? वाचताना वेचलेले ??‍?

☆ कोणाचं घरटं मोडू नका ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

 ( सत्य घटना )

टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग !—

एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.

जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं.  त्यांना वाटायला लागलं की आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.

गाड्या थांबल्या. त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले. तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता. त्याला बोलावलं. तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ती आलीय ,हे त्यानी ओळखलंच. त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं. त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.  “दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे.”

यावर तो मुलगा म्हणाला , “सरजी, पैशाचा सवालच नाहीए.  कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही.”

“का रे बाबा?”

“त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत. सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल, ते माझ्याच्यानं पाहवणार नाही. कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी.”

हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.

शेषन् म्हणाले, “कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. माझं पद, माझी पदवी, उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला. जे शिक्षण, संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत, ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.”.

 

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments