☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समर्पण
पांडुरंगाची निर्व्याज भक्ती करता करता तुकाराम महाराजांच्या तनामनात विठु माऊली विषयी समर्पित भावना निर्माण झाली आहे. त्यासंबंधी काही अभंगांचे आपण येथे विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराजांना सर्व जग विष्णुमय वाटते आणि साधकांनाही ते हेच सांगतात.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म/
भेदाभेद भ्रम अमंगळ//
आईकाजी तुम्ही भक्त भागवत/
कराल ते हित सत्य करा//
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर/
वर्म सर्वेश्वर पूजनाचे//
तुका म्हणे एका देहाचे अवयव/
सुखदुःख जीव भोग पावे//
ते असे मानतात की, सर्व जग, त्यातील सजीव प्राणी आणि निर्जीव जड वस्तू हे सगळेच विष्णुमय आहे असे जाणावे. एखाद्या दगडाला शेंदूर फासल्याने त्याला देवत्व येते ना? हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे. भेद, अभेद, वाद
-विवाद म्हणजे भ्रम आहे. भागवत भक्त म्हणजेच भगवंताचे निस्सीम भक्त! तुम्ही हे ऐका आणि स्वहित करून घ्या असे संत तुकाराम कळकळीने सांगत आहेत. कारण ते स्वतः या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये, त्यातच सर्वेश्वराचे पूजन आहे. पुढे महाराज सांगत आहेत की, सर्व जीव हे एकाच देहाचे अवयव आहेत, त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगावी लागतात. त्यामुळे दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर पर्यायाने एका भगवंताचाच त्रास समजावा. भागवतात केलेला विश्वात्मकाचा उपदेश याहून वेगळा नाही. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराप्रती स्वतःला वाहून घेण्याची ही कृती आहे.
या अभंगात महाराज स्वतःची मनोवस्था अधिक स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात,
नींदी कोणी मारी/ वंदी कोणी पूजा करी//
मज हेही नाही तेही नाही/
वेगळा दोहीपासून//
देह भोग भोगे घडे/ जे जे जोडे ते ते बरे//
अवघे पावे नारायणी/ जनार्दनी तुकयाचे//
तुकाराम महाराजांची कोणी निंदानालस्ती करोत, किंवा कोणी त्यांना मारोत, (शब्दांचा मार)
कोणी त्यांना वंदोत नाही तर त्यांची पूजा करोत, त्यांना कशाचाच फरक पडत नाही. त्यांना त्याचे सुखही नाही किंवा दुःखही नाही. सुखाचे किंवा दुःखाचे सारे भोग दैववशात केवळ देहाला भोगावे लागतात. संत तुकारामांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे जे काही बरे वाईट भोग आहेत ते एका जनार्दनाकडे, नारायणाकडे जातात. नारायणापाशी तुकाराम महाराजांच्या समर्पणाची ही अवस्था आहे.
सकळ चिंतामणी शरीर/
जरी जाय अहंकार समूळ आशा//
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी/
निर्मळ स्फटिक जसा//
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/
येती तया पासी अवघे जन//
तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/
मोक्ष तेणे दर्शने//
मन शुद्ध तया काय करीसी माळा/
मंडित सकळा भूषणासी//
हरीच्या गुणे गर्जताती सदा/
आनंद तया मानसी//
तन मन धन दिले पुरुषोत्तमा/
आशा नाही कवणाची//
तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा/
काय महिमा वर्णू त्याची//
या अभंगात तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगत आहेत. ज्याचा सर्व अहंकार विनाश पावला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी ज्याच्यामध्ये जराही उरली नाही, तो स्फटिका समान निर्मळ आहे. त्याचे सर्व शरीर जणू चिंतामणी आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशीला जाण्याची त्याला आवश्यकता नाही. उलट सर्व तीर्थ अशा पुरुषा पाशी येतात. कारण सर्व तीर्थाना पावन करणारा तो स्वतःच एक तीर्थस्थान झाला आहे. त्याच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला जपमाळ ओढायची काही आवश्यकता नाही. तो स्वतः सर्व भूषण मंडित आहे. जो सतत हरीचे गुणगान करीत नामघोष करतो तो निरंतर आनंदातच असतो. ज्याने आपले तन, मन, धन पुरुषोत्तमाला अर्पण केले आहे, तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज हे स्वतः अशाच पुरुषांपैकी एक आहेत, म्हणून तर आपण त्यांना संत तुकाराम असे ओळखतो.
तुकाराम महाराजांना सर्वत्र एक पांडुरंग दिसत आहे. ते म्हणतात—-
दाता नारायण/ स्वयेभोगीता आपण//
आता काय उरले वाचे/ पुढे शब्द बोलायचे//
देखती जे डोळे/ रूप आपुलते खेळे//
तुका म्हणे नाद/ झाला अवघा गोविंद//
सर्व प्राण्यांना सर्वकाही देणारा दाता दुसरा तिसरा कोणी नसून नारायणाच आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच आहे. याचाच अर्थ असा की तुकाराम स्वतः नारायणमय झाले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा भोग ते म्हणजे नारायण घेत आहे. अशा परिस्थितीत मी मिळवले, मी भोगले असे म्हणायला जागाच उरत नाही. जिकडे पहावे तिकडे त्यांना नारायणाचेच रूप दिसते. (या ठिकाणी भक्त प्रल्हादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.)
नर आणि नारायण यामध्ये भेद असा राहिलेलाच नाही. जेवढा शुद्ध नाद आहे, तेवढा गोविंद झाला आहे.
म्हणून खेळ मांडीयेला ऐसा/
नाही कोणी दिशा वर्जीयली//
माझिया गोते हे वसले सकळ/
न देखी जे मूळ विटाळाचे//
करुनी ओळखी दिली एकसरे/
न देखो दुसरे विषमासी//
तुका म्हणे नाही काळापाशी गोवा/
स्थितीमति देवावाचुनिया//
वरील अभंगात तुकाराम पुन्हा एकदा स्वतःच्या स्थितीविषयी बोलतात. ते म्हणतात, ” मी असा खेळ आरंभला आहे की त्यामध्ये कोणतीही दिशा वगळली नाही. सर्व दिशा शुभ आहेत. पांडुरंग हाच माझे सर्व गणगोत आहे. त्याने सर्व जग व्यापले आहे, त्यामुळे विठ्ठलाचे मूळ जो भेदभाव तो माझ्या ठिकाणी उरलाच नाही. सर्वत्र पांडुरंग ओतप्रोत भरलेला आहे, अशी त्याने स्वतःच्या स्वरूपाची मला ओळख करून दिल्यामुळे मी त्याच्या स्वरूपा वाचून दुसरे काही पाहू शकत नाही. आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही की गुंतलेले नाही. मी कालातीत अशा देवाच्या स्थितीमध्येच माझ्या बुद्धीसह एक झालो आहे. “
तुकाराम महाराजांचा देहाभिमान संपूर्ण तया गळून पडला आहे, परब्रम्हाशी ते एकरूप झाले आहेत.
या संदर्भात आणखी काही अभंगांचा परामर्श आपण पुढील लेखात नक्की घेऊ.
☆ कंजूस… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
गावातील सर्वात कंजूस माणूस मेला… पण त्याच्या जुन्या लोखंडी पेटीत पैसे नव्हते, तर ४१७ अपूर्ण माफीनाम्यांची पत्रे होती. “
“गणपत काका गेले…! ” पहाटे पाच वाजताच ही बातमी संपूर्ण गावात पसरली. पण कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख नव्हते.
पारावर बसलेले ज्येष्ठ म्हणाले, “बरं झालं… देवाने उशिरा का होईना न्याय केला. “
कोणी उपहासाने म्हणाले, “आता त्याच्या पेटीतून लाखो रुपये निघतील… आयुष्यभर कुणाला एक रुपयाचीही मदत केली नाही. “
बायका कुजबुजत होत्या, “असा कंजूस माणूस आयुष्यात पाहिला नाही. “
“फाटकी बनियन शिवून घालायचा… पण कुणाला मदत करायची नाही. “
लहान मुलंही त्याला पाहून रस्ता बदलायची.
सगळं गाव त्याला एका नावानेच ओळखत होतं – ‘गणपत कंजूस. ‘
गणपत काकांची अंत्ययात्रा अंगणात तयार होती. पण त्यांना खांदा द्यायला चार माणसंही तयार नव्हती. शेवटी ग्रामपंचायतीने चार मजूर बोलावले.
इतक्यात त्यांचे जुने वकील दयानंदराव धावत आले. ते मोठ्याने म्हणाले, “अंत्ययात्रा पाच मिनिटे थांबवा. “
सगळे चकित झाले. “आता अजून काय बाकी आहे? “
वकिलांनी एक जुना लिफाफा काढला. “गणपत काकांची शेवटची इच्छा होती-
‘जोपर्यंत माझी लोखंडी पेटी संपूर्ण गावासमोर उघडली जात नाही, तोपर्यंत माझी अंत्ययात्रा काढू नका. ‘”
लोक हसू लागले. “मेला तरी पैसा सोडत नाही. “
“नक्की सोनं लपवलं असेल. “
“नोटांच्या गड्ड्या असणार. “
त्यांची खोली उघडली गेली. एका कोपऱ्यात जुनी लोखंडी पेटी होती. धुळीने पूर्ण माखलेली. वकिलांनी कुलूप उघडलं. सगळ्यांचा श्वास रोखला गेला पण… पेटीत ना सोनं होतं… ना चांदी… ना पैशांच्या गड्ड्या… फक्त जुने कागद. शेकडो कागद. प्रत्येक वेगळ्या लिफाफ्यात. प्रत्येकावर गावातील कुणाचं ना कुणाचं नाव. आणि लाल शाईने लिहिलेला एकच शब्द- “माफ करा… “
मोजणी झाली. एक… दोन… दहा… पन्नास… एकूण… ४१७ लिफाफे. संपूर्ण गाव शांत झालं.
“हे काय आहे? ” सरपंचांनी विचारलं.
वकील म्हणाले, “ही गणपत काकांची शेवटची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं होतं – ‘माझ्या चितेला अग्नी देण्याआधी यातील पहिली पाच पत्रं वाचून दाखवा. ‘”
पहिलं पत्र होतं- ‘भिमा लोहार’
भिमा पुढे आला. हसत म्हणाला, “पाहूया… आता काय लिहून ठेवलंय. “
वकील वाचू लागले – “भिमा, मला माफ कर. वीस वर्षांपूर्वी तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू माझ्याकडे पैसे मागायला आला होतास. मी सगळ्यांसमोर तुला रागावून हाकलून दिलं. पण त्याच रात्री तुझ्या दारात नाव न सांगता पन्नास हजार रुपये ठेवले होते. समोरून दिले असते तर तू घेतले नसतेस. म्हणून वाईट माणूस होणं स्वीकारलं… पण तुझ्या मुलीचं लग्न मोडू दिलं नाही. तू मला आयुष्यभर कंजूस समजलास… तीच माझी शिक्षा होती.
— गणपत. “
भिमाच्या हातातून पत्र खाली पडलं. तो रडत म्हणाला, “त्या रात्री खरंच पैसे दारात ठेवले होते… मी आजपर्यंत समजलो होतो… देवाने पाठवले. ” तो ढसाढसा रडू लागला.
दुसरं पत्र— ‘रुक्मिणी काकू’
त्या थरथरत पुढे आल्या. पत्रात लिहिलं होतं-
“रुक्मिणी काकू, तुमच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी तुम्ही माझ्याकडे आलात. मी तुम्हाला हाकलून दिलं. पण त्या रात्री शहरातील रुग्णालयात तुमचं संपूर्ण बिल मीच भरलं. तुम्ही माझे पैसे परत करण्यासाठी जमीन विकू नये म्हणून माझं नाव लपवलं. मला तुमचा मुलगा वाचावा इतकंच हवं होतं. माफ करा.
तिसरं पत्र होतं— ‘देशमुख गुरुजी’. गावातील निवृत्त शिक्षक पुढे आले.
“गुरुजी, तुम्हाला वाटायचं मी शिक्षणाचा विरोधक आहे. कारण शाळेसाठी वर्गणी मागितली तेव्हा मी एक रुपयाही दिला नव्हता. पण शाळेच्या वाचनालयासाठी शहरातील ट्रस्टने दिलेली सर्वात मोठी देणगी माझ्याच नावाने स्थापन केलेल्या ट्रस्टकडून होती. मला मुलांनी माझं नाव नाही… पुस्तकं लक्षात ठेवावीत असं वाटलं. माफ करा.
— गणपत. “
गुरुजींच्या हातातील काठी खाली पडली. ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, “मी आयुष्यभर मुलांना सांगत राहिलो… ‘गणपतसारखं कधी बनू नका. ‘ आज वाटतं… मलाच गणपतसारखं व्हायला हवं होतं. “
तेवढ्यात गर्दीतून आवाज आला— “जर तो इतका चांगला होता… तर आयुष्यभर सत्य का लपवलं? “
वकीलांनी पेटीच्या तळाशी असलेला जाड लिफाफा बाहेर काढला. त्यावर लिहिलं होतं— “हे शेवटीच वाचा… हीच माझी खरी शिक्षा आहे. “
पत्रात लिहिलं होतं- “जर हे पत्र वाचलं जात असेल… तर कदाचित पहिल्यांदाच गाव मला ऐकायला तयार झालं आहे. मी जन्मतः कंजूस नव्हतो… मला तसं व्हावं लागलं.
बावीस वर्षांपूर्वी माझा दहा वर्षांचा मुलगा ‘मोहन’ हृदयाच्या आजाराने त्रस्त होता. डॉक्टरांनी तीन लाख रुपये मागितले. मी संपूर्ण गावात हात जोडले. पण कुणीही मदत केली नाही. त्या रात्री माझा मुलगा माझ्या कुशीतच गेला.
त्या दिवसापासून मी ठरवलं – या गावात पैशाअभावी कोणाचंही मूल मरू देणार नाही. मी कमी खाल्लं… जुने कपडे घातले… सण साजरे केले नाहीत… कारण मला पैशांचा नव्हे, दुसऱ्यांच्या अश्रूंचा भय वाटत होतं.
मोहनने शेवटच्या श्वासात मला एकच गोष्ट सांगितली होती –
‘बाबा… कुणाची मदत कर… पण त्याला कधीही उपकाराची जाणीव होऊ देऊ नको. ‘
मी ते वचन आयुष्यभर पाळलं. म्हणून प्रत्येक मदतीबदल्यात मी माझी बदनामी स्वीकारली.
लोक मला कंजूस म्हणत राहिले… आणि मी शांत राहिलो.
कारण एखाद्याची अब्रू वाचवण्यापेक्षा मोठी कमाई दुसरी नाही. माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेवर फुले चढवू नका. त्या पैशातून एखाद्या गरजू मुलाची शाळेची फी भरा. माझा मोहन त्याच्या हसण्यात पुन्हा जिवंत होईल.
— गणपत. “
संपूर्ण गाव ढसाढसा रडू लागलं. सकाळी ज्यांच्या अर्थीला चार खांदे मिळत नव्हते… त्या गणपत काकांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण गाव खांदा द्यायला उभं राहिलं.
कोणी म्हणालं, “पहिला खांदा मी देणार. “
दुसरा म्हणाला, “नाही… आधी मी. “
शेवटी गावातील ज्येष्ठ म्हणाले, “आज गणपतला चार नव्हे… संपूर्ण गाव खांदा देईल. “
आणि खरंच… श्मशानापर्यंत प्रत्येकाने एकदा तरी त्या अर्थीला खांदा दिला.
तेराव्याच्या दिवशी ग्रामपंचायतीने चौकात एक नवी पेटी ठेवली. त्यावर लिहिलं होतं— “गणपत मदत पेटी. खाली एक छोटी ओळ- “ज्या दिवशी कुणाची मदत कराल… त्या दिवशी त्यावर तुमचं नाव लिहू नका. “
आजही म्हणतात… त्या पेटीत दर महिन्याला कुणीतरी गुपचुप पैसे टाकून जातं. कोण टाकतं, हे कुणालाच माहीत नाही.
कदाचित…
गणपत काकांची खरी संपत्ती त्यांचे पैसे नव्हते… तर त्यांचं चारित्र्य होतं. आणि चारित्र्याचं खरं वैशिष्ट्य असंच असतं-
माणूस निघून जातो… पण त्याची माणुसकी लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहते.
*माणुसकी हेच जीवनसत्य… *
**
लेखक : अज्ञात.
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज फिर मैंने जिंदगी की किताब खोली, देखा तो हर पन्ना तेरी रहमतों से भरा पड़ा था।
काल मी माझ्या एका हिंदी भाषी मैत्रिणीला Mrs Sharma ला फोन केला. आमच्या नोकरीच्या काळात आम्ही बरेच वर्ष म्हणजे जवळपास तीन वर्षे बरोबर होतो. कारण तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही कधीच एका ठिकाणी नव्हतो.
तो काळ जरा नाजूकच होता. कारगिल युद्धाचा काळ. आमचे नवरे चार पाच महिने घरी नव्हते. त्यामुळे त्या कठीण काळात एकमेकांना साथ, सहारा, दिलासा आम्ही देत असू. आमची मुल पण जवळपास एकाच वयाची होती. अर्थातच आमचा बॉन्ड मजबूत झाला. कठीण काळातील ती मैत्री आजही टिकून आहे. आता रिटायर्ड होऊनही पंधरा वर्षं व्हायला आलेत.
ती नेहमी म्हणायची,
अरे!! STARs सिर्फ आसमान में हीथोडी चमकतेहैं। हमारे हजबंड्स के कन्धे पर भी STARS चमकते हैं।
मी तिला विचारलं,
कैसे हो.??
तिने दिलेले उत्तर,
सब अच्छा चल रहा हैं।
करीबन करीबन हम सब ठीक हैं। मजेमें हैं।
Col. Sharma यांचा एक पाय युद्धात जखमी झाला होता. आणि तो नंतर कापावाच लागला होता.
Mrs Sharma म्हणजे माझ्यासाठी Power bank आहे. ऊर्जेचा स्त्रोत. तिच्या डिक्शनरीत हारणे, रडणे, निराश होणे, आपल्या नशिबाला कोसणे, दुसऱ्यांना ब्लेम करणे हे शब्द/ असे विचार नाहीतच बहुतेक. ती माझी मैत्रीण म्हणजे माझ्यासाठी अगदी लॉकर मध्ये जपून ठेवण्यासारखा अनमोल ठेवा आहे.
मी नेहमी देवाला या गोष्टी साठी धन्यवाद देते. कारण, काबिल दोस्तों का साथ मिलना भी तकदीर होती हैं। बहुत कम लोगों के हाथोंमें यह लकीर होती हैं।
माझ्या हातावर ती रेखा छान स्पष्ट, गडद आणि लांबलचक आहे. याचा मला अभिमान आणि समाधान दोन्ही आहे.
तिच्या काही गोष्टी माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. एखादया वेळी जेंव्हा कधी मी low phase मध्ये असते, तेंव्हा मी Mrs Sharma च्या गोष्टी आठवते. आणि लगेच माझे विचार बदलतात.
ती नेहमी म्हणायची,
अग!! माझ्या आईच्या पोटात जेंव्हा माझा अंकुर फुटला, तेंव्हा पासूनच माझ्या जिंकण्याची सुरवात झाली. तेंव्हाच माझ्या किती तरी करोड स्पर्धकांना हरवून मी बाजी मारली होती. आणि माझा जन्म झाला. मी winning attitude घेऊनच जन्माला आले आहे. मग हरायचा प्रश्नच येत नाही.
अग!! आयुष्य म्हंटल तर स्ट्रगल असणारच. कमी जास्त होणारच. That is Part of life.
हे तर प्रत्येकाच्या बाबतीतच सत्य आहे.
आज Mrs Sharma ने पुन्हा एकदा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा? याची आठवण करून दिली. किती तरी जून्या गोष्टी आठवल्या.
साधारण दिसणारी, Mrs Sharma branded कपडे घालत नसे. So called आधुनिक दिसणाऱ्या बायकांमध्ये तिच्या कडे कोणाचे लक्ष पण जाणार नाही, असा तिचा appearance होता.. पण तिचे विचार मात्र branded होते / आहेत.
ती नेहमी म्हणायची,
अग!! एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना आपण पर्याय कोणता निवडतो?? हे नेहमीच महत्वाचे असते.
जेंव्हा एका सैनिकाशी लग्न करायचा निर्णय मी घेतला, तो माझा विचार पुर्वक निर्णय होता, तेंव्हा ज्या agreement वर मी सही केली होती, त्यात भविष्यात होऊ शकणाऱ्या गोष्टी मला माहित होत्या. कोणते प्रसंग माझ्या आयुष्यात येऊ शकतात?? याची पूर्ण कल्पना होती मला.
बर!! त्यानंतर लग्नाच्या वेळेस सात फेरे घेतानाही ‘वचनांचा’ मी अभ्यास केला होता.
अग! देवाची किती मोठी कृपा आहे की Col Sharma आज माझ्या बरोबर आहेत. त्यावेळी तिने दाखविलेले साहस धैर्य अचंभित करणारे होते. कुठे ही रडणे नाही. घाबरणे नाही. तो पिरेड तिच्या करिता नक्कीच कठीण होता. भेटायला येणाऱ्या बायकांना तीच धीर देत होती. त्याही परिस्थितीत युनिटच्या इतर बायकांचे प्रश्न सोडवत होती.
Col. Sharma ना वाईट वाटत होत की या injury मुळे त्यांना पूर्ण युद्ध खेळता आल नाही.
तेंव्हा खरच कोणाला सॅल्युट मारावा?? Col Sharma की Mrs Sharma??
हा प्रश्न फक्त मलाच नाही, तर अनेक जणांना पडला असावा.
मला म्हणाली,
आता पर्यंत अनेक अनुभव आले ग.
म्हणतात ना,
“Experience is the list of mistakes you committed in past life and not to repeat them in future. “
तेच मी नेहमी लक्षात ठेवते.
आता तर मी बऱ्या पैकी शहाणी झाली आहे.
मला म्हणाली,
“Yesterday I was clever. I wanted to change the world. Today I am wise I am changing my self.
आपल्या नशिबात काही गोष्टी नसतातच हे खरय, पण किती तरी, अनेक गोष्टी आपल्या जवळ असतात. हे लक्षात घेतल तर खरच देवाचे किती आभार मानावे?? हेच कळत नाही. वेळोवेळी देवाने दिलेली साथ कळते. प्रत्येकालाच प्रारब्धाला सामोरे जायचेच असते.
मीच का?? मलाच का?? माझ्या नशीबातच का?? हे प्रश्न स्वतः ला किंवा देवाला सुध्दा विचारायचे नसतात.
अग!! मी देवाजवळ रोज एकच गोष्ट म्हणते,
” हे देवा!! माझी बुदधी नेहमी चांगली जागृत राहू दे. योग्य मार्गावर चालण्याची, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा दे. मी पडूच नये अस माझ म्हणण अजिबात नाही, पण पुन्हा उठायची शक्ती दे.
दिवसातून किती दा तरी मी देवाचे आभार मानते.
मला म्हणाली,
आज फिर मैने जिंदगी की किताब खोली, तो देखा हर पन्ना तेरी रहमतों से भरा पड़ा हैं।
बरोबर आहे.
म्हणतात ना.
It is not happy people who are thankful.
It is thankful people who are always happy.
दि. २६ जुलै.. हा कारगिलविजय दिवस असंतो. (We may not know them all but we owe them all.)
पांडुरंगापुढची लोट गर्दी, पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेली पूजा… रुक्मिणी बाई जरा नाराज झाल्या म्हणाल्या… तीन वाजता कोणी उठून आंघोळ घालता का? यांची झोप अर्धवट होते… लोक या माणसाला(देवाला) झोप घेऊ देत नाहीत… बर झोप नाही ते नाही… आंघोळ तरी काय.. दही घाल… दूध घाल पाणी घाल.. मग पंचाने पूस मग तो पोशाख तो टिळा ते चंदन आणि केवढी मोठी ती तुळशीची माळा… तयार करून उभं करतात झालं…! म्हणजे हे उभेच आहेत! मी तेव्हाच म्हणलं होतं देवाला अहो नको खाली जायला नको खाली जायला पण म्हणाले “अगं अगणित भक्त आहेत आपले खाली त्याना दर्शन नको द्यायला? … आणि खरं सांगू रुक्मिणी मी दर्शन देत नाही ग मी त्यांना पाहतो… “आता या वाक्यावर काय बोलावे या माणसाला… नवरे कधी बायकोच ऐकून घेतोयत…?
खाली आलो तर एका भक्तांना वीट टाकून उभं केलं त्याच्यावर यांना. त्याची मातृ-पितृसेवा संपेना मग तेवढ्याशा विटेवरी उभे. मी म्हणल ऊभरहायला चांगली जागा तरी बघा… ते म्हणाले, ” बाई तू माझ्या फंदात पडू नकोस तू पलीकडे जा आता या विटेला तू वीट समजतेस तो त्याच्या भक्तीचा पाया आहे आणि श्रद्धा आणि विश्वासाच्या सिमेंटनं ती वीट जमिनीवर घट्ट करून ठेवली मी इथून हलू शकत नाही… “. अहो पण 28 युग झाली आपण तिथेच आहात तुम्हाला असे एवढ्याशा विटेवर उभ राहिलेले पाहून मला मोकळ चाकळ हिंडता येते का? ” तर म्हणतात कसे… ” तुझा काय कमी थाट आहे का तुझी सुद्धा पूजा नित्यनियमानं चालली आहे भरगच्च दागिने अंगावर आहेत मला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी नाही स्वयंपाकाची कटकट नाही “मग मी फणकार्यान म्हणाले, ” तुम्हाला नाही कळायचं आम्हाला बायकांना वाटत असतं आपल्या हातून काहीतरी छान करावं आणि आपल्या नवऱ्याला बसून खाऊ घालावं… त्याने मग केलेल्या पदार्थाचं कौतुक करावं… माझ्या नशिबी मेले हे सुख नाहीच रोज परातभर गोड पदार्थाचा तो नैवेद्य कंटाळा येत नाही का हो तुम्हाला खाऊन… कधी मेल तुम्हाला माझ्या हातच खावस वाटतच नाही… “त्यावर म्हणतात कसे, “अगं ते भक्तीभावने एवढं करताय मग आपण नको का खायला? “… “अहो पण मग माझी बायको म्हणून काही भक्ती नाही का? … याना मुळी माझी किंमतच नाही” असं म्हणलं की हसतात फक्त! … मग काय बोलणार आठ दहा दिवस काही बोलायचं नाही..! एवढा मोठा प्रवास करून येणारा तो गरीब बिचारा वारकरी पाहिला की माझं मन द्रवतं मग म्हणतात कसे द्रवतं ना तुझं सुद्धा मन मग झालं तर आपल्या भक्तांसाठी एवढी तोशिश आपल्याला घ्यायलाच पाहिजे.
मला मेलीला एक काम करू लागले नाहीत कधी पण त्या जनीला दळू लागले.. कांडू लागले.. पाणी भरू लागले.. कोणाची तरी गुरं राखू लागले.. त्या सावत्याला येणं जमणार नाही म्हणून त्याच्या शेतावर गेले. दर्शन द्यायला..! हे सगळं जमतं या माणसाला पण बायकोला वेळ देणं अजिबात जमत नाही. म्हणून मी गेले एकदा रुसून आणि जाऊन चिंचबनात बसले… मग मात्र जरा यांचं धाब दणाणल… मग विनवणी केली त्यांनी मला म्हणाले… चल बाई चल शेजारी उभी रहा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ग… तुझ्या जीवावर तर मी एवढ्या भक्तांवर प्रेम करतो. भक्तांवरचं त्यांचं प्रेम पाहिलं ना.. लंगडी खुळी पांगळी अतिशय गरीब घरी डोक्यावर छप्पर सुद्धा पुरेसं नाही अशी माणसं खांद्यावर पताका घेऊन यांच्या ओढीने… पायात चप्पल सुद्धा नसते… एवढा रस्ता चालत येतात… ते माझ्या पतीला भेटायला…! आणि मला पटतं माझ्या आधी माझ्या नवऱ्यावर त्यांचा हक्क आहे…! मग म्हणते उभे राहा उभे राहा आणि द्या सगळ्यांना दर्शन…! आशीर्वाद द्या त्यांना… आता तुम्ही त्यांचे बाप झाला की मला आई होण भागच आहे. अर्थात तुमच्यामुळे हे भाग्य मला मिळते याची मला जाणीव आहे अहो रुसले रागवले म्हणून काय झालं आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारी जगातली इतकी अफाट माणसं आहेत हे पाहून कोणत्याही बाईला अभिमानच वाटतो… पण देवा मी पण तुमची भक्त असं समजून मला थोडा वेळ द्या एवढी बायको म्हणून विनंती आहे तुम्हाला…! ऐकेल ना अहो ऐका ना…!
☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – १☆ श्री संभाजी बबन गायके☆
☆
सातवी इयत्तेत असतानाच त्याने मनात पक्के ठरवले… फौजेतच जायचं. त्यासाठी शारीरिक क्षमता उच्च दर्जाच्या लागतात, हे समजल्यावर तर रोज व्यायामाचा धडाका सुरु केला! गावातले अनेक तरुण फौजेत होतेच. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायचे होते.
१९९९ मध्ये भारत-पाक कारगिल युद्ध झाले आणि त्यानंतर भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात सैन्यभरती सुरु झाली. इथवर त्याच्या वयाची सोळा वर्षे पूर्ण झाली होती. घरून वडिलांचे प्रोत्साहन होतेच. वडील तो भरतीसाठी निघाला की त्याच्या हातावर दोन हजार रुपये ठेवीत. आणि हरियाणाच्या बाहेरच्या राज्यात भरती असली की पाच हजार. पण ते वयच काहीसे अल्लड होते. बंगळूरु येथे होणार असलेल्या भरतीसाठी गेलेला असताना हा पठ्ठ्या चक्क सिनेमागृहात जाऊन बसला आणि एकाच चित्रपटाचे सलग तीन खेळ पाहून आला… तोवर इकडे भरतीसाठी त्याचे मित्र गेटच्या आत दाखल झालेले होते… याला काही प्रवेश मिळाला नाही! पण या लष्करी केंद्रावर त्याने PARA SF चे जवान पाहिले… त्यांचा रुबाब पाहिला आणि मग बस्स… आयुष्यात असाच गणवेश पाहिजे… असा प्रण केला.
पुढच्याच महिन्यात अजयकुमार भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले! प्रशिक्षणादरम्यान एक पाय मोडला… बरं होण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि प्रशिक्षण पूर्ण केलेच. आणि काहीच कालावधीत त्यांनी त्यांचे PARA COMMANDO बनण्याचे स्वप्न पूर्ण केले! ही फार मोठी झेप होती!
अजयकुमार यांचा स्वभावच जणू free style. संथ आयुष्य त्यांना आवडतच नसे. सुदैवाने त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये नेमणूक मिळाली आणि एका बहादूर सैनिकाची कारकीर्द सुरु झाली! बर्फाळ प्रदेशात प्रचंड आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अजयकुमार अतिरेक्यांशी लढण्यासाठी सज्ज झाले होते.
सैनिकी दल कोणत्याही मोहिमेवर निघताना त्या दलाचा वाटाड्या ही मोठी जबाबदारी असते. अजयकुमार आणि महाराष्ट्राचे प्रवीण पाटील हे कमांडो स्काउटच्या कामासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत!
खांद्यावर एम. एम. जी. , अंगावर पस्तीस किलो युद्ध साहित्य घेऊन मैलोनमैल चालण्याची सवय करून घ्यावी लागली!
दहा अतिरेकी, त्यांचे पाच कमांडर, असे एकूण पंधरा जण होते. त्यांच्या मागावर जाण्याचे आदेश मिळाले. या पहिल्याच मोहिमेत दोन अतिरेक्यांना टिपण्याची संधी मिळाली! काही वर्षांत सात मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या… एकूण तीस-पस्तीस अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात सहभागी होता आले! दोन दिवसाची मोहीम असताना त्याच ठिकाणी नाऊ दिवस थांबावे लागले. जवळचे अन्न संपल्यावर झाडाची पाने, वनस्पती खाऊन दिवस काढले! आणि तीन अतिरेकी टिपले!
पुढे पुढे तर परिस्थिती अशी होती की, ‘ऑपरेशन’ मिला मतलब भगवान मिल गया! म्हणजे सातत्याने अतिरेकी विरोधी कारवाया आपल्याला करायला मिळाव्यात, देशाचे शत्रू आपल्या हातून मारले जावेत.. अशी सैनिकांची आंतरीक इच्छा असे!
हवालदार अजयकुमार सिंग यांची ही सैनिकी वाटचाल सुरु होती. जवळजवळ सात-आठ वेळा ते मृत्यूला हुलकावणी देऊन परत आले होते. आणि एके दिवशी….
देखण्या, तरण्याबांड मुलाचा नडगीखालून तुटलेला पाय पाहून ती माऊली जागेवरच मूर्च्छा येऊन कोसळली! बापाची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच देऊन झाली होती… त्यामुळे आज तो शांत होता आणि सुनेकडे पहात होता. सारं घर सुन्न होऊन स्तब्ध होऊन बसलं होतं. प्रत्येकाच्या मनातला प्रश्न निराळा होता….!
खरं तर आपला लेक ज्या नोकरीत आहे, त्या नोकरीत हे असं काही घडणं साहजिकच होतं, हे आई-वडील, पत्नीला ठाऊक होतंच. त्यांच्या गावात, आसपासच्या परिसरात, नात्यांत असे अनेक तरुण त्यांनी पाहिले होतेच… आणि त्यांच्या गावात दोन पुतळेही उभारलेले होते… युद्धात कामी आलेल्या सैनिकांचे!
“बेटा, तू जिंदा लौट आया… यही मेरे लिये बहुत है! इस बुढे बाप में इतनी तो ताकद है की तुम्हें बिठा के खिला सकुं… जब तक मेरी जान में जान होगी तब तक! ” म्हाताऱ्याने बोलता बोलता त्याचा इरादा आणि मर्यादा सांगून टाकल्या आणि दुसरीकडे पहात डोळे पुसून घेतले!
हे शब्द ऐकताच मरणालाही न भिणारा तो बहादूर तरुण मनातून थरथरला… आणि दुसऱ्याच क्षणी पेटून उठला! परावलंबित्व आणि तेही म्हाताऱ्या आई-वडिलांवर? एक पाय नसला म्हणून काय झालं….. दुसरा पाय, दोन हात आणि एक काळीज तर आहे शाबूत!
आणि हा काही त्याला आताच यावेळी सुचलेला विचार नव्हता…. ज्यावेळी पाय तुटून पडलेला पाहिला… त्याचवेळी जीव बचावल्याचे समाधान होतेच… म्हणजे आणखी काही शत्रू यमसदनी पाठवण्याची संधी! आणि उर्वरीत शरीर आणि मुख्य म्हणजे मेंदू शाबूत राहिला याचेच कौतुक जास्त होते त्याच्या मनात!
बारा विशेष सैनिकांची एक तुकडी शत्रूसाठी अगदी सीमेनजीक सापळा रचून बसली होती सात-आठ दिवस. पण हाती काही लागले नाही… शिकारीला जाऊन काहीच न मिळणं ही किती निराशाजनक गोष्ट असते.. हे कसलेल्या शिकाऱ्यांनाच समजू शकते.
मग तळावर परतण्याचा आदेश प्राप्त झाला. तळपायांना आलेले मोठमोठे फोड, सुजलेली बोटं, भिजलेली शरीरं घेऊन हे शूर माघारी फिरले जड पायांनी. आठ दिवसांनी पूर्ण ताटभर अन्न मिळणार होतं. पहिला घास तोंडात घातला आणि खबर आली…. शिकार टप्प्यात आलेली आहे… मारली पाहिजे!
आता हे बारा जण तर तिथून सुट्टी मिळून शांत क्षेत्रात आरामासाठी जायचे होते… पण ते दुसऱ्या दिवशी. म्हणजे नियमानुसार आज ते मोहिमेवर जाऊच शकत होते. मोठ्या साहेबांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला… पण त्यांना मनातून ठाऊक होतं…. ही पोरं आता काही थांबणार नव्हती! ‘ऑपरेशन मिल गया… समझो भगवान मिल गया’ अशी यांची धारणा असते! आपण किती अतिरेकी शोधून मारले या संख्येचा सैनिकांना मोठा अभिमान असतो!
“चलो, फटाफट! ” म्हणत अगदी काहीच मिनिटांत दल सज्ज झाले! सोबत घ्यायचे अन्न वजनाने हलके आणि शस्त्रं जड निवडण्यात आली. दोन दिवसांची पायपीट करायची होती. पाकिस्तानी सीमेच्या अगदी नाकाजवळ जाऊन कारवाई करायची होती. या आधीही यांनी अनेक शिकारी केल्या होत्या, आणि तिथल्या कार्यकालात हा स्कोअर आणखी वाढवूनच सुट्टीवर जाण्याचा सर्वांचा निश्चय होता.
सीमेवर काही ठिकाणी तिथल्या भौगोलिक रचनेनुसार भारत-पाक सीमाचौक्यांतले अंतर काही ठिकाणी खूपच जास्त तर काही ठिकाणी खूपच कमी आहे. त्यामुळे काही सैन्यचौक्या आणि त्यांतील माणसं उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. त्यांचे बोलणेही ऐकू येते! त्यामुळे इथे डोळ्यांत अधिक तेल घालावे लागते. भारताच्या चौक्यांत किती माणसे आहेत, ते किती जागरूक आहेत, याचा अंदाज पाकिस्तान सैन्य नेहमीच घेत असते.
पाकिस्तानला भारताच्या हद्दीत अतिरेकी घुसवायचे होते तिथून. कारण त्यांना वाटत होते की, त्यांच्या समोर असलेली चौकी फारशी जागरूक नाही! काही ठिकाणी तर चक्क बनावट चौकी असते… म्हणजे केवळ सांगाडा असतो… तिथे कोणीही नसते… आणि हे दोन्ही बाजूंचे सैनिक करीत असतात! म्हणून ते रात्रीच्या काळोखात सलग तीन दिवस अगदी जवळ येऊन त्या चौकीवर दगड मारून पहात होते… अंदाज घेत होते… आणि आपण काही कारवाई करण्याच्या आत त्यांच्या सीमेत पळून जात होते. ते तीनदा आले म्हणजे पुन्हा एकदा कधीतरी येतीलच, अशी आपल्या अधिकाऱ्यांची खात्री होती!
आपले सैन्यपथक रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी सीमेच्या अगदी हाकेच्या अंतरावर जाऊन लपून बसले. दिवसा अजिबात हालचाली करता येत नाहीत. चिखल, पाऊस, थंडी.. एकाजागी शांत बसून राहायचे, आणि रात्र पडली की शत्रूच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे. खाद्यपदार्थ शिजवायचे नाहीत… कारण वास जाईल त्यांना. मग कच्ची मॅगी चावून खायची… सोबतीला काजू, बदाम असले तर उत्तमच.. अन्यथा खाणे हा उपक्रम अगदीच अनिवार्य असतो म्हणून करायचा… खरं ध्येय एकच… शत्रूच्या नरडीचा घोट घेणे!
शत्रूला इथून यायचे असेल तर एकच सोयीची वाट होती. एका उथळ ओढ्यातून येणारी. त्यांच्या उजव्या बाजूला उंच डोंगर होता आणि डाव्या बाजूला खोल दरी. आपले सैनिक आपल्या सैन्यचौकीच्या खालच्या बाजूला जाऊन बसलेले होते. एका तुकडीचे तीन गट केले गेले. अतिरेकी आलेच तर त्यांना पाकिस्तानी बाजूला असलेल्या सगळ्यात शेवटच्या तुकडीने पुढे जाऊ द्यायचे. मधल्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला चढवायचा आणि त्यातून ते मागे फिरले तर मागची तुकडी आहेच आणि पुढे निसटून गेले तर पुढेही आपली माणसं सज्ज बसलेली असतीलच!
सीमेवर दोन्ही सैन्यांनी भूसुरुंग पेरून ठेवलेले असतातच. पण ज्या अर्थी ते लोक आपल्या चौकीपर्यंत येत होते म्हणजे त्या रस्त्यावर भूसुरुंग नसलेली जागा त्यांनी शोधून ठेवल्या असाव्यात. आता त्याच रस्त्यावर सुरुंग पेरून ठेवणे गरजेचे होते. पण खोदून भूसुरुंग लावणे धोक्याचे होते. त्यासाठी लांब केबल असलेला आणि लांबून कार्यान्वित करण्याजोगा सुरुंग लावण्याची योजना झाली. हे सुरुंग अंधार पडल्यावर लावायचे… आणि सकाळी लवकर काढून घेऊन यायचे असे ठरले. कारण दिवसा त्याचा काही उपयोग नव्हता. शत्रू आला तर डोळ्यांनी दिसणारच होता!
हे काम सतत सहा दिवस झाले. गेल्या दिवसांत सलग तीन रात्री येऊन गेलेला शत्रू या सहा दिवसांत एकदाही आला नाही! हे वाट पाहणे किती जीवघेणे असेल, याची कल्पना करता येणार नाही!
अजय सिंग यांच्याकडे सुरुंग लावण्याचे काम सोपवले गेले होते… कारण या कामात ते अगदी कुशल झालेले होते. इतक्या वर्षांचा अनुभव पाठीशी होता. पण यादिवशी काही वेगळेच घडत होते. सुरुंग लावायला निघालेल्या अजयकुमार यांना त्यांच्या साहेबांनी दोन वेळा थांबवले होते… पहिल्या वेळी “अजून अंधार व्हायचा आहे! ” म्हणून दुसऱ्या वेळी “काहीतरी खाऊन जा! ” असं सांगत.
शेवटी त्या रात्री अजय सिंग पुढे निघाले. सोबत सहकारी होताच. सुरुंग लावायच्या जागेजवळ पोहोचले तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जोरदार लाथ मारून दूर ढकलून दिले. अजय सिंग यांचा पाय एका वायरवर पडणारच होता तेवढ्यात सहकाऱ्याने पाहिले. त्या वायरचे दुसरे टोक पालापाचोळ्यात लपवून नेत एका झाडाच्या फांदीवर एका मिठाईच्या डब्यात पोहोचवले गेले होते. पाकिस्तानात बनवलेल्या गुलाबजामूनचा डबा होता. त्यात एक किलो स्फोटके भरलेली होती! दोघांनी मिळून ती स्फोटके निकामी केली.
आता अजय सिंग क्लेमोर नावाचा सुरुंग लावायला सज्ज झाले. हा सुरुंग शत्रूच्या बाजूला त्यातून उडालेली स्फोटके जातील अशा रचनेचा असतो, आणि त्याला दूर अंतरावरून कार्यान्वित करता येते. अजय सिंग यांनी याही वेळी अचूक क्लेमोर लावला आणि ते माघारी आले.
ती रात्र काहीही न घडता उलटून गेली. आता मात्र खूप कंटाळा आला होता सर्वांना! आज शनिवार. मागे झालेली चकमक शनिवारीच झाली होती. म्हणजे बजरंग बलींच्या आशीर्वादाने आज निश्चित contact होगा! अशी सर्वांचीच खात्री होती.
आजचीच रात्र इथे थांबायचे ठरले. नाहीतर उद्यापासून मोहिम थांबवण्याचे आदेश प्राप्त झालेले होते. सायंकाळचा सूर्य बुडाला आणि इकडे सर्वांनी मोहिमेवर निघायची पुरती तयारी केली. याजागी पुन्हा यायचे नाही, त्यामुळे मागे कोणत्याही खुणा राहता कामा नयेत, याची व्यवस्था केली.
अजय सिंग क्लेमोर लावण्याच्या ठिकाणाकडे दबकत निघाले. अजय सिंग यांना आज स्फोटक लावण्याची जागा काहीशी निराळी भासली. त्यांनी लावलेला डेटोनेटर तिथून हलवला गेल्याचा संशय आला. कदाचित सहकारी सैनिकाने चुकून तसे केले असावे असे क्षणभर त्यांना वाटले.
अजय सिंग गुडघ्यात वाकून खाली बसलेले होते. त्यांच्या शेजारी असलेल्या एका झाडाचे जमिनीवर आलेले एक जाडसर मूळ अगदी जवळच होते… आणि एक जोरदार स्फोट झाला…!
अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मुळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे….! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार!
पश्चिम सहारा डेझर्टमध्ये अलिकडे एक उल्का सापडली. ती अबुधाबीच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. उल्केचं, ‘नॉर्थ वेस्ट आफ्रिका12691/NWA12691 असं नामकरण करण्यात आलं. परीक्षणांती, हा चंद्राचा तुकडा आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. चंदामामाने ही आपल्याला भेट पाठवली.
या उल्केचे वजन साडे तेरा किलो आहे. अनेक खनिजं तिच्यात आहेत. त्यामुळे ती रंगीबेरंगी दिसते. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एखादा धूमकेतू किंवा एखादी उल्का चंद्रावर आदळून हा टवका निघाला असावा. मुळात तो खूप मोठ्या आकाराचा असावा. कित्येक वर्षे तो अवकाशात फिरत असावा. पृथ्वीकडे तो खेचला जाऊन, तो सहारा वाळवंटातही हजारो वर्षे पडून राहिला असावा. कोरडेपणामुळे तो सुस्थितीत राहिला असावा. वाळवंटाच्या एकसुरी रंगाच्या पार्श्वभूमीवर हा रंगीबेरंगी तुकडा उठून दिसला व सापडला.
चंद्रावरून तिथल्या दगड-मातीचे नमुने आणायला मानवानं किती प्रयत्न केले. किती पैसा खर्च केला…
…. पण ही उल्का म्हणजे चंदामामाने आपल्याला धाडलेली अनोखी भेट आहे.
☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्यांची गोष्ट नाही. ती एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात, पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात.
पती-पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते. त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असेही दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की, “हे कधीच बदलणार नाहीत. ” तर पतीच्या मनात खंत असते की, “ही मला कधीच समजून घेत नाही. ”
पण गंमत बघा…
तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते. आणि तोच पती रागात असला तरी पत्नी जेवली नाही, हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो.
यालाच विवाह म्हणतात.
मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई-वडील स्वतःला मुलांच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडांत पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपापल्या आयुष्यात रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं.
आणि मग फक्त दोघेच उरतात.
एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे, एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. “इतकं बोलू नकोस, ” म्हणून ज्याला रागावलं होतं, तो आवाज कायमचा शांत झाला तर घराच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात.
एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेकजण येतात. पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, “जेवलास/जेवलीस का? ” असे विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे — हे सगळं परत आणता येत नाही.
म्हणून लक्षात ठेवा…
सर्वोत्तम जोडपे ते नसते, जे कधीच भांडत नाही.
सर्वोत्तम जोडपे ते असते, जे भांडणानंतरही एकमेकांची साथ सोडत नाही.
वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो.
समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो.
आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं.
खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड — या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो.
आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा. कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूंहून अधिक पवित्र असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा…
आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही. पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळणे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈