डॉ. धनंजय देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा – –
— — ” तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर
चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा… क्रमशः स्वरूपातील ही सिरीज!
पूर्वीच्या काळी इतक्या सुरेख चालीरीती होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही पोस्ट सिरीज!! बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेनच पण आज सांगतोय… “तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर “… या संकल्पनेबद्दल!
या नावातच त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं की, पूर्वीच्या काळी “आजीबाईचा बटवा” नावाची संस्कृती घरोघरी होती. म्हणजे काय तर आजीजवळ एक छोटी चंची (बटवा) पिशवी कायम कमरेला खोचलेली असायची. ज्यात किरकोळ आजारावर गुणकारी ठरणारी जडीबुटी टाईप अनेक औषधी गोष्टी असायच्या. अगदी ओव्यापासून खडीसाखरेपर्यंत आणि लवंग विलायची पासून जायफळ, सुंठीपर्यंत… थोडक्यात तो एकप्रकारचा त्याकाळचा “फर्स्ट एड बॉक्स” होता. पोट दुखी, डोकेदुखी, मळमळ, ओकारी, चक्कर येणे अशा आजारावर आजी मग तिच्या ज्ञानातून योग्य ती गोष्ट बटव्यातून काढून द्यायची. उदा. कुणाचे डोकं दुखत असेल तर बटव्यातील वेखंडाचा तुकडा सहाणेवर उगाळून कपाळाला ती लावत असे अन थोड्या वेळात डोकेदुखी छू ssss व्हायची. आजीकडे ते ज्ञान तिच्या आधीच्या पिढीकडून आलेलं असायचं अन ते ज्ञान ती मग सुनांना देऊन त्यांनाही शहाणे करत असे.
किती छान होत ते सगळं तेव्हा!!
मात्र बटव्यामधील काही गोष्टी वापरून उपचार जसे केले जायचे तसेच पण बटव्यातील नाही तर डोक्यातील ज्ञान व पूर्वजांनी सांगितलेली हातोटी यातून काही वेगळे प्रकारही केले जायचे. आजच्या काळात त्याला फारतर :”मायनर ऑपरेशन” असं म्हणता येईल.
तर त्याकाळी विशेषतः लहान मुलांना अरबट चरबट काहीतरी खाल्याने महिन्यातून एकदोनदा तरी गॅसेस, अपचन,. पोट घट्ट होणे, असं काहीतरी हमखास व्हायच. मलाही ते व्हायचच व्हायच.
मग माझी आई जमिनीवर एक सतरंजी टाकून मला म्हणायची… “बनियन काढून झोप यावर उताणा”
आणि मी तसे झोपल्यावर आई गव्हाच्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याचा एक छोटा दिवा बनवायची. दिवाळीत अभ्यंगस्नान वेळी ओवाळताना बनवतात तसा साधारण! आणि मग त्या दिव्यात थोडं गोडेतेल टाकून वात त्यात भिजवून ती वात ठेवलेला तो दिवा आई मग माझ्या पोटावर (म्हणजे बरोब्बर बेंबीवर) अलगद ठेवायची. आणि वात पेटवून त्यावर पटकन पितळीचा जाड तांब्या ठेवून द्यायची.
दोन पाच मिनिटांनी तो तांब्या मग पोटाला घट्ट चिकटून जायचा. तो आई हलवून पाहायची. खूप घट्ट तो तांब्या बसलाय असं दहा मिनिटांनी जाणल्यावर आई मग त्या तांब्याच्या तोंडाशी एखादे बोट हळूच खुपसायची त्याबरोबर “पॉक्क ssss” असा आवाज यायचा. जो मला खूप आवडायचा पण!
तांब्या बाजूला केल्यावर तिथं विझलेला तो दिवा आई मग काढून बाजूला ठेवायची. त्यात थोडस तेल शिल्लक असायचं ते दोन तीन कोमट थेम्ब आई मग बेंबीत सोडून “उठू नको लगेच, पडून राहा पाच मिनिट” म्हणायची.
आणि मग पाच मिनिटांनी अस्मादिक एकदम फ्रेश झालेले असायचे. पोटदुखी गायब झालेली असायची.
तर अशी हि तांब्या ठेवण्याची साधारण प्रथा होती.
आपल्या पूर्वजांनी घरगुती जगण्यात विज्ञान इतक्या चपखलपणे बसवले होते की ज्याची बरोबरी आजच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही होणार नाही.
तर त्या तांब्या ठेवण्यामागचे विज्ञान काय होत?
तर जेव्हा दिवा पेटवून त्यावर तांब्या ठेवला जातो, तेव्हा तांब्याच्या आतली हवा संपून जाते आणि तिथं निर्वात पोकळी निर्माण होते. आणि बऱ्यापैकी व्हॅक्युम तयार होऊन पोटाला बाहेरून ओढल्यासारखं घडत. बेंबीच्या भोवतीच्या पोटातल्या नळ्या, आतडी जी अपचन अथवा अन्य कारणाने मिस्प्लेस झालेली असायची ती सगळी गपगुमान त्या निर्वात पोकळीने ओढल्या गेल्याने आपापल्या जागेवर येऊन बसायची. आणि दुखणं थांबायचं. काहीवेळा हल्ली डॉक्टरलोक अशा पोटदुखीबद्दल बोलतात सुद्धा की “आतड्यावर आतडी चढली आहेत… डिसलोकेट झाली आहेत त्यामुळे असं दुखत आहे”
तर तेच सगळं त्याकाळी घडलं तरी घरोघरी तांब्या मेथडने त्यावर उपचार व्हायचाही.
आजकाल असे घरगुती पण गुणकारी उपाय करताना फारसे कुणी दिसत नाही. त्यामुळेच कदाचित तांब्यासारख्या उपायाची प्रथा जी आता लुप्त होत जातेय असं वाटत. अर्थात अजूनही ग्रामीण भागातील काही स्त्रिया हि प्रथा, हा रिवाज जपताना आढळतात. माझ्याही पाहण्यात आहेत अशा स्त्रिया! मात्र ते प्रमाण वरचेवर कमी होत जातेय हे नक्की!असो… कालाय तस्मेय नमः!!
डॉ. डीडी क्लास : आताच्या पिढीला हे कदाचित माहित नसेल म्हणून सांगितलं आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या महिलांना त्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतील म्हणून हि पोस्ट! आता मुळात असे उपाय एक तर कुणाला माहीतच नाहीत अन माहित असले तरी डेअरिंग केली जात नाही. किरकोळ पोटदुखी असेल तरी लगेच मेडिकलवाल्याकडे जाऊन गोळ्या आणल्या जातात किंवा जास्त दुखायला लागलं तर थेट हॉस्पिटलचं! मात्र आपल्या भारतीय वैद्यक परंपरेत असे कितीतरी उत्तम उपाय होते, आहेत… जे त्या त्या वेळच्या वैद्यांनी आणि आज्जीबाई लोकांनी आमच्या आईसारख्या मागच्या पिढीला सांगून ठेवले. आणि ती प्रथा टिकून राहिली गेली. मात्र ता लुप्त होतेय… हे नक्की!
धन्यवाद! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या रिवाजाबद्दल!
तोवर स्टे ट्यून!
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





