श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ॥ ३३ ॥

अर्थ : मुमुक्षु साधकांनी भक्तीचे ग्रहण करावे, अर्थात भक्तीमार्गच स्वीकारावा.त्यांच्यासाठी तोच उपयुक्त आहे.

विवेचन : भक्ती स्वयंफलरूप आहे, म्हणून मुमुक्षुनेदेखील ‘सा एव’ म्हणजे तीच भक्तीच स्वीकारावी. आता मुमुक्षू कोणास म्हणावे याचा विचार करणे आवश्यक आहे. संसारात जे मानवदेहधारी जीव आहेत यांचे बद्ध, मुमुक्षू व मुक्त असे तीन प्रमुख भेद शास्त्रकारांनी कल्पिले आहेत. बद्धालाच विषयी असेही म्हणतात किंवा बद्धात पामर व विषयी असे दोन वर्ग मानले जातात. ऐहिक विषयभोगाचा धर्माधर्म, योग्य-अयोग्य न पाहता स्वैररूपाने अंगीकार करणारा रागद्वेषलोभादिकांनी युक्त अशा मनुष्यास पामर म्हटले जाते. ऐहिक भोगासक्त ते पामर व स्वर्गलोकातील म्हणजे पारत्रिक धर्म्य अशा पुण्यविशेषाने प्राप्त झालेल्या भोगात आसक्त पुरुषांना विषयी म्हटले आहे. पामर हा धर्माधर्म पाहत नाही, व विषयी धर्मानेच प्राप्त झालेल्या विषयाचे सेवन करीत असतो, त्यामुळे तोही बद्धच असतो. विषयासक्तीने रागद्वेषादिकांनी देहतादात्म्यानी, कर्म व कर्मफलासक्तीने व तन्मूलक अहंकार अज्ञानादि अनेक बंधनांनी तो बांधला गेलेला असतो, त्या बंधनातून सहजरीत्या तो बाहेर पडू शकत नाही. यालाच संसारबंधन म्हणतात. या बद्धासच शास्त्रीय भाषेत ‘बुभुक्षू, भोगासक्त असेही म्हटले जाते. या बुभुक्षूत दोन प्रकार संभवतात. मुमुक्षूत्व योग्य व अयोग्य एखादा भोगासक्त असला तरी पूर्वसुकृताने सत्संगतीत केलेल्या सच्छास्त्र श्रवणाने या भोगातील दोष अनुभवास आल्यामुळे त्यातील असारता जर कळू लागली तर यातून सुटावे असे वाटू लागल्यास त्यास मुमुक्षुत्वयोग्य म्हणावे, व असा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही, कोणी योग्य मार्गदर्शन केले तरी अश्रद्धा, दुराग्रह, कुतर्क, विपर्ययादी दोषांनी सन्मार्गाकडे न प्रवृत्त होणार्‍यांना मुमुक्षुत्व अयोग्य म्हटले जाते. ज्याचे पूर्वसंस्कार चांगले आहेत असे सदबुद्धिवान पुरुष ज्यांना इहपरभोगातील दोषाची पूर्ण कल्पना आली आहे, या देहात, संसारात राहणे म्हणजे एकप्रकारचे बंधन आहे, कारण मुक्तपणाने आनंदाचा भोग येथे नाही, अनेक बंधने अंतर्बाह्य रूपाने आपणांस पीडा देतात त्यामुळे जो दुःखी होतो व त्याचे परिमार्जन करण्याचा जो सतत प्रयत्न करतो त्यासच मुमुक्षू असे म्हटले जाते. 

भगवंत गीतेत म्हणतात,

केली कर्में मुमूक्षूंनी पूर्वी हे तत्व जाणुनी|

तैसी तू हि करी कर्में त्यांचा घेउनि तो धडा||

(गीताई ४.१५)

प्रत्येक मनुष्याला मुक्ति हवी असते. वयानुसार आणि प्रगल्भतेनुसार मुक्तिची व्याख्या बदलत जाते. लहान मुलांना खेळायला जायला मिळाले तर मुक्ति वाटते, तर तरुणांना मनाप्रमाणे वागायला मिळाले तर मुक्ति वाटते, मोठ्यांची मुक्ति थोडीफार वेगळी असते. पण मुक्तिची ही संकल्पना अगदीच सामान्य म्हणता येईल. 

खरी मुक्ति म्हणजे लौकिक आणि अलौकिक अशा सर्व पाशातून मुक्त होणे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगायचे. आवडता मित्र भेटला आणि त्याच्याशी गप्पा मारण्यात आपली गाडी चुकली किंवा एखादा वैरी भेटला आणि त्याच्याशी लढण्यात गाडी चुकली, तर दोन्हीमध्ये आपलेच नुकसान होणार. त्या अनुषंगाने इथल्या लौकिक अथवा अलौकिक अशा कोणत्याच गोष्टीत न गुंतता अलिप्त होणे, म्हणजे मुक्ति मिळवणे. मेल्यावर कदाचित मुक्ति मिळेल, पण जिवंत असताना जर मनुष्य सर्व लौकिक आणि पारलौकिक बंधनातून मुक्त झाला तर तो स्वतःच परमात्मा असल्याचा साक्षात्कार त्याला होऊ शकेल आणि हे सर्व भक्ति केल्याने सहज साध्य होऊ शकेल असे नारद महाराज आपल्याला सांगतात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted