श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘रवि’ला शिशिर नाही…” – भाग -२ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

(इथं संबंध येतो विद्वत्तेचा, व्यासंगाचा, नैपुण्याचा. हे तीन गुण तुमच्याकडं असतील आणि त्याला कार्यमग्नता, विवेक आणि सहृदयता या तीन स्वभाववैशिष्ट्यांची जोड असेल तर तुम्हाला नाकारणं हे जगासाठी सोपं नसतं. हे तीन गुण आणि तीन स्वभाववैशिष्ट्यं यांचं एकत्र रसायन असलेल्या एकाही व्यक्तिमत्वाला जग नाकारू शकलेलं नाही. स्वत:च्या व्यक्तिमत्वात ह्या सहा गोष्टी विकसित केलेली व्यक्ती स्वत:चं स्थान निर्माण करतेच.) 

इथून पुढे – – – 

साठच्या दशकात सचिन देव बर्मन, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, खय्याम, रोशन, सलील चौधरी, नौशाद असले एकाहून एक श्रेष्ठ संगीतकार आपापल्या प्रतिभेनं भारतीय चित्रपटसृष्टी गाजवत होते. रसिक आजही ती गाणी विसरू शकलेले नाहीत, इतकी गुणवान संगीतनिर्मिती होत होती. अशात नव्या माणसाचा शिरकाव होणं ही गोष्ट किती कठीण असेल याची कल्पना करून पाहिली तरी अंगावर सरसरून काटा येतो. समजा, एखादं काम मिळालं तरी त्याची गुणवत्ता कणभरानंही कमी असून चालणारच नाही, ही एक अलिखित जबाबदारीच होती. रसिकांची मनं आणि कान सर्वोत्तमाला सरावलेले होते, त्यांना सर्वसाधारण दर्जा सहन होण्यासारखी परिस्थितीच नव्हती. या सगळ्या वातावरणात जीवघेणी स्पर्धा नव्हती, एकमेकांचा पाय खेचण्याची कुणाची वृत्ती नव्हती. चित्रपटसृष्टीला घाणेरड्या राजकारणाचा स्पर्शही झालेला नव्हता. यातून स्वत:चं स्थान निर्माण करणारा आणि ते राखणारा संगीतकार खरोखरच विशेष मानला पाहिजे.

हेमंत कुमार यांचा सहायक संगीतकार म्हणून रवि यांनी शर्त, सम्राट, जागृति, नागिन, चंपाकली, दुर्गेश नंदिनी अशा चित्रपटांसाठी काम केलं. त्यातही ‘नागिन’ आणि त्या चित्रपटात वाजलेली बीन श्रोते अजूनही विसरू शकलेले नाहीत. ही किमया रवि यांचीच होती.

फिल्मिस्तान स्टुडिओ च्या अधिकारी वर्गाला ही चाल प्रचंड आवडली आणि त्यांनी २५० रूपये प्रति महिना पगाराची नोकरी रवि यांना देऊ केली. हेमंत कुमार सुद्धा त्यांना २०० रूपये पगार देऊ लागले होते.

याच दरम्यान हेमंतदांनी रवि यांना सुचवलं की, त्यांनी आता स्वत: स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरूवात करायला हवी. रवि घाबरून गेले. ‘आपली नोकरी गेली’ असं त्यांना वाटलं. पण हेमंतदांनी त्यांना समजावून सांगितलं की, “स्वतंत्रपणे काम केलं तरच मोठा संगीतकार होशील. ” हाच रवि यांच्या कारकीर्दीतला महत्वाचा क्षण होता.

एकेकाळी फूटपाथवर राहणाऱ्या या तरूणानं बी. आर. चोप्रा, रामानंद सागर, एस. डी. नारंग, देवेन्द्र गोयल, नाडियाडवाला, गुरुदत, ओ. पी. रल्हन सारख्या मोठमोठ्या चित्रपटनिर्मात्यांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम केलं.

अत्यंत विलक्षण गोष्ट अशी की, रवि यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण, तरीही शास्त्रीय रागदारीच्या आधारावर अवीट गोडीच्या श्रवणीय आणि निरंतर स्मरणात राहतील अशा शेकडो सुरावटी त्यांनी बांधल्या. संगीतकार म्हणून चार-चार पिढ्या श्रोत्यांच्या पहिल्या पसंतीत राहणं ही किमया रवि यांना साधली. त्यांच्या सुरावटी कालसुसंगत नसून भावसुसंगत आहेत. म्हणूनच, त्या काळाच्याही डोक्यावर पाय देऊन उभ्या आहेत.

‘कालजयी संगीतकार’ असा विचार करायचा झाला तर रवि ला त्यामध्ये अढळपदाचा मान आहे. काव्य आणि शायरी यांची उमज जितकी प्रगल्भ होती, तितकीच त्यांची प्रतिभासुद्धा उत्कृष्ट होती. म्हणूनच तर त्यांची गाणी गुणवत्तेच्या मापदंडांच्याही पलिकडे गेली आहेत.

गाण्यांचं संगीत संयोजन करण्याची रविची स्वत:ची अशी खास शैली होती. त्यांच्या शैलीवर अन्य कुणाचा प्रभाव दिसत नाही. जगावेगळं करून दाखवण्याचा अट्टाहास नसणं हेच तर रविचं बलस्थान होतं. गाण्यानं सर्वतोपरी त्याची स्वत:ची उंची गाठली, स्वत:चं अस्तित्व टिकवलं, आणि स्वत:चं सार्थक केलं, अशीच गाणी करणाऱ्या दुर्मिळ, मोजक्या संगीतकारांमध्ये रवि यांचं नाव आहे.

संगीतरचना करण्याची शैली आणि विशेषत: त्यातून माणसांच्या भावनांना थेट स्पर्श करण्याची हातोटी या कौशल्यात तर रवि अक्षरश: उस्ताद होते. सूर, शब्द, आणि कथानक यांची त्रिमिती जुळवताना त्यांनी ‘स्वर’ ही चौथी मिती सुद्धा इतक्या प्रभावीपणे वापरली की, रवि च्या गाण्यांमुळे अनेक गायक-गायिकांना त्यांची स्वत:ची अशी वेगळी ओळख मिळाली.

रविने केवळ संगीतकार म्हणूनच काम केलं असं नाही, त्यांनी गीतकार म्हणूनही काम केलं आणि गायक म्हणूनही काम केलं. आणि या तीनही भूमिकांमध्ये ते यशस्वी कलावंत म्हणून डौलानं विहरत राहिले.

चित्रपटउद्योगात त्यांचा कुणी गाॅडफादर नव्हता. त्यांनी आयुष्यात जे जे यश मिळवलं ते ते सगळं स्वत:च्या मेहनतीनं आणि प्रतिभेच्या जोरावर मिळवलं.

रवि यांची आणखी दोन महत्वाची वैशिष्ट्यं म्हणजे, एकाच चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी लोकप्रिय आहेत, असेच अनेक चित्रपट त्यांनी केले. आणि दुसरं म्हणजे, एकाच शब्दरचनेसाठी अनेक चाली करण्याचं त्यांचं अद्वितीय कौशल्य. ‘गुमराह’ सिनेमातल्या ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों’ या अजरामर गीतासाठी त्यांनी थोड्याथोडक्या नाही तर ३१ चाली केल्या होत्या.

‘चौदहवीं का चांद’, ‘घराना’, ‘चाइना टाउन’, ‘गुमराह’, ‘ख़ानदान’, ‘व़क्त’, ‘दो बदन’, ‘फूल और पत्थर’, ‘हमराज’, ‘आंखें’, ‘नील कमल’, ‘एक फूल दो माली’, ‘निकाह’ हे रवि यांनी संगीत दिलेले प्रमुख चित्रपट.

संपूर्ण कारकीर्दीमध्ये रवि यांना अनेक पुरस्कार मिळाले. पाच वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आणि त्यातील दोन वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७१ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. लता मंगेशकर पुरस्कार, कवि प्रदीप शिखर सम्मान, अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

वय वाढत जातं, वाढत्या वयाबरोबर विचारांमधली लवचिकताही कमी कमी होत जाते. पण रविच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. त्यांचं वय वाढत गेलं तरी त्यांच्या संगीताचं तारूण्य मात्र अक्षय राहिलं. हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीचे आयाम बदलत गेले. मनाचा ठाव घेणाऱ्या प्रभावी काव्यरचनांचं प्रमाण कमी कमी होत गेलं. चिंतनशीलता आटायला लागली. ‘झटपट काम अन् ढीगभर दाम’ हे सूत्र सगळेचजण सर्रास वापरायला लागले. गुणवत्तेशी एवढी मोठी तडजोड करणं रवि यांच्या स्वभावात बसणारी गोष्टच नव्हती. साहजिकच, ते प्रसिद्धीपासून दूर होत गेले. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांकरिता संगीत दिग्दर्शन सुरू केलं. तिथंही त्यांची प्रतिभा तळपत राहिली. मल्याळी सिनेसृष्टीमधल्या अग्रगण्य संगीत दिग्दर्शकांमध्ये ते ‘बाॅम्बे रवि’ या नावानं ख्यातकीर्त आहेत.

दीर्घ आजारानं ७ मार्च, २०१२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आज रविजी विद्यमान नाहीत. पण, अंगभूत क्षमतेच्या बळावर अमरत्व मिळवता येतं, हा त्यांनी घालून दिलेला वस्तुपाठ मात्र प्रत्येकानं मनावर कोरून ठेवावा, असा आहे….!

– समाप्त – 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted