मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९६ – देवपुजा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९६ – विजय साहित्य ?

☆ देवपुजा…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पुजार्चन करताना

करू सोळा उपचार

आवाहन देवतांना 

घडे दर्शन त्रिवार….! १

देऊ आसन मंत्राने

लाभण्याला सुखासन

पाद्यपुजा करूनीया

यशप्राप्ती संकलन…! २

 *

अर्घ्य सुगंधी जलाने

लाभे मना  समाधान

आचमन गंगाजल

होई आनंद विधान…! ३

 *

स्नान घालता देवास

मिळे जिवनात सुख

पंचामृत देता देवा

स्नेह माधुर्य सन्मुख…! ४

 *

अभिषेक देवतांना

स्थैर्य‌ शांततेचा लाभ

वस्त्र अर्पिता प्रेमाने

लाज राखी पद्मनाभ…! ५

 *

यज्ञोपविताचा मान

मोक्षप्राप्ती लाभतसे

गंध लावता देवाला

ज्ञानप्राप्ती गेही वसे…! ६

 *

फुले अर्पिताच मिळे

सर्व सुख समाधान

कुंकू हळद पिंजर

लाभे सौभाग्याचे दान..! ७

 *

अलंकार देता‌ देवा

मनी श्रीमंतीचा वास

धूप प्रक्षालन करी

कीर्ती ऐश्वर्य प्रवास…! ८

 *

दीपदान सौख्य मोठे

ज्ञान वैराग्य लाभते

प्रासादिक नैवेद्याने

अन्नपुर्णा सुखावते…! ९

 *

आरतीच्या गजरात

प्रसन्नता नांदे धामी

प्रदक्षिणा घालताना

लाभ स्वामित्वाचा नामी…! १०

 *

श्रीफलाने पुजार्चना

दावी सौख्याचे शिखर

दुर्वा तुलसी बेलाने

कृपा हस्त शिरावर…! ११

 *

मंत्र पुष्पांजली देई

सुख समृद्धीचे देणे 

अक्षतांनी परिपुर्ण

सोळा उपचार लेणे…! १२

 *

नमस्कार स्विकारावा

विनयाने विनवणी

सह कुटुंब प्रार्थना 

नको दुर्भाग्य मन्मनी…! १३

 *

यथाशक्ती यथामती

करू पुजा मनोभावे

नाना लाभ फलदायी

अशा देव पुजनाने….! १४

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिशोब प्राक्तनाचा… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हिशोब प्राक्तनाचा… ☆ सुरेखा चिखलकर ☆

भावना जेव्हा ओढाळ झाल्या

थकला भागला जीव

भावनांना कुशीत घेऊन

प्रसवत राहिला शब्द न शब्द

भोगलेल्या आठवांचे गाठोडे

विझणाऱ्या सांजेला आठवून

काही जखमा माफीची

 परवानगी देत नाहीत तर

विद्यात्याच्या हिशोबाने घडून

द्यावे सारं काही अन्

काळजाला सोलून आपणही

प्राक्तन म्हणून भोगून घ्यावं

सांजेचे कवडसे अन्

पापण्या मात्र आभाळ होतात

आसवं पाझरू लागताच मलाच

हरवाया शब्दांची धार होऊन

विझल्या राखेवर मग

शांततेची अत्तरे सांडावीत अन्

शब्दांच्या वेदनांनी मूठमाती

द्यावी मातीच्या त्या देहावर…

🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन

गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.

समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—

हाती होन दावीती वेणा /

करिती लेकीची धारणा//

ऐसे धर्म जाले कली/

पुण्य रंक पाप बळी//

सोडिले आचार/

द्विजृाचहाड जाले चोर//

टिळे लपविती पातडी /

लेती विजार कातडी//

बैसोनिया तक्ता/

अन्योविण पीडिती लोका//

मुदबरव लिहिणे/

तेल तूप साबण केणे //

नीच्याचे चाकर/

चुकलिया खाती मार//

राजा प्रजा पिडी/

क्षेत्री दुश्चितासी तोडी//

वैश्य शुद्रादिक/

हे तो सहज नीच लोक//

* वघे बाह्यरंग/*

आत हिरवे वरी सोंग//

तुका म्हणे देवा/

काय निद्रा केली धावा//

समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.

ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे

सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”

तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—

वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /

बोलतो ती वर्मे संतांपुढे//

चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/

पाप-पुण्यभागी विभागीले//

प्रथम पाऊली पावविला पंथ/

आदी मध्य अंत भेद नाही//

आंबे बोरी वड बाभुळ चंदन/

गुणागुणभिन्न अग्नि एक//

तुका म्हणे मन उन्मन जो होय/

तोवरी हे सोय विधी पाळी//

तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,

वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.

त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-

आली सिंहस्थ पर्वणी/

न्हाव्या भटा झाली धणी //

अंतरी पापाच्या कोडी/

वरी वरी बोडी डोई दाढी//

बोडीले ते निघाले/

काय पालटले सांग वहिले//

पाप गेल्याची काय खूण/

नाही पालटले अवगुण//

भक्तीभावेवीण /

तुका म्हणे अवघा सीण //

सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.

चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.

पहा हो देवा कैसे जन/

भिन्नभिन्न संचिते //

एक नाही एका ऐसे/

दावी कैसे शुद्ध हीन//

पंचभूते एकी राशी/

सूत्रे कैसी ओळखावी//

तुका म्हणे जो जे जाती/

त्याची स्थिती तैशी ते//

देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.

पुढील लेखात आणखी काही अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… २३ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(त्यानिमित्त जनजागृतीसाठी लिहिलेल्या दोन कविता रसास्वादासाठी प्रस्तुत.)

यंत्रदास विरचित श्रीसुरक्षितताबोधग्रंथामधील विश्वसौंदर्यवर्णननाम आध्याय १९

विश्व सौंदर्य वर्णन

अरे विश्व पाहे जरा रंगलेले

जरा ऐकते सूर नादावलेले

हळू हुंग सूगंध धुंदावलेले

सुखे पांघरी वात मंदावलेले ll१ll

*

पहा पर्वतांची कशी ती निळाई

पहा लाल माती पहा रानराई

पहा पाखरांचे थवे हिंडणारे

पहा सारिका, मोर ते नाचणारे ll२ll

*

पहा वीज, वारे, पहा मेघ, तारे

पहा पुष्पभारे, पहा रे किनारे

पहा धातुसाठे, पहा रत्नसाठे

पहा गारगोटे, पहा अष्म मोठे ll३ll

*

कसे तेज फाके नभी भास्कराचे

रुपेरी मृदू चांदणे पौर्णिमेचे

पहा क्रीडने, नर्तने वासरांची

पहा रंग, रूपे जळी मासळ्यांची ll४ll

*

जरा ऐक ती गर्जिते सागराची

वंशीवनी वाजते शीळ साची

जरा ऐक रे खर्ज ते मंडुकांचे

जणू साम गाती जथे ब्राह्मणांचे! ll५ll

*

प्रभूने कसे विश्व हे निर्मियेले

विनाकारणे का असे निर्मियेले?

जगी शासनू फक्त त्याचेच चाले

अरे, पानही श्रीकृपेनेच हाले! ६ll

*

इथे कीड, मुंगीसही अर्थ आहे

घुशी, साप, डासासही कार्य आहे

किडे, गांडुळे, पाल, माशा, मसूरे

तरू, खेचरे, भूचरे, जsलचरे ll७ll

*

कुणाची अरे ही असे मालमत्ता?

कुणाची इथे चालते सांग सत्ता?

अरे, यातले तू वदे, काय केले

बुधा! बोल ना काय तू निर्मियेले? ll८ll

*

तुलाही अरे निर्मिले ईश्वराने

जसे निर्मिले विश्व सारे तयाने

कधी जे कुणी निर्मीलेलेच नाही

तया छेदण्याचा कुणा हक्क नाही ll९ll

*

जगातील सारेच आहे पुरेसे

विभागून घ्यावे जिवांनी जरासे

दुज्या जsगवावे, स्वतःही जगावे

असे सूत्र सांभाळुनी वावरावे ll१०ll

*

नसे आपले, का धरावीस आशा

उगा कासया हाव, का रे पिपाशा?

नको ओरबाडू निसर्गास वेड्या

तयाच्याच हाती तुझ्या सर्व नाड्या ll११ll

*

बसे ज्यावरी त्या न शाखेस तोडी

पुरे हाव आता, पुरे, स्वार्थ सोडी

निसर्गात आहे क्रमू नेमलेले

जसे सूत्र माळेमधे ओवलेले ll१२ll

*

चुकोनी जरी तोडिले सूत्र कोणी

गळोनीच जाती मणी चौ दिशांनी

न माळेस अर्थू, न रत्नांस शोभा

अशाने कुणाचे भले होय बाबा! ll१३ll

– – –

यंत्रदासविरचित श्रीसुरक्षितताबोधग्रंथामधील पर्यावरणसमस्यावर्णननाम अध्याय २०

पर्यावरण समस्या वर्णन

नव्या संस्कृतीने पहा काय केले

निसर्गास सा-या प्रदूषीत केले!

नभा नासवीले, जळा नासवीले

फळा नासवीले बिजा नासवीले! ll१ll

*

कुठे पाखरे भेदरोनी उडाली?

कुठे कूजने कोकिळांची विराली?

वने, वाटिका पार खंगून गेल्या

हिरे, माणके, पाच संपून गेल्या! ll२ll

*

कुठे व्याघ्र गेले? कुठे सर्प गेले?

कुठे भृंग गेले? कुठे हंस गेले?

गवे, कासवे, केसरी, रान साळू

मृगे, माकडे, खेकडे, मोर, भालू ll३ll

*

कुठे वन्य प्राणी? कुठे शुद्ध पाणी?

कुठे रातराणी? कुठे लोकगाणी?

कुठे नम्र वाणी? कुठे देववाणी?

धरा ही कशी दीसते दीनवाणी! ll४ll

*

दिसेना कुठे वृक्षवल्ली जराशा

खुळ्या मानवाच्या किती या पिपाशा!

खरी कस्तुरी फक्त काव्यात राहे

इथे कुंद दुर्गंध कोंदून आहे! ll५ll

*

पहा वाळवंटे जगी माजलेली

धुरू-धूलिकांनी नभे दाटलेली

भगांकीत झाली धरित्री बिचारी

कुणी सर्व केले? मनाला विचारी ll६ll

*

जमीनीत हे क्षार कोठून आहे?

कसे शुष्क झाले कुवे, कूप, नाले?

कुठे दूर पर्जन्य गेले रुसोनी?

गिधाडामुखी रंगती हर्षगाणी! ll७ll

*

पहा उष्णता वाढताहे जगाची

स्थिती घोर आहे पहा जंगलांची

जमिनीतले तेलसाठे उडाले

जळे, वायु सारे अशुद्धून गेले ll८ll

*

सुरत्नाकराच्या तळी काय आहे?

अरे, त्याज्य सारे उदासून आहे!

अणू चांचण्यांनी दशा काय केली?

धरा अंतरी पार पिंजून गेली! ll९ll

*

नवी संस्कृती हाटवीते समुद्रा

तयाने तरी का धरावी मर्यादा?

नवे भोग आले, नवे रोग आले

कुमारी आवंढा गिळे, गर्भ गाळे! ll१०ll

*

गुणी माणसांचाच बाजार केला

किडे, कीटकांचाहि संहार केला

कुठे सत्य गेले? कुठे वीर्य गेले?

कसे ‘कोरोना’सारखे रोग आले? ll११ll

*

पहा ‘ताज’ आता भुरा दिसताहे

हिमासारखा तो खरा शुभ्र आहे

पहा जान्हवीची दशा काय आहे

मळी, सांडपाणी तिथे वाहताहे! ll१२ll

*

अरे, खेद मानू नको बोलण्याचा

जरा जाण हेतू अशा सांगण्याचा

नसे वेळ गेली अजूनी टळूनी

पुरे हाव, स्वार्था धरी आवरोनी ll१३ll

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित 

उतार वयात  मिळाली

व्हाट्सऍपची काठी !

कपाळावरची मिटली

आपोआप आठी !

 

वेळ कसा जातो आता

हेच कळत नाही !

वर्तमान पत्राचं पानसुद्धा

हल्ली हलत नाही !

 

चहा पिताना लागतो

व्हाट्सऍप हाताखाली !

डाव्या बोटाने हलके हलके

मेसेज होतात वरखाली !

 

कुणाचा वाढदिवस आहे ?

कोण आजारी आहे ?

कोण चाललंय परदेशात

अन काय घडतंय देशात ?

 

कधी लताची जुनी गाणी तर

कधी शांताबाईंची कविता !

बसल्या बसल्या डुलकी लागते

कधी एखादी गझल समोर येते ! 

 

टीव्हीवरचं चॅनेलसुद्धा

हल्ली बदलत नाही

व्हाट्सऍपशिवाय आमचं

पान जरासुद्धा हलत नाही !

 

वय जरी होत चाललं

हातपाय जरी थोडे थकले !

तरी व्हाट्सऍपच्या औषधाने

मन मात्र रिलॅक्स झाले !

 

आता फार काळजी करत नाही

आता चिडचिडसुद्धा होत नाही !

व्हाट्सऍपचा मित्र भेटल्यापासून

आता मनातसुद्धा रडत नाही !

 

आनंदी कसे  जगायचे याचे

आता कळले आहे तंत्र !

व्हाट्सऍपच्या या जादूच्या

काठीने दिला सुखाचा मंत्र.

  

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक ध्रुव जणू लाखो तारे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक ध्रुव जणू लाखो तारे ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

शमवायाला अपुली तृष्णा

कुठवर घेशिल उसने पाझर

खणता खणता खोल स्वत:ला

लाभो तुजला तुझाच निर्झर

 *

आटपाटची अद्भुत नगरी

वसवलीस जी अंतर्यामी

सार्वभौम या अधिराज्याचा

तूच विधाता आणिक स्वामी

 *

खंत कशाला जनविजनाची

तूच तुझा जोवरी सोबती

नसु दे संगत नक्षत्रांची

ठेव आतली ज्योत जागती

 *

कालकूट रे सर्व नद्यांचे

रिचवाया तू समुद्र व्हावे

परी मंथनी तुझ्या अथांगा

केवळ अमृतकुंभ निघावे

 *

विदीर्ण होइल काळिज ऐसे

घोंघावत मरणाचे वारे

ठेव अबाधित तुझी अस्मिता

एक ध्रुव जणू लाखो तारे

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देवबाभळी… चित्र एक.. काव्ये दोन ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देवबाभळी… चित्र एक.. काव्ये दोन ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(१) -हळद लागली देवबाभळी

(भावगीत – (वर्ण संख्या २०, यति ११ व्या अक्षरावर))

फुले पखरली अंगांगावर कांचन बहरून आला 

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||ध्रु||

*

पानगळीने एकटीच कधी बांधावर उदासवाणी

पावसऋतूत किती देखणी दिसते जणू महाराणी

वैद्यराज बाभूळ बहुगुणी हिज मानाचा शेला घाला 

हळद लागली देव बाभळी मधुरीम श्रावण झाला ||१||

*

लवलवणारी चिमणी पाती काट्यांचे मोहोळ भरले 

सडा टाकण्या मनमोहकसा कनक जणू पाझरले 

लोलक दिसती झुंबरातले किरणात कोवळ्या माला

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||२||

*

वेडी बाभळ, शमीरूकु कधी बावळ म्हणून रूजली

केसुरडी, किंकरात, कोकई, रामकाठी नावे सजली

सोनरुपाचा मम् गीताने काव्य साज देखणा ल्याला 

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||३||

* * * *

(२) बाभळीत या असे दुवा रे*

(वृत्त : वनहरिणी – मात्रा : ८+८+८+८=३२)

*

बांधावरल्या निर्जन जागी अंगावरती काटे सारे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||ध्रु||

*

हिरडीसाठी दातखिळीने बळकट करते तुमच्या दाता

माझ्या शेंगा किती बहुगुणी लोणचे तुम्ही बनवा आता

साली पाने शेळ्या खाती डिंक घालुनी लाडवात रे 

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||१||

*

काटे घेऊन वावरते मी कधीतरी मी पिवळी होते

लाकूड फाटा बहुउपयोगी दारे खिडक्या त्याच्या देते

माझ्या शेंगा माझा पाला खाणाऱ्यांनो काटक व्हा रे 

बाभळ सांगे माझ्या मधले सत्व औषधी सारे घ्या रे ||२||

*

पाने झडली तरिही देते पांतस्थाला दाट सावली

काटे भरली सर्वांगाला आशिष देते होत माउली 

व्याधी वरती औषध साऱ्या बाभळीत या असे दुवा रे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||३||

*

पशुपक्ष्यांची चिवचिव सारी माझ्या अंगा खांद्यावरती 

सुगरण खोपे विणतच जाते फांद्यावरती असंख्य घरटी

सुरक्षीत अन् आश्वासकसे बाहू माझे सावरणारे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१६ ☆ गजल… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१६ ?

☆ गजल ☆ प्रभा सोनवणे ☆

सोसला  दुष्काळ हा, आता तरी,

पावसाच्या बरसु दे झरझर सरी

*

जातिधर्माचे कशाला दाखले

वाढते आहे विषमतेची दरी

*

तू किती नाकारल्या काळ्या मुली

भांडते रात्रंदिनी गोरी परी

*

कष्ट करणे टाळले वरचेवरी

देत आहे कोण भाजी भाकरी ?

*

ना इथे ना राहते आहे तिथे

भेटला मज विश्वव्यापी तो हरी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ घे भरारी… ☆ जयश्री पाटील ☆

जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

☆ घे भरारी… ☆  जयश्री पाटील ☆

सांगतोना ग वारसा आपण सावित्रीचा

मग का विसर पडतो तुला तिच्या कर्तुत्वाचा

*

शिकलोना ग आपण विज्ञान शाळेमध्ये

नाही का ग घेतले ज्ञान तर्कशास्त्रामध्ये

*

सिक्सथ सेन्स असतो म्हणतात ना ग स्त्रीयांना

कुठे हरवतो तो भोंदू बाबांच्या पाया पडताना

*

सत्ता अधिकार पैसा असते का मर्यादा त्याला

स्वत्व गमावून हे सारे हवे आहे का ग तुला

*

शक्तीचा जागर करतो ना ग आपण नवरात्रात

दाखव सामर्थ्य दृष्टांशी खंबीर होऊन लढण्यात

*

मती नको ग तुझी ठेवू कुठे तू गहाण

कर जरासा नेहमी एक विचार महान

*

मुलगा हवा म्हणून नको नादी कोणाच्या लागू

दबावाला कोणाच्याही तू नको कधी बळी पडू

*

दत्तक पुत्र घेऊनी लढली लक्ष्मी रणांगणी

सावित्री ही झिजली समाजसेवा करूनी

*

छत्रपती शाहू सयाजी होते दत्तक पुत्र

रयतेसाठी त्यांनीच धरले सुधारणेचे छत्र

*

सायासाने मिळाला आहे स्त्रियांना मोकळा श्वास

घे भरारी सोडून दे तू तो अंधश्रद्धेचा बंदीवास

 

© जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

नाटककार रविंद्रनाथ (१)

वैश्विक काव्य जगतात मानाचं स्थान प्राप्त केलेल्या रविंद्रनाथांनी नाट्य जगताला लहान मोठ्या अशा जवळपास ५०-५५ उत्कृष्ट नाटकांनी समृद्ध केले आहे. परंतु दुर्दैवाने हे सत्य कुठेच अधोरेखित झालेलं नाही. त्यांच्या नाटकांमधील डाकघर, रक्त करबी, विसर्जन, राजा ही नाटके तसेच चित्रांगदा, श्यामा, नटीरपूजा, चंडालिका, ताशेर देश या नृत्यनाटिका जास्त चर्चिल्या गेल्या आहेत. पण त्यांची छोटी छोटी नाटकं, आपल्या वगनाट्य सदृश नाटिका, प्रहसनं, नाट्यछटा देखील समाजमनावर छाप सोडणाऱ्या आहेत. तसेच त्या थट्टा विनोदाच्या अंगानं सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय जीवनातील विसंगतीवरही प्रकाश टाकणाऱ्या आहेत. रविंद्रनाथांची नाटके कलात्मक सौंदर्याचा अनुभव देता देता सामाजिक प्रबोधनही करतात. त्यांच्या कवितांप्रमाणेच त्यांची नाटके देखील त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहेत. आत्ताच्या भाषेत आपण ज्यांना प्रायोगिक नाटके म्हणतो तशी प्रायोगिक नाटके देखील त्यांनी प्रायोगिकतेचं कसलेही अवडंबर न माजवता लिहिली, बसवली व प्रस्तुत केली.

परंतु त्या काळातली मेलोड्रॅमॅटिक नाटके बघण्याची सवय असलेल्या बंगाली प्रेक्षकांना रविंद्रनाथांच्या नाटकांतील तरलता, अस्फुट संघर्ष लक्षात येत नसल्यामुळे म्हणा किंवा धार्मिक, सामाजिक व्यंगावर भाष्य असल्यामुळे म्हणा रविंद्रनाथांना नाटककार म्हणून जे स्थान कलाजगतात मिळायला हवं होतं ते कांही मिळालं नाही. अर्थात टागोरांनीही हे मान्य केलं होतं. ते म्हणत, “मला नाटक लिहिता आलं नाही. एक मध्यवर्ती कल्पना घेऊन त्यावर नाटक तोलण्याची कला माझ्यात नाही. ” अर्थात त्यांच्या नाटकांकडे पाहिलं असता लक्षात येतं की, हा त्यांचा विनय होता. त्यांच्या मधला कवी त्यांच्या नाटकांतही डोकावतो, हे मात्र खरे आहे. त्यांची कांही नाटकं तर गद्य काव्य असल्यासारखी वाटतात.

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ नाटकाचं बंगालीत भाषांतर केलं होतं. त्या काळात इंग्रजी नाटकांच्या अनुकरणाचं वारं होतं. त्यामुळे पारंपरिक बंगाली नाट्यकला व नवदरबारी लोकांची नाट्यकला यात मोठं अंतर आलं होतं. रविंद्रनाथांनी लोकरंगमंचातली शक्ती ओळखून, त्यावर आपले संस्कार करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. नाटकाविषयी त्यांच्या मनात कोणतेही व्यावसायिक विचार नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही नाटक कंपनीसाठी नाटक लिहिले नाही.

(अपूर्ण–पुढील भागात)

—–

गीत : ७६

DAY after DAY, O lord of my life, shall I stand before thee face to face? With folded 

hands, O lord of all worlds, shall I stand before thee face to face? 

Under thy great sky in solitude and silence, with humble heart shall I stand before thee 

face to face? 

In this laborious world of thine, tumultuous with toil and with struggle, among hurrying crowds shall I stand before thee face to face? 

And when my work shall be done in this world, O King of kings, alone and speechless shall I stand before thee face to face? 

—–

मराठी भावानुवाद : गीत : ७६

*

हे परमेशा, नित्य, प्रतिदिन

मला भेटशील का रे?

कर दोन्ही जोडूनि उभा मी

मला भेटशील का रे?

*

गगनाखाली निळ्या, अथांग, अतल

नतमस्तक मी शांत, एकाकी, निर्मल

मला भेटशील का रे?

*

दुष्कर जीवन, संकटे कितीक आली

या गर्दीत ना उसंत क्षणाची मिळाली

मला भेटशील का रे?

*

जीवनी, कर्तव्ये सारी पुरी करुनी

येतो मूकपणे, एकांताचे बोट धरुनी

मला भेटशील का रे?

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत : ७७

I KNOW thee as my God and stand apart ⎯ I do not know thee as my own and come 

closer. I know thee as my father and bow before thy feet ⎯ I do not grasp thy hand as 

my friend’s.

I stand not where thou comest down and ownest thyself as mine, there to clasp thee to 

my heart and take thee as my comrade.

Thou art the Brother amongst my brothers, but I heed them not, I divide not my earnings 

with them, thus sharing my all with thee.

In pleasure and in pain I stand not by the side of men, and thus stand by thee. I shrink to give up my life, and thus do not plunge into the great waters of life.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ७७

 *

तुज काय म्हणू मी, कोण म्हणू?

न कळे नाते काय आपुले

पिता, बंधु की सखा म्हणू?

*

जेथे तव पदचिन्हें रमणीय

ती भूमी मज असे पूजनीय

तू माझा समजुनि मी तेथे

उभा कसा राहू?

*

पिता म्हणू, तर जवळ न जाईन

नतमस्तक तव सामोरी होईन

आदर ठेवी दूर जरा मज,

हात कसा तव हाती धरू?

*

सखा सोबती, तू माझा जर

जवळी तुझ्या राहू का निरंतर

कवटाळुनि मम हृदयापाशी 

तुला कसा घेऊ?

*

बंधु तुला जर मानत असतो

तव आज्ञेचे पालन ना करतो

संचित माझे तुझिया सोबत 

वाटुनि का घेऊ?

*

दुःखाचे क्षण, सुखाची पखरण

अनुभवता ये, तुझी आठवण 

जीवन नौका वल्हविसी का,

भवसागर हा पार करू?

*

तू परमात्मा, तुज जीवन अर्पिन

नश्वर या जगती, पुन्हा न येईन

एकरूप तुजसवे होउनि 

मुक्ती का पावू?

 

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत ७८

WHEN the creation was new and all the stars shone in their first splendour, the gods 

held their assembly in the sky and sang “Oh, the picture of perfection! The joy 

unalloyed!” 

But one cried of a sudden ⎯ “It seems that somewhere there is a break in the chain of light and one of the stars has been lost. ” 

The golden string of their harp snapped, their song stopped, and they cried in dismay ⎯

“Yes, that lost star was the best, she was the glory of all heavens!” 

From that day the search is unceasing for her, and the cry goes on from one to the other that in her the world has lost its one joy! 

Only in the deepest silence of night the stars smile and whisper among themselves ⎯

“Vain is this seeking! Unbroken perfection is over all!” 

—–

मराठी भावानुवाद : गीत : ७८

*

तारे गगनी चमकत होते

जेंव्हा झाली विश्वनिर्मिती

वैभव पाहून देवांच्या तर

आनंदा ना राहिली मिती

*

तुटली ताऱ्यांची साखळी

एक तारा कुठे हरवला

मोजीत बसला होता रात्री

कोणी एक रडू लागला

*

घाबरले देवही, गीत थांबले

सुवर्ण तारच तुटली वीणेची

हरवला ताराच म्हणती

शान होता स्वर्गाची

*

सारे होते शोधत अविरत

इकडे तिकडे, तिकडे इकडे

आनंद हरवून बसले विश्व

समजून असे मूढ रडे

*

शांत, गर्द रात्रीच्या डोही

हसती तारे अन् कुजबुजती 

व्यर्थ शोध हा वेदनेचा 

परिपूर्णता आहे जगती

– क्रमशः भाग २६

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares