☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
सौ.अंजली गोखले
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
इतक्या वर्षाच्या घोर तपश्चर्ये नंतर आणि अथक प्रयत्ना नंतर मी ज्या सोनेरी क्षणांची वाट पहात होते, तो क्षण समोर येऊन ठेपला. मी भरत नाट्य म् या अवघड नृत्य प्रकारामध्ये एम ए. ही पदवी मिळवून मास्टरी केली. तो क्षण मी, आई-बाबा, घरातील सर्व, ताई, गोखले काकू, श्रद्धा, माझ्या मैत्रिणी सगळ्या साठीच अविस्मरणीय होता.
एम ए. पदवी प्राप्त केल्यामुळे माझी आणि माझ्या व्यक्तिमत्वाची ओळखच पूर्णपणे बदलून गेली. कदाचित या परिस्थिती मध्ये मी घरातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहिले असते. आई-बाबां साठी कायमची चिंता बनून राहिली असते. पण त्यावर मात करून मी हे मोठे यश प्राप्त केले होते.
अनेक शाळांमधून, महिला मंडळांमधून, रोटरॅक्ट क्लब, लायन्स क्लब मधून मला नृत्याचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली समाजामध्ये माझी ओळख अंध शिल्पा अशी न रहाता, नृत्यांगना शिल्पा म्हणून झाली. एक चांगला कलाकार म्हणून मला ओळखले जाऊ लागले. मीही माझे भाग्य समजते की माझ्या वाट्याला कलाकाराचे आयुष्य आले.
सतत कार्यक्रम, त्यासाठी ड्रेसअप होणे, मेकअप करणे, हेअर स्टाईल करणे, दागदागिने घालणे, पायात घुंगरू, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे यामध्ये माझा वेळ आनंदात जात होता. घुंगरां च्या छुन छुन गोड गोड नादाने माझ्या जीवनात अनोखे संगीत निर्माण केले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, त्यांचे अभिप्राय, रंगमंचावरून खाली उतरताना पासून त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, त्यांनी हसत मुखाने केलेले हस्तांदोलन या मुळे मी हर्षून जात होते. माझ्या जीवनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. माझे हे कौतुक बघून आई बाबांच्या चेहर्यावरील आनंद आणि समाधान मला जाणवत होते.
भरत नाट्यम् मध्ये एम.ए होणं हे ताई आणि माझ्यासाठी तपश्चर्येचा प्रदीर्घ काल होता. प्रवास होता. त्याचा परिपाक म्हणून त्याला पदवीच्या रुपात एक छान, गोंडस फळ आलं होतं. त्या आनंदा प्रित्यर्थ्य आईबाबांनी एक कौटुंबिक समारंभ करायचं ठरवलं. तो दिवस माझ्यासाठी न भूतो न भविष्यति असा होता. या कार्यक्रमामध्ये आपटे कुटुंबीय, आमचे सर्व कुटुंबीय, सुपरिचित या सर्वांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समोर मी माझी कलाही सादर केली. सगळे जणं नृत्यामध्ये रमून गेले.
☆ विविधा ☆ महात्मा गांधींचा खादीचा वसा ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
खादी म्हणजे हातांनी विणलेले, हातांनी तयार केलेले धागे व त्या धाग्यांपासून विणलेले कापड. (hand made, hand spun) टकळी किंवा चरख्यावर सूत कातले जाई, त्याला सूतकताई म्हणत.भारतातील खेड्यातून राहाणा-या गरीब जनतेला आर्थिक दौर्बल्यातून बाहेर काढण्यासाठी महात्मा गांधींनी 1918 मध्ये खादीची चळवळ सुरु केली. हातमागावर वस्त्र तयार करणे व विणणे या कार्यक्रमातून स्वावलंबन व स्व-शासन या दोन मूल्यांवर आधारित गुणांना त्यांनी उचलून धरले.या वस्त्रोद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कपाशीचे पीक हे भारतातील खेड्यांत उत्पन्न केले जाईल.प्रत्येक जण या उत्पादनाच्या व कताईच्या कामात गुंतून राहील.प्रत्येक स्त्री पुरुष त्यांच्या आवश्यकतेनुसार व किमान गरजेइतकेतरी सूत कातून वस्त्र उत्पादन करेल असे चळवळी चे स्वरूप व ध्येय होते. स्वातंत्र्य पूर्व काळात किंवा नंतरही भारताच्या अनेक भागात शेतकरी वर्गाला वर्षभराच्या उपजीविकेसाठी सुद्धा पुरेसं काम नव्हतं. पाऊस पाण्याच्या दुष्काळामुळे वर्षाचे जवळ जवळ सहा महिने विना काम, विना उद्योग जायचे.
सर्वसामान्य लोक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मानसिक दृष्ट्या हताश व निराश झाले होते. अशा वेळी वस्त्रोद्योग हा ठोस रामबाण उपाय ठरला.कुणालाही शिकता येईल, कुणालाही करता येईल असा उद्योग. जो अतिशय कमी खर्चात व किमान मुद्दल गुंतवणुकीत करता येईल असा व्यवसाय. त्याकाळी कच्चा माल भारतातून इंग्लंडला निर्यात केला जाई आणि तिथे उत्पादित केलेले कापड भारतात आयात केले जाई. पण ते भारतातील जनतेला परवडण्यासारखे नसे. मुख्यतः भारतातील जनता काम व त्यापासून मिळणारा लाभ या दोन्ही पासून वंचित रहात असे. परदेशी मालावर अवलंबून न रहाता आपल्या देशातील कच्च्या मालापासून देशातच कापड तयार करण्याचा खादीचा व्यवसाय हा स्वावलंबनाचा पहिला धडा महात्मा गांधींनी घालून दिला. इंग्रजांचा भारतावरील हक्क झुगारून देण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल.
खादी उत्पादनामागे एक आर्थिक विचारही आहे. तो विचार ‘ Mass Production नको Production by Masses हवे, असा होता. मोठ्या यंत्रांच्या केंद्रित अर्थ व्यवस्थेमध्ये अनेक लोक बेकार तर होतातच, शिवाय मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात विकेंद्रित अर्थव्यवसाय फायद्याचा ठरेल.
खादीच्या चळवळीमागे आणखी एक विचार होता. त्या काळी छोट्या, बारीकसारीक कामे करणा-यांना कमी लेखले जाई. समाजातील उच्च-नीचतेच्या दरीवरती सेतू बांधण्याचं स्वप्न या खादीच्या चळवळीतून गांधींनी पाहिलं होतं. देशातील प्रत्येकाने मग तो उच्चपदस्थ असो वा कमी, श्रीमंत असो वा गरीब, स्त्री-पुरूष प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास सूतकताईला द्यावा व खादी निर्मितीला हातभार लावावा, जेणेकरून गरिबांची सेवा व गरजवंताला मदत होईल. समाजातील दोन भिन्न वर्ग एका सूत्राने बांधले जातील. गांधीजींची ही खादीची चळवळ फक्त राजकीय नव्हती तर त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक कारणे होती. 1934-35 साली एका व्यक्तीच्या स्वावलंबनातून सुरू केलेली ही चळवळ संपूर्णं खेडे, संपूर्ण गाव स्वावलंबी बनवण्याइतकी विस्तारित करण्यात आली. 1920 नंतर संपूर्णं देशभरात स्वयंसेवकांची असंख्य शिबिरे भरवून ही चळवळ देशव्यापी केली गेली.
परिश्रम, स्वावलंबन, परस्परांतील भेदाभेद विसरून एकत्रित काम करणे, परदेशी वस्तू, परदेशी कापड न वापरता, आपल्या देशात तयार होणारे वस्त्र, वस्तू वापरून आपल्या गरीब बांधवांना मदत करणे, या गुणांची ओळख करून देताना विस्मरणात गेलेल्या आपल्या संस्कृतीतील तत्वांचा पाठपुरावा महात्माजींनी केला. खादी ही विशिष्ट काळापुरती मर्यादित चळवळ न राहता तो जीवनाचा स्वभावधर्म होईल इतका पगडा तरूण मनावर बिंबवण्याचे काम या चळवळीने केले. पारतंत्र्याला झुगारून स्वदेशीच्या अभिमानाचं स्फुल्लिंग महात्मा गांधीनी मनामनात चेतवलं.
गांधीजी म्हणत, ” गांधी या नावाचा विसर पडला तरी चालेल पण गरिबांना आधार असलेल्या या चरख्याचा व त्यामागच्या विचारांचा देशाला कधी विसर न पडो.” ते पुढे म्हणत, ” समर्पणाला व त्यागाला आंतरिक व बाह्य शुद्धतेचे पाठबळ असेल तेव्हाच ते परिणामकारक होते. शुद्ध त्याग हा दृढ विश्वास राखून प्रसन्न चित्ताने केलेला असतो. मत्सर, दुर्भावना किंवा शत्रूबुद्धी यांचा पुसटसा सुद्धा स्पर्श नसतो.”
खादी हा कापडाचा तुकडा नाही तर तो ताठ मानेने आयुष्य जगण्याचा मार्ग आहे हा मंत्र त्यांनी दिला.
हा मंत्र आत्मसात करून स्वतः चरख्यावर सूत कातून स्वतःची वस्रे म्हणजे हातरूमाल, साडी, ब्लाऊज, अंथरूण पांघरुण, टॉवेल ( पंचा), झोळी, शर्ट, पायजमा वापरणारी माणसे अजून हा घेतलेला वसा जोपासत आहेत.
☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
वहिनी गेल्या. नंतर आण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरी निमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. आण्णाचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून, मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने आण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे. आण्णांची आई बनून तिने आण्णांना जेवू घातले.
वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. आण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी, आई-वडील, भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्यांची ख्याली-खुशाली विचारून, घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी आण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. आण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’ आण्णा म्हणायचे, म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, `मग तुमचं कोण करणार?’ ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’ पण ती म्हणायची, ‘मी वहिनींना वचन दिलय, शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार!’
उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. आण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् तीदेखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.
आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’ म्हणायचा. पण आण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलय.. देहदान केलय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात, आपली वास्तु, जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं, हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती, त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरुऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात, त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर, आई-वडील, भाऊ, मुलगा या सार्यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता आण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. `ऋणानुबांधाच्या गाठी’ हेच खरं!
विविध प्रसंगी आपल्या मनातील विविध अशा विशिष्ट भावना प्रकट करण्याची, व्यक्त होण्याची मानवाची सहज ओढ त्यानं आपली बोली भाषा आणि सहजस्फूर्त सूर-लयीच्या आधारानं भागवली आणि आज ज्याला आपण लोकसंगीत म्हणतो त्याची निर्मिती झाली. सामान्य लोकांच्या जीवनातून सहजपणे ज्याची निर्मिती होत गेली ते लोकसंगीत! लोकसंगीत हा शब्दच आपल्याला सांगतो कि हे लोकांचे संगीत आहे… त्यामुळं त्याची मालकी कुण्या एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समाजाची आहे, त्याच्या निर्मितीचे श्रेय हे संपूर्ण समाजाचं आहे. हे संगीत सर्वसामान्य लोकांच्या जीवनातून सहजी, उत्स्फूर्तपणे उपजलं आणि तितक्याच सहजी ते त्यांच्या ओठी खेळत, विकसित होत राहिलं.
मुळातच मानवाच्या जगण्याशी संगीत किती सहजी बांधलं गेलं आहे ह्याचा विचार केला तर स्वस्थ मन:स्थितीत सहजपणे गुणगुणणं, विविध भावना आवाजांतून व्यक्त करत असताना त्या भावनेनुसार आवाजात होणारे चढ-उतार, अत्यानंदानं गिरक्या घेणं, नाचणं, एखादी धून कानांवर आल्यावर स्वयंप्रेरणेनं पायानं धरला गेलेला ठेका किंवा टाळ्या वाजवत साधलेली लय, आनंदानं किंवा संतापानंही व्यक्त होताना सहजपणे विशिष्टप्रकारे केलेले हातवारे, आनंदानं उड्या मारणं किंवा संतापानं दाणदाण पाय आपटणं, डोळ्यांच्या, पापण्यांच्या, अंगप्रत्यंगांच्या विशिष्ट हालचालींतून शब्दांशिवायही भावना व्यक्त करणं अशा कितीतरी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या क्रिया आठवतील.
ह्या सर्व क्रिया ‘सूर, ताल, लय’ ह्या संगीतातील मूलतत्वांपैकी कुठल्या ना कुठल्या तत्वाशी आपसूक जोडल्या गेलेल्या आणि म्हणूनच ‘संगीत’कलेशी नातं सांगणाऱ्या आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढं शब्दसंपदा प्राप्त झाल्यावर बुद्धिमान व कल्पक मानवाच्या जगण्यातल्या अंगभूत संगीताला छान आकार प्राप्त होत गेला.
माणसाच्या दैनंदिन जीवनात उठल्यापासून झोपेतोवर संगीतच कसे सामावलेले आहे ह्याचा विचार करताना लक्षात येईल कि, पूर्वीच्या काळी पहाटे घरोघरी स्त्रिया जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या. ह्या ओव्यांतून त्यांची सुख-दु:खं, आशा-निराशा, स्वप्नं, काळजी अशा विविध भावना आपसूक व्यक्त होत असत आणि अवजड जातं ओढताना त्यांना होणारे श्रमही हलके होत असत. अतीव शारिरिक कष्ट करताना होणारे श्रम हलके करण्याचं श्रमगीत हे एक उत्तम साधन आहे. शेतकरी गीतं, कोळीगीतं इ. श्रमगीतांचेच प्रकार!
पूर्वीच्या काळी लोकांनी नदीवर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देताना म्हटलेले ओंकार, श्लोक, पूजेच्यावेळी घंटानाद करत म्हटलेली आरती, जेवणापूर्वी म्हणायचे श्लोक, दिवसभर कामकाजाच्या वेळेस श्रम हलके करण्यासाठी गुणगुणणं किंवा गाणी गाणं, मुलांनी शाळेत एका लयीत म्हटलेले पाढे, ठेक्यात म्हटलेल्या कविता, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी म्हटलेली शुभंकरोती आणि एकूणच लयदार परवचा, ‘त्याच्या’ आळवणीत गायलेलं भजन, लहान मुलाचं रडं थांबवण्यासाठी टाळ्या-टिचक्या वाजवण्यापासून, ‘अलेलेले’ अशा लयदार उद्गारांपासून ते खुळखुळ्याचा घेतलेला आधार व त्यांना निजवताना गायली गेलेली अंगाई अशा कितीतरी गोष्टींत संगीतच तर सामावलेलं आहे.
मानवप्राण्याच्या सामुहिक जीवनाला जेव्हां सुरुवात झाली तेव्हांपासून लोकसंगीत अस्तित्वात आलं. लोकसंगीत हे समूहाचे, समूहाकडूनच निर्मिले गेलेले आणि समूहासाठीच सादर केले जाणारे संगीत आहे. ह्यातील सामूहिक हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच त्याचे निर्मितीश्रेयही व्यक्तिगत नाही तर सामूहिक आहे. हे संगीत फक्त कोण्या एका व्यक्तीसाठी, ठराविक वर्गासाठी नव्हे तर प्रत्येकच व्यक्तीसाठी म्हणजे संपूर्ण समूहासाठी आनंददायक, अर्थवाही असते. ह्यातील शब्द व स्वररचना अगदी सहजस्फूर्त साधी-सोपी असल्याने संपूर्ण समूह, सगळे लोक त्याच्याशी जोडले जाऊ शकतात.
वर उल्लेखिलेल्या मानवाच्या भावाभिव्यक्तीतील ‘उपजत’ संगीतातूनच त्याच्या जगण्यातीत विविध प्रसंगांनुसार, त्या-त्या कालमानातील जीवनपद्धतीनुसार, त्या-त्या मातीतील संस्कृती व समाजव्यवस्थेनुसार, चालीरितींनुसार, विकसनशीलतेतून उदयास आलेल्या विविध संकल्पनांनुसार लोकसंगीताचे विविध प्रकार उदयास आले. जगण्यातल्या विविध प्रसंगी मनात निर्माण होणाऱ्या विविध भावनांशी जोडलं गेलेलं संगीत म्हटल्यावर मानवाच्या जगण्याचं, संस्कृतीचं प्रतिबिंब त्यात असणं अगदीच साहजिक आहे. खरंतर, संस्कृतीचा फार मोठा भाग हा संगीतानं व्यापलेला आहे हे लक्षात येईल.
माणसाच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगी त्यानं आपल्या भावाभिव्यक्तीसाठी घेतलेल्या संगीताच्या आधारातून जन्मलेले लोकसंगीताचे विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रकार तर अक्षरश: अनंत आहेत. ह्याची कारणमीमांसा करायला गेलं तर जाणवतं कि, मनात निर्माण होणारी कोणतीही भावना नेमकेपणी व्यक्त करण्यासठी संगीत हे सहजस्फूर्त व अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आल्यावर बुद्धिमान मानवाने प्रसंग व त्यानुरूप भावनांचं नेमकं वर्णन करू शकणाऱ्या साध्या-सोप्या बोली भाषेतील शब्द आणि उत्स्फूर्त संगीतधून ह्यांची घातलेली ही सुरेख सांगड आहे. मानवाच्या अनुभूतीतून निर्माण होणारं हे संगीत असल्यानंच लोकसंगीत ‘सजीव अभिव्यक्ती’ असल्याचं मानलं जातं आणि ही अभिव्यक्ती जितकी सजीव तितकं दर्जेदार तिने त्या-त्या देशाचं प्रतिष्ठित संगीत साकार केलं आहे.
☆ विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे ☆
त्यादिवशी संध्याकाळी नेहमी प्रमाणे 6.10 ची ट्रेन पकडली. एकाद तासात मी माझ्या डेस्टीनेशन पोहचणार होते. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8.05 च्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6.10 ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासाभरात पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी. सी. कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे.
हे गेलं 25 वर्षे सुरू आहे.
गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचार -विचाराची, पेहरावाची, संस्कृतीची व रंगाची…..
आजही मी गडबडीत एस-4 डब्यात शिरले. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते.
त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले.
तो गोरापान. कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता. भाषा थोडी फार गावाची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किचिंतसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसांचा भला मोठा आंबाडा. चेह-यावर केसांच्या बटा. बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीचं गावंढळ. .. ‘ दुदु गाईच्या गोट्यामंदी, दुदु बाळाच्या वाटीमंदी….’ पण तो तिच्या या गाणं गाण्याने भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्याच्या चेह-यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले. त्याने तिला गप्प बसायची खूण केली पण तिचं पालुपद चालूच राहीले. मग त्याने न राहवून तिला बडबड करायला सुरुवात केली….. तुला केव्हांच सांगतोय गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भसाड्या आवाजात गातीस? डब्यातले लोक बघतायेत. तुझ्या बरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळतंच नाही. तरीच हजारदा आण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकी दिली. मित्राला दिलेला शब्द, लेकापेक्षा जास्त मोठा होता. लेकाचा विचारच केला नाही. ना रंग ना रूप… ना शिक्षण ना, ना वागायचं भान. उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.
शिक्षण म्हणे काय तर पाचवी पास..!! त्याची बडबड सुरु तर हिची गाणं सुरू. मी न राहवून त्याला सांगितले की ती बाळाला झोपतेय. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्याचे लग्न त्यांच्या मित्रांच्या मुलीबरोबर लावून दिले. तो म्हणाला, अहो मॅडम हिला चार चौघात घेवून जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात. माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळतं नाही. त्याच्या बोलण्यात खंत होती.
मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागले, मला कळालेच नाही. खरंच तो दिसायला देखना. गोरा, नाकी डोळी छान. शिकलेला. शिष्टाचार पाळणारा. आणि ती काळी, दात पुढे असणारी , कमी शिकलेली. गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षर ही काढला नाही. निमूटपणे ऐकून घेत होती. प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्याच्या बाजूने विचार करत होते. मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही. मी उगाचचं रागाने तिच्याकडे पाहिले.
एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळं वडिलांसारखे सुंदर आहे. गोंडस आहे. रडण्या-या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाळ काही शांत होईना.
त्याने उगी उगी करत चार इंग्रजी शब्द पण झाडले. माय डियर, कीप क्वायट. बेबी… बेबी… बी क्वायट… तरीही बाळ रडायचे थांबेना. तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याच्या प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळानं कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले.
बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेह-यावर मातृत्वाच जे भाव होते, जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोड्या वेळा पूर्वी तिच्या बद्दल मनात राग धरला होता.
तिच्या चेह-यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करवते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते. त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते…!!
आई गोरी आहे की काळी! आई शिक्षित की अशिक्षीत! ती…. ती सुंदर आहे की असुंदर ! आई ती आईच असते….नऊ महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळयात सुंदर असते…. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई…!! त्यादिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले….!!
स्पर्श म्हणले की किती प्रकारचे स्पर्श मनाला स्पर्शून जातात नाही? प्रेमाचा, आपुलकीचा, हक्काचा, आश्वासनाचा, धीर देणारा, हवा हवासा वाटणारा, नको वाटणारा.
जेव्हा शुभमंगल होऊन हक्काचा जोडीदार येतो आणि सप्तपदी च्या वेळी हातात हात घेतो तेव्हा जाणवतो, तो त्याच्या सोबतीचा स्पर्श. त्याचा हळुवार लाडिक स्पर्श प्रेमात पाडतो तर प्रोत्साहित स्पर्शाने दहा हत्तींचे बळ देऊन जातो, आणि सारे अडथळे कसे चुटकी सरशी दूर करतो त्याच्या मिठीत तर स्वर्ग सुख ही ठेंगणे भासते आणि सारे सुख दुःख विरघळून जाते.
आपल्याला स्पर्शाची ओळख अगदी आईच्या गर्भात असल्या पासून होऊ लागते. किंबहुना असं ही म्हणता येईल की, आईला बाळाच्या स्पर्शाची ओळख आपलं बाळ उदरात असल्या पासून होत असते. तो अनोखा, हवा हवासा वाटणारा, आनंद देणारा स्पर्श. त्या मारलेल्या पहिल्या लाथेच्या स्पर्शाने आई सुखावून जाते, आणि मन वाट पाहू लागते की कधी एकदा आपले बाळ आपल्या कुशीत येतय आणि त्याच्या कोमल हाताने आपल्याला स्पर्श करतय.
आणि जेव्हा आपले नवजात बालक आपल्याला पहिल्यांदा स्पर्श करते तेव्हा ते तर, स्वर्ग सुख!!! मग आई आपला चेहरा मुद्दामून त्याच्या हाता जवळ नेते जेणेकरून त्याने आपले मऊ हात फिरवावेत. त्या नवजात बालकाला कुशीत घेतल्यावर तरी अस वाटतय जणू सारे सुख आपल्या मिठीत सामावलेले आहे.
कालांतराने मुलं मोठी होतात आणि नोकरीला जाऊ लागतात तेव्हा वडीलांनी पाठीवरून फिरवलेला, हिंम्मत देणारा स्पर्श, हे सांगणारा की हो पुढे मी आहे.
आईच्या स्पर्शात तरी माया, वात्सल्य, कौतुक, विश्वास, आधार सारे काही सामावलेले असते.
वृद्धापकाळात सुखावून जातो आपल्या नातवंडांचा जादूवाला स्पर्श. जर नातवंडांनी आजीच्या गुडघ्याला तेल लावून मालीश केले तर ती सुखावलेली आजी दहा मैल चालून येते. मुलांनी किंवा मुलींनी प्रेमाने फिरवलेला पाठीवरून प्रेमाचा स्पर्श आपण एकटे नाही आहोत ह्याची जाणीव करून जाते.
स्पर्शात अनेक आजार बरे करण्याची शक्ति आहे म्हणून तर खूप महत्व आहे स्पर्श थेरपीला. मसाज केल्यानंतर जे सुख मिळते ते खूप सुखावणारे असते, आराम देणारे असते व दाह कमी करणारे असते..
असे अनेक स्पर्श आहेत जे आपल्या स्मरणात राहतात, जसे शाळेत गेल्यावर बाईंनी कौतुकाने फिरवलेला कींवा बाई ओरडल्या नंतर आपल्या मैत्रिंणीने किंवा मित्राने हळूच आपला हात हातात घेतल्यावरचा आधाराचा स्पर्श. महाविद्यालयात नकळत झालेला पण मग तो हवाहवासा वाटणारा मोहरून टाकणारा किंवा नको असलेले तिटकारा येणारा स्पर्श. दाह कमी करणारा किंवा दाह देणारा स्पर्श.
थोडक्यात इतकंच म्हणता येईल की स्पर्शात लाख मोलांचे बळ असते, जे आजारी माणसाला निरोगी बनवतो, निराधारा व्यक्तीला आधार देऊन जातो. एखाद्याला प्रोत्साहन तर एखाद्याचा आधार बनुन जातो. एखाद्याला प्रेम जिव्हाळा देऊन जातो. एक सुखाची झप्पी जणू.
☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
१९७७ मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहिशीझाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.
आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी आण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले, की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना, त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळू हळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून आण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात आण्णांना नेमके काय हवे, कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, आण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.
वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा आण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता आण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात आण्णांची बोलण्याची, लिहिण्याची घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.
प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं, हाही आण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळू हळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं, पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. आण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वास्वानींच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कतृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी `मानवतेचा दीपस्तंभ’ या दोन भागात केले. या सार्या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.
उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, आण्णांना लेखनात मदत करत राहिली. आण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. आण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा, असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर आण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली, कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या ८९ जुलैमध्ये कालवश झाल्या.
नगर शहरातील बुरूडगल्लीतील ‘डोंगरे सदन’ ही शंभरी ओलांडलेली वास्तू प्रख्यात विदुषी पंडिता रमाबाई यांचे चुलतभाऊ कृष्णराव वासुदेव डोंगरे यांनी बांधली आहे. विशेष म्हणजे या घराचं लाकूडकाम चिनी सुतारांनी केलं आहे आणि हे वैभव कृष्णरावांच्या नात कांचन चांदोरकर आणि त्यांच्या कुटुंबानं सुरेख सांभाळलं आहे.
आपल्या आजोबांच्या आठवणी सांगताना कांचन चांदोरकर म्हणाल्या, कृष्णराव मूळचे कर्नाटकातील गंगामूळचे. गावी होणाऱ्या जाचामुळे त्यांना रमाबाईंनी पुण्याजवळच्या केडगाव येथे मुक्ती मिशनमध्ये बोलवलं. तेथील अनेक इमारतींचं बांधकाम कृष्णरावांच्या देखरेखीखाली झालं. पुढे ते नगरला स्थायिक झाले. नगरमधील अनेक इमारतींचे काम त्यांनी केलं. क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलची कौलारू वास्तू त्यांनीच बांधली. सध्या धरती चौक म्हणून अोळखला जाणारा भाग सव्वाशे वर्षांपूर्वी बाभळींनी व्यापलेला होता. साहेबराव निसळांकडून जागा विकत घेऊन कृष्णरावांनी तिथं १९१८ ते २० दरम्यान घर बांधलं. तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं. अनेक देशातील युद्धबंदी नगरच्या किल्ल्यातील लष्करी छावणीत होते. त्यातील चांगली वर्तणूक असलेल्यांना दिवसभर बाहेर काम करण्याची मुभा ब्रिटिश सरकारनं दिली होती. त्यात काही चिनी सुतार होते. त्यांचं कौशल्य हेरून कृष्णरावांनी त्यांच्याकडून मलबारी सागवानी लाकडात आपल्या घराचं बांधकाम करून घेतलं. चुन्यातील अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव काम अजूनही जसंच्या तसं आहे.
चांदोरकर कुटुंबानं काळानुसार या धाब्याच्या घरात थोड्या सुधारणा केल्या. मधले काही लाकडी खांब काढून फरशी बदलण्यात आली. धुळीचा त्रास टाळण्यासाठी खिडक्यांना काचा लावण्यात आल्या, गॅलरी बंदिस्त करण्यात आली. तथापि, हाॅलमधील लाकडी खण तसेच ठेवण्यात आले आहेत.
नामवंतांच्या मैफली
प्रसिद्ध गायक-अभिनेते पंडितराव नगरकर, पंडित वालावलकर यांच्यासह अनेक नामवंत गायकांच्या मैफली ‘डोंगरे सदन’मध्ये झाल्या आहेत. कांचन यांच्या वडिलांना संगीताबरोबरच फोटोग्राफी व यंत्रांच्या दुरूस्तीची आवड होती. वाद्ये तर ते लीलया दुरूस्त करत. त्यांच्याकडे मोठा आॅर्गनही होती. चांदोरकर कुटुुंबाकडे आकाराने सर्वात छोट्या बायबलची प्रत आहे.
सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जगात सर्वात सिनिअर बनण्याचा मान भारताचे यष्टीरक्षक रघुनाथ चांदोरकर यांना मिळाला आहे. ‘डोंगरेसदन’ मध्ये राहणारे नगरचे रणजीपटू बाबा चांदोरकर यांचे ते थोरले भाऊ. दोघेही भाऊ रणजी खेळले. कर्जतला जन्मलेल्या व सध्या डोंबिवलीला राहणाऱ्या रघुनाथरावांनी मागील वर्षी शंभरी अोलांडली. न्यूझीलंडचे अॅलन बर्जेस यांच्या निधनानंतर ते सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू बनले आहेत.
संग्राहक – सुश्री मानसी आपटे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ८) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
सूर संगतराग ललत किंवा ललित
********
मारवा थाटोत्पन्न ललत किंवा ललित या रागाचा विचार करतांना पहिली गोष्ट मनांत येते ती म्हणजे रागांतील स्वरांचा व निसर्गाचा किती घनिष्ठ संबंध आहे. सूर्योदयाची वेळ, हळूहळू वर चढणारा दिवस, मध्यानीची प्रखरता, सांजवेळ, रात्र, उत्तर रात्र, चोवीस तासांतील हे सगळे प्रहर सा रे ग म प ध नि ह्या स्वर सप्तकांतून रसिकाच्या मनःचक्षूसमोर साकार होतात. बर्याचदां मध्यम(म) ह्या स्वरावरून रागाची वेळ ठरविली जाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा राग ललत! एका पाठोपाठ येणारे दोन मध्यम (तीव्र,शुद्ध) हे या रागाचे खास वैशिष्ठ्य! या स्वरांची गंमत अशी की दिवसा शुद्ध असणारा मध्यम जसजशी रात्र चढू लागते तसतसा तीव्र होत जातो. ललत रागांतील तीव्र म रात्र नुकतीच संपल्याचे जाहीर करतो तर शुद्ध म दिवस वर येत असल्याची सूचना देतो.
“नि (रे) ग म(ध), (म)(ध), (म)म ग, ग (रे) ग (म), ग (रे) सा” अशी सुरावट ऐकली की द्दृष्टीसमोर अरूणोदयाचे चित्र उभे रहातेच.
अभिषेकी बुवांनी तेजोनिधी लोहगोल या कट्यार काळजांत घुसली मधील नाट्यपदाला म्हणूनच ललत रागांतील स्वरांचा आधार घेतला असावा.
पियु पियु रटत पपीहरा ही याच रागातील पारंपारीक बंदीश भावमधूर पहाटेचे वातावरण निर्मीते.
“खिन्न आंधळा अंधार आता
ओसरेल पार
लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल
आता उजाडेल…..”
ह्या मंगेश पाडगांवकरांच्या ओळी म्हणजे ललतचे पहाट घेऊन येणारे सूर.
या रागांत रिषभ आणि धैवत कोमल व बाकी इतर स्वर शुद्ध. काही संगीतकार मात्र या रागाचा जनक मारवा म्हणून शुद्ध धैवत घेऊन सादरीकरण करतात. पंचम वर्ज्य असल्यामुळे जाति षाडव~षाडव.
नि (रे) ग म,(म)म ग,(म) (ध) सां
(रें) नि (ध) (म) (ध)(म) म ग (रे) सा
असे याचे आरोह/अवरोह.
प्रातःकालच्या मंगलमय वातावरणाबरोबरच
पवित्र प्रेमाचा आविष्कारही ह्या स्वरांतून आपल्याला जाणवतो.
“नैना भरायोरी
नींद उध्यारो जब रातही
तब पिया पास ना देखायोरी
मै का करू अब
शोक पियाके बिछुरन सन मोहे
हाय हाय कछु ना देखायोरी”
प्रेमरसांत आकंठ बुडालेली प्रेमिका डोळ्यात भरून आलेल्या पाण्यामुळे जवळ असलेल्या तिच्या प्रियकराला पाहू शकत नाही. कुमारजींनी त्यांच्या या बंदिशीतून तिच्या मनाची अवस्था साकारली आहे.
मृच्छकटीक नाटकातील ‘हे सखी शशीवदने’ पद, जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर हे ग. दि. मा/बाबूजी या जोडीचे पोस्टांतील मुलगी या चित्रपटांतील गीत, लता मंगेशकर व मन्ना डे यांचे ‘प्रीतम दरस दिखाओ’ ही सर्व गाणी ललतची ओळख करून देतात.
“इक शहेनशाहने बनवाके हंसी ताजमहल…!”
मुघल सम्राट शहाजहानने त्याच्या मुमताज बेगम साठी बांधलेला ताजमहाल ~प्रेमाचे प्रतीक~ म्हणजेच ललतचे सूर.
कोणत्याही जखमेची वेदना कमी करायला एक हळूवार फुंकरही पुरेशी असते. मग ती जखम शरीरावरची असो वा मनावरची. तत्परतेने केलेली मलमपट्टी जखम लवकर भरुन येण्यासाठी आवश्यकअसते. एरवी जखम चिघळत जाते. हे चिघळणं वेदनादायीच असतं. जखम झालेल्याइतकंच जखम करणाऱ्यासाठीही. म्हणूनच जखम झालीच तर ती चिघळू न देण्याची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.
चिघळणं म्हणजे विकोपाला जाणं. चिघळलेल्या जखमा कालांतराने बऱ्या झाल्या, तरी जखमेचा कोरला गेलेला व्रण मात्र जखमेच्या जन्मखूणेसारखा कायम रहातो.
मनावरील जखमा बऱ्या झाल्यानंतरचे हे असे व्रण मात्र जखम बरी झाली तरी त्या जखमेच्या वेदनेसारखे दीर्घकाळ ठसठसतच रहातात. नात्यातलं आपलेपण मग हळूहळू विरु लागतं
नाती रक्ताची असोत, वा जुळलेली किंवा जोडलेली असोत, वा निखळ मैत्रीची असोत ती अलवारपणे जपणं महत्त्वाचं. जपणं म्हणजे जखमा होऊ न देणं आणि झाल्याच तर त्या चिघळू न देणं. यासाठी गरज असते ती परस्पर सामंजस्याची.
व्यक्ति तितक्या प्रकृती हे मुलभूत तत्त्व हाच कोणत्याही नात्याचा पाया असायला हवा. मग परस्पर सामंजस्य आपसूकच आकार घेईल, आणि नात्यानाही सुबक आकार येत जाईल.
परस्पर सामंजस्य म्हणजे वेगळं कांही नसतंच. दुसऱ्यालाही आपल्यासारखंच मन असतं आणि मतही हे कधीच न विसरणं म्हणजेच परस्पर सामंजस्य. कधीकधी असूही शकतो दुसऱ्याचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळा तरीही कदाचित तोच बरोबरसुध्दा हे मनोमन एकदा स्विकारलं की मतभेद कायम राहिले तरी मनभेदाला तिथे थारा नसेल. मनभेद नसले तर मनावर नकळत ओरखडे ओढलेच जाणार नाहीत. दुखावलेपणाच्या जखमाच नसतील तर मग त्या चिघळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. तरीही नकळत, अनवधानाने दुखावलं गेलंच कुणी कधी, तरीही त्या दु:खावर फक्त आपुलकीच्या स्पर्शाची एक हळूवार फुंकरही दु:ख नाहीसं व्हायला पुरेशी ठरेल.