मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 2 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 2 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’)  इथून पुढे —-

– अर्थात हा निर्धार तिचा या स्पर्धेआधीपासून होताच. कारण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिनं जो व्हिडीओ तयार केला होता तोही मोठा रंजक आहे. त्यात ती असं स्पष्ट म्हणते की, “ स्मार्टफोन आणि आपण ही एक लव्ह- हेट प्रकारचीच रिलेशनशिप आहे. फोन हातात नसेल तर जगणं सुनं सुनं वाटतं. मी तर सगळी कामं फोनमध्येच नोंदवते. रात्रंदिवस सोशल मीडियात कनेक्ट असते. मोबाइल गेम खेळण्याचीही चटक लागलेली आहे. घरात कुणी बोलतंय, गप्पा मारतंय, जेवतंय, त्यावेळीही हातात फोन घेऊन तो कधी एकदा स्क्रोल करायला लागायचा असं व्हायचं. मी सतत फोनवरच.” 

“ मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, मी माझा वेळ वाया घालवते आहे. मी स्क्रोल करण्यापलीकडे काहीही करत नाही. फक्त वेळ वाया घालवते आहे. ‘डूइंग नथिंग’ या स्टेजला मी कधी पोहोचले मला कळलंही नाही. रोज मी झोपतानाही फोन उशाशीच घेऊन झोपायचे. रात्री- बेरात्री जाग आली तरी मी लगेच हातात फोन घेऊन स्क्रोल करायला लागत असे. आणि एवढं करून मला कशासाठीच वेळ नव्हता. वेळच मिळत नाही ही तक्रार मी सतत करत होते. त्यामुळे मला वाटतं की या स्मार्टफोनशिवाय जगून पाहावं. म्हणून मी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं.” 

-हा तिचा व्हिडिओ निवडला गेला. तिनं आव्हानही स्वीकारलं; पण पुढे काय? सोपं आहे का सेलफोनशिवाय राहणं? कसं जमलं तिला?

एलिना सांगते, “ मुळात मी सेलफोनशिवाय जगायचं म्हणतेय याचा धक्का माझ्या मित्र-मैत्रिणींनाच जास्त बसला. ते म्हणाले, ‘अशक्य आहे तू जे म्हणतेस ते, शक्यच नाही याकाळात सेलफोनशिवाय जगता येणं.’  पण मी ठाम होते. मलाही एकदम रिकामपण आलं. खूप वेळ एकदम अंगावर आला. मला साधं कुणाशी फोनवर बोलायला वेळ नव्हता; पण आता हातात फोन नाही, त्यावरचा स्क्रोलिंग नाही म्हटल्यावर मला वेळच वेळ होता. अगदी रिकामा वेळ. अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्यावाचून काही  पर्यायच उरला नाही. फोटो घेण्यापेक्षा मी जिथं आहे ते पाहू, अनुभवू लागले. मुख्य म्हणजे माझी भरपूर झोप व्हायला लागली. या काळात मी 30 हून जास्त पुस्तकं वाचली. १२५  टक्के जास्त प्रॉडक्टिव्ह झाले. अधिक चांगलं काम करू लागले. मला वेळच नाही, ही तक्रारच माझ्या आयुष्यातून संपली. मुख्य म्हणजे सतत सोशल मीडिया स्क्रोल करकरून मी जास्त उदास आणि डिप्रेस होत असे. ते सारं बंद झालं. माझा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, ती उत्तमच आहे. मात्र मी तिचा गैरवापर किंवा अतिवापर करत असे. आणि त्याबदल्यात मला काय मिळालं?

तर माझं स्वातंत्र्य गेलं. संपलंच. माझा खासगीपणा संपला. मला काही व्यक्तिगत आयुष्यच उरलं नाही. माझी विचार करण्याची क्षमताही बधिर झाली. मी फक्त तासनतास स्क्रोल करत असे. दिवसाला किमान तीन-चार तास मी फोनवर असायची. आणि त्यावेळेत मी केलं काय ?

तर काही नाही. हे किती धोकादायक आहे—–हे धोके उमगले आणि मी ठरवलं हे सेलफोन फास्टिंग करायचंच. नो मोअर स्क्रोलिंग. आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. आता ठरवलंय हे वर्षच नाही तर यापुढेही कायम स्मार्टफोन वापरायचा नाही ! “ 

– एलिना हे जे काही सांगते ते काही तिच्यापुरतंच मर्यादित नाही. ते आज जगभरातल्या प्रत्येकाला लागू आहे. मात्र वर्षभर सेलफोनशिवाय राहण्याचं जे धाडस एलिनाने केलंय ते करण्याची हिंमत आपल्यात आहे का?

विचारावं ज्यानं त्यानं  स्वतःला..!

– समाप्त – 

लेखक:-   अनामिक हितचिंतक

संग्राहिका : – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! साखरभाताची साखर झोप ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? साखरभाताची साखर झोप! ?

“अगं जरा ऐकतेस का !”

“तुमचच तर ऐकत आले आहे जन्मभर !”

“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.”

“मग काय उत्तर अपेक्षित आहे गुरुवर्यांना ?”

“हे s s च ! मी म्हणतोय नां ते हे s s च ! ते व्हाट्स ऍपवर तुमच्या महिला मंडळाच्या “खुमखूमी” ग्रुपवर सारखे, सारखे पुणेकरांवरचे पुणेरी विनोद वाचून, तुझी भाषा जन्माने जरी तू अस्सल गिरगावकरीण असलीस, तरी आता साध्या साध्या प्रश्नांची उत्तर देतांना पण, पुणेरी भाषेत द्यायला लागली आहेस !”

“आता या विषयावर, बेडवर पडल्या पडल्या, रात्री अकरा वाजता माझं बौद्धीक घेणार आहात कां ?”

“अगं, काही जणांची मराठी जशी इंग्राजळलेली असते, तशी तुझीही मराठी आता साधं साधं बोलतांना पण, मुळा मुठेच्या पात्रात डुबकी मारल्या सारखी बोलायला लागल्ये, कळलं ?”

“इ s s श्श ! हल्ली मुळा मुठेच्या पात्रात चुळ भरण्या इतकं सुद्धा पाणी नाहीये, त्यात मी मेली डुबकी कशी काय मारणार ?”

“हे तुला कुणी सांगितलं?”

“अहो परवा लेले काकी गेल्या होत्या पुण्याला, त्या सांगत होत्या !”

“काय ?”

“त्यांची गाडी नदीच्या पुलावरून जातांना, त्यांनी भक्तीभावाने एक पाच रुपयाचं नाणं, चालत्या गाडीतून नदी पात्रात टाकलं !”

“मग ?”

“मग काय मग, खालून एका माणसाचा किंचाळण्याचा आवाज आला ! म्हणून त्यांनी ड्रायवरला गाडी थांबवायला सांगितली आणि त्या खाली नदी पात्रात डोकावून पाहायला लागल्या आणि बघतात तर काय ?”

“काय ?”

“अहो त्यांनी फेकलेलं ते नाणं पात्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाळाला लागून, त्यातून रक्त येत होतं !”

“बापरे !”

“त्या मग तशाच धावत गाडीत बसल्या आणि त्यांनी ड्रायवरला गाडी हाणायला सांगितली !”

“हा s णा s य s ला ! काय ही तुझी भाषा ? मी मगाशी जे म्हटलं ते काही अगदीच खोटं नाही ! अगं गिरगांवातल्या गोरेगावकर चाळीला स्मरून, निदान दामटवायला, हाकायला असं तरी म्हणं गं !”

“त्यानं काय फरक पडणार आहे ?”

“जाऊ दे, तुझ्याशी या विषयावर आत्ता वाद घालण्यात अर्थ नाही ! गूड नाईट !”

“अरे वा रे वा, असं कसं गुड नाईट !”

“म्हणजे ? मी नाही समजलो !”

“अहो आत्ता माझा चांगला डोळा लागत होता, तर तुम्हीच नाही का, ‘अगं ऐकतेस का?’ असं बोलून माझी झोप उडवलीत ती !”

“अरे हॊ, आत्ता आठवलं. तू उद्यासाठी जो ‘साखरभात’ करून ठेवला आहेस नां, तो जरा चमचाभर आणून देतेस का ?”

“आत्ता ? रात्री अकरा वाजता ? अहो वाटलं तर सकाळी नाश्त्याला घ्या तो आणि जेवतांना पण घ्या की, आत्ता कशाला उगाच रात्री झोपताना तुम्हाला चमचाभर साखर भात हवाय ?”

“अगं त्याच काय आहे नां, आमच्या मास्तरांनी ‘साखरझोप’ ह्या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला आहे !”

“बरं, मग ?”

“मग काही नाही, म्हटलं अनायासे तू आज साखरभात केलाच आहेस, तर तो थोडा खाऊन झोपीन ! म्हणजे रात्री साखरझोप लागून, सकाळी त्यावर काहीतरी लिहिता येईल असा एक सुज्ञ विचार मनांत साखर पेरून गेला इतकंच !”

“अस्स होय ! आता आमच्या ह्या प्रौढ ढ विद्यार्थ्यांची मलाच मेलीला काळजी घेतली पाहिजे ! नाहीतर उगाच मी त्याला आत्ता साखरभात दिला नाही, म्हणून तो जर उद्या परीक्षेत नापास झाला, तर त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळा व्हायचा !”

असं बोलून बायको किचन मधे गेली आणि बाउल मधे साखरभात घेवून आली. मी पण विजयी मुद्रेने तो बाउल घ्यायला हात पुढे केला आणि धाडकन बेडवरून खाली पडलो!

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२८-०१-२०२२

ताजा कलम  – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

गोडवा बंधनाचा

दिवस संक्रांतीचा

मधुर वाणीचा

रंग उडत्या पतंगाचा

बंद दाटल्या नात्यांचा

संक्रांतीच्या शुभेच्छांच्या अनेकविध चारोळ्या मध्ये ही चारोळी मला उंच आकाशात घेऊन गेली.अगदी आकाशात विहरणाऱ्या पतंगांजवळ. विविधरंगी उडत्या तबकड्याच त्या !! पतंगांच्या हवेत  डोलणाऱ्या  शेपट्याच्या मोहक हालचालींना मीही मनोमन डोलू लागले.

गदिमांच्या ‘बाई मी पतंग उडवीत होते’ या गाण्याची आठवण झाली ‘हसू फेसाळ घुसळीत अंग’ असे म्हणत लावणी गाणाऱ्या जयश्री गडकर चा चेहरा  डोळ्यासमोर आला.

मनातल्या मनात त्या लावणीचं रसग्रहण चालू होतं

काटा-काटीनं आला ग रंग

हसू फेसाळ घुसळीत अंग

दैव हारजीत घडवीत होते

सूर ताल लय आणि लावणीचा ठसका यांचा फेर धरून मनात नाच चालला होता पण मला अचानक ठसका लागला तो त्या गाण्याचा भावार्थ जाणून….

चढाओढीनं चढवलेले, हवेत स्थिरावलेले,मुक्त विहार करणारे ,इंद्रधनुष्याचा सडा टाकणारे हे पतंग शेपटीचा रुबाब दाखवत जेव्हा नयनसुख देतात तेव्हा गाण्यातील एक ओळ काळजाचा ठोका चुकवते…

माझ्या दोऱ्याने तुटला दोरा

एक पतंग येई माघारा

गेला गुंतत गिरवीत गोते

आकाशात स्थिरावलेला अचानक गोते खात माघारी येणारा, पुन्हा जमिनीच्या कुशीत शिरणारा, क्वचित प्रसंगी झाडाच्या कवेत जाणारा, आयुष्याच्या शेवटी गुंतत गोते खाणारा हा पतंग मला विचारांच्या गर्तेत लोटू लागला.

वरवर स्वच्छंदी वाटणारा हा पतंग स्वातंत्र्य उपभोगतो का? नाही..तोही हवेच्या मूडचा गुलाम… त्याचा आधार म्हणजे मांजा. लोकांना पतंग दिसतो पण ज्यामुळे तो आकाशात फिरवतो तो मांजा दिसत नाही.

पतंगाचे आकाशात उडणे हेदेखील मांजा वर अवलंबून असते मांजाची लांबी पतंगाच्या आकाशाच्या गवसणीला प्रतिकार करते.

पतंग जसा जसा उंच जाऊ पाहतो तशी तशी मांजाची शक्ती( लांबी) अपुरी पडू लागते. जोवर तो एकटा तरंगत असतो तोवर तो विहरतो जणू त्याचे साम्राज्य आहे पण हळूहळू तिथे स्पर्धा सुरू होते. आता तो एकटा नसतो इतर पतंग त्याच्याशी काटा-काटी खेळतात .एक प्रकारचे युद्ध सुरू असते. तो मांजाचे ऐकत नाही. मांजाची शक्ती निष्प्रभ ठरते त्याच्या बेताल वागण्या पुढे! मांजा हात टेकतो. दुर्बल मांजाला दुसऱ्या पतंगाचा मांजा कापतो आणि घडायचे तेच घडते.

क्षणार्धात पतंग माघारी येतो मांजाचे बंधनच त्याला मुक्तीचा आनंद देत होते हे त्या मदमस्त पतंगाला कळू नये का?

आकाशात उडत असलेले पक्षी देखील स्वातंत्र उपभोगत नाहीत. त्यांच्याही पंखाखाली हवेचा दबाव आहे. ती त्याना  दाबते.  ठराविक मर्यादेपलीकडे पक्षीसुद्धा आकाशात जाऊ शकत नाही एका ठराविक उंचीपर्यंत एकांत त्याच्यापुढे एकाकीपण……

बंधन हे बंधन न मानता ते सुरक्षाकवच मानून मुक्तीचा आनंद घेतला तर कसे?

थेंब जेव्हा महासागर होतो त्या क्षणी तो सागराचं बंधन स्वीकारतो.

हीच गोष्ट संक्रांत संक्रमित करत असेल का?……..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 1 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 1 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“एक कोटी रुपये देतो, वर्षभर स्मार्टफोन वापरायचा नाही,” असं कुणी सांगितलं तर तुम्ही कराल का?

– कुणीही म्हणेल की ‘ एक कोटी रुपये मिळणार असतील तर वर्षभर राहू की सुखानं फोनशिवाय, त्यात काय अवघड आहे.’

-खरं तर अवघड काही नाही, पण वाटतं तितकं सोपं ते आता उरलेलं नाही. आपण सारेच स्मार्टफोनला इतके सरावलो आहोत की फोन हा फक्त एकेकाळी कॉल करणं, घेणं, बोलणं यासाठीच होता हे आता आपण विसरून गेलेलो आहोत. सतत स्क्रोल करत राहण्याचं हे व्यसन इतकं वाढलं आहे की, एक दिवस मोबाइल बिघडला किंवा हरवला, एवढंच काय पण काही वेळ त्याची बॅटरी संपली तरी जीव कासावीस होतो. फोनशिवाय जगणंच अशक्य व्हावं इतका फोन जवळ बाळगूनच अनेकजण जगतात. झोपताना आणि शौचालयातही फोन जवळच असतो.

अशा अवस्थेत फोनशिवाय जगणं कसं शक्य व्हावं?

पण एलिना मुगडन या तरुणीनं हे आव्हान स्वीकारलं. न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरात राहणारी ही तरुणी. वय वर्षे 29. गेल्या वर्षी फेब्रुवारीतली ही गोष्ट. व्हिटॅमिन वॉटर या फिटनेस ब्रॅण्ड कंपनीने अमेरिकेत एक स्पर्धा आयोजित केली. ‘स्क्रोल फ्री इयर’ असं त्या स्पर्धेचं नाव. वर्षभर स्मार्टफोन न  वापरता राहिलं तर एक लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले व्हिडिओ पाठवले होते. त्यातून एलिनाच्या व्हिडिओची निवड झाली, आणि वर्षभर तिचा आयफोन एका डब्यात बंद करण्यात आला. पुढचे बारा महिने स्मार्टफोन नाही, त्यावर स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिकटॉक असं काहीही नाही. ओला-उबेर- खाण्याचे पदार्थ ऑनलाइन मागवण्याचे अ‍ॅप्स, हे काहीही वापरता येणार नाही.

कंपनीने एलिनाचा आयफोन काढून घेतला आणि तिला एक फ्लिपचा साधासा फोन दिला. त्या फोनवरून फक्त कॉल करता येतील आणि आलेले कॉल स्वीकारता येतील. यापेक्षा जास्त त्या फोनवरून काहीही करता येणार नाही. तशी सोयच नाही. एवढंच नाही तर लॅपटॉप, टॅब यांचा वापरही अत्यंत मर्यादित करण्याची परवानगी देण्यात आली.

आणि एवढं करूनही ती खरंच स्मार्टफोनपासून वर्षभर लांब राहिली का, हे तपासण्यासाठी तिची येत्या फेब्रुवारीत शिस्तशीर लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. त्यावरून कळेलच की खरंच तिनं हा सेलफोन उपवास तंतोतंत पाळला की नाही.

पैसे मिळतील तेव्हा मिळतील, पण वर्षभर सेलफोनपासून दूर राहण्याचा एलिनाचा अनुभव खूप रंजक आणि डोळ्यात अंजन घालणाराही आहे.

एलिना सांगते, ‘खूपदा वाटलं की हा स्मार्टफोन उपवास सोडावा. फोनशिवाय जगणं मला जमतच नव्हतं. सोशल मीडिया नाही, कुणाशी संपर्कच नाही या भावनेनं मग तगमगायला लागले. कुठं जायचं तर गाडी बुक करता येत नाही. मित्र-मैत्रिणींशी चटकन बोलता येत नाही, त्यांचं काय चाललंय हे कळत नाही. जसं काही मी जगापासून लांब फेकले गेले असं मला वाटायला लागलं होतं; पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’

क्रमशः…..

लेखक:-   अनामिक हितचिंतक

संग्राहिका : – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कावळ्याची जणू कावळी ! ☆ संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

⭐ कावळ्याची जणू कावळी ! ⭐ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित  ⭐

कावळ्याची जणू कावळी !

कावळी : चला पुढचे पंधरा दिवस स्वयंपाकाला सुट्टी.

कावळा: हो जसा काही रोजच पुरणपोळीचा घाट घालतेस.

कावळी: देह सुटला पण तुमच्या वासना काही सुटल्या नाहीत. मनुष्य देहात असताना सगळं खाऊ घातलंय तुम्हाला, तरी तुमचं रडगाणं सुरूच

कावळा: मग कशाला आलीस माझ्या पाठोपाठ ?

कावळी: एवढ्या वटपौर्णिमा केल्या, तेव्हा बोलला असतात, तर आता तरी आपले मार्ग  वेगळे झाले असते. आता भोगा आणखी सात जन्म.

कावळा: असो,आता उगाच वाद घालू नको.लोक काय म्हणतील ? 

कावळी: आता कोणाला कळणारे आपली भाषा ?

कावळा: तेही खरंय म्हणा. मग कुठे जेवायला जायचं म्हणतेस ?

कावळी: अहो बऱ्याच जणांनी बोलावलंय. मलाच कळत नाहीये कोणाचं आमंत्रण स्वीकारावं. मी नुसतंच तोंडदेखल्या काव काव करून आलीये.

कावळा: पण आता पोटात काव- काव सुरू झालीये. वेळेत निघायला हवं, नाहीतर दुसरी  जोडपी येऊन कट्ट्यावर बसतील.

कावळी: म्हणून अनोळखी लोकांकडे जायचंच नाही. जे आपली मनापासून आठवण काढतात  ना तिथेच जाऊया.

कावळा: म्हणजे कुठे ?

कावळी: आपल्या मुलांकडे.

कावळा: अजिबात नाही. जिवंत असताना त्यांनी किती आठवण काढली ते पाहिलंय मी.  प्रॉपर्टीची विभागणी काय केली, दोघांनी माझा आप्पासाहेब बेलवलकर करून टाकला.

कावळी: मुलगीही तशीच नलूसारखी आणि तुम्ही ?

कावळा: हो शेवटी मीच तुमचा सरकार— काव काव.

कावळी: हसू नका. आवरा आता. तुमच्या मित्राकडे जाऊ. त्याने पारावर आपलं ताट नक्कीच आठवणीने वाढून ठेवलं असेल.

कावळा: नको मेल्याने पेल्यात बुडवून माझं आयुष्य कमी केलं, नाहीतर आणखी काही वर्ष जगलो असतो मी. त्याचं काही खरं नाही, ताटाभोवती पाणी फिरवायचं सोडून मद्याचे थेंब  टाकले असतील मला आकर्षून घ्यायला. पुन्हा अडकायच नाहीये मला व्यसनात. असले मित्र नकोच.

कावळी: मग माझ्या जिवलग मैत्रिणीकडे जाऊ.

कावळा: तिथेही नको तुमच्या गप्पा सुरू झाल्या तर मी उपाशी राहीन.

कावळी: अहो गप्पा मारायला आता आपण काही मनुष्य नाही, विसरलात का ?

कावळा: लक्षात आहे.  पण तुम्ही बायका भिंतीशी सुद्धा बोलू शकता. तू तरी कावळी आहेस.

कावळी: खबरदार मला कावळी म्हणाल तर. किमान या पंधरा दिवसात तरी मला खूपच मानाने  वागवतात लोक.

कावळा: ठीक आहे बाई– नाही म्हणत कावळी. तू तर डोमकावळी.( तू तर चाफेकळी चालीवर)

कावळी: पुरे आता. कुठे जायचं ते ठरवा पटकन. कधीची छान तयार होऊन बसलेय.

कावळा: मी काय म्हणतो, आपण घरीच जेऊया का ? आता आपुलकीने बोलावणारी माणसं राहिली नाहीत. राहिलाय तो फक्त सोपस्कार. लोक आपल्या नावाने स्वयंपाक करणार, छोट्याशा ताटात नैवेद्य दाखवणार. आपण खातोय की नाही हे सुद्धा नाही पाहणार. आणि स्वतः मात्र खीर-वड्याच्या जेवणावर आडवा हात मारणार. ज्यांनी जिवंतपणी आपल्याला नीट नाही वागवलं त्यांच्याकडून मेल्यानंतर चांगल्या वागणुकीची काय अपेक्षा करणार ?– त्यापेक्षा तू खिचडी टाक.

कावळी: झाsss लं. सगळंच बारगळलं. तेव्हाही हॉटेलला नेतो म्हणायचात आणि शेवटी असंच   काहीतरी सांगून घरी खिचडी करायला लावायचात—पण तुमचं म्हणणं पटतय.  –शेवटी कोणी नाही आपलं. आपणच जगतो एकमेकांसाठी, म्हणूनच तर भगवंताने बांधल्या आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी.

कावळा: सरकार माझं ते आवडतं गाणं म्हणा नं, फक्त थोडं एडिट करून—

कावळी: आता पूर्वीसारखा कोकीळकंठी आवाज लागणार नाही बरं.

कावळा: हरकत नाही दोघांचा रंग तर सारखाच ना. घेईन मी ऍडजस्ट करून.थोडं खर्जात गाशील.

कावळी: सांज ये गोकुळी, कावळी कावळी. कावळ्याची जणू कावळी ——-

जिवंतपणी नातीगोती जपा. 

संग्राहक : – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: ब्रह्मवादिनी मैत्रेयी ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ ब्रह्मवादिनी मैत्रेयी ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

वैदिक काळातील विद्वान स्त्री म्हणून मैत्रेयीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मित्र ऋषीं ची कन्या म्हणून तिचे नाव मैत्रेयी. त्रेतायुगात तिचा जन्म झाला. तिचे वडील मिथिलेचा राजा जनक याच्या  दरबारात मंत्री होते.

एकदा जनकराजाने वादविवाद सभेचे आयोजन केले . त्या सभेत याज्ञवल्क्य ऋषी आले होते. ते यजुर्वेदाचे प्रमाण तक याद्निक सम्राट महान तत्त्वज्ञ व न्याय शास्त्रज्ञ महर्षी होते. ते यज्ञ करण्यात इतके निपुण होते की यज्ञ करणे त्यांच्या साठी कपडे बदलण्याइतके सोपे होते म्हणून त्यांचे नाव यज्ञवल्क्य.यज्ञ+ वल्य=यज्ञवल्क्य. याज्ञवल्क्य असेही म्हणतात. मैत्रेयीने त्यांना वादात पराभूत केले. ते म्हणाले मी तुझा शिष्य होऊ इच्छितो. ती म्हणाली तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाही. माझे पती व्हा. जनक राजाच्या आज्ञेवरून दोघे पती-पत्नी झाले. याज्ञवल्क्य ऋषींना पहिली पत्नी होती कात्यायनी. ती कात्यायन ऋषींची कन्या. ती आश्रमाची सर्व व्यवस्था पाहत असे. मैत्रेयीला अध्यात्म, चिंतन, वाद-विवाद यात गोडी होती.

काही दिवसानंतर याज्ञवल्क्य ऋषींना गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असे वाटले. दोन्ही पत्नींना बोलावले व संपत्तीची समान वाटणी करूया म्हणाले. मैत्रेयी म्हणाली आत्मज्ञान हवे आहे. या संपत्तीतून ते मिळेल का? ऋषी म्हणाले नाही ती म्हणाली.मला ही क्षुल्लक संपत्ती नको. तुमच्या ज्ञानसंपत्तीचा वाटा मला हवा. मला अमरत्व हवे आहे.तुम्हाला नक्की ते ज्ञान आहे म्हणून तुम्ही येथील मोहन सोडून ते ज्ञान संपादन करण्यासाठी जात आहात ना? रेशीम ना खूप आनंद झाला त्यांनी तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. जीवन, जगत, आत्मा, परमात्मा यांचे गूढ रहस्य तिला समजावून सांगितले. जगात फक्त प्रियतम आत्मा आहे त्याला जगातील सर्व वस्तू व संबंध प्रिय आहेत. आत्मा दृश्य श्रवणीय चिंतनशील ध्यान करण्यासारखा आहे कारण त्याचे दर्शन श्रवण,मनन,चिंतनाने होते. आत्म्याचे महत्त्व चारी वेद इतिहास पुराणे उपनिषदे सूत्रे मंत्र‌ यात आहे. महान आत्म्याचे श्वास व आश्रय आहे. आत्म्याचे दर्शन श्रवण मनन निविध्यासन यांच्याद्वारे पचवावे लागते. त्यासाठी वनवास व्रत, इतर साधना करावी लागते. ही एकत्वाची उपासना अमरत्वाची अनुभूती देते. मग अद्वैत विविध रूपे व विकारांना विराम मिळतो मग श्रवण चिंतन वगैरे काही लागत नाही. मैत्रीचे समाधान झाले. तिला आत्मज्ञान प्राप्त झाले. तिने उपनिषद लिहिले. तिने आपल्या विद्वत्तेने संपूर्ण स्त्री जातीचे मूल्य वाढवले. धर्मपालन करूनही पत्नी ज्ञानसंपदा वाढवू शकते हे तिने सिद्ध केले. अशा या सुशील शांत निस्वार्थी साधवी सहनशील चरित्रवान ज्ञानसंपन्न मैत्रेयीला कोटी कोटी कोटी प्रणाम .

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

राधाबाई गोपाळराव गद्रे हे त्यांचे नाव! गोपाळराव म्हणजेच आप्पा! राधाबाई हे त्यांचे नाव कधी वापरात आलेच नसावे. त्यांच्या लग्नानंतर सुरुवातीला त्या धाकट्या वहिनी होत्या. पण दिरांची जसजशी लग्ने होत गेली,तशी त्या धाकट्या वहिनी पण राहिल्या नाहीत आणि कालांतराने त्यांचे आप्पा वहिनी,आप्पा मामी, आप्पा काकू, किंवा सुनंदा नाहीतर दिलीपची आई ,अथवा वृंदाच्या सासुबाई असे नामाभिधान झाले.

तर हे त्या आप्पा वहिनींचे मी रेखाटलेले चित्र…… अतिशय कमी, कामापुरतेच बोलणाऱ्या… हो-नाही मानेनेच म्हणणाऱ्या , आप्पा वहिनी!… “तिचा शब्द म्हणजे अगदी शंभर रुपये तोळा.”असं कधीतरी मी सासुबाईंकडून ऐकलं होतं.

त्यांना खळखळून हसताना…. जोरजोरात गप्पाटप्पा करताना…. कडाडून भांडताना… दंगा करणाऱ्या आपल्या मुलांवर संतापून ओरडताना…. किंवा सुनेबरोबर आवाज चढवून तू तू मैं में करताना… एकूणच वातावरण कधी कर्कश्य तर कधी नादमय करताना…. बहुतेक कुणी पाहिलं किंवा ऐकलं ही नसेल. चेहऱ्यावर कायम एक हलकसं स्मित हास्य… बस तेवढंच! त्यामुळे त्या एक शांत, संयमी व्यक्तिमत्वाचा धनी वाटायच्या.

माझ्या लग्नाला चार-सहा महिनेच झाले होते. मी दिल्लीहून माझी बँकेतली नोकरी सोडायला सांगलीला आले होते. त्यांनी मला एकदा जेवायला बोलावले होते.’ ‘जावेला मदत करून इम्प्रेशन मारूया,’ असा विचार करून मी जरा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. स्मितहास्याने  माझे स्वागत झाले. पण बघते तो काय इतर सगळे स्वयंपाकाचे काम संपून स्वयंपाक- काकू पुऱ्या तळत होत्याआणि आम्हा दोघींना करण्यासारखे कोणतेच काम शिल्लक नव्हते. मग कॉफी पिता पिता मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी एकटीच बडबडतेय… आमच्यात संवाद होतच नाहीय. कारण समोरची व्यक्ती फक्त ‘ गुड लिसनर’  आहे. हे बघून मूड खराब झाल्याने मी गप्पच बसले….मला जांभया येऊ लागल्या.तेवढ्यात एक मासिक आणून त्यांनी माझ्या हातात ठेवले.”बस वाचत, जेवायच्या वेळेपर्यंत” असं म्हणून त्या तेथून निघूनही गेल्या. जेवताना त्या सहजच बोलून गेल्या कि त्यांना रहस्यकथा,हेर कथा वाचायला खूप आवडतात. तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप गुढ, गहन, गंभीर काहीतरी आहे, असं मला सारखं वाटत आलंय.

त्या अशा अबोलीचं फुल होऊन कशा राहू शकतात?.. हा विचार करताना मला असं वाटायला लागलं की भगवद् गीतेतत स्थितप्रज्ञाची जी लक्षणे आहेत, ती त्यांच्यावर बरोबर फिट् बसतात. ‘न उल्हासे न संतापे ‘.. किंवा ‘सुख-दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौ’.. इत्यादी, इत्यादी…..

खरंच, त्या एका स्थितप्रज्ञाचंच आयुष्य जगल्या. संसाराच्या रहाट-गाडग्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सर्वांसारखंच त्यांनाही तोंड द्यावं लागलं. पण नेहमीच्या चिरपरिचित हास्यानंच त्या त्यांना सामोऱ्या गेल्या. कधी त्याबद्दल कोणाकडे तक्रारही केली नाही.

वृद्धावस्था आली. पंच्याहत्तरीपर्यंत व्यवस्थितच होत्या. हळूहळू विस्मरण होऊ लागलं. पण वयाचा विचार करतात ते नॉर्मल होतं. खरी दैव लीला पुढंच आहे. तो वरती बसलेला क्रीडाशिक्षक, नाटककार माणसाला काय काय खेळ  खेळायला, नाटकं करायला भाग पडतो ते सगळं अतर्क्यच असतं.

जन्मभर मौन व्रत धारण करायला लावणाऱ्या त्या मातेला देवानं नंतर अखंड बडबड करण्याचं व्रत करायला भाग पाडलं. या खेळाची वेगळीच इनिंग चालू झाली. स्वतः लहान मुलगी असल्यासारखं बडबडणं, मुलाला बाबा बाबा म्हणून भरवायचा हट्ट करणं, अशी नाटकंही सुरू झाली. त्यामुळं त्या एका वेगळ्याच विश्वात वावरत आहेत असं सगळ्यांना जाणवू लागलं. दिवसेंदिवस याची तीव्रता वाढतच गेली.  जाग्या असेपर्यंत अखंड, अविश्रांत बडबड,… प्रथम वाक्यं होती,…नंतर शब्द थोडे तरी कळणारे!… त्यानंतर असंबद्ध बडबड,…. ओरडणे, दूरपर्यंत ऐकू जाईल असे…. आणि थकून गेल्या की झोपी जाणे!…. जवळजवळ अडीच वर्षं या बडबडव्रताचे पालन चालू होतं.

मला सांगायची संस्कार ही गोष्ट या पुढंच आहे.साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट..संक्रांतीचा दिवस…. वडीलधाऱ्यांना त्यांच्याकडे जाऊन तिळगुळ देऊन नमस्कार करायची माझी पद्धत. त्या प्रमाणे त्यांच्या खोलीत गेले…. बसलेल्या होत्या.. थोडासा तिळगुळ त्यांना भरवला आणि नमस्कार करायला वाकले,…. क्षणार्धात एक आशिर्वाद देणाऱ्या हाताने माझ्या डोक्याला स्पर्श केला. चमकून मी वर बघितलं .तर एक नेहमीपेक्षा वेगळेच प्रसन्न हास्य चेहऱ्यावर धारण केलेली ती महिला मला मुकेपणाने खूप चांगलं काहीतरी सांगून गेली होती. जिला शब्दातून भावना व्यक्त करता येत नव्हत्या, तिची देहबोली खूप काही सांगून गेली होती.

हे सगळं माझ्या मनाला इतकं स्पर्शून गेलं आणि जो एक अवर्णनीय आनंद मला झाला त्याला तोड नाही. विचार करणारी बुद्धी आणि भावना व्यक्त करणारं मन ज्या मेंदूत( हृदयात नाही.) असतं, त्या मेंदूनं प्रतिक्रया द्यायलाही त्यांना समर्थन केलं होतं. आणि  त्यांना एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवलं होतं. त्या मेंदूला हुलकावणी देत आणि वाकुल्या दाखवत त्यांनी मी केलेल्या नमस्काराचं डोक्यात हात ठेवून दिलेले उत्तर, मला वेगळाच संदेश देऊन गेलं.याला विज्ञानाच्या भाषेत प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणत असतील ही, पण मला वाटलं की हा एक संस्कार होता. त्यांच्या शरीरावर लहानपणापासून झालेला संस्कार! कितीतरी वेळा असे आशीर्वाद त्यांना मिळाले असतील आणि त्यांनी दिले ही असतील. आणि  सगळं काही विसरून बसलेल्या त्या… पण त्यांच्या शरीरानं त्यांच्या हाता कडून मेंदूला आणि अप्रत्यक्षपणे त्या परमेश्वराला पण हूलकावत आशीर्वाद देण्याचा संस्काराची जणू पूर्तीच केली होती. हे संस्कार कधी शिकून, वाचून, प्रयत्न करून येत नाही तर जीवनानं शरीराला त्याच्या नकळत दिलेली ही एक देणगी असते.

आता आप्पावहिन या जगात नाहीत. पण गेल्या दोन वर्षापासून जेव्हा कधी मला त्यांची आठवण येते तेव्हा तो आशीर्वादाचा हात आणि त्यांची त्यावेळची अतिप्रसन्न मुद्राच माझ्या डोळ्यासमोरून तरळून जाते…. आणि पुढेही जाईल.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री उप्पिलियाप्पन कोविल….सुश्री मानसी घाणेकर ☆ संग्राहक – सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ श्री उप्पिलियाप्पन कोविल….सुश्री मानसी घाणेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆

तमिळनाडूला गेलो होतो तेव्हा कुंभकोणम्ला एका मंदिरात दर्शनाला गेलेलो… ‘श्री उप्पिलियाप्पन कोविल’. याची गोष्ट गंमतीशीर आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी भूदेवी—लक्ष्मीदेवी आपली मुलगी म्हणून जन्माला यावी यासाठी घनघोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन श्री लक्ष्मीदेवी त्यांच्या आश्रमासमोरच्या तुळशीवृंदावनाखाली लहान बालिकेच्या रूपानं प्रकट झाली. मार्कंडेय ऋषींनी अगदी प्रेमळ बापाच्या जिव्हाळ्यानं काळजीकाट्यानं तिला लहानाची मोठी केली. इतकी वर्षं श्री लक्ष्मीदेवीचा विरह भगवान विष्णूंना अजिबात सहन होईना. ते मार्कंडेय ऋषींकडे साधंसुधं रूप घेऊन गेले. पौंगडावस्था आणि तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचा हात मागण्यासाठी. त्यांना मार्कंडेय ऋषींनी ओळखलं नाही. ऋषी म्हणाले, ‘ अहो, माझी गोडुली मुलगी अजून किती लहान आहे ! तुम्ही किती मोठे आहात…छे छे..ते काही जमणार नाही…तिला अजून काहीच दुनियादारी येत नाही…तापत्रय असलेल्या संसाराचा भार ती कशी सांभाळेल? अहो…तिला अजून पदार्थ शिजवताना मीठ किती टाकावं याचाही अंदाज नाही…! ‘ त्यावर भगवान श्रीमहाविष्णू म्हणाले, ‘ नका काळजी करू…मी सांभाळून घेईन तिला संसारात…अजिबात अंतर देणार नाही…तिला जेवण बनवताना मिठाचा अंदाज येत नाही ना….काही हरकत नाही…मी आजपासून बिनामिठाचं भोजन करेन! ‘

आणि मग तिथे श्री महाविष्णू—लक्ष्मीदेवीचं लग्न झालं. तेव्हापासून त्या मंदिरात बिनामिठाचा नैवेद्य दाखवला जातो !!

’ उप्पू (मीठ) + इल्लेया (नाही) + अप्पन (स्वामी) म्हणजे मीठ न खाणारा देव ‘  असं श्री महाविष्णूंना बिरूद दिलं गेलं.

अतिशय चवदार आणि अफलातून प्रसाद आहे तिथला  !!!

परिपूर्ण पुरूष !!!

 

— मानसी घाणेकर

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नि:शब्द — ☆ संग्राहिका – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

⭐ नि:शब्द —  ⭐  संग्राहिका –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

नि:शब्द— 

काल एक धक्का बसला. अजून सावरलो नाही.

एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष  आठ) एका कोपर्‍यात बसून इतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.

कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता.

मी त्याला विचारले…

” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?”

त्याने खेळावरील नजर न हटवता मला उत्तर दिले .

” आय नको म्हनत्या ….”

” आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील ! “

त्याने उत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.

मलाच त्याला चिडवण्याची खुमखुमी गप्प बसू देईना….

” मला माहिती आहे, आई तुला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !! “

माझा टोमणा त्याला बरोबर  बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्‍यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले…

” आई म्हनत्या…खेळू नको….खेळून भुक लागल….मग खायला मागशील “

त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा उठून तो कुठेतरी निघून गेला.

मी अजूनही बेचैन आहे. आणि गेल्या वर्षभरात भूक लागावी, अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो.

 

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक १७ – भाग ३ – मोरोक्को__ रसरशीत फळांचा देश ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १७ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ मोरोक्को –  रसरशीत फळांचा देश ✈️

मर्राकेश शहर म्हणजे फ्रेंच व मूर संस्कृतीचा संगम आहे. मूर म्हणजे बर्बर भाषेत मर- अकुश म्हणजे देवाची भूमी. यावरून मर्राकेश नाव रुढ झाले. मोरोक्कोमध्ये  रोमन लोकांनंतर दुसऱ्या शतकापासून बर्बर राजवट होती. पाचव्या शतकात आखाती देशातून अरब इथे आले. त्यांनी इस्लामचा प्रसार केला. कालांतराने अरब व बर्बर यांच्यातील भांडणांचा फायदा घेऊन स्पॅनिश व फ्रेंच लोकांनी इथे प्रवेश केला. स्पॅनिश लोकांशी काही करार करून, फ्रेंचांनी इथे१९१२ पासून १९५६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर इथे एलबीत घराण्याचे राज्य सुरू झाले. थोडे अधिकार असलेली संसद असली तरी राजा हा देशाचा प्रमुख आहे. आज एलबीत घराण्याच्या पाचव्या पिढीचे राज्य चालू आहे.

मोरोक्कोमध्ये आजही एक लाखाहून अधिक फ्रेंच लोक राहतात. इथे बर्बर, अरब, स्पॅनिश, फ्रेंच अशी मिश्र वस्ती आहे. अरेबिक व बर्बर भाषा तसेच थोडी स्पॅनिशही बोलले जाते. फ्रेंच ही व्यापार व व्यवहाराची भाषा आहे. अनेक शहरात फ्रेंच शाळा आहेत. त्यामुळे मोरोक्कोच्या आचार- विचारांवर फ्रेंच, युरोपियन यांचा प्रभाव आहे. लोक गोरे- गोमटे, उंच,नाकेले आहेत. स्त्रियांना काळा बुरखा घालावा लागत नाही. केस झाकून, चेहरा उघडा ठेवून त्या सर्वत्र वावरत असतात. कॉलेजात जाणार्‍या, नोकरी करणाऱ्या काही तरुणी जीन्स मध्येही दिसल्या.फ्रेंच राज्यकर्त्यांमुळे अनेक प्रमुख शहरात लांब-रुंद सरळ  व मध्ये शोभिवंत चौक असलेले रस्ते, विशाल उद्याने, कारंजी, विद्यापीठे, शाळा, रुग्णालये यांची उभारणी झाली आहे.

मर्राकेश येथील बाराव्या शतकात अलमोहाद राजवटीत बांधलेली कुतुबिया मशीद भव्य व देखणी आहे. याच्या उंच मिनार्‍यावरून आजही नमाज पढविण्यासाठी अजान दिली जाते. रेड सॅ॑डस्टोन व विटा वापरून ही दोनशे साठ फूट म्हणजे ८० मीटर उंच मशीद बांधलेली आहे. याच्या सहा मजली उंच चार मिनारांवर  निमुळते होत गेलेले तांब्याचे मोठे बॉल्स ( गोळे )आहेत इतिहासकाळात यांना अस्सल सोन्याचा मुलामा दिलेला होता.

इथला बाहिया पॅलेस हा सुलतानाच्या वजिराने स्वतःसाठी बांधला आहे. त्याला अनेक बायका व मुले होती. इस्लामी आणि मोरोक्को वास्तुशैलीचा हा उत्तम नमुना आहे. सभोवती फळाफुलांनी भरलेल्या, पक्षांनी गजबजलेल्या बागा आहेत. उंच लाकडी दरवाजे, झुंबरे, लाल, निळ्या,पिवळ्या मोझाइक टाइल्समधील भिंतींवरील नक्षी बघण्यासारखी आहे. रॉयल पॅलेस हा अल्मोहाद राजवटीत बाराव्या शतकात बांधला गेला. मोठ्या बागेमध्ये असलेल्या त्याच्या प्रवेशद्वाराचे डिझाईन भूमितीसारखे व टेराकोटा टाईल्समध्ये आहे. हा राजवाडा बाहेरून बघावा लागतो कारण आता तो एका फ्रेंच  उद्योगपतीच्या मालकीचा आहे. तिथून पुढे सुंदर आखीव-रेखीव मिनारा गार्डन आहे.

खूप मोठ्या चौकातील मर्राकेश मार्केट गजबजलेले होते. संत्र्याचा ताजा मधूर रस पिऊन मार्केटमधील दुकाने बघितली. फळे, ड्रायफ्रूट, इस्लामी कलाकुसरीच्या वस्तू,खडे जडविलेल्या चपला, कार्पेट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असे असंख्य प्रकार होते.आपल्याकडल्यासारखे गारुडी व माकडवाले होते. गोरे प्रवासी साप गळ्यात घालून आणि माकडांना खायला देताना फोटो काढून घेत होते. आश्‍चर्य म्हणजे आपल्याकडे वासुदेव असतो तसेच उंच टोपी घातलेले, गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेले, आपल्या इथल्यासारखाच लांब, पायघोळ, चुणीदार झगा घातलेले ‘वासुदेव’ तिथे होते. असे वासुदेव नंतर अनेक ठिकाणी दिसले. त्यांच्या हातात पितळेची मोठी घंटा होती. कधीकधी ते त्यांच्याजवळील पखालीतून पाणी देऊन प्रवाशांची तहानही भागवत होते. लोक हौसेने त्यांच्याबरोबर फोटो काढून घेऊन त्यांना पैसे देत होते. दुनिया अजब आणि गोल आहे याचा प्रत्यय आला.

आमच्यातील काही मैत्रिणींनी इथे ताजीन विकत घेतले. ताजीन म्हणजे पक्या भाजलेल्या मातीचे, रंगीत नक्षीचे भांडे! या भांड्याचे झाकण संकासुराच्या टोपीसारखे उंच असते. या भांड्यात केलेल्या पदार्थांची वाफ अजिबात बाहेर जात नाही व शाकाहारी, मांसाहारी पदार्थ चविष्ट होतात असे सांगितले. हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणात त्या ताजीनमध्ये शिजविलेला ‘खुसखुस’ नावाचा पदार्थ त्या ताजीनसह टेबलावर आला. ‘खुसखुस’ म्हणजे लापशी रवा थोडा भाजून शिजविलेला होता. त्यात गाजर, काबुली चणे, बटाटा, फरसबी, कांदा, कोबी अशा भाज्या त्यांच्या पद्धतीच्या सॉसमध्ये शिजविलेल्या घातलेल्या होत्या. नॉनव्हेज खुसखुसमध्ये चिकनचे तुकडे होते.तिथे गव्हाच्या रव्याचे अनेक पदार्थ मिळतात.अनेक बायका, रस्त्यावर भाजून शिजविलेला रवा आणि मिल्कमेडचे डबे घेऊन बसल्या होत्या व प्रवाशांना खीर बनवून देत होत्या.  हॉटेलमधील जेवणातही गरम- गरम, चौकोनी आकाराची, दोन पदरी रोटी व गव्हाची खीर होती. या शिवाय तिथे तापस (TAPAS) नावाचा माशांचा प्रकार लोकप्रिय होता.

भाग-३ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares