? इंद्रधनुष्य ? 

☆ पुणेरी ताट… ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी “पुणेकरास” मेनू विषयी त्याचं मत मागितलं … त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर…

“मेनू साधारण असा असावा”

१. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू – त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण. 

२. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक…

३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.

६. “ओल्या नारळाची” कोथिंबीरीची चटणी, काकड़ी- शेंगदाणे कूट आणि दही घातलेली कोशिंबीर.

७. चवी पुरतं पंचामृत.

८. गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

९. मठ्ठा.

“आता काही सूचना…. लक्ष्य पूर्वक वाचा..”

  • आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
  • तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
  • श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये…
  •  आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही… श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही…
  • आळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये…
  • तसेच, खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
  • मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते ५ ते ६ मि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
  • वरणाची डाळ “एक-पात्रीच” हवी, नाहीतर चव बदलते.
  • पापड-कुरडई मरतुकडे नको…. त्याच्यातला “कुरकुरीतपणा” निघुन गेल्यास आमची “कुरकुर” सुरु होईल…
  • गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
  • ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी… तिखट नको… त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये…

 “आता पान वाढावयाच्या सूचना -“

१. पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..

२. पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे…

३. पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग “शून्य अंश” पकडून मीठ वाढावे आणि 

४. त्याच्या “उणे पाच अंशावर” लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे…

५. उणे ९० अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.

६. मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण “भसकन” वाढू नये… वरणाचा ओघळ नको… आणि त्यावर “साजूक तुपाची धार” हवीच… पण त्यासाठी जेवणार्यास वाट पहायला लावू नये… तुपाचा चमचा चांगला खोलगट असावा.. मागून चेपलेला अपेक्षित नाही.

७. मुदाचा आकार प्रमाणशीर असावा… “भसाडा नको…”

८. वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.

९. मसाले-भाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..

१०. आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.

११. उजव्या हाताला वरच्या बाजूला ४५ अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.

१२. आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.

वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास तुमच्या तुम्हीच दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये. आणि उपकार केल्यासारखा वाढप्याचा चेहरा असू नये.  

बस एवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या. 🙏

“काटेकोर” पुणेकर…

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted