मराठी साहित्य – विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(रविवारची टुकारगिरी)

मंडळी नमस्कार

‘मी परत येईन’ नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा “सूत्रधार” तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे ‘सूत्रधार’ म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन – तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय ‘हमलोग’ मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार ‘सूत्रधार’ म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे ‘निवेदक’ हे ‘दिसणारे सूत्रधार’ . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी “सूत्र शिरोमणी” म्हणून पु.लं च्या ‘नारायणाचा’ आवर्जून उल्लेख करेन.

जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे ‘सूत्र’ संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ‘ सूत्रधाराला’ ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची “ब्रेकींग न्यूज” ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते – १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना ” सूत्रांचा” योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती ?

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, ‘सूत्र ‘ धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

( सूत्रधार) अमोल

१/१२/१९

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मागच्या भागात सांगितलेल्या पौराणिक कथेनुसार जे सहा राग पहिल्यांदा उत्पन्न झाले त्या मुख्य सहा रागांच्या प्रत्येकी सहा किंवा पाच (याबबत प्राचीन ग्रंथकारांच्या मतांमधे भिन्नता आढळते) रागिण्या आणि पुढं प्रत्येक रागिणीचे पुत्रराग व पुत्रवधू राग अशी ‘राग-वर्गीकरण’ पद्धती प्राचीन ग्रंथांत आढळून येते. त्याकाळी ती प्रचलितही होती. मात्र, ह्या कल्पनेला काहीही वैज्ञानिक, शास्त्रीय आधार नसल्याने ती लोप पावत जात पुढे इतर रागवर्गीकरण पद्धती अस्तित्वात आल्या. त्या सहा मुख्य रागांपैकी ज्या भैरव रागाची माहिती आपण मागच्या भागात घेतली त्याची एक रागिणी म्हणजे ‘भैरवी’!

‘भैरवी’ हा दहा थाटांमधील हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे हा राग भैरवी थाटाचा आश्रयराग आहे. भैरवी हे नाव प्रत्येकाच्याच परिचयाचे असते. कारण कुठल्याही मैफिलीची सांगता ही भैरवीमधील रचना गाऊन करायची अशी एक पद्धती आपल्याकडे रूढ झाली आहे. त्यामुळे कधी इतर एखाद्या कंटाळवाण्या व्याख्यान/प्रवचनात किंवा अगदी गंमतीत घरी बोलत असतानाही बोलणं ‘आवरतं’ घ्या हे सूचित करण्यासाठी आता ‘भैरवी घ्या’ असं म्हटलं जातं, कारण भैरवी म्हणजे ‘सांगता’ ही सर्वसामान्य माणसाची कल्पना असते. शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या किंवा न जाणणाऱ्या सगळ्यांचाच एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्याकडे ‘भैरवी कोणती गायली?’ हा उत्सुक प्रश्न असतोच.

खरंतर उत्तर भारतीय हिंदुस्थानी संगीत पद्धतीत कोणताही राग गाण्याची शास्त्राधारित वेळ ठरलेली आहे. त्यानुसार भैरवी हा प्रात:कालीन राग आहे. मग कोणत्याही वेळी होणाऱ्या मैफिलीची सांगता भैरवीने करायची ही प्रथा रूढ होण्यामागे काय कारण असावं? तर काही गुणी अभ्यासू व्यक्तींच्या मते काही प्रथा ह्या ‘समाजमान्यतेतून निर्माण होतात. भैरवी हा राग लोकांना इतका भावला असेल कि प्रत्येक मैफिलीमधे तो ऐकायला मिळावा असे वाटू लागले असेल, गायकालाही भैरवी गायल्यानंतर परिपूर्णतेची अनुभूती येत असेल आणि त्यातूनच मग हा पायंडा पडत गेला असावा.

भैरवी रागाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात आरामशीर ख्यालगायन आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी संपूर्ण शास्त्रीय गायनाची मैफील असेल तेव्हांही सांगतेला भैरवीतली एखादी उपशास्त्रीय रचना किंवा भैरवीतला छोटा ख्याल व तराणा, बंदिश कि ठुमरी असं काहीतरी गायलं जातं. मात्र ठुमरी, टप्पा, गझल इ. उपशात्रीय प्रकारांमधे, सुगम संगीतामधे ह्या रागाचा भरपूर वापर केलेला दिसून येतो. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात पूर्ण बारा स्वरांचा वापर केला जातो. खरंतर रागात म्हणण्यापेक्षा ह्या रागाधारित रचना करताना किंवा रचनांना विस्तार करताना असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. अर्थातच उपशास्त्रीय रचनांमधे रागाचे नियम पाळण्याचे बंधन नसतेच. मात्र ह्या रागात इतर सर्वच स्वरांचा वापर खुलूनही दिसतो. परंतू, जेव्हां एखादी रचना भैरवी रागाची ‘बंदिश’ म्हणून प्रस्तुत केली जात असेल तेव्हां मात्र रागनियम पाळावेच लागतात. इतर स्वरांपैकी फक्त शुद्ध रे चा आरोही वापर हा बंदिशींमधेच दिसून येतो तेवढाच!

भैरवी थाटाचे सर्व सूर ह्या रागाच्या आरोह-अवरोहात आहेत. म्हणजे सर्व सात सूर आहेतच मात्र त्यांत रे , ग, ध, नि हे चारही स्वर कोमल आहेत. ह्या रागाच्या वादी-संवादी स्वरांविषयी मतभिन्नता आहे. काहीजण ते अनुक्रमे म व सा तर काहीजण ध व ग असल्याचे मानतात. संपूर्ण सातही स्वरांचा वापर झाल्याने रागाची जाती ही ‘संपूर्ण’ आहे. समाजमान्य प्रथेनुसार हा सर्वकालीन राग मानला गेला असला तरी शास्त्रानुसार तो प्रात:कालीन राग आहे.

मात्र सगळ्या व्याकरणीय गोष्टींच्या पलीकडे जाऊन भैरवी अनुभवताना आपण स्वत:ला विसरून एका वेगळ्याच विश्वात पोहोचतो. ही भैरवी अंत:चक्षूंना ‘पैलतीर’ दाखवते किंवा अंतर्मनाला ती जाणीव करून देते असं मला वाटतं. गुणी गायकाची संपूर्ण सर्वांगसुंदर मैफिल ऐकल्यावरही परमानंदाच्या उच्च शिखरावर नेणारी भैरवी म्हणूनच कदाचित सर्वांनाच हवीहवीशी!

किशोरी ताईंचं ‘अवघा रंग एक झाला’, भीमसेनजींचं ‘जो भजे हरी को सदा’, जसराजजींचं ‘निरंजनी नारायणी’, अभिषेकी बुवांचं ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ह्या रचनांचं स्मरण झालं तरी श्वासांतलं चैतन्य जाणवून अंगावर रोमांच उभे राहातात…. त्या जणू कैवल्याचं चांदणंच वाटतात! ह्या रागातल्या किती रचना सांगाव्या…!

अगा वैकुंठीच्या राया, प्रभु अजि गमला, बोला अमृत बोला, तम निशेचा स्मरला, सुकतातची जगी या अशी कित्येक नाट्यपदं भवानी दयानी, जे का रंजले गांजले, अच्युता अनंता श्रीधरा माधवा, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, जातो माघारी पंढरीनाथा, जनी नामयाची रंगली कीर्तनी, अजि सोनियाचा दिनु, गा बाळांनो श्री रामायण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा कित्येक भक्तिरचना, असेन मी नसेन मी, एकाच जा जन्मी जणू, रंगरेखा घेऊनी मी, आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे अशी कित्येक भावगीतं, खुलविते मेंदी माझासारखी लावणी, झुकझुकझुकझुक अगीनगाडी सारखं बालगीत अशा सगळ्याच रचनांमधे भैरवी खुलली आहे… अर्थातच राग भैरवीतल्या स्वरांसोबत इतरही स्वरांचा वापर करून!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

खरच नावांप्रमाणे आमचे बालपण मोरपंखी होतं. कसलेच टेंशन नाही.

दिवस भर शाळा करायची. भरपूर वेळ खेळायचे आणि उरलेला वेळ अभ्यास करायचा. थोडा अभ्यास पुरायचा कारण त्यावेळी मुलं शाळेत शिक्षक काय शिकवतात हे लक्ष देऊन ऐकायचे, कारण क्लास लावणे हे परवडत पण नव्हते आणि फॅड पण नव्हते आणि कोणत्याच शिक्षकांचा तो व्यवसाय पण नव्हता तेव्हा कोणतेच शिक्षक पैसे कमावण्यासाठी शिकवत नव्हते तर कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो त्याच प्रमाणे विद्यार्थी घडवत होते.

पोहायला शिकण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्लासला घालावे लागले नाही. आमच्या गल्लीत विजू काका म्हणुन एक काका होते त्यांनी गल्लीतल्या प्रत्येक मुलाला पोहायला आलेच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला होता. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत ते सगळ्या मुलांना पाटील विहिरीत घेऊन जायचे शिकवायला. कोणी येणार नाही म्हणायचेच नाही तर, त्यांनी प्रत्येक  मुलाला उत्तम पोहायला शिकवले. तिथे तासावर नाही तर तासनतांस डुंबत रहायचो आम्ही सगळे. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागले की यायचो घरी, डबे, ट्यूब आणि दोर हे सारे साहित्य घेऊन. कोणतीही फी न घेता आत्मियतेने शिकवणार्या माझ्या त्या काकांना माझा सलाम. नित्य नेमाने त्यांच्याबरोबर जायचे हीच त्यांची फी.

आमच्या वेळी सायकल शिकायची म्हणजे पण एकधमाल असायची. एका तासाला आठआणे भाडे देऊन आधी सायकल भाड्याने घ्यायची आणि मग गल्लीतले ताई दादा यांनी कोणीतरी सायकल शिकवायची. मला आमच्या घराच्या शेजारी सुगंधा म्हणून रहायची, तिने सायकल शिकवली. कितीदा तरी पडले, खरचटले पण धडपडत सायकल शिकले एकदा, आणि सुरुवातीला त्याला एक घंटी असते हे लक्षातच यायचे नाही. घंटी वाजवायच्या ऐवजी मी तोंडानेच सरका सरका असे म्हणायचे. आत्ता मुलांना आधी नवीकोरी सायकल मिळते मग ते चालवायला शिकतात आमच्या वेळी मात्र आधी चालवायला शिका मग सायकल मिळेल अस होतं.

गेले ते दिवस जेव्हा रणरणत्या उन्हांतही आंबे तोडतांना झाडाची सावली मिळायची, चिंचा पाडताना, नकळत आंबट चव जिभेवर रेंगाळायची, मित्र जमवून जिगळी तयार करताना न कळत आपुलकी वाढायची.

आता मुलांच्या खिश्यात असतात कॅडबरी, च्युईंगम, टाॉफी , आमच्या वेळी खिसे भरलेले असायचे  आवळा, सुपारी आणि बोरांनी. मन तृप्त व्हायचे पेरू आणि करवंदानी. चिमणीचा घास म्हणून आवळा जेव्हा तोडला जायचा तेव्हा तो ऊष्टा कोणाला वाटत नसे. कोणीतरी खिश्यातून आणलेली मीठ मसाल्याची पुडी असायची त्याला तो लावून खाल्ला की त्याची चव तर अवर्णनीय असायची. आत्ता सारखे चॉकलेट नसायचे आमच्याकडे पण खिसे लाल वाटाणे, शेंगदाणे आणि फुटाणे ह्यानी भरलेले असायचे. आत्मियतेने भरलेले हे खिसे कधी रिकामे होऊन त्याच्या जागी शिष्टाचार आला हेच कळले नाही. कोणाच्याही झाडावर चढून पेरू तोडून खाताना कधी कमीपणा वाटला नाही, ना पकडले गेल्यावर एक धपाटा खाण्यात कमीपणा, कारण त्या धपाट्यात पण आपलेपणा असायचा आणि त्या काकूही दुसरे दिवशी आमची वाट पहायच्या. हेच जर आत्ता सापडलो तर लगेच म्हणतील विचारून घ्यायचा ना मी दिला असता, पण त्यांना कुठे माहिती की चोरून पेरू तोडून खाण्यात आणि त्या आपुलकीच्या धपाट्यात किती माया दडलेली असायची ते.

पूर्वी घरचे भडंग, कांदा कैरी अस घेऊन आम्ही उद्यानात जात असू आता हीच जागा पॉपकॉर्न कुरकुरे ने घेतली. एखाद्या वेळी येताना गुर्ऱ्हाळ्यात जाऊन उसाचा रस आणि आलेपाक म्हणजे आमच्या साठी मेजवानी असायची आणि आता पिझा, बर्गर ही संस्कृती होऊन बसली.

नारळाच्या शहाळ्याची जागा कधी पेप्सी ने घेतली हे कळलेच नाही,तसेच लिंबू सरबत कधी हद्द पार झाले आणि फ्रीझ मधे कोल्ड्रिंक कधी दिमाखात सजले ते ही कळलेच नाही. कोकम सरबताची जागा मीरिंडा ने घेतली आणि फ्रेंड सर्कल चा एक भाग बनून गेली.

आमच्या बालपणी कोणत्याही मित्र, मैत्रिणींच्या घरी थेट आत प्रवेश असायचा. आत्तासारखी फोन वर अपॉइंटमेंट घ्यावी लागत नसे.

मग सुट्टीत रंगायचा आमचा पत्यांचा एक डाव, कॅरम, नाहीतर कोणाच्या तरी गल्लीत लपंडाव, लगोरी, छप्पी. आताच्या मुलांना हे खेळ माहितही नसतील, बरोबर आहे म्हणा आम्ही रिकामे होतो ते बिझी असतात मोबाईल गेम्स आणि टीव्ही कार्टून पाहण्यात. आणी चुकून बाहेर पडलेच तर मॉल मधे जाऊन डॅशिंग कार खेळतात.

मला अजून एका गोष्टीची आठवण होते. मला आठवते ती टणटण वाजणारी हातगाडी. तो आवाज आला की सगळे गोळा व्हायचे  मस्त ऑरेंज, कोला चा बर्फाचा गोळा खायला आणि मुद्दामून जीभे वर चोळून जीभ रंगवायची. गेले ते दिवस गोळ्याचे, कुल्फी चे आणि हात गाडीच्या ऑरेंज कंँडीचे.

आता मिळते ती ट्रिपल लेयर, कसाटा , मस्तानी.

पण बर्फ चोखून खाल्लेले  समाधान यात कुठे ? पावसाळ्यात ते भाजलेले कणीस नाहीतर शेंगा म्हणजे आहाहा !!!! पर्वणीच. काय आली ना आठवण तुम्हाला पण तुमच्या बालपणीची??

खरच किती आठवणी, आता आठवणीच राहिल्या नाही का?

कुठे हरवले ते दिवस जेव्हा धडपडत सायकल शिकली जायची, कोणी तरी हक्काने पोहायला शिकण्यासाठी स्वतःच्या जिवाचा आटापिटा करायचे, आणि रणरणत्या उन्हातही सुखद सावली मिळायची.आपण मनात आणले तर हेच मोरपंखी दिवस आपण आपल्या पुढच्या पिढीला ही देऊ शकू, नाही का ?

पुन्हा कोकम, पन्ह, फ्रीझ मधे विराजमान होईल, कॉल्डड्रिंक, पीझा, बर्गर हद्द पार होतील आणि घरच्या भडंगाचा आस्वाद जिभेवर पुन्हा रेंगाळेल.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?1. 9.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

रिचार्ज व्हायचा आपापला एक फंडा असतो. कोणाचं गाणी ऐकून मन रिफ्रेश होतं तर कोणाचं चित्रपट बघून. पण माझे मन मात्रं  हातात लेखणी आली की रिफ्रेश व्हायला लागते.

माझी प्रत्येक रचना मग ती कथा असो कविता असो चारोळ्या असो अगदी आध्यात्मिकावरही लेख कविता असो ती माझ्या पेक्षा वेगळीच असू शकत नाही. मी जे लिहिते किंवा लिहिण्यासाठीजे शब्द निवडते..खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असते.

रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ लिखाण मला प्रेरणा देतात तर शब्द ऊर्जा आनंद..बोलायलाही खूप आवडतं आणि बोलतेही..अगदी पुस्तकांवरही ….

मनांचा मनाशी संवाद… प्रश्न माझेच आणि उत्तरेही माझीच…. ना तिथे हेवेदावे ना मतभेद.. फक्त समाधान

अतिव आनंद…मग मी म्हटलं संवादांना,क्षणांना,आठवणींना ,अनुभवांना ..तुम्हाला  मनात का कैद करू?

म्हणून मी कागदाशी मैत्री केली आणि त्या सर्वांना मी कागदावर उतरवतं गेले व्यक्त होत गेले. आजूबाजूला घडणारया प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून त्याचेही अनुभव मी अगदी त्रयस्थ पणे मांडत गेली आणि अजूनही मांडत आहे… सूर्य ,चंद्र, पाऊस यांच्याशी सुद्धा माझी सलगी झाली आणि वेगळ्याच दृष्टीने जग कळू लागले.

शांततेपासून ते व्यक्त होण्याचा आणि अस्तित्वापासून ते परिपूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास…या प्रवासाने मला व्यक्त होता आले आणि मी लिखाणातून व्यक्त झालेही..आणि मी अजूनही व्यक्त होत आहे..

माझ्यातल्या मला शोधायला आवडतं आणि हो व्यक्त होऊन लिहायलाही आवडतं…

खरचं लेखणीचं एक वेगळंच विश्व असतं नाही का? व्यक्त व्हायला..

सोबत असतात कोरा कागद,पेन आणि भावना….

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

रसग्रहण:

आयुष्यामध्ये कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला; मग ती एखादी कला असो, संशोधन असो, वारी किंवा परिक्रमा असो, देशसेवा असो त्या ध्यासापायी सर्वस्व उधळून देणे, त्या ध्येयाची धुंदी चढून इतर जाणिवा नाहीशा होणे ही जी तन्मयतेची, तंद्रीची, झपाटलेपणाची स्थिती आहे तिला म्हटले आहे “झपूर्झा “.

असा एखादा ध्यास घेऊन,त्यासाठी जगाला विसरून बेभान अवस्थेत त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी ध्येयपूर्ती करून यशोगाथा लिहिल्या आहेत, त्यांना अवलिया, साधक असे म्हटले जाते. हर्ष, खेद, हास्य, शोक या भावनांच्या त्यांच्या जाणीवा बोथट झालेल्या असतात.जे इतरांना व्यर्थ वाटते त्यात त्यांना अर्थ भरलेला जाणवतो आणि त्या अर्थासाठी ते धडपडतात. हा अर्थ त्यांनाच दिसतो ज्यांना त्याचे वेड लागलेले असते. या अर्थाचे बोल कसे असतात तर “झपूर्झा गडे झपूर्झा. ”

जिथे कुणाला काही दिसत नाही अशा ज्ञाता पलीकडे अज्ञाताच्या अंधारात त्यांना काहीतरी जाणवते.वीज चमकून जावी तसे होते. त्या उजेडात अंधुक जाणीवा होतात. तिथे काहीतरी आहे हे जाणवते आणि ते त्याचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करतात. या जाणीवा गूढ गीते गातात. त्याचे बोल असतात “झपूर्झा गडे झपूर्झा.”

भुई नांगरलीच नाही तर पीक येईल कसे ? अशी कितीतरी जमीन नांगरल्याविनाच आहे. म्हणजेच विश्वात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. त्यासाठी ते शोध घेत राहतात आणि शेवटी ते संशोधन फळाला येते. असंख्य शास्त्रज्ञांनी शोध लावले ते म्हणजे विश्वात असलेल्याच गोष्टींची उकल करून सर्वसामान्यांसाठी त्यांचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले. त्यासाठी झपाटून शोधाचा ध्यास घेतला. त्यावेळचा मंत्र आहे “झपूर्झा गडे झपूर्झा.”

या विश्वाचा पसारा म्हणजे एक अवघड कोडे आहे. विश्वाची निर्मिती, मानवी जगाचा विकास हे समजून घेणे हाच ज्ञानाचा हेतु आहे. ज्ञान आणि कला यांच्या माध्यमातून विश्वाचे रहस्य, त्याची सुंदरता जाणवते. याचा अभ्यास ही अशाच अवलियांनी केला. तोही एकच मंत्र गात “झपूर्झा गडे झपूर्झा.’

आपल्या तारा मंडळातील मंडळी अव्याहत फिरत असतात. पण या तारा मंडळाच्या पलीकडेही असंख्य ग्रह-तारे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचा अभ्यास करणे यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला सारून झपाटून जाऊन अभ्यास करणे, प्रयत्न करणे आणि तिथे पोहोचणे हे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा या सर्व अशक्य कोटीतील कामांसाठी आवश्यक असते ते झपाटलेपण. त्यालाच म्हणतात “झपूर्झा.’

कवीने एके ठिकाणी सांगितले आहे की ,’त्यांनी काही मुलींना पिंगा घालताना पाहिले. त्या मुली “जपून जा पोरी जपून जा”असे म्हणत गोल फिरत होत्या. असे  म्हणत म्हणत फिरताना हळूहळू अंगात लय भिनत जाते आणि त्याचीच गुंगी येते. कवीने त्याच अर्थाने शब्द योजीले “झपूर्झा गडे झपूर्झा.”

कवितेच्या सुरुवातीला लिहिले आहे, आपल्याला जे  कांही नाही असे वाटते, त्यांतूनच महात्मे कल्याणाच्या चिजा बाहेर काढतात. त्या महात्म्यांची स्थिती लक्षात घेऊन पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊ नये असे वाटते .म्हणजेच ह्या अज्ञाताच्या गुहेमध्ये शिरणाऱ्या मनाला बजावले ‘जपून जा मना जपून जा’.तर त्या ध्यासामध्ये फिरत असताना त्याचेच कधी ” झपूर्झा रे झपूर्झा ” झाले हे त्या मनाला सुद्धा कळत नाही.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

घटना तशी जुनीच. म्हणजे १९६५ सालातली. मी अकरावीत शिकत होते. म्हणजे त्यावेळचे मॅट्रिक. आमच्या सायन्सच्या सरांनी एके दिवशी रात्री आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका त्यावेळच्या तीन मजली बिल्डिंग च्या टेरेस वर बोलावलं होतं. अमावस्येची रात्र होती….. घाबरायचं कारण नाही. आम्हाला ते खगोल  शास्त्रातील’आकाश गंगा’प्रत्यक्ष दाखवून ग्रह तारे नक्षत्र यांची माहिती देणार होते.

आमच्या सायन्सच्या सरांइतका उत्साही शिक्षक मी आजवर पाहिला नाही. आपल्या विषयातील संपूर्ण ज्ञान त्यांना होते. आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची तळमळ ही होती. फिजिक्स केमिस्ट्री मधले कितीतरी प्रयोग …. अभ्यासक्रमाबाहेरचे …त्यांनी आमच्याकडून करवून घेतले होते.

त्या रात्री सरांनी उत्तर-दक्षिण पसरलेला तार्‍यांनी तुडुंब भरलेला चकाकणारा आकाशगंगेचापट्टा दाखवला. खूप सगळी माहिती सांगितली. त्यामुळे खगोलशास्त्राचा वेगळा अभ्यास करावाच लागला नाही.

लग्नानंतर दिल्लीला गेल्यावर बरेचदा मुद्दामून सातव्या मजल्याच्या टेरेसवर जाऊन मी आकाशगंगा शोधायचा प्रयत्न करायचे पण लाईटच्या झगमगाटात ती आकाशगंगा मला कधीच दिसली नाही. आता तर छोट्या छोट्या गावात सुद्धा बिजली च्या झगमगाटामुळे  आकाशगंगा आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे. उन्हाळ्यात दिल्लीला आम्ही त्यावेळी रात्री टेरेस वर झोपायला जायचो. आता ए.सी मुळे. त्याही गंमतीला आपण मुकले आहोत.मुलांना मी थोडंसं लक्षात राहिलेला ज्ञान द्यायचे. मृगनक्षत्र… हरीण… त्याच्या पोटात घुसलेल्या बाणाचे तीन तेजस्वी तारे…. व्याध. तसेच सप्तर्षींचा  पतंग… दोरी सारखा खूप दूर असलेला ध्रुवतारा.. जो जास्त चमकत नाही… वशिष्ठ ऋषी.. त्यांच्या शेजारी छोटीशी चमकणारी अरुंधती ची चांदणी… सगळं त्यांना दाखवायचे. खरं तर सगळंच फार फिकट दिसायचं. शर्मिष्ठा देवयानी ययातीचा तो M सारखा तारा समूह.. जो एका वेगळ्याच आकाशगंगेच्या भाग आहे (बहुतेक). जो सरांनी दाखवला होता… तो मला कधीच दिसला नाही. शुक्र मंगळ ग्रह पण दिसले नाहीत. पुढं मुलं मोठी झाल्यावर मी त्यांना प्लॅनेटोरियम मध्ये घेऊन गेले होते. तिथं मॉडर्न टेक्निकनं दाखवलेली आकाशगंगा पाहिली. पण सरांनी दाखवलेली आकाशगंगा मला तिथं सापडलीच नाही…… ती हरवून गेली होती.

वर्षापूर्वी मला कर्नाटकातल्या एका खेड्यात जायचा प्रसंग आला. आम्ही तिघं जणं होतो. एका छोट्याशा स्टॅन्डवर बस थांबली. आम्ही आमच्या गंतव्या कडे… साधारण दोन-अडीच मैल चालत निघालो. तीपण अमावस्येची (एखादा दिवस मागेपुढे) रात्र होती. चालताना दृष्टी वर गेली आणि मुग्ध होऊन मी पाहतच राहिले. तो दक्षिणोत्तर पसरलेला तारकांचापट्टा-milky way-मला खुणावत होता. पूर्ण गोलाकार क्षितिज…. काळे कभिन्न आकाश.. ते म्हणजे एक खोलगट वाटी…. अन त्यावर चमकणारा आकाशगंगेच्या पट्टा. तो इतका जवळ वाटत होता की शिडीवर चढून आपण त्याला हात लावू शकू …. आणि हे काय?…. त्या मृगाच्या चौकोनात असंख्य तारे चमकत होते. मग मी माझ्या ओळखीचे तारे शोधण्याचा प्रयत्न करू लागले. ‘खरंच आता सर असायला हवे होते’ मनात विचार चमकून गेला.

पंधरा वीस मिनिटानंतर”काकू थांबू नको.. लवकर ये “. या पुतण्याच्या हाकेनं मी भानावर आले .’मध्ये रुपया ‘नसलेल्या सुपभर लाहया मी मनात भरून घेतल्या.

शेवटी लहानपणी पाहिलेली….अन् हरवून गेलेली आकाशगंगा मला सापडली होती.

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

कोवळ्या हिरव्यागार गवताच्या फुलांवर ठिबकलेले दवबिंदू,  समोर दाटलेला धुक्याचा तलम झिरमिरित पडदा, ताजातवाना,  थंड सुखद गारवा.  शरद ऋतुतल्या अशा पहाटवेळी श्री वसंत बापट यांनी कवीमनाला मुक्त केले आहे.

” अशी ही शरद ऋतुतील तरणीताठी पहाट समोर आहे, जणु उषेनं हिरवागार चुडा दोन्ही हातात भरलाय,  तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे. गवतपातीच्या नाजुक तनुवर दवाचं चमकणारं कणीस खुलून दिसतंय.

जणूकाही अष्टदिशा तिच्या दासी होऊन तिला न्हाऊ घालत आहेत. आणि अशा राजविलासी थाटात नुक्ते स्नान करून आलेली पहाट आपली आरसपानी कांती न्याहाळत  आहे. तितक्यात कुणाच्या तरी चाहुलीनं ती थबकली. चटकन आपल्या विवस्त्र देहलतेवर हात उंचावून रवि-रश्मी चं सोनेरी वस्त्र ओढून घेतलं. अंगाशी हात लपेटून लाजेनं ओठंगुन ती  क्षणभर उभी राहिली.

ओलसर पाय अलगद उचलून ती चालू लागली. नटखट वारा अवतीभवती रुंजी घालतच होता.  नजर पुढे जाताच तिला दिसला निळाशार तलाव. त्या निळ्या दालनात कुणी असेल का? तिचं पाऊल क्षितिजाशीच थबकलं.

माथ्यावरच्या तलम निळ्या ओढणीतून तिच्या गालावरचा,  फुलाच्या स्पर्शाने उमटलेला व्रण लक्ष वेधून घेत आहे. एक एक पाऊल अलगद टाकत ती येत आहे.

तिच्या नाजुक तनुवर लगडलेले केशरी गेंदेदार झेंडू  आणि सोनेरी शेवंती असे रंग गंधाचे गहिरेपण बघून गुलाबाच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि झेंडू-शेवंतीच्या टपो-या, टंच रुपाच्या बरोबरीने तोही मुसमुसून बहरला.

अशी रंग गंधात चिंब भिजलेली पहाट हलकेच फुलांची हनुवटी कुरवाळीत चालली आहे.  गवतफुलांच्या,  तृणपात्यांच्या कानात हळुच कुजबुजत चालली आहे. पण हे प्रेम वात्सल्य ममता वगैरे काही नाही हं! हे आहेत तारुण्याचे विभ्रम.  यौवनातील प्रेमाचे लडिवाळ क्षण आहेत. असे हे इशारे सराईताला सुद्धा कसे कळावे?

अशी ही सुखद रोमांचित पहाट कवी मनाला जास्तच रोमॅटिक करते. नावात वसंत, पहाट शरदातली,  आणि आश्विनातली पुष्पसृष्टी. अशी ऋतु-मास मीलनाने बहरलेली पहाट.

कवी वसंत बापट यांचा सेतु हा 1957 सालचा काव्यसंग्रह. ते स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातले कवी. अत्यंत संवेदनशील अशा कविमनावर राजकीय,  सामाजिक घडामोडींचा परिणाम होणे अपरिहार्य होते. स्वांतः सुखाय हे तत्व बहुजन हिताय या तत्वाने झाकून टाकले. त्या काळी वसंत बापट हे पोवाडे लिहिणारे व गाणारे म्हणून नावाजलेले होते. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा,  शिंग फुंकलेे रणी वाजतात चौघडे सज्ज व्हा उठा चला सैन्य चालले पुढे’ अशी स्फुरणदायी कवने खूप गाजली. शूरत्वाला आव्हान देणारी, पारतंत्र्याची लाचारी मानसिक दैन्य याने खचलेल्या अचेतन जनतेला गदागदा हालवून जागं करणारी त्यांची तेजस्वी धारदार लेखणी तळपत होती. वसंत बापटांनी  दुस-या एके ठिकाणी म्हटले आहे, ” संघर्ष,  लोभीपणा, मानसिक सुस्तपणा या आवर्तात सापडल्यामुळे जीवनातील मूलभूत आनंदाला आपण मुकतो. ” ह्याचा प्रत्यय म्हणजे

नंतरच्या काळात त्यांच्या लेखणीने नवे रुप धारण केले.  कोमलतेला हलकासा स्पर्श करणारी, सृष्टीसौंदर्य शब्दात उलगडून मन ताजेतवाने करणारी कोमल कलम तारुण्याला साद देत होती.  निसर्गाच्या स्पंदनांची जाणीव,  मनाच्या अनेक स्मृती,  अनुभव  यांचे आगळे वेगळे रसायन त्यांच्या नंतरच्या कवितांतून आढळते. याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ” सेतु” ही कविता.

फुलातील फूलपणा तर आहेच, पण त्या बरोबर त्याच्याशी संलग्न अशी जाणीव मनात घर करते.

कवितेत शब्द सहज समजणारे. वाचताना जाणवते की, ” ह्या जागी हेच शब्द,  ह्यापेक्षा दुसरा चपखल शब्द असूच शकत नाही “. बघा ना!……’तरणीताठी पहाट ‘, ‘राजविलासी स्नान’ , ‘ आरसपानी कांती ‘, ‘ ओठंगुन उभी ‘, ‘ वारा नखर’, ‘ फलचुखिचा व्रण’, ‘ गुलाब ईर्षेने मुसमुसले’, अशी सुंदर शब्द रर्त्ने. इतके तरल आणि पारदर्शी शब्द,  असं वाटतं की, लिहिताना पेनातून शाईऐवजी दवबिंदू तर टपकत नाहीत ?

प्रत्येक ओळीतून एकेक भावनावस्था प्रकट होते. अरूणोदय हा नेहमीच पूज्य, आराध्य वाटतो.उगवते सूर्यबिंब दिसताच नकळत हात जोडले जातात.पण इथे तर कवीने हाच अरूणोदय इतक्या नर्म,  संयमी,शृंगारिक भावनेने व्यक्त केला आहे. शृंगार रसाला एका उच्च आणि स्वच्छ,  शुद्ध पातळीवर नेऊन ठेवलं आहे.  हेच या कवितेचे मर्म आहे.

रात्र संपून पहाट होता होता एक सौंदर्याकृती आकाराला येते.एक निसर्ग चित्र तयार होते आणि कलमरूपी कुंचला खाली ठेवता ठेवता कवीला ती पूर्वस्मरणीय घटना वाटते, आणि चित्रच बदलून जाते. एक सजीव सौंदर्य डोळ्यासमोर येते आणि कवीमन थबकते.  डोळे विस्फारून पहाटेकडे अनिमिषतेने बघतच रहाते.अशाच पहाटे ” तिला” पाहिले होते. क्षणभरात पहाटेचे ते दवांनी भिजलेले गारव्याचे स्मृतिक्षण रोम रोम पुलकित करतात आणि शब्द उतरतात,

” ही शरदातिल पहाट? …..की…….ती तेव्हाची तू?

तुझिया माझ्या मध्ये पहाटच झाली सेतु?”

एका झंझावाती, मर्द मनाच्या कवीची अगदी नाजुक आणि सुंदर कविता ” सेतु ”

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील भागांत देस रागाचे विवेचन केल्यानंतर, त्याच रागाचे सख्खे भावंड म्हणता येईल अशा तिलककामोद रागाविषयी विवरण करणे क्रमप्राप्तच आहे. एकाच खमाज नामक जनकाची ही दोन अपत्ये! दोन भावंडांच्या जीन्स एकच असल्या तरी हा सुरेश आणि हा रमेश हे दोघे स्वतंत्र अस्तित्व असलेले भाऊ आपण सहज ओळखू शकतो नाही का? त्यांच्या स्वरूपांत साम्य असूनही वेगळेपण असते. स्वभावही वेगळे असतात. देस व तिलककामोद यांच्यांतही असेच वेगळेपण आहे.

दोघांचे स्वर एकच! सा रे ग म प ध नी, अरोहांत नी कोमल! तिलककामोद मात्र जरा अवखळ,खेळकर स्वभावाचा! त्याची चाल सरळ नसून जरा वक्र वळणावळणाची आहे असे म्हणावे लागेल.

सा रे ग सा, रे म प ध म प सां—आरोह

सां—प ध म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)~ अवरोह. या आरोह~अवरोहावरून हे लक्षांत येते. टप्प्याटप्प्यावर रांगणारे जणू हे बालकच आहे. तिलककामोदची ही वक्र चाल फारच कर्णमधूर वाटते. त्यामुळे हा राग अतिशय लोकप्रिय आहे. कुशल कलावंत अवरोही रचनेत गंधारावरून षडजावर येतांना रिषभाला हलकेच स्पर्ष करून तो कणस्वरूपाने दाखवितात व गायन/वादनांत रंजकता आणतात. अंतर्‍याचा उठाव ‘ प ध म प सां ‘ या स्वरांनी घेऊन तिलककामोद आपले स्वतंत्र अस्तित्व श्रोत्यांच्या निदर्शनास आणतो.” प(मंद्र)नी(मंद्र) सा रे ग सा, रे म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)” हे राग निदर्शक स्वर आहेत. मंद्र सप्तकाचा उत्तरार्ध व मध्य सप्तकाचा पुर्वार्ध हे या रागाचे विस्तारक्षेत्र आहे. या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. जरी अवरोहांत देसप्रमाणेच याही रागांत निषाद कोमल असला तरी उत्तरभारतीय कलावंत कोमल निषाद न वापरतां शुद्ध निषाद घेऊनच हा राग पेश करतात.शास्रानुसार हा राग रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी प्रस्तूत करावयाचा असतो.

तिलककामोद म्हटला की सर्वांच्या पटकन् लक्षांत येणारे गीत म्हणजे उंबरठा या चित्रपटांतील ” गगन सदन तेजोमय ” ही प्रार्थना!

लता दिदींचे सूर, र्‍हुदयनाथ मंगेशकरांची स्वररचना आणि कविवर्य वसंत बापट यांचे शब्द! ह्या तिघांचे रसायन असे काही जमून आलेले आहे की हे गाणे ऐकतांना मन मोहरून येते. स्व.श्री सुधीर फडके यांचेही तिलककामोद रागावर फार प्रेम! रूपास भाळलो मी,विठ्ठला तू वेडा कुंभार,दिसलीस तू फुलले ऋतू, आकाशी झेप घेरे पांखरा, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ही बाबूजींनी स्वरबद्ध केलेली आणि गायिलेली गाणी

तिलककामोद रागावरच आधारित आहेत.

ठुमरी, दादरा, कजरी हे उपशास्रीय गायनाचे प्रकार या रागांत आहेतच! अबके सावन घर आजा ही पारंपारिक ठुमरी अनेकांनी गायली नि आजही गायली जाते. सावनकी रितु आयी री सजनिया प्रीतम घर नही आये ही शोभा गुर्टू यांनी गायिलेली ठुमरी ऐकतांना ब्रम्हानंदी टाळी लागते.

उपशास्रीय व सुगम गायनांत या रागाचा दिलखुलास विहार असला तरी हे विसरून चालणार नाही की ख्याल गायनांतही हा राग प्रचलित आहे.चौताल,धमार या विलंबित तालांत

अनेक बंदिशी आढळतात. ” हर हर हर करत फिरत ना डरत गोपियनके साथ “ही चौतालातील बंदीश, ” चलोरी होरी खेलन सजनी दे तारी “हा धमार प्रचलित आहे.

वर नमूद केलेल्या रचनांवरून असे म्हणतां येईल की भक्ति,शृंगार, प्रीति सर्वच भावनाविष्कार करण्यास ह्या रागाचे चलन सक्षम आहे. ह्यांत एकप्रकारचा मांगल्यभाव आहे. इथे उल्हासाची उधळण नाही परंतु निराशाही नाही.चांगल्या गोष्टी तशाच टिकून राहिल्या आहेत असा तिलककामोदाचा भाव आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

एकवीस दिवसाच्या युरोप ट्रीप वरून आम्ही परतलो. अजूनही ट्रीपच्या मूडमध्येच होतो.

इतकं प्रगत राष्ट्र, इतकी मोहमयी दुनिया नजरेत साठवून घ्यावं असं सौंदर्य इतकी आधुनिकता भव्य रस्ते भव्य इमारती इतका सुरेख निसर्ग हे सर्व पाहून डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या.

आल्या आल्या मला स्वयंपाकाच्या कट्ट्याचे दर्शन घ्यावं लागलं. चहा करण्यासाठी सरसावले तर डोळे आणखीनच विस्फारले ओट्याच्या एका कोपऱ्यात एक छोटासा हिरवा देठ आणि त्याच्यावरच पिवळे फूल मला खुणावत होतं.

जाताना मीच बीजारोपण केलं होतं जणू! मोहरीचा एक दाणा रुजला होता आणि आपलं अस्तित्व दाखवत होता. मी जणू त्याला पंधरा-वीस दिवसाचा ‘ब्रीदिंग टाईम ‘दिला होता एरवी रोजच्या साफसफाईत तो अंकुरला नसता.

खूपच गोंडस निरागस हिरवट इवलसं पिवळ्याधमक फुलांन नटलेलं असं ते हळुवार डोलत होतं.

माझ्या मनातील सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली त्याने

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले

त्या कुणी ना पाहिले…..

या गाण्यांच्या ओळी मला सहाजिकच आठवल्या. त्या क्षणी कवीच्या भावनाही समजल्या.

….मी युरोप मध्ये पाहिलेलं ट्यूलिप फूल सुंदर की हे मोहरीचं फुल याचा विचार करत बसले आणि दूध उतू गेलं.

अस्तित्वा साठीची ही त्याची धडपड मला जाणवली . माझ्या डोळ्याला ते दिसणं हे त्याचं असणं! आणि माझ्या हदयात त्याचं बसणं हे त्याचं अस्तित्व!!

नाही का?…

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

देव जरी मज कधी भेटला। माग हवे ते माग म्हणाला…..हे गाणं मला फार आवडायचं.

अजुनही आवडतं…तेव्हां विचार करायची, खरंच देव भेटला तर…?नियोजन हा माझा स्थायी स्वभाव असल्यामुळे मी अगोदरच मागण्यांची यादी करुन ठेवली होती…कारण ऊगीच देव घाईत असला तर ऊशीर नको व्हायला…. आपली तयारी असलेली बरी…!! पण देव काही भेटला नाही.जगाचा कारभार सांभाळण्यात इतका गुंतला की माझ्यासारख्या सूक्ष्म जीवासाठी त्याला वेळच मिळाला नाही…

माझी यादी वर्षानुवर्षे तशीच पडून आहे….

आणि आता अलीकडे माझ्या मनात सहज विचार आला, देव नाही तर नाही, त्याचा एखादा सचीव भेटला तर….

शंकराच्या देवळांत नाही का..? आधी नंदीला पुजावे लागते…

मानवाच्या बाबतीतही कुणा स्टारची भेट हवी असेल तर अगोदर सेक्रेटरीशीच बोलावे लागते…..

मग आठवलं…कल्पवृक्ष…!! स्वर्गातला देवांचा सहकारी…तो भेटला तर…?

मी जपून ठेवलेली ती यादी बाहेर काढली…एकेका मागणीवरुन नजर फिरवली……

तशी म्हणा मागण्यांची सवय माणसाला जन्मजातच असते….मानवाचा पहिला ट्याँहा च मुळी मातेच्या दूधाची मागणी करण्यासाठी असतो….कळत नकळत तो आयुष्षभर मागतच असतो….माझ्यासारख्या सरकारी नोकरीतल्या व्यक्तीला तर संप, मागण्या हे नवीन नाहीच….मागण्या पुर्‍या झाल्या तर आनंद …

मागण्या फिसकटल्या तर पुन्हां संप…

पण कल्पवृक्ष एकदाच भेटणार…संधी वाया घालवायची नाही…एका आंधळ्या गरीब बेघर निपुत्रिक दरिद्री माणसाला देव भेटतो…एकच वर देतो ,म्हणतो माग…

तो मागतो, माझ्या विद्याविभूषित पुत्रपौत्रिकांना सुवर्णाच्या माडीवर, रहात असलेले मला पहायचे आहे…..एकाच वरात त्याने सरस्वती ,लक्ष्मी ,संतती  वैभव दीर्घायुष्य, दृष्टी सगळं मागितलं….

कल्पवृक्ष भेटला तर असेच बुद्धीचातुर्य आपल्याला दाखवावे लागेल…

पुन्हा एकदा यादी ऊलट सुलट वाचली….आणि लक्षात आले ही तर पन्नास वर्षापूर्वीची यादी…आता आपण पैलतीरावरचे …संध्यारंग पाहणारे ..एकेका मुद्यावर फुली मारत गेले…हे कशाला..? हे तर आहे.हेही नको.

याची आता काहीच गरज नाही..नव्वद टक्के यादी तर आपली पुरीच झाली आहे.. मग कल्पवृक्ष भेटला तर काय मागायचे?? बघु. करु विचार.

टी.व्ही लावला.

जगभराच्या बातम्या…कुणा कृष्णवर्णीयावर गोळ्या झाडल्या…. चॅनल बदलला. अल्पवयीन दलित बालिकेवर अत्याचार….मी चॅनल बदलत राहिले … संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून…. शेतकर्‍याची आत्महत्या…  करोनाचे बळी… दुष्काळ. .महापूर, अपघात. शैक्षणिक राजकीय सामाजिक भ्रष्टाचार… आरक्षण वाद… सर्वत्र नकारात्मक वातावरण….. मन सुन्न झाले…टी.व्ही. बंद केला…

सर्वत्र द्वेष, मत्सर, चढाओढ…. कल्पवृक्ष भेटलाच तर काय मागायचे?

विंदांची कविता आठवली… घेता घेता देणार्‍याचे हात घ्यावेत…. बस् ठरलं…. कल्पवृक्ष भेटला तर मागायचे….

“बा कल्पवृक्षा, मला तुझे हातच दे…!!!”

© सौ. राधिका भांडारकर

 

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

स्वच्छ सुंदर सकाळ! निळे निरभ्र आकाश! हवेतील तापमानही १९/२० डिगरी सेलसियस्,त्यामुळे सुखद गारवा! आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर लोकांना चालण्यासाठी जवळ जवळ पांच मैल लांबीचा ट्रेल बांधला आहे. दुतर्फा उंच, हिरव्यागार वृक्षांच्या रांगा! त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चालायला जा सतत शीतल सावली.

परवा अशीच चालत असतांना मनांत विचार आला वर्षानुवर्ष्ये हे वृक्ष उन्हांत उभे राहून आपल्याला सतत सावली देत असतात, मधूर फळे देत असतात, त्यांच्यावर उमलणार्‍या फुलांच्या सुगंधाने वातावरणांत प्रसन्नता निर्मीत असतात. परोपकार म्हणजे काय ते निसर्गाकडूनच शिकावे. दुसर्‍याच्या जीवनांत आनंद निर्माण करणे हेच यांचे महान कार्य!

मग स्वर्गातील कल्पवृक्ष आणखी वेगळे कसे असतात? असे म्हणतात की कल्पवृक्षाखाली बसून मनांतली एखादी इच्छा व्यक्त केली तर ती ताबडतोब पूर्ण होते. इच्छांची यादी तर खूपच लांबलचक आहे. कधीही न संपणारी. खरोखरच असा कल्पवृक्ष असतो का? आणेल का कोणी त्या वृक्षाला भूतलावर? दिसेल का तो आपल्याला?

चालता चालता माझ्या विचारांची साखळी लांबतच गेली. आता हळूहळू मन बेचैन झाल्यासारखे वाटू लागले. मग walking trail वर अंतरा अंतरावर ठेवलेल्या एका बाकड्यावर मी जरा डोळे मिटून शांत बसले.

काय सांगू ? मला एकदम डोळ्यासमोर लक्ष्मी~विष्णू उभे असल्याचा भास झाला आणि काय आश्चर्य त्या जोडीत मला माझे आई बाबाच दिसले. बाबा विचारत होते,” काय हवं आहे बेटा तुला? तुला जे पाहीजे ते देतो.” मला साक्षात्कारच झाला.

खरेच! आजपर्यंत काय केले नाही माता पित्यांनी आपल्यासाठी?अनेक खस्ता खाल्या, कष्ट केले, आपले सगळे हट्ट पुरविले, आजारपणांत रात्री रात्री जागवल्या. आज समाजांत आपल्याला जे मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांनी दिलेल्या उच्च शिक्षणाने, त्यांनी घातलेल्या सुविचारांच्या खत पाण्याने, उत्तम संस्कारांने!

खाडकन् डोळे उघडले. खूप आनंद झाला.

अरे! कुठला कल्पवृक्ष शोधतो आहोत आपण?

कल्पवृक्षाच्या छत्र छायेतच तर आपण वाढलो!

धन्यवाद!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares