☆ पॅरालिम्पिक्स (Paralympics) क्या है ?☆ श्री मकरंद पिंपुटकर☆
सन २०१९. गोविंदगढ, तालुका जेवर, जिल्हा गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश.
… जन्मतःच एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असलेल्या प्रवीण कुमार ने गुगलवर एक प्रश्न टाकला – “पॅरालिम्पिक्स क्या है ?” क्षणार्धात उत्तर आलं – “दिव्यांग (अपंग) खेळाडूंसाठीचे ऑलिंपिक”. (दुसऱ्या महायुद्धात जखमी / अपंग झालेल्या सैनिकांसाठी १९४८ साली सुरू झालेल्या या स्पर्धा सुरू झाल्या होत्या.)
हा प्रश्न विचारला तेव्हा प्रवीण अवघ्या १६ वर्षांचा होता. खेळांची आवड होती, व्हॉलीबॉल खेळायचा तो, पण धावताना मात्र अधू पाय त्याला त्रास द्यायचा. उंच उडी मारणे मात्र सहजसुलभ वाटायचे.
२०१९ मधील त्या एका गूगल सर्चने सर्व काही बदलून टाकले.
प्रविण आता उंच उडीवर कसून मेहनत घेऊ लागला, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊ लागला. २०२० साली टोकियो, जपान इथे होणाऱ्या पॅरालिम्पिक्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करत होता.
टोकियोमध्ये तो पुरुषांच्या उंच उडी T६४ प्रकारात २. ०७ मीटरची उडी मारतो आणि रौप्यपदक घेऊनच बाहेर पडतो. (शारीरिक पंगुत्वाचे वेगवेगळे गट केले आहेत, त्यातील एकातरी पायामध्ये गुडघ्याखालून व्यंग असण्याचा गट T६४ आहे.) भारतात जल्लोष झाला, पण स्वतः प्रविण समाधानी नव्हता.
त्याने प्रशिक्षक डॉ. सत्यपाल सिंग यांना सांगितले, “पुढच्या वेळी सुवर्णपदक. ” प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात अडथळा पार करणाऱ्या त्या मुलासाठी रौप्यपदक पुरेसे नव्हते.
भारत सरकारने २०२१ साली अर्जुन पुरस्काराने प्रविणला गौरवले.
प्रशिक्षकांना दिलेल्या वचनाप्रमाणे, पुढच्या स्पर्धेत, २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रविणने आपल्या पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०२३ साली जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आणि आता पाळी होती २०२४ सालच्या पॅरिस पॅरालिम्पिक्सची.
६ सप्टेंबर २०२४. स्टेड डी फ्रान्स. पुरुषांची उंच उडी T६४ अंतिम फेरी.
… बार वर वर जात राहतो. १. ८९ मी. पार. १. ९३ मी. पार. १. ९७ मी. पार. २. ०१ मी. पार. २. ०३ मी. पार. २. ०६ मी. पार. सहा उड्या, प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात पार. अजिबात डगमगला नाही. दुसऱ्या संधीची गरजच नाही.
… आता बार २. ०८ मी. उंचीवर लावलेला, आशियाई विक्रम. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी. सुवर्णपदकाचा बार.
… प्रवीण वेगाने धावतो. आपल्या मजबूत पायावर जोर लावतो, झेप घेतो. एका क्षणासाठी तो पॅरिसच्या आकाशात तरंगत असतो, त्याच्या जर्सीवरील तिरंगा दिव्यांच्या प्रकाशात चमकत असतो. तो बारवरून कमान करून उडी मारतो आणि पलीकडे गादीवर उतरतो – सफाईदारपणे.
… आणि बार अजूनही तिथेच आहे – स्थिर.
एकच जल्लोष.
सुवर्णपदक. पॅरिस २०२४ मध्ये भारताचे सहावे सुवर्णपदक. प्रविणने अमेरिकेच्या डेरेक लोक्सिडेंटला २ सेंटिमीटरने हरवले. २०२० पॅरालिम्पिक्सचा इंग्लंडचा सुवर्णपदक विजेता जोनाथन पाचव्या क्रमांकावर फेकला गेलेला.
आणि वयाच्या २१ व्या वर्षी, प्रविण हा मरियाप्पन थंगवेलू यांच्यानंतर पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरलेला.
तो आपल्या प्रशिक्षकाला मिठी मारतो. आपल्या खांद्यावर ध्वज गुंडाळतो. ज्या मुलाने काही वर्षांपूर्वी गुगलवर पॅरालिम्पिक्स शोधले होते, त्याने नुकतेच जगाला हरवले होते.
उंबरठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो घराच्या मुख्य दाराच्या चौकटीला खालच्या बाजूला लावलेलं जाड उंच लाकूड. उंबरठ्याशिवाय घराला पूर्तता नसते, हा घराचा महत्वाचा भाग असतो.
माझ्या माहेरी घर मोठे होते. प्रत्येक खोलीला उंबरठा होता. पूर्वी अंगणात रांगोळी काढताना उंबरा धुऊन त्यावरही हळदी कुंकू घालून नमस्कार केला जायचा. उंबऱ्यावर गो पद्म, स्वस्तिक रांगोळी काढली जायची.
पूर्वीच्या काळी घर हेच स्त्रीचे विश्व होते. बाईने उंबरठा ओलांडून स्वकर्तुत्वाने काही करायचे म्हटले की तिला घरातून विरोध असायचा.
उंबरठा म्हणजे तिच्यासाठी लक्ष्मणरेषा. स्त्रिने घरातील लोकांच्या विरुद्ध उंबरठा ओलांडून बाहेर जाणे म्हणजे संस्काराची मर्यादा ओलांडली असे मानले जात असे.
नववधू घरात प्रवेश करताना उंबरठ्यावर ठेवलेले तांदळाचे माप ओलांडून मगच घरात प्रवेश करते. तिच्या दृष्टीने हा गृहप्रवेश खूप महत्त्वाच्या ठरतो.
धार्मिक दृष्टीने सुद्धा उंबरठा महत्त्वाचा मानला जातो. नरसिंह व लक्ष्मीचे स्थान त्या ठिकाणी असते. उंबरठा सहसा उंबराच्या झाडाच्या लाकडापासून बनवला जातो.
उंबरठा हा मर्यादेची जाणीव करून देतो. उंबरठ्याच्या आत सुरक्षतेची भावना असते. आपल्या संस्कृतीत उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर वास्तुशास्त्रानुसार उंबरठा नकारात्मक ऊर्जा रोखून धरतो.
हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा ही कल्पनाच इतिहास जमा झाली आहे. तिथे उंबरे नसतातच, अगदी असेल तर कडापयाची लांबडी पट्टी बसवून घेतात.
माझ्या मते घराला उंबरा असावा. उंबरा पायाला क्षणभर थांबवतो आणि पाय थांबले की मन ही क्षणभर जागे होते. तो सांगतो जणू आता घरात प्रवेश करतो आहेस, बाहेरचा राग, अहंकार, कटुता दाराबाहेर ठेव आणि घरात प्रवेश करताना प्रेम, आदर, संयम व विनम्रता घेऊन ये.
उंबरठा आपल्याला मर्यादा शिकवतो. बाहेर किती ही मोठ्या पदावर असलास तरी घरी येताना माणूस म्हणून घरात प्रवेश कर.
सद्गुरु वामनराव पै सांगतात “माणसाने कुठे थांबायचे हे माणसाला कळायला हवे” खरं पाहता उंबरा हेच शिकवतो. पती, पत्नी, आईवडील आणि मुले, सासू-सून, बहीण -भाऊ, आजी आजोबा व नातवंडे या प्रत्येक नात्यात उंबरा म्हणजे मर्यादा असतात. हा उंबरा ओलांडला गेला तर नाती बिघडतात आणि हा उंबरा जपला तर आपुलकी राहते, घरात शांतता नांदते.
थोडक्यात दाराचा उंबरा घराचे रक्षण करतो तर मनाचा उंबरा नात्याचे बंध जोडून ठेवतो.
सध्या चालू असलेले नवीन वाक्य.. रोज FM वर ऐकू येतय.
“धुन बदल के तो देखो”
म्हणजे “थोडा बदल करून तर बघा ” हे सांगणं आहे.
प्रत्येक जण वेगळा आहे. ते वेगळेपण त्याची ओळख आहे. प्रत्येकाची विचार करायची एक पद्धत असते. संस्कार वेगळे असतात. सवयी सर्वच वेगळं असतं. आणि त्या त्या प्रमाणे सर्व जण आपल आयुष्य जगत असतात. पण आपलं आयुष्य इतरांबरोबर ही जुडलेलं असतं. परिवार मित्र मैत्रिणी, शेजारी, समाजातील इतर लोक. सर्वांशी संबंध येतात आपले. तेंव्हा adjust करणे accept करणे avoid करणे या गोष्टी करणं आलच.
परिस्थिती प्रमाणे, काळाप्रमाणे वयोमानानुसार, थोडे थोडे बदल करणे गरजेचे असते. ते आपल्या फायद्याचेच असतात.
– – यालाच वेगळ्या शब्दांत “धुन बदल के तो देखो “असं म्हटलं आहे.
नवीन व जुन्या पिढीतील अंतर कमी करायला, दोघांनी थोडे बदल केले तर उत्तमच. दोन्ही पिढ्यांना त्याचा उपयोग होईल. सामंजस्य वाढेल. difference कमी होतील. सासू -सुनेचे नातं छान होईल. जून्या आणि नवीन पद्धती, विचारांचे, चालीरीतींचे right combination एका नवीन संस्कृती ला जन्म देईल. जी सर्वांना मान्य असेल.
प्रकृतीचे नियम बदलणे आपल्या हातात नाही. पण एक काम असही आहे, जे आपण करू शकतो. आणि ते करताना कोणाला विचारायचीही गरज नाही. आणि ते म्हणजे स्वतः ला बदलणे.
खरं तर खूप मोठे बदल करायची गरज नसतेच. छोटे -छोटे बदल करूनच खूप मोठा बदल झाल्याचे लक्षात येते. थोडे विचार बदलले. थोडी सहनशीलता वाढविली, दुर्लक्ष करायचे ठरवले, परिस्थिती ला मान्य केले. शांत रहायला शिकले. वादविवाद टाळायला शिकले. माघार घ्यायला शिकले कौतुक करायला शिकले. नवीन पिढी ला charge द्यायची वेळ आली आहे. हे समजलं. तर झाला की बदल. आणि तुम्ही ही बदललेली धुन ऐकुन तर बघा. किती आनंद देईल ती तुम्हाला.
अहो!! साधी घरात ” seating arrangement ” बदलली. दोन गुलाबाची फुले flowers pot मधे लावली, तरी आपल्या ला वेगळे पणा जाणवतो. व छान वाटत. “ज्याला नेहमी टीमचा मेंबर रहायचे असेल मग ती टीम “घरची ” किंवा”बाहेरची” कोणतीही असो तर धुन बदलत रहावी लागेल. “
तसं सध्याच्या परिस्थिती ने बदल घडवून आणलेला आहेच. हा जबरदस्तीने झालेला बदल आपण स्विकारलाच ना. म्हणजे बदल करणे शक्य आहे आपल्याला.
बदलत्या जगाबरोबर चालायचे असेल, तर बदलणे हे प्रत्येक क्षेत्रात गरजेचे आहे. हा “success” मंत्र आहे.
… काल रेडिओ वर ऐकलं. सासूबाई म्हणतायेत “यावर्षी अधिक महिन्याचे सौभाग्याचे वाण मी माझ्या लाडक्या सुनेला देणार आहे ” या सासुबाईंनी धुन बदलायचे ठरविले आहे. असं दिसतंय.
म्हणतात ना
” प्रत्येकाला खूष ठेवणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. पण सर्वांबरोबर खुष राहणे ही सोपी गोष्ट आहे. “
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
नाटककार रविंद्रनाथ (१)
वैश्विक काव्य जगतात मानाचं स्थान प्राप्त केलेल्या रविंद्रनाथांनी नाट्य जगताला लहान मोठ्या अशा जवळपास ५०-५५ उत्कृष्ट नाटकांनी समृद्ध केले आहे. परंतु दुर्दैवाने हे सत्य कुठेच अधोरेखित झालेलं नाही. त्यांच्या नाटकांमधील डाकघर, रक्त करबी, विसर्जन, राजा ही नाटके तसेच चित्रांगदा, श्यामा, नटीरपूजा, चंडालिका, ताशेर देश या नृत्यनाटिका जास्त चर्चिल्या गेल्या आहेत. पण त्यांची छोटी छोटी नाटकं, आपल्या वगनाट्य सदृश नाटिका, प्रहसनं, नाट्यछटा देखील समाजमनावर छाप सोडणाऱ्या आहेत. तसेच त्या थट्टा विनोदाच्या अंगानं सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय जीवनातील विसंगतीवरही प्रकाश टाकणाऱ्या आहेत. रविंद्रनाथांची नाटके कलात्मक सौंदर्याचा अनुभव देता देता सामाजिक प्रबोधनही करतात. त्यांच्या कवितांप्रमाणेच त्यांची नाटके देखील त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहेत. आत्ताच्या भाषेत आपण ज्यांना प्रायोगिक नाटके म्हणतो तशी प्रायोगिक नाटके देखील त्यांनी प्रायोगिकतेचं कसलेही अवडंबर न माजवता लिहिली, बसवली व प्रस्तुत केली.
परंतु त्या काळातली मेलोड्रॅमॅटिक नाटके बघण्याची सवय असलेल्या बंगाली प्रेक्षकांना रविंद्रनाथांच्या नाटकांतील तरलता, अस्फुट संघर्ष लक्षात येत नसल्यामुळे म्हणा किंवा धार्मिक, सामाजिक व्यंगावर भाष्य असल्यामुळे म्हणा रविंद्रनाथांना नाटककार म्हणून जे स्थान कलाजगतात मिळायला हवं होतं ते कांही मिळालं नाही. अर्थात टागोरांनीही हे मान्य केलं होतं. ते म्हणत, “मला नाटक लिहिता आलं नाही. एक मध्यवर्ती कल्पना घेऊन त्यावर नाटक तोलण्याची कला माझ्यात नाही. ” अर्थात त्यांच्या नाटकांकडे पाहिलं असता लक्षात येतं की, हा त्यांचा विनय होता. त्यांच्या मधला कवी त्यांच्या नाटकांतही डोकावतो, हे मात्र खरे आहे. त्यांची कांही नाटकं तर गद्य काव्य असल्यासारखी वाटतात.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ नाटकाचं बंगालीत भाषांतर केलं होतं. त्या काळात इंग्रजी नाटकांच्या अनुकरणाचं वारं होतं. त्यामुळे पारंपरिक बंगाली नाट्यकला व नवदरबारी लोकांची नाट्यकला यात मोठं अंतर आलं होतं. रविंद्रनाथांनी लोकरंगमंचातली शक्ती ओळखून, त्यावर आपले संस्कार करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. नाटकाविषयी त्यांच्या मनात कोणतेही व्यावसायिक विचार नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही नाटक कंपनीसाठी नाटक लिहिले नाही.
(अपूर्ण–पुढील भागात)
—–
☆ गीत : ७६ ☆
DAY after DAY, O lord of my life, shall I stand before thee face to face? With folded
hands, O lord of all worlds, shall I stand before thee face to face?
Under thy great sky in solitude and silence, with humble heart shall I stand before thee
face to face?
In this laborious world of thine, tumultuous with toil and with struggle, among hurrying crowds shall I stand before thee face to face?
And when my work shall be done in this world, O King of kings, alone and speechless shall I stand before thee face to face?
I KNOW thee as my God and stand apart ⎯ I do not know thee as my own and come
closer. I know thee as my father and bow before thy feet ⎯ I do not grasp thy hand as
my friend’s.
I stand not where thou comest down and ownest thyself as mine, there to clasp thee to
my heart and take thee as my comrade.
Thou art the Brother amongst my brothers, but I heed them not, I divide not my earnings
with them, thus sharing my all with thee.
In pleasure and in pain I stand not by the side of men, and thus stand by thee. I shrink to give up my life, and thus do not plunge into the great waters of life.
महाराष्ट्रातील सर्व शाळांतून ‘हिंद की चादर’ नावाचा उपक्रम सुरु आहे. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ बलिदान दिलेले सिख गुरु श्री तेग बहादूरजी यांच्या स्मरणार्थ अनेक उपक्रम केले जात आहेत. या इतिहासाची विद्यार्थ्यांना शालेय वयातच ओळख व्हावी यादृष्टीने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित निबंध, गीतगायन, चित्रकला अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
गुरु श्री तेग बहादूरजी
प्रसिद्ध पंजाबी गायक श्री. सतिंदर सरताज यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या पराक्रम आणि बलिदानाची कहाणी अगदी मोजक्या शब्दांत अतिशय प्रभावीरीत्या गाण्याच्या विडीओच्या माध्यमातून मांडली आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे गीत ऐकवण्यात येत आहे. इतरांनीही हा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, असे वाटते!
शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोबिंद सिंग यांच्या पोटी श्री त्यागमल यांचा १ एप्रिल, १६२१ रोजी अमृतसर येथे जन्म झाला. त्यांच्या मातोश्रींचे माता नानकी असे होते. मुघल सेनेविरोधात करतारपूर येथे झालेल्या लढाईत केवळ तेरा वर्षांचे वय असलेल्या त्यागमल यांनी मोठे शौर्य गाजवले. या पराक्रमामुळे त्यांचे नाव तेग बहादूर असे ठेवण्यात आले. तेग म्हणजे तलवारीची धार, तेज. आठवे गुरु म्हणून श्री हरीरायजी गादीवर असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत शिखांचे नववे गुरु बाबा बकाला गावात वास्तव्यास असून त्यांचा शोध घ्यावा, असे सुचवले.
त्यानुसार बाबा बकाला गावात अनुयायांनी मोठा शोध घेतला. स्वत:ला गुरु म्हणवून घेणारे अनेक लोक त्या गावात निघाले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
त्याच दरम्यान माखन शा लुबाना नावाचा एक व्यापारीही गुरुंच्या शोधात बाबा बकाला गावात येऊन पोहोचला. या व्यापाऱ्याचे जहाज समुद्रात अचानक आलेल्या वादळात बुडणार होते. त्याने मनोमन गुरुंची प्रार्थना केली होती. माझे प्राण वाचले तर मी गुरुंना पाचशे सुवर्णमुद्रा भेट म्हणून देईन, असे त्याने ठरवले होते. परंतू एवढ्या मोठ्या संख्येने स्वत:ला गुरु म्हणवणारे लोक पाहून त्याच्यापुढे खरे गुरु कोण? हा पेच उभा राहिला. पण बुद्धीमान असलेल्या या व्यापा-याने एक युक्ती केली. तो प्रत्येक तथाकथित गुरुंकडे गेला. आपण माझे प्राण वाचवलेत, त्याबद्दल मी तुम्हांला दोन सुवर्णमुद्रा भेट देऊ इच्छितो असं म्हणत त्याने त्या गुरुंना दोन दोन सुवर्णमुद्रा देऊ केल्या. आणि त्या सर्वांनी त्या स्वीकारल्या!
– —- व्यापारी निराश झाला. पण इतक्यात त्याला कुणीतरी तेग बहादूर यांचेकडे जाण्यास सुचवले. गुरुंच्या समोर दोन सुवर्णमोहरा ठेवताच गुरु तेग बहादूर म्हणाले… यात ४९८ सुवर्णमुद्रा कमी आहेत! समुद्रात जहाज बुडत असताना गुरुंना व्यापा-याने पाचशे सुवर्णमुद्रा देण्याचा नवस मनातल्या मनात केला होता… त्यामुळे कुणालाही सुवर्णमुद्रांची पाचशे ही संख्या माहीत असणे अशक्य होते. हे सामर्थ्य केवळ सिद्ध पुरुषांच्या अंगीच असू शकते, हे व्यापा-याने ओळखले… त्याचा गुरु शोध तेग बहादूर यांच्यापाशी थांबला! त्याने घराबाहेर धाव घेतली आणि आनंदातिशयाने ओरडून लोकांना सांगितले… गुरु सापडले! तेंव्हापासून शिखांचे नववे गुरु म्हणून श्री तेग बहादूरजी यांचे नाव प्रसिद्धीस आले. त्यांनी माता नानकी यांच्या नावाने एक नवीन नगर वसवले. जे पुढील काळात आनंदपूर म्हणून प्रसिद्ध झाले.
काश्मिरातील हिंदू पंडित समुदायाने इस्लाम धर्माचा स्विकार करण्याची सक्ती औरंगजेबाने केली. अन्यथा वाईट परिणामास तयार रहा असा इशाराही दिला. त्यामुळे घाबरून गेलेल्या पंडितांनी मदतीसाठी गुरु तेग बहादूर यांचेकडे धाव घेतली. हिंदू समुदायाने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शीख समुदायाकडे साहाय्य मागणे ही विशेष बाब होती. श्रीगुरू तेग बहादूर यांनी आपल्या अनुयायांना घेऊन दिल्लीकडे कूच केले.
त्यावेळच्या मुघल बादशाह औरंगजेबाची भेट घेऊन काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी सशस्त्र संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी होती. औरंगजेबाने गुरु तेग बहादूर आणि त्यांच्या अनेक अनुयायांना आग्रा येथेच कैद केली. मग दिल्लीत आणून त्यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर अमानुष अत्याचार केले. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यास अभय देण्याचे आमिषही दाखवले. पण धर्मवीर श्री गुरु तेग बहादूर यांनी स्पष्ट नकार दिल्यावर आधी त्यांचे अनुयायी भाई मतीदासजी, भाई सतीदासजी, भाई दयालाजी यांचे शस्त्राने कापून, आगीत जाळून आणि अशाच अत्यंत क्रूर पद्धतीने प्राण घेतले. तरीही कुणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही. शेवटी गुरु तेग बहादूर यांचा औरंगजेबने जाहीर शिरच्छेद करवला.
– – – या सर्वांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची कुणाची हिंमत नव्हती. तेवढ्यात त्या जागी एक मोठे वादळ उठले… धूळ उठली. गुरुजींचे अनुयायी जैता जी यांनी गुरुंचे मस्तक तिथून पळवले व ते आनंदपूर येथे पोहोचले. गुरुंचे सुपुत्र गुरु गोबिंदसिंग यांनी या मस्तकावर तेथे अंत्यसंस्कार केले. इकडे गुरुंचे दुसरे अनुयायी बंजारा लखी शा यांनी गुरुजींचे धड स्वत:च्या घरी नेले. व मुघल सैनिकांच्या नजरा चुकवून घरातच त्यांचे अग्निसंस्कार केले. त्यासाठी त्यांनी घरातच चिता रचली व घरच पेटवून दिले!
– – हिंदू समाजाच्या रक्षणासाठी शिख गुरुंनी अशाप्रकारे बलिदान दिले. या त्यांच्या कामगिरीमुळे गुरु तेग बहादूर यांना ‘ हिंद दी चादर ‘ अर्थात हिंदू धर्मावर घातले गेलेले संरक्षक वस्त्र, कवच अशी उपाधी दिली गेली.
… गुरु तेग बहादूर यांनी रचून ठेवलेल्या पायावरच पुढे गुरु गोबिंदसिंगजी यांनी खालसा अर्थात पवित्र लढाऊ गटाची स्थापना केली व पुढे मुघलांविरोधात सशस्त्र संघर्ष केला!
– वाहे गुरु:-अद्भूत परमात्मा.
– खालसा:- शुद्ध. फतेह:-विजय.
– जो बोले सो निहाल… जो कुणी शुद्ध मनाने म्हणेल की ईश्वर शाश्वत सत्य आहे.. सत श्री अकाल… तो सुखी, मुक्त होईल!
एखाद्या व्यक्तीला “मी कधीच चुकत नाही” किंवा “माझी विचारसरणीच अंतिम सत्य आहे” अशी ठाम खात्री वाटू लागते, तेव्हा ती केवळ त्याच्या मतांवर ठाम असते असे नसून, तिच्या संपूर्ण मानसिक रचनेत एक प्रकारचा बंदिस्तपणा निर्माण झालेला असतो. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अवस्था ‘cognitive rigidity’ म्हणजेच विचारांतील कठोरता दर्शवते. अशा व्यक्तीला नवीन माहिती, विरोधी मत किंवा आत्मपरीक्षण स्वीकारणे कठीण जाते, कारण त्यातून तिच्या ‘स्व’बद्दलच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. परिणामी, ती व्यक्ती एकाच विचाराच्या चौकटीत अडकून राहते आणि चकवा लागल्यासारखे त्याच प्रश्नाभोवती वारंवार फिरत राहते. हे वर्तन बाहेरून हट्टीपणासारखे दिसते, पण आतून ते असुरक्षिततेशी जोडलेले असते.
या प्रक्रियेमागे ‘confirmation bias’ ही एक महत्त्वाची मानसिक प्रवृत्ती कार्यरत असते. म्हणजे, माणूस आपले आधीचे मत बरोबर ठरवणारीच माहिती स्वीकारतो आणि विरोधी माहिती नाकारतो किंवा दुर्लक्ष करतो. त्यामुळे “मीच बरोबर आहे” ही भावना अधिकाधिक दृढ होत जाते. यात अहंकाराची जोड, व्यक्तीचे मत आणि तिची ओळख हे सगळे गुणावगुण एकरूप होतात. त्यामुळे मत चुकले आहे हे मान्य करणे म्हणजे स्वतःलाच कमी लेखणे, अशी भीती निर्माण होते. यामुळे व्यक्ती वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी आत्ममग्नतेत गुरफटते.
एखाद्या रुग्णाने “मला काहीच आजार झालेला नाही” असे ठरवले, तर तो निदान, तपासणी आणि उपचार या सगळ्यांपासून दूर राहतो. परिणामी आजार अधिक बळावतो. त्याचप्रमाणे, विचारांच्या पातळीवरही “मी चुकूच शकत नाही” ही धारणा व्यक्तीला आत्मसुधारणेपासून रोखते. ती स्वतःच्या विचारांकडे नव्या दृष्टीने पाहत नाही, त्यामुळे चुका सुधारण्याची संधीच नाकारली जाते. असे वास्तव नाकारणे, हा एक प्रकारचा मानसिक बचावात्मक प्रतिसाद असतो. याउलट, विवेकशीलता म्हणजे स्वतःच्या विचारांवरही प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणे ही बौद्धिक नम्रता प्रगतीसाठी अत्यावश्यक असते. माणूस चुकतो आणि आपणही चुकू शकतो, हे मान्य केल्यावरच तो नवीन शिकण्यास, बदल स्वीकारण्यास आणि अधिक व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यास तयार होतो. डोळ्यावरचा धुरकट चष्मा पुसण्याची तयारी असणे हीच खरी प्रगतीची सुरुवात असते.
अशा पार्श्वभूमीवर, “मीच बरोबर” या आत्ममग्नतेत अडकलेली व्यक्ती केवळ स्वतःच्या बौद्धिक विकासालाच अडथळा ठरत नाही, तर व्यापक सामाजिक संवादालाही बाधा आणते. कारण संवादाचा गाभा हा परस्परांचे ऐकण्याची तयारी, स्वतःच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची क्षमता आणि सत्याच्या शोधात लवचिक राहण्याच्या वृत्तीमध्ये असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मतांना अंतिम सत्य समजते, तेव्हा ती प्रत्यक्षात सत्याच्या शोधापासून दूर जात असते आणि स्वतःच्या विचारांच्या प्रतिध्वनीतच अडकून पडते. खरी विवेकशीलता ही अचूकतेच्या दाव्यात नसून, चुकण्याची शक्यता मान्य करण्याच्या प्रामाणिकपणात आणि त्या चुकांमधून स्वतःला सतत सुधारण्याच्या धडपडीत असते. म्हणूनच बौद्धिक प्रगतीचा मार्ग हा आत्ममग्नतेतून नव्हे, तर शंकांना सामोरे जाण्याच्या धैर्य आणि आत्मपरीक्षणाच्या सवयीमधूनच उलगडत जातो, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊ तेवढे बरे.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पण मी नाही दिलं तर..?” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
नमस्कार. मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो… त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या… एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात…
मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो…
मग त्या रुसून बसतात… मग मी त्यांना म्हातारे म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो…
ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार…?
गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते… डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते…
मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो तिचाही आणि माझाही…
मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते… !
– – हे मी रोजच गणित सांगितलं… असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं… (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो)
– दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो… !
अशीच एक आजी आहे.. ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने…
सुनेला आजी (सासू)अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही… बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही…
मग या आजीनं जगायचं कसं…?… म्हणून ती एका परिसरात भीक मारायला येते…
(राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत.. परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागते)
तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली…
.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच… ! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”… अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो…
… तेवढ्यात ही आजी पाठी मागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती…
आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष…
जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप… तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो… तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही…”
ती म्हणाली, “ माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…? “.. असं म्हणून ती तोंड पाडून निघाली… !
मला वाईट वाटलं, पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “ मी तुला खरच लांबचा वाटतो…???”
“ न्हाय रं बाळा तूच तर माझा मुलगा हायस… “ असं म्हणत तिने माझ्या डोक्यावरून हात ठेवून बोट कडाकडा मोडली…
– – युद्ध तिथंच संपलं…
मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “ म्हातारे सगळेच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत. ,.. ”
ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “ बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या… !!! “
“पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा…?”
… तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं… ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…???
मी त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं…
परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात.. यात खूप फरक आहे…
स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं…
काय म्हणू या दातृत्वाला…????
– – एरवी शे 200 किलो डोक्यावर अंगावर खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी…
… पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना… तिच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती…
बॅग उचलता उचलता ती म्हणाली, ‘ तू हे माझ्यासमोर खा… ‘ मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या… ती भरून पावली…
… देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो…
मला नेहमी असं वाटतं, देव देवी अल्ला ईश्वर येशु हे आता मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत.. माणूस, माणूसच आहे का हे पाहायला.. ,?
.. ही आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…?
… माहित नाही.. ,.
आजी समोर खाल्लेला एक घास… ! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली… कशी कोण जाणे…?
मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली… तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता… आजीही गालातल्या गालात हसत होती…
खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो…
… सहज मागं वळून पाहिलं… सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती…
नीलम माणगावे या लक्षवेधी साहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा, कविता, ललित, वैचारिक, माहितीपर, समीक्षणात्मक, संशोधनात्मक लेख, कादंबरी, संकीर्ण, बालसाहित्य इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केलय. आत्तापर्यंत त्यांची 69 पुस्तके प्रकाशित झालीत. केवळ ‘ विपुल ‘ एवढेच विशेषण त्यांच्या लेखनासाठी पुरेसे नाही. कारण त्यासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि त्यातील आशय यातील वेगळेपणामुळे त्यांचं लेखन ‘ लक्ष्यवेधी ‘ ही ठरत गेलं. त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकाला.. मग तो कविता संग्रह असो, कथासंग्रह असो, कादंबरी असो.. कुठला ना कुठला पुरस्कार मिळालेलाच आहे.
नुकताच त्यांना २००५ मधील कसदार बालवाङ्मयाच्या लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शांताबाई आणि बाबुराव शिरोळे’ पुरस्कार प्राप्त झाला. तूच आमचा हीरो, चिंगळी, आक्कुबाईचं तळं यासारखे त्यांचे कथासंग्रह मुलांना खूप आवडतील, असे आहेत. त्याशिवाय, बिलोरी कवडसे, आणि माठ हसला, पळ सोने पळ यासारखे त्यांचे ५ विज्ञान कथासंग्रह आहेत. बालवाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणजे ‘गाथा उत्क्रांतीची’.. हे सचित्र दीर्घ काव्य आहे. तिची प्रयोगशील वृत्ती यातून दिसून येते. याशिवाय, ‘परीराणी आणि छान छान गाणी’, ‘अंगणगाणी आणि रिंगण गाणी’, ‘गड्डम् गड्डम् गाणम् बडबडम्’ यासखे अनेक कविता संग्रह त्यांचे मुलांना आवडतील असे आहेत. नीलमताई शाळाशाळातून आणि वेगवेगळ्या संमेलनातून कथाकथन आणि कवितावाचन करतात म्हणजे आणि थेट मुलांशी संवाद साधतात.
नीलमताईंच्या साहित्याचा अभ्यासक्रमात, पाठयक्रमातही समावेश झालेला आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड इ. ५वी (लोअर मराठी) ‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेचा समावेश. याच कवितेचा कर्नाटक राज्यच्या ८ वीच्या पाठ्यपुस्तकात, (थर्ड लँग्वेज) समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूरच्या एम. ए. – भाग १ पार्ट १मध्ये ‘पळ सोने पळ’ या बालकथेचा अमावेश झाला आहे.
लवाङ्मयाच्या त्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा उल्लेख करायचा झाला तर, ‘डॉलीची धमाल’या कादंबरिकेचा उल्लेख करायला हवा. ‘डॉली समवयस्क मुलांशी खेळणारी एक मुलगी. सर्वांना ती हवीहवीशी वाटते. एकदा ती सर्वांचा निरोप घेते. कादंबरीच्या शेवटी रहस्य उलगडते. ‘डॉली हे मुळी मुलगीच नसते. ती असते रोबोट॰ आता तिची बॅटरी संपत आलेली असते. नवीन तंत्रज्ञानाचा किती सुरेख वापर करून घेतला आहे इथे. या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
म. सा. प. चा नीलमताईंना मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. त्यापूर्वी त्यांना एकंदर कविता लेखनासाठी ‘ना. घ. देशपांडे’ पुरस्कार मिळाला होता.
विषय-वैविध्याबरोबर आशयातील वेगळेपणा, नाविन्य, कल्पकता, प्रयोगशीलता ही त्यांच्या कवितांची काही ठळक वैशिट्ये सांगता येतील. त्यांच्या ‘खचू लागली भुई ‘ या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘पैंजण’ ही नीलमताईंची अतिशय गाजलेली कविता. कविता चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे…
… आजी जड, वजनदार पैंजण घालून आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.
… आईने जड, वजनदार पैंजण वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.
… तिसर्या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ हे सगळं सहन केलं.
… आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊ देत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी… ’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.
– – स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी ’ असं म्हणणारी माझी मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.
– – ही कविता मुक्तछंदात आहे. प्रत्येक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची… ’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, ’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको… ’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले, नव्हे. तसं नव्हेच ! आपोआप लेखणीतून उतरत गेले असणार.
… २०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे… महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भारतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.
नीलमताईंचं, ‘जसं घडलं तसं’ हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. च्या भाग १ साठी पाठ्यपुस्तक म्हणून लावण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कवितांवर एक प्राध्यापक एम. फील. करत आहेत. तर, दुसरे प्राध्यापक त्यांच्या एकूण कथांवर एम. फील. करत आहेत.
नीलमताईंच्या अनेक कवितांना प्रयोगशीलतेचा स्पर्श आहे. उदा. सरोगेट मदरवरील कविता ‘भांडवली ज्ञान’,
– – पण तिची अलीकडे प्रकाशीत झालेली ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ आणि ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ ही दोन पुस्तके म्हणजे तिच्या प्रयोगशीलतेचा आगळा-वेगळा आविष्कार म्हणावी लागतील. मुक्तछंदात लिहिलेले काव्यात्म संवाद यात आहेत. ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ मध्ये बापूजी आणि त्यांचा चरखा यातील काव्यात्म संवाद आहे. तर, ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बोधीवृक्ष यांच्यातील संवाद आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती याच्या अनुषंगाने हे संवाद आहेत. संवादांच्या विषयात साम्य आहे, पण दोन्हीतील आशय वेगवेगळा आहे.
लेखिकेच्या प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण सांगायचं, तर तिने ‘खेळखंडोबा’ नावाची एक लघु कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत तिने हत्तींच्या माध्यमातून अनेक महत्वाचे प्रश्न, विशेषत: धर्माबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेत.
नीलमताईंच्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ‘निर्भया अजून लढते आहे. ’ हा त्यांचा दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहातील सर्वच कथांचे ‘बलात्कार’ हे सूत्र आहे. यात बलात्काराचे वर्णन कुठेच नाही. त्यामागची कारणमीमांसा, मानसिकता, तशी मानसिकता निर्माण होण्यामागची विशिष्ट परिस्थिती याचे दर्शन या कथांमधून लेखिकेने घडवले आहे. वृत्तपत्रातून आपण बलात्काराच्या बातम्या वाचतो, टी. व्ही. वरून ऐकतो. क्षणभर हळहळतो. मग सोडून देतो. लेखिकेने ती बीजे आपले विचार, मनन-चिंतन यांचे खत-पाणी घालून जोपासली. आपल्या कल्पक रचना कौशल्याच्या निगराणीने, त्यातून सशक्त झाडे निर्माण केली. जोपासली.
– या संग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.
नीलमताई एक प्रतिभासंपन्न, यशस्वी लेखिका आहेत, तशाच त्या बंडखोरही आहेत. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांवर त्यांचा विश्वास आणि निष्ठा आहे. त्यांची जिथे पायमल्ली होताना दिसते, तिथे त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येते.
नीलमताई स्वत: जैन धर्मीय. तरीही जैन धर्मातील चुकीचे रीतिरिवाज, वा परंपरा, वाईट चाली-रीती, काही अनुयायांचे बेताल वर्तन, भ्रष्टाचार यावर त्यांनी आपल्या लेखनातून टीका केली. ही त्यांची मोठीच बंडखोरी म्हणायला हवी… कधी लेखाच्या, कधी कवितेच्या, कधी कथेच्या माध्यमातून. उदा. ‘शांते तू जिंकलीस. ’ ही कथा. इथे शांता मंदिरासाठी पट्टी द्यायला नकार देते. म्हणून गाव तिच्यावर बहिष्कार टाकतो. तिला वाळीत टाकतो. पुढे तिच्या मुलाचा मृत्यू होतो. त्याचे अंत्यसंस्कार करायला कुणीच येत नाही. तेव्हा ती आणि तिची सासू चादरीची झोळी करून त्यातून त्याला स्मशानाकडे नेऊ लागतात. नंतर ते पाहून हळूहळू गाव त्यात सामील होतो. – – याच शीर्षकाच्या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.
नीलमताईंच्या या धर्मावर टीका करणार्या लेखनाने समाजातील अनेकांची अस्मिता दुखावली. आपल्याच धर्माविरुद्ध ती असं कसं लिहू शकते? समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी तिने यापुढे असं लेखन करायचे थांबवावे, असा तिला समज दिला. इतकेच नाही, तर असं काही यापुढे लिहिलं, तर तुमच्या घरावर आम्ही दगडफेक करू, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. पण त्या आपल्या जागी अढळ राहिल्या. जे मनाला पटेल, योग्य वाटेल, ते अव्याहतपणे लिहीत गेल्या. या सर्व प्रकरणात त्यांचे जोडीदार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुळात ते स्वत: अं. नि. स. चे कार्यकर्ते. वैचारिकदृष्ट्या ते त्यांच्याशी सहमत होते.
नीलमताईंच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष नित्यश: बहरत, फुलत, दरवळत राहोत. त्याने वाचकांना आनंद मिळो. त्यांचे भोवतालचे भान जागृत करो, संवेदनशीलता निर्माण करो… या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
☆ अनारसा शिळा का मानत नाहीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
अनारसा शिळा का मानत नाहीत?
— परंपरा आणि Food Science
अधिक महिन्यात अनारसाचे दान करण्याची जुनी परंपरा आहे.
शास्त्रात अनारसाला “अपूप” म्हटले जाते आणि विशेष म्हणजे —
अनारसा हा शिळा मानला जात नाही!
पूर्वीच्या लोकांनी हे फक्त श्रद्धेपोटी सांगितले नव्हते… त्यामागे खूप सुंदर Food Science दडलं आहे.
साधारण भात, पोळी, भाजी यामध्ये moisture जास्त असतो. त्यामुळे त्यामध्ये सूक्ष्मजंतू लवकर वाढतात आणि अन्न लवकर खराब होते.
– – पण अनारसा वेगळा आहे..
१) Deep Frying Science
अनारसा तुपात / तेलात व्यवस्थित तळला जातो.
तळताना : त्यातील बराच moisture कमी होतो. बाहेरचा भाग crisp होतो. high temperature मुळे बरेच microorganisms नष्ट होतात, म्हणून तो जास्त टिकतो.
२) गूळ आणि साखरेची कमाल
अनारसामध्ये गूळ आणि साखर भरपूर असते.
हे दोन्ही :
✔️ नैसर्गिक preservative सारखे काम करतात
✔️ moisture bind करून ठेवतात
✔️ खराब होण्याची प्रक्रिया मंदावतात
म्हणून अनारसा पटकन आंबत नाही.
३) Fermentation चा फायदा
अनारसाचे पीठ मुरवले जाते. या fermentation मुळे texture सुधारते, shelf life वाढते, पचनास मदत होते… पूर्वी refrigerator नसतानाही लोकांना अनुभवाने हे माहिती होते.
४) Low Moisture = जास्त टिकाऊ
अनारसामध्ये पाणी फार कमी उरते.
Food Science मध्ये एक नियम आहे —“जितका कमी moisture तितके अन्न जास्त टिकते. ”
म्हणूनच चिवडा, शेव, पापड, अनारसा
हे पदार्थ जास्त दिवस टिकतात.
५) म्हणूनच दानासाठी योग्य
पूर्वी प्रवास, दानधर्म, व्रतवैकल्य यासाठी टिकणारे पदार्थ महत्वाचे होते.
– – अनारसा : पौष्टिक, टिकाऊ पोटभर ऊर्जा देणारा आहे.
म्हणून अधिक महिन्यात “अपूप दान” करण्याची परंपरा निर्माण झाली.
खरंतर आपल्या जुन्या पदार्थांमध्ये फक्त चव नाही तर अनुभव, ऋतुचक्र, आरोग्य आणि अप्रतिम Food Science दडलेले आहे.
आज विज्ञान जे सांगतंय…ते आपल्या आजीला अनुभवाने आधीपासून माहिती होतं
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈