मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूतकाळाचा पिसारा ☆ स्व. दत्ता हलसगीकर

स्व. दत्ता हलसगीकर 

दत्ता हलसगीकर

(जन्म 7 ऑगस्ट 1934 – मृत्यु 9 जून 2012)

? कवितेचा उत्सव ?

☆ भूतकाळाचा पिसारा ☆ स्व. दत्ता हलसगीकर  ☆ 

भूतकाळाचा पिसारा फुलवून नाचलेले मोर

आता थकून गेले आहेत

आणि भविष्य तर थिजून गेलेले, आता

निर्माल्यावर पाण्याचा शिडकावा करून

आम्ही फुले टवटवीत करतो, त्या म्लान गंधातही हरवतो…

वसंत ऋतूच्या गोष्टी बोलताना किती हळुवार होतो आम्ही !

कष्ट उपसलेल्या रेषांचे हात ती दाखवते,

स्वप्ने थिजल्या माझ्या मोतीबिंदुच्या डोळ्यात ती डोकावते

विरळ झालेल्या तिच्या रुपेरी केसांना पाहून मी गहिवरतो.

माझ्या छातीवर सांडलेल्या तिच्या काळ्याभोर केसांचा पाऊस आठवतो.

माझ्या बरोबर चालताना थकून थकून गेलेल्या

तिच्या पावलांना मी रोज रात्री तेल चोळतो तेव्हा ती पोटभर रडते,,,,

उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केले..

या आठवणीच्या उमाळ्याने मी जवळ घेतो

तेंव्हा सुरकुतलेल्या तिच्या निस्तेज गालांवर लाली चढते.

उन आणि पाऊस, सकाळ आणि संध्याकाळ

आता वसतीला आली आहेत,

घर आवरून झाले आहे; हाक आली की आता उठून निघायचे ||

 

स्व. कवी दत्ता हलसगीकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 96 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 96 ☆

☆ गज़ल ☆

का उगा करतोस कांगावा

तू पुन्हा तो शब्द पाळावा

 

आरसा दावे अता भीती

जाणिवांचा हा असे कावा

 

सोहळा तारूण्य ढळल्याचा

साजरा होण्यास ही यावा

 

फारशी नसतेच मी येथे

तेथला येईल सांगावा

 

लादते आयुष्य पाठीवर

का कुणी शेर्पाच नेमावा?

 

तारका नांदोत आकाशी

जन्म हा धुलिकणच रे व्हावा

 

भाबड्या आहेत माझ्या कल्पना जगण्यातल्या

आडवाटा टाळल्याने राजरस्ते गाठले

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कधीतरी ☆ श्रीओंकार कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कधीतरी☆ श्री ओंकार कुलकर्णी ☆ 

कधीतरी

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

सूर साठवून देतो

साद शिणल्या मेंदूला

ऐकतो गाणे एकाकी

एकटाच असलो जरी

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

रंग भरूनी घेतो

आसमंत डोळ्यामधी

चालते अशीच ही

एकटीच चित्रकारी

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

प्राणवायू भरूनी घेतो

फुफ्फुसामध्ये नासिकेतूनी 

लोम अनुलोमातूनी

रोम रोमात रोमांचकारी 

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

क्षणासाठी माझा असतो

चोचले जीवाचे पुरवूनी

जगतो जरा थोडासा

असलो सत्यात जरी

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

©  श्री ओंकार कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

 “उन्हातल्या चांदण्याचा बहर” श्री. दत्ता हलसगीकर – भाग १

सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक कविता बऱ्याचदा भेटत गेली आणि त्या कवितेने मनात घरच केले. ती कविता होती

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

अशाप्रकारे सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी ही आशयघन कविता ज्यांची आहे ते आहेत सुप्रसिद्ध कवी श्री गणेश तात्याजी हलसगीकर उर्फ दत्ता हलसगीकर. सात ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेले दत्ताजी शेवटपर्यंत सोलापूरला राहत होते. त्यांनी सोलापूरातच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नोकरी केली. त्यांना लिखाणाची आवड होती. किशोर वयापासून अखेरपर्यंत त्यांनी काव्यलेखन आणि ललित लेखन केले.

दत्ताजींच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, सोशिकता, अगत्य होते तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होई. प्रेमळ, निर्मळ, सात्विक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

त्यांच्या काव्यरचना सोप्या, हळुवार,प्रवाही होत्या. त्यांनी आपल्या कवितेतून वंचितांचे दुःख मांडले. गोरगरिबांबद्दल कणव बाळगणारी यांची कविता मनाला भिडणारी, सामूहिक आवाहन करणारी आहे.

त्यांची कविता श्रमिकांपासून  श्रीमंतांपर्यंत भाष्य करताना जास्त खुलून येते. तर श्रमिकांबद्दल जास्तीच हळवी होते. जगण्याचा आनंद कशात आहे, जगणे कसे सुखकर करता येईल हे त्यांनी कवितेतून सांगितले. ‘ उंची ‘या कवितेतून त्यांनी ‘ ज्यांची बाग फुलून आली ‘ अशा देखण्या शब्दात सामाजिक परिस्थितीची जाणीव समाजाला करून दिली.

या कवितेने इतिहास घडवला आहे.२२भाषांमधे तिचे भाषांतर झालेले आहे. आकाशवाणीवरून ही कविता असंख्य वेळा वाचली गेलेली आहे. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ताजींचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीत झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात दत्ताजींनी हीच कविता वाचली होती.

☆ उंची ☆

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळुन आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

 

ज्यांच्या अंगणी ढग झूकले

त्यांनी दोन ओंजळ पाणी द्यावे

आपले श्रीमंत हृदय त्यांनी

रीते करून भरून घ्यावे ||

 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा

युगायुगाचा अंधार जेथे

पहाटेचा गाव न्यावा ||

 

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडेसे खाली यावे

मातीत ज्यांचे जन्म मळले

त्यांना उचलून वरती घ्यावे ||

अतिशय तरल शब्दात त्यांनी सामाजिक जाणीवेचा वसा सांगितला आहे. त्यांची कविता समाज वेदनांनी व्यथित होतानाच वात्सल्याने भरून येते. अंधाराचे गाऱ्हाणे मांडताना प्रकाशाचे तोरण लावते.मातीशी इमान राखत आभाळाशी नाते सांगते. त्यामुळे त्यांचे शब्द कधी शीतल, सोज्वळ वाटतात तर कधी फटकारे मारणारे वाटतात.म्हणूनच

एकट्याने किती करावी जाग्रणे

झाडांशी अंगणे दुसऱ्यांची ||

असे परखड बोल ते सुनावतात.याच बरोबरीने

एवढासा अंधार मोठा होत गेला

त्याने सूर्य सुद्धा झाकून टाकला |

विनाशाची एवढीशी निसरडी वाट

एवढ्याशा छिद्राने रिता झाला माठ ||

असे चिरंतन जीवनज्ञानही ते सहजपणे सांगून जातात. एकूणच दत्ताजींची विचारसरणी सकारात्मक, वास्तवदर्शी आहे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता जिद्दीने पुढे जायचे हे सांगताना ते म्हणतात,

 मला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत

थोड्याशा अंधाराने मी निराश नाही

अजून मला वसंताची चाहून लागत आहे

थोड्याशा पानझडीने मी हताश नाही ||

अशी त्यांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःखाचे प्रेरणादायी अनुभव देते आणि आपल्या मनातही सकारात्मकता जागवते.

क्रमशः ....

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 96 ☆ नांगराचा फाळ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 96 ☆

☆ नांगराचा फाळ ☆

नांगराचा फाळ घेते काळजावर

वेदनेचा मातिच्या गर्भात वावर

 

वेदने खेरीज येथे सृजन नाही

सृजन दुःखालाच देते फक्त ग्वाही

मातिचा आधार ज्याला तेच स्थावर

 

तू प्रवासी पाहुणा आहे घडीचा

डाव रोजच खेळतो आहे रडीचा

तू सुखाला मागतो आहेस सत्वर

 

मोह माया येत नाही सोबतीला

सत्य आहे जे मिळाले ह्या घडीला

दौलतीचा सोस आहे सांग कुठवर

 

पेटली ही लाकडे जेव्हा स्मशानी

थांबली ही माणसे बघ दूर स्थानी

पेटलेला देह आहे फक्त नश्वर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जपताना शब्द ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जपताना शब्द ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

जपताना शब्द

मनातला एक एक

लेखणीत काव्य

ऊतरते प्रत्येक.

काजवा होऊनी

भावनांचे रंग

तिमीरा भेदतो

चैतन्याचे अंग.

ओंजळीत ओळ

काहूर कल्लोळ

कवणांची रात्र

प्रहरीचे लोळ.

चांदण वेलीत

मन चंद्रकोर

हृदया बिलगे

शब्दांचा चकोर.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खांब – स्व शांताबाई शेळके ☆ प्रस्तुति – सौ.वंदना हुळबत्ते

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

☆ खांब ☆ स्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

बाईच्या ओठांआड दडलेले असते रडणे

वर वर हसणे आणि आतल्या आत कुढणे

आल्यागेल्यांचा सत्कार बाई स्वत: करते

घरभर वारे होऊन ती सतत फिरते

नवरा,मुले,सासू,सासरे तिलाच साद देतात

रात्रंदिवस तिचे विनामोबदला घेतात

आजाऱ्याच्या उशापाशी दिवा होऊन जागते

भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते

‘ रांधा वाढा उष्टी काढा’ चे कपाळावर गोंदण

राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला आंदण

गोंदणात खुलत असतो सूर्य गंध टिळा

चार काळ्या मण्यांनीच साजरा दिसे गळा

तिच्या अहेव चुड्याआड मनगट असते घट्ट

‘ सारे मीच करीन’ तिचा जन्मजात हट्ट

कुशीत भार वाहुन देते वंशाचा दिवा

पुढच्या अनेक पिढ्यांसंगे तीच जुळविते दुवा

भुईत पाय रूजवून ती आभाळात फुलते

देहाचाच खांब करून अवघे घर तोलते

  चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शांताबाई शेळके यांची कविता – समंजस ☆ स्व शांताबाई शेळके

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

समंजसस्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

 दुःख समंजस माझे

नाही फिरविली द्वाही

कधी आले आणि गेले

मला कळलेही नाही

 

मला कळलेही नाही

उरे पुसटशी खूण

…..फक्त फिकट चांदणे

…..फक्त मंदावले ऊन.

    चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तोच चंद्रमा नभात – समंजस ☆ स्व शांताबाई शेळके

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

☆ तोच चंद्रमा नभात ☆ स्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

 

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे

छायांनी रेखियले चित्र तेच देखणे

जाईचा कुंज तोच तिच गंध मोहिनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

 

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे

मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे

ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

 

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा

गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतूनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

    चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – अशा होत्या शांताबाई !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – अशा होत्या शांताबाई !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जणू वडीलधारी आक्का किंवा ताई

अशा होत्या शांताबाई !!

 

दिसणे त्यांचे राजसवाणे

हसणे त्यांचे लोभसवाणे

काव्या मधले स्निग्ध चांदणे

मुखावरती जणू विलसणे

त्यांची गाणी,त्यांची वाणी घंटा किणकिणत जाई

अशा होत्या शांताबाई !!

 

ती बालगीते, ती लावणी

ती प्रेमगीते, ती विराणी

विचार, प्रज्ञा,सौंदर्य, माधुरी

यांची सुरेल हातमिळवणी 

या साऱ्यांचा चित्ताकर्षक काव्यौघ खळाळत जाई

अशा होत्या शांताबाई !!

 

कथा-कादंबरी, गीते-कविता

ललित लेख,अनुवाद समीक्षा

प्राध्यापिका,बालसाहित्यिका

भावसंपन्न साहित्य,रसिकता

एका बिंबातून असंख्य प्रतिमा उमटत जाई

अशा होत्या शांताबाई !!

 

विरहाला या नाव नसे

अंतरीचा हा भाव असे

या हृदयीचे त्या हृदयासी

भावबंध जुळाले जसे

मुकुट मस्तकी ल्याली शारदा ‘शांत-रत्न’ झळाळून जाई

अशा होत्या शांताबाई

अशा होत्या शांताबाई!!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares