मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

किती घोर अन्याय होता हा!

इतक्या आल्हाददायक वातावरणात घरातच राहणे ही अत्यंत कठोर शिक्षा होती. बर्फाळ दिवस उलटल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये हवामान जेमतेम दोन-तीन महिने कृपावंत व्हायचे. लोक घराबाहेर पडायचे. असे कांही सुखद दिवस मुक्कामास येत नाहीत तोच आसमंताला धूर घेरून टाकत असे. लोकांना घरातच राहण्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात येई. निव्वळ मोजक्या दिवसांच्या प्रखर उन्हामुळे धरतीवर इतकी उष्णता निर्माण व्हायची की जंगलात घर्षणामुळे आग लागायची. आग इतक्या भयानक वेगाने पसरायची जणू हजारो किलोमीटर व्यापलेल्या जंगलाच्या या अग्निकुंडात समिधाच अर्पण व्हायच्या! या आगीच्या दाहकतेचा अनुभव घेणारी अनेक शहरे रिकामी केली जायची. जिकडे तिकडे आग, आग आणि फक्त आगीचेच साम्राज्य.

कॅनडातील अल्बर्टा येथील जळणारी आणि जाळणारी वनराई!

वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांवर स्वार होत आगीतून निघणारा घनदाट धूर दशदिशांत स्वैर संचार करायचा आणि एडमंटन आणि कॅलगरीसह अनेक शहरांना आपल्या कवेत कवटाळून घ्यायचा. हे अग्निचक्र साधारणपणे दरवर्षी नित्यनेमाने सुरूच असायचे. वातावरण प्रदूषित करीत जाणारे हे धूम्रवलय अल्बर्टा प्रांत आणि त्याच्या पल्याड देखील विनासायास अनिर्बंधरित्या पसरत राहायचे. अग्निज्वालांचे भीषण तांडव इतके तीव्र असायचे की बहुतेक प्रभावित क्षेत्रात सरकारी प्रयत्न निष्प्रभ ठरायचे. दूरवर फैलावत चाललेले धुराचे वलय हेच दर्शवीत असायचे की आगीचे भीषण स्वरूप किंचितही कमी झाले नव्हते. ही प्रदीप्त अग्निज्वाळा वारा नेईल त्या दिशेने त्याच्या संगतीत प्रचंड आवेगाने फरफटत जात आणखीनच क्रियाशील होत होती.

बाहेर जाऊन मोकळी स्वच्छ हवा अनुभवू इच्छिणाऱ्या लोकांचे स्वागत करायला धुराची उबदार वाकळ सज्ज असायची. त्यांची इच्छा असो कां नसो, त्यांना एक तर या गरम पांघरुणात स्वतःला लपेटून घ्यावे लागे, किंवा त्याची ऊब नकोशी असल्यास स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागे. हाच तो वन्य वणवा. मी जंगलीपणाच्या आहारी गेलेल्यांच्या पाशवी जिद्दीविषयी ऐकले होते. मात्र या वन्य वणव्याच्या जिद्दीने पेटवलेला प्रकोप प्रथमच डोळ्यांसमोर प्रकटला होता. जणू शिवशंकराने त्याचा प्रलयंकारी आग ओकणारा तिसरा नेत्र उघडलाय असा आभास होत होता. कुठल्याही उपायाने या आगीचा क्रोध शमण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अनियंत्रित गुंडगिरी अंगात भिनलेल्या झुंडीसारखी ही आग कोणाच्याच आटोक्यात येत नव्हती. आता तर सैरावैरा धावणाऱ्या या अग्निज्वाळांचा जणू स्वतःवरील ताबा नष्ट झाला होता.

मेघांचा वेगळाच हट्ट होता, न बरसण्याचा. मग सृष्टी हतबल झाली. पावसाचा एकही थेंब झिरपला नाही आसमंतातून! हेलिकॉप्टरच्या मदतीने पाडण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या सरींनी देखील कांहीच साध्य झाले नाही.

शेवटी उरली ती भडकलेली आणि करपून टाकणारी आग, आतली आणि बाहेरचीही! आतून आणि बाहेरूनही पेटलेली आग. बाहेर असलेली जंगलातील आग सर्वांना दिसत होती. पण आतल्याआत मला होरपळून टाकत धगधगणारी आग माझी स्वनिर्मित होती. त्या आगीच्या धुराने मला वेढून टाकले होते. त्या ज्वालांत मी एकटा जळत होतो, माझ्या मुलाशिवाय, लिली या माझ्या लाडक्या पत्नीशिवाय, माझ्या कुटुंबाशिवाय. शेवटी एकल माणसाची कुठली ओळख तरी असते कां?

कालपर्यंत जे कुटुंब डेरेदार वृक्ष होते, ते आज फक्त एक निष्पर्ण पोकळ खोड उरले होते, तेही घटस्फोट या शब्दाच्या साखळ्यांनी जखडलेले! संबंधविच्छेद होताच मला आता त्या प्रेमबंधनाने दोन जीवांना जोडणाऱ्या प्रत्येक धाग्याचा स्पर्श स्मरत होता. एक वेळ अशी होती की लिलीचा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय मला करमत नसे. तिकडे तीही तितकीच बेचैन असायची. या उन्मादात जगाला विसरून जात आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. आम्ही तासनतास बोलत असू. या संवादाचे चक्र कधीच थांबत नसे. आम्हाला एकमेकांचा विरह अजिबात सहन होत नसे. आमचे लग्न देखील मोठ्या थाटामाटात झाले, म्हणतात ना ‘बिग फॅट वेडिंग’, तसे!

लग्नानंतर मोहक स्मितहास्य करणारा लिलीचा चेहरा माझ्यासाठी दररोज जणू नवतीचे नजराणे घेऊन येत होता. तिचे ते खळखळणारे हास्य कानांत साठवून घेण्यासाठी माझे कान आसुसलेले असायचे. ते मधुर हास्य कायम राहावे यासाठी मी नाना क्लुप्त्या करून पाहत असे. कधी तर मी तिला तिच्या आवडत्या उपाहारगृहात घेऊन जायचो, तर कधी शॉपिंग मॉलमध्ये! या सर्वांहूनही तिला रम्य निसर्गाच्या सानिध्यात राहणे खूप आवडायचे. त्यासाठी मी दर महिन्याला तिची आवड ध्यानात घेत सहलीची योजना आखायचो. कधी कॅम्पिंग करायचे, कधी गिर्यारोहण तर कधी क्लाइंबिंग! तीही प्रणयाराधनात मागे नव्हती. ती माझ्या आवडीचे पदार्थ अगदी निगुतीने रांधायची आणि मला प्रेमाने खाऊ घालायची. ते पदार्थ आवडल्याचे निदर्शक असलेले माझे थम्सअपसहित मनमुराद हास्य बघताच तिचा चेहरा लाजेने लालेलाल व्हायचा. त्या गुलाबी दिवसांत आम्ही एकमेकांमध्ये बेभानपणे इतके हरवून जायचो की आम्हाला जगाची कसलीच पर्वा नसायची.

बेधुंद करणाऱ्या पहाटवेळा आणि अत्यंत आतुरतेने ज्यांची प्रतीक्षा केली जायची त्या उन्मत्त रात्री. प्रत्येक दिवशी हे असेच व्हायचे. कामावर जायचे अगदी जीवावर यायचे.

“ऐक ना, आज कामावरून सुट्टी घेऊ या. “

“वैद्यकीय रजा घेऊ या. ” 

“नको, त्यापेक्षा वर्क फ्रॉम होम (घरून काम) करणे ठीक राहील. ”

या संभाषणानंतर आम्ही पुन्हा एकदा इतके निकट यायचो की आमच्यामध्ये शब्दाचा देखील आडपडदा येऊ शकत नसे. कामाचा कुठलाच ताणतणाव आम्हाला दिवसाढवळ्या देखील जवळ येण्यापासून रोखू शकत नव्हता. बस, एकच गोष्ट मनात भिनली होती, आम्ही पूर्ण समर्पणभावनेने एकमेकांमध्ये विलीन झालो होतो. जणू आमचे वेगळे अस्तित्वच नव्हते. प्रत्येक दिवसाचा प्रारंभ मंदगतीने होत असे, पण नंतर जसजसा तो पुढे सरकत असे, तसतसा घड्याळाच्या काट्यांच्या मागे पळत जातांना इतका व्यस्त होत असे की तो कधी संपायचा ते आम्हाला कळतही नसे. दोघांच्याही मनांत एकमेकांच्या अधिकाधिक सामिप्याव्यतिरिक्त इतर कुठलीच कामना नव्हती.

हर्षोल्लास आणि प्रेमानुभवांचा अमर्याद खजिना दिवसागणिक वर्धमान होतच होता. आम्ही असे आनंदलहरींवर तरंगत असतांनाच आमच्या प्रेमाच्या वेलीवर एक पुष्प उमलले. बिट्टू आमच्या आयुष्यात आला. सुखाच्या वर्तुळाचा घेर चौपट झाला. आता आम्ही दोघांचे तीन झालोत. आमच्या घराला आता खरे घरपण आले. ते जणू एक पवित्र मंदिर झाले. असे म्हणतात की कळसावर कोणीही अधिक काळ थांबू शकत नाही, त्याला खाली उतरावेच लागते. आम्ही देखील मात्र तृप्ततेच्या शिखरावर असतांनाच या पूर्णत्वास गेलेल्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या. या भेगांनी भिंती अशा कांही खोलवर पोखरल्या गेल्या, की त्या भूकंप आल्यासारख्या हादरून जायला लागल्या. कदाचित आमच्या जीवनातील आनंदपर्व संपवण्याची काळालाच घाई झाली असावी. तसेही सगळ्या वेळा सारख्या थोड्याच असतात?  बिट्टू सहा महिन्यांचा होता होता आमच्या प्रेमाची गंगा उलट्या दिशेने प्रवाहित होत गेली. आमच्या प्रेमाचा पतंग जितक्या वेगाने उंच उंच उडत गेला होता, त्यापेक्षा अधिक वेगाने तो खाली आला. या पतंगाची फाटून पार दुर्दशा झाली होती. आता प्रत्येक क्षणी दुसऱ्याची मदत करायला आम्ही हात आखडता घेत होतो.

कटू संवादांच्या मालिकेने घर बेचैन व्हायचे.

“रात्रभर बिट्टू रडत होता. पण तुला एकदाही उठून बघावेसे वाटले नाही की तो इतका कां रडतोय? “

“अगं, त्याला भूक लागली असेल, दूध तर तूच पाजणार होतीस ना, मी उठून काय करणार होतो? ” 

“अरे, तो दरवेळी दुधासाठी उठत नाही. ” 

“मग मला उठवायचे की. “

“कधीतरी स्वतः होऊन काहीतरी करायचे ना. प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी कां?  कधीतरी तू समजून घ्यायला नको कां?  

“बरं बाई, मी खरोखर मूर्खच आहे. तुला कोणत्या वेळी काय हवे असते हे मला समजू शकत नाही. ” 

ती पाय आपटत तरातरा निघून जायची. या लहान सहान गोष्टी मोठमोठ्या मतभेदांच्या भेगांचा पाया आणखीनच मजबूत करायच्या. हातातील वस्तू जमिनीवर आदळत होत्या, त्यांचा आवाज वाढायला लागला की मी घराबाहेर निघून जायचो. हळूहळू कर्कश झालेल्या संवेदना आता धीट झाल्या होत्या. हे चिडचिड करणारे आवाज आता त्रासदायक व्हायला लागले. त्यांचे माझ्या मनावर आणि शरीरावर वाढत चाललेले ओझे मला सहन होईनासे झाले. कर्णकटू कोलाहल आता सतत माझ्या कानांशी अरेरावी करीत खोल घुसत होता. आता कुठलेही मधाळ शब्द कडव्या विषासारखे वाटायला लागले. आम्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे तीक्ष्ण वाग्बाण चालवत असतानांच मध्येच निरागस बिट्टूचे रडणे टिपेला जात असे. कोणे एके काळी प्रेमाचे मंदिर असलेले आमचे घर जणू तिघांच्या आवाजाने कातावून जात स्वतःच उच्चरवाने आक्रोश करीत होते. प्रेमाच्या गुलाबपाण्याने शिंपलेल्या मायाळू भिंतीचे आता कठोर सिमेंट आणि मजबूत मातीच्या लिंपणाने एका भावविहीन डोलाऱ्यात कधी रूपांतर झाले ते आम्हांला कळलेच नाही.

“इतक्या जोरात ओरडत जाऊ नकोस, लिली. माझी नाही तर किमान बिट्टूची तरी काळजी घे. “

“तू इथे असतांना ओरडल्याशिवाय काहीच होत होत नाही रे! त्याशिवाय तुला ऐकायला येतं कुठे? ” 

“हो, सगळी चूक माझीच आहे! “

माझं, माझं, माझं… माझ्या कानाभोवती घोंघावणाऱ्या या शब्दांनी मला धक्का बसला. मी भानावर आलो, कारण हे माझं घर नव्हतं तर समुद्रकिनारा होता. मात्र माणसांच्या गर्दीतही मी इथे एकटाच होतो. पण ते किंचाळणारे आवाज माझा पाठलाग करत होते. गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!

गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!

.

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक हृदयस्पर्शी सत्यकथा…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “एक हृदयस्पर्शी सत्यकथा…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका शांत कॉलनीत ‘आप्पा’ एकटेच राहायचे. त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची एकुलती एक मुलगी, ‘समीरा’, बंगळुरूमध्ये एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीला होती आणि नुकतीच ती लग्न करून तिथे स्थायिक झाली होती.

आप्पांची एक सवय होती. गेल्या अनेक वर्षांपासून, घड्याळात रात्रीचे बरोबर १० वाजले, की त्यांचा समीराला न चुकता फोन यायचा. फोनवरचे त्यांचे प्रश्न नेहमी तेच असायचे.

“हॅलो बाळा, ऑफिसमधून घरी पोहोचलीस का? जेवण झालं का तुझं?”

सुरुवातीला समीरा या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे द्यायची. पण लग्नानंतर आणि नोकरीच्या वाढत्या ताणामुळे तिला आप्पांच्या या रोजच्या फोनचा प्रचंड कंटाळा येऊ लागला. कधी ती मित्रांसोबत बाहेर असायची, कधी नवऱ्यासोबत टीव्ही बघत असायची, तर कधी ऑफिसच्या मीटिंगमध्ये असायची. बरोबर १० वाजता आप्पांचा फोन वाजला, की तिची चिडचिड व्हायची.

एके दिवशी रात्री समीराचे तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. ती रागातच बेडरूममध्ये येऊन बसली. तिचे डोके भणाणून गेले होते.

तेवढ्यात घड्याळात १० वाजले आणि तिच्या मोबाईलवर ‘आप्पा कॉलिंग’ असे नाव झळकले. समीराने रागाने फोन उचलला आणि आप्पा काही बोलण्याआधीच ती संतापाने ओरडली.

“बाबा, काय लावलंय तुम्ही हे रोज रोज? मी आता लहान शाळेत जाणारी मुलगी नाहीये! माझं लग्न झालंय, माझं स्वतःचं एक वेगळं आयुष्य आहे. रोज रात्री बरोबर दहा वाजता फोन करून माझी चौकशी करणं प्लीज बंद करा आता. मला माझा ‘स्पेस’ हवाय. मी सुरक्षित आहे. मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मीच तुम्हाला फोन करत जाईन. प्लीज मला रोज हा असा त्रास देऊ नका!”

समीराने न थांबता एका श्वासात सर्व राग आप्पांवर काढला.

पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता होती. आप्पांचा फक्त एक जड श्वास समीराला ऐकू आला. थोड्या वेळाने अत्यंत कांपऱ्या आणि दबक्या आवाजात आप्पा फक्त एवढंच म्हणाले, “बरं बाळा… झोप आता. काळजी घे स्वतःची. “

आणि फोन कट झाला.

त्या दिवसानंतर आप्पांचा रात्री १० वाजताचा फोन येणे कायमचे बंद झाले. ते फक्त सकाळी व्हॉट्सॲपवर एखादा ‘सुविचार’ किंवा फुलांचा फोटो पाठवायचे. समीराला खूप मोकळे आणि निवांत वाटले. “चला, सुटले एकदाची या रोजच्या कटकटीतून, ” असा विचार करून ती स्वतःच्या संसारात आणि नोकरीत मग्न झाली. ती स्वतःहून आप्पांना रविवारी कधीतरी पाच मिनिटे फोन करायची, तेव्हाही आप्पा अतिशय मोजकेच बोलायचे.

असेच सहा महिने उलटून गेले.

एके दिवशी पहाटे साडेपाच वाजता समीराच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन पुण्याच्या शेजाऱ्यांचा होता. समीराने झोपेतच फोन उचलला आणि पलीकडचे शब्द ऐकताच ती जागीच थिजली.

आप्पांना झोपेतच सायलेंट हार्ट अटॅक आला होता आणि ते कायमचे हे जग सोडून गेले होते.

समीरा वेड्यासारखी रडत, पहिली फ्लाईट पकडून पुण्यात पोहोचली. घरातली ती गर्दी, ते रडणे आणि आप्पांचे ते शांत झोपलेले शरीर बघून समीराच्या काळजाचे तुकडे झाले. सर्व विधी पार पडले. नातेवाईक निघून गेले. चार दिवसांनी समीरा आप्पांची बेडरूम आवरत होती.

आप्पांच्या उशीखाली तिला त्यांचा तो जुना स्मार्टफोन आणि एक छोटीशी डायरी सापडली. समीराने ती डायरी उघडली. त्यातील एका पानावर आप्पांच्या थरथरत्या अक्षरातील ओळी वाचून समीराचा श्वासच कोंडला गेला.

आप्पांनी लिहिले होते:

“समीराच्या आईला जाऊन पाच वर्षे झाली. हे घर खायला उठतं. रात्री १० वाजले की मला घाम फुटायला लागतो, छातीत भयंकर धडधडतं. या एकटेपणाची आणि अंधाराची मला खूप भीती वाटते. पण जेव्हा मी रात्री बरोबर १० वाजता समीराला फोन लावतो, तिचा ‘हॅलो बाबा’ हा आवाज कानावर पडतो… तेव्हा माझ्या धडधडणाऱ्या काळजाला शांतता मिळते. माझा जीव भांड्यात पडतो. ती सुरक्षित आहे हे समजलं, की मला या रिकाम्या घरात रात्रीची शांत झोप लागते. “

समीराचे हात थरथर कापू लागले. तिने पुढचे पान पलटले. ती त्याच तारखेची नोंद होती, ज्या दिवशी तिने आप्पांना फोनवर रागावून सुनावले होते.

“आज माझ्या मुलीने मला फोन करू नको असं सांगितलं. तिला माझ्या प्रेमाचा आता त्रास होतोय. तिचं बरोबर आहे, ती आता मोठी झालीये. मी आजपासून तिला कधीच कॉल करून त्रास देणार नाही. पण… आता रात्रीची झोप कशी येणार? तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला श्वास घेता येत नाही. “

समीराच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने वेड्यासारखा आप्पांचा तो जुना मोबाईल हातात घेतला आणि त्याचा ‘कॉल लॉग’ (Call History) उघडून पाहिला.

मोबाईलची स्क्रीन बघताच समीराने एक भयंकर मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली!

गेल्या सहा महिन्यांत… ज्या दिवशी तिने आप्पांना ओरडले होते त्या दिवसापासून ते काल आप्पा जाईपर्यंत… रोज रात्री बरोबर १०:०० वाजता आप्पांनी समीराचा नंबर डायल केला होता! पण तो फोन ‘रिंग’ होण्याआधीच अवघ्या दोन सेकंदात त्यांनी तो ‘कट’ केला होता.

ती रोज रात्री आपला नंबर डायल करायचे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा समीराचा फोटो बघायचे, आणि फोन लागण्याआधीच कट करायचे… जेणेकरून समीराला त्रास होऊ नये! पण स्वतःच्या एकटेपणाशी लढताना, फक्त नंबर डायल करून ते स्वतःच्या काळजाची समजूत काढत होते.

समीरा ढसाढसा रडत होती. ती उशीला घट्ट मिठी मारून ओरडत होती, “मला माफ करा बाबा! मी खूप स्वार्थी आहे. मला वाटायचं तुम्ही माझ्यावर ‘कंट्रोल’ ठेवण्यासाठी फोन करताय, पण तो फोन माझ्यासाठी नव्हता… तो तुमच्या स्वतःच्या जगण्यासाठी होता! बाबा, प्लीज मला एक कॉल करा… मला तुमचा आवाज ऐकायचाय!”

पण आता रात्रीचे १० वाजून गेले होते, आणि समीराचा फोन पुन्हा कधीच वाजणार नव्हता.

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्यथा तिची, कथा माझी… – लेखिका : प्रतिभा परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ व्यथा तिची, कथा माझी… – लेखिका : प्रतिभा परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सुमनने नाश्ता टेबलावर ठेवून मुलांना आवाज दिला.

कालच मुलांची परीक्षा संपली होती त्यामुळे घरी सगळं रिलॅक्स्ड झालं होतं.

मागचे दहा-बारा दिवस मुलांच्या अभ्यासापुढे सुमनला काही सुचत नव्हतं. घर काम पटापट आवरून ती मुलांना अभ्यासाला बसवी. आता घराकडे लक्ष द्यायला हवे आहे, उन्हाळा ही सुरू होतो आहे.

गरम कपडे धुवायला काढून ते धुवून सुमन बाल्कनीत वाळत टाकायला गेली.

बाल्कनीत खाली खूपसा कचरा काड्या, पिसं पडलेली होती. तिने कपडे वाळत टाकून कचरा गोळा करून टाकला.

उद्यापासून एक एक खोली आवरायची असं ठरवून कामाला लागली.

दुपारी जरा झोपली तो चिवचिवाटाने तिला जाग आली.

 

काय बाई कल -कल आहे म्हणत ती बाल्कनीत आली. खाली परत कचरा पडला होता. सुमनने वर पाहिलं, बाल्कनीत एक विंड चाईम लावलेलं होतं त्यावर चिमणीने घरटे बांधले होते. “आता इथे ही घरटं ! बाई -बाई आणखीन कुठे जागा नाही का गं तुला मिळाली??” सुमन चिमणीकडे पहात बडबडली.

 

अचानक चिमणी खिडकीत येऊन बसली. सुमनला वाटले चिमणी तिच्याकडे पाहून बोलतिये.

“मग कुठे बांधू?? एक तरी झाड सोडल कां तुम्ही आमच्यासाठी? तुम्ही आमच्या जागेवर आपलं घर बांधलं, मग आता आम्ही तुमच्या घरात घरट बांधतोय.

अचानक घर मोडणं आणि त्यानंतर कुठे जायचं हे माहित नसल्यावर काय स्थिती होते हे तुम्हा माणसांना कसे समजणार??”

चिमणीचे बोलणे ऐकून सुमनच्या डोळ्यासमोर तिचे चाळीतले घर आले.

लग्न होऊन ती उदय बरोबर चाळीतल्या घरात आली होती. वर्षभरात अंकिताचा जन्म झाला. एक दिवस कुजबुज सुरू झाली येथे हायवे बनणार आहे तेव्हा त्यांची चाळ मोडून इथून हायवेचा पूल बनणार. तेव्हा ही जागा रिकामी करायची ऑर्डर आहे असे ऐकायला येत होते. मालकांनी आम्ही प्रयत्न करतो असे खोटे आश्वासन दिले. पण अचानक एक दिवस बुलडोजर घेऊन कामगार आले आणि एकच गोंधळ उडाला. कसेबसे सामान बाहेर काढून लोक बाहेर येऊन बसले.

 

उदयच्याएका मित्राने एका खोलीचे घर रिकामे असल्याचे सांगितले. भाडं जरा जास्त होतं, पण मागचा पुढचा विचार न करता उदयने ते घर घेतले. पैशांसाठी तिने सोन्याच्या बांगड्याही विकल्या.

पुढे उज्वल झाला. नशीब पालटले. उदयला बढती मिळाली आणि त्यांनी हा दोन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला. फ्लॅट नवीनच बांधलेले होते.

रस्ता पक्का करण्यासाठी बरीच झाडे कापली गेली होती. हे सर्व आठवून सुमनला तो दिवस आठवला आणि चिमणीची व्यथा जाणवली.

मुलांचा रिझल्ट लागला दोघे छान पास झाली म्हणून दोन दिवसासाठी चौघे गावी देवदर्शनाला जाऊन परत आली.

 

इकडे आता चिमणा चिमणीच्या घरट्यात चिवचिवाट वाढलेला होता. अंड्यांतून पिल्लं बाहेर आली होती. चिमणी चिमणा पोरांसाठी किडे, धान्य गोळा करून आणत होती.

 

सुमनही एका ताटलीत भात, पोळीचा चुरा ठेवायची. हळूहळू बाळ मोठे होत गेली.

काही दिवसांनी चिमणबाळे फुर्र– फुर्र उडू ही लागली आणि अचानक त्यांचं येणं बंद झालं.

चिमणी ही फारशी दिसत नव्हती.

आता सुमनला दुपार रिकामी रिकामी वाटू लागली.

चिमणी घर सोडून गेली वाटतं. ती विचार करू लागली. अचानक तिला चिऊ चिऊ चा आवाज आला. वाटलं चिमणी तिला बाय-बाय करायला आली आहे.

 

“पुढच्या वर्षी इथेच घरटं बांधायला ये हं!” सुमन चिमणीला म्हणाली.

“मी असेल कि नाही माहित नाही पण ही माझी बाळ त्यांच काय होणार??”

सुमनला जाणवले चिमणीला काय सांगायचे आहे! तिने मनाशी ठरवले बाल्कनीत कुंडीत लावलेले वडाचे व आंब्याचे रोप समोरच्या पार्कमध्ये नेऊन लावूया. चिमणीच्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी घराची सोय होईल.

लेखिका : प्रतिभा परांजपे

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – ३ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती. )

इथून पुढे – – 

 ॓क्यूं हमीदा, तबीयत ठीक नही है क्या? क्या हुआ? 

या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली, क्या करनेका बहन? अपना नशीबही अच्छा नही. चाचाके मर्जीनुसार कभी उनके रूममे भी जाना पडता है. पैर दबाने के बहाने से बुला लेते है और…. क्या करूं? मेरे फॅमिलीको खाली मेरा पैसा चाहिये. मेरा पासपोर्ट वगैरा सब चाचाके पास ही है. यहा दो बरस पुरे होने के बाद मुझे दो महीने की छुट्टी मिलेगी. तब तक मै वापस नही जा सकती. अभी मैने एक तरकीब सोची है. जब जब चाचा पैर दबाने के लिए बुलाते है, तो मैं पहिले उनसे कुछ अच्छा गहना मॉ॑ग लेती और मेरे बॅग में रखती. सायरा बेगमको सब पता है. लेकिन वो कुछ नही कर सकती. मेरे मेहनत का पैसा तो मेरे घरवालेही खाते है. कम से कम कुछ सोना तो मेरे पास रहेगा. तिचं घर आल्यावर,  ॓फिर मिलेंगे.॔ खुदा हाफिज.॔ म्हणून ती निघून गेली.

 पण तिचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर वीज पडल्यासारखं झालं. माझी अवस्था तिच्यापेक्षा फार वेगळी नव्हतीच !दिवसेंदिवस सुरेंद्रची मागणी वाढत चालली होती. त्यातच सुलेखा ताईला दिवस गेल्याचं कळलं. मी वरकरणी त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचं नाटक केलं. पण एकदा सुलेखा ताईला फोनवर कुणाशी तरी बोलताना मी ऐकलं होतं की त्या होम सायन्सच्या डिप्लोमाची फी खूपच जास्त आहे. आता दोन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपली इथून सुटका नाही हे मी मनोमन जाणलं होतं. बाळ.. बाळंतीणीचं करायचं सोडून मला कोण शिकायला पाठवेल? इतकी चांगली हक्काची मुलगी कामाला घरात असताना मला कोण एवढ्यात भारतात पाठवेल?॔ 

… आणि त्यादिवशी सुरेंद्रने ॓मोठी मागणी ॔ पुढे केली. मी सगळी काळजी घेईन. तुला काही त्रास होणार नाही असं आश्वासनही दिलं.॔ हे कधीतरी घडणारच होतं, म्हणून मीही सावध होते. मुंबईला मी रात्रीच्या ज्युनिअर कॉलेजला जात असताना माझ्याबरोबरच्या काही मैत्रिणी, त्यांनी काल कुठे कसा सेक्सचा अनुभव घेतला ते रंगवून सांगत असंत. अमक्या तमक्या त्या मोठ्या बकऱ्याकडून ठरल्यापेक्षा मी काय जास्त उकळलं, ड्रेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी सेट कसं मिळवलं. याचं वर्णन करीत. मी त्यांच्या धैर्यापुढे अवाक् होई…. .॔ 

चित्रा पुन्हा रडू लागली. तिच्या पाठीवर हात फिरवत राजश्री तिला शांत राहायला सांगत होती. पण हे सगळे प्रकार ऐकून राजश्रीच एवढी हादरून गेली होती की आता तिच्याच पाठीवरून हात फिरवायला तिला सावरायला, तिचे डोळे पुसायला रमेश जवळ असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटत होतं. आणि एकीकडे हे सारं रामायण ऐकायला तो इथे नाही तेही चांगलं झालं असं वाटत होतं.

 काही मिनिटं अशीच शांततेत गेली. थोडं थांबून चित्रा म्हणाली दीदी,॓ कसं सांगू तुला? सुरेंद्रची मागणी मान्य करण्याआधी मी त्याच्यापुढे मुंबईतली महागाई, शिक्षणाचा खर्च, आमची घराची गरज असा सारा पाढा वाचला. त्यानं मला माझ्या मुंबईच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं. आणि मगच मी त्याच्या स्वाधीन झाले. मी कबूल करते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पुरुष सहवासाची आणि प्रत्येक वेळी बँकेत जमा होणाऱ्या पैशाची मला भुरळ पडली. पण मला आता तिथून, या साऱ्या मोहातून लवकर बाहेर पडायचं होतं. मी वेळेवर मुंबईला पोचले नाही तर इथलं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मला पुढच्या वर्षात ॲडमिशन मिळणार नाही हे मला माहीत होतं.

 दीदी, तुम्हा दोघांना माहितेय की मला पुढे शिकून कॉम्प्युटरचा एखादा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहायचंय.

 ॓… आणि माझं नशीब चांगलं म्हणून दुबईच्या त्या मोहमयी, सोनेरी दुनियेतून परतण्याचा ॓शॉर्टकट ॔ मला लवकरच सापडला. काही दिवसांपूर्वी सुलेखाताई,  ॓आज मी लवकर घरी येते. दोघी मिळून थोडे लाडू, शंकरपाळे करू.॔ असे सांगून शाळेत गेली. आणि अनपेक्षितपणे, सुखाला चटावलेला सुरेंद्र लवकर घरी आला. त्याला मी ॓आज ताई पण लवकर घरी येणार आहे.॔ असं अजिबात सांगितलं नाही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे आमच्या प्रेमाचा सिलसिला सुरू असतानाच सुलेखाताई तिच्याकडची किल्ली लावून दार उघडून आत आली. सुरेंद्रला घाईनं माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहून आणि आमच्या चेहऱ्यावरून तिनं काय ते जाणलं.

 खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तिला आमचा संशय होताच. पण आज आम्ही रंगेहाथ पकडले गेलो होतो. त्या दोघांची खूप वादावादी झाली. मलाही खूप बोलणी खावी लागली. शक्य तितक्या लवकरचं तिकीट काढून माझी मुंबईला रवानगी करण्याचा निर्णय झाला. मी ताईकडून आठवणीनं माझ्या पासपोर्टबरोबर माझं बारावीचं आणि माझी इतर सर्टिफिकेट्स मागून घेतली आणि मगच माझी बॅग भरायला घेतली. दीदी, मी तुम्हा दोघांची क्षमा मागते. माझा अपराध तुम्ही समजून घ्याल ना?॔ 

 राजश्री काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं याबद्दल खंत करावी की आपण विश्वासानं दुसऱ्या देशात पाठवलेली दुसऱ्याची मुलगी सुखरूप घरी आली याबद्दल देवाचे आभार मानावे हेच तिला समजेना. डोळे पुसत, जिना उतरणाऱ्या चित्राकडे ती निःशब्द होऊन नुसती बघत उभी राहिली.

 मन मोकळं झाल्याने चित्राला आता जरा बरं वाटत होतं. राजश्रीताईकडून घरी येताना चित्राला दुबईतला आणखी एक प्रसंग आठवला…

… एकदा काही खरेदीसाठी ती सुलेखाताई आणि सुरेंद्र एका मॉलबाहेर भेटणार होते. त्या दिवशी सुरेंद्रनं आपल्याला घरी फोन करून ठरल्या वेळेपेक्षा एक तास लवकर तयार राहायला सांगितलं होतं. सुरेंद्रला आवडणारा सुंदर आकाशी रंगाचा ड्रेस घालून आपण तयार झालो. ड्रेसचं आणि आपलं सुरेंद्रनं अगदी ॓साग्रसंगीत  ॔कौतुक केलं. बाहेर पडल्यावर गाडी वेगळ्याच दिशेला निघालेली पाहून आपण सुरेंद्रला विचारलं ,॓आपल्याला ताईने तिकडच्या मॉलमध्ये बोलावलं आहे ना ?॔हो. पण त्याआधी एक सरप्राईज आहे बाईसाहेबांना. असं म्हणत सुरेंद्रने गाडी ॓गोल्डसूक ॔ जवळ उभी केली. मागे ताईंबरोबर खरेदीला गेलो होतो तेव्हा आपल्याला आवडला होता तसाच सोन्याचा सेट सुरेंद्रने आपल्यासाठी खरेदी केला. भारावून जाऊन तो सेट पर्समध्ये ठेवताना आपल्याला झालेला आनंद आपण लपवू शकलो नाही. गाडीत बसल्यावर सुरेंद्र म्हणाला,  ॓बाईसाहेब याची पुरेपूर वसुली मी करणार आहे बरं !॔आपण खोटं खोटं रागावून त्याला आणखीनच उत्तेजन दिलं होतं. मॉलमधली खरेदी आटोपून, घरी येऊन सारं आवरल्यावर रात्री आपण आपल्या खोलीचं दार लावलं. तो चमचमणारा सुंदर सेट घालून स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात न्याहाळलं. मग एका जुन्या ड्रेसमध्ये तो सेट गुंडाळून अलगद बॅगेच्या तळाशी ठेवला.

… आत्ता दीदीला सगळं काही सांगताना ही गोष्ट आपल्याला आठवली नाही की हे सांगायचं आपण मुद्दामून टाळलं ?

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.) – इथून पुढे – – 

साऱ्या विचारांनी, आठवणींनी शिणून राजश्रीला झोपाळ्यावरच डुलकी लागली. जाग आली तेव्हा सुनंदाबाई स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. रमेश येऊन त्याचं आवरून पेपर वाचत होता. राजश्री जागी झालेली पाहून त्यानं काळजीन विचारलं,  ॓बरं वाटत नाहीये का? किती थकलेला दिसतोय तुझा चेहरा!॔ 

“ काही नाही. थोडी डुलकी लागली होती. देवाजवळ देवा लावते आणि जेवून घेऊया “ राजश्री उठत म्हणाली.

जेवण झाल्यावर राजश्रीने संध्याकाळी बँकेत कळलेली चित्राच्या अकाउंटची हकीगत रमेशला सांगितली. चित्रा चोरी करणार नाही याबद्दल दोघांचीही खात्री होती.

मग नेमकं काय झालं असेल? चार-पाच महिन्यात एवढे कसले पैसे जमा झाले असतील? अशा विचारांच्या आवर्तात केव्हातरी राजश्रीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून रमेश दौऱ्यावर चालला होता तेव्हाच राजश्रीलाही जाग आली होती पण तिला उठावसंच वाटेना. पुन्हा चित्राच्या विचारात ती बुडून गेली..

 *****

सुरुवातीला आठवड्यातून एकदा चित्राचा ठराविक वेळी फोन येई तेव्हा तिची आई, भाऊ येऊन बसत. स्पीकरवर फोन ठेवला की साऱ्यांना तिचं बोलणं ऐकता येई. आणि तिच्याशी बोलताही येई. दुबईच्या कितीतरी गोष्टी ती उत्साहाने सांगत असे.

॓दीदी इथला एअरपोर्ट, रस्ते अगदी स्वच्छ आणि सुंदर आहेत. रस्त्यावर छान झाडं, फुलं आहेत आणि दिनेश रस्त्यावर इतक्या प्रकारच्या सुंदर मोटारी बघितल्या ना की मला तुझी खुप आठवण येते. किती प्रकारची गाड्यांची चित्रं तू जमविली आहेस. मी येताना आणीन आणखी चित्रं तुझ्यासाठी.

दीदी, सुलेखाताईची जागा पण आपल्यासारखी छान आहे. इथे मॉल्सपण खूप मोठे आहेत. ही दोघही मला बरोबर घेऊन जातात. आम्ही खरेदी करतो, खातो पितो. काळजी करू नका मी मजेत आहे.॔ असं उत्साहाने सांगायची तर कधी आपुलकीने दीदीची, भाईसाहेबांची चौकशी करायची. दहावीत गेलेल्या दिनेशला नीट अभ्यास करायलाही सांगायची.

घरकाम आणि स्वयंपाक या दोन्ही जबाबदाऱ्या चित्रानं घेतल्याने, सुलेखाला अगदी मोकळं छान वाटत होतं. गेली चार वर्ष स्वतः सगळं काम आणि नोकरी करण्यात तिची फार धावपळ झाली होती.

असाच एकदा चित्राचा ठरल्यापेक्षा वेगळ्या वेळी फोन आला होता.  ॓दीदी इथे येऊन आता दोन महिने होऊन गेले. मी सुलेखा ताईला माझ्या होम सायन्सच्या कोर्सबद्दल विचारलं. माझी सर्टिफिकेट तिच्याजवळ दिली. पण सुलेखा ताई म्हणाली की तू येईपर्यंत इथलं शैक्षणिक वर्ष अर्धं संपून गेलं आहे. आता तू घरच्या कॉम्प्युटरवर दुपारी प्रॅक्टिस कर. काही नवीन माहिती मिळव.॔ हे सारं ऐकताना चित्राच्या आवाजातली निराशा झाली जाणवत होती.

त्या रात्री मुद्दाम फोन करून राजश्री सुलेखाशी बोलली. पण ॲडमिशनचे काही अवघड नियम गोड भाषेत सांगून सुलेखानं वेळ साजरी केली. पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनची आत्ताच चौकशी करते असेही ती म्हणाली. पण राजश्रीच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. पूर्ण शैक्षणिक वर्ष फुकट गेल्याने चित्राचाही जीव हळहळत होता. तिला मुकाट्याने घर काम आणि बाजारहाट करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तिच्या पगाराचे पैसे मात्र सुलेखा नियमित पाठवत होती. तरी हळूहळू चित्राच्या फोनमधला उत्साह कमी होत असल्याचं राजश्रीला जाणवलं.

काल बँकेत कळालेल्या माहितीने तर राजश्रीला आणखीनच कोड्यात टाकलं होतं. सुलेखाला सकाळीच फोन करावा असं ठरवून राजश्री स्वतःचं आवरत होती. तेवढ्यात सुनंदाबाई आल्या त्या सांगतंच की,  ॓अहो दीदी, चित्रा आज पहाटे अचानक घरी आलीय. तुम्हाला सर्वांना भेटावसं वाटलं म्हणून आले. इतकंच बोलली आणि डोक्यावर पांघरून घेऊन आडवी झाली. आज रात्री ती तुम्हाला भेटायला येणार आहे. माझ्याशी धड काही बोललीच नाही. तुमच्याजवळ बोलेल काहीतरी कदाचित !॔हे ऐकून राजश्रीला चांगलाच धक्का बसला. सुलेखानं साधं फोन करून चित्राच्या येण्याबद्दल कळवलंही नव्हतं. काय झालं असेल नेमकं? राजश्री विचारात पडली. आता रात्रीची आणि चित्राची वाट बघण्याखेरीज उपाय नव्हता.

चित्रा आल्यावर राजश्रीनं तिला स्वतःजवळ सोफ्यावर बसवून घेतलं. पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमानं विचारलं,॓ बरी आहेस ना बेटा?॔ पण राजश्रीच्या या प्रश्नावर चित्रा बांध फुटल्यासारखी गदगदून रडू लागली. राजश्रीने तिला थोडं रडू दिलं. शांत झाल्यावर चित्रा म्हणाली,  ॓दीदी, माझ्या हातून मोठी चूक झालीय. मला क्षमा करा. मी तुमचा माझ्यावरचा विश्वास मोडलाय. काय आणि कसं सांगावं तेच कळत नाहीये….. पण आता मला सगळं सांगायलाच हवं.

तिथे माझा सगळा दिवस कामात जात होता पण रात्री मात्र माझ्या खोलीमध्ये झोपायला गेल्यावर तुमच्या सर्वांच्या आठवणीनं मला फार रडू यायचं. एकटं.. एकटं वाटायचं. तिथे खायला प्यायला कमी नव्हतं पण ज्या उद्देशाने मी इथे आले होते त्या माझ्या शिक्षणाचं काहीच पुढे होत नव्हतं.

सुट्टीच्या दिवशी त्या दोघांबरोबर मला फिरायला मिळायचं. चकचकीत, डोळे दिपवणाऱ्या त्या श्रीमंत जगाचं दर्शनही मोहात पाडणारं होतं. त्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा मॉलमध्ये गेले तेव्हा त्या उंच सरकत्या जिन्यांवरून मला सावरण्याच्या निमित्तानं सुरेंद्रने माझा हात दाबून धरला, तेव्हाच त्याचा स्पर्श मला वेगळा वाटला. मग लक्षात यायला लागलं की, सुलेखाताई अंघोळीला गेली असेल तेव्हा स्वयंपाकघरात काहीतरी मागायच्या निमित्ताने येऊन तो मला जाणूनबुजून स्पर्श करायचा. दीदी, खरं सांगते इथे तुमच्याकडे मला कसलीच भीती वाटली नाही. भाईसाहेबांबद्दल तर नेहमी आदरच वाटला. पण तिथे सुरेंद्रचं लागट वागणं जाणवायला लागलं होतं.॔ 

चित्रा पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. चित्राच्या डोळ्यांपुढे तो पहिलाच प्रसंग उभा राहिला…

एकदा सुरेंद्र अचानक ऑफिसमधून लवकर घरी आला. सुलेखाताईला घरी यायला अजून वेळ होता. आपण सोफ्यावर बसून कादंबरी वाचण्यात गढलो होतो. वॉश घेऊन आल्यावर सुरेंद्रनं बॅगेतून एक छान मोठं चॉकलेट काढून आपल्या पुढे धरलं. चॉकलेट घ्यायला हात पुढे केल्यावर तो म्हणाला,  ॓अगं, नको. पुस्तक वाचतेयस ना? ते खराब होईल. मीच देतो तुला… असं म्हणत त्यानं अगदी जवळ बसून आपल्या तोंडात चॉकलेट भरवलं. आपण वाचत असलेल्या कादंबरीत नुकताच अशा प्रकारचा प्रसंग रंगवला होता. त्यानं लावलेल्या भारी सेंटचा मंद सुवास, तोंडात विरघळणाऱं चॉकलेट, त्याची भुरळ घालणारी नजर सारं मोहात पाडणारं होतं. त्याच्या मिठीला आपण केलेला प्रतिकार लटका आहे हेही त्याच्या केव्हाच लक्षात आलं होतं… 

पण हे सगळं दीदीला कोणत्या तोंडानं सांगणार?

हुंदके थांबल्यावर चित्रा दीदीला एवढंच म्हणाली, दिवसेंदिवस दिवस त्याची लगट वाढत चालली होती. आणि मी कबूल करते की माझाही पाय मोहाच्या घसरगुंडीवर पडला होता. मला सावरायला कुणी नव्हतं.

सुरेंद्र– सुलेखा ताईच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. खरेदी करायला आम्ही तिघं एकत्रच गोल्डसुक मार्केटला गेलो होतो. सोन्याचा तो चमचमणारा बाजार पाहून डोळे दिपून जात होते. ताईंची पसंती चालली होती. मीसुद्धा मला आवडलेला एक सोन्याचा नेकलेस पुन्हा पुन्हा गळ्याला लावून बघत होते. मागच्या आरशात पाहिलं तर सुरेंद्र ॓छान दिसतोय ॔ अशी पसंतीची मान डोलावत, मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होता. दोन-चार पगार आपल्याला इथेच द्यायला सांगून तो सेट खरेदी करता आला तर किती छान होईल, या विचाराने झोपेतसुद्धा मला तो हार दिसत होता.॔ 

थोडं थांबून, पाणी पिऊन चित्रा पुढे सांगू लागली,  ॓एखादं सामान आणायचं राहिलं असलं तर मी आमच्या घराजवळ असलेल्या स्टोअरमध्ये जात असे. तिथेच माझी आणि हमीदाची चार-पाच वेळा गाठ पडली होती. ती सुद्धा काही सामान घ्यायला स्टोअर मध्ये यायची. तिच्याशी बोलताना कळलं की तीही हैदराबादहून इथे एका कुटुंबात काम करण्यासाठी आली होती. तिला आठ नऊ भावंडे होती. वडिलांच्या बांगड्या विकण्याच्या व्यवसायात त्यांचं भागत नव्हतं. कुणाच्या तरी ओळखीनं ती दुबईला आली होती. साधारण माझ्याच वयाची होती. इथे तिला घरकाम पुष्कळ होतं. फक्त नियमितपणे तिच्या घरच्यांना तिचा पगार मिळत होता आणि हमीदाला पंधरा-वीस दिवसांनी अम्मीशी फोनवर बोलता येत होतं.

त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती.

– क्रमशः भाग दुसरा

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

॓सुनंदाबाई, संध्याकाळी चांगली कोवळी मेथीची जुडी आणा. भाईसाहेब दोन-तीन दिवस बाहेरगावी जात आहेत. थोडे पराठे बरोबर देता येतील. ॑ नाश्ता करता करता राजश्री सुनंदाबाईंना दिवसभरच्या कामाच्या सूचना देत होती.

रमेश नाश्ता करून कोर्टाच्या कामासाठी बाहेर पडला होता. त्याच्या वडिलांपासून चालत आलेली त्यांची टॅक्स कन्सल्टेशनची फर्म चांगली नावाजलेली होती. एम कॉम झालेली राजश्री फर्ममध्येच अकाउंटस् चं काम सांभाळायची. आवरायला उशीर झाला की राजश्रीला चित्राची खूप आठवण येई.

  ॓दीदी, ड्रेसला इस्त्री करून ठेवली आहे. मॅचिंग बांगड्या गळ्यातलं पण ठेवलाय तिथेच आणि टेबलावर गोड ताज्या ताकाचा ग्लास ठेवलाय. आठवणीने प्या बरं का. मागचं सर्व आवरून येतेच मी ऑफिसला.॔ असा प्रेमळ आग्रह करणाऱ्या हुशार, चटपटीत चित्राला दुबईला पाठवून आता वर्ष होऊन गेलं होतं.

  ॓हल्ली ती फोनवर पहिल्यासारखी उत्साहाने बोलत नाही. नुसतं हो… नाही.. बरं.. म्हणंत फोन ठेवून देते. काही बिनसलय का तिचं ते एकदा नीट विचारलं पाहिजे.॔ असा विचार करत राजश्री सँडल्स घालत होती. तेवढ्यात फोन वाजला.

  ॓आता कोण असेल? आधीच उशीर झालाय ॔. असं मनात म्हणंत राजश्रीनं फोन उचलला. फोन तिच्या नेहमीच्या बँकेतल्या मॅनेजरचा होता. राजश्रीला शक्य तितक्या लवकर बँकेत भेटायला बोलावलं होतं.

  ॓संध्याकाळी नक्की येऊन जाते.॔ असं म्हणत राजश्रीनं फोन ठेवून दिला. एवढं अर्जंट काय काम असेल तिला प्रश्नच पडला.

 *****

  ॓तुमच्याकडे कामाला असलेल्या चित्राचा आपण इथे तुमच्या मदतीने एन् आर् आय् अकाउंट उघडला आहे. या नॉन रेसिडेंट इंडियन अकाउंटमध्ये दरमहा 22/25 हजार रुपये जमा होतात आणि त्यातले 15/16 हजार रुपये काढले जातात.॔ संध्याकाळी भेटल्यावर बँक मॅनेजरने सांगितलं.

  ॓ हो. मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्राला आम्ही दुबईला माझ्या मैत्रिणीकडे मदतीसाठी पाठवत आहोत. तिचा भाऊ येऊन घरखर्चासाठी थोडे पैसे काढत जाईल. राजश्री म्हणाली.॔

पण गेल्या चार-पाच महिन्यात या अकाउंटमध्ये नेहमीच्या रकमेशिवाय

आणखी जवळजवळ दीड लाख रुपये जमा झाले आहेत. काही फिक्सड् डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर विचारा तिला. ही जमा रक्कम थोडी जास्त वाटली नेहमीपेक्षा म्हणून बोलावलं तुम्हाला. मॅनेजर म्हणाले ॔

  ॓थँक्स! मी कळवते तुम्हाला काय करायचं ते.॔ असं म्हणून राजश्री गडबडीने उठली.

घरी येईपर्यंत उलट सुलट विचारांनी राजश्रीचं डोकं भणभणून गेलं. तोंड धुऊन तिनं कपडे बदलले. सुनंदाबाईने दिलेलं गरम थालीपीठ आणि तिला आवडणारी वेलचीची कॉफी पितानाही तिच्या डोक्यात चित्राच होती. चित्राचा विषय सुनंदाबाईंजवळ… तिच्या आईजवळ… काढावा का हा मनातला विचार तिने बाजूला केला.

आधी रमेशजवळच बोलावं याबद्दल, असं ठरवून ती गप्प राहिली. खाण्यापिण्याची भांडी आवरून सुनंदाबाई बाजारात गेल्या. रमेश यायला अजून तसा वेळ होता. हॉलमध्ये टांगलेल्या वेताच्या झोपाळ्यावर ती विचार करत बसली. तिचं मन पाच सहा वर्ष मागे गेलं.

 *******

राजश्रीचं गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं. कदाचित गर्भाशय काढावही लागणार होतं. ऑपरेशननंतर दोन-तीन महिने राहायला येऊ शकेल असं सासर… माहेरचं कुणीच नव्हतं. त्यामुळे घर सांभाळेल, तिची काळजी घेईल अशा एखाद्या चांगल्या बाईच्या ती शोधात होती. त्याचवेळी तिच्याकडे भांडी घासणाऱ्या बाईंनी तिला चित्राचं नाव सुचवलं होतं. चित्राची आई बाईंच्या लांबच्या नात्यातली होती. अलिबाग जवळच्या एका छोट्या गावात ती मुलगी कुटुंबीयांसह राहत होती. चित्राच्या कामसूपणाची, चांगुलपणाची बाईंनी खात्री दिली आणि मदतीसाठी चित्राला मुंबईला आणायचं ठरलं.

चित्राने थोड्याच दिवसात मुंबईच्या जीवनाशी जुळवून घेतलं. राजश्रीदीदी आणि भाई साहेबांचा विश्वास संपादन केला. ऑपरेशननंतर दीदीची मनापासून काळजी घेतली. तिची औषधं, खाणं.. पिणं सारं सांभाळलं. डायबेटीस असलेल्या भाईसाहेबांचं पथ्याचं खाणं शिकून घेतलं. स्वच्छ, नीटनेटक्या, हसतमुख मितभाषी चित्राला राजश्री आणि भाईसाहेबांनी घरातल्यासारखंच वागवलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि आता राजश्रीच्या ऑपरेशन नंतर ती शक्यताही दुरावली होती.

चित्राच्या बोलण्यातून कळलं होतं की तिच्या वडिलांना मुंबईत चांगली नोकरी होती पण त्यांच्या व्यसनामुळे साऱ्या संसारावर अवकळा आली होती. धाकट्या दोन भावांच्या शिक्षणासाठी चित्रांने स्वतःच शिक्षण आठवीनंतर सोडलं होतं आणि गावातच एक लहानशी नोकरी धरली होती. आईसुद्धा मोलमजुरी करत होती. चित्रा तिला मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाला मदत करत होती. तिला घरच्यांची आठवण यायची पण लांब राहून का होईना आपण त्यांना मदत करतोय हे जाणवलं की तिला बरं वाटायचं.

राजश्री आणि भाईसाहेबांनी तर या कुटुंबाला आधार द्यायचं ठरवलंच होतं.

  ॓चित्रा, तू आता इथेच राहून रात्र शाळेत जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. आपण जमेल तसं तुझ्या भावांना आणि आईलासुद्धा आणू इथे. दीदी आणि भाईसाहेबांच्या या बोलण्याने चित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिची रात्र शाळा सुरू झाली. राजश्रीने खटपट करून, डिपॉझिट भरून एक छोटी दीड खोलीची जागा या कुटुंबासाठी मिळवली आणि काही महिन्यातच चित्राची आई आणि भाऊही मुंबईला आले. राजश्री आणि भाईसाहेबांनी  ॓कमवा व शिका॔ असा चांगला गुरुमंत्र या कुटुंबाला दिला होता. कुटुंब खरंच गुणी होतं. जर मोठा दिनेश शाळेत जायच्या आधी जवळपासच्या सोसायटीतल्या चार-सहा जणांच्या गाड्या पुसायच्या तर कधी कुणाला दूध, भाज्या आणून द्यायचा. चित्राच्या आईला सुद्धा चांगली घरकामं मिळाली. धाकटा भाऊ जवळच्या शाळेत जायला लागला. सगळ्यांचं आयुष्य आधीपेक्षा सुकर झालं होतं.

अशीच एकदा राजश्रीची बालमैत्रीण सुलेखा एका लग्नाच्या निमित्ताने राजश्रीकडे चार-पाच दिवस राहायला आली होती. पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन सुलेखा नवऱ्याबरोबर दुबईला गेली होती. त्यानंतर आत्ताच मैत्रिणींची भेट होत होती. त्यामुळे गप्पांना, खाण्यापिण्याला, फिरण्याला उधाण आलं होतं. सुलेखाचा नवरा सुरेंद्र दुबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. सुलेखा तिथल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती.

इथे आल्यावर, राजश्रीच्या घरी काम करणारी कामसू, विश्वासू, शांत स्वभावाची चित्रा सुलेखाच्या मनात भरली. त्यावेळी नुकतीच बारावी पास झालेल्या चित्रांनं पुढे कुठलं शिक्षण घ्यावं याची चर्चा राजश्रीकडे चालू असतानाच,  ॓चित्रासारखी मुलगी आपल्याला मदतीला मिळाली तर?॔ असा विचार सुलेखाच्या मनात चमकून गेला.

  ॓अगं, चित्राला आमच्याकडे दुबईला पाठवतेस का? तिथे आता मुलींसाठी स्पेशल होम सायन्सचा कोर्स सुरू झालाय. आम्ही चित्राला त्या कोर्सला घालू आणि मला चित्राची घरकामात मदतही होईल. आम्ही दरमहा तिच्या इथल्या अकाउंटमध्ये साधारण 22… 25 हजार रुपये जमा करू. तिचं शिक्षण होईल आणि पैसे पण जमतील.॔ सुलेखाने आपला प्रस्ताव राजेश्रीकडे मांडला.

राजश्री विचारात पडली. चित्राच्या कुटुंबाला पैशाची गरज तर होतीच. दोन्ही भावांचे शिक्षण, चित्राचं लग्न, मुख्य म्हणजे स्वतःची जागा असं सगळंच व्हायचं होतं. त्यांच्या राहत्या खोलीच्या कराराचे अकरा महिने कधी संपायचे कळायचंही नाही. मग राजश्रीलाच धावपळ करून, जादा भाडं कबूल करून जागेचं नवीन ॲग्रीमेंट करून घ्यावं लागायचं. सुलेखाच्या या प्रस्तावामुळे या कुटुंबाचा फायदा होईल असंच राजश्रीला वाटलं.

मुलीला एवढ्या लांब, अनोळखी ठिकाणी पाठवायला सुनंदाबाई प्रथम तयार नव्हत्या. मग चित्रानेच आईची समजूत घातली. चित्राला पासपोर्ट मिळाल्यावर सुरेंद्र सुलेखानं दुबईहून आवश्यक ती कागदपत्रं पाठवली. चित्राच्या येण्याचा उद्देश, तिची राहण्या जेवण्याची व्यवस्था, तिचा दरमहाचा पगार अशा बऱ्याच गोष्टींची नोंद तिथल्या सरकारी खात्यात झाल्यावर अखेर एकदाचं परवाना पत्र आणि तिकीट दुबईहून आलं. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मिलिटरीमध्ये निर्णयात्मक, कडक शिस्तीच्या आणि नियम बद्ध वातावरणात वाढलेल्या कर्नल साहेबांचा खाक्या काही और होता. भल्या पहाटे निसर्गरम्य वातावरणात वावरायला त्यांना खूप आवडायचं. चिमणपाखरांची भाषा त्यांना अवगत असल्यामुळे त्या दोस्तांशी दोस्ती करून बागेतून गोल फेरफटका मारून ते आपल्या पेन्शनर मित्रांकडे वळायचे.

आज पंधरा दिवस झाले तरी वासुनानांचा पत्ता नव्हता. हॊ त्याला कारणही तसंच होतं आयुष्याच्या संध्याकाळी पुढे जाण्यात त्यांच्या बायकोने, 1ला नंबर पटकावला होता.

ती मला सोडून माझ्या आधी देवाकडे का गेली? ह्या प्रश्नांच्या भोवऱ्यातून वासुनाना अजूनही बाहेर पडले नव्हते.

अखेर ह्या मित्र मंडळींनी त्यांना बागेत आणलंचं. त्यांना बोलतं करण्यासाठी मित्रांची धडपड चालूच होती.

पण ‘आता मी काय करू? कसा जगू? वेळ, दिवस कसा घालवू? ह्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येईना. सगळेच गप्प होते. सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं इतकं की कट्ट्यावर बसलेल्या मंडळींच्या तोंडून नेहमी एकच वाक्य बाहेर पडायचं.

“हम पंछी एक डालके” 

आणि बरं का! ह्या सगळ्यांचे पुढारी होते कर्नल साहेब. खूप विचार करून त्यांना एक आयडिया सुचली. उत्स्फूर्तपणे ते म्हणाले, “मंडळी मला एक विचार सुचलाय. आपण आता रिकामं बसून नाही चालायचं. रिकाम्या डोक्यात शिरू पाहणाऱ्या सैतानाची कत्तल करायची. एकदम गोळी मारायची त्याला” 

गोंधळलेल्या नागुअप्पांनी त्यांचा धबधबा आंवरत विचारलंन्, “अरे बा, कर्नलया तुझी मिल्ट्री भाषा सोड. आणि सरळ भाषेत बोल ना जरा! आपण नक्की काय करायचं ते तरी सांग. कुठून तरी वासुनाना निराशेतून बाहेर आलेचं पाहयजेतं”

“सांगतो,! सगळ सांगतो! नागूआप्पा तुमच्यापासून सुरुवात करूया. नागोजीराव अहो काय बॉडी आहे तुमची 85 पार केलीतं पण अजूनही 75 चेच वाटताय तुम्हीं. आहात कुठे! कर्नल साहेबांची गाडी रुळावर येतच नव्हती.

“अरे करण्या! तुझी गाडी रुळावरून घसरतीय लेका, मी काय विचारतोय आणि तू कां मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोयस?

आता मात्र सगळेच’एक डालकेपंछी’ओरडले”कर्नल साहेब मुद्द्यावर या, आणि सांगा तुमची भन्नाट आयडिया” 

कर्नल, भरदार मिशीतून मिस्कील हंसतं बोलते झाले, “आठवून बघा लहानपणीआपल्या शाळेत पी. टी. चा स्पेशल एक तास राखून ठेवलेला असायचा.

हॊ असायचा, पण मग त्याचं काय इथं? आपण काय आता त्या पी. टी. ला जाऊन वेळ घालवू शकतो का?

 “अहो मुद्याचं बोला हॊ कर्नल साहेब “उतावळे साठीचे संभाजीराव आता मात्र कावले होते. त्यांच्या गरम होत चाललेल्या डोक्यावर हात ठेवून साहेब म्हणाले, धीर धर! यार असा तापू नकोसआपल्या डोक्यात सैतान नकोय आणि संतापही नकोय. तुमच्या अधीर मनाला अधिक न ताणता माझ्या भेजातल्या आयडिया सांगतो,

 असं बघा नागप्पा ती समोर बालमंडळी बसली आहेतं ना, मोबाईल मध्ये डोकं खूपसून, त्यांना आपण मैदानात मोकळ्या हवेत, कोवळ्या उन्हात आणायचं आणि व्यायामात गुंतवायचं. एका जागी बसलेल्या ह्या गुळाच्या ढेपा हलल्याच पाहिजेत. बागेच्या गोल रिंगणात त्यांना पळवायचं. ” 

अरे पण महाभागा ती पोरं तयार होतील कां?

 कां नाही? त्यांचे बापही तयार होतील. पिझ्झापास्ता खाऊन ढेकर देणाऱ्यांना रींगणात पळवलेलं त्यांच्या आईबापांनाही नक्की आवडेल.

“अगदी बरोब्बर! मुलांना शिस्त लावणे त्यांना नाही जमलं, पण ते आपण जमवलं, आणि मी म्हणतो परस्पर पावणे बारा वाजले तर आईबाप कशाला विरोध करतील? उलट त्यांच्या ते पथ्यावरच पडेल. आपणचं सुरुवात करूया”

” बेस्ट आयडिया” आप्पा उत्साहाने उभे राहयले.

मिशीतल्या मिशीत हंसणाऱ्या कर्नल साहेबांच्या मनात आलं, होईल -होईल, दोस्तांना गुंतवण्याचा आपला प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. त्यांच्याअंगात चैतन्याचं वारं सळसळायला लागलं.

आणि मग कर्नल पुढे सरसावून म्हणाले, “म्हणजे आयडिया नंबर एक पटलीय ना तुम्हाला? कापऱ्या हातांच्या टाळ्या खणखणीत वाजल्या आणि बेंबीच्या देठापासून, शाळकरी मुलांसारखा कोरस भरगच्च होकार दणदणला.

कोपऱ्यातून विशूभाऊंचा आवाज आला, “अरे त्या बालचमुंबरोबर आपणही कवायत करू या की! त्यांना लगोरी, विटी दांडू काकडी कोशिंबीर इत्यादी खेळ शिकवूया. पोरं दमली कंटाळली तर मामाच पत्र हरवलं, बटाटा शर्यत इत्यादी गंमतीशीर खेळात त्यांना आपण गुंगवूया. हे जुने मजेचे खेळ खेळताना बागेतल्या कुंदकळ्यांबरोबर या बाळ गोपाळांच्या हास्यकळ्याही उमलतील. “कोपऱ्यातल्या त्या आवाजाला टाळ्यांनी दणकून दाद दिली. आणि पेन्शनरांच्या घोळक्यातून दिलखुलास खोडकर हंसू बाहेर पडलं. कर्नलचा खणखणीत आवाज दणाणला, “सुनो यार! आता आयडिया नं. 2 ते आपलं, वर्तुळातलं, समोरचं फिरत मोफत वृत्तपत्र वाचनालय आहे ना! तिकडे आपल्याला आता वळायचय” 

“त्यात काय! रोजच आपण जातो की तिथे. ती तर आपली फेवरेट जागा आहे. जगातल्या उलाढाली, राजकीय गोष्टी, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान याची बँक लुटायला. गप्पांचा फड संपल्यावर या आवडत्या अड्ड्याकडे आपण हमखास रोजच वळतोच की, कोवळ्या उन्हाची शाल पांघरून पेपर वाचायला का मज्जा येते राव!

त्या सुखकल्पनेतून मित्राला बाहेर काढत कर्नल म्हणाले, “सदुभाऊ पण या अड्डयावर आता आपण ह्या बाळगोपाळांना पण घेऊन जायचंय. “

काय सांगताय! पण येतील का ती पोर आपल्या म्हाताऱ्यांच्या बरोबर?

अहो येतील की, आपण त्यांचे प्रेमळ आजोबा होऊन त्यांची मोबाईल मधली मान वर्तमानपत्रात अडकवायची. असं बघा, अण्णांना वयामुळे दिसत नाही. ही छोटी मंडळी पेपर वाचून दाखवतील त्यांना.

मुलांना पण त्यामुळे स्पष्ट उच्चाराची, मराठी वाचायची, सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल”.

रघुदादांनी अण्णांच्या पाठीवर थाप मारली. “अण्णा लेका दुहेरी फायदा होईल तुझा. त्या मुलांचा आणि त्यांच्या बापांचा पण फायदा होईल. ” 

“तो कसा काय?

असं बघ मोबाईलचं भूत मानगुटीवर बसल्यामुळे पोरांचं डोकं आणि डोळेही बिघडलेत. तासंतास स्क्रीन समोर बसल्याने पाठदुखी, मान दुखी, चिडचिडेपणाआणखी काही विकारांनी आकार घेतलाय.

 त्यांच्या विकासाचा कणाच मोडलाय रे!

त्यांना दुजोरा देत जोशीभाऊ म्हणाले, “वर्तमानपत्रात राजकारण, खेळ, अर्थशास्त्र एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे मेंदूला चालना मिळून मेमरी वाढते. शब्दसंग्रह वाढून ज्ञानात भर पडते. नियमित वाचनाची सवय लागून रिकामं मन सैतानाचं घर न बनता बुद्धीचा आगर होतं. ” 

इतका वेळ पेपर वाचणारे गजाभाऊ ओरडले “अरे ही बघा आजकी ताजी खबर, उत्तर प्रदेश सरकारने शाळांमधून हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्याचा आणि प्रार्थनेच्या आधी दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतलाय. आणि जगभरातून ह्या निर्णयाचंशाळांतून स्वागतच झालय”

हे ऐकल्यावर कर्नल साहेबांनी आनंदाने आरोळीच ठोकली. “अरे मग आपणही हा निर्णय मान्य करून मराठी पेपर वाचन सुरू करूया. मुलांच्या जिभेला मातृभाषेचं वळण लाऊ. इंग्लिश मीडियम मुळे मराठी इंग्रजीची त्यांच्या बोलण्यात येणारी खिचडी तरी वाचेल. कर्नल साहेब बाकी तुमच्या पोतडीतल्या आयडिया भन्नाटचं असतात. उशीर कशाला! उद्याचाच मुहूर्त धरू.

बागेतल्या मारुती पुढे शकुनाचा नारळ फोडून, खोबऱ्याचा प्रसाद वाटून, कार्यक्रमाचा श्री गणेशा आत्ताच करूया.

कर्नल साहेबांनी पिल्लू सोडलं “मंडळी आता गुढीपाडवा जवळचं आलाय सगळ्या भाभीजींना माझा निरोप सांगा भरपूर मसाले भात करून आणायचा. कडुलिंबाच्या चटणीचा उतारा हवाच श्रीखंडपुरीची ऑर्डर देऊया. आणि साजरं करूया वनभोजन. उंच उंच गुडी बागेतच उभी करूया. मदतीला चिल्लीपिल्ली वानर सेना आपल्या हाताशी असेलच. अशाप्रकारे चैतन्य बागेत चैतन्य उसळलं. सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि होकार भरला 

 मंडळी काय सांगू तुम्हाला! तेव्हांपासून दरवर्षी ह्या चैतन्य उद्यानात गुढीपाडवा साजरा केला जातो बागेत उंच उंच गुढी उभारली जाते. माळापताकांनी बाग सजवली जाते. हौशी पुरुष मंडळी सनई सुरू करतात आणि मग काय! त्या चैतन्य बागेत वनभोजन साजरं होतं. नववर्षाची अशी ही उत्साही आनंदी सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू झाली.

अशा प्रकारे कर्नल साहेबांचा उपक्रम पार पाडतांना सगळेच आनंदात असतात.

बायकोच्या वियोगाचं काही काळ का होईना वासुनाना दुःख विसरलेत. कारण बागेत रोज पेपरवाचन, कवायत पकडापकडी, पळणे, p. T. चा तास साजरा होतो. बाल मंडळींबरोबर हे ज्येष्ठही आता चिरतरुण झालेत. दुःख आणि दुखणं गोंजारायला त्यांना आता वेळच नाहीय्ये बरं का!

आणि हॊ ह्याचं सगळं श्रेय नक्कीच कर्नलसाहेबांनाच आहे. तर धन्यवाद कर्नल साहेब. मित्र-मैत्रिणींनो तुम्हांलाही गुढी पाडव्याच्या आत्तापासूनच शुभेच्छा.

धन्यवाद 

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कार…!  लेखक : श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ संस्कार…!  लेखक : श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे

दुसरीत असताना एक धडा होता, एका शाळेत वार्षिक तपासणी सुरू असते. पाहुणे येतात, दोन मुलांना वर्गासमोर उभे करून विचारतात… सांगा बघू या दोघात श्रीमंत कोण आहे? एक दात किडका, हडकुळा मुलगा उभा असतो पण त्याच्या अंगावर मखमली सदरा असतो, टेरीकाँट्ची विजार असते, गळ्यात सोन्याची साखळी असते, पायात महागडे बुट असतात.

दुसरा मुलगा सुदृढ असतो, स्वच्छ दातांचा, हसतमूख, पण त्याचा गणवेश साधा असतो, त्याच्या गळ्यात दत्तात्रेयाचा काळा धागा असतो, पायात साध्या चपला असतात. मुलं काय पहिल्या मुलाकडॆ श्रीमंत म्हणून बोट दाखवतात.

कसले हे धडे? या पासून काय धडा घ्यायचा आम्ही? गरीब श्रीमंत हा भेद मात्र. त्या कोवळ्या वयात मनात जो ठसला तो पन्नाशी गाठे पर्यंत… तेंव्हा माझ्या डोळ्या समोर श्रीमंत मुलगा म्हणून यायचा तो आमच्या वर्गातला अर्णव तळवलकर… तो राहायलाही आमच्या समोर होता. ज्या काळात शेखर, मकरंद, उदय, शैलेश, दिलीप अशी ठरलेली नावं ऐकीवात होती त्या काळात या तळवलकारांच्या मुलाचं नाव अर्णव होतं. त्याच्या धाकट्या बहिणीचं नावही असच खास… जयजयवंती.

तशी अर्णवकडची प्रत्येक गोष्टच खास होती, त्या काळात त्याच्या हॉलमधे फ्रीज होता, घरात गुळगुळीत फरशी होती, शोभिवंत कार्पेट होतं, जेवायला बसण्यासाठी डायनींग टेबल होतं, फुलदाणीत कायम ताजी फुलं ठेवलेली असायची. टेबलावर डीशमधे रसरशीत फळं ठेवलेली असायची.

त्याची आई बिनबाह्यांचा ब्लाऊज घालायची, घरात वावरताना पायात स्लीपर घालायची, अर्णवच्या बाबांना अरे तुरे करायची..

आणि आमच्याकडे? सतत ओचा पदर खोचलेली, सतत कामात गर्क असलेली माझी आई. एक अंधारं स्वैपाकघर जिथे सतत तळणीचं काम चालायचं, एक दुरमुखलेली बैठकीची खोली.. दोन खुर्च्या कधीकाळी घेतलेल्या. आलेली पत्र अडकवण्यासाठी एक तार खिडकीत लटकलेली असायची. वेलजी भाई अँड सन्सचं फुकटात मिळालेलं बटबटीत कँलेंडर दुसर्‍या खिळ्यावर फडफडत असायचं.

केवढा हा विरोधाभास? कधी अर्णवकडे जावं लागलं तर, तर त्याची आई भूतदया दाखवल्यासारखं माझ्याशी चांगलं वागायची, अर्णवला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसायचा. पण त्याची आई माझ्यासमोरच त्याला समजवायची.. “असं नाही करायचं, शेखर तुझ्या वर्गात आहेना? ” तो माझ्याकडे आणखिनच तुच्छतेने बघायचा. कारण शाळेत बाई माझ्याशी कशा वागतात हे त्याला माहीत होतं. म्हणूनच मला सुद्धा त्याच्याघरी जायला मनापासून आवडायचं नाही. पण जावं तर लागायचच

कारण अर्णवची आई आमच्या आईकडून थालीपिठाची भाजणी, चकल्या, चिवडा, कुळथाचं पीठ असं काही ना काही घेत असायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे नकद द्यायची. आणि माझ्या हातावर पेपरमिंटची गोळी. एव्हाना पंचक्रोशीत माझ्याकडे दयेनं पाहणार्‍यांची संख्या वाढतच होती. त्यात अर्णवची आई आघाडीवर होती, ‘ छायाताई बघ किती कष्ट करतात? कुणासाठी? तुझ्यासाठीच ना? मग अभ्यास नको करायला? ’ हे समीकरण मला तेंव्हाही लक्षात यायचं नाही.. अजूनही येत नाही, आई कष्ट करते त्या बदल्यात मी अभ्यास करायचा? … मग आईचं सामान पोहचवून यायचो, गरम गरम पातेलं शेगडीवरून उतरवायला मदत करायचो, वाळवणं सांभाळायचो ते कशाच्या बदल्यात होतं?

पण कोणताही प्रश्न विचारायचा मला अधिकार नव्हता. कारण एक दोन वर्ष माझी दांडी उडाली होती. आता अर्णवही माझ्या वरच्या इयत्तेत गेला होता. तो काळ असा होता की, तुम्ही शालेय जीवनात अपयशी ठरलात की तुमचा जन्म वाया गेला. मग नाही नाही ते दोष तुम्हाला येऊन चिकटणार, जो बोलणार नाही तो आळशी… समोरचा आपल्याशी असा का वागतो? हे तेव्हा बरेचदा लक्षातच यायचं नाही.. एकदा असच झालं… ,

तेंव्हाचं आमचं पार्लं म्हणजे तुरळक वस्तीचं टुमदार गाव होतं. तिन्हीसांजेआधीच सामसूम व्हायची. इतकी की लोकलचा आवाज गावात घुमायचा, तशी त्या काळातही अर्णवची आई सोबत कामवाली घेतल्याशिवाय फिरायची नाही, ते ही ती दोन पावलं मागे.. अर्णवची आई पुढे, बाईच्या हातात पिशव्या, अर्णवच्या आईच्या हातात फक्त पर्स. पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे… प्रार्थना समाजच्या इथल्या चिंचोळ्या रस्त्यावरून ती एकटीच चालली होती, वातावरण अंधारलेलं, रस्त्यावर तुरळक रहदारी, तिच्या हातात सामानाच्या पिशव्या… योगायोग असा की माझ्या आधी अर्णव तिथूनच सायकलवरून पास झाला, तेंव्हा आम्ही दोघे टिळक मंदिराच्या व्यायाम शाळेत जायचो. एकदमच बाहेर पडायचो. पण त्याच्या बाबानी त्याला नवीन स्टायलीश सायकल घेऊन दिल्यापासनं त्याच्या लेखी माझा भाव आणखीनच घसरला होता. तो पुढे निघून गेला.

मला आश्चर्य वाटलं. आम्हाला आई रस्त्यात अचानक दिसली की कोण आनंद व्हायचा,… अक्षरश: आम्ही उड्या मारायचो.. जरा हातातली पिशवी घे असं आईला सांगावं लागायचं नाही. ते आपोआपच आमच्याकडून घडायचं. आम्ही सगळीच भावंड आईसाठी वेडी होतो. पण अर्णव मात्र भुर्र्कन निघून गेला, मी त्याच्या आईपाशी थांबलो. म्हंटलं ‘आज उशीर झाला तुम्हाला…’

त्या ‘हो अरे…’ म्हणत काहीतरी बोलल्या. मी म्हणालो, द्या पिशव्या मी घरी नेऊन पोहोचवतो. त्याना पण ओझं जडच झालं होतं. त्या सुखावल्या. पटकन पिशव्या माझ्या सायकलला लावल्या, आणि मी निघणार… तेव्हढ्यात त्यांनी मला थांबवलं. क्षणात, क्षणापुरता त्यांचा अविर्भाव बदलला.

तो बदल, त्यांचा तो सावधपणा, त्याही वयात मला खटकणारा होता. सावध होत, त्यांनी सहजपणाचा आव आणत त्यांची पर्स काढून घेतली. त्यांच्या या कृतीला अनेक पदर होते. माझी कौटूंबीक पार्श्वभूमी, माझी शालेय प्रगती, माझ्याबद्दल मारले जाणारे शेरे, ताशेरे… निमूट राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी निमूट पुढे झालो.

काळही पुढे जात होता. अर्णव वारेमाप शिकला. मधे दोन तीन वर्ष अमेरिकेला सुद्धा होता… मी पण सुचेल ते लिहित होतो. नशिबाने हात दिला होता, त्या आधी घर सोडलं. पार्लं कायमचं सुटलं होतं, अर्णवचं लग्न झालं, त्याचे बाबा गेले, जयजयवंती सासरी गेली, हे सगळं कानावर येत गेलं. माझी गोष्टही माझ्या परीने पुढे सरकत होती.

मग “मी नवा ” हे आणखी एक पुस्तक बाजारात आलं. या पुस्तकाच्या निमित्ताने दिलिपभाईनी एक कार्यक्रम पार्ल्याचा मार्केटमधल्या राममंदिरात ठेवला. तिथे अर्णवची आई आली आणि मला भेटायला थांबली. जाताना इतकेच म्हणाली, “ उद्या मला इथेच भेटशील का? माझं महत्वाचं काम आहे. ”

मी उमाकडे बघितलं. तिने मला कळेल अशी मान तुकवली आणि भेटायची वेळ ठरली. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो सुद्धा… औपचारीक बोलणं गरजेपुरतं झाल्यावर त्या म्हणाल्या, “ माझं एक महत्वाचं काम आहे “… असं म्हणत त्यानी एक पुरचूंडी माझ्या हवाली केली. म्हणाल्या यात चवदा तोळे सोनं आहे. कसंही करून तू हे जयूला नेऊन दे. मी जाणं शक्य नाही आणि ती आली तरी मी हे करू शकत नाही. कारण माझ्यावर सुनेचा आणि नातवंडाचा पहारा असतो. हे अर्णवच्या हाती लागलं, तर हे सुद्धा तो गिळून टाकेल. घर आणि काही पाँलीसीज त्याने फसवून माझ्या सह्या घेऊन बळकावलं आहेच, घर त्याने त्याच्या नावावर करून घेतलंय, हे त्याच्या सी ए नेच मला सांगितलय. मी मला माहीत नसल्याचा आव आणून त्या घरात खोट्या मानाने राहते, पण मी पुर्णपणे त्याच्या कह्यात आहे.

… आधी घर स्वच्छ ठेवायला धडपडत होते. आता सगळं नीट आहे हा लोकांचा गैरसमज टिकवायला धडपडते आहे. मला माहीत आहे, मी गेल्यावर हा जयुच्या तोंडाला पानं पुसणार आहे. देवदयेनं तिला काही कमी नाही, पण तरी आईकडून असं काहीतरी मला तिला द्यायचं आहे… पिशवीतून पर्स काढून घेणार्‍या त्याच होत्या. ती पुरचुंडी स्विकारणारा मीच होतो. भोवतीचं पार्लंही तेच होतं पण.. पण काळ बदलला होता..

– – मला काय वाटतं माहितिये, यशाने तो माणूस बदलत नाही, पण त्याच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलतो…

त्यांनी जयजयवंतीचा घाटकोपरचा पत्ता दिला, सवड झाली की जा म्हणाल्या..

मी घाईने म्हणालो “ इतकं जोखमीचं काम, सवडीनं जा काय… मी उद्याच जातो. तुम्ही तिला तसं कळवून ठेवा…”

– – खरं सांगतो ती चवदा तोळ्यांची पुरचुंडी खिशात जपून ठेवली आणि डॊळ्यासमोर त्या धड्यातली दोन मुलं उभी राहीली… त्यांच्या जागी अर्णव आणि मी दिसायला लागलो आणि श्रीमंतीचा खरा अर्थ समजला…

… घेतलेली कामगिरी उद्या चोख बजावल्यावर तर, अर्णव माझ्याशेजारी उभा राहूच शकत नव्हता…

लेखक : श्री चंद्रशेखर गोखले

प्रस्तुती : प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ मेरे पास ‘भूख’ की कहानी है! ☆ श्री परम शिवम ☆

श्री परम शिवम

(श्री परम शिवम (डी आई जी – सी आर पी एफ) पत्रकारिता एवं जनसंचार में स्नातक तथा वाणिज्य में स्नातकोत्तर। अनुशासित जीवन के साथ एक संवेदनशील हृदय. हम श्री परम शिवम जी का साहित्य आपसे समय समय पर साझा करते रहेंगे. आज प्रस्तुत है आपकी एक हृदयस्पर्शी संस्मरणात्मक कथा – मेरे पास ‘भूख’ की कहानी है!.)

 

कथा कहानी – मेरे पास ‘भूख’ की कहानी है! ☆ श्री परम शिवम

(‘सतरंगी दस्तरख्वान’ (संपादन- सुमना रॉय, कुणाल रे अनुवाद- वंदना राग, गीत चतुर्वेदी) में खाने की कहानियाँ हैं, अन्न की कहानियाँ- फार्मचे पाव, साउरडॉ, रसम, सारस्वत तमड़ी, भाकरी, पचडी-हुग्गी, किकोड़े, बैंगुनभाजा….. भोजन के विविध रूपों, व्यंजनों, पाक-कला की कहानियाँ, पर दुनिया का ऐसा कौन सा स्वाद जो मेरी ‘भूख’ की कहानी के बिना पूरा हो जाए-  श्री परम शिवम् )

बेसिक ट्रेनिंग संपन्न हो गयी थी और चालीस किलोमीटर की रेस सफलतापूर्वक करने के बाद कमांडो-ट्रेनिंग की भी इति हो आयी थी. अब प्रयाण था- बटालियन की पहली तैनाती पे सुदूर उत्तर पूर्व में मणिपुर जाना था, यही जीवन मे ‘दूर’ का आरम्भ था इसके बाद जीवन में अनगिन ‘दूर’ आए, करीबी शायद एकाध !

अकादमी से निकलते बरास्ता तीन दिन की छुट्टी ली गयी थी उसके बाद कमज़ोर मन ने पाँच दिन एक्स्ट्रा भी निकाल लिए थे, फिर भी तैयार ना था. अप्रेल-मई की गर्मियों की साँय-साँय करती दोपहर में ‘घर’ सोचते तो घर का कोना-कोना रस्सी होकर पाँव से लिपटने लगता, पाँव खुद-ब-ख़ुद स्तम्भित हो जाते, अडिग…अचल…अहिल.

यात्रा लम्बी थी-पहले जबलपुर से गुवाहाटी फिर आगे दीमापुर और फिर उसके बाद कॉन्वॉय से इम्फाल, लगे कित्ता दूर है, मन नहीं सोचता था पाँव ही सोचने लग पड़े थे और सोच-सोच जमते जाते थे, सून-सपाटा ऐसा कि कोई बोलने वाला भी न था-

सूखी रोटी तोड़ लें, कोई कहीं न जाए

आ पिया घर रहें मैं कमाउँ तू खाए

मन को मारा गया, कोनों की रस्सियों को खोला गया, पाँव उठाए गए और घर को छोड़ा गया, अजानी दिशाओं का प्रयाण और विलम्बित नहीं किया जा सकता था पर रत्ती भर भी मन नही, जबलपुर में हिले-डुले का धर्म भूलने वाले पाँव दादर-गुवाहाटी के स्लीपर कोच में चढ़े हैं, रात के दो बजे. जबलपुर से टिकट कन्फर्म नही हुई थी, टी टी ने मरी सी आश्वस्ति कर रखी थी-देखते हैं !

सिहोरा, स्लीमनाबाद, कटनी, मैहर, सतना… सब निकल रहे खड़े-खड़े, आस-पास ‘खड़ों’ की भीड़ है, सब खड़े-खड़े ही जा रहे, किसी के पास आश्वस्ति है, बाकियों के पास वो भी नहीं. सामान- एक सूटकेस, एक ट्रंक, एक बैग और एक होल्डाल-बेडिंग भी इधर-उधर हो रखी, मन के क्षेत्रफल मे किसी अन्य बात का अवसर ही न हो रहा, बस टुकुर-टुकुर टी टी को ताके जाएं, वो भी दृष्टि बचाते दूसरे कोच निकल गए. बाहर पौ फट रही, उषा की चमकीली रेख उभर रही किन्तु बर्थ-रहित अंतस में प्रत्यूषा का कोई आकर्षण नहीं, आंतरिकता निश्चिंत हो तो कोई सौंदर्य जगे इस अनिश्चय में क्या तो तुम्हें निरखें जगती ! मन, चेतना, ह्रदय, मस्तिष्क सब का केंद्र एक- बर्थ मिले तो प्रकृतिस्थ हों,तब बताते तुम्हें ओ दृश्यावलियों !

घर से निकले आठ घण्टे हो चुके, अंधकार का चँदोवा तो सतना में ही उठ गया था अब सूरज पूरा का पूरा चढ़ आया है, दिन का चमकीला थान खुल-बिछ गया. गाड़ी मुगलसराय पहुँची है, टी टी ने बर्थ भी कन्फर्म कर दी – साइड अपर ! सामान व्यवस्थित कर लिया गया है, बर्थ मिलते ही खंड-खंड व्यवस्थित हो आया है, अणु-परमाणु अपने घेरे में घूमने लगे हैं- आत्मस्थ, प्रकृतिस्थ, चेतनस्थ सब हो आया. सारी अनाश्वस्तियाँ पलक झपकते लुप्त हुई हैं, नासिका में वास आने लगी, कानों को सुनाई दे रहा, दृष्टि को दिखाई देने लगा-सामने जूस सेंटर है, कोई तृष्णा नहीं, बस नई-नई आश्वस्ति को सेलिब्रेट करना है, उतरता हूँ.

सद्य हासिल अचिंता को एन्जॉय करते एप्पल-जूस पिया गया है, हर घूँट में बर्थ प्राप्ति की स्वास्ति उतरी है, मन्यस्कता स्थिर हो रही, भुगतान के लिए पैसे बाहर निकाले फिर वापिस रखे है, कोई दो हज़ार रु कत्थई, ढीली जीन्स की पिछली पॉकेट में और आकर आश्वस्ति की पुष्टि के लिए बर्थ पर लेटता हूँ, जाने किस कौंध में पीछे पॉकेट पे हाथ मारता हूँ-‘अरे दूसरे पॉकेट में होंगे’ हाथ तत्क्षण दूसरे पॉकेट पर जाता है, हड़बड़ाहट सी हो जाती है, एक धड़के में वाशरूम की तरफ भागता हूँ, क्या उतार दूँ, क्या निकाल फेंकू कि दो हज़ार वापिस मिल जाएं, कहीं से झटक आएं, माँ ने बोला भी था सारे पैसे एक जगह मत रखना पर मलंग को किसका सुनना ठहरा, नहीं सुनी अब भुगतो ! वाशरूम की सीमित जगह में क्या-क्या न झटका गया, बस ट्रेन को झटकना रह गया था, दो हज़ार रुपए जा चुके थे, जेब कट गई थी. मन कैसा-कैसा हो आया था और कैसी तो नाउम्मीदी उतर आई थी ट्रेन के उस गंधाते प्रसाधन में. इधर-उधर खंगालने में सिर्फ छह रुपए और गुवाहाटी तक का टिकट ही निकल पाया. निढाल और विरक्त कदमों से बर्थ तक पहुँचता हूँ, ट्रेन कहाँ जा रही, क्यों जा रही, क्या जा रही, कोई लेना-देना नही, बोध-दर्पण हठात ही चटक-तिड़क उठा है, जगत बहा जा रहा पर कोई बिम्ब, कोई छवि नही उभर रही और तो और माँ के गर्भ से साथ हो लिया ‘आत्मालाप’ भी गूँगा पड़ गया है, सन्न पड़ा है, एक सपाटता सी पसर गयी है हर ओर हर छोर !

पिछली रात खाना खाया था, मुगलसराय में जूस पिया अब पेट पकड़ के साइड अपर पे लेटा हूँ, आँतों में हलचल है, भूख लग रही…

दोपहर भूखे पेट ही निकाल दी, पानी की बोतल साथ है, वही पी लेते हैं. मन रो रहा, घर वापिस लौट जाएं ! माँ ने सूजी के लड्डू साथ दिए थे, एकाध जैसे-तैसे गटका गया है, गला सूख रहा. कैसी तो बेकसी पसर रही अस्ति के सारे संभव में, जीवन का प्रवाह, आत्मा का प्रवाह, देह का प्रवाह, सारे प्रवाह रुद्ध हो आए हैं. बक्सर-दानापुर के आस-पास का इलाका है कुछ विद्यार्थी कोच में चढ़ें हैं, भीड़ बढ़ गयी है, मैने मुद्रा बदल ली है और उठ बैठा हूँ, एक छात्र बची जगह में ऊपर चढ़ आया है, साथ बैठ गया है. मन होता है उससे कुछ अनुरोध करूँ, आँतें बात-बात में ख़ुद को उमेठने सी लगती हैं. बातों का सिलसिला शुरू करता हूँ, अपना दुखड़ा रोता हूँ, बताता हूँ कि जेब कट गयी है अब पास कुछ नहीं किन्तु इसके आगे स्पष्ट रूप से माँग नहीं पाता, माँगने की सामर्थ्य नहीं, दीनता नहीं जुटा पा रहा, भूख के आगे अभी समर्पण नहीं, किसी के आगे समर्पण नहीं !

छात्र से कोई खाद्य न जुटता वो बस इतना ही बोलता है -“अरे ! मुगलसराय बहुत खराब है वहाँ तो यही होता है”

चौबीस घण्टे बीत गए कुछ खाए हुए, अन्न को देखे उसकी गंध लिए हुए…अन्न, अनाज, गंदुम, दालें, बासमती कितने नाम-रूप सब भीतर बन-बिगड़ रहे. रात के तिमिर को चीरती ट्रेन भागी जा रही.

गर्मियों के दिन, कोच में भी गर्मी पसरी है  पर प्यास नहीं लग रही, भूख लग रही है,

नींद नहीं आ रही, भूख लग रही है,

आँख नहीं लग रही, भूख लग रही है,

घर की याद आ रही, भूख लग रही है,

लौट जाऊँ, लौट जाऊँ भूख लग रही है.

आस-पास सबने खाना खाया है, किसी ने शिष्टतावश भी नहीं पूछा, भूख लग रही है.

कैसी कातरता है ! घर से लेकर चले ग्लूकोज़ पैकेट से बीच-बीच में ग्लूकोज़ मिला पानी पीता हूँ तो घड़ी दो घड़ी राहत होती है जैसे आँतें सो गई हों किन्तु थोड़ी देर में ही फिर मरोड़ उठने लगते हैं जैसे कोई शक्तिशाली पँजों से गीले कपड़ों के समान आँतों को मरोड़ रहा हो, यही क्रम हो रखा. थोड़ा ग्लुकोज-पानी पीता हूँ आँतें भ्रमित हुई हैं, आँख लग जाती है, करवट नहीं लेटता, पीठ के बल भी नहीं, पेट के बल लेटता हूँ आँतों पर दबाव डाल उनके उमेठ, उनके दर्द को काबू करता.

एक बस व्यवधान हो रखा शेष सब क्रम से हो रहा- दूसरी सुबह भी समय पर खुल रही, भगवान भुवन भास्कर, अनंत रश्मियों के चमकीले रथ पर सवार धरा तक आए तो, किंतु निपट खाली हाथ – ऐसे सूरज का मैं क्या करूँ, अन्नहीन…. खाद्यहीन….नाश्ता हीन ! तुम्हारा प्रकाश लेकर क्या करूँ अंशुमाली ! गेहूँ चाहिए चावल चाहिए मुझे ! क्षुधा की अरश्मियों ने तिमिर फैला रखा है उदर में, एक दाने का प्रकाश ही इस तिमिराच्छन्न को भेद पाएगा, इस जठराग्नि का शमन कर पाएगा जिसमें तिल-तिल मै स्वाहा हो रहा.

खाने को कुछ नहीं तो क्या ब्रश का स्वांग किया जाए. जिनके पास अन्न है, अन्न की सामर्थ्य है, ब्रश कर रहे, मुँह धो रहे, हँस-हँस कर अन्न की बातें कर रहे. मैं एक निरान्न आँतों को भरमाए रखने की जुगत में लगा हूँ- बोतल में पानी भर लिया जाए, ग्लूकोज़ मिलाकर घूँट-घूँट उतारते रहेंगे, बरगलाएँगे उन आँतों को जिनमें सहस्त्रों कांटे से उग आए हैं, जिनकी नोक हरपल आँतों की भीतरी दीवार को छेद रही. ट्रेन किसी छोटे निर्जन स्टेशन पर खड़ी है, नल से पानी भर लिया जाए !

आह ! अब यही बचा था, विपदा ! ऐसी परीक्षा करोगी भूख-आपदा में फँसे और होम-सिकनेस से जूझते मन की बोतल का ढक्कन गिरकर ट्रेन के नीचे पटरियों में चला गया है.

हे मालिक ! यही बोतल तो जीवन-रेखा हो रखी, इसके बिना तो आँतों को भ्रमित करना भी मुश्किल हो जाएगा.

जान की परवाह नहीं करता, भूख की परवाह करता हूँ, उतरता हूँ, ट्रेन के नीचे जाता हूँ, कोई भय नही, ट्रेन चल पड़ने की कोई आशंका नहीं, बस आँतों को शांत रखने का ध्येय ही आत्मा पर फहरा रहा, आत्मा भी रिक्त, क्षीण और कृश हो चली, अन्नहीन देहता में आत्मा का वो स्वरूप नहीं होता जो खाते-पीते इतराते बदनों में होता है.

तन की हवस मन को गुनाहगार बना देती है

बाग के बाग़ को बीमार बना देती है

भूखे पेटों को देशभक्ति सिखाने वालों

पेट की भूख इन्सान को ग़द्दार बना देती है

‘नीरज’ याद आते हैं और तिरोहित भी हो जाते हैं

नीचे वाली बर्थ पर सफेद कुर्ते पाजामे में तुंदियल से सज्जन जमे हैं. आते-जाते हर फेरीवाले से कुछ न कुछ लेकर खाने और लगातार चना-मूँगफली से अपना मुँह चलाते रहने के कारण सिंधी लगते हैं, मन में आता इनसे याचना करता हूँ , टूटने लगा हूँ, अब टूटने लगा है सब-कुछ, घर वाले कहते रहे हैं घुन्ना है,संकोची है, जिसे अब तक किसी संपदा सा सम्हाला वो संकोच भी टूटा जा रहा, माँग लेता हूँ, भयँकर भूख लग रही, माँग की अनुनय भीतरों में भाषा हो आयी है, बस ध्वनि होने को है, लेकिन जो भी चेष्टा सी पनपी थी गले में फंसकर रह जाती है फड़फड़ाती सी, नहीं माँग पाता ! उन्हें खाते देखता हूँ, बर्थ पे लेटा सामने पीली सी छत देखता हूँ, घरघराते पँखे को देखता हूँ, छत पे आड़ी-तिरछी लकीरों से उभर आई भिन्न-भिन्न आकृतियाँ देखता हूँ, आँते फिर दुखने लगी हैं सहन नहीं हो रहा.

सिंधी सज्जन उठकर वाशरूम की तरफ गए हैं, कोई स्टेशन आया है हबड़-तबड़ मची है. सज्जन की बर्थ पर सिक्का नज़र आता है, और दिन होते तो सोने के सिक्कों के ढेर को भी हेय-दृष्टि देखता किन्तु आज यही सिक्का समूची दृष्टि में भर आया है, उतरकर सिक्का उठा लेता हूँ. अपने पास से एक रुपए मिलाकर दो रुपए का खीरा खरीदा है. समय को खींचकर, तानकर एक-एक टुकड़ा खाया जा रहा ताकि अधिक लगते समय से अधिक परिमाप का भ्रम-बोध हो, ख़ुद को नहीं आँतों को छलने का उपक्रम है किन्तु एकाध घण्टे बाद आंतें फिर दुखने लगी हैं इस बार दुगुनी प्रबलता से, असहनीय मरोड़ उठती है, अब ग्लूकोज़ पानी भी आँतों को तुष्ट नहीं कर पा रहा, गला इतना सूख गया है कि सूजी के लड्डू निगलने के क्रम में लगता जैसे गले के भीतर खरोंचे पड़ रहीं, गला छिल जाएगा. कमांडो ट्रेनिंग के सर्वाइवल कोर्स में भी ‘बर्दाश्त का माद्दा’ बढ़ाने भूखा रखा गया था पर ऐसा भूखा नहीं कि दाने को तरस जाए आदमी, मोहताजी हो जाए.

ट्रेन पता नहीं किस भू-भाग से गुज़र रही, लेट हो आयी है- शाम तक गुवाहाटी पहुँचना था पर रात ग्यारह बजे पहुंची है. अगली ट्रेन कल सुबह दस बजे वो भी एक नम्बर प्लेटफार्म से. चार नम्बर प्लेटफार्म पर माँदा सा खड़ा, सामान एक नम्बर प्लेटफार्म तक ले जाने की योजना बनाता हूँ, खाली पेट योजना नहीं बनती. पीछे बाकी सामान छोड़ ट्रंक उठाता हूँ, प्लेटफार्म से सीधे पटरियों पे उतरता, पार करता, अगले प्लेटफार्म पे चढ़ता, फिर उतरता, पार करता अन्ततः एक नम्बर पर पहुँच ट्रंक रखता हूँ, लौट पड़ता हूँ. यही क्रम बाकी सामान के लिए भी दोहराता हूँ. लोगों का आना-जाना लगा है, सब खाए-पिये लग रहे, क्या-क्या खाया होगा इन लोगों ने, दुनिया भर के स्टॉल लगे हैं,हर स्टॉल पे भीड़ लगी है सबको कुछ न कुछ मिल रहा, कोई मेरा पेट क्यों नहीं पढ़ता, कोई मेरी निरीहता क्यों नहीं पढ़ता. चारों सामान एक नम्बर प्लेटफार्म पर पहुँचा ट्रंक पर ही दुहरा हो जाता हूँ. 48 घण्टे से अधिक हो रहे पेट में अन्न का दाना नहीं, आँखों के नीचे हल्की कालिमा उभर रही.

गुवाहाटी रेलवे स्टेशन के प्लेटफार्म क्रमांक एक पर तीसरी सुबह खुल रही पर जीवन का क्रम वही आँतों पे टिका हुआ, मन में आया कि जी आर पी थाने में जाकर बात करता हूँ, पर सामान का क्या करूँ, कहाँ ढोउँ, जेब तो कटवा ही ली अब यदि सामान भी हाथ से जाए ? तिस पर संकोच अलग, कहीं नहीं जाता नियति के समक्ष अड़ा रहता हूँ.

आगे दीमापुर की तरफ जाने वाली गाड़ी को दस बजे इसी एक नम्बर पे लगना था किन्तु ऐन वक्त पे घोषणा हुई कि ट्रेन एक नम्बर पर नहीं सात नम्बर पर लगेगी एक भूखे-टूटे मनुष्य की असहायता की ऐसी पराकाष्ठा, ऐसी परीक्षा !

भारतीय रेल व्यवस्था ! तुम नहीं जानतीं क्या पाप कर रही हो, क्या अघट कर दिया है तुमने ! तुम्हारे लिए प्लेटफार्म बदलना एक प्रशासनिक आदेश है किन्तु एक मनुज टूटन की कगार पे है, नियति के षड्यंत्र में भारतीय-रेल तुम भी शामिल हो रही ! रोज़े-महशर ये हिसाब भी रखा जाएगा दावरे-हश्र के हुज़ूर में ताकता हूँ इधर-उधर, कैसी विदीर्णता है, कैसी लाचारी ने जकड़ लिया है कि कोई कँधे पे हाथ भी धर दे तो फूट-फूट कर रो पडूँ, सोचता हूँ चारों सामान उठा लूँ किन्तु उठाऊँ तो उठाऊँ कैसे

ट्रेन की तरफ भाग रहे लोगों पर दृष्टि बिछलती है. ‘सामान उठाए साहेब !’ बाजू से ध्वनि आयी है, चन्द्रभान कुली,-” बटालियन जॉइन करने जा रहे…जेब कट गई…पाँच रुपए बचे हैं, दे देंगे, उठाना है तो उठाओ !” बहुत करके भी इतना ही माँग पाता हूँ.

-“आइये ! एकाध आप उठाइये बाकी हम ले चलते हैं”.

चन्द्रभान ने लाकर लामडिंग जाने वाली पैसेंजर ट्रेन की काष्ठ-कुर्सी पर बिठा दिया है. सामने साधु बाबा हैं. पाँच रुपए चन्द्रभान को दे दिए गए हैं अब दमड़ी नहीं, हाय ! क्या तो घट रहा.

कुछ समय बीतता है

चन्द्रभान वापिस आया है

-” यदि आपके पास पैसे नहीं तो ये दस रुपए रख लीजिए”

-“नहीं, हो जाएगा”

‘हाय रे संकोची ! तेरे संकोच को आग लगे’ आँतें बिफर पड़ी हैं. पेट की भूख के आगे चन्द्रभान के लिए कृतज्ञता भी आकार नहीं ले पाती, हल्की नमी है आँख के कोरों में. चेहरे का हाल-मुहाल देख सामने वाले साधु बाबा भी पूछ बैठते हैं-“परेशान दिखता है बच्चा !”

घर-घर जाते हैं, हर घर से न मिले फिर भी विविध तो मिलता ही होगा सो एकाध रोटी तो होगी बाबा के झोले में इसी आस में झोले को ताकते साधु को पूरा दुखड़ा सुना डालते हैं वो पूरा सुनते हैं पर मिलता कुछ नहीं तो क्या खुलकर ही माँगना पड़ेगा ‘कोई रोटी वोटी है तो दो”

अजब समय है जब तक हाथ पसारकर नहीं मांगेंगे तो क्या कोई देगा नहीं, क्यों ये जगत ऐसा संवेदनहीन हो रखा, क्यों कोई इस असहनीय भूख को नही पढ़ पा रहा

न ! नहीं माँगूगा !

साधु दो लड्डू ले लेते हैं, देते कुछ नहीं.

गुवाहाटी स्टेशन से ट्रेन चल पड़ी है. असम की भू-दृश्यावली खिड़की के पार एक चक्कर में गुज़र रही पर भीतर कोई भाव नहीं उपजता, सारी शक्तता जैसे लुट गयी हो, पेट में दाना होता तो इन दृश्यों को पी रहा होता- दृश्यों को तरल बनाकर पीने की कला आती है मुझे !

प्रथमतया गुज़र रहा अहोम भूमि से, ओ ब्रह्मपुत्र ! ओ सुपारी के पेड़ों की श्रृंखला तुम ही साक्षी रहना मेरी इस भूख की जिसने तुम्हें न निरखने दिया.

शाम तक ट्रेन लामडिंग पहुँचाती है, प्लेटफार्म पर सामान रख ट्रंक के ऊपर ही ढेर हो जाता हूं. यहां से दीमापुर के लिए ट्रेन पकड़नी जो देर रात आएगी. समीप ही जवानों का एक ग्रुप पटरी पार बाज़ार में मिल रही स्वादिष्ट मछली और दाल का चटखारे लेकर ज़िक्र कर रहा, सी आर पी एफ के ही जवान लग रहे.

“इनसे माँग लेता हूँ”

किन्तु कैसे स्वयं को दयनीय प्रस्तुत करूँ, देह अशक्त हुई है पर अभी भी दैन्य नहीं, नहीं माँगता !

यहाँ-वहाँ दृष्टि दौड़ाता हूँ, प्लेटफार्म में कही रोटी का टुकड़ा दिख जाए तो उठाकर खा लूँ, खड़े नहीं हुआ जा रहा आँतें तो लगता मर चुकीं, अब दर्द नहीं बल्कि अब दर्द महसूसने की क्षमता ही नहीं.

ट्रंक पर ही पड़ा रह जाता हूँ.

रात दो बजे दीमापुर की ट्रेन आयी है सुबह सात बजे दीमापुर पहुँचा हूँ.

हवलदार नायर आया है लेने, “क्या हुआ साब !” आंखों के नीचे गाढ़े काले घेरे और चेहरे पे उतर आई दीनता को देख पूछता है

कुछ नहीं बोलता

मेस पहुँचा हूँ

तीन पूरे दिन और एक रात के बाद अन्न सामने है

रोटी और भिंडी की सूखी सब्ज़ी

पहला कौर लेता हूँ…

अन्न पधारो आँत में भूखन को सुख दो

सबकी विधी में जा बसो कोई को न दुख दो

© श्री परम शिवम्  

डी आई जी, सी आर पी एफ, गुरुग्राम  

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हास्य… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ हास्य… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“सायकल चालवता येते का?? “

त्याच्या प्रश्नाने ती गडबडली कारण नेमकं तिचं ‘स्वप्न काय’ त्याने विचारताच ती म्हणाली, “नवऱ्यासोबत टू व्हीलरवर बसून वेगात हुरर करत हिंडायचं… “

तिचं स्वप्न ऐकताच त्याचा हा प्रश्न… ती मग हळूच म्हणाली, “थोडी थोडी जमते.. “

तो म्हणाला, “हरकत नाही, आपल्याकडे प्रॅक्टीसला टू व्हीलर नाही, सायकल आहे म्हणून विचारलं… “

ती थोडी हिरमुसली, पण तो मात्र खळखळ हसला होता, कारण स्वतःला सायकल येत नाही पण त्याच्या मागे बसून हुरर करत हुंदडायचं स्वप्न ती बघत होती.

‘सायकल’ ऐकून बहुतेक ‘नकार’ हे समजून त्याचं रुटीन सुरू होतं. सायकलवर टांग मारून तो निघणार तेवढ्यात जोशी आजी गॅलरीतून ओरडल्या, “बंड्या होकार आलाय… उद्या येत आहेत ते तारीख काढायला… “

मन हवेत तरंगलं आणि सायकल सुध्दा हवेत चालली त्यादिवशी. पुढे सगळं स्वप्नासारखं घडत गेलं. कोणी नसलं तरी चाळीतल्या सगळ्यांनी सगळ्या भूमिका घेतल्या. जोशी आजी पुढाकाराला होत्याच, भाले मामा झाले, कोणी काका, कोणी करवल्या, असं करत गरिबीतलं कार्यही माणसांच्या प्रेमामुळे श्रीमंत झालं. बंड्याचे दोनाचे चार हात झाले तेंव्हा आजी म्हणल्याच, “नशिबात असलं की घडतच नाही, तर चांगले बंगल्यावाले पोरं बिनलग्नाचे बसलेत. बंड्याने नशीब काढलं. गुणी पोरगीं मिळाली… “

सगळं नवं स्वीकारत ती बंड्याशी नातं जपत होती. बंड्याही तसाच, परिस्थितीने गरीब असला तरी मनाने श्रीमंत असलेला… रोज गजरा चूकत नव्हता… ती ही सगळं स्वीकारणारी, फक्त एक खंत, टू व्हीलर डोळ्यासमोरुन जात नव्हती…

एकदा उगाच काहीतरी बिनसलं आणि तिने स्वप्न छेडलंच. “मी म्हणालेच होते बाबाला, तो सायकलवाला आहे… गाडी घोडी नाही त्याच्याकडे… “

तिच्या या वाक्याने तो हिरमुसला, डबा उचलून गपचूप निघून गेला. उगाच बोललो असं वाटून ती रडवेली झाली. जोशी आजीकडे जाऊन मुसमुसुन रडली. आजीला सगळं सांगितलं.

आजीने पाठीवर हात फिरवत जवळ घेतलं आणि म्हणाली, “बंड्याला कोणी नाही, ह्या चाळीचा जिना झाडून मिळालेल्या भाकरीवर मोठा झाला. माझ्या शिकवण्यांमध्ये येऊन बसायचा म्हणून त्याला शाळेत टाकलं. जिन्याखाली राहायचा. शिकला, ही छोटी नोकरी मिळाली, ही खोली भाड्याने घेतली, पै पै जमवून ही सायकल घेतली. आयुष्यात तू आलीस, आता आणखी दिवस बदलतील बिचाऱ्याचे… पण तू एक लक्षात ठेव, त्याचं आणि तुझं, दोघांच्या चेहऱ्यावरचं हास्य ज्या दिवसापासून ह्या वस्तूंसाठी हरवायला लागेल त्या दिवसापासून संसार फक्त एक कर्तव्य राहील, त्यातलं हास्य लोप पावेल… वस्तू येत राहतील, पण त्यासाठी लागणारा वेळ तुला सहन करावा लागेल, तरच खरी गंमत,.. “

तिलाही पटलं… ती घरी पळाली. त्याची येण्याची वेळ झालीच होती. आवरून जिन्यापाशी थांबली. तो दिसताच म्हणाली, “गाडीवर मागे नाही, तर सायकलवर समोर बसायचं आहे मला… तुला येते का तशी डबलसीट चालवता..? “

तो हसला. ती सायकलच्या दांडीवर बसली… त्याने गजरा तिच्या केसात माळला. सुगंधी वाऱ्यात.. एकदम जोरात… खळखळ हास्याच्या तालावर सायकल वेगात निघाली.

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares