मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी तरी अशी कशी???” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “मी तरी अशी कशी???” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

मी तरी अशी कशी???

 – – एकादशी दुप्पट खाशी… तरीही म्हणे मी उपाशी???

… आज “ पापमोचनी “ एकादशी म्हणून जराशीच लवकर उठले… पटापट आवरून पूजेला बसले. हार फुलांनी विठूला सजवले… पण…

.. पण लक्ष सगळं चुलीशी… पोट ओरडतंय ना… मी तर कालच्या रात्रीपासून आहे की उपाशी… ॥

… मग पूजा पटापट उरकून केली भगर नि दाण्याची आमटी उलुशी …चविष्ट खिचडी जराशी… अन् पित्त नको म्हणून गोडशी लापशी…अंमळ जास्तच झालं म्हणत… सुपारीही खाल्ली की चुकून जराशी…

तरी का वाटतंय् मला… मी आहे उपाशी… ॥

… आज भजनाचा स्पेशल क्लास… आहे ना ही ‘ पापमोचनी’ एकादशी..

मग वामकुक्षी सोडून उठले पटदिशी… मेकअप आवरला अगदी झटदिशी.. साडी नेसले ठेवणीतली झकासशी…

पण निघतांनाही वाटत होतं… आहे मी उपाशी॥

… संध्याकाळी ‘फक्त’ थालीपीठं खमंगशी… चापून खाल्ली लोणकढ्या तुपाशी…

मागचं आवरून टाकलं अगदीच चटदिशी…

टी. व्ही. पहायला अन् आडवारले जराशी… 

तरी अजून का वाटतंय् असल्यासारखं उपाशी? … ॥

… नकळतच डोळा लागला अन् मनाला जाग आली जराशी

… पोटात अडकलेले विचार… हळूच निसटून गेले मनात… अन् दचकलेच जराशी

… मनाचा देव्हारा तर रिकामाच होता… विठूरायाचा त्यात मागमूसही नव्हता…

… त्यालाच नेमकी विसरले कशी? खंत फार दाटून आली मनाच्या तळाशी… ॥

… अन् अचानक कुणीतरी बोललं कानाशी… उठून बसले मी खट्टदिशी…

… ‘‘उपास उपास म्हणत दुप्पट की खाल्लंस… आणि माझ्याकडे नेमकं दुर्लक्ष केलंस… 

… असू देत आता यावेळी… तसंही ‘पापमोचन’ नाहीच होणार.. पण तरी माफ करून टाकतो तुला…

… मात्र खाण्याच्या नादात पुन्हा मला विसरलीस तर… तर जन्मात मी कधीच भेटणार नाही तुला…

… माझ्याखेरीज मनात सारखं इतर भरताड करतेस कशाला? ..

… तिथे असू दे जागा… फक्त माझ्या नामाला…

… मन भरून सतत आठव मला … विसरून जा जरा स्वत:ला…

… मग मात्र नक्की म्हणशील… मन स्वानंदाने गच्च भरलंय्… 

… नंतर खुशाल असं म्हण ना की… एकादशी दुप्पट खाशी…

… पण.. पण आता मात्र मी मुळीच नाही उपाशी… ॥

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

गाभाऱ्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठित असतात आणि त्यांचे केवळ डोळ्यांनी दर्शन घेणे अपेक्षित असते, असे मानले जाते. बाकी, सुरक्षितता हा मुद्दा आहेच. आणि शिवाय संबंधित धार्मिक संस्था त्या देवतांची अधिकृत छायाचित्रे प्रसिद्ध करून विक्रीस उपलब्धही करून देत असतात. पण तरीही लोक प्रत्यक्ष त्या धार्मिक स्थळी अगदी आत जाऊन त्या देवतांचे फोटो, विडीओ करण्याचा प्रयत्न का करीत असतात, हे समजण्याच्या पलीकडे आहे. बहुतांश सर्वच मंदिरांत फोटो काढण्यास मनाई असे फलक असतातच. शिवाय तिथले सेवेकरी तशा सूचनाही सातत्याने देत असतात.

– – शेगावही याला अपवाद नाही. फक्त इथे सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर अजिबात केला जात नाही. केवळ संबंधित माणसाच्या समोर सूचनांचा फलक धरला जातो. तरीही अतिउत्साही लोक मोबाईलमध्ये चोरून चित्रण करताना सापडतात. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब येतेच, मग ते संबंधित मोबाईल ताब्यात घेऊन ते चित्रण पुसून टाकतात. प्रदक्षिणा मार्गावर इतर भाविकांना अडथळा होऊ नये म्हणून तिथे उभे राहून फोटो घेऊ दिले जात नाहीत, त्याऐवजी पर्यायी ठिकाण सुचवले जाते. पण या सा-या कामांत सेवेक-यांचा बराच वेळ जातो, हे लोकांच्या ध्यानात येत नाही. रील बनवून पैसे कमवण्याचा उद्योग तर हल्ली सर्रास दिसतो. मग त्यासाठी आपण पवित्र स्थळांचे पावित्र्य धोक्यात आणतो आहोत, हे लोक विसरतात. श्री गजानन महाराज संस्थानने श्री गजानन महाराजांचे अतिशय उत्तम दर्जाचे फोटो उपलब्ध करून दिलेले असताना आपल्याच मोबाईलमध्ये फोटो घेण्याचा अट्टहास लोक करीत राहतात. असो.

– – – भारताच्या सन्मानीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच शेगांव मंदिरास भेट दिली. विशेष अपवाद आणि कार्यालयीन संदर्भ या कारणांनी, मा. राष्ट्रपती महोदया प्रत्यक्ष गाभा-यासमोर उभ्या असतानाचे एकच छायाचित्र प्रसिद्ध केले गेले आहे. या छायाचित्रात श्री गजानन महाराज यांची मूर्ती दिसते आहे. मंदिराच्या आतल्या भागातील कोणतीही छायाचित्रे किंवा चित्रफिती प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत.

सामान्य लोकांना फोटो काढू देत नाहीत, मग राष्ट्रपती दौ-यात ही परवानगी कशी, असा प्रश्न काही स्वयंघोषित फेसबुक पेजवाल्यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर उतावळ्या वाचकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत विविध प्रकाराच्या comments केलेल्या आढळतात. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या मा. राष्ट्रपती महोदयांची प्रत्येक भेट ही अधिकृत/आधिकारिक/official मानली जाते. यावेळी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे घेतली जातात. श्री गजानन महाराज संस्थानने याबाबत one time exception म्हणून कदाचित त्यांच्या अधिकारात ही परवानगी दिलेली असावी, आणि यात काहीही गैर दिसत नाही.

 

भारतातील एकूण परिस्थिती लक्षात घेता अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे अपरिहार्य आहे. यासाठी विहित नियमावली तयार केली गेलेली आहे. अर्थात याचा त्रास सर्वसामान्य जनतेस होणे साहजिकच आहे. परंतू अशा भेटींची पुरेशी आगाऊ सूचना दिलेली असते, हे ध्यानात घेतले पाहिजे. संतांपेक्षा, देवापेक्षा कुणीही मोठे नाही, हे जरी खरे असले तरी ज्या वेळी देशाचे सर्वोच्च नेतृत्व मोठ्या भक्तिभावाने एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देते, त्यावेळी काही गोष्टी काही काळापुरत्या सहन करणे गरजेचे असते. या संपूर्ण भेटीदरम्यान संस्थान आणि प्रशासनाने जनतेला होऊ शकणारा त्रास कमीत कमी कसा राखता येईल, या गोष्टीला प्राधान्य दिलेले दिसले. गावापासून ब-याच अंतरावर मुख्य कार्यक्रम स्थळ असल्याने गावात फारशी अडचण झाली नाही. आनंद विहार मध्येच मा. राष्ट्रपती महोदयांची विश्रांती-अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था आनंद विहार या भक्त निवास संकुलात अत्यंत देखणी व शिस्तबद्ध केलेली होती. तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलिस इत्यादी व्यक्तींची निवास व्यवस्थाही याच ठिकाणी होती. परंतु याच संकुलात निवासासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली गेली. दौऱ्यादरम्यान उपद्रव होऊ नये म्हणून परिसरातील भटक्या श्वानांना पकडून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्राणी कल्याण संस्थेला दिली गेली होती आणि या श्वानांची योग्य ती काळजी घेतली गेल्याचे दिसले.

 

– – या व इतर सर्वच गोष्टींसाठी श्री गजानन महाराज संस्थान तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिस दल कौतुकास पात्र आहे, असे मला वाटते. जय गजानन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ११ वा – – 

जनी सर्वसुखी असा कोण आहे?

विचारे मना तूचि शोधूनि पाहे|

मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|

तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|

अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का?

म्हणून समर्थ मनाला (म्हणजे आपल्याला)उपदेश करताना म्हणतात, ” जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही. ” लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच!

परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो, ‘ खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ‘ साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल.

हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.

म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

  • जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
  • पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
  • वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
  • माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो? (क्रमशः)

– – – – 

श्लोक १२ वा – – 

मना मानसी दुःख आणू नको रे|

मना सर्वथा शोक चिंता नको रे|

विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|

विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|

अर्थ : हे मना (मानवा) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा (आनंदाचा) भोग घे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु ‘गतं न शोच्यम्’ म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे.

देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.

जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे… ‘ असे म्हणू शकले.

समर्थ या श्लोकात आपल्याला ‘ विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.

स्वसंवाद :: 

  • मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?
  • भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?
  • देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?
  • विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का?

 – क्रमशः श्लोक ११ आणि १२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इस ताण का क्या करे..? – लेखिका : योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ इस ताण का क्या करे..? – लेखिका : योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

 

ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…

वेळेवर उठण्यापासुन वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..

बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या विषयांवर खाडखाड बोलू शकते…

त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजूनच वाढतो.

बारकाईने विचार करा…

साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण- भात, भाजी, पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्नाबद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…

या भाजीत हे व्हिटॅमिन..

पोळीत एवढ्या कॅलरी..

सॅलड पाहिजेच..

गोड नको रे बाबा…

हे तेल असं, ते तेल तसं…

१०००० पावलं चाललंच पाहिजे..

फलाणं आणि बिस्तानं…

अरे! दोन घास ताटात आलेत, ते खायचे नाहीत नीट आणि शंभर नाटकं…

शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… ही सूत्रं नाहीतच हल्ली…

प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचंय… तरुणच रहायचंय… तरुणच दिसायचंय… कशासाठी…?

तरुण मुलांना दिसू द्या की तरुण.. तुमचं तरुणपण झालंय ना जगून… आपण काय अश्वत्थामा आहोत का? पृथ्वीवरच कायम राहायला..

Accept the reality… and live your life happily.

‘मी एक अतिछोटी व्यक्ती आहे

जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही.. ‘

असं रोज स्वतःला सांगितलं, तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.

फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या- नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…

काही दिवसांपूर्वी मी असंंच खूप ज्ञानाचा विस्तार केला होता.. माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं की या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय.

मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केलं आणि आता खूप बरं वाटतंय..

आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करते… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सूत्र आहे सध्या…

तुम्हाला एक गंमत सांगते..

नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…

राहू खराब… केतू खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…

म्हटलं हे ऐकून, वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा… कृष्णार्पण म्हटलं आणि दिलं सोडून…

आता मस्त वाटतंय..

रोजचं जेवण… रोजची झोप.. रोजची आवराआवर… रोजचं रुटीन याचा ताण घेऊ नका…

तुमच्या सोयीने ते करा… आणि मनापासून केलेलं कधीही अपाय करत नाही… त्याचा उपयोग चांगलाच होतो..

घेऊ नका ताण आणि जगणं करा छान..

लेखिका: योगिता कुलकर्णी

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # सीनें में जलन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # सीनें में जलन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#सीनें में जलन… ऑंखों में तूफ़ान… #

…. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं सगळ्या भारतीय सिनेसृष्टीला आणि लोकांच्या हृदयाला जिंकून घेऊन एक अनभिषिक्त सम्राटाचं पद अनेक दशकं गाजवतं राहीला….स्वप्नं बघायची… ती पूर्णत्वास नेताना संघर्ष करायचा… आणि ती स्वप्नं सत्यात उतरावयाची याचा वस्तुपाठच त्याने आजवर केलेल्या शेकडो सिनेमातून तरूणाईलाच नव्हे तर तमाम लोकांना दिला… अन्याय घडो कुठेही.. इट का जवाब पत्थरसे देना… आणि आपल्या साध्या सरळ मार्गी दैनंदिन व्यवहारात जर कुणी आडदांडपणा करून त्रास देत असेल व त्यास दादापुता करूनही ऐकत नसेल तर… खेल तुम्हने शुरू किया तो खत्म हम कर देंगे.. ही अन्यायाविरूद्धची , नाहक पिळवणूकी विरुद्धची लढाई एकट्या खांद्यावर कशी लढायची याचं प्रशिक्षण तो देत गेला… यंग अंग्रीमॅन हा त्याने अशा विविध पैलूंच्या भूमिका साकारून मिळवला तो उगाच नाही… त्याचे खदिरांगासारखे आग ओकणारे डोळे जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आता अन्याय कर्ता, जुलूम कर्त्याची आता काही खैर नाही हे हाणामारी आणि दे दणादण मारपिट पटातून आपल्या दिसून येते…पूर्व सुरीचा हिंदी चित्रपटातील रोड रोमियो ची असलेली नायकाची प्रतिमा त्याने आपल्या कलेच्या अदाकरीने बदलून टाकताना… नायकातली नजाकत आणि शांत डोक्याचा मुत्सद्दी  खलनायक रंगवताना नकारात्मक नायकाचे गुणधर्म जास्त भावतात…काहीवेळा तर त्याच्या नायकाची प्रतिमा आपल्या रसिक मनावर इतकी बिंबली गेली असल्याने त्याने हा खलनायक रंगवला आहे हेच मुळी पचनी पडत नाही…राग जितका टोकाचा त्याला दाखवता आला तितकेच प्रेमाचे, मोहब्बतेचे, इश्काचे नजारे सुध्दा अगदी संयत दाखवून दिले… तो ज्या चित्रपटात असेल त्या चित्रपटातील नायिका त्याच्यावर फिदा होताना पडद्यावर वर दिसायच्या पण पडद्या बाहेर खाजगी जीवनात देखील त्या नायिका ‘ ‘हाय मैं मर  जावाॅं’ करत अपनी जिंदगी न्यौछावर करायला मागे पुढे पाहत नसत… किंबहुना काहींना तर  त्याच्या प्रेमाचा सिलसिला असाच अखंड चालू राहावा असचं वाटल्याने त्यां आजही अतुट प्रेमापोटी त्याच्यासाठी  ‘ नजर लागी सय्या तोरे बंगले पे’ आळवत मैं तुलसी तेरे ऑंगन की बनून राहिल्या… पण आपल्या मनातील ही होणारी चलबिचल मात्र त्याने चारचौघात कधीही चर्चेवर दिसणार नाही याची काळजी घेतली… अफवा, कंडम गाॅसिप के चर्चे तर हर जुबान पर होत राहीले… असा हा हरहुन्नरी  कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहीला… उत्तुंग उंचीवर पोहचला आणि या सम हाच असा एकमेवाद्वितीय राहिला…निसर्गाच्या नि नियतीनेही तशात त्याला असे काही फटकारले तेव्हा तर तो काळाच्या पडद्याआड लुप्त होता होता त्याच्या सतीच्या पुण्याईने  तारले… कलावंताला घडवता येत नसते तर तो घडत जात असतो ,पैदाईशीच असतो..याला आपल्या अलौकिक कीर्तीच्या अंहकाराने छेद देत कलावंत निर्मितीची प्रशाळा आपले सगळे तनमन नि ओतून उभा केली… पण नियतीला ते साफ ना मंजूर होते आणि त्याला क्षणात होत्याचे नव्हते केले… चलती हुई गाडी दलदलमें फस गई… तोपर्यंत यंग अंग्रीमॅन चा करिष्माही संपलेला होता… बाजारू चलनी नाण्यांचा अभिनेत्यांचा  खणखणाट सुरू असल्याने त्याला रोड पतीची अवकळा आली होती… पण इथं  नियतीचे दान त्याला  अनुकूल  असे पडले.. कौन बनेगा.. च्या टि. व्ही.  छोट्या पडद्यावर तो आला.. आणि पुन्हा त्याने आपल्या कलेची झलक दाखवून द्यायला सुरुवात केली.. बघता बघता ती कलावती अधिक जोमाने दौडत निघाली… पुनश्च त्याला उत्कर्षाचे दिवस लाभले… आणि मग खऱ्या अर्थाने म्हणू लागला मेरे पास अब पहलेसे ज्यादा सबकुछ है.. बंगला है, गाडी है,ढेर सारा पैसा है, दौलत है, आज पहले जैसे क्या नही मेरे पास…तुमही बताओ…हां एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची राहून गेली…माझा पहिल्या भरभराटीच्या काळातले अवतीभवतीचे माझे माझे म्हणणारे लोक मात्र माझ्या पडत्या काळात सोडून गेले आणि आता  मधूचा सुवास येताच  माशा पुन्हा घोंगावू लागल्यात… एक गोष्ट माझी मात्र अजूनही तशीच साथ देतेय ती तीस पैश्याची पुत्तूशेठ बीडी कालही होती तशीच आजही माझ्या ओठांवर शिलागावून बसलेली आहे… ना तिची चव बदलली ना तिला माझ्या श्रीमंतीने लाथाडले… म्हणूनच मी तिला जवळ ठेवले आहे… तिच्या मदतीनेच मी माझ्या नैराश्याचा धूर बाहेर सोडत असतो… आणि बीडीचे जळणारे लालचुटूक थोटूकाची ठिणगी मला जगण्याची सतत उर्मी देतं असतं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगांतून गीतेचे तत्वज्ञान

देह बुद्धी नष्ट होऊन भक्तिमार्गाने परब्रम्ह प्राप्त झाले, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून माणसाची सुटका होते, हे तत्त्वज्ञान आहे. परंतु तुकाराम महाराजांना पांडुरंगाची अखंड भक्ती करून त्याची सेवाच करायची आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही, म्हणून त्यांच्या एका अभंगात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,

आमुचे उचित/ हेचि उपकार/

आशपुलाची भार/ घालू तुज//

 आमच्या योगक्षेमाचा भार देवा तुझ्यावर घालून स्वस्थ बसणे हेच उचित आहे.

 मी भक्त व तू माझा हरी, अशी द्वैतभावना तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिसत असली

 तरी अद्वैत झाल्याशिवाय, खरा भक्त असूच शकत नाही हे त्यांच्या अभंगातून दिसणारे गीतेचेच तत्त्व आहे. ते अभंगातून स्पष्ट सांगतात,

दुजेखंडे तरी/ उरला तो अवघा हरी/

आपण बाहेरी/ नलगे ठाव धुंडावा//

इतुले जाणावया जाणा/ कोड तरी मने मना/

पारधीच्या खुणा/ तेणेची जाणाव्या//

तुकाराम बुवा या अभंगात काय सांगतात? मनानेच मनाला जाणले पाहिजे. जो पारधी असतो तो शिकारीचा शोध कसा घेतो, हे दुसरा पारधीच जाणतो. आपला हरी हा आपल्या जवळच आहे, तो दुसऱ्या ठिकाणी शोधायची गरज नाही.

 देह आधी काय खरा/ देहसंबंध पसारा/

 बुजगावणे चोरा/ रक्षणसे भासते//

 तुका करी जागा/ नको वासपू वाऊगा/

 आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//

तुकाराम महाराज निजरूप विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात, आणि सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैत रूप हरी तुला सापडेल, कारण तू स्वतःच परमात्मरूप आहेस. तुझी आत्मदृष्टी उघडी ठेवशील तर तुला हा बोध होईल.

थोडक्यात महाराजांना इथे असे सांगायचे आहे, की संपूर्ण विश्वात, चराचरात जो परमात्मा भरलेला आहे, तो तुला तू जर डोळे उघडे ठेवलेस तरच दिसू शकेल. आपल्याला एखादा माणूस सहज कुठेतरी भेटतो, आणि आपली मदत करून जातो. परमेश्वराच्या रूपानेच आपल्याला मदत करण्यासाठी तो आलेला होता याची मात्र आपल्या देहधारी माणसाना जाणीव नसते.

भगवंताने अर्जुनाला काय सांगितले?

“तुझे सर्व कर्म मला अर्पण कर.” तुकाराम महाराजही मुमुक्षुंना हेच सांगत आहेत.

आहे ते सकळ/ कृष्णासी अर्पण/

नकळता मन/ दुजे भावी//

म्हणून पाठे/ लागतील भुते/

येती गिवसित /पाच जणे/

(पंचमहाभूते, ज्यापासून माणसाचे शरीर बनले आहे)

 ज्याचे त्या वंचले/ आठव न होता/

दंड हा निमित्त कारणे/ तुका म्हणे//

अर्थात सर्व कर्मे हरीची असून त्याची त्याला अर्पण करायची आठवण न ठेवल्यामुळे, माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो, त्याला दंड मिळतो.

तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा गीतेत आलेल्या धर्म रक्षणाचे महत्त्व जीवनात का आहे ते त्यांच्या अभंगातून सांगतात, त्याचप्रमाणे शांत मनोवृत्तीचे महत्व ते समजावून सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख/

म्हणवुनी  शांती धरा/ उतराल पैलतीरा//

अंगी भरती आधी व्याधी/ तुका म्हणे त्रिविध ताप/ मग जाती आपोआप//

 मन जेव्हा शांत असेल, त्याचवेळी सर्व दुःखांचा नाश होऊन पैलतीरास जाणे सोपे होईल.

साळंकृत कन्यादान/ पृथ्वीदानाच्या समान/

परिते न कळे या मुढा/ येईल कळो भोग पुढा//

आचरता कर्म/ भरे पोट राहे धर्म/

सत्या देव साहे/ ऐसे करूनिया पाहे//

अन्न मान धन/ हे तो प्रारब्ध आधीन/

तुका म्हणे सोसे दुःख/ आता पुढे नासे//

गीतेतील कर्मयोग महाराजांनी या अभंगात भक्तांना सांगितला आहे. या ठिकाणी त्यांनी तत्कालीन वर्णाश्रमधर्माचे महत्त्व लक्षात घेतले आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माला अनुसरूनच कर्म केल्याने दुःख राहत नाही असा या अभंगातून त्यांनी उपदेश केला आहे.ज्याप्रमाणे

कृष्णाने पार्थास त्याच्या क्षात्र धर्माचे पालन करण्यास सांगितले.

क्रमशः… 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सौंदर्यदर्शनम्… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ सौंदर्यदर्शनम्… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

मी किचनकडे चाललो होतो तर बायको म्हणाली, ” चहा करणार असाल तर मला पण करा अर्धा कप, जास्ती नको. ” मी चहा करून तिला दिला. तिनं एक घोट घेतला अन् उद्गारली, ” वा, सुंदर, सुंदर झालाय! ” ” थँक्यू” माझी संयमित प्रतिक्रिया. तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडले. घरात पाऊल टाकताच ऋद्धी उत्तेजित होऊन म्हणाली, ” आजोबा, काय सुंदर पिक्चर आहे हो ‘ दशावतार ‘. दिलीप काकांनी तर कमाल केलीय. सुंदर, अभिनय, सुंदर कोकण, सुंदर चित्रण, सुंदर दिग्दर्शन, व्वा! सुंदर भट्टी जमलीय. मजा आली. “

मला पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पाठ्यपुस्तकात शिकलेली ग ह पाटलांची “देवा तुझे” ही सुंदर कविता आठवली…

देवा, तुझे किती, सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो ॥

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे ॥

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे

किती गोड बरे गाणे गाती ॥

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी ॥

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील!!

 

सौंदर्य—हे एक विलक्षण कोडं आहे!

जगाच्या प्रत्येक कणात, अणुरेणूत त्याचे अस्तित्व जाणवते, पण “हेच ते सौंदर्य” असे हातात घेऊन दाखवता येत नाही. अनुभवांच्या अनंत रंगपंचमीमध्ये विहरताना एकच प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उगवतो, हे सौंदर्य म्हणजे नवकी आहे तरी काय? त्याची व्याख्या, त्याचे स्वरूपवर्णन, त्याची मिमांसा कशी करावी?

सूर्यास्ताची केशरी प्रभा, बाळाच्या चेहऱ्यावरची निष्पाप, निरागस स्मितरेषा, स्वरांच्या विलोभनीय विभ्रमातून झुळझुळणारा माधुर्यझरा, तरल कवितेतील भावाविष्कार, सद्गुणी माणसाच्या कृतीतून प्रकटणारे औदार्य, आर्तता, करुणा, या साऱ्यात अनामिक अशी एकच छटा असते, – ती म्हणजे सौंदर्याची अनुभूती. हे दृश्य नाही, वस्तू नाही; हे तर मनाच्या स्पर्शातून उमलणारे एक नाजूक भावतत्त्व आहे.

“सौंदर्य” हा शब्दच स्वतः अर्थपूर्ण आहे—

‘सु’ म्हणजे उत्तम आणि ‘अंदर्य’ म्हणजे रूप-गुणांचा संगम. त्यामुळे सौंदर्य केवळ बाह्य रूपांत नसून अंतर्गत लय, संतुलन, माधुर्य व समरसतेचा अविष्कार आहे.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी आणि भारतीय आचार्यांनी या संकल्पनेला विविध कोनांतून उजाळा दिला आहे.

– – प्लेटो म्हणतो, “Beauty is the splendor of truth” —सत्याचा तेजस्वी झगमगाट म्हणजेच सौंदर्य.

– – अरिस्टॉटलच्या दृष्टीने सौंदर्य हे Order, Symmetry and Definiteness—क्रम, प्रमाण आणि स्पष्टतेत सामावलेले असते.

– –कांटच्या मते सौंदर्य म्हणजे disinterested pleasure—स्वार्थरहित, शुद्ध आनंद.

– – भारतीय परंपरेत भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील रससिद्धांत सौंदर्याच्या अनुभूतीचे केंद्रस्थान आहे. ‘रसोत्पत्ती’ म्हणजेच भावांचे सूक्ष्म स्पंदन मनात जागविणे; हेच कलात्मक सौंदर्याचे सर्वोच्च ध्येय.

✦ *सौंदर्याची वैशिष्ट्ये*

सौंदर्य हे केवळ पाहण्यात नसून जाणण्यात आहे. त्याची काही वैशिष्ट्ये—

१. संतुलन – जिथे अतिरेक नाही, तिथे सौंदर्य वसते. जसे स्वर-तालाची समतोल संगती.

२. लय – विश्वाचा नित्य प्रवाहातच लय आहे; पानांची हालचाल ते हृदयाची ठोके—सर्वत्र लय.

३. समरसता – विविध घटकांची एकात्मतेने झालेली सुंदर संगती.

४. माधुर्य – मनाला शांत करणारी, कोमल करणारी गोड, हवीहवीशी वाटणारी स्पंदने.

५. अहंकारशून्यता – जिथे ‘मी’ विरतो आणि अनुभवात मन पूर्णपणे लीन होते, तोच सौंदर्याचा परम क्षण.

 

भारतीय सौंदर्यमीमांसा

भारतीय चिंतनात सौंदर्य हे “सत्यम्, शिवम्, सुंदरम्” या त्रिसूत्रीमध्ये दडलेले आहे. ‘सुंदर’ म्हणजेच ‘सत्य’ आणि ‘शिव’ यांचे तेजस्वी रूप. भरतमुनींचे नाट्यशास्त्र, आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक, अभिनवगुप्तांचे अभिनवभारती—हे सारे ग्रंथ सौंदर्यदृष्टीची अंतरंगातील दिशा दाखवतात.

रससिद्धांतानुसार कला म्हणजे रसनिर्मिती—अलौकिक, शुद्ध आणि उत्कट आनंदाचा अनुभव. शृंगारातील प्रेम, करुणेतून उमटणारी विषादलहरी किंवा वीररसमध्ये जाणवणारा पराक्रम—ही सर्व सौंदर्याची विविध रूपे.

भारतीय तत्त्वज्ञान सांगते की सौंदर्य वस्तूत नसते, तर रसग्राही मनात जन्मते. म्हणूनच एकाच दृश्यात एखाद्याला सौंदर्य दिसते, तर दुसऱ्याला कदाचित नाही—अनुभूतीची क्षमता भिन्न असते.

 

पाश्चात्य सौंदर्यमीमांसा

पाश्चात्य विचारसरणीने सौंदर्याला स्वतंत्र तत्त्व म्हणून प्रतिष्ठा दिली आहे.

प्लेटो—सर्व दृश्य-सौंदर्य हे परम आदर्शरूपाचे प्रतिबिंब.

अरिस्टॉटल—कला म्हणजे वास्तवाचे सर्जनशील अनुकरण (Mimesis).

कांट व हेगेल—बुद्धी आणि भावनांच्या समतोलातून सौंदर्य प्रकटते.

टॉलस्टॉय—कला म्हणजे भावनांचा संवेदनांद्वारे प्रसार.

– – या सर्व उक्ती एकच सांगतात—सौंदर्य हे दिसण्यात नव्हे, तर भावना, अर्थ आणि अभिव्यक्तीच्या संगमात असते.

 

✦ *कलेतील सौंदर्य*

.. कला म्हणजे सौंदर्याचा मूर्त अविष्कार!

.. चित्रकलेत रंग-रेषांची नृत्यलय,

.. संगीतामध्ये स्वर-तालाची समरसता,

.. कवितेत शब्द-अर्थ-भावनांची रेशीमगाठ

… कलाकाराच्या अंतर्मनातील स्पंदन जेव्हा रूप घेतं, तेव्हा सौंदर्याचा जन्म होतो.

 

✦ *निसर्गातील सौंदर्य*

निसर्ग हे सौंदर्याचे शुद्धतम रूप!

पहाटेचा शीतल, आल्हाददायक, सुगंध, वाऱ्याची हलकीशी सळसळ, समुद्राच्या लाटांची नित्य लय, फुलांचा बहर, पावसाची रिमझिम—या प्रत्येक क्षणातून सौंदर्य अमृतधारेसारखे ओघळते. निसर्गच कलाकाराला प्रेरणा देणारा पहिला गुरू आहे.

 

✦ *मानवी जीवनातील सौंदर्य*

मानवी सौंदर्य हे देहात नाही, तर माणसाच्या वर्तनात, संस्कारांत, विचारांत असते.

नम्र वाणी, प्रामाणिकपणा, सहानुभूती, परदु:खात सहभागी होण्याची क्षमता—हेच खरे सौंदर्य. करुणा, रुजुता, कोमलता, त्याग, परोपकार या सद्गुणांत लपलेली दिव्यता कोणत्याही चित्रापेक्षा श्रेष्ठ.

 

✦ *सौंदर्य आणि अध्यात्म*

सौंदर्याचा सर्वोच्च अनुभव हा अध्यात्मिक आहे!

जेव्हा मन द्वैत-अद्वैताच्या सीमेपलीकडे जाऊन एकत्व अनुभवते, तेव्हा सौंदर्याचे गूढ स्वरूप उलगडते. भारतीय परंपरेत ब्रह्म हेच “सत्य-शिव-सुंदर” मानले आहे; म्हणूनच सौंदर्याचा शोध हा देवत्वाच्या शोधाशीच जोडलेला असतो.

 

✦ *सौंदर्याचे सार्वत्रिक अस्तित्व*

सौंदर्य अथांग आहे.

ते दगडातही असते आणि फुलातही, सागराच्या लाटात, मेघांच्या गडगडाटातही आणि श्रावणाच्या झडीतही. कधी हसण्यात उमलते, तर कधी अश्रूतून ओघळते. मातेला आपल्या बाळात दिसणारे सौंदर्य आणि वैज्ञानिकाला प्रयोगात जाणवणारे सौंदर्य—दोन्ही एकाच भावविश्वाचे रूप.

सौंदर्याला सीमा नाहीत; ते अखंड वाहणाऱ्या अस्तित्वाची दिव्य संगती आहे.

 

✦ *उपसंहार*

सौंदर्य ना केवळ डोळ्यांनी दिसते, ना केवळ बुद्धीने समजते—ते हृदयात स्पंदते. त्याचा अनुभव म्हणजे एक शुद्ध, नाजूक, परम आनंदाचा क्षण. सौंदर्य हे सत्याचे, शिवाचे, आणि जीवनाच्या मौलिकतेचे रूप आहे.

आपल्याकडे पाहण्याची दृष्टी असेल, तर जगातील प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक कणात सौंदर्य उमलत राहते.

कारण सौंदर्य म्हणजेच ईश्वराचे स्वरूप—

कणाकणात वास करणारे, ब्रह्मांड व्यापूनही अंगुष्ठमात्र उरलेले, अनंत असणारे—

सत्यं, शिवं, सुंदरम्!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भांड्याला भांडं लागणारच! ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ भांड्याला भांडं लागणारच! ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

भांड्याला भांडं लागणारच! 

आणि… 

लागले की नाद होणारच! 

याचा सरळ अर्थ खरं म्हणजे असाच आहे, की तोंडाला तोंड लागलं म्हणजे वाद होणारच! पण हे सरळ कुणाला सांगितलं तर आणखी कितीही तोंडं तोंडाला लागू शकतील आणि किती वाद वाढतील याचा नेम नाही. म्हणून आपण म्हणतो भांड्याला भांडं लागलं की नाद होणारच! तसेही आपल्याला मधून नादमय बोलायची सवय असतेच नं! म्हणूनही आपण तसं म्हणतो.

आमच्या माहेरी मंजुळ नादा मध्ये बोलायची कोणाला सवय नव्हतीच! घर एवढं मोठं की अशा मंजुळ नादात बोललं तर कोणाला हाकाही ऐकू येणार नाहीत आणि दिलेलं उत्तरही ऐकू येणार नाही. खाली-वर आम्ही आणि काका असं राहत असू. काही निरोप द्यायचा असेल तर शंखनादासारखा आवाज करून बोलल्याशिवाय जागच्या जागून निरोप कसा देणार! थोडक्यात शंकराच्या डमरूमधून काय निघेल! अशा नादाची आम्हाला अतिशय सवय होती. कोणी हळू बोललं तर जेवलीस की नाही? अशी विचारणा व्हायची.

त्यातून आमच्या घरातही दुकानं आणि घरासमोरही दुकान ओळी. मग काय! माझे वडील प्रेस वाल्यालाही पापाराऽऽम कपडे घेऊन जा. असे मोठ्ठ्या आवाजात सांगायचे. दुसऱ्या दुकानदाराला, दाढीचं ब्लेडही खर्जाच्या आवाजात मागूनच बोलावून घ्यायचे. अशी भांड्याच्या नादापेक्षा तोंडाच्या नादाचीच आम्हाला फार सवय होती. त्यामुळे नादमय भांडे काय असतात हे माहितीच नाही. एकदा आमच्या घरात भाड्याने राहणारी कुमुद नावाची बहिणी सारखीच एक मुलगी आली घरी. माझ्या हाताने दोन भांड्यांना भांडे लागले. आवाज झालाच! ती अगदी त्रासिक चेहरा करून म्हणाली, ‘ए तो नाद थांबव. ‘ मी तिला ठामपणे म्हटले, ”असा काय भांड्यांचा झालेला नाद थांबवता थोडाच येतो! ” मग तिने मला सांगितले की त्या भांड्याला हात लाव म्हणजे नाद थांबतो. तेव्हा मला कळले, खऱ्या भांड्याला भांडे लागणे आणि लागल्यावर नाद होणे म्हणजे काय असते ते.

असेच आमच्या बहिणींचे तोंडाला तोंडं लागणे की भांड्याला भांडे लागणे असे वाद आणि नाद नेहमीच व्हायचे कधी रडा रड व्हायची तर कधी आम्ही त्याची मजा पण घ्यायचो. एकदा आम्ही सर्वांनी घरी आणलेली केळी खाल्लीत. पण माझ्या लहान बहिणीने एक केळ जास्त घेतले. तर मी लगेच तिच्याशी भांडायला लागले एक केळ जास्त का घेतलं म्हणून! तेवढ्यात वडील आले. आणि मला म्हणाले घेऊ दे घेतलं तर ती का तुझ्या बापाचं खाते. मी मनातच म्हटलं ‘माझ्या बापाचं नाही तर कोणाचं खाते आहे? मी आधी आली आहे नं! ‘ पण तेवढं काही म्हटलं नाही बरं मी. तेवढं सौजन्य होतं म्हटलं माझ्यात! पण तरी अकलेचे तारे तोडलेच मी! माझे वडील जमदग्नीचा अवतार असूनही धाडस करून त्यांना म्हटलंच. ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काळ जगणार आहे. म्हणून ती माझ्यापेक्षा भरपूर जास्त केळं जास्त खाईल. यावर त्यांना अक्षरशः हसावे, की रडावे, की आपल्या या दिव्य पोरीवर पंचारती ओवाळून टाकाव्यात असेच झाले असावे. मी मात्र बोलून टाकूनही स्थितप्रज्ञ वृत्तीने त्यांच्याकडे बघत होते. शेवटी त्यांनीच माझा नाद सोडला.

असे नाद नेहमीच काही भांड्याला भांडे किंवा तोंडाला तोंड लागूनच होतात असे नाही. तर कधी कधी एकाचेच तोंड वाजत राहते. आमच्या आजीने माझ्या आईला कामात थोडा आधार व्हावा म्हणून माहेरची एक बाई कामासाठी पाठवली होती. त्यांना आम्ही सगळे नानीबाई म्हणत असूं. तेव्हा अशा बऱ्याच विधवा आणि सोवळ्या बायका असायच्या. कामही करायच्या बिचाऱ्या. त्यांच्या काही अपेक्षाही नसायच्या फारशा. त्या एक दिवस मला कॉफी द्यायला विसरल्या. त्या गेल्या नंतर किती वेळा कॉफी प्यायले पण कॉफी पिताना नेहमी आईला म्हणायचे की नानीबाईच्या वेळची माझी कॉफी शिल्लकच राहिलेली आहे. एक दिवस तिने दोन कप कॉफी दिली मला आणि सांगितलं ही नानीबाईच्या वेळी ची कॉफी घे आणि ही आताची कॉफी घे आणि तुझा एका भांड्याने-तोंडाने वाजणारा नाद संपव एकदाचा! तरी हळूच पुटपुटलेच मी! एकाच वेळेला दोन कप कॉफी घेऊन मागची थोडीच भरून निघते. पण आईला आपली लेक माहिती असल्यामुळे कळलं की हिच्याकडे आता जास्त लक्ष देण्यात अर्थ नाही!

असो. असा एका तोंडाने होणारा वाद एकदा मी सासूबाईं सोबतही केला. त्या दर गुरुवारी सगळ्यांना उपास असतो म्हणून भाजी संध्याकाळी आणायच्या. सकाळी माणसांमधून जेवायला हे एकटेच म्हणून त्या सकाळी काही भाजी आणायच्या नाहीत. माझ्या मनात असायचंच. ह्यांना त्या दिवशी दोनदा भाजी मिळेल म्हणूनच त्या आणत नाहीत. बरं सासरी आल्यावर तरी चुपचाप बसावं की नाही? एकदा मी म्हटलंच. हळूच पुटपुटले बरं. तरी त्यांना ऐकू गेलंच. ह्यांना गुरूवारी दोनदा भाजी मिळेल नं! म्हणून गुरुवारी सकाळी भाजी आणल्या जात नाही. त्या काही आई थोडीच होत्या! सरळ कमरेला पदर खोचून दोन भांडे समोरासमोर आले होते. पण जाऊ दे म्हणून मी माझं भांडं गप्पच ठेवलं त्यांचं वाजलेलं ऐकत राहिले.

असे भांड्याला भांडे किंवा तोंडाला तोंडे लागतांना कधी नाद होतो तर कधी वाद! अशा नादातूनच शंकराच्या डमरूतून निघाले तसे अ ई ऊ ण ऋ ऌ क निघाले तर सुंदर बोलण्याची भाषा आणि लिपी तयार होते नाही का? …

(ता. क. : अजून शिल्लक असलेले पुन्हा केव्हातरी…)

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ५०

स तरति स तरति स लोकान्स्तारयति ॥ ५० ॥

अर्थ : जो या भवसागरातून(आपण माया नदी असेही म्हणू शकतो) तरून जातो, तो आपल्या सोबत इतरांना ही तारतो.

विवेचन : सेहेचाळिसाव्या सूत्रात आरंभी ‘कस्तरति माया’ मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न उपस्थित करून एकोणपन्नासाव्या सूत्रापर्यंत माया तरून जाणार्‍या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. “जो संगत्याग करतो, महानुभवांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचे उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसेच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो या दैवी दुरत्यया गुणमयी मायेतून तरून जातो हे निश्चयपूर्वक द्विरुक्तीने या सूत्रात सांगतात. मायातारण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे मागील सूत्रात सांगितलेच आहे.

आसक्तीचा त्याग, सत्पुरुषांची सेवा, ममत्त्वाचा त्याग, एकांत सेवन, लौकिक गोष्टीचा त्याग, त्रिगुणातीत होणे, योगक्षेमाचा त्याग, कर्मफळाचा त्याग, कर्म संन्यास, द्वंद्वाच्या पलिकडे जाणे, तसेच वेदांचा साक्षेपाने अभ्यास 

करून ज्याला भगवंता विषयी निरतिशय प्रेम प्राप्त होते, तो साधक स्वतः या मायनदीतून तरून जातोच, तसेच स्वतः सोबत अनेकांचे कल्याण करतो, त्यांनाही तारुन नेतो असे नारद महर्षी आपल्याला सांगतात.

भक्त स्वतः भक्ती करतात व लोकाना भगवद्‌भक्तीचे, भगवन्नामाचे महात्म्य अट्टाहासाने पटवून अनेकांना या भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारदाचे सर्व जीवन अनंत जीवांना मायानदीतून तारून नेण्यातच गेले नाही काय? ‘यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कवणाची ॥’ हे तुकाराममहाराजांचे उद्‌गारही लोकतरणच दर्शवितात. ते लोकांना का तारून नेतात? याचे उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. *”बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि॥’* हे उद्‍गार याचीच साक्ष देतात. त्याच्या अवतारकार्याचे प्रयोजनच हे सांगितले जाते. ‘अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥’ चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या सर्व वृक्षांचेही महत्त्व वाढते, त्याचा उद्धार होतो त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्याने ओहोळास पावन करते, परिस आपल्या सामर्थ्याने लोहास सुवर्ण बनवितो, कस्तुरी आपल्या गुणाने मातीस मुल्यवान बनविते त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष आपल्या सामर्थ्याने अनेकाना या मायानदीतून तारून नेतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥ आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५१

अनिर्वचनीयम् प्रेमस्वरूपम्

अर्थ: प्रेमाच्या स्वरूपाचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.

विवेचन: भक्तीची व्याख्या करताना ती परम प्रेम रुपा आहे असे आधी सांगितले आहे. त्यानंतर ती अमृत स्वरूपा आहे असे सांगितले आहे. रूप आणि स्वरूप यात फरक आहे. रूपात वस्तूचा आकार, रंग, बाजनझ आवरण आदी बाह्य गुणधर्माचा समावेश होतो. स्वरूप वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे लक्षण सांगते. नट वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळा दिसतो पण प्रत्यक्षात मात्र त्याचा विशिष्ट असलेला स्थायीभाव जे त्याचे स्वरूप असते ते मात्र वेगळे असते.

प्रेम हा शब्द प्री या धातूपासून तयार होतो. संतोष पावणे, तृप्त होणे. प्रेम हा मनाचा असा अनुभव अथवा अवस्था आहे की ज्यामुळे मनुष्य समाधानी होत असतो.

प्रेम फक्त अनुभवता येते. जशी हवा दाखवता येत नाही, आकाशाची उंची मोजता येत नाही तसे प्रेम मोजून दाखवता येत नाही. प्रेम असते तरी नसते. असे कोणी म्हणू शकत नाही की मी अमक्या वर पाच रुपयांचे प्रेम करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकदा मनुष्य नवनवीन क्लुप्त्या शोधून काढेल. चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे चंद्र सूर्य आणून देतो अशा थापा मारू शकेल. अर्थात हे सारे वर्णन असेल किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेली कृति असू शकेल…! याला फारतर प्रेमाचा आविष्कार म्हणता येईल…

पण प्रेम म्हणता येईल का? तर नाही…

प्रेम हे अदृष्ट, अदृष्य असल्याने ते पाहता येत नाही. ज्याला अशा प्रेमाचा लाभ होतो, अनुभूति मिळते, तो एका विलक्षण आनंदात असतो. त्या आनंदाचा तो आस्वाद घेऊ शकतो, पण सर्वार्थाने त्याचे वर्णन करू शकत नाही..

संत तुकाराम महाराज प्रेमाबद्दल म्हणतात,

“प्रेम नये सांगता बोलता दाविता। अनुभव चित्ता चित्त जाणे ।।”

(अभंग क्रमांक २७२९, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

महाराज म्हणतात, प्रेम ही काही प्रदर्शन करायची भावना नाही. प्रेम ही मनापासून ते मनापर्यंत पोहचणे आवश्यक असते. हल्लीच्या काळात खरे प्रेम मिळणे तसे खुप अवघड आहे. कारण प्रेम हा काय प्रकार आहे. ही भावना काय आहे. हे किती जनांना माहीत आहे. हाच खुप मोठा प्रश्न आहे असे मला वाटते. कारण सद्यपरिस्थितीत आकर्षणाला व वासनेलाच प्रेम म्हटले जाते.

आपण इथे भगवंतावर अकारण केल्या जाणाऱ्या प्रेमाबद्दल चर्चा करीत आहोत. पण समाजाची, समाजातील सद्यस्थिती लक्षात यावी म्हणून त्याचा वरती उल्लेख आला आहे.

प्रेम म्हणजे देव

प्रेम म्हणजे भक्ती,

प्रेम म्हणजे साधना

प्रेम म्हणजे शक्ति।।

प्रेम, त्यातून मिळणारा आनंद याचे अचूक वर्णन करणे अशक्य आहे, पण सर्व संतांना सामान्य मनुष्याबद्दल कळवळा असल्याने ते या प्रेमाचे वर्णन करतात, अर्थात ते सुद्धा चपखल वर्णन करू शकत नाहीत असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५२

मूकास्वादनवत्

अर्थ : प्रेमाचा अनुभव हा मुक्या माणसाने घेतलेल्या रसास्वादाप्रमाणे असतों. (… त्यामुळे त्याला तो शब्दाने सांगता येत नाही.)

विवेचन : मुका मनुष्य बोलू शकत नाही. त्याला झालेल्या, होत असलेल्या वेदना तो सांगू शकत नाही. इथे नारद मुनी आपल्याला मूक्याचे उदाहरण देऊन साधक अनुभूतीच्या विशिष्ट टप्प्यावर मौन होऊन जातो. बाह्यांगावरून तो मूक झाला, अबोल झाला असे आपण म्हणू शकतो. परंतु त्या पातळीवर पोचलेल्या साधकाला जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे भगवतांची लिला आहे, याची अनुभूती आलेली असते. त्याच्या आयुष्यात तसेच त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याला भगवंताचे अस्तित्व जाणवत असते. सर्व जाणल्यावर बोलायचे काही शिल्लक रहात नाही.

एक छान वाक्य आहे.

“वेदना जास्त बोलते आणि सुख कमी बोलते. “

भक्तिमार्गात या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर साधक मौन न झाला तर नवल…! साखर दुधात पूर्णपणे मिसळून गेली की त्यातून स्वतः साखरेला तिचे वेगळेपण दाखवता येत नाही आणि आपण ते वेगळे करून पाहू शकत नाही.

समर्थ दासबोधात याचे वर्णन करतात…

“मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥”

 (दास. ०६. १०. ०२)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५३

प्रकाशते क्वापि पात्रे”

अर्थ: त्या परम प्रेमाचा प्रकाश क्वचितच, कधीतरी एखाद्या अधिकारी व्यक्तीत पाहायला मिळतो.

विवेचन : भगवंतावरील प्रेम हेच खरे प्रेम आहे, असे सर्व संत सांगतात. पण हे प्रेम वेगळे काढून दाखवता येत नाही, त्याची फक्त अनुभूती घेता येते. ज्याप्रमाणे नदी सागराला जाऊन मिळण्यासाठी धडपड करीत असते. ती सागराला जाऊन मिळाली की नदीचे अस्तित्व संपुष्टात येते. नदी पुन्हा बाहेर सांगू शकत नाही की मी नदी आहे. तसे खरा ज्ञानी मनुष्य कधीही सांगत फिरत नाही की मी ज्ञानी आहे. तर, त्याच्या चित्तात प्रकट झालेला ज्ञानाचा प्रकाश आपसूक सर्वदूर पसरतो. साखर सांडली की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही, त्या आपसूक येत असतात.

संतांचे अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्याच्याकडे अकारण शांतता लाभते, ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाही, तरी त्याच्याकडे पुन्हा जावेसे वाटते, अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ज्याच्याकडे गेल्यावर परत येऊ नये असे वाटते, (अर्थात माहेरी गेल्यासारखे वाटते) त्याला संत अर्थात ज्ञानी म्हणता येईल.

एक व्यवहारातील उदाहरण पाहू. अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देत असतात, पण त्यातील फार कमी लोक त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात.

खरंतर जीव हा मुळात ज्ञानी आहे, पण त्याच्यावर असलेला मायेचा पडदा ज्याला काढता येतो, तो ज्ञानी होतो. वाचायला /लिहायला एकदम सोपे आहे, पण ही माया जाणणे फार अवघड.

“लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी|

झटणाऱ्यात एखादा तत्त्वतां जाणतो मज||”

(गीताई ०७. ०३)

एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, अर्थात प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्या व्यक्तीला जे आवडते ते करतो. त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने बनवलेल्या, आणलेल्या, भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा आदर करतो, त्यांना अत्यंतिक प्रेमाने सांभाळतो. याच अनुषंगाने जेव्हा साधक भगवंतावर प्रेम करू लागतो, त्याचवेळी त्याने भगवंताने निर्माण केलेल्या चराचर सृष्टीवर प्रेम करणे अपेक्षित आहे, नव्हे अनिवार्य आहे. असे प्रेम करणारा मनुष्य विरळाच असतो. पण त्याच्या या निःस्वार्थ प्रेमाचा प्रकाश पडल्या शिवाय रहात नाही.

साधकाने साधना करीत रहावी, दयासिंधु आसलेल्या सद्गुरूंना त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पुढील सूत्रात आपण परमप्रेम कसे असते, ते शब्दाने सांगण्याचा प्रयत्न नारद महर्षींनी केला आहे त्याचा अभ्यास आपण करू.

जय जय रघुवीर समर्थ!! 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मैं और मेरी ख्वाहिश!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘मैं और मेरी ख्वाहिश!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

(महिला दिन विशेष)

“हाय, अबला!  तेरी यही कहानी… आंचल में है दूध और आँखों में पानी!” प्रियाने शाळा-कॉलेजात असताना ह्या ओळी कधीतरी वाचल्या असतील. पण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात आपण कधी ‘अबला’, ‘बिचारी’ म्हणवल्या जाऊ, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

देहरादून सारख्या शहरात परंतू सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली प्रिया अभ्यासात अव्वल होती. वडिलांचे छत्र हरपले होते. बारावी शास्त्र शाखेत शिकत असतानाच तिच्या लग्नाच्या गोष्टी घरात सुरु झाल्या. पालकांनीच हे निर्णय घ्यायचे असतात अशा वातावरणात वाढलेली प्रिया कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच विवाहबद्ध झाली.

१४, राजपूत रायफल्स या भारतीय सैन्याच्या रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सैनिकाशी प्रियाची लग्नगाठ बांधली गेली. अमित शर्मा काहीच दिवसांनी नाईक पदावर पदोन्नत झाले. भारतीय सैन्यात हे पद Other Rank अर्थात कनिष्ठ पातळीवरील म्हणून ओळखले जाते. एखादा तरुण सैन्यात ‘जवान’ म्हणून दाखल होतो त्यावेळी त्याचे वय सुमारे सतरा-साडेसतरा वर्षे असते आणि शिक्षण फारतर दहावी-बारावी. अमित कमी शिकलेले असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजलेले होते. त्यांनी प्रियाला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळेच प्रिया गणित विषय घेऊन पदवीधर (बी. एस्सी.) आणि पुढे याच विषयात पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी.) मिळवू शकली. संसारामध्ये ख्वाहिश अर्थात ‘आशा’ नावाचे सुंदर फूल उमलले होते. प्रियाने पुढे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (बी. एड.) पूर्ण केला आणि शिक्षक पात्रता परीक्षाही तिने उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली! संसाराला हातभार म्हणून प्रिया देहरादूनमधील एका खाजगी शिकवणी वर्गात शिक्षिका म्हणून नोकरी करीत होत्या.

सैनिक जेंव्हा प्रत्यक्षात विवाह करतो तेंव्हा तो त्याचा एका अर्थी पुनर्विवाहच असतो. कारण सैन्यातील नोकरी ही त्याची ‘पहली पसंद’ मानली जाते. आणि सैनिक पत्नींना या नोकरीत त्यांच्या कुंकवाला असलेल्या धोक्याची जाणीव असतेच असते!

९ जून, २०१२चा दिवस प्रिया यांच्यासाठी एक अशुभ बातमी घेऊन आला. दोनच दिवसांपूर्वी अमित सुट्टीवरून परत त्यांच्या पलटणमध्ये परतले होते. त्यावेळी १४, राजपूत अरुणाचल प्रदेशातल्या उत्तर-पूर्व प्रदेशात तिथल्या देशविघातक शक्तींच्या विरोधात युद्धात होती. १७ जून रोजी कर्तव्यावर पोहोचलेले नाईक अमित शर्मा त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाहनाने निघालेले असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून त्यांना वीरगती प्राप्त झाली!

 पदरात लहान मुलगी असलेल्या प्रिया यांच्यासमोर आयुष्य आ वासून उभे होते. सैन्याकडून वीरपत्नींना, कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई उत्तम दिली जाते. पण पुढे काय करायचे हा प्रश्नच असतो. शिवाय शैक्षणिकदृष्ट्या कमी शिकू शकलेल्या जवानांच्या पत्नी सुद्धा साधारणपणे अल्पशिक्षितच असतात. त्यामुळे त्यांना पुढे फार मोठी झेप घेता येत नाही… मात्र प्रिया यांच्याकडे उत्तम शैक्षणिक योग्यता होती. आणि हीच बाब हुतात्मा अमित शर्मा यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अरुण पी. आगरवाल साहेब यांनी हेरली! कारण अमित शर्मा त्यांच्या हाताखाली काम करीत असताना त्यांनी कित्येकवेळा प्रिया यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत साहेबांना सांगितले होते… आणि एक अल्पशिक्षित जवान आपल्या पत्नीला एवढे उच्च शिक्षित करतो आहे, याचे त्यांना कौतुकही होते!

 कर्नल साहेबांनी प्रिया यांच्या कुटुंबियांपुढे एक प्रस्ताव मांडला… प्रिया सैन्याधिकारी बनू शकतात! अर्थातच एवढ्या मोठ्या दु;खाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या त्या कुटुंबास हे पचनी पडणे अवघड होतेच. प्रिया यांच्या बंधूने तर हा प्रस्ताव एकदम धुडकावून लावला… अबला, बिचारी म्हणवून घेण्याची अजिबात इच्छा नसलेल्या प्रिया यांच्या हृदयात मात्र एक ख्वाहिश जन्म घेत होती… आपल्या नव-याचा गणवेश परिधान करण्याची इच्छा… केवळ सैनिकाचा नव्हे तर सैनिक अधिका-याचा गणवेश. त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची तयारी दाखवली… आणि पती-निधनाला काही दिवस उलटले असतानाच त्या दिशेने प्रयत्न सुरु केले. मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय सैन्यातील सहृदय अधिकारी होतेच… त्यात कर्नल आगरवाल साहेब आघाडीवर होते. शालेय जीवनात खेळांत प्रवीण असलेल्या प्रिया यांना शारीरिक चाचणी आणि अभ्यासात हुशार असल्याने बौद्धिक चाचणी अजिबात कठीण नव्हती.

परंतू, लष्करात भरती होण्यासाठी अत्यंत काटेकोर शारीरिक तपासण्या केल्या जातात. खूप वर्षांपूर्वी प्रिया यांना किडनी स्टोन झाला होता आणि त्यासाठी सर्जरी करून घेतली गेली होती. यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी नियमांनुसार प्रिया यांना बाद केले! प्रिया अर्थातच प्रचंड निराश झाल्या. त्यांचा भाऊ प्रवेश तर त्या अधिका-यासमोर धाय मोकलून रडला… पण नियमापुढे काहीही होणार नव्हते!

 परंतु कर्नल आगरवाल साहेबांनी विशेष प्रयत्न करण्याचे ठरवून प्रिया यांना धीर दिला. त्यांनी तिला कमांडंट साहेबांची भेट घेण्याची सूचना केली. विशेष बाब म्हणून प्रिया यांना कार्यालयीन नोकरी देऊ केली गेली! यावर प्रिया यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या निर्णायक ठरल्या. त्या म्हणाल्या, “नोकरी मिळावी म्हणून मी एवढा आटापिटा करत नाहीये… मी उच्च शिक्षित आहे. माझे पती हुतात्मा झाले आहेत, त्या आधारावरही मला शिक्षिकेची नोकरी किंवा दुसरी एखादी शासकीय सहज मिळू शकेल. पण मला माझ्या दिवंगत पतीच्या स्मृती चिरंतन जपून ठेवायच्या आहेत… त्यांच्या सारखीच वर्दीमध्ये देशसेवा करायची आहे… आणि त्यासाठी सर्वकाही करण्याची माझी शारीरीक आणि मानसिक तयारीही आहे… मला संधी मिळावी! ” 

 आणि एका जवानाच्या पत्नीची सैन्यात अधिकारी होण्याची वाटचाल सुरु झाली… एक इतिहास घडू पहात होता. कारण सैन्यात अधिकारी असलेल्या व हुतात्मा झालेल्या अधिका-यांच्या पत्नींपैकी काही शूर महिलांनी ही वाट यशस्वीपणे चोखाळली होती तोपर्यंत… पण जवानाची पत्नी अधिकारी होऊ पाहते आहे हे प्रथमत:च घडू पहात होते!

 अंगभूत हुशारी, कष्ट करण्याची जिद्द, वैय्यक्तिक दु:ख बाजूला ठेवून कर्तव्यपथावर दमदार पावले टाकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, त्यासाठी लहान मुलीपासून कित्येक महिने दूर राहण्याचा ताण सहन करण्याची तयारी… या सा-या बाबी प्रिया सेमवाल-शर्मा यांना लेफ्टनंट पदापर्यंत घेऊन जाण्यात साहाय्यक ठरल्या. प्रशिक्षणादरम्यान प्रिया यांनी अनेक पारितोषिके पटकावली… एक कार्यक्षम सैन्याधिकारी आकार घेत होता! प्रशिक्षणाच्या एका टप्प्यावर त्यांनी कंपनी सार्जन्ट मेजर (Coy Sergeant Major) हे प्रतिष्ठेची जबाबदारीही मिळवली होती!

 Officers’ Training Academy, Chennai या लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रामध्ये Commandant Lieutenant General एस. एस. जोग साहेबांच्या मार्गदर्शनात त्यावर्षी ६२ महिला आणि १९४ पुरुष सैन्याधिकारी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झाले… यांत प्रिया सेमवालसुद्धा होत्या!

 लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांना आरंभी Corps of the Electrical and Mechanical Engineering (EME) मध्ये रुजू करून घेण्यात आले. या विभागातील कामासाठी गरजेची असलेली B. Tech. ही पदवीही आपली इतर कामी करीत असताना प्रिया यांनी प्राप्त केली! पुढे त्या मेजर बनल्या.

२०२२ मध्ये भारतीय नौसेनेने President’s Fleet Review अंतर्गत भारतीय नौसेनेचे सामर्थ्य दर्शवणारे एक विशेष अभियान योजले होते. म्हादेई, तरिणी, हरियाल, कदलपुरा, आणि नीलकंठ या नौकांसमवेत आय. एन. एस. बुलबुल नावाची नौका गोवा, कारवार, मुंबई ते कोच्ची १६६७ किलोमीटर्स हे समुद्री अंतर विशिष्ट वेगाने आणि आखलेल्या योजनेनुसार पार करणार होत्या… या मोहिमेत मेजर प्रिया सेमवाल यांनीही सहभाग घेतला होता… आणि आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती!

 पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांति-सेनेत लेबानन-इस्रायल सीमेवर मेजर प्रिया सेमवाल यांनी अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवली. पूर्वी महिलांना भारतीय सैन्यात ‘पर्मनंट कमिशन’ अर्थात कायम नेमणूक मिळत नसे. महिलांना Short Service Commission दिले जाई, त्याचा कार्यकाळ दहा ते चौदा वर्षे असू शकतो. मात्र ‘पर्मनंट कमिशन’ मध्ये अधिकारी अधिक दीर्घकाळ आणि सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहू शकतात. मेजर प्रिया सेमवाल यांनी हे कमिशन प्राप्त केले आहे!

 महिलांना समान न्याय देण्याच्या बाबतीत भारतीय सैन्य, भारतीय न्यायव्यवस्था यांचा नेहमीच पुढाकार असतो. महिलाही सर्वच क्षेत्रांत प्रभावी काम करू शकतात, हे मेजर प्रिया सेमवाल-शर्मा यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. कर्नल अरुण पी. आगरवाल साहेबांनी एका सामान्य सैनिकाच्या वीरपत्नीला दिलेले प्रोत्साहन सुद्धा प्रशंसनीय आहे. येणा-या महिला दिनानिमित्त मेजर प्रिया सेमवाल आणि कर्नल अरुण पी. आगरवाल यांना कडक अभिवादन. जय हिंद!

(पहिले छायाचित्र कर्नल अरुण पी. आगरवाल साहेबांचे आहे. दुसऱ्या छायाचित्रात हुतात्मा नाईक अमित शर्मा, प्रिया सेमवाल-शर्मा आणि त्यांची कन्या ख्वाहिश, हे आहेत.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares