प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला ह्या फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डेवरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…
एकदा एक मूर्ख शायर
सूर्यास म्हणतो की….
भास्करा, कीव मजला
येऊ लागते कधी मधी,
रात्र प्रणयाची तू रे
पाहिली आहे कधी ?
तेव्हा सूर्य उत्तर देतो…
आम्हासही या शायराची
कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास
रात्र यावी लागते.
प्रेम हे काय दिवस ठरवून
व्यक्त करायची चीज आहे ?
आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.
प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.
गदिमा म्हणून गेलेयत…
‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला…’
यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की
‘जिथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पहाते’
मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.
ही कोंडी शेवटी तो फोडतो,
(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)
‘लाजून हांसणे अन् हांसून ते पहाणे,
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’
भेट झाल्यावर मात्र हृदयात
एक अनाहूत हुरहुर सुरू होते.
मग परत गदिमा मदतीला येतात,
‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’
तोही आपल्या विश्वात नसतोच.
‘होशवालों को खबर
बेखुदी क्या चीज है,
इश्क किजे, फिर समझिये,
बंदगी क्या चीज है’
प्रेमात ती ठार वेडी झालीय,
म्हणतेय काय….
‘मी मनांत हसता प्रीत हसे,
हे गुपीत कुणाला सांगू कसे ?’
त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे.
तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू ) आहेत,
ती म्हणते,
‘नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी’
ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे
नाहीत. मग तीच म्हणते,
‘ये मुलाकात इक बहाना है,
प्यार का सिलसिला पुराना है’
शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर
‘घडी घडी मेरा दिल धडके,
हाय धडके, क्यू धडके’
ह्याची खात्री पटलीय पण
खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.
‘कहना है, कहना है,
आज तुमसे ये पहली बार,
तुम ही तो लायी हो,
जीवन में मेरे
प्यार, प्यार, प्यार..’
ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय.
तृप्त झालीय.
‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना’
आणि मग झाडांची पाने हलतांत. तो खूष.
‘जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,
झाली फुले कळ्यांची,
झाडे भरांत आली’
आणि तिनं चक्क होय म्हटलं.
हा गडाबडा लोळायचा बाकी.
‘तुम क्या जानो, मुहब्बत क्या है..:
‘कोकिळ कुहूकुहू बोले,
तू माझा तुझी मी झाले.’
दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते:
‘तुज्ये पायान् रूपता काटां,
माज्ये काळजान् लागतां घांव’
आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.
दो लब्जों की है बस ये कहानी या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.
‘आज तू डोळ्यांत माझ्या,
मिसळूनी डोळे पहा,
तू असा जवळी रहा,
तू अशी जवळी रहा..’
प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डेच्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?
भारतीय संस्कृती आणि माय मराठी प्रेमी… नक्कीच सहमत असतील.
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘गारंबीचा बापू ‘ या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे.
‘अजब सोहळा, माती भिडली आभाळा… ‘
रवींद्र साठे यांनी असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे. पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली? आपण कधी गेलो का तिथे? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.
मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न.
थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या.
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥
जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरु राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला.
मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला (पैस) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥
अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या.
तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी उगीच नाही
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता, तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे.
पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे.
पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे.
समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहुचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे.
तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रेवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं.
खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत कारण मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी ही भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. मराठी माणसाची खासियत अशी की तो हिन्दी संस्कृत या भाषा सहज आणि सोप्या रीतीने समजू बोलू शकतो. तसेच इंग्रजी बोलणे ही त्याला सोपे जाते कारण मराठी भाषा ही या भाषांमधूनच विकसित केली गेली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मायबोली आहे. तसेच तिचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहे. त्यात विदर्भाची भाषा, कोकणी, मालवणी अश्या मराठी पूरक भाषांचा समावेश आहे.
मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड व अनेक संत कवींच्या रचना, अभंग यांनी ती परिपूर्ण तर आहेच शिवाय ती मराठी मनाचा हळवा कोपरा आहे. मराठी मनाची शान आहे.
उद्योग, व्यवसाय, संगणक या बदललेल्या युगातही मराठी कोठेही कमी पडत नाही म्हणजेच ती पोट भरण्याचेही साधन आहे.
आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे.
बराच वर्षांपासून इंग्रजीमाध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्व देणे कमी झालेले दिसत आहे. मराठी भाषेतील साहित्य कविता, नाटके, प्रवास वर्णने, निबंध, लघुनिबंध ह्यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो. मराठी साहित्यातील साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे.
मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.
☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
माझी आई सरदार बोकिलांकडची. पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांमधला एक पूर्ण शहाणा सखारामपंत बोकिल, यांची ही वंशज. वडिल बळवंतराव व आई गीताबाई यांचं माझी आई हे शेवटचं अपत्य म्हणजे शेंडेफळ. तिला एक मोठा भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी. भावाचं नाव अण्णाजी. माझा मामा अण्णाजी बळवंत बोकिल उतारवयात आपला जेष्ठ मुलगा बळवंत (आजोबांचं नाव काही विशिष्ठ हेतूनं पुन्हा नातवाला ठेण्याची त्यावेळी पद्धत होती. त्यामागे काही श्रद्धा असाव्यात.) याच्याकडे रहात असे. हिवरे, चांबळी, घोरपडी इथल्या काही जमिनी विकून त्यांनी पर्वती पायथ्याला एक बंगला घेतला होता, तो आजही आहे.
१९८० च्या मे महिन्यात माझा मामा गेला. ही दुःखद वार्ता कळताच त्वरित मी, माझी आई रिक्षा करून मामाच्या घरी पोहोचलो. आईला पाहताच मामीनं, ” वन्सं, हे काय झालं हो ” म्हणून हंबरडा फोडून आईला गळामिठी मारली. दोघीही ढसाढसा रडल्या. भावनांना आवेग ओसरला आणि मग काय झालं, कसं झालं वगैरे माहितीची देवाण-घेवाण झाली.
थोडयाच वेळात इतर आप्तेष्ट, नातेवाईक, परिचित, शेजारी जमू लागले. जागोजाग, घरात, बाहेर लोक उभे होते. स्त्रिया आतल्या खोलीत मामी, वहिनी यांच्या भोवती होत्या. अनुभवी जाणकारांनी पुढची कार्यवाहीची सूत्रं हाती घेतली. मला आणि काही लोकांना वैकुंठात जाऊन तिथल्या पुढच्या व्यवस्था बघण्याचं दायित्व दिलं गेलं. सूचनेप्रमाणे आम्ही स्मशानभूमीवर गेलो.
गेल्या गेल्या मी पहिलं काम केलं मोघे गुरुजींना कळवण्याचं. त्यानंतर विद्युत दाहिनीची व्यवस्था. पण ती नेमकी बंद होती. त्यामुळे पारंपारिक पद्धतीनं अग्निसंस्कार करणं भाग होतं. मग इंधन, सरपण, लाकडं, गवऱ्यांची व्यवस्था करणं आलं. मृतव्यक्ति कोण आहे, पुरुष का स्त्री, तरुण का वृद्ध का बाल त्यावर किती इंधन लागेल हे ठरतं हे तिथं कळलं. वखावाल्यानं आवश्यक तेवढं इंधन हातगाडीवर भरलं. सोबत एक सहाय्यकही दिला गाडीबरोबर. मी स्मशानातला, त्यातल्यात्यात स्वच्छ असा एक चर निवडला. तिथं लाकडं उतरून घेतली. माझी धावपळ चालू होती.
सहाय्यकानं सरण रचायला घेतली. सरण रचण हे ही एक तंत्रकौशल्य आहे. त्यानं सर्वात खाली लाकडी ओंडक्यांचा एक थर दिला. त्यावर आडव्या उभ्या लाकडांनी चारी बाजू भक्कम केल्या. वर दुसरा थर देऊन तो थांबला.
तोपर्यंत सूर्यास्तही झाला. अंधार पडू लागला. स्मशानातले पिवळे सोडियम व्हेपरचे दिवे लागले. दिवसा आकाशात विहरणारे पक्षी चिवचिवाट करीत, झाडाझाडात दडलेल्या आपापल्या घरट्यात परतले आणि त्याच झाडाझाडातून वाघळांचे थवे किचकिचाट करीत बाहेर झेपावू लागले.
परस्पर स्मशानात येणारे आप्तेष्ट एकेक करून जमू लागले. पंधरा-वीस मिनिटात शववाहिनी पोहोचली. तिच्या बरोबर दोन चाकी चारचाकीतून आलेले स्नेही, सोबती, नातेवाईक आले. सर्वांनी श्रीरामनामाच्या घोषात मामाचं पार्थिव गाडीतून बाहेर काढून सरणाच्या बाजूला ठेवलं.
धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य मांडलं गेलं. पाच मिनिटात मोघे गुरुजीही आले. सरण अर्ध्यापर्यंत रचून झालं होतं. आमचा दादा (मामेभाऊ) वस्त्रं बदलून पुढल्या विधीसाठी सज्ज झाला. गुरुजींनी मत्रोच्चारास आरंभ केला. बाजूला ठेवलेल्या पत्रावळीवरच्या सातूच्या पिठाकडे बोट दाखवून ” कोणीतरी या पिठाचे पाच सारख्या आकाराचे पिंड वळायला घ्या बरं”. गुरुजींनी सभोवती उभ्या राहिलेल्यांकडे बघून आज्ञा केली. मी पटकन पुढे होऊन ते कार्य करू लागलो. “आता बॉडी उचलून चितेवर ठेवा”. पुढची आज्ञा झाली. चार-सहा लोकांनी देह तिरडीवरून उचलून चितेवर ठेवला.
गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे मी केलेले पाच पिंड दादा नं मामाच्या देहावर ठेवले. त्यानंतर इतरांनी सहाय्यकाच्या मदतीनं उरलेली लाकडं, गावऱ्या रचल्या. एकानं शिंकाळ्यातलं मडकं उपडं करून त्यातला निखारा भूमीवर ओतला. गुरुजींनी प्रेताला अग्नी द्यायला सांगितला. गवरीची दोन खांडं हातात घेऊन, दादानं तो निखारा उचलून अश्रूभरल्या डोळ्यांनी चितेवर ठेवला आणि त्याला अनावर हुंदका आला. दोघांनी त्याला धरून जरा बाजूला नेलं. इतरांनी एकेक कोळंगा चितेवर ठेवला.
भावनांचा ओघ ओसरल्यावर दादानं जलानं भरलेलं मडकं डाव्या खांद्यावर धरून चितेला तीन प्रदक्षिणा घातल्या. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना कोणीतरी दगडानं (यालाच अष्मा म्हणतात). मडक्याला एकेक छिद्र पडलं. शेवटी चितेकडं पाठ करून त्यानं तो घट खांद्यावरून मागे सोडला. मोठ्ठा ‘फाट्’ असा ध्वनि उठून ‘घटस्फोट’ झाल्याचे जगजाहीर झाले! डाव्या हाताची पालथी मूठ ओठांवर आपटून बोंब मारली आणि तो मटकन खाली बसला!
अग्नी धुमसू लागला. आसमंतात धूरच धूर झाला. अजून ज्वाळा दिसत नव्हत्या. पाच मिनिटं वाट पाहून एकानं पश्चिमेच्या बाजूनं चितेवर बाटलीतलं घासलेट शिडकलं आणि एकदम लाल, भगव्या, पिवळ्या ज्वाळांचे लोळ वरती उसळले. सारी शेड त्या प्रकाशानं उजळली. भोवताली कोंडाळं करून उभ्या राहिलेल्या लोकांच्या चित्रविचित्र कृष्णछाया शेडच्या भिंतींवर, छतावर नाचू लागल्या.
मी जवळच उभा होतो. ज्वाळांचा प्रकाश आणि धग असह्य झाल्यामुळे मी डोळे मिटून पटकन थोडा मागे सरकलो आणि मान एका बाजूला वळवली. दोनेक क्षण गेले असतील. मी डोळे उघडले. सहज माझं लक्ष शेडच्या कोपऱ्याकडं गेलं. दिसलं की तिथं एक काळा कभिन्न, सहा फूट उंचीचा, सत्तरी पार केलेला, मुंडन केलेला, हातात दंड, अंगावर भगवं कौपीन, पायात खडावा, कपाळावर, दंडांवर भस्माचे आडवे तीन पट्टे लावलेला सन्याशी उभा आहे!
त्याच्या अंगावरची भगवी वस्त्रं चितेतून उठलेल्या केशरी, लाल, पिवळ्या रंगाच्या ज्वाळांच्या प्रकाशात अधिकच उठून दिसत होती. त्याचे टपोरे पाणीदार डोळे अधिकच चमकत होते. मी पटकन डोळे मिटून पुन्हा उघडले. मला काही भास तर होत नाहीये ना? मी चार-पाच वेळा डोळ्यांची उघडझाप करून पाहिलं. पण तो भास नव्हता, वास्तव होतं.
तो सन्याशी माझ्याकडेच पहात होता. जिथं तो उभा होता त्या कोपऱ्याकडे इतरांची पाठ होती. तिकडं कोणाचं लक्षही नव्हतं. मी त्याची दृष्टी टाळत दुसरीकडे पाहिलं. काही क्षणानंतर माझ्या मनाविरुद्ध माझी दृष्टी पुन्हा एकदा त्याच्याकडं गेली. तो अजूनही माझ्याकडेच एकटक पहात होता. आमची दृष्टभेट झाली. माझा घसा कोरडा पडतोय असं मला वाटलं. मी एक कोरडा आवंढा गिळला. तेवढ्यात त्यानं मला मान हलवून खुणेनं जवळ बोलावलं. मी जागचा हललो नाही पण माझ्या मणक्यातून एक लहर शिरशिरली. क्षणभर थांबून त्यानं आता हातानं जवळ येण्याचा संकेत करताच माझी पावलं त्याच्याकडं ओढली गेली.
मी त्या स्वामींच्या जवळ गेलो आणि वाकून नमस्कार करू लागताच ते थोडे मागे सरकत पुटपुटले, “please don’t touch my feet. It’s not required. May God bless you and your family. ” मी हात जोडून उभा राहिलो. माझे थरथरते हात त्यांनी पाहिले असावेत. ते म्हणाले, ” Don’t be affred young man, relax. I wish to congratulate you and your relatives. ” त्यांच्या त्या अश्वासक शब्दांनी मी काहीसा तणावमुक्त झालो. ” मी विचारलं, ” Why Sir, what is the reason? ” त्यावर ते म्हणाले, ” Because you deserve it. You are doing a great job. “
माझ्या लक्षात आलं की हे कोणी उच्च शिक्षित योगी, संन्यासी असावेत. त्यांच्या इंग्लिश शब्दोच्चारावरून हे ही ध्यानात आलं की ते अमराठी आहेत. बहुदा दक्षिण भारतीय असावेत. तरीही मी म्हणालो, “स्वामिजी मै क्या सेवा कर सकता हूँ आपकी? ” त्यावर जरा संकोचून ते उत्तरले, “I am sorry my boy, I don’t understand Hindi or Marathi. I can speak English, Sanskrit and almost all South Indian languages. Tamil is my mother toung. ” यावर मी इंग्लिशमधे पृच्छा केली, ” I am very sorry, what can I do for you sir? ” (पुढील संभाषण मराठीतच सांगणं बरं.)
“ज्या व्यक्तीची उत्तरक्रिया इथं चाललीय ती दिवंगत व्यक्ति कोण आहे? आणि जो इतक्या आपुलकीनं, भक्तिभावानं क्रियाकर्म करतोय तो कोण आहे? नक्कीच तो सुसंस्कृत परिवारातला असणार. गेला अर्धातास मी बघतोय, सगळे विधी यथासांग आणि शास्त्रवत होतायंत. हे मंत्रोच्चर करणारे, विधिक्रम सांगणारे पंडितजी सुद्धा सुशिक्षित आहेत. तुम्ही मंडळी उच्चकुलीन वाटता. महाराष्ट्रीय ऋग्वेदी ब्राह्मण आहात ना? संकल्प सोडताना त्या कर्म करणाऱ्या मुलानं पंडितजींना आपलं गोत्र, प्रवर सांगितलं त्यावरून मी ताडलं. बरोबर ना? ” स्वामींच्या निरीक्षणशक्तीनं मी थक्क झालो. त्यांचा अभ्यास जाणवला. त्यांचा तर्क योग्य असल्याचं मी त्यांना सांगताच त्यांच्या मुखावर समाधानाची छटा उमटली.
आमच्या संभाषणातून मला स्वामींविषयी काही त्रोटक माहिती मिळाली. त्यांचं सध्याचं (सन्यास ग्रहण केल्यानंतरचं) नाव ‘स्वामी चिद्विलासानंदभारती’. ते त्यांच्या कोणा परिचिताच्या अंत्यविधीसाठी उत्तर काशीहून पुण्यात आले होते. विलंब नको म्हणून मृत व्यक्तीच्या निवासस्थानी न जाता ते लोहगाव विमानतळावरून टँक्सीने परस्पर वैंकुठ स्मशानभूमीवर आले होते. त्यांची अपेक्षित मंडळी अजून आलेली नसल्यामुळे ते इथंच थांबले होते त्यांच्या प्रतीक्षेत, एका कोपऱ्यात उभे राहून आमचे विधि पहात होते.
स्वामींना मी माहिती दिली की, मृत व्यक्ती माझे मामा असून त्यांची उत्तरक्रिया करणारा मामांचा जेष्ठ पुत्र, माझा मामेभाऊ आहे. त्यावर स्वामी म्हणाले, “आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.
☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कॅप्टन राकेश वालिया
(स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.)
इथून पुढे – –
जीवनात मोठी मजल मारली होती. हा अनुभव शब्दबद्ध करण्याची उर्मी दाटून आली मनात. त्यानुसार जुळवाजुळव करीत पुस्तक प्रकाशित केलेही. लाखो शब्दांची कहाणी हजारो शब्दांत आणताना कसरत करावी लागली. तोवर विविध ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने देण्याची संधी मिळत होती… नाव होत होते. स्वत;चे घर झाले होते. एकूणच आयुष्य आता सुखात जाईल, अशी चिन्हे होती. पण पत्नीच्या गंभीर आजारात मोठी रक्कम खर्ची पडली… तिचे हाल बघवत नसतानाही आशा न सोडता उपचार सुरु ठेवले होते. पुस्तकाला प्रतिसाद तर उत्तमच लाभला. पण मध्येच कोरोना महामारी उपटली. घरातील सर्वच या कचाट्यात सापडले. यातून आर्थिक नाकाबंदी होत गेली. इंग्रजी पुस्तकाचे हिंदीत भाषांतर करून देण्यात मदत करेन, पुस्तकाचे प्रमोशन करेन असं सांगत एक महिला संपर्कात आली. आधी फोनवर होणा-या संभाषणातून चर्चेची गाडी प्रत्यक्ष भेटण्यावर आली. माझा नवरा आणि मी येते असे म्हणाली. आपल्या छोट्याशा मोटारीतून जाऊन साहेब त्या महिलेला भेटले. काही कारणांनी नवा-याला येणे जमले नाही… म्हणून ती महिला एकटीच आली होती. सर्वसामान्य सभ्य महिलांचा पोशाख अंगावर, उत्तम संभाषण कौशल्य तिच्याकडे होतेच. जुजबी चर्चा झाल्यावर नंतर भेटू असे ठरत असतानाच त्या महिलेने आणखी चर्चा करण्यासाठी एखाद्या हॉटेलात बसू असे सुचवले. इथे शंका आली. नम्र नकार देत साहेबांनी त्या महिलेला मोटारीतून दिल्लीतल्या एका पोलिस स्टेशनसमोरच सोडले. तिला तिथेच जवळपास काही काम होते, असे तिने सांगितले होते म्हणून. हा प्रवास केवळ सुमारे पंचवीस मिनिटांचा होता. साहेब घरी पोहोचले आणि त्यांना त्या पोलिस स्टेशनमधून फोन आला… एका महिलेने बलात्काराची फिर्याद गुदरली आहे… त्वरीत या.. अन्यथा हातकड्या घालून घेऊन येऊ! पलीकडून पोलिसी खाक्या बोलला. महिलेचे नाव विचारले तर भलतेच नाव सांगितले गेले. साहेब थेट पोलिस स्टेशनात धडकले. ती महिलाही तिथे होती… जी त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्यांना मदत करणार होती. “यांनी मला पेयातून गुंगीचे औषध पाजून माझ्यावर चालत्या मोटारीत लैंगिक अत्याचार केले… अशी फिर्याद होती. मामला अत्यंत गंभीर होता. अटक… बदनामी… खटला… आणि तुरुंगवास ठरलेला होता. अचानक बॉम्ब पडल्यावर कानठळ्या बसतातच… कारण कानांवर हात ठेवायला फुरसत मिळत नाही. इथेही असेच झाले. ती महिला मोटारीत बसली असताना जवळजवळ वीस मिनिटे दुस-या फोनवरून कुणाला तरी मेसेज करीत असल्याचे साहेबांनी पाहिले होते… त्यांच्या लक्षात हा डाव यायला वेळ लागला नाही. तेवढ्यात साहेबांच्या मुलाचा फोन आला… त्याला मेसेज गेला होता… तुझ्या वडिलांनी गुन्हा केला आहे!
पोलिसांनी त्या महिलेचीही चौकशी चालवली होती. पण सामान्य प्रश्नाला ती भलतीच उत्तरे देत होती… तपासात सहकार्य करायला राजी नव्हती. नशिबाने पोलिसांनी साहेबांविरुद्ध अटक करण्याची जरुरी नसलेले warrant जारी केले आणि खटल्याला सामोरे जाण्याची सुचना केली. पोलिसांना साहेबांचा काही दोष असल्याचे दिसत नव्हते. पंचवीस मिनिटांच्या मोटार प्रवासात महिलेला गुंगी आणणारे पेय देणे, तिला गुंगी येणे, छोट्या मोटारीच्या आसनावर तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करणे आणि तिला भरवस्ती असलेल्या रस्त्याने आणि त्यात डिसेंबर न्यू इअरसाठी लावलेल्या पोलिसी बंदोबस्ताच्या नाकाबंदीमधून आणून पोलिस स्टेशन समोर उतरवणे… आणि मग त्या महिलेने काही वेळाने त्याच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बलात्काराची तक्रार नोंदवणे… आणि या लेखी तक्रारीच्या अर्जावरचे अक्षर सुबक, नीटस आणि अगदी तपशीलवर वर्णन करणारे होते… जणू काही हा अर्ज आधीच तयार करून ठेवलेला होता… गोष्टी काही जुळत नव्हत्या.
साहेब घरी आले. पत्नीला, मुलाला परिस्थिती सांगितली. मित्रांशी चर्चा केली. तेवढ्यात त्या महिलेच्या तथाकथित वकिलाचा फोन आला… ले दे के बात को रफा-दफा कर सकते हैं! ‘वकील’ महाशय बोलत होते. अर्थातच कर नाही त्याला डर नाही… या उक्तीने साहेबांनी त्याला नकार दिला. काही मित्रांनी, पोलिसांतल्या काही मार्गदर्शक लोकांनी ‘तात्पुरते फरार व्हा… मग पुढे पाहू’ असा सल्ला दिला… जो साहेबांनी लगेच धुडकावून लावला. जामिनासाठी अर्जही केला नाही. आणि पोलिसांनीही ना-अटक वारंट बजावल्याने अटकेची वेळ आली नाही.
पुढे खटला खालच्या न्यायालयात चालला. महिलांच्या बाजूचे असलेले काही कायदे या महिलेच्या बाजूने वागले. कायद्यांचा गैरफायदा घेतला जाऊ लागल्यावर कायदेही हतबुद्ध होतात! इथे साहेबांच्या विरोधात निकाल गेला… पण वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा मिळाली!
तोवर मिडीया, लोकांत, नातेवाईक मंडळीत चर्चा तर झालीच होती. धूर आहे म्हणजे आग असणारच की… अशी घिसी-पिटी कहाणी इकडे तिकडे फिरली. साहेब नोकरी करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीने आता तुमच्या सेवेची गरज नाही, असे कळवले. प्रश्न केवळ पैशांचा नव्हता.. इभ्रतीचा होता!
पण फौजी साहेब गप्प बसणा-यातले नव्हते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनेही समांतर तपास केला. लष्करी सेवेत असताना त्यांनी गुप्त माहिती विभागातही सेवा बजावली होतीच. संगणक प्रणाली वापरण्याचेही ज्ञान तोवर मिळवले होते. त्यांनी त्या महिलेची इत्यंभूत माहिती मिळवली. पैसे द्या… सर्व मिटवून टाकू म्हणाना-या त्या महिलेने अशा प्रकारचे सात-आठ खटले विविध प्रौढ व्यक्तींवर दाखल केल्याचे दिसून आले. संबधित पोलिसांनी प्रोटोकौल न पाळता घाईघाईने गुन्हे दाखल केल्याचेही दिसले. साहेबांनी सर्व माहिती गोळा केली. काही लोक बदनामीच्या भीतीने पैसे देऊन गप्प बसलेले होते. साहेबांनी दिल्लीतील एका स्वयंसेवी कायदा साहाय्य सेवेची मदत घेतली. एकम न्याय फौंडेशन नावाची ही संस्था असून दीपिका नारायण भारद्वाज नावाची तरुणी हे सेवाभावी काम करते. तोवर या महिलेच्या माध्यमातून साहेबांना ४७ वेळा फोन केले गेले… पैसे मागितले गेले… साहेबांच्या वकिलांना त्या महिलेचा वकील भेटायला आणि प्रकरण मिटवण्याचे बोलणे करूनही गेला होता! साहेबांच्या वकिलाने त्या वकिलाचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवण्याची युक्ती मात्र वापरली, त्याचा फायदा झाला.
सुप्रीम कोर्ट मध्ये advocate अश्विनी कुमार दुबे साहेबांनी ‘आरोपी’ची बाजू मांडली. आरोपी आणि गुन्हेगार हे दोन वेगळे शब्द असतात. ज्याच्यावर आरोप केला गेलेला आहे तो गुन्हेगार असतोच असं नसतं. कायद्यांतील पळवाटा शोधून निष्पाप लोकांना अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणे ही सुद्धा एक प्रवृत्ती बनत चालली आहे, अशी शंका वाटते.
एका सेवानिवृत्त सैनिक अधिका-याच्या वाट्याला आलेले, २०२२ मध्ये सुरु झालेले हे दुष्टचक्र २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टच्या सकारात्मक निकालाने संपले… आणि भारतीय सेनेसाठी जीवाची बाजी लावून आलेला एक सैनिक अधिकारी जीवनाच्या या मोठ्या युद्धात विजयी ठरला… एकम न्याय संस्था, श्रीमती दीपिका नारायण भारद्वाज, वकील अश्विनीकुमार दुबे साहेब यांचे आभार मानताना आपले कथानायक शूरवीर कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) यांचेही त्यांच्या never say die वृत्तीबद्दल अभिनंदन झालेच पाहिजे. त्यांनी सेवा बजावली त्या गोरखा पलटणमध्ये ‘‘कायर हुनु भांडा मरनु रमरो’ म्हणजे ‘ भिऊन जगण्यापेक्षा लढून मरणाला कवटाळणे उत्तम’ असं म्हटलं जातं… कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) न भिता लढले… आणि जिंकले! त्यांनी स्वत: पस्तीस मिनिटे न्यायसनाच्या डोळ्यांना डोळा भिडवून नीडर युक्तिवाद करीत आपली बाजू मांडली, हे विशेष! सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने वालिया साहेबांची निर्दोष मुक्तता केली आहे.
एकम न्याय कॉन्फरन्स संस्थेने वालिया साहेबांना ‘आयर्न स्पाईन ‘ (अर्थात पोलादी कणा असलेला माणूस). या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
☆ मराठी भाषा गौरव दिन… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती.
या निमित्ताने आम्ही प्राथमिक शिक्षक शाळेत जे शिकवत असतो ते थोडे आपुलकीच्या माणसांना सांगावे वाटले. लहान मुलांना योग्य उच्चार शिकवले गेले नाहीत तर काय होते ते आपण सगळेच अनुभवत असतो. त्या साठी आम्ही प्राथमिक शिक्षक अगदी लहान वयाचे होऊन त्यांच्या वयाचा विचार करून काही गोष्टी सोप्या करून सांगतो. खूप वेळा त्यांच्यातले होऊन जावे लागते. आणि उच्चार चुकला तर काय गंमत होते आणि अर्थ कसा बदलतो हे दाखवावे लागते.
क, ख, ग, घ, ङ – यांना *कंठव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो. एकदा करून बघा.
च, छ, ज, झ, ञ- यांना *तालव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा
ट, ठ, ड, ढ, ण- यांना *मूर्धन्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो. एकदा म्हणून बघा.
त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात. यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.
प, फ, ब, भ, म, – यांना *ओष्ठ्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा.
हे लहान मुलांना सांगून चालत नाही. त्यांच्या कडून म्हणवून घ्यावे लागते. शिक्षकाने उच्चारणे व मुलांनी मागे म्हणणे हा एक आनंद सोहळा असतो. हे सगळे प्रात्यक्षिक करून घ्यावे लागते. तरच त्यांचे उच्चार व लेखन योग्य होण्यासाठी मदत होते.
बरेचदा काही कविता तयार करून त्यातील गंमत दाखवावी लागते.
अशीच एक कविता.
बघा कशी वाटते..
*एक काना वाढला*
*आणि अर्थच बदलला*
मल झाला माल
गल झाली गाल
पल झाला पाल
चल ची बदलली चाल
मत झाले मात
नत झाली नात
पत मधून उगवली पात
रत होताच झाली रात
मन चा वाढला मान
धन चे झाले धान
तन ने घेतली तान
नन झाली नान
तर बनले तार
मर बनले मार
हर झाला हार
गर झाला गार
सर चे झाले सार
पर ने केले पार
धर ची बदलली धार
खर बनली खार
भर चा झाला भार
नर ची झाली नार
सर चे झाले सार
चर चे झाले चार
गड झाले गाड
पड झाले पाड
झड झाली झाड
लड बनली लाड
कडी बनली काडी
गडी बनले गाडी
सड बनली साडी
वड झाले वाडी
गज बदलून झाली गाज
सज वर चढला साज
भज झाले भाज
मज ला चढला भलता माज
रग ला आला राग
मग ने काढला माग
नग बनला नाग
जग ला आली जाग
भंग ने पाडला भांग
रंग ने लावली रांग
संग वदला सांग
ढंग ची झाली ढांग
तप करता आला ताप
जप जपता झाला जाप
कपा ने केले काप
खप बनला खाप
टळ चे झाले टाळ
मळ ची झाली माळ
चळ चे झाले चाळ
गळ ने काढला गाळ
अशी माय मराठीची संपन्नता
उभी रेघ अवतरता
अकार आकार होता
शब्दांच्या अर्थात येते परिवर्तनता.
आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का? कारण एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.
अथर्ववेदात कामदेवाला सर्जनशील शक्तीचा संरक्षक मानले आहे. कामदेव म्हणजे तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तातील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. ज्याचा जन्म ब्रम्हदेवाच्या हृदयापासून झाला.
मन्मथ, मदन, आनंद, कुशमेश्वर, प्रद्युम्न आणि कामदेवाची पत्नी रती म्हणून रतिकांत अशी कामदेवाची विविध नावे आहेत. कामदेव हे पुरुष प्रेमाचं प्रतीक आहे तर रती हे स्त्री प्रेमाचं प्रतीक आहे. कामदेव आणि रती दोन्ही प्रेम देवताच आहेत. आणि पर्यायाने सृजन अथवा उत्पत्ती देवता आहेत. विश्वाची निर्मिती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री-पुरुषांमध्ये कामवासना प्रज्वलित होतील. या कामवासनेचा संभव रती आणि मदनदेवतेमुळे स्त्री-पुरुषांच्या शरीरात होतो जे अत्यंत नैसर्गिक आहे.
अशा प्रकारच्या कामभावनेने घायाळ झालेल्या एका तरुणीच्या प्रणयार्त मनस्थितीचे दर्शन देणाऱ्या अत्यंत संवेदनशील गीताचा आज आपण रसास्वाद घेऊया. गीतरचना अर्थातच डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची आहे आणि शीर्षक आहे प्रणयार्त.
☆ प्रणयार्त ☆
मयुरपिसांचा चंदनमंचक प्रणयातुर झाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला।।ध्रु।।
*
धगधगत्या अंगा न साहवी तलम वस्त्र हलकी
हिरमुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी
फुलती कलिका आर्त जाहली भृंगा भोगायला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।१।
*
ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा
प्रणयदग्धता भाजुन काढी अवघ्या शयनगृहा
दवबिंदूंना आस लागली प्राशुनी घ्यायाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।।२।।
*
गवसणीस सोडून बैसला तानपुरा मोकळा
आहे केवळ ध्यास अंतरी स्पर्शसुखाचा मला
काळ तिष्ठला स्तब्ध होऊनी प्रणयाच्या साक्षिला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।।३।।
*
डॉ. निशिकांत श्रोत्री.
या गीतातील धुंद, प्रणयोत्सुक, नशा चढलेली तरुणी जणू काही कामक्रीडेसाठी आवाहनच देत आहे. ती म्हणते,
मयूर पिसांचा चंदन मंचक प्रणयातुर झाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।ध्रु।
मोरपिसांचा मुलायम बिछाना असलेला हा चंदनाचा पलंगही माझ्या इतकाच कामक्रियेसाठी उत्सुक झालेला आहे. माझ्या अंगोपांगी संचारलेला हा कामाग्री शमवायला त्या सुगंधी मदनशरांचा वर्षावच व्हायला हवा.
पुढे ती म्हणते,
धगधगत्या अंगा न साहवी तलम वस्त्र हलकी
हिरामुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी
फुलती कलिका आर्त जाहली भृंगा भोगायला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला
काम हा विकार असला तरी त्याची उत्पत्ती ही नैसर्गिक आहे. या गीतातील ही तरुणी या भावनावेगाने इतकी व्याकुळ झाली आहे की तिला अंगावरच्या तलम वस्त्रांचंही ओझं वाटतंय. अंगातली चोळी काढून टाकून तिला अनावृत स्थितीतच सौख्य वाटत आहे. उमलणाऱ्या फुलाला जशी गुणगुणणाऱ्या भ्रमराची ओढ असते तद्वत तिला प्रियकराच्या स्पर्शाची आर्त आस जाणवत आहे.
या चार पंक्तीत कवीची शब्दांवरची प्रभावी पकड जाणवते. किती काव्यमय पद्धतीने त्यांनी कामातुर तरुणीचे विवस्त्र पण चितारले आहे! कलिका आणि भुंगा या प्रतीकात्मक रूपकांविषयी आपण जरा नंतर विचार करूया.
ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा
प्रणय दग्धता भाजुन काढी अवघ्या शयनगृहा
दवबिंदूंना आस लागली प्राशुन घ्यायाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायाला
प्रियकराच्या स्पर्शासाठी आसुसलेली ही विरहिणीच आहे. या क्षणी तिच्यासोबत आहे ती समयिची प्रज्वलित ज्योत. जणू काही ती या प्रणयातुर नारीला निरखून पहात आहे. अवघ्या शयनगृहाला जणू काही पेटलेल्या या कामाग्नीची धग जाणवत आहे. तसेच अंतर्देहातून पाझरणार्या दवबिंदूनाही आता निराळ्या स्त्रोतात मिसळून जाण्याची घाई झाली आहे. नदीचं पाणी जसं सागराच्या प्रवाहात मिसळण्यासाठी उत्सुक असतं नेमकी हीच स्थिती इथे जाणवत आहे. आणि या विकारांची तृप्ती, शांती फक्त मदनशरांनीच होऊ शकणार आहे.
गवसणीचा सोडून बैसला तानपुरा मोकळा
आहे केवळ ध्यास अंतरी स्पर्श सुखाचा मला
काळ तिष्ठला स्तब्ध होऊनी प्रणयाच्या साक्षीला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला
प्रणयाच्या या धुंद, गंधित, निशेच्या परमोच्च बिंदूवर असताना देहावरच्या वस्त्रांचे तिला भान नाही. फक्त स्पर्श सुखासाठी तिचे अंतर्मन उत्कट झालं आहे. काळही जणू थांबलाय, स्तब्ध झालाय या निसर्गोत्पन्न प्रणयाचा सोहळा अनुभवण्यासाठी. ही प्रणयाची आर्तता संतोषण्यासाठी या रतीला फक्त मदनाचीच प्रतीक्षा आहे.
उत्तान शृंगार रसातलं हे तीन कडव्यांचं गीत वाचताना डोळ्यासमोरून एक शृंगारिक दृश्यच तरळत जातं.
वाहणाऱ्या हलक्या हवेच्या झुळुकेने शयनगृहाचे पारदर्शक पातळ पडदे डोलत आहेत.. कोपऱ्यातील समईच्या ज्योतीचा प्रकाशही जणू त्या नशेला पूरक ठरत आहे आणि अशा वातावरणात पुरुष स्पर्शासाठी सैरभैर झालेली ती विवस्त्र रमणी प्रियकराची वाट पाहत आहे… असे हे शब्द चित्र डोळ्यासमोरून झरकन जाते.
हे गीत वाचल्यानंतर क्षणभर तरी कुठल्याही नियमशास्त्राच्या आधारे त्याची तोडफोड करावी असं वाटलंच नाही. फक्त डोळे मिटावेत आणि कवीच्या तरल शब्दांची नशा अनुभवावी.
प्रतिभा, व्युत्पत्ती, अलंकार, छंद, वृत्त या काव्य कारणांना काव्य शास्त्रात खूप महत्त्व आहे आणि हे तंत्र प्रणयार्त या गीतात अगदी तंतोतंत साधलेले आहे.
या काव्यपंक्तीत सहज होणारा चेतना गुणक्त्ती या अलंकाराचा अविष्कार केवळ सुंदर!
शिवाय हिरमुसली होऊन बसली फडताळी कंचुकी*या ओळीतील *हिरमुसली कंचुकी ही शब्दरचनाही खूप सूचक आहे. अंगावरची वस्र उतरवताना स्वाभाविक स्त्रीलज्जा किंवा संकोच व्यक्त करण्यासाठी योजिलेला हिरमुसली हा शब्द अतिशय कौशल्याने, काव्याचे सौंदर्य सांभाळून कवीने हलकेच वेचला आहे.
या गीतात कवीने ज्या मदनशरांचा उल्लेख केला आहे त्याबद्दल थोडा विचार करूया.
कामदेवाची अस्त्रे म्हणजे धनुष्य व बाण आहेत. त्याचे धनुष्य इक्षु दंडाचे (उसाचे) अत्यंत लवचिक असे आहे. रक्त कमल, नील कमल, आम्रमंजरी, अशोक पुष्प व मोगरा ही पाच गंधपुष्पे म्हणजे त्याचे पाच बाण आहेत. संमोहन, उन्मादन शोषण, तापन, स्तंभन हे सारे मदनाचे बाण आहेत. आणि कामक्रीडे मध्ये त्या त्यावेळी त्यांच्या अर्थपूर्ण सहाय्यकारी भूमिका आहेत. हे सर्व नीट अभ्यासले असता कवीने या गीतात केलेला मदन शरांचा उल्लेख औचित्यपूर्ण वाटतो.
कलिका आणि भुंगा ही प्रतीकात्मक रूपके आहेत. आणि ती स्त्री-पुरुषांच्या शृंगारिक अवयवांसाठी(कामेंद्रियांसाठी) सूचकतेने वापरलेली आहेत. तसेच कमलदलातला भुंगा हा लाक्षणिक अर्थाने संभोगाची कल्पना मांडतो.
गवसणीस सोडून बैसला तानपुरा मोकळा…. या काव्यपंक्तीत चेतना गुणोक्ती अलंकारासोबत हळुवारपणे विवस्त्रता व्यक्त करणारं रूपकही आहे. तानपुरा या शब्दात “तिच्या कायेची कमनीयता” दडलेली आहे. आणि गवसणी म्हणजे देहावरची वस्त्रे. लाक्षणिक अर्थाने वापरलेले हे शब्द काव्यरचनेला वेगळेच सौंदर्य प्राप्त करुन देतात.
हे संपूर्ण गीत मी जस जसे वाचत गेले आणि एकेका शब्दांची यथामती फोड करत गेले तेव्हा डॉक्टर श्रोत्रींच्या अचाट कल्पना बुद्धीची आणि सौंदर्य दृष्टीची झालेली जाणीव थक्क करणारी वाटली.
वास्तविक काव्यशास्त्रात शृंगार हा अत्यंत महत्त्वाचा रस आहे आणि कवींचाही शृंगार रस हा आवडताच आहे. मूळातच कामविकार हे सर्वसामान्य माणसाच्या दंपती जीवनात उद्भवतातच आणि सामाजिक व कौटुंबिक जीवनात कामशांतीचे महत्त्वही तितकेच आहे.
शृंगार समयी स्री आणि पुरुष यांच्या भावना निराळ्या असतात. शृंगारा अंती पुरुषाला जाणवते ती असीम तृप्ती. मात्र स्रीच्या बाबतीत तसे नसते. ती तृप्त न होता अधिक आर्त होते. आणि या गीतात ही आर्तता अतिशय तरल शब्दात कवीने टिपली आहे. हे विशेष आहे.
श्रृंगार रसाचा साहित्य कृतीमध्ये वापर करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. शब्दांच्या वापराला इथे खूप महत्त्व आहे. शृंगारमय प्रसंगाचे वर्णन करताना शब्दांची जर घसरण झाली तर सारी कलाकृती सवंग, अश्लील, आघळपघळ, ओंगळवाणी, अवाचनीय होईल. पण डॉक्टर श्रोत्रींचा शब्दप्रवाह हा चांदण्यासारखा शीतल आहे, तरल आहे, सुंदर आहे. सूचक आणि भावदर्शी आहे. मोगर्याची फुलं उधळावीत इतका सुखद आहे. त्यामुळे शृंगारतलं निसर्गतत्व त्यांनी अत्यंत आध्यात्मिक रित्या मांडलय म्हणूनच त्यांचं हे गीत म्हणजे मला शिंपला उघडून मोती उचलावा इतकं सुंदर वाटलं आणि वाचक हो! तुम्हालाही ते तसेच जाणवेल याची मला खात्री आहे.
☆ वस्तू वस्तू जपून ठेव – २ – रेडिओ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
“नमस्कार श्रोतेहो… हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. सकाळचे पाच वाजून सत्तावन्न मिनिटे आणि बारा सेकंद झाले आहेत. आपल्या आजच्या सभेला सुरुवात करु या मंगलध्वनीने…
आणि मग तो मंगलध्वनी सुरु व्हायचा. अगदी लहानपणी पासून दिवसाची सुरूवात अशीच होते. आणि दर पाच मिनिटांनी बदलणारे कार्यक्रम वेळ सांगतात. सकाळच्या घाईत घड्याळ बघावे लागत नाही. ते काम रेडिओ ऐकला की आपोआप होते. शिवाय ते कार्यक्रम ज्ञानात भर घालतात हा खूप मोठा आणि महत्वाचा फायदा! आजही मला लहानपणी निवेदन करणारे निवेदक व त्यांचे निवेदन आठवते. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या द्यायला आल्या की शाळा कॉलेजला निघायची योग्य वेळ झाली हे लक्षात यायचे. आणि त्या बातम्या संपल्या की उशीर झाला असे समजायचे.
सकाळी सकाळी रेडिओ लावायची जुनी सवय बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या करते. आज गाणे ऐकले शब्द शब्द जपून ठेव एकीकडे काम चालू होते. आणि इतके अर्थपूर्ण गाणे ऐकत असताना माझ्या मनात कसे विचार येतात याचे हसू आले. आणि जपून ठेवलेल्या वस्तू आठवायला लागल्या. आणि कुठे कुठे जीव अडकतो याची गंमत वाटली.
परवा सहज कपाट आवरताना जरा पिवळसर पडलेली कॅरीबॅग सापडली. उघडून बघितले तर रेडिओचे लायसन सापडले. आता असे वाटेल हा काय प्रकार आहे? पण पूर्वी (मी लहान असताना) रेडिओ साठी परवाना आवश्यक होता. एका वर्षा साठी १/२ रुपये पोस्टात भरून त्या पुस्तकावर तिकीट लावून आणावे लागायचे. आणि घरात टेबल सारखे मोठे रेडिओ असायचे तो नीट ऐकण्यासाठी ३/४ फूट लांबीची व २/३ इंचाची तांब्याची जाळी असलेली पट्टी घरात लावावी लागायची. आणि छोटा रेडिओ (ट्रांझिस्टर) सायकलच्या हॅण्डलला लावून लोक ऐटीत फिरायचे. आणि ज्याच्याकडे लायसन नसेल तो लपवून ट्रांझिस्टर नेत असे.
हे सर्वच रेडिओ मात्र नवनवीन कपडे घालायचे.
त्यात गृहिणीची कलाकुसर व दृष्टी याची जणू परीक्षा व्हायची. काही जणी तर त्यावर स्वहस्ते भरतकाम करायच्या आणि कौतुक मिळवायच्या.
आमच्या कडे मोठ्ठा रेडिओ होता. लांबून बघितले तर पुस्तकांचे कपाट वाटावे असा होता. मी कायम त्याच्या बटणावर पाय ठेवून वर चढून दूध प्यायला बसायची. मग जेवायला बसायची. ही बाल सवय त्याचा उपयोग कळायला लागल्यावर सुटली.
विशेष म्हणजे या रेडिओचे सर्वत्र दर्शन होते. शेतात, मळ्यात, चौकात, पारावर, बागेत कुठेही सूर ऐकू येतात. मधल्या काही काळात असे भय वाटत होते की सगळ्या आधुनिक साधनांच्या गदारोळात आपला रेडिओ लुप्त होईल का? पण रेडिओने आपले स्थान कायम ठेवले आहे. स्वरूप बदलले आहे. सुटसुटीत झाले आहे. पूर्वीच्या अडचणी (रेडिओ वापरातील) आता नाहीत. त्याने प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये स्थान मिळवले आहे. आणि पेन सारखे छोटे स्वरूपही धारण केले आहे. आणि आता ऐकू येणारी स्टेशन्स सुद्धा वाढली आहेत.
काही वर्षांपूर्वी प्रसारित होणारे कार्यक्रम आधुनिक स्वरूप धारण करून पुन्हा प्रसारित होऊ लागले आहेत.
या रेडिओच्या अनंत आठवणी बऱ्याच जणांच्या मनात जागृत असतील.
रेडिओवर एक जाहिरात लागते. एक सखी दुसरीला विचारते, “कुटं ग शिकलिस एवढं ग्यान? ” लगेच दुसरी उत्तरते, “आपल्या रेडिओनं श्यानं केलंय की, तू बी ऐकत जा. ” हे ऐकून अगदी पटले. खरेच जे नियमित रेडिओ ऐकतात त्यांचे मन विविध माहिती, ज्ञान, आरोग्य, गृहिणींना मार्गदर्शन, मनोरंजन, यांनी भरून जाते. आणि या साठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. शिवाय डोळेही बिघडत नाहीत.
या रेडिओची सुरुवात भारतात १९२३ साली झाली. पण ती खाजगी कंपनी होती. आणि ती दिवाळखोरीत निघाली. नंतर १९३६ मध्ये ही कंपनी सरकारने ताब्यात घेतली आणि ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले.
प्रासंगिक कार्यक्रम सादर करणे. हे तर रेडिओचे खास वैशिष्ट्य आहे.
रेडिओवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर लिहायचे म्हंटले तर एक वेगळाच लेख होईल.
आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने भारतातील रेडिओ विषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय खूप मोठा आहे. जे माझ्या सारखे रेडिओ प्रेमी आहेत त्यांना नक्कीच असे वाटते, हा रेडिओ अजरामर होवो. या मनापासून शुभेच्छा!
☆ शुद्ध भाषा आणि भाषाशुद्धी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
*मराठी मातृभाषादिनाच्या सर्वांना शुभेच्छा. *
फेसबुक, व्टहाटस् अपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.
स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे.
*आतपुढ* (आले तसे पुढे ढकलले) ही व्टहाटस् अप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात.
आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हे ही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे.
आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल त्यांना या विषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.
त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते!
याला काय करायचे! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो इंग्रजी असो वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा.
लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते!
समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘कापी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे.
लेख लिहिताना, ‘ घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते ‘ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘ वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे ‘ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजी काट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर ‘ ‘ उसमे क्या है’, ‘ उससे क्या फरक पडता है, ‘ ‘चलता है याsर’, ‘ टेक इट ईझी ‘ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचुकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य आहे.
अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.
मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही किती परकीय शब्द, किती ऊर्दू, किती इंग्रजी शब्द!
इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’, please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?
आपली दैनंदिन विचार विनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?
एका हिंदी लेखातील अवतरण…
‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोग में लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजी के शब्द बोलते है। हर हिंदी प्रेमी इस लेख को पढ़ने के बाद अपने मित्रों के साथ साझा अवश्य करे।’
(अवतरण समाप्त)
आपण मराठीतही अनेक ऊर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा ह्या सूचनेचा.
अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, आभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग!
समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेऊन आता इथेच थांबणे उचित समजतो.
व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर! तो पर्यंत नमस्कार!!
फक्त वेलांटी जर बदलली… दिन या शब्दाची तर आजची अवस्था वर्णन करायला पुरेसे आहे… पण वेलांटी बदलून परिस्थितीचे वर्णन करणारे शब्द मराठी भाषेतच आहेत. असो आज आपण आजच्या लेखात मराठी भाषेने दिलेले काव्य आणि गाणे याचा विचार करूयात आणि आपण किती समृद्ध आहोत हे लक्षात येईल आपल्या घरची समृद्धी लक्षात न घेता लोकांच्या प्लास्टिकच्या डब्याचं वर्णन करायच अशी आज आपली गत झाली आहे असो..!
संपूर्ण मराठी भाषेचा विचार केला तर पुस्तक तयार होईल.. फक्त मराठी भाषेत असलेल्या काव्य आणि गाण्यांचा आपण येथे विचार करणार आहोत
अगदी साडेसातशे वर्षांपूर्वी पासून चा विचार केला तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हरिपाठ अनेक वारकऱ्यांच्या मुखातून रोज सकाळी प्रसवतो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.. किंवा पैलं तो गे काऊ कोकता हे… मोगरा फुलला… आणि विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले पसायदान म्हणजे भारतीय माणूस देवाकडे काय मागतो आणि विश्व कल्याणाची चिंता करतो याचे उत्तम उदाहरण आहे. तुकोबांच्या गाथांचा मोह तर इंद्रायणीलाही झाला आणि त्या त्यामधे बुडालेल्या असतानाही वर तरुन आल्या. चोखामेळ्याचे अभंग जनाबाईचे अभंग तुकारामाचे अभंग आपली अभंग ठेव आहे. मन अस्वस्थ झालं की शांततेचा तो एकमेव मार्ग आहे नुसता हरिपाठ म्हणला तरी मन शांत होईल
पुढील काळात अनेकांनी त्यात भर घातली अनेक काव्य मुखामुखी झाली जात्यावरच्या ओव्यांनी बायकांचा दुःख बोलून दाखवलं माहेर सासरची महती गाईली त्यानंतरच्या येणाऱ्या काळात मोरोपंतांच्या आर्या आल्या खाडीलकरांची नाट्यपद आहेत संगीत नाटकांचा जमाना आला आणि त्यांनी लोकांना वेड लावला. आजही ती नाट्य गीते ओठावर आहेत संगीत मानापमान संगीत सौभद्र अशा अनेक नाटकाने त्या काळातली दुनिया संगीतमय करून टाकली आणि तो काळ मराठी भाषेच्या नाट्यकलेचा वैभवशाली काळ समाजाला गेला त्यानंतर येणाऱ्या मर्ढेकर आणि त्यांचे समकालीन कवी यांनी आशय संपन्न कविता दिल्या पुढे त्या काही कविताना चाल लावून त्याची गाणी झाली गाण्याच्या बाबतीत असं म्हणतात की गाण्यांना जन्म आहे मृत्यू नाही.. ती अमर आहेत. मराठी भाषेतील अवीट गोडीची ही गाणी हे काव्य खरोखर अजरामर आहेत…
जन पळभर म्हणतील हाय हाय… हे भा रा तांब्यांचे काव्य अजरामर आहे.. परी जयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती… या कवितेतला विनम्र भाव आणि कृतज्ञता किती सुंदर आहे! अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना… या काव्यामागची कथा वेगळी आहे.. काव्यमागे अनेक कथा असणारी गाणी तत्कालीन कवीनी दिली… पुढे चित्रपटांचा काळ जसा सुरू झाला तशी सुंदर चालीची अनेक गीते आणि भावगीते तयार झाली. प्रत्येक गीताला एक कथा सांगावी इतका ऐवज आहे प्रत्येक गाण्याला कथा आहे कवीची संगीतकाराची पण ते लिहिण्याचा एक स्वतंत्र विषय करावा लागेल.
कौसल्येचा राम बाई… हे काव्य लिहून झाल्यावर पु ल देशपांडे यांनी त्याची चाल बांधली होती माणिक बाईने ते गाणं गायलं आणि या गाण्याला अमरत्व लाभलं ग दि मा ने दिलेली कित्येक गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत…
प्रेमा भाग्य दिले तू मला… त्या बदल्यात नायिका विचारते आहे की मी तुला काय देऊ? .. प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का? का जळवंती च्या जलाची निळी ओढ ती तुला हवी का? अशा अनेक सुंदर ओळी या काव्यात आहेत आणि तितकीच सुंदर चाल… तितके सुंदर संगीत..! ही सगळी अमरत्व लाभलेली गाणी…
खळ्यांचे श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा… भर मे महिन्यात ट्रेनमध्ये बसून दुपारच्या वेळेला लिहिलेले हे गाणं म्हणजे कवीच्या कल्पनाविलासाचे उत्तम उदाहरण आहे. लताबाईने ते तितक्याच ताकतीने गायलेला आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे?
घन घन माला नभी दाटती या गाण्यातील..
कोणी विरहिणी राधा गवळण
तिला अडवते कवाड अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले
विरले जलधारा…! काय सुंदर काव्यरचना आणि प्रसंग. अत्यंत कलात्मक…! हा एवढा खजिना सोडून इंग्रजी माध्यमाकडे का वळता रे बाबांनो…?
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. अ अ आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका… दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी अवघ्या दत्त विराजे… बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला… वाट पाहणाऱ्या दोन प्रेमी युगोलांसाठी अजरामर झालेले गीते… जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते.. जे वेड मजला लागले तुजला ही ते लागेल का माझ्या मनाची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? … उडत्या चालीची, तरुण मनाची,… तुझी चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु किंवा लपवलास जरी हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का… मालती पांडे यांनी गायलेले सुंदर गीत… नाच नाच नाचुनी अति मी दमले… बाई मी विकत घेतला शाम… जग हे बंदी शाळा… जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे… रामायणातील राम जन्मला ग सखे राम जन्मला त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करणारे अप्रतिम गीत, जोवर राम आहेत कृष्ण आहेत तोवर या गीतांना मरण नाही ती अमर आहेत. हा माझा मार्ग एकला हे शांत चालीचं गाणं.. जीवनाचा सत्य सांगून जातं. “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया” हे गाणं डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही… जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा प्रत्येक मुलीच्या लग्नात वाजणार हे गीत अख्या मांडवाला रडवून जायचं… अमर भूपाळी मधली घनःशाम सुंदरा ही भूपाळी… सांगा मुकुंद कुणी हा पाहिला हे गाणं… गगन सदन ही प्रार्थना.. सुवासिनी मधले येणार नाथ आता.. बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत… जीवनात ही घडी अशीच राहू दे.. आम्ही जातो आमच्या गावा मधलं… देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा… आराम हराम आहे या चित्रपटातलं आकाशी झेप घे रे पाखरा… तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले… एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात… अष्टविनायका तुझा महिमा कसा… किती असंख्य गाणी..! विरह गीत, प्रेम गीत, भक्तीगीत, भावगीत, मराठी कवींनी लिहिली संगीतकाराने चाली लावल्या संगीत दिलं आणि ती गाणी अजरामर झाली केवढा मोठा खजिना आहे. हे मी इथे लिहिते ते अगदी वरवरचे आहे याची जाणीव मला आहे या खजिन्याचा आनंद घ्यावा… तोच आनंद पदरात भरून माघारी फिरावं.. खजिन्याचा आनंद लुटावा खजिना नव्हे.. कारण तो अमाप आहे.
… हे इतक सुंदर मराठीत असताना हे सगळं सौंदर्य हा आस्वाद हा संस्कार आमची पुढची पिढी मात्र घेणार नाही कारण ते रेन रेन कम अगेन, मेरी हॅड अ लिटिल लॅम्प.. डॅफो डीलस्.. अशा कविता पाठ करते ज्या त्यांच्या मातृभाषेत नसल्यामुळे त्यांना त्याचा अर्थही समजत नाही आजच्या दिवशी या सगळ्या कवी लेखकांचे स्मरण करा त्यानी आपल्याला काय दिले हे दहा मिनिटे बसून मनोमन आजमवा. आमची पिढी भाग्यवान मातृभाषेत शिकली आणि फर्ड इंग्रजी येत नाही म्हणून कुठेही अडलं नाही मराठी साहित्यातला हा आनंद आम्ही आज उपभोगतोय. नुसती गाणी नाहीत हा संस्कार आहे, इतिहास आहे, पुराण आहे.. त्याच्या कथा आहेत, त्या भावभावनांचे वर्णन आहे.. आम्ही हे मनसोक्त उपभोगले… श्यामची आईचे चिंधीच्या गाण्याने घराघरात प्रेमाचा संस्कार रुजला होता आणि द्रोपदीशी बंधू शोभे नारायण.. हे भावा बहिणीचे प्रेम सांगितलं होतं …
हे सगळं लुप्त होता कामा नये. हा निखळ आनंद सर्व मराठी कुटुंबाला मिळालाच पाहिजे. किमान अशी प्रार्थना आपण देवाजवळ आजच्या दिवशी करू…
या लेखात मी फक्त काव्याचा परामर्च घेतला आहे.. तोही अगदी वरवर. पण थोडा आनंद तो नक्कीच मिळवून देईल. आजच्या दिवशी ज्ञानेश्वर तुकाराम जनाबाई सर्व संत सज्जन त्यानंतरचे कवी कुसुमाग्रज माडगूळकर खळे काका भारा तांबे मर्ढेकर अत्रे देशपांडे अशा असंख्य लेखकाना, कवीना मनापासून वंदन ज्यानी ही भाषा समृद्ध केली, त्या माय मराठीला सौंदर्य प्राप्त करून दिले, त्या सर्वांना आजच्या दिवशी मनापासून वंदन.
… लक्षात ठेवा नाणी संपतात पण गाणी संपत नाहीत. ती अमर आहेत.. अगदी अजरामर…!
आपल्या लाडक्या लेकाला लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत तरी शिकवा रे.. एवढी आग्रहाची विनंती आहे, नाहीतर ते या खजिन्याला मुकतील आणि त्यांची यंत्र होतील.