मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

योग आणि आयुर्वेद

आपल्या देशात आणि आपल्या राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या वस्तू, वनस्पती, फळे, फुले या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणूनच जाहिरातबाजीच्या मागे लागून विदेशी वस्तू वापरण्यापेक्षा स्वदेशी वस्तू वापरणे कधीही चांगलेच. स्वदेशी चळवळीचे एक महान प्रचारक आणि अभ्यासक राजीव दीक्षित यांनी आपले संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहून घेतले होते. स्वदेशी चळवळीला त्यांनी योग आणि आयुर्वेद यांची जोड दिली होती. घरात विशेषतः स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा आपल्या आरोग्यप्राप्तीसाठी वापर कसा करून घेता येईल हे त्यांनी अनेक रुग्णांवर प्रयोग करून सप्रमाण सिद्ध केले. घरात असणाऱ्या हळद, दालचिनी, मिरी, लवंग या सारख्या मसाल्याच्या वस्तू तसेच मेथी, खाण्याचा चुना, मीठ यासारख्या अनेक गोष्टींचे अनेक आजारांवर उपयोगी पडणारे गुणधर्म सांगितले. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आज बाजारात अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत आणि ती आपण घरच्या पदार्थांचा वापर न करता अत्यंत महागड्या किमतीने विकत घेतो.

मीठ, साखर,बेकरी पदार्थ, फ्रिज आणि फ्रिजमधील वस्तू  यासारख्या गोष्टींच्या अतिवापरापासून दूर राहा असेही राजीव दीक्षित यांनी निक्षून सांगितले. तरी घरात मोठा फ्रिज असणे ही आम्ही प्रतिष्ठेची बाब समजतो. रोज मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि तयार झालेले अन्न लगेच खाल्ले तर फ्रिजची फारशी गरज राहणार नाही. आजचे आधुनिक संशोधन सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर आरोग्यासाठी चांगला नाही हेच सांगते.

आपला आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. पण आपल्या एखाद्या गोष्टीचा जेव्हा परदेशात अभ्यास केला जातो, आणि त्याचे महत्व ते लोक जेव्हा आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला आपल्या प्राचीन गोष्टींचा, परंपरांचा त्या चांगल्या आहेत असा साक्षात्कार होतो. आज भारतातील आयुर्वेद आणि योग यांचे महत्व जगाने मान्य केले आहे. आयुर्वेदाचा उपयोग विदेशात विशेषतः अमेरिकेत एक पर्यायी औषधपद्धती म्हणून केला जात आहे. योग आणि आयुर्वेद ही परस्परपूरक शास्त्रे असून त्या जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. त्यात मन, शरीर आणि आत्मा यांचे संतुलन साधले जाते.

आयु म्हणजे आयुष्य किंवा जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. आयुर्वेद हे जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेद हे शास्त्र अतिप्राचीन असून त्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे प्रणेते मानले जातात. आयुर्वेदात पुढे चरक, सुश्रुत, वाग्भट आदी महर्षींनी संशोधन करून मानव जातीवर अनंत उपकार करून ठेवले आहेत. याच महर्षींच्या ग्रंथांचा अभ्यास आजही आयुर्वेदाच्या अभ्यासकांना होतो आहे. सुश्रुत यांना तर सर्जरीचे जनक मानले जाते. त्यांच्या ‘ सुश्रुत संहितेत अनेक शस्त्रक्रियांचे वर्णन आले आहे. सृष्टीमध्ये कार्यरत असणारे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांचा आपल्या आरोग्यावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास त्यात आहे. त्यानुसार कफ, पित्त, वायू या शरीरातील प्रकृतीचा विचार त्यात आहे.

आयुर्वेद केवळ रोगाच्या लक्षणांचा विचार करून उपचार करीत नाही, तर रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन काळात जे परदेशातील व्यापारी आणि पर्यटन करणारे लोक भारतात आले, त्यांनी आपल्याबरोबर भारतातील हे आयुर्वेदाचे ज्ञान नेले. त्यांच्या बऱ्याच औषधोपचार पद्धतींवर भारतीय आयुर्वेदाचा प्रभाव त्यामुळेच दिसतो. आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध जपणूक करून प्रसार करण्याचे कार्य केरळ सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर होते. अनेक देशी विदेशी पर्यटक त्याचा लाभ घेतात. महाराष्ट्रातही अनेक नामवंत वैद्यांनी ही आयुर्वेदाची परंपरा जपली आणि वाढवली.

अर्थात वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक शोध लागताहेत. अनेक आजारांवर संशोधन होते आहे. अलोपथीतील उपचार आणि शस्त्रक्रियांमुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या आजारातून जीवदान मिळाले आहे. विविध रोगांवर शोधल्या गेलेल्या लशींमुळे लाखो लोकांचे प्राण जगभर वाचले आहेत. त्यामुळे दोन्ही पॅथी आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. असे असले तरी या दोन्ही उपचार पद्धतींचा मेळ घालून त्यांचा वापर तारतम्याने करणे योग्य होईल. छोट्या मोठ्या आजारांसाठी आयुर्वेदातील उपचारांचा वापर करून अगदी आवश्यक तेव्हा अलोपॅथी उपचार पद्धती वापरता येईल. आयुर्वेद हा सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. त्यातील संशोधकांनी आपले आयुष्य त्यासाठी खर्ची घातले आहे. आयुर्वेदातील उपचारात रोग पूर्णपणे बरा करण्याची क्षमता असून त्या औषधांचे दुष्परिणाम अलोपथी औषधांच्या तुलनेत अतिशय कमी आहेत.

आपल्याला होणाऱ्या आजारातील सुमारे ऐंशी टक्के आजार हे मनोकायिक ( सायकोसोमॅटीक ) असतात असे संशोधन सांगते. म्हणजेच हे आजार संसर्गजन्य नसतात. योग आणि आयुर्वेद शरीर आणि मन या दोहोंचा विचार करून आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. योग, आसन आणि प्राणायाम यांचे महत्व आज जगाने मान्य केले आहे. 21 जून हा दिवस तर जवळपास संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगाचा अभ्यास जगातील अनेक देशात आज केला जातो आहे. आयुर्वेद आणि योग यांच्यात आपल्याला निरामय आरोग्य देण्यापासून ते मोक्षापर्यंत पोहोचवण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान आदींच्या साहाय्याने अनेक असाध्य आजारांवर मात करता येते याचा अनुभव आज जगभरातील अनेक लोक घेत आहेत. आजच्या धकाधकीच्या आणि दैनंदिन तणावपूर्ण वातावरणात योग, आसने आणि प्राणायाम अनेक लोकांना आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करत आहेत. रामदेव बाबांसारख्या अनेक योगाचार्यांनी जगभर योगाच्या प्रसारासाठी मोठा हातभार लावला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नियमितपणे योगासने आणि प्राणायाम करतात.

रॉबर्ट स्वोबोदा हा अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारा एक तरुण. एकदा काही कारणाने तो आफ्रिकेत गेला. तिथे त्याला अतिसाराची लागण झाली. तेथील एका आदिवासी व्यक्तीने त्याला कसला तरी झाडपाला खायला दिला. त्याचा आजार आश्चर्यकारकरित्या बरा झाला. आपले ओक्लाहोमा विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षण सोडून आपण शास्त्रशुद्ध असे आयुर्वेदाचे शिक्षण घेतले पाहिजे असे त्याच्या मनाने घेतले. त्यासाठी भारताइतका चांगला देश दुसरा नाही असे त्याला वाटले.  आयुर्वेदाच्या ओढीने तो भारतात आला. पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी घेतली. रॉबर्ट स्वोबोदा यांनी मग आयुर्वेदाबरोबरच योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, तंत्रविद्या इ. अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आज ते जगभर आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ‘ लाईट ऑन लाईफ ‘ हे त्यांचे पुस्तक त्यापैकीच एक.

आरोग्यपूर्ण जीवनासाठी दररोजचा शुद्ध आणि ताजा आहार, योगात सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे आचरण या गोष्टी आपल्याला निरामय आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जातात. नियमित योग आणि प्राणायाम करणाऱ्या  आणि संतुलित आहार घेणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. त्यांनी  योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. त्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही आणि संपत नाही. वयाला, वृध्दापकाळाला आणि अनेक व्याधींना दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज नव्वदी गाठली तरी पूर्वीच्याच क्षमतेने काम ते करीत आहेत. गाडी चालवताहेत, सभा, समारंभांना जाताहेत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी नाहीत काय ? 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वरकडे जाताना रस्त्यात रश्मी चौक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरचं थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर इंग्रजीमध्ये “मेडस्टोन ” लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.

आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डनमध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.

गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी..  पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा…………

बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लंबिंगचे सामान, रंगाचे सामान, ब्रशेस, स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोठया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार. पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.

पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे, त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपूर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांच्या आईचे चित्रकार एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबलवर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची. त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे.  येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा. 

त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच…डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली… ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी… डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ….ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला

‘ डॉल ‘ म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच ‘ पेस्तन ‘ म्हणे…………

हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक यांची गर्दी होत असे.

माझी आणि त्यांची ओळखही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली 

‘ वेल डन माय बॉय’ !

मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची…….पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत… टिपिकल पारसी टोन…

पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाटमध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो. डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले. 

पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो, कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा.  पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा  ” दुर्मिळ ” मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना 

अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. “तू चांगला ट्राय करते……असाच होते, पन तुला जमेल…….”..मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली ” Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?” मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .. .ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.

माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे, रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .

मला चित्रात पाचगणीची थंड हवा, धुके, वारे हे सगळे दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य……….” असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहिजे…….फॉग एकदम पिक्चरमंधी घुसला पाहीजे…….”  सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.

मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . ” तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला ” त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले. 

एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहिली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.

1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो.

कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्गचित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे ……

त्यांनी मला एक कल्पना सांगितली.  मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतु चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????” … सुश्री साधना पवार ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????” … सुश्री साधना पवार ☆

शुक्रवारी ग्रहण आहे,चंद्रग्रहण…

ग्रहण म्हंटलं की माझ्या तर पोटात खूप मोठा गोळा येतो, कारण त्या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि माझ्या मुली ‘शिक्षित’ होताहेत या समजावरही सावली पडते…

गेल्या वर्षी पाटण मधली एक बातमी वाचली आणि हादरून गेले… एक आठ महिन्याची गर्भवती, ग्रहण आहे म्हणून वीस एक तास एकाच जागी, हातपाय न हलवता, काहीही न खाता पिता बसून राहिली. खूप खूप तहान लागली,घरी खूप विनवण्या केल्या ,माहेरून आईला बोलावून घेऊन पाणी देण्यासाठी विनंती केली. पण गर्भाला काही problem उद्भवू शकतो म्हणून कुणीही तिला घोटभरही पाणी दिलं नाही,

तडफडून तडफडून ,टाचा घासून घासून मरून गेली बिचारी शेवटी…

खूप रडले हो ही बातमी वाचून.आधी तिच्याभोवतालच्या मूर्ख बायकांचा खूप खूप राग आला,परत काही वेळानं त्यांची कीव आली आणि त्यानंतर काही वेळाने आपल्या समाजात ज्याप्रकारे रूढी रेटल्या जातात त्याचा विचार करून, आपण तरी ‘कुठे कुठे’ पुरे पडणार अश्या प्रकारचं औदासिन्य आलं………..

Msc, BE, वगैरे असलं क्वालिफिकेशन असणाऱ्या मुली जेव्हा विचारतात, “ मॅडम, शुक्रवारी ग्रहण आहे, काय काय काळजी घ्यायची ?” …. तेव्हा वाटतं अरे या भूगोल न शिकताच उच्चशिक्षित झाल्या की काय?

की आपली घोकंपट्टीवाली शिक्षणपद्धती त्यांना कुठे तर्क लावायला शिकवतंच नाही?

ग्रहण म्हणजे पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली, त्याच्यामुळे आपल्या पोटातील गर्भाला कसा काय प्रॉब्लेम होईल हा विचार करायची तसदी सुध्धा घ्यायची नाही. आम्ही डॉक्टर्स सांगतो की ग्रहण पाळण्याची वगैरे काही गरज नाही, बाळामधील व्यंगाचा आणि ग्रहणाचा दुरून दुरून सुदधा संबंध नाही तरी ,तरीही विषाची परीक्षा नको म्हणून ,घरातील पन्नाशी साठीतील ज्येष्ठ स्त्रिया दुखावल्या जातील ,आकांड तांडव करतील म्हणून या बिचाऱ्या गर्भवती ते पाळतात…

ग्रहण पाळतात म्हणजे काय तर ग्रहणाचे वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत खुर्चीवरती बसून राहायचं, हातपाय हलवायची नाहीत, मांडी घालून बसायचं नाही, काहीही खायचं प्यायचं नाही, काही चिरायचं नाही ,बोलायचं सुध्धा नाही म्हणे……नाहीतर……..नाहीतर काय होईल हे यांचे तर्क ऐकून चाटच पडते मी तर. 

त्यांच्यामते हे असं ग्रहण न पाळल्यास ,बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं, म्हणजे गर्भवतीने त्या काळात भाजी चिरली तर बाळाचा ओठ आतल्याआत चिरला जाणार, तिने मांडी घातली तर बाळाचे पाय वाकडे होणार, तिने काही खाल्लं पिलं तर बाळाच्या नरड्याला छिद्र पडणार(?हा ,हा?)…

किती किती हास्यास्पद आहे हे. या अश्या समजुती तीस एक वर्षांपूर्वी एक वेळ मानूनही घेतल्या असत्या. पण आता गर्भवती माता साक्षर असतात, त्यांना बेसिक science तर माहिती असतंच की. त्या कशा काय अश्या खुळचट तर्कांबाबतीत प्रश्न विचारत नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 

अरे पोरीनो, गर्भामध्ये व्यंग होणे याची कारणे वेगळी आहेत. .. म्हणजे फॉलीक असिडच्या कमतरतेने बाळाला मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग होते,अनुवंशिकतेने, गुणसूत्रांच्या दोषाने, काही व्यंग होतात.  आपल्याकडे नात्यात ,समाजात लग्न होत असल्याने जोडप्याच्या खराब गुणसूत्र एकत्र येऊन त्यामुळे गर्भामध्ये व्यंग तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे. काही औषधे गर्भावस्थेत चुकून घेतल्याने, गर्भावस्थेतील uncontrolled मधुमेहामुळे,  अशी अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालेली कारणे आहेत. पण ते आपण डॉक्टरांकडून कशाला समजून घ्यायचं हो ,आपण आपलं आपल्या आजूबाजूच्या अडाणी बायका काय म्हणतात त्यावरच डोळे झाकून विश्वास ठेवायचा, होय ना? या त्याच बायका असतात ज्या गर्भावस्थेत झोपलं की बाळाचं डोकं मोठं होतं, डिलिव्हरी झाल्यावर जास्त पाणी प्यायचं नाही नाहीतर पोट सुटतं, कॉपर टी ने अंगाची झीज होते, पिशवी कुजते, असले धादांत खोटे समज मुलींवर लादतात…जाऊ दे..  तो तर एक स्वतंत्रच लेखाचा विषय होईल…….

या सर्व ग्रहण पाळण्याच्या dramya मुळं त्या गर्भवतीचे रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे रक्तामध्ये गुठळी होऊन ती फुफ्फुसात जाऊन अडकण्याची शक्यता वाढते, हातापायांवर सूज चढते, bp वाढतो,रक्तातील साखर कमी होऊन तिला व तिच्या बाळाला जीवाला धोका उदभवतो, हे सगळं आम्ही डॉक्टर कानी कपाळी ओरडून सांगत असताना देखील या बायका काही आपला हेका सोडत नाहीत…..हेतू प्रेमापोटीची काळजी हा असेलही कदाचित त्यांचा ,पण त्याला बळी नको पडायला…….

कमीत कमी सुशिक्षित स्त्रियांनी तरी जरा तर्क वापरून आपापल्या आई, मावशी ,सासू ,आजेसासू ,शेजारणी यांना हे ग्रहण पाळण्याच्या अघोरी पद्धतींमधला फोलपणा आणि धोके स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजेत आणि तरीही त्या असे काही करायला भाग पाडत असतील तर थोडं बंड करायला हवं,

हो ना???

मग काय ,तरीही पाळणार ग्रहण????????????????

लेखिका : डॉ. साधना पवार.

संग्राहक – श्री सुनील देशपांडे

  • माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन (ऑर्गन डोनेशन) रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०.
  • उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई.
  • संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक.
  • सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन)

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री आणि पर्स… ☆ सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्त्री आणि पर्स… ☆ सुश्री सुनीता जोशी ☆

स्त्रीच्या आयुष्यात “पर्स” म्हणजे एक अविभाज्य घटक आहे !

कुठेही जायचे तर “पर्स” हवीच !!

.

काहीही विकत घ्यायचे नसेल तरी पर्स हवीच !!

.

ह्या मागची कारणमीमांसा थोडक्यात —-.

#सखी …. स्त्रीची एक जिवाभावाची सखीे….. तिच्याशिवाय ती अजिबात राहू शकत नाही,… जिथे ती तिथे पर्स आणि … ही सखी म्हणजे तिची पर्स

.

इतर सगळ्या बायकांच्यासारखं तिची पर्स म्हणजे एक अखंड जग आहे….

.

नको त्या वस्तू लगेच सापडणार आणि

हवी ती वस्तू नको झाल्यावरच सापडणार .

.

मोबाईल ची रिंग पूर्ण वाजून गेल्यावर ,

मिस कॉल पडल्यावर फोन सापडणार

.

गाडीवरून उतरल्यावर विस्कटलेले केस सारखे करावेत म्हणून कंगवा शोधताना मात्र हाच फोन दर दोन सेकंदला हातात येणार*.

.

*अचानक येणारी शिंक लपवायला रुमाल शोधावा

तर कंगवा न चुकता हातात येणार……

.

सुटे पैसे हवे असतील तेव्हा नोटा आणि नोटा शोधताना लाज निघण्याइतकी चिल्लर सापडणार….

.

… या गोंधळातून वाचण्यासाठी प्रत्येक स्त्री बरेच उपाय करते,अनेक कप्पे असलेली पर्स आणते.

आणल्या आणल्या प्रत्येक कप्प्यात काय आणि कसे व्यवस्थित ठेवायचं हे ठरवते.

.

पण हा असला व्यवस्थितपणा तिच्या पर्सला फार दिवस मानवत नाही….आईच्या मायेने सगळ्या चित्रविचित्र वस्तू पोटात घेऊन ती पुन्हा गोंधळ घालायचा तो घालतेच…….

.

त्यानंतर मग स्त्री एक कप्पा असलेली मोठी ,सुटसुटीत पर्स आणते,मग काय विचारता..

पर्समधे ठेवलेल्या वस्तू “तुझ्या गळा,माझ्या गळा” गाणं गात अगदी गळ्यात गळे, पायात पाय घालून एकजीव होतात…. आणि त्यांना वेगळं करण्याचं महापातक करताना स्त्रीचा जीव निघतो..

.

महत्वाच्या वस्तू, कार्ड्स ठेवायला स्त्री चोरकप्पे असलेली पर्स आणते. पण हा कप्पा कार्डांना आपल्यात कधीच सामावून घेत नाही. ती बिचारी अशीच इकडे तिकडे पडून राहतात, आणि ह्या चोरकप्प्याला रबर, पीन्स, टिकल्या, टुथपिक्स असल्या गोष्टीच आवडून जातात.

.

*एखादं पुस्तक नेहमी बॅग मध्ये ठेवत असते स्त्री, पण ते वाचायला वेळ असा मिळत नाहीच. म्हणून वैतागून ज्या दिवशी ती पर्स हलकी करण्यासाठी पुस्तक काढून ठेवते, नेमकं कुठंतरी वाट बघत बसायची वेळ येते.*

.

.नेहमी लागणारी औषध, वेलदोडा, चणे फुटाणे, चॉकलेट्स, पेन्सिल, लाल आणि निळ्या रंगाची पेन्स,

लिपस्टिक, पावडर कॉम्पॅक्ट, घरच्या किल्या, अशी न संपणारी वस्तूची यादी असते तिच्या पर्समध्ये ..

.

.त्या शिवाय हिशेब लिहायला एक छोटी वही (जिच्यात नंतर हिशोब लिहू असं ठरवून काही हिशोब लिहिलेला नसतो). .

.

अनेक लोकांची कार्डस (जी कधीच उपयोगी पडत नाहीत,आणि नेमक्या वेळेस सापडत नाहीत),अशा चिक्कार गोष्टी असतात.

.

.तिच्या पर्स मध्ये पैसे किती मिळतील याची मात्र फार गॅरेंटी नसते.

.

…… पण पर्स प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे हे नक्की…तिच्या शिवाय ती घर सोडू शकत नाही, कारण तिला फार एकट आणि असुरक्षित वाटतं.

.

*जुनी पर्स बदलणे म्हणजे तिच्यासाठी एक दिव्य असते, “जा मुली जा”अशी भावूक अवस्था असते तिची..*.

नवीन पर्स रूळे पर्यंत जुनी पर्स किती छान होती, हिच्यात काही अर्थ नाही असं म्हणून नव्या पर्सला नावं  ठेवता ठेवता तिच्यावर अवलंबून राहायला सुरु होणे ….. या सगळ्या चक्रात ना स्त्री व्यवस्थित पर्स लावते ना ती व्यवस्थित राहते.

.

….. अशीच स्त्रीची व पर्सची जोडगोळी भटकत राहते, मजा करत, मजा लुटत……

© सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा. माझ्या देशातल्या मातीत, पानोपानी सोने आहे. पण त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. चमकणाऱ्या विदेशी वस्तू आम्हाला आकर्षित करतात. पण जे चकाकते ते सगळेच सोने नसते ही गोष्ट आम्ही सोयीस्कर विसरतो. जेव्हा आमच्या हळदीवर, बासमती तांदळावर, कडुलिंबाच्या औषधी उपयोगांवर दुसऱ्या देशांनी पेटंट घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे आम्हाला जाग आली. अन्यथा आपल्या गोष्टींचे महत्व आम्हाला कुठे ? पूर्वी आमच्या दंतमंजनात कोळसा आणि मीठ आहे म्हणून हिणवणाऱ्या विदेशी कंपन्या आज मोठ्या गर्वाने आमच्या टूथपेस्टमध्ये कोळसा, मीठ वगैरे आहे म्हणून टेंभा मिरवतात. तेव्हा आम्हाला त्याचे महत्व कळते. एखादी गोष्ट जोपर्यंत दुसरे लोक सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याचे महत्व कसे बरे पटावे ? वस्तूंच्या बाबतीतच काय, पण माणसांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असेच वागतो. स्वामी विवेकानंद जोपर्यंत अमेरिकेतील शिकागो येथे आपले विचार प्रकट करून जगन्मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्यांचे महत्व कळत नाही. स्वदेशी वस्तू, स्वदेशी वनस्पती, स्वदेशी खाद्यपदार्थ आणि आमच्याकडील विचार, सेवा आणि बुद्धिमत्ता यांचा वरदहस्त असलेली माणसे या सगळ्यांचे महत्व आम्हाला कधी कळणार ?  

व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या सगळ्या घोषणांचे म्हणूनच महत्व आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, म्हणून मी हे म्हणतो असे बिलकुल नाही. हा निर्णय आजच्या काळाला सुसंगत आणि आवश्यक असा आहे म्हणूनच त्याचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि नंतर म, गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. स्वदेशी चळवळीची गरज आजही तेवढीच आहे. फक्त आज संदर्भ बदलले आहेत. त्या काळात तो लढा ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता. आज आपल्याला आपल्या स्वतःसाठी तो लढायचा आहे. जागतिकीकरण, खुल्या अर्थव्यवस्थेच्या या काळात आपल्याला घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, पण तारतम्याने विचार करावा लागेल. त्याबाबतचे राजकीय, राष्ट्रीय धोरण राज्य सरकारे, केंद्र सरकार भलेही ठरवील. ते त्यांना ठरवू देत, पण तुम्ही आम्ही आहार विहार, आचार विचाराने स्वदेशी होऊ या. 

स्वदेशीची जादू कोरोना काळात आपण अनुभवली आहे. लोकल उत्पादने, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन या गोष्टींनी आम्हाला त्या वेळी फार मोठा मदतीचा हात दिला आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता केली आहे. या लोकललाच आपला जीवनमंत्र बनवला पाहिजे. या कोरोना काळातच आपण अनेक अवघड गोष्टी करून दाखवल्या आणि स्वदेशीची जादू पाहिली आहे. कोरोना काळात ज्यांची तीव्रतेने आवश्यकता भासली असे व्हेंटिलेटर आपल्या देशात कितीसे बनत होते ? पण कोरोनाचे संकट आले आणि अनेक कंपन्यांनी यात आघाडी घेवून ते बनवायला सुरुवात केली. मग भारतानेच अनेक देशांना व्हेंटिलेटर पुरवले. त्याच पद्धतीने कोरोना लशींवर भारतीय वैद्यकीय संस्थांनी संशोधन करून विक्रमी वेळेत लशी तयार केल्या. यापूर्वी मिसाईल मॅन आणि आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वदेशीचा वापर करून अण्वस्त्रे तयार केली. आज आपण अनेक उपग्रह, चांद्रयान बनवतो आहे, त्यांचे प्रक्षेपण करतो आहोत.

या सगळ्या गोष्टी अभिमान वाटावा अशा निश्चितच आहेत. पण आमच्या आचार विचारात, जगण्यात स्वदेशी आले आहे का ? आमच्या जगण्याचा तो एक भाग झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नकारार्थी द्यावे लागेल. राज कपूरच्या ‘ श्री ४२० ‘ या चित्रपटात एक गाणे आहे. ‘ मेरा जुता हैं जपानी, ये पतलून इंग्लीस्तानी, सरपे लाल टोपी रुसी, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी ‘ असे गाणे आहे. त्यात त्याच्या वापराच्या सगळ्या वस्तू जरी विदेशी असल्या तरी मन मात्र हिंदुस्तानी आहे. पण यात आता बदल व्हायला हवा. केवळ ‘ दिलच हिंदुस्तानी ‘ असून भागणार नाही, तर वापरातील सर्वच वस्तू स्वदेशी असायला हव्यात. कदाचित आपल्याला माझे म्हणणे पटणार नाही, कोणाला माझा सूर नकारार्थी वाटेल तर अजून कोणी म्हणेल की असे काय आहे त्यात, ज्याबद्दल तुम्ही सांगताय ? पण ज्यावेळी मला काय म्हणायचे आहे हे आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला माझे म्हणणे पटेल. तोपर्यंत स्वदेशीची जादू कळणार नाही. आमच्या आहारातील खाद्यपदार्थ, आमची पेये, आमच्या वनस्पती, झाडे, वृक्ष, वेली, आम्ही घेत असलेली पिके, वापरत असलेली खते, कीटकनाशके, आमचा आयुर्वेद,आमचा योग या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने स्वदेशी हव्यात. कशासाठी ? या सगळ्या गोष्टी आमचे जीवन समृद्ध आणि आरोग्यसंपन्न करणाऱ्या आहेत. 

आपण सुरुवात खाद्यपदार्थांपासून करू. एकदा मी आणि माझे कुटुंबीय एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये पिझ्झापासून ते थालीपीठापर्यंत सर्व पदार्थ उपलब्ध होते. मला तिथले थालीपीठ खाण्याची इच्छा होती. तिथे आलेली तरुणाई मात्र पिझ्झावर ताव मारत होती. आणखी एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे विविध प्रकारचे बर्गर्स उपलब्ध होते आणि त्या सोबत पिण्यासाठी पाणी नव्हते तर तिथे दिले जाणारे कोल्ड ड्रिंक घ्यायचे होते. या सगळ्या प्रकारांनी मी विचारात पडलो. हे सगळे पदार्थ कितपत आरोग्यदायी आहेत, यावर माहिती घेऊ लागलो. 

पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्राईज, पॅटिस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमिन यासारख्या पदार्थांना फास्ट फूड किंवा जंक फूड असे नाव आहे. यातील बरेचसे पदार्थ मैद्यापासून बनलेले असतात. पाव, बिस्कीट आदी सगळे बेकरी प्रॉडक्ट्स सुद्धा मैद्यापासूनच बनतात. मैदा हा पोटाच्या तक्रारी वाढवणारा आणि अजिबात फायबर नसलेला पदार्थ आहे. हे सगळे पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स कधीतरी ठीक आहेत पण वारंवार खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. या पदार्थांमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर असते. पौष्टिक तत्वे मात्र नगण्यच असतात ! जास्त फॅट, अतिरिक्त साखर आणि मीठ यामुळे हे पदार्थ चविष्ट तर बनतात पण आरोग्यावर दुष्परिणाम करतात. रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. या पदार्थानी टाईप टू डायबिटीस, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. वजनात वाढ होणे, श्वसन संस्थेचे आजार बळावणे असेही दुष्परिणाम होऊ शकतात. 

चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो नावाचा घटक वापरतात. त्याला चायनीज सॉल्ट असेही म्हटले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थांना एक वेगळी चव येते. तरुणाई विशेष करून या पदार्थांकडे आकृष्ट होते. या पदार्थांची लहान मुलांना लवकर सवय लागते. पण वारंवार असे पदार्थ खाणे आरोग्याला घातक ठरते. आपल्याकडील भाकरी, पोळी, भाज्या, पोहे, थालीपीठ इ देशी पदार्थात भरपूर फायबर्स असतात. आरोग्यासाठी ते उपकारक असतात. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. आपण ते करताना अतिरिक्त साखर, मीठ इ चा वापर करत नाही. त्यामुळे त्यांच्या दुष्परिणामापासूनही दूर राहतो.

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

शनिवारी सकाळी मेघाचा, माझ्या मैत्रीणीचा हॉस्पिटलमधून फोन आला. “अंजूला मुलगी झाली. अंजू बरोबर दोन तास बसायला येतेस का? अमित नेमका कामासाठी बाहेरगावी गेलाय.”

मी अंजूसाठी तिला आवडणारी सालीच्या मुगाची खिचडी-कढी केली. पापड भाजले व डबे भरले. आल्याचा चहा थर्मास मध्ये भरला. गुलाबी कार्नेशनच्या फुलांचा गुच्छ घेतला आणि हॅास्पिटलमधे पोचले.

मी हॅास्पिटलच्या लॅाबीकडे जात असताना मेघाचा टेक्स्ट आला.. “डॅाक्टरांचा राऊंड झाला की मेसेज करते.”

मी लॉबीमध्ये बसले. आजूबाजूला बसलेले काळजीग्रस्त चेहरे, थकलेली शरीरे आणि नश्वर देह जवळून बघत होते. विधात्यानं रेखाटलेल्या आयुष्यरेषा लांबवण्याच्या प्रयत्नात दमून जाणारे जीव आपण ! पृथ्वीतलावरचा कितीही पैसा टाकून विकत न मिळणारा “वेळ” कसा वाढवता येईल त्यासाठी सर्व धडपड ! 

तेवढ्यात समोर लहान मुलांच्या वॅार्डमधे गडबड दिसल्याने विचारांची श्रुंखला तुटली. पोटात कालवलं.

 “ परमेश्वरा लहान मुलांना का आजार देतोस रे बाबा ” म्हणत असतानाच नीना दिसली.

नीना माझी आवडती विद्यार्थिनी ! सेवा करण्यासाठीच जन्माला आलेली !  उंच बांध्याची, हसताना मोहक खळया पडणारी अंतर्बाह्य सुंदर नीना नर्सच्या निळ्या कपड्यात फारच गोड दिसत होती. मी दिसताच लहान मुलीसारखी पळत आली.

“Mrs Ranade, so good to see you.” 

“कशी आहेस नीना” म्हणत मी तिला घट्ट मिठी मारली. “पेडियाट्रिक वॉर्डमध्ये काम करतेस हल्ली? ठीक आहे ना सगळं?” मी विचारले.

हातातला स्टेथास्कोप तिच्या ऍप्रनच्या खिशात ठेवत ती म्हणाली, ” हो. आजची गडबड फार वेगळी आहे. आमचे छोटे पेशंटस एकदम खूष आहेत आज. अनेक शाळांकडून त्यांना आज मॅजिक रॅाक्सची भेट आली आहे. खरं तर त्याला “काइंडनेस रॉक्स”(Kindness Rocks) म्हणतात, पण मी त्यांना “मॅजिक रॅाक्स” म्हणते.

“मॅजिक रॅाक्स?? मी काही शाळांच्या पटांगणात कधी एखाद्या झाडाच्या बुंध्याशी, कधी बागेत, कधी बीचवर, रंगीबेरंगी, छान मजकूर लिहिलेले लांबट गोलाकार दगड बघितले आहेत. पण तो मुलांचा चित्रकलेचा प्रोजेक्ट वगैरे असावा यापलीकडे त्याचा फारसा विचार केला नव्हता. तेच का मॅजिक रॅाक्स?” मी नीनाला विचारले.

तेवढ्यात तिथे असणाऱ्या १४ वर्षाच्या पेशंटला नीना म्हणाली, “अरे, मॅडमना दाखव ना तुला आज काय मिळाले ते?”

त्याने उत्साहाने छोटी केशरी रंगाची गिफ्ट बॅग उघडली. त्यातून एक लांबट, गोलाकार दगड बाहेर काढला. हाताच्या तळव्यात मावेल एवढा. तो लांबट दगड वरून सपाट होता त्यामुळे आपण पाटीवर लिहितो तसे त्यावर लिहिणे शक्य होते. तो दगड पांढऱ्या रंगाने रंगवला होता. त्यावर केशरी बास्केटबॉलचे चित्र काढले होते. शेजारी लिहिले होते,” यार, लवकर बरा हो. पुढच्या मॅचला तू हवासच.”

तो त्याच्या प्लास्टरमधे असलेल्या पायाकडे बघत म्हणाला, “ नक्की खेळू शकेन मी पुढची मॅच.” आपण पुढची मॅच खेळत आहोत हे चित्र त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होते.

“ मिसेस रानडे ”, नीना म्हणाली, ” मनाने घेतले मॅच खेळायची की बघता बघता हा पळायला लागेल बघा. माझं काय होणार, कसं होणार म्हणून रडत बसले की हिलींगला वेळ लागतो.. मनाची शक्ती प्रचंड असते. ती नाही कळत आपल्याला ! ती शक्ती मॅजिक रॅाक जागी करतो असं मला वाटतं. “

“पेडियाट्रिक वॉर्डच काय..हल्ली सर्व पेशंटना…. जगातल्या सर्व पेशंटना हं ” म्हणत तिने माझ्याकडे वळून बघितलं.. “ हे उभारी देणारे रंगीबेरंगी रॅाक्स सुंदर संदेश घेऊन भेट म्हणून येतात. पेशंटचा मूड एकदम इतका सुधारतो की विचारू नका !”

पुढच्या खोलीत छोटा पेशंट होता. सात वर्षाचा ! त्यानेही आम्हाला त्याला आलेली भेट दाखवली. त्याच्या हातातल्या मॅजिक रॅाकवर शब्द होते “बी (Bee) हॅपी.” आणि त्यावर एक हसरा चेहरा, एक सूर्य, आणि एक मधमाशी (Bee) काढली होती. चित्रकार अगदी बिगरीतला होता हे दिसतच होते.

तो मुलगा म्हणाला, ” निखिलला चित्रं काढता येत नाहीत.. ही मधमाशी, हा चेहरा…हाहाहा..म्हणत तो मनापासून  हसत होता.

नीना म्हणाली,” बघितली मॅजिक रॅाकमधली शक्ती? साहेब सकाळी रडत बसले होते आणि आता बघा.”

पुढे लागलेल्या वॉर्डमध्ये एक इन्स्पेक्टर काका होते.  नीना म्हणाली,” यांना शेजाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाने फार सुंदर रॅाक पाठवलाय.”  निळसर रंगाने रंगवलेल्या त्या दगडावर युनिफॉर्ममधल्या पोलिसांचे चित्र काढले होते. खाली लिहिले होते, ” काका तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. लवकर बरे व्हा आणि घरी या. हसायला विसरू नका.” नीना म्हणाली, “काका तुम्हाला मॅजिक रॅाक पाठवलेल्या मुलाला कॅडबरी द्या बरं का !” काकांनी त्यांचा रॅाक उचलून कपाळाला लावला. म्हणाले, ” भलेभले मला रडवू शकत नाहीत पण या पोरानं ही भेट पाठवून रडवलं बघा.”

लहानपणी जादूचा दिवा, जादूची सतरंजी वगैरे पुस्तकं वाचताना भान हरपल्याचे आठवत होते. पण एकविसाव्या शतकातला मॅजिक रॅाक मला नि:शब्द करून गेला होता.

एक साधा दगड .. पण त्याला शेंदूर लागला की त्याचा देव होतो.. एक साधा दगड.. पण त्याला छिन्नी हातोडा लागताच त्यातून हवा तो ईश्वर प्रकट होतो..  तसाच एक साधा दगड…ज्याच्यावरचे संदेश माणसाला उभारी देतात. “ तुम्ही एकटे नाही..आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर ” म्हणतात. 

काय लागतं माणसाला कठीण परिस्थितीतून जाताना? …… 

कुणीतरी आपलं हित चिंतत आहे, कुणीतरी आपली आठवण काढत आहे, कुणीतरी आपलं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे.. बस. . एवढंच हवं असतं…. मॅजिक रॅाकवर आलेले निरागस संदेश किती जणांचं  मनोधैर्य वाढवत होते. हिलींग घडवून आणत होते…. सगळेच अगम्य !

आता मला ठिकठिकाणी बघितलेले ” मॅजिक रॅाक्स ” आठवू लागले. जवळच्या बीचवर मला मॅजिक रॅाक दिसला होता. त्यावर सोनेरी रंगात लिहिले होते..  “ एखाद्या ढगाळलेल्या आयुष्यातले इंद्रधनुष्य बन !”

एकदा टीव्हीवर एका जवानाने त्याच्या मुलाखतीत ” तू घरी येण्याची मी वाट बघतेय.” लिहिलेला रॅाक दाखवला होता. मुलांनी शाळेत जे मॅजिक रॅाक्स विखुरले होते त्यावर “तू एकटा नाहीस”, “क्षमा”, “दया”, “आनंद”, “Love”, “Keep trying” असे शब्द लिहिले होते. एकावर “बाजीगर” लिहिलं होतं. “तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्यातच आहे ” लिहिलेला गुलाबी मॅजिक रॅाक जाणाऱ्या-येणाऱ्याला  क्षणभर थांबावयास भाग पाडून अंतर्मुख करत होता.

कठीण आजाराशी झुंज देणाऱ्या एका मैत्रिणीला ”The worst is over” लिहिलेला रॅाक दिसल्याने आपण आता बरे होणार असा संदेश “वरून” आला आहे असं वाटलं होतं. मॅजिक रॅाक्स ठेऊन शुभशकून निर्माण करणाऱ्या काही परोपकारी जीवांना आयुष्याचा खरा अर्थ कळला होता. 

मनात आलं….. कागदावरचा संदेश व मॅजिक रॅाकवरचा संदेश यात पहिला फरक आहे स्पर्शाचा ! ज्या मातीतून आपण निर्माण होतो आणि ज्या मातीत परत जातो तिथला दगड हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून कदाचित त्याच्याशी पटकन नातं जुळत असावं. देवळातल्या गाभाऱ्याशी  व  तिथे असणाऱ्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पडणाऱ्या जलाबरोबर जसं तत्क्षणी नातं जुळतं तसंच ! 

विचारांची आवर्तनं, मेघाचा टेक्स्ट आला “वर ये” , म्हणून थांबली. नीनाने मला दगडातला देव दाखवल्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानले. “उद्या जेवायला ये” म्हटलं व थेट हॉस्पिटलच्या अंगणात गेले. एक लांबट गोलाकार बदामी रंगाचा दगड उचलला. तिथल्या नळावर धुऊन रुमालाने कोरडा केला.  पर्समधून गुलाबी शार्पी काढून त्यावर लिहिलं,

“अंजू-अमित तुम्ही खूप छान आई बाबा होणार आहात. तुमच्या प्रिन्सेसला खूप खूप शुभेच्छा ! “

घाईघाईने अंजूच्या खोलीकडे गेले.  तिला सर्व भेटी दिल्या व “मॅजिक रॅाक” पण  दिला.  तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. मावशी “काइंडनेस रॉक“ बनवलास ना माझ्यासाठी! सो वंडरफुल ! तुला कसे माहिती असते ग हे सगळे?”

मी गालातल्या गालात हसत तिला जवळ घेतले आणि म्हणाले, ” तू घरी आलीस ना की तू, मी व तुझी आई “धन्यवाद” देणारे रंगीबेरंगी मॅजिक रॅाक्स बनवू. तुझ्या प्रिन्सेसचं नाव लिहू त्यावर ! बाळाच्या बारशाला छान रिटर्न गिफ्ट होईल ना?”

एक लहानशी गोष्ट माणसासाठी काय करू शकते याचे हे उदाहरण आहे. 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन अनुज नय्यर 

खूप व्रात्य होता हा मुलगा. उंच शिडशिडीत बांधा आणि अभ्यासासोबत खेळात अत्यंत कुशल ! पण त्याच्या खोड्या सर्वांना पुरत्या जेरीस आणणाऱ्या असत. गणिताच्या शिक्षकांचा हा तसा लाडका पण त्याच्या या स्वभावाचे गणित त्या शिक्षकांना कधी सोडवता आले नाही ! त्याला ते ‘उत्साहाचं गाठोडं’ म्हणत असत. 

असेच एका दिवशी साहेबांनी कुणाची तरी कुरापत काढली आणि सुंबाल्या केला. सर्वच त्याला शोधत होते… सरांनी तर चक्क फळ्यावर  लिहिले…. Wanted Anuj…. dead or alive! अर्थात हे सगळं गंमतीत! कारण  त्याच फळ्यावर दिलेलं गणित वर्गात अनुज शिवाय दुसरं कुणीच सोडवू शकत नव्हते! स्वारी मात्र दुसरीकडेच कुठे तरी नवीन खोडी काढण्यात दंग होती!

व्हॉलीबॉल खूप खेळायचा अनुज ! वडील म्हणायचे,”अरे, शर्ट खराब होईल !” तर यावर पठ्ठ्या शर्ट काढून खेळू लागला ! मग नंतर पँट खराब होईल असं वडील म्हणू लागले तेव्हा साहेब फक्त हाफ पँट घालून खेळत… पण खेळ पाहिजेच. पोराने चाळीतल्या एकाही घराची खिडकीची काच फोडायची म्हणून शिल्लक ठेवली नव्हती… पण तरीही त्याच्यावर कुणी डाफरलं नाही.. कारण पोरगं गुणाचं होतं. सर्वांच्या मदतीला धावून जायचं तर त्याच्या स्वभावाचा एक भागच होता.

पुढे अनूज आर्मी स्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी गेला आणि एक सच्चा सैनिक आकार घेऊ लागला… शाळेच्या अभ्यासात आणि खेळांच्या मैदानात ! पाहता पाहता अनुज सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी निवडला गेला आणि तेथून उत्तीर्ण होऊन हा प्राध्यापक नय्यर साहेबांचा मुलगा सैन्य अधिकारीही झाला !

‘ तुला सैनिकच का व्हायचं रे? ‘ असं त्याला कुणीतरी तो अगदी लहान असताना विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, ” मला सियाचीन मध्ये जाऊन बघायचं आहे, थंडीचा माणसावर काय परिणाम होतो ते !”

आणि कर्मधर्मसंयोगाने त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली ती कारगिल मध्ये, आणि सहकारी होते लढाऊ जाट रेजिमेंटचे. एका वादळाला आणखी काय हवं असतं.. त्याला गर्जायचं असतं… फक्त वातावरण तयार झालं पाहिजे !

सैन्यात येऊन अनुजसाहेबांना जेमतेम दोन वर्षे झाली होती. जाट पलटणी मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून जबाबदारी मिळाली. मोकळा वेळ मिळाला की साहेब आई वडिलांना, मित्रांना पत्र लिहीत.. अगदी नेमाने ! इतके की सहकारी त्यांना letter man संबोधू लागले ! त्यांच्या अनेक पत्रांतून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कल्पना मांडल्या होत्या. ‘सामान्य निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवणे हा आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे ते नेहमी म्हणत. 

१९९९…. आपला देश क्रिकेटच्या विश्वचषकाच्या धुंदीत होता. तिकडे पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसत होता…. लपून छपून ! छुप्या रीतीने पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या वेषांत कारगिलच्या उंचच्या उंच पहाडांवर भारतीय भूभागावर हल्ला करता येईल अशा जागा पटकावून ठेवल्या होत्या. 

या घुसखोरीची खबर मिळाली तेव्हा तसा खूप उशीर झाला होता. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न देह पाहून आपल्या सैनिकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती ! आहे त्या परिस्थितीत, साधनसामुग्रीत भारतीय सैन्याने घुसखोरी मोडून काढण्याची मोहिम सुरू केली.

आपण युद्धक्षेत्रातच नेमणूकीस आहोत, याची खबर अनूजसाहेबांनी घरी लागू दिली नव्हती. उंच पहाडावरील एक महत्त्वाची जागा आपल्या ताब्यात घेणे अतिमहत्त्वाचे होते. सोळा हजारापेक्षा जास्त फूटावर असलेल्या त्या ठिकाणी चढाई करणे केवळ अशक्यप्राय गोष्ट. आणि हे करताना हवाईदलाची मदत घेणे गरजेचे होते. परंतू हवाईदलाची मदत पोहोचेपर्यंत थांबण्यात धोका होता.. पाकिस्तान आपली पकड अधिक मजबूत करू लागला होता… उशीर म्हणजे नुकसान !   

६ जुलै १९९९. उद्या सकाळी पहाडावर कब्जा करायला निघायचं होतं. अनूज साहेबांनी वडिलांना फोन लावला. सांगितलं नाही नेमकं कुठं हल्ला करणार आहेत ते, पण ‘मोठी कामगिरी करायला निघालोय’ एवढं मात्र सांगितलं.

प्राध्यापक नय्यर त्यांना म्हणाले होते, “देखो ! हार कर नहीं आना ! वरना मैं तुम्ही गोली मार दुंगा !” अर्थात हे सर्व प्रेमात आणि मुलावरच्या विश्वासानं बोललं जात होतं. हे दोघं केवळ मुलगा आणि वडील नव्हते तर दोन दोस्त होते, सखे होते !

त्यावर अनूज साहेब म्हणाले होते, “आपका बेटा हूँ… हारने की बात सोच भी नहीं सकता !” 

या पूर्वीच्या पत्रात त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं…. ‘देशाप्रती असलेलं माझं कर्तव्य पूर्ण करण्याआधीच मरण्याएवढा मी बेजबाबदार नाही पपा ! भारतीय सेना आणि भारतीय जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो पाहून यावेळी मरणाचा विचार करणं अतिशय गैर ठरेल. शेवटच्या शत्रूच्या शरीरातून प्राण निघून जाईपर्यंत मी माझे श्वास घेतच राहीन… जयहिंद !’

पहाडावर चढाई सुरू झाली. पुढच्या तुकडीच्या हालचाली शत्रूने वरून अचूक टिपल्या आणि आगीचा वर्षाव सुरू केला. त्यात आघाडीचे सैन्याधिकारी, सैनिक जखमी झाले, धारातीर्थी पडले. मोहिम अयशस्वी होण्याची चिन्हे होती. 

दुसरी ताजी कुमक पहाडावर पाठवण्यात आली. यात अनूजसाहेब होतेच. पहाडावरून येणाऱ्या बातम्या त्यांच्याही कानी पडत होत्या. पहाडावर जाताना पुरेसा दारूगोळा सोबत असलाच पाहिजे, याचा त्यांना अंदाज होताच. वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी आपली बॅग़ भरायला आरंभही केला होता. एखादं लहान मूल जसं कुठं बाहेर जायचं असल्यास आपल्या पिशवीत जमतील तेवढी खेळणी भरून घेतं ना, त्यातीलच हा प्रकार. 

वरिष्ठ साहेब त्यांच्या पाठीमागेच उभे होते… त्यांनी हाक मारताच… अनूजसाहेब म्हणाले….”आया साहब ! बस और थोडे हॅन्डग्रेनेड्स ले लू ! इनकी जरुरत पडेगी !” जणू खेळायला निघालेल्या ह्या पोराचा खेळ प्रत्यक्ष मृत्यूच्या अंगणात ठरलेला होता. 

योगायोगाने जेव्हा अनूजसाहेब आपली युद्धाची तयारी करीत होते त्यावेळी दिल्लीत त्यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांच्या पिशव्या भरत होत्या…. कारगिलमधे लेकाला पाठवण्यासाठी. आणि दुसऱ्या एका घरात आणखी एक व्यक्ती अनूजसाहेबांसाठी चॉकलेट्स पॅक करीत होती… त्यांची जीवाची मैत्रिण… टिम्मी ! 

थोड्याच दिवसांत अनूज आणि टिम्मी विवाहबद्ध होणार होते… दोघांनी एकाच नजरेने स्वप्नं पाहिली होती ! साहेबांच्या बोटांत सोन्याची एंगेजमेंट रिंग शोभत होती. मोहिमेवर निघताना अनूजसाहेबांनी आपली ही अंगठी आपल्या मोठ्या साहेबांच्या हवाली केली…. ” मी परत नाही येऊ शकलो तर ही माझी लाखमोलाची ठेव माझ्या प्रेयसीच्या हाती सोपवा !”

चढाई सूरू झाली ! अनूजसाहेबांचे वरिष्ठ मेजर रामपाल साहेब आघाडीवर होते. लढताना जबर जखमी झाले. त्यांना मागे आणावे लागले. त्यांची जागा अनूजसाहेबांनी घेतली. त्यांना आता कॅप्टन म्हणून बढती मिळाली होती… भर युद्धाच्या दिवसांत ही बढती म्हणजे देशाने खांद्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी. 

निकराचा हल्ला करीत निघाले साहेब आणि त्यांचे बलवान जाट सैनिक. चढाई सोपी नव्हती… सोळा हजार फूट…. कडेकपारी…. पाय निसटला की जीवन निसटून जाईल याची खात्री… वरून प्रचंड गोळीबार होत होता. 

सैनिकांजवळचे अन्न पदार्थ संपले ! पोटात भुकेचा वणवा भडभडून पेटलेला होता. पण लढण्यासाठी दारूगोळा महत्त्वाचा होता. अन्नाचं ओझं होईल….! त्या बहाद्दरांनी अन्नाऐवजी बंदुकीच्या गोळ्या, हातबॉम्बचं ओझं सोबत नेणं पसंत केलं…. ‘सैन्य पोटावर चालतं’ ही म्हण या शूरांनी इथं खोटी ठरवली एका अर्थानं !

उपाशीपोटी लढणं….. कल्पना तरी करवते का सामान्य माणसांना? पण असामान्य माणसांची कथा आहे ही…. आणि खरी आहे ! 

अनूजसाहेब सर्वांत पुढे होते. उंचावरच्या सांदी कोपऱ्यात पाकिस्तानचे चार बंकर्स होते. त्यात बसून ते आरामात फायरिंग करीत होते. साहेबांनी गोळीबाराच्या पावसात पुढे धाव घेतली आणि पहिले तीन बंकर्स उध्वस्त केले… त्यातील नऊ शत्रू थेट वरती पाठवले…. त्यांच्या मशिनगन्स निकामी केल्या…. पण… चौथा बंकर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात तिकडून आलेल्या एक आर.पी.जी.गोळ्याने त्यांच्या शरीराचा वेध घेतला…. रॉकेट प्रॉपेलर गन ! हिच्यातून गोळी नाही तर बॉम्बच डागला जातो एक प्रकारचा. त्या अस्त्राने या अभिमन्यूचे प्राण हिरावून नेले ! 

तोवर कामगिरी फत्ते झाली होती…. पहाड ताब्यात आला होता… पाकिस्तानची राक्षसी पकड त्यामुळे ढिली पडणार होती ! पुढे विजय आवाक्यात होता, दृष्टीपथात होता ! पण हे पहायला कॅप्टन अनूज नय्यर आणि त्यांचे काही साथीदार या जगात नव्हते ! 

प्राध्यापक एस.के.नय्यर यांच्या घरातील टेलिफोन खणखणला…. लष्करी अधिकारी होते फोनवर…. “जयहिंद सर….” आणि असंच काही बोलून ते अधिकारी नि:शब्द झाले काही वेळेसाठी….

नय्यर साहेब म्हणाले….. ” माझा लेक लढतानाच मरणाला सामोरं गेला ना?”

” सर, केवळ भारतीय सेनाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आपल्या सुपुत्राचा ऋणी राहील कायम !” ते अधिकारी कसेबसे म्हणू शकले ! काय बोलणार अशा वेळी? 

केवळ चोवीस वर्षे वयाचे, केवळ दोनच वर्ष लष्करी सेवा झालेले कॅप्टन अनूज नय्यर… मरणोपरांत महावीर चक्र ! त्यांनी आपले शब्द खरे केले…. शत्रूचा नि:पात झाल्यावरच आपला श्वास थांबवला ! 

 ७ जुलै….. या पराक्रमाचा स्मरण दिन ! भावपूर्ण आदरांजली हे महावीर योद्धा !

…  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

” हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे .”… नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज 

म्हणाली . आणि सासुबाईंचे डोळे भरून आले .

” मला कशाला ग एवढे लागतात ? “

” अहो , दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून . दारावर भाजी , फळवाले येतात . कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते . शिवाय तुमची भिशी असते. राहू द्या तुमच्याजवळ .”

” अग , पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची .ते असतांना त्यांच्याकडे मागत असे , आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते .” .. सासू हसून म्हणाली .

” तुम्ही भिशीच्या ग्रुपबरोबर सिनेमा , भेळ पार्टी , एखादं नाटक, असे कार्यक्रम ठरवत जा . जरा मोकळं व्हा आई . ह्यांनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते . मोठे दादा तर वेगळे 

झालेत , ताई सासरी खूष आहेत . मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा .मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात … आता जगा स्वतःसाठी . “

” इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”

” मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती. आईने पटकन सहाशे रुपये काढून 

हातावर ठेवले . म्हणाली , ‘ तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा , ‘आजी कडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला , खेळणी घेऊन द्या ….’ आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती . ‘ एवढे पैसे कधी 

मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग ‘  असे म्हणाली होती … तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ……आई , मला माहितेय , घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न ? किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ….शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील … तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ……….तुमची पेन्शन राहू द्या आई .मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन . ” 

” अग , सगळं आजच बोलणार आहेस का ? जा आता तुला उशीर होईल. “

“मला बोलू द्या आई .हे मी माझ्या समाधानासाठी करतेय  . आई म्हणते , की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर , प्रेमच उगवेल . “

…. सासूने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले . ती दिसेनाशी होईपर्यंत दारात उभी असतांना 

तिच्या मनात आले … 

‘ सून आल्यावर मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते. तू उलट  कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस ….. ‘ 

…… ज्या घरात लेकी सुना सासूचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतोच मुळी. 

जेथे असेल आपुलकी .. प्रेम .. जिव्हाळ्याचे अस्र … 

….. तेथे फिके पडते वास्तुशास्त्र. 

खरंच ,,,,,,, सासू अन सुनेमधे असा बदल झाला तर …. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अजून ही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “अजूनही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी लिहिलेले आणि नंतर गायब झालेले लिखाण आज अचानक जुनी कागदपत्रे चाळताना सापडले आणि वाचल्यानंतर हे जाणवले की त्यातील बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

लालयेत पंच वर्षाणि  दश वर्षाणि ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

 असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ.

मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.

 मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत, मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाई मध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे. आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकीनऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात . बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे.

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या, बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराण काळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षा दरम्यान गृहस्थाश्रम व 55 ते 60 वर्षा दरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंट नंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात विचार करता मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल.

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत. 

प्रॅक्टिकली बोला.

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू.

पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी ( म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच )  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेट सुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच.  अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचे कडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्यामते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान. 

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो –

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,

आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला,

भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ?

सामाजिक अराजकतेचे दान ?

ढासळत्या पर्यावरणाचे थैमान.

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,

पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह,

नाही परतवू शकलो या लाटा,

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं, 

जरी जगलो तरी……….

नाही गेलो भोव-याच्या तळाशी. 

प्रवाहातील पत्थरांना चुकवत,

कपाळमोक्ष नाही होऊ दिला.

म्हणूनच अजूनही अशा आहे,

प्रवाह वळवता येईल,

बिघडलेलं सावंरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर

विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल.

खरंच येईल तरुणांनो,

आम्हाला आशा आहे.

आमच्या शापित जीवनाला,

शिव्या घालत बसण्यापेक्षा,

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा.

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं

अनिवार्य असेल तरी कचरू नका,

पण प्रवाहपतित होऊ नका.

इतिहासाची पुनरावृत्ती करू नका.

भविष्यकाळाच्या भल्यासाठी,

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं,

आवश्यकच असेल तर ………..

हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो, 

हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन,

तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे,

अन गर्जना करतोय,

देन सीझर मस्ट डाय.

देन सीझर मस्ट डाय.

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बार्बी/ BAR- B ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

बार्बी/ BAR- B ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

काल पोरांना हा सिनेमा दाखवायला थेटर वर सोडायला गेलेलो. सिनेमा बघायला आलेले सगळेचजण ‘गुलाबी’ ड्रेसमधे आलेले (  मुलंही याला अपवाद नव्हती)

मजा वाटली या जनरेशनची. पिक्चरच्या थिमला साजेसा पेहराव.

(काही महिन्यांपूर्वी आलेल्या “बाईपण भारी देवा” या सिनेमालाही बायकांचा ग्रुप साधारणपणे सिनेमातील व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने नटून जाताना बघितला )

नाही तर आम्ही.  अनेक सिनेमे तर शाळेच्या खाकी चड्डी,पांढरा शर्टवर पाहिलेत. 

त्यावेळेला असं काही नव्हतं नशीब नाहीतर ‘शहेनशहा’ बघायला हाताला प्लॅस्टर घालून जावं लागलं असतं अन ‘टारझन’ च्या वेळी पानं लावून. 

बार्बीचं गाणं तसं ऐकिवात आहे. त्यातील एकही इंग्रजी  शब्द कळत नाही. आज सहज गुगल वर त्याचे लिरिक्स वाचले. त्यातील एका कडव्यातील  शेवटचे वाक्य  👇

I’m a Barbie girl, in the Barbie world

…….

………..

Imagination, life is your creation

आता या ओळीत जीवन जगण्याचे सार वगैरे दडलेले असेलही पण

 #माझी_टवाळखोरी # चं मर्म तरी दुसरं काय आहे? 

(माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे– ती जास्त रंगते जेव्हा आम्ही  A पेक्षा B साईडला बसतो.  शाळेत ही ‘ब’ तुकडी भारी देवा असं उगाच नाही म्हणायचो आम्ही 😌)

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print