मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४१

तस्मिन्स्तज्जने भेदाभावात् ॥ ४१ ॥

अर्थ :भगवंत आणि त्याचे भक्त यामध्ये भेदाचा अभाव असतो. अर्थात भक्त आणि भगवंत वेगळे नसतात.

विवेचन:~ मागील सूत्रात महत्संग दुर्लभ अगम्य अमोघ आहे पण तो भगवत्कृपेने प्राप्त होतो असे सांगितले, तेव्हा भगवत्कृपा व महात्म्या पुरुषाच्या संगती प्राप्तीत कार्य-कारण भाव संबंध कसा अशी शंका कोणी घेईल, त्याचे उत्तर या सूत्रात दिले आहे. येथेही ‘तत्’ शब्दाचा प्रयोग केला आहे तो ‘भगवंत’ वाचक आहे. (म्हणून मागील सूत्रातील ‘तत्’ शब्दही भगवद्वाचकच घेणे योग्य आहे.) त्या भगवंताचा व तज्जन म्हणजे सर्वस्वी त्याचेच झालेले (असलेले) भक्तजन यांचा भेद नाही. शास्त्रामध्ये अन्योन्याभावास भेद म्हणतात. अन्योन्याभावास प्रतियोगि व अनुयोगी लागतात. म्हणजे ज्याचा अभाव तो प्रतियोगी व ज्याचे ठिकाणी अभाव तो अनुयोगी म्हटला जातो. उदाहरणार्थ घट हा पट नाही, या वाक्यात घट हा प्रतियोगी पट हा अनुयोगी आहे. म्हणजे घटाचा अभाव पटाचे ठिकाणी दाखविला जातो. जर पट हा घट नाही अशी वाक्ययोजना केली तर पट हा प्रतियोगी व घट हा अनुयोगी होईल.

दुधामध्ये लोणी असते, ताक घुसळले की त्यातून लोणी आपसूक वर येत असते. या सूत्रानुसार मनुष्याची अंतर्यामी भगवंत असतोच, मनाचा तळ आणि तळाशी असलेला मळ नष्ट झाला की मनांची शुद्धता होते. मग मनाच्या तळाशी असलेला भगवंत नकळत मनात प्रगट होत असतो.

इथे संत मुक्ताबाई यांचा एक अभंग आहे…..

ब्रह्मा दिसे उघडे जगामध्ये |

एकची तंतू नानापरी कपडे ||

धोतर आणि लुगडे || १ ||

*

एकची माती नानापरी भिंती

रांजण आणि सुगडे || २ ||

*

एकची सोने नानापरी दागिने|

लेणे बाळी आणि भूगडी || ३ ||

*

म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा

हरी आणि रोकडे || ४ ||

*

थोडक्यात वरील अभंगातून आपल्या लक्षात येईल की अनेक प्रकारे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये असतोच असतो. तो योग्यवेळी प्रगट होतो. अर्थात भक्तांमध्ये भगवंत असतोच, योग्यवेळी तो प्रगट होऊ शकतो.

या सूत्रामध्ये भक्ताकरिता अथवा संत महात्म्याकरिता ‘तज्जन’ हा शब्द वापरला आहे. केवळ संत भक्त भाविक महात्मा या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. श्री नारदांनी अभिप्रेत अर्थ दाखविण्याकरिता ‘तज्जन’ शब्दाचा उपयोग केला असावा असे वाटते.

ही अवस्था प्राप्त होणे ही ‘तज्जन’ होणे आहे. अशा भक्ताचा व देवाचा भेद राहील कसा? उभयतांमध्ये असा तादात्म्य संबंध आहे म्हणूनच मागील सूत्रात सत्संग हा भगवत्कृपेने लाभतो असे नारद म्हणतात.

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाहीत, तरीही त्याच्याकडे जावेसे वाटते. त्याच्याकडे जाऊन आंतरिक समाधान लाभते, त्याला संत म्हणता येईल. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“संत चरण रज लागता सहज, वासनेचे बिज जळूनी जाय । मग रामनाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढु लागे । कंठी प्रेम दाटे नयनी नीट लोटे । हृदयी प्रगटे रामनाम हृदयी प्रगटे रामनाम । तुका म्हणे साधन सुलभ गोगटे परी उपतिष्ठे रामनाम ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

नारद भक्तिसूत्रे. ४२

तदेव साध्यताम् तदेव साध्याताम् ॥ ४२ ॥

अर्थ : तोच सत्संग साधावा. तोच सत्संग साधावा.

विवरण : मागील चौतिसाव्या सूत्रापासून भक्तिसाधनाचा विचार केला आहे. विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुणश्रवण, कीर्तन इ. साधने सांगितली. नंतर मुख्यत्वाने महत्कृपा हे साधन सांगितले व महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ आहे हेही स्पष्ट केले आणि भगवत्कृपेने सत्संग प्राप्त होतो, तत्त्वतः भगवान व संतमहात्मे यांच्यात भेद नाही. ज्याना भक्तीचा लाभ व्हावा असे वाटत असेल त्यानी महत्संगच साधावा असे आदराने द्विवार सांगितले आहे. याचे कारण मागे सांगितलेली विषयत्याग संगत्याग इ. साधने ही महत्संगाच्या द्वाराच सिद्ध होऊ शकतात. सत्संगच का साधावा? याची कारणे खाली दिली आहेत.

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. साधकाला भगवंताचे दर्शन व्हावे असे वाटतं असते. त्यासाठी त्याच्या अंतरंगाची शुद्धता होणे अनिवार्य असते. त्यासाठी स्वतःचे दोष कळणे अत्यंत गरजेचे असते. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की गोंदवल्यात आला आहात, तर माझ्या रामाचे डोळे भरून दर्शन घ्या. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की तो तुम्हाला तुमचे दोष सांगेल. आपले दोष आपल्याला कळणे ही परमार्थ मार्गातील महत्त्वाची पायरी. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की संत दर्शनाने आपले दोष आपल्याला कळून येतात. (दुसऱ्याने आपले दोष दाखविले तर मनुष्याला रुचत नाहीत…) श्री तुकाराम महाराज म्हणतात, “बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥” 

संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे.

तिसरे अव्यावृत भजन – जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते भगवंतांच्या कृपेमुळेच. श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥’ म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल.

इथे एकच सूत्र दोनदा सांगितले आहे. माउली आपल्या हरिपाठात सुद्धा हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा असे दोनदा सांगतात. इथे पहिले हरि हे साधन म्हणून आहे तर दुसरे हरि हे साध्य म्हणून आहे असे समजावे. साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.

माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,

“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”

मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात मोठे पुण्य आहे. मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना 

ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.

नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो.

नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो.

म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– – भक्ती सूत्र क्र. ४१ आणि ४२.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कब है छब्बीस जनवरी? कब?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “कब है छब्बीस जनवरी? कब?” ☆ श्री संभाजी बबन गायके

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण अनुक्रमे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी असतात. आणि या तारखा केवळ तारखा न राहता आपल्या राष्ट्रीय मानसिकतेच्या प्रतिक बनल्या आहेत.

पण यामुळेच कधी कधी ‘सव्वीस जानेवारी किती तारखेला आहे? ’ असा गंमतीदार प्रश्नही अनवधानाने विचारला जातो! त्याशिवाय कितवा प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिन हा प्रश्नही दरवर्षी उपस्थित होतोच! काही जणांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक (गणतंत्र) दिन यांमधील फरक लवकर सांगता येत नाही… असे पाहिले गेले आहे! ऑगस्ट महिन्यात बहुदा पाऊस असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात आयोजित होतात. शालेय जीवनातील हे दोन राष्ट्रीय सण आपल्या चांगलेच लक्षात असतात. विशेषत: सुमारे ३० वर्षांपूर्वी घरोघरी इस्त्री नसण्याच्या काळात, किंवा कपड्यांना इस्त्री करायची आवश्यकता न वाटण्याच्या काळात गावातल्या इस्त्रीवाल्यांकडे शालेय गणवेश मोठ्या संख्येने इस्त्रीसाठी येत असत. ज्यांना हे शक्य नसे ते विद्यार्थी पाणी पिण्याच्या लोटीमध्ये/तांब्यामध्ये कोळशाचे निखारे घालून ते तापलेले भांडे इस्त्रीसारखे वापरत… आणि या प्रयत्नात काहींनी टेरीकॉटचे शर्टस जाळूनही ठेवलेले आहेत. प्रभातफेरी खरोखरीच प्रभातीच काढली जायची आणि त्यानंतर मिळणारा खरोखरीचा अल्प खाऊ हे सुद्धा एक आकर्षण असायचे. त्यावेळी सुट्टी आहे म्हणून मुलांना घेऊन बाहेर फिरायला जायचे म्हणून शाळेला दांडी मारण्याची परंपरा सुरु झालेली नव्हती. असो.

तर विषय असा आहे… एका शिक्षकांनी आपल्या मुलाचे नाव चक्क सव्वीस जानेवारी ठेवल्याचे वाचनात आले. झाले असे होते, की शिक्षक महोदय त्यांच्या शाळेच्या प्रजासत्ताक, उत्तरेत असल्याने गणतंत्र दिवस च्या कार्यक्रमात व्यस्त म्हणजे व्यग्र होते… (मराठीत व्यस्तचा अर्थ वेगळा आहे! ) तेवढ्यात त्यांच्या पत्नीने घरी पुत्ररत्न प्रसवले. ही बातमी गुरुजींच्या पर्यंत अत्यंत तातडीने पोहोचवण्यात आली. नावे ठेवण्याची पद्धत त्याहीवेळी होतीच. शिवाय आपल्या अपत्यांची नांवे इतरांच्या अपत्यांपेक्षा जरा हट के असावी असा हट्टही काही लोक बाळगीत. (श्रीमंती नांवे पूर्वी वर्तमानपत्रांच्या शेवटच्या, खेळांच्या पानांवर आढळून येत… विशेषत: टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग यांसारख्या खेळांतल्या मुला-मुलींची नांवे वेगळीच असत… मात्र बळेबळेच जुळवलेली नसत! )

तर गुरुजींनी त्याच वेळी तिथेच जाहीर केला… हमारा बेटा छब्बीस जनवरी के नाम से जाना जायेगा! आणि त्या बालकाचे नांव चक्क छब्बीस जनवरी असे नोंदवलेही गेले. या नावामुळे या बालकास आपली प्रजा आणि तिचे तंत्र यांमुळे बराच मनस्ताप भोगावा लागला, ही बात अलग! आपल्या या प्रजासत्ताक चिरंजीवाच्या नावाचे आधार कार्ड बनवून घेताना मात्र गुरुजींनी विशेष काळजी घेतली नाही. आधार कार्डची माहिती data enter करताना संबंधित ऑपरेटर त्याच्या ‘उत्तरी’य अंग्रेजीला जागला आहे… त्याच्यासाठी जानेवारी म्हणजे इंग्लिश लेटर्समध्ये Jawvaary…साधारण जवारी (ज्वारी) सारखी. निर्वाचन वाल्यांनी janvary हे स्पेलिंग बिनविरोध निवडून दिले आहे… AB फॉर्म बहुदा संपले असतील किंवा कुणी पळवले किंवा गिळून टाकले असतील! शिवाय बहुदा या गुरुजींचे कुलनाम दर्जी (कपडे शिवून देण्याचा व्यवसाय करणारे) असावे… आता हे इंग्रजीत असावे असे त्यांना वाटणे साहजिकच.. त्यामुळे आडनाव टेलर असे केले गेले असावे. एलिझाबेथ टेलर सुद्धा त्यांना माहीत असावी! फक्त तारीख ट्वेंटी सिक्स जरा अति झाले असते, म्हणून त्यांनी ते तसेच राहू दिले!

January या इंग्रजी शब्दाचा सर्वाधिक अचूक उच्चार हिंदीत आहे… जनवरी. आपण तो अधिक उंचीवर नेत जानेवारी असा निवांत लांबलेला केलेला आहे.

गेल्या वर्षात अशी नांवे प्रकाशात येताना दिसतात. कोरोना, रेल्वे, एक्स्प्रेस अशीही नावे त्या त्या बालकांच्या जन्मकाळानुसार, स्थळानुसार पाडली गेली असावीत. पण छब्बीस जनवरी हे नांव मात्र आहे भारी!

संबंधित व्यक्तीची त्याकाळी खूप चेष्टा (हिंदीत चेष्टा म्हणजे प्रयत्न) झाली. पण आता त्यांना त्याच नावाचा अभिमान वाटतो. असो. सर्वांना ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या belated शुभेच्छा! जय हिंद! जय भारत!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक मोलाचा धडा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “दोन मुलगे…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मी अमेरिकेतून आईच्या अंत्यसंस्काराला आलो होतो, अंगात $3, 000 किमतीचा खास शिवलेला सूट घातला होता. एअरपोर्टवरून भाड्याच्या आलिशान SUV मधून गावात घरापाशी पोहोचलो. डिझायनर सन-ग्लासेसच्या मागे अजून न सांडलेले अश्रू लपले होते..

 

गावातील इतर लोकांची परिस्थिती पाहता मला माझ्या स्वतःचा अभिमान वाटत होता.

मी ‘यशस्वी’ झालो होतो.

आयुष्यात पुढे गेलो होतो.

 

गेल्या 15 वर्षांपासून मी शिकागोमध्ये राहून लॉजिस्टिक्सचा व्यवसाय चालवत आहे. मी चांगली कमाई केली आहे.

मी गाव सोडल्यानंतर, माझ्या धाकट्या भावाला म्हणजे डेव्हिडला आईजवळ राहता यावं म्हणून मी डेव्हिडला दर महिन्याला $200 पाठवत होतो आणि आईच्या उपचारासाठी $100 वेगळे पाठवत होतो..

माझ्या मते, त्यामुळे मी ‘चांगला मुलगा’ ठरत होतो.

माझ्यामुळे घराची बिलं भरली जात होती.

माझ्यामुळे आई नीट खातपित होती.

माझ्यामुळे सगळं ‘व्यवस्थित’ होत होतं.

अंत्यसंस्कारानंतर, घरी परतल्यावर माझ्या तक्रारी सुरू झाल्या –

 

“अंगण एवढं कोरडं का पडलंय?” मी खिडकीतून पाहत डेव्हिडला विचारलं.

“मी एकदा बागायतीसाठी जास्त पैसे पाठवले होते, त्याचं काय केलंस. ”

 

भिंतीवरील उखडलेला रंग पाहत मी म्हणालो, “मी सांगितलं होतं, कुणाला सांगून रंगरंगोटी कर, मी पैसे पाठवतो. पण तू काहीच केलं नाहीस. “

 

आणि मग मी नकळत एक सीमा ओलांडली.

“आई इतकी बारीक का झाली होती?”

“मी पाठवलेल्या पैशातून तू तिला निट खायला प्यायला देत होतास ना?”

 

डेव्हिड काहीच बोलला नाही.

 

तो स्वयंपाकघरातील टेबलाजवळ बसला होता — अंगावर न बसणारा जुना सूट, डोळ्याखाली गडद वर्तुळे, हात सुजलेले आणि खरखरीत.

तो माझ्यापेक्षा लहान होता, पण दिसायला माझ्यापेक्षा मोठा दिसत होता..

 

मी पुन्हा व्यवसायाच्या सुरात आलो.

“घराविषयी बोलायला हवं,” मी म्हणालो.

“सध्या बाजार चांगला आहे. पटकन विकता येईल. 60-40 वाटू — तू जास्त घे, कारण तू इथे राहिलास. ”

 

मी कृतज्ञतेची अपेक्षा करत होतो.

 

पण त्याऐवजी, डेव्हिड हळूच उठला, एका जुन्या ड्रॉवरमधून वही काढली आणि टेबलावर ठेवली.

 

“वाच,” तो शांतपणे म्हणाला.

 

ती आईची ‘देखभाल नोंदवही’ होती.

 

12 ऑक्टोबर:

ती संपूर्ण रात्र किंचाळत होती. मला ओळखत नव्हती.

पाच वेळा चादरी बदलल्या.

तिला स्वच्छ करताना तिने माझा चावा घेतला. रक्त येत होतं, पण तिला मी एकटी सोडू शकत नव्हतो.

 

3 नोव्हेंबर:

मायकलने पाठवलेले पैसे घरखर्चासाठी पुरेसे होते, पण आईच्या हृदयाच्या औषधांसाठी नाही.

इन्शुरन्सने पैसे देण्यास नकार दिला.

म्हणून आज माझी बाईक विकली.

 

25 डिसेंबर:

‘ तिचा यशस्वी मुलगा’ फोन करत नाही, म्हणून ती दिवसभर रडत होती. काहीही खात पित नव्हती..

तिने थोडं खावं म्हणून मी मायकलचा जुना व्हॉइसमेल लावला आणि त्यावर तिला मी थोडं भरवलं.

आणि मी तिच्या खाटेजवळ जमिनीवर झोपलो.

 

15 जानेवारी:

अंघोळ घालताना तिला उचलताना माझी पाठ दुखावली.

डॉक्टर म्हणाले — डिस्क सरकली आहे…

शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेणं शक्य नाही.

 

माझ्या घशात शब्द अडकले.

 

डेव्हिड माझ्याकडे पाहून म्हणाला,

“तू पैसे पाठवलेस. आणि त्यासाठी मी आभारी आहे.

पण तू पैसे पाठवत असताना — तू छान झोप घेत होतास.

तू सुट्ट्या घेत होतास. सहलीला जात होता. स्वतःचं छान आयुष्य जगत होतास. ”

 

तो छातीवर हात ठेवून म्हणाला,

“मी चार वर्षांत एकदाही पूर्ण रात्र झोपलो नाही.

माझी नोकरी गेली..

माझा साखरपुडा तुटला..

पैसे रात्री 3 वाजता साफसफाई करत नाहीत.

पैसे घाबरलेल्या आईला शांत करत नाहीत.

पैसे मरण यातना होत असताना कुणाला मिठी मारत नाहीत. ”

 

त्याचा आवाज मंद झाला.

 

“भावा, तू घर विक. सगळे पैसे तूच ठेव.

मी माझा वाटा आधीच घेतलाय,

ह्या घरात राहून, उपभोग घेऊन.. “

 

तो आईच्या खोलीत गेला आणि दार बंद केलं –

पहिल्यांदाच, अनेक वर्षांनंतर, शांत झोपायला..

 

मी एकटाच स्वयंपाकघरात उभा राहिलो.

माझे घड्याळ, बूट, आरशातील प्रतिबिंब पाहत..

कशालाच आता अर्थ उरला नव्हता..

 

मी फक्त औषधांचे पैसे दिले.

त्याने रात्रभर जागून ती औषधं तिला दिली.

 

मी फक्त अंत्यसंस्कारांचे पैसे दिले..

त्याने तिच्या आजारपणात शेवटपर्यंत तिचा हात धरून ठेवला..

 

त्या दुपारी मी घर पूर्णपणे डेव्हिडच्या नावावर केलं.

त्याच्या भविष्यासाठी..

ती माझ्याकडून त्याला भेट नव्हती..

तो ‘थकीत मोबदला’ होता, त्याच्या त्यागाला, त्याच्या निस्वार्थी सेवेला, त्याच्या समर्पणाला. जे अमूल्य आहे म्हणून मी आयुष्यभर त्याचा ऋणी आहे..

एक आत्मचिंतन:

प्रत्येक कुटुंबात दोन भूमिका असतात:

उपग्रह मूल— यशस्वी, दूर राहणारं, पैसे पाठवणारं..

काठीसारखं मूल — जवळ राहणारं, संपूर्ण ओझं वाहणारं, वाकेपर्यंत.

 

तुम्ही पैसा दिला म्हणजे तुम्ही सर्व जबाबदारीतून मुक्त होत नाहीत..

बँक ट्रान्सफर आईबाबांचे डायपर बदलत नाही..

पैसा रात्री जागत नाही..

बॅन्क चेक एकटेपणी सोबत देत नाही..

 

तुम्ही जर शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडलं असेल,

तर जो भाऊ घरी राहिला आहे त्याचा त्यागही लक्षात घ्या..

 

आणि जेव्हा उरलेलं वाटायची वेळ येईल,

तेव्हा एक जाणीव ठेवा – आपल्या आईबाबांच्या सेवेसाठी

ज्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये..

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – वखरे साहेबांनी सुचवल्यानुसार ‘त्या’ सर्क्युलरची एक कॉपी मी घरी जाताना सोबत घेऊन गेलो खरा पण त्या सर्क्युलरच्या एवढ्याशा एन्व्हलपचं ओझंही मला मणामणाचं वाटत राहिलं!)

त्यात काय असेल हे उत्सुकता मिश्रित दडपण होतं ते वेगळंच. उद्याच्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा सगळा उत्साह आणि आनंद, आत्तापासूनच मनात ठाण मांडून बसलेल्या या सर्क्युलरच्या विचारानंच मलूल होऊन गेला होता! मी घरी पोचलो तोवर सांगलीहून निघालेले सलिल/आरती अजून घरी पोचलेले नव्हते. त्यांचा विचार मनात असतानाच घरी गेल्याबरोबर आईने “नितिन देशपांडे येऊन गेले. त्यांनी तुला फोन करायला सांगितलंय” असा निरोप मला दिला. त्याकाळात मोबाईल अजून अस्तित्वात नव्हते. त्यामुळे जे कांही बोलणं व्हायचं ते लँडलाईन वर किंवा असं निरोपानिरोपीच. थोडं फ्रेश होऊन मी नितिनना फोन करणार होतोच तो आता तातडीने करायला हवा होता. आईकडून त्यांचा हा निरोप ऐकला आणि हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या उद्याच्या प्रकाशन समारंभाची व्यवधानं मनात गर्दी करू लागली. कशासाठी करायला सांगितला असेल फोन? प्रिंटरकडून कथासंग्रहाच्या कॉपीज् मिळण्यात कांही अडचण आली असेल का?अजून त्या संदर्भातली ऐनवेळीच करायला हवी होती अशी बरीच कामं मार्गी लागायची होती, त्यात कांहीं अडचणी आल्या असतील कां?शन्नांकडून ऐनवेळी कांही फोन आला असेल कां? ठरल्याप्रमाणे ते येतील ना नक्की? समजा तशीच कांही अडचण असेल तर ऐनवेळी करायचं काय? कार्यक्रम रद्द करायची वेळ आलीच तर इतक्या सगळ्या आमंत्रितांना ते कळवायचं कसं? एक ना दोन. मी ऑफिसमधे असेपर्यंत तरी नितिन देशपांडेंचा फोन आलेला नव्हता. ते घरी सांगायला आले होते म्हणजे तसंच कांहीतरी महत्त्वाचं कारण असणार नक्कीच. मनात सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात मी सोबत आणलेल्या ‘त्या’ सर्क्युलरचा विचार मनाच्या पार तळाशीच जाऊन पडला!

याच सगळ्या विचारांमुळे सुरू झालेल्या घालमेलीत मी फ्रेश होऊन आलो. या क्षणी खरंच वाफाळलेल्या गरम चहाची तल्लफ होती. आई म्हणालीही, ‘चहाचं आधण ठेवते लगेच. चहा घे न् मग जा ‘ असं. पण माझं लक्ष सगळं नितिन देशपांडेना लगेच फोन करायला हवा इकडंच. त्याशिवाय मलाच चैन पडणं शक्यच नव्हतं.

“मी जवळच्या बुथवरून नितिनना फोन करून येतो न् मगच चहा कर. तोवर आरती, सलिलही येतील. आलोच. ” म्हणत मी घाईघाईने बाहेर पडलो. नितिनना फोन केला ते अचानक काय घडलं असेल हा विचार मनात घेऊनच. त्यांचं बोलणं ऐकत असताना मात्र तोवरचं हे सगळं दडपण हळूहळू निघूनच गेलं. आज ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून उद्याच्या प्रकाशन समारंभाच्या सगळ्या कामांच्या विचारांनीच माझ्या मनाचा ताबा घेतलेला होता. पण माझ्याशी बोलताना नितिन देशपांडेनी मघाशी मनात येत राहिलेले सगळेच नकारात्मक विचार परस्परच मोडीत काढून टाकले होते. बोलणं संपताच मी फोन बंद करून घरची वाट धरली तेव्हा मरगळ सगळी निघूनही गेली होती. कारण नितिन देशपा़डे फोनवर जे बोलले ते मला दिलासा देत पूर्णतः निश्चिंत करणारं असंच होतं! पण तरीही मनात खोलवर कुठंतरी नितिन आणि राजलक्ष्मी यांच्याबद्दल वाटणाऱ्या कौतुकाबरोबरच अपराधीपणाची सूक्ष्म बोच मला टोचू लागली होती. त्याला कारणही तसंच होतं. ते दोघे क्षणभरही विश्रांती न घेता सगळ्याच कामात हातचं राखून न ठेवता राबत होते आणि नाईलाजाने कां असेना मी त्या सगळ्यापासून एखाद्या ति-हाईतासारखा सुरक्षित अंतरावर उभा! नितिन देशपांडेंशी फोनवर बोलल्यापासून तर ही टोचणी अधिकच वाढली होती. कारण फोनवर नितिननी सांगितल्यानुसार तोवर पूर्ण न झालेली सगळीच कामं अगदी सुरळीत मार्गी लागली होती! शन्नांसाठी डेक्कन जवळच्या त्यांनीच सुचवलेल्या एका लाॅजमधली रूम बुक करून ठेवली होती, सकाळी लवकर त्यांना रिसिव्ह करायला नितिन स्वत:च जाणार होता, नंतर त्यांचा ब्रेकफास्ट, जेवण यासाठीही तो त्यांना कंपनी देणार होता, कथासंग्रहाच्या शंभर प्रती आज रात्री नऊपर्यंत तयार होणार होत्या, त्या तो प्रेसमधून मिळाल्या की हाॅलवर नेणं सोयीचं पडावं म्हणून स्वत: आमच्या घरी पोचवणार होता,

त्यातली एक प्रत तो शन्नांना नजरेखालून घालता यावी म्हणून स्टेशनवर जातानाच उद्या सकाळी स्वतःबरोबर आठवणीने घेऊन जाणार होता, कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी चारची होती आणि टिळक स्मारक मधला हाॅल तीन वाजता ताब्यात मिळणार होता, उपस्थित रसिकांसाठी चहा-खाण्याची आॅर्डर त्यांनी केटररकडे देऊन ठेवली होती आणि त्यानुसार केटररने पाचपर्यंत गरम डिश सर्व्ह करायचं आश्वासनही दिलं होतं, व्यासपीठावरचं डेकोरेशन, बैठक व्यवस्था ही सगळी जबाबदारी राजलक्ष्मीने स्विकारलेली होती. आणि मी? मी मात्र माझ्याचसाठी सुरू असलेल्या त्या दोघांच्या या धावपळीपासून दूर सुरक्षित उभा! अपराधीपणाची टोचणी होती ती हीच. नाही म्हणायला नितिननी त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं एकचं काम माझ्यावर सोपवलं होतं तेही ते मीच करायला हवं होतं म्हणून. कारण कांही अपवाद वगळता जवळजवळ सर्व आमंत्रित माझेच नातेवाईक तसेच बॅंकेतल्या स्टाफ पैकी माझे जवळचे असे मित्र असल्याने नियोजित वेळेपेक्षा थोडं आधीच मी त्या सर्वांच्या स्वागताला तिथं वेळेआधी पोचायचं एवढंच काम मी करायचं होतं!

खरं तर हा प्रकाशन समारंभ हे माझ्यासाठी एखाद्या शुभकार्यासारखंच होतं आणि तेही सर्वार्थाने माझ्या घरचंच! तरीही स्वत:च्या सर्व कमिटमेंटस् बाजूला ठेवून, या संदर्भातल्या अगदी नियोजनापासून कार्यसिद्धी पर्यंतच्या सर्वच जबाबदाऱ्या नितिन आणि राजलक्ष्मी दोघांनीही अशा मनापासून स्विकारल्या आणि यशस्वीपणे पारही पाडल्या‌.

नाईक सरांनी राजू/ नितिनकडे ‘चिरानी प्रकाशन’ तर्फे माझा कथासंग्रह प्रकाशित करायला सुचवणं आणि ते त्या दोघांनी मनापासून मान्य करून त्या संकल्पाची अशी सिध्दी होईपर्यंत सर्वार्थाने पुढाकार घेणं हे माझ्यासारख्या नव्या लेखकाला ‘त्या’नेच घडवलेलं वाटावं असं अतर्क्यच होतं! पण हे तेवढंच नव्हतं. ‘त्या’चाच कृपालोभ वाटावा अशा, मी तोवर कधी कल्पनाही न केलेल्या एका अनोख्या अशा घटनेच्या पाऊलखुणांचे धागेदोरेसुध्दा या प्रकाशन समारंभाशीच जोडले जाणार आहेत आणि याचा मुख्य दुवा मी शांतपणे वाचण्यासाठी ऑफिसमधून घरी येताना सोबत आणलेल्या ‘त्या’ सर्क्युलर मधेच लपलेला आहे हे त्याक्षणी तरी मला जाणवलेलं नव्हतं एवढं खरं!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फोनवर पुणेरी उत्तरे…” ☆ श्री सुधीर करंदीकर

पुण्याच्या गमतीशीर पाट्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच.

नुकताच मला फोनवर ‘पुणेरी उत्तरे’ याचा छान अनुभव आला, तो शेअर करतोय.

पौड रोडला एक प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचे ऑफिस आहे. मेडिकल एक्सपेन्सेस करता या इथे मी इन्शुरन्स ची पॉलिसी घेतली आहे.

गेल्या आठवड्यात मला त्या ऑफिसमध्ये एक क्लेम नेऊन द्यायचा होता म्हणून आदल्या दिवशी मी दुपारी त्या ऑफिसला फोन केला –

तिकडे फोनवर मॅडम होत्या.

मी : मॅडम नमस्कार, सकाळी ऑफिस किती वाजता उघडतं

तिकडून मॅडम : सकाळी नऊ वाजता

आणि फोन बंद झाला.

विचार केला उद्या ऑफिस उघडतानाच तिथे पोहोचावं, गर्दी वाढायच्या आत क्लेम द्यावा आणि ऊन वाढायच्या आत घरी पोहोचावं.

दुसऱ्या दिवशी बरोबर नऊ वाजता मी ऑफिसच्या दाराशी पोहोचलो. तेवढ्यात म्हणजे नऊ वाजता एक मावशी तिथे आल्या, दाराचं कुलूप उघडलं, दार उघडं ठेवलं, आणि त्या आत गेल्या.

अगदी डॉट नऊ वाजता ऑफिस उघडत आहे, हे बघून मी खुश झालो. स्टाफ पैकी कोणीच येताना दिसत नव्हते.

मी विचार केला नऊ वाजता ऑफिस उघडणार म्हणजे स्टाफच्या लोकांना यायला पाच एक मिनिट उशीर होऊ शकतो. सव्वा नऊ झाले तरी कोणाचाच पत्ता नाही.

मग मी आतल्या मावशींना विचारलं –

मी : मावशी ऑफिस सुरू किती वाजता होतं

मावशी : मला माहिती नाही. मी रोज नऊ वाजता ऑफिस उघडते. स्वच्छता करते आणि ऑफिसचे वॉचमन आले की मी पुढच्या कामाला जाते. पुढचं काय होतं मला माहित नाही.

मी थोडा वेळ वाट बघितली आणि विचार केला, अजून थांबण्यात काही पॉईंट नाही, उद्या यावं.

दुपारी मी ऑफिसला फोन केला –

मी : मॅडम, ऑफिसचं टाइमिंग काय आहे.

मॅडम : ऑफिसचं टाइमिंग सकाळी साडेदहा ते पाच आहे

मी : अहो काल मी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही नऊ वाजता म्हणाला

मॅडम : हो बरोबर आहे. तुम्ही विचारलं होतं ऑफिस किती वाजता उघडतं. म्हणून मी नऊ म्हणाले. कारण आमच्या ऑफिसच्या मावशी रोज नऊ वाजता येऊन ऑफिस उघडतात. तुम्ही ऑफिसची वेळ विचारली असती तर मी साडे दहा ते पाच म्हटलं असतं.

आणि फोन बंद झाला.

मी (मनामध्ये) मॅडमचं म्हणणं बरोबर आहे. माझा प्रश्नच स्पष्ट नव्हता. विचार केला, क्लेम स्वीकारण्याची काही विशिष्ट वेळ आहे का? ते पण विचारून घ्यावं. म्हणजे पुन्हा एक फेरी वाया जायला नको.

मी पुन्हा फोन लावला.

मी : मॅडम मला असा असा क्लेम सबमिट करायचा आहे. त्याकरता काही विशिष्ट वेळ आहे का

मॅडम : हो क्लेम स्वीकारण्याची वेळ रोज दुपारी साडेतीन ते पाच अशी आहे.

मी : धन्यवाद

मॅडम : जय श्रीराम

मी पण जय श्रीराम म्हटले आणि फोन बंद झाला.

दुसऱ्या दिवशी मी सव्वा चार ला ऑफिसला पोहोचलो. तिथल्या मॅडम ना क्लेम दिला. आणि त्यांच्याशी बोलताना आवाजावरून लक्षात आलं, की फोनवर बोलणाऱ्या मॅडम त्या याच आहेत. त्यांच्या टेबल समोर कुणीच बाहेरचे कस्टमर नव्हते. म्हणून विचार केला दोन मिनिटं यांच्याशी बोलावं. ‘फोनवर जे विचारलं तेवढेच उत्तर’, या त्यांच्या स्टाईलचं मी कौतुक केलं, यावर त्यांनी त्यांचे दोन-तीन अनुभव सांगितले, मी पण माझे इतर ऑफिसमधले दोन अनुभव सांगितले आणि गप्पा वाढायला विषय मिळत गेले. त्यांना वाचनाची आवड आहे हे समजल्यावर मी माझ्या म्हैस, काही आहे का? , आणि हसती खेळती बायको, या पुस्तकांची थोडी जाहिरात केली. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर मला दिला (नाव सुचित्रा) आणि पुस्तकं कशी मागवायची ते कळवायला सांगितले. मधे एक चहा पण झाला. गप्पांमध्ये दोन मिनिटांचे पाच कधी वाजले समजलंच नाही. इतर लोक आवरा आवर करायला लागले होते. गप्पा थांबल्या. बाय बाय झाले आणि मी हसत हसत बाहेर पडलो…

(मंडळी प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते. शिकण्याची आपली सकारात्मक तयारी मात्र आवश्यक असते. ओळखी वाढतात, हा पण एक मोठा फायदा आहेच. माझ्या वाचकांच्या यादीमध्ये सुचित्राताई यांची वाढ झाली, हा मला बोनस)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मुन्नीची कथा…’ – लेखक : श्री दीपक कणगलेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मुन्नीची कथा…’ – लेखक : श्री दीपक कणगलेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

(नाव बदलले आहे.)

न्यायदेवतेच्या दरबारात न्यायाची चक्रे फार मंद गतीने फिरत असतात. भारतात तर ती कायम स्लो मोशनमधेच फिरतात. पोलीसखाते देखील त्यांच्यावरच्या भ्रष्टाचार, कोठडीतील मृत्यू आणि खोटे साक्षीदार अशा आरोपांमुळे मलीन झाले आहे. या अशा पार्श्वभूमीवर मुन्नीची ही कथा तुमच्या मनाला अस्वस्थ तर करेलच, पण त्याबरोबर कुठेतरी थोडासा दिलासा पण देऊन जाईल.

चार डिसेंबर २०२५ ला सात वर्षाच्या मुन्नीचे, ती तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत असताना एका नराधम मानवी राक्षसाने अपहरण केले, तिला निर्जन स्थळी नेऊन लोखंडाच्या कांबीने निर्घृणपणे मारहाण केली आणि त्या कोवळ्या जिवावर बलात्कार केला. गुन्हेगाराचा शोध लावण्यासाठी मुन्नीची साक्ष घेणे महत्वाचे होते. पण तिच्यावर झालेला अत्याचार, त्यानंतरचे इस्पितळ आणि ऑपरेशन्स यामुळे झालेल्या शारिरीक आणि मानसिक इजेमुळे ती शॉकमधे गेली होती. तिचे बोलणे बंद झाले होते. कोणीही जवळ आले की थरथर कापत ती भयभीत होत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते. पोलिसांची खाकी वर्दी आणि वकीलांचा काळा डगला बघून ती आणखीनच विड्रॉलमधे जाऊ लागली.

असे सहा दिवस गेले. अपर पोलीस अधीक्षक ASP सिमरन भारद्वाज हिने यावर एक तोडगा काढला. तिने तिची खाकी वर्दी उतारून साधा पोषाख धारण केला. दररोज मुन्नीला भेटून तिच्याशी गुन्हा सोडून इतर अनेक विषयांवर गप्पाटप्पा केल्या. तिच्याबरोबर खेळ खेळली, तिचा चॉकलेटचा हट्ट पुरवला. काही दिवसातच मुन्नीची भीति आणि अबोला हळूहळू कमी होत गेला. ती अधेमधे बोलू लागली आणि एके दिवशी तिने सर्व घटनाक्रम सांगितला. आरोपीचे वर्णन केले, आपण त्याचे केस कसे ओढले, तेही सांगितले. पोलीसांनी लगेच घटनास्थळावरून ते केसही हस्तगत केले आणि या सर्व पुराव्याच्या आधारावर आरोपी _रामसिंग_ (वय ३२) याला अटक केली.

पण आता खरी अडथळा शर्यत तर पुढे होती. नवीन _भारतीय नागरिक सुरक्षा संहिता_ BNSS प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यासमोरची साक्षीदाराची साक्ष न्यायालयात ग्राह्य धरली जात नाही. (Section 183- Record of confessions & statements). त्यासाठी ती साक्ष _न्यायदंडाधिकाऱ्यासमोरच_ (Judicial Magistrate) व्हावी लागते. मुन्नीच्या डोळ्यासमोर परत जज्ज, काळे डगले, खाकी वर्दी आली असती, तर ती परत विड्रॉलमधे गेली असती.

या वेळी सिमरनने एक नवी युक्ती केली. तिने मुन्नीला सांगितले की आता आम्ही तुला एका छान शाळेत घालणार आहोत, आणि त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुला बोलावले आहे. सिमरनने तिच्या दोन महिला कॉन्स्टेबल साधे कपडे घालून तयार केले. त्यांनी मुन्नीला कारमधून फिरवले, शाळेसाठी तिच्या पसंतीचे शॉपिंग केले, स्कूल बॅग आणि वह्या, पुस्तकांची पण खरेदी झाली. एवढेच नव्हे तर शाळेला योग्य अशी केशरचना पण केली. मुन्नी आता खूष होती, शाळेत जायला उत्सुक होती.

साक्षीच्या ठरलेल्या दिवशी न्यायदंडाधिकारी मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शाळेत बसले. नवीन सर खूपच प्रेमळ, हसरे व रिलॅक्स दिसत होते. ते अधूनमधून जोक्स पण मारत होते. त्यांनी मुन्नीबरोबर बर्‍याच इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. तिला भूक लागली तेव्हा त्यानी चक्क शाळेच्या शिपायाला पाठवून तिच्या आवडीची पाणीपुरी मागवली. संध्याकाळ होता होता दंडाधिकाऱ्यांनी सर्व साक्ष रीतसर रेकॉर्ड केली. मुन्नी तर खूषच होती. तिला नवी शाळा खूप आवडली होती. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला!

मात्र अजून शेवटची एक बाजी मारणे बाकी होते आणि ते म्हणजे _ओळख परेड_! पोलीसांनी कोर्टाच्या परवानगीने एक _स्पेशल वीटनेस डिपोझिशन सेंटर_ स्थापन केले. परेड रूमला एकतर्फी काच (one way mirror) लावण्यात आली. पाच सहा गुंडासारखे दिसणारे चेहरे एकत्र बघून मुन्नी परत गप्प झाली असती. या धोक्याची शक्यता पत्करायला सिमरन तयार नव्हती. तिने रामसिंग आणि इतर इसमांना हातात खेळणी (stuffed toys) घेऊन उभे रहायची आज्ञा केली. मुन्नीने क्षणार्धात आरोपीला ओळखले!

खटला उभा राहिला आणि FIR दाखल केल्यापासून एक्केचाळीसाव्या दिवशी, १७ जानेवारी २०२६ ला (पाचच दिवसापूर्वी) कोर्टाने रामसिंगला अल्पवयीन बालिकेचे अपहरण, शारिरीक इजा व बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली!

लेखक : दीपक कणगलेकर

मो 9822281018

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वृद्धत्व एकटेपणा आणि निर्णय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वृद्धत्व एकटेपणा आणि निर्णय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

वृद्धाश्रम चालवणारा माझा एक मित्र सांगत होता, त्यांच्या वृद्धाश्रमात ९७ वर्षांच्या एक बाई आहेत. त्या़ंचा एकुलता एक मुलगा आणि सून दोघेही निवर्तले आहेत. एकुलता एक नातू त्याच्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये रहातोय. जेव्हा या बाईंच्या शेवटच्या घटका येतील तेव्हा त्यांच्या उपचारांच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना देण्यात यावे आणि त्या निर्णयाला नंतर कोणी आव्हान देऊ नये, अशी कायदेशीर तरतूद करणारे कागदपत्र तयार करण्यासाठी, त्याला त्यांनी आत्ता बोलावून घेतले आहे. तो सांगत होता, त्या कागदपत्रात नक्की काय लिहायचे, हे कोणालाच धड सांगता येत नाही. याविषयी काही विचारच केला गेलेला नाही.

आमचे शेजारी आहेत त्यांची मामी गेला महिनाभर हाॅस्पिटलमध्ये आहे. शेजाऱ्यांचे मामा मनमोहन सिंग रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर असताना त्यांचे P. A. नंतर The Times of India मध्ये editor finance वगैरे पदे भुषवलेले. मामी M. A. (English) Gold Medalist. अत्यंत सधन आणि मुलंबाळं नाहीत. मामा काही वर्षांपूर्वी अचानक गेले. आता मामी वय ८७+ शेवटच्या घटका मोजत आहे. ते सांगत होते, मामीला पैशाची काय विल्हेवाट लावली आहेस, असं विचारण्याचा आम्हाला धीर होत नसे. तिला वाटेल, आम्हाला काही इंटरेस्ट आहे. कदाचित तसंच तिच्या माहेरच्या लोकांना पण वाटत असेल. आता मामी सहीसुद्धा करू शकत नाही. कुठे काय इन्व्हेस्टमेंटस आहेत, बॅंक अकाऊंटस… कोणाला माहीत नाही. हे दोघे सत्तरीतले भाचे सगळी धावपळ आणि उपचारांचे पैसे खर्च करत आहेत.

त्या बाईच्या सोसायटीत कळलं तेव्हा शेजारचे लोक आले. त्यांना वेगळाच प्राॅब्लेम आहे. सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. या बाईने तिच्या फ्लॅटचं नाॅमिनेशन गेली तीस वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेल्या भाचीच्या नावाने केलं आहे. भाची म्हणते, मला त्यात काही इंटरेस्ट नाही.

हे सगळं चित्र किती भयानक आहे!

आत्ता आपल्या पिढीत मुलं परदेशी असणाऱ्यांना अशा समस्या आहेत. पण पुढच्या पिढीत माझ्या माहितीत देशात, परदेशी एकेकटी रहाणारी, लग्नाचं वय उलटून गेलेली असंख्य मुलंमुली, अत्यंत उच्चशिक्षित आणि मुलं होऊ न दिलेली जोडपी दिसायला लागली.

हा केवढा भयानक प्रश्न पुढच्या काळात उपस्थित होणार आहे!

मध्यंतरी माझ्या नवऱ्याला काही शेअर्स डिमॅट करायचे राहून गेले होते. त्या कामासाठी फंड मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जावं लागलं असताना तिथल्या माणसाने सांगितलं होतं, की हजारो कोटींचे शेअर्स पडून आहेत. काही वर्षांनी ते मूळ कंपनीच्या मालकीचे होतात, पण खूप व्याप करावा लागतो. पण ही गोष्ट नुसती पैशाची झाली. जिथे माणूस मृत्यूशय्येवर आहे आणि त्याच्या वतीने त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी कोणीच नाही, त्या माणसाचं काय करायचं हा केवढा मोठा प्रश्न नजिकच्या भविष्यात निर्माण होणार आहे!

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गणित… शिकवंण आणि शिकणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “गणित… शिकवंण आणि शिकणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

अभ्यासाला असलेला विषय शिकणं, आणि आपल्याला मिळणारी इतर शिकवण यात गोंधळ करून चालत नाही. गणितासारख्या विषयात तर मुळीच चालत नाही.

गणित शिकणं आणि मिळालेली इतर शिकवण यात फरक आहे. पण मी शिकवण गणितात वापरायचा प्रयत्न केला त्यामुळे सगळ गणितच बिघडलं. बिघडलं काय कोलमडून पडलं.

पडलेलं काही सहसा उचलायचं नाही. या शिकवणूकीत मी काय उचलायचं नाही याचा नेमका अर्थच लक्षात घेतला नाही आणि पडलेली बरीचशी गणितं मी तशीच राहू दिली. म्हणजे सोडवलीच नाही. आणि तिथूनच गणिताची शिकवणी सुरु झाली.

गणित सोडवायला काय लागतं? तर सूत्र

माहिती असाव लागत. पण या गणिताने आणि त्याच्या सुत्रांनी माझा गोंधळ कमी करण्याच्या ऐवजी वाढवला. कारण मी गणिताची सूत्र आणि शिकवण यांची आपसात सांगड घालत होतो.

एखादी गोष्ट दोन किंवा जास्त जणांत सारखी वाटायची तर भागाकार करावा. हे सूत्र. पण वाटणी करण्यावरून दोघांंच भांडण तिसऱ्याचा लाभ हे ऐकून होतो. दोन माकड, एक बोका, आणि खवा यांची गोष्ट माहीत होती. मग वाटणी कशाला हवी… वाटणीमुळेच जमीनीचे तुकडे पडले अशीही शिकवण होती. मग जास्त तुकडे करायचेच कशाला…

भेदभाव करायचा नाही ही शिकवण. पण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते असं गणितात सांगीतल. मग लहान मोठा हा भेद आलाच कि. याबरोबरच समता, समानता म्हणजे सगळे सारखे. यासारखे शब्द शिकवण या सदरात आले. आणि गणितात सम संख्या, विषम संख्या, मुळ संख्या, पूर्ण संख्या अशी संख्येतच भेेद जाणवला. परत मनाचा गोंधळ सुरु. अपुर्णांकाचा तर अजून विचारच केला नव्हता.

हा गोंधळ कमी होत नाही तो पर्यंत त्याच्यात भर पडली ती काळ, काम, आणि वेग या त्रिमूर्तींची. या गणितात किती काळ घालवला ते आठवत नाही. पण ते सोडवण्याच काम पूर्ण झालं नाही. कारण तेवढा वेगच नव्हता. याबाबतीत परत शिकवण लक्षात आली. काळ हे उत्तम औषध आहे. किंवा अति वेग संकटात नेई. त्यामुळेच मी काम, आणि वेगाला काही काळ काळावरच सोडलं.

नुसतं गणित होत तोपर्यंत ठिक होतं. पण पुढे बीजगणित नावाचा प्रकार आला. यात ठळक फरक काय, तर अंकगणित संख्या (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) यांचा अभ्यास करतं, तर बीजगणितात संख्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चिन्हे (चल) म्हणजे X, Y वापरतात. आणि अज्ञात मूल्ये शोधण्यासाठी संबंध आणि रचनांचा वापर करतात. बीजगणित हे अंकगणिताचेच एक विस्तारित रूप आहे, अज्ञात संख्यांचा अभ्यास करण्यासाठी अधिक सामान्यीकृत दृष्टिकोन वापरते.

झालं, इथे गणिताचच बीज नीट रुजल नाही, तिथे परत बीजगणिताच नविन बीज रुजवण्याचा प्रकार झाला. ज्ञात असलेल्या संख्यांचं गणित सोडवतांना गोंधळ तिथे अज्ञात संख्येच काय करणार… बीजगणितात गणिताच बीज असेल तर मग नुसत्या गणिताच काय होतं… असा गोंधळ गणिताच्या पायरी सारखा वाढत होता. पण गणित सुटत नव्हत.

येवढ्यावरच थांबेल असं वाटत असतांना या बरोबरच भूमिती नावाचा एक भाऊ पण आला. चौकोन, आयत, त्रिकोण या नावानं त्याने आपली भूजा पसरायला सुरुवात केली. यात परत समभूज, समद्वीभूज, विषमभूज अशा त्याच्या भूजा वेगवेगळ्या जाणवल्या. कोनाचा तर विचारच नव्हता. त्याला कोणत्या (दृष्टी)कोनातून बघाव लघुकोन, विशालकोन हाच प्रश्न होता. पुरक कोन मला मारकच वाटले. वर्तुळ, त्रिज्या, व्यास हे माझ्या परिघात आलेच नाहीत.

भूमीतीच्या बर्‍याच प्रश्नात क्षेत्रफळ काढा, घनफळ काढा असच विचारलं जायचं. आता त्रिकोणाच क्षेत्रफळ काढायचं तर सूत्र आलंच. 1/2 × पाया × उंची. आता जिथे पायाच भक्कम नाही, तिथे उंचीचा विचार कसा करणार, आणि केला तरी या 1/2 च काय करायचय…

इथेही परत शिकवण आली. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” याचा एक अर्थ फळांची अपेक्षा न ठेवता, अनासक्त भावनेने आपले नियत कर्म करत राहणे महत्त्वाचे आहे. हेच निष्काम कर्माचे तत्त्वज्ञान आहे असा आहे. म्हणजे कामकरतांना फळाची अपेक्षा ठेवायची नाही. पण या भूमीतीच्या बर्‍याच प्रश्नात क्षेत्रफळ काढा, घनफळ काढा असच विचारलं जायचं. परत गोंधळ फळाची अपेक्षा तर ठेवायची नाही. पण क्षेत्रफळ आणि घनफळ काढायचं. हा प्रकार मला रणांगणात जाऊन शस्त्र न उचलण्यासारखा वाटला.

परत सगळ्याची क्षेत्रफळ काढायची सूत्र वेगळी. शेवटी मी अशा गणिताबद्दल काय करायचय हे ठरवायचं सरांच्या हाती सोपवलं. थोडक्यात सगळी सूत्र त्यांच्याकडे सोपवली. आणि थोडी सुसूत्रता आणायचा प्रयत्न केला.

गणित, बीजगणित, भूमिती हे मला कलम केलेल्या रोपासारख वाटल.

थोडक्यात काय शिकणं आणि शिकवंण यात गोंधळ करायचा नाही. शिकणं जर एक शास्त्र असेल तर शिकवंण हे कसं वागायच याचा मूलमंत्र आहे. कसं वागायचं ही शिकवण. यात नातेसंबंधातली गणितं सुटतात. तर आर्थिक पेच सोडवायला गणित कामाला येतं. यात गोंधळ केला तर गणित बिघडतं.  

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ६ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ६ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

पण, लक्षात कोण घेतो?

सामान्य मनुष्याला एक सवय असते. तो नेहमी आपल्या चुकांचे खापर फोडायला काहीतरी अथवा कोणीतरी निमित्त शोधत असतो… तो कधी परिस्थितीला दोष देईल, तर कधी एखाद्या व्यक्तीला दोष देईल तर कधी देवाला…

पण त्याला असे कधीही वाटतं नाही किंवा त्याच्याकडे मी चुकू शकतो हे मान्य करण्याचे धैर्य नसतं असे आपण म्हणू शकतो… माझा मुद्दा आपल्या लक्षात येत असेल…?

आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…

बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?

पोशाख संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?

आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला तसे आचरण करणे उचित आहे का? याचा विचारच नाही. आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, जिथे पंख्याची सोय करणे शक्य नाही, अशावेळी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…) वर वर्णन केलेले चित्र नजरेसमोर आणून पाहावं…

लग्नाच्या नावावर अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरण, आणि इतर अनावश्यक खर्च आणि दैनंदिन जीवन जगताना आपण करीत असलेले अंधानुकरणहे वेताळ नव्हेत?

यातून आपण बाहेर पडायला हवे.

पटतंय ना?

– लेख क्र. ६ 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक इर्जिक पुन्हा इर्जिक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ एक इर्जिक पुन्हा इर्जिक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

‘इर्जिक’—हा शब्द मराठी ग्रामीण जीवनाच्या मुळाशी रुजलेला. शहरी रसिक वाचकांसाठी तो प्रथमच गो. नि. दांडेकरांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ या अजरामर कादंबरीतून परिचित झाला.

इर्जिक ही केवळ एक शेतीपद्धत नव्हे, तर ती ग्रामीण समाजाची सामूहिक संवेदना होती. एखाद्या शेतकऱ्याकडे नांगरणी, काढणीसारखी कामे करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री, मनुष्यबळ किंवा भांडवल नसेल तेव्हा तो आपल्या स्वाभिमानाला मुरड घालून, अगतिकतेने गावकऱ्यांना हाक मारी. गावकरीही त्या हाकेला ‘ओ’ देत. कुणी मागे राहू नये, कुणी उपाशी पडू नये, या भावनेतून ते सारे मिळून त्याचे काम निःशुल्क उरकत. काम संपले की कृतज्ञतेपोटी यथाशक्ती मिष्टान्न वा सामिष भोजन देऊन श्रमपरिहार केला जाई. ह्यालाच ‘इर्जिक’ म्हणत.

शेकडो वर्षे चालत आलेली ही सहकारसंस्कृती आज मात्र काळाच्या प्रवाहात जवळजवळ लोप पावली आहे. इर्जिक मागणे किंवा करून घेणे, कोणत्याही स्वाभिमानी शेतकऱ्याला कमीपणाचे वाटे.

पवनाकाठचा धोंडी या कादंबरीचा नायक धोंडी, इर्जिक टाळण्यासाठी प्राणपणाने झुंज देतो. स्वाभिमान आणि परिस्थिती यांच्या संघर्षात अखेर त्याचा अंत होतो. धोंडी हा शतकभरापूर्वीच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी होता. आज मात्र शेतकरी बदललाय. पत्रकारांनी, राजकारण्यांनी त्याला ‘बळिराजा’ केलं आहे. त्याच्या अपेक्षा बदलल्या, शेतीकडे पाहण्याची दृष्टी बदलली—आणि माझीही.

यंदा मी माझ्या शेतात चक्क इर्जिक करतोय.

सहा एकरांचा हा भूखंड मी मुद्दाम वेगळा राखून ठेवलेला आहे. इथे केवळ पारंपरिक पद्धतीने पिके घेतो. गेली शंभर-सव्वाशे वर्षे जतन केलेली असंकरित बियाणी पेरली जातात. रासायनिक खते, कीटकनाशके यांना इथे प्रवेश नाही. पावसाचं पाणी आणि भूमीत साठलेली नैसर्गिक आर्द्रता, हाच आमचा आधार. खरीप आणि रब्बी, दोन्ही पिके याच तत्त्वावर घेतली जातात.

‘पुरंदर जलउपसा योजने’मुळे हा परिसर सुजलाम् झाला आहे. शेततळी, विंधनविहिरी, ओलिताखाली आलेली शेती यामुळे एकेकाळचा दुष्काळी प्रदेश आज पूर्ण बदललाय. कांदा, ऊस, फुलपिके, भाजीपाला, फळबागा यांकडे सर्वांचा कल आहे.

तरीही आम्ही पारंपरिक पिकांवर ठाम आहोत. जगाच्या दृष्टीने ही शेती मागास, आतबट्ट्याची वाटेल. पण आमच्यासाठी हा पर्यावरण रक्षणाचा, जीवनसाखळी अखंड ठेवण्याचा प्रयत्न आहे. तो कदाचित केविलवाणा, हास्यास्पदही असेल—हे आम्ही जाणतो. तरीही रेटून करतोय.

गावाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, बुलेट ट्रेन यांसारखे विशाल प्रकल्प येवू घातले आहेत. विकासाच्या या रेट्यापुढे आम्ही किती काळ तग धरू, हे काळच ठरवेल.

पोटऱ्यातून कणसं डोकावू लागली की रानपाखरांचे थवे त्यावर तुटून पडतात. आम्ही त्यांना हुसकावत नाही. हरणांचे कळप शेतात धुडगूस घालतात—त्यांनाही आडवत नाही. त्यांची पोटं तट्ट फुगल्यावर त्यांच्या मुखातून जे उरेल, तेवढ्यावरच आमचा अधिकार. सगळ्यांनीच ऊस, फुले, फळे पिकवली, तर तृणधान्यांवर जगणाऱ्या पाखरांनी काय खावं, कसं जगावं?

काळ बदलतो आहे. कदाचित अशी पारंपरिक शेती करण्याची ही अखेरची संधी असेल.

 

आज माघ वद्य चतुर्थी. पौर्णिमेच्या तीन कला जरी क्षीण झाल्या असल्या, तरी चांदण्याचा शीतल प्रकाश अजूनही शेतावर अलगद सांडतो आहे. अशाच चांदण्यारात्री ज्वारीची काढणी इर्जिकीतून करण्याचा आम्ही निर्धार केला.

सायंकाळी पुण्याहून निघून रात्री शेताच्या बांधावर पोहोचलो. ९. ५६ ला चंद्र उगवला—गुलाबी, केशरी छटांनी न्हालेला. एका सुहासिनीने निरांजनाने चंद्राला ओवाळले. बायांनी पदर खोचले, एकमेकींना कुंकू लावलं. तरुणांनी बाह्या सरसावल्या. ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर आसमंतात घुमला आणि काढणीला सुरुवात झाली.

चार तासांत उभं पीक धराशायी झालं! घामाच्या धारा, वाढता गारवा, थकलेली शरीरे—आणि तरीही चेहऱ्यावर समाधान.

रात्री तीन वाजता काम उरकलं. श्रमपरिहार पुढे ढकलला गेला. आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. रस्ता निर्मनुष्य होता. एक तरसांची जोडी रस्ता ओलांडताना क्षणभर थांबावं लागलं—निसर्गाने जणू नमस्कार स्वीकारला.

घरी पोहोचून जरा आडवा झालो डोळा लागता, पण स्वप्नात जेसीबी, बोअरवेल जिग, ट्रक, ट्रॅक्टर यांचे गगनभेदी आवाज, भेदरून पळून जाणारी पाखरं दिसू लागती, छाती धडधडू लागली—आणि डोळे टक्क उघडले.

मनात विचार चमकून गेला—आज आपण स्वतःसाठी इर्जिक केली, पण जर पुन्हा एकदा, गावासाठी, गावाच्या भविष्यासाठी इर्जिक करता आली तर?

चावडीवर उभं राहून गावक-यांना आवाहन करता आलं तर—

“बाबांनो, माझ्यासाठी नव्हे, साऱ्या गावासाठी इर्जिक करूया.

प्रत्येक शेताच्या बांधा-बांधावर, मोकळ्या जागांवर, माळणानांवर झाडं लावूया, प्रयत्नपूर्वक ती शिंपून, जगवूया… पाखरांसाठी, निसर्गासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. ”

हे शक्य आहे का?

हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल?

उत्तर काळ देईल!

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares