श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

🌸 विविधा 🌸

☆ छत्रपती शिवरायांना पत्र… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

दिनांक –          

राजे,

साष्टांग नमस्कार!

आज तुम्हाला माझ्या मनातील विचार सांगावेसे वाटते म्हणून हा पत्र प्रपंच करीत आहे. खरंतर राजे, तुमची आठवण ही पदोपदी येत असते. पण आज पत्रातून व्यक्त होण्याचे वेगळेच कारण आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना एका उदात्त हेतूने करून तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता जागृत केलीत. कित्येक वर्षे असलेल्या परकीय राजसत्तांच्या जुलमी जोखडातून जनतेला मुक्त करून त्यांच्यात ‘स्व’ ची जाणीव करून दिलीत. आपण जे आदर्श हिंदवी राष्ट्र निर्माण केलेत, ते टिकवण्याची, त्याचा लौकिक वाढवण्याची जबाबदारी खरं तर आम्हा सर्व नागरिकांची आहे.

पण राजे, आज समाजातील अनेक घटना या मन उद्विग्न करणाऱ्या आहेत. या गोष्टींवर कोणाचातरी वचक रहायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. खरंतर आपली लोकशाही शासनव्यवस्था जगामध्ये श्रेष्ठ आहे. पण तरीसुद्धा यातील कायद्यांना अनेक पळवाटा असल्याने गुन्हेगारीवर हवा तसा अंकुश राहताना दिसत नाही. कित्येक वर्षे गुन्हेगार मोकाट फिरत असतात.

महाराज, आपली शासन व्यवस्था किती महान होती! आपण आपल्या उण्यापुऱ्या तीस वर्षात सार्वभौम सिंहासनाची स्थापना करून दाखवली. यावेळी अनेक संघर्ष आपल्याला करावे लागले. पण हा आपला संघर्ष कुण्या जातीशी वा धर्माशी नव्हताच मुळी! तो संघर्ष अन्यायाविरुद्ध होता. तो संघर्ष वाईट प्रथांविरुद्ध होता, झुंडशाहीविरुद्ध होता. पण खेदाने म्हणावेसे वाटते की आपले ते उदात्त विचार आज पायदळी तुडवले जात आहेत. आताच्या लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्रात जाती-जातीमध्ये भेदभाव केला जात आहे. धर्मावरून राजकारण केले जात आहे. लव जिहाद, धर्मांतरण यासारख्या घटनांमुळे आज समाज व्यवस्था पोखरून निघाली आहे. धर्मनिरपेक्ष देशात शुल्लक कारणांवरून धार्मिक तेढ निर्माण करून जाळपोळ, बंद, हिंसा इत्यादी गोष्टी केल्या जातात. यातून सामान्य माणूस हा पुरता हतबल होऊन जातो. कायदा सर्वांना समान असूनही राजकीय पुढा-यांच्या मतलबी राजकारणामुळे हा संघर्ष धुमसतच राहताना दिसतो. आपल्याच बांधवांमध्ये धार्मिक तेढ निर्माण केली जाते. म्हणूनच महाराज आज आपली खरी गरज आहे.

राजे, चारित्र्याशिवाय चरित्र निर्माण होत नसते. आपले चारित्र्य आपल्या व्यक्तिगत जीवनासह प्रशासकीय कारभारातून प्रकट झालेले आहे. आपण स्वराज्यासाठी शत्रूवर आक्रमण करत असताना आपल्या सैनिकांना परस्त्री बाबत, लेकी सुनांबाबत दिलेली ताकीद आज प्रकर्षाने जाणवत असते. ज्यावेळी तुमच्या सैनिकांनी एका परस्त्रीला लुटून आणले होते, त्यावेळी आपण म्हणाला होता, “अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती,……. ” केवढे आपले उदात्त विचार! आणखी एका प्रसंगात परस्त्रीला त्रास देणाऱ्या एका पाटलाला सुद्धा आपण जबर शासन करून आपला एक धाक निर्माण केला होता. पण महाराज आपण आपल्या वागण्यातून एवढा मोठा आदर्श ठेवूनही आज बदलापूर सारखी परिस्थिती का बरं निर्माण होते? आज कित्येक शहरांमध्ये स्त्रियांवर अत्याचार का बरे होताना दिसतात? त्यांना आपल्या सुरक्षेची चिंता का बरे वाटत राहते? वासनेच्या आहारी गेलेल्या नजरा आमच्या माता भगिनींवर ठिकठिकाणी रोखल्या जातात. खरंच महाराज, आज आपण असता तर अशा वासनांध नजरा किंवा बरबटलेले हात आपण नक्कीच छाटून टाकले असते. महाराज म्हणूनच मी तुम्हाला विनवतो, आपण परत या.

महाराज, आपण वतनदारी बंद केलीत. कारण सरदार, प्रशासक यांना कोणत्याही भ्रष्टाचारापासून दूर ठेवले जावे. आपण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नव्हता. पण आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. टक्केवारीची कीड समाज पोखरून टाकत आहे. प्रशासनातील अधिकारी असो अथवा राजकीय पुढारी असो प्रत्येक जण आपली खळगी भरण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे.

राजे, या भ्रष्टाचारी व्यवस्थेतून आपणही सुटू शकला नाहीत. हे कशाचे द्योतक मानावे बरे? पुतळा दुर्घटनेने या गोष्टीचा साऱ्या जगाने अनुभव घेतला. आपल्या मूर्तीचा फक्त वापर केला जातो. पण आपली कीर्ती डोळ्यासमोर ठेवून लोक वागत नाही याचे फार दुःख वाटते.

महाराज, आपले कार्य हे प्रकृतीविरुद्ध विकृतीच्या संघर्षात प्रकृतीच्या पुनर्स्थापनेसाठी, स्वातंत्र्य व गुलामगीरीच्या संघर्षात स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यासाठी व निरपेक्ष धर्मनिष्ठेचा आदर्श घालून देण्यासाठी होते. मग आपले चरीत्र वाचूनही आजचे राज्यकर्ते हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कधी बरं वागतील?

राजे, आज आपल्याशी पत्ररुपाने बोलून थोडं मन हलकं केलं. आपले विचार, आपले आदर्श समाजात रुजविण्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्या.

आपलाच,

एक शिवभक्त.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted