मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक – १७ – – 

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते ।

अकस्मात होणार होऊनि जाते ।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

अर्थ :

संसारात माणूस अनेक व्यर्थ चिंता करत बसतो. परंतु जे घडायचे असते ते अकस्मात घडूनच जाते. कारण प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते. हे सत्य काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि ते मात्र त्याबद्दल सतत दुःख करत राहतात.

आधीच्या श्लोकात आपण गेलेल्या व्यक्तीचा जो शोक करतो, तो शोक मोह किंवा लोभातून निर्माण होतो असे समर्थ सांगतात. या श्लोकात ते पुढे एक वेगळाच पैलू उलगडतात. माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त असतो. परंतु चिंता करून फारसा उपयोग नसतो, कारण जे घडायचे आहे ते कर्मानुसार घडणारच असते.

माणसाचे आयुष्य चिंतांनी भरलेले असते. चिंता नाही असा दिवस फार क्वचितच येतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही याची चिंता असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी मिळेल की नाही याची काळजी वाटते. पुढे लग्न होईल की नाही, संसार कसा होईल, मुलं चांगली निघतील का, म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल? अशा अनेक चिंता माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत असतात. या चिंतेच्या ओझ्याखाली तो आयुष्य जगत राहतो.

परंतु समर्थ सांगतात की अशा प्रकारची व्यर्थ चिंता करण्याचा काही उपयोग नाही. कारण आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसारच घडत असते. आपले कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, आणि दुष्कर्म केले असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बाभळीचे झाड लावून आंब्यांची अपेक्षा करणे जसे अशक्य आहे, तसेच दुष्कर्म करून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.

महाभारतातील दुर्योधन आणि दुःशासन यांनी नीतीने वागणाऱ्या पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. त्या दुष्कृत्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अखेर महाभारताच्या युद्धात संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. कर्माच्या नियमानुसार फळ मिळते याचे हे ठळक उदाहरण आहे.

आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. या भेटीचा आपण सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटकडून चांगल्याकडे अशी आपली वाटचाल व्हायला हवी.

जीवनाला अनेकदा रंगमंचाची उपमा दिली जाते. त्या रंगमंचावर प्रत्येकाला एक भूमिका मिळालेली असते. त्या भूमिकेचे प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. एखादा शिक्षक असेल तर त्याने आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असलेली व्यक्ती आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तेच तिचे खरे साधन आहे.

आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजेच आपला स्वधर्म आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात —

“स्वये आचरिता स्वकर्म ।

ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म ॥”

म्हणूनच माणसाने आपले कर्म उत्तम करणे आवश्यक आहे. जीवनात येणारी सुखदुःखे ही आपल्या प्रारब्धानुसारच येतात हे ज्यांच्या लक्षात येते, ते शहाणे लोक त्यांचा शांतपणे स्वीकार करतात. ते व्यर्थ चिंता करत बसत नाहीत.

परंतु जे या तत्त्वाला समजून घेत नाहीत, ते मात्र दुःख आणि खेद यांच्या गर्तेत अडकून पडतात. स्वधर्म विसरला की माणूस विकारांच्या आहारी जातो, आसक्ती वाढते आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे त्याला अधिकाधिक बंधनात अडकवतात. परिणामी तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटत राहतो.

जर आपण खरोखरच हे मानत असू की जीवन ही परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण सुंदर उपयोग करायला हवा. आपल्या कर्तृत्वाने जीवनपथ उजळून टाकायला हवा. कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कर्म करणे आणि ते परमेश्वराला अर्पण करणे हीच जगण्याची खरी रीत आहे. अन्यथा तेच कर्म बंधनकारक ठरून दुःखाला कारणीभूत होते.

स्वसंवाद : 

  • मी माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल खूप चिंता करतो का?
  • जे काही घडते ते माझ्या संचिताचे फळ आहे हे मी मान्य करतो का?
  • माझ्या हातातील वर्तमानकाळ मी चांगल्या कर्मासाठी वापरतो आहे का?
  • स्वधर्माचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?
  • कर्तव्य करताना मी फळाची अपेक्षा ठेवतो का, की निरपेक्ष भावनेने कर्म करण्याचा प्रयत्न करतो?

– – – 

श्लोक क्र. १८ – – – 

मना राघवेंवीण आशा नको रे |

मना मानवाची नको कीर्ति तू रे|

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |

तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे|१८|

अर्थ: हे मना एका रामाशिवाय (परमेश्वराशिवाय) तू कशाचीच आशा ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती (कीर्ति गाऊ नकोस) करू नकोस. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, त्याचेच वर्णन करणे (स्तुती करणे) योग्य (म्हणजे श्लाघ्यवाणे)आहे. कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तोच तुला तारू शकेल.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला आपण व्यर्थ चिंता करीत बसतो असे सांगतात. कारण होणारी गोष्ट पूर्वसंचितानुसार घडणारच असते. पण मग चिंता करायची नाही तर काय करायचे त्याचे उत्तर या श्लोकात आपल्याला मिळते. आपल्याला कोण मदत करेल? कोणाची आशा ठेवायची? कोणाची स्तुती गायची? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या श्लोकात मिळतात.

मनुष्याचा जन्मच वासनेच्या पोटी होतो. त्यामुळे वासना पूर्णपणे सोडणे सोपे नाही. परंतु ईश्वरप्राप्ती शिवाय ठेवलेल्या इतर वासना किंवा कामना दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून समर्थ सांगतात की हे मना (मानवा)एका भगवंतावाचून तू दुसऱ्या कशाचीही वासना किंवा अपेक्षा ठेवू नकोस.

आपली भारतीय संस्कृती ही मुलत: अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे अध्यात्मात मानले जाते. सारी वेद, शास्त्रे आणि पुराणे परमेश्वराचे वर्णन करतात आणि परमेश्वराचा महिमा गातात.

परंतु माणसाच्या ठायी असलेल्या देहबुद्धीमुळे त्याला मानवी जीवनातच धन्यता वाटते. इतर श्रेष्ठ व्यक्तींकडे पाहून आपले जीवनही तसेच असावे असे त्याला वाटल्यास नवल नाही. समाजामध्ये लोक थोर व्यक्तींची प्रशंसा करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक तर आपल्या दरबारात आपली कीर्ती गाण्यासाठी भाट ठेवत असत. आजही वरिष्ठांची खुशामत करण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झाली आहे. आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी लोक वरिष्ठांची स्तुती करताना दिसतात. अशा प्रकारच्या स्तुतीने ऐहिक जीवनात थोडाफार फायदा होतही असेल. पण त्याला स्वाभिमानाने जगणे म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची लाचारीच आहे. दुसऱ्याची स्तुती जरूर करावी. गुणग्राहकता आपल्याजवळ असावी परंतु ती स्वार्थापोटी नसावी. लोकांची मानसिकता अशी असते की ते स्वार्थापोटी आज आपली स्तुती करतील परंतु उद्या त्यांचा स्वार्थ साधत नाही असे दिसले की ते निंदा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

परंतु संकटकाळी किंवा अंतिम प्रसंगी श्रीमंत माणसे, वरिष्ठ लोक किंवा नातेवाईक यापैकी कोणीही उपयोगी पडत नाही. मोक्षमार्गावर वाटचाल करणे, आत्मदर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हे जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रसंगी केवळ परमेश्वराचेच सहाय्य आपल्याला होत असते. त्याच्याच कृपेने जीवनातील संकटांना आपण धैर्याने तोंड देऊ शकतो.

महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवतील म्हणून द्रौपदीने सुरुवातीला दरबारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदींना विनंती केली. तिचे पती असलेल्या पांडवांची देखील तिला आशा होती. परंतु यापैकी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तेव्हा तिने आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तोच तिच्या मदतीला धावून आला. म्हणून आशा करायची ती परमेश्वराची.

हे मानवा, स्तुती करायचीच असेल तर संत, सद्गुरु किंवा परमेश्वराची कर. त्यांचेच गुणगान गा असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी त्या परमेश्वराची स्तुती गुणांचे वर्णन केले आहेत. समर्थ ज्या राघवाची स्तुती करायला आपल्याला सांगतात, तो राघव म्हणजे परमेश्वर सर्व सृष्टीत विराजमान आहे. राघव हा शब्दच किती सुंदर आहे! राघव म्हणजे चैतन्य! हे चैतन्य सर्व चराचरात भरलेले आहे. चैतन्याची अनेक रूपे असतात. त्याला नावेही वेगवेगळी असतात. पण मूळ चैतन्य एकच असते. ते आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण त्याचेच गुणगान करावे. तोच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात मी खरोखर कोणावर आशा ठेवतो — माणसांवर की परमेश्वरावर?
  • स्वार्थ साधण्यासाठी मी कधी कोणाची खुशामत तर करत नाही ना?
  • दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करताना माझ्या मनात स्वार्थ तर नसतो ना?
  • माझ्या दैनंदिन जीवनात परमेश्वराचे स्मरण किंवा स्तवन याला किती स्थान आहे?
  • ऐहिक यशापेक्षा आत्मिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे हे मला खरोखर पटते का? (क्रमशः)

 

– क्रमशः श्लोक १७ आणि १८. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रांगोळी अशी ही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रांगोळी अशी ही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

निळ्या आभाळी

नाजुक रांगोळी

रेखिलीय कोणी

सकाळी सकाळी!!

*
वारा वाहे तशी

बदलते नक्षी

आभाळ अंगण

तयासाठी साक्षी!!

*

रंग रांगोळीचा

फिकट लिंबोळी

निळ्या लिंबोळीची

आगळी ही खेळी!

*

रंगसंगती ही

मना पाडी भूल

आभाळाचं चित्र

मनात रेखलं!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वेड्याला वेळीच आवरा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ वेड्याला वेळीच आवराश्री प्रमोद वामन वर्तक ☆

लोटून जगाला भयंकर 

तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत 

वेडा “तात्या” स्वतः निघाला

आरूढ होण्या मुद्रेवर घाईत

*

जगात डागाळलेली प्रतिमा 

स्वच्छ होईल कां स्वर्णमुद्रेने?

अहंकाराचा मेरूमणी म्हणून 

पूर्वीच ओळखले त्या जगाने

*

बगल मारून कायद्याला

“तात्या” स्वर्णनाणे छापणार 

स्वतः नरकवासी झाला तरी 

शिक्का बनून अमर राहणार

*

द्यावी सु्बुद्धी लवकर त्याला 

आज विनवितो मी येशूला 

नाहीतर एका ठार वेड्यामुळे 

अंत जगाचा तो ठरलेला

अंत जगाचा तो ठरलेला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८७ – कविता माझी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८७ – विजय साहित्य ?

☆ कविता माझी…!

(अक्षरछंद, दशाक्षरी (५..५), ३२ ओळी)

कविता‌ माझी, अनावृत्त‌ ती

शब्द‌ फुलांनी, आलंकृत ती

अनुभवांची,अनूभूतींची

प्रतिभा शक्ती,‌सालंकृत‌‌ ती. १

*

नांदत आहे, कविता माझी

दूर करीते, बघ नाराजी

वाचत‌‌ जाई,‌ माणसांस‌ ती

शब्द फुलांची, परडी ताजी.२

*

कधी‌ बोलते, कधी वाचते

गूज मनीचे, कधी सांगते

सुख दुःखाचे, पैंजण पायी

कधी हासते, कधी नाचते.३

*

कविता माझी,श्वास बोलका

अंतरातला, शब्द शेलका

नाव गाव नी,‌ वाव देऊनी

जाते ठेऊन, अर्थ नेमका.४

*

आशयारुढ, शब्दांकीत ती

कल्पकतेने, अर्थांकीत ती

फुले तितिक्षा, खुले कविता

रविशलाका,‌स्नेहांकीत ती.५

*

कविता माझी, शब्द प्रतिमा

सृजनतेचा, चढे लालिमा

कधी आरसा,कधी वारसा

संजीवक ती, ही‌ मधुरिमा.६

*

कविता माझी पारिजातक

भाव भावना, होती व्यापक

मनी तितिक्षा, कविराजांची

कलागुणांचे, दैवी द्योतक…!७

*

शब्द पालखी,पहा निघाली

अक्षर लेणी, उदया आली

प्रकाशपर्वी, रसिकांसाठी

शब्द सेतूने, प्रचूर झाली…!८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पालवी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

पालवी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

जुन्या पानांच्या राखेतून

नव्या ऋतूची चाहूल येते

वाऱ्याच्या अलगद स्पर्शाने

कोवळी पालवी डोळे उघडते

 

वेदनेच्या सावलीत आशेचा दिवा पेटतो

कोरड्या फांदीच्या छातीतून

हिरवा श्वास अलगद फुटतो

 

मातीच्या कुशीत दडलेले

स्वप्न हळूच अंकुरते

सूर्याच्या सोनसळी नजरेत

जीवन पुन्हा उमलते

 

वादळे येवोत कितीही

धैर्य मुळांना धरून राहते

आणि एका शांत पहाटेला

नव्या जगाची पालवी फुटते

 

कारण…

प्रत्येक अंताच्या दाराशी

एक सुरुवात उभी असते

जिथे विश्वासाच्या मातीतून

उद्याची हिरवी पालवी जन्मते.. ।

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता(३)

अर्जुनाला रणभूमीवर माझ्याच नातेवाईकांना मी कसे मारू असा जेव्हा भ्रम झाला त्यावेळी, माता, पिता, बहीण, बंधू, भार्या, अपत्ये ही सर्व नाती कशी असत् आहेत, आणि मी- कृष्ण हेच कसे परब्रह्म आहे याचा उपदेश श्रीकृष्णाने गीतेत केला. त्याच परमतत्वानुसार

तुकाराम महाराज सर्व मोह पाशातून मुक्त झाले आहेत. म्हणून ते म्हणतात,

बाप मेला न कळता/ नव्हती संसाराची चिंता/

विठू तुझे माझे राज्य/ नाही दुसऱ्याचे काज/

बाईल मेली मुक्त झाली/ देवे माया सोडविली/

पोर मेले बरे झाले/ देवे माय विरहित केली/

माता मेली मज देखता/ तुका म्हणे हरली चिंता/

ज्या ज्या गोष्टी असत् आहेत, त्याचा विनाश अटळ आहे हे सत्य स्वीकारण्याची शक्ती जेव्हा अंगी येते, तेव्हाच सत् ची, परमतत्वाची, परब्रम्हाची ओळख पटते. त्याचवेळी जिवा शिवाचे ऐक्य होऊ शकते.

जोपर्यंत माणूस संसार बंधनात अडकून पडलेला आहे, तोपर्यंत त्याला संसाराचे भय असते. एकदा का त्याला संसार हा भासच आहे याची खात्री पटली की तो भव भयापासून मुक्त होतो. महाराज आता संसारातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यांना कसल्याही भोगाची आसक्ती राहिली नाही. म्हणून ते देवाजवळ बोलतात,

 भोगावरी आम्ही घातला पाषाण/ मरणा मरण आणियेले/

 विश्व तू व्यापक काय मी निराळा/ कशासाठी बळा येऊ आता/

 काम सारुनिया काढावे बाहेरी/ आणूनी भितरी काय ठेवू/

 तुका म्हणे काही नेणे लाभ हानी/ असेल तो धनी राखो वाडा/

मी गुणातीत आत्मा आहे. मला देह दुःख नाही अशा भूमिकेचा दगड भोगांच्या डोक्यावर ठेवून मी मरणाचा अंत केला आहे. देवा तू जर विश्वव्यापक असशील, तर मी त्यापेक्षा निराळा नाही. अशा परिस्थितीत मला वेगळेपणाचा खटाटोप करण्याची काय जरूर आहे? तू आणि मी एकच आहोत. लाभ किंवा हानीची परवा तू असताना मी का करावी? मी काही लाभ हानी जाणत नाही, जो या देहाचा धनी असेल तोच त्याचे रक्षण करेल.

याचसाठी तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतून साधकांना विठ्ठलाच्या चिंतनाचे महत्त्व सांगतात.

 काय नोहे केले/ एका चिंतीता विठ्ठले/

 सर्व साधनांचे सार/ भवसिंधू उतरी पार/

 योगयागतपे/ केला त्याने अमुपे/*

 तुका म्हणे जपा/ मंत्र त्रीअक्षरी सोपा/

एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय मिळत नाही? हा भव सिंधू पार करण्यासाठी विठ्ठल हा त्रि अक्षरी मंत्र पुरेसा आहे. योग, याग, साधना वगैरे गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.

सर्वतोपरी देहाभिमान शून्य होणे म्हणजेच योग आणि तप आहे. तोच परमार्थ आहे. ज्यावेळी देहाभिमान नाहीसा होईल त्याचवेळी जन्ममृत्युरूपी येरझार थांबेल.

योग तप याची नावे/ गणित व्हावे अभिमाने/७

 करणे ते हेचि कर/ सत्य बरा व्यापार/

 तरी खंडे येरझार/ निधे भार देहाचा/

जेव्हा विषयसुख गोड वाटते, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन महाराज त्यांच्या या अभंगात करतात.

 विषयाचे सुख /येथे वाटे गोड/

 पुढे अवघड/ यमदंड/

 मारिती तोडिती/ जोडीतील निष्ठुर/

 यमाचे किंकर/ बहु साल/

 असिपत्र तरुवर/ खैराचे इंगळ/

 निघतील ज्वाल/तैल पाकी/

 तप्तभूमीवरी/ चालविती पायी/

 अग्निस्तंभ बाही/ कवटाळविती/

 म्हणूनी तुका येतो काकुळती/ पुरे यातायाती गर्भवास/

क्षणिक विषयसुखाचे भोगावे लागणारे परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला येते.

एका नामात हरी वसलेला आहे, परंतु आपल्यासारखी सामान्य माणसे देहातच सर्व सुख आहे असे मानतात व त्यामुळे परब्रम्हप्राप्ती आपल्यापासून दूर पळते.

देह हा सादर पहावा निश्चित/ सर्व सुख येथे नाम आहे.

आपल्याला मिळालेल्या देहाकडे आदराने जरूर पहावे, परंतु एक परब्रह्म, एक नामच सर्व सुखाचे साधन आहे.

लटक्या संसारात माणूस अडकतो. लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडतो. त्याला हरिनामाचा विसर पडतो. खूप पैसा जमवण्याची धडपड करतो. शेवटी या क्षणभंगुर देहाचा नाश होतो आणि बापाने ठेवलेल्या पैशांवरून दोन भावांचे आपसात भांडण लागते.

 लटीकियाच्या आशा/ होतो पडिलो वळसा/

 होऊनिया दोषा/ पात्र मिथ्या अभिमाने/

 बारावी उघडली दृष्टी/ नाहीतरी होतो कष्टी/

 आक्रंदते सृष्टी/ मात्र या चेष्टांनी/

 मरणाची नाही शुद्धी/ लोभी प्रवर्तली बुद्धी/

 परती तो कधी/ घोड्याची ना माघारी/

 साचवुनी मरे धन/ लावी पोरांची भांडण/

 नाही नारायण / तुका म्हणे स्मरला.

 संसारी माणसाची अशी ही शोककथाच आहे.

आता हा पुढील अभंग पहा.

 येथे नाही उरी आले अवतार/ येरे ते पामर जीव किती/

 विषयाचे झणी व्हाल लोलिंगत/ जेवलीया अंत नलगे भंग/

 वाहून या भार कुंथसील ओझे/ नवे तेचि माझे थीता त्याग/

 तुका म्हणे कैसी नव्हे त्याची लाज/ संती केशी-राज साधियाला/

या अभंगात तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. या ठिकाणी अवतार हा शब्द नारायणाच्या मत्स्य, कुर्म आदी दशावतारांना उद्देशून आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जिथे हे अवतार सुद्धा राहिले नाहीत तिथे सामान्यांची काय कथा? विषयाची आसक्ती माणसाला कुठे नेईल त्याचा काही नेम नाही. जे खरोखर आपले नाही, त्याचे ओझे खांद्यावरून विनाकारण वाहून हे माणसा तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. त्यामुळे स्वहिताचा त्याग होईल. केशव हाच परमात्मा आहे, त्याला साध्य करण्यातच स्वहित आहे.

स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन अहोरात्र गोविंदाचे पोवाडे गात होतेच आणि लोकांनाही भवभयापासून मुक्त व्हावे यासाठी ते सावध करीत होते. विठ्ठलाचे नाव वाचेत असल्यामुळे विषयात अडकलेल्या तुकारामांना  योग्य मार्ग सापडला. कृष्णाने अर्जुनाला गीतेत हेच सांगितले होते की तू कृष्ण भावना भावित होणे जरुरीचे आहे.

क्रमशः… १३

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद महाराज की जय!!!

नारद भक्ति सूत्रे ५७

उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वा श्रेयाय भवति ||५७ ||”

अर्थ:

भक्तीच्या या तीन प्रकारांपैकी आधी सांगितलेले प्रकार हे नंतरच्या प्रकारांपेक्षा उत्तरोत्तर जास्त कल्याणकारी आहेत.

विवेचन:

तामस गुणी भक्ति, राजस गुणी भक्ति आणि सात्विक भक्ति याबद्दल आपण मागील सूत्रात थोडा विचार केलेला आहे. तरी आपण काही मुद्दे पाहू.

तमोगुणी साधकाची भक्ति सकाम असते. तो अर्थार्थी असतो. प्रपंच आणि प्रपंचातील वस्तूंच्या भोगांचे त्याला आकर्षण असते. अनेक सुखसुविधा अर्थात उत्तम भोग भोगता यावेत म्हणून तो ईश्वराकडे वळतो.

रजोगुणी भक्तास प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असतात. प्रपंचातील आणि परमार्थ मार्गातील विविध अनुभवांनी त्याची थोडी तयारी झालेली असते. जग नश्वर आहे, त्यातील सूखे खऱ्या अर्थांनी आपल्याला समाधान देऊ शकणार नाहीत याची अल्पशी अनुभूती त्याला आलेली असते. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न तो करीत असतो.

सत्वगुणी साधकाची भक्ति निष्काम असते. त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली असते.

असा भक्त जरी प्रपंचात रहात असला तरी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटलेली असते, परिणामी त्याची अंगी खरे वैराग्य येते.

याचा थोडा वेगळा विचार केला तर या तीन पायऱ्या आहेत असे आपल्या लक्षात येईल.

१. जागे होणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे.

२. ध्येय प्राप्तीसाठी कार्य करणे. त्यासाठी आवश्यक गोष्टींचा अंगिकार आणि त्याज्य गोष्टींचा बहिष्कार. इथे साधकाला आपल्या दोषांची जाणीव होते.

३. साधक आपले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करू लागतो.

आपला देश कृषीप्रधान आहे. वरील तीन गोष्टी करणे म्हणजे शेतातील तण, खराब गवत आणि कचरा बाहेर काढून टाकणं. यातून शेताची अर्थात मनरूपी शेताची मशागत होऊन त्यातून चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धी होणे हा परमार्थ मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गौणी भक्तीतून साधक मुख्य भक्तीकडे जाऊ लागतो, त्याची साधना हळूहळू उच्च पातळीवर जाऊ लागते…!

जय जय रघुवीर समर्थ 

— 

नारद भक्ति सूत्रे ५८

अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ||५८||”

अर्थ : इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग जास्त सुलभ आहे.

विवेचन:

भगवंत प्राप्तीच्या इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग अधिक सुलभ आहे असे सर्व संत आपल्याला सांगतात. याचा विचार आपण या आधी पंचविसाव्या सूत्रात केलेला आहे. या सूत्रात आपण भक्तिमार्गाचे सोपेपण अर्थात सुलभता पाहणार आहोत.

योगमार्गात मनुष्याला अनेक गोष्टी अत्यंतिक काटेकोरपणे कराव्या लागतात. कारण त्या मार्गात तसेच विधिविधान आहे असे आपल्या लक्षात येईल. योगमार्गात आधी शरीरावर ताबा मिळवून मग मनावर ताबा मिळवावा लागतो. त्यासाठी त्याला युक्त आहार विहार करावा लागतो. भगवंत गीतेत म्हणतात –  

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि |

मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन||”

(गीताई ०६. १७)

सध्याच्या काळात आहार, विहार आणि यथायोग्य झोप घ्यायला मिळणे शक्य आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे सामान्य साधकाला योगमार्ग कठीण ठरू शकतो.

आधी कथन केल्याप्रमाणे मनुष्य कर्म सुद्धा योग म्हणून करू शकतोच असे नाही. तर तो बरेच वेळा करून टाकत असतो, उरकत असतो. अशी कर्म करून मुक्ति मिळू शकेल का? अर्थात सामान्य मनुष्याला, साधकाला कर्म करणे साधू शकते, पण *कर्मयोग* साधणे मात्र जिकिरीचे ठरते.

ज्ञान मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे. याची सुरुवात साधन चतुष्ट्याने होते. साधक वैराग्यशील असावा लागतो. अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास अंगी मुरावा लागतो. इतके सगळे करून ज्ञानप्राप्ती झाली तर त्याचा अभिमान होण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत सांगतात की भगवंताला अहंकार बिल्कुल चालत नाही.

भक्तीमार्ग हा सर्व सामान्य माणसांसाठी अगदी राजमार्गासारखा आहे. या मार्गाला अर्थात भक्तीला राजविद्या असेही म्हणतात. विद्या, संपत्ती, कुळ, वर्णाश्रम, वेदाध्ययन, कठोर तपश्चर्या इत्यादींची भक्तीला अपेक्षा नाही.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या जवळच्या नातेवाइकांवर, आपल्या आवडत्या वस्तूंवर प्रेम करीत असतो. ते प्रेम कधी स्वार्थी असते तर कधी निःस्वार्थी. प्रेम म्हणजे काय हे दाखवता येत नसले तरी त्या प्रेमाची अनुभूती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाने घेतलेली असते. हेच प्रेम भगवंताकडे वळवले की त्याचे भक्तित रूपांतर होते.

संत तुकाराम महाराज या प्रेमाने भगवंत कसा जवळ येतो याचे वर्णन पुढील अभंगात करतात. — – 

*”प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥२॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥३॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥४॥”*

(अभंग क्रमांक 432, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५९

प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् (च) ||”

अर्थ : भक्ति कोणत्याही प्रमाणावर म्हणजे पुराव्यावर अवलंबून नाही तर ती स्वतः सिद्ध आहे, म्हणून ती इतर मार्गांपेक्षा सोपी आहे.

विवेचन : कर्मयोग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना करताना नारद मुनी २६ व्या आणि ३० व्या सूत्रांत याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये भक्ति स्वयं फलप्रभा आहे असे म्हटले आहे. अर्थात तिला कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही.

प्रमा म्हणजे ज्ञान. ज्यामुळे ज्ञान होते, ते प्रमाण. प्रमाणा मध्ये ज्ञानाचा उगम होतो. भारतीय तर्कशास्त्रात तीन प्रमाण मानली गेली आहेत.

१. प्रत्यक्ष

२. अनुमान

३. शब्द किंवा आप्तवाक्य

  1. इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. (Perception)
  2. निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढणे म्हणजे अनुमान.
  3. ज्याच्यावर आपला विश्वास आहे, जो आपला हितचिंतक आहे, निःस्वार्थी आहे, त्याचे म्हणणं आपण मान्य करतो. खरे मानतो, ते आप्त वाक्य.

परमार्थ मार्गात जर कर्ममार्ग, ज्ञानयोग अथवा योगमार्गाने जायचे असेल त्यासाठी किमान त्या त्या विषयाचे प्राविण्य अथवा पात्रता (अर्हता) अंगी येणे गरजेचे ठरते.

याउलट भक्तिमार्गात कसलीच लौकिक पात्रता लागत नाही. अनेक संत निरक्षर होते, अनेक संत श्रीमंत होते, अनेक संत अतिशय गरीब होते, काही संतांनी एका नामस्मरणाशिवाय कोणतेही साधन केलेलं नाही. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला, अनेक स्त्री संत आहेत. रामाच्या प्रमुख भक्तांपैकी विभीषण राक्षस, हनुमंत वानर तर शबरी वनवासी होती, पण तिघांनी आपापल्या परीने भक्ति करून रामाची प्राप्ती करून घेतली. रामाने तर हनुमतांचा भरतासारखा भाऊ म्हणून गौरव केला.

ज्याप्रमाणे मातेला आपल्या वात्सल्याचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही, त्याप्रमाणे भक्ताला आपल्या भक्तीचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६०

शान्तिरूपात् परमानंदरूपाच्च ||६०||”

अर्थ : भक्तीमध्ये स्वभावतः शांति असल्याने आणि ती अपार आनंद रूप असल्यामुळे ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे.

विवेचन : सर्वसामान्य मनुष्य आपल्या आयुष्यात कधी प्रयत्नाने तर कधी प्रारब्धाने अनेक गोष्टी मिळवतो. पण मनःशांती मिळवणं त्याला जमतेच असे नाही.

बालपणी त्याला नवनवीन खेळणी मिळाली की सुखशांती मिळेल असे वाटते, थोडा मोठा झाला की त्याला रंगीबेरंगी कपडे, चैनीच्या वस्तू मिळाल्या की सुखशांती मिळेल असे वाटते, मग ही मालिका संपता संपत नाही आणि मनुष्याला शांती लाभत नाही…

अनुदिनी अनुतापें तापलो…! “ अशी त्याची स्थिती होऊन जाते. याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्की घेतला असेल.

साधक भक्तिमार्गात लागला की मात्र त्याला शांतीचा लाभ होऊ लागतो. “जितकी भक्ति तितकी प्राप्ति” या न्यायाने तो जितका भक्ति मध्ये रमतो, तितका तो मनाने शांती अनुभवू लागतो. भक्ति म्हणजे शीतगृह असे म्हटले तरी वावगे होऊ नये. तिथे गेले की कोणी कसाही असो, त्याला शांती मिळाल्याशिवाय रहात नाही. भक्तिसाधना दृढ होऊ लागली की साधक निःशंक आणि निर्धास्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे, आपल्याला खंबीर आधार देणारे आपले सद्गुरू आहेत, याची त्याला खात्री पटते. साधनेच्या पुढील पडावात त्याच्या लक्षात येते की सर्व काही भगवंतच करतो. आपल्या हातात काहीच नाही आणि भगवंत माझ्या भल्या साठीच सर्व काही करीत आहे, अशी त्याची धारणा होऊ लागते. त्यामुळे तो तटस्थपणे भगवंताची लिला पाहू लागतो. मग त्याचा आनंद, त्याचे समाधान, त्याची शांती कधीही भंग पावत नाही. संत तुकाराम महाराज याचे वर्णन पुढील अभंगात करतात.

आनंदाचे डोही आनंदतरंग |

आनंदचि अंग आनंदाचे || धृ. ||

*

काय सांगों जालें कांहीचियाबाई 

पुढें चाली नाहीं आवडीनें || ||

*

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |

तेथिचा जिव्हाळा तेथें बिंबे || ||

*

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |

अनुभव सरिसा मुखा आला || ||

(अभंग क्रमांक २५८२, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– भक्ती सूत्र क्र. ५७ / ५८ / ५९ / ६० 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विचारणा… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ विचारणा… ☆ अर्चना गादीकर निकारंगे 

हळूच विचारले मनाला, ” भावले का तुला? “

विलंब न करता उत्तरले, ” प्रश्न हा का झाला? “

म्हटले, ” किती सुंदर वाटतोय निसर्ग हा! “

बोलते झाले, ” अशीच नेहमी अवलोकीत राहा. “

थंडगार वार्‍याची झुळूक, पक्ष्यांचे मधुर बोल,

हे भावत असते मनात खूप खोल.

सुंदर हे वातावरण प्रसन्न करते मनास,

पहावे त्याला रोज ह्रदयी असतो एक ध्यास.

 *

साधेसुधे असे हे प्रसंंग आनंद देतात,

पाहताच त्यांना नकळत मनाचा ताबा घेतात.

निस्वार्थी भावनेने निसर्ग रोज देत असतो,

परतफेडीचा प्रश्न तिथे अस्तित्वात नसतो.

© अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ – ही जवळची माणसे…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? क्षण सृजनचा ?

☆– ही जवळची माणसे… – ☆ ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

काही योगायोग असतात… १४ मार्च… कविवर्य सुरेश भट साहेबांचा स्मृतीदिन…

एक महिन्यापूर्वी भट साहेबांची चारोळी वाचायला मिळाली होती – –

रोज छळतात ही

जवळची माणसे

जन्म गिळतात ही

जवळची माणसे

तेव्हा लहान तोंडी मोठा घास म्हणून त्याचा विस्तार म्हणून तीन चार कडवी तेव्हा लिहून झाली पण रचना आज म्हणजे १४ मार्चला पूर्ण झाली…

… रचना पूर्ण झाल्यानंतर लक्षात आले की १४ मार्च हा भटसाहेबांचा स्मृतीदिन!

हीच ती रचना – – (… ळतात हा शब्द एकत्रित आणण्याचा आणि त्यातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न)

☆ ही जवळची माणसे.. ☆

रोज छळतात ही

जवळची माणसे

जन्म गिळतात ही

जवळची माणसे…

*

अडचणीला पळतात ही

जवळची माणसे

आपले परके कळतात ही

जवळची माणसे…

*

सुखामध्ये लोळतात ही

जवळची माणसे

दुःखामध्ये गळतात ही

जवळची माणसे…

*

निकडीला कळतात ही

जवळची माणसे

दुज्यांना फळतात ही

जवळची माणसे…

*

समृद्धीला जळतात ही

जवळची माणसे

कडकीला वळतात ही

जवळची माणसे…

*

नकोशांशी जुळतात ही

जवळची माणसे

कृतघ्नते उसळतात ही

जवळची माणसे…

*

दुराव्यात रूळतात ही

जवळची माणसे

कटाक्षात वळतात ही

जवळची माणसे…

*

भावनांशी खेळतात ही

जवळची माणसे

अंतर्मनात मळतात ही

जवळची माणसे…

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गगनजाई रूपवती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गगनजाई रूपवती… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत)

येता ऋतूगंध खास, फुले येती बहरास 

पाय माझे तिथे घुटमळती

शरदाच्या चांदण्यात, हेमंतातली पहाट 

गगनजाई रूपवती

 

उंच उंच तरू देखणे 

पानात रुपेरी चांदणे

झुपक्यात फुलांचे नांदणे

पाचूला श्वेतांगी गोंदणे

हा वारा येता येता, सुगंधाच दान देता 

माझ्या मनास मोहवती

 

नभात रातीची चांदणी

भुलली पाहून रजनी

भेटण्या आतुर धरणी

सुगंध घेऊन अंगणी

बकावली फुलणारी, फुले भिरभिरणारी

वळेसरात गंधवती

 

पाटलीनबाई दिसते भारी

गगनमल्लीगे चमचमणारी 

धवल चंद्रिका दिसते न्यारी

मन गाभारी रुजली सारी

दृष्ट काढूया का याची, याच्या देखण्या रुपाची

ओंजळीत माझ्या किती खुलती

 

आकाशमोगरा कुणी म्हणे

बुचाच्या फुलात हिला गणे

आकाशनीमास देखणे

लाभले चंदेरी चांदणे

मन बालपणी जाते, त्याचे माझे गोड नाते 

कवने ओठी मज स्मरती

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares