शामला पालेकर
वाचताना वेचलेले
☆ “एका रुपयाची किंमत!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सुब्रोतो नावाचा, वीस वर्षाचा एक मुलगा होता, जो कलकत्त्यातील एका कॉलनीमध्ये राहात होता.
त्याचे वडील एक भट्टी चालवत असत, जिथे ते दूध तापवून त्यापासून खवा बनवण्याचे काम करत असत.
सुब्रोतो खरं तर एक चांगला मुलगा होता, परंतु त्याला अनावश्यक खर्च करण्याची एक वाईट सवय होती. तो नेहमीच वडिलांकडे पैसे मागत असे आणि ते खाण्यापिण्यामध्ये आणि सिनेमा बघण्यामध्ये खर्च करत असे.
एके दिवशी वडिलांनी सुब्रोतोला बोलावले आणि म्हणाले, “”हे बघ बाळा, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे तुला आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. हे रोज उठून, तू माझ्याकडे पैसे मागतोस आणि ते इकडे तिकडे उडवतोस, ही चांगली गोष्ट नाही.”
“काय बाबा! कुठे मी तुमच्याकडे हजारों रुपये मागितले आहेत?फक्त काही रुपयांसाठी तुम्ही मला एवढे लेक्चर देत आहात? एवढेसे रुपये, तर मी कधी पण तुम्हाला परत करू शकतो.” सुब्रोतो जरा वैतागून म्हणणला.
सुब्रोतोचे बोलणे ऐकून वडील विचलित झाले, परंतु त्यांना कळून चुकले की, धाकदपटशाहीने ही गोष्ट त्याला समजणार नाही. म्हणून ते म्हणाले, “”ही तर खूप चांगली गोष्ट आहे… असे कर की, तू मला जास्त नाही, फक्त एक रुपया रोज आणून देत जा.”
सुब्रोतो हसला आणि जणू काही मी जिंकलो, या आविर्भावात तो तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुब्रोतो जेव्हा वडिलांकडे आला, तेव्हा त्याला बघताच वडील म्हणाले, “बाळा, आण माझा एक रुपया.”
त्यांचे बोलणे ऐकून सुब्रोतो जरा घाबरला, आणि लगेच आपल्या आजीकडून एक रुपया घेऊन आला.
“घ्या बाबा, मी घेऊन आलो तुमचा एक रुपया,” असे म्हणून त्याने ते नाणे वडिलांच्या हातात दिले.
वडिलांनी ते नाणे घेतले आणि भट्टीमध्ये फेकून दिले.
“हे काय, तुम्ही असे का केले?”” सुब्रोतोने वैतागून विचारले.
वडील म्हणाले, “तुला काय करायचे आहे? तुला फक्त एक रुपया देण्याशी मतलब असला पाहिजे. मग मी त्याचे काहीही करू शकतो.”
सुब्रोतोने पण जास्त वाद घातला नाही आणि तो तिथून गुपचूप निघून गेला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा वडिलांनी त्याच्याकडे एक रुपया मागितला, तेव्हा त्याने आपल्या आईकडून एक रुपया घेऊन त्यांना दिला… बरेच दिवसांपर्यंत हाच क्रम चालू राहिला. तो रोज कुणा मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून एक रुपया घेई, आणि वडिलांना देई आणि वडील ते नाणे भट्टीमध्ये फेकून देत.
नंतर एक दिवस असा आला की, ज्यावेळी प्रत्येक जणांनी त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला. सुब्रोतोला काळजी वाटली, की आता तो वडिलांना एक रुपया कुठून आणून देणार.
संध्याकाळ होत आली होती, त्याला काही समजत नव्हते की आता काय करावे! एक रुपया, न देण्याची नामुष्की त्याला सहन होणारी नव्हती. त्यावेळीच त्याला रस्त्यावर एक वयस्कर मजूर दिसला, जो एका प्रवाशाला सायकल-रिक्षात बसवून घेऊन जात होता.
“ऐका दादा, काही वेळासाठी तुम्ही मला ही रिक्षा ओढू द्याल का? त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडून फक्त एक रुपया घेईन,”सुब्रोतो रिक्षावाल्याला म्हणाला.
रिक्षावाला खूप थकून गेला होता, त्यामुळे तो लगेच तयार झाला.
सुब्रोतो रिक्षा ओढू लागला.हे काम त्याला वाटत होते, त्यापेक्षा खूप कठीण होते… थोडे अंतर ओढल्यानंतरच त्याच्या हाताला घट्टे पडले, आणि पाय पण दुखू लागले! कसेतरी त्याने आपले काम पूर्ण केले आणि त्याच्या मोबदल्यात जीवनात पहिल्यांदाच स्वतःहून एक रुपया कमविला.
आज मोठ्या गर्वाने तो वडिलांकडे गेला आणि त्यांच्या हातावर एक रुपया ठेवला. रोजच्याप्रमाणे वडिलांनी रुपया घेऊन तो भट्टीत फेकण्यासाठी हात उचलला.
“थांबा बाबा!”सुब्रोतो वडिलांचा हात धरत म्हणाला, “तुम्ही हा फेकू शकत नाही! ही माझ्या मेहनतीची कमाई आहे.”” आणि सुब्रोतोने त्यांना घडलेली पूर्ण गोष्ट सांगितली.
वडील पुढे झाले आणि आपल्या मुलाला त्यांनी घट्ट आलिंगन दिले.
“बघ बेटा! इतके दिवस मी नाणी आगीत फेकत होतो, परंतु एकदाही तू मला थांबवले नाहीस. परंतु, आज जेव्हा तू स्वतःच्या मेहनतीची कमाई आगीमध्ये पडताना बघितलीस,तर एकदम ओरडलास. अशा प्रकारे, जेव्हा तू माझ्या मेहनतीची कमाई नको त्या गोष्टींमध्ये उडवतोस, त्यावेळेस मला पण तेवढेच दुःख होते. मी पण उदास होतो… म्हणूनच पैशाची किंमत समजून घे.जरी ते तुझे असू देत किंवा दुसऱ्या कोणाचे, कधीही अनाठायी खर्च करून, त्यांना नष्ट करू नकोस!”
सुब्रोतोला वडिलांनी सांगितलेली गोष्ट समजली. त्याने लगेच वडिलांना वाकून नमस्कार केला आणि आपल्या चुकीच्या व्यवहाराबद्दल क्षमा मागितली. आज त्याला एका रुपयाची किंमत समजली होती आणि त्याने मनातल्या मनात संकल्प केला की, आता तो कधीही पैशाचा अपव्यय करणार नाही.
मित्रांनो, हे तर आपल्याला कळले एका रुपयाचे महत्त्व, परंतु प्रत्येक क्षणी आपल्याला जे निसर्गाकडून फुकटात मिळत आहे, ज्याशिवाय आपण एक क्षणसुध्दा जिवंत राहू शकत नाही, तर आपण त्याची किंमत कधी चुकवू शकू का?
जर नाही, तर हे जीवन देणाऱ्याच्या प्रति, आपण प्रत्येक क्षणी कृतज्ञ होऊ शकतो का!
आपण आपल्याला मिळालेल्या संसाधनांचा उपयोग कसा करतो, ते आपलं चारित्र्य दर्शवत असते. आपली ही संसाधने आपलं अंतर्गत व्यक्तिमत्व आहे, जसे मन, बुद्धी, अहंकार… नंतर मग वेळ आणि बाहेरील संसाधने जसे संपत्ती, शक्ती इत्यादी. आपण त्यांचा उपयोग खऱ्या उद्देशासाठी सर्वोत्कृष्ट रीतीने केला पाहिजे.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




