संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “आयुष्याची छायाचित्रे..“ ☆ संध्या बेडेकर ☆
न्युटन ने अगर गिरे हुए सेब की जगह गिरे हुए लोग देखे होते तो *gravity *की जगह *Humanity* की पढाई हो रही होती.
श्रावण महिना म्हणजे विशेष महिना. श्रावण सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी, असे अनेक सणवार आणि १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. त्यानंतर लगेच नवरात्र, दसरा, दिवाळी
महिने केंव्हा सुरू होतात ? आणि केंव्हा संपतात, कळतच नाही. नवीन लग्न झालेल्यांच्या घरी अजून एक भर म्हणजे मंगळागौर पूजन. एकंदरीत उत्साही वातावरण.
आमच्या भजन मंडळीला अनेक ठिकाणी भजनासाठी आमंत्रण असते.
दरवर्षी आम्ही दोनदा तरी भजन आनंदवन आणि आसरा या वृद्धाश्रमात करतोच.
तेथील लोकांना पण आता आमची सवय झाली आहे.
तेथे गेल्यावर मात्र आयुष्याची अनेक छायाचित्रे प्रकर्षाने जाणवतात. रंगीन असं एकही चित्र दिसत नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं ज्यांना आयुष्यात लहान सहान कारणांवरून तक्रार असते ना त्यांनी मधून मधून वृद्धाश्रमाला भेट द्यावी. अशा सर्वांचे डोळे उघडतील आणि डोकं ठिकाणावर येईल.
बरे असो,
वृद्धाश्रमाचे नाव जरी आनंदवन असले तरी आनंदाचा अभाव स्पष्ट जाणवतो. प्रत्येक चेहर्यावर नकळत नजर थांबते, चेहऱ्यावरील भाव वाचायचा मी प्रयत्न करते. त्यांच्या डोळ्यातील स्तब्ध भाव त्यांच्या दुःखाची, पण स्पष्ट न दिसणारी अनेक कारणं मनात धुमाकूळ घालतात.
येथे स्वइच्छेने कोणी येत असेल का ?
या लोकांचे कोणी नातेवाईक नाहीत का ? यांची मुल कुठे आहेत ? यांनी कोणती नोकरी केली असेल ? यांचे येथे येण्याआधीच आयुष्य कसे असेल ? यांना कोणी भेटायला येत असेल का ? घरच्यांनी पण नाइलाजाने यांना इथे ठेवले असेल का ?
त्यांचा पण आयुष्याचा काही काळ मजेत गेला असेलच ना. खटृटी मीठी यादें असतीलच ना. त्यावेळी आयुष्य नावाच्या पुस्तकाचे पूढचे पान त्यावर काही तरी भारी लिहिलं असेल या आशेने / विचाराने पलटवत असतीलच ते. आता ते पुस्तक बंदच करून ठेवलं असेल का त्यांनी ?
एका खोलीत चार अनोळखी माणसं एकत्र राहतात. सर्व जेष्ठ, एकटे, मनाने खचलेले,
एकमेकांना बघून यांच्या दुखात भरच पडत असणार. कदाचित समदुःखी असल्याने आपापल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करणं जमत असेल का त्यांना ?
शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत. काही तर अगदी फाइव स्टार आहेत. तेथे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बिचारा भाव दिसत नाही. पण येथे मात्र त्यांना बघून जीव कासावीस होतो.
प्रत्येक वर्षी दोन चार नवीन चेहरे दिसतात, तर जूने चेहरे गायब असतात. ते कुठे गेले ? आपल्या घरी गेले का ? असा विचार मनात येतो पण विचारायची हिम्मत होत नाही.
आज कार्यक्रम चालू असताना एक गृहस्थ उमाताईंजवळ आले आणि म्हणाले,
“तुमची काही हरकत नसेल तर त्या तिथे बसलेल्या ताई आहेत ना, त्या छान गाणं म्हणतात. त्यांना एक भजन म्हणू देत का ? “
उमाताईंनी लगेच हो म्हंटल आणि लगेच पेटीची साथ दिली. थोड्या वेळ का होईना त्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंदी भाव बघून आम्हाला बरं वाटलं
आज भजन झाल्यावर, संस्थेचे संस्थापक बरोबर चहा घेत असताना त्यांनी आपले अनुभव सांगितले. सध्या सामाजिक परिस्थिती कशी खालावली आहे त्याबद्दल ते बोलत होते. एकेक *खरी गोष्ट * ऐकून जीव खालीवर होत होता.
सध्या लोकांची वैचारिक समीकरण चूकत आहेत. संवेदना जणू मेल्या आहेत. लोक माणूस घाणे झाले आहेत. बाकीचे जाऊ दे स्वतः चे आई वडील पण नकोसे झाले आहेत.
सामाजिक परिस्थिती भयावह आहे.
अस प्रत्येक घरी आहे, असं म्हणता येणार नाही. पण प्रमाण वाढत चाललंय. सामाजिक आरोग्य ढासाळलय. हा रोग तीव्र गतीने वाढतोय. कॅंसर सारख्या रोगांवर रामबाण औषध शोधणं सुरू आहे. पण या रोगांवर औषध काय ?
म्हणूनच की काय,
काल आसाम सरकार ने या दिशेने एक पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सुट्टी जाहीर केली आहे.
ती कशाला ?
तर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या आईवडिलांबरोबर ही सुट्टी घालवावी यासाठी.
म्हणजे आता परिस्थिती ही आहे की हे सांगावं लागतंय. कुठून तरी सुरुवात करणं पण गरजेचे आहे.
संस्थापक जे सांगत होते,
त्यात नटसम्राट चे उदाहरण होते. तर मुलांनी वृद्धाश्रमात आईला किंवा वडिलांना आणून सोडलेली अनेक व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यांची तब्येत खराब आहे हे सांगायला फोन केला, तर तो सुद्धा उचलत नाहीत. आपण कोणालाही नकोसे आहोत ही भावना च माणसाला अर्ध अधिक संपवते. हे असे लोक जीवन जगत नाही तर दिवस काढतायेत. श्वास चालू असेपर्यंत जगणार आहेत नाईलाजाने.
मी सहज त्यांना मला तेथे ओळखीचे वाटणाऱ्या एका गृहस्थांबददल विचारले तर ते म्हणाले,
अहो!! ते सहकार नगर मध्ये राहणारे श्री देशमुख आहेत. बायको मागच्या वर्षी गेली. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. एका मोठया कंपनीत वैज्ञानिक आहे.
Gravitational force संबंधित काही तरी research करतोय म्हणे.
आई गेली तेंव्हा किंवा त्यानंतरही *त्याला* भारतात येणे जमले नाही.
मोठा माणूस तो. म्हणून वेळ मिळाला नाही.
संस्थापकांचा राग लक्षात आला.
देशमुख येथे रहात नाही पण आठवड्यातून दोन तीन दा येतात. छान इंग्रजी बोलतात. खूप पुस्तकं वाचतात. सर्वांशी गप्पा मारतात, सर्वांना बरोबर घेऊन बाग काम करतात. त्यांच्या येण्याने येथील वातावरण थोडं बदललंय.
तेवढ्यात श्री देशमुख तेथे आले. आमच्या बरोबर गप्पा मारत होते.
चेहऱ्यावर, बोलण्यात आत्मविश्वास होता.
जे झालं ते झालं. त्यावर विचार करत बसण्यापेक्षा पूढे काय करायचे ? हे बघावे. या मताचे असावे.
असे त्यांच्या बोलण्यावरून वाटल. श्री देशमुख म्हणाले,
मी पण त्यांच्यातलाच एक आहे. त्यांचा एकटेपणा, दुःख मी समजू शकतो. मी येथे रहात नाही पण मधून मधून येतो.
स्वतः ला किती ही समजवा, किती ही बहादुर बनायचा प्रयत्न करा, शेवटी कुठे तरी हृदयात दबलेले दुःख, ती जखम आपल डोकं वर काढतेच ना.
सहजच देशमुख साहेब बोलून गेले.
माझा मुलगा अमेरिकेत वैज्ञानिक आहे. Gravitational force च्या संदर्भात Reaserch करतोय.
थोडं हसून (?) म्हणाले,
ज्यावेळी न्युटनने सफरचंद खाली पडताना बघीतले आणि gravity चां शोध लावला. त्यावेळी जर त्याने माणसाला खाली पडताना बघीतल असतं तर बर झालं असतं. आज लोकांनी gravity च्या ऐवजी Humanity चां अभ्यास केला असता.
नाही का ?
सर्व स्तब्ध होते. जग पूढे चाललंय, पण आपण ? प्रत्येकाच्या चेहर्यावर अनेक प्रश्न होते.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




















