मॅटिनीला लागलेले चित्रपट बघणे, हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक कैफ असायचा. तो आम्ही पुरेपूर अनुभवला. त्याचे पडसाद आणि आठवणी, वयाच्या साठीतही निश्चित उर्जा देणाऱ्या आहेत.
साधारण ४०-५० वर्षांपूर्वीचा हा कैफ आज आठवताना एक जाणवते की, केवळ चित्रपट, नट नट्या इतकेच मर्यादित नव्हते. ते तर असायचेच; पण त्याही सोबत इतर अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झाला आहे. पण गोठवलेले ते क्षण अजूनही ताजे आहेत.
तसे कुणाचेही चित्रपट चालत; पण खरा सम्राट होता देव आनंद. शिवाय राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमारही अनेकदा भेटत,,,शम्मी कपूर हा तर एक्का होता. सी.आय.डी, नौ दो ग्यारह, उजाला, तुमसा नही देखा, हमराही, ससुराल इत्यादी अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले.
त्या स्वप्नभारल्या शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा जायचा. हा तो मॅटिनीचा काळ!
हा सगळा काळ भन्नाट गाण्यांचा होता. भगवान दादांचा ‘अलबेला ‘ देव आनंद चा’ असली नकली’ राजकपूरचा ‘श्री420’ दिलीप कुमार चा ‘कोहिनूर ‘ या चित्रपटांच्या गाण्यांवर पडद्यावर पैसे उधळले जात. प्रेक्षक पडद्यासमोर डान्स करीत, एक “”बघणेबल सीन” असायचा.
मुळात थिएटर मधील चित्रपट ही संस्कृतीच आता संपली आहे. प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत हे जवळपास नाहीच.इंटरव्हल झाल्यावर येणारा थंड पेयांच्या बाटल्यावर ओपनर फिरवल्यावर येणारा आवाज आता नाही, गरम शेंगांचे कोन नाहीत. इंटरव्हल संपल्यावर वाजणारी घंटा,,, आतला मायावी काळोख, पडदा सरकल्यावर येणारा आवाज, सगळे अजून कानात साठवलेले आहेत. हा कैफ मल्टीप्लेक्स मध्ये नाही, का नाही सांगता येत नाही. मॅटिनीचं एक वेगळेपण होतं, अगदी प्रांजळपणे सांगायचं तर चित्रपट साक्षरता वगैरे प्रकार त्याकाळी नव्हते. होते फक्त “एक वेडेपण”,,
आज सगळे बदलले आहे, टीव्ही, मोबाईल वर चित्रपट आहेत. एकपडदा थिएटर जाऊन मल्टीप्लेक्स आले, आणखी एक संस्था संपली,, काळाबाजारवाले हा देखील एक अविभाज्य भाग होता. या सगळ्या संस्कृतीचा!! खरं तर मॅटिनीला काळाबाजार नसायचा. त्यामुळे सिनेमा बजेट मध्ये साजरा व्हायचा ;;
डोअरकीपर इतका स्थितप्रज्ञ माणूस सापडणे अवघड. उशीरा येणाऱ्या प्रेक्षकांना बॅटरीचा प्रकाश पाडून सीट दाखवली जायची. आपल्या सीटचा वेध घेत बसल्यावर उशीरा आलेल्या प्रेक्षकाचा एक प्रश्न ठरलेला, “‘किती वेळ झाला सुरू होऊन?”” या प्रश्नाला काही अर्थ नसायचा. शेजारचे उत्तर देखील तेच असायचे “”आत्ताच टायटल संपली”” या सगळ्या उपाशी पोटीचे (अनेक वेळा ) हे आख्यान म्हणजे “मॅटिनी”.
सिनेमाच्या आठवणी अनेकरंगी आहेत, मॅटिनी त्यातील एक छटा, केवळ माझ्याच नव्हे तर अनेक रसिकांच्या आणि विविध गावांच्या छटा आहेत. उद्या सिनेमा चा इतिहास लिहिला तर “मॅटिनीचा ” उल्लेख नक्की असेल.
अविमोह त्यागून कर्मफलाचा… – कवी मनोहर कवीश्वर संग्राहक – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
सुधीर फडके यांनी गायलेले खालील अजरामर गीत म्हणजे भगवद्गीतेचा परिपाकच !
— कवी मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेल्या आणि बाबूजींनी गायलेल्या एका गाण्यात जणू गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया
युद्धभूमीवर अर्जुनाची जी अवस्था झाली, ती अवस्था तुमची, आमची, सर्वांची रोजच होत असते. आपले म्हणवणारे लोक आपल्या विरुद्ध जाऊन बंड पुकारतात, तेव्हा आपले जीवन कुरुक्षेत्राप्रमाणे भासू लागते. मात्र, आपली एवढी पुण्याई नाही, की भगवान श्रीकृष्ण आपले मनोबल वाढवण्यासाठी आपल्या समोर प्रगट होतील. यासाठीच भगवंतांनी अर्जुनासकट सर्व मानवजातीला उद्देशून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते म्हणजेच भगवद्गीता. भगवंतांनी गीता गायली, तो दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जाऊ लागला. यापूर्वी आपल्याकडून गीतेचे पठण, चिंतन झाले नसेल, तर गीता जयंतीच्या मुहूर्तावर हे गीता पठणास सुरुवात करावी.
आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची तात्विक उत्तरे गीतेत सापडतात. फक्त ती डोळसपणे शोधता आली पाहिजेत. समजवून घेता आली पाहिजेत . प्रत्यक्ष गीता समजली नाही, तर गीतेतील अनुवाद वाचावा, भावार्थ वाचावा. येनकेनप्रकारेण भगवद्गीतेतील बोध आपल्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. असाच एक प्रयत्न कवी मनोहर कवीश्वर यांनी एका गाण्यात केला आहे. त्या गाण्यात, जणू काही गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया.
विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था,
कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था।
भगवान श्रीकृष्ण पार्थाची अर्थात अर्जुनाची समजूत घालतात, नात्यांचा मोह त्यागून ज्या कार्यार्थ युद्धभूमीवर आला आहेस, ते कार्य अर्थात धर्मयुद्ध करण्यासाठी सज्ज हो. या कर्तव्यापासून दूर पळू नकोस. ज्यांना आपले म्हणवतोस, त्यांनीही तुला आपले समजले असते, तर ते आज तुझ्याविरूद्ध युद्धासाठी सरसावले नसते. तू ही तुझे कर्तव्य ओळख आणि शस्त्र हाती घे.
शस्त्रत्याग तव शत्रूपुढती नच शोभे तुजला,
कातर होसी समरी मग तू, विरोत्तम कसला,
घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था।
तू क्षत्रिय आहेस. युद्धभूमीवर पाठ फिरवून जाणे तुला शोभणार नाही. युद्धाच्या क्षणी तू भयभीत झालास, तर तुला कोणीही विरोत्तम म्हणणार नाही. हे युद्ध तुझ्या एकट्याचे नाही, तर धर्मरक्षणार्थ आहे. तुला धीर एकवटून आलेल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे.
कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा,
मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा,
इहपरलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा।
जेव्हा कर्तव्याची वेळ येते, तेव्हा कर्तव्यापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आड येत राहतात. त्या मोहाच्या क्षणांना बळी न पडता आपण आपले काम चोख बजावायचे असते. तसे झाले नाही, तर तू भरकटत जाशील. ध्येयापासून परावृत्त झाल्यावर तुझ्या जगण्याला अर्थ उरणार नाही आणि ती सल आयुष्यभर तुला जगू देणार नाही.
कुणी आप्त ना कुणी सखा ना,जगती जिवांचा,
क्षणभंगूर ही संसृती आहे, खेळ ईश्वराचा,
भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था।
आपले आपले म्हणवणारे लोकच आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. स्वत:च्या सावलीवरही विश्वास ठेवू नका. तीदेखील अंधारात आपली साथ सोडून जाते, मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? जोवर सगळे छान, सुरळीत सुरू आहे, तोवरच ही नाती आहेत, कठीण काळ येता, कोणीही कोणाला विचारत नाही. हा कठीण काळ नात्यांचा खरा परिचय करून देतो. म्हणून त्यांच्यावर विसंबून न राहता, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि तुझ्या हातांनी तुझे आयुष्य घडव.
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो,
कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणुत भरलो,
मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था।
चांगले-वाईट प्रसंग हाताळण्यासाठी तू समर्थ आहेस. दुसरे कोणी किंवा साक्षात परमेश्वर माझ्या मदतीला येईल याची वाट बघत बसू नकोस. मला शोधण्यात वेळ दवडू नकोस. मी अणुरेणुत सामावलो आहे. तुुझे कर्म योग्य असेल, तर मी कायम तुझ्या सोबत असेन. यशाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपयशाने खचून जाऊ नकोस. ही सर्व माया मीच निर्माण केली आहे. त्यात न अडकता, तुला कर्तव्यनिष्ठ राहायचे आहे, हे लक्षात ठेव.
कर्मफलाते अर्पुन मजला, सोड अहंता वृथा,
सर्व धर्म परि त्यज्युन येई शरण मला भारता,
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था।
*तुझे प्रत्येक कर्म भगवंताला साक्षी ठेवून कर. फळ काय मिळेल, याचा विचार न करता, तुझे कर्म करत राहा. केलेल्या कर्माचा वृथा अभिमान बाळगू नकोस. तू एक माध्यम आहेस. कर्ता करविता परमेश्वर आहे, हे कायम लक्षात ठेव, म्हणजे तुला अहंकाराची बाधा होणार नाही आणि अहंकाराचा वारा लागला नाही, तरच तू तुझ्या कर्तव्याबाबत जागरूक राहशील.
कवी: – मनोहर कवीश्वर
प्रस्तुती :-:ज्योत्स्ना गाडगीळ
संग्राहिका :– सौ शशी नाडकर्णी नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ वारसा….राधा ओक… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
काल सासूबाईंचे ८३ वर्षाचे भाऊ आले होते. त्यांच्याकडे बघून कोणी त्यांच्या वयाचा अंदाज बांधून दाखवावा. तरतरीत चेहरा, दात घट्ट, ऐकायला छान येतंय, हातात काठी नाही, डोळ्याला चष्मा नाही. वयपरत्वे किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सोडता तरुणांना लाजवेल असा उत्साह. मध्यंतरी मी एका पुस्तकासाठी लेखन केलं होत. त्या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या लेखिका स्वतः पुस्तक द्यायला आल्या होत्या. वय वर्ष ८०+. तरीही आवाज खणखणीत, डोळे उत्तम, सरळ बांधा. फार दूर कशाला माझ्याच घरात माझ्या सासूबाई ७४ वर्षांच्या. पण आजही या वयात माझ्या दुप्पट काम करतात. या सर्वांची उदाहरणे द्यायचा एकच उद्देश म्हणजे मागच्या पिढीला मिळालेलं उत्तम आरोग्य म्हणजे देणगीच नाही का? आणि इथूनच मला माझ्या नवा लेखाचा विषय मिळाला तो म्हणजे वारसा.
आज आपल्या पैकी ७०% घरांमध्ये सकाळी नाष्ट्यापासून संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत घरात प्रत्येक कामाला बाई असतेच. नाश्ता, स्वयंपाक, केर, फरशी, भांडी. या प्रत्येक कामासाठी बहुतेक घरांमध्ये कामाची बाई लावलेली दिसते. या मुख्य कामांच्या यादीमध्ये भाजी आणणे, निवडणे, चिरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, घर आवरणे, बेसिन बाथरूम टॉयलेट घासणे, या सारखी अनेक छोटी कामं लपलेली असतात. घरात बाई लावण्यामागे प्रत्येकाच्या वेगळ्या गरजा किंवा कारणे असू शकतात. त्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये. पण घरातली ही सगळी कामं आपल्या हातावेगळी होऊन पण आपल्याला असे कुठले शारीरिक कष्ट पडतात, की ज्यामुळे चाळीशी पन्नाशीमध्ये गुडघे, सांधे दुखणे असे हाडाचे दुखणे किंवा शरीराच्या इतर असंख्य व्याधी निर्माण होतात?
एखादा दिवस बाई नाही येणार म्हटलं की आपल्याला अगदी जीवावर येतं. मग बिनधास्त त्या दिवशी आपण बाहेरून ऑर्डर करतो, किंवा मग भांडी तशीच ठेऊन देतो. पण त्यापैकी एखादे काम आपण करावे असं का नाही वाटत? याचं कारण कामाची कमी होत चाललेली सवय. आज फूड प्रोसेसर, व्हेजिटेबल कटर यामुळे हाताने कणिक भिजवताना किंवा भाजी निवडताना- चिरताना होणारे बोटाचे व्यायाम होतच नाहीत. घरात केर फरशीला बहुतेक घरामध्ये बाई असते. त्या मुळे वाकून केर काढणे किंवा बसून फरशी पुसणे हा व्यायाम होतच नाही. घरातील अशी असंख्य कामं असतात ज्यामध्ये आपल्या शरीराला उत्तम व्यायाम मिळतो. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला चाळिशीतच शरीराच्या अनेक व्याधी निर्माण होतात. कारण शरीराला काही हालचाल किंवा ताण नाहीच. दुर्दैवाने असे व्यायाम आपल्यापैकी अनेकांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत किंवा स्वतःला करायचे नसतात. किंबहुना so called वेळच नाही मिळत, या सबबीखाली ढकलले जातात. पण मग ऑफिसच्या आधी किंवा नंतर जिम, योग क्लास इथे व्यायाम करायला वेळ असतो.
वारसा म्हणजे फक्त संपत्तीवरचा हक्क, जमीन जुमला, याचा नाही बरं का. तो वारसा आहे उत्तम आरोग्याचा, निरोगी शरीर आणि मनाचा. मागच्या पिढीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं आरोग्य जास्त चांगलं दिसत. का असेल बर असं? आज आपल्यापैकी ९०% स्त्रियांना ३५-४०शी मधेच तब्बेतीच्या असंख्य तक्रारी आहेत. पण याची खरी कारण आपण समजून किंवा जाणून घेतोय का? पूर्वी घरातली असंख्य काम घरातील बाई दिवसभर करत राहायची. त्यापैकी सगळ्याच स्त्रिया house wife नसायच्या. पण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून घरातील काम, सणवार यांचं management त्या जबरदस्त करायच्या. कारण मुळात त्यांच्याकडे स्वतःच्या घरासाठी काटकसरीनं जगायची आणि कष्ट करायची तयारी असायची. तिला आजूबाजूला बघायला देखील वेळ व्हायचा नाही. त्या बायकांना तासतासभर फोनवर बोलायला किंवा इतरांची उणीदुणी काढायला वेळ नसायचा. पण आपल्या पिढीमध्ये आपण “मला वेळच नाही ग मिळत” हे जे म्हणतो ना, त्याच्या खरं तर उलट, आपल्या कडे वेळच वेळ आहे. म्हणूनच कदाचित आपल्या पिढीमध्ये हेवेदावे, ego issues जास्त आहेत. कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा विचार करत बसण्याइतका वेळ आहे.
आपण पुढच्या पिढीला काय देतोय? एक कृत्रिम आयुष्य जे फक्त तंत्रज्ञांच्या भोवती फिरतंय. आपल्या मुलांना स्वतःच्या गोष्टी जागेवर ठेवणे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपाट आवरणे, जेवलेलं स्वतःचं ताट उचलून ठेवणे, अशी छोटी कामं देखील करून देत नाही. कारण त्यांच्या बघण्यात ही कामं दुसराच कोणी तरी करतोय ज्याला पैसे दिले की आपलं काम झालं ही भावना आपणच त्यांच्यात निर्माण करतोय, असं नाही का वाटत? आपल्या मुलांच्यात कष्टाची तयारीच निर्माण होत नाहीये. सगळं आयतं हातात मिळतं आहे. कॉलेजला जायला लागलं की हातात गाडी मिळते, पण मग कधी तरी चालत जायची वेळ आलीच तर अशा वेळी मुलं कॉलेज बंक करून घरी बसतात. का? कारण कष्ट करायची तयारी नाही.
आज आपल्याला एक किंवा फार फार तर दोन मुलं असतात. त्यामुळे त्यांना सगळं चांगलं द्यायच्या नादात आणि अति प्रोटेक्टिव्ह स्वभावामुळे आपण त्यांना अजून जास्त दुबळे बनवत आहोत. मध्यंतरी माझी एक मैत्रीण म्हणाली, “ बर ग बाई तुला दोन मुलं आहेत. आम्हाला एकच आहे तेच जीवापाड जपायचं आहे. आमची राजकन्या आहे ती.” प्रश्न मला दोन मुलं आहेत किंवा एक मूल याचा नाहीये. पूर्वीच्या काळी बायकांना ८-१० मुलं असायची. पण म्हणून त्या त्यातल्या ८ मुलांना वाऱ्यावर नाही सोडायच्या. तसंच मला दोन मुलं आहेत म्हणजे मी एकाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आणि दुसऱ्याच्या बाबतीत हवालदिल नाहीये. मुळात प्रश्न हा आहे की, मूल एक असो किंवा दोन, त्याला समाजात लढायची , कष्ट करायची , एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा ध्यास घेण्याची वृत्ती आपण निर्माण करतोय का नाही ?
हा लेख म्हणजे मी काही ब्रह्मज्ञान देत नाहीये. किंबहुना मी देखील तुमच्या सगळ्यांच्यासारखीच आहे. पण स्वतःचं काही चुकत असेल तर मान्य करायची माझी तयारी आहे. तंत्रज्ञानाने माणसाला जितकं जवळ आणलं, मॉडर्न बनवलं, तितकंच पांगळही केलं. पूर्वी ६०ला सिनियर सिटीझन म्हटलं जायचं. पण हे जर असंच सुरु राहिलं तर कदाचित येत्या काही वर्षात ४०लाच सिनियर सिटीझन म्हटलं जाईल. कारण जे म्हातारपण पूर्वी ६० नंतर यायचं, ते अलिकडे सरकत आत्ताच ४०ला येऊन पोचलंय. म्हणूनच वाटतं की आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती, पैसे याचा वारसा देण्यापेक्षा, उत्तम आरोग्यासाठी कानमंत्र देऊया, जो त्यांचं आयुष्य अजून सुंदर करायला मदत करेल.
लेखिका :- राधा ओक
संग्राहक :- डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ कांदा….शिरीष लाटकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
“ मित्रा .. जरा कांदा घेतोस .. ?”
आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या माणसाने आवाज दिला ..
तसा वेटर विनम्रपणे त्याच्याजवळ आला …” सर … चॉप करून देऊ की पिसेस मध्ये … ?”
तसा तो बेफिकीर स्वरात म्हणाला …” आण कसा ही ….”
आणि पुढच्याच क्षणी माझी मान गर्र्कन वळली ..चेहऱ्यावर कमालीची नापसंती … कपाळावर ठळक आठी …
समोर बसलेल्या दीपाने माझा नूर अचूक ओळखला …हातावर हात ठेवत म्हणाली …” असू देत … जेव शांतपणे …सगळ्यांचे तुझ्यासारखे नखरे नसतात …”
आता मी तिच्याकडे रोखून पाहिलं .. तशी ती गालात हसली …स्त्री धर्माला अनुसरून तिने टोमणा मारायची अचूक संधी साधली होती ..
मी दबक्या पण ठाम आवाजात म्हणालो …“ नखरे नाही .. ह्याला रसिकता असं म्हणतात …”
दीपाने नुसतीच मान हलवली … पटलं होतं की नाही .. कुणास ठाऊक .. ?
अर्थात तिच्यासाठी हे नेहमीचं होतं म्हणा …खाण्यापिण्याच्या बाबतीतला माझा चोखंदळपणा तिला पुरेपूर माहितीय ..उगाचच ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणून खाणाऱ्यांमधला मी नाही … उलट ‘आधी रसने भुलविले – मग उदर शमविले’ (हा माझाच श्लोक आहे .. वेदपुराणात शोधू नये) या कॅटेगिरीमधला मी आहे … ‘ खाण्याच्या बाबतीत चवीशी तडजोड होऊ शकत नाही …’ असं माझं ‘भीष्ममत’ आहे ..
आणि कांदा हा चव वाढवणाऱ्या समस्त गोष्टींमध्ये अग्रस्थानी आहे … यात शंका नाही .. कांदा हा जगातला असा एकमेव पदार्थ आहे .. जो कसा चिरलाय, यावरून तो कशाबरोबर खायचा हे ठरतं.
नाही कळलं … ? एक मिनिट … समजावून सांगतो …
एकच कांदा वेगवेगळ्या पद्धतीने चिरला की त्याची चव वेगवेगळी लागते ..
म्हणजे बघा .. पावभाजी सोबतच कांदा …हा साधारण पाव सेंटीमीटरच्या आकारात एकसारखा चिरलेला हवा ..कांदा असा चिरला की त्याला हलकासा रस सुटतो …. हा रस भाजीच्या तिखटपणाला अचूक छेद देत तिची गंमत वाढवतो …
मिसळीचा कांदा .. तो ही खरंतर बारीक चिरलेला …. पण त्यात वरच्यासारखी एकसंधता असता कामा नये ..काही तुकडे लहान हवेत … काही किंचित मोठे हवेत .. !मिसळीत असूनही कांद्याने आपली आयडेंटिटी टिकवली पाहिजे … तर मजा आहे …. तर्रीत तरंगणारी मिसळ खाताना कांद्याचा एखादा किंचित मोठा तुकडा दाताखाली येतो तेव्हा जी अनुभूती येते ती निव्वळ अवर्णनीय.
बऱ्याचदा जेवणात आपण गोल चकत्या केलेला कांदा घेतो …दातांना चाळा आणि जिभेला ब्रेक म्हणून ठीक आहे …पण माझ्या दृष्टीने त्याची फार मोठी ओळख नाही ..म्हणजे भारताच्या राजकारणात अण्णा हजारेंच्या उपोषणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या कांद्याला जेवणात असतं .,.
त्यापेक्षा मद्यपान करत असताना सॅलडमध्ये असलेला हाच गोल चकतीचा कांदा जास्त रंगत आणतो …. मद्याची कडवट चव जिभेवर असताना हा कांदा जिभेवर चुरचुरला की पिण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं …
ताटात वाढली जाणारी कांद्याची अजून एक पद्धत म्हणजे ‘कंटाळकांदा’…. जेवणाची ताटं वाढलेली असताना नवऱ्याने ऐनवेळी कांदा मागितला की बायको रागाने कांद्यावर वार करून त्याच्या चार फोडी करते आणि वाढते .. त्याला ‘कंटाळकांदा’ असं म्हणतात …हा प्रकार आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहे … कारण तो सोपा आहे ..पण मला तो केविलवाणा वाटतो …एखादा नको असलेला मुलगा आपल्या ग्रुपमध्ये शिरला की कसं फिलिंग येतं .. अगदी तसं फिलिंग हा कांदा देतो … अशा प्रकारे चार तुकडे करून कांदा देणारी हॉटेल्सही मला फार रुचत नाहीत …कारण त्यात प्रेमाने खाऊ घालण्यापेक्षा कर्तव्य उरकल्याची भावनाच जास्त असते ..
ताटातलं खाद्य बदलेल … तसं कांद्याचं रूप बदलून वाढतो .. तो खरा …. म्हणजे कधी कधी तुम्ही तंदूर ऑर्डर करता आणि त्या सोबत एक विलक्षण इंटरेस्टिंग कांदा येतो …. हा कांदा पाकळी पाकळी वेगळी करून सर्व्ह केला जातॊ ….. तंदूरमधल्या बटाट्यापासून .. पनीरपर्यंत आणि चिकनपासून शीख कबाबपर्यंत प्रत्येकाशी याची सलगी असते … अर्धवट खरपूस भाजलेला .. तंदूरच्या मसाल्यात चिंब झालेला आणि आपल्या सोबत्याला (पनीर / चिकन) घट्ट बिलगलेला पाकळीचा कांदा म्हणजे स्वर्गसुख … ! तो टाळून इतर कुठलाही कांदा तंदूरसोबत खाणारे खाद्यनगरीचे गुन्हेगार आहेत .. असं माझं स्पष्ट मत आहे …
अर्थात तंदूरबरोबरचा हा कांदा बटर चिकनबरोबर अजिबात शोभत नाही …किंबहुना कुठल्याच पंजाबी डिशसोबत शोभत नाही …तिथे व्हिनेगर मध्ये बुडवलेला हलकासा लालसर झालेला आंबटसर अख्खा कांदाच हवा …घी मध्ये शब्दशः न्हायलेली बटर चिकनची डिश .. गरम गरम नानच्या तुकड्यासोबत तिचा घास घ्यायचा आणि मग एकच चावा घेऊन अर्धा कांदा फस्त करायचा …
देवा … सुखाची परमोच्च कल्पना … त्या क्षणी देवाने उचललं तरी मोक्ष मिळेल अशी स्थिती ..
हो पण … याच बटर चिकनची जागा जेव्हा कोल्हापुरी मटण घेतं .. तेव्हा कांद्याचं रूप ही निर्विवादपणे बदलतं … तिथे झणझणीत पांढऱ्या तांबड्याबरोबर गोड दह्यात सराबोर असलेला उभा चिरलेला कांदाच तोंडी लावायला हवा .. आणि कोल्हापूरचं मालवण झालं की हाच गोल चिरलेला कांदा लिंबाच्या रसात कुस्करून खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर वाढला जायला हवा. …
आणखी एक महत्वाचं ……
जेव्हा चुलीवरची भाकरी … भरली वांगी आणि झुणका ताटात सजतो .. तेव्हा कांदा चिरण्या – कापण्याच्या आणि सोलण्याच्या फंदात पडूच नये … जमिनीवर ठेवावा नि हाताने उभा चेचावा ..
हो .. पण यातल्या बाहेरच्या पाकळ्या खायच्या नाहीत हां …मधली कोवळी पाकळी खायची फक्त ….. तुम्हाला सांगतो .. शहाळ्यातली मलई झक मारेल ..
एकूण काय … ‘ जैसा देस वैसा भेस ‘च्या धर्तीवर … जसं जेवण तसा कांदा !
तेव्हा यापुढे हॉटेलात काय किंवा घरी काय– ‘आण कसाही ‘ म्हणायची चूक करू नका ..
चोखंदळ रहा … अहो … शास्त्र असतं ते … !
– शिरीष लाटकर
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती.
माणसाचं देखील असंच असतं. पण माणसाच्या आयुष्यात एकदाच येते का हो ही निवृत्ती ? नाही. माणूस अनेक वेळा निवृत्त होत असतो. नव्हे, त्याने प्रत्येक वेळी, प्रत्येक फेजमध्ये निवृत्ती घ्यायलाच हवी. एका फेजमधून निवृत्ती घेऊन पुढच्या फेजमध्ये पाऊल टाकायला हवं. असं करताना त्या त्या फेजमध्ये निर्माण झालेले अनुबंध तोडण्याची काहीच आवश्यकता नाही. खरं तर अनुबंध तोडण्यासाठी नसतातच. पण माणसाने एका फेजमध्ये गुंतून राहूच नये.
माणसाच्या अनेक निवृत्तींपैकी पहिली निवृत्ती म्हणता येईल ती म्हणजे शालेय शिक्षण संपताना घ्यावी लागणारी निवृत्ती. हे वयच तसं असतं. आता सगळेच मित्र मैत्रिणी पांगणार असतात. इतकी वर्षे केलेला एकत्र अभ्यास, एकत्र खाल्लेला टिफिन, खेळ आणि मारामारी देखील. खुपच हळुवार आठवणी असतात आणि हुरहुर लावणारे क्षण. पण या निवृत्तीला पर्याय नसतो.
दुसरी निवृत्ती येते ती काॅलेजचं शिक्षण संपताना. पण शाळा सोडताना वाटणारी हुरहुर तेवढ्या प्रमाणात यावेळी नसते. एक चांगली बाजू असते हल्ली की काॅलेज सोडल्यावर देखील आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे ही निवृत्ती तेवढी क्लेशदायक नसते.
त्यानंतर माणूस नोकरी व्यवसायात शिरला की घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा नुसता धावत असतो, अखंड. करिअर, पैसा, सेव्हिंग्ज, आपल्या स्वप्नातील घर, मनासारखा जोडीदार आणि नंतर मुलं बाळं. त्यानंतर पाल्यांचं पालनपोषण, शिक्षण, वगैरे. कधीही न संपणारी यादी असते ही.
मुलं मुली मोठे झाले की त्यांना शिंगं फुटायला लागतात. त्यावेळी मित्रत्वाच्या भूमिकेत शिरून त्यांना सल्ला द्यावा, चांगलं वाईट काय ते समजावून सांगावं. आपल्या संस्कारांमुळे त्यांना आपलं बरंचसं पटतं. पण कधी कधी जनरेशन गॅपमुळे काही मतभिन्नता होऊ शकते. त्यावेळी त्यांच्यापासून त्या वेळेपुरती निवृत्ती घ्यावी. दुरून लक्ष ठेवावं हे ओघाने आलंच.
मुलामुलीच्या लग्नाच्या वेळेच्या आसपास आपली सेवानिवृत्ती जवळ आलेली असतेच. त्यावेळी मुलामुलीला त्यांच्या स्वतःच्या पायांवर उभं रहायला द्यावं. फार काही ढवळाढवळ करू नये त्यांच्या आयुष्यात. त्यांच्यापासून निवृत्ती घ्यावी.
मुलगा मुलगी परदेशात गेले असतील तर आपल्या व त्यांच्यात कदाचित जास्त अंतर पडू शकतं. त्याची मानसिक तयारी ठेवावी.
आयुष्यात असेही प्रसंग येतात की एखाद्याने तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करायला सांगितलेले असते आणि ते काम तुम्ही सहजरीत्या करून जाता. या कामाबद्दल तुम्हाला काही मोबदला मिळणार नसतो. तुमची तशी अपेक्षा देखील नसते. पण कौतुकाच्या दोन शब्दांची अपेक्षा मात्र असु शकते. पण खरं तर तशी अपेक्षा ठेवू नये. कारण अपेक्षापुर्ती झाली नाही तर आपल्यालाच मानसिक त्रास होतो. म्हणूनच ते काम करून मोकळं व्हावं व लगेचच त्यातून निवृत्ती घ्यावी.
एक निवृत्ती अशी देखील असावी ज्याची अनुभुती फक्त स्त्रीयाच घेऊ शकतात. पुरूष घेऊ शकत नाहीत. ती म्हणजे एकदा घरात सुन आली की सासुने मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरावं आणि सुनेचे नव्या नवलाईचे दिवस संपले की किचनचा ताबा हळूहळू सुनेकडे द्यावा. चार उपदेशाच्या गोष्टी जरूर सांगाव्यात. पण तिला मोकळीक द्यावी. तसेच तिच्याकडूनही काही नवं शिकावं, अपडेट रहाण्यासाठी.
यानंतर सर्वांच्याच आयुष्यात एकदाच येणारी निवृत्ती म्हणजे सेवानिवृत्ती. तो दिवस फारच हळवा असतो. उद्यापासून एकदम रिकामपण येणार असतं. एक मोठी पोकळी निर्माण होणार असते. काहीजण हे सगळं ग्रेसफुली घेतात आणि सहज निवृत्त होतात. पण ब-याच जणांना ते जमत नाही आणि तिथेच चुकतं त्यांचं. आता खरं तर सेकंड इनिंग सुरू करायची असते. त्या सेकंड इनिंगची तयारी अगोदरच केलेली असेल तर ती देखील एंजॉय करता येते. खुप सोपं असतं ते. आपण रोज कसं कसं आणि काय काय करायचं ते ठरवायचं आणि व्यवस्थित पार पाडायचं म्हणजे झालं. काय करता येत नाही या इनिंगमध्ये ? माॅर्निंग वाॅक, इव्हिनिंग वाॅक, व्यायाम, व्यवस्थित झोप, नाश्ता, जेवण, वगैरे. त्याच्या जोडीला वाचन, चिंतन, मनन आणि लेखनाचं अंग असल्यास उत्तमच. हल्ली तर WhatsApp, Facebook, Blogs, इत्यादी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात. संगीताची आवड असेल तर दुधामध्ये केशरच. तसेच निसर्गात भटकावं, ज्या ठिकाणी जायचं राहीलं असेल तेथे जोडीदारासह जाऊन यावं, करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करून टाकाव्यात.
या सगळ्यात एका निवृत्तीबद्दल सांगायचंच राहिलं. रोज रात्री झोपताना सर्वांतून काही तासांसाठी सक्तीची निवृत्ती घ्यावी. म्हणजे शांत झोप लागते व दुस-या दिवशी सकाळी आपण एकदम फ्रेश असतो त्या दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. कारण नवीन दिवस म्हणजे नवीन जन्मच असतो आपला.
EVERY DAY IS A MINIATURE OF LIFE FOR BIG DREAMS.
या सर्व ब-याचशा सहजसाध्य निवृत्तींनंतर अगदी अखेरचीच निवृत्ती सहज घेता येईल का माणसाला ?
पती आणि दोन्ही मुलगे इंजिनियर. त्यांनी १९७७ नो्हेंबर ला हेम इले्ट्रॉनिक्स ह्या नावे उद्योग सुरू केला.
त्यांना १९९१ साली पुरस्कार: व्यवसायातील अतिशय प्रतिष्ठीत जी एस पारखे पुरस्कार त्यांच्या एका उपकरणास मिळाला.
स्नेहलता गाडगीळ ना २०१८ साली महिला उद्योजक राज्य परिषदे कडून संजीवनी पुरस्कार त्यांच्या इंजिनिअरिंग मधील योगदान साठी देण्यात आला.
तसेच २०१९ साली लोकमत सखी मंच कडून नवदुर्गा हा पुरस्कार त्यांच्या इंजिनिअरिंग क्षेत्रात केलेल्या कार्य बद्दल प्रदान करण्यात आला.
स्नेहलता गाडगीळ गेल्या १० वर्षा पासून सांगली मिरज एम आय डी सी च्या डायरेक्टर आहेत .
त्या श्री शिल्प चिंतामणी हौ सोसायटीच्या डायरेक्टर आहेत. त्याना नाटकात काम करण्याची आवड आहे. त्यांनी ए डी ए ह्या नाट्य संस्थेतून राज्यं नाट्य स्पर्ध मध्ये भाग घेतला होता. वाचन आणि भरपूर प्रवास करायची ही आवड .
कधी कधी कर्तृत्वाची उंचीच इतकी असते की सन्मानाचं वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव २०१८ वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रीमुळे पद्मश्री सन्मानाला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५, जेव्हा अगदी साध्या साडीत आणि स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा पूर्ण भारतच काय, पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.
अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनीचं लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुलं खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्रीनी आपलं आयुष्याचं ध्येय निश्चित केलं, ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं— असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजूंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ‘ ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन ‘ असं त्यांनी निक्षून सांगितलं. लोक त्यांच्यावर हसले, समाजाने त्यांची टिंगल उडवली. एक २३ वर्षाची स्री, अंगावर ४ मुलं- ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब असताना, “ हॉस्पिटल काढायचं तर सोड पण स्वतःच घर नीट करून दाखव “ अशी लोकांनी तिची अवहेलना केली.
हरेल तर ती भारतीय स्री कुठली…. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्रीनी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामं करून त्यांना महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलाला त्यांनी अनाथाश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बँकेत आपलं खातं सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षणं आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते त्या बँकेत बचत करत गेल्या. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिल्या.
१९९२ साल उजाडलं . सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईच स्वप्न पूर्ण करण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. जी लोकं २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती, त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देत आहोत हे सांगताना गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी गावातील लोकांना केलं. आपल्याच लोकांसाठी ह्याचा फायदा होईल हे बघून गावातील लोकं येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.
ह्यूमॅनिटी हॉस्पिटल हे नाव आजूबाजूच्या गावात पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला, जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्ययावत असून ह्यात ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, एक्स रे अश्या, तसेच इतर विविध उपकरणांनी सुसज्ज आहे. ह्या हॉस्पिटलचं एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.
अशिक्षित, गरीब आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असून पण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचवून ह्यूमॅनिटी हॉस्पिटलचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं, हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठं काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते—
“I am very happy to get the award, but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.”
पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लिपर वर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला तेव्हाच मिळाला जेव्हा आमच्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं.
सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला– तर त्या सन्मानाची शान वाढवली आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची जबाबदारी वयाच्या २३ वर्षी असणारी एक स्त्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं, आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये– ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी त्यांनी हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्याचे संस्कार त्यांनी केले. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही, आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्नं पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत. त्यांना माझा कडक सॅल्यूट.
जय हिंद!!!
आजची दुर्गाच —–
— शब्दांकन (विनीत वर्तक)
संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ ‘मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत‘☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
(एक बोधकथा)
इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफी शॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलेलो होतो.आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली.” दोन कॉफी….एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीसाठी !”
माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला, ‘ एक कॉफी ऑफ कप.’
आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.
काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की,” वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.”
त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.
हे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला. या शहरातील गरीबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.
नकळत आमचे डोळे पाणवले. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती, तो खिशात पैसे नसतांनाही आला होता. त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत, किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय, हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी देणाऱ्यालाही आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.
—–खरंच बोध घेण्यासारखी कथा.
प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“अगं ऐकलंस का, एक फक्कडसा चहा आण बघू, खूप दमलोय !”
“एवढ दमायला काय झालंय तुम्हांला ? चाळीतल्या पोरांनी ख्रिसमससाठी बनवलेलं ख्रिसमस ट्री चढून एकदम घरात नाही नां आलात ?”
“काहीतरीच काय तुझं ? मला अजून पायाखालच नीट दिसतंय ! तुझ्या सारख्या त्या टीव्हीवरच्या रटाळ सिरीयल बघून, मला चष्मा नाही लागलाय अजून !”
“कळलं कळलं ! आता दमायला काय झालंय ते सांगा ?”
“अगं हे काय आणलंय ते बघ तरी !”
“अ s s ग्गो बाई ! डिनर सेट !”
“करेक्ट, अगं आपल्याला लग्नात मिळालेला डिनर सेट आता किती जुना झालाय ! म्हटलं घेऊन टाकू एक नवीन !”
“हो, पण त्यात एवढं दमायला काय झालंय म्हणते मी ?”
“अगं तो बॉक्स जरा उचलून तर बघ ! सेव्हन्टी टू पिसेसचा अनब्रेकेबल डिनर सेट आहे म्हटलं ! एवढा जड डिनर सेट दोन जिने चढून आणल्यावर दम नाही का लागणार ?”
“अगं बाई, खरच जड आहे हो हा !”
“आता पटली खात्री, मी का दमलोय त्याची ! मग आता तरी आणशील ना चहा ?”
“एकच मिनिटं हं !”
“आता का s य s ?”
“अहो, या बॉक्सवर Hilton कंपनीच नांव आहे !”
“बरोबर, म्हणजे तुला इंग्लिश वाचता येतं तर !”
“उगाच फालतू जोक्स नकोयत मला !”
“यात कसला जोक? तू नांव बरोब्बर वाचलंस म्हणून……”
“तुम्हांला ना, खरेदीतल काही म्हणजे काही कळत नाही !”
“आता यात न कळण्यासारखं काय आहे ? हा डिनर सेट नाही तर काय लेमन सेट आहे ?”
“तसं नाही, अहो Milton कंपनी डिनर सेट बनवण्यात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही आणलात Hilton चा डिनर सेट, कळलं ! कुठून आणलात हा सेट ?”
“अगं तुझ्या नेहमीच्या ‘महावीर स्टोर्स’ मधून ! तो मालक मला म्हणाला पण, काय शेट आज भाभीजी नाय काय आल्या तुमच्या संगाती ! मी म्हटलं शेठ, तुमच्या भाभीजीला सरप्राईज देणार आहे आज, म्हणून तिला नाही आणलं बरोबर !”
“आणि पायावर धोंडा मारून घेतला !”
“आता यात कसला पायावर धोंडा ?”
“अहो Milton च्या ऐवजी Hilton चा डिनर सेट आणलात नां ?”
“अगं तो शेठच म्हणाला, ही Hilton कंपनी नवीन आहे, पण चांगले डिनर सेट बनवते आणि Milton पेक्षा खूपच स्वस्त, म्हणून….”
“स्व s s स्त s s ! एरवी मी दुकानात घासाघिस करतांना मला अडवता आणि आज स्वतःच डुप्लिकेट माल घेऊन आलात ना ?”
“यात कसला डुप्लिकेट माल ? हे बघ या बॉक्सवर चक्क लिहलय, Export Quality, Made in USA !”
“अहो, USA म्हणजे उल्हासनगर सिंधी अससोसिएशन पण होऊ शकत ना ? मला सांगा, हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे कशावरून ?”
“अग असं काय करतेस ? शेटजीनी मला एक सूप बाउल आणि एक डिश खाली जमिनीवर आपटून पण दाखवली !”
“मग ?”
“मग काय मग, ते दोन्ही फुटले नाहीत, म्हणजे तो सेट अनब्रेकेबल नाही का ?”
“फक्त दोनच आयटम जमिनीवर टेस्ट केले ? सगळा डिनर सेट नाही ?”
“काय गं, तुम्ही बायका भात तयार झालाय की नाही हे बघायला, फक्त त्यातली एक दोनच शीत चेपून बघता ना ? का त्यासाठी अख्खा भात चिवडता ?”
“अहो भाताची गोष्ट वेगळी आणि डिनर सेटची गोष्ट वेगळी !”
“ठीक आहे, मग हा सूप बाउल घे आणि तूच बघ जमिनीवर टाकून.”
असं बोलून मी बायकोच्या हातात त्या सेट मधला सूप बाउल दिला ! तिने तो हातात घेऊन मला विचारलं
“नक्की नां ?”
“अगं बिनधास्त टाक, अनब्रेकेबल…”
माझं वाक्य पूरं व्हायच्या आत बायकोने तो सूप बाउल जमिनीवर टाकला आणि त्याचे एक दोन नाही तर चक्क चार तुकडे झाले मंडळी !
“आता बोला ? हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे म्हणून !”
“अगं पण शेठजीने खरंच सूप बाउल खाली टाकला होता पण त्याला साधं खरचटलं पण नाही. शिवाय…..!”
“एक डिश पण नां ?”
असं बोलून तिने सेट मधली एक डिश घेतली आणि ती पण जमिनीवर टाकली. मंडळी काय सांगू तुम्हांला, ती डिश पण सूप बाउलच्या मागोमाग निजधामास गेली ! ते बघताच मी उसन अवसान आणून बायकोला म्हटलं, “अगं पण माझ्या समोर त्याने या दोन गोष्टी टाकल्या त्या कशा फुटल्या नाही म्हणतो मी ?”
“अहो हेच तर त्या व्यपाऱ्यांच टेक्निक असतं !”
“टेक्निक, कसलं टेक्निक ?”
“अहो त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे तुम्हांला कधीच कळणार नाही !”
“म्हणजे ?”
“मला सांगा, त्या शेठने ज्या सेट मधल्या बाउल आणि डिश खाली टाकल्या तो सेट तुम्हांला दिला का ?”
“नाही नां, मला म्हणाला तो शोकेसचा पीस आहे, मी तुम्हांला पेटी पॅक सेट देतो !”
“आणि तुम्ही भोळे सांब त्याच्यावर विश्वास ठेवून पेटी पॅक सेट घेवून आलात, बरोबर नां ?”
“होय गं, पण मग आता काय करायच ?”
“आता तुम्ही नां, मेहेरबानी करून काहीच करू नका ! फक्त तो बॉक्स द्या माझ्याकडे, मी बघते काय करायच ते !”
“अगं पण….”
“आता पण नाही आणि बिण नाही, आता मी माझं टेक्निक दाखवते शेटजीला ! ही गेले आणि ही परत आले ! आणि हो, मी येई पर्यंत आपल्या दोघांसाठी चहा करा जरा फक्कडसा !”
असं बोलून बायकोने तो बॉक्स लिलया उचलला आणि ती घराबाहेर पडली ! मी आज्ञाधारक नवऱ्यासारखा चहा करायला किचन मधे गेलो ! माझा चहा तयार होतोय न होतोय, तेवढ्यात हिचा विजयी स्वर कानावर आला “हे घ्या !” असं म्हणत बायकोने Milton च्या डिनर सेटचा बॉक्स जवळ जवळ माझ्यासमोर आपटलाच !
“आ s हा s हा s ! काय तर म्हणे सेट फुटेल ! अहो हा काय तुम्ही आणलेला डुप्लिकेट Hilton चा सेट थोडाच आहे फुटायला ? ओरिजिनल Milton चा डिनर सेट आहे म्हटलं !”
“काय सांगतेस काय, Milton चा डिनर सेट ? अगं पण त्या शेटनं तो बदलून कसा काय दिला तुला ?”
“त्या साठी मी माझं टेक्निक वापरलं !”
“कसलं टेक्निक ?”
“लोणकढीच टेक्निक !”
“म्हणजे ?”
“अहो मी त्याला लोणकढी थाप मारली, की तू जर का मला हा Hilton चा सेट बदलून Milton चा सेट दिलास, तर मी आणखी पन्नास Milton चे सेट तुझ्याकडून घेईन !”
“काय आणखी पन्नास Milton चे डिनर सेट ? काय दुकान वगैरे….”
“अहो, मी त्याला सांगितलं पुढच्या महिन्यात माझ्या नणंदेच लग्न आहे. तेंव्हा पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मला ते हवे आहेत !”
आपल्या रसिक श्रोत्यांप्रती आणि रसिक वाचकांप्रती जणू कृतज्ञता व्यक्त करत, असे भावपूर्ण काव्य लिहिणारे श्री. गंगाधर महाम्बरे यांचा आज स्मृतिदिन.(३१/१/१९३१ – २३/१२/२००५)
प्रतिभावंत कवी, गीतकार, लेखक, बालसाहित्यकार, आणि याच्या जोडीने, अनुवादक, ग्रंथपाल, कोशकार– असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेले श्री. महाम्बरे. ते कोकणातून पुण्यात आल्यावर पूर्ण वेळ साहित्यक्षेत्रात रममाण होण्याआधी, त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय सुरु केला होता. आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बरीच वर्षे ग्रंथपाल म्हणूनही ते कार्यरत होते.
अर्थात ही त्यांची अगदी सुरुवातीची ओळख. खरी ओळख ” एक बहुरंगी बहुढंगी साहित्य-निर्माते ” हीच.,
त्यांच्या साहित्यनिर्मितीतले वैविध्यही खरोखरच थक्क करणारे. त्यांनी अगदी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ती अशी —-
१ ) साहित्यविश्वाला समृद्ध करणारे लेखन — आनंदाचे डोही, मराठी गझल, उत्तुंगतेचा सह्जस्पर्श, उषःकाल ( कवितासंग्रह ), किशोरनामा – ( कथासंग्रह ), रंग जीवनाचे ( कादंबरी ), रसिकेषु ( ललितलेखन ), वॉल्ट डिस्ने चरित्र, व्यक्तिचित्रे, सैगल, चार्ली चॅप्लिन : काळ आणि आज, विस्मरणापलीकडील पु.ल., प्रतिभावंतांच्या सहवासात, बिजलीचा टाळ ( कादंबरी ), भावगीतकार ज्ञानेश्वर, सापेक्षी समीक्षा, प्रवासातील प्रतिभावंत, माणसं जनातील-मनातील, मौनांकित ( चरित्र ). त्यांनी नाटककार आणि बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक असणाऱ्या मामा वरेरकर यांचे चरित्र ‘ एक अविस्मरणीय मामा ‘ नावाने लिहिले आहे. तसेच दादासाहेब फाळके यांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहे. २ ) अगदी वेगळ्या विषयांवरील पुस्तके — कोकणातले व्यवसाय व त्यासंबंधीचे मार्गदर्शन, ऑटोरिक्षा ( देखभाल व दुरुस्ती ), महिलांसाठी उद्योगव्यवसाय, लाखमोलाचे उद्योगव्यवसाय, चला जाणून घेऊ या ! अंकशास्त्र. मौलिक मत्स्यव्यवसाय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, मोडी शिका, भगवान गौतम बुद्ध आणि बौद्धधर्म, लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा, महाराष्ट्रातील समाजसुधारक, विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता, विद्यार्थ्यांसाठी उद्योगव्यवसाय, शुभंकरोती, — आणि असे बरेच काही मार्गदर्शक लेखन. याखेरीज, २१ व्या शतकाचा मराठी-इंग्रजी शब्दकोश, आणि चित्रपट क्षेत्रातल्या तांत्रिक शब्दांचा कोशही त्यांनी तयार केला होता.
श्री. महाम्बरे यांच्या काव्यनिर्मितीतही– भावगीते, चित्रपट गीते, आणि नाट्यगीते, अशी विपुलता होती.—– कंठातच रुतल्या ताना, तू विसरुनी जा रे–, निळा सावळा नाथ, पाण्यातले पहाता प्रतिबिंब, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद, संधीकाळी या अशा, सावलीस का कळे, तूच खरा आधार- देवा, अशी कित्येक उत्कट भावकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत.
धाकटी मेहुणी, युगे युगे मी वाट पहिली, सोबती, सौभाग्यकांक्षिणी, अशा चित्रपटातली त्यांची गीते प्रसिद्ध झाली होती. तसेच, गा भैरवी गा, चाफा बोलेना, तेथे कर माझे जुळती, या नाटकांमधली गीते त्यांनी लिहिलेली होती.
त्यांना मिळालेले पुरस्कार —– “ मौलिक मराठी चित्रगीते “ या रसग्रहणात्मक पुस्तकाला ‘ राष्ट्रपती सुवर्णकमळ ‘ – नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल दिल्ली तर्फे १९८३ सालचा ‘ पोएट ऑफ दि इयर ‘ पुरस्कार, – चित्रपट महामंडळाचा ‘ चित्ररत्न पुरस्कार’, – गोमंतक मराठी अकादमीची सन्माननीय फेलोशिप,– म.स.प.चा ना.घ.देशपांडे पुरस्कार ‘, –केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार. मॉरिशस नभोवाणीवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या, आणि ‘ रसिक तुझ्याचसाठी ‘ या गीताची ध्वनिमुद्रिका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती, या विशेष गोष्टी सांगितल्याच पाहिजेत अशा.
श्री. गंगाधर महाम्बरे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.
आज “ कवितेचा उत्सव “ या सदरात वाचूया श्री. महाम्बरे यांची एक सुंदर काव्यरचना.
दर वर्षी अमेरिकेचा दौरा होतोच. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातीच्या शाळेला सुट्टी असली तरी मुलीला जावयाला ऑफिस असतेच. मग मी नातीला बघायला, तिची शाळा सुरू होईपर्यंत USA मुक्कामी असते.
ते दिवस मोठे सुंदर असतात. उन्हाळा सुरू झालेला, पण उबदार उन्हाळा. झाडे नव्याने हळूहळू छान फुलून येतात.
एकदा फिरताना मुलीच्या कम्युनिटीमध्ये काही घरांसमोर निळे फुगे लावलेले दिसले. कुतूहलाने विचारले, ” हे कसले ग फुगे?”
मुलगी म्हणाली, ” अग पुढच्या आठवड्यात गराज सेल आहे ना–त्याची खूण आहे, की लोकांना समजावे–इथे आहेत सेलच्या वस्तू.”
मी हरखून गेले आणि म्हटले, ” अदिती मला केव्हाचा बघायचाय ग हा सेल. खूप ऐकलंय याविषयी.”
अदिती हसायलाच लागली. म्हणाली, ” आई, मागच्या खेपेला वृद्धाश्रम बघून झाला. आता या वेळी गराज सेल ? ”
” हो, अनायसे आलेच आहे, तर नेच मला. “
ती कबूल झाली. छोट्या आद्याला जावयाने सांभाळायचे कबूल केले आणि त्या रविवारी आम्ही गराज सेल बघायला निघालो.
तिच्या कम्युनिटीत जवळजवळ आठशे बंगले आहेत. आम्ही कारने जिथे फुगे दिसतील तेथे थांबत होतो—प्रत्येक ठिकाणी किती व्यवस्थित सामान लावले होते–गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकाच्या गराजमध्ये आणि समोरही खूप जागा असते. तिथे नको असलेले सामान ठेवले होते. समोर खुर्ची टाकून मालक किंवा मालकीण बाई बसल्या होत्या. किती प्रकारचे सामान हो।
मुलांची खेळणी-अगदी नवी चकचकीत असावी अशी, पुस्तके, क्रोकरी, काय नव्हते तिथे ? अगदी फ्रीज-टी.व्ही. सुद्धा बघितले. मला इतकी मजा वाटत होती.
हा सेल शनिवार-रविवार असतो. त्यासाठी आधी कम्युनिटीची नाममात्र फी भरावी लागते, मगच ते विशिष्ठ फुगे देतात. दोन्ही दिवस ९ ते १ पर्यंत वेळ असते. १ वाजता सेल बंद होतो.
खूप लोक या सेलमधून संसारोपयोगी वस्तू घेतात. कोणीही मोडके तोडके असे काहीही ठेवत नाही. आणि अगदी नाममात्र किमतीत हे मिळते.
उद्देश फक्त एकच —आपल्या वस्तू हलवणे, ज्यांचा आता घरमालकाला उपयोग नसतो. मुले मोठी झाली की खेळणी पडून राहतात. मोठा tv घ्यायचा तर आधीचा कुठे ठेवणार? आपल्या इकडच्यासारखा exchange तिकडे नाही.
अशीच फिरताना मला माझ्या खूप आवडत्या, सिडने शेल्डनची कोरी पुस्तके दिसली. मोठे खोके भरून बाहेर ठेवली होती. केवढा आनंद झाला सांगू—लेक म्हणाली,” बाई ग ही सगळी घेणारेस की काय ? बॅगेचे वजन माहीत आहे ना ?”
मी सरळ खाली वाकून ती बघू लागले. किंमत फक्त 1 डॉलर लिहिली होती. मला इतका आनंद झाला. जवळ आरामखुर्चीवर एक खूप म्हाताऱ्या बाई विणत बसल्या होत्या.
मी त्यांना ‘ हलो ‘ म्हटले आणि विचारले,” बघू ना ही मी पुस्तके?”
त्या म्हणाल्या ,” बघ की. कुठून आलीस ? इंडियातून का ? ” मी ‘ हो ‘म्हटले. माझ्या खांद्याला लोकरीची विणलेली सुंदर स्लिंग बॅग होती–माझ्या आईने विणलेली. त्यांनी ती बघितली आणि म्हणाल्या, ” मी ही बॅग बघू का ?”
मी म्हटले, ” हो,बघा ना. माझ्या आईने विणलीय. तिला खूप हौस आहे विणायची. तुमच्या एवढीच आहे ती आता. “
त्या हसल्या आणि म्हणाल्या, “ मी ८९ वर्षाची आहे. माझ्या मुलाचे हे घर आहे. तोही आता ६५ वर्षाचा आहे. कोण कोणाला सांभाळणार ? मी आपली वृद्धाश्रमात राहते. इकडे अशीच पद्धत आहे. तेच बरेही पडते. चांगला आहे मी राहते तो वृद्धाश्रम. “
त्यांनी माझी स्लिंग बॅग नीट बघितली– “ छानच विणली आहे “ म्हणाल्या.
मी पटकन ती रिकामी केली. अदितीच्या purse मध्ये माझे सामान टाकले आणि त्यांना म्हणाले, “ घ्या ही तुम्हाला .नवीनच आहे हं. मी इकडे येणार म्हणून आईने नवीन विणून दिली.” त्या खूप संकोचल्या.. ‘नको नको. मी सहजच म्हटले अगदी.’ असं म्हणत राहिल्या.
“ पण तुम्हालाही आवडते ना विणायला, म्हणून देतेय,”
त्या खुश झाल्या. म्हणाल्या “ थँक्स डिअर. आता मी अगदी अशाच विणून माझ्या वृद्धाश्रमातल्या मैत्रिणींना देईन.: मला सांग, तू इकडे का आली आहेस ? “
“ ही माझी मुलगी. तिला छोटी मुलगी आहे ४ वर्षाची. तिला सुट्टीमध्ये सांभाळायला मी आलेय.”
“ थांब हं जरा “ असं म्हणत त्या तुरुतुरु आत गेल्या आणि एक भलेमोठ्ठे टेडी बेअर घेऊन आल्या. अदितीच्या हातात देऊन म्हणाल्या, “ नवीनच आहे हं हे. माझा नातू मोठा झाला त्याचे आहे. घे तुझ्या बेबीला. खेळेल ती याच्याशी. याचे नाव ब्लु बेरी आहे बरं का–माझ्या नातवाने ठेवलंय ते. “
आम्ही संकोचलो आणि म्हणालो, “ नको हो. उगीच कशाला ? “
पण त्यांनी ते परत घेतले नाही. उलट म्हणाल्या, ”तुझ्या आईला सांग, खूप छान विणतात त्या. मला एक गोड गिफ्ट मिळाली इंडियातून–थँक् यू सो मच–हे कसे म्हणतात तुमच्या भाषेत?”
मी म्हटले,” आभारी आहे “
त्या म्हणाल्या, “ आईला सांग आभारी आहे “
आम्ही त्यांचा निरोप घेतला. अदितीने त्यांचा फोन नंबर घेतलाच होता.
म्हणाल्या,” कधी जमले तर ये ग मला भेटायला आईला घेऊन माझ्या वृद्धाश्रमात. “
आम्ही घरी आलो. आद्याने टेडी बघताक्षणीच कडेवर घेतले. त्याचे नाव विचारले.आणि त्या ब्लु बेरीशी जी काय दोस्ती तिने केली की विचारू नका. २४ तास ते तिच्या बरोबर।–अगदी
झोपताना जेवतानासुद्धा.
मी भारतात परत आले. एकदा फोनवर बोलताना अदिति म्हणाली,
“ आई,त्या जेनी आजी गेल्या ग. मी त्यांना भेटायला गेले होते एकदा तेव्हा तुझी चौकशी करत होत्या. झोपेतच गेल्या म्हणे. त्यांच्या मुलाने कळवले मला. “
–मला वाईट वाटले. त्यानंतर जेव्हा केव्हा मी गराज सेल बघते, तेव्हा त्या गोड, निळे डोळे असलेल्या, पांढरेशुभ्र कापसासारखे केस असलेल्या, बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जेनी आजीची आठवण येते.