☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २९ – –
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |
बळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे |
पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं|
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९|
अर्थ : आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर (त्यांच्या डोक्यावर) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी (आणि श्रीकृष्णांनी सुद्धा) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत (त्यांच्या रक्षणासाठी)विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर (राम) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.
विवेचन: मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण (कोदंडधारी) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात.
सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या सहाय्याने स्वउद्धार करून घेऊ शकतो. संत महंत आपल्या आयुष्यामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करणे आणि समाजातील भक्ती किंवा सात्विकता वाढवणे असे कार्य करीत असतात. ते लोकांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. परंतु दृष्टांचे निर्दालन करणे त्यांना शक्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा – –
जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो ||
– – असे म्हटले आहे. म्हणजे दुष्टांचे दुष्टत्व किंवा वाईट भावना नष्ट होवोत आणि सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड वाढो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् |
धर्मसंस्थापनार्थामि युगे युगे ||
– – हे भगवंताने आपल्या भक्तांना गीतेत दिलेले वचन आहे. जे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत अशा लोकांना सुद्धा तो कधी शासन करत नाही. तो तर अजातशत्रू आहे. पण पण जर कोणी त्याच्या भक्ताला त्रास देत असेल तर ते मात्र तो सहन करू शकत नाही आणि त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अवतार घेतो.
जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजला होता आणि राक्षसांनी सदाचारी लोकांना आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांना त्रास देणे सुरू केले, तेव्हा देवीने देखील अनेक अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. श्रीराम आणि श्रीकृष्णांनी देखील अशा अनेक दुराचारी लोकांचा नाश केला.
परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतो यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात, ” आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उद्धारासाठी, मोक्षासाठी श्रीरामांनी अयोध्यानगरीतील नागरिकांना आपल्या सोबत विमानात बसवून नेले होते. श्रीकृष्णांनी देखील शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्या नगरीतील लोकांना नवीन द्वारकापूरीत नेले होते. असा हा भगवंत भक्तवत्सल आणि सज्जनांचे रक्षण करणारा आहे. एकदा का आपण त्याचे भक्त झालो की आपली सगळी काळजी तोच वाहतो आणि सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये तोच आपला आधार होतो. आपले रक्षण करतो.
समर्थ म्हणतात भक्तांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीदच (कर्तव्य)आहे. आणि भक्तांचे रक्षण करण्याबद्दलचा त्याचा महिमा पदोपदी म्हणजे सर्वत्र गाजतो आहे. राम अत्यंत उदार आहे. आपले भक्त त्याला प्रिय आहेत. त्यांच्यात तो भेदभाव करत नाही. हा माझा तो तुझा असे त्याच्याजवळ नसते. तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तांना तो मोक्ष मार्गावर नेण्यासाठी सहाय्य करतो. तेव्हा आपल्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी अशा रामाला शरण जावे हेच खरे !
स्वसंवाद ::
१) मी परमेश्वराची खरोखरच मनापासून भक्ती करतो का ?
२) संकटसमयी मला ‘तो माझ्या पाठीशी आहे’ ही भावना कितपत बळ देते?
३) मी सज्जनांच्या बाजूने उभा राहतो का, की परिस्थितीनुसार भूमिका बदलतो?
४ “भगवंत भक्तांची उपेक्षा करत नाही” या विचारावर माझा किती दृढ विश्वास आहे ?
– – –
श्लोक क्र. ३० – – –
समर्थाचिया सेवका वक्र पाहे |
असा सर्व भूमंडळी कोण आहे ?
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०|
अर्थ :एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.
विवेचन : “नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे.
सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा निस्सीम भक्त हनुमान याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूया.
हनुमंत रामाचा सेवक आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो त्याच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या धन्यावर म्हणजे मालकावर ज्याची प्रचंड निष्ठा आहे. असा सेवक म्हणजे हनुमंतराय !मग साहजिकच अशा सेवकावर मालकाचे देखील प्रेम असणारच !
सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीराम हनुमंताला विचारतात की बोल तुझी काय इच्छा आहे ? तेव्हा हनुमंत फक्त त्याची भक्ती मागतात. श्रीराम त्याला उराशी धरतात. आपला लहान बंधू म्हणून आलिंगन देतात केवढे हे प्रेम ! मारुतीरायांची केवढी ही निरपेक्ष सेवा !
समर्थांचा (भगवंताचा) जो भक्त असतो तो देखील त्यांच्या कृपेने समर्थच होतो. त्यामुळे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नसते. त्याच्यावर संकटे येत नाहीत असे नाही. पण जीवनातील दुःखांना, संकटांना तो धैर्याने सामोरा जातो. हा देह माझा नाहीच. तो भगवंताचा आहे अशी त्याची धारणा झालेली असते. त्याच्या सेवेसाठीच त्याचा उपयोग तो करत असतो. म्हणून देहाला दुःख झाले तरी तो विचलित होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे… अशी त्याची वृत्ती होते.
सेवक व्हावे तर अशा व्यक्तीचे व्हावे जो आपली कधीही उपेक्षा करीत नाही. व्यवहारात चाकरी भलेही कोणाची करा. परंतु सेवक मात्र त्या भगवंताचे व्हा. कसा आहे हा भगवंत ? ज्याचा सेवक आपल्याला व्हायचे आहे ? हा भगवंत असा आहे की त्याच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे वर्णन तिन्ही लोक करतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत त्याच्या पराक्रमाचा डंका वाजतो आणि सगळेच त्याचे गुणगान गातात.
एकदा का आपण त्याचे सेवक झालो की तो आपली कधीही उपेक्षा करत नाही. सेवक म्हणजे भगवंताचा भक्त ! खरा भक्त भगवंताकडून काही हवे म्हणून भक्ती करीत नाही. तर मला भगवंत हवा आहे, त्याच्याशिवाय दुसरे काही नको अशा समर्पण भावनेने त्याची भक्ती असते. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त ! असा सेवक, असा भक्त जो असतो, त्याची सुखदुःखे, काळजी, चिंता आपोआप कमी होत जातात. म्हणजे त्याला त्याची पर्वा नसते. भगवंत त्याची काळजी वाहतो. भगवंताच्या नामात तो रंगून गेलेला असतो. अशा या भगवंताकडे भक्ताकडे भगवंत देखील लक्ष ठेवून असतो. तो त्याची उपेक्षा करीत नाही. त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी ज्याची खात्री असते तो निर्भयपणे जीवन जगू शकतो. लोकांनी स्तुती केली किंवा निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांपासून असा भक्त कोसो दूर असतो. आपल्या कर्तव्यात रत असताना त्याची आठवण ठेवावी. कर्तेपण आपल्याकडे न घेता राम कर्ता आहे, तोच हे करून घेतो आहे ही भावना ठेवावी.
स्वसंवाद ::
१) मी भगवंताचा “सेवक” आहे की केवळ “अपेक्षा करणारा भक्त”?
२) माझ्या भक्तीत निरपेक्षता आहे का, की काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे?
३) मी माझ्या चिंता खरोखरच परमेश्वरावर सोपवतो का, की फक्त शब्दांत बोलतो?
Toung Twister फक्त या नव्या पिढीतच नाहीत, तर खुद्द श्री समर्थ रामदास स्वामींनीसुद्धा त्यांच्या काळात लिहून ठेवले आहे. बघा पटापट न चुकता म्हणता येते आहे का ते…
लाटानुप्रास
ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्यासाठी हा भाषालंकार अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो..
श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक
*
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।
*
झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।
*
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।
*
कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।
*
भरभरित भरारी भरभराटे भरारी
थरथरित थरारी थरथराटे थरारी
तरतरित तरारी तरतराटे तरारी
चर्चरित चरारी चरचराटे चरारी।।
*
रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।
*
न अडखळता जोरात म्हणण्याचा प्रयत्न करून पहा…
जीभेसाठी व्यायाम!
हा व्यायाम करा व म्हातारपणी ऊद्भवणा-या स्मृतीभ्रंश, विस्मरण वगैरे मेंदूच्या त्रासापासुन स्वत:चा बचाव करा!
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २७ आणि २८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २७ – – –
भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ।
रघुनायका सारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।
अर्थ : हे मना, एखाद्या भित्र्या माणसासारखा तू प्रपंचाला का घाबरतोस? भीती सोडून धैर्य धारण कर. कारण तुझ्या पाठीशी रघुनायकासारखा स्वामी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अगदी यमाचा कोप झाला तरी तो तुला कधीही सोडणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही.
विवेचन : मानवी जीवन हे अनेक अनिश्चिततांनी भरलेले आहे. उद्या काय होईल याची चिंता, नोकरीची काळजी, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा असंख्य विचारांनी मन व्यापलेले असते. त्यामुळे माणूस आतून अस्वस्थ आणि भयग्रस्त होतो.
प्रपंचाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या भीतीने खचून जाणे योग्य नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला धीर देतात…
“धरी रे मना धीर, धाकासि सांडी”
… हे मना, तू भीती झटकून टाक आणि धैर्याने उभा रहा.
आपले जीवन हे जर एक रणांगण मानले, तर या रणांगणावर शूरवीराप्रमाणे लढणे आवश्यक आहे. हातात तलवार किंवा बंदूक आहे पण हात पाय कापताहेत, तर लढाई कशी लढणार ? शत्रूसाठी मग तुम्ही सोपे लक्ष्य असाल. मनात भीती असेल तर विजय शक्य नाही.
संकटेही अशीच असतात. आपण त्यांना जेवढे घाबरतो, तेवढी ती अधिक मोठी वाटतात. धैर्याने सामना केला, तर ती हळूहळू नाहीशी होतात.
या संदर्भात स्वामी विवेकानंद यांच्या बालपणातील प्रसंग अत्यंत बोलका आहे. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र. ते अत्यंत अवखळ आणि खोडकर होते. ते झाडावर चढत. आईला असे वाटले की झाडावर चढून हा खाली पडला तर त्याला इजा होईल. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना झाडावर चढू नकोस. तिथे ब्रह्मराक्षस राहतो असे सांगितले. पण नरेंद्राने आईला विचारले, “ब्रह्मराक्षस ? कुठे आहे तो मला त्याला पाहायचेच आहे. ?” ब्रह्मराक्षस प्रत्यक्षात नव्हताच. आपली मनच अशा गोष्टींची निर्मिती करते. म्हणूनच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे आपण म्हणतो.
समर्थ पुढे आपल्याला एक मोठा आधार देतात…
… रघुनायकासारखा स्वामी आपल्या पाठीशी आहे.
राम म्हणजे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाही, तर तो धैर्य, धर्मनिष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. वाल्यासारख्या बलाढ्याला संपवणारा, रावणासारख्या अहंकारी व्यक्तीचा नाश करणारा हा राम सज्जनांचा त्राता आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात
प्रत्यक्ष यम जरी कोपला, तरी राम तुला कधीही सोडणार नाही. तुझी उपेक्षा करणार नाही. याचा अर्थ असा नाही की की श्रीरामांना शरण जाण्यामुळे आपला मृत्यू टळणार आहे. मृत्यू तर अटळ आहे परंतु श्रीराम आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो तेव्हा मृत्यूची भीती कमी होते. संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते.
शेवटी, भय, आनंदी आणि धैर्याचे जीवन जगण्यासाठी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की श्रीरामावर (भगवंतावर) श्रद्धा ठेवा, धैर्य धरा आणि निर्भयपणे जगायला शिका. श्रीराम तुमच्या पाठीशी आहेतच.
स्वसंवाद ::
मी माझ्या आयुष्यातील समस्यांना धैर्याने सामोरे जातो का, की त्यांना घाबरून जातो?
माझी भीती वास्तव आहे की ती माझ्या मनाने निर्माण केली आहे ?
संकटांच्या वेळी मला ईश्वरावर खरोखर विश्वास वाटतो का?
माझ्या मनातील श्रद्धा आणि धैर्य वाढवण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
– – – –
श्लोक क्र. २८ – – –
दिनानाथ हा राम कोदंडधारी |
पुढे देखता काळ पोटी थरारी |
जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |२८|
अर्थ: श्रीराम हा दीनांचा कैवारी/रक्षणकर्ता आहे. धनुर्धारी रामाला समोर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काळ म्हणजे यमराजाला देखील धडकी भरते. हे वाक्य सत्य समजा की भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आणि त्याचे रक्षण करणारा आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही.
(कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला, वाक्य – वचन, नेमस्त – निश्चितपणे)
विवेचन :मागील श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी म्हणजे प्रपंचाच्या भीतीने हे मानवा तू का घाबरतोस ? या श्लोकात ते भगवंत आपला रक्षणकर्ता कसा आहे आणि तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करीत नाही हे समर्थ निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवतात. त्यासाठीच भगवंत आपल्या दासाची/भक्ताची उपेक्षा करीत नाही हे सांगणारे (नुपेक्षी कदा राम दासाभिमानी)हे पालुपद असलेले बरेच श्लोक आहेत.
मनुष्य अनेक अर्थाने दुबळा किंवा परावलंबी असतो. संकटप्रसंगी त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. कधी कधी हा आधार तो आपल्या नातलगांमध्ये किंवा मित्रांमध्ये शोधत असतो. परंतु या सगळ्याच गोष्टी बेभरवशाच्या असतात. परिस्थिती फिरली की ही मंडळी सुद्धा पाठ फिरवतात. पैसा सुद्धा सर्वप्रसंगी उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून संत आपल्याला कळकळीने सांगतात की आधार हा एकमेव परमेश्वराचाच असला पाहिजे कारण सर्व परिस्थितीत तोच आपल्याला साथ देईल. तो दीनानाथ आहे.
आपल्याला नुसता कोणाचातरी आधार आहे ही जाणीव सुद्धा खूप मानसिक बळ देणारी असते. स्वामी समर्थांच्या फोटोखाली, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे वचन लिहिलेले असते. हे वचन लाखो भक्तांना जगण्याची शक्ती देते. स्वामी प्रत्यक्ष आपल्या पाठीशी आहेत या भावनेतून भक्त कठीण प्रसंगातूनही तरुन जातो. गीतेतील नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात – –
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
– – जो भक्त निष्ठेने आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी उपासना करील त्याचे मी रक्षण करतो.
आजकाल बरीच शिकलेली मंडळी माझा देवावर विश्वास नाही असे म्हणत असतात आणि त्याचे निरनिराळ्या प्रकारे समर्थन करीत असतात. आपण आस्तिक म्हणून जगायचे की नास्तिक म्हणून जगायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अशा मंडळींनी आस्तिक लोकांचा बुद्धिभेद करून त्यांच्या जगण्याचा आधार काढून घेऊ नये. ईश्वराला विज्ञानाच्या कसोटीवर अनुभवता येत नाही. त्याची अनुभूती श्रद्धेच्या कसोटीवर घेता येते ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी त्याच्यावर दृढ श्रद्धा असावी लागते, निष्ठा असावी लागते. त्या भावनेने जोपर्यंत आपण त्याची भक्ती करीत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही.
समर्थांना प्रिय असलेला आणि त्यांचे आराध्य दैवत असलेला राम हा कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला आहे. त्याच्या नुसत्या धनुष्याच्या टणत्काराने काळ देखील थरारतो. तो दीनांचा, दुःखितांचा रक्षण करणारा आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. फक्त आपली त्याच्यावर दृढ श्रद्धा हवी.
संकटातून परमेश्वर आपले रक्षण करतो असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ संकटांशी सामना करण्याची शक्ती तो आपल्याला देतो आणि त्याच्या कृपेनेच हा भवसागर आपण तरुन जातो असा आहे. तेव्हा हे मना, तू अन्य सगळे आधार सोडून केवळ एका रामावर श्रद्धा ठेव. तोच तुझे कल्याण करील. जेव्हा आपल्याला आतून जाणवते की एक दिव्यशक्ती आपल्या सोबत आहे, तेव्हा चिंता, राग, भविष्याची भीती यासारख्या गोष्टी आपोआपच कमी होतात. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, आपल्याजवळ आहे ही अनुभूती आली की माणूस कोणत्याही संकटांना सहजपणे तोंड देऊ शकतो.
स्वसंवाद ::
१) मी खरोखरच परमेश्वराला अंतिम आधार मानतो का ? की पैसा, मित्र नातेवाईक हेच अंतिम प्रसंगी उपयोगी पडतील असे मला वाटते ?
२) संकटसमयी देवावरील माझा विश्वास डळमळतो का की अधिक दृढ होतो?
३) “राम दासाभिमानी आहे” या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे का ?
४) मी परमेश्वराला केवळ सुखात आठवतो की दुःखातही त्याच्यावर भार टाकतो ? (क्रमशः)
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
परमेश्वराशी संवाद
गाथेतील अभंगांचे वाचन करीत असताना पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराशी अनेक वेळा अत्यंत जवळीकतेने आणि प्रेमादराने संवाद साधतात. आज आपण त्यांच्या अभंगांतून देवाशी घडलेला संवाद पाहूया.
अखंड नामस्मरण त्यांनी अंगीकारले आहेच. ते हरीला पुन्हा पुन्हा हेच सांगतात की
हरी तुझे नाम गाईन अखंड/
यावेळी पाखंड नेणे काही//
अंतरी विश्वास अखंड नामाचा/
काया मने वाचा हेची देही//
तुका म्हणे आता देई संत संग/
तुझे नामी रंग भरो मना//
हे देवा, माझ्या मुखात तुझेच नाव अखंड रहावे या व्यतिरिक्त मी दुसरी कोणतीच गोष्ट जाणत नाही. तुझ्या नामावरचा माझा विश्वास कायम रहावा, आणि काया, वाचा, मने करून माझ्या ओठी तुझ्या नावाशिवाय दुसरे काहीच नको. ईश्वरा जवळ ते संतांच्या संगतीची याचना करतात कारण संत हे ईश्वराचे रूप आहे.
प्रपंचात अडकलेल्या तुकाराम महाराजांची अवस्था दोलायमान झालेली आहे. ना धड प्रपंच ना परमार्थ अशा स्थितीत ते हरीलाच साद घालतात. त्याला सांगतात, हे मुरारी, माझे चित्त धनामध्ये गुंतले आहे, आणि ते मला दारोदार हिंडवीत आहे. हे मनाचे असे भरकटणे थांबतच नाही. पृथ्वीवर भटकू- नही समाधान काही मिळत नाही.
धना गुंतले चित्त माझे मुरारी/
मन घेऊन हिंडवी दारोदारी//
मन हिंडता न पुरे यासी काही/
७मही ठेंगणी परि ते तृप्त नाही//
पुढे ते देवाला सांगतात की त्यांची बुद्धी सुद्धा शांत दिसत नाही, कारण इंद्रिय विषयांच्या भोवऱ्यात ते सापडले आहेत. या अशा भरकटलेल्या चित्तामुळे माझ्या जिवाला शांती नाही. तेव्हा या दुष्ट आणि खोड्याळ मनापासून हे परमेश्वरा तू मला वेगळे कर.
पाहता न दिसे मज शुद्ध मती/
पुढे पडीलो इंद्रिया थोर घाती//
जीवा नास त्या संगती दंडबेडी/
हरी शीघ्र या दृष्ट संघाशी तोडी//
षड्रिपुंची तुकाराम महाराजांना फार भीती वाटते. ते देवाला विनवतात,
मोह पापिणी दुष्ट माया ममता/
काम क्रोध ही यातना थोर करी//
तुजवाचुनी सोडवी कोण हरी//
ही सर्व माया, ममता, मोह म्हणजे एखाद्या दुष्ट पापिणीसारखे आहेत. काम, क्रोध यामुळे मनाला फार यातना सहन कराव्या लागतात, त्यामुळे हे हरी तुझ्यापासून मी दूर जातो. ते पुढे देवाला सांगतात, निद्रा, दंभ, आळस, याची त्यांना भीती वाटते. म्हणून देवा या दुर्गुणांना माझ्या देहात थारा नसावा. मला फक्त तुझ्या एकट्याचीच हाव आहे.
निज देखता निज हे दुरी जाये/
निजा आळस दंभ या भीत आहे//
तया वस्ती नको देऊ देवा/
तुज वाचुनी नास्ती आणिक देवा//
करी घातपात भय लाज थोरी/
असे सत्य व्हाव बहु भक्ती दूरी//
नको मोकलू दीनबंधू अनाथा/
तुका विनवी ठेवूनी पायी माथा//
या ठिकाणी महाराजांनी देवाला दीनबंधू म्हणून संबोधले आहे. मोठ्या भावाप्रमाणे हा हरी दीनांचे, पीडितांचे रक्षण करतो. महाराजांच्या काळातही घातपात लबाडी होतीच. तर त्यापासून ते म्हणतात हे दीनबंधू तू मज अनाथाला वाचव. संशय, संकोची वृत्ती हे अवगुण फार घातक आहेत तेव्हा मला तू यापासून दूर ठेव. तुझ्या पायांवर माझी एवढी विनंती आहे.
प्रपंचातील तुकाराम महाराज स्वतःला अनाथ म्हणत आहेत, कारण एका परमेश्वराशिवाय त्यांना आजूबाजूला दुसरे कोणी दिसतच नाही.
पांडुरंगाच्या दर्शनाची उत्कट आस हा तर गाथेचा गाभा आहे. पांडुरंगाला ते माऊलीच म्हणतात. याही अभंगात त्यांची ही माऊलीच्या भेटीची उत्कटता दिसून येते. आईची आणि तिच्या अपत्याची काही कारणांमुळे ताटातूट झाली तर ते बालक सैरभैर होऊन मोठ्याने रडायला लागते, तशीच तुकाराम बुवांची अवस्था या त्यांच्या अभंगातून झालेली आपल्याला दिसते.
बोलोनिया दाऊ का तुम्ही नेणाजी देवा/
ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन//
पांगुळले मन काही नाठवे उपाय/
म्हणून पाय जीवी धरुनी राहिलो//
त्याग भोग दुःख काय सांगावे मांडावे/
ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशन का//
तुका म्हणे माता बाळ चुकलीया वनी/
न पवता जननी दुःख पावे विठ्ठले//
महाराज म्हणतात, ” हे देवा मला दर्शन द्या असे तुम्हाला वारंवार सांगण्याची आवश्यकता आहे का? तुम्हाला तर हे माहीतच आहे. तुम्ही मला जसे ठेवाल तसा मी राहीन. माझं मन अत्यंत दुर्बल झाल्यामुळे मी तुमच्या पायाशी आलो आहे, माझ्याकडे अन्य कोणताच उपाय नाही. मी कोणते भोग घ्यावे, कोणते दुःख सोसावे मला माहित नाही. रानामध्ये आई आणि मुलाची ताटातूट झाल्यासारखी माझी मनस्थिती झाली आहे.
विठ्ठलाच्या दारात जणू काही धरणे धरून बसल्यावर तुकाराम महाराजांना स्वतःतीलच दोष दिसतात आणि मग ते रागाने विठ्ठलाला म्हणतात,
जळो माझे कर्म वाया केली कटकट/
झाले तसे तंट नाही आले अनुभवा//
मी उगीचच तुमच्या दारात कटकट केली आग लागो माझ्या कर्माला. तुमची सत्कीर्ती मी जी ऐकली त्याचा मला अनुभव आला नाही.
आता पुढे धीर काय देऊ या मना/
ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे//
अहो नारायणा आता मी माझ्या मनाला कसा धीर देऊ ते तुम्हीच सांगा.
गुणवंत केलो दोष जाणयासाठी/
माझे माझे पोटी बळकट दूषण//
मला तुम्ही गुणवंत केलेत, पण मी परदोषच बघत बसलो. मी व माझे मानणे हा तर माझ्यातीलच दोष आहे.
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा/
बरवा हा लळा पाळीयेला शेवटी//
शेवटी महाराज म्हणतात, ” हे केशवा, दयाळा, तुम्ही माझे खूप लाड पुरवलेत, त्याची प्रचिती आली. माझे गुणदोष समजले, हे तुमचे माझ्यावर चांगले उपकार झाले. याचाच अर्थ जेव्हा महाराजांनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळाले.
असे देवाशी कधी भांडण, कधी रुसवा कधी गोडवा दर्शविणारे अनेक अभंग गाथेत सापडतात आणि त्यावरून तुकाराम आपल्याला समजतातच परंतु परमार्थाचीही. आपल्या सामान्यांना थोडी तरी ओळख होते.