श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ८६ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- नाईक सरांची अचानक झालेली ही भेट वर वर पहाता योगायोगाने घडलेल्या एखाद्या घटनेसारखी वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. ती भेट लवकरच मला अमूल्य असं कांही देण्यासाठी एक निमित्त ठरणार होती हे मला तेव्हा माहित नव्हतं एवढंच!)
सरांशी झालेल्या भेटीच्या वेळी एखाद्या विकएण्डला मी देशपांडेंकडे जायचं असं ठरलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी बऱ्यापैकी वेळ होता म्हणून मी राजू/नितीनना फोन केला आणि आज तुम्हाला सोयीचे असेल तर माझा दुपारनंतर येऊन जायचा विचार आहे एरवी पुन्हा कधीतरी असं सांगितलं.
” जरूर या. आज आम्ही घरीच आहोत. ” राजू अगत्याने म्हणाली, ” हो आणि येताना तुमच्या कथांची कात्रणं जमलं तर घेऊन या. ” असंही सांगितलंन.
” कथांची कात्रणं? कां गं? कशासाठी? “मी न समजून विचारलं. ”
“परवा तुम्ही इथून गेल्यानंतर नानांनी आमच्या ‘चिरानी प्रकाशन’ तर्फे तुमचा कथासंग्रह प्रकाशित करा असं आवर्जून सुचवलं होतं. आज अनायसे येताच आहात तर त्या कथांची कात्रणंही घेऊन या. ” राजू म्हणाली.
मला हे अनपेक्षित होतं.
पण मला ते सहजासहजी स्विकारावंसं वाटेना. मुख्य म्हणजे मी आजवर केलेलं कथालेखन स्वान्तसुखायच तर होतं. केवळ एखादा अनुभव मनाला भिडला किंवा चांगला कथा विषय सुचला की लगेच लिहायला वेळ मिळायचाच नाही आणि वेळ मिळेल तेव्हा निवांत लिहू म्हंटलं तरी ते बऱ्याचदा जमायचंही नाही. मग लेखनाला थोडीफार तरी नियमितता यावी या विचाराने मी चांगल्या चांगल्या मासिकांच्या कथालेखन स्पर्धांना कथा लिहून पाठवायचं ठरवलं. त्यानिमित्ताने लेखन सराव रहावा एवढाच उद्देश होता. अनेक कथांना स्पर्धा पुरस्कार मिळत गेले, कथा आवडल्याची वाचक पत्रे येऊ लागली हाच आनंद माझ्यासाठी पुरेसा होता. त्यामुळे कथा साठत जातील तसे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत असं मला कधीच वाटलं नव्हतं. बॅंकेच्या कामाचे व्याप आणि जबाबदाऱ्याच एवढ्या होत्या कीं मनात नेहमी त्याचेच विचार गर्दी करायचे. त्यामुळे कथा लिहून झाली कीं मनाचा तो कप्पा लगेच आपोआपच बंद व्हायचा!
पण योगायोगच असा की कांही वर्षांपूर्वी नाईक सरांनीच पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती महामंडळाच्या अनुदान योजनेतून माझा ‘जगावेगळी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध होईपर्यंत सातत्याने आग्रह, मार्गदर्शन आणि प्रयत्न करीत मला प्रोत्साहित केलं होतं. आणि आता या दुसऱ्या संग्रहाचं नियोजनही त्यांच्याच पुढाकाराने सुरू होणार होतं!!
सरांचा माझ्यावर लोभ होता हे खरंच, पण यावेळी सरांचा हा प्रस्ताव मला सहजासहजी स्वीकारता येईना. त्यादिवशी मी जाताना कथांची फाईल घेऊन गेलो पण ती देताना अतिशय मोकळेपणानं मी त्या दोघांनाही हेच सांगितलं होतं.
“सरांच्या मनात माझ्या बद्दल असलेल्या सद्भावनांमुळेच तुम्हाला त्यांनी हे सुचवलेलं असणार नक्कीच. म्हणूनच मला मनापासून एक सांगावसं वाटतं. तुम्ही दोघेही लेखक आहात, साहित्यप्रेमी आहात, आणि रसिक वाचकही! तुम्ही दोघांनीही या कथा वाचून कथासंग्रह प्रकाशित करायच्या दृष्टीने तुम्हाला त्या आवडतायत कां योग्य वाटतात कां ते पहा. मगच पुढे काय करायचं ते आपण ठरवूया. सर म्हणाले म्हणून घाई गडबडीने कांही नको करायला. ” ते दोघेही हसून ‘बरं’ म्हणाले. त्यांच्या हसण्याचा अर्थ मला पुढे त्यांच्याकडून कथांचं डीटीपी सुरू झाल्याचं कळलं तेव्हाच समजला. प्रूफ रिडिंग मी स्वतः करायची तयारी दाखवली तेव्हाही राजू हसून ‘चालेल’ म्हणाली. डीटीपी तिने स्वत:च केलेलं होतं. प्रूफरिडींग मी दर शनिवार-रविवार त्यांच्याकडे जाऊन पूर्ण केलं खरं पण विशेष कौतुक म्हणजे किरकोळ अपवाद वगळता त्यात कांहीच चुका नव्हत्या. तो कथासंग्रह प्रकाशित होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर असं अतिशय मनापासून आणि हसतमुखाने दिलेलं राजू आणि नितीन यांचं योगदान खरोखरच कौतुकास्पद होतं! त्या दोघांची ही कामाची पद्धत आणि त्यांचं साहित्यप्रेम माझ्या दृष्टीने आदर्श म्हणावं असंच होतं!
त्या कथासंग्रहाला प्रस्तावना कुणाची घ्यायची असा विषय निघाला तेव्हा मी अतिशय मनापासून भ. रा. नाईक सरांचंच नाव घेतलं होतं. पण तरीही त्या दोघांनी ‘साप्ताहिक सकाळ’ चे त्यावेळचे संपादक श्री. ‘सदा डुम्बरे’ यांचं नाव सुचवलं!
“या संग्रहातील बऱ्याच कथा ‘साप्ताहिक सकाळ’ कथा स्पर्धेतील विजेत्या कथा आहेत. त्यामुळे आधी ‘सदा डुम्बरे’ सरांनाच विचारूया ” राजू म्हणाली होती.
ते योग्यही होतं. पण त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणं, त्यांनी संमती देणं, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून प्रस्तावित संग्रहातील सर्व कथा त्यांनी वाचणं आणि प्रस्तावना लिहून देणं हे सगळंच मला अशक्यप्रायच वाटू लागलं!
” मी फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेईन. ते काय म्हणतात ही पुढची गोष्ट. प्रयत्न तरी करू. ” राजू म्हणाली. आणि पुढे आठवड्याभरातच “मी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला मनोदय सांगितला. त्यांनी लगेच होकारही दिलाय. मी कथांची फाईल घेऊनच गेले होते. ती त्यांना वाचायला देऊन आलेय. सदा डुम्बरेसर तुम्हाला ओळखतात म्हणाले. ” असंही तिने सांगितलं.
सदा डुम्बरे सर मला ओळखतायत हे समजलं तेव्हा कथास्पर्धांमधील माझ्या कथांमुळे ते फक्त नावानेच ओळखत असणार असंच मला वाटलं पण ते तेवढंच नव्हतं! जेव्हा त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आवर्जून ‘धन्यवाद’ द्यायला त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी माझ्या संदर्भातल्या एका प्रसंगाची खूप जुनी अशी एक आठवण आवर्जून मला करून दिली, तेव्हा मी आश्चर्याने थक्क होऊन गेलो! एखाद्याबद्दलची कृतज्ञता योग्य वेळी मनापासून बोलून दाखवण्यातला त्यांचा मोठेपणा खरंच अपवादात्मक असाच. त्यांनी मला आठवण करून दिलेली माझ्या संदर्भातली ती घटना माझ्या दृष्टीने तशी एक साधीच घटना होती. पण तरीही ती त्यांनी इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरसुद्धा माझ्या नावासकट लक्षात ठेवावी हे आश्चर्य वाटावं असंच होतं!
लिहिण्याच्या ओघात त्या घटनेचा संदर्भ आलाच आहे तर ती घटनाही आवर्जून सांगणं मला अगत्याचं वाटतं. कारण ती घटनाच आज डुम्बरे सरांचं मोठेपण अधोरेखित करायला निमित्त ठरलेली आहे! मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही तेव्हापासून सहा सात वर्षे आधीची घटना. मी कथालेखन स्पर्धेसाठी ‘साप्ताहिक सकाळ’ साठी पाठवलेली एक कथा वेळेत पोहोचू शकली नव्हती त्यामुळे स्पर्धेसाठी तिचा विचार झालेला नव्हता. पुढच्या वर्षी तीच कथा मी ‘साप्ताहिक सकाळ कथालेखन स्पर्धे’साठी पुन्हा पाठवली. सुदैवाने त्याच कथेला त्यावर्षी पहिल्या नंबरचा पुरस्कारही जाहीर झाला. तसे त्यांचे पत्रही मला मिळाले. तरीही त्या कथास्पर्धेचा सविस्तर निकाल पहाता यावा म्हणून मी एका पेपरस्टॉल वरून नुकताच प्रकाशित झालेला ‘साप्ताहिक सकाळ’ चा अंक आवर्जून विकत घेतला. आणि तो सहज चाळू लागलो तेव्हा मला धक्काच बसला. कारण त्या अंकात गेल्यावर्षी मी स्पर्धेसाठी पाठवलेली हीच कथा तेव्हा स्पर्धेत समाविष्ट न झाल्याने प्रसिद्धीसाठी मात्र स्वीकारलेली असावी, म्हणूनच ती या आठवड्याच्या अंकात आज प्रसिद्ध झाली होती! पुढच्याच आठवड्यात प्रसिद्ध होऊ घातलेल्या कथा-विशेषांकात यावर्षीची पारितोषिक प्राप्त सर्वोत्तम कथा म्हणूनही हीच कथा अनवधानाने पुन्हा प्रकाशित होणार होती! ते आक्षेपार्ह तर ठरणार होतंच आणि ‘साप्ताहिक सकाळ’च्या प्रतिमेला तडा जायला निमित्तही! अर्थातच डुंबरे सरांची चूक नसूनही मुख्य संपादक म्हणून याची झळ डुंबरे सरांनाही बसणार होतीच. मी त्या अंकातील स़पादक म्हणून दिलेला त्यांचा फोन नंबर पाहून लगेच त्या नंबरवर फोन केला. फोनवर सुदैवाने संपादक सदा डुम्बरे सरच होते. मी त्यांना नेमकी वस्तुस्थिती सविस्तर सांगताच ते अवाक् झाले.
“तुम्ही आज आवर्जून हे सांगितलंत खूप बरं झालं. मी तातडीने यात लक्ष घालतो. ” ते म्हणाले होते.
अर्थातच गुणवत्तेनुसार तयार केलेल्या पारितोषक प्राप्त कथांच्या यादीतल्या माझ्या कथेऐवजी दुसऱ्या कथेला ती संधी मिळणं अपेक्षितच होतं. मुख्य म्हणजे नकळत घडलेली चूक योग्य वेळी दुरुस्त होणंही तितकंच आवश्यकही होतं.
अर्थात हे सगळं याच क्रमाने त्या त्या वेळी घडत गेलं म्हणूनच केवळ फार मोठं अरिष्ट टळलं याचं मला समाधान होतं. प्रत्येक माणसांप्रमाणेच प्रत्येक कथाही आपापलं प्राक्तन घेऊनच जन्माला येत असते याचं एक लेखक म्हणून मला आलेलं ते प्रत्यंतरच होतं!
तीच कथा आता प्रकाशित होऊ घातलेल्या माझ्या ‘स्पर्श प्रकाशाचा’ या कथासंग्रहात समाविष्ट असणे आणि ती पुन्हा या संग्रहाला प्रस्तावना लिहिण्यापूर्वी ‘सदा डुम्बरे’ सरांच्याच समोर जाणे हा सुध्दा एक अनोखा योगायोगच होता!
खूप वर्षांपूर्वी घडलेलं हे सगळं मी विसरूनही गेलो होतो. पण या पार्श्वभूमीवर मी डुंबरेसरांना धन्यवाद द्यायला जेव्हा फोन केला तेव्हा माझ्याशी बोलताना त्यांनी याच घटनेची मला आठवण करून दिली आणि आपल्या हातून घडून गेलेली एखादी सकारात्मक गोष्ट सुध्दा नकळत दुसऱ्यासाठी प्रदीर्घकाळ स्मरणीय कशी ठरू शकते याचा सुखद अनुभव मला आला! एरवीही त्यांनी प्रस्तावना लिहायला नकार नसताही दिला पण माझं नाव नजरेसमोर आलेल्या क्षणी त्यांच्या मनात खोलवर रूजलेल्या त्या प्रसंगाच्या माझ्या संदर्भातल्या आठवणीचं त्यांना नेमकं स्मरण होणं आणि त्यांनी त्याचा मोकळेपणाने आवर्जून उल्लेख करणं हा त्यांचा चांगुलपणाच म्हणायला हवा!
नाईक सरांचं फक्त एकदोन दिवसांच्या सवडीनं पुण्यात येणं, त्यांना त्यावेळी माझी नेमकी आठवण होणं, त्यांचं मला आवर्जून फोन करणं, त्यांच्या लेक न् जावयाच्या घरी आमची भेट होणं, त्या दोघांनी नेमकी अलीकडेच त्यांची नवीन प्रकाशन संस्था सुरू केलेली असणं, सरांच्या मनातील माझ्याबद्दल असलेल्या लोभामुळे त्यांना माझा नवीन कथासंग्रह त्या घरच्याच प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित व्हावा असं मनापासून वाटणं, आणि त्यांच्या इच्छेला त्यांच्या लेक जावयानेही अगदी मनापासून प्रतिसाद देणं या एका महिन्याभरातच घडून गेलेल्या सगळ्या अनपेक्षित घटनांचे इतरही अनेक धागेदोरे या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाशीही आश्चर्यकारकरित्या जोडले जाणार होते आणि ‘त्या’च्या कृपालोभाची अशा अनेक धाग्यादोऱ्यांनी घातली गेलेली वीण माझ्या उर्वरित आयुष्याला एक अनोखी कलाटणी देऊन जाणार होती हे मात्र माझ्या गावीही नव्हतं!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






