श्री मयुरेश उमाकांत डंके
इंद्रधनुष्य
☆ “‘रवि’ला शिशिर नाही…” – भाग -१ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
खरं तर त्याला व्हायचं होतं गायक. पण, नियतीनं पुढचा प्रवास काही वेगळाच लिहून ठेवला होता. जन्मजात
सृजनशीलतेनं त्याला संगीतकार म्हणून नवी ओळख दिली.
१९२६… दिल्ली.. आपल्या मुलांकडून किती आणि कुठपर्यंत अपेक्षा करायच्या, याची कल्पना पुरेशी सुस्पष्ट असणाऱ्या पालकांचा तो काळ होता. भारतातली सामाजिक परिस्थिती तर अतिशय गुंतागुंतीची आणि अस्थिर होती. सतत नवनवी स्थित्यंतरं घडत होती. ब्रिटीशांच्या सत्तेविरूद्ध भारतीयांचा प्रखर संघर्ष सुरू होता. सर्वसामान्य भारतीय कुटुंबांमधलं वातावरण मुलांना त्यांच्या मनाप्रमाणं करिअर करू द्यावं, कलागुणांना वाव द्यावा, मुलांचा व्यक्तिमत्व विकास करावा, अशा मानसिकतेतलं नव्हतंच. मानसिक, सामाजिक, आर्थिक अशा कुठल्याच पातळीवर निकोप वातावरण नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर या मुलाच्या बालपणाची वर्षं यथातथाच गेली. घरची परिस्थिती फार सधन किंवा गर्भश्रीमंत नव्हती. पण एक वेळ शिजवलेलं दोन वेळा खायला लागावं, इतकीही बिकट नव्हती. मुलांना ‘भोपळ्यात बी’ पद्धतीनं वाढवण्याइतपत श्रीमंती किंवा उपभोगात्मक दृष्टीकोन नव्हते, पण मुलांची शारीरिक-मानसिक-बौद्धिक-सामाजिक-सांस्कृतिक आबाळ होऊ नये, याची काळजी घेणारं पालकत्व त्या काळात अस्तित्वात होतं.
उत्तम साहित्यिक अभिरूची, सभ्य आणि विद्वत्प्रचुर भाषाशैली याचे संस्कार या मुलावर कळत-नकळत होत गेले. वडील उत्तम भजने गात असत. साहजिकच कानावर आणि गळ्यावरही तो प्रभाव पडत गेला. शालेय वयात रेडीओवर एक भजन या मुलानं ऐकलं. त्याला ते इतकं आवडलं की, त्यानं ते चालीसकट तोंडपाठ केलं. शाळेमध्ये आणि इतरांसमोर गाऊन दाखवून अनेकांची शाबासकीही मिळवली. लोक त्याच्या आवाजाचं कौतुक करायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की, आपण गायक व्हावं, असं स्वप्न त्या मुलाच्या मनात रूंजी घालायला लागलं.
वयात आलेल्या मुलाचं मन चोवीस तास सूर आणि संगीत यांच्यातच रमायला लागलं आणि शालेय अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होत त्यातला रस आटून गेला. अभ्यासात गती दिसेना. शेवटी, दिल्लीतल्या एका कारखान्यात नोकरी धरली. पगार होता १५ रूपये महिना.! पण परिस्थितीचे चटके बसूनही गाण्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही.
पुढे, दिल्लीच्या डाक-तार विभागात इलेक्ट्रीशिअन म्हणून नोकरी धरली. पगार होता १९६ रूपये महिना..! (त्या काळी १९६ रूपयांत महिनाभर चौकोनी कुटुंबाला जगता यायचं, आता तेवढ्या पैशात फक्त दोन लिटर पेट्रोल येतं..! असो..) १९४५ ते १९५० अशी पाच वर्षं नोकरी केली. गाण्याची हौस होतीच. सोबतच दिल्ली आकाशवाणी केंद्रावर गायन ही करू लागला.
कुठं काही साधतंय का ते पहावं, म्हणून या मुलानं काही दिवसांची रजा घेतली आणि मुंबई गाठली. गादीवर झोपून साखरझोपेत स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात आणणं महाकठीण आहे, याचा प्रत्यय त्याला येऊ लागला. पावलोपावली प्रचंड संघर्ष.. हिराबाग धर्मशाळेत त्यानं आपलं चंबूगबाळं ठेवण्यापुरता आणि रात्रीच्या झोपण्यापुरता आसरा मिळवला. पण जेव्हा तिथं जागा मिळत नसे, तेव्हा स्टेशनच्या फलाटावर, बंद दुकानाच्या फळीवर, फूटपाथवर, थोडक्यात जिथं जागा मिळेल तिथं झोपावं लागायचं. सारखी वाढीव रजा मागून मागून शेवटी कंपनीने ‘रजा मिळणार नाही’ असं स्पष्ट सांगितलं तेव्हा ह्यानं सरळ नोकरीच सोडून दिली..!
आता जगायचं कसं? पोट भरण्यासाठी खावं तर लागणार. पण खिसा रिकामा. मग हा तरूण पंखा दुरूस्ती, इस्त्री दुरूस्ती, वीज उपकरणांची किरकोळ दुरूस्ती अशी कामं करून पोटापुरतं मिळवायचा आणि रात्री उघड्या आभाळाखाली झोपायचा. अशी दोन-अडीच वर्षं गेली….!
मुंबईत पहिलं भाड्याचं घर त्यांनी घेतलं, ती एक पत्र्याची खोली होती. तिथं वीज नव्हती. सूर्यास्तानंतर सगळा अंधारच अंधार. शेजारी मिरची आणि सिमेंटची तीन गोदामं होती. मिरचीचा खाट टाळण्यासाठी ते सिमेंटच्या गोदामाच्या बाजूला राहत. पैसे वाचवण्यासाठी एकवेळ जेवत. घर सोडल्याचं दु:ख तर होतं, शिवाय अंधारातला एकटेपणा, पोटातली भूक, कफल्लक अवस्था आणि स्वप्नं मात्र मोठी अशा विचित्र कात्रीत ते अडकले होते.
१९५१ साली पहिलं काम मिळालं ते कोरस गायक म्हणून. साहिर लुधियानवी यांची गाणी आणि सचिन देव बर्मन यांचं संगीत असलेला चित्रपट होता ‘नौजवान. ’ लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, किशोर कुमार अशी मातब्बर गायकांच्या आवाजातली एकाहून एक सरस गाणी असलेला हा चित्रपट होता. आणि हा तरूण त्यातल्या एका गाण्यात कोरस मध्ये उभारून गायला. तेव्हा या पैकी कुणाला माहीत होतं की, एके दिवशी याच तरूणाच्या संगीत दिग्दर्शनाखाली आपल्याला गायचं आहे म्हणून…?
एक वर्षानं १९५२ साली दुसरं काम मिळालं, तेही कोरस गायक म्हणूनच. सिनेमा होता ‘श्रीमती जी. ’ श्यामा आणि नासिर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा. या सिनेमासाठी तीन संगीतकार होते. त्यापैकी एक होते जिम्मी. याच सिनेमाच्या वेळी या तरूणाची गायक-संगीतकार हेमंतकुमार यांच्याशी भेट झाली, ओळख झाली. हेमंतकुमार पार्श्वगायनही करत असत आणि चित्रपटांना संगीतही देत असत. त्याच वेळी ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारित सिनेमाचं संगीत करत होते. या चित्रपटातल्या ‘वंदे मातरम्’ या गाण्यात कोरसमध्ये गाण्याची संधी त्यांनी या तरूणाला दिली.
एके दिवशी हेमंतदा गात होते, पण गाण्यातल्या एका ऊर्दू शब्दाचा उच्चार चुकत होता. ह्या तरूणानं त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली, योग्य उच्चार सांगितला आणि सुधारूनही घेतला. एक सहायक संगीत दिग्दर्शक होण्यासाठी जे जे गुण आवश्यक असतात, ते ते सगळे गुण ह्या तरूणामध्ये आहेत, हे हेमंतदांनी ताडलं.
“माझा सहायक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करशील? ”
“हो. पण.. ”
“माझं काम तर करच. पण, बाहेरही कामं मिळाली तर करत रहा. माझी हरकत नाही. ”
आणि या तरूणानं हेमंत कुमार यांचा सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरूवात केली. त्यावेळी त्याला एका गाण्याचे २० रूपये मिळत आणि एका रिहर्सलचे २ रूपये मिळत असत. साधारणपणे महिन्याला ६० रूपयांची मिळकत सुरू झाली तेव्हा त्यानं त्यातून तबला आणि पेटी खरेदी केली. या तरूणाचं नाव रविशंकर शर्मा….. संगीतकार, गायक, गीतकार रवि…!
‘कुठल्याही क्षेत्रात काम करा पण ज्या क्षेत्रात काम कराल त्यात शिखरावर जा’ असं सगळेचजण म्हणतात. पण त्या शिखरावर जायचं कसं? त्याचा रस्ता कुठला? तो कसा शोधायचा? तो मिळाल्यावर पुढं काय करायचं? या प्रश्नांची ठराविक, छापील अशी उत्तरं नसतात. ज्याची त्याची उत्तरं ज्याला त्याला स्वतंत्रपणे शोधावी लागतात.
प्रतिभेच्या क्षेत्रात करिअर करणं ही तर फारच अवघड गोष्ट आहे. कारण, तिथं सगळीच्या सगळी भिस्त आपल्या प्रतिभेवरच अवलंबून असते आणि प्रतिभा सतत कार्यरत ठेवणं, उत्तमतेचा आलेख सतत चढता राहणं ही गोष्ट अजिबातच सोपी किंवा सहजसाध्य नाही.
‘संधी’ ही एक फार मोठा मुद्दा आहे. संधी मिळणं आणि संधी शोधणं या दोन पूर्णत: वेगवेगळ्या गोष्टी असतात. अनेकदा संधी आपणहून चालून येतात, पण काही काही क्षेत्रच अशी अथांग पसरलेली असतात की, तुमच्यापर्यंत संधीनं आपणहून चालत यायला आपण एकमेव टिकोजीराव थोडेच असतो? उलट कितीतरी वेळा असा अनुभव येतो की, ‘संधी मिळेल-संधी मिळेल’ च्या आशेचा प्रभाव इतका वाढलेला असतो की, ‘संधी शोधणं’ राहूनच जातं. साहजिकच, संधी मिळण्याची वाट पाहत राहणाऱ्यांची आयुष्यच वाया जाण्याचा किंवा प्रतिभेला गंज चढण्याचा धोका फार मोठा असतो.
‘मला सगळं मनाजोगं तयार मिळालं पाहिजे किंवा कुणीतरी मला काम दिलं पाहिजे, मग दाखवेन मी काय चीज आहे ते’ अशी आपली धारणा असेल तर करिअर घडण्याऐवजी ते बिघडतंच. ‘संधी शोधणं’ हेच ज्यांना जड वाटतं, त्यांच्यासाठी ‘संधी निर्माण करणं’ ही गोष्ट म्हणजे बैलाचं दूध..! काहीही हातात नाही, समोर काही दिसत नाही, आजूबाजूचं वातावरण पूरक नाही, कुणाचा आधार नाही, अशा परिस्थितीत धीर यायच्याऐवजी खचतोच.
त्यातही व्यावहारिक जग तुमच्याशी फार वेगळे डाव खेळत असतं. तुम्ही जन्मला नव्हतात, तेव्हाही ते सुखेनैव चालतच होतं. आज तुम्ही इकडची काडी तिकडं न करता घरात बसलात, तरीही ते सुरूच आहे. उद्या तुम्ही या जगात नसलात, तरीही जग असंच सुरू राहणार. एकूण काय, जगाला आपल्या असण्या-नसण्याशी काही देणं-घेणंच नाही. आपल्या महत्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्या पूर्ण करण्याचा मार्ग मिळायला नको का? “तू कितीही हुशार असलास तरी, मला तुझी आवश्यकता नाही” असं जर जग म्हणायला लागलं तर माणसानं करायचं काय?
इथं संबंध येतो विद्वत्तेचा, व्यासंगाचा, नैपुण्याचा. हे तीन गुण तुमच्याकडं असतील आणि त्याला कार्यमग्नता, विवेक आणि सहृदयता या तीन स्वभाववैशिष्ट्यांची जोड असेल तर तुम्हाला नाकारणं हे जगासाठी सोपं नसतं. हे तीन गुण आणि तीन स्वभाववैशिष्ट्यं यांचं एकत्र रसायन असलेल्या एकाही व्यक्तिमत्वाला जग नाकारू शकलेलं नाही. स्वत:च्या व्यक्तिमत्वात ह्या सहा गोष्टी विकसित केलेली व्यक्ती स्वत:चं स्थान निर्माण करतेच.
– क्रमशः भाग पहिला
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





