मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

पूर्वपिठीका –

इंग्रज सरकारला विनंती करून, त्यांच्या अटी मान्य करून अंदमानातून मुख्य हिंदुस्थानात येण्यामागचा सावरकरांचा मुख्य उद्देश राष्ट्रसेवा हाच होता. त्यांना माहित होतं की अंदमानात जेलमधून राहून आपण देशासाठी कांहीच करू शकणार नाही. तेच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीवरून आपण अप्रत्यक्षरित्या का होईना स्वातंत्र्यचळवळीचा भाग होऊ शकू. निदान या कार्यासाठी लोकांना प्रेरित  करू शकू. त्यासाठी अखिलहिंदू एकतेचं महत्व लोकांच्या गळी उतरवून जातीपातीमुळे विखुरलेला हिंदुसमाज एकसंध व्हावा यासाठी प्रयत्न  करू. परकियांच्या ‘divide and rule’ या धोरणाला त्यावाचून खीळ बसणार नाही.

अखेर अंदमानातून आणून रत्नागिरी इथे सरकारने त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी हिंदूसभेची स्थापना केली व आपले स्थानबद्धतेतील पहिले भाषण दिले, अस्पृश्यता निर्मूलन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सकलहिंदुएकतेचं आपलं ध्येय त्यानी सात वर्षांतच गाठलं व रत्नागिरी इथं श्रीपतीतपावन मंदीर  उभारलं, जिथं सर्व जातींच्या हिंदूंना मुक्त प्रवेश होता; इतकंच नव्हे तर गाभाऱ्यात जाऊन पूजापाठ करण्याची, वेदमंत्रोच्चाराची मुभा होती. हिंदुएकता व अस्पृशता निर्मूलनावर त्यांनी अनेक कविता रचल्या व त्या विविध संघटनांद्वारे, विविध ठिकाणी, विविध समारंभातून जाहीर रित्या गायल्या गेल्या अशा प्रकारे समाज प्रबोधन करून त्यांनी ही सामाजिक  चळवळ पुढे नेली. थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, आपल्या एका भाषणात म्हणाले होते, “मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं पण अवघ्या सात वर्षांतच  या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली आहे ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”

सावरकरांच्या प्रेरणेतूनच शेठ भागोजी कीर यांनी रत्नागिरी येथे साकारलेल्या पतितपावन मंदिरात देव प्रतिष्ठेचा अभूतपूर्व  समारंभ २२ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला तेंव्हा सर्व  जाती, उपजातीचे पाच हजारांहून अधिक हिंदू जमले होते. अनेक सामाजिक व राजकीय नेते, संतमहंत तसेच वेदान्ताचे गाढे अभ्यासक, ‘महाभागवत’ डाॅ शंकराचार्य  कुर्तकोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याप्रसंगी सर्व जाती, उपजातीच्या वीस हिंदु युवतींनी सावरकरांचे हे गीत एक कंठाने गायले.

हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा... स्व. वि. दा. सावरकर ☆

उद्धरिसी गा हिंदुजातिसी केंव्हा

हे हिंदुजातिच्या देवा ॥ धृ. ॥

आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही

तुम्ही पतितपावन  स्वामी

निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया

चुकलो न आपुल्या पाया

आणि पायांनी राखु शुद्धता साची

छाटिले पावलांनाची

ऐकू न पडो आपुलिया कानाते

मुख कथी न म्हणुनि ज्ञानाते

निज सव्यकरे वामकरा जिंकाया

विक्रियली शत्रुला काया

करु, बंधूसी बंद करु दारा, जे

चोर ते घराचे राजे

हे पाप भयंकर  झाले । रे

पेरिले फळाला आले। रे

हृदि असह सलते ते भाले । रे

उद्धार अता! मृत्युदंड की दे वा

हे हिंदुजातिच्या देवा! ॥१॥

 

अनुताप परी जाळितसे या पापा

दे तरि आजि उःशापा

निर्दाळुनि त्या आजि भेद – दैत्यासी

ये हिंदुजाति तुजपाशी

ते अवयव विच्छिन्न सांधिले आजि

तू फुंकी जीव त्यामाजी

देऊनि बळा वामनासि ह्या काळी

तो घाल बळी पाताळी

जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी

परि तुझी गदा तुजजवळी

जरि करिसी म्हणू जे आता। रे

म्हणशील करू ते नाथा । रे

उठू आम्ही परि दे हाता। रे

दिधलासि जसा कंस मारिला तेंव्हा

हे हिंदु जातीच्या देवा ॥२॥

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

सावरकरांच्या सर्वच कविता गेय आहेत कारण त्या वृत्तबद्ध  आहेत. बहुतांश कविता जरी विविध मात्रावृत्तात बांधलेल्या असल्या तरी त्यांनी इतर वृत्तांचा वापर देखिल केलेला आहे.

या कवितेत ते पतितपावनाचा धावा करीत आहेत. अस्पृश्यता पालनामुळे हिंदु धर्माचे नुकसान कसे झाले व आता आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला तुमच्या सहाय्याची कशी आवश्यकता आहे, हे या कवितेत कवी पटवून देतात. आम्ही पापी आहोत, संपूर्ण हिंदु समाजच पतीत आहे, पण तुम्ही पतितपावन आहात तर तुम्ही आमचा हा हिंदु समाजपुरूष एकसंध करून आमचा उद्धार करा.

वेदांनी ब्राम्हणांना समाजपुरूषाचे मस्तक मानले आहे तर शूद्रांना पाय. कवी म्हणतात आमच्या मस्तकाला विटाळ होऊ नये म्हणून आम्ही आमचे पाय तोडले, इतकच नव्हे तर पायांनी देखिल आपली शुद्धता राखण्यासाठी पावलं तोडली. म्हणजे जसे सवर्णांनी दलितांना दूर लोटले तसेच शूद्रांनी पण अतिशूद्रांना दूर केले, सामावून घेतले नाही.

कानांनी ज्ञान ग्रहण करू नये म्हणून मुखाने त्याचा उच्चार केला नाही. म्हणजे ब्राम्हणांनी शूद्रांना वेदाध्ययनापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून वंचित  ठेवलं.

क्षत्रियांनी देखिल अशाच चुका केल्या. डाव्या हाताला जिंकण्यासाठी उजव्या हाताने आपलं पूर्ण शरीरच शत्रूला  विकलं. जसे जयचंदाने पृथ्वीराजास जिंकण्यासाठी महंमद घोरीला आपलं स्वातंत्र्य विकलं. सख्ख्या भावाला घरात कोंडून चोराच्या हातात आम्ही जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या. असं करून आपण आपलच नुकसान करून घेत आहोत हे आम्हाला कळलं नाही.

आता आम्हाला आमच्या चुका समजल्या आहेत. आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमच्या चुकांमुळेच हिंदु समाजपुरूष पंगु झाला आहे. आता याची जाणीव आम्हाला झाली आहे.

हा सल भाल्याप्रमाणे आम्हास  टोचतो आहे. आता आम्ही हे तोडलेले अवयव जोडले आहेत पण त्यात जीव येण्यासाठी, एकसंधता येण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.

तेंव्हा हे हिंदूंच्या देवा, तूच आम्हाला सहाय्य करून आमचा उद्धार तरी कर नाहीतर मृत्युदंड तरी दे. भेदाभेद राक्षसाचे निर्दालन करून आम्ही तुला शरण आलो आहोत, तरी आम्हाला उःशाप दे.

कंसासारख्या दुष्ट प्रवृतींचे उच्चाटन करण्यासाठी जसा तू आम्हाला मदतीचा हात दिलास तसाच आताही दे जेणेकरून अशा समाजविघातक कुप्रथांचे उच्चाटन करून हा हिंदुसमाजपुरुष एकसंध व बलशाली होईल. एवढीच विनंती मी तुला करतो आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर

पहाटेच्या हळूवार स्पर्शानं सकाळ जागी झाली होती. सूर्य किरणांची लगबग संपून ते स्थिरावले होते. कुठं धुणं धुतल्याचे आवाज तर कुठे भांडयांचा खणखणाट ऐकू येत होता. कुठे ‘‘ दिपे, पाणी काढलंय आंघोळीला जा,’’ अशा हाका, कुणी दोन्ही खांद्यावर पदर घेऊन हातात किटली घेऊन दूध आणायला चाललं होतं. कुणी लगबगीनं नोकरीचं ठिकाण गाठायला निघालं होतं.

सगळं कसं रोजच्या सारखं चाललं होतं. कुठे कुणी अडखळत नव्हतं कि चाचरत नव्हतं. जणू काल काही घडलचं नव्हतं. कालचा दिवस यांच्या आयुष्यात उगवलाच नव्हता. सगळे जगतायत. कां? प्रत्येकाकडं कारण आहे,  जगण्याचं! स्वतःसाठी, स्वतः निर्माण केलेलं! कुणाला खूप मोठं व्हायचयं, कुणाला खूप पैसा मिळवायचाय, कुणाला छान संसार थाटायचाय, कुणाला मुलांना मोठ्ठ करायचंय, कुणाला मुलांची लग्न करायचीत, कुणाला नातवंडं पहायचीत, तर कुणाला त्यांची लग्नं….सारं न संपणारं! सा-या मनाच्या समजुती. अन् असं मनाला पटण्याजोगं कारण नसेल ना तर “आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा आहे. संकटांना निधडया छातीनं सामोरं जायला हवं, जीवनाचा क्षण न् क्षण वेचला पाहिजे. त्यातून आनंद मिळवला पाहिजे.” असं अगदी राणी लक्ष्मीचा आव आणून सांगतील. पुळचट! स्वतः पुळचट  असतात. आत्महत्या करण्याचं धाडस नसतं आणि ते दाखविणा-याला भ्याड म्हणतात.

 पण खरंच! आयुष्यात कांहीतरी करून दाखविण्याची धमक असणारे किती निघणार? हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे! बाकी सगळे सामान्य अतिसामान्य! संसाराच्या चौकटीत रमणारे. मग सगळेच जर तसे धाडसी असते तर काय झालं असतं? सगळा समाज विस्कळीत झाला असता. त्यांना एकत्र बांधणारा कांही दुवाच राहीला नसता. कुठे कांही लागेबांधेच राहिले नसते. कुठं कुणासाठी अश्रुच वाहिले नसते. सगळं कसं अशाश्वत झालं असतं.

अशाश्वत? अशाश्वत झालं असतं, म्हणजे आता सगळं शाश्वत आहे? आहे तर काय! सगळं शाश्वत आहे. म्हणून तर कुणी उद्यासाठी घर बांधतय, कुणी पैसा साठवतंय, कुणी दागिने करतंय. प्रत्येकजण उद्यासाठी जगतोय. उद्याच्या स्वप्नांसाठी! स्वप्नांच्या पूर्ततेचा आनंद लुटण्यासाठी! पण खरंच जर सगळं अगदी अशाश्वत असतं नां, तर एक मात्र चांगलं झालं असतं. प्रत्येकजण वर्तमानातला प्रत्येक क्षण न् क्षण जगला असता अगदी अधाशासारखा! स्वच्छ, पारदर्शक, निर्भेळ, निरपेक्ष जगला असता. या शाश्वतामुळं जगण्यावरच मळभ साठलंय. कुणी जगत नाहीय, आपोआप जगले जातायत. कुजणारं स्वत्व आणि त्यावर वाढणा-या स्वार्थाच्या आळयांच्या बुजबुजाटात !

अशाश्वताने आपलं अस्तित्व दाखविण्यासाठीच  कालचा  नंगा नाच केला असावा. शाळेला म्हणून घराबाहेर पडलेली मुलं परतलीच नाहीत. त्यांचे आई बाप हा नियतीचा क्रूर खेळ पहात बसलेत. अशाश्वताच्या विळख्यानं गुदमरत! आपल्या आसपास मात्र सगळं शाश्वत आहे. जणू, काल टी.व्ही. वर दाखवलेला मुलांच्या पालकांचा आक्रोश यांच्या कानापर्यंत पोचलाच नाही. सगळयांची उद्याची आखणी, उद्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

मगं खरं काय आहे? शाश्वत की अशाश्वत? कां अशाश्वताच्या धुक्यातून चाचपडत वाट काढू पहाणारं, पैलतीराचं मृगजळ दाखवणारं शाश्वत! कि शाश्वतावर आरूढ होवून त्याला हवं तसं दौडू देणारं पण लगाम मात्र आपल्या हातात ठेवणारं अशाश्वत!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…

पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…

कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच  तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .

दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.

काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …

तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..

ती प्रचंड खुश…

तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..

भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.

ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली  होती ….

त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..

“ आई इतकं काय निरखून बघताय?”

“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “

सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..

“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…

तिचा तिला वेळ द्या….  कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”

तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “  अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “

सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .

‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत  तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .

अनेक जण सांगणारे भेटले.  माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .

एकदा सुन म्हणाली …. 

“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”

तिने सुनेच्या  बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.

यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही  कमी झाला .

मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …

ती चमकली.  फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं…. 

वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…

ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.

मनोमन तिला सगळं काही उमगलं…

अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…

… आई स्टूलावर  चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल  घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल  पकडले…

आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा  डोळ्यात दिसत होती….

दोघी  कौतुकाने   छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…

सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……

कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सियाचिन….जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहा-यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं…  तिचं नाव शिवा चौहान…अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम. 

१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले.  राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली. घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच मुळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.

सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या, यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुरुषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये नेमणूक मिळाली. 

त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘ फायर अ‍ॅन्ड फ्यूरी सॅपर्स ‘ ….अर्थात ‘ अग्नि-प्रक्षोप पथक.’ .हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खो-यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते…त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे…सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात…अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच फायर अ‍ॅन्ड फ्यूरीच्या अधिकारी.   

Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं ! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत. 

आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणं, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत. 

कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे, इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या. त्यांच्या आधी महिला अधिका-यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं…..  पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहीम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक, अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही. 

आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला…प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिनवर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले…एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा! 

सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरुण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे ! 

नवरात्राच्या दुस-या माळेच्या निमित्ताने …..  कॅप्टन शिवा चौहान आपणांस अभिमानाने सल्यूट…जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिंतामुक्त कसे व्हावे?…” – लेखक : स्वामी विज्ञानानंद ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिंतामुक्त कसे व्हावे?…” – लेखक : स्वामी विज्ञानानंद ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

बायको घरात फार कटकट करते म्हणून एखाद्या माणसाने घर सोडून रानात जावे, यासारखे मूर्खपण कोणते? अरे, तुला एका अबलेची कटकट वाटते, तर रानातला लांडगा तुझ्याकडे टकमक पाहात राहील, तेव्हा तुझे काय होईल? भातात खडा सापडला, म्हणून तू घरातून निघून जातो आहेस, त्या जंगलात तुलाच खाऊन टाकण्यासाठी वाघ खडा आहे.

संकटामध्ये पलायनवाद हा सोपा वाटतो; पण तो तसा नसतो. तुकाराम महाराजांच्यासारखे संत म्हणूनच सांगतात,

नको गुंतो भोगी

नको पडो त्यागी।

लावूनि सरे अंगी देवाचिया॥

सुख मिळत नाही म्हणून त्रागा करण्यापेक्षा, सुखाच्या वेळीसुद्धा तू देवाला भागीदार करून घे. म्हणजे दुःख आपोआप भागले जाईल. देवमातेच्या खांद्यावर, कडेवर तू सुरक्षित नाहीस, ही भावनाच खोटी. देवमातेच्या कडेवर एकदा बसले म्हणजे मखमलीवरून चालण्याचे सुखही त्या मातेलाच आणि मध्ये काटेरी वाटेचे बोचरे दुःखही तिलाच. यापेक्षा अधिक उत्तम मार्ग शिल्लक नाही.

 संकटे काय ती सामान्य माणसाला असतात, ही समजूत खोटी आहे. संकटे भक्तांना जास्त असतात. आणि देवाच्या आयुष्यात संकटांचा कळस असतो. राम, कृष्ण, शिव, सगळ्यांच्या जीवितामध्ये संकटांचे कळस झाले. आणि तसे ते झाले म्हणून लोकांनी त्यांच्या मूर्तीवर कळस चढवून, देवमंदिरे बांधली.

संकटे यावी लागतात, ती सोसावी लागतात, त्यातच पुरुषार्थ असतो. छोट्या चमत्कारात नव्हे.

लेखक :स्वामी विज्ञानानंद

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “WhatsApp वर बोलू काही…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “WhatsApp वर बोलू काही…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी आयुष्यावर बोलू काही… असा एक खास आणि छान कार्यक्रम सगळ्यांना दिला. त्यावरून हे सुचल.

खर तर आयुष्यावर बोलू काही म्हणत खरेच (खरेच म्हणजे संदिप खरे) बोलले आणि सलील कुलकर्णी यांनी गाणी म्हटली आम्ही फक्त त्यांचे (खरे) बोलणे आणि सलील यांची गाणी ऐकली. (त्यांचे आडनावच खरे अस असल्याने जे बोलले ते खरे बोलले असेच म्हणावे लागेल.) आम्ही कार्यक्रम सुरू असताना बोललोच नाही. बोललो असेल ते सुद्धा आपसात. इतका मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम.

आयुष्यावर बोलू काही… आणि WhatsApp वर बोलू काही यात काही साम्य आहे. तर काही फरक.

साम्य अस कि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम प्रामुख्याने दोघांचाच आहे, तिसरा हा सहाय्यक म्हणून असतो. तसाच WhatsApp वर बोलू काही हा कार्यक्रम देखील दोघांचाच आहे.

आयुष्यावर… यात काही वेळा दोघांची जुगलबंदी बघायला मिळते, तशीच जुगलबंदी WhatsApp वर… यावेळी असते.

जुगलबंदी बरोबरच या कार्यक्रमात काहीवेळा संदिप खरे बोलत असतात तेव्हा सलील शांतपणे ऐकत असतात. WhatsApp वर… या कार्यक्रमात देखील एकजण बोलत असतांना दुसरा शांतपणे ऐकत असतो. किंबहुना त्याला फक्त ऐकावेच लागते. त्याने मधे बोलण्याचा प्रयत्न केला तर… वाढलेल्या आवाजात जुगलबंदी सुरू होते. आणि ती तितकी श्रवणीय नसते.

दुसरे साम्य अस कि या गाण्याच्या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपलीशी वाटणारी गाणी आहेत. अग्गोबाई… देते कोण… देही वणवा पिसाटला… पासून मी मोर्चा नेला… दमलेल्या बाबाची कहाणी… अशी सगळ्यांसाठी व काही अंतर्मुख करणारी गाणी आहेत.

तसच WhatsApp वर बोलू काही. यात यश, वाढदिवस, लग्न, चिमुकल्यांचे आगमन, उत्सव, सणवार ते श्रध्दांजली पर्यंत  सगळ्यांसाठी आनंद देणाऱ्या आणि दु:खाच्या गोष्टी फोटो आणि व्हिडिओ सह येतात.

फरक असा आहे की आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम व्यवस्थित नियोजन करून होतो. त्या कार्यक्रमाची तारीख, वार, वेळ, ठिकाण, कार्यक्रमाचा साधारण कालावधी हे ठरलेल असत. तसेच त्याची जाहिरात देखील होते. कदाचित कार्यक्रमाची रंगीत तालीम देखील होत असावी.

पण WhatsApp वर बोलू काही या कार्यक्रमाचे मात्र कोणतेही नियोजन नसते. वेळ, काळ, आणि त्यावेळी होणारा WhatsApp चा (अति) वापर यावरून हा कार्यक्रम केव्हाही, कुठेही होऊ शकतो. वेळ (कार्यक्रम सुरू होण्याची, आणि संपण्याची) त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. या कार्यक्रमाची जाहिरात नसते. (पण कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्तींकडून खाजगीत सर्वदूर पसरणारी चर्चा होण्याची शक्यता असते.)

थोडक्यात आयुष्यावर बोलू काही याची जाहिरात करावी लागते, WhatsApp वर बोलू काही याची जाहिरात काहीवेळा कार्यक्रम संपल्यावर (रंगून आणि रंगवून) होते. रंगीत तालीमची गरज नसते. उत्स्फूर्त आणि जोशपुर्ण सादरीकरण असते.

दुसरा फरक WhatsApp वर बोलू काही या कार्यक्रमात काही वेळा जोडी बदलते. नवराबायको, आईमुलं, वडीलमुलं अशा जोड्या बदलत असतात. तिसरा येथे सहाय्यक म्हणून असतो.

आयुष्यावर… यात आवाज सगळ्यांपर्यंत ऐकू जाईल याचा प्रयत्न. तर WhatsApp……. यात आपल बोलण दोघांतच आणि दोघांचच राहिल याची दक्षता. पण आवाज मोठा असतो. काही वेळा परिस्थिती नुसार नुसत्या डोळ्यांनीच हा कार्यक्रम होतो.

आयुष्यावर… यासाठी घराघरांतून लोकं ऐकण्यासाठी शक्य असल्यास मित्रमंडळीसह जातात. तर WhatsApp…. हा कार्यक्रम खाजगीतला, कौटुंबिक  असतो.

पण एक नक्की… आयुष्यावर बोलू काही हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम आहे. आणि अवेळी आणि अती होणाऱ्या WhatsApp च्या वापरानंतर WhatsApp वर बोलू काही हा अंतर्मुख करणारा कार्यक्रम आहे.

WhatsApp वाईट नाही. पण चांगल काय आहे? किती, केव्हा, कुठे, कसं वापरायचं हे समजलं तर WhatsApp वर बोलू काही हा कार्यक्रम देखील आयुष्यावर… याचा इतकाच चांगला होईल.

WhatsApp वर बोलू काही, हे WhatsApp वरच लिहून पाठवत असल्याने येथेच कार्यक्रम थांबवतो…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शारदीय नवरात्र… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ शारदीय नवरात्र… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गणेशोत्सव संपला की सर्वांना नवरात्राचे वेध लागतात ! नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. नऊ हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.

सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे हे शिकवतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आली आहे. पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो तर अश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो..

आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकांशी जोडलेले असतात. भौतिक प्रगतीच्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप, तेज, माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची ‘श्री महालक्ष्मी’, ‘श्री महासरस्वती’ आणि ‘श्री महांकाली’ ही तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी  संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ज्ञानाची देवता आहे. श्री महाकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे महाकाली ही वाहनावर बसून हातात आयुधे घेतलेली अशी आपण पाहतो.

पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सर्जनाचे प्रतीक असणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरु होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत  सप्तधान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन रोपे तयार होतात. यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो. मातीच्या घटातून येणारी ही छोटी रोपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात. ही ‘आदिशक्ती’ असते.

याच काळात “सरस्वती”ची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटीपूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ‘ तू शक्ती दे, तू बुद्धी दे ‘ असे म्हणून सरस्वती पूजन होते. पाटी पूजन अजूनही कित्येक मराठी शाळांमधून केले जाते. ते नवमीच्या दिवशी होते.

या नवमीला खंडे नवमी असेही म्हणतात.त्या दिवशी पांडव वनवासातून परत आले आणि वनवासाला जाताना शमीच्या झाडांवर ठेवलेली शस्त्रे त्यांनी काढून घेतली आणि कौरवांशी युध्दाची तयारी केली. अशा या खंडेनवमीचे स्मरण म्हणून आपण घरी शस्त्र पूजा करतो. देवासमोर घरात असणारी छोटी मोठी शस्त्रे जसे की सुरी, कात्री, कोयता मांडून ठेवतात व त्याची पूजा करतात. (आमच्याकडे माझे मिस्टर डॉक्टर असल्याने आम्ही स्टेथोस्कोप, फोर्सेप्स, सिरींज यासारख्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करत होतो.) शेवटी ही पण आत्ताच्या काळातील शस्त्र आहेत ना ! खंडेनवमीला वाहनांची  पूजाही करण्याची पद्धत आहे.. अर्थात काहीजण दसऱ्याच्या दिवशीही करतात. त्यानिमित्ताने  वाहने स्वच्छ करणे, धुऊन काढणे, झेंडूच्या फुलांच्या माळा घालून सुशोभित करणे, दाराला तोरण बांधणे हे सर्व घडते.

देवीचे तिसरे रूप म्हणजे “महाकाली” ! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रुप ! यात देवी  सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते. आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठीही “महाकाली” ची पूजा आहे !

या सर्व देवी रूपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र ! या नवरात्राला “शारदीय नवरात्र” हे सांस्कृतिक नाव साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजनशक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे, यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर केले जातात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ ! त्यामुळे आपल्याला बुद्धी वैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते.

ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते तो हा ‘ नऊ ‘ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळे ही  नवनिर्मिती होते. भारतात विविध  प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे, गुजरातमध्ये देवीसमोर गरबा खेळला जातो. बंगालमध्ये कालीमाता उत्सव होतो. उत्तर भारतात दुर्गा पूजन होते, तसेच महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आणि इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.

सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवीस्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी, हीच या शारदीय नवरात्राच्या काळात मी देवीची प्रार्थना करते.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके  

मला पाहून ती थबकली….जागच्या जागी खिळून राहिली जणू ! अजून अंगाची हळदही न निघालेली ती….दोन्ही हातातील हिरव्या बांगड्या सुमधूर किणकिणताहेत. केसांमध्ये कुंकू अजूनही ताजंच दिसतं आहे. तळहातावरील मेहंदी जणू आज सकाळीच तर रेखली आहे…तळहातांचा वास घेतला तर मेहंदीच्या पानावर अजूनही झुलणारं तिचं मन दिसू लागेल… तिनं केसांत गजराही माळलेला आहे….तिच्या भोवती सुगंधाची पखरण करीत जाणारा. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचं लक्ष आधी माझ्या कपाळाकडे आणि नंतर आपसूकच गळ्याकडे गेलं….बांगड्या फोडल्या गेल्या त्यावेळी हातांवर झालेल्या जखमांचे व्रण तिच्या नजरेतून सुटले नाहीत….आणि तिच्या चेह-यावरच्या रेषा सैरावैरा होऊन धावू लागल्या….एकमेकींत मिसळून गेल्या….एक अनामिक कल्लोळ माजला तिच्या चेह-यावर ! 

ती शब्दांतून काहीही बोलली नसली तरी तिची नजर उच्चरवाने विचारत होती….. ही अशी कशी माझ्या वाटेत येऊ शकते? खरं तर हिने असं माझ्यासारखीच्या समोर येऊच नये….उगाच अपशकुन होतो. मी सौभाग्यकांक्षिणी होते आणि आता सौभाग्यवती….सौभाग्याची अखंडित कांक्षा मनात बाळगून असणारी! सौभाग्याची सगळी लक्षणं अंगावर ल्यायलेली. कपाळी कुंकू, नाकात नथ, कानांत कुड्या, दोन्ही हातांत हिरवा चुडा, बांगड्यांच्या मध्ये सोन्याच्या बांगड्या, बोटांत अंगठ्या, केसांमध्ये कुंकवाची रेघ, पायांत जोडवी आणि गळ्यात मंगळसूत्र….त्याचा आणि माझा जीव एका सूत्रात बांधून ठेवणारं मंगळसूत्र. आज घटस्थापनेचा मुहूर्त….आणि त्यात हिचं येणं…काहीच मेळ लागत नाही ! 

मी म्हणाले…तुझ्या कपाळाचं कुंकू माझ्या कुंकवानं राखलंय…माझ्या कपाळीचं पुसून. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कायम रहावं म्हणून तो माझं मंगळसूत्र तोडून निघून गेलाय मला शेवटचही न भेटता. कडेवर खेळणा-या लेकात आणि माझ्या पोटात वाढणा-या बाळात त्याचा जीव अडकला नसेल का?  बहिणींच्या राख्या त्याला खुणावत नसतील का? दिवसभर कमाई करून दिवस मावळताच पाखरांसारखं घरट्यात येऊन सुखानं चार घास खाणं त्याला अशक्य थोडंच होतं..पण त्यानं निराळा मार्ग निवडला…हा मार्ग बरेचदा मरणाशी थांबतो. 

पण मीच कशी पांढ-या कपाळाची आणि पांढ-या पायांची? माझं कपाळ म्हणजे जणू माळरान आहे जन्म-मरणातील संघर्षाचं. इथं मैलोन्मैल काहीही नजरेस पडत नाही. रस्त्यात चिटपाखरू नाही आणि सावलीही. झळा आणि विरहाच्या कळा. मनाचं रमणं आणि मरणं….एका अक्षराचा तर फेरफार ! मन थोडावेळ रमतं आणि बराच वेळ मरतं.

मी सुद्धा अशीच जात होते की सुवासिनींच्या मेळ्यांमध्ये. एकमेकींची सौभाग्यं अखंडित रहावीत  म्हणून प्रत्येकीच्या कपाळी हरिद्रम-कुंकुम रेखीत होतेच की. मग आताच असं काय झालं? कपाळावरचा कुंकुम सूर्य मावळला म्हणून माझ्या वाटेला हा अंधार का? माझ्या कपाळी कुंकू नाही म्हणून का मी दुसरीला कुंकू लावायचं नाही? माझ्याही पोटी कान्हा जन्मलाय की….माझ्या पोटी त्यांची ही एक कायमची आठवण! मी कुणा गर्भार सुवासिनीची ओटी भरू शकत नाही. 

कुणाच्या मरणावर माझा काय जोरा? मरणारा कुणाचा तरी मुलगा,भाऊ,मामा,काका इत्यादी इत्यादी असतोच ना? मग त्याच्या मरणानं मी एकटीच कशी विधवा होते? नव-याच्या आईचा धनी जगात असेल तर तिला कुंकवाचा अधिकार आणि जिने आपले कुंकू देशासाठी उधळले तिच्या कपाळावर फारतर काळ्या अबीराचा टिपका? 

मूळात हा विचार कदाचित आपण बायकांनीच एकमेकींच्या माथी चिकटवलेला असावा, असं वाटतं. आता हा विचार खरवडून काढायची वेळ आलेली आहे…कपाळं रक्तबंबाळ होतील तरीही. मातृभूमीच्या रक्षणासाठी मरण पत्करणा-यांच्या आत्म्यांना अंतिमत: स्वर्ग देईन असं आश्वासन दिलंय भगवान श्रीकृष्णांनी. मग या आत्म्याच्या जीवलगांना देव अप्रतिष्ठेच्या,अपशकूनांच्या नरकात कसं ठेवील…विशेषत: त्याच्या पत्नीला? त्याच्या इतर नातलगांना हा शाप नाही बाधत मग जिने त्याचा संसार त्याच्या अनुपस्थितीत सांभाळला तिला वैधव्याच्या वेदना का? का जाणिव करून देतोय समाज तिला की तु सौभाग्याची नाहीस? सबंध समाजाचं सौभाग्य अबाधित राखण्यासाठी ज्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या सौभाग्याचं कुंकू असं मातीमोल करून टाकण्याचा अधिकार कुणी का घ्यावा आपल्या हाती?

उद्या पहिली माळ….जगदंबा उद्या युद्धाला आरंभ करेल…दानवांच्या रुधिराच्या थेंबांनी तिचं अवघं शरीर माखून जाईल आणि कपाळ रक्तिम..लाल दिसू लागेल. जगदंबा अखंड सौभाग्यवती आहे…कारण देवांना मृत्यूचा स्पर्श नसतो होत. मग तिच्या लेकींना तरी या पिवळ्या-लाल रंगाच्या रेखाटनाविना कशी ठेवेल ती? 

जगदंबेची लढाई तर केंव्हाच संपून गेली….दानव धुळीस मिळवले तिने. तिच्या देहावरील रक्त केंव्हाच ओघळून जमिनीत मुरून गेलंय. आता आपण अनुभवतो तो स्मरणाचा आणि राक्षसांच्या मरणाचा सोहळा. नवरात्र हे प्रतीक आहे त्या रणाचं. आया-बायांनो,बहिणींनो,सौभाग्यवतींनो..आजच्या पहिल्या माळेला तुम्ही किमान माझ्यासारखीच्या भाळावर तरी हळदी-कुंकवाची दोन बोटं उठवलीत ना तर हुतात्म्यांचे आत्मे तृप्त होतील, सीमेवर लढणारी इतरांची सौभाग्यं आणखी प्राणपणानं झुंजतील. कारण आपल्या माघारी आपल्या  नावाचं सौभाग्य पुसलं जाणार नाही ही जाणीव त्यांना प्रेरणा देत राहील.

स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांनी जिजाऊ मांसाहेबांना शहाजीराजेसाहेबांच्या मागोमाग सती नाही जाऊ दिलं….त्यांच्या चितेच्या समोर हात पसरून उभं राहून त्यांनी आईसाहेबांना रोखून धरलं. राज्याभिषेकातल्या होमातील रक्षा जिजाऊंनी आपल्या कपाळी लावली. जिजाऊ राहिल्या म्हणूनच स्वराज्याच्या कपाळावर स्वातंत्र्याचा कुंकुमतिलक सजू शकला.शूर धुरंधराची स्वाभिमानी पत्नी आणि लाखो कपाळांवरील कुंकू टिकावं म्हणून जीवाचं रान करणा-या शूर सुपुत्राची माता म्हणून जिजाऊसाहेबांचा मान उभ्या महाराष्ट्राने राखला. असाच मान आजही हुतात्म्यांच्या पत्नींना,मातांना,लेकींना मिळावा हे मागणं फार नाही !  

आज मी निर्धारानेच आले आहे आईच्या गाभा-यात…तुम्हां भरल्या कपाळांच्या पावलांवर पाऊल टाकून. .. पण आज मी ठरवलं….देवीसमोर जाऊन तिच्याकडे आणखी काहीतरी मागायचं….एक आठवण आहे सौभाग्याची माझ्या पदरात..त्यांचा लेक….त्यालाही मातृभूमीच्या सेवेत धाडायचं ! 

*************************************  

रास्ते मे विधवा वीर-वधू को देख; 

एक नववधु ठिठक गई !

यह विधवा मेरे रस्ते में; 

क्यों आकर ऐसे अटक गई?

तुम यहां कहां चली ;आई हो भोली !

यह नववधुओं की तीज सखी; 

यह नहीं अभागन की टोली !

यह सुनकर वह वीर पत्नी बोली

मुझको अपशकुनी मत समझो 

मैं सहयोगिनी उसे सैनिक की; 

जो मातृभूमि को चूम गया !

तुम सब का सावन बना रहे; 

वो मेरा सावन भूल गया!

तुम सब की राखी और सुहाग; 

वो मंगलसूत्र से जोड़ गया !

तुम सब की चूड़ी खनकाने; 

वो मेरी चूड़ी तोड़ गया !

मेरी चुनरी के लाल रंग; 

वो ऐसे चुरा गया!

उनकी सारी लालिमा को; 

तुम्हारी चुनरी में सजा गया !

उनकी यादों की मंदिर में; 

मैं आज सजने आई हूं !

मेरा बेटा भी सैनिक हो; 

भगवान को मनाने आई हूं !

विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा स्तुत्य उपक्रम काही सामाजिक संस्थांनी हाती घेतला आहे. सैनिक आणि त्यांच्या परिवारांसाठी कार्यरत असणा-या जयहिंद फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या शूर सौभाग्यवतींसाठी आणि इतर भगिनींसाठी विधवा प्रथेला मूठमाती देऊन वीरपत्नींना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातीलच एका वीर सैनिक – वीर पत्नीची कहाणी वाचून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. उपरोल्लेखित हिंदी कविता त्यांच्याच लेखात आहे. आज नवरात्रातली पहिली माळ….चला उजाड कपाळांवर सौभाग्याचा सूर्य रेखूया….जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर 

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलाच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे.

भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे—

।।नभ: स्पृशं दीप्तम्।।

हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आलेले आहे. (भगवद्गीता ११.२४)

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन्  यांनी हे वाक्य सुचविले. त्याचा अर्थ असा आहे “हे! विष्णो, आकाशस्पर्शी ज्योती सारखा आणि अनेक वर्णयुक्त, उघड्या मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्राच्या तुला पाहून भयभीत झालेल्या माझ्यामध्ये धैर्य आणि शांती नाहीशी झाली आहे.”

थोडक्यात ज्या भयभीत झालेल्या अर्जुनातली वीरश्री जागृत करण्याचं काम भगवंताने केले त्याप्रमाणे वायुसैनिकांना हे घोषवाक्य लढण्यास प्रवृत्त करते.

८ ऑक्टोबर १९३२  रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली म्हणून ८ ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिन समजला जातो. सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. 

ब्रिटिशकालीन वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स असे होते (१२ मार्च १९४५). मात्र स्वातंत्र्यानंतर त्यातले रॉयल जाऊन भारतीय वायुसेना दल असे त्याचे नामकरण केले गेले. 

१९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. नंतर वेगवान जेट विमाने आली. नेट, हंटर कॅनबेरा यासारखे ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी झाली. परराष्ट्रीय धोरणानंतर रशियन हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल झाली. सध्याच्या काळात रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वाॅरफेअर सी —४—आय संगणकीय सुविधा वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूरस्थ शत्रूच्या विमानाची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरच्या शत्रूंच्या तळाचा शोध घेणारी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय वायुसेनेत सहभागी आहेत. येत्या काही वर्षात हवाई दलाच्या यादीत २२० एलसीए चा(L C A) ताफा असेल.त्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख मिग२९या लढाऊ विमानाचे पायलट  विवेक राम चौधरी हे  आहेत. ते  २७वे एअर चीफ मार्शल आहेत.(३० सप्टेंबर २०२१) ते नांदेडवासी आहेत.महाराष्ट्रासाठी ही गौरवशाली बाब आहे. 

वायुसेना दिनाच्या वेळी भारतीय हवाई दलाचे धाडसी वैमानिक लष्कराच्या विविध विमानांसह एक अप्रतिम एअर शो करतात. विशेष पराक्रम गाजवण्यार्‍या हवाईदल सैनिकांना सन्मानचिह्ने दिली जातात. यावर्षीचा हा ९१ वा वायुसेना वर्धापन दिन आहे. यावर्षीचा फ्लाय पास्ट उत्तर प्रदेश मधील सांस्कृतिक नगरी प्रयागराज इथे होणार आहे.

भारतीय वायुसेना म्हणजे भारताचा अभिमान आणि शान आहे. 

प्राणपणाने भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या या वायुसैनिकांना मानाचा मुजरा !!

वंदे भारत ! 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टी दिन : 12 ऑक्टोबर… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ दृष्टी दिन : 12 ऑक्टोबर… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 लहानपणी शिकलेला व कायम लक्षात राहणारा एक धडा आठवला डोळ्यांचा भाव असे नाव होते. त्यातही डोळ्यांची किंमत एका एक डोळा नसलेल्या श्रीमंत व्यक्तीने सांगून डोळस माणसाचे डोळे उघडले होते.डोळ्यां वरून खूप म्हणी व वाक्प्रचार पण आहेत.आणि डोळ्यांचे उपयोग पण खूप आहेत.अगदी व्यक्ती शब्दाने बोलू शकत नसेल तरी डोळ्यांनी बोलतो.डोळ्यांची भाषा कधीच खोटे बोलत नाही.डोळे माणसाच्या मनाचा आरसा असतात.डोळे वाचता आले की माणूस वाचता येतो आणि समजतो.मग आपकी नजरोने समझा असेही होते.जसे नजरेने भाव वाचले जातात तशी नजर लागते पण.मग काय नजर काढावी लागते.ही नजर केव्हा,कुठे,कोणाची लागली?ती कशी काढायची हे प्रेमळ नजरेला व्यवस्थित कळते.तसेच एखाद्या चांगल्या उत्तम गोष्टींवर डोळा पण ठेवला जातो.हा डोळा त्यातील भाव चांगले असतील तर नजर लागी राजा असे होते. किंवा आँखो ही आँखो मे इशारा पण होतो. अगदी लहान बाळाचे भाव व्यक्त करणारे निरागस डोळे त्याच्या भावना सांगून जातात.तर म्हातारे,आजारी लुकलुकणारे डोळे पण बरेच काही सांगून जातात.माणूसच काय पण पशू,पक्षी हे सुध्दा डोळ्यांनी बोलतात.फक्त डोळे वाचण्याची नजर हवी.

डोळ्यांचे रंग,रूप,आकार खूप भिन्न भिन्न असतात.नुसते डोळे दिसले तरी व्यक्ती ओळखू येते.सध्याच्या स्कार्फ लपेटून घेण्याच्या काळात फक्त डोळ्यांच्या मदतीने माणूस ओळखण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे.अगदी कोणतेही सौंदर्य टिपायचे असेल तर आपला व कॅमेऱ्याचा दोन्ही डोळे उत्तम असावे लागतात.एखाद्या मंदिरात गेल्या नंतर उघड्या डोळ्यांनी ती अंतर्मनात साठवून घ्यावी आणि नंतर जेव्हा जेव्हा डोळे बंद करू त्या वेळी ती अंतर्चक्षूंनी पहावी.हे खरे दर्शन.त्राटक ध्यान करताना डोळ्यांचे खूप महत्व.नुसते बाह्य डोळे तर महत्वाचे असतातच पण त्याच बरोबर नजर असावी लागते.आणि  सिद्ध हस्त  नजर असेल तर कोणतीच गोष्ट त्या नजरेतून सुटत नाही.किंबहुना असे म्हणणे योग्य ठरेल की,ती नजर सगळ्यातले चांगले टिपून घेते.ज्याला कोणातील चांगले दिसत नसेल त्याला सहज आंधळा आहेस का म्हंटले जाते.किंवा काहीजण डोळे असून पण आंधळे असतात.म्हणजे डोळ्यांनी बघतात.पण त्याचा अर्थ लक्षात घेत नाहीत.

अशा उपयुक्त जग,चराचर दाखवणाऱ्या डोळ्यांची काळजी पण तितकीच महत्त्वाची.त्या साठी खाणे,पिणे ( योग्य प्रमाणात पाणी ),विश्रांती,व्यायाम आवश्यक आहे.

डोळे त्याचे वाक्प्रचार,म्हणी,गाणी, डोळसपण,नजर,डोळ्यातील भाव,वेळोवेळी डोळ्यात येणारे पाणी,डोळ्यांची काळजी,त्या साथीचे उपाय असे वेगवेगळे लेख होऊ शकतात.

डोळसपणे डोळ्यांनी वाचल्यामुळे योग्य नजर मिळते.असे बरेच लेख वाचून बरेच विषय मिळतात.असे म्हणता येईल,काही लेखा मुळे डोळे उघडले जातात.आणि नवीन नजर मिळते.अशीच नवीन नजर मिळण्या साठी नवीन लेख वाचण्याची डोळ्यांना उत्सुकता असते.

आणि हे सगळे करण्यासाठी आजचा दिवस! डोळ्यांची जपणूक व आरोग्य याचे महत्व सांगणारा!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print