मराठी साहित्य – विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग १ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग १ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

कोजागिरी पौर्णिमेला विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही आदिवासी भागात माळी पौर्णिमा म्हणतात.  यावेळी पावसाळी पीक तयार झालेले असते.

नवरात्र ते कोजागिरीचा हा काळ सुगीचा हंगाम साजरा करण्याचा आणि रब्बी हंगामासाठी बियाणे निवडण्याचा आणि तयार करण्याचा असतो.  लोकांच्या घरी आनंद असतो आणि कामाची धांदलही असते.

दस-यापासून कोजागिरीपर्यन्त झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात शंकर आणि पार्वती रात्री वस्तीला येतात अशी समजूत आहे.  त्यांच्यासाठी अंगणात ऊसाची, धानाची किंवा  ज्वारीची मंडपी तयार करतात.  त्या मंडपात  मऊ गवताची बिछायत घातलेली असते.  गवताची उशी,  लोड,  तक्के केलेले असतात,  काही घरी झूलाही बनवलेला असतो. त्यामध्ये शंकर पार्वती,  गणपती, कार्तिकेय, नंदी असा सर्व परिवार बनवलेला असतो.  एक भाग शेण आणि चार भाग माती हे प्रमाण घेऊन हा परिवार तयार केला जातो.

या मंडपी रोज नाना प्रकारच्या फळा फूलांनी सजवतात.  विशेष म्हणजे त्या मंडपीवर छोट्या छोट्या पणत्याही मांडलेल्या असतात.  त्या पणत्यांना दिवणाल म्हणतात. दस-यापासून पौर्णिमेपर्यन्त रोजच त्या सूर्योदयाच्या वेळी  ताज्या ताज्या बनवल्या जातात.

दस-याच्या म्हणजे पहिल्या   दिवशी 5, त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी कमीत कमी 4 दिवणाल.. असे पौर्णिमेपर्यन्त करतात.  नवसाच्या असल्या तर जास्तीही बनवतात. त्या दिवसभर वाळवून रात्री त्यात दिवे लावून आरास करतात.  त्यासाठी करंजीचे तेल वर्षभर साठवलेले असते.

अगदी 2000 साली सुध्दा तिथल्या कितीतरी पाड्यात वीज घेतलेली नव्हती पण माळी मंडपी आणि त्यावरच्या दिव्यांची आरास मात्र प्रत्येक घरात सजलेली असे.

घरातली आणि शेजारची  सर्वजण त्याच्यासमोर बसून गातात आणि फेर धरतात.  ही गाणी साधारण भूलाबाईच्या गाण्यासारखीच असतात.

मंडपीचा रोजचा नैवेद्य  म्हणजे रोटया आणि भाजी. ही भाजी मुख्यतः पालेभाजी किंवा कंदभाजी,  पण ही पाचही दिवस वेगळया ठिकाणावरून गोळा करुन आणायची असते.  म्हणजे कधी अंगणात उगवलेली,  शेतातली,  पाण्यातली,  रानातली, अशा प्रकारची.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी,  आपापल्या घरच्या मंडपी घेऊन सर्व लहानथोर जवळपास असलेल्या नदीकाठच्या देवळात  जमतात.

तिथे सगळे जण मिळून स्वैपाक करतात.  स्वैपाक म्हणजे भात, आमट, बरा म्हणजे डाळीचे वडे,  मक्याच्या रोट्या,  गोड पदार्थ  म्हणजे कणकेचा लचका. लचका म्हणजे गव्हाची रवाळ कणिक दळून ती भरपूर तूपात खमंग भाजतात आणि घोटून घोटून अगदी मऊ थुलथुलीत शिरा करतात.

बायका आणि मुली रानफूलांच्या माळांनी सजलेल्या असतात. लहान मुले गणपती आणि कार्तिकेयाच्या रुपात असतात.   एखादे नवसाचे मूल नंदीसारखेही सजवलेले असते.  मोठी म्हणजे टिनेजर मूले भूतगण बनतात.  सगळीकडे नुसती धमाल असते.

फूलांची  आकर्षक सजावट केलेल्या मंडपी मध्यभागी ठेवून त्याच्या वर सर्व दिवे लावतात.   उरलेले दिवे मंडपींच्या भोवतीने वर्तुळाकार 2-3 ओळीत लावलेले असतात.

सर्वप्रथम शंकर पार्वतीला त्यावर्षीच्या पाऊस पाणी आणि शेतातल्या पिकांबद्दल निवेदन केले जाते.  त्या वर्षभरात समाजात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी  देवाला सांगितल्या जातात.

त्यानंतर जमलेल्या स्त्रिया आणि पुरूष .. यांच्या गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करत गाणी म्हटली जातात.  ही गाणी खूपच गंमतीदार असतात,  त्यामध्ये शंकर पार्वतीच्या भांडणाच्या आणि रुसण्याच्या आणि  चंद्र,  गंगा,  गणपती आणि कार्तिकेयाच्या यांच्या खोड्यांच्या… अशा कथा असतात.

त्यातली एक कथा तर मला फारच आवडली.

(ही कथा उद्याच्या भागात वाचूया)

क्रमशः ….

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अन्न हे पूर्णब्रह्म ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ विविधा ☆  ? अन्न हे पूर्णब्रह्म  ?☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार 

अन्नाद्भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्नसम्भव: |

यज्ञाद्भवन्ति पर्जन्य: यज्ञ: कर्मसमुद्भव: ||

अर्थ- सर्व प्राणिमात्र अन्नापासून उत्पन्न होतात.पावसामुळे अन्ननिर्मिती होते, यज्ञामुळे पाऊस पडतो तर यज्ञ हे आपल्या विहित कर्मांचे फळ आहे.भगवद्गीतेमध्ये भगवंतांनीच अन्नाचे महत्त्व सांगून ठेवले आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात मनावर जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात, अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात त्यातला मुख्य. घटक म्हणजे आपण खातो ते अन्न होय.

माणूस जशा प्रकारचे अन्न खातो ,ज्या परिस्थितीत खातो, ज्या मनस्थितीत खातो त्या त्याप्रमाणे त्याच्या मनाची जडणघडण होत जाते.म्हणून नेहमी प्रसन्न मनाने जेवावे. म्हणून आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे की पाट, रांगोळी, उदबत्ती वगैरे थाट करून पंगत बसविली जायची. हल्ली टेबल डेकोरेशन असते. ही वातावरणनिर्मिती मन प्रसन्न ठेवते.

जेवण नेहमी सात्त्विक, षड्रसयुक्त ,ज्याला आपण चौरस आहार म्हणतो,असे असावे. रोजच्या स्वयंपाकातून आपल्याला हे षड्रस मिळतात. मीठ, लिंबू चटणी कोशिंबीर लोणचे भाज्या, डाळ,भात, चपाती,फळे, क्वचित प्रसंगी एक गोड पदार्थ हा आहार योग्य चौरस आहार या सदरात मोडतो.

एखाद्या ऋतूत जे पिकते ते त्याचवेळी खाणे इष्ट ठरते. उदा- आंबा, कैरी वगैरे. भारतामध्ये प्रांतांनुसार खाण्याच्या सवयी ,पद्धती यात बदल झालेला दिसतो.तो तेथील हवामानानुसार योग्य आहे. तसेच अन्न शिजवताना शिजविणाऱ्याच्या मनस्थितीचा परिणामही जेवणावर होतो. म्हणून स्वयंपाक नेहमी प्रसन्न मनाने करावा. एकदा एका माणसाला खानावळीत जेवावे लागले. रोज रात्री त्याला खून केल्याची , झाल्याची तत्सम स्वप्ने पडत. काही दिवसांनी त्याला कळले की तुरूंगातून सुटका झालेला एक खुनी कैदी तिथे जेवण बनवतो.अशा अर्थाची एक कथा गुरूचरित्र ग्रंथात आहे.म्हणून असे सांगितले जाते की घरच्या कर्त्या पुरूषाने नेहमी आपल्या आईच्या, बायकोच्या नाही तर स्वत:च्या हातचेच अन्न खावे.

सात्त्विक आहार नेहमी घ्यावा. हे गीतेत आणि ज्ञानेश्वरीत सांगितले आहे.अन्नाचे सात्त्विक, राजस, तामस असे तीन प्रकार विशद केले आहेत. मूळचे सुरस, ताजे, नीट शिजलेले, स्वादिष्ट, शरीरास हितावह,सहज पचणारे ते सात्त्विक अन्न. त्याने आरोग्य उत्तम राहते. राजस अन्न म्हणजे कोरडे, तिखट, जळजळीत, अति गरम, जास्त शिजलेले असे अन्न.ते पचते पण हितावह नसते. तर तामस अन्न हे आंबलेले, शिळे, उष्टे, अर्धवट शिजलेले करपट, रसहीन असते. माणूस जे खाईल तशी त्याची वृत्ती सात्त्विक, राजस, तामस  बनते.

अन्न खूप खाऊ नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. तसेच उपाशीपोटी राहू नये. अति खाऊ नये.योग्य तेवढेच खावे. अति खाणारा,उपाशी राहणारा, शांत झोप न घेणारा यांना योगप्राप्ती होत नाही असे भगवंतांनीच सांगितले आहे. म्हणून योग्य, सात्त्विक आहार अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे समजून उमजूनच खावे. नकळतसुद्धा अन्नाचा अपमान करू नये. जेवताना भांडू नये. शत्रूसुद्धा जेवत असेल तर त्याला सुखाने जेऊ द्यावे. तसेच एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेऊ नये.

अन्न शिजवताना , जेवणापूर्वी देवाचे नाव घ्यावे. स्वयंपाकापूर्वी स्त्रियांनी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे.  जेवताना मन शांत ठेवावे. सावकाश जेवावे.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित:|

प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ||

असेही भगवंतांनी सांगितले आहे. सर्व अन्नाचे पचन वैश्वानर करतो. प्रत्यक्ष भगवंत  वैश्वानर बनून मनुष्याच्या देहात वसतो.  म्हणून नेहमी जीवनसत्त्व युक्त, आपल्याला योग्य उष्मांक देणारे अन्न खावे. शरीराचे पोषण उदरभरण, याबरोबरच मनाचेही पोषण करणारे अन्न  माणसाने खाणे आवश्यक आहे.

© सुश्री प्रज्ञा परशुराम मिरासदार

A-1, 603, अक्षर एलेमेंटा, पोदार स्कूलजवळ, व्हिजन वन मॉल जवळ, ताथवडे, पुणे – ४११०३३

मोबा. 9657878331

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे – 5 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे – भाग 5 ☆ सौ. अंजली गोखले ☆

संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ आणि जबाबदारीच्या पदांसाठी साठीच्या पुढच्या मंडळींना प्राधान्य देतात.  कारण त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता जबरदस्त असते.  त्यांचे कौटुंबिक पाश बऱ्यापैकी झालेले असतात, काम करण्याची इच्छाशक्ती असते, क्षमतेमध्ये ते कमी पडत नाहीत. अमेरिकेमध्ये संशोधन करून प्रयोगांती असे सिद्ध केले आहे की माणसाचे सर्वात कार्यक्षम वय 60 ते 70 आहे. आहे की नाही आश्चर्यकारक!त्यांच्यामध्ये सत्तरी पर्यंतच्या लोकांचा नंबर काम करण्याच्या बाबतीत पहिला. त्यानंतर सत्तर ते ऐंशी वयाचे लोक व्यवस्थित कार्यक्षम!त्यानंतर चा नंबर लागतो 50 ते 60 वयाचा. विशेष म्हणजे नोबेल पदक विजेत्यांचे सरासरी आयुर्मान 62 वर्षे दिसून आले आहे. अमेरिकेतल्या मोठाल्या शंभर चर्चेस मध्ये काम करणाऱ्या धर्मोपदेशक यांचे वय तपासले असता बहात्तर वर्षापर्यंत हे लोक व्यवस्थित काम करू शकतात असे आढळून आले. पोपचेसरासरी वय 76 दिसून आले. यावरून एवढाच निष्कर्ष निघू शकतो की परमेश्वर यांनी हे जे शरीर बहाल केले आहे, त्याची सर्वात चांगल्यात चांगली वर्षे कोणती म्हणाले तर साठी पासून सत्तरी पर्यंत!या वयामध्ये आयुष्यातले चांगले तुम्ही मिळवु शकता.

यावरून आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनो, वाढत्या वयाची चिंता करू नका, योग्य नियोजन करून कार्यरत रहा, अच्छा ही बना, आनंदात रहा. मग संध्याछाया का बर  भिववतील ?याच वयामध्ये आयुष्याचा खरा अर्थ समजलेला असतो, दिशा तर आता ठरलेलीच असते, त्यामुळे मागे अजिबात न वळून बघता पुढे पुढे चालत रहा. या वाटेवर काही झाडे उन्मळून पडणारच, आधारचे हात कमी होणारच, शरीराला_ मनाला वेदना या होणारच.  पण या सर्वांवर मात करून जीवन गाणे गात राहिले पाहिजे.  आकाशातील ढग, पाऊस बरसून आपले पूर्ण आयुष्य रिते करतो, नद्या सतत वहाततेच पाणी किनाऱ्याला देत राहतात, सागर त्याच पाण्याची वाफ करून पुन्हा ढगांना पाणी भरण्याची संधी देतो. झाडे आपले पूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी वेचतात, गोड गोड फळे माझी म्हणून त्यांना खाताना आपण कधी पाहतो का?ही सगळी रंगीत सुवासिक फुले माझेच आहेत असे ते कधी म्हणतात का?दुःखाने टाहो फोडताना, अपयशाने खचून जाताना रडत रडत जीवन जगणारी झाडे आपण कधी पाहतो का?मग या सुंदर अश्या निसर्गाकडून आपण हेच शिकूया आणि आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य ही आनंदी बनवूया. बालपण तरुणपण वृद्धावस्था आपल्याला मिळालेली वरदा नं आहेत.  त्या त्या वयात, त्या त्या क्षणात, त्यांचा आनंद मिळवू या मग कुठल्याही वयामध्ये आपल्या ओठी याच येतील

“जीवनात ही घडी

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत – राग यमन ☆ सुश्री अरुणा मेल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत – राग यमन ☆ सुश्री अरुणा मेल्हेरकर ☆ 

संगीतापासून दूर रहाणारा अपवादात्मकच कोणी असू शकतो,कारण~~

 

सूर म्हणजे जिव्हाळा

सुख शांतीचा हिंदोळा

 

सुरांतच असते भक्ति

सूर देतात मनास शक्ति

 

सा सर्वांचा सोबती

रे कधी विरह कधी शांती

 

ग ने होतो भावनाविष्कार

म अति कर्ण मधूर

 

प असते विश्रान्ती

धने येते संगीतसागरास भरती

 

नि नाजूक कोमलांगी ललना

सप्तसूर देती आल्हादच जीवना

 

सुरांच्या या प्रकृतीवर हिंदुस्तानी /कर्नाटकी राग संगीत आधारलेले आहे.

सा रे ग म प ध नी ह्या एका सप्तकाच्या २२ श्रुति आहेत. साच्या ४, रेच्या ३, गच्या २, मच्या ४, पच्या ४,धच्या ३, निच्या २. अशा या २२ श्रुति.

हेच सुरांतील नाद होत. ह्या २२ नादांतून शुद्ध व विकृत अशी स्वर निर्मिती शास्रकारांनी केली आणि आजतागायत हे शास्र सर्वमान्य आहे.

अशारीतिने ७ शुद्ध आणि कोमल रे ग ध नि व तीव्र म हे ५ विकृत स्वर, अशा एकूण १२ स्वरांवर संपूर्ण जगतात संगीत विराजमान आहे.

वेदकालापासून संगीत हे शास्र मानलेले आहे. सामवेद हा संगीत विषयावरील वेद आहे. भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्रांत संगीताविषयीचे नियम सांगितले आहेत. २०/२१ व्या शतकांत राग संगीत थोडे थोडे बदलत गेले असले तरी मुख्य पाया अढळच आहे. पं.कुमार गंधर्व, संगीत मार्तंड जसराजजी यांच्यासारख्या कलावंतांनी अनेक नवीन रागांची नीर्मिती केली असली तरी आजही संगीताच्या नवशिक्या विद्यार्थ्यांस यमन,भूप,भैरव काफी हेच पारंपारिक राग प्रथम शिकविले जातात.

या लेखमालेत एका रागाची ओळख करून द्यावयाची आहे म्हणून मी माझा आत्यंतिक आवडीचा प्रारंभिक राग यमनची निवड केली आहे.

यमन हा संपूर्ण राग आहे.म्हणजे या रागांत सा ते नि ह्या सातही स्वरांचा समावेश आहे. यांतील मध्यम(म) मात्र तीव्र आहे. म्हणून हा कल्याण थाटांतील राग.

सा रे ग म (तीव्र)प ध नी सां~आरोह

सां नी ध प म(तीव्र) ग रे सा~अवरोह

नि(मंद्र)रे ग रे सा, प,म(तीव्र) ग, रे, सा~पकड

म्हणजे रागाचे स्वरूप दाखविणारा स्वर समूह.

ग(गंधार),नि(निषाद) अनुक्रमे वादी व संवादी स्वर.

हा राग प्रामुख्याने रात्रीच्या प्रथम प्रहरी गायला/वाजविला जातो.

असे म्हणतात की हा राग चांगला घोटला गेल्यानंतर बाकीचे इतर राग शिकणे सोपे जाते.

येरी आली पियाबिन, तोरी रे बासुरिया, मोरी गगरी ना भरन दे, अवगुण न कीजिये गुनिसन

या पारंंपारिक बंदिशी आजही गायल्या जातात, त्या कर्णमधूरही वाटतात. गायक आपल्या कुवतीनुसार रागांत रंग भरत असतो व रागाचे नवनवे पैलू श्रोत्यांस उलगडून दाखवित असतो.

राग संगीताची हीच तर खासियत आहे.कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करतां त्याला आपले गानचातूर्य दाखवून रसिकांचे मन जिंकायचे असते.

नाट्यसंगीत हा राग संगीताशी निगडीत उपशास्रीय गायन प्रकार आहे. बाल गंधर्वांनी अजरामर केलेल्या नाट्यपदांची गोडी केवळ अवीट आहे. स्वयंवरातील नाथ हा माझा मोही खला, मानापमानांतील नयने लाजवित,कुलवधू नाटकांतील क्षण आला भाग्याचा,सौभद्रातील राधाधर मधुमिलिंद जयजय, किंवा अगदी अलिकडचे देवाघरचे ज्ञात कुणाला ही पदे यमन,यमन कल्याण रागांतीलच आहेत.

आपले सर्वांचे लाडके गायक/संगीत दिग्दर्शक कै.सुधीर फडके उर्फ बाबूजी यांची तर बहुतांशी गाणी यमन रागांत अथवा त्यावर आधारित आढळतात. समाधी साधन हा तुकारामाचा अभंग आणि का रे दुरावा हे भावगीत, दोन्ही यमन मध्येच परंतु संगीत रचना करतांना त्या त्या काव्यातील भावनाविष्कारानुसार बाबूजींनी स्वरसमूहांचे नियोजन केल्यामुळे एकाच रागातील दोन गाणी कानाला वेगळी वाटतात.

हे त्यांचे चातूर्य आहे. हीच सुरांची जादू आहे.यमनमधील एक तीव्र म ही सगळी करामत करतो.

या रागाचा अभ्यास करतांना असे लक्षांत येते की भक्ती आणि शांत रसाबरोबर श्रृंगार रसालाही हा राग पोषक आहे.

ज्यांना संगीताची जाण नाही परंतु खूप आवड आहे त्यांना हा लेख वाचून यमन राग ऐकतांना त्याचा अधिक आनंद मिळेल अशी आशा वाटते.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपले निर्व्याज गुरू ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ आपले निर्व्याज गुरू ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

आत्ताच्या विज्ञान युगात खूप वेळा पुस्तके, ग्रंथ, मोबाईल, संगणक यांच्याद्वारे आणि नेटवरुन मिळणारी माहिती खूप उपयोगी पडते. ही माहिती खरी असते. त्यांच्याकडून भेदभाव होत नाही. गुरु करण्याआधी आपण सर्वप्रथम त्यांची कथनी व करनी याबाबतीत निरीक्षण व मनन,चिंतन केले पाहिजे. त्याला कसोटी लावलीच पाहिजे असा दंडक आहे.गुरु हा त्याच्या ज्ञान व सदाचरणावरून ठरतो. वयावरुन नाही. गुरु ही शक्ती आहे व्यक्ती नाही. वर्तमानकाळात गुरु परंपरेलाही किड लागू पाहत आहे. त्यांचे व्यापारीकरण होत आहे. त्यांच्याकडून स्रियांचे लैंगीक शोषण होत आहे. याबाबतीत खुप सावध रहावे लागत आहे. असे गुरु संकट दूर करण्याऐवजी संकटे निर्माण करतात. हे देवदूत नसून यमदूत आहेत. साधू नसून संधीसाधू आहेत. म्हणून मला पुस्तक, संगणक हे गुरु मला विश्वासू वाटतात. या दोन्ही गुरुंचे वर्णन करणाऱ्या कविता केल्या आहेत.

पुस्तक

पुस्तक असे आमचा गुरु आणि मित्र

त्यानेच घडवले अनेकांचे अंतर

त्यानेच उलगडले अनेकांचे अंतर

पुस्तक वाचता वेळ जाई मजेत

ती एक असे वेगळीच संगत

रुपे त्याची अनेक अन् कित्येक जन्मदाते

भाषाही त्यांच्या अनेक

मर्यादा नसे कोणत्याच गोष्टींची  परी मर्यादा पडे त्यासी

मार्गदर्शन, मनोरंजन करी सर्वांचे

भेदभाव नसे तयापाशी

तो एक प्रसिध्दिचा अन् संग्रहाचा मार्ग

ते एक उत्तम प्रसारमाध्यम

ग्रंथालय असे त्यांचे घर

जगाच्या पाठीवर सर्वत्र त्यांचे अस्तित्व

पण शेवटी पुस्तक करी विनंती

‘मी जरी मुका तरी वाचकांनो

जाणा माझे अंतर

दुमडू नका, फाडू नका माझी पाने

सांभाळूनी ठेवा मला

माहिती अन् स्फूर्ती घेऊन माझ्याकडून

घडवा आपुले भविष्य सूंदर’

आणि आता

संगणक

संगणक तू संगणक

आहेस माहितीचा साठक

आयुष्याचा अविभाज्य घटक

नवीन दिशांचा प्रेरक

पुढील प्रवासाचा संयोजक

तरीही आमचा सहचालक

आहेस संपर्काचा साधक

असतो तुला मालक

कित्येक क्षेत्रांचा दर्शक अन् संचालक

देतोस माहिती करतोस करमणूक

आहेस माहीतीचा अन् मालाचा वितरक

नवीन कल्पनांचा सुचक

जुन्यानव्या मैत्रीचा योजक

तसाच आनंदाचा आयोजक

रिकाम्या वेळाचा नियोजक

तुच असशी आमचा मार्गदर्शक

तसाच निरोपाचा वितरक

जन्मदाता तुझा एक संशोधक

साथी तुझा नेटवर्क

मग लागतो तुला संरक्षक

तूच एक संगणक

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले ☆

किशोर वयातले ते अल्लड, अबोध कळी पण हळूहळू उमलत जाते, तस तसे अवतीभोवतीचे खरे वास्तव लख्ख दिसायला लागते ,  जाणवायला लागते. तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यांची पाखरं फडफडायला लागतात,  मनाला फुलपाखरी पंख फुटतात. स्वप्नांच्या ढगांमध्ये मुक्तपणे संचार सुरू होतो. एवढ्याश्या मनामध्ये, इवल्याशा नजरेची स्वप्न असंख्य असतात, , अभ्यासाची असतात करियरची असतात, मोठेपणी आई-वडिलांना आधार देण्याची असतात, मित्र-मैत्रिणींची असतात, आयुष्याच्या जोडीदाराची असतात, मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याची असतात.कोणाला मिलिटरी मध्ये जायचे असते, कोणाला क्रिकेटर बनायचे असते, कोणाला शास्त्रज्ञ तर कोणाला सर्जन!उन्हाळ्यामध्ये बहावा कसा फुलून, पिवळ्या जर्द नाजूक फुलांनी डवरलेला असतो, डोलत असतो, गुलमोहर गडद लाल फुलांनी आकर्षून घेत असतो, तसे तारुण्यातल्या मनाला ही सगळी स्वप्न खुणावत असतात.ती स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते.ज्यांना मनासारखे यश मिळते, ते सुखाने मनोराज्यात मुक्तपणे विहार करतात.ज्यांचे निम्मी किंवा अखे तरूणपण त्यांना पकडण्यात जाते, त्यांच्या मनाला ओरखडे पडतात, त्यांच्या स्वप्नांचे पक्षी दूर दूर भरकटत निघून जातात आणि उरते एकाकीपण!सभोवताली निराशेचे ढग जमायला लागतात.जीवनाला सुरवंटाचे काटे टोचायला लागतात आणि अपयशाने खचून जायला होते.यास  सुरवंटी अवस्थेमध्ये , एखादा जरी सोबतीचा हात मिळाला, सहानुभूतीची हलकीशी थाप पाठीवर पडली, तरी ते आयुष्य सावरायला मदत मिळते आणि बघता बघता आयुष्याची पन्नास-पंचावन्न वर्षे भुरकन सरतात.इतरांसाठी करता-करता, स्वतःच्या इच्छा , अपेक्षा, आवड गुंडाळून ठेवलेली असते.आयुष्याची संध्याकाळ खुणावायला लागते.

नेमक्या याच वळणावर आपल्या आयुष्याची, आरोग्याची, आपल्या माणसांची खरी किंमत कळते.काहींना”संध्याछाया भिवविती हृदया”हे जाणवायला लागते तर अनेकांना अनेक व्याधींचा  विळखा पडलेला असतो. त्यांना दवाखान्याचे खेटे घालावे लागतात, वेळच्यावेळी औषध पाण्याच्या वेळा सांभाळण्यात सहकार्याची दमछाक होते.आपल्या गाडीचा वेग मंदावलाय हे समजते. काहीजण मात्र यासाठी नंतर अतिउत्साही बनतात. आपले छंद जोपासतात. आपला आनंद आपणच शोधतात. पर्यटनाचा आनंद उपभोगतात. मित्रमंडळीत रमतात. वाचन मनन चिंतन आणि चर्चा अशा मधून एकमेकांशी संवाद साधतात. तरुणपणी जे करायला मिळाले नाही, जे छंद जोपासायला मिळाले नाही त, आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे हातातून गेलेले असतात, ते पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनाची संध्याकाळ मनासार खी उपभोगतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ टपालाचे दिवस …. ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ टपालाचे दिवस …. ☆ श्रीशैल चौगुले ☆

(ऑक्टोबर महिन्यात टपाल दिवस साजरा करण्यात येतो.त्यानिमीत्त.)

आठवणीतले क्षण एखाद्या चिमणीसारखे टिपतात आणि मग आपणास लेखणीने सांगीतल्याशिवाय मनही स्वस्थ बसत नाही.

लहान असताना जसजसे कळायला लागले तसतसी विशीष्ट व्यक्तींची ओळख डोळ्यात साठवून ओळख पटू लागली. खास करुन शिक्षक,पोलीस, व सर्वात महत्वाची व्यक्ती चटकन आकर्षून घ्यायचा तो पोस्टमन.

मला वाटते त्यावेळी जांभळा सदरा व टोपी असा काहीतरी वेश होता बहुधा. नंतर खाकी वेष व हातात कसले तरी थोडे कागद व पिशवीतही खाकी चौकोनी जाड कागद. हळूहळू त्या कागदाची ओळख टपाल म्हणून परिचीत झाली. दारात पोस्टमन आला कि हा काही क्षणाचा विशेष पाहुणाच वाटायचा. मग बहिणींची धावपळ व्हायची. कुणाचे पत्र आले हे पहाणेसाठी व माझीही लुडबूड व्हायची, बहिणींचे परकर धरुन. मग ती टपाल नावाची अद्भूत वस्तू मलाच मिळण्यासाठी रडारड घरभर. पण, ते पत्र पूर्ण वाचलेशिवाय काय माझ्या हाती लागायचे नाही.

कधी कधी तारही आल्याचे आठवते. धारवाडहून मामांचे अथवा मुंबईहून नागूकाका शिक्षक जे वडिलांचे व आमचे घरोबा शेजारी यांचे.

मग घरभर धिंगाणा चालायचा. पत्र वाचायला अथवा लिहायला येणारी व्यक्ती अथवा मुलगा हुशार समजला जायचा.

पण हे टपाल भांडण लावण्यात सर्ईरात. वाचायला व्यवस्थीत आले तर ठिक, नसता घरभर बहिण भावंडात हशा होऊन कधी कधी टपाल फाटूनही जायचे. पाठवाणार्याचे ते दुर्दैवच.

पत्ता निट असेल तरच पत्र लवकर मिळायचे. अन्यथा पोस्टमन गल्ली बोळ शोधून दोन दिवस दिरंगाईने पत्र पोचते करायचे. त्यात पत्र वेळाने आले कि,पटकन पोस्टात जाऊन दहा पैशाचे पत्र आणून ऊत्तर पाठवताना मजकूरात पहिले वाक्य ‘टपाल वेळाने मिळाले’.

पत्र लिहिताना लिहीणार्याचा भाव काय विचारता. आम्ही सगळे त्यांच्याभोवती रींगण करुन गुडघे दुमडून,गालावर हात ठेऊन गांभिर्याने टपालकडेच एकटक मंत्रमुग्ध होऊन बघत असू. मग काय लिहीणार्या बहिणीचा भाव अधिक,सरा, अंधार करू नका,हलवू नका. मग आम्ही हताश. पण टपाल पूर्ण झाले की टपालपेटीत टाकून येण्याची जबाबदारी कधी कधी माझ्यावरही यायची. मला अतिशय कटाक्ष सुचना असायच्या,’हे बघ,ते पेटीचे वरचे दार ऊघडून त्यात टाकायचे. हाताला येतय नव्हे. मी होय म्हणून थाप लावायचा. मग मुलींच्या शाळेत अथवा बस स्थानकातल्या पेटीजवळ गेलो की,अगोदर चड्डी गच्च करणार. कारण ही गडमोहीम साधी नव्हती. खांबावर चार पाय वर चढून मोठ्या कसरतीने दार ऊघडून टपाल टाकायचे. पण मोहिम फत्ते झाली कि मला पाच दहा पैशाचे बक्षिस घरी आल्यावार नक्की मिळायचे. अहाहा काय त्या टपालमेहनतीतून मिळालेल्या साखरगोळी,निलगीरी गोळीचा आस्वाद. छे ! तो आनंदच वेगळा.

टपालाची सुध्दा एक गंमत असायची. आम्ही  चव्हाणवाड्यात नवीन रहायला आलेलो. मी तिसरी चौथीच्या वर्गातला हुशार विद्यार्थीच होतो अगदी ठाम.

मग दिवसभर शेजारी चव्हाणवाड्यातच थौड्या फरकाने एक दोन वर्षाच्या अंतराने सवंगडी असलेने तिथेच खेळायला असू. मग टपाल वागैरे आले कि गलकाच गलका. मग त्यांचे घरी आमच्या तुलनेने लहान व शिक्षणानेही थोडाफार मठ्ठ असलेला चव्हाणांचेच शेजारीमित्र होते. त्याला टपाल वाचायची भारी हौस. अजून दुसरीपर्यंतच असेल पण टपालाचा आनंद विरळच.

तो कोणतेही पत्र आले कि,मामा चचो,मामी चचो,काका चचो असा मोठ्याने वाचायचा आणि वाडा हशानै गदगदून जायचा.

आणखी एक टपालाचा प्रसंग,आमच्या बहिणींची नुकतीच लग्नं झालेली. मग त्यांच्यात सरशी असायची कि,कुणाचे मिस्टर किती थोर म्हणजे भाऊंजींची लढत असायची.

मग मोठ्या बहिणीच्या हाती मधल्या बहिणीच्या भाऊजीकडून आलेले पत्र हाती आले मग त्या टपालातील दोष काढून चिडवा चिडवी सुरु. आम्ही सगळे गमतीत रमून हसू लागलो. आणि आमच्या मधल्या बहिणीचा राग अनावर होऊन अक्षरशः पळीने फेकून बहिणीला अंदाजाने भिरकावले. तिला वाटले लागणार नाही. आणि काय विचारता राव पळीचा घाव पायावर जबरदस्त बसला. बहिण बेशुध्द काही क्षण. हसता हसता सगळ्यांचे डोळे भरुन आले., मधल्या बहिणीचे तर काळीजच फुटले या टपालप्रकरणातून. तसा मारण्याचा हेतू नव्हता पण  रागाने भिरकावलेले स्वयंपाकशस्त्र. क्षणभर धावपळ. काय करायचे कुणाला काही कळेना.

यापुढे मात्र टपालातल्या दोषांची टिका टळली. आणि आम्ही चांगले टपाल लिहायला शिकलो.

एकंदरीत संदेशाचे पुष्पकविमान म्हणजे टपाल.

एक हिंदी कविता आठवाते पाठ्यपूस्तकातीलः

लेकर पिला पिला थैला

पत्र बॉंटने आता

यह है मुन्सीराम डाकीया. . . . .

डाकीया’ नावाची कविता.

अशा खूप जीवनातल्या सुख-दुःख क्षणाशी निगडीत पोस्टमन वा टपालाच्या आठवाणी. पण आजसाठी ईथेच थांबतो.

सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार व. . . . गोड गोड पापा.

आपला विश्वासू

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -3 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -3 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्याला वाटेल लहान जीवांना कसला आलाय कठीण प्रसंग?लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं.  आई बाबा, आजी आजोबा यांच्या प्रेमाच्या  मऊ उबे मध्ये वाढत असताना त्यांना कशाचा होणार त्रास?पण आलीकडे ही प्रेमाची मऊ दुलई फार लवकर काढली जाते आणि पाळणाघर नावाच्या वेगळ्याच शिस्तीच्या धगे ला त्यांना सामोरे जावे लागते, इच्छा असो वा नसो, ही परिस्थिती ते वाढणारे मूल बदलू शकत नाही. त्या नवीन वातावरणामध्ये ते रमले तर ठीक, नाहीतर अशाही फुलपाखराचे सुरवंट व्हायला वेळ लागत नाही.

तीच परिस्थिती शालेय जीवनामध्ये.  खरेतर लहान मुलांना शिकायला खूपच आवडते.  त्यांची इवलीशी नजर बघा, नव्याचा शोध घेत असते. एखादी गोष्ट त्यांना आवडली की त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला ती चमक दिसते. त्यांचा मेंदू विलक्षण तजेलदार असतो.  स्पंज जशा पाणी शोषून घेतो, तसा त्यांचा मेंदू नवनवीन गोष्टी स्वीकारायला आसुसलेला असतो. अशावेळी या मेंदूला योग्य ते खाद्य मिळाले तर ठीक. पण जर का कु संगत लाभली तर आयुष्याचा सुरवंट झालाच म्हणून समजा. अशावेळी त्याला त्यामधून बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची, आजूबाजूच्या लोकांची आणि त्याच्या शिक्षकांची असते.

शाळेच्या इयत्ता जसजशा वाढत जातात, तस-तशी त्यांची निरीक्षणशक्ती वाढते. त्या निरीक्षणाचे अनुकरण करण्याचे ते निरागस वय. घरी घरी आई बाबा जसे वागतात, बोलतात, ते ही मुले बरोबर टिपतात आणि त्याप्रमाणे त्यांचे वागणे असते.  एखादेवेळी आईने एखादा खोटा शब्द बोललेला त्यांच्या लक्षात आले, तर ते नेमकेपणाने लक्षात ठेवतात. आणि आपल्या सोयीसाठी खोटे कसे बोलावे, वागावे हे हेरतात आणि मोठ्यांच्या नकळत त्यांच्या गाडीचा ट्रॅक बदलत जातो.  हे असे न होण्यासाठी योग्य आणि सचोटीने वागण्याची जबाबदारी असते, ती घरातील आजूबाजूच्या वयाने मोठे असलेल्या थोरांची !

उमलत्या वयातील मुला-मुलींची आयुष्याकडे बघण्याची उत्सुकता पराकोटीची वाढलेली असते.  आत्तापर्यंतचा मित्र किंवा काल पर्यंत ची मैत्रीण यांच्या वागण्या-बोलण्यात झाले ला बदलत्यांना फार लवकर समजतो.  पण कारण समजत नाही.  मैत्री तर हवीहवीशी असते, पण अचानक निर्माण झालेली दरी कासावीस करते.  शाळेमध्ये अभ्यासाचा ताण वाढत जातो, अनेक नवनवीन गोष्टी समजायला लागतात.  समाजा मधल्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते.  भोवताली घडते ते सारेच चांगले वाटायला लागते.  एखादी चुकीची गोष्ट आई-बाबांनी, शिक्षकांनी दाखवून दिली, समजवण्याचा प्रयत्न केला तर तो अपमान वाटतो.  त्यांच्याशी बोलणेच नको इथपर्यंत मजल जाते.  त्यांचा  सहवास टाळावा असा वाटतो.  अशा या संवेदनशील वयामध्ये सच्चे मित्र मैत्रिणी खूप उपयोगाचे अन महत्त्वाचे ठरतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

हाव. दिसायला दोन अक्षरी एक साधा शब्द, पण त्यात नकारात्मक अर्थांचे विविध छटांचे रंग ठासून भरलेले. . ! कांही हवं असणं आपण समजू शकतो, पण अंत नसलेलं ‘आणखी हवं’ ही उध्वस्ततेची सुरुवात ठरते. आणखी हवं असणं म्हणजे हव्यास. हव्यास म्हणजे विध्वंसाची ठिणगीच जणू. कारण कोणत्याही हव्यासाचं असणं परोपकारासाठी, जनसुखाय -जनहिताय कधीच नसतं. ते तसं असूच शकत नाही. ते असतं स्वत:साठी, . . स्वार्थासाठी. ! म्हणूनहव्यासाची परिणती अर्थातच विनाश हेअपरिहार्यच. खरं तर विश्व निर्माण झालं तेव्हाच निसर्गनियमही अस्तित्वात आले. हे नियम निसर्गातले सर्व घटक काटेकोरपणे पाळत असतात. अपवाद फक्त माणसाचा.  पैसा, पद, प्रतिष्ठा, सुख यांच्या हव्यासापायी निसर्गाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या सुरुवातीचा पहिला क्षणच विनाशकाले विपरीत बुध्दी ठरला.  आपलं जगण्याचं निसर्गाला अपेक्षितच नव्हे तर अभिप्रेतही असलेलं प्रयोजनच माणूस विसरुन गेला आणि विनाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला.

निसर्गाने माणूस निर्माण केला आणि त्याला बुध्दीचं वरदान दिलं. त्या बुध्दीचा  सर्व निसर्गघटकांच्या हितासाठी त्याने योग्य उपयोग करणे अपेक्षित होते. पण हव्यासाच्या अतिरेकामुळे सुखासमाधानाच्या मृगजळामागे धावता धावता निसर्गानेच दिलेलं बुध्दीमत्तेचं कोलीत हातात घेऊन सर्वाना प्रकाश दाखवणे अपेक्षित असताना अतिरेकी हव्यासामुळे माणूस ते क़ोलीत घेऊन सगळा निसर्गच जाळत सुटलाय.

माणसाचं हे अनैसर्गिक जगणंच त्याला आज विनाशाच्या अखेरच्या वाटेवर घेऊन आलंय.

निसर्गाला अपेक्षित असणारं  माणसाचं ‘ जगणं’ हे एका अतिशय सुखी, समाधानी, समृध्द,  सुंदर अशा जगाच्या निर्मितीला निमित्त झालं असतं.  एरवी अगदी सहज वास्तवात येऊ शकलं असतं असं ते सुंदर जग आज माझ्या मनात मला स्वच्छ दिसतंय, पण. . स्वप्नवतच.  म्हणूनच ते रुखरूख वाढवणारं ठरतंय. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख.  निसर्गाला अभिप्रेत असलेल्या त्या सुंदर जगाचं दर्शन   तुमच्याही मनात ती रुखरुख निर्माण करेल आणि कदाचित नव्या वाटा शोधण्याची असोशीही. . . . !

कसं आहे हे हवंहवंस जग?हे जग आणि अर्थातंच इथलं जगणंही अतिशय निरामय

आणि  सुंदर आहे. या जगात माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात आहे. ॐकार हाच प्रत्येकाचा देव आहे. घरं मंदिरासारखी पवित्र आहेत आणि त्या घरांऐवजी प्रत्येकाच्या मनामधे देव्हारे आहेत. त्या देव्हार्यात ॐकाराची पूजा नित्यनेमाने होते. नीतिनियमांनुसार आचार हे प्रत्येकाचे व्रत, आणि त्यातून मिळणारं समाधान हा पूजेचा प्रसाद. . !निसर्गाचे सर्व नियम इथे सर्वानी मनापासून स्विकारलेत. त्यामुळे निसर्गालाही कृतकृत्य वाटतेय. त्यामुळे निसर्ग छान खुललाय. फुललाय. निसर्गचक्राचा स्वत:चा ताल, वेग सर्वांसाठीच हवाहवासा, आनंददायी ठरतो आहे. निसर्ग प्रसन्न आहे, त्यामुळे माणसेच नव्हे, तर मनुष्येतर प्राणीही अतिशय समाधानी आहेत. माणसांनी त्याना अभयारण्यांऐवजी अभयच देऊ केल्यामुळे मानवाचा अधिकार त्यानीही मनापासून स्विकारलाय आणि स्वत:च्या अरण्यकक्षेत ते आनंदाने जगतायत. माणसांचं नागरी जीवन त्यामुळे भयमुक्त आणि श्वासोच्छवासासारखं सहजसुंदर आहे. पृथ्वीच्या अंगाखांद्यावरचं जनसंख्येचं अतिरिक्त ओझं आता कमी झालंय. त्यामुळे पृथ्वीसुध्दा निरोगी आणि नीतिमान माणसांचं आस्तित्व अलंकारांसारखं मिरवतेय. . . !

या जगात प्रत्येकजण सुखी आहे आणि समाधानीही. . !

प्रत्येकाला स्वत:च्या कुटुंबाचं असं घर आहे. ते एकमजलीच आहे. घरापुढे प्रशस्त अंगण आहे आणि फुललेली हसरी बागही. त्या बागेतल्या गोड,  रसाळ फळांसारखाच प्रत्येकाचा संसार आहे.

रस्तेआहेत आणि ते स्वच्छ, चकचकीत आहेत. पादचार्यांसाठी खास अभयरस्ते आहेत. वाहनांसाठी अर्थातच वहातुकीचे वेगळे रस्ते. त्यामुळे रस्त्यातून चालणं आणि वहान चालवणंही आनंददायी आणि निश्चिंत आहे.

एकमजली बैठ्या घरांमुळे सूर्यही प्रसन्न आहे. त्याच्या आनंदप्रकाशी किरणांतून पसरणार्या प्रकाशाची कोणत्याही अडसरावीना आता मुक्त उधळण होऊ शकतेय. त्यामुळे या वातावरणात भरुन राहिलेल्या सौरशक्तीवरच सर्व वाहने चालतायत. त्यामुळे संपूर्ण निसर्गच प्रदूषण, धुराचा वास, आणि सहवास यापासून पूर्णपणे मुक्त आहे. शाळा आहेतच, त्याना प्रशस्त पटांगणेही आहेत. घरांसारख्या शाळाही नैसर्गिक संस्कारकेंद्रे आहेत. मुलं फुलांसारखी सुंदर आहेत. त्याना शाळा घरांइतक्याच प्रिय आहेत. . !

कौटुंबिक पार्श्वभूमीवर श्रमविभागणी आहे. नेमून दिलेली सर्व कामे प्रत्येकालाच आळीपाळीने करावी लागतात. तिथे स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी याऐवजी प्रत्येकाचा एक व्यक्ती म्हणूनच विचार होत असल्याने सर्वानाच सर्वप्रकारच्या कामांचं कौशल्य अंगी बाणवणं शक्य होतं. या जगात वृध्दांचं वार्धक्य तरुणांच्या निगराणीखाली कृतार्थ आहे. . !इथे मरणही आहेच, आणि ते  जगण्याइतकंच सुंदरही आहे. कारण ते भयमुक्त आहे. निसर्गनियमांनुसार योग्यवेळी येणारा हा मृत्यू अट्टाहासाने कांहीही करून जगण्याचा हव्यास नसल्याने कृतार्थही आहे. आणि म्हणूनच पुन्हा सळसळत्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी टाकल्या जाणार्या कातीसारखि तो सहजसुंदर आहे.

हे स्वप्नवत वाटेल सगळं, पण हे वास्तवात उतरणं अशक्य नसणारं स्वप्न आहे. मात्र सर्व स्तरांवर फोफावलेल्या हव्यासांची बांडगुऴं हाच यातला एकमेव अडसर आहे. . !त्या बांडगुळाचा नाश करायचा की फक्त जिवंत रहाण्यासाठी घुसमटत जगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता आलं,  तरच स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा पुसली जाईल. . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्यालासुद्धा आनंद देणारा.  उत्साह वर्धक असाच तो कार्यक्रम आहे असे मला वाटले.पण आपल्याकडे त्यापेक्षा विरुद्ध परिस्थिती आहे असे मला जाणवले.आत्ता या घडीला साठे च्या पुढचे.  पंच्याहत्तरी पर्यंतच्या लोकांनाहे म्हणणे पटेल.हे लोक तरुण असताना.  तरुणां सारखे वागायला मिळाले का त्यांना?सतत वयाने मोठ्यांचा मान राखायचा.  त्यांचे सांगणे ऐकायचे आणि त्याच प्रमाणे वागायचे.अश्या जबरदस्त पगड्याखाली.  रहावे लागल्या कारणाने.  सतत एक प्रकारचा दबाव त्यांच्यावर होता.त्यामुळे मनमुराद हसणे.  गप्पा मारणे.  सहकाऱ्यांबरोबर फिरणे अशा साध्या साध्या आनंदापासून ही मंडळी वंचित राहिली.घरचे काय म्हणतील?त्यांना आवडणार नाही.  त्यांनी एकदा नको म्हटले ना.  मग नको.अशा दबावाखाली त्यां चं तरुण पण संपलं .

विशेष करून महिलावर्ग या बाबतीत जास्तच दबला गेला .एखादी डिग्री मिळाली की त्यांचे पंख छाटले जायचे .संशोधन सुरू .मग इतरांच्या म्हणण्याला होकार देऊन.  माहेरचा मोकळा.  आनंदी स्वच्छंदी उंबरा ओलांडून.  टिपिकल वर्चस्वाचा दुसरा उंबरा ओलांडून. दुसऱ्या घरी जायचे. तिकडे गेल्यावर आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या.  स्वभाव बदलायचा.  पदरी पडले पवित्र झाले.  या नात्याने नवीन पण रटाळ आयुष्याला मन मारून सुरुवात करायची.खुर्चीत एखादी चे मत विचारले जायचे.  पण ते म्हणणेविचारात घेतले जाईल असे नाही .मग अशा सगळ्या वातावरणात तरुणपणीच.  मनाचे वृद्धत्व जाणवायला लागायचे.उडणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यात कोंड्यावर तो लवकर म्हातारा होणारच ना!मग किती का गोड-धोड.  चांगले चांगले खायला घाला.  मानसिक वृद्धत्व आले किती घालवणे अवघड.

कोणालाही त्या त्या वयामध्ये.  जे येते.  जे करायला आवडते.  रुचते.  ते थोड्या प्रमाणात का होईना.  पण करायला मिळाले पाहिजे.सचिन तेंडुलकरच्या हातातून पंधराव्या वर्षी बॅट काढून घेतली असती.  तर त्याचे खेळणे फुलले असते का?त्याने इतके उत्तुंग ध्येय गाठले असते का?लता मंगेशकर ना मधुर गळ्यातून गायची संधी न देता.  दोन वेळेच्या भाकऱ्या बडवायला लावल्या असत्या.  तर आपल्याला अविट गाणी ऐकायला मिळा लीअस ती का?

आवडीचे काम करायला मिळाल्यावर शरीर हे सुदृढ राहते.  मन प्रसन्न राहते.  काम करायला उत्साह येतो आणि आनंदी आनंद उपभोगायला मिळतो.अशी व्यक्ती स्वतःही आनंदी राहते आणि दुसऱ्यालाही आनंद वाटते.असे हे सरळ वागणे .   फार थोड्यांच्या वाट्याला येते .बहुतेकांच्या बाबतीमध्ये सुरवंटाचे फुलपाखरू होण्याऐवजी फुलपाखराचे सुरवंट होते .

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गरज आहे.  ती सुरवंटाचे फुलपाखरू होऊ द्यायची.फुलपाखराचे गुन्हा सुरवंट न होऊ देण्याची.बाल्यावस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत प्रत्येकाला या संक्रमण आम मधून जावेच लागते.गरज आहे ती सावरण्याची !अशा कठीण प्रसंगी आपले मनोबल ढळू न देण्याची .कुणीतरी येईल आपल्याला मदत करेल.  या आशेवर न राहण्याची. विं.दा. नीसांगितल्याप्रमाणे “माझ्या मना बन दगड”ही अवस्था अनुभवण्याची.प्रसंगी मन कणखर बनवले.  तरच त्या व संतुलित अवस्थेत मधून संतुलन मिळू शकतो.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares