मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा + संपादकीय निवेदन – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

✍️ 💐 अ भि नं द न 💐✍️

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आणि ई अभिव्यक्ती मराठी अंकाच्या संपादक मंडळ सदस्या सौ. मंजुषा मुळे यांचे अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन 💐

🖊️स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशन, मुंबई सर्कल (महाराष्ट्र व गोवा) आयोजित लेख स्पर्धेत प्रथम पुरस्कार ✒️

स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशन, मुंबई सर्कल (महाराष्ट्र व गोवा) यांनी आयोजित केलेल्या लेख स्पर्धेत त्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. या यशाबद्दल यांचे अभिनंदन!

🖊️राष्ट्रकवि श्रीकृष्ण ‘सरल’ स्मृति प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार ✒️

हिंदी साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचे त्यांचे कार्य सातत्याने चालू आहे. आतापर्यंत त्यांनी २७५ हून अधिक हिंदी लघुकथांचा अनुवाद करुन त्या कथा मराठी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमधून प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या या  साहित्य सेवेची दखल घेऊन, सरल काव्यांजलि साहित्यिक संस्था, उज्जैन,(म.प्र.) या संस्थेने राष्ट्रकवि श्रीकृष्ण ‘सरल’ स्मृति प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नुकताच १४ सप्टेंबर या हिंदी दिनानिमित्त त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

या गौरवास्पद कामगिरी बद्दल सौ. मंजुषा मुळे यांचे समुहातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐

🖊️✒️

आजच्या अंकात वाचूया तीन लघुकथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

(१) सांगा ना बाबा… श्री भगवान वैद्यप्रखर() हे छानच झालं  श्री संतोष सुपेकर  () खिडकी  श्री भगवान वैद्यप्रखर☆ मराठी अनुवाद / लेखिका : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

?

(१) लघुकथा – सांगा ना बाबा…

(एका हिंदी कवितेवर आधारित) 

‘आता त्या चिमणीला मी कुठल्या भाषेत समजावून सांगू बाबा? तुम्ही कोणत्या भाषेत बोलायचात तिच्याशी … बाबा ते प्लीज एकदा सांगा ना मला.

अजूनही ती न चुकता रोज घरात येते. आधी उंबऱ्यावर बसून चिव चिव करते… तुम्हाला हाका माराव्यात तशी. मग खिडकीत बसते… मान वेळावून सगळीकडे बघत राहते … तुम्हाला शोधत असल्यासारखी. मग बाल्कनीत जाते … नाच करावा तशी स्वतःभोवतीच फिरत राहते… एकीकडे चिवचिवाटही मोठ्याने सुरु असतो…. तो थांबतच नाही…. आणि मी अक्षरशः चक्रावून जातो.

तुम्ही गेलात… ते कळल्यावर भेटायला आलेले नातेवाईक परतले. शेजाऱ्यांनी आणि मित्रांनीही चौकशी करणं थांबवलं. इतकंच काय.. अनेक वर्षं आपला पत्ता शोधत येणाऱ्या पत्रांनी- मासिकांनीही जणू आपल्या घराकडे पाठ फिरवली. हो.. पण घायाळ झालेल्या पाखरासारखी तुमची पुस्तकं मात्र काही दिवस नक्कीच फडफडत राहिली होती … आता त्यांच्यावर धूळ साठलीय तो भाग वेगळा. पण … 

…. पण ती निळ्या पिवळ्या पंखांची चिमणी मात्र अजूनही येते …अगदी रोज… कधी एकटी तर कधी सोबत आणखी बऱ्याच चिमण्या घेऊन — पोलीस ठाण्यात विनाकारण डांबून ठेवलेल्या आपल्या माणसाला सोडावं म्हणून लोक मोर्चा घेऊन जातात ना.. तसंच काहीसं वाटून जातं मला त्यांच्याकडे बघून. आता तिला मी काय सांगू … कसं सांगू बाबा?

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तुम्ही तिला तांदळाचे दाणे खायला द्यायचात … पेपर वाचून दाखवायचात.. तुमच्या कविता वाचून दाखवायचात.. आणि ते सगळं कळत असल्यासारखं, तल्लीन होऊन ती तुमच्यासमोर शांत बसून रहायची. कधीकधी तीही बहुतेक स्वतःची सुखं दु:खं चिवचिव करत तुम्हाला सांगत राहायची, आणि तुम्हीही शांतपणे ऐकत राहायचात. तुम्ही बागेत काम करायचात तेव्हा तर ती तुमच्याकडे अशी निरखून बघत राहायची की जणू काही तुम्ही तिच्या बागेत काम करणारा माळी असायचात … 

… आत्ता प्रकर्षाने आठवतंय सगळं.

तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक रोपट्याला तिने किती वेळा तुमच्याबद्दल विचारलं असेल …सांगा ना बाबा…आता कसं सांगू.. कसं समजावू मी तिला….

एक दिवस ना बाबा, ती धीटपणाने बेधडक थेट घरातच आली आणि शोधत राहिली…. एकही पेटी.. एकही कपाट असं राहिलं नाही जिथे बसून तिने तुमचा कानोसा घेतला नाही. आरशावर डोकं आपटून आपटून विचारत होती …. तुम्ही कुठे आहात ते. शेवटी हताश झाल्यासारखी तुमच्या टेबलावर जाऊन बसली.. आणि तुमच्या पेनाला विचारायला लागली…. त्याने तुम्हाला शेवटचं कधी पाहिलं होतं ते….

आता तिला कसं समजवायचं बाबा.. आम्हीही तिला तांदळाचे दाणे देतो, पण तोंडही लावत नाही ती. मोठ्याने चिवचिवाट करून नक्कीच गळा कोरडा पडत असणार तिचा.. पण अजूनही तुम्ही झाडाला टांगून ठेवलेल्या पाण्याच्या मडक्याकडे ती बघतही नाही…. दारात, अंगणात, बाल्कनीत, खिडक्यांमध्ये चिवचिव करत भिरभिरत रहाते आणि दमली की निघून जाते….. दुसऱ्या दिवशी परत येण्यासाठी..

– आता तिला कसं सांगायचं की तुम्ही खूप लांब निघून गेला आहात …. परत कधीही इथे न येण्यासाठी… 

बाबा ऐका ना.. हे सगळं सगळं तुम्ही त्या चिमणीला कोणत्या भाषेत सांगितलं असतंत …. ते सांगायला तरी या ना बाबा परत … 

प्लीज बाबा.. या ना…‘

कविवर्य : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ यांच्या ‘बोलो ना पापा’ या हिंदी कवितेवर आधारित.

लेखिका : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?

(२) हे छानच झालं…  

माझा एक मित्र सकाळी सकाळी घाईघाईने कुठे तरी चालला होता. रस्त्यावर नेहेमीची वर्दळ अजून सुरू झाली नव्हती. त्यामुळे त्याच्या टू-व्हिलरचा वेग नकळतच वाढला होता… एक काम करून लगेच ऑफिसला वेळेत पोहोचायचं आहे हाच विचार असणार त्याच्या डोक्यात… आणि रस्त्याने जाणाऱ्या एका वृध्द गृहस्थांना त्याच्याही नकळत त्याच्या गाडीने धडक दिली. तो प्रचंड घाबरला. गाडी बाजूला लावून त्याने त्या गृहस्थांना आधार देत उठवून बसवलं. बरंच लागलं होतं त्यांना. घाबरलेल्या मित्राने मला घाईघाईने फोन केला… ‘पटकन् ये’ म्हणाला, आणि मी लगेच तिथे पोहोचलो. मुद्दाम माझी कार घेऊन गेलो… त्या गृहस्थांना धरून गाडीत बसवलं… हॉस्पिटलमध्ये नेलं. सुदैवाने जिवाला धोका ठरणाऱ्या जखमा नव्हत्या. औषधोपचार… बॅन्डेज सगळं करून झाल्यावर आम्ही दोघं त्यांना त्यांच्या घरी पोहोचवायला गेलो.

त्या अनोळखी घरात जातांना खरं तर जरा घाबरलोच होतो… आजोबांच्या घरातल्यांचा त्या अपघातावरून आणि त्याहीपेक्षा उपचारांच्या खर्चावरून वाद होणार… आम्ही बोलणी खाणार… पैसेही द्यावे लागणार… या सगळ्यासाठी आम्ही मनाची तयारी केलेलीच होती….

घरात पोहोचताच त्या आजोबांचा तरुण मुलगा तावातावाने माझ्या मित्राला बोलायला लागला… ‘‘खरं तर तुमची रवानगी थेट पोलिस कोठडीत करू शकलो असतो मी… पण माझ्या वडलांना धडक मारल्यावर तुम्ही तिथून पळून गेला नाहीत… त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात… उपचार केलेत… म्हणून सोडून देतोय् तुम्हाला… नाहीतर तुम्हाला जेलची हवाच खायला लावली असती मी… लक्षात ठेवा… आणि आत्ता आमची हलाखीची परिस्थिती तर बघताच आहात तुम्ही. मी दिवसभर घराबाहेर असतो… दोन-दोन नोकऱ्या करून कसं तरी घर चालवतो. आता बाबा अंथरूणावर पडून रहाणार म्हणजे कितीतरी कामांसाठी मला पैसे खर्च करावे लागणार… रजा घ्याव्या लागणार. भरीस भर म्हणून त्यांच्या औषध-पाण्याचा खर्च आहेच. अहो माझे वडील या वयातही सकाळी लवकर उठून पाणी भरायचे… मुलांना शाळेत सोडायला जायचे, येतांना दूध आणि भाजी घेऊन यायचे. पुन्हा दुपारी मुलांना शाळेतून आणायला जायचे. विजेचं बील, पाण्याचं बील भरायचे, रेशन आणायचे. दळण दळून आणायचे. शिवाय रिकाम्या वेळेत सुतारकाम करून थोडेफार पैसेही कमवायचे… आता ही सगळी कामं कोण करणार? तुम्ही असं करा… आम्हाला कमीत कमी साठ-सत्तर हजार तरी द्याच…”

… आणि तिथे अंथरूणावर पडलेल्या वडलांच्या जखमांवर मात्र, मुलगा त्यांची जी खोटी खोटी प्रशंसा करत होता, ते शब्द मलम लावण्याचं काम करत होते. त्या तशा जखमी अवस्थेतही त्यांना छान हसावंसं वाटत होतं… त्यांच्या मनात विचार येत होता की… ‘‘मला हा ऍक्सिडेंट झाला हे तर छानच झालं… आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच मुलाच्या तोंडून माझं या घरातलं महत्त्व तरी ऐकायला मिळालं मला …”

मूळ हिन्दी कथा : ‘अच्छा हुआ!’

कथाकार : श्री संतोष सुपेकर, उज्जैन

मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?

(३) खिडकी…  

“बाबा.. बाबा.. अहो लक्ष कुठे आहे तुमचं? ऊन किती तापलंय.. आणि तुम्ही इथे बाल्कनीत निवांत बसलायत.. चला आत चला..“

“हो बाळा, मी उठणारच होतो आत्ता..“

“बाबा मी रोज बघतोय.. तुमची खोली बदललीये तेव्हापासून तुम्ही या बाल्कनीतच जास्त वेळ बसून असता..“

“हां.. बरोबर आहे.. पण अरे असंच येऊन बसतो इथे.. सहजच..“

“नव्या खोलीत कुठली गैरसोय जाणवते आहे का तुम्हाला? सगळं फर्निचर नवं आहे.. आणि ही खोली तुमच्या आधीच्या खोलीपेक्षा थोडी मोठीही आहे.. मग तरी..?“

“अरे गैरसोय वगैरे काही नाही.. सगळी अगदी छान सोय आहे.“

“हो ना? मग खोलीतून उठून सारखे असे बाल्कनीत का येऊन बसत असता?“

“अरे खरंच खास असं काही कारण नाहीये.. पण का कोण जाणे.. इथे येऊन बसलं की फार बरं वाटतं.. आणि अरे वेळही चांगला जातो.. म्हणून.. बाकी काही नाही.“

“बाबा मला कळतेय की तुम्ही सांगत नसलात तरी नक्कीच काहीतरी कारण आहे याचं. अहो ‘आबांची खोली आम्हाला पाहिजे‘ म्हणून किती हट्ट करत होती दोन्ही मुलं.. दोघेही मोठे झालेत आता.. अभ्यासही खूप असतो त्यांना.. त्यामुळे बाबा त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आम्हाला. पण हे बघा त्याविषयी तुम्हाला काही सांगायचं असलं तर मोकळेपणाने सांगा मला.. असं मनात नका ठेऊ.“

– – “आता तू एवढं म्हणतोच आहेस तर सांगतो…. त्या खोलीला एक बऱ्यापैकी मोठी खिडकी आहे ना.. त्या खिडकीपाशी मी तासनतास बसून राहायचो. तिथून रस्त्यापलिकडचं ते वाण्याचं दुकान दिसतं. तिथे सतत माणसांची ये-जा चालू असते.. ती बघत वेळ कसा जातो कळत नाही. आणि माझे ते अगदी जवळचे मित्र होते ना.. काळेकाका.. त्यांचं घर बरोब्बर समोरच्या चौकातच आहे. माझ्याशी गप्पा मारायला ज्या रस्त्याने यायचे ना ते, तो रस्ताही अगदी स्पष्ट दिसतो त्या खिडकीतून. आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला आणखी एका मित्राचं तीन मजली मोठं घर आहे. तो हयात होता तोपर्यंत त्याच्या गच्चीवरच्या कुंड्यांना पाणी घालायला जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा हमखास दिसायचा.. एकमेकांना बघून नुसते हात हलवायचो आम्ही.. पण खूप छान वाटायचं रे.. आता दोघेही गेले हे जग सोडून.. खरं तर एक-एक करत बरोबरचे बहुतेक सगळेच गेले रे.. खूप साऱ्या आठवणी मागे ठेवून.. त्या खिडकीशी बसून त्या सगळ्या आठवणी मी आठवत राहायचो.. जणू पुन्हा अनुभवायचो ते दिवस आणि मन रमवायचो. आता त्या खोलीतून या खोलीत आलोय.. माझं सगळं सामानही इकडे हलवलंय…. पण त्या खिडकीची सोबत सुटली रे.. म्हणून तर सारखा असा इथे या बाल्कनीत….“

– – बोलता बोलता नकळत ओलावलेले डोळे झटकन पुसत त्या वडलांनी मान वळवून शेजारी उभ्या असलेल्या मुलाकडे पाहिलं.. पण – –

– – मुलगा तिथे नव्हताच.. कधी निघून गेला ते कळलंच नव्हतं त्यांना……..

मूळ हिन्दी कथा : ‘खिडकी‘.

कथाकार : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’.

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वरदलक्ष्मी…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ वरदलक्ष्मी… ☆ प्रा. भरत खैरकर 

यामिनीने सोबत म्हणून दोन बाहुल्या, सॉफ्ट टाॅय ठेवलेल्या आहे. त्यांची तिने ‘हनी- बनी’ अशी नावं ठेवली आहे.. त्यांच्याशी ती सतत बोलत असते, त्यांना झोपवून पांघरून  घालून.. पाणी पाजून..ती त्यांची काळजी घेते! बाहेर जाताना बाय-बाय.. ‘आतून दार लावून घ्या..’ वगैरे सूचना ती करते.. घरातून येता जाता ती त्यांच्याशी बोलत असते. बऱ्याचदा एकटं  घर  यामिनीला खायला उठायचं. म्हणून ही बाहुल्यांची सोबत! नवऱ्याचे कोणी नातेवाईक आल्यावर तिच्या ह्या बाहुली प्रेमावर हसायचे‌.. पण ती दुर्लक्ष करायची. कारण त्यांच्याशी बोलल्यावर तिला घरात कोणीतरी सोबतीला आहे. असं वाटायचं. घरात एकटं राहून  राहुन तरी किती राहणार. आणि एकटं करणार तरी काय? म्हणून ती तिच्या एका पोलीस मैत्रिणीकडे विरंगुळा म्हणून जायची. तिथे तिच्या आईशी  गप्पा मारायची..मुक्कामी थांबायची.. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र लागले तर तिच्या नवऱ्याचा मित्र जवळच राहायचा.. तो सगळं बघून घ्यायचा. ती सतत कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवायची.. निदान चार-पाच तास तरी घराबाहेर काढता यावे म्हणून ती जवळच्याच एका  शाळेमध्ये शिकवायलाही जायची.. पण ते केवळ वेळ जावा म्हणून..

कॅनडातील ओटावा मध्ये असलेल्या आपल्या मुलाला यामिनी कालपासून तिसऱ्यांदा फोन करत होती.. पण काही केल्या फोन लागत नव्हता.. तिला अलीकडे  त्याच्या लग्नाची  काळजी वाटत  होती.. तिने पुण्यातील दोन तीन मुली बघितल्या होत्या..त्यातली एक तिला पसंत पडली होती आणि त्या संबंधित आपल्या मुलाशी बोलावं म्हणून ती तिच्या बाबुला.. म्हणजे आपल्या मुलाला.. अरविंदला फोन लावत होती.

मुलाशी तिचं रोज फोनवर बोलणं  व्हायचं.. त्याला चांगली मुलगी मिळावी आणि त्याचा संसार सुखाचा व्हावा एवढीच तिची इच्छा होती!

आपल्या शेवटच्या  दिवसांमध्ये आपल्या मुलाचं कल्याण व्हावं..म्हणून तिने वरदलक्ष्मीचं पूजन घरात मांडलं होतं.. देवीला मनोमन नमस्कार करत असताना ती एकदम जुन्या आठवणीत गेली.

मुळात ती महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वरील   कारवार परिसरातली  कोकणी  नाईक देसाई परिवारातील.. श्री रामनाथ हे त्यांचं कुलदैवत! तिचा नवरा कर्नाटकी.. फायनान्समध्ये मास्टरी केलेला.. हिचं शिक्षण बीएससी केमिस्ट्री होतं.. पण त्यावेळेस तुला नोकरीची गरज नाही. ‘माझा भरपूर पगार आहे.’ असे म्हणून तिला नोकरीपासून त्याने थांबवून.. संसारात लक्ष देण्याची तिला सूचना केली होती.. त्यानुसार तिनेही संसार केला होता..

तो कामसू होता.. आपल्या कामांमध्ये फार हुशार होता.. निर्व्यसनी..साधा भोळा.. बघून कोणी म्हणणार नाही की हा फायनान्समध्ये इतका मास्टर माणूस आहे! सरळ स्वभावी आणि कौटुंबिक मनुष्य..

तो पुण्यातील एका मोठ्या नावाजलेल्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटचा हेड होता. तेथे त्याने बऱ्यापैकी नाव कमावले होते. कंपनीला खूप सारा फायदा त्याच्या कॅल्क्युलेशनमुळे मिळाला होता..  त्याची फायनान्शियल स्किल  सर्वांना माहिती होती.  बऱ्याच मित्रांचे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा तो भरून द्यायचा. कंपनी व्यतिरिक्त तो सायंकाळी लहान मोठ्या पतसंस्थांमध्ये  ऑडिट करायला जायचा.त्याची कीर्ती कार्पोरेट फिल्डमध्ये चांगलीच पसरली होती.. पुण्याच्याच एका सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या संचालकालाही त्याने फायनान्शिअल सल्ला दिला होता.. त्याचा फायदा त्या शिक्षण संस्थेला खूप झाला. शिक्षण संस्थेच्या संचालकाने त्याची हुशारी बघूनच आपल्या संस्था व त्यांचा फायनान्स  रिपोर्ट त्याला रिटायरमेंटनंतर सांभाळायला दिलं होता.

त्याला शेअर बाजाराच सुरुवातीपासून आकर्षण होतं.

पण अजूनही त्याने ठोस अशी काही शेअर बाजारात गुंतवणूक केली नव्हती. त्याचा शेअर बाजाराचा अभ्यास चालू होता. रिटायरमेंट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गुंतवणूक करावी असा त्याचा मानस होता.. पण तो त्याने काही यामिनीला किंवा मुलाला बोलून दाखवला नव्हता.. सारखा आपल्या कामांमध्ये तो गुंतून राहायचा.. हळूहळू त्याचे शेअर बाजारातील आकर्षण वाढत गेले.त्यातूनच त्याची शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूक ह्यात रुची वाढली होती..

तिच्या नवऱ्याने घरात असलेल्या ५० तोळ्यापैकी ३४ तोळे सोने शेअर बाजारात.. शिवाय रिटायरमेंटच्या वेळी मिळालेल्या ग्रॅज्युएटी व  पीएफचे सर्व  ३४ लाख रुपये  शेअर मध्ये घातले..

त्याला स्वतःच्या कॅल्क्युलेशन वर एवढा विश्वास होता की लगेचच आपल्याला हा पैसा दुप्पट किंवा तिप्पट होईल ही गॅरंटी होती..

मात्र  हाय रे नशिबा.. तसं काही झालं नाही. उलट शेअर बाजार कोसळला आणि कुठे चूक झाली माहिती नाही.. त्याचा सर्वच्या सर्व पैसा बुडाला.. ही गोष्ट  बायको पोराला कशी सांगावी?  ह्या भीतीनेच त्याने धसका घेतला होता.

यातलं काहीच यामिनीला किंवा मुलाला माहिती नव्हतं.. सर्व पैसा बुडाला. आणि अचानक या माणसाच्या किडन्या फेल झाल्या. यामिनीला वाटलं दुसरं काहीतरी असेल! होतातच रिटायरमेंट नंतर तब्येतीचे प्रॉब्लेम..! पण शेअर बाजारात बसलेला फटका आपण मुलाला व बायकोला कसा सांगावा? या भीतीनेच त्याला कापरं सुटलं होतं.त्याचा धसका घेऊन  त्याने बिछाना पकडला होता.

रिटायरमेंटआधी असलेला फ्लॅट विकून पुण्यापासून लांब  त्यांनी एक बंगला बांधला होता तिथे आता रिटायरमेंट नंतर राहू व मुलाला युएसला पाठवू असा काहीसा  निश्चय असतानाच  ही घटना घडली होती..

त्याच्या ट्रीटमेंटसाठी खूप काही खर्च करावा लागला नाही कारण ज्या शैक्षणिक संस्थेत त्याने मदत केली होती त्या संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याची तीन महिने ट्रीटमेंट चालली होती आणि संचालकाने सर्व ट्रीटमेंट  मोफत मध्ये  करायच्या सूचना दिल्या होत्या.

तो किडनी फेल होऊन  मरण पावला होता. त्याहीपेक्षा त्याने धास्ती घेतली होती. नवऱ्याने मृत्यूच्या  दोन दिवस आधी  ” यामिनी, तू आपल्या मुलाला  युएसला  शिक्षणाला पाठवलं पाहिजे.” असं वचन घेतलं होतं.  ‘असं कसं शक्य आहे? मला कसं जमेल?” यामिनी.

तेव्हा तो  म्हणाला,” मला माहिती आहे,तू काय आहे ते! तू करू शकशील सगळं!” हे आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं..

नवऱ्याचं अचानक जाणं, तिला सोसवत नव्हतं.पण पर्याय नव्हता. आलेल्या संकटावर मात करणे गरजेचे होते. तो बंगला भाड्याने देऊन मुलाला युएसला पाठवून  आता ती स्वतः  एकटी भाड्याच्या घरात राहत होती.

आज जर बाबूचे बाबा असते तर आपल्याला ही धडपड करावीच लागली नसती.  तिचा उर एकदम भरून आला.

आजही तिने श्रावणातील हळदी कुंकवासाठी वरदलक्ष्मीच्या पूजेनिमित्त  बिल्डिंग मधील बायकांना बोलावले होते.. कौतुकाने ती आपल्या  मुलाचे फोटो सर्वांना दाखवीत होती आणि होणाऱ्या सुनेसंबंधी स्वप्नात  रंगली होती.. तेवढ्यात तिला अरविंदचा फोन आला.. आणि ती भरभरून काल बघितलेल्या मुलींबद्दल बोलू लागली…

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन् गौर प्रसन्नतेने हसली…… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆

सुश्री स्नेहल अखिला अन्वित

? जीवनरंग ?

☆ अन् गौर प्रसन्नतेने हसली… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित

“अगं थांब त्याला कुठे हात लावतेस, गौरींना नैवेद्य दाखवायचाय अजून!! त्याशिवाय कुणी काही तोंडात टाकायचं नाही, आज्जी ओरडेल नाहीतर,” सुहासी आपल्या सहा वर्षांच्या परीला म्हणाली.

“कधी होणार तुमचं, केव्हाची वाट पाहतेय मी, मला भूक लागली,” परी एवढंस तोंड करून म्हणाली.

“रोज जेवतेस ना वेळेवर, एक दिवस वाट पहायची जरा. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्ण बाईचं पान वाढलं की तुला बसवेन तिच्याबरोबर.”

“एवढाss वेळ, मला खरंच भूक लागली. ती भजी दिसतायत, पुरणपोळी दिसतेय समोर, मला खावंसं वाटतय आणखीनच……” परी काकुळतीने म्हणाली.

“जा आता तिकडे, उगीच इथे स्वैपाकघरात लुडबुड नको करुस, आज्जी ओरडेल उगाच,” असं म्हणत सुहासीने परीला जवळजवळ बाहेर ढकललच.

ती किरकिरतच आतल्या खोलीत जाऊन बसली.

तिला बघून जरा टेकायला म्हणून तिथे बसलेली तिची आज्जी उठली. स्वयंपाकघरात गेली आणि परीचं ताट वाढून गौरीला नमस्कार करून तिला जेवायला सांगितलं.

सुहासीला कळलंच नाही काय झालं ते, ती सासूबाईंना म्हणाली, “काय झालं चुकलं का काही माझं? सवाष्ण नाही आली अजून, गौरीला नैवेद्य नाही दाखवला, तुम्ही तिला का वाढलत? तुमचं तर नेहमी सगळं कडक असतं. ती आली होती माझ्याकडे भूक लागली म्हणून, मी तिला समजावून पाठवलं होतं. थांबली असती ती.”

“हो थांबली असती ती, पण मलाच तिचा चेहरा बघून राहवलं नाही. सवाष्ण कधी येणार काय माहीत? तिने सांगितलेली वेळ जाऊन अर्धा तास झाला. नैवेद्याच सगळं ठेवलंय मी बाजूला. खाऊ दे परीला. घरची चालती बोलती गौर आहे ती!!”

सुहासीला कळेना, एकदम असं आपल्या सासूला झालं काय? काल तर गौरीची तयारी करताना माझ्यावर खेकसल्या होत्या या. आतापर्यंत तर कधी नव्हत्या या अशा!! दर गौरी-गणपतीत काय कुठल्याही सणाला यांचा तमाशा ठरलेलाच असतो. यांच्या मनाप्रमाणे कितीही काही केलं तरी याचं तोंड वाकडच असतं नेहमी.

सगळं नुसतं दडपणाखाली, सणाचा आनंद तो काय घेता येतच नाही कधी!!

आता काय नवीन मनात आलंय कोणास ठाऊक? पोरीला घालतायत खायला, मला जेवताना रडवणार वाटतं……..

सुहासीच्या मनात बरंच काही चाललं होतं, तेवढ्यात तिला सासूबाईंनी बोलावलं.

ती गेली तशा त्या म्हणाल्या, “आल्या बघ सवाष्ण बाई. गौरीच्या नैवेद्याचं ताट घेऊन ये आणि नैवेद्य दाखवून या सवाष्ण बाईंबरोबर तूही बस. मी वाढते तुम्हाला दोघींना.”

सासूबाई हे बोलल्या, तसे भीतीने तिचे

हृदयाचे ठोके जास्तच वाढले, भरभर ही पळत होते आणि तिला अगदी सहज ऐकूही येत होते!!

ती पटकन म्हणली, “काहीतरी काय, मी कशाला बसू. तुम्ही बसा हवतर. सगळेच बसा एकदम, बाबांना आणि ह्यांना पण वाढते मी.”

“नाही, आज तूच बस जेवायला यांच्याबरोबर. बाकीचे थांबतील थोड्या वेळ. “

सुहासी तर ऐकूनच बिथरली. तिला काही केल्या समजेना, आपल्या सासूला नेमकं झालंय तरी काय? ती पुन्हा त्यांना म्हणालीच, “अहो आई, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही हो. तुम्ही सगळे जेवल्याशिवाय. इतक्या वर्षांची सवय मला शेवटी जेवायची. तुम्हीच बसा मी वाढते.”

“आता सणाच्या दिवशी वाद वाढवत बसणार आहेस का माझ्याशी?” सासूबाईंनी डोळे वटारले तशी, सवाष्ण बाईसमोर आणखी तमाशा नको म्हणून ती मुकाट्याने जेवायला बसली.

सासूबाईंनी तिला अगदी आग्रह करून वाढलं, पोटभर जेवायला लावलं. सुहासीला पहिले जमेचना, असं कधी घडलंच नव्हतं ना यापूर्वी. पण ते कुणी दुसऱ्याने वाढलेले गरम गरम पदार्थ एकेक करून पोटात जायला लागल्यावर तिचं मनच पोटापेक्षा जास्त तृप्त झालं.

सवाष्ण समाधानाने गेल्यावर मात्र सुहासीला राहवलं नाही, ती भरल्या घरात ढसाढसा रडायला लागली. तिला असं पाहून मुलगी देखील तिला बिलगून रडायला लागली. सगळेच आपआपली काम सोडून बाहेर आले.

सुहासी रडतरडतच सासूबाईंना म्हणाली, “काय चुकलं असेल तर सांगा, पण असं नका वागू हो. मोठं पाप केल्यासारखं वाटतय मला, तुमच्या सर्वांच्या अगोदर जेवले मी आज. मला हे पचणारच नाही.

दुसरी काही शिक्षा द्या पण हे असं नका वागू हो आई!!”

तिला एवढं रडताना पाहून सासूबाईनी तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, “का पचणार नाही? एवढी वर्ष तुला मागे ठेवून आम्ही खायचो. आम्हाला पचलं ना ते. दर गौरी जेवणाला आमच्याकडून राहिलेलं तू तोंडात घालायचीस, कधी तर एवढंस राहत असेल, त्यावरही समाधान मानायचीस. तुझे आवडते पदार्थ तुझ्यासमोर आम्ही संपवून टाकायचो, तरी कधी काही बोललेली आठवत नाही मला तू.

मग आज पहिल्यांदा गौरी जेवणाला घरची गौर तृप्त झाली तर तिला का नाही पचणार?”

“पण आई, हे काय असं अचानक सगळं इतकं बदललं?,” सुहासी मनातलं बोललीच एकदाची.

“सुहासी, या गौरींनी बदलवलं ग मला. काल आपण गौरीची तयारी करत होतो, तर तुझ्याकडून चुकून स्टँडला धक्का लागला, आणि मी तुझ्यावर खेकसले. तुला नको नको ते बोलले. तुझ्या माहेरचाही उद्धार केला. तुझे डबडबलेले डोळे दिसले मला, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून गौरीच्या नाकात नथ अडकवायला गेले, तर मला त्या गौरीचे डोळेही तुझ्यासारखेच डबडबलेले दिसले त्याक्षणी एकदम. आणि घाबरून काळजात जोरात कळ गेली. भास होता की काय होतं कोणास ठाऊक, पण जाणवलं एवढं खरं!!

जणू गौर मला सांगत होती, घरच्या गौरीला दुखवलस, रडवलस आणि माझं काय कौतुक करत बसलीयेस?? तिच्याकडं बघ पहिले. माझं खरं अस्तित्व लेकिसुनांत आहे. त्यांच्या त्रासाने मी पण दुःखी होणार……….

कितीही मोठी पैठणी नेसवा, सोन्या- रूप्याने मढवा,  कितीही सजवा धजवा, पन्नास प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा मी हसणार नाहीच!!

आणि खरंच ग माझी गौर हसताना मला दिसली नाहीच कधी. अगोदरही नाही आणि आताही नाही.”

छोटया परीच्या काहीतरी मनात आलं तशी ती पटकन उठली, गौरींजवळ गेली, त्यांना निरखून बघितलं, आणि आनंदाने टाळया वाजवत म्हणाली; “आज्जी, तुझ्या दोन्ही गौरी तर आज हसतयात की ग गोड गोड!!”

परीच्या आज्जीने झटकन गौरींकडे पाहिलं, आणि म्हणाली, “खरंच की!! माझी गौर हसतेय आता…..”

छान वाटलं ना आज्जी आता तुला, परी नाचत म्हणाली. तसं तिच्या आज्जीने तिला जवळ घेतलं आणि तिचा पापा घेत म्हणाली, “तू आणि तुझी आई, माझ्या खऱ्या गौरी, तुमच्याशी चांगलं जमवून घेतलं की या दोन गौरीच काय आपलं घरही नेहमीच हसायला लागेल, हे कळलंय हो मला आता!!

सुहासी, संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तेव्हा तुझ्या मनासारखं कर सगळं. पाहिजे तश्या नटा तुम्ही दोघी घरच्या गौरी, मी नाही काही खुसपट काढणार नेहमीसारखी. पण तुम्हाला नजर लागू नये म्हणून दृष्ट मात्र आठवणीने काढेन हा यावेळी!!”

हे नुसतं ऐकूनच घरातल्या सगळ्या गौराया अगदी प्रसन्नतेने हसल्या …….

© सुश्री स्नेहल अखिला अन्वित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळ आला होता, पण – भाग – २ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ काळ आला होता, पण – भाग – २ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – ‘गोळी मार स्साल्याला!’ टकलूने माझ्या कानपटीवर पिस्तुलाची मूठ मारली. डोळ्यात एखाद्या बोगद्यातला अंध:कार भरत चालला. धरणीकंप झाला. जग गोल गोल फिरायला लागलं. अंधारात शेकडो रातकिडे एकदम किरकिरू लागले. वेदनेची एक लहर वीजेसारखी शरिरातून गेली. मग अंधार अधीक गडद झाला. लडबडून मी जमिनीवर बसलो.) — आता इथून पुढे

‘सगळं माहीत आहे याला. माहीत असूनसुद्धा सांगत नाही. गोळी मार याला!’

काळ्या बोगद्यात अशुभ वटवाघळे फडफडत होती. मेंदूत कुणा टाईम बॉम्बची टिक्  टिक् ऐकू येत होती.

एक ना एक दिवस प्रत्येकालाच मरायचे आहे. मरणाला काय भ्यायचं? पण थोडा अधीक वेळ जर मिळाला असता तर…. अनेक अर्धवट कामे तशीच पडून रहातील.

टकलूने कॉलर ओढून मला उठवले. सदर्‍याची वरची बटणे तुटून जमिनीवर पडली.

‘ऊठ, ऊठ भल्या माणसा, तू काय इतक्या लवकर मरू इच्छितोस. आता तरी सांग भल्या माणसा, कुठे आहे के. पी.?’

‘ मी सांगतो ना, ‘गोळी मार स्साल्याला!’

माझी कानपट जळत होती. एक टेंगुळ आलं होतं. ते विलक्षण ठणकत होतं. वाटत होतं, डोकं फुटून त्याचे हजार तुकडे होतील. जेव्हा वेताळ विक्रमाच्या खांद्यावर बसून त्याला कहाणी सांगत असे आणि काठीण प्रश्नाचं उत्तर विचारात असे, तेव्हा विक्रमालाही तसंच वाटत असेल का?

रात्री पार्टीत धीमने म्हटलं होतं, तुझी कुंडली पहिली आहे. शनीची साडे-साती सुरू झालीय. त्रास होईल. ‘हनुमान चालीसा’चा पाठ सुरू कर आणि मीठ कमी खा.’

‘काय रे, सांगतोयस के.पी. चा पत्ता की दाबू ट्रिगर? सरळ वरचं तिकीट कापलं जाईल.’ मृत्यू माझ्या माथ्यावर टक टक करत होती.

‘जर मी कुणा के.पी.ला ओळखतच नाही, तर तुम्हाला त्याचा पत्ता कुठून देणार?’

माझा आवाज विझत आलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीसारखा  कापत होता.

‘अच्छा, तू के.पी.ला ओळखत नाहीस?’  दाढीवाला खंबीरपणे चालत माझ्यापाशी आला

‘नाही.’

‘तू शर्मा नाहीस?’ टकलूने विचारले.

‘आहे. ‘

‘विश्वास ठेवा, मी कुणाही के.पी. नावाच्या माणसाला ओळखत नाही.’

‘खोटं बोलतोय हा! गोळी मार याला!’ दाढीधारीने माझा उजवा हात धरून मागे मुरगळला. ‘आई ग!’ वेदनेच्या अजगराने हात आणि खांदे मजबूतपणे जखडले. मी कळवळलो. म्हंटलं, ‘हां हां  मारा मला. क्षणोक्षणी मरत रहाण्यापेक्षा  यातना लवकर संपून गेल्या, तर बरंच होईल!’

‘खरं खरं सांग, तू रजत शर्मा नाहीस? के.पी.चा पार्टनर?’ टकलूच्या पिस्तुलाची नळी आता माझ्या गळ्याच्या निळ्या नसीला कुरवाळत होती.

म्हणजे हे खुनी मला रजत शर्मा समजत होते तर…..

नाही’ विव्हळत मी म्हंटलं.

रजत शर्माला मी ओळखत होतो. शहरात आलेल्या काश्मिरी विस्थापितांची देख-भाल करणारी एक संस्था होती. त्या संस्थेचा तो सक्रिय सभासद होता. त्याशिवाय त्याचा स्वतःचा काही व्यवसायदेखील होता. जवाहर नगरमधे राहात होता. एक दोन वेळा देणगीच्या संदर्भात मला भेटला होता.

‘खोटं बोलतोय हा! मी म्हणतोय, गोळी मार साल्याला!’

‘तू रजत शर्मा नाहीस, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा?’ टकलूने माझ्याकडे टवकारून पहात विचारलं, जसं काही तो पोलिसवाला आहे आणि मी गुन्हेगार.

‘कोटाच्या खिशात माझं आधार कार्ड आहे. बघा.’ माझा आवाज प्रकाशाची पायवाट शोधत होता.

टकलूने खुंटीवर टांगलेल्या माझ्या कोटाच्या खिशातून माझे आधार कार्ड काढले आणि काळजीपूर्वक बघू लागला. जसं काही त्याच्या अशा बघण्याने लिहिलेली अक्षरे बदलणार आहेत.

काळ जसा तिथे गोठला होता. मला वाटलं त्याच्या नजरेच्या ऊष्णतेने माझं आधार-कार्ड जळून जाईल. भिंतीवर चिकटवलेलं मधुबालेचं छायाचित्र थरथर कापून उठेल. कॅलेंडरमधून डोकावणारे,  सोनल मान सिंहाचे  काजळभरले डोळे घामेजल्या सारखे दिसत होते. सिलिंग फॅनच्या आडून एक पाल खाली पाहत होती.

थोड्या वेळाने टकलू म्हणाला, ‘हं… तू रजत शर्मा नाहीस तर…. राकेश शर्मा आहेस. ‘

गोठलेला काळ जसा वितळून वाहू लागला. बाहेर कुठे तरी एक कोकीळ जोराने कुकला. पाल सिलिंग फॅनच्या आडून बाहेर आली.

‘हो.’ मी म्हंटलं.

‘रजत शर्माला ओळखतॊस?’

‘नाही.’

मी या खुन्यांना रजत शर्माचा पत्ता काय म्हणून सांगू?

‘खोटारड्या, गोळी मार साल्याला.’ त्याचा आवाज पुन्हा एकदा तीक्ष्ण चाकूसारखा टोचला.

‘छोट्या, सोडून दे याला. हा तो नाही.

‘पण….. ‘

‘छोट्या आपण चुकीच्या माणसाला पकडलय.’

‘जा. मर साल्या ‘   दाढीवाल्यानं  मला जोरात धक्का दिला. मी भिंतीवर जाऊन आदळलो. थोडंसं  जुनं प्लॅस्टर  खाली पडलं.

‘तू नशीबवान आहेस,की तू रजत शर्मा नाहीस, राकेश शर्मा आहेस.’ टकलू म्हणाला.

‘पण याने सगळं ऐकलय. याला जिवंत सोडून कसं जाता येईल? मी तर म्हणतो, गोळी मार स्साल्याला.’दाढीवाला  माझा पूर्वजन्मीचा शत्रू वाटत होता.

‘राहू दे छोट्या! ऐक साध्या माणसा, तुला कळलंच असेल आम्ही किती भयंकर, धोकेबाज माणसे आहोत. आम्ही आज आलो, तर पुन्हा उद्याही येऊ शकतो.  कुठेही, कधीही तोंड उघडू नकोस. कळलं! तू काहीच पाहीलं नाहीस. काहीच ऐकलं नाहीस. तू स्वतःवरच उपकार करशील. आपलं  तोंड शिवून टाकशील. गांधींची तीन माकडेच आता तुला वाचवू शकतील. ‘

टकलूच्या गळ्यातून एक बिघडलेला पंखा घुर्र घुर्र करत होता.

मी मान हलवली. वा: खुन्यांनो, गांधीजींच्या तत्वज्ञानाचा हा उपयोग!

‘आणि आम्ही गेल्यावर अर्ध्या तासापर्यंत बाहेर पडायचं नाही. टकलूने  ताकीद दिली. मी होकार भरला. वेदनेचा अजगर माझं  अंग आवळत होता.

टकलूने  पिस्तुल पँटच्या खिशात ठेवले आणि दरवाजा उघडला. उन्हाचा एक उत्सुक तुकडा गुप्तहेरासारखा घराचा शोध घेत खोलीत घुसला आणि आत पसरलेल्या तणावाला हुंगू लागला.

‘वाचला स्साला! पण काही गडबड केली, तर तुला गोळी मारायला मी स्वतः येईन. शब्दांच्या सुरीने मला अर्धमेला करत दाढीवालाही टकलूबरोबर  बाहेर पडला. मी गुपचूप भिंतीला चिकटून उभा होतो. छाती अजूनही भात्यासारखी चालू होती.  बाहेर मोटार सायकल  स्टार्ट झाली होती. शेजारच्या मिस सैलीचा अल्सेशियन कुत्रा भुंकू लागला. मग मोटरसायकलच्या इंजिनाचा आवाज दूर  होत होत गेला आणि कुत्राही भुंकायचा थांबला.

मला वाटलं, जसं काही कुणी माझ्या गळ्या वर ठेवलेला चाकू हटवलाय. एक दीर्घ श्वास घेऊन मी दरवाजापाशी आलो. ते गेले होते. बाहेर एप्रीलच्या रस्त्यावर एकाकीपण विखरून पडलं होतं. रस्त्याच्या  कडेला उगवलेल्या उघड्या झाडा-झुडुपांवर  नवी पालवी फुटू लागली होती. हवेत, शेजारच्या मंदिरात होणारा घंटानाद पसरत होता. तेवढ्यात उशिरा उठलेला कोंबडा उतावळ्या स्वरात बांग देत होता.  मनगटावरील घड्याळात आठ वाजले होते.

मी कपाळावरचा घाम पुसला. नसांमधून धावणारी वेदना आता काहीशी कमी झाली होती. कानपटीवर उभारलेल्या टेंगुळावर हात फिरवला. रक्त येत नव्हतं. केवळ सूज होती. मृत्यू माझ्याजवळून वास घेऊन निघून गेला होता. आज त्याचा दिवस दुसरीकडे कुठे तरी होता. आज माझी पाळी नव्हती. कुठे तरी, कुणी तरी होतं, ज्याला वाटत होतं, मी अजून जगावं… त्याला मनोमन धन्यवाद दिले. मग खाली पडलेलं वर्तमानपत्र उचललं आणि आत डोकावलो. शेजारच्या कारखान्याचा सायरन पुन्हा वाजू लागला…… मला वाटलं, असा एखादा कारखाना, नाही का निघू शकत, जो केवळ चांगल्या आणि प्रामाणिक माणसांचंच उत्पादन करू शकेल?

– समाप्त – 

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळ आला होता, पण – भाग – १ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ काळ आला होता, पण – भाग – १ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

‘नाही सांगितलं, तर गोळी मार स्साल्याला!’ मोठ्या दाढीवाल्याचा टोकदार आवाज धारदार चाकूसारखा टोचला.

——

सकाळी सात वाजता कारखान्याचा भोंगा मोठ्या आवाजात वाजला, तरी मला उठावसं वाटत नव्हतं. अजूनही डोळ्यात झोप होती. रात्री उशिरा झोपलो होतो. काल संध्याकाळी नीलोफरकडे पार्टीला गेलो होतो. तिथे अशी काही मैफल रंगली, की वेळेचा पत्ताच लागला नाही. सकाळी भोंगा वाजल्यानंतर काही वेळ निद्रा आणि जागृती यांच्या सीमा – रेषेवर डुलक्या घेत राहिलो.

‘उठा शर्मा जी, आज सोमवार आहे.’

डोक्याच्या कुठल्या तरी कोपर्‍यात प्रकाश पडला. डोळे उघडले. बिछान्यावर पडल्या – पडल्याच इष्ट देवतेला हात जोडले. ‘कल्याण कर प्रभू!’ मग उठून आळस दिला. आत वॉश बेसिनवर जाऊ तोडावर पाणी टाकलं. एवढ्यात दरवाजाची घंटी अपरिचित पद्धतीने वाजली. इतक्या सकाळी सकाळी कोण मरायला आलय, कंबखत!

टॉवेलने तोड पुसून दरवाजा उघडला, तर दरवाजात सात फूट उंचीचा एक धिप्पाड, मिशाळ, टाकल्या मला मागे सारत आत घुसला. त्याच्या हातात पिस्तुल होते. त्याच्या बरोबर एक मोठा दाढीवालादेखील घुसला. त्याने दरवाजा आतून बंद केला.

‘हे… हे… काय होतय? कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? कुणाला भेटायचय?’ मी घाबरून विचारलं. हे सगळं पापणी लावते, न लावते, तोच घडलं होतं. मी खोलीमधे स्तंभित होऊन उभा होतो.

‘चूप! प्रश्न आम्ही विचारणार. तू फक्त उत्तरे द्यायचीस. के. पी. कुठे आहे?’ माझी कॉलर धरून टकलूने विचारले.

‘कोण के. पी.? मी कुणा के. पी. वी. पी. ला ओळखत नाही.’ मी त्यांच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपडू लागलो. त्याची ऊंची माझ्या खुजेपणाची टवाळी उडवत होती.

‘ तू के. पी.ला ओळखत नाहीस. के. पी.चा लंगोटी यार!’

उलट्या हाताची एक जोरदार थप्पड माझ्या कानपटीवर पडली. सगळं डोकं भणभणलं. डोक्याच्या गल्ल्या गल्ल्यांमधून खूप सार्‍या माशा भणभणल्या.

‘नाही सांगितलं, तर गोळी मार स्साल्याला!’ मोठ्या दाढीवाल्याचा टोकदार  आवाज चाकूच्या तीक्ष्ण धारेसारखा टोचला.

‘ऐकलस ना? खरं खरं सांग, कुठे आहे के.पी.?’ टकलू फाटक्या आवाजात म्हणाला. त्याचा डावा हात माझा गळा आवळत चालला होता. उजव्या हातात पिस्तूल होतं. त्याचा आवाज ऐकून वाटत होतं, जसा काही एखादा बिघडलेला पंखा घुर्र-घुर्र करत फिरतोय.

‘मला माहीत नाही. मी खरोखरच कुणा के.पी.ला ओळखत नाही.’ मी बसलेल्या आवाजात म्हणालो. माला श्वास घ्यायला त्रास होत होता. कपाळावरून घामाची नदी वाहू लागली होती. कान गरम झाले होते. हृदयाची धडधड घाबरलेल्या घोड्यासारखी पळत होती. समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाची सुई सात वाजून पाच मिनिटावर थांबलेली होती.

‘असा नाही बोलणार हा मादर… गोळी मार याला!’ मोठया दाढीवाल्याने टकलूला पुन्हा चावी मारली.

‘तुला काय वाटतय, आम्ही इथे नाटक करायला आलोय? सरळ सरळ सांग, के. पी. कुठे आहे?’

टकलू मुच्छ्डने माझ्या मानेवरची पकड अधीक घट्ट केली. वेदनेचा अजगर मला जखडू लागला, पण मी गप्प बसलो. मौन हेच माझे एकमेव हत्यार होते.

‘मी सांगतोय ना, गोळी मार स्साल्याला!’

दाढीवाल्याने टेबलावर असलेली पुस्तके इकडे तिकडे केली. तिथे काय शोधत होता, कुणास ठाऊक? त्याला काय अशी शंका आली की काय, की मी के. पी.ला पुस्तकाच्या कुठल्याशा पानात लपवून ठेवलय.

‘नाही… नाही…  हा सज्जन माणूस आहे. मरू इच्छित नाही. हां! तर सज्जन माणसा, आम्ही कोण आहोत, माहीत आहे? आम्ही व्यावसायिक खून करणारे आहोत. चल. फटाफट सांग कुठे आहे के. पी? आम्ही तुला सोडून देऊ.’ टकलूने प्रेमाने लहान मुलासारखं पाठ थोपटत म्हंटलं, जसं काही के. पी.चा पत्ता सांगितल्यावर, तो मला बक्षीस म्हणून लॉलीपॉप देणार आहे.

‘तुमचा काही तरी गैरसमज झालाय. मी कुणा के. पी.ला ओळखत नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवताय.’

‘नाही सांगितलं, तर गोळी मार स्साल्याला! याचं प्रेतच बोलेल.’ दाढीवाल्याने आता कपाट उघडून त्यात शोधाशोध सुरू केली, जसं काही मी के. पी. ला कुठल्या तरी कपाटात बंद करून ठेवलय.

‘नाही… नाही… हा चांगला माणूस आहे. हा स्वत:च सांगेल, हं, तर भल्या माणसा, आता तू मला सांगशील, की के. पी. कुठे आहे? ‘ असं म्हणत म्हणत टकलूने पिस्तुलाची नळी माझ्या कानपटीवर ठेवली. माझं डोकं गरम झालं. श्वास थांबू लागला. सगळं संपणार की काय? आत्ता? इथेच? याचवेळी? आणि मी भिंतीवर टांगलेल्या एका फोटोफ्रेममध्ये जाऊन बसणार? मला असं मरण येणार? अनोळखी गुंडांकडून? ऐन तारुण्यात? अकारण? काय हीच माझी नियती आहे? मला असं मरण यावं, असं मी काहीच केलं नाही. मी आस्तिक आहे. अलीकडेच झालेल्या चमत्काराच्या वेळी मी शेजारच्या मंदीरातील गणपतीला दूधही पाजले. माझी कुणाशीही व्यक्तीगत दुश्मनी नाही. मी कधीही कुणाच्याही हक्कावर आक्रमण केलं नाही. अगदी साधा सरळ माणूस आहे मी. आंथरण्या-पांघरण्यासाठी  मूठभर विश्वास आहे, बस्स! मग हे खूनी काय आज माझी हत्या करतील? माझ्या विश्वासाचीही हत्या करतील?

मी खरोखरच के. पी. नावाच्या कुणा व्यक्तीला ओळखत नव्हतो. पिस्तुलाची राक्षाशीण माझ्या कानपटीवर तणलेली होती. माझी ओठ सुके होते. कानपटी जळत होती. खाक घामाघूम झाली होती. हात घामाने चिपचिपित झाले.

मी तीन आकडे मोजतो. तोपर्यंत याने नाही सांगितलं तर याला गोळी मार. दाढीवाल्याचा टोकदार  आवाज चाकूच्या तीक्ष्ण धारेसारखा टोचला. हात घामाने चिपचिपित झाले. डोळ्यांपुढे अंधेरी आली. हृदयाची धडधड, भितीवर हातोडा मारावा, तशी होत होती. मी मृत्यूची वाट बघू लागलो. जे होणार आहे, ते कोण टाळू शकणार?

लहानपणी एकदा एका दुष्ट नोकराने, एक कबुतर पकडलं आणि ब्लेडने त्याचा पाय कापला. तेव्हा मी खूप रडलो आणि ते लंगडं काबूतर त्याच्याकडून हिसकावून घेतलं नि त्याला उडवलं. पण ते उडताच दहा-बारा कावळे त्याच्या मागे लागले. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी, ते घाबरलेले कबुतर तीन-चार मिनिटे  इकडे-तिकडे व्याकुळपणे उडत राहिले. नंतर थकून खाली पडले. मग त्या सगळ्या कावळ्यांनी त्या लंगड्या कबुतराला टोचून टोचून खाल्लं.

‘नाही… नाही…हा मोठा प्रेमळ माणूस आहे. आत्ता सांगेल. काय रे, प्रेमळ माणसा? तुला काय आम्ही मस्करी करणारे वाटलो. आम्ही खुनी आहोत खुनी.   के. पी. तर मरेलच, पण त्याचा पत्ता सांगितला नाहीस, तर तू आधी मरशील. कळलं?’

मी गुपचुप श्वासोछ्वासाचा आवाज ऐकत राहिलो. काय सांगणार? त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांच्यासाठी माझे शब्द आपला अर्थ हरवून गेले होते.

‘गोळी मार स्साल्याला!’ टकलूने माझ्या कानपटीवर पिस्तुलाची मूठ मारली. डोळ्यात एखाद्या बोगद्यातला अंध:कार भरत चालला. धरणीकंप झाला. जग गोल गोल फिरायला लागलं. अंधारात शेकडो रातकिडे एकदम किरकिरू लागले. वेदनेची एक लहर वीजेसारखी शरिरातून गेली. मग अंधार अधीक गडद झाला. लडबडून मी जमिनीवर बसलो.

– क्रमश: भाग पहिला

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!..! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!..!..! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!

२ जुलै १९९९ ची रात्र. अंधार माजल्यासारखा अधिकाधिक मिट्ट होत चाललेला. दिवसभर धडाडणा-या तोफा आता थंड करण्याचा,रात्रभर विश्रांती घेण्याचा आणि दिवस उजाडताच पुन्हा मारा सुरु करण्याचा त्यांच्यापुढे एक पर्याय होता…पण तो त्यांनी स्वीकारला नाही. आजचा तसा तिसरा दिवस होता. तोफा आणि तोफा डागणारे सैनिक, त्यांचे नेतृत्व करणारे अधिकारी यांनी क्षणभर विश्रांती घेतलेली नव्हती. कारण यांनी खालून वर तोफगोळे डागले नाहीत, तर पहाडांवर चढत जाणारे पायदळाचे सैनिक उंचावरून येणा-या पाकिस्तानी गोळीबाराला बळी पडणार होते, हे निश्चित. युद्धाचे सुद्धा एक तंत्र असते. शत्रू त्यांच्या सुरक्षित खंदकामध्ये आरामशीर बसून आपल्या सैनिकांवर गोळीबार करत असताना आपला तोफखाना शत्रूला तुफान बार उडवत  भाजत राहिला म्हणजे त्यांना गोळीबार करण्यात अडचणी येतात…आणि शत्रू असा अडचणीत सापडल्याचा फायदा घेत आपले सैनिक आगेकूच करीत करीत त्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्यांच्या अधिकाधिक जवळ पोहोचू शकतात! आणि म्हणूनच हा तोफांचा मारा थांबला म्हणजे आपल्या सैनिकांना असणारा धोका वाढत जाणार!

१४ मे १९९९…  ३१५, फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) कारगिल युद्धाच्या आरंभी द्रास सेक्टर मध्ये उतरवली गेलेली पहिली फिल्ड रेजिमेंट ठरली!  पाकिस्तानी घुसखोरांच्या वेशात भारतात घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याच्या कामात इतर चार रेजिमेंटस व्यग्र झाल्या होत्या. तोलोलिंग, point 5140, black tooth, टायगर हिल, गन हिल- point 4875 ही महत्त्वाची ठाणी ताब्यात घ्यायला 1 Naga, 8 Sikh, 17 Jat, 16 Grenadiers निघाल्या होत्या आणि ३१५,फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) वर या चार रेजिमेंटसला साहाय्य पुरवण्याची (Artillery Support)  देण्याची मोठी जबाबदारी दिली गेली होती. ज्या जागेवरून तोफा उडवल्या गेल्या ती जागा शत्रूच्या लक्षात यायला वेळ लागत नाही…मग शत्रूही या जागेवर मारा सुरु करतो. म्हणून तोफांचा जागा सातत्याने बदलत ठेवावी लागते..आणि हे काम अतिशय जिकीरीचे असते…पण तरीही मोठ्या त्वेषाने केले जाते!

रात्र सुरु झाली…आणि आपले सैनिक लक्ष्याच्या समीप पोहोचू पहात होते…वरून पाकिस्तानी मारा सुरु होता…अशावेळी खालून त्यांच्यावर अचूक मारा होणे गरजेचे होते…तसा संदेशही दिला जात होता…दिवसभर तोफा चालवून सैनिक थकलेले होते…सेकंड-इन-कमांड मेजर चंद्रभूषण द्विवेदी साहेब त्यांच्या तंबूत क्षणभर विसावले होते…संदेश कानी पडताच ते तंबूबाहेर धावले…त्यांनी स्वत: एका तोफेचा ताबा घेतला आणि ते फायरींग करू लागले…इतर तोफांतूनही  तोफगोळे सतत आणि अचूक डागले जात आहेत, हे पहात होते…शाब्बास…शाब्बास…फायर! अशा आरोळ्या सुरु होत्या! थांबून चालणार नव्हते…त्यांच्या कवर फायरच्या आधारे जवान इंचा-इंचाने शत्रूकडे सरकत होते…रात्रीच्या अंधारात! भारताकडून तोफांचा मारा काही क्षण जरी थंडावला असता तरी शत्रूला खाली गोळीबार करण्याची उसंत लाभली असती.

सर्व काही सुरळीत सुरु होते….पण शत्रूला आपल्या तोफखान्याची जागा समजली होती….त्यांनी नेम साधला…एक तोफगोळा नेमका साहेब ज्या गनवर काम करीत होते…तिच्या अगदी शेजारी येऊन आदळला…अर्थात मोठा स्फोट झाला…साहेबांचा हातात आणि शरीरात त्या गोळयाचे अणकुचीदार तुकडे मोठ्या वेगाने घुसले…रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या…पण साहेब थांबले नाहीत…शेवटच्या श्वासापर्यंत आदेश देत देत तोफांचा भडीमार करीत राहिले…साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र लढत असणारे लान्स हवालदार मलय्या, नाईक सरवन कुमार, नाईक बिश्नु राय, लान्स नाईक गोपय्या, गनर राजकुमार, गनर सिंघा यांनी सुद्धा तिथेच शेवटचे श्वास घेतले!

आज या बलिदानांना पंचवीस वर्षे पूर्ण झालीत…कारगिल युद्धातला हा एक मोठा निर्णायक प्रसंग होता! मेजर चंद्रभूषण विन्धेश्वर द्विवेदी साहेब मरणोत्तर सेना मेडलचे मानकरी ठरले. बिहार मधील पूर्णिया मध्ये जन्मलेले चंद्रभूषण हे देशाचे भूषण ठरले. सुट्टीवर असताना द्विवेदी साहेब अत्यंत कुटुंबवत्सल आणि सीमेवर अत्यंत कर्तव्यकठोर असत. त्यांची थोरली कन्या नेहा डॉक्टर असून एका सैन्याधिकारी साहेबांशी त्या विवाहबद्ध आहेत. तर  धाकटी कन्या दीक्षा लेखिका आहे. दीक्षा यांनी त्यांच्या पित्याने त्यांना सीमेवरून पाठवलेल्या पत्रांचा संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे.

…… हुतात्मा मेजर चंद्रभूषण आणि त्यांच्या सहकारी हुतात्मा सैनिकांना आजच्या स्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद ॥

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याचं माहेरपण… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ त्याचं माहेरपण… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

” हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस,यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा,..?”अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळाली देखील,…

अभि जाम मूडमध्ये ओरडला,”मै मायके चला जाऊंगा तुम देखती रहीयो,..”

पाणी पिताना येणार हसू दाबत,..अनुने हातानेच खुणावल,..आणि घोट गिळत विचारलं,”नक्की बरा आहेस ना,..?”अभि अगदी फुल मूड मध्ये,..हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”

आता अनु त्याच्या जवळ जात त्याला दटावत म्हणाली, ” अभ्या नाटकं नको हं,पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”

“नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला,..”

अनुने लाडाने त्याला पाठीत हलकं चापट देत म्हटलं,..” ताईंकडे चाललास मग असं सांग ना,..हे काय नवीन,..म्हणे माहेरी चाललो,..”

अभिने शर्टची घडी केली,इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे तिचा हात हातात घेऊन म्हणाला,..” “म्हणू दे मला हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला  ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाच पाकीट ठेवलं,..”

मी म्हंटल, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”

तर ताई म्हणाली,..”ओवाळणी नाही रे तुला माहेरपणाला बोलावतीये,..”

मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला पटकन जवळ घेतलं,..खुप रडली गळ्यात पडून.. म्हणाली, “आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात,  पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो त्या उजळवण्याची जागा माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना,..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं म्हणजे माझ्याकडे,.. अनु आली की तू निघणार आहेस,..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी “..  एवढं सांगून तायडी गेली,..

आता मी चाललो माहेरी,..”जाऊ ना राणीसरकार,..?”

अनु म्हणाली, ” आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..”नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुज स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?”

अनु म्हणाली, ” जा बाबा जा.. जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वहाणं,… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”

अभि म्हणाला, ” असं मग येतोच हे सुख उपभोगून,..”

अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं खरंच भारी कल्पना आहे ही भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,..

“ये ना दोन दिवस.  अभि गावाला गेलाय.. मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..

दोन्हीकडे माहेरपण रंगले,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून  आठवणींच्या गप्पांना उत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..

…. भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

हा खरंतर आमच्या केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा. अगोदर लिहिलेल्या केदारनाथ यात्रेचा पूर्वार्ध. यमुनोत्री यात्रेत घोडेबाजार सह रस्ता, पायी, घोड्यावर, पीट्टू, आणि डोली ने प्रवास कसा होतो हे पाहण्याचा सगळा अनुभव पहिल्यांदा आला. आणि काहीप्रमाणात पुढील केदारनाथ प्रवास कसा असेल याची थोडीफार जाणीव झाली ती याच प्रवासात. पण जाणीव असणं आणि प्रत्यक्ष परिस्थिती, यात काहिवेळा प्रत्यक्ष परिस्थिती थोडी बिकट असते असा अनुभव येतो. तो मात्र केदारनाथलाच आला.

एखाद्या पैसे गुंतवण्याच्या जाहिरातीत जसं काही जोखीम किंवा आर्थिक धोका असणार्या काही गोष्टी पटापट सांगीतल्या तर जातात, पण आपल्याला त्या नीट कळत नाहीत. तसाच काहीसा प्रकार यमुनोत्री आणि केदारनाथ प्रवासात जाणवला.

यमुनोत्री यात्रेत केदारनाथ यात्रेची कल्पना आली असली तरी ती फक्त चुणूक होती. कारण या यात्रेचा प्रवास छोटासाच होता. अंतर जास्त नव्हतं. वातावरण बदलाचा प्रभाव तेव्हढा नव्हता. आणि पायी, घोडा, किंवा डोलीच्या प्रवासाच्या अगोदर आणि नंतर पायी चालण्याचा प्रसंग आला नाही.

पण घोड्यावर बसण्याचा त्रास लक्षात आला तो इथेच. आम्ही घोडे करायचे ठरवल्यावर त्या घोडेवाल्यांना आपलाच घोडा घेऊन आपल्यालाच पैसे मिळावेत याची इतकी घाई झाली की आमच्यापैकी दिसेल त्याला, बाई आणि माणूस यांना उचलून घोड्यावर बसवायची स्पर्धाच सुरु झाली आहे असं वाटलं.

मी वर जावं की नाही. जायचच असल्यास घोडा करावा की डोली. याचा विचार करण्याअगोदरच चारपाच जणांनी जमेल तसं उचलून एखाद पोतं चढवून त्याला हलवून नीट कराव तसं समोर असलेल्या घोड्यावर मला चढवलं सुध्दा. त्यातही पहीला प्रयत्न थोडा असफल झाल्यावर माझ्या शरीराकडे आणि हालचालींकडे पाहून एक त्यातल्यात्यात कमी उंचीचा घोडा आणला.

यावेळी मला दहीहंडी उत्सवाची आठवण झाली. फक्त तिथे पहिला प्रयत्न असफल झाल्यावर दुसरा संघ येतो. पण लक्ष्य तेवढंच उंच असतं. इथे मला घोड्यावर चढवणारा संघ त्याच घोडेवाल्यांचा होता. पण कमी उंचीचा घोडा आणून गोंविंदाला (मला) कमी उंचावर चढवलं जाणार होतं. यात मी मात्र कदाचित मनातल्यामनात खऱ्या गोंविंदाचा धावा केला असावा.

या सगळ्या गदारोळात आमच्यापैकी दोन तीन जणांना याच पध्दतीने घोड्यावर चढवलं सुध्दा होतं. असा प्रसंग अगोदर आला नसल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून कमी अधीक प्रमाणात, वेगवेगळे आवाज निघाले होते. या आवाजात भिती, किंचाळणं, सवय नसणं, या प्रकारे उचलतील याचा अंदाज नसणं याचे संमिश्र भाव होते. मला त्रास झाल्याने माझ्या तोंडातून आवाज येत नव्हता, तर मला घोड्यावर बसायचंच नाही म्हणून मी चक्क ओरडत होतो. पण ते ऐकणार कोण……. कारण सगळ्यांच्याच बाजूला घोडे आणि घोडेवाले यांचीच गर्दी.

मी घोड्यावरुन काहिही करून खाली उतरण्यासाठी धडपडत होतो. आणि आलेलं गिर्‍हाईक जाऊनये याचा खटाटोप घोडेवाले करत होते. यात थोडा गोंधळ झाला. पण या सगळ्या गोंधळात एकच जण त्यातल्यात्यात शांत होता….. तो म्हणजे घोडा…….

म्हणजे माणसं घोड्यासारखी आणि घोडा माणसासारखा वागत होता…….

मी अगदी थोडावेळच घोड्यावर होतो. पण तेवढ्या अल्पकाळात माझ्या नजरेसमोर घोड्यावर बसून, हातात तलवार घेऊन, ती घोड्यांबरोबर चालवणारे मावळे. आणि पाठीशी लहान मुलाला बांधून मेरी झांसी नही दूंगी असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी येऊन गेले. आणि मनातल्यामनात त्यांची माफी मागत. तडफेने घोड्यावरुन पायउतार झालो.

राजकारणात पायउतार व्हाव यासाठी खटाटोप असतो. तर इथे मी पायउतार होवूनये म्हणून प्रयत्न सुरु होते. पण शेवटी विजय माझाच झाला असलातरी आता काय करावं?……. या विचारात घोडेवाले आणि माझ्या बायकोसह ज्यांनी मला बरोबर नेले होते ते सगळेच मान खाली घालून वीचार करत होते. शेवटी तुुम्ही सगळे जा…… मी यमुनोत्रीच दर्शन घेतलं नाही तरी चालेल….. या विचारावर माझा प्रवास थांबला आणि इतरांचा सुरु झाला.

यांच्या पूर्ण प्रवासाला दोनतीन तासांचा कालावधी अपेक्षीत होता. पण जेमतेम अर्धाच तास झाला असेल. माझ्या बायकोच्या सांगण्यावरून परत एक सहकारी कुलकर्णी यांचा फोन…….. काय विचार करताय….. परत केव्हा येणार आहोत…. करा हिंमत….. डोली करा पाहिजेतर……. आम्ही रस्त्यात, नाहीतर वर थांबतो, वाट बघतो.

मग काय?……. माझ्या अंगात परत एकदा झाशीची राणी, आणि मावळे यांच स्फुरण चढलं. फक्त चढाईसाठी घोड्याएवजी डोली वापरावी असा निर्णय माझाच झाला. (कधीतरी मी एकटासुध्दा धाडसी आणि ठोस निर्णय घेऊ शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढला.) आणि परत आमच्या चारचाकीच्या सारथ्याला सोबत घेत मी एक डोली ठरवून त्यात त्याच डोलीवाल्यांच्या साहाय्याने अगदी पेशवाई थाटात नाही, पण पाय जमतील तसे जवळ लांब करत वीराजमान झालो. सुदैवाने वातावरण चांगले होते.

मी वीराजमान झाल्यावर आमचा प्रवास सुरु झाल्याची वार्ता उलट टपाली भ्रमणध्वनी द्वारे पाठवण्याची काळजी मीच घेतली. ती पोहोचेपर्यंत त्यांचा गड सर होत आला होता. त्यांच्यासाठी ही आनंदी वार्ता होती. बायको जवळ त्या वेळी तिथे साखर असती तर कदाचित तीने त्या बसल्या घोड्यावरुनच साखर वाटायचा आनंदही घेतला असता. पण तो योग नव्हता.

मी सुखरुप वर पोहोचलो. आमची मंडळी आणि सोबतचे सहकारी यांची भेट झाली. आणि यमुनोत्री दर्शन व परतीचा प्रवास सुखरुप झाला.

या वेळी एक गोष्ट घडली ती आमचे सहकारी नंदेश परदेशी यांनी लक्षात आणली. बर्‍याचशा सिनेमात लग्नाची द्रृश्य आवर्जून दाखवली जातात. या सगळ्या सोहळ्यात नयनरम्य द्रृश्य असतात. असच नयनरम्य द्रृश्य आमच्या या प्रवासात पण होतं. फक्त सिनेमात वर हा घोड्यावर असतो. आणि वधू डोलीत असते. आमचा लग्न सोहळा कधीच पार पडला होता. पण आज माझी बायको घोड्यावर स्वार होती. आणि मी मात्र डोलीत होतो. आज खर्या गोष्टीला क्रूतीची साथ होती. आणि साक्ष होती यमुनोत्री.

आजच नाही तर आजच्या आधीच्या इतर प्रवासातच काय….. बाहेर जातांना सुध्दा खर्या अर्थाने ती पुढाकार घेत असते, आणि मी त्यातल्यात्यात सुरक्षित आणि कमी खडतर मार्ग माझा असतो, आणि खडतर तिचा. पण आज ते घोडा आणि डोली या प्रवासात जाणवलं.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पुरस्कार…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “पुरस्कार…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

घराला काल रात्रीपासून झोप नाही.

कालच कळलं.. अण्णांना ‘आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालाय.

यंग इंडिया ऑर्गनायझेशन दरवर्षी हा पुरस्कार देतं.. पाच लाख रुपयांचा. मज्जा आहे बुवा अण्णांची.

अण्णा वेडा माणूस. त्याहून वेडी माई… हे वेड मजला लागले. वेड्याची बायको.. माईला वेड्याची बायको होण्यात काय सुख वाटायचं कुणास ठावूक? आपण तरी काय करणार?

.. तर काय सांगत होतो? हा अण्णा चांगला मुख्याध्यापक होता जिल्हा परिषदेच्या शाळेत. मोजून पंधरा वर्ष नोकरी केली. आयुष्यभर काटकसरीत जगला. पै पै साठवला… खरं सांगतोय.. परवडायचं नाही म्हणून मूलही होऊ दिलं नाही. काय म्हणायचा माहित्येय? शाळेतली मुलं ही माझीच मुलं. असला वेडा माणूस…

त्याला माईची साथ… कल्याणमस्तु!

एक दिवस वेडाचा झटका आला. दिली नोकरी सोडून. गेली दोघं जव्हारच्या जंगलात. झोपडीत राहिली तिथं दोघं. कुठली तरी ठाकरवाडी. एक एक पोरगं गोळा केलं. शाळा सुरू केली… झोपडीतच.

वह्या, पुस्तकं, औषधं, पोरांना पुरेसं अन्न… सब कुछ… स्पाॅन्सर्ड बाय आण्णा.. साठवलेल्या पैशातून.

तो सुद्धा संपत आला. शाळा हा एकच ध्यास. त्यासाठी सगळा अट्टहास. दिसेल त्याच्यापुढे हात पसरले.

.. अण्णा नेहमी म्हणायचे. चांगल्या कामासाठी, शिक्षणासाठी, हात पसरताना कधीही लाजू नये. सरकारी अनुदानासाठी धडपड चालू होती. अण्णांच्या चपलांचे अनेक जोड झिजून मेले. टेबलाखालचे व्यवहार अण्णांना कधी जमलेच नाहीत.

वाईट माणसं भेटली तशी काही चांगलीही. टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेलं. अण्णांनी सगळं लक्ष विद्यार्थ्यांवर केंद्रित केलं. नुसत्या मार्कांची फॅक्टरी नको होती अण्णांना… चांगल्या माणसाचं वाण देणारी शाळा हवी होती.

– अण्णांनी शाळा तशीच घडवली… शिस्त पाळणारी… संस्कार जपणारी… मातीला न विसरणारी.

अण्णांची शाळा म्हणजे हिऱ्याची खाण… जिथं मुळाक्षरं पोचली नव्हती, तिथली मुलं शिकली. मोठी झाली.

कुणी सरकारी अधिकारी झाले. कुणी डाॅक्टर झाले. कुणी इन्जिनिअर झाले… आणि कुणी शिक्षक….. अण्णांच्या तालमीत तयार झालेले शिक्षक पुन्हा अण्णांना येवून मिळाले. अण्णांची काळजी मिटली.

शाळा एकदम जाऊ दे जोरात. ते जाऊ दे हो.. प्रत्येक जण ‘चांगला माणूस’ झालाय. बरीच जणं शहरात गेली. तरीही मातीला विसरली नाहीत. जमेल तेवढी मदत आठवणीनं करायची. शाळेसाठी, वाडीसाठी.

अण्णा आणि माई… सेकंड इनींग्जची सुरवात. आयुष्यभर कधी ‘टाईमप्लीज’ म्हणलं नाही. आता दोघंही थकली..

सदानंद…  अण्णांचाच विद्यार्थी. इंजिनिअर झालाय. काही दिवस नोकरी. आता स्वतःचं युनिट काढलंय भोसरीला. जेवढं कमावतो, त्यातले निम्मे वाटतो. त्याची बायकोही त्याला साजेशी. दोघंही अण्णांचेच विद्यार्थी. अण्णांवर दोघांचा भारी जीव. माई अण्णा दोघं आता त्याच्याकडेच असतात.

…. अण्णांना पुरस्कार मिळाल्यापासून सगळे आनंदात.

समारंभ छानच झाला. तुडुंब गर्दी. अण्णांचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम संपवून मंडळी घरी.

बक्षिसाचा चेक अण्णांनी माईच्या हातात दिला…

” यावर तुमचा हक्क. आयुष्यभर तुमची कुठलीही हौसमौज पुरवता आली नाही. स्वतःच्या सगळ्या इच्छा तुम्ही मारून टाकल्या. तुमचं एखादं तरी स्वप्न यातून पुरं करा..”

माई गहिवरल्या..

” खरं सांगू, डोळे भरून युरोप बघायचा होता एकदा…”

”ठरलं तर मग.”

.. “आधी तुमच्या दोघांचा पासपोर्ट काढायला हवा. महिनाभरात होऊन जाईल ते काम. मग तुमच्या युरोप टूरचं बुकींग करू…” सदानंद उवाच.

सदानंदने फारच मनावर घेतलं. चार आठवड्यात पासपोर्ट आला सुद्धा.

” उद्या जाऊ यात टूरिस्ट कंपनीच्या आॅफीसात ” अण्णांनी माईंना आठवण करून दिली.

” काही नको. पैसे संपले. काल गजा आला होता. तुम्ही गेला होतात चेकअपला. वाडीतल्या शाळेतली शिक्षकाची नोकरी सोडलीये त्यानं. तो तिकडे निघालाय बीड जिल्ह्यात… ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढतोय. तुमची खूप वाट बघितली. शेवटी कंटाळून गेला. लगोलग सदाला बोलवून घेतला. पुरस्काराची ती रक्कम त्याच्या खात्यात वळती केली. त्या पैशाची खरी गरज तिथं होती. म्हणून म्हणलं, टूरटूर करू नका फार…”

…. अण्णा गडगडाटी हसले… अगदी मनापासून. कौतुकानं त्यांनी माईंकडे बघितलं. माई नव्या नवरीसारख्या लाजल्या.

…. अण्णांनी दुसऱ्यांदा’जीवनगौरव पुरस्कार’पटकावला.

|| माई अण्णा प्रसन्न || 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एका संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले.. बाहेर दत्तू होता..

‘काय हो काका? आज सकाळीच…

‘मास्तर आसत..?

‘अजून झोपलाय तो.. काल रात्री गेटमिटिंग करून आलाय.. उठवू का?

तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला..

‘काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच..?

मास्तर.. कालच्या मिटिंगमध्ये काय ठरला संपाचा?

‘नाही हो.. मालक मागण्या मान्य करत नाही.. आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही असे साहेबांचे म्हणणे..

‘मास्तर.. यात आमी उपाशी रवलव.. दोन वरसा झाली.. संप आज मिटात. उदया मिटात म्हणून.. खायचा काय?

‘होय हो काका.. मला का समजतं नाही.. एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती.

‘मग पुढे काय? सारंगअण्णा काय म्हणटत?

‘बघू.. आज मी भेटायला जाणार आहे अण्णाना.. त्याना कालच्या गेटमिटिंग बद्दल पण सांगायचे आहे..

‘मास्तर.. जास्त वेळ काढू नकात.. माज्या चेडवाचा लग्न ठरवलंय.. दोन वरसा झाली.. तेच्या घरची चौकशी करतत.. गळ्यात तीन ग्रॅमची डवली तरी घालूक होयी.. आणि लग्नाचो खर्च.. कपंनी बंद.. पैसे खायसून हाडू?

‘बर मी आज म्हणतो अण्णांना.. तुमचा विषय पण सांगतो.. या तुम्ही..

‘उदया येतंय मास्तर.. बरी बातमी घेऊन या.. म्हणत दत्तूकाका गेले आणि विश्वास खुर्चीत धापकन बसला.

आंघोळ करून श्रद्धा बाहेर आली..

‘गेले दत्तूकाका?काय म्हणत होते?

‘संप केंव्हा संपणार? त्यान्च्या लेकीचे लग्न ठरून दोन वर्षे झाली.. त्यान्च्या गावाकडील आहे मुलगा.. कणकवली जवळचा.. पोलीस आहे.. लग्न करायचे पण खिशात काय तरी हवे ना..

‘या तुमच्या संपामुळे खुप लोकांचे वांधे झाले.. दोन वर्षे संप..? किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत?

‘सोळाशे.. आणि स्टाफ वेगळा..

‘म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्षे पगारवाचून आहेत.. एका कुटुंबात पाच माणसे पकडली तर एक लाख माणसे उपाशी आहेत.

‘होय तर.. जवळपास एक लाख माणसे या संपामुळे उपाशी आहेत.. दत्तू काका सारखे..

‘विश्वास.. आपली पण तीच परिस्थिती आली असती पण माझी नोकरी आहे म्हणून.. कशी काय असेना..कमी पगाराची का असेना  पण त्यामुळे घरात रेशन तरी येतंय.

‘बर.. मी सारंगअण्णांकडे जाऊन येतो, संप मागे घेतात का ते विचारायला… तुझ्याकडे पन्नास रुपये असतील तर दे.. बस साठी.. सिगरेट्स पण संपल्यात.. श्रद्धाने पर्स मधून पन्नास रुपये काढून दिले.

विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनिटे चालत सारंगअण्णाच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोचला. आत अण्णाच्या समोर पाचसहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्याच्याशी बोलत होते. विश्वास आत गेला आणि एका स्टूलवर बसला. त्याला पहाताच अण्णांनी बोलणे आवरते घेतले आणि त्याच्याकडे तोंड करत बोलले..

‘झाली काल गेट मिटिंग? कामगारांचे काय म्हणणे?

‘अण्णा.. कामगार घायकुतीला आलेत.. त्त्यांचा संयम संपला.. त्यान्च्या दोन वेळ जेवणाचे वांधे झालेत.. पोरीबाळींची लग्ने अडकलीत.

‘पण त्या वेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना? मी यांच्याकडे गेलो होतो? मी ठाणे पट्टीत दहा बारा कंपनीत भरगोस पगारवाढ दिलीच ना? पण आता परिस्थिती बदलली..मिलचा संप फसला.. डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपले काय?

‘म्हणजे अण्णा.. मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला?

‘होय रे बाबा.. खूपच बदल झाला.. डॉक्टर एवढे स्ट्रॉग.. एवढा मिलकामगार त्यान्च्या मागे.. तरी संप यशस्वी झाला नाही.

‘का यशस्वी झाला नाही मिलकामगारांचा संप?

‘कारण मुंबई.. येथील जमिन.. जमिनी विकून कोट्यावधी पैसे मिळतात तर मिल चालवायला कुणाला इंटटेस्ट आहे? आणि राज्यकर्ते.. दोघांची आतून सेटलमेंट..

‘मग आपला संप? त्याचे काय होणार?

‘विश्वास.. मी तुझ्या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही.. कारण माझे यूनियन मुंबईतील अजून दहा कंपनीत आहे आणि पुणे.. नाशिक भागात पण आहे.. हा संप फसला तर इतर कंपनीत परिणाम होईल… मला माझे यूनियन सुरु ठेवायचे आहे आणि त्यावर माझी डाळचावल आहे.

‘म्हणजे अण्णा.. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कपंनीतील कामगारांना उपाशी ठेवणार? केवढे हे पाप?

‘जीवो जिवश्य जीवनम.. हा डार्विनचा सिंद्धांत तुला माहित असेलच. अश्या लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात.

‘हे पाप आहे अण्णा? कामगार स्वस्थ बसणार नाहीत..

‘मग कामगारांना तू का सांगत नाहीस.. संप मोडून कंपनीत जा म्हणून?

‘मला तसें सांगावेसे वाटते.. पण मला हे मान्य करायला हवे.. अजूनही बऱ्याच कामगारांचा तुंमच्यावर विश्वास आहे… कारण अनेक कंपन्यात तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे… आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण..

‘कसले दुसरे कारण विश्वास? बोल.. स्पष्ट बोल…

‘मला माहित आहे.. तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत.. त्याना तुम्ही पोसताय.. संप जो मोडेल त्त्यांचा तुम्ही गेम कराल..

अण्णा मोठ्याने हसले..’तुला माहित आहे ना सर्व.. मग गप्प बस..

रागाने विश्वास बाहेर पडला.. बस पकडून घरी आला.. घराखाली एक दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला. त्याचे डोके गरम झाले होते. अण्णा आपला हेका सोडतं नव्हते.. पुढे काय करावे हे त्याला कळेना.. त्याची कॉलेजपासूनची डावी विचारसरणी.. कामगार.. त्यांचे हक्क.. याविषयी तो पोटतिडकेने बोलायचं. या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला.. त्त्यांचे लहानसहान प्रश्न सोडवू लागला.. त्यामुळे तो यूनियनलीडर झाला. गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे कामगार नाराज होते. ते विश्वासबरोबर बोलत.. कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares