मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६३ आणि ६४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६३ आणि ६४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ६३ – – 

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।

हरीबोध सांडूनि वेवाद लागे ।

करी सार चिंतामणी काचखंडे ।

तया मागता देत आहे उदंडे । ६३ ।

अर्थ :: एखाद्याच्या घरी कामधेनू आहे. पण तो दुसऱ्याच्या घरी ताक मागू लागला तर ही हास्यास्पद गोष्ट ठरते. त्याप्रमाणे आपल्यापाशीच असणाऱ्या भगवंताकडे दुर्लक्ष करून एखादा व्यर्थ वाद घालू लागला तर त्याचे जीवन वाया जाते. एखाद्याच्या हातात चिंतामणी आहे, परंतु तो त्याच्याकडे केवळ काचेच्या तुकड्यांची मागणी करू लागला तर अशा माणसाचे वागणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे ठरते.

(हरीबोध – परमेश्वराचे ज्ञान, वेवाद – व्यर्थ /निष्फळ वाद, काचखंडे – काचेचे तुकडे)

विवेचन :: या आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला निजध्यास तुटला म्हणजे काय हे सांगितले. या श्लोकातही तोच मुद्दा पण वेगळ्या शब्दात ते आपल्याला समजावून सांगत आहेत. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा ठरतो तो त्याला मिळालेल्या बुद्धीच्या वरदानामुळे. या बुद्धीचा वापर करून तो आत्मज्ञान करून घेऊ शकतो. नराचा नारायण होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. असे असताना कधी कधी तो अगदी हास्यास्पद वागतो. घरी कामधेनू आहे म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी गोमाता आहे. पण याला त्याची जाणीवच नाही. हा दुसरीकडे ताक मागत फिरतो. इथे कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा भगवंत. तो सदैव आपल्याजवळच असतो. पण याची जाणीव नसलेले अज्ञानी जीव मात्र त्याला शोधत इकडेतिकडे फिरतात. भोंदूबाबा, साधूंच्या नादी लागतात. भगवंत आपल्याजवळ आहे. त्याला शोधायला खरं तर कुठेच जायची गरज नाही. ‘ मंदिरात अंतरात तोच नांदताहे… ‘ पण ही गोष्ट आमच्या लक्षातच येत नाही. आम्हाला परमेश्वरासंबंधी जे काही ज्ञान झाले आहे, ते सोडून देऊन आम्ही व्यर्थ, कोरडे आणि निष्फळ वादविवाद करत बसतो.

समर्थ जसे कामधेनूचे उदाहरण देतात, तसेच ते चिंतामणी रत्नाचेही देतात. चिंतामणी हे एक दिव्य रत्न असून त्यामुळे जे हवे ते प्राप्त होते. परंतु काही मूर्ख माणसे मात्र अशा या दिव्य चिंतामणीच्या संपर्कात आले असताना देखील त्याच्याकडे काचेच्या तुकड्याची मागणी करतात. कामधेनू किंवा चिंतामणी ही रूपके समर्थांनी वापरली आहेत. परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू किंवा चिंतामणी! इच्छिलेले देणारा. पण आम्हाला त्याचे महत्वाच कळत नाही. एकदा परमेश्वराची कृपा झाली की काही मिळवायचे बाकी राहत नाही. पण आम्ही मात्र जवळ कस्तुरी असूनही कस्तुरीच्या शोधात फिरणाऱ्या कस्तुरीमृगासारखे रानोमाळ भटकत राहतो. ‘ तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी ‘ अशी आमची अवस्था होते.

हरीबोधाइतकी मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. आम्हाला हे समजते पण उमजत नाही. आमची श्रद्धा डळमळीत होऊ लागते. हरीबोध किंवा परमेश्वराची प्राप्ती ही इतक्या सहजासहजी होणारी गोष्ट नसते. त्यासाठी विवेक आणि श्रद्धा आवश्यक असतात. संयमाने उपासना सुरु ठेवावी लागते. पण एकदा का श्रद्धा डळमळीत झाली की नाना प्रकारच्या शंका मनात घर करू लागतात. या आधीच्या श्लोकात समर्थांनी निजध्यास सुटला म्हणजे काय घडते ते सांगितले होते. तेच अशा वेळी घडते. मग परमेश्वर आहे का? तो मला प्राप्त होईल का? मी एवढा वेळ कशाला वाया घालवायचा? त्याऐवजी माझ्या हातात जे आनंदाचे क्षण आहेत, ते मी का गमवावे? असा मनुष्य संतांशी देखील व्यर्थ वादविवाद करीत बसतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता वाचणारे त्यातील सांगितलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून त्याचे अनुकरण करण्यापेक्षा मला किती कळते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत बसतात. ‘ ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक तरी ओवी अनुभवावी ‘ असे म्हटले जाते. पण आम्ही तिची अनुभूती घेण्यापेक्षा व्यर्थ, कोरडे वादविवाद करत बसतो. खरे ज्ञान तेच की हृदयापर्यंत पोहोचते.

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” मला विद्वानांबद्दल आदर आहे पण प्रेम नाही. “त्याचे कारण हेच आहे. विद्वान माणसे आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. पण भगवंत प्राप्तीसाठी जी तळमळ, श्रद्धा आणि प्रेम लागते, तिचा अभाव त्यांच्यामध्ये असतो. भगवंत उदंड देणारा दाता आहे. त्याच्याकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. भगवंताच्या रूपाने आपल्याकडे सर्वस्व असते. तोच असतो कामधेनू आणि चिंतामणी. तेव्हा त्याच्याकडे क्षुद्र गोष्टी कशासाठी आणि का मागायच्या? पैसा, संसार, मुलेबाळे, सत्ता, प्रसिद्धी, कीर्ती हे तर सारेच मागतात. पण मला भगवंत हवा आहे हे मला तीव्रतेने वाटले पाहिजे. त्यासाठीच समर्थांची ही तळमळ!

स्वसंवाद :: 

१) माझ्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींची (श्रद्धा, ज्ञान, साधना) मला खरी जाणीव आहे का?

२) मी बाहेर बाहेर शोधण्यात जास्त वेळ घालवतो का, की अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो?

३) मी आध्यात्मिक ज्ञान फक्त “समजून” घेतो, की खरोखर “जगतो”?

४) मी वाचन, चर्चा, वाद यांत अडकतो का, की प्रत्यक्ष साधना करतो?

५) माझ्या मनात शंका जास्त आहेत का, की श्रद्धा दृढ आहे?

६) मी “चिंतामणी” हातात असूनही “काचखंडे” मागत तर नाही ना याचा कधी विचार केला आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ६४ – – 

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।

अती काम त्या राम चित्ती वसेना ।

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।

अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।६४।

अर्थ :: मूढ म्हणजे मूर्ख मनुष्य. अशा व्यक्तीला आपले हित कशात आहे हे कळत नाही. त्याच्याजवळ साहजिकच दृढ बुद्धी म्हणजे निश्चयाचा अभाव असतो. ज्याच्या मनामध्ये विषयवासना मोठ्या प्रमाणात घर करून असतात, त्याच्या मनात साहजिकच भगवंताला स्थान मिळणे शक्य नसते. अती लोभी माणसाला शेवटी क्षोभाला म्हणजे क्रोधाला सामोरे जावे लागते. विषय विकारांच्या अती अधीन झालेला माणूस लाचार आणि दीनवाणा असतो.

विवेचन :: ‘अति सर्वत्र वर्जयेत ‘असे संस्कृत वचन आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो सर्वनाशाला कारणीभूत होतो. एखादी गोष्ट आरोग्याला हितकारक जरी असली तरी तिचा अतिरेक झाला तर तो घातक ठरतो. उत्तम प्रकृतीसाठी शरीराला व्यायाम आवश्यक असतो. पण त्याचा अतिरेक झाला तर अंतिमतः हानीच होते. त्याप्रमाणे सर्वच गोष्टींचे आहे. अती खाणे, अती बोलणे, अती निद्रा, अती उर्मटपणा अशी कोणतीही गोष्ट अती झाली की नुकसानच होते. ‘अती तिथे माती ‘ असे आपण म्हणतो ते यामुळेच.

कामवासना किंवा विषय सेवन आपल्या आयुष्यात जेवढे आवश्यक असते, तेवढे करण्याची परवानगी आपल्याला आपली संस्कृती देते. त्यासाठी एक विशिष्ट चौकट आपल्या संस्कृतीने आखून दिलेली आहे. त्यासाठी विवाह संस्कार आहे. तात्पर्य एका मर्यादेत विषय सेवन शास्त्रास मान्य आहे. परंतु विषय सुखाच्या अधीन होऊन त्यापलीकडे दुसरे काहीच न दिसणे हे तामसी वृत्तीचे लक्षण आहे. पशुसुद्धा आवश्यक तेवढाच कामवासनेचा आधार घेतात. प्रजोत्पादन हे त्यांचे उद्दिष्ट असते. परंतु माणूस मात्र कोणतीही मर्यादा पाळत नाही. कामातुराणां न भयं न लज्जा असे एक संस्कृत वचन आहे. सध्या विविध माध्यमांमुळे माणसांच्या वासना भडकवल्या जातात. त्यांचा अतिरेक झाला तर काय होते याचे प्रत्यंतर आपल्याला रोजच्या बातम्या पाहिल्या तरी येते.

अती विषयी माणूस हा मूढ बुद्धी असतो. मूढ बुद्धी म्हणजे आपल्या हिताचे न कळणारा. त्याला कोणी कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नाही. पटले तरी ऐकण्याची तयारी नसते. रावण हा स्त्रीलंपट होता. विषयलोभी होता. त्यातूनच त्याने सीतेसारख्या पतिव्रतेला उचलून आणण्याचे पातक केले. बिभीषण, मंदोदरी आदींनी त्याला वेळोवेळी समजावून सांगितले पण त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असल्याने त्याला आपल्या हिताचा सल्ला देखील रुचला नाही.

ज्यांच्या मनात सदैव विषयवासनेनेच ठाण मांडलेले असते, त्यांच्या चित्तात राम म्हणजे भगवंत राहीलच कसा? परमेश्वर प्राप्तीसाठी शुद्ध आणि निर्मळ चित्त हवे. बऱ्याच वेळा अशी काही माणसे भगवंताचे नाम घेताना दिसतात. पण ते लोकांची दिशाभूल करीत असतात. त्यांचा अंतर्गत हेतू वेगळाच असतो. मुहमें राम बगलमे छुरी अशी स्थिती असते. अशा माणसांपासून सावध राहिलेले बरे.

जशी अवस्था अती कामी माणसाची होते, तशीच अवस्था अती लोभी माणसाची होते. अग्नीत जेवढे तूप टाकले तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. काम आणि लोभ यांचे देखील असेच आहे. कुठे थांबायचे हे कळत नाही. गरज आणि लोभ यात अंतर आहे. गरजा मर्यादित असतात. लोभ किंवा हाव यांना कोणतीही मर्यादा नसते. लोभापोटी माणसाच्या हातून अनेक अपराध आणि नको त्या गोष्टी घडतात. आपल्या प्रपंचासाठी जेवढे आवश्यक तेवढे मिळवणे हे प्रापंचिक माणसाचे कर्तव्यच आहे. ते देखील योग्य मार्गाने! पण लोभी माणसाचा विवेक हरवलेला असतो. त्यामुळे माझे ते माझे पण तुझे तेही माझेच अशी त्याची वृत्ती होते. येनकेन मार्गाने तो ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी या गोष्टींची हाव माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाते आणि त्याचे अध :पतन घडवून आणते.

आपल्याला हवी ती गोष्ट नाही मिळाली की मग अशा माणसांचा संताप होतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘ अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. ‘ दुर्योधनाला राज्य आणि सत्तेची एवढी हाव होती की त्याने पांडवांच्या हिश्याचे राज्य तर सोडाच परंतु त्यांना पाच गावेही देण्यास नकार दिला. दुष्ट शकुनीच्या बदसल्ल्याला तो बळी पडली. त्याच्या हिताचे सांगणाऱ्या भीष्म, विदुर, श्रीकृष्ण आदींच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे त्याला मनःशांती नव्हती. त्याचे चित्त क्षोभाने व्यापलेले होते. शेवटी सत्ता आणि संपत्ती यांच्या अतिलोभाने त्याचा घातच केला.

म्हणूनच दासबोधात समर्थ सांगतात की ‘ अती सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुनि वर्तावे. ‘ धर्माने घालून दिलेल्या मर्यादेत सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोचि तो मानवी धन्य होतो. ‘ असेच वागणे आपल्या हिताचे आहे. जे अती विषयी माणसे असतात त्यांची अवस्था व्यवहारात अत्यंत दीनवाणी होते. त्यांना किंमत राहत नाही असे समर्थ म्हणतात. दैनंदिन जीवनातही अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यांच्या लोभ किंवा कामवासनेच्या अतिरेकामुळे लोकांमध्ये त्यांची छी थू होते. माणूस जेव्हा विषयांच्या अधीन होतो, तेव्हा तो त्याचा मालक न राहता गुलाम होतो. मग ही गुलामगिरी त्याला वाटेल तसे वागण्यास भाग पाडते. त्यात आपण लाचार किंवा दैन्यवाणे होत जात आहोत हेही त्याच्या लक्षात येत नाही.

स्वसंवाद :: 

१. माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचा ‘अतिरेक’ होतोय का? (उदा. सोशल मीडिया, खाणे, राग किंवा कामाचा अट्टाहास) 

२. माझी कोणतीही कृती ही ‘गरज’ आहे की ‘लोभ’, हे मी ओळखू शकतो का?

३. जेव्हा मला माझ्या आवडीची गोष्ट मिळत नाही, तेव्हा माझ्यात ‘क्षोभ’ (राग) निर्माण होतो का? तो शांत करण्यासाठी मी काय करतो?

४. माझे चित्त ‘निर्मळ’ ठेवण्यासाठी मी दिवसातला किती वेळ स्वतःला आणि परमेश्वर चिंतनाला देत

– क्रमशः श्लोक ६३ आणि ६४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘इंद्रगोप’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘इंद्रगोप’ ☆ श्री दिवाकर बुरसे

पावसाच्या पहिल्या सरींसोबत अवतरणारा लाल मखमली निसर्गदूत

पहिला पाऊस पडतो… ग्रीष्माच्या तप्त उन्हाने करपलेल्या धरतीवर अचानक आकाशातून पाण्याचे टपोरे थेंब येवून आदळतात. क्षणार्धात भूमीच्या उदरात दडलेला गंधकोश भंगतो आणि मातीचा रम्य गंध आसमंतात दरवळतो. झाडांच्या फांद्यांवरची नवी पालवी थरथरते. सृष्टीच्या अंगावर जणू नवजीवनाची शाल पांघरली जाते. अंबरात सप्तरंगी अर्धगोल इंद्रधनुष्य प्रकटते आणि अशाच वेळी, काळ्या आईच्या कुशीत वर्षभर लपून बसलेले काही लालभडक, मखमली जीव अचानक धरतीवर प्रकटतात. हिरव्यागार गवतावर विखुरलेले ते लाल ठिपके पाहताना वाटते, जणू निसर्गाने धरतीच्या भाळी कुंकवाची उधळण केली आहे! हा जीव म्हणजे ‘इंद्रगोप’.

पर्जन्याचा देव इंद्र. कदाचित म्हणूनच आपल्या रसिक पूर्वजांनी पावसाळ्यात आकाशात उमटणाऱ्या सप्तरंगी कमानीला ‘इंद्रधनुष्य’ आणि धरतीवर प्रकटणाऱ्या या लाल मखमली जीवाला ‘इंद्रगोप’ अशी नावे दिली असावीत.

हा इंद्रगोप म्हणजे — मराठीतला आपला परिचित मृगकिडा. मृग नक्षत्रात तो दिसू लागतो म्हणून त्याला ‘मृगकिडा’ म्हणतात. महाराष्ट्रात गोसावी किडा, किटकुल अशीही त्याची नावे आहेत. संस्कृतमध्ये तो इंद्रगोप आणि वीरबहूती, तर इंग्रजीत Red Velvet Mite म्हणून ओळखला जातो. भारतीय लोकजीवनात त्याचे आगमन म्हणजे पावसाळ्याची चाहूल. म्हणूनच तो केवळ एक जीव नसून ऋतू परिवर्तनाचा लाल मखमली संदेशवाहक मानला गेला आहे.

कालिदासाच्या काव्यातला लाल ठिपका

भारतीय काव्यविश्वात निसर्गाच्या सूक्ष्म छटा शब्दबद्ध करणाऱ्या महाकवी कालिदासांनी इंद्रगोपालाही आपल्या ‘मेघदूत’, ‘ऋतुसंहार’ आणि ‘कुमारसंभव’ या प्रमुख रचनांत वर्णन करून अमर केले आहे.

‘मेघदूता’च्या पूर्वमेघ, श्लोक ४० चा आरंभ _’रक्तैरिन्द्रगोपैश्चितां’_ अशा शब्दांनी पर्वताच्या शिखराच्या सांध्यावर, लाल इन्द्रगोप किड्यांनी सजलेल्या, ‘कामरूपा’ नावाच्या हिरण्य नदीचे वर्णन केलंय.

तपःक्लेशक्षामां… संनद्धैरिन्द्रगोपकणैरिव ॥

या ‘कुमारसंभव’ – सर्ग ३, मधील २६ व्या श्लोकात पार्वतीच्या तपस्वी वेशाला सौंदर्य देण्यासाठी इंद्रगोपाची उपमा दिली आहे. तपस्विनी असूनही तिच्या शरीरावर पडलेली फुलं म्हणजे वेलीवर बसलेले इन्द्रगोप!

‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकात विरहाने व्याकूळ झालेला राजा पुरूरवा आपल्या प्रिय उर्वशीचा शोध घेत अरण्यात भटकत असतो. हिरव्या गवतावर पसरलेल्या लाल इंद्रगोपांकडे पाहून त्याला क्षणभर वाटते— उर्वशीच्या लाल किनारीच्या वस्त्राचा एखादा तुकडाच तर इथे पडलेला नाही ना?

प्रेम आणि विरहाच्या भावनांना निसर्गाच्या रंगांत मिसळून पाहण्याची ही कालिदासांची अद्वितीय दृष्टी.

‘ऋतुसंहार’मध्ये त्यांनी पावसाळ्यातील भूमीचे वर्णन करताना म्हटले आहे…

श्लोक:

इन्द्रगोपकचित्राङ्गा प्रावृट्काले च मेदिनी ।

भाति सम्प्रति सा देवी रत्नाभरणभूषितेव ॥

(सर्ग २ प्रावृट् /वर्षा वर्णन श्लोक २)

अनुवाद: पावसाळ्यात ही पृथ्वी इंद्रगोप नावाच्या लाल किड्यांनी आणि रानफुलांनी चित्रविचित्र नटलेली असते. त्यामुळे ती आता रत्नजडित अलंकारांनी भूषवलेल्या देवीसारखी शोभून दिसते.

आजही पहिल्या पावसानंतर लाल मखमली इंद्रगोपांनी सजलेली हिरवीगार भूमी पाहताना कालिदासांच्या उपमेची प्रचिती येते.

किडा नव्हे, अष्टपादी चमत्कार

लोकभाषेत त्याला किडा म्हटले जाते; पण प्रत्यक्षात तो कीटक नाही. इंद्रगोप हा Trombidiidae कुळातील अष्टपादी (Arachnid) प्राणी आहे. कोळी आणि गोचीड यांचा तो दूरचा नातलग. वर्षातील बहुतांश काळ तो जमिनीखाली, ओलसर बिळांमध्ये लपून राहतो. पहिल्या दमदार पावसानंतर मोठ्या संख्येने बाहेर येणारा हा जीव पूर्वीपासून पावसाचा नैसर्गिक दूत मानला जातो.

धरतीचा लाल प्रहरी

इंद्रगोपाचे सौंदर्य जितके मोहक, तितकेच त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. तो वाळवी, मुंग्या, मावा आणि इतर अनेक सूक्ष्म किड्यांची अंडी खातो. त्यामुळे शेतीतील हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. मातीतील सूक्ष्म जीवसृष्टीचे संतुलन राखण्यातही त्याचा मोठा वाटा असतो. उपयुक्त जीवाणू, बुरशी आणि सेंद्रिय पदार्थांच्या विघटन प्रक्रियेसाठी तो अप्रत्यक्षरीत्या हातभार लावतो. म्हणूनच इंद्रगोप हा निरोगी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा जैविक निर्देशक मानला जातो. शेतकऱ्याचा हा इवलासा मित्र नकळतपणे जैविक कीडनियंत्रणाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.

रेशमी प्रेमबाग

निसर्गात प्रेम व्यक्त करण्याच्या किती विलक्षण पद्धती असतात याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे इंद्रगोप. मीलनाच्या काळात नर माइट रेशमासारख्या धाग्यांचा मार्ग तयार करतो. त्यावर पाने, काटक्या आणि सूक्ष्म वस्तूंनी सजावट करतो. या रेशमी मार्गावर तो शुक्रपुटिका ठेवतो आणि नृत्यसदृश विभ्रमांनी मादीला आकर्षित करतो. या लहानशा जीवाने उभारलेली ती प्रेमबाग म्हणजे निसर्गातील एक अद्भुत प्रणयकथा आहे.

अळी ते शिकारी

अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्यांना आरंभी सहा पाय असतात. या अवस्थेत त्या अळ्या इतर सूक्ष्म किटकांवर परजीवी म्हणून जगतात. नंतर वाढीच्या प्रक्रियेत त्यांना आणखी दोन पाय येतात आणि ते पूर्ण विकसित अष्टपादी बनतात. त्यानंतर ते स्वतंत्रपणे जमिनीत राहून सूक्ष्म प्राण्यांची शिकार करतात.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारी त्यांची भूमिका निसर्गातील परस्परसंबंधांची सुंदर जाणीव करून देते.

माणसांचा मित्र

लाल रंगामुळे अनेकांना हा जीव धोकादायक वाटतो; परंतु तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे. तो माणसांना किंवा पाळीव प्राण्यांना चावत नाही, दंश करत नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी तो केवळ कडू आणि दुर्गंधीयुक्त द्रव्य स्रवतो. त्यामुळे पक्षी आणि इतर शिकारी त्याच्यापासून दूर राहतात. त्याचा लाल रंग आक्रमणाचे प्रतीक नसून, निसर्गाने त्याच्या अस्तित्वाभोवती उभारलेली एक सावधगिरीची खूण आहे.

या लाल रत्नांचे जतन करूया

रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक हा इंद्रगोपांसाठी सर्वांत मोठा धोका आहे. व्यापक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अनेक कीटकनाशकांमुळे हे उपयुक्त जीव नष्ट होतात. जैविक उपायांचा वापर, कमी नांगरणी, सेंद्रिय आच्छादन आणि मातीतील ओलावा टिकवून ठेवणे यांमुळे त्यांचे संरक्षण होऊ शकते. निसर्गातील अशा लहान जीवांचे रक्षण म्हणजे शेतीचे, मातीचे आणि पर्यावरणाचे रक्षण होय.

धरतीच्या उदरातील जीवंत रत्ने

पूर्वी ग्रामीण भागात इंद्रगोपाला हळद-कुंकू वाहून मान दिला जाई. त्यामागे अंधश्रद्धा नव्हती; तर निसर्गातील प्रत्येक जीवाशी असलेले आत्मीय नाते होते.

आज विज्ञानाने इंद्रगोपाचे पर्यावरणीय महत्त्व सिद्ध केले आहे; परंतु आपल्या पूर्वजांनी ते खूप आधी ओळखले होते. पहिल्या पावसाच्या सरींनंतर जेव्हा हिरव्यागार धरतीवर हे लाल मखमली जीव विखुरलेले दिसतात, तेव्हा वाटते—आषाढाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी भूमातेने आपल्या ओंजळीतली माणकं, पोवळ्यांची भरभरून उधळण केली आहे. त्यातील प्रत्येक रत्न, प्रत्येक कण जणू निसर्गाने जपून ठेवलेला एक छोटासा चमत्कार असतो. तोच हा इंद्रगोप—पावसाचा दूत, मातीचा मित्र आणि सृष्टीच्या सौंदर्याला लाभलेला लाल मखमली स्पर्श!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले जेव्हा काळजी घेतात तेव्हा

खूप छान वाटतंय..

 

एका आईच्या हृदयातून निघालेले बोल:

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले,

आज ते मला, आई, खाऊन बघ छान आहे, म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलंडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

चालताना उड्या मारु नकोस रे पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई हळू, पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज.. सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते..

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई, हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं…

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनीकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

किती मस्त वाटतंय..

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

 

खूप धन्य वाटतंय..

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “सैराट होऊन ये…” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सैराट होऊन ये…” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

वेशीपर्यंत आलायस… आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस… पटकन माप ओलांड आणि आत ये… कंजूसपणा करू नको… दिल खोलके बरस… येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये… येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव… तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल… एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील… ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल, पण तरी पण तिथे थांब… कारण तिचा धनी गेल्यावर पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा तिलाच ओढायचाय… म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा… आणि तिथल्या मातीत रुजून राहा… मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड… नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड… हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस… धन-धान्यासाठी ये, छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये… पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव… आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव… सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे, फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे… वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमा-गरम भज्यांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये… तर्राट होऊन ये… सैराट होऊन ये… आणि सगऴीकडे झिंग झिगं झिंगाट करुन टाक…

 लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

व्यावहारिक ज्ञान

ठरल्याप्रमाणे लेखमालेच्या या २६व्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या काही व्यावहारिक ज्ञानाविषयीच्या अभंगांचा विचार करू.

दान, धर्म, पुण्य कर्म करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, परंतु पुण्य कर्म करताना ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या अभंगात महाराज काय सांगतात पहा…

सर्वांभूती द्यावे अन्न/ द्रव्य पात्र विचारोन//

उपतिष्ठे कारण/ तेथे बीज पेरीजे//

सर्व भूतमात्रांना अन्नदान करावे, पण द्रव्य मात्र योग्यता पाहूनच द्यावे. जेथे बी उगवेल असे वाटते तेथेच ते पेरावे. थोडक्यात दान हे सत्पात्री असावे.

पुण्य करिता होय पाप/ दुग्ध पाजोनी पोशीला साप//

करोनी अघोर जप/ दुःख विकत घेतले//

भूमी पाहता नाही वेगळी/ माळ बरड एक काळी//

उत्तम निराळी/ मध्यम आणि कनिष्ठ //

म्हणोनी विवेके /काही करणे ते निके//

तुका म्हणे फिके/ रुची नेदी मिष्ठान्न//

सापाला दूध पाजले तर पुण्य कर्म न होता पाप होते, कारण दूध पिऊनही साप गरळच ओकणार. एखादा जारण मारण मंत्र म्हणून दुसऱ्याचे वाईट करता करता, आपले स्वतःचेच वाईट करून घेतो. पृथ्वी सगळी सारखी असली तरी त्यातही माळ जमीन, खडकाळ जमीन, काळी जमीन, कमी जास्त कसाची जमीन असे भेद असतात, म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणे, नीट पारखून करणे फार महत्त्वाचे आहे. मिष्ठान्न केले आणि त्यात साखरच घातली नाही, तर ते चविष्ट लागेल का? याचसाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट मोठ्या विवेकाने केली पाहिजे.

माणूस कसा ओळखावा याविषयी तुकाराम महाराज सांगतात.

नाही सर्व येत जोडील्या वचनी/

कवित्वाची वाणी कुशलता//

सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे/

अनुभवाच्या गुणे रुचो येते//

काय आगी पाशी शृंगारिले चाले/

पोटीचे उकले कसा पाशी//

तुका म्हणे येथे करावा उकल/

लागेचिना बोल वाढवूनी//

मनात ईश्वराची भक्ती नसताना जर कोणी शब्दाला शब्द जोडून काव्य करील तर ते देवाला कसे मान्य होईल? ज्याच्या ठिकाणी खरा अनुभव आहे, त्याच्या बोलण्याने दुसऱ्याला वेधक वाटते कारण ते सत्य असते. अनुभवामुळे त्यातील तथ्य कळते. तुकाराम महाराज अधिक स्पष्टतेसाठी उदाहरणे देतात. हिणकस धातूला सोन्याचा मुलामा केला तर तो शृंगार अग्निपुढे उघडा पडतो. आणि कसोटी पुढे त्याच्या आतील हिणकस धातू ओळखू येतो. ज्या ठिकाणी हृदयात खरा अनुभव असेल तेथे स्पष्टीकरण देण्याची जरुरी पडत नाही, खरी योग्यता लगेच कळते. ते पुढे म्हणतात…

लचाळाच्या (अजागळ) कामा नाही ताळा वाळा/

न कळे ओंगळा उपदेश//

वचनचर्येची नकळे चाचणी/

ऐसी संघस्टनी अमंगळ//

समय न कळे वेडगळ बुद्धी/

विजाती ते शुद्धीचाच चाट//

तुका म्हणे याचा धिक्कारची बरा/

बहुमती खराहुनी हीन//

याचाच अर्थ असा की, जो कोणी अजागळ मनुष्य आहे, त्याच्या कामात काहीच ताळमेळ नसतो आणि त्या मुर्खाला (महाराज त्याला घामट म्हणतात) कितीही समजावून सांगितले तरी त्याची समजण्याची क्षमताच नसते. त्याला शास्त्र, त्यातील मर्म, काही कळत नाही. तेव्हा अशा लोकांपासून चार हात दूरच राहावे. या मतिमंद लोकांना काळ, वेळ समजत नाही. त्यांची बुद्धी विसंगत असते. अशा लोकांपासून दूर राहणे उत्तम! अशी कितीतरी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ” बरे बाबा तुझेच खरे. ” असे बोलून जास्त वाद न घालता त्याच्यापासून लांब जावे असे महाराज सांगतात. अशा माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. ते लोक गाढवाहुनही नीच समजावे. त्यांचा धिकार करावा.

स्वभावोदुरतिक्रमः– भिन्न भिन्न स्वभावाची माणसे रोजच्या रोज आपल्या जीवनात येत असतात. महाराज म्हणतात की ज्यांचा स्वभावच चोरी करण्याचा असतो, त्यांच्या ध्यानीमनी तोच ध्यास असतो.

चोराचिया धुडका मनी / वसे ध्यानी लांछन//

त्याचप्रमाणे पाऊस पडावा तसे आम्ही बोलत असतो. परंतु ज्यांच्या अंगी दोषच आहेत त्याला आमचे बोलणे झोंबते. आम्ही हिताचे बोललो तरी त्याची तडफड होते. आपल्यालाही हा अनुभव वारंवार येतो कारण आपले सरळ बोलणे समोरचा वाकडेच धरतो. अशा माणसांच्या वाऱ्याला उभे राहू नये.

एक एका सहाय्य करू/ अवघे धरू सुपंथ//

कोण जाणे कैसे परी/ पुढे उरी ठेविता//

अवघे धन्य होऊ आता/ स्मरविता स्मरण//

तुका म्हणे अवघी जोडी/ ते आवडी चरणांची//

यासाठी तुकाराम महाराज सर्व लोकांना सांगतात की, तुम्ही आम्ही मिळून एकमेकांच्या सहाय्याने चांगल्या वाटेवरून चालू या, चांगले जगूया, नाहीतर म्हातारपणी परमार्थ करू अशी चालढकल केली तर पुढे काय वाढून ठेवले आहे ते कोणास ठावे? म्हणून उद्या वर काही ढकलू नका. जे काही करायचे ते आज करा, आत्ता करा. नामस्मरण करणारा व करून घेणारा असे आपण सर्वजण धन्य होऊ. विठोबाच्या चरणांची आवड धरली म्हणजे सर्व काही जोडले जाते व महान पुण्य प्राप्त होते.

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती/

व्याघ्रही न खाती सर्प तया//

विष ते अमृत आघात ते हित/

अकर्तव्य नीत होत त्यासी//

दुःख ते देईल सर्व सुख फळ/

होतील शितळ अग्नी ज्वाळा//

आवडेल जीवा जीवाचिये परी/

सकळा अंतरी एक भाव//

तुका म्हणे कृपा केली नारायणे/

जाणिजे ते येणे अनुभवे//

तुकाराम महाराज सांगतात, आपले चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. वाघासारखे हिंस्र आणि सापासारखे विषारी प्राणी आपल्याला काही त्रास देत नाहीत. (भगवान शंकराच्या गळ्यातील नागाप्रमाणे) विषाचे अमृत होते.

मीराबाईच्या सच्य्या भक्तीमुळेच तिने राणाजीने दिलेला विषाचा प्याला रिचविला.

शरीरावर आघात झाले तरी ते हितकर ठरतात. आपल्या हातून चुकून एखादे अनुचित कर्म घडले पण ते नीतीला धरून असले तर शुभंकरच ठरेल. दुःखातही सुख प्राप्त होईल आणि आगीचा जाळ शांत होईल. शुद्ध चित्ताचा माणूस लोकांना प्राणप्रिय असेल. त्याच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच राहील. असा अनुभव स्वतःबद्दल ज्याला येतो त्याला भगवंत कृपावंत झाला आहे असे समजावे.

कंथा प्रावर्ण/ नव्हे भिक्षेचे ते अन्न//

करी यापरि स्वहित/ विचारूनी धर्मनित//

देऊळ नव्हे घर/ प्रपंच परउपकारक//

विधीसेवन काम/ नव्हे शब्द राम राम//

हत्या शास्त्र धर्म/ नव्हे निष्काम ते कर्म//

तुका म्हणे संती/ करुनी ठेविली आईती//

वरील अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

व्यावहारिक आणि अध्यात्मिक दृष्टीने काही वस्तूंमध्ये कसा फरक असतो याविषयी महाराज बोलतात.

संन्याशाची कंथा(झोळी) आणि सामान्य जनांची वस्त्रे सारखी समजू नयेत. त्याचप्रमाणे पवित्र भिक्षान्न इतर अन्नाप्रमाणे समजू नये. धर्म व नीती विचारात घेऊन स्वहित साधावे. देवालय हे इतर घरांप्रमाणे सामान्य घर नव्हे. परोपकार करताना तो संसारी माणूस इतरांप्रमाणे नव्हे. शास्त्राने सांगितलेल्या नियमांनुसार विषय सेवन केले असता तो माणूस विषयलोलूप नव्हे. राम हा शब्द इतर शब्दांप्रमाणे साधा नाही. क्षत्रियाने युद्धात शत्रूचा वध केल्यास ती हत्या न होता क्षात्रधर्मपालन होते. आणि निष्काम बुद्धीने केलेले कोणतेही कर्म हे इतर कर्माप्रमाणे बंधक नाही. हे नीतिशास्त्र आहे, याप्रमाणे सर्वांनी वागावे.

याचाच अर्थ असा रोजच्या जीवनात इतरांसमवेत वावरत असताना व्यावहारिक ज्ञान वापरून आणि नैतिक धर्माचे पालन करून माणसाने आपले आचरण ठेवावे.

क्रमशः… २६ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हातारा नव्हे महातारा! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारा नव्हे महातारा! श्री नागेश शेवाळकर

वयाची पन्नाशी उलटली की मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे निवृत्तीनंतर काय करावे? वेळ कसा घालवावा? अनेक जण या विचाराने एवढे बेचैन, अस्वस्थ असतात की, निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी येते. नोकरी असताना वेळच नसतो आणि निवृत्तीनंतर वेळच वेळ असतो.

काही व्यक्ती अशाही असतात त्या निवृत्तीला विरक्ती समजतात! आपण सेवेतून निवृत्त होत आहोत म्हणजे आपण संसाराच्या मायाजालातून निवृत्त होत आहोत, असा विचार असतो. परंतु तसे नाही, संसार हे असे चक्रव्यूह आहे, त्यातून बाहेर पडणे भल्याभल्यांना जमत नाही. आजकाल बहुतेक कुटुंबातील मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यांच्या पश्चात नातवंडांची जवाबदारी साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठांवर येऊन पडते. नातवांच्या बाललीला, त्यांची छोटी मोठी कामे करणे हा फार मोठा विरंगुळा असतो. नातवंडासोबत रमले की, सारे दुःख दूर पळून जातात.

निवृत्तीनंतर घरातील छोटी मोठी कामे करताना स्वतःच्या आवडीच्या छंदाकडे लक्ष दिले पाहिजे. अशा छंदामुळे आयुष्य सुसह्य होते, सकारात्मक होते. नोकरीमुळे आवडीच्या छंदाकडे दुर्लक्ष झालेले असते. भजनाची, लेखनाची, गायनाची, वाद्य वाजवण्याची, वाचनाची आवड अनेकांना असते. त्यामुळे निवृत्ती म्हणजे आपल्या आवडत्या छंदांना पुनरुज्जीवित करण्याची संधी सहर्ष स्वीकारली पाहिजे…

दुसरीकडे अनेक जण निवृत्ती ही आसक्ती समजून वाटचाल करतात. ‘मला हे हवं, ते हवं. मला हे मिळालेच पाहिजे… ‘ अशा हटवादी भूमिकेत वावरतात. निवृत्त होईपर्यंत असलेल्या ‘हम करे सो कायदा… ‘ ही सवय या वळणावर घातक ठरते. मुले मोठी झालेली असतात, कमावती असतात, त्यांचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे लहानसहान गोष्टींमध्ये वारंवार सल्ला द्यायलाच पाहिजे असे नसते. मुलांच्या चुका सातत्याने दाखवून दिल्याने मुले कंटाळतात. ते ज्येष्ठांपासून दुरावतात, संवाद कमी होतो. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये आपण एकटे पडल्याची भावना बळावते. एकटेपणाची जाणीव होताच चिडचिड, संताप, अशा भावना बळावतात.

वयाची साठी गाठलेली व्यक्ती म्हणजे जणू छोट्या मोठ्या आजाराचे माहेरघर! गुरूवर्य प्राचार्य राम शेवाळकर यांनी असे म्हटले आहे की, साठीनंतर येणारा आजार कधी एकटा येत नाही तर सोबत अनेक आजारांना घेऊन येतो. एकदा का आजाराचा समूह मानवाच्या शरीरात शिरला की, हे आजार मानवाच्या अंतापर्यंत त्याच्या सोबतीला असतात. त्यामुळे प्रत्येकाने पन्नाशीनंतर असे कोणतेही आजार होऊ नयेत ही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी निवृत्ती म्हणजे संसाराबाबतीत जशी विरक्ती नसावी तशीच संसाराबद्दल अतिरिक्त आसक्तीही नसावी.

प. पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी एक छान मंत्र दिला आहे, ते म्हणतात, ‘स्वतः च्या मुलाकडे राहतानाही पाहुण्याप्रमाणे राहिले पाहिजे. ‘ वरवर पाहिले तर हे वाक्य अत्यंत साधे वाटत असले तरी आनंदी, समाधानी जीवन जगण्याचा तो एक साधा मार्ग आहे. सुखी जीवनाचे सार आहे…

त्यादिवशी नेहमीप्रमाणे आम्ही पाच-सहा ज्येष्ठ नागरिक एकत्र बसलो होतो. एकानंतर एक असे अनेक विषय चर्चेला येत होते. प्रत्येक जण, चर्चेत भाग घेऊन स्वतःचे मत मांडत होता. चर्चा सुरू असताना एक जण स्वतःचा उल्लेख ‘म्हातारा’ असा करत होता. ते ऐकून एक व्यक्ती म्हणाली,

“स्वतः ला म्हातारा समजू नका तर महातारा असे म्हणा. म्हातारा हा साडेतीन अक्षरांनी सुरू होणारा शब्द किती अर्थपूर्ण आहे ते लक्षात घ्या. म्हातारा या शब्दातील अर्धा ‘म’ आहे ना, त्याला आपण पूर्णत्व देऊ! म्हातारा या शब्दाचा झाला ‘महातारा’! महातारा किती छान संकल्पना आहे ना! आता या नवीन शब्दाचा थोडा वेगळा विचार करू या.

ग्रहमंडळातील महातारा म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव! धरणीमातेला अंधारातून बाहेर काढून लख्ख प्रकाशमान करणारा महातारा म्हणजे भास्कर… रवी..! आपणही म्हातारे होऊन अडगळीत पडण्यापेक्षा महाताऱ्याप्रमाणे आपल्या गृहमंडळाला प्रकाशित करीत राहूया. मुलांच्या संसाराला, जमेल तसा प्रकाश देत राहू… अनुभवाची ऊर्जा देत राहू. म्हणजे मदत करीत राहू. “

त्या व्यक्तिने समोर ठेवलेली ही नवीन परिभाषा आणि ज्येष्ठांची थेट सूर्यासोबत केलेली तुलना ऐकून आम्ही सारे भारावून गेलो. त्याचवेळी आम्हाला आमच्याकडे असलेल्या एका अनोख्या तेजस्वी शक्तीची जाणीव झाली.

एका वेगळ्या स्फूर्तीदायक अवस्थेत निघताना वाटले, खरेच साठ वर्षाचे जीवन म्हणजे समृद्ध अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेली एक नौका! सुख-दु:ख, संकटं, हाल अपेष्टा, अपेक्षा, समाधान, आनंद, यशापयश असे अनेक अनुभव असलेल्या महाताऱ्यांनी आपल्या समृध्द अनुभवाचे दालन हळूवार, सहजतेने खुले केले तर त्या लखलखीत प्रकाशात त्यांच्या घरातील ग्रहमंडळ तर प्रकाशित होईलच परंतु, आजूबाजूचे ‘ग्रह- उपग्रह’ यांच्याही जीवनात लख्ख प्रकाश पडेल. तेव्हा महाताऱ्यांनो, चला, उठा. पसरवा अनुभवाचा लख्ख प्रकाश! करा सारी सृष्टी प्रकाशमान! … अशा तेजोमय विचाराने प्रेरित होऊन मी घरी पोहोचलो. सौभाग्यवती वाहिनीवर एक नाटक बघत होती. मी महातारा या विचाराने एवढा प्रभावित झालो होतो की, मला त्या नाटकाचे नावही ‘म्हातारा नव्हे महातारा! ‘ असेच असल्याचे दिसत होते…

००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी करण्यासारखी परिस्थिती” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी करण्यासारखी परिस्थिती…” ☆ श्री मंगेश मधुकर

काळजी करण्यासारखी परिस्थिती झालीये खरी…

झालं असं की,

 

सध्या 

स्त्री-पुरुष 

मुलं-मुली 

लहान 

मोठा 

श्रीमंत 

मध्यमवर्गीय 

गरीब 

पैसेवाला 

कफ्फलक 

या धर्माचा 

त्या धर्माचा 

या जातीचा 

त्या जातीचा

हुशार 

भोळा 

शिकलेला 

अडाणी 

पुढारी 

कार्यकर्ता 

उद्योगपती

कामगार 

शिक्षक

विद्यार्थी 

नोकरीवाला 

बिझनेसवाला 

बंगल्यातला 

फ्लॅटमधला 

झोपडपट्टीतला 

कारवाला 

रिक्षावाला 

बाईकवाला 

सायकलवाला

सगळ्यांची 

एकच गरज 

पाणी

—-

नेहमी चिंब भिजवणाऱ्या पावसानं आता डोळ्यात “पाणी” आणलयं.

धोक्याची घंटा जोरजोरात वाजतेय.

जुन्या सवयी बदला.

‘पाणी’ जपून वापरा.

आत्ताच नाही तर नेहमीच.

नाहीतर..

“पा णी बा णी”

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कॅडेव्हर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“कॅडेव्हर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हा शब्द अनेक सर्वसामान्य लोकांसाठी नवा शब्द असण्याची शक्यता आहे. नवा म्हणजे नव्याने निर्माण झालेला नव्हे तर वाचकासाठी नवा असलेला, आजवर अज्ञात असलेला शब्द! वैद्यकीय परिभाषेतील असे अनेक शब्द आपल्याला अनोळखी असतात.

Cadaver कडेवअर असा याचा साधारण उच्चार आढळतो.. आणि अर्थ आहे मृतदेह… corpse!

विकार, आजार, वेदना आणि मृत्यू यांपासून तात्पुरती का होईना सुटका मिळावी म्हणून मानवाने वैद्यकीय शास्त्राचा डोलारा उभारला. शरीराचा आतून अभ्यास करणे अनिवार्य झाले. मुळात शरीर रचना हाच एक चमत्कार आहे. कोणत्याही कृत्रिम रचनेला मानवी देहाची सर कधीच येणार नाही. म्हणून अभ्यासासाठी खरेखुरे शरीरच लागते. जिवंत देहांचा अभ्यास करण्यावर मर्यादा असतात, पण मृतदेहांबाबत पूर्ण मोकळीक मिळते. या गरजेतून मग मृतदेह प्रत्यक्ष उघडून पाहून त्यांच्या अंतर्गत रचनांचा अभ्यास करण्याचा प्रघात पडला. आणि मग या देहांच्या साहाय्याने वैद्यकीय अभ्यास, संशोधन, प्रयोग सुरू झाले.

Andreas Vesalius (1514-1564) यांनी वैद्यकीय अभ्यासासाठी सर्वप्रथम शवविच्छेदन केल्याचे समजले जाते. १८३२ मध्ये याबाबतीत ब्रिटनमध्ये कायदा अस्तित्वात आला. भारतात आरोग्य हा राज्य विषय असल्याने आपल्याकडे राज्यांचे स्वतंत्र कायदे दिसतात. महाराष्ट्रात १९४९ मध्ये सदर कायदा केला गेला.

अधिकृत शासकीय परवानगी मिळाल्याने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मृतदेह भावी डॉक्टर्स मंडळींचे पहिले गुरू म्हणून भूमिका बजावू लागले! जणू हे मृतदेह पुन्हा सजीव झाले. असुरांचा नाश करण्यासाठी आपल्या देहाचे दान देण्याची बाब भारताला नवी नाही. दधिच ऋषींनी राक्षस निर्मुलनासाठी स्वत:ची हाडे देण्यासाठी देह अग्नीच्या स्वाधीन केल्याचे सांगितले जाते. विविध प्रकारच्या व्याधी या जर राक्षस मानल्या तर त्यासंदर्भात मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करणारे व तो संकल्प सिद्धीस जाण्यास साहाय्य करणारे सर्वच ऋषी मानले गेले पाहिजेत!

कायदेशीर देहदान १९४९ पासून अस्तित्वात आले. तर अवयवदान १९९४ पासून कायदेशीर मान्यताप्राप्त झाले. देहदान आणि अवयवदान स्वतंत्र बाबी आहेत. देहादानात व्यक्तीचा देह काही काळ वापरला जातो. तर अवयवदानात आवश्यक अवयव काढून इतरांसाठी वापरले जातात आणि देह अंत्यसंस्कारासाठी परत केला जातो. वैद्यकीय अभ्यासात एक मृतदेह आणि दहा विद्यार्थी असे प्रमाण अपेक्षित असताना आता वीस ते पन्नास विद्यार्थी आणि एक मृतदेह अशी स्थिती आहे.. कारण वाढती वैद्यकीय महाविद्यालये आणि सतत विकसित होणारे संशोधन.

देहदानाची चळवळ सुरू होण्याआधी वैद्यकीय महाविद्यालये बेवारस प्रेते उपलब्ध होण्यावर अवलंबून असत. आधुनिक पोलिस तपास पद्घती, संपर्क व्यवस्था, माहिती संप्रेषण व्यवस्थेमुळे मृतांच्या वारसांचा शोध घेण्याची प्रक्रिया जलद आणि परिणामकारक झाल्याने बेवारस प्रेतांची संख्या खूप कमी झाली! शिवाय एड्स, काविळ यांसारख्या गंभीर कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह, भाजणे आणि तत्सम बाबींमुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या देहांचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकत नाही. यामुळे cadevers उपलब्ध होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेऊन ही कल्पना रुजवली आणि उदात्त विचारांच्या सुसंस्कृत, शिक्षित नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. पुण्याची प्राप्ती, समाधान, समाजसेवा या विविध भावना प्रबळ ठरल्या.

देहदानाची कार्यवाही ही पूर्णत: कायदेशीर, नैतिक मूल्यांचे भान ठेवून पूर्ण केली जाते. अभ्यासासाठी मृतदेह दान मिळाल्यावर संपूर्ण व्यवस्था संबंधित वैद्यकीय महाविद्यालय करते. सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, विद्यार्थी एकत्र येऊन प्रार्थना करतात, या वेळी नातलग उपस्थित राहू शकतात, आणि मगच तो देह वैद्यकीय विद्यार्थांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला जातो. आणि साधारणत: वर्षभरानंतर उर्वरीत देह, अवशेषांवर त्या त्या व्यक्तीच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जातात.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात विद्यार्थ्यांना हिप्पोक्रटिक आणि कडेवअर शपथा दिल्या जातात. त्यांपैकी अभ्यासासाठी उपयोगात आणावयाच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वी साधारणपणे पुढील प्रमाणे शपथ दिली जाते, जी इंग्रजी भाषेत असते. पुढे मराठी भाषांतर दिले आहे.. जे इंटरनेटवरून घेतले आहे.

“मी अत्यंत गंभीरपणे आणि निष्ठेने प्रतिज्ञा करतो की, मी या मृतदेहाचा (शवाचा) सर्वोच्च आदर, सन्मान आणि प्रतिष्ठा कायम ठेवीन. मी या देहदात्याला माझे ‘प्रथम शिक्षक’ (पहिले गुरु) मानतो, ज्यांचे निःस्वार्थ दान मला वैद्यकशास्त्राचे ज्ञान आणि कला शिकण्यास मदत करेल. मी माझ्या संपूर्ण अभ्यासात व्यावसायिकता, गोपनीयता (निजता) आणि नैतिक आचरण पाळेन. मी या दात्याने केलेल्या सर्वोच्च त्यागाचा सन्मान करेन आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी, करुणेने आणि सचोटीने करेन. माझ्या या ‘मौन शिक्षकांचे’ (Silent Teachers) अमूल्य योगदान माझ्या सदैव स्मरणात राहील आणि मी त्याचा आदर करेन. ” समाजात आणि समाजातील विविध स्तरांमध्ये विविध प्रकारचे लोक असतात. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट स्तरामधली आहे म्हणून ती अमुक एक प्रकारे वागेल असे नसते. सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणातील व्यक्तीला वैद्यकीय अभ्यासक्रमात कसा प्रवेश मिळाला आहे, याच्या चर्चेस अर्थ नाही! व्यक्तीवरील संस्कार हे हल्ली काही समाजसापेक्ष राहिलेले नाहीत. एकूणच तरुणांची बदललेली मानसिकता आणि सामाजिक अस्वास्थ्य ही मुख्य कारणे आहेत. असो.

मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी देणे आणि मग विद्यार्थ्यांना त्याच्या साहाय्याने शिकवले जाणे आणि त्यासाठी त्या देहाचे विच्छेदन करणे वेगळे… आणि मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन करणे वेगळे. शिकवण्यासाठी उपयोगात आणला जाणारा देह क्रमाक्रमाने विच्छेदीत केला जातो. अभ्यास शाखेनुसार ते ते विद्यार्थी विशिष्ट अवयवाचा विशेष अभ्यास करतात. उदा. नेत्रतज्ज्ञ होण्यासाठी विद्यार्थी डोळे आणि तत्सम भागाचा अभ्यास करतील आणि त्यासाठी दान दिलेल्या देहाच्या संबंधित भागाचा अभ्यास करतील. आणि हे तज्ज्ञ, अनुभवी, निष्णात वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक यांच्या देखरेखीखाली केले जाते! तर उत्तरीय तपासणीत देह एकदाच विच्छेदित केला जातो, निष्कर्ष नोंदवले जातात आणि देह अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. मृत्यूच्या कारणांची सखोल तपासणी आवश्यक असल्यास त्यादृष्टीने महत्वाचे अवयव/त्यांचे नमुने राखून ठेवून ते संबंधित प्रयोगशाळांकडे पाठवले जातात. गुन्ह्यासंदर्भात काहीवेळा पुन्हा विच्छेदन केले जाऊ शकते.

मनुष्य जिवंत असताना त्याचा देहाचा योग्य तो सन्मान राखला जाणे गरजेचे, अपेक्षित असले तरी निर्जीव देहाचाही तेवढाच सन्मान राखला जाणं नीतिमत्तेस धरूनच आहे. सर्वच माणसांची वागण्याची, विचार करण्यची पद्धत एकच असेल, असं होत नाही. किमान सार्वजनिक जीवनात आदर्श नीतीमत्तेने वागणे हा संबंधित व्यक्तीवर झालेल्या संस्कारांचा, किंवा त्या व्यक्तीने स्वत:वर केलेल्या संस्कारांचा, परिसर, मित्र यांनी टाकलेल्या प्रभावाचा भाग असू शकतो. कुणाच्या मनात काय सुरु आहे, त्याला काय म्हणायचे आहे, त्याला काय वाटते यावर इतरांचे काहीही नियंत्रण असू शकत नाही.

वैद्यकीय क्षेत्राचे मानवी जीवनात अत्यंत मोठे स्थान आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती सन्माननीय ठरतात. यांत अनेक त्यागी व्यक्ती समाजाने पाहिल्या आहेत. काही व्यक्तींच्या वर्तनाने संपूर्ण गटाला दोषी ठरवणे खूप चुकीचे आहे. या क्षेत्रातील लोक दुर्गंधी सहन करतात, बहुतेक वेळा आव्हानात्मक, नकारात्मक वातावरणात काम करीत असतात, त्यांच्या प्रती आपण आभारी असले पाहिजे!

देहदान, त्या देहाचे विच्छेदन करताना संबंधित वैद्यकीय विद्यार्थ्यांचा आपापसांत झालेला तथाकथित अश्लील संवाद याबाबत सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या विषयावरून देहदानाबाबत काही ऊहपोह सुरु आहे. या चर्चेच्या दरम्यान एका महिलेने फेसबुक comment मध्ये “मी देहदानाचा संकल्प रद्द करते आहे” अशा आशयाचे विधान केलेले वाचले. यावरून सार्वजनिक ठिकाणी, उघडपणे बोलल्या गेलेल्या शब्दांचे परिणाम समाजावर किती दूरगामी होऊ शकतात, याची कल्पना यावी. हे नुकसान सहजी भरून येणारे नाही. मात्र देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. आपले जनमानस तसे विचारी आहे, या एका प्रकारामुळे लोक य देहदानासारख्या पवित्र कार्यापासून दुरावले जाणार नाहीत, अशी खात्री आहे आणि अपेक्षासुद्धा!

देहादानात आलेला देह आपल्या सास-यांचा आहे हे माहीत असूनही त्या देहाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देणा-या एका महिला डॉक्टर यांच्या विषयी मी वाचले आहे… त्यामुळे किमान माझी तरी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबद्दलची आदराची भावना कायम आहे. कुणा अविचारी, उथळ व्यक्तीच्या तद्दन घाणेरड्या शेरेबाजीमुळे ही भावना दुखावली जाणार नाही! जगाच्या बाजारात मातीही मिळते आणि मोतीही… काय घ्यायचे आपण ठरवायचे!

(मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही. केवळ माहिती घेऊन लिहिले आहे. यातील तांत्रिक माहिती चुकीची, अपुरी असू शकते. देहदानास पाठिंबा आणि कायद्याने अत्यावाशाय्क असलेल्या मरणोत्तर वैद्यकीय तपासणीचा पुरस्कार यासाठी हा लेख लिहिला आहे. खम्मम येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेतल्या गेलेल्या शपथेचे छायाचित्र संदर्भांसाठी साभार वापरले आहे.)

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

 

गर्भगृह – जिथे “मी” संपतो, तिथेच सत्य सुरू होतं.

 

एक प्रश्न विचारतो.

उत्तर देण्याची घाई नको.

फक्त… आत जा.

तुम्ही कधी तरी गर्भगृहात उभे राहिलात?

नक्कीच राहिले असाल,

तेव्हा —

तुम्हाला नक्की काय वाटलं?

शांतता?

भीती?

ओढ?

रडू?

याखेरीज असंख्य भावना

की… काहीच नाही?

ते “काहीच नाही” हेसुद्धा उत्तर आहे.

कारण गर्भगृह तुम्हाला काहीतरी देत नाही —

ते तुमच्याकडून काहीतरी घेतं.

 

 गर्भगृह म्हणजे फक्त एक खोली नाही.

मंदिराच्या आत जाताना आपण दरवाजे ओलांडतो —

पण ते दरवाजे केवळ भौतिक सामग्रीचे नसतात.

ते मनाच्या थरांचे दरवाजे असतात.

पहिला दरवाजा — बाहेरचा गोंगाट सोडून येणारा “मी”

दुसरा — प्रश्नांनी भरलेला, अपेक्षांनी थकलेला “मी”

तिसरा — उत्तराच्या शोधात असलेला, एकटा “मी”

आणि चौथा —

जिथे “मी” उरत नाही.

तिथेच गर्भगृह सुरू होतं.

 

 गर्भगृहात अंधार का असतो?

 

गर्भगृह अंधारं असतं — हा योगायोग नाही.

जसा आईच्या उदरात अंधार असतो, तरीही तिथेच जीव आकार घेतो —तसंच गर्भगृहाच्या त्या काळोखात तुमचे संकल्प, तुमची श्रद्धा, तुमचं भविष्य आकार घेतं.

बाहेरचा प्रकाश डोळ्यांना दिसतो.

आतला प्रकाश आत्म्याला जाणवतो.

गर्भगृह तुम्हाला त्या आतल्या प्रकाशाकडे वळवतं.

म्हणून तिथे दिवे कमी असतात — कारण तिथे तुमचीच ज्योत पेटायची असते.

 

 मंत्र का म्हणतात तिथे?

कारण तिथे भाषा चालत नाही — तर तिथे चालते कंपन, स्पंदन.

तुम्ही जेव्हा “ॐ नमः शिवाय” म्हणता —

तेव्हा तुम्ही फक्त शब्द उच्चारत नाही,

तुम्ही स्वतःच्या पेशींना एक संदेश देत असता.

त्या नादात तुमची भीती विरघळते,

तुमचा अहंकार झुकतो,

आणि त्या क्षणी —

देव तुमच्यात शिरतो, तुमच्यासमोर नव्हे.

 हजारो वर्षांची ऊर्जा

जुन्या मंदिराच्या गर्भगृहात एक वेगळाच भार असतो —

तो दगडांचा नाही.

तो हजारो माणसांच्या अश्रूंचा, प्रार्थनांचा, श्रद्धेचा भार आहे.

शतकानुशतके तिथे कोणी आलं —

मुलासाठी, आजारासाठी, दारिद्र्यासाठी, प्रेमासाठी.

त्या सगळ्यांनी आपापलं काहीतरी तिथे ठेवलं.

ती मूर्ती दगडाची किंवा धातूची नाही — ती लक्षावधी माणसांच्या विश्वासाची घनमूर्ती आहे.

म्हणून तिथे गेलं की काहीतरी होतं.

ते “काहीतरी” विज्ञानाला अजून ज्याला नाव देता आलेलं नाही.

 

 गर्भगृह “सगळ्यांसाठी” का नसतं?

इथे एक खरं बोलतो —

गर्भगृहाचे नियम कोणाला कमी लेखत नाहीत.

ते त्या जागेची कंपनशक्ती टिकवण्यासाठी आहेत.

जसं एखाद्या शस्त्रक्रियागृहात

सगळ्यांना आत सोडत नाहीत —

तिथे तयारी लागते, शुचिता लागते —

तसंच गर्भगृहात मनाची शुचिता लागते.

तुम्ही स्वच्छ आहात की नाही हे कपड्यांवरून नाही —

ते तुमच्या हेतूवरून ठरतं.

 आणि हे सगळ्यात महत्त्वाचं — गर्भगृहात जायलाच पाहिजे असं नाही.

जर तुमचं मन स्थिर असेल, आणि जर तुम्ही कुठेही बसून डोळे मिटलेत आणि त्या शक्तीशी जोडले गेलात तर ती स्पंदनं तुमच्यापर्यंत येतात. अंतर नाही. भिंत नाही. दरवाजा नाही. तरीही ती स्पंदने पोचतात

श्रद्धा हाच रस्ता आहे.

 

शेवटी एकच प्रश्न —

तुमच्या कुलदेवतेचं स्थान तुमच्यासाठी काय आहे?

एक जिवंत ऊर्जास्थान —

जिथे तुम्ही रिकामे होऊन जाता आणि भरून येता?

की एक फोटो काढण्याची जागा?

की एक पर्यटन स्थळ?

हे वाचताना जर आत कुठेतरी काहीतरी हललं,

एखादा श्वास खोल गेला,

डोळे ओले झाले —

तर तुमचं गर्भगृह आत आहे.

ते कधीच बंद नसतं.

गर्भगृहात तुम्ही प्रवेश करत नाही —

तिथून परतताना

तुमचं सत्य घरी परततं.

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कपडे दाखवण्याचा कार्यक्रम…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कपडे दाखवण्याचा कार्यक्रम…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

घराघरात अनेक कार्यक्रम होतात. काहीवेळा ते अचानक तर काहीवेळा ठरवून होतात. हा दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे घरात मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरल्यानंतर खरेदी केलेले कपडे दाखवण्याचा कार्यक्रम.

मुलगा किंवा मुलगी पाहण्याचे कार्यक्रम काही प्रमाणात कमी झालेले आहेत. तेच अगोदर बघतात, आणि नंतर आपल्याला सांगतात. यात आपल्याला बघण्याशिवाय किंवा बघत राहण्याशिवाय काही करायचं नसतं. तो भाग निराळा. महत्वाचा आहे तो घेतलेले कपडे दाखवण्याचा.

क्रिकेटचे सामने कसे दोन तीन राऊंड मधे होतात, तसाच हा दाखवण्याचा कार्यक्रम दोन तीन राऊंड मधेच होतो. टिम पण वेगळ्या असतात. त्याचा फायनल राऊंड सुध्दा होतो. क्रिकेटचा सामना पहायला जसे काही प्रेक्षक हे सगळ्या राऊंडला असतात, तसेच काही या वेळी सगळ्या राऊंडला असतात.

या प्रत्येक वेळी जो उत्साह असतो तो कमालीचा असतो. बर्‍याचदा तर खरेदीला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा थोडासाच कमी या दाखवण्याच्या कार्यक्रमाला लागतो. पण कार्यक्रम सगळा साग्रसंगीत असतो.

खरेदीला कुठून सुरुवात झाली, सोबत कोण होत, कोण आल नाही, तर कोण आल नाही तरीही चाललं असतं पण अगदी वेळेवर त्यांनी येऊ का… अस विचारल्याने एक जास्तीची गाडी वेळेवर घ्यावी लागली, रस्त्यात कुठे, कशासाठी, कितीवेळ थांबलो याची रनिंग काॅमेंन्ट्री सुध्दा असते. यात कौतुुक आणि थोडी तक्रार दोन्ही असतं.

मग अगदी कार्यालयात जाण्यापासून परत घरी येईपर्यंत कोणकोणते कार्यक्रम कोणकोणत्या क्रमाने आहेत त्याच पध्दतीने हे कपडे लावलेले असतात. व त्या कपड्यांच्या दर्शनाचा व प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरु होतो.

दुकानात सगळे बसल्यावर जसं पहिल्यांदा थंड पाण्याचा राऊंड होतो, तसाच घरातही होतो. दुकानात जसा सुरुवातीला आपला थंड प्रतिसाद असतो तसाच इथेही काही प्रमाणात जाणवतो. पण नंतर वाढतो.

दुकानात सगळे लाईट लावलेले असतात तस्सेच हाॅल मधले सगळे लाईट लावत लाईट कलर पासून दाखवायला सुरुवात होते. आणि रंग खुलत जातात तसतसा या गप्पा पण रंगत आणि खुलत जातात.

अगोदर साध्या, देण्याघेण्याच्या साड्या दाखवल्या जातात. या साड्या वरवर पाहून बाजूला ठेवल्या जातात. म्हणजे खास जेवणात वरणभात जरी आवडीने खाल्ला तरी तो जेवढ्या प्रमाणात वाढतात, व जेवढ्या लवकर संपतो तितकाचवेळ या साड्यांना मिळतो.

मग सुरुवात होते… ही कार्यालयात जातांना, मुद्दामच थोडी हलकी घेतली… ही सिमंती पुजनाला, ही रात्रीच्या जेवणाला, ही सकाळी विधी करतांना, ही लग्नाच्या वेळी, ही जेवताना, ही लक्ष्मी पुजनाला, आणि ही कार्यालयातून घरी येतांना… ही पण थोडी हलकीच आहे… सांगण जरी भरभर वाटलं तरी दाखवणं मात्र हळूहळूच असतं…

थोडी हलकीच घेतली यावर वजनाला… कि किमतीला… हा प्रश्न कोणाच्या तरी चेहर्‍यावर पडतो. आणि मग साडी सारखाच तो प्रश्न उलगडला जातो. अग खरंच… पण वजनालाच हलकी वाटते… किंमत साधारण इतकीच असते हल्ली…

आपल्या हलक्या साडीचीही किंमत (मान) ठेवली म्हणून दाखवणार्‍यालाही बरं वाटतं… हलक्या साडीला कोणीच हलक्यात घेतलं नाही याचं समाधान चेहर्‍यावर दिसतं. आता खास विधीसाठी घेतलेल्या खास साड्या परत एकदा त्या गर्दीतून बाहेर येतात. आणि मग त्याचा रंग, डिझाईन, पोत, प्रकार यावर नाना प्रकाराने चर्चा होते. साड्यांचा एक एक पदर उलगडला जातो त्याच प्रमाणात साडी बद्दल काय वाटतं याचे विचार सुध्दा उलगडले जातात. हळूहळू त्या साड्या आणि विचार दोन्ही पसरतात.

या साड्या, त्यांचे पदर, व त्यावर व्यक्त केलेले विचार जसजसे पसरत जातात तसेच पाहणारे सुध्दा असलेल्या जागेवर जमेल तस पसरण्याच्या प्रयत्नात असतात. व याच पसार्‍यात चला चहा, किंवा थंड करते याची घोषणा होते.

थोडक्यात पहिल्यांदा झालेल्या पाण्याच्या राऊंड नंतर चहाचा राऊंड करावा वाटतो इतका वेळ (खरतर काळ म्हणायचं होतं पण काळ जरा जास्तच लांबल्यासारखं वाटतं) मधे गेलेला असतो.

चहा, किंंवा थंड झाल्यावर परत देण्याघेण्याचे काही खास कपडे असतात. ते नातेवाईक, त्यांच वय, व त्यांची शारिरीक स्थिती यानुसार ड्रेस मटेरियल पासून नऊवारी साडीपर्यंत लांब असतं. आणि मग कोणाकोणाला काय, का देणार याची चर्चा होते. यात कोणाला काय द्यायच यावर आपली मतं सुध्दा व्यक्त केली जातात. यात बराच वेळ घालवला अस लक्षात आल्यावर, सिनेमाच्या शेवटी जशी नामावली दाखवतात पण ती पटापट पुढे सरकते, तशी माणसांची खरेदी सरकते. हा झब्बालेंगा, हे कपडे पॅट शर्ट साठी. सुट घ्यावा का असा विचार झाला होता. शेवटी ठरवलं तुम्हाला जे सुट वाटतील तेच घ्या. होना… यांच्या कपड्यांना काही जास्त वेळ लागत नाही खरेदीला. आमच्या चार पाच साड्यांपैकी नक्की कोणत्या तीन घ्याव्या याचा विचार करे पर्यंत यांचे कपडे पिशवीत घालून तयार होते. शेवटी दिड तास घालवल्यावर सगळ्याच ठेवाव्या असं ठरलं. मागे पुढे लागतातच. आणि मग निघतांना या दोन परत ठेवायची इच्छाच होत नव्हती, मोह आवरतच नव्हता. आणि आता इतकी खरेदी झाल्यावर लगेचच काही परत खरेदीची वेळ येणार नाही म्हणून या पण ठेवल्या.

त्या दोन ठेवलेल्या साड्यांबरोबर मग सगळ्या साड्या परत नीट ठेवल्या जातात.

चर्चा इथेच संपत नाही. मग चर्चा सुरु होते ती ब्लाऊज पीसची. घेतले नसतील तर कुठे घ्यायचे. आणि घेतले असतील तर कोणाकडे, कधी, आणि कसे शिवायला टाकायचे. याची…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares