मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

न्यायमूर्ती पिन्हे यांच्या या निकालानंतर,दादाजींनी पुन्हा खटल्याच्या फेर सुनावणी साठी अपील केले. इंग्रजांना येथील धर्म कायद्यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी व्यापारी वृत्तीचे होते. राजकीय स्वार्थ त्यांनी साधला. त्यांच्या राज्यकारभारात मदत करणारा इथला तत्कालीन सुशिक्षित समाज, हा उच्चवर्णीय व परंपरावादी होता.  इंग्रजांना  राज्य महत्त्वाचे होते. त्यांना धार्मिक बाबतीत लक्ष घालायचे नव्हते.दादाजींनी केलेल्या अपिलाचा खटला यावेळी न्यायमूर्ती फॅरन यांच्याकडे सोपविण्यात आला. समाज व प्रसारमाध्यमे यांच्या दबावामुळे न्यायमूर्ती फॅरन यांनी 1887 मध्ये रखमाबाईच्या विरोधात निकाल दिला. वादीची तक्रार रास्त असून रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत आपल्या पतीच्या घरी राहायला गेले पाहिजे अथवा सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा भोगायला तयार झाले पाहिजे. असा निकाल त्यांनी दिला. रखमाबाईंनी या लादलेल्या विवाहाला आणि या अन्याय निकालाला निक्षून नकार दिला. त्या ऐवजी तुरुंगवास चालेल असे त्या म्हणाल्या. कोर्टाला उद्देशून रखमाबाई बाणेदारपणे म्हणाल्या, ‘नको असलेल्या पतीच्या घरी राहायला जाण्याऐवजी मी आपण  दिलेली शिक्षा भोगायला आनंदाने तयार आहे.’असे त्यांनी कोर्टाला सांगितले या कायदेशीर लढाईत रखमाबाईचे आजोबा हरिश्चंद्र व आई जयंतीबाई  या दोघांनी रखमाबाईना शेवटपर्यंत  साथ दिली. डॉक्टर सखाराम अर्जुन मात्र खटल्याचा हा सारा ताण सहन न होऊन खटला सुरू असतानाच मृत्यू पावले. रमाबाईंचे अतुल्य धाडस पाहून, नंतर जाणता समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहिला. रखमा बाईंच्या आर्थिक सहाय्यासाठी हिंदू लेडी या नावाने निधी उभारण्यात आला. एवढेच नव्हे तर बालविवाह संबंधातील कायद्यात बदल करण्यात यावा यासाठी,या कायद्यात सुधारणा करण्यासाठीच्या शिफारशी सरकारकडे पाठविण्यात आल्या. या गडबडीत रखमा बाईंच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विरोध व विलंब झाला. त्यातच दादाजीने पत्रक काढून रखमा बाईंचे आजोबा हरिश्चंद्र व आई जयंतीबाई हे दोघे रमाबाईंच्या  नावावर जनार्दन सावे यांनी करून दिलेल्या संपत्तीच्या लोभाने तिला आपल्याकडे नांदायला पाठवत नाहीत असा आरोप केला.त्याला उत्तर म्हणून रखमाबाईंनी आपले संपत्तीचे विवरण प्रसिद्ध केले. दादाजीचा खोटेपणा उघडकीस आला. दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे दादाजींच्या मामाच्या या उलटतपासणीत कोर्टाच्या लक्षात आले. दादाजींची बाजू उघडी पडल्यावर दादाजींनी रखमाबाई ना तडजोड करण्याची विनंती केली.या विनंतीप्रमाणे दादाजींनी रखमाबाईंनीवरचा पत्नी म्हणून हक्क सोडावा आणि दादाजींना खटल्यासाठी लागलेला खर्च रखमाबाईंनी द्यावा अशी तडजोड झाली.चार वर्ष गाजलेला, दादाजी विरुद्ध रखमाबाई हा खटला 1887साली संपुष्टात आला.आणि रखमाबाई मुक्त झाल्या.

नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त बावीस वर्षांच्या होत्या. पण या कोवळ्या वयात अनुभव संपन्न झाल्या होत्या. सत्यशोधक विचारांचा वारसा, प्रगल्भ बुद्धी त्यांना लाभली होती. स्वतःचे आणि डॉक्टर सखाराम अर्जुन यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्यावरील खटल्याच्यावेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन पिची यांनी रखमाबाईना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ पिची व डॉक्टर सखाराम अर्जुन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.डॉक्टर एडिथ पॅरिस च्या होत्या. तिथून 1883 मध्ये द्या मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते. या पती-पत्नीच्या प्रयत्नामुळे रखमाबाईना डफरीन फंडातून आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाई ना इंग्लंडमध्ये रहाण्यासाठी मॅक्लेरन  दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई  डॉक्टर एडिथ आणि फिप्सन यांच्यासोबत 1889 मध्ये वैद्यक शास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या. त्यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी आणि आई जयंतीबाई यांचा शुभ आशीर्वाद त्यांना लाभला. इंग्लंड मधील कालखंड हा रखमाबाईच्या  जीवनातील सुवर्णकाळ होता. वाल्टर मॅक्लेरन  हे इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य होते.त्यांच्या सुविद्य पत्नी इव्हा मॅक्लेरन या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. या सुसंस्कृत घरात रखमाबाईंचा इंग्लंडच्या प्रगत जीवनाशी,प्रगत विचारांशी  परिचय झाला. स्त्री-पुरुष समानतेची ओळख त्यांना इथेच झाली.लॉर्ड टेनीसन या  महान व्यक्तिमत्वाशी आणि बर्टान्ड रसेल या विद्वानांच्या पत्नीऑलिस रसेल यांची ओळख याच घराने त्यांना करून दिली. इथे त्यांना आदर्श जीवनपद्धती अनुभवता आली.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठीचीअट असलेला केम्ब्रीजचा  एक वर्षाचा कोर्स त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांनी चार महिन्यात पूर्ण केला. आणि 1890 मध्ये लंडन स्कूल ऑफ ऑफ मेडिसिन फॉर वुमेन या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणाचा प्रारंभ केला. 1894 मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अनेस्थेशिया विभाग, डेंटल विभाग,चिल्ड्रेन हॉस्पिटल, ऑप्थाल्मिक   हॉस्पिटल येथील कामांचा अनुभव घेऊन त्या परीक्षेसाठी स्कॉटलंडला गेल्या.प्रसूतिशास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत त्यांनी ऑनर्स पदवी मिळविली.

वैद्यकीय पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतलेल्या रखमबाईंचा टाईम्स ऑफ इंडियाने सन्मान केला. त्यांचे भव्य स्वागत केले. कारण टाइम्स’ने त्यांच्या पत्रांना प्रसिद्धी दिली होती.लोकांच्या दबावाला बळी न पडता हिंदू लेडीचे नाव जाहीर केले नव्हते व त्यांची पत्रे गव्हर्नरकडे विचारार्थ पाठविली होती.डॉक्टर रखमाबाईंनी मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून वैद्यकीय व्यवसायात सुरुवात केली. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. कामा हॉस्पिटलमध्ये सहा महिने काम करुन डॉक्टर रखमाबाई सुरतच्या माळवी हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या. घरापासून दूर राहून त्यांनी हे असिधाराव्रत अंगिकारले. प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती, घरी केलेल्या बाळंतपणात होणारे मृत्यू यासाठी रखमाबाईंनी खूप काम केले.माळवी हॉस्पिटल हे डॉक्टर रखमाबाई हॉस्पिटल म्हणून ओळखले जाऊ लागले. रखमाबाईंनी हॉस्पिटलमध्ये बाल वर्ग सुरू केले. स्त्री शिक्षणासाठी वनिता आश्रमची स्थापना केली. अनेक स्त्रियांशी त्या जोडल्या गेल्या. 1917 मध्ये  त्या सुरत हॉस्पिटल मधून निवृत्त झाल्या. 1918 मध्ये त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. लोककल्याण हेच ध्येय ठेवले.त्या आजन्म अविवाहित राहिल्या. 1918 मध्ये सुरतला आलेल्या इन्फ्ल्यूएन्झा च्या साथीत त्यांनी अविश्रांत सेवा केली. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली. त्यांच्या आजोबांच्या मालकीच्या गावदेवी येथील मंदिरात अस्पृश्य स्त्रियांना घेऊन त्यांनी 1932 मध्ये प्रवेश केला व अस्पृश्यता निवारणात योगदान दिले. त्यांच्या सुरत सेवेबद्दल शासनाने कैसर ए हिंद अशी पदवी त्याना दिली. रेड क्रॉस सोसायटी ने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या 91 वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या. 25 डिसेंबर 1955 रोजी त्या देवत्वात  विलीन झाल्या.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिनांच्या निमीत्ताने… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ विविधा ☆ जागतिक महिला दिनांच्या निमीत्ताने… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिन १९४३ साली साजरा झाला. १९७१ साली आठ मार्चला एक महिला संघटन, समस्या निवारण, सुरक्षितता असे मूलभूतत प्रश्न घेऊन पुण्यात, एक व्यापक असा मोर्चा काढला होता. पुढे १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून युनोने जाहीर केले… आणि त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी येऊ लागली. बदलत्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार स्त्रियांच्या समस्या, प्रश्न ही बदलत गेले… जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मूळ हेतु, महिलांचे अधिकार जपणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे हाच आहे.. या सर्व पार्श्वभूमी चा विचार करता, या महिला दिनी, एक स्त्री म्हणूनच नव्हे, एक जागरुक, सामाजिक भान असणारी व्यक्ती म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न ऊभे राहतात… स्त्रीवाद म्हणजे ढोबळमानाने असे मानले जाते की पुरुषांविरुद्धची चळवळ. मात्र स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचार प्रवाह….

वास्तविक आपल्या संस्कृतीत..

।।यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।।

ही विचारधारा आहे. आपले अनेक सण स्त्री शक्तीचा जागर करतात. पण मग मखरात पूजल्या जाण्यार्‍या या स्त्री शक्तीचे प्रत्यक्ष समाजातले स्थान सुरक्षित तरी आहे का?

तितकेच पूजनीय आहे का?

समानतेची वागणूक खरोखरच तिला मिळते का?

“मुलगी झाली” म्हणून तिच्या जन्माचा सोहळा होतो का?

ती गृहित, ती दुय्यम हे तिच्या जीवनाचं पारंपारीक स्टेटस पूर्णपणे बदलले आहे का?

जेव्हां ‘मी टु’ सारखी अंदोलने घडतात, हाथरस सारख्या घटना वेळोवेळी वाचायला मिळतात, तेव्हां वरील सर्व प्रश्नांची ऊत्तरे संपूर्णपणे सकारात्मक मिळत नाहीत हे दु:खं आहे.

महिला दिनी, महिला शिक्षणासाठी जीवन समर्पित करण्यार्‍या पूज्य सावित्रीबाईंचे स्मरण होईल. अनेक पौराणिक, ऐतिहासिक, ऊंबरठा ओलांडून जगलेल्या विसाव्या, एकविसाव्या शतकातील, सर्व स्तरांवर, सर्व क्षेत्रांत ऊच्च स्थानी पोहचलेल्या महिलांची गौरवाने नावे घेतली जातील… पण म्हणून स्त्रीच्या आयुष्यातला संघर्ष संपला असे म्हणू शकतो का? गुलामगिरीच्या जोखडातून ती पूर्ण मुक्त झाली असे सामाजिक चित्र आहे का..???

पुन्हा ऊत्तर नाईलाजाने नकारात्मकच….

परवाच माझी एक अत्यंत सुविचारी, समंजस, कुटुंबवत्सल, नाती जपणारी मैत्रीण सासुच्या भूमिकेत सुनेविषयी सांगताना म्हणाली.. “अग! शांभवीचं घरात लक्षच नसतं..सदा आॅफीसच्या मीटींग्ज, करीअर, पैसा. प्रमोशन्स… घरासाठी वेळच नाही. मुलांसाठी वेळच नाही.. काही सण, रिती, सोहळे परंपरा… कश्शाची पर्वा नाही…. वेळच नसतो तिला.. आज मुलं  सगळं स्वत:चं स्वत: करतात, सगळ्यांची वेळापत्रकं सांभाळली जाताहेत… पण ऊद्या मुलांना  आईबद्दल नेमकं काय वाटेल ग….मायेचा  सहवास नसेल तर या पीढीचं काय होणार?…”

तिचं हे भाष्य, हे प्रश्न ऐकल्यावर मी थक्क झाले!!  माझ्याकडे ऊत्तरं होतीही. नव्हतीही. तिला विचारावेसे वाटणारे प्रश्नही मनात ऊभे राहिले… पण प्रातिनिधीक स्वरुपातच मला शांभवी दिसली.. एका महत्वाकांक्षी पुरुषाच्या मागे स्त्री सर्वस्वाचा त्याग करून जबाबदारीने उभी असते, तेव्हांही ती दुय्यम स्थानांवर, आणि स्त्रीपणाचा ऊंबरठा ओलांडून  चार पाऊले पुढे टाकते,  तेव्हांही ती गौरवमूर्ती न बनता, समाजाच्या नजरेत अपराधीच….. हीच समस्या कालही होती आजही आहे…..!!

म्हणूनच आजच्या महिला दिनी स्त्री शक्तीचा ऊदो ऊदो करताना “जोगवा” मागायचाच असेल तर तो संपूर्ण सक्षमतेचा.. स्वशक्तीचा, खंबीर बनण्याचा…  आत्मनिर्भरतेचा… निर्णयक्षमतेचा आणि त्याच बरोबर एक नवा जाणीव असलेला, समान दृष्टीकोन असलेला, अविकृत समाजबांधणीचा…. कारण, जरी चढलो असलो उंचावरी तरी पायर्‍या अजुन बाकीच आहेत…..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

 ☆ विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

गावाकडे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया या आत्मनिर्भर  असतात.  शेतातील जवळ जवळ ऐंशी टक्के कामे स्त्रियाच करतात. पेरणी टॅक्टरने केली तरी काही ठिकाणी हाताने रोपे लावणे, बी टोकणे यासाठी स्त्रियाच लागतात. नंतर खुरपणी, भांगलन आहेच. साधारण एका पिकाला दोन तीन वेळा भांगलन करावेच लागते. त्यातून स्त्रियांना रोजगार उपलब्ध होतो. या कामासाठी शिक्षणाची अट नसते. शिकण्यासाठी एखादा दिवस पुरतो. त्यामुळे तुमची इच्छा असेल आणि  तुम्हाला गरज असेल तर कुणीही शेतीत काम करून रोजगार मिळवू शकतो.

भांगलन झाल्यानंतर काढणी, मळणी असते. मळणी यंत्रावर असली तरी मदतीला स्त्रिया लागतात. बरं या कामाची शेतकर्‍याला तातडीची गरज असतेच.  सुगीमध्ये अगदी जास्त रोज देऊन बायकांना बोलावले जाते.

शेतीची कामे बारमाही चालतात. त्यामुळे रोजगार सतत उपलब्ध असतो. शेतात काम केल्यामुळे मोकळी ताजी हवा मिळते. आपोआप व्यायाम होत असल्यामुळे आरोग्य चांगले राहते.

कुठे ना कुठे भाजी, तरकारी पिकवली जाते. येताना कुणीही भाजीचा वानवळा देतात. नाहीतर अगदी कमी दरात ताजी भाजी मिळते.

कित्येक बायका शेतात जाताना दोन तीन शेळ्या चरायला नेतात. जिथं भांगलन  वगैरे चालू असेल तिथेच बांधावर झुड्पाला शेळ्या बांधायच्या. गळ्यातलं दावं जरा लांब सोडायचे. त्यांचं त्या चरतात. येताना जळण, गवत डोक्यावरून आणतात. शेळीचं औषधी ताजं दूध मिळते. बोकड असेल तर तो विकून बरेच पैसे मिळतात. यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नसते. फारसा खर्चही येत नाही. फक्त कष्ट करायची तयारी हवी. आणि खेडयातील स्त्रिया ते करतात. असे समुहाने काम केल्यामुळे त्यांचा मैत्रभाव वाढीस लागतो. एकमेकांना मदत करणे. लग्न कार्याला एकत्र काम करणे, मोठ्यांचा सल्ला मिळणे यासाठी खर्चही कमी किंवा जवळ जवळ नसतोच. कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही.

आपल्याच माणसात काम करणामुळे आत्मविश्वास, निर्भयता येते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. त्यामुळे झोपडीतही ती फार दुःखी नसते.

आता बचत गट खेड्यातही असतात. त्यामुळे पैशाचा योग्य विनियोग त्या करू शकतात.

शेतातील सुगीच्या दिवसात मूग, उडीद, चवळी, घेवडा, हरभरा ही कडधान्ये आपल्या शेतात नसतील तर शेजारणी कडून घेऊन त्यांना राख, किटकनाशक पावडर लावून वर्षभराची साठवण करतात. या कडध्यान्याच्या डाळी करून साठवतात. गहू, ज्वारी यांची वर्षभरासाठी साठवण करता येते. सुगी मध्ये धान्य स्वस्त मिळते. खेड्यात भुईमुगाच्या शेंगाही अशाप्रकारे साठवूण ठेवतात.

घरात जर असे वर्षभर पुरेल एवढे धान्य असेल तर ती गृहिणी केवढी तणावमुक्त राहू शकते.

एखादीचा नवरा मुलगा दारुडा , जुगारी असतो तेव्हा तिला त्रास होतो. पण ती एकटी पडत नाही. तिच्या साठी मदतीचे हात सदैव तत्पर असतात.

 

© सौ. सावित्री जगदाळे

१७/२/१९

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

त्या काळाच्या मानाने जयंती बाईंचा प्रथम विवाह उशिरा झाल्यामुळे त्यांना फार मानसिक आघात सहन करावे लागले होते. शिवाय वर्षाच्या आत पतीच्या  मृत्यूचा  आघात त्याच्यावर झाला. रखमा बाईंच्या वाट्याला असे कटू अनुभव नकोत असे त्या मातृहृदयाला वाटले असावे. म्हणून केवळ त्यांच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी नात्यातील दादाजी नावाच्या एकोणीस वर्षाच्या मुलाशी करून दिला. परंतु त्यांच्या मनात रखमा बाईंच्या या विवाहाची सल कायम होती.विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहत होत्या.आणि दादाजी व त्यांची आई दादाजींच्या मामाकडे राहात होते. दादाजी फारसे शिकलेले नव्हते. बुद्धी बेताची होती. प्रकृतीच्या कुरबुरी नेहमी असत. त्यांच्या मामांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुठल्याही सामाजिक निकषावर दादाजी रखमाबाईंनी साठी योग्य जोडीदार नव्हता.  फक्त हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले म्हणून तो रखमावर पत्नी म्हणून अधिकार सांगे. रखमाबाई कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या.डॉक्टर सखाराम राऊत यांच्या घरात वैचारिक व आर्थिक संपन्नता होती. आपल्या पित्याप्रमाणे डॉक्टर बनण्याचे स्वप्न  रखमाबाईनी पाहिले होते. डॉक्टर सखाराम यांना समाजात खूप मान होता. त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता.तो पुरोगामी व प्रागतिक विचारांचा वारसा रखमाबाईना मिळाला. दादाजी व रखमाबाई यांच्यात वैचारिक,बौद्धिक आणि आर्थिक दरी होती. रखमाबाईंची या विवाहाला संमती नव्हती. मुलीला तिचा पती निवडण्याचा हक्क हवा अशी त्यांची विचारधारा होती. बालविवाहा मुळे त्यांचा हा हक्क हिरावला गेला.दादाजी रखमासाठी अनुरूप नाहीत म्हणून डॉक्टर सखाराम व जयंतीबाई तिला सासरी पाठवण्याचे नाकारत असत.

लग्नानंतर आठ वर्षांनी दादाजींनी रखमाबाईवर हाय कोर्टात केस दाखल केली बॉम्बे हायकोर्टात,न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर रखमाबाईंनी स्पष्ट निवेदन केले. त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे.कमी शिकलेला, सतत आजारी असलेला, मामावर अवलंबून असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला असा हा पती माझे पालनपोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीच वाटत नाही. नवरा म्हणून त्याला  स्वीकारणे मला मान्य नाही.’

संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी खटल्याचा निकाल दिला. ‘रखमाबाई आणि  दादाजी यांचे वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याने ते विस्थापित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, अल्पवयात आई-वडिलांनी लग्न लावून दिल्यानंतर, मुलीला जेव्हा समज येते,तेव्हा तिची इच्छा नसताना,तिला पती नावाच्या माणसाकडे रहायला जाण्याची सक्ती करणे हा अत्यंत क्रूरपणा आणि रानटीपणा आहे असे मी मानतो.’

न्यायमूर्ती पिन्हे यांनी असा निकाल दिल्यानंतर रखमाबाईवर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव झाला आणि तेवढीच त्यांच्यावर आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली.

इंडियन स्पेक्टेटर, केसरी आणि नेटिव्ह  ओपिनियन यासारख्या वृत्तपत्रांनीही टीका केली.  हिंदू धर्मशास्त्राने मान्यता दिलेला विवाह बेकायदेशीर ठरविण्याचा इंग्रजांचा कायदा हा हिंदूंच्या समाजजीवनास अत्यंत घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना, पश्चिम राष्ट्रां प्रमाणे, स्त्रियांची संमती आवश्यक नाही. नेटिव्ह  ओपिनियन या वर्तमानपत्राने आपल्या 11:10. 1885 च्या बातमीत या निकालाची खिल्ली उडवताना असे म्हटले की, आपण नेटिव लोक बायकांविषयी इतकी प्रतिष्ठा ठेवणारे मुळीच नाही. एक नाही तर दुसरी, दुसरी  नाही तर तिसरी बायको मिळेल. देशात काय वाण पडली आहे का बायकांची?’

अशावेळी रखमाबाईंनी साथ देण्यासाठी काही समाजसुधारक, विचारवंत पुढे आले. बेहरामजी मलबारी, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकाराने’ हिंदू लेडी’ संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी भारतातील पुरुषी श्रेष्ठत्वाचे राज्य, पुरुषी अहंकार, स्त्रीचे अ लिखित दास्यत्व यावर टाइम्स ऑफ ऑफ इंडिया मधून घणाघाती आघात केले. स्त्रियांना घरात तसेच कायद्याने कसलीही सुरक्षा नाही. त्यांचा कोणी पाठीराखा नाही. वयात आल्यावर, किंवा बारा वर्षाच्या मुली लग्नाच्या राहिल्या तर त्या कुटुंबाला तुच्छतेने वागविले जात असे. प्रौढ वयात लग्न म्हणजे बारा वर्षानंतर लग्न हा सामाजिक आणि धार्मिक गुन्हा मानला जाई.बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची पद्धत अस्तित्वात होती.सती जाणार्‍या स्त्रीचे आक्रंदन  ऐकवत नसे. स्त्रियांची दुखे, बालविवाह, केशवपन,जरठ विवाह, सती जाणे किंवा वैधव्य आल्यावरचे स्त्रियांचे अंधारे आणि मुके जीवन यावर समाजमन जागृत करण्यासाठी रखमाबाईंनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने घणाघाती लेखन केले. समाजाच्या हिंस्त्र मनोवृत्तीवर कोरडे ओढले. पुरुषी समाजव्यवस्थेला मार्मिक प्रश्न विचारले. या विषयांवर त्यांनी 26 जून 1885 रोजी बालविवाह, 19 सप्टेंबर 1885 रोजी सक्तीचे वैधव्य यावर लेख लिहिले. या लेखामुळे सर्वत्र खळबळ माजली. या पत्रात् त्यांनी स्त्रियांना दिलेला अतिनिम्न दर्जा,स्त्रियांचे वस्तुरूप स्थान, स्त्रियांना दिली जाणारी अमानुष वागणूक, त्यांना विवाहात दान देण्याची संकल्पना, आणि स्त्रीचे भयग्रस्त गुलामी जीवन, स्त्री म्हणजे पुरूषाच्या सुखाचे साधन अशा तत्कालीन  समाजमनावर प्रहार केले.  यामुळे पुरुषप्रधान समाज चिडला. सक्तीचे वैधव्य यामध्ये तर त्यांनी नागाच्या फण्यावर पाय ठेवल्यासारखे लेखन केले. स्त्रियां सारखेच,पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवले जात नाही ?असे त्यांनी लिहिले.हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला. मृत्यू पावलेल्या  पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना दुसरा असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कुणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. टाइम्स ऑफ इंडिया मधून ‘हिंदू लेडी ‘या  टोपण नावाने लढा दिला. टाइम्स ऑफ इंडियावर  हिंदू लेडीचे नाव जाहीर करण्यासाठी दबाव आला. पण रखमाबाईंनी कुणालाही भीक घातली नाही.लेखनाच्या मार्गाने लढा दिला.हा दीडशे वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढयाचे महत्व लक्षात येते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

हळूहळू त्यांना मैफिलींसाठी आमंत्रणं येऊ लागली. मैफिली व्हायलाही लागल्या होत्या–रसिकांची भरपूर दाद अर्थातच मिळत होती.पण अचानकच त्यांनाआवाजाला खर येण्याचा त्रास व्हायला लागला.खरं तर लोकांची प्रशंसा, कौतुक यांची चटक एकदा लागली की त्यापासून आपणहून लांब जायचं ही प्रत्यक्षात खूपच अवघड गोष्ट असते. पण शोभाताईंनी मात्र आपणहून मैफिली थांबवायचा निर्णय घेतला, आणि इथेच त्यांचं वेगळेपण, त्यांचा समतोल विचार प्रकर्षाने दिसून आला. आणि त्याचबरोबर, माघार घ्यायची म्हणजे पराभूतासारखे रडत रहायचे नाही–तर चार पावले मागे येऊन, आणखी जोमाने आणि आत्मविश्वासाने दुसरी उडी मारायची, हा त्यांच्यातला विशेष आणि अपवादात्मक गुणही अधोरेखित केला गेला. एव्हाना अनेक गायनोत्सुक विद्यार्थी ‘आम्हाला तुमच्याकडेच गाणं शिकायचं आहे’ असा आग्रह करायला लागलेच होते. आणि शोभाताईंचा निर्णय झाला. त्यांनी गाणं शिकवायला सुरुवात केली. ज्ञानाचं अफाट भांडार त्यांच्याकडे होतंच. आई-वडलांकडून शिकवण्याच्या कलेचा वारसा मिळालेलाच होता. मग काय, बघताबघता शिष्यांची संख्या सत्तराच्याही पुढे गेली. पण शोभाताईंचे वेगळेपण असे की, त्यांनी रूढार्थाने गाण्याचे क्लास सुरु केले नाहीत. एका बॅचमध्ये साधारण सारख्या गुणवत्तेचे ४ ते ६ पेक्षा जास्त शिष्य असणार नाहीत याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवले. शिकवण्यातून उत्पन्न मिळवणे हे प्राधान्य  नव्हतेच. पैशाचा हव्यास तर कधीच नव्हता, हे आवर्जून सांगावेसे वाटते. दिवसभर त्यांच्या शिकवण्या चालू असत. दमले-थकले-वैतागले हे शब्द त्यांच्या कोशात नव्हतेच. प्रत्येक बॅचला उत्साह तेवढाच, जीव तोडून शिकवणेही तसेच. शिष्य म्हणजे आपली मुलंच या दृढ भावनेने प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेण्याचे कामही तितकेच सहजपणे, निरपेक्षपणे सुरु असायचे. कुणाहीबद्दल अशी प्रामाणिक आपुलकीची आणि तळमळीची भावना सातत्याने बाळगणे, आणि प्रत्यक्षात तसे वागणे, हा शोभाताईंचा आणखी एक फार मोठा आणि दुर्मिळ गुण. आणि वैयक्तिक आयुष्यातल्या एकाही कर्तव्याबाबत काडीचीही तडजोड कधीही करायची नाही हा तर जणू त्यांचा बाणाच.

अशातच पी.एच.डी. करण्याच्या ऊर्मीने पुन्हा उसळी मारली, आणि त्यासाठी शोभाताईंचे अथक प्रयत्न सुरू झाले. “मराठी भावगीताची ८० वर्षांची वाटचाल, त्यांचे बदलते स्वरूप, आणि त्यातील सांगीतिक सौंदर्य स्थळे” असा, मुळातच खूप मोठा आवाका असणारा विषय त्यांनी निवडला. त्यासाठी खूप मागे जात, त्यांनी अगदी मुळापासून जास्तीतजास्त माहिती मिळवली. तेव्हा जे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रसिद्ध गीतकार-संगीतकार-गायक हयात होते, त्यांना प्रत्यक्ष भेटून,यासंदर्भात त्यांच्या मुलाखती घेतल्या, ज्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखे जपून ठेवलेले आहे. या अभ्यासाच्या ओघात १०० वर्षांच्याही आधीच्या भावसंगीताच्या इतिहासाचा नेटका आढावा त्यांनी प्रबंधात घेतलेला आहे. शास्त्रीय संगीतातली सौंदर्यस्थळे हा तर त्यांचा हुकुमाचा एक्काच. भावगीतात त्यांचा कुठे कसा वापर केला गेला आहे याची तपशीलवार उदाहरणे त्यांनी  दिलेली आहेत. भावगीताचे बदलते स्वरूप सांगतांना, आजच्या तरुण गीतकार-संगीतकार- गायकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींचा समावेशही केलेला आहे. हे सगळे  दमछाक करणारे होतेच. त्यात कॅन्सर नावाचा महाभयंकर राक्षस अचानक वाट अडवून उभा राहिला. पण मनाची उमेद आणि ध्यास प्रचंड,आणि त्याला जिद्द-चिकाटी-सातत्य यांची प्रबळ साथ. त्यामुळं अजिबात ढासळून न जाता त्यांनी आपले काम चालूच ठेवले आणि एक अत्त्युत्तम प्रबंध आकाराला आला. त्यानंतरची तोंडी परीक्षा म्हणजे तर जणू शोभाताईंचा गाण्याचा एक छोटेखानी कार्यक्रमच ठरला. या प्रबंधावर आधारित पुस्तक काढावे या परीक्षकांच्या लेखी अभिप्रायानुसार, राजहंस प्रकाशनाने त्यावर आधारित “ सखी भावगीत माझे” हा पुस्तकरूपी संदर्भग्रंथच  प्रकाशित केला.

अनेक विद्यार्थ्यांच्या सर्वार्थाने गुरू असलेल्या शोभाताईंचे नाव, ‘गुरू ’या कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या “ रागऋषी पुरस्कार”,”पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार”, “पं. ना. द. कशाळकर पुरस्कार” यासारख्या विशेष सन्माननीय पुरस्कारांवर साहजिकच  कोरले गेले. जातिवंत गुरु  अष्टपैलू शिष्य कसा घडवतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे,त्या ज्यांच्या पहिल्या गुरु होत्या असे आजचे  जागतिक कीर्तिप्राप्त शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर होत. विजय नावाच्या सोनेरी कोंदणात शोभा नावाचा हा पैलूदार अस्सल हिरा अखेरपर्यंत कमालीचा लखलखता राहिला.

अशा गुरुवर्य शोभाताईंचं आज महिला दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक संस्मरण आणि नमस्कार.?

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव… महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.. जगभरातून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण ८ मार्च या दिवशी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो…

खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा…तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही… केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही..

“जागतिक महिला दिन ” आजची सगळी वृतपत्रे यशस्वी महिलांच्या मुलाखती फोटोंनी भरगच्च भरले. ते वाचल्यावर आपल्याला समजते की किती तरी कठीण प्रसंगातून जाऊन त्यांनी आज वेगवेगळ्या स्तरावर यशाची शिखरे गाठली आहेत. हे सर्व वाचले की मनाला नवचैतन्य नवाहुरूप उभारी देऊन जातो. परंतु स्त्रीभृण हत्येचा किळसवाणा प्रकारही मनातून काही जात नाही. तसेच अजूनही या समाजात स्त्रीलिंग नाकारण्यात येत आहे. बरेचदा एक स्त्री दुसर्‍या स्त्रीची वैरी असल्याचे आजकाल आढळून येत आहे. मुलगी झाली की घरातील महिला वर्ग “दुसरी पण मुलगीच का? “… असे उद्दगार आपल्याला ऐकायला मिळतात. काही अपवादही आहे बरं का?..

खरं तर आजच्या या 21 व्या शतकात हे अपेक्षित आहे का? “बेटी बचाओ! बेटी पढाओ ” असे आजच्या या घडीला आपल्याला जाहिरात द्वारे पथनाट्याद्वारे सांगावे लागत आहे..

असे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालायला लागले. विचार करता करता मला “ती “भेटली..

“ती “… आपल्याला अनेक नात्यातून भेटत असते..

आपल्या निसर्गदत्त सोशिक स्वभावानुसार..

सृष्टीच्या सृजनाचा आविष्कार…घडवून आणते आणि सहनही करते..वर्तमानावर चढावा नैराश्याचा झाकोळ भूतकाळ पोखरून काढणारा तर भविष्य अनेक प्रश्नचिन्ह घेऊन येणारा..तरीही शोधत असते उजेडवाटा “ती”

आपल्याच अस्तित्वाची पण स्वःसामर्थ्याने उजळत ठेऊन अंधाराला शह देत कणखरपणे उजेडाच्या बेटावर उभी असते. आपल्या अस्तित्वाचा ठसा बिनदिक्कत उमटवत असते “ती “..

आपल्या इच्छांना ध्यासांना आपलं सत्व सिद्ध करत आकार देण्याच्या धडपडीत किती -कितीकदा कोलमडून पडते. तरी पण एकेक पाऊल पुढे पुढे टाकत जाते. वाट शोधताना संवेदनांची पडझड, वाटेवरचे काटेकुटे दूर करत चालताना लागलेल्या क्षमतांचा कस, स्वाभिमानानं जगताना घरादारांशी झगडावं लागलेलं… तिने अनुभवलेलं तिचचं तिच्यातून तुटतं जाणं….तरीही.. चिकाटी आत्मविश्वास डळमळू न देणारी “ती”..

म्हणूनच म्हणावसं वाटतं की..

“ती ” ची कहाणी

“ती ” चं जगणं

अनेक प्रश्न घेऊन आयुष्याशी लढणं !

वर्तमानाची चिंता

भविष्याचे प्रश्न घेऊन

रोजचा दिवस ढकलणं!

“ती” च नाही महत्त्व

घराला नी समाजाला

तिच्या वेदना जाणून घ्याव्याशा

वाटत नाही कुणाला?

जीवनाच्या वाटचालीत धीर देत..

मार्गक्रमणा करित असते

अनपेक्षित घडले की

असहाय्य बनते?

जीवनाच्या भयानक भोवर्‍यात

अजाणता सापडते..!

जीवनाच्या वळणावर मात्र

“आयुष्य ” मोठं प्रश्नचिन्ह बनतं?

समस्येची उकल ही

करावीच लागणार!

आनंददायी तेजोमय यश

कि गडद काळोखी अपयश..!

हे प्रश्न मात्र क्षणाक्षणाला

विचलितचं करणार..!!

 

पुराणामध्ये स्त्री शक्तीला वंदन केले आहे.. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे.. कोणत्याही कठीण काळात स्त्री ही सर्वदाच अग्रणी असते  म्हणून “महिला” सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे…

बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकां  व्यतिरिक्त ती अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी नटलेली आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभलेले आहेत. आणि त्यांना तिने  अधिक चमक आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे तर काही ठिकाणी ती पुरूषांच्या देखील पुढे आहे.. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत…

जाता जाता मी म्हणेन की निरोगी हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते.तिचे स्वःताचे अस्तित्व परिपूर्ण असते.तू विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती आहेस. एक दिवस तरी तू स्वःताच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर..

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

आज जागतिक महिला दिन! ‘आजचा दिवस माझा’ असं म्हणत प्रत्येक महिलेनं स्वतःच्या हक्कासाठी लढायचा हा दिवस!! सध्या प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करण्यासाठी एक दिवस ठरवण्याची पद्धत आहे. जागतिक महिला दिन हा सुद्धा एक असा दिवस! महिलांप्रती पुरुषांनी सजग करण्याचा दिवस!!

पदोपदी महिलांच्या आकांक्षांचा विचार करून आपल्या बरोबरीने समाजामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे एवढी सजगता पुरुषांमध्ये यावी याची जाणीव करून देणारा हा दिवस!

पुरुषांची शारीरिक शक्ती जास्त असेल परंतु स्त्रीची मानसिक आणि आंतरिक शक्ती अतुलनीय आहे. शक्ती म्हणजे पाशवी शक्ती असेल तर ती पुरुषाकडे अधिक आहे परंतु नैतिक शक्ती अनंत परीनी स्त्रीजवळ जास्ती आहे हे विसरता कामा नये.या शक्तीला त्रिवार वंदन केलं पाहिजे.

जे जे उत्तम,उदात्त, उन्नत, महन्, मधुर ते ते सर्व स्त्री मध्ये आहे. तिच्याकडं जीवनाचं गांभीर्य आहे. स्त्री प्रेरणादायी आहे. तिच्या सर्व गुणांची कदर केली पाहिजे.

स्त्री विना अस्तित्व नाही. ती उद्याची माता आहे. ती स्वतः जन्म घेऊन नाते जोडते आणि जन्म देऊन नाते निर्मिते…. म्हणून ती विश्वाचा प्राण आहे असे म्हणायला हरकत नाही. तसा तिचा सन्मान व्हायला हवा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं गेलं आहे. एक सुशिक्षित माता सुसंस्कृत समाज उभा करते म्हणून महिलांच्या साक्षरतेला प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडून जाणारी स्त्री ‘सावित्रीबाई’ हिची आठवण या दिवशी व्हावी असा हा दिवस!

स्त्री ही समाजाच्या नीतिमत्तेचा कणा आहे.त्यामुळे समाज तिला कसा वागवतो यावर समाजाचं आरोग्य अवलंबून आहे. सध्या स्त्रीला समाजाची वागणूक ‘बंदिनी… स्त्री ही हृदयी पान्हा नयनी पाणी’ अशी आहे. हे दुर्दैव आहे.हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

स्त्री जन्माच सार्थक मातृ रूपात आहे. शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ,मुलाला पाठीला बांधून लढणाऱ्या ‘लक्ष्मीबाई’ यासारखा मातांचं स्मरण आजच्या दिवशी व्हायला हवं.

आज जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग महिलांनी व्यापलेला आहे.कर्तबगारी असूनही उपेक्षित असा हा महिला समाज… त्यांच्या सक्षमतेची जाणीव सर्वांना व्हावी हे या दिवसाचे प्रयोजन आहे आहे. महिलांच्या वाट्याला आलेलं अर्ध आभाळ अजून काळवंडलेलं आहे. हे मळभ घालवण्यासाठी तिचा निकराचा लढा चालू आहे. या तिच्या लढ्याला पुरुष वर्गाची उत्तम साथ हवी याची जाणीव आजच्या दिनी पुरुषांना झाली पाहिजे.

जगणं हे तिच्यासाठी एक आव्हान आहे.जगातल्या सर्वात सुरक्षित अशा जागी म्हणजेच आईच्या उदरात तिला नखं लागताहेत. त्यात दुर्दैवाने तिचे जन्मदाते आई-वडील सामील आहेत.

अर्थात आईला हे मान्य नाही. तिचं स्त्रीमन तिला साद घालतं, पण ती इथे अबला ठरते. तिच्या मनाविरुद्ध गोष्ट घडते.तिच्या वात्सल्याचया, प्रेमाच्या चिंधड्या होताहेत. हे दुर्दैवी आहे.

मुलीने या जगात प्रवेश केलाच तर…’ भय इथले संपत नाही’ अशा अवस्थेत ती जगते. अगदी अनोळख्या व्यक्ती पासून ते अगदी घरातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांची ती शिकार होते. शिवाय तोंड दाबून बुक्क्यांचा मार तो निराळाच…..

या सर्व संकटातून सहीसलामत सुटलेली पोर नशीब घेऊनच जन्माला येते म्हणायची…..खूप खबरदारीनं तळहातावरच्या फोडासारखं जपलेली ही पोर एक दिवस लग्न होऊन आपल्या घरी जाते. आईवडिलांची जबाबदारी कमी होते पण तिची वाढते.

सासू ही स्त्री असूनही तिच्याशी व्यवहारांनं वागते.संवेदना प्रेम यांची उणीव तिच्या वागण्यात जाणवते.सून आपल्या मुलीसारखी असं वारंवार म्हणते पण मुलगी म्हणायला तयार होत नाही.

ज्याच्या प्रेमाला ती आसुसलेली असते तो पुरुष…. नव्हे त्या पुरुषाची मानसिकता हा तिचा शत्रू आहे. आपल्या फायद्यासाठी तो तिला कशीही वापरतो. त्याचा पुरुषी अहंगंड त्याच्या भाषेत ही उतरला आहे. हेही ती पचवत आली आहे.

हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिच्या वर होत असणाऱ्या अन्यायाची जाणीव होणं हे या दिवसाचं महत्त्व आहे.

तिच्या डोळ्यात अन्याया विरुध्द लढण्याचा अंगार आहे. फक्त त्याला कायद्याचे कवच हवं…. ते आहे पण ते आणखी सुरक्षित हवं.मग तो अंगार अगदी सगळी दुष्कृत्ये जाळून टाकेल.

महिलांच्या सबलीकरणापासून इतरही सर्व कायद्यात आज पर्यंत काहीच बदल झाले नाहीत असं माझं म्हणणं नाही पण त्याची गती कमी आहे. महिलांच्या बाबतीतले कायदे आणखी कडक व्हायला पाहिजेत जेणेकरून हे गुन्हे आटोक्यात येतील. आजच्या दिनी या गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे.

आजच्या या जागतिक महिला दिनी तिच्या या अर्धा आभाळात विश्वासाचा सूर्य कधी न मावळो ही इच्छा!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

ज्या प्रमाणे  कळीमधून कमळ हळू हळू उमलत जावे, त्याममाणे माझा सर्वांगीण विकास हळूहळू होत होता. माझ्या व्यक्तिमत्वातील सूप्त गुण फुलत होते. नवरत्न दिवाळी अंकाच्या माध्यमातून आमचा छोटासा महिला वाचन कट्टा तयार झाला. त्यामध्ये आम्ही कविता वाचन हिरीरीने करतो. त्यातीलच सौ.मुग्धा कानिटकर यांनी त्यांच्या घरी हॉल मध्ये माझ्या एकटीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये मी भरतनाट्यम चा नृत्याविष्कार सादर केला आणि कविताही सादर केल्या नाट्य सादर केले.त्या सर्वांनी माझे तोंड भरुन कौतुक केले.त्यांच्या शाब्बासकी मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

त्यापाठोपाठ तसाच कार्यक्रम मिरजेतील पाठक वृद्धाश्रमात मला आठ मार्च महिला दिनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सर्व आजी कंपनी मनापासून आनंद देऊन गेल्या आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

5 जानेवारी 2020 रोजी आमच्या नवरत्न दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण सोहळा, सेलिब्रिटी श्रीयुत प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत नृत्य रुपात सादर करायला मिळाले.विशेष म्हणजे सुरवाती पासूनच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा ठेका धरला होता आणि नृत्य संपल्यावर सर्वांनी त्या गाण्याला आणि नृत्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले. अर्थात हे मला नंतर सांगितल्या वर समजल. विशेष म्हणजे श्री प्रसाद पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आणि मला म्हणाले, ” शिल्पाताई, आता आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढून घ्यायचाय.”

माझ्यातील वक्तृत्वकला ओळखून मी सूत्रसंचालन ही करू शकेनअसे वाटल्याने लागोपाठ तीन मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली गेली. एका नवरत्न दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन गोखले काकू यांच्या मदतीने मी यशस्वी करून दाखवले.ते अध्यक्षांना नाही इतके भावले की त्यांनीच माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर माझा भाऊ पंकज न्यायाधीश झाल्यानंतर आई-बाबांनी एक कौतुक सोहळा ठेवला होता. त्याचेही दमदार सुत्रसंचलन मीच केले ज्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी पंकज दादा मला म्हणाला, ” शिल्पू ने समोर कागद नसतानाही काल तोंडाचा पट्टा दाणदाण सोडला होता.” तसेच माझी मैत्रिण अनिता खाडिलकर हिच्या “मनपंख” पुस्तकाचे प्रकाशनझाले त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन ही मी यशस्वी रित्या पार पाडले.

माझ्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी फक्त आणि फक्त गडद काळोख असूनही मी माझ्या परिचितांच्या कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचलन रुपी प्रकाशाची तिरीप आणू शकले याचे मला खूप समाधान आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

डॉक्टर रखमाबाई राऊत

ही गोष्ट आहे डॉक्टर रखमाबाई राऊत यांची.गोष्ट तशी जुनी, दीडशे वर्षांपूर्वीची. पण आजही भारतीयच नव्हे तर जगातील स्त्रियांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली आहे. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे. दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई भारतात  परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या. भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमा बाईंची इतिहासात नोंद आहे पण याहून खूप मोठा इतिहास त्यांनी स्वकर्तृत्वाने घडविला आहे. स्त्री शिक्षण,स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री शक्ती, स्त्रीमुक्ती असे शब्द उच्चारणे हे ही पाप समजले जाई, त्याकाळात वीस वर्षांच्या कोवळ्या रखमाबाई संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिल्या.अजाणत्या वयात लादलेल्या  लग्नापासून मुक्त होण्यासाठी,व्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्या कायदेशीर लढाई लढल्या. आणि आणि स्वतःवरील  बालविवाहाचे संकट त्यांनी निग्रहाने परतवून लावले. 18 87 साली रखमाबाई कायदेशीरपणे विवाह बंधनातून मुक्त झाल्या. बॉम्बे हायकोर्टामध्ये चार वर्षे चाललेला हा खटला ‘विवाह प्रस्थापित करण्याकरीताचा खटला’ म्हणून जगभरात गाजला.

रखमाबाई चा जन्म 22 नोव्हेंबर 1864  साली झाला. त्यांच्या आईचे नाव जयंतीबाई व वडिलांचे नाव जनार्दन सावे होते. जनार्दन सावे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. रखमाबाई यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील हरिश्चंद्र यादव जी चौधरी हेही शिक्षित व आधुनिक विचारांचे होते.म्हणून मुलीचा विवाह त्यांनी उशिरा म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी केला. रखमाबाई यांच्या जन्मानंतर अल्पावधीतच जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला. रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यांनी पुन्हा एकदा प्रथेविरोधात जाऊन जयंती बाईंचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता.

जयंती बाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम हे जे जे हॉस्पिटल मध्ये असिस्टंट सर्जन होते. अचाट बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती यामुळे वैद्यक शास्त्रावरील त्यांनी लिहिलेले ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. जयंती बाईबरोबर आलेली चिमुकली रखमाबाई डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या घरी वाढू लागली. हा रखमाबाई बाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ होता. रखमाच्या जडण-घडणीत डॉक्टर सखाराम  या दुसऱ्या पित्याचा मौलिक वाटा आहे. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत डॉक्टर बनण्याचे स्वप्न रखमा ने बघितले. हे धाडस त्या डॉक्टर सखाराम राऊत यांच्यामुळेच करू शकल्या. म्हणून तर रखमाबाईंनी जन्मदात्या ऐवजी डॉक्टर सखाराम राऊत यांचे नाव लावले. जन्मदात्यापेक्षा जन्‍म घडविणार्‍याला त्यांनी थोरपण दिले.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

डॉ. शोभा अभ्यंकर —- भारतीय शास्त्रीय संगीतविश्वात ‘गानगुरू’ म्हणून ख्यातनाम असलेले एक अतिशय उमदे आणि सतेज व्यक्तिमत्व.

प्रचंड जिद्द, आश्चर्य वाटावं अशी चिकाटी, आणि कौतुक वाटावं असा आत्मविश्वास यांची जन्मजात देणगी लाभलेल्या शोभाताईंबद्दल किती आणि काय काय लिहावं?

एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात २० जानेवारी १९४६ रोजी शोभाताईंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा समजूतदार, विचारी आणि अभ्यासू स्वभाव इतरांना प्रकर्षाने जाणवत होता. त्या वयातही राहण्या-बोलण्यातला, वागण्यातला पोच, नेमकेपणा,आणि स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची आवड वेगळेपणाने उठून दिसावी अशीच. पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत त्यांचे ११ वीपर्यंतचे शिक्षण झाले. तेव्हाही अभ्यासाइतकीच आवड होती ती गाण्याची. तेव्हाच्या हिंदी-मराठी चित्रपटातली बरीचशी गाणी शास्त्रीय संगीताशी नाते सांगणारी असायची,आणि शोभाताईंना ती बहुतेक सगळी गाणी त्यातल्या दोन कडव्यांच्या मधल्या म्युझिकसकट अगदी जशीच्या तशी म्हणता यायची याचे ऐकणाऱ्याला कमालीचे कौतुक वाटायचे. का कोण जाणे, पण त्या वयात शास्त्रीय संगीत शिकण्याचा म्हणावा तसा योग त्यांच्या आयुष्यात आला नाही. पण तरीही त्या संगीताशी त्यांची नाळ जन्मतःच जोडली गेलेली होती हे नक्की.

११वी उत्तम तऱ्हेने पास झाल्यावर त्यांनी स.प. कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. कारण शास्त्र विषयात त्यांना गाण्याइतकीच गती होती. पुढे बायोकेमिस्ट्री या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली.

तेव्हाच्या रीतीनुसार, आता पुरेसे शिक्षण झाले असे गृहीतच असल्याने, मग पुण्याच्याच श्री विजय अभ्यंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वतः श्री. विजय आणि त्यांचे सगळेच कुटुंबीय संपन्न-समजूतदार-प्रेमळ आणि शिक्षणाचा आदर व कदर करणारे होते. त्यात शोभाताईंचे व्यक्तिमत्त्वही असे होते की अगदी  लगेचच आपल्या वागण्याने त्यांनी तिथल्या सर्वांची मने जिंकून घेतली. बायोकेमिस्ट्रीतच पुढे पी.एचडी करावी या त्यांच्या विचाराला सगळ्यांनीच उचलून धरले, आणि अभ्यासही सुरु झाला. पण सासूसासरे, आजेसासूसासरे, लहान दीर-नणंदा अशा मोठ्या एकत्र कुटुंबात सगळ्यांसाठीची सगळी कामे उरकून दिवसभर विद्यापिठात जाणे फार कष्टप्रद होत होते. त्यात एका नव्या जीवाची चाहूल लागली,आणि त्यांनी आपणहून, अतिशय सारासार विचार करून तो अभ्यास थांबवण्याचा अवघड निर्णय घेतला.

पण फक्त उत्तम रीतीने संसार करणं ही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही हे त्यांना, आणि विशेष म्हणजे श्री विजय यांनाही प्रकर्षाने जाणवत होतं. कारण शोभाताई खरोखरच सर्वगुणसंपन्न आहेत, जिद्दी आहेत, ध्यासवेड्या आहेत, हे त्यांना मनापासून पटलं होतं. आणि नेमक्या अशावेळी शोभाताईंची संगीताची आवड त्यांना वारंवार साद घालायला लागली…. इतकी आर्ततेने, की आता यापुढे शास्त्रीय संगीत हा एकच ध्यास घ्यायचा, हा निर्णय त्यांच्या मनाने,बहुदा त्यांच्याही नकळत घेऊन टाकला आणि मग त्यांचे शास्त्रीय-संगीत शिक्षण नियमितपणे सुरु झाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे जोमाने शिकायला सुरुवात झाली. आणि एकीकडे त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापिठात संगीत विषयात एम.ए चा अभ्यासही सुरू केला. अंतिम परिक्षेत त्या विद्यापिठाच्या भारतभरातल्या सर्व केंद्रांमधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, आणि याच यशासाठी त्यांना विद्यापिठातर्फे सुवर्णपदक, “गानहिरा” पुरस्कार, आणि “वसंत देसाई पुरस्कार” हे मानाचे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुढे संगीतमार्तंड पं. जसराजजी यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. एकीकडे पं. वि. रा. आठवले यांच्याकडे अनवट, म्हणजे फारसे प्रचलित नसलेले, आडवाटेचे राग शिकण्यास जाणेही सुरु झाले होते. त्यांना अफाट स्मरणशक्तीचे केवढे मोठे वरदान लाभले होते, हे या सगळ्या शिक्षणादरम्यान, त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवत होते.  कारण राग-स्वर-आरोह-अवरोह या सगळ्यांची, एकाही रागाच्याबाबतीत कुठेही लेखी नोंद करण्याची गरजच त्यांना कधीही पडत नसे.त्यांच्या डोक्यातच अशा प्रत्येक गोष्टीची कायमस्वरूपी तंतोतंत नोंद अशी घेतली जात असे की कित्येक वर्षांनी जरी त्यातला एखादा लहानसा संदर्भ जरी कुणी त्यांना विचारला तरी क्षणार्धात त्या योग्य उत्तर देत असत. “यांचा मेंदू आहे की कॉम्प्युटर “ अशीच विचारणाऱ्याची प्रतिक्रिया असायची.

 क्रमशः….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares