सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ परिक्षा – पालकांची ‘चिंता’ आणि विद्यार्थ्यांची ‘चिता’…  ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

नवीन वर्षाचा पहिला महिना उत्साहात संपतो. लगेच दुसर्‍याच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीतील मुलांच्या उत्साहाला परीक्षेचं ग्रहण लागतं. सूर्य – चंद्र ग्रहणाप्रमाणं विद्यार्थ्याच्या मनात काही काळ मानसिक अंधार दाटून येतो. अफवा आणि भीती पसरवली जाते. पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांची सावली मुलांच्या गुणात्मक तसेच वास्तव क्षमतेला झाकोळून टाकते. परीक्षेचं हे ग्रहण केवळ मुलांच्या गुणांवर परिणाम करत नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आणतं.

दहावी बारावीच्या परीक्षा म्हणजे केवळ विद्यार्थ्याचं शैक्षणिक मुल्यांकन नाही तर त्या कौटुंबिक मानसिक सहनशक्तीचं आव्हान ठरलं आहे. परीक्षेत ९० % पेक्षा कमी गुण म्हणजे अपयश आणि अपयश म्हणजे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा लोप होय. असा सर्वसाधारण चुकीचा समज आहे. अशा कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक वृत्तीमुळे परीक्षा काळात काही विद्यार्थी सोडले, तर इतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत प्रचंड गोंधळ असतो.

 विद्यार्थ्यांची मानसिकता –

परफाॅर्मन्स एन्झायटी – चिंता 

पालकांना अपेक्षित असलेले गुण मिळतील की नाही. प्रश्नपत्रिका आपण केलेल्या अभ्यासावर असेल की नाही. वेळ पुरेल की नाही. किती गुण पडतील. मनात अनावश्यक विचारांची गर्दी होते. अनेक चिंता मुलांचा मेंदू पोखरून काढतात. एकाग्रता कमी होते. परीक्षेची भीती वाढते. परीक्षेला जायलाच नको असंही वाटायला लागतं. त्या ताणामुळं धाप लागणं, घाम फुटणं, शरीर थरथरणं, प्रचंड रडायला येणं असे शारीरिक परिणाम दिसतात.

तुलनात्मकता – वर्गमित्र, शेजारचा मुलगा, नातेवाईकांमधला एखादा मुलगा याच्याशी पालक सतत तुलना करत असतील तर मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो. त्यांची चिडचिड होते. झोप – भूक कमी होते. वेदनादायक आजार बळावू शकतात. ‘शेजारच्या मुलाला पाहा’ हे वाक्य म्हणजे फक्त इतरांशी केलेली तुलना नाही तर सामाजिक प्रतिस्पर्धेचं लक्षण आहे. शेजारी, नातेवाईक अशा स्पर्धेत हिरीरीने पुढाकार घ्यायला भाग पाडतात.

हरणं जिंकणं शिकणं – हरणं जिंकणं याबरोबरच बरंच काही शिकायला मिळणं हे ही महत्त्वाचंच आहे. ठेचकाळून पडलं म्हणून कुणी पडूनच राहत नाही तसं परीक्षेत गुण कमी पडले म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे पुन्हा परीक्षाच न देण्याची मानसिकता करण्याची गरज नाही. आधुनिक मानसशास्त्र अडचणींतून परत उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्यावर भर देतं. पण सध्या पालकांच्या कडक भूमिका मुलांमधे असहाय्यतेची भावना निर्माण करतात. ‘मी कितीही प्रयत्न केला तरी चांगले गुण मिळणार नाहीत’. असा मुलं सतत नकारात्मक विचार करायला लागतात. हरण्यातूनही जे शिकायला मिळतं त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल.

गुण = मूल्य – परीक्षेतील गुण हेच विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतात. परीक्षेतील गुणांशिवाय इतर कितीतरी कौशल्य त्याच्याकडे असतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जितके गुण जास्त तितका तो हुशार असा सार्वत्रिक गैरसमज आहे. परीक्षेतील अपयश हे केवळ शैक्षणिक अपयश आहे असं मानलं जात नाही. तर त्या विद्यार्थ्याला कुचकामी, निरुपयोगी ठरवलं जातं. त्यामुळं त्याचा आत्मविश्वास कमी होतो. त्याच्या यशाची रेषा त्याच्यापासून लांब होत जाते.

पुन्हा पुन्हा असमानता – बर्‍याचवेळा विद्यार्थ्याचं अपयश त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. बौद्धीक क्षमता असूनही त्याला आवश्यक ती शैक्षणिक साधनं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं समाजात अपयशी ठरतो. त्याच्या मनात श्रीमंतीविरूद्ध द्वेष निर्माण होण्याची शक्यता बळावते. गरीब श्रीमंत विद्यार्थी भेद नसावा पण सरकारी शाळा आणि खासगी शाळा नियमितपणे हा भेद आणि पक्षपातीपणा रुजवण्याचंच काम करतात. दहावीच्या निकालानंतर ही तुलना मोठ्या प्रमाणात होते. सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा निर्माण करण्यास मदत करते.

पालक असे कसे…?

पालक स्वत:ची अपूर्ण स्वप्नं मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात.

घरातील टी व्ही बंद होतो.

पालकांचं स्वत:चं सामाजिक जीवन थांबतं.

घरी नेहमी असणारी माणसांची वर्दळ बंद होते.

मुलाचे खेळ, त्याचे छंद सगळं बंद होतं.

त्याला मित्रांमधे जाणं, गप्पा मारणं करू दिलं जात नाही.

मुलानी अभ्यासाव्यतिरिक्त काहीही करू दिलं जात नाही.

विद्यार्थी जगतातलं वास्तव –

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात १, ४२६ विद्यार्थ्यांवर केलेल्या २०२३ मधील अभ्यासानुसार, ७४% विद्यार्थ्यांना तीव्र शैक्षणिक ताण आहे. यावरून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंदाज येतो.

 हिमाचल प्रदेशातील शिमला मधील २०२२ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, ८३% विद्यार्थ्यांना मध्यम ताण आहे.

कोलकात्यात २०१५ मधे केलेल्या अभ्यासानुसार, ६३. ५% विद्यार्थी शैक्षणिक दबावामुळे तणावग्रस्त होते, तर ८१. ६% विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली.

तमिळनाडूमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, मुलांमध्ये मुलींपेक्षा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चिंतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त होते.

कर्नाटकातील एक अभ्यास असंही सांगतो की, मुलांमध्ये अभ्यासाचा दबाव, गुणाची चिंता आणि स्वतःची अपेक्षा यांमुळे ताण जास्त असतो.

कोलकात्यातील एक अभ्यास असं सांगतो की, ६६% विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांकडून चांगल्या शैक्षणिक कामगिरीबद्दलचा दबाव आहे.

अनेक अभ्यास आणि NCRB च्या अहवालांनी भारतातील तरुण वयातील आत्महत्या आणि परीक्षचा ताण याचा संबंध जोडला आहे.

उपाय – 

पालकानी बुद्धिमत्तेची व्याख्या नीट समजून घ्यावी. परीक्षेतील गुणांवर बुद्धीमत्ता ठरवू नये. मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर ‘बहुबुद्धिमत्ता सिद्धांत’ सांगतात. ते म्हणतात, “परीक्षा केवळ तार्किक-गणितीय आणि भाषिक बुद्धिमत्तेचे मूल्यमापन करतात. मुलाची सर्जनशीलता, सामाजिक कौशल्ये, भावनिक समज अशा इतर महत्त्वाच्या बुद्धिमत्ता परीक्षांमधून कळत नाहीत. “

सर्व शाळांमधे समुपदेशक, मानसतज्ज्ञ यांची नेमणूक करायला हवी. शहरी-ग्रामीण, सरकारी – खासगी, श्रीमंत-गरीब शाळांमधील मूलभूत सुविधा आणि दर्जा यात समानता आणायला हवी.

पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच भावनिक साक्षरता, ताण व्यवस्थापन, लवचिकता यांसारख्या कौशल्य आधारीत शिक्षणाची गरज आहे.

दहावी बारावीची अंतिम परीक्षा म्हणजेच यशस्वी भविष्य हा गैरसमज आहे हे लक्षात घ्यायला हवं.

डॉक्टर-इंजिनियर शिवाय करिअरचे अनेक पर्याय आहेत याची समाजात, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी.

सकारात्मक प्रेरणा द्याव्यात. त्यामुळं मुलांचं अंतर्गत कुतूहल आणि शिकण्यातील आनंद टिकवून ठेवतात.

परीक्षापूर्व, परीक्षाकाळ, परीक्षेनंतरचा काळ आणि सगळ्यात महत्त्वाचा निकाल या सर्व कालावधीत मुलांच्या वेदना समजून घ्याव्यात. वेदनेचं मुळ शोधावं. त्यानुसार मुलांशी संवाद साधावा.

आम्ही तुझ्यासोबत आहोत. परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी चालेल. आपण तो साजरा करू हा विश्वास मुलांना द्यावा.

शालेय व्यवस्थापनाने १००% निकालाचा हट्ट सोडायला हवा कारण त्याचाही ताण मुलांवर असतो.

ग्रहण म्हणजे तात्पुरता अंधार. अगदी तसंच परीक्षेचं असतं. दुर्बिणीतून ग्रहण बघणं सुरक्षित असतं. तसंच परीक्षेकडे चाचणीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भीती कमी होण्याची शक्यता वाढते. जसं ग्रहणामुळं सूर्याचं अस्तित्त्व संपत नाही तसं परीक्षेमुळं विद्यार्थ्याचंही अस्तित्त्व, त्याचं कर्तृत्त्व कधीच संपत नाही. ग्रहणात विशेष करून डोळ्यांची काळजी घेतली जाते. परीक्षाकाळात मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागते. ग्रहनानंतर सूर्य तसाच चमकतो जसा तो होता. परीक्षेनंतर मुलंही अधिक चमकतात हे लक्षात घेतलं तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत. पालकांच्या चिंता विद्यार्थी चितेच्या चरम सीमेपर्यंत पोहोचणार नाहीत.  

– – फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीची परीक्षा देणार्‍या सर्व विद्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा!!!

 

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted