श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सैन्याचा निडर चेहरा!” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

एकेका हातात पंधरा पंधरा किलो वजनाची संहारक स्फोटके हातात घेऊन दुश्मनावर निर्णायक प्रहार करण्यासाठी पुढे निघालेल्या त्या तरुण, देखण्या आणि बहाद्दर सैन्याधिका-याच्या डोळ्यांसमोर त्याची जन्मदात्री उभी राहिली… कारण मोहिम जोखमीची होती… जिवंत माघारी येता येईलच याची शाश्वती दिसत नव्हती! चांगल्या पगाराची, सुरक्षित आणि विशेषत: कुटुंबात रमू देईल अशी सरकारी नोकरी सोडून जेंव्हा तो फौजेत निघाला होता तेंव्हा… आईसाहेबांनी फर्मावले होते… ”हाती शस्त्र धरीत प्रत्यक्ष रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करणार असशील तरच भारतीय सैन्याधिका-याची वर्दी परिधान कर! ” 

मध्यरात्र उलटून गेलेली… तरीही नेमकी त्यावेळी आई जागी होती… तिने लेकाचा फोन दुस-याच घंटेला उचलला. त्याचा फोन अशा अवेळी? पोरगं काहीतरी सांगत होतं… आणि तिला काहीही ऐकू येत नव्हतं… अत्याधुनिक रायफली गोळ्या डागताना खूप मोठा आवाज करतात… तो धमाका ऐकून तिच्या कानठळ्या बसल्या… काहीतरी अघटित होत असावं… तिचं काळीज थिजून गेलं… आणि फोनचा रिसीव्हर तिच्या हातातून गळून पडला! आता त्याचा पुन्हा फोन येईपर्यंत देवाचा धावा करीत बसावं… तिच्या मनानं तिची समजूत काढली!

 “आई, मी कदाचित जिवंत परतू शकणार नाही… पण तुला अभिमान वाटेल अशी कामगिरी करूनच दाखवेन… तुझी शपथ! ” हे त्याचे शब्द आईपर्यंत पोहोचेपर्यंत हवेत विरून गेले… गोळीबाराचा, दारूगोळ्याचा वास त्या हवेत भरून राहिला होता! साहेबांनी आपला मोबाईल फोन खिशात ठेवला आणि ते पुढे सरसावले.

 सैनिक माता असलेल्या या मातोश्रींच्या सूनबाई सुद्धा तिकडं फौजेत कर्तव्यावर तैनात होत्या. केरळातल्या अलापुझा जिल्ह्यातल्या मुथूकुलम नावाच्या निसर्गसुंदर अशा छोट्या गावात राजलक्ष्मी वेणूप्रसाद नायर, लेकाच्या फोनची वाट पाहण्याशिवाय करू तरी काय शकणार होत्या? ऋषी लहानपणापासून देशाला सर्वस्व मानणारा युवक. अभ्यासात अव्वल होताच आणि साहसीसुद्धा. मनात आणले असते तर साऊथ चित्रपटांचा नायक सहजी झाला असता. पण त्याही पेक्षा तो सामाजिक कार्यकर्ता अधिक होता. आश्वासक शब्दांनी लोकांशी संवाद साधण्यात त्याचा हात धरू शकेल असा मुलगा गावात नव्हता. उच्च श्रेणीत इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यावर केरळ वीज मंडळात साहाय्यक अभियंता ही नोकरी हात जोडून उभी होती. पण या नोकरीत आयुष्य घालवण्यासाठी ऋषी जन्माला आलेले नव्हते… हे काळाने सिद्ध केले. हुतात्म्यांच्या कथा त्यांच्या मनात रुंजी घालीत असत… फौजेचा गणवेश त्यांना खुणावत असे. हाती बंदूक घेऊन आपण शत्रूवर तुटून पडलो आहोत, अशी स्वप्ने त्यांना दिवसा पडायची… राष्ट्रगीत गायले जाऊ लागले की ते रोमांचित होत असत! त्यांच्यात एक शूर सैनिक लपला होता… आणि त्याला या नागरी जीवनात अडकून पडल्यासारखे झाले होते! केरळ विद्युत मंडळात नोकरीला लागून एकच वर्ष झालेले असताना ऋषी यांनी विशेष परीक्षा देऊन एअर इंडियामध्ये नोकरी मिळवली. पण या नोकरीत ते रमणारे नव्हते… त्यांना शस्त्र, युद्ध खुणावत राहिले. शेवटी हजारो तरुणांमधून ऋषी इंडियन मिलिटरी अकादमी, देहराडून येथील सैन्याधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठी निवडले गेले. शास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये कमालीचे स्वारस्य असलेल्या ऋषी यांना भारतीय सैन्याने नेतृत्वगुणांनी संपन्न केले… एका कोवळ्या तरुणाचे कणखर सैनिकात रुपांतर झाले होते. २०१० मध्ये ऋषी नायर मेकनाईझ्ड इन्फंट्री मध्ये रुजू झाले. भारतासारख्या वैविध्यपूर्ण सीमा आणि शत्रू अन्य कोणत्याही देशाला लाभलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक अधिका-याला, प्रत्येक सैनिकाला देशभर फिरवून आणले तरच गरजेच्या प्रसंगी अनुभवाचा उपयोग होऊ शकतो. सेना ऋषी साहेबांना असाच अनुभव देत गेली. चीन सीमेवर गेली कित्येक वर्षे मोठा सशस्त्र संघर्ष झालेला नाही. पाकिस्तान सीमेवरून समोरासमोर लढत नाही. ऋषी साहेबांसारख्या सळसळत्या रक्ताच्या सैनिकाला त्याची तलवार आजमावून पाहण्याची संधी मिळावी तरी कशी? ते संयुक्त राष्ट्र संघाच्या आफ्रिकी देशांतल्या शांतीसेनेमध्ये सेवा करून आले होते. परंतु प्रत्यक्ष मैदानात मर्दुमकी गाजवण्याची संधी त्यांना लाभली नव्हती! ते सैन्यात येण्याआधी कारगिल होऊन गेले होते… आणि काश्मिरात त्यांना पाठवण्यात आलेले नव्हते!

परंतु कश्मीरने त्यांना जणू बोलावून घेतले… कारण भारतीय सैन्याची काश्मिरात गेली कित्येक दशके ‘रात्रं-दिन आम्हां युद्धाचा प्रसंग’.. अशी स्थिती आहे. हजारो अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास २००४ ते २०१४ या दशकात २०९३ निष्पाप नागरिकांचा बळी घेणा-या ४०४३ अतिरेक्यांना मारण्यासाठी सैनिक, अधिकारी, पोलिस, विविध संरक्षण दलांचे मिळून १०६७ जण धारातीर्थी पडले होते. काश्मिरात भारतीय सैन्य अखंडपणे युद्ध लढत आहे…! आणि हे समोरासमोरचे थेट युद्ध नव्हे! नव्या युद्धास्थितीला सामोरे जाण्यासाठी खास जम्मू-कश्मीरसाठी १९९० मध्ये तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल एस. एफ. रॉड्रीक्स यांच्या नेतृत्वात आरपार कारवाई करणा-या आर. आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. लेफ्ट. जनरल पी. सी. मनकोटिया साहेब या दलाचे प्रथम डिरेक्टर जनरल होते. भारतीय सैन्याच्या विविध विभागांतून या दलात निवडक सैनिक, अधिकारी बोलावून घेतले जातात. पाकिस्तानी घुसखोर अतिरेकी, स्थानिक अतिरेकी यांच्या कारवाया रोखणे हे प्रामुख्याने कर्तव्य असलेली राष्ट्रीय रायफल्स स्थानिक जनतेमध्ये विकासात्मक कार्यक्रमसुद्धा हाती घेते. काश्मिरी जनतेला भारतीय संघराज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सेना करते… म्हणूनच काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे!

त्यावेळी मेजर असलेले ऋषी राजलक्ष्मी यांनी राष्ट्रीय रायफल्सकडून २०१५ मध्ये आलेले बोलावणे आनंदाने स्वीकारले. काश्मिरातील त्राल नावाच्या भागात अतिरेक्यांनी उच्छाद मांडला होता. मेजर ऋषी यांनी या काळात येथे कंपनी कमांडर असताना अतिरेक्यांशी शस्त्राने लढण्यासोबतच स्थानिक जनतेशी प्रेमाचे नाते जोडण्यात चांगले यश मिळवायला आरंभ केला होता. शत्रूला शस्त्राने जिंकणे जेवढे महत्वाचे तेवढेच स्थानिक जनतेचे मन जिंकून घेणेही महत्त्वाचे आहे.. हे त्यांनी जाणले. अतिरेकीविरोधी मोहिमांत ऋषी साहेब हिरीरीने सहभागी होत… त्यांना शत्रूच्या रक्ताची चटक लागली होती… त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी कर्नल विक्रम कड्यान त्यांना म्हणत… ”कधी तरी तुला भीती वाटू दे.. एकदा तरी स्वत:च्या जीवाची काळजी कर! ” २०१५ मध्येच मेजर ऋषी इंडियन नर्सिंग सर्विसेसमध्ये श्रीनगर बेस आर्मी हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या मेजर अनुपमा यांचेशी विवाहबद्ध झाले! मेजर साहेब स्थानिक तरुणांशी, विशेषता: लहान मुलांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवून होते. पाकिस्तानी अपप्रचाराला बळी पडून ही नवी पिढी चुकीच्या मार्गाला जाणार नाही यासाठी मेजरसाहेब सतत प्रयत्नशील असत. याच भागात बु-हाण वानी नावाचा तरुण अतिरेकी कुप्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने शेकडो काश्मिरी युवक पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या जाळ्यात ओढले होते. भारतीय सैन्याने या बु-हाण वानीला ८ जुलै २०१६ रोजी त्राल पासून साठ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कोकरनाग येथे यमसदनी धाडल्यावर काश्मिरात मोठा गहजब उडाला होता. परंतु मेजर ऋषी यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही… कारण त्यांनी स्थानिक जनतेची विविध मार्गांनी मने जिंकून घेतली होती… स्थानिक लोक मेजर ऋषी यांना खान साहब म्हणून संबोधू लागले होते! चार मार्च, २०१७. शनिवार होता. त्राल मध्ये भारतीय सेनेचा स्थानिक नागरीकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपक्रम सुरु होता. वैद्यकीय शिबिरासाठी सुमारे हजारभर रुग्ण जमा झाले होते. दुपारचे तीन वाजले होते. शिबिरात मेजरसाहेब लोकांशी संवाद साधत असताना त्यांना त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नीरज पांडे साहेबांचा तातडीचा संदेश आला… आकीब मौलवी हाफू गावात लपला आहे! बुऱ्हान वानीची जागा घेऊ पाहणारा, पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेला कमांडो, अनेक वर्षांपासून भारतीय सैन्याला हवा असणारा आणि प्रत्येक वेळी निसटून पळून जाण्यात यशस्वी झालेला आकीब मौलवी! याला आता सोडायचा नाही… मेजर ऋषी साहेबांनी निश्चय केला. अगदी काही मिनिटांतच त्यांनी आपली क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज केली… आणि तेथून तीस किलोमीटर्स अंतरावर असलेल्या हाफू गावाकडे कूच केले…!

या प्रवासादरम्यान विविध घटकांशी संपर्क साधला जाऊन हाफू गावाभोवती सी. आर. पी. एफ. (सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स) आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी मोहिमेचे क्षेत्ररक्षण लावले! स्थानिक लोकांना भारतीय सैन्याची ही हालचाल समजली… त्यांनी आकीबच्या समर्थनार्थ मोठा जमाव आणला… दगडफेक सुरु केली. मेजर ऋषी तिथे पोहोचताच त्यांने एका सैनिकाला सोबतीला घेऊन गावातील घरांत शोध सुरु केला… अर्धा तास झाला तरी कुणी हाती लागेना. पोलिसांनी दगडफेक करणा-या जमावाला कसेबसे रोखून धरले होते. तेथून काही अंतरावर असलेल्या एका घराबाहेर चार-पाच माणसांचा एक गट उभा होता… मेजरसाहेब थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले… त्यातील एकानेही तोंड उघडले नाही… परंतु त्यातील एकाचे डोळे एका विशिष्ट घराकडे एकदा वळालेले मेजरसाहेबांनी चाणाक्षपणे टिपले… त्याच डोळ्यांनी मेजरसाहेबांच्या नजरेला नजर दिली… सावज त्या घरात लपले होते तर! साहेबांनी त्वरीत धाव घेतली… निवडक साथीदार सोबतीला घेतले… त्या घराभोवती फास आवळायला सुरुवात केली. त्या दुमजली घराच्या सीमाभिंतीपाठी आपल्या जवानांनी आपापल्या जागा घेतल्या!

भारतीय सैन्याच्या नीतीनुसार मेजर ऋषी साहेबांनी आकीबला ‘शरण ये.. अभय देतो’ असे आवाहन केले… या आवाहनाला आकीबच्या रायफलने दुस-या मजल्यावरून गोळीबाराने आव्हान दिले… त्या घरातून एकाच वेळी दोन रायफल्स धडाडू लागल्या! आकीब एकटा नव्हता… पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मदचा सैफुल्ला उर्फ उसामा सुद्धा होता.. आज दोन शिकारी गवसणार होत्या! आता सी. आर. पी. एफ. , जम्मू-काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्स यांनी त्या घरावर नेम धरले… तीन तास गोळीबार सुरु होता! ते दोघे शस्त्रसज्ज होते.. आधुनिक रायफली आणि भरपूर गोळाबारूद! ही मोहीम दिवसाउजेडी संपली तर बरे… त्या घरावर छोट्या तोफांनी मारा करणे शक्य होते.. मात्र परिसरातील इतर घरांचे नुकसान, नागरीकांच्या जीविताला धोका नको म्हणून आर्टीलरी फायरचा पर्याय निवडला गेला नाही. त्याऐवजी त्या घरात स्फोटके लावून ते उडवून लावण्याची योजना आखली गेली. मेजर ऋषी साहेबांनी फोनवरून सीओ साहेबांची परवानगी मिळवली आणि पंधरा किलोचे एक स्फोटक हातात घेऊन ते त्या घराकडे निघाले… इतर सैनिक त्यांना कवरिंग फायर देऊ लागले… साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता… त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते… सायंकाळचे साडेसहा वाजले होते… अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted