श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘शिशिराचा श्वास.. उत्तरायणाची कुजबूज…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
२१ डिसेंबरच्या पहाटे, क्षितिजावर उगवणारा सूर्य जणू दीर्घ श्वास घेत उत्तर दिशेकडे वळू लागतो. त्या सूक्ष्म वळणाबरोबरच उत्तरायणाची सौम्य चाहूल पृथ्वीच्या उरात अलगद उतरते. थकलेल्या मातीला नवी उमेद मिळते आणि शिशिर ऋतू आपल्या शीतल पदराने साऱ्या सृष्टीला मायेनं कवेत घेतो. वातावरणात एक अलक्षित शांतता नांदू लागते. थंडगार वाऱ्याच्या कुजबुजीतून ऋतूचं आगमन सांगणारी हळवी साद ऐकू येते.
“ऋतवः षट्, जीवनस्य लयाः।”
ऋतू म्हणजे जीवनाच्या सहा नाजूक लयीच होत.
शिशिरातील गारवा अंगाला झोंबतो खरा, पण मनाला मात्र प्रसन्नतेची ऊब देतो. पहाटे पसरलेलं धुकं जणू निसर्गाचं स्वप्न असतं; गवतावर साचलेले दवबिंदू त्या स्वप्नावर चमकणारे मोती. निळसर, स्वच्छ आकाशात एक अलौकिक निर्मळता दडलेली असते. झाडांची पानगळ सुरू होते. हिरव्या आठवणींचा शांत निरोप आणि कोरड्या पानांची सळसळ. ही पानगळ मृत्यूची नाही; ती नव्या अंकुरांच्या स्वागताची मूक सिद्धता असते!
“न हि नाशोऽस्ति पल्लवानाम्, पतनं पुनरुत्थानाय।”
पानगळ म्हणजे नाश नव्हे; ती नव्या जीवनाची नांदी असते.
हवेत शुष्कता वाढते. ओठ कोरडे पडतात, त्वचा ताणली जाते, आणि माणूस निसर्गाशी अधिक सजग नातं जोडू लागतो. याच कोरडेपणातून आरोग्याची शिस्त जन्माला येते. तेल, तूप, स्निग्धता आणि उष्णतेचे मोल कळते—जणू शरीर स्वतःच आपली काळजी कशी घ्यावी, हे शिकवू लागते.
“आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः।”
आहार शुद्ध झाला, की मनही निर्मळ होते.
शिशिर ऋतू म्हणजे फळा- शाकभाज्यांचा उत्सवच! गाजरांचा लालिमा, संत्र्यांची सुगंधी आंबटगोडी, डाळिंबातील टपोऱी माणकं, आवळ्याची तुरट चव, या साऱ्या-साऱ्यांत आरोग्याचा अमृतरस भरलेला असतो. तीळ, गूळ, शेंगदाणे आणि सुकामेवा यांपासून घडणारे लाडू, चिक्की आणि हलवे हे पदार्थ शरीराला ऊब देतात, आणि मनात उत्साहाची गोड लहर जागवतात.
प्रांताप्रांतांची खाद्यसंस्कृती शिशिरात अधिक खुलून येते. महाराष्ट्रात तीळगुळाचा गोडवा आणि पुरणपोळीचा दरवळ; उत्तर भारतात तव्यावर फुलणारे पराठे आणि सरसों का साग; पंजाबमधे मक्केकी रोटीची धग; दक्षिणेत उकडलेल्या पदार्थांची साधी पण पौष्टिक ऊब.
प्रत्येक प्रदेश आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण पाककौशल्यातून आणि जिव्हालालव्यातून शिशिराशी संवाद साधतो.
पशुपक्षीही ऋतूच्या लयीशी आपले जीवनगान जुळवतात. खगांचे थवे दूरवर स्थलांतर करतात, जनावरे ऊबदार आश्रय शोधतात, आणि मानव शीत निवारणासाठी लोकरीच्या वस्त्रांत स्वतःला गुंडाळतो. शाल, स्वेटर, टोपी यांतून त्याला बाह्य ऊब मिळते. गडद, विविधरंगी वस्त्रांत फिरणारी माणसं पाहिली की जणू उद्यानातील फुलांचे ताटवेच चालू लागल्याचा भास होतो!
शिशिर ऋतू सण-उत्सवांनीही नटलेला असतो. मकरसंक्रांत उत्तरायणाचे स्वागत करते. “तीळगुळ घ्या, गोड गोड बोला”
या साध्या वाक्यातून समाजमनात माणुसकीचा गोडवा पसरतो. निरभ्र आकाशात विविध रंगांचे, आकारांचे पतंग रंगीबेरंगी स्वप्नांसारखे उडतात. घराघरांत गूळ-तीळाचा सुगंध नात्यांना घट्ट बांधतो.
“माधुर्यं भूषणं वाचा।”
गोडवा हीच वाणीची खरी शोभा आहे.
शिशिर म्हणजे केवळ थंडीची चाहूल नव्हे; तो अंतर्मुख होण्याचा काळ आहे. निसर्ग जसा शांत होतो, तसाच माणूसही स्वतःकडे वळतो. उत्तरायणाचा सूर्य जसा हळूहळू उंचावतो, तसतशी जीवनात आशेची किरणे वाढू लागतात.
शिशिर आपल्याला शिकवतो…
थंडीतही ऊब निर्माण करता येते, कोरडेपणातही स्नेहयुक्त गोडवा फुलवता येतो. वृक्षांवरून गरगरत भूमीवर पडणारी पानगळ सांगते, हा अंत नव्हे; यानंतर वसंत फुलणार आहे, नवा आरंभ होणार आहे, नव्हे तो अटळ आहे. जीवन हा अखंड प्रवाह आहे.
शिशिर ऋतू नुसते ऋतुपरिवर्तनाचे संकेत देत नाही, तर जीवनाचे सूक्ष्म तत्त्वज्ञान उलगडतो. पानगळ जशी त्या वृक्षांना जीर्ण पर्णसंभार ढाळून हलके करते, तशीच आसक्ती, अहंकार आणि अनावश्यक ओझी गळून पडली, तर जीवन अधिक निर्मळ होते. थंडीत ऊब जितकी मोलाची वाटते, तितकीच कठीण काळी प्रेम, करुणा आणि माणुसकीची ऊब आवश्यक ठरते.
“तमसो मा ज्योतिर्गमय।”
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रवासच जीवन आहे.
उत्तरायणाचा सूर्य अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रवासाचे प्रतीक आहे. तो सांगतो, जडत्व, निराशा आणि थकव्याच्या कठीण काळानंतर आशा, चैतन्य आणि उन्नती नक्कीच येते. शिशिरातील शिस्तबद्ध आहार-विहार जसा शरीराला बळ देतो, तशीच संयम, संतुलन आणि आत्मचिंतनाची साधना मनाला स्थैर्य देते.
निसर्ग आपल्याला थांबायला शिकवतो, साठवायला शिकवतो, त्यागायलाही शिकवतो. योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतो. प्रत्येक ऋतूचा स्वीकार केल्यास जीवनातील प्रत्येक टप्पा अर्थपूर्ण ठरतो. शिशिर म्हणजे अंत नव्हे, तो नव्या वसंताची शांत, संयत आणि आशादायी सिद्धता आहे.
म्हणूनच शिशिर आपल्याला सांगतो, बाह्य थंडीपासून स्वतःचे रक्षण करताना अंतर्मनातील सूर्य प्रज्वलित ठेवावा. कारण जेव्हा आत प्रकाश उगवतो, तेव्हा बाहेरचे ऋतू कितीही कठोरकर्कश असले, तरी जीवन उबदार, अर्थपूर्ण आणि तेजस्वीच राहते!
🙏🏽🙏🏽🙏🏽
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





