मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ CPR…अर्धवट ज्ञान धोक्याचे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

CPR…अर्धवट ज्ञान धोक्याचे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

दुस-याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे, हे नेहमीच कौतुकास्पद आहे. परंतु अर्धवट वैद्यकीय ज्ञान, गैरसमज यांमुळे एखाद्या व्यक्तीची जीव वाचवला जाण्याची शक्यता बरीच कमी होऊ शकते!

आपल्याकडे अपघातात सापडलेल्या व्यक्तीला पाणी पाजण्याची रीत आहे. आणि अशा व्यक्तीला यावेळी पाणी पिण्याची प्रचंड इच्छा होते, हेही खरे आहे. या व्यक्तीला जर मांडीवर घेतले तर हनुवटी त्याच्या गळयाच्या खाली टेकते आणि त्यामुळे त्याचा श्वासमार्ग काहीसा अवरुद्ध होतो…अशावेळी त्याला पाणी पाजले तर ते पाणी पोटात न जाता फुप्फुसात जाण्याची आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याची खूप शक्यता असते. यामुळे त्या व्यक्तीला उपायापेक्षा अपायच होऊ शकतो. 

हल्ली हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. आणि कधीही, कुणालाही, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी याला सामोरे जावे लागू शकते. हृदयविकाराच्या झटक्याचे एकापेक्षा अधिक प्रकार असतात. Heart Attack आणि Cardiac Arrest यांमध्ये फरक असतो. 

Heart Attack (Myocardial Infarction): A plumbing problem where blood flow to a part of the heart muscle is blocked. The person is usually conscious, breathing, and has a pulse. CPR is not performed in this state.:- हृदयाच्या स्नायूंना होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये काही अडथळा येतो. असा रुग्ण सर्वसाधारणपणे शुद्धीवर असतो, श्वास सुरु असतो, त्याच्या श्वासांची नाडी लागते. या प्रकारात सीपीआर दिला जात नाही.

Cardiac Arrest: An electrical problem where the heart abruptly stops beating and pumping blood. The person loses consciousness, stops breathing normally (or only gasps), and has no pulse. This is when CPR is required.:- या प्रकारात हृदयाचे काम अचानकपणे थांबते आणि रक्त आत घेण्याची आणि बाहेर टाकण्याची प्रक्रिया थंडावते. रुग्ण बेशुद्ध होतो, नियमित श्वास घेत नाही, दीर्घ उसासे टाकतो आणि त्याची श्वासाची नाडी लागत नाही. या प्रकारात cpr दिला जातो. 

गरज नसताना cpr दिला जात असताना, cpr देणारी व्यक्ती प्रशिक्षित नसल्याने एका महिलेच्या बरगड्या मोडल्याचा प्रकार नुकताच घडला, त्याची बातमी आपण वाचली असेलच! यात cpr देणा-याचा हेतू चांगलाच होता…मात्र परिणाम चुकीचा झाला!

वरील माहिती इंटरनेटवरून घेतली असून त्याचे स्वैर भाषांतर केले आहे. आणि हे १०० टक्के बरोबर असेल, असे अजिबात नाही. मात्र सर्वसामान्य माहिती द्यावी, म्हणून दिली आहे. 

मुख्य मुद्दा हाच आहे की, cpr अर्थात cardiopulmonary resuscitation (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन) कसे द्यावे. भारतातील केवळ २ टक्के लोकांना याचे प्रशिक्षण मिळालेले आहे!

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. ते प्रत्येकाने एकदा तरी नजरेखालून घालावे! मोठी माणसे आणि लहान मुले यांना cpr द्यायचा झाल्यास स्वतंत्र सूचना आहेत!

आणखी एक गोष्ट, cpr देताना छातीवर दाब द्यावाच लागतो, या दाबामुळे रुग्णाच्या बरगड्या तुटू शकतात! आणि वयस्कर व्यक्ती ज्यांचे हाडे वयोमानामुळे ठिसूळ झालेली आहेत तसेच लहान मुले यांच्यात हे प्रमाण अधिक होऊ शकते. काही अज्ञानी लोक डॉक्टरांनी जोरात cpr दिला आणि त्यामुळे रुग्णाची हाडे तुटली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला…असे समजतात! याला काही अर्थ नाही. उलट जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करीत असताना बरगड्या मोडल्या तरी cpr थांबवून चालत नाही..अन्यथा रुग्णाची वाचवले जाण्याची शक्यता संपून जाऊ शकते!

 शासनाने प्रसिद्ध केलेली cpr देण्याची पद्धत सांगणारी pdf इंटरनेट वर उपलब्ध आहे. मी whatsapp वर पाठवू शकतो.

 अधिकृत माहितीसाठी प्रत्येकाने शासकीय अधिकृत लेखी साहित्य पहावे. या लेखावर विसंबून राहू नये, ही नम्र विनंती.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्णाचं गुप्तदान… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्णाचं गुप्तदान…  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

अर्जुन एकदा श्रीकृष्णाला विचारता होतो – “कृष्णा, कर्णाप्रमाणेच मीसुद्धा खूप दान करतो, मग लोकं कर्णाचेच दानशूर म्हणून का गोडवे गातात? “

कृष्ण अर्जुनाला एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावात घेऊन जातो. कृष्ण आपल्या मंत्रशक्तीने त्या टेकडीचे सोन्याच्या ढीगात रूपांतर करतो आणि अर्जुनाला सांगतो, “हे सोनं या गावातल्यांना वाटून टाक.”

अर्जुन गावात दवंडी पिटवतो व दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्वांना सोन्याचं दान स्वीकारायला बोलावतो. दिवसभर अर्जुन दान वाटतो आणि प्रश्नार्थक मुद्रेने कृष्णाकडे पाहतो.

कृष्ण काही उत्तर न देता कर्णाकडे जातो व त्यालाही एका टेकडीएवढ्या सोन्याचं दुसऱ्या एका गावात वाटप करायला सांगतो. हा निरोप मिळताक्षणी कर्ण त्या गावच्या मुखियाकडे जातो, व सांगतो की तुमच्या गावाच्या वेशीवर सोनं ठेवलं आहे, तुम्ही तुमच्या गावकऱ्यांत वाटून टाका.

निरोप दिल्यावर क्षणभरही न थांबता कर्ण तिथून निघून जातो. अर्जुन हे सर्व पहात असतो आणि ही निरपेक्ष वृत्ती बघून तो मनात खजिल होतो. कृष्ण त्याला सांगतो, “तू स्वत: उभा राहून दान वाटत होतास तेव्हा तुझ्या मनात सुक्ष्म अहंकार होता – हे दान *मी* देत आहे, *मी* गावकऱ्यांना मदत करत आहे, *माझं* कौतुक व्हावं. कर्णाचं तसं नाही. त्याच्या डाव्या हातानं दिलेलं दान उजव्या हाताला कळतही नाही, या त्याच्या प्रसिद्धीच्या मागे न धावण्यातच त्याचं श्रेष्ठत्व आहे.”

अर्जुनाला आणखी काही सांगायची गरज नव्हती.

— — — —

करोना काळातली ही कथा. गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील रांदेर गावाजवळील गोराट नावाचं छोटंसं खेडं! रेड झोनमधील करोना प्रभावित क्षेत्र. सकाळी दोन तास किराणा भाजीपाला विक्रीला परवानगी असण्याच्या वेळात एक छोटासा टेंपो खेड्याच्या बाजाराच्या जागी येऊन उभा राहिला. टेंपोच्या सर्व बाजूंच्या फलकावर – बॅनर्सवर “गरजूंसाठी प्रत्येकी एक किलो पीठाचं वाटप” असं लिहीलेलं.

ना लाऊडस्पीकर, ना गाजावाजा, ना फोटोग्राफरची फौज. टेंपोचा ड्रायव्हर गाडी थांबवून मागच्या बाजूला येऊन हातात एक किलो पीठाची पिशवी घेऊन उभा राहिलेला. तोही डोक्यावर टोपी घातलेला आणि मास्क वगैरे जामानिम्याने चेहरा जवळपास दिसतच नव्हता.

खरंच गरजू जे होते, ज्यांना एक किलो पीठाचीही महती होती असे पाच पन्नास जण येत गेले, तो ड्रायव्हर प्रत्येकाला एक एक किलो पीठाची पिशवी देत होता, अदबीने मनापासून नमस्कार करत होता, थोडे धीर देणारे दोन शब्द बोलत होता आणि मग रांगेतील पुढच्या माणसाकडे वळत होता.

— — — —

हनुमान मंदिराजवळच्या मासीने (मावशी) एक किलो पीठ घेतलं होतं. लॉकडाऊनमुळे तिचं टिकल्या बांगड्या विकण्याचं छोटेखानी दुकान गेला महिनाभर बंदच होतं. जवळची पुंजी संपत आलेली. थोडं उधार उसनवार करून कसंबसं ती चिल्ल्यापिल्यांना दोन घास खाऊ घालत होती.

आज असलेल्या तुटपुंज्या पैशातून तिनं थोडी भाजी, थोडे तांदुळ, थोडी डाळ घेतली होती. आज गव्हाचं पीठ मिळालं होतं, पोराबाळांना एक दोन दिवस तरी पोळी खायला मिळणार होती.

घरी आली, कणिक मळायला तिनं पीठाची पिशवी फोडली, पीठ काढताना पीठात एक प्लॅस्टिकची पिशवी तिच्या हाताला लागली. ती पिशवी तिनं झटकून उघडली, पाहिलं तर एक नोटांचं छोटं पुडकं त्या पिशवीत होतं. तिच्या छोट्या कुटुंबाची महिन्या दोन महिन्याची डाळ तांदुळाची सोय करेल इतके पैसे त्यात होते.

मासीने ते पीठ तसंच ठेवलं. कशीबशी दाराला बाहेरून कडी घातली आणि ती बाजारपेठेतल्या त्या टेंपोवाल्याला शोधायला; त्याला भेटायला; त्याचे आभार मानायला धावतच निघाली.

तास दोन तास वाटप करून, “इदं न मम” म्हणत, आपलं काम चालू ठेवण्यासाठी टेंपो जसा आला तसाच गुमनामपणे पुढच्या गावाला निघून गेला होता आणि बाजारपेठेत त्याच्याकडून पीठ घेतलेली मासी, रसिकाबेन, चंपककाका, अस्लम, राघाभाई, करसनकाका त्याला शोधत होते आणि तो गेला त्या वाटेकडे बघत हात जोडून नमस्कार करत त्याचे आभार मानत होते.

— — आजही गुप्तदान करणारे दानशूर कर्ण डाव्या हाताने दिलेलं दान उजव्या हाताला कळू देत नाहीयेत.

डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

🌸 विविधा 🌸

☆ “छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?☆ श्री जगदीश काबरे ☆

किंडलसारख्या वाचन ऍपचा, भ्रमणध्वनीचा, संगणकाचा आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा वाढता वापर पाहता माणसाच्या वाचनाच्या सवयींमध्ये मोठा बदल होत आहे, हे नाकारता येत नाही. पूर्वी पुस्तक वाचण्यासाठी छापील पुस्तक हातात घेणे अपरिहार्य होते; पण आज त्याच पुस्तकाचे इलेक्ट्रॉनिक रूप सहज उपलब्ध होते. एका छोट्याशा भ्रमणध्वनीत किंवा वाचनयंत्रात शेकडो, हजारो पुस्तके साठवता येतात. प्रवासात, प्रतीक्षेत किंवा घराबाहेर असतानाही वाचन करता येते. अक्षरांचा आकार बदलणे, प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करणे, शब्दाचा अर्थ तत्काळ शोधणे, पुस्तकातील एखादा उतारा शोधणे आणि वाचन जिथे थांबले तिथून पुढे सुरू करणे अशा सुविधा इलेक्ट्रॉनिक वाचनाला अधिक सोयीच्या बनवतात. त्यामुळे पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण निश्चितच वाढत जाण्याची शक्यता आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक वाचन वाढले म्हणजे छापील पुस्तके पूर्णपणे नष्ट होतील, या निष्कर्षावर उडी मारणे घाईचे ठरेल. करण इतिहासात प्रत्येक नवीन माध्यमाच्या आगमनावेळी जुन्या माध्यमाच्या अंताची भविष्यवाणी करण्यात आली होती; पण तसे काही घडले नाही. जसे की चित्रपट आल्यावर रंगभूमी संपेल असे मानले गेले, दूरदर्शन आल्यावर चित्रपटगृहे बंद पडतील असे वाटले, संगणक आल्यावर कागदाचा अंत होईल असे सांगितले गेले आणि भ्रमणध्वनी आल्यावर दूरध्वनीचे जुने प्रकार नाहीसे होतील असे मानले गेले. प्रत्यक्षात झाले असे की नवीन माध्यमांनी जुन्या माध्यमांचे स्वरूप, वापर आणि सामाजिक स्थान बदलले; त्यांना सर्वस्वी नष्ट केले नाही. पुस्तकाबाबतही अशीच प्रक्रिया घडण्याची शक्यता अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक पुस्तक छापील पुस्तकाची जागा काही क्षेत्रांत घेईल; परंतु छापील पुस्तकाचे अस्तित्व त्यामुळे संपेलच असे नाही. या मागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तक हे केवळ माहिती साठविण्याचे साधन नसून ती एक सांस्कृतिक वस्तू आहे. पुस्तकाच्या कागदाचा स्पर्श, त्याचा वास, मुखपृष्ठ, पान उलटण्याची क्रिया, पुस्तकावर केलेल्या खुणा, एखाद्या जुन्या पुस्तकातून मिळणारी आठवणींची अनुभूती आणि स्वतःचा पुस्तकसंग्रह असणे यांना इलेक्ट्रॉनिक पुस्तके पूर्णपणे पर्याय होऊ शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या पुस्तकाला काही विशिष्ट कारणांमुळे भावनिक मूल्य प्राप्त झालेले असते. मग ते पुस्तक केवळ मजकूर राहत नाही; ते एखाद्या काळाची, व्यक्तीची, विचाराची किंवा जीवनानुभवाची स्मृती बनते. त्यामुळे ज्ञानाच्या वापरासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम अधिक उपयुक्त ठरले, तरी पुस्तकाच्या सांस्कृतिक आणि भावनिक मूल्यामुळे छापील पुस्तक टिकून राहण्याची शक्यता मोठी आहे.

भ्रमणध्वनीवर वाचताना वाचक सतत इतर सूचनांच्या, संदेशांच्या, चित्रफितींच्या आणि सामाजिक माध्यमांच्या आकर्षणात असतो. त्यामुळे दीर्घकाळ एका विषयावर एकाग्र होऊन वाचण्याची क्षमता कमी होण्याचा धोका आहे. छापील पुस्तक वाचताना पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये इतर डिजिटल व्यत्यय तुलनेने कमी असतात. म्हणून गंभीर साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र किंवा विज्ञान यासारखे विषय सखोलपणे वाचण्यासाठी छापील पुस्तकाला अजूनही पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यम वाचन अधिक सुलभ करते; पण सुलभता आणि एकाग्रता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी एखादे पुस्तक मिळवण्यासाठी ग्रंथालयात जावे लागे किंवा पुस्तक विकत घ्यावे लागे. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे जगातील अनेक ग्रंथ काही क्षणांत उपलब्ध होऊ शकतात. दुर्मिळ पुस्तके, जुन्या आवृत्त्या, संशोधनग्रंथ आणि विविध भाषांतील साहित्यही डिजिटल स्वरूपात मिळू शकते. त्यामुळे भौगोलिक अंतर, पुस्तकांची उपलब्धता आणि काही प्रमाणात आर्थिक अडथळे कमी होतात. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी ही क्रांती अत्यंत महत्त्वाची आहे.

याहून महत्त्वाचा बदल म्हणजे पुढील पिढ्यांसाठी पुस्तक या शब्दाचा अर्थच बदलू शकतो. आज पुस्तक म्हटले की अनेकांच्या मनात कागदाची पाने, मुखपृष्ठ आणि बांधणी असलेली वस्तू येते. भविष्यात एखाद्या तरुणाच्या दृष्टीने पुस्तक म्हणजे वाचण्यासाठी उपलब्ध असलेली डिजिटल सामग्री असू शकते. जसे आज अनेक तरुणांना पत्र लिहिण्याची जुनी पद्धत अपरिचित आहे, तसेच भविष्यातील काही पिढ्यांना छापील पुस्तक हे मुख्य वाचनमाध्यम वाटणार नाही. परंतु याचा अर्थ ते पुस्तक हातात घेऊन वाचणे विसरतील असा होत नाही. म्हणून लोक पुस्तके वाचणे विसरतील असे म्हणण्यापेक्षा लोक पुस्तके वाचण्याची पद्धत बदलतील हे विधान जास्त संयुक्‍तिक ठरेल. त्यामुळे छापील पुस्तकाचा ऱ्हास काही विशिष्ट क्षेत्रांत अधिक वेगाने होऊ शकतो. संदर्भग्रंथ, शब्दकोश, वर्तमान घडामोडींशी संबंधित साहित्य, शैक्षणिक सामग्री आणि त्वरित शोध घेण्यासाठी लागणारी माहिती यासाठी डिजिटल रूप अधिक सोयीचे आहे. अशा सामग्रीसाठी मोठमोठी पुस्तके जवळ बाळगण्याची आवश्यकता कमी होईल. परंतु कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे, कलात्मक पुस्तके, संग्रहणीय आवृत्त्या आणि भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके यांना छापील पुस्तकांच्या स्वरूपात मागणी राहू शकते. म्हणजे भविष्यात छापील पुस्तकाचे प्रमाण कमी होईल, पण त्याचे अस्तित्व अधिक निवडक आणि विशिष्ट स्वरूपाचे होण्याची शक्यता आहे.

या बदलाकडे केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणेही योग्य नाही. पुस्तक वाचण्याची सवय टिकवणे हा समाजाच्या बौद्धिक आरोग्याचा प्रश्न आहे. माध्यम कोणतेही असो, दीर्घ लेख वाचण्याची, तर्क समजून घेण्याची, विचारांशी असहमती नोंदवण्याची, कल्पनाशक्ती वापरण्याची आणि एखाद्या विषयावर शांतपणे चिंतन करण्याची क्षमता टिकणे अधिक महत्त्वाचे आहे. भ्रमणध्वनीवर हजारो पुस्तके उपलब्ध असूनही जर माणूस फक्त लहान संदेश, शीर्षके आणि चित्रफिती पाहत राहिला, तर माहितीची उपलब्धता वाढूनही सखोल ज्ञान मिळवण्याची ओढ कमी होऊ शकते. उलट एखादा माणूस इलेक्ट्रॉनिक पुस्तकात तल्लीन होऊन शेकडो पाने वाचत असेल तर त्याचे वाचन छापील पुस्तकाइतकेच अर्थपूर्ण असू शकते. म्हणून भविष्यातील संघर्ष हा छापील पुस्तक आणि इलेक्ट्रॉनिक पुस्तक यांच्यातील नसून सखोल वाचन आणि वरवरच्या माहितीत रममाण होणे यात असणार आहे. छापील पुस्तक कदाचित आजच्या सारखे सर्वत्र दिसणार नाही. पुस्तकांची दुकाने, ग्रंथालये आणि घरातील पुस्तकांचे कपाट यांचे स्वरूपही बदलू शकते. परंतु माणसाला विचार समजून घेण्यासाठी, कल्पना आत्मसात करण्यासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी पुस्तकाची गरज लागणारच आहे. कारण माध्यम बदलले तरी ज्ञानाची आणि चिंतनाची गरज संपत नाही.

त्यामुळे भविष्यात लोक छापील पुस्तके वाचणे विसरून जातील हा अंदाज अतिशयोक्त आहे. अधिक वास्तववादी अंदाज असा वर्तवता येईल की छापील पुस्तक हे वाचनाचे एकमेव प्रमुख माध्यम राहणार नाही; तर इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण वाढेल एवढेच. परंतु छापील पुस्तक पूर्णपणे नाहीसे होणार नाही. भविष्यात दोन्ही माध्यमे परस्परपूरक असतील. ज्यांना वेग, उपलब्धता आणि सोय महत्त्वाची वाटेल ते इलेक्ट्रॉनिक पुस्तकांकडे वळतील; ज्यांना पुस्तकाचा स्पर्श, संग्रह, सौंदर्य, स्मृती आणि एकाग्र वाचनाचा अनुभव महत्त्वाचा वाटेल ते छापील पुस्तकाकडे परततील. अखेरीस बदलणार आहे तो पुस्तकाचा आकार आणि माध्यम; माणसाची वाचण्याची आणि जाणून घेण्याची मूलभूत गरज नाही. त्यामुळे छापील पुस्तकांपासून वाचक दूर जाईल हा समज गैरसमजच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राखी बंधन : आधुनिक विचार… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ राखी बंधन : आधुनिक विचार… ☆ राधिका भांडारकर ☆

श्रावणातल्या पौर्णिमेची चाहूल लागली की मनाच्या एखाद्या हळुवार कोपऱ्यात बालपण पुन्हा जागं होतं. रंगीबेरंगी राख्या, मिठाईची ताटं, भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि त्यानंतर मिळणारी छोटीशी ओवाळणीची भेट… राखीबंधनाचा हा सोहळा केवळ एका दिवसाचा नसतो. तो आठवणींच्या धाग्यांनी विणलेला असतो.

पूर्वी राखी म्हणजे बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेला संरक्षणाचा धागा, अशी त्याची साधी व्याख्या होती. भाऊ बहिणीचे रक्षण करेल, तिच्या पाठीशी उभा राहील, अशी त्यामागची भावना. त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीत या भावनेला निश्चितच महत्त्व होते.

पण काळ बदलला आहे. आजची बहीणही सक्षम आहे, स्वावलंबी आहे, स्वतःचे निर्णय घेणारी आहे. ती भावाकडून केवळ संरक्षणाची अपेक्षा करत नाही. तिला त्याची साथ हवी असते, पण त्याचबरोबर तीही भावाच्या आयुष्यातील आधारस्तंभ होऊ शकते.

म्हणूनच आज राखीचा अर्थ नव्याने समजून घ्यायला हवा.

‘तू माझं रक्षण कर’ ऐवजी ‘आपण एकमेकांसाठी उभे राहू’, हा आजच्या राखीचा अधिक सुंदर अर्थ असू शकतो.

भाऊ बहिणीच्या स्वप्नांना पाठिंबा देईल आणि बहीण भावाच्या संघर्षात त्याचा हात घट्ट धरून ठेवेल. यशाच्या क्षणी दोघे एकमेकांसाठी टाळ्या वाजवतील आणि अपयशाच्या क्षणी एकमेकांना सावरतील. हे नाते संरक्षणाच्या एकतर्फी भावनेतून सहजीवनाच्या आणि समानतेच्या भावनेत प्रवेश करेल.

आज अनेक भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत, देशांत राहतात. स्क्रीनवरून होणाऱ्या भेटी, व्हिडिओ कॉलवरच्या गप्पा आणि कुरिअरने पोहोचणारी राखी यामुळे अंतर कमी होते. मनगटावर राखी बांधली जात नसली तरी मनातला धागा तसाच घट्ट राहतो.

कधी कधी तर राखीचा अर्थ रक्ताच्या नात्यापलीकडेही जातो. आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटलेली मैत्रीण, संकटात धावून आलेला मित्र, आधार देणारा सहकारी—ही नातीही आपल्याला सांगून जातात की माणसाला सुरक्षित वाटण्यासाठी रक्ताचं नातं असणं आवश्यक नाही; विश्वासाचं नातं असणं आवश्यक आहे.

आजच्या पिढीला राखी देताना आपण तिला केवळ एक परंपरा म्हणून देऊ नये. तिच्यामागचा विचारही द्यायला हवा. स्त्रीचे संरक्षण करण्यापेक्षा तिचा सन्मान करणे, तिच्या निर्णयांचा आदर करणे आणि तिच्या स्वातंत्र्याला साथ देणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच भावालाही आपल्या भावनांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा, कमकुवत क्षणी आधार मागण्याचा आणि बहिणीकडून आधार स्वीकारण्याचा तितकाच अधिकार आहे.

बहिणीला राखीच्या बदल्यात महागडी भेटवस्तू देणे, पैसे देणे किंवा तिच्या नावावर काहीतरी देऊन आपले कर्तव्य पूर्ण झाले असे मानणे, यापेक्षा तिच्या कर्तृत्वाची दखल घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तिला ‘घेणारी’ म्हणून नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभी राहणारी, निर्णय घेणारी आणि कुटुंबाच्या जडणघडणीत समान वाटा उचलणारी व्यक्ती म्हणून पाहणे गरजेचे आहे.

बहिणीला दानाची नव्हे, सन्मानाची गरज आहे. तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन, तिच्या करिअरला पाठिंबा, तिच्या मताला महत्त्व आणि तिच्या स्वप्नांना मोकळे आकाश—हीच तिच्यासाठी सर्वात मोठी राखीची भेट ठरू शकते.

राखीचा धागा कितीही नाजूक असला तरी त्यात नातं घट्ट बांधण्याची ताकद असते. त्या धाग्यात मालकी नसावी, बंधन नसावे; असावी ती फक्त आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाची गाठ.

म्हणून या राखीपौर्णिमेला बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना एवढंच म्हणावं—

“तू माझं रक्षण करशील, यापेक्षा मला खात्री आहे की तू माझ्या पाठीशी उभा राहशील. आणि तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात मीही तुझ्या सोबत असेन.”

कदाचित हाच आधुनिक राखीबंधनाचा खरा अर्थ आहे.

मनगटावरचा धागा काही दिवसांनी जुना होईल, तुटेलही. पण परस्पर विश्वासाचा धागा आयुष्यभर टिकला, तरच राखीबंधन सार्थकी लागेल.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनोळखी गुरू… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ अनोळखी गुरू…  ☆ तृप्ती देव ☆

गुरुपौर्णिमेच्या दिवस होता ऑफिसमधून परतताना एसटी स्टँडवर नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती.

एका बाकावर मी आणि एक वृद्ध गृहस्थ शांतपणे बसले होतो. साधा पांढरा कुर्ता, हातात जुनी कापडी पिशवी आणि डोळ्यांत विलक्षण शांतता. एकीकडे माझ्या शेजारी एक तरुण सतत मोबाईलवर ओरडत होता. बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, प्रत्येक गोष्टीत सल्ले देऊ नका, मी आता लहाना राहिलेला नाही, माझं आयुष्य मी स्वतः बघेन, तुम्ही उगाच माझ्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं बंद करा, असा रोजचाच त्रास झालाय मला तुमचा, असं रागारागाने बोलून त्याने फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. माझ्या मनालाही वाटलं की आजकालची मुलं आईवडिलांचा आदरच करत नाही. कोणाची परिस्थिती कशी आणि मनस्थिती मला ओळखता. येत नव्हती. नक्की काय झालं हे कळत नाही. पण एका बापाची काळजी समजत होती. कुठलातरी ताण मुलाच्या मनावर होता त्याच्या शब्दातून तो जाणवत होता.

तेवढ्यात समोर बसलेले आजोबा उठले आणि त्या मुलाजवळ गेले. ते रागावले नाहीत किंवा त्यांनी उपदेशही केला नाही. त्यांनी फक्त अत्यंत आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बाळा एक विनंती करू. तो चिडून म्हणाला की काय. आजोबा हसले आणि म्हणाले की आज घरी गेल्यावर बाबांच्या खोलीत जा, ते झोपले असतील तर त्यांच्या पायाशी दोन मिनिटं शांत बस. तो हळूच हसला आणि म्हणाला की त्याने काय होणार. आजोबा अतिशय हळुवार आवाजात म्हणाले की काही नाही झालं तरी चालेल,

पण एक दिवस असा येईल की त्या खोलीत पलंग असेल, उशी असेल, त्यांच्या चप्पलाही दारात तशाच असतील, त्यांचा कपड्यांचा वासही खोलीत असेल, फक्त हाक मारायला बाबा नसतील आणि त्या दिवशी पश्चात्तापाचे अश्रू ढाळले तरी ती गमावलेली दोन मिनिटं जगातील संपूर्ण संपत्ती दिली तरी विकत मिळत नाहीत. क्षणभर संपूर्ण स्टँडवर गहिवरलेली शांतता पसरली. त्या शब्दांचा थेट त्याच्या हृदयाला स्पर्श झाला.

आईवडिलांचं असणं हे किती मोठं छत्र असतं आणि आपण काय गमावून बसू शकतो याची जाणीव त्याला झाली. त्याच्या डोळ्यात क्षणार्धात पाणी आलं. त्याने थरथरत्या हातांनी पुन्हा फोन काढला आणि बाबांना फोन लावला. यावेळी त्याचा आवाज पूर्णपणे बदलला होता, गळ्यात हुंदका दाटून आला होता. तो कातर आवाजात म्हणाला की बाबा मला माफ करा, मी खरंच खूप चुकलो, मी आत्ताच घरी येतोय, आज आपण एकत्र बसून चहा पिऊया आणि मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला काय उत्तर आलं माहीत नाही, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापानंतरचं एक वेगळंच समाधान आणि हसू होतं. मी त्या आजोबांकडे पाहिलं आणि विचारलं की तुम्ही शिक्षक आहात का. 

ते हसले आणि म्हणाले की नाही बाई, मी फक्त आयुष्याकडून शिकलेला विद्यार्थी आहे. इतकं बोलून ते गर्दीत बस मधे चढून निघून गेले. मी त्यांचं नावही विचारू शकले नाही. आज अनेक वर्षांनीही गुरुपौर्णिमा आली की मी देवापुढे दिवा लावते, पण त्याआधी घरातल्या माणसांसोबत दहा मिनिटं बसते. कारण त्या अनोळखी वृद्धाने मला शिकवलं की गुरू तो नसतो जो मोठमोठी प्रवचनं देतो, गुरू तो असतो जो एका वाक्यात आयुष्याचा आणि नात्यांचा अर्थ बदलून टाकतो. त्या अनोळखी माणसाचं नाव मला आजही माहीत नाही, पण प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी मनात त्यांना नमस्कार करते. कारण काही गुरू पुस्तकात भेटतात, काही मंदिरात आणि काही अचानक एखाद्या एसटी स्टँडवर. मनामध्ये गुरुचे स्थान मिळवतात.

असे गुरू कोणत्याही शाळेच्या पाटीवर किंवा पुस्तकात नसतात, तर ते आयुष्याच्या वळणावर अचानक भेटतात. त्यांची एकच साधी गोष्ट आपल्याला नात्यांचं खरं मोल शिकवून जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता मनाला स्पर्श करून आयुष्य बदलणारा हाच अनुभव खऱ्या अर्थाने गुरू असतो.

 ┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग २ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग २ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

विवेकानंद केंद्र -एकनाथजी रानडे -ए. बालकृष्णन

 – मा. श्री. ए. बालकृष्णन… विवेकानंद विचार आणि पूर्वांचलाशी आयुष्यभर नातं जोडणाऱ्या एका विलक्षण कर्मयोग्याला श्रद्धांजली… मृत्यू दि. २७/८/२

परस्परं भावयन्तः…

बालकृष्णनजींबरोबर प्रवास करताना त्यांनी तिनसुकियाला भगवद्गीतेतील एक श्लोक आम्हाला समजावून सांगितला—

“परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ।”

संघटनेच्या कामाचा हा किती जबरदस्त आधार आहे, हे तेव्हा जाणवलं.

एकमेकांना वाढवणं, एकमेकांना बळ देणं आणि एकमेकांच्या विकासातून मोठं कार्य उभं करणं—हा विचार बालकृष्णनजींच्या कार्यपद्धतीतच होता.

त्यांच्या पॅशनेट नेतृत्वाखाली विवेकानंद केंद्राचं पूर्वांचलातील काम अफाट वाढलं.

शेकडो मुलांशी असलेला संपर्क काही हजार मुलांपर्यंत आणि पुढे लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

अनेक सेवाकार्ये उभी राहिली… अनेक शाळा उभ्या राहिल्या… अनेक प्रकल्प उभे राहिले… 

या प्रकल्पांचं नियोजन, त्यांची स्थापना आणि त्यांची अंमलबजावणी—सगळंच आखीव-रेखीव आणि जबरदस्त होतं.

‘विवेकानंद केंद्र शिक्षा प्रसारक विभाग’ त्यावेळी अरुणाचल प्रदेशातील अनेक शाळांचं काम पाहत होता. त्या शिक्षण प्रसारक विभागाचा मी सदस्य झालो.

बालकृष्णनजींच्या नेतृत्वात काम करताना एक गोष्ट सतत जाणवायची—

… ते कामाला केवळ प्रकल्प म्हणून पाहत नव्हते; ते त्याला राष्ट्रकार्य म्हणून पाहत होते.

विचार जगलेला माणूस

बालकृष्णनजी फारसं वैचारिक बोलायचे नाहीत.

ते बोलायचे ते विचार जगलेलं आयुष्य.

ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली भगवद्गीता.

ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली केंद्र प्रार्थना.

ते सांगायचे ते त्यांनी अनुभवलेली उपनिषदं.

म्हणूनच त्यांच्या शब्दांना वेगळी ताकद होती.

२००६मध्ये कन्याकुमारीमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम येणार होते. आम्ही काही कार्यकर्ते बालकृष्णनजींबरोबर शिलास्मारकावर होतो.

बालकृष्णनजी ज्या पद्धतीने कलामांना शिलास्मारक समजून सांगत होते, ती पद्धत मला फार अफलातून वाटली.

त्यांच्या प्रत्येक शब्दामागे अनुभव होता.

प्रत्येक गोष्टीमागे अभ्यास होता.

आणि प्रत्येक अभ्यासामागे काम होतं.

देशावरचं संकट म्हणजे स्वतःचं संकट

२००८-०९च्या सुमारास मी दिब्रुगडला गेलो होतो. त्या वेळी बालकृष्णनजी तिथे होते.

मी ‘ज्ञान प्रबोधिनी’चं काम करत होतो. विवेकानंद केंद्राचं काम तेव्हा सोडलं होतं.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा काळ होता. अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई हादरवून सोडली होती.

बालकृष्णनजी दिवसभर त्याचे अपडेट्स घेत होते.

‘Spiritually Oriented Service Mission’ असलेल्या विवेकानंद केंद्राचा एक प्रमुख कार्यकर्ता देशावर आलेल्या संकटाचा पदोपदी, क्षणोक्षणी अभ्यास करतो, समजून घेतो—हे माझ्यासाठी नवलाचं होतं.

कारण त्यांच्यासाठी आध्यात्मिकता म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हतं.

वो अपने भाई हैं!

बालकृष्णनजी आणि ज्ञान प्रबोधिनी यांचं एक वेगळंच नातं होतं.

एखादा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यात ज्ञान प्रबोधिनीचा उल्लेख आहे असं सांगितलं की ते म्हणायचे—

“अरे, वो अपने भाई हैं। उनके साथ करना ही पड़ेगा! ”

प्रबोधिनीबरोबर एखादं काम करण्याचा प्रस्ताव मी ठेवला आणि त्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला, असं मला आठवत नाही.

क्षणाचाही विलंब न लावता ते ‘हो’ म्हणायचे.

एकदा विवेकानंद केंद्राच्या प्रमुख शिक्षकांना आणि जीवनव्रतींना इम्पॅक्ट, इम्पॅक्ट प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन यांचं प्रशिक्षण द्यावं, असा मी प्रस्ताव ठेवला.

त्यांनी विचारलं—

“वो कौन देगा रे प्रशिक्षण? ”

मी म्हणालो—

“अजितराव कानिटकर.”

क्षणात उत्तर आलं—

“अरे, वो अपना अजित है! उसको बुलाओ, कोई बात नहीं. लेकिन रेल से मत बुलाओ, प्लेन से बुलाओ. उसको सब मालूम है.”

त्यांच्या मनात माणसांबद्दल किती विश्वास होता, याची ही छोटीशी झलक.

पूर्वांचलावर प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम

पोंगसे सरांबद्दल बोलताना ते म्हणायचे—

“अरे, विवेक तो सच्चा कार्यकर्ता है रे वो! उसको नॉर्थ-ईस्ट के बारे में बहुत प्यार है.”

पूर्वांचलाबद्दल त्यांचं प्रेम अफाट होतं.

आणि पूर्वांचलावर प्रेम करणाऱ्या लोकांवरही त्यांचं तितकंच प्रेम होतं.

हीच कदाचित त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद होती.

ते प्रदेशावर प्रेम करत होते, पण त्याहून अधिक माणसांवर प्रेम करत होते.

प्रसाद को प्रसाद दिया…

बालकृष्णनजींबरोबरचा माझा शेवटचा अनुभव कन्याकुमारीतील विघ्नहर्ता गणेश मंदिरातला.

संध्याकाळच्या वेळी ते आरतीला प्रसाद घ्यायला यायचे. त्यांच्या द्रोणामधला थोडा प्रसाद स्वतः घ्यायचे आणि उरलेला मला द्यायचे….. आणि मग खळखळून हसायचे. ते हसायचे तेव्हा त्यांचं पूर्ण शरीर हसतंय असं वाटायचं. म्हणायचे—

“आज प्रसाद को प्रसाद दिया, मेरा काम खतम! ”

या एका वाक्यात त्यांचं प्रेम, त्यांचा विनोद आणि माझ्याशी असलेली त्यांची आत्मीयता—सगळं सामावलेलं होतं.

एका शब्दातून दिसलेली त्यांची दृष्टी

सलग दहा-बारा दिवस आम्ही कन्याकुमारीत होतो. मातृभूमी पूजनाचा कार्यक्रम निवेदिता दीदी आणि बालकृष्णनजींच्या उपस्थितीत झाला.

या संपूर्ण प्रक्रियेकडे बालकृष्णनजी किती बारकाईने पाहत होते, हे मला एका छोट्याशा प्रसंगातून जाणवलं.

त्या पोथीत एक शब्द होता—‘परराज्यातील’, ‘परभाषेतील’.

बालकृष्णनजींनी शांतपणे मला सांगितलं—

“प्रसाद, यहाँ ‘परराज्य’, ‘परभाषा’ ये शब्द युज करने से ज्यादा ‘अन्य भाषा’, ‘अन्य राज्य’ हे शब्द युज करने से बहुत अच्छा रहेगा.”

मी थक्क झालो.

एका शब्दामध्ये दडलेला भावार्थही ते इतक्या बारकाईने पाहत होते!

मग विचार आला—

जे माणूस एका शब्दाचा आयाम इतक्या बारकाईने पाहतं, ते माणूस संपूर्ण कामाचे आयाम किती बारकाईने पाहत असेल?

प्रबोधिनीतील एखादी प्रक्रिया ते शांतपणे समजून घेत असतील, तर विवेकानंद केंद्रातील—विशेषतः पूर्वांचलातील—प्रत्येक प्रक्रियेचा किती बारकाईने विचार करत असतील!

आज सकाळी…

आज सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतला.

राधा दीदींच्या पोस्टवरून बालकृष्णनजींचं निधन झाल्याचं समजलं.

क्षणभर काहीच कळलं नाही.

सुन्न झालो.

कुणीतरी आपल्या जिवाभावाचा माणूस गेल्याची जाणीव झाली.

बालकृष्णनजी,

तुम्ही आम्हाला काय दिलंय, याची गणतीच करता येणार नाही.

प्रचंड ताकदीने काम करत राहणं,

तेवढ्याच शुद्धतेने काम करत राहणं,

प्रचंड श्रद्धेने काम करत राहणं—

हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली असेल.

पदोपदी कुठेही काम करत असताना विवेकानंद विचार आणि पूर्वांचल विसरायचा नाही, हे आम्ही तुमच्या आचरणातून शिकलो.

दूर, साडेतीन-चार हजार किलोमीटरवर असलेल्या आपल्या बांधवांशी एक वेगळं नातं तुम्ही आमचं निर्माण केलंत.

हे नातं आम्ही नक्की जपू.

तुम्ही निजधामाला गेलात.

पण तुम्ही ज्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्यावरचा तुमचा विश्वास आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.

पुन्हा कधीतरी तुम्हाला भेटायला आलो, तर तुम्ही उभं केलेलं कार्य आणखी मोठं झालेलं असेल.

आणखी कितीतरी कार्यकर्ते त्या कार्यात जोडले गेलेले असतील.

आणि पूर्वांचलाशी जोडलेलं ते नातं आणखी दृढ झालेलं असेल.

तुमचा कार्यकर्त्यांवर सगळ्यात जास्त विश्वास होता, बालकृष्णनजी.

तो विश्वास सार्थ ठरवणं—

हीच आमची तुम्हाला खरी श्रद्धांजली.

बालकृष्णनजी, नमस्कार!

लवकरच भेटू…

तोपर्यंत तुम्ही दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत राहू.

– समाप्त –

लेखक : प्रसाद चिक्षे

ज्ञान प्रबोधिनी

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई अजूनही वाट पाहते…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “आई अजूनही वाट पाहते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

आई अजूनही वाट पाहते… पण आम्ही मोठे झालो.

घर बदललेलं नाही.

त्या भिंती अजूनही तशाच आहेत.

दार अजूनही तसंच किरकिरत उघडतं.

 

फक्त एक गोष्ट बदलली आहे…

घरातले आवाज कमी झालेत.

 

आई अजूनही तिथेच आहे.

पण आम्ही… मोठे झालो.

लहानपण

लहानपणी घर म्हणजे गोंधळ असायचा.

सकाळी आईचा आवाज –

उठा आता! शाळेला उशीर होईल.

आम्ही चादरीत लपून बसायचो.

आई येऊन पांघरूण ओढायची –

चल… अजून झोपायचं नाही.

 

किचनमध्ये पोह्यांचा वास.

डब्यांसाठी घाई.

बाबा पेपर वाचत.

त्या सगळ्या गोंधळात

आई कायम धावत असायची.

पण तेव्हा आम्हाला वाटायचं…

आईला थकवा येतच नाही.

 

 वेळ

हळूहळू वर्षं गेली.

शाळा संपली.

कॉलेज सुरू झालं.

घरातले विषय बदलले.

Exam कधी आहे? ”

Job मिळाला का? ”

आई अजूनही तसंच विचारायची –

जेवलास का? ”

तो प्रश्न कधी बदललाच नाही.

 घर सोडण्याचा दिवस

एक दिवस बॅग भरली.

नोकरीसाठी शहर बदलायचं होतं.

आई शांतपणे कपडे घडी करत होती.

ती म्हणाली –

सगळं घेतलंस ना? ”

मी म्हणालो –

हो.

पण खरं सांगायचं तर

मी घरच तिथे ठेवून जात होतो.

दारातून बाहेर पडताना

आई म्हणाली –

कधी कधी फोन कर.

त्या चार शब्दांत

खूप काही होतं.

नवीन आयुष्य

नवीन शहर.

नवीन नोकरी.

नवीन लोक.

आयुष्य वेगाने चालायला लागलं.

Meeting.

Deadline.

Traffic.

फोन करायचं ठरवायचो…

पण वेळ नसायचा.

कधी कधी रात्री आईचा missed call दिसायचा.

मी message करायचो –

Busy होतो.

आई reply द्यायची –

ठीक आहे बाळा.

 

आईचं घर

आई अजूनही त्या घरात आहे.

सकाळी उठते.

चहा करते.

कधी कधी चार कप ठेवते.

मग हसते –

अरे… आता दोनच लोक.

किचन शांत.

भांड्यांचा आवाज कमी.

पण आठवणींचा आवाज जास्त.

 

गॅलरी

संध्याकाळी आई गॅलरीत उभी राहते.

रस्त्यावरची मुलं खेळत असतात.

कुणीतरी आई! म्हणत धावत येतं.

आई थोडं हसते…

आणि आत जाते.

कारण तिला आठवतं —

एकेकाळी त्या आवाजात आमचं नाव असायचं.

 जुने फोटो

एक दिवस आईने जुना अल्बम काढला.

 

फोटो –

शाळेचा.

पिकनिकचा.

दिवाळीचा.

एका फोटोमध्ये

आम्ही सगळे हसत होतो.

आई फोटोला हात लावते.

आणि हळूच म्हणते –

किती पटकन मोठे झाले.

 

सण

दिवाळी आली.

पूर्वी घरात धिंगाणा असायचा.

फटाके.

फराळ.

गोंधळ.

आता आई दोनच दिवे लावते.

 

एक देवासाठी.

एक दारासाठी.

 

ती म्हणते –

कदाचित यंदा येतील.

 

फोन

रात्री फोन वाजतो.

आई पटकन उचलते.

हॅलो? ”

मी म्हणतो –

आई, कशी आहेस? ”

ती लगेच म्हणते –

छान… तू जेवलास का? ”

मी म्हणतो –

हो.

ती अजून काही बोलायचा प्रयत्न करते.

पण मग म्हणते –

ठीक आहे… काम कर.

फोन ठेवला की

घर पुन्हा शांत होतं.

 

 सत्य

मोठं होणं वाईट नाही.

स्वप्नं पूर्ण करणंही चुकीचं नाही.

पण एक गोष्ट आपण विसरतो…

आपण मोठे होत असताना

आई अजूनही तिथेच थांबलेली असते.

ती अजूनही वाट पाहते.

एका फोनची.

एका भेटीची.

एका आई म्हणण्याची.

 

 एक दिवस

एक दिवस अचानक मी घरी गेलो.

दरवाजा उघडला.

आई मला पाहून थबकली.

अरे अचानक? ”

मी म्हणालो –

तुला भेटायला आलो.

त्या दिवशी किचन पुन्हा जिवंत झालं.

आईने चार पदार्थ केले.

घरात पुन्हा आवाज आला.

 

शेवट

त्या रात्री आई म्हणाली –

तू आलास की घर पुन्हा घर वाटतं.

ते वाक्य ऐकून

माझं मन भरून आलं.

कारण मला कळलं…

घर कधी रिकामं नसतं.

घरातली वाट पाहणारी आई

त्याला जिवंत ठेवत असते.

 

जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल…

तर एक काम करा.

आज आईला फोन करा.

फक्त एवढं म्हणा —

आई, कशी आहेस? ”

 

कारण…

आपण मोठे झालो असलो

तरी आई अजूनही वाट पाहते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “फाटणं आणि फाडणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “फाटणं आणि फाडणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

फाटणं आणि फाडणं…

लहानपणी ज्या काही गोष्टींबद्दल प्रसाद (हातावर, गालावर, आणि पाठीवर) मिळाला असेल तो या दोन गोष्टींबद्दल जास्त असेल. (देवाचा) प्रसाद हा प्रेमाने तळहातावर ठेवला जातो व तो खाल्ला जातो. पण फाटणं आणि फाडणं यामुळे मिळणारा प्रसाद हा तळहातापासून पाठीपर्यंत अंगावर पडला होता. त्यासाठी जागेचं म्हणजे शरीराच्या भागाच, आणि जागेच म्हणजे कुठे आहोत याच बंधन नव्हत. आणि गोडवा… त्याचा तर संबंधच नसायचा.

फाटणं यात वस्तूच नुकसान असत. तर फाडणं बहुतेक वेळा मुद्दाम केल जात. फाटणं यात दुर्लक्ष, निष्काळजीपणा असतो. तर फाडणं यात काळजीपूर्वक करायचं कांहीही नसत. फाटणं यात दु:ख असत, तर फाडण्यात दु:खाचा संबंध असेलच अस नाही.

हा कागद कोणी फाडला… किंवा कसा फाटला… अथवा हे कागद काही कामाचे नसतील तर फाडून टाकू… फाडणं हा शब्द साधारण अशाच प्रकारच्या वाक्यात ऐकायला येतो. किंवा यात जे घडलं तीच क्रिया फाडणं यात अपेक्षित असते.

फाडणं याला व्यवस्थितपणा लागत नाही. यासाठी कोणतही मोजमाप नसत. याला कोणतही शास्त्र, किंवा सुत्र नाही. सुसूत्रता तर मुळीच लागत नाही. ऊलट व्यवस्थितपणे केलेला अव्यवस्थितपणाच यात अपेक्षित असतो. मनाला येईल तसे आणि तेवढे तुकडे करणं यालाच आपण फाडणं म्हणतो.

पण फक्त याच अर्थाने हा शब्द वापरतो का… तर मुळीच नाही. बर्‍याच चांगल्या गोष्टींसाठीसुध्दा फाडणं हा शब्द वापरतो, आणि त्यात बोलणारा आणि ऐकणारा यांना गैर वाटत नाही.

वर्गणी किंवा इतर चांगल्या ठिकाणी पैसे मिळाल्यावर दिली जाणारी पावती. याला पावती फाडणं असच म्हणतात. चांगल्या मनाने, चांगल्या कामासाठी दिलेल्या पैशांची पोचपावती देतांना त्या पावतीचा फाडणं असा ऊल्लेख होतो.

लग्न ठरल्यावर केली जाणारी कपड्यांची खरेदी. याला कपडा फाडायचा आहे असाच ऊल्लेख खान्देशात तरी सहज केला जातो. परत हा शब्द वापरतांना उत्साह जाणवतो. अशा कपडे फाडण्याच्या कार्यक्रमाला काहींना मानाने यायला सांगितल जातं. बर्‍याचदा तर अशा वेळी पंधरावीस जणं असल्याच मी पाहिलं आहे. काहीतर दुकानाच्या बाहेरच असतात. दुकानात साडी फाडली जाते आहे का शर्ट पीस आणि पॅट पीस हे त्यांना दिसतही नाही. पण कपडा फाडायच्या कार्यक्रमास ते हजर असतात.

एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींच श्रेय, यश, अपयश कुणाच्या नावावर असेल, याला सुध्दा याचं बील कोणाच्या नावावर फाडायचं असाच प्रश्न मनात असतो. काही तर या यशासाठी आपणच असल्याचा दावा करतात. तर अपयशाच खापर कोणावर फोडाव याचा घाट घालतात.

असच बील फाडणं वस्तूच्या खरेदीनंतर सुध्दा असतं. आपल्या नांवाने जे बील फाडलं जात ती वस्तू आपण आनंदाने घेतलेली असते, बर्‍याचदा त्याचं बील संभाळून सुध्दा ठेवतो, पण वस्तू घेतांना त्याच बील मात्र फाडल जात.

दुध नासणं याला सुध्दा काही ठिकाणी दुध फाटलं असच म्हणतात. द्रवरूप पदार्थ नासतो, सांडतो. पण दुध मात्र फाटतं. दुधाचा चक्का करायचा असेल तर मात्र दुध मुद्दाम फाडलं जात. पण मला दुध फाटलं या शब्दाची गंमत वाटते.

पण या शब्दांमुळे काही गोष्टींना ऊजाळा मिळाला.

 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खोपा शिडीला टांगला ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ खोपा शिडीला टांगला ☆ श्री दिवाकर बुरसे

‘टाटा मोटर्स’चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कशिया, स्पथोडिया, ग्लिरिसिडिया, जकरेंडा, पेल्टाफोरम, बाटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल!  जगविख्यात पक्षिनिरीक्षक डा. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी.

चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची ‘इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी. ‘ ‘टेल्को’ कंपनीने ती ताब्यात घेऊन तिथे आपली ‘ मशीन टूल डिव्हिजन’ सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला ‘स्टडर्स बिल्डिंग’ नावाची, इंग्रजी ‘सी’ च्या आकाराची एक बैठी एकमजली वातानुकूलित इमारत आहे. तिला ऐसपैस पडवी आहे. इतर शॉप्स आणि इमारतींपासून ती जरा दूर आहे. तिच्या मागे उत्तरेला दाट झाडी आहे. त्यामुळे तिथे अनेक पक्षांचा राबता असतो. या परिसरात मानवाची फारशी वर्दळ नसते. या इमारतीत ‘आर अँड डी १’, ‘मेकनिकल अँंड हायड्रॉलिक लॅब अँड टेस्टिंग’ आणि मेट्रोलॉजि’ हे विभाग आहेत. त्यावेळी काही काळापुरती माझी नियुक्ती या हायड्रॉलिक लॅब विभागात झाली होती.

ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. दुपारी तीन-चारची वेळ होती. आकाश झाकळून आले होते. सर्वत्र अंधार पडला होता म्हणून बिल्डिंगमधले दिवे लावले. जेव्हा इमारत विद्युत प्रकाशाने उजळून निघाली, तेव्हा लक्षात आले की कॉरिडॉर मात्र अंधारात आहे. तिथल्या ट्यूबलाईट्स लागत नाहीयेत. मी लगेच सी पी ई डीला (सेंट्रल प्लांट इंजिनियरिंग डिव्हिजन) फोन करून कळविले आणि सर्व नवीन ट्यूबलाईट्स बसवायची विनंती केली. पाच वाजता जनरल शिफ्ट संपल्यामुळे मी घरी निघून गेलो.

दुसऱ्या पाळीतील सी पी ई डी च्या कर्मचाऱ्याने तत्परतेने येऊन कॉरिडॉरमधील सर्व दिवे बसवले. त्याचे हे काम होईतो जेवणाची सुट्टी झाली. त्याने बरोबर आणलेल्या शिडीची घडी घालून ती पडवीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकवून उभी केली आणि तो गेला. शिडी तशी तिथेच राहिली. ती परत न्यायची तो विसरला आणि पुढे सात-आठ दिवस ती तशीच पडून राहिली.

एक दिवस माझ्या दृष्टीस ती शिडी पडली. मी सी पी ई डी ला फोन करून ती शिडी त्वरित घेऊन जायला सांगितले. मला कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचा रागही आला. काही वेळाने शिडी न्यायला एक जण आला पण त्याने शिडीला हातही लावला नाही. नुसताच तिच्याकडे बघत बघत, आला तसा परत गेला. शिडी तिथे कोपऱ्यात होती तशीच उभी!

दुसऱ्या दिवशी मी जरा तणतणतच फोन केला. म्हटलं, “काय चाललंय हे?  ती शिडी का नेत नाही तुम्ही?  आता आठ दिवस होऊन गेले इथले काम करून. काम झाल्यावर पुढचे निस्तरायला नको वेळच्यावेळी? ” पलीकडून मलाच प्रश्न झाला, “काय?  अजून नाही नेली?  कमाल आहे. मी कालच सांगितलं होतं आणायला. इथे आमच्या डिपार्टमेंटचं कामही अडून राहिलंय त्यामुळे. मी आत्ता लगेच पाठवतो कोणालातरी आणि उचलून आणतो. ” मी तरीही जरा जोरातच बोललो, “आत्ताच्या आत्ता हलवा इथून. आहो, म्हणजे आम्ही फाईव्ह एस ची डिसिप्लिन काटेकोरपणे पाळायची, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि तुम्ही ही अशी गलथान कामं करायची?  ते काही नाही. त्वरित उचला इथून. “

तो कर्मचारी परत आला पण शिडी उचलायच्या ऐवजी सरळ माझ्या केबिनमधे शिरला आणि अजिजीने म्हणाला, “एक्स्ट्रिमलि सॉरी सर. काईंडली एक्स्यूज मी. सर, खरं म्हणजे मी परवा शिडी न्यायला आलो होतो. शिडी उचलायला तिच्या जवळ गेलो तो माझ्या लक्षात आले की त्या शिडीच्या वरच्या एका पायरीच्या सांदीत एक पक्षांची जोडी आपले घरटे करत्येय. ते अर्धेअधिक झालंय करून. पुढच्या चार-पाच दिवसात बांधून पूर्ण होईल बहुतेक. ते पाहून मनात विचार आला, बिचाऱ्यांनी काडी काडी गोळा करून घर बांधायला घेतलंय. दिवसभर आळीपाळीने हेलपाटे मारतायत दोघही. समजा, मी ही शिडी नेली तर त्याचे घरटे तुटेल. दोघांनी केलेले काम वाया जाईल. त्यांचे घरट्याचे स्वप्न अर्धवट राहील. त्यांनी घेतलेल्या साऱ्या कष्टांवर पाणी पडेल. पुन्हा त्यांना दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल. परत काड्या, कापूस, चिंध्या शोधून आणाव्या लागतील. यात किती वेळ जाईल साहेब. त्यांचा सगळा शेड्यूल डिस्टर्ब होईल. पक्षांचा अंडी घालण्याचा हा सिझन आहे. म्हणून तर त्यांची लगबग चाललीय येवढी. अशात एखाद्याचे घर असे विनाकारण उध्वस्त करणे बरे दिसते का आपल्याला, तुम्हीच सांगा. असे पाप नको व्हायला हातून म्हणून मी शिडी नेत नाहीए. त्यातून जर तुमचा हट्टच असेल तर नेतो. पण मनाला पटत नाही हे. सांगा काय करू?  नेऊ का राहू देऊ तिथेच?  महिन्याभाराचा प्रश्न आहे. एकदा त्यांच्या पिलांना पंख फुटले की जातील भुर्रssकन् उडून. प्लीज कोआँपरेट करा सर. “

त्या कर्मचाऱ्याच्या भावना इतक्या प्रामाणिक होत्या, त्याच्या बोलण्यात येवढे आर्जव होते की मला काय करावे हेच सुचेना. तो माझ्याशी बोलत असताना इतर मशीनवर काम करणारे दोन-तीन आपरेटरही भोवती गोळा झाले. सर्वांना त्या कर्मचाऱ्याचे म्हणणे पटले असावे. खरे म्हणजे मलाही त्याचे म्हणणे पटले होते. त्याच्या या उदात्त विचारांना दाद द्यावीशी वाटत होती. त्याचे कौतुक करावसे वाटत होते.

तरीही मी म्हणालो, ” अरे असे कसे करता येईल. पुढचे दीड-दोन महिने ही शिडी अशीच ठेवायची कोपऱ्यात अडगळीसारखी, त्यावर धूळ, कोळिष्टकं जमायला!  त्या भागाची झाडलोट, स्वच्छता होणार नाही. इट विल लुक अग्लि, अन्-टायडी, इनडीसेंट अँड विच इज नाट अक्सेप्टेबल”.

यावर माझ्याच शॉपमधला एक पुढे आला आणि म्हणला, ” सर, त्याची काळजी आम्ही घेऊ, इथे काम करणारे सगळे. ” “काळजी घेऊ म्हणजे नक्की काय करणार?  जे दिसायला कुरूप आहे त्याला कसे रूप देणार तुम्ही?  उगीच काहीतरी आपलं. ” मी तरीही विरोध दर्शविला.

त्यावर दुसरा म्हणाला, “सर, ते आमच्यावर सोपवा ना. एक दिवस जाऊ द्या. उद्या करू काहीतरी व्यवस्था. आम्ही केलेली व्यवस्था आवडली तर ठेवा. नाही तर हा त्याची लडर घेऊन जाईल. ही पाखरं दुसरा आश्रय शोधतील. आपण फाईव्ह एस च्या आग्रहासाठी आपल्या आश्रयाला आलेली पाखरं उडवून लावू. फाईव्ह एस चे आडिट होईल, आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. मग आपण त्याला फ्रेम करून इथेच, या कोपऱ्यातल्या भिंतीवर टांगून ठेऊ. साऱ्या जगाला दाखवू आपले कर्तृत्व. ” 

हा शेवटचा उपरोध अतिशय तीक्ष्ण आणि मर्मभेदी होता. विषय भावनिक झाला होता. औद्योगिक परस्पर संबंधांत ताण निर्माण करू पहात होता. कामगारांच्या म्हणण्यात सुसंस्कृतता, सहृदयता, भूतदया, पर्यावरणाचे भान, जबाबदारीची जाणीव इ. अनेक जीवनमूल्ये व व्यवसायमूल्ये डोकावीत होती. त्यांचा आदर करणे आवश्यक वाटले मला.

क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग मीच म्हणालो, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर राहू दे शिडी तिथे. बघू नंतर. ” माझा निर्णय सगळ्यांना आवडला. “थक्यू सर. आम्ही काळजी घेऊ. ” असे म्हणत सगळे पांगले, आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागले. मी ही मिटिंगला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफेसमधे आलो. दिवसाच्या कामाचे शेड्यूल सहकाऱ्यांना समजून सांगितले. कामाच्या सूचना दिल्या आणि टेबलावर येऊन पडलेले टपाल पहायला सुरवात केली. तेवढ्यात एक कर्मचारी टेबलाजवळ आला आणि म्हणाला, “सर, तुमचं हे हातातलं काम झालं की जरा कॉरिडॉरमध्ये याल का?  बघा कसं झालंय ते. ” त्याचा विषय माझ्या लगेच लक्षात आला आणि मी म्हणालो, “नंतर कशाला?  हा आलोच, चल, तुझ्याबरोबर लगेच येतो. ” 

बाहेर येवून बघतो तो काय!  शिडी कोपऱ्यात पूर्वीसारखीच भिंतीला रेलून उभी होती. वरती गवताचे घरटे आकार घेतच होते. पण शिडीभोवती काही अंतरावर वर्तुळाकारात सुंदर फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. त्याच्या बाहेर साखळीचे कुंपण उभारले होते. शेजारी एक स्टँड उभा करून त्यावर सुवाच्य अक्षरात एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते, “please don’t disturb. Work in progress”.

जवळच्या एका झाडाच्या फांदीवर दोन पत्र्याची लहान डबडी लटकवली होती. एका डब्यात पाणी आणि दुसऱ्या डब्यात मुठभर राळे ठेवले होते. कामगारांची ही संवेदनशीलता, कल्पकता आणि योजकता पाहून मी थक्क झालो!

 विशेष म्हणजे ज्या ‘फाईव्ह एस’ या जपानी व्यवस्थापनतंत्राचा अवलंब करण्याचे धोरण कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारात राबवू इच्छित होती, ज्याचे प्रशिक्षण प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले होते त्या तंत्रातील सूत्रांचे तंतोतंत पालन या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले होते!

त्यांना हे तंत्र इथे अवलंबायला कोणी सांगितले?  कोणी शिकवले?  निसर्गातील सर्व जीवजंतू, वनस्पती, भूमि, जल, वायू, पर्यायाने आपले पर्यावरण या विषयी आमचे कर्मचारी इतके जागरूक, दक्ष आहेत?  ‘हो, आहेत’, हेच या प्रश्नाचे उत्तर. समोर दिसतंय हे त्याचे एक उत्तम उदाहरण!

निसर्गातील सर्व प्रकारच्या जीवनशृंखला जपण्याविषयी ते पुरेसे जागरुक आहेत, गंभीर आहेत हे पाहून धन्य वाटले. कारखान्यातील तंत्रज्ञान, कौशल्ये इ. विषयात त्यांना प्रशिक्षित केले जाते. ती व्यवसायिक गरज असते. तसे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कर्तव्ये, सुरक्षितता, समाज विकास इ. विषयी सुद्धा त्यांना प्रशिक्षित केले जाते हे आमच्या टाटा मोटर्सच्या प्रशिक्षण धोरणाचे वैशिष्ठ्य. हे त्यांना शिकवलेले ज्ञान खालपर्यंत झिरपत आहे हे सिद्ध करणारा हा प्रत्यक्ष पुरावा. प्रत्येकाला, पावलोपावली जे ज्ञान आणि भान दिले जाते, त्या ज्ञानाचा त्यांनी व्यवहारात केलेला हा उपयोग खरंच कौतुकास्पद होता.

 मी त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांचे आभारही मानले कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची संधी दिली म्हणून!

पुढील दोन महिने माझे सर्व उत्साही सहकारी एखाद्या पहिलटकरीण लेकीची काळजी तिचे आई-वडील जशी घेतात तशी काळजी घेत होते त्या विहगयुगुलाची!  त्या जोडप्याला कोणाचा जराही व्यत्यय होऊ नये म्हणून इतरांना तो रस्ताही तात्पुरता बंद केला त्यांनी. चक्क सूचनाच लावली त्या मार्गावर ” Entry prohibited”. ते स्वतःही सारे लांब उभे राहूनच काळजी घ्यायचे.

यथावकाश पक्षिणीने त्या घरट्यात चार अंडी घातली. दोघांनी आळीपाळीने ती उबवली. त्यातील तीन अंड्यातून पिले बाहेर आली. एक अंडे वाऱ्यामुळे खाली पडून फुटले. पुढील पंधरा-वीस दिवस हे पिलांचे भरण-पोषण-शिक्षणात गेले. काही दिवसात पिलांना पंख फुटले आणि एका रम्य सुप्रभाती चिवचिवाट करीत ती पिले घरट्यातून आकाशात आत्मविश्वासाने झेपावली!

ज्यांनी अथक परिश्रम घेऊन घरटे बांधले, त्यात आपला संसार थाटला, तीन पिलांना जन्म दिला, त्यांचे संगोपन करून जगायला सक्षम बनवले ते पक्षाचे जोडपे मात्र दुसऱ्या दिवसापासून अचानक दिसेनासे झाले. आम्ही कर्मचारी मित्रांनी दोन-तीन दिवस त्यांची वाट पाहिली. पण कोणीच फिरकले नाही!

साप्ताहिक सुटीनंतर कामावर आलो आणि आफीसमधे प्रवेश करताना सवयीप्रमाणे कॉरिडॉरच्या ‘त्या’ कोपऱ्याकडे लक्ष गेले. पण आता तर तो कोपराही रिकामा होता. शिडी आणि त्यावर उभारलेले घरटे अदृष्य झाले होते. फुलांच्या कुंड्या, साखळीचे कुंपण, जवळचा स्टँड, हे सारे उचलले गेले होते. खालची जमीन धुऊन पुसून स्वच्छ केली गेली होती. भिंतीवर एक नवीन पोस्टर चिकटवले होते. त्यावर लिहिले होते…

Project completed successfully!  

Thanks to all team members for their active support and participation.”

Birdees.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यसन – तसे आणि असे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ व्यसन – तसे आणि असे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

साक्षी शहरात लहानाची मोठी झालेली, पण तरीही बऱ्यापैकी orthodox मुलगी. गावातल्या शेती सांभाळून नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न झालं, आणि साक्षी अधून मधून शेतावरही जायला लागली.

दिवसभर शेतात काम करणाऱ्या बायका पाहिल्या की राहून राहून तिला प्रश्न पडायचा – यांची बाळं दिवसभर आयांशिवाय कशी राहत असतील?

न राहवून एके दिवशी तिने हा प्रश्न शेतात काम करणाऱ्या एका बाईला विचारलाच. आणि तिचं उत्तर ऐकून अवाक झाली. “तुला माहितीये की ती बाळं आयांशिवाय दिवस – दिवस कशी राहतात ते?  अग, त्या बायका त्या एवढ्याश्या मुलांना कप कप ताडी (दारू) पाजतात. मग काय दिवसभर ती लेकरं झिंगलेल्या गुंगलेल्या अवस्थेत रहातात.

जसजशी मुलं मोठी होतात, तशी आणखीन आणखी ताडी रिचवतात. बरं, आई वडिलांनी चार उपदेशाचे सल्ले सांगावेत, तर ते स्वत:च मुलांसमोर – आज काय आनंद झाला आहे म्हणून, तर उद्या दु:ख झालं म्हणून, नि परवा सहज म्हणून दारू पितात. मुलांना काय आदर्श रहाणार?

ही व्यसनं मुलांची आयुष्यं बरबाद करत आहेत. “

काळ वाटचाल करत राहिला.

नवऱ्याची नोकरी बदलल्यावर साक्षी त्याच्याबरोबर शहरात आली होती. तिलाही एक गोजिरवाणा मुलगा झाला होता आणि तो आता तेरा वर्षांचा – म्हणजे इंग्रजी परिभाषेत teen ager झाला होता. आज साक्षी, त्याच मैत्रिणीला, मुलगा सदैव कसा मोबाईल घेऊन बसला असतो ही तक्रार करायला फोन करत होती.

“अग, आल्या गेल्याशी सोड, आम्हा आई बाबांशीही बोलणं नाही. धड अभ्यासाकडे लक्ष नाही की खाण्याकडे. शाळेत जातो हे आमच्यावर उपकारच समज. घरी आला की मोबाईल सुरू.

रात्री कधी उठून पाहिलं तरी हा मोबाईलमध्ये डोस्कं खुपसून बसलेला असतो. रात्री झोपायला उशीर म्हणून सकाळी उठायला उशीर. चष्मा लागला आहे, मान दुखते म्हणतो.

या सगळ्याला तो जळला मोबाईल कारणीभूत आहे. आम्ही दोघंही त्याच्या कानीकपाळी ओरडत असतो – ठेव तो मोबाईल, जरा मैदानी खेळ खेळायला जा, जरा घाम तर येऊ दे. पण उपयोग शून्य. “

मैत्रिणीला साक्षीचेच जुने डायलॉग आठवले.

लहानपणी या मोबाईलचं व्यसन साक्षीनेच मुलाला लावले. त्याला दोन घास भरवायचे असले की ती त्याला मोबाईलवर व्हिडिओ लावून द्यायची. आपल्याला सीरिअल पहायची असली की त्याला मोबाईल गेम चालू करून द्यायची.

तोंडाने सांगायचं मोबाईल वापरू नकोस, पण या ना त्या कारणाने स्वतः साक्षी आणि नवरा, दोघेही खूप मोबाईल वापरायचे.

मग करोना काळात तर मुलांना, शाळेच्या बहाण्याने, मोबाईल वापरायचं परमिटच मिळालं. लेकाला स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला गेला आणि मग तो जास्तच वहावत, जास्तच गुरफटत गेला.

“माझं ऐकशील का? , ” मैत्रीण साक्षीला विचारत होती. “पहिलेप्रथम तुम्ही दोघं नवराबायको आपला मोबाईल वापर मर्यादित करा. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही तोंडाने त्यांना उपदेश करत असाल पण स्वतःच त्यात आकंठ बुडाले असाल, तर ही विसंगती मुलं पटकन ओळखतात.

मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम त्याला सांगा, समजावून द्या. त्याच्या झोपेची गणितं कशी बिघडली आहेत, आणि त्याने आरोग्य कसं बिघडलं आहे, ते दाखवून द्या.

Family time ठरवा, त्यात कोणी मोबाईल वापरणार नाही, एकमेकांशी गप्पा मारू असं ठरवा आणि अंमलात आणा.

हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण सुरुवात तर करा. दारूचं व्यसन असो वा मोबाईलचं, ते सोडलं पाहिजे असं व्यसनी माणसाला स्वतःहून वाटलं पाहिजे.

पण याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. लहान मुलाला गूळ खाऊ नकोस म्हणून उपदेश करण्यापूर्वी, स्वतः रामकृष्ण परमहंसांनी आठवडाभर गूळ खाणं सोडलं होतं, आणि मगच उपदेश केला होता.

व्यसन, मग ते दारूचं असो वा मोबाईलच्या अति वापराचं, दोन्हीही घातकच. ” समेवर येत मैत्रीण म्हणाली आणि साक्षीच्या विचारांना आणि तदनुसार कृतीला चालना देत, तिनं फोन ठेवला.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares