श्री मनोहर जांबोटकर
वाचताना वेचलेले
☆ अनावधानाचे ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
दररोज रात्री झोपण्यापूर्वी तन मन धन आपल्या आराध्याला अर्पून डोळे मिटून त्याला समर्पण करावं.
रात्रीची झोप आणि सकाळी जागं होणं…ही फक्त रोज घडणारी शारीरिक क्रिया नाहीये, त्यात एक गूढ अध्यात्म दडलं आहे.
दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्या इच्छा”, “माझी धडपड” यात गुरफटलेला मनुष्य जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा नकळत सगळं सोडून देतो.
पद, पैसा, चिंता, यश, अपयश, नाती, अहंकार — काहीच हातात राहत नाही. झोप म्हणजे एका अर्थाने दररोज अनुभवलेलं छोटंसं ‘ध्यानच’ असते. ध्यानात जसं मन बाहेरच्या जगापासून बाजूला होऊन निरामय शांततेत उतरतं, तसं झोपेतही घडतं. फरक एवढाच की ध्यानात आपण जाणीवपूर्वक शांततेकडे जातो आणि झोपेत निसर्ग आपल्याला त्या शांततेत अलगद घेऊन जातो.
कदाचित म्हणूनच गाढ झोप ही इतकी सुखद वाटते, कारण त्या क्षणी मनुष्य अहंकारातून पूर्णतः पण थोडावेळच बाहेर आलेला असतो.
ना कालची खंत असते, ना उद्याची भीती…फक्त एक शांत अस्तित्व.
मग पहाटे जेव्हा जाग येते आणि आपले डोळे उघडतात, श्वास सुरू असतोच, सूर्य पुन्हा खिडकीतून डोकावणार असतो, तेव्हा आपल्या संस्कारित मनाला जाणवतं ही फक्त जाग नाही, ही कृपा आहे. आपण रात्री स्वतःला पूर्णपणे अज्ञाताच्या स्वाधीन करतो आणि सकाळी पुन्हा जागे होतो यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठं आश्चर्य दुसरं कोणतं? खरं म्हणजे हीच ती ईश्वरी कृपा आहे, असते, असेल.
अध्यात्म कदाचित ह्याच एका जाणिवेपासून सुरू होत असावं की जीवनावर आपला ताबा नाही, फक्त सहभाग आहे. आपण मालक नाही, निमित्त आहोत.
प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवसाची सुरुवात नसते; ती अस्तित्वाने दिलेली एक हळूवार आठवण असते
“ अजून तुझं कार्य संपलेलं नाही.”
जो मनुष्य रात्री झोपताना समर्पण आणि सकाळी उठताना कृतज्ञता अनुभवतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस साधनेसारखा होतो. त्याला उमगू लागतं – झोप ही केवळ विश्रांती नाही, आणि उठून बसणं ही केवळ दिनचर्या नाही…तो दररोज घडणारा एक अदृश्य आध्यात्मिक चमत्कार आहे.
ह्याची जाण ज्याला आली तो अध्यात्म तरला असेच म्हणावे लागेल.
*
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




