मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर

? मनमंजुषेतून ?

☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर ☆

(नर्मदालयच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.)

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवस भर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.

शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”

“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.

“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.

पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.

पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी  सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं.

एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.

“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.” 

“काय? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.

झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.

जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.  तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या  दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले.  एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.  जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”.  आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं.  पण थोडा वेळच.  शेवटी मन शंकेखोर.  हा निव्वळ योगायोग  तर नाही ?  पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली.  मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली  आहे.

पहिला फोन सरस्वती दीदींना  केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?

त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,  “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही.  पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”

 

©  भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा  पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन मध्य प्रदेश.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

जळतय

तळमळतय

हे विशाल वाळवंट

की

थोडा तरी

जीव लाव रे

हिरव्या प्राणांच्या

लाडक्या तृणपात्या

पण

हिरव्याच तोर्‍यात

मान उडवत ते

नाक मुरडून हिरवंगार

दुष्ट हसतं

आणि भिरभिरत जातं

दूर…दूर…

 

[2]

पृथ्वीचे आसूच

फुलवत ठेवतात

तिचं हसू

 

[3]

मुळं कशी?

जमिनीमधल्या

फांद्या जशी

फांद्या कशा?

हवेमधली

मुळं जशी

 

[4]

ही प्रचंड पृथ्वी

उग्र आणि कठोर

पण

किती मीलनसार झाली

तृणपात्यांच्या संगतीनं ……

 

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

रेडिओच्या जाहिरातीतील ताई सारखी विचारतेय, आई कधी येणार गं नळाला पाणी?

छोटूला  कळतच नाही आहे ही ताई रोज रोज अशी का विचारतेय? नळाला पाणी तर आहेच ना? मग?

त्यानं आजीच्या मागं एकसारखा तगादा लावला आहे.

छोटू: “आजी ही वेडी आहे का ग? की या ताईच्या घरात खरंच पाणी येत नाही नळाला?”

आजी: “नाही रे वेडी कशी? त्यांच्याकडं नळच  नाही. ऐकलं नाहीस का तिची आई तिला विहीर दाखवतेय ते?”

छोटू : “विहीर?”

आजोबा : “हो, अरे तुझ्या त्या पुस्तकात आहे बघ चित्र; वेल चं?”

छोटू : “Well? बापरे. . आजोबा त्यांना रोज वेल मधून पाणी काढावं लागतं? नळ नाही त्यांच्या कडं?”

“आजी , आपण जाऊया त्यांच्याकडं? मला बघायची आहे वेल”..

महानगरातल्या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या छोटूला घरात नळ नसतात, पाणी नळाला येत नाही ही कल्पनाच करता येत नाही. मागं एकदा त्याच्या यूकेजी च्या’ मिस नं दूध कोण देतं? ‘ असा प्रश्न विचारला होता. छोटू म्हणाला, ‘पिशवी. ‘मिसनं बरंच समजावून सांगितलं. पण हा ऐकेचना. शेवटी त्याच्या आई बाबांना शाळेत बोलाविण्यात आलं. मग एकदा त्याला गावी जाऊन गोठा दाखवावा लागला. तेंव्हा कुठं बाळराजांना  गाय आणि म्हैस दूध देतात हे पटलं.

आजी : “हो, जाऊया हं. तुझ्या आई बाबांना रजा काढायला सांगू आणि जाऊ विहीर बघायला.”

छोटू एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं संध्याकाळी आई बाबा आल्यावर त्यांच्या मागं लकडा लावून गावी जायचं ठरवूनही टाकलं.

आजी मात्र विचारात हरवल्या. त्यांच बालपण जरी शहरात गेलं असलं तरी त्यांचे काका- काकू गावीच रहात होते. प्रत्येक दिवाळी, मे महिना या दोन्ही सुट्ट्यांत आजी म्हणजे यमू गावी जायची.

आजींच्या डोळ्यासमोर आठ-नऊ वर्षांची फ्राॅक घातलेली यमू आली. त्यांचं मन भूतकाळात गेलं. छोटू बरोबर बोलता बोलता त्या यमू बरोबर किटलीतून पाणी आणू लागल्या.

“आई, काकू मी येणार आहे पाणी आणायला.”

” खूप लांबून आणायचंय हं पाणी ठमाबाई. तुला नाही जमणार.” . . . काका

“हो आणि येताना थोडं ऊन होईलच. आमची चांदणी कोळपून जाईल.”. . . काकू

अशा कोणत्याही वाक्यांना न जुमानता यमू शांताक्कांच्या मागं लागून फळीवर ठेवलेली लहानशी किटली काढून घेईच. आई आणि काकूच्या मागं मागं ती छोटी छोटी पावलं टाकत चालायला लागे देखील.

शेतातल्या विहिरीवर पोचेपर्यंत तिच्या हातातली किटली शांताक्काकडं पोहोचे. तिच्या हातात, फ्राॅक च्या खिशात फुलं, पानं यांचं संमेलन भरले. प्रत्येक वेगळा रंग तिला खुणावत असे. पानांचा, फुलांचा वेगळा आकार तिला मोहात पाडत असे.

गावापासून जवळच असलेली विहीर. . . सगळ्या बायका इथं जमत आणि मग सुखदुःखाची देवाणघेवाण करत कपडे धुतले जात. दगडावर घासून , धोपटून जसा कपड्यातला मळ बाहेर पडे तसाच मनातला सुध्दा. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचे पिळे, आणि पिळ सुटलेली स्वच्छ मनं तसंच भरलेल्या कळशा घागरी घेऊन सगळ्या घरी परतत.

एवढा वेळ यमू कधी पाण्यात खेळे, कधी आपला फ्राॅक धुवून टाके तर कधी जवळच्या फुलझाडांत रमे. मे महिन्यात मात्र ही फुलझाडं वाळलेली असत. पिवळी पडलेली पानंही तिच्या वही पुस्तकात गोळा होत. शाळेतल्या मैत्रिणींना तिचा हा गावरान अल्बम वेड लावत असे. फिरकीच्या टोपणाची किटली भरुन घेऊन ती घरी परते.

क्वचित कधीतरी काकू नदीवर कपडे धुवायची टूम काढे. वारणा नदीचं तसं उथळ पात्र, खडकाळ काठ, गावापासून लांब असलेला, तिथं नेणारा धूळखात, सुस्त पडलेला, तापलेला मातीचा रस्ता, धूळ बसलेली झाडं, झुडपं, काटेरी निवडूंग! त्या रस्त्यावर काकूच्या मैत्रिणी भेटायच्या. रखरखत्या ऊन्हात, संसाराचा कोरडा भार गाठोड्यात बांधून, कोरड्या मनानं, झपाझप चालत त्या नदीकाठ गाठत. गळ्यात लाकडी ओंडका बांधलेली , पाण्यात डुंबण्यासाठी आसुसलेली जनावरं  जड पायांनी संथपणानं जाताना दिसत. धूळरस्ता त्यांनी उठवलेली अक्षर चित्रलिपी कोरडेपणानं वागवत राही.

हाताला काही तरी गार लागलं. आजी भानावर आल्या. आजोबा सरबताचा ग्लास हातात घेऊन ऊभे होते.

“काय, आठवणीतून आलात का बाहेर?”

आजीनं हसून ग्लास हातात घेतला.एक घोट घेऊन त्या म्हणाल्या,” परिस्थिती फारशी बदललेली नाही हो. आठवणीतील गाव काय आणि आपलं शहर तरी काय. आजची बातमी वाचलीत पेपर मधली?”

आजोबा:  “हं, इतकी वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, अजून दैनंदिन गरजा भागवता येत नाहीत.”

आजी:  “परदेशात बेसीनच पाणी देखील पिण्यायोग्य असतं.”

आजोबा:  “गल्फ कंट्रीज मध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार होत. पाणी महाग आहे पण दुर्लभ नाही.”

आजी: “आणि जीवनदायी पाण्याचं महत्त्व पटवून द्यायला कमी पडलो आपण”.

आजोबा: “या भारतदेशाला पुन्हा एकदा भगीरथ प्रयत्न करावे लागणार बहुतेक.”

“आजी, आजोबा, आजोबा.” . छोटू  जोर जोरात हाका मारत होता.

“अगं ही भीमाक्का  बघ नळ सुरू ठेऊन कुठं गेलीय. बादली भरून वाहतेय ना.”

दोघंही आवाजाच्या दिशेनं निघाली.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  deepapujari@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वैभवाचे दिवस भाग – ३ ☆ सुश्री सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ वैभवाचे दिवस भाग – ३ ☆ सुश्री सुचित्रा पवार ☆ 

आमच्या घराच्या जवळ गावंदर असल्याने आम्हाला निसर्गाचा आनंद भरभरून घेता आला. पिके कापणीला आली की पक्ष्यांची गर्दी व्हायची आणि ते पक्षी आमच्या अंगणातल्या झाडाझुडावर निवांत विश्रांती घ्यायचे. बाजूलाच लगेच शेते असल्याने त्यांची घरटीही आसपासच्या झाडांवर, खोबणीतून ढोलीतून असायची. संध्याकाळी खेळून दमलो की मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर निवांत बसून आकाशातले पाखरांचे थवे न्याहाळत राहायचो. ढगांच्या कापसात वेगवेगळे आकार शोधायचो, कधी हरीण कधी राक्षस कधी देव तर कधी शिवाजीमहाराज दिसायचे. आकाशात तिन्हीसांजेला होणारी रंगांची उधळण आणि तांबूस, केशरी, पिवळ्या, काळ्या  नानारंगी छटा पाहून हरकून जायचो; नित्यनेमाचे  निसर्गातील हे बदल आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. आसपासचे पशुपक्षी, फुलपाखरे, झाडेझुडे, दगड धोंडे, ओढे, नाले इतकेच काय दूरवर उन्हात झळझळणारे दाट मृगजळ देखील आमचेच वाटायचे; जवळ जाऊन त्यात हात बुडवावा असं वाटायचं; हे सारे आमचे सखेसोबतीच होते. शाळेत जाताना रमत गमत जाणे येणे आणि मग निसर्गातले हे दररोजचे बदल स्वीकारत अन न्याहाळत त्याच्याशी एकरूप होत जगणे अंगी मुरले होते. शेतातली पिके काढली की मुलांना पतंग उडवायला रान मोकळेच! कितीदा सड घुसून पाय रक्तबंबाळ व्हायचे, काटे टोचून पायात मोडायचे पण आनंदाच्या त्या क्षणांपुढे कोणत्याच वेदना क्षुल्लक होत्या.

निसर्गचक्राप्रमाणे आमचे खेळही बदलत असत, म्हणजे पावसाळ्यातले खेळ वेगळे, उन्हाळ्यातले खेळ वेगळे! पावसाळ्यात चिखलात खेळणे, मातीची भांडी बनवणे असले खेळ खेळत असू पण खरी खेळाची मजा उन्हाळ्यातच यायची. सुट्टी दीर्घकाळ चालायची आणि शाळा, अभ्यास असलं काहीच नसायचं, त्यामुळं सर्व सुट्टीवर आमचाच हक्क होता.आम्हाला उन्हाळ्यात कुठल्या कलासेस अथवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला बसवले जात नव्हते. त्यामुळं अधून मधून घरी बोलवलं की सांगितलेलं काम करायचं आणि पुन्हा खेळायचं.

जोंधळ्याचे पीक निघून कडब्याच्या गंज्या परड्यात विसावयाच्या. मजबूत टणक गणगटे काढून साठवून ठेवायचे आणि गणगटांनी खेळायचे. प्रत्येकाच्या समसमान गणगट घेऊन चौकोनी किंवा गोल रिंगणात मांडून सपाट दगडाने (याला आम्ही व्हस्टर म्हणायचो)टिपून रिंगणातून बाहेर काढायचे असाच कोईंचा आणि चिंचोक्यांचा डाव असायचा. ओढलेल्या(जिंकलेल्या)कुया अंगणात पुरून ठेवायचो त्यावर ओळखीची खूण ठेवून दुसऱ्या दिवशी पुरून ठेवलेल्या कुया काढून खेळायचो. कधीतरी रात्री अचानक पाऊस यायचा आणि पुरलेल्या कोयी मुजुन जायच्या, थोड्या दिवसांत त्या जागेत आंब्याचे कोवळे तांबूस कोंब वरती यायचे मग लक्षात यायचे,  ‘इथं कोयी पुरल्या होत्या !’

याचबरोबर दुपारच्या वेळी सावलीत बसून काचा कवड्या, भातुकली, (भातुकलीच्या खेळात बोळकी, हिंगाचे, पोंड्सचे रिकामे झालेले डबे, टोपणे, सगळं चालायचं भातुकलीचा संसारसेट क्वचितच मिळायचा) गदी गाई,  गजगे,  बिट्या, जीबली, लपंडाव खेळत असू.

(मुलेही आमच्यासोबतच खेळत, भेदाभेद मुळीच नव्हता, छेडाछेडी किंवा आतासारखं अजून पहिलीत जात नाही तोपर्यंत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असले प्रकार नव्हते.) सर्वचजण सवंगडी निर्मळ निकोप मनाचे होते. कुणाही मुलाची ओळख ‘शेजारचा’ अशी नसायची, ‘माझा भाऊ ‘ अशीच असायची. चुकलं तर मरेस्तोवर मार असायचा, मुलगी ‘मोठी’ झाली की खेळ बंद व्हायचे लगोर, काट्याकोली, विष अमृत, सुरपाट्या गट्टया, आयरे, पत्यांच्या पानाने, विटी (चिन्नी )दांडू,  कबड्डीने खेळायची.

आमचे टाइम पास असायचे-एकत्र बसून गप्पा मारणे, ढगांचे आकार, आकाशाचे रंग न्याहाळणे,  पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, वेगवेगळ्या कीटकांचे निरीक्षण करणे, झाडांच्या पानांच्या पिपाण्या करून वाजवणे, कर्दळीच्या बिया पानांच्या सुरळ्या करून  त्यावर ठेवून फुंकरीने उडवणे, चिकाडीचे तांबडे तुरे तोडून ते झाडाच्या ढोलीत खोबणीत ठेवून ‘कोंबडे झोपले’ म्हणायचे. बाभळीच्या गोल गोल शेंगा तोडून त्या पैंजण, जोडवी म्हणून पायाला बोटाला बांधून जोरजोरात पाय आपटायचे आणि शेंगा खूळ खूळ वाजवायचो. चिंचेचा कोवळा पाला, कोवळ्या चिंचा ओरबाडून खाणे किंवा त्यात मीठ टाकून दगडावर चेचून खाणे, जुन्या वहितली कोरी पाने काढून त्यांची वही शिवणे, फाटकी पुस्तके चिकटवणे हे असायचे.

तीन टाईम पोटभर जेवायचो, डाळींची किंवा वाळल्या कडधान्यांची आमटी न भाकरी, भाजी क्वचितच, दूध क्वचितच, भात फक्त संध्या काळीच तोही रेशनच्या तांदळाचा.

भाजलेली चवळी, मूग, हरभरे, फुटाणे, चुरमुरे मक्याची कणसे,  भुईमुगाच्या ओल्या शेंगा, सिजन मध्ये चवळी-मुगाच्या ओल्या शेंगा, ऊस, ज्वारीचे गोड बांड( ज्वारीचे टणक ताट),  ज्वारीचा हुरडा, हरभऱ्याचे डहाळे,  हिरव्या -पिकल्या चिंचा हे आमचे वरचे खाऊ होते.बिस्कीट, ब्रेड, पाव असले खाऊ आमच्या आसपास ही फिरकत नव्हते, चहाबरोबर कधीतरी शिळी चपातीच  कधीतरी पाच-दहा पैशांचा बटर बुडवून खायला मिळायचा.पाहुणे आले तर तेही चपाती उसळ किंवा भजी, वड्याच आणायचे त्यामुळं बेकरी वस्तुंना किंमत नव्हती. उन्हाळ्यात करवंद जांभळं, चोखून खायचे छोटे आंबे रानात -काट्याकुट्यात हिंडून खायचो.कुठल्याही विहिरीचे, हौदाचे पाणी कचरा बाजूला सारून घटाघटा प्यायचे. पाण्याची बाटली, ब्रिसलरी असलं आमच्या गावीही नव्हतं. दुधाच रिकाम पातेलं आणि तुपाची बेरी भाकरीबरोबर खायला ‘तू-मी’ व्हायचं. (आज त्याला कोण विचारत पण नाही)

क्रमशः….

© सुश्री सुचित्रा पवार

तासगाव

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….

ही लढवत होती ती गढी….

गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …

महाराज मला मारा …

ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .

हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.

तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

 

आणि या शञूच्या बाईसाठी..

शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.

ताई………….

ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.

आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…

 

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..

अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.

राजा.. मी तुला शञू समजले..

मी वैरी समजले..

पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…

धन्य शिवाजी राजा..

धन्य त्याचे माता पिता..

 

ही कथा इथच संपत नाही

शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.

यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

 

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

 

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

 

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती

पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .

आणि तुम्हाला सांगायची गरज नाही

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…

आणि काय नात आहे शिवाजी राजाच.

माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

 

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…

वादाच्या पलिकडले शिवाजी …

बहिणीचा भाऊ शिवाजी …

 

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …

कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .

निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .

कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

 

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल

कारण तिला विश्वास असेल

हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.

शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.

माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

 

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा

हि विनंती ..

जय श्रीराम.

? ?

आहारात ‘सत्व’,

वागण्यात ‘तत्व’,

आणि

बोलण्यात ‘ममत्व’

असेल

तरच जीवनाला ‘महत्त्व’ येते.

?? ??

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 93 ☆ आठवण – ७ एप्रिल २०२१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 93☆

☆ आठवण – ७ एप्रिल २०२१ ☆ 

आज अभिनेता जितेंद्र चा जन्मदिवस! मी शाळेत असताना जितेंद्र चे खुप सिनेमे पाहिले. शिरूर मध्ये असताना जितेंद्र चं वेड लागलं ! मला आठवतंय, बूँद जो बन गयी मोती, गीत गाया पत्थरों ने, गुनाहों का देवता, अनमोल मोती, औलाद, फर्ज, विश्वास, जिगरी दोस्त…..हे सगळे शिरूर ला तंबूत पाहिलेले सिनेमा.

एकदा मी आणि माझी मैत्रीण ज्योती धनक सतरा कमानी पुलापर्यंत फिरायला गेलो होतो. मी फूल है बहारों का, बाग है नजारों का और चाँद होता है सितारों का…. मेरा तू.. . तू ही तू….  हे गाणं गुणगुणत होते. ज्योती नी विचारलं “जितेंद्र आवडतो का तुला?” मी म्हटलं, हो…” जितेंद्र आणि शशी कपूर…. “त्यावर ज्योती म्हणाली, “शशी कपूर चं लग्न झालंय, जितेंद्र करेल तुझ्याशी लग्न.”

जितेंद्र माझ्याशी लग्न करेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं, कारण गुड्डी मधल्या जया भादुरी इतकी अतिभावनिक मी कधीच नव्हते. पण ज्योती धनक नी चेष्टेने का होईना , म्हटलेलं ते वाक्य तेव्हा लई भारी वाटलं होतं, त्या नंतर मी जितेंद्र चा प्रत्येक सिनेमा पाहिला.

पन्नास वर्षां पूर्वीची ही आठवण !… जुन्या आठवणी येताहेत कारण आत्मचरित्र लिहायला घेतलं आहे… ज्योती धनक ला आठवतंय का हे पडताळून पहायला आवडेल मला, तसा योग येवो!

*********

आणि तो योग आला व्हाटस् अॅप मुळे जुन्या मित्र मैत्रिणींचे मोबाईल नंबर मिळवणं सोपं झालंय!

एका मित्राने ज्योती धनक चा नंबर दिला. मी तिला फोन केला, आणि विचारलं “तुला आठवतोय का हा जितेंद्रचा किस्सा?”

ती म्हणाली, “म्हणजे काय, मला सगळं आठवलं ”

ज्योती खुप छान बोलली, खुप आपुलकीने, आयुष्यात घडून गेलेल्या घटना परत येत नाहीत पण त्याच्या साक्षीदार असलेल्या मित्र मैत्रिणींमुळे ते क्षण आठवणीत का होईना परत जिवंत करता येतात.

आणि हेच आयुष्यातलं काव्य आहे.

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुर्यात् सदा मंगलम्….भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ विविधा ☆ कुर्यात् सदा मंगलम्….भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆

विवाहाची सुरुवात वाँगनिश्चयाने होते. त्यावेळचे मंत्र असे आहेत. वधुपिता वरपित्याला म्हणतो,

“वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुता त्वया।

कन्यावलोकन विधी निश्चितस्त्ंवं सुखी भव॥”

अर्थ — मी अंतःकरणपूर्वक तुम्हाला अर्पण केलेली कन्या तुम्ही मनःपूर्वक स्वीकारली आहे. तिचं यथायोग्य अवलोकन करून कोणताही दोष नाही याची खात्री करुन, सुखी व्हा.

वरपिता वधुपित्याला म्हणतो,

“वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुत मया ।

वरावलोकनविधौ निश्चितंस्त्ंव सुखी भव ॥

ह्या मंत्रामध्येही तुम्ही वराचं अवलोकन करून तुम्ही खात्री करून घ्या व सुखी  व्हा. असं वचन दिलेलं आहे. वधुवरांना समान महत्व दिलेलं इथे दिसून येतं.

कन्यादान करतानाच्या मंत्राने तर वधुपित्या वराला शब्दाने बांधून घेतलेलं आ… करुण वातावरणात थोडी हास्याची खसखस पिकावी म्हणून काही गमतीदार विधी समारंभात छान रंगत आणतात. ‘लाजाहोम’ च्या वेळी मुलीचा भाऊ मेहुण्याचा चक्क कान पिळतो. “माझ्या बहिणीला नीट संभाळ बरं, नाही तर मी आहे नि तू आहेस.” अशी तंभी देतो. वर त्याला कानपिळीचा मान देऊन शांत करतो.

लग्न  वधूच्या घरी करायची जुनी प्रथा आहे. हेही विचार पूर्वक ठरविलेलं आहे. मुलगी आता कायमची परग्रही जाणार. तिच्या प्रेमाचे आप्तेष्ट, शेजारी, मैत्रिणी, गायीगुरं, झाडं वेली आणि प्रत्यक्ष ते घर तिला प्रेमाने निरोप देणार. पुन्हां पुन्हां आलिंगन, प्रेमालाप, गुजगोष्टी होणार. मायबाप तिला मिठीत घेणार, तिला ही सर्वांना भेटायचय्, स्पर्शायचय, साऱ्यांना मनात साठवायचय, ह्यासाठी मायघरातला मोकळेपणाच हवा. हा घनव्याकूळ विधी माहेरीच होणं इष्ट. सीमांत पूजन, वराकडील मंडळींना अहेर करणं ह्यातही मुलीच्या हिताचाच विचार केलेला आहे. वरमायेला जरा जास्तच मान देण्याची पध्दत आहे हे खरं आहे, पण गौरिहराच्या वेळी वरमाय वधूच्या आईची ओटी भरून तिचा  सन्मान करते. पोटची पोर तिने आपल्याला दिलीय्, तिच्या पोटात दुःखाने खड्डा पडला असेल म्हणून वरमाय तिला साडी देऊन तिचं पोट झाकते नि दिलासा देते. हे किती काव्यमय आहे!

सूनमुख पहाणे ह्या विधीत वरमाय  मुलगा आणि सून यांच्या मध्ये बसते. तुम्ही दोघंही मला सारखीच हा भाव त्यात असतो.सुनेच्या तोंडात साखर घालून तिचा नि स्वतःचा चेहरा ती आरशात पहाते. आपण दोघी एकरुप होऊन आनंदाने राहू असं आश्वासन त्यात आहे. ऐरणीदान ह्या विधीच्या वेळी सुपं, वेळूची डाली, दिवे असा संभार मुलीचे मातापिता  सासरच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवतात. “आमच्या ह्या प्राणप्रिय कन्येची जबाबदारी आता तुमच्या शिरावर बरका.” अशी भाकच घातली जाते. मग काय बिशाद तिला कोणी सासुरवास करण्याची!

सप्तपदी हा आपल्या विवाह संस्कारातला सर्वात महत्त्वाचा विधी. यामध्ये  अग्नीच्या साक्षने वधुवर एकमेकांचे हात हाती घेऊन समान पावलं टाकतात. वधू अश्मारोहण करते व जोडिदाराला म्हणते, “मी ह्य दगडाप्रमाणे तुझ्या संसारात स्थीर राहीन.” तर नक्षत्रदर्शन ह्या विधीत वर वधूला ध्रुवतारा  दाखवतो नि म्हणतो, “मी त्या ध्रुवाप्रमाणे स्थीरपणे तुझ्याशी संसार करीन.”  दोघांच्याही  मुखातून येणारा ‘नातिचरामि’ हा उद्गार म्हणजे तर दोघांनी एकमेकांना दिलेलं प्रेमाचं अभिवचन.

ब्रह्म-माया, प्रकृति-पुरुष, यांच्या अद्वैतातून विश्वाचा हा चैतन्य पसारा सतत पसरत राहिला आहे. मानव त्यातलाच एक घटक. त्याची वैचारिक पातळी इतर प्राण्यापेक्षा  खूप वरची. त्याने स्वतःची एक आखिव रेखिव संस्कृती निर्माण केली. अनिवार्य अशी कामप्रव्रुत्ती त्यातून वंशसातत्य हा निसर्गाचा हेतू याचं उन्नयन त्याने विवाह संस्था रचून केलं. स्थल, काल, व्यक्ती सापेक्ष अशा वेगवेगळ्या प्रथा निर्माण झाल्या. त्यातली एक आपली हिंदु विवाह पध्दती. तिच्यातले बोचणारे सल आपण काढू शकतो.

वधू वरांच्या सहजीवनाचा आरंभ कोर्टकचेऱ्यातल्या रुक्ष वातावरणात होण्यापेक्षा आनंदी, मंगल वातावरणात होणंच चांगलं नाही का? मंगलाक्षता टाकून आपण म्हणुया. “कुर्यात सदा मंगलम्।”

  क्रमशः…

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आजच्या विदयार्थ्यांसमोरील आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

☆ विविधा ☆ आजच्या विदयार्थ्यांसमोरील आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆ 

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विदयार्थी काळ हा अतिशय महत्वाचा असतो. या काळात आपण जे शिकतो जे अनुभवतो, ज्या प्रेरणा आपल्याला मिळतात त्याचा उपयोग आपल्या पुढील आयुष्यात  होत असतो. अशा  काळात आपल्या समोर आदर्श असणे हे आवश्यक असते. विदयार्थ्यांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विद्याव्यासंग, सामाजिक, राष्ट्रीय कार्य, विदवत्ता,उत्तम आदर्श आहे. जगातील सर्वच विदयार्थ्यांच्या  समोर बाबासाहेब हे एक आदर्श आहेत.

१  विद्येचे महत्व

आजच्या काळात विद्येला  खूप महत्व आहे. त्यावर वेळ व पैसा मोठयाप्रमाणात खर्च केला जातो. विद्येबद्दल बाबासाहेबांचे  विचार हे क्रांतिकारी आहेत. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे  साधन आहे. तुम्हाला जर  स्वतःला बदलायचे, समाजाला बदलवायचे असेल तर शिका. बाबासाहेब शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा असा संदेश देतात. विद्या हा मानवी जीवनाचा  पाया असून ते मानवाच्या सर्वांगीण विकासाचे  साधन आहे. बाबासाहेब म्हणतात  मी मोठा कसा झालो  असे जर मला कोणी विचारले तर मी सांगेन शिक्षणाच्या संस्काराने.  बाबासाहेबानी आपल्या  जीवनात शिक्षणाला  खूप महत्व  दिलेलं आहे. त्यासाठी अपार  मेहनत केलेली  आहे. ज्या प्रमाणे पोटात  अन्न नसेल तर व्यक्ति अशक्त होतो त्याचप्रमाणे जर शिक्षण  नसेल तर व्यक्ति लाचार होतो त्याचे जीवन पशुसम होते अशा अचूक व साध्या  सोप्या पद्धतीने त्यांनी शिक्षणाचे महत्व  पटवून दिले आहे. त्यामुळे  विदयार्थ्यांनी ही शिक्षणाचे महत्त्व ओळखुन  विद्या संपन्न करण्यासाठी झटलं पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी ही अपार मेहनत, ध्येयनिष्ठा ठेवून विद्या मिळवली पाहिजे.

तुमच्याकडे विद्या असेल तरच तुम्हाला मान सन्मान मिळेल असा उपयोगी व विकासाचा मार्ग बाबासाहेब दाखवतात.

२ विद्येबरोबरच शील असले पाहिजे

नुसते विद्वान  होऊन उपयोग नाही तर विद्ये बरोबर विदयार्थ्यांच्या  अंगी शील असले पाहिजे, असे बाबासाहेब आवर्जून सांगतात.

शिकलेल्या लोकांमध्ये शील नसेल तर समाजाचा राष्ट्राचा नाश होईल मग नुसत्या शिक्षणाचा उपयोग काय? त्यामुळे विदयार्थ्यांनी विद्येबरोबरच शील ही जोपासले पाहिजे. शील म्हणजेच नीतिमत्ता चांगले वाईट समजणे, वाईटापासून  दूर राहणे. आपल्या  हातून चांगले कार्य कसे होईल हा विचार सदैव विदयार्थ्यांनी केला पाहिजे असा मोलाचा संदेश बाबासाहेब देतात. हा संदेश किती महत्वाचा आहे हे आपण आजूबाजूची  परिस्थिती पहिली की लक्षात  येते. व्यसन, वाईट संगत,अमली पदार्थ  सेवन, यात काही तरुण गुरफटलेले दिसून येतात त्यामुळे विदयार्थ्यांनी वाईट कृत्यापासून दूर राहून, वाचन, लेखन,गायन, वादन, चित्रकला, नृत्य,  क्रीडा, असे छंद जोपासले पाहिजेत.

शिकलो म्हणजे सर्व झाले असे नसून केवळ पदवी मिळवणे म्हणजेच शिक्षण  नव्हे तर विदयार्थ्यांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे.

जे तो शिकणार  आहे त्याचा उपयोग केवळ आपल्यापुरता न होता  समाजहितासाठी  झाला पाहिजे असे ही बाबासाहेब  आवर्जून सांगतात.

३ अजन्म विद्यार्थी

बाबासाहेब हे अजन्म विद्यार्थी होते. रात्रभर जागून अखंड अठरा अठरा  तास ते अभ्यास  करीत असत. वाचन, लेखन  करीत असत. कोलंबीया विद्यापीठाने  knowledge of symbol ज्ञानाचे उपासक  म्हणून  त्यांचा गौरव केला आहे. विदयार्थी  भूमिका घेऊन सतत काहीतरी शिकत राहणे, एखाद्या विषयाचा  पाठपुरावा करणे, एखाद्या विषयाचा  खोलवर अभ्यास करणे, सतत वाचन करणे, लेखन करणे हे गुण बाबासाहेबांकडून  विदयार्थ्यांनी घेतले  पाहिजेत. विविध विषयावर अपार मेहनत घेऊन त्यांनी विविध ग्रंथ प्रकाशित केले आहेत. काहीवेळा आपण ही अर्धवट माहिती घेतो व तिलाच खरे मानून चालतो त्यामुळे अपुरे विद्यार्जन करून काही उपयोग नाही तर योग्य शिक्षण घेऊन आपली योग्यता सिद्ध केली पाहिजे. बाबासाहेबांचा हा मोलाचा संदेश  असून विद्या घेत असताना विदयार्थ्यांनी आपल्या अंगी कोणती कौशल्य आहेत याचा विचार करून आपले क्षेत्र  निवडले पाहिजे व त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले पाहिजे. आता मला शिकण्याचा उपयोग नाही असे न म्हणता सतत शिकत राहिले पाहिजे. ते शिक्षण पुस्तकीच असेल असे नाही तर बऱ्याच नवीन गोष्टी, तंत्रज्ञान येत असते ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कोरोना काळात या पूर्वी कधीही ज्याचा फारसा विचार केला नाही अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण शिकली त्यातील तंत्रे समजून उपयोगात आणली म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याचा आपल्याला फायदाच झाला.

४  संघर्ष

बाबासाहेबाचा शैक्षणिक  प्रवास हा अतिशय खडतर असा होता. गरिबी, जातीय अवहेलना  अपमान, पुरेशी साधने  नसणे  परंतु अशा ही स्थितीत त्यानी आपली जिद्द सोडली नाही. आणि ज्या देशात त्यांना  अपमानकारक  वागणूक मिळाली त्याच  देशाची राज्यघटना  त्यांनी  लिहिली. हे सर्व घडू शकले  ते त्यांच्या  तील प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयनिष्ठा, अपार  मेहनत करण्याची तयारी,चिकाटी, जिद्द  धाडसीपणा, स्वाभिमान, महत्वकांक्षा, यामुळे.

अपमानाला त्यांनी  मेहनतीने  उत्तर दिले. आणि विविध विषयातील 32  पदव्या मिळवल्या. यातून आपल्याला एक शिकवण  घेता येईल की एखाद्याकडे जिद्द असेल मेहनत  करण्याची तयारी असेल तर तो आपल्या कार्यात यशस्वी  होईलच. त्यामुळे आपण गरिबी, पुरेशी साधने नसणे अशा  गोष्टीचा विचार न करता त्यावर मात करून मला पुढे कसे जाता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून आपले ध्येय गाठले पाहिजे.

५  पुस्तक प्रेमी, वाचन प्रेमी

विद्यार्थीदशेत असताना पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांचा  उपयोग करूनच अभ्यास  करावा लागतो. वाचनामुळे आपल्या विचारात प्रगल्भता येते.

बाबासाहेबांचे पुस्तकांवर  प्रचंड  प्रेम  होते. पुस्तकांसाठी बंगला  बांधणारे एकमेव बाबासाहेब असतील. मुंबई दादर येथे त्यांनी राजगृह  नावाने खास पुस्तकासाठी घर बांधले होते. आजही तिथे आपणास ग्रंथ पहावयास  मिळतात. पुस्तक वाचण्यासाठी ते जेवायचे ही विसरून जातं असत.परदेशात  असताना वेळ वाया जावू नये म्हणून ते ग्रंथालयात चोरून पावाचे तुकडे खातअसत. इतके प्रेम त्यांचे पुस्तकांवर होते.

बाबासाहेब म्हणतात ज्ञानची भूक भागावी म्हणून  मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले आहेत. तुमच्याकडे जर दिन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. सहजसोप्या भाषेत बाबासाहेब आपल्याला पुस्तकांचे महत्व  सांगतात.त्याचे अनुकरण  आपण विद्यार्थी दशेपासूनच केले पाहिजे. जशी आपल्याला पुस्तके मिळतील तसा  संग्रह केला पाहिजे.

वाढदिवसाच्या निमित्त असो, या कोणीही आपल्या भेट देणार असो  अशावेळी  आपण पुस्तके देण्याची विनंती  केली पाहिजे. शालेय वयापासूनच वाचनाची  आवड जोपासली  पाहिजे व विविध  विषयावरची  पुस्तके वाचली पाहिजेत.वाचनालयाचे  सभासद  होऊन तेथील  पुस्तके वाचली पाहिजेत. वाचन करीत असताना  त्यातील महत्वाचे  मुद्दे आपल्या  वहीत उतरून घेण्याची सवय लावली पाहिजे. अशी सवय विदयार्थ्यांनी ठेवली तर पुढे तुम्हाला  याचा खूप चांगला उपयोग होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बावीस हजारापेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता.22हुन अधिक विविध विषयावरील संशोधनपर पुस्तके बाबासाहेबानी लिहिली आहेत.लोकांनी माझी अवहेलना  केली पण पुस्तकांनी मला ज्ञान  दिले. अशाप्रकारे विदयार्थ्यांनी ही आपला स्वतःचा  पुस्तक संग्रह करून त्याचा जास्तीजास्त उपयोग ज्ञान  मिळवण्यासाठी, समाजातील प्रश्न समजून घेण्यासाठी,विषयाचे  आकलन होण्यासाठी केला पाहिजे.

अशाप्रकारे विविध गुणांची खाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले पाहिजे. विद्या, शील, संघर्ष, सतत शिकण्याचा ध्यास  वाचनप्रेम, पुस्तकांचा सहवास, विद्ववता जिद्द, चिकाटी स्वाभिमान, याचा आदर्श  आपण सर्व विदयार्थ्यांनी घेतला पाहिजे. कठोर परिश्रम करून उच्च शिक्षण घेतले पाहिजे व आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नतीसाठी तसेच समाजाच्या व राष्ट्राच्या  उन्नतीसाठी  केला पाहिजे. अशा या थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम.

ज्ञानवंत प्रज्ञासुर्य

करितों वंदन तुम्हा

उज्वल होवोत  दिशा

आदर्श तुमचा आम्हा

© प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

नवी मुंबई

7738436449

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्र गुढीपाडवा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ चैत्र गुढीपाडवा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सोनपिवळ्या किरणांनी

आले नवीन वर्षे

नवं वर्षाचा हर्ष

मनोमनी दाटे. .!!

निसर्गाचा आदर करण्यासाठी मराठी महिन्यातला पहिला महिना

चैत्र — चैत्र महिना

चैत्र पाडवा… म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षातला पहिला सण. हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात.. नवीन वर्ष, नवीन संकल्प. … चैत्र महिना म्हटला की आपल्या  डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी… गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण, चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया… दारावरती लावलेलं झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचे तोरण, नवीन खरेदी, घरोघरी उभारलेली गुढी…  एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता वातावरणात असते.

तिच्या स्वागतासाठी अंगणात काढलेली रांगोळी चित्रे म्हणजेच चैत्रांगण..

फाल्गुनाचा निरोप घेत अलगद येऊ घातलेल्या चैत्राचं निर्सगाने केलेलं एक सुंदरस खुलं असं स्वागत. . निसर्गच नाही तर अवघं चराचर चैत्राचं स्वागत करायला उत्सुक असतं.

गीष्मऋतूतही वाळलेल्या झाडाला कोवळा कोंब फुटतो व बघता बघता हिरवाई सळसळते. कोवळ्या पालवीने भारावलेली झाडे वार्‍याचे बोट पकडून डोलू लागतात. रंगीबेरंगी फुले आनंदाने नाचू लागतात. पक्षांचा किलबिलाट सुरू होतो व तो आपल्या कानांना तृप्तीचे काही क्षण देऊन जातो. सृष्टीचा हा नवनिर्मितीचा काळ. .या नवनिर्मितीचे वसंतोत्सवात आगमन होते व सर्वत्र आनंदाची हर्षाची गुढी उभारली जाते..

चित्रा या नक्षत्रावरून वर्षातल्या या पहिल्या महिन्याला चैत्र असं संबोधलं जातं. हिंदू या पंचांगानुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. . अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. या चैत्रापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतलं मानाचं पानं. म्हणजेच ही गुढी. .!!

ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. गुढीपाडवा हे संकल्प शक्तीचे गुढत्व दर्शविते. “आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धी करता आता पुढेच पडत राहील ”

असे प्रतिपदा सांगते म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्य संकल्पाची गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. गुढी म्हणजे नावीन्य, स्वागतशीलता नवनिर्मितीची प्रेरणा उत्साह आनंद. …!!

चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केले तर असे लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नवे चैतन्याचे, नवे सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.

सुगंधी फुले जसं वातावरण सुगंधीत प्रफुल्लित करतात तसं प्रत्येकाच्याही आयुष्यात प्रेमाचा सुगंध मायेचा सुगंध असाच दरवळावा असं यातून सुचित होत असतं. .म्हणून नववर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नवकल्पनांच्या, नवविचारांच्या उत्तुंग अश्या गुढ्या उभारूया व मंगलमय संस्कृतीचं तोरण बांधूया. ..!

संस्कृतीच्या क्षितीजावर

उजळून आली

नवी पहाट. .!

क्षण मोलाचे

घेऊन आली

पुन्हा नव्याने आयुष्यात..!

क्षण ते सारे

वेचून घेऊ

नववर्षे आनंदे

साजरे करू. ..!!!

दरवर्षी आपण नव्या वर्षाचे स्वागत करतो. नव्या संकल्पना करतो. यंदा निसर्गाशी प्रतारणा न करता पर्यावरणपूरक वागण्याचा संकल्प करूया… निसर्ग प्राणी संपदा यांचे रक्षण केले तरच मानवजातीची आरोग्यदायी गुढी उभी करू शकू…

निसर्गातील बदल सुखावहपणे मानवाच्या समोर आल्हादकपणे ठेवणारा यंदाचा गुढीपाडवा सर्वांनाच आरोग्यसंपदेचं दान देणारा ठरो हीच मनोकामना… !!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बसंत की बहार आई ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ बसंत की बहार आई ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

संक्रांत आली. तीळगूळ देता-घेता आणि गुळाची पोळी खाता खाता अंगात ऊब येत गेली. सक्रांत आली,  म्हणता म्हणता रथतसप्तमीही जवळ आली. रथसप्तमी येते पौष शुद्ध सप्तमीला. ही तिथी सूर्यपूजेची तिथी. माझ्या लहानपणी आजी,  आई, मामी अंगणात तीन दगडांची चूल करायच्या. चुलीवर मातीचं बुडकुलं ठेवायचं. त्यात भरून दूध घालायचं. खाली काटक्यांचा जाळ करायचा. मग ते दूध उतू जाऊ द्यायचं. तो सूर्याला दाखवलेला नैवेद्य असे. सजीव सृष्टी साकारण्यासाठी सूर्य हा महत्वाचा घटक. आता सूर्यदेव अधीक प्रखरतेने तापणार आणि थंडीला दूर पळवणार म्हणून हा त्याला नैवेद्य. अंगणात सूर्याचा रथ,  त्याचे सात घोडे वगैरे रांगोळीही काढली जायची.

लहानपणी पाठ केलेलं होतं,  वर्षाचे महिने बारा. चैत्र, वैशाख….. ते  माघ, फाल्गुन आणि वर्षाचे ऋतु सहा. वसंत,  ग्रीष्म,  वर्षा,  शरद,  हेमंत,  शिशीर. या पाठांतरात प्रत्येक ऋतुला दोन दोन महिने दिलेले. त्यात मार्गशीर्ष, पौष हे महिने हेमंताचे. हा ऋतू पानगळीचा. पुढचे माघ, फाल्गून हे महिने शिशिराचे. तोही थंडीचाच ऋतू मानला जायचा. ऊब आणि उष्णता वसंताबरोबर येणार. त्याचे आगमन चैत्र पाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आता हे सारं जितक्या काटेकोरपणे पाठ केलेलं होतं,  तितका काटेकोरपणा काही सृष्टीत घडताना प्रत्यक्षात दिसत नाही. साधारण रथसप्तमी सरली की थंडी कमी होऊ लागते. शिवरात्रीला ती आणखी कमी होते आणि होळीबरोबर तर ती पळूनच जाते. ‘होळी आली थंडी पळाली’, असंच लोक म्हणायचे. थंडी पळते पण त्याच्या आगे-मागे सृष्टीतही स्थित्यंतर घडू लागते.

साधारण माघापासूनच पानगळीने खराटा झालेल्या झाडांवर आधी हिरवी लव, नंतर कोवळी पालवी हसू,  खेळू,  नाचू लागते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यातून, गुजराथ,  मध्य प्रदेश,  राजस्थान इ. ठिकाणी लोक माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात आणि त्यांच्या दृष्टीने वसंताचे आगमनही तेव्हाच होते. ऋतूंचा सांधा जणू या महिन्यात बदलतो.

  ‘मिठी मातीला मारून    पाने ढाळितात आसू

   वर हासतात फुले     शाश्वताचं दिव्य हसू’

तेव्हापासूनच उमटणार्‍या वसंताच्या पाउलखुणा पुढे ठळक होत जातात. फाल्गुनात हे पुष्पवैभव परम उत्कर्षाला जाऊन पोचते. पळस,  पांगारा,  शेवरी फुलफुलून  येतात. त्यांच्या तजेलदार केशरी,  नारिंगी, लाल – गुलाबी रंगामुळे त्यांना जंगलातील अग्निशीखा असं म्हणतात. काही निष्पर्ण,  तर काही सपर्ण झाडांवरचा हा रंगोत्सव डोळ्यांवर जादू करतो. मग माणसेही रंगात न्हाऊन निघतात. त्यासाठीच तर संस्कृतीने होळी-रंगपंचमी यासारखे सण योजलेत. उत्तरेकडे पूर्वी पळसापासून रंग तयार करायचे. हे नैसर्गिक रंग पक्के पण हानीकारक मुळीच नसायचे. हे रंग एकमेकांवर उडवायचे. अनंद, उल्हासात निसर्गाच्या रंगोत्सवात सामील व्हायचं. उत्तरेकडे म्हंटली जाणारी फागू (फाल्गून) गीते वसंताचं स्वागत करणारी. सृष्टीने धारण केलेल्या नव्या रुपाची वर्णनं करणारी.

महाराष्ट्रात असं रंगात रंगणं होतं रंगपंचमीला. होळीत जुना कचरा जाळून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगात रंगून जायचं.

चैत्रात वसंत ऋतू एखाद्या सम्राटासारखा चराचरावर अधिराज्य गाजवतो. आता ऊन कडक होतं. वरून आग ओतली जातेय की काय असं वाटू लागतं. अशा वेळी पळस फुलांकडे पाहताना वाटतं,

`वणवा पेटला पेटला   पळसफुलांनी   पाकळ्यांवर झेलला.’

याच दिवसात जाई,  जुई,  मोगरा,  चमेली,  सायलीसारखी नाजूक फुले वेलींवर, झुडुपांवर ऊतऊतून येतात. वाटतं,

‘किती आवेग फुलांचे    वेल हरखून जाते.

काया कोमल तरीही     उभ्या उन्हात जाळते.’

या काळात उन्हाच्या झळांनी देह-मनाची काहिली काहिली होते पण वार्‍याच्या झुळुकीबरोबर येणारी सुगंधी लकेर सारं निववून, शांतवून जाते. वर्षभर दुर्लक्षित असलेला बहावा आपल्या अंगावर सोनमाळा धारण करत,  येणार्‍या-जाणार्‍याचे लक्ष वेधून घेतो.

‘किती कशा भाजतात    उन्हाळ्याच्या उष्ण झळा

परि झुलतात संथ      बहाव्याच्या फुलमाळा’

बघता बघता वैशाख सरत येतो. आपले पुष्पवैभव आवरून आणि सृष्टीचे आधिराज्य ग्रिष्माकडे सोपवून वसंत निघून जातो. फुले मातीत मिसळली आहेत खरी,  पण त्यांचं शाश्वताचं हासू काही लोपलेलं नाही. ते फळांच्या रसातून हसतेच आहे.

टीप – यातील कवितांच्या ओळी माझ्या स्वत:च्या आहेत. – उज्ज्वला केळकर

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares