श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ८१ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मनात विचार होते ते आता त्यांच्याशी काय बोलायचं याचेच. मनातली हतबलता कधीच विरून गेली होती. अनिश्चिततेचा तर लवलेशही नव्हता. हीच पुढे घडू पहाणाऱ्या चमत्काराची सुरूवात आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाही नव्हती!)
सहस्त्रबुद्धे आजोबांनीच दार उघडलं. ‘या’ म्हणाले आणि लगबगीने आत गेले. वेळेचा अंदाज घ्यायला मी माझ्या हातातल्या घड्याळकडं पाहिलं त्याच वेळी पाण्याचं तांब्या-भांडं घेऊन बाहेर आलेल्या आजोबांच्या ते नेमकं लक्षात आलं.
“गेले तीन दिवस अशीच वेळेची सर्कस चाललेय तुमची. मी फार त्रास देत नाहीय ना तुम्हाला?”
“अजिबातच नाही. उलट खूप वेळ घेऊन येता आलं असतं तर तेच मला जास्त आवडलं असतं. ” मी मनापासून म्हणालो. आणि ते खरंही होतं. केवळ बँक स्टाफच्या आत्मकेंद्री विचारांमुळे ग्राहक कसे दुखावले जातात आणि बॅंक-व्यवस्थापनालाही त्याचा किती मनस्ताप होत असतो याचा खूप काही शिकवून जाणारा अनुभव बँकिंग क्षेत्रामधल्या माझ्या तोवरच्या दीर्घ वाटचालीत मी प्रथमच घेत होतो. त्यामुळेच त्यादिवशीच्या कटू घटनेमुळे दुखावल्या गेलेल्या सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणंही आवश्यक आहे असंच मला वाटत होतं.
सहस्त्रबुद्धे आजोबांबद्दल मला कितीही सहानुभूती वाटत असली तरी केवळ त्यांच्या समाधानासाठी मी प्रभूदेसाईंना अतिशय कठोर शिक्षा करू शकणार नव्हतो आणि म्हणूनच आजोबांना अपेक्षित असणारा न्यायही मला देता येणार नव्हता. कारण प्रभूदेसाईंना शिक्षा करायची तर बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर आरोप ठेवून तो पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाचाच एक भाग म्हणून माझ्यावरच येणार होती. त्यामुळे सहस्त्रबुद्धे आजोबांचं समाधान करायचं तर त्यांना प्रोसेसमधील या अडथळ्यांची जाणीव करून देणं जेवढं आवश्यक होतं तेवढंच अडचणीचंही ठरू शकणार होतं. कारण आजोबा ते ऐकून दुखावले, अस्वस्थ झाले, चिडले तर सगळ्याच प्रकरणाला नकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ज्या उद्देशाने हे सगळंच प्रकरण आम्ही धसाला लावलं होतं तो उद्देशही पूर्ण झाला नसता ते वेगळंच. त्यामुळे परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळणं आवश्यक होतं. बोलण्यातल्या कौशल्यापेक्षा आजोबांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधणं गरजेचं आहे असा विचार मी केला. गेल्या तीन दिवसात वेळोवेळी या प्रकरणाबद्दल माझ्या मनात जे जे विचार येऊन गेले ते सगळे अतिशय निखळ स्वरूपात आजोबांपुढे व्यक्त करून त्या पार्श्वभूमीवर यापुढे त्यांनी काय करणं आपल्याला अपेक्षित आहे हेही अतिशय स्पष्ट शब्दात त्यांना सूचवणं हाच एकमेव मार्ग मला योग्य वाटला. याच्या परिणामतः येणारं यशापयश ‘त्या’च्यावर सोपवून मी बोलायला सुरूवात केली.
“आजोबा, खरं सांगायचं तर या सगळ्या प्रकरणाबद्दलचेच विचार गेले तीन दिवस माझ्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. तुमच्या दुखावलेल्या भावना, तुम्हाला झालेला मनस्ताप, आणि त्यामुळे तुमच्यासारख्या वयोवृध्द ग्राहकाच्या मनातली बॅंकेची प्रतिमा डागाळली गेल्याच्या विचाराचाच मला खूप त्रास होतोय. खरंतर ग्राहकाला बॅंकेत तत्पर आणि चांगली सेवा मिळावी यासाठी सर्वच बॅंकांमधे काटेकोर नियम आहेत. एखाद्या ग्राहकाने तक्रार केली तर त्याचं तत्परतेने निराकरण होतेय कीं नाही हे पहाण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही कार्यरत आहे. खरं सांगायचं तर यामुळेच निर्माण होऊ पहाणारी तक्रार शक्यतो ब्रॅंचपातळीवरच योग्य पध्दतीने हाताळून त्याचं निराकरण करण्याचाच प्रयत्न बहुतेक ब्रॅंचमॅनेजर्स करीत असल्याने स्थानिक पातळीवरच त्याची दखल घेतली जाते.
प्रभूदेसाईंच्या बाबतीत मात्र जे घडलं ते खरंच त्यांच्यासारख्या सूज्ञ माणसांकडून कधीच अपेक्षित नाहीय. ही नकळत झालेली चूक नाहीये. आमच्या साहेबांशी बोलतानाही मी त्यांना जे सांगितलं होतं तेच आज तुम्हालाही सांगतो. ब्रॅंच मॅनेजरच्या दृष्टीने मोठ्या रकमांची डिपॉझिट्स बँकेत ठेवणारे खातेदार हेच महत्त्वपूर्ण ग्राहक असा अपवादात्मक कां असेना पण कांही मॅनेजर्सचा चुकीचा समज असतो. कदाचित त्या दिवशी समोर बसलेल्या अशाच एका कस्टमरला तत्पर सेवा देताना कोणताही अडथळा मधे येऊ नये असा प्रयत्न करत असतानाच प्रभूदेसाईंनी दुसऱ्या ग्राहकावर आपल्याकडून अन्याय होऊ नये याचीही काळजी, केवळ ते ब्रॅंच मॅनेजर होते म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही घ्यायला हवी होती असंच मला वाटतं. विशेषतः तुम्ही बराच वेळ बाहेर ताटकळत बसलाय हे त्यांच्या लक्षातही न येणं हेच चुकीचं होतं. तुम्ही आपणहोऊन पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा केबिनमधे गेलात तेव्हा निदान तिथेच बसलेल्या दुसऱ्या ग्राहकासमोर तरी त्यांनी तुमचं हसतमुखानं स्वागत करून नेमकं काय काम आहे हे विचारून घ्यायला हवंच होतं. एरवी इंटरकाॅमवरून अकाऊंटंना पूर्वकल्पना देऊन तुम्हाला त्यांच्याकडेही ते पाठवू शकले असते. तुमचं एक अगदी साधं काम हातावेगळं करण्यासाठी फक्त दोन मिनिटंही पुरेशी ठरली असती. असं असताना त्यांना ते करावंसं न वाटणं हेच आक्षेपार्ह आहे.
ज्या मन:स्थितीत तुम्ही बॅंकेत आला होतात त्याचा विचार करता प्रभूदेसाईंच्या वागण्या-बोलण्यावरील तुमच्या प्रतिक्रिया कितीही टोकाच्या असल्या तरी त्या नैसर्गिक आणि अपरिहार्य अशाच होत्या… “
ते लक्षपूर्वक ऐकत होते. मी बोलायचं थांबलो तसं भानावर येत त्यांनी चमकून माझ्याकडं पाहिलं. त्यांची ओलसर नजर पाहून मला पुढं काय बोलावं सुचेचना.
“… हे सगळं पुन्हा आठवताना, ऐकताना तुम्हालाही खूप त्रास होतोय हे समजतंय मला आजोबा. पण असं असूनही तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी तुमचं पूर्ण समाधान होईल असं मी काय करायला हवं तेच मला समजत नाहीय ” मी म्हणालो.
” म्हणजे?”
“प्रभूदेसाईंना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून तुम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. असं वाटणं यात गैर कांहीच नाही. पण तुम्ही थोडं समजूतीनं घेतलंत तर तुमच्या दृष्टीनं यातून समाधानकारक मार्ग कसा निघेल याचा विचार आपण करू शकू असं मला वाटतं. “
“सबुरीनं घ्यायचं म्हणजे काय करायचं?”
“कोणत्याही कर्मचाऱ्यांने नकळत किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कुठल्याही चुकीची त्याला काय शिक्षा करायची याचे बँकांचे काही नियम आहेत आणि त्यासाठीची ठराविक प्रोसेसही. त्या बाहेर न जाता प्रभूदेसाईंना त्यांच्याकडून झालेल्या चुकीची स्पष्ट शब्दात कल्पना देऊन त्यांच्या बाबतीत नेमकी काय ॲक्शन घ्यायची हे ठरवावं लागेल. हे सगळं शक्यतो झोनल ऑफिसच्या पातळीवरच झालं तर लगेच अंमलात आणता येऊ शकेल. सर्व अहवाल सेंट्रल ऑफिसला पाठवून त्यांची अनुमती घ्यायची तर त्या प्रोसेसला बराच वेळही लागू शकेल. या दोन्हीपैकी जे करायचं ते तुमचं समाधान होईल असं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. पण जे कांही ठरेल त्याचा अंतिम निर्णय अर्थातच आमच्या डी. जी. एम्. साहेबांचाच असेल. तरीही त्याची पूर्वकल्पना तुम्हाला देऊन तुमची संमती घेण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. “
“ठीक आहे. जे ठरेल ते सांगा मला. त्यानंतर काय करायचं ते मी पाहिन. ” आजोबा कांहीशा नाराजीने म्हणाले.
मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो. पण ही अनिश्चितता अशीच सोबत घेऊन जाणं मला नको होतं. विषय पूर्णतः संपायला हवा होता आणि या क्षणापर्यंत तरी आजोबांचा अॅप्रोच मला निश्चिंत करणारा वाटत नव्हता. मी जाता जाता क्षणभर थबकलो. आजोबा माझ्याकडेच पहात होते.
“जाण्यापूर्वी एकच सांगायचंय. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. अनुभवी आहात. खरंतर मी तुम्हाला कांही सांगणं योग्य आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही भाविक आहात, दत्त महाराजांच्यावर तुमची श्रद्धा आहे याची मला कल्पना असल्यानेच हे सांगावंसं वाटतंय म्हणून सांगतो.. “
त्यांनी मला आत येऊन बसायची खूण केली. निसटू पहाणारा क्षण जणू अकल्पितपणे क्षणभर थबकला होता. तो घट्ट धरून ठेवत मी ‘त्या’नेच प्रेरणा द्यावी तसं बोलू लागलो….
“कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा, चुकीबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार केवळ व्यवस्थेचा एक भाग म्हणून माणसाने स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे नियम ठरवलेले आहेत. त्या नियमांप्रमाणे घेतलेला निर्णय सर्वार्थाने न्याय देणारा असतोच असं नाही. पण या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असते. सोप्या भाषेत आपण ज्याला ‘देव’ म्हणतो त्या देवाची यंत्रणा. तो पहात असतो सगळं. आणि प्रत्येक क्षणी घडणाऱ्या घटनांचा साक्षीदारही तोच असतो. न्याय देणारा जसा तो तसाच अन्यायाचं निवारण करणाराही तोच. त्या देवाच्या काठीला आवाज नसतो. पण अतिशय योग्य पद्धतीने, कुणाच्याही नकळत, कसलाही गाजावाजा न करता, त्या काठीने होणारा न्यायनिवाडा हा अन्यायचं निराकरण करणारा, अन्याय झालेल्याला खऱ्या अर्थाने न्याय देणाराच असतो. एकच सांगावंसं वाटतं, प्रभूदेसाईंना काय शिक्षा करायची हेही आपण ‘त्या’च्यावर सोपवूया. जे होईल ते योग्यच असेल हा विश्वास असू दे. मी आमच्याकडून जे करणं आवश्यक आणि शक्य असेल ते सगळं करीन. उद्याची आपली भेट असेल ती या विषयापुरती शेवटची असेल हे नक्की. येतो मी… “
त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या मनात झिरपणारं समाधान मला दिलासा देत होतं. यापुढं जे घडेल ते ‘तो म्हणेल तसं’ ! तिकडं सहस्त्रबुद्धे आजोबाही असाच विचार करत असतील याची मला खात्री होती.
तरीही त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच मला येणाराय यांची मात्र मला कल्पना नव्हती!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





