☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समाज स्थितीचे वर्णन
गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.
समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—
हाती होन दावीती वेणा /
करिती लेकीची धारणा//
ऐसे धर्म जाले कली/
पुण्य रंक पाप बळी//
सोडिले आचार/
द्विजृाचहाड जाले चोर//
टिळे लपविती पातडी /
लेती विजार कातडी//
बैसोनिया तक्ता/
अन्योविण पीडिती लोका//
मुदबरव लिहिणे/
तेल तूप साबण केणे //
नीच्याचे चाकर/
चुकलिया खाती मार//
राजा प्रजा पिडी/
क्षेत्री दुश्चितासी तोडी//
वैश्य शुद्रादिक/
हे तो सहज नीच लोक//
* वघे बाह्यरंग/*
आत हिरवे वरी सोंग//
तुका म्हणे देवा/
काय निद्रा केली धावा//
समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.
ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे
सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”
तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—
वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /
बोलतो ती वर्मे संतांपुढे//
चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/
पाप-पुण्यभागी विभागीले//
प्रथम पाऊली पावविला पंथ/
आदी मध्य अंत भेद नाही//
आंबे बोरी वड बाभुळ चंदन/
गुणागुणभिन्न अग्नि एक//
तुका म्हणे मन उन्मन जो होय/
तोवरी हे सोय विधी पाळी//
तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,
वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.
त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-
आली सिंहस्थ पर्वणी/
न्हाव्या भटा झाली धणी //
अंतरी पापाच्या कोडी/
वरी वरी बोडी डोई दाढी//
बोडीले ते निघाले/
काय पालटले सांग वहिले//
पाप गेल्याची काय खूण/
नाही पालटले अवगुण//
भक्तीभावेवीण /
तुका म्हणे अवघा सीण //
सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.
चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.
पहा हो देवा कैसे जन/
भिन्नभिन्न संचिते //
एक नाही एका ऐसे/
दावी कैसे शुद्ध हीन//
पंचभूते एकी राशी/
सूत्रे कैसी ओळखावी//
तुका म्हणे जो जे जाती/
त्याची स्थिती तैशी ते//
देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
नाटककार रविंद्रनाथ (१)
वैश्विक काव्य जगतात मानाचं स्थान प्राप्त केलेल्या रविंद्रनाथांनी नाट्य जगताला लहान मोठ्या अशा जवळपास ५०-५५ उत्कृष्ट नाटकांनी समृद्ध केले आहे. परंतु दुर्दैवाने हे सत्य कुठेच अधोरेखित झालेलं नाही. त्यांच्या नाटकांमधील डाकघर, रक्त करबी, विसर्जन, राजा ही नाटके तसेच चित्रांगदा, श्यामा, नटीरपूजा, चंडालिका, ताशेर देश या नृत्यनाटिका जास्त चर्चिल्या गेल्या आहेत. पण त्यांची छोटी छोटी नाटकं, आपल्या वगनाट्य सदृश नाटिका, प्रहसनं, नाट्यछटा देखील समाजमनावर छाप सोडणाऱ्या आहेत. तसेच त्या थट्टा विनोदाच्या अंगानं सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय जीवनातील विसंगतीवरही प्रकाश टाकणाऱ्या आहेत. रविंद्रनाथांची नाटके कलात्मक सौंदर्याचा अनुभव देता देता सामाजिक प्रबोधनही करतात. त्यांच्या कवितांप्रमाणेच त्यांची नाटके देखील त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहेत. आत्ताच्या भाषेत आपण ज्यांना प्रायोगिक नाटके म्हणतो तशी प्रायोगिक नाटके देखील त्यांनी प्रायोगिकतेचं कसलेही अवडंबर न माजवता लिहिली, बसवली व प्रस्तुत केली.
परंतु त्या काळातली मेलोड्रॅमॅटिक नाटके बघण्याची सवय असलेल्या बंगाली प्रेक्षकांना रविंद्रनाथांच्या नाटकांतील तरलता, अस्फुट संघर्ष लक्षात येत नसल्यामुळे म्हणा किंवा धार्मिक, सामाजिक व्यंगावर भाष्य असल्यामुळे म्हणा रविंद्रनाथांना नाटककार म्हणून जे स्थान कलाजगतात मिळायला हवं होतं ते कांही मिळालं नाही. अर्थात टागोरांनीही हे मान्य केलं होतं. ते म्हणत, “मला नाटक लिहिता आलं नाही. एक मध्यवर्ती कल्पना घेऊन त्यावर नाटक तोलण्याची कला माझ्यात नाही. ” अर्थात त्यांच्या नाटकांकडे पाहिलं असता लक्षात येतं की, हा त्यांचा विनय होता. त्यांच्या मधला कवी त्यांच्या नाटकांतही डोकावतो, हे मात्र खरे आहे. त्यांची कांही नाटकं तर गद्य काव्य असल्यासारखी वाटतात.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ नाटकाचं बंगालीत भाषांतर केलं होतं. त्या काळात इंग्रजी नाटकांच्या अनुकरणाचं वारं होतं. त्यामुळे पारंपरिक बंगाली नाट्यकला व नवदरबारी लोकांची नाट्यकला यात मोठं अंतर आलं होतं. रविंद्रनाथांनी लोकरंगमंचातली शक्ती ओळखून, त्यावर आपले संस्कार करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. नाटकाविषयी त्यांच्या मनात कोणतेही व्यावसायिक विचार नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही नाटक कंपनीसाठी नाटक लिहिले नाही.
(अपूर्ण–पुढील भागात)
—–
☆ गीत : ७६ ☆
DAY after DAY, O lord of my life, shall I stand before thee face to face? With folded
hands, O lord of all worlds, shall I stand before thee face to face?
Under thy great sky in solitude and silence, with humble heart shall I stand before thee
face to face?
In this laborious world of thine, tumultuous with toil and with struggle, among hurrying crowds shall I stand before thee face to face?
And when my work shall be done in this world, O King of kings, alone and speechless shall I stand before thee face to face?
I KNOW thee as my God and stand apart ⎯ I do not know thee as my own and come
closer. I know thee as my father and bow before thy feet ⎯ I do not grasp thy hand as
my friend’s.
I stand not where thou comest down and ownest thyself as mine, there to clasp thee to
my heart and take thee as my comrade.
Thou art the Brother amongst my brothers, but I heed them not, I divide not my earnings
with them, thus sharing my all with thee.
In pleasure and in pain I stand not by the side of men, and thus stand by thee. I shrink to give up my life, and thus do not plunge into the great waters of life.