श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “मीही हुतात्माच!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

स्काड्रन लीडर अभिमन्यू राय

मी ही हुतात्माच!

धार्मिक विचारांसाठी आपले प्राण देणाऱ्यास धर्मानुसार विविध मरणोत्तर उपाध्या दिल्या जातात. इस्लाममध्ये शहीद, ख्रिस्त धर्मात martyr तसेच हिंदू धर्मात हुतात्मा इत्यादी.

भारतीय सैन्य धर्मनिरपेक्ष तत्त्वावर काम करीत असल्याने या उपाध्या अधिकृतरित्या वापरल्या जात नाहीत. तर थेट शब्दांत killed in action, battle casualty, Died of Wound असे शब्दप्रयोग केले जातात.. आणि या शब्दांना परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अर्थाच्या छटा असतात, असे समजते!

सैनिकी कर्तव्य पार पाडत असताना सैनिकाला आलेला मृत्यू हा विशेष सन्मानाचा असतो. पण जनमानसात प्रत्यक्ष युद्धात शत्रूशी लढत असताना सैनिक धारातीर्थी पडला की त्याचे महत्त्व जास्त असते. शिवाय विविध पुरस्कार प्राप्त झालेले सैनिक, अधिकारी लोकांच्या जास्त नजरेत असतात. विशेषत: परमवीर चक्र, शौर्य चक्र इत्यादी प्राप्त सैनिक, अधिकारी! खरे तर देशासाठी गेलेला प्रत्येक जीव आपल्यासाठी सदैव नमस्कारणीय आणि प्रिय! असो.

भारतीय लष्कर आपल्या मित्रदेशांतील सैनिकांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण प्रदान करत असते. यांत प्रामुख्याने आशियाई, आफ्रिकी देशांतील सैनिकांचा, अधिकाऱ्यांचा समावेश असतो. जागतिक राजकारण, युद्धनीतीदृष्ट्या हे अत्यावश्यक आहे. चीनला शह देण्यासाठी व्हिएतनाम या देशाशी सुद्धा आपले मैत्री संबंध असून त्यांचा एक तरुण भारतात दिंडीगल हैदराबाद येथील हवाई प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी होता. पण हा प्रशिक्षणार्थी काही कारणांनी त्याच्याकडून अपेक्षित असलेला दर्जा राखू शकत नव्हता. प्रशिक्षण कालावधी जवळजवळ संपत आला होता. तरीही या प्रशिक्षणार्थी पायलटची मन:स्थिती पूर्ण तयार नव्हती. त्याचे प्रशिक्षण अर्धवट सोडून जाणे योग्य दिसणार नव्हते. शिवाय भारताच्या प्रशिक्षण संस्थांच्या इभ्रतीचा प्रश्न होताच. अशावेळी हे चक्रव्यूह भेदायला एक अभिमन्यू स्वयंस्फूर्तीने पुढे आला… अभिमन्यू राय! ग्रुप कॅप्टन श्री. अमिताभ राय यांचे सुपुत्र. लहानपणी त्यांनी पायलट होण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षात उतरवले. एन. डी. ए. खडकवासला येथे १२३व्या तुकडीत त्यांनी प्रवेश प्राप्त केला आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ते इंडियन एअर फोर्स फ्लाइंग ब्रांच १९२ मध्ये निवडले गेले. आणि २०१३ मध्ये एक अत्यंत कुशल वैमानिक बनून देशसेवेत रुजू झाले! अंगभूत कौशल्याच्या बळावर अभिमन्यू २०१५ मध्येच फ्लाईट लेफ्टनंट बनले. मालवाहक जड विमाने उडवण्यात अभिमन्यू यांनी विशेष कौशल्य प्राप्त केले होते! त्यांना Sqadran Leader पदावर पोहोचायला विलंब लागला नाही.

माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय पंतप्रधान महोदय अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई ताफ्यात अभिमन्यू साहेबांनी उत्तम सेवा बजावली होती. लवकरच हवाई प्रशिक्षक म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. भारताने पाकिस्तानमधील बालाकोट वर केलेल्या धाडसी हवाई हल्ल्यात अभिमन्यू साहेबांनी शौर्य गाजवले होते!

वर्ष २०२३. अभिमन्यू राय साहेब Dundigal Airbase हैदराबाद येथे कार्यरत होते.

चार डिसेंबर, २०२३. सकाळचे सव्वा आठ वाजले आहेत. Pilatus PC 7 Mk II हे प्रशिक्षण लढाऊ विमान सज्ज आहे. विमानात व्हिएतनाम मधून आलेले प्रशिक्षणार्थी पायलट वुहान थाईन तयार आहेत. त्यांना अभिमन्यू साहेब आज जादाचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष वेळ आणि परवानगी काढून विमानात उपस्थित आहेत…. आज कमी उंचीवरून वेगात उडण्याचा सराव करायचा आहे… उड्डाण करून चाळीस मिनिटे झालीत…. सर्वकाही ठीक सुरू असताना… विमान जमिनीकडे अत्यंत वेगाने निघाले… खाली लोकवस्ती होती… कोणत्याही क्षणी विमान जमिनीला धडकेल अशी स्थिती… अभिमन्यू साहेब यावेळी bail out करून अर्थात seat eject करून.. हवाई छत्री वापरून स्वतःचा जीव वाचवू शकत होते… पण अभिमन्यू साहेबांनी त्यांचे सर्व कसब पणास लावले आणि विमान लोकवस्ती पासून दूर नेण्यात यश मिळवले.. पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती..

एका मोठ्या खडकावर त्यांचे विमान आपटले आणि क्षणार्धात आगीचा गोळा बनले… दोन्ही वैमानिक विमानातच अडकून होते.. त्यांचे देहावसान झाले… भारताने एक समर्थ, देखणा, शूर, उमदा वैमानिक, प्रशिक्षक गमावला. व्हिएतनामने एक भावी वैमानिक गमावला. वीरमाता चित्रलेखा यांनी एकुलता एक मुलगा गमावला.. आणि फ्लाईट लेफ्टनंट अक्षिता आणि Sqadran Leader अभिमन्यू राय यांचा काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार असा अकाली संपला! अभिमन्यू साहेबांच्या सहधर्मचारिणी भारतीय हवाई दलात सेवेत आहेत!

त्यादिवशी कमी उंचीवरून विमान उडवण्याचा सराव करताना प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण बहुदा सुटले असावे, असे म्हटले जाते.

अभिमन्यू साहेब वेगवेगळ्या जातीची सहा विमाने उडवू शकायचे.. ही गोष्ट अत्यंत कठीण समजली जाते.

अभिमन्यू साहेबांच्या घरचे आणि त्यांच्या पत्नीच्या माहेरची सुमारे चाळीस माणसे भारतीय सैन्यात विविध पदांवर आणि विभागात सेवेत आहेत!

सामान्य माणसांचे मरणे आणि सैन्यसेवेतील माणसांचे मरणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. एक सैनिक तयार व्हायला प्रचंड कष्ट, वेळ आणि पैसे लागतात. सैनिकाच्या जडण घडणीत आई वडिलांचा सिंहाचा वाटा असतोच असतो. सैनिकाचे लग्न होईपर्यंत त्याचा आणि आई वडिलांचा सहवास सर्वाधिक असतो.. भावनिक नाते घट्ट असते. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख डोंगराएवढे म्हणावे लागेल. पण यावेळेपर्यंत आई वडिलांचे आयुष्य निम्म्यावर पोहोचलेले असते.. तर सैनिकाचे आणि त्याच्या पत्नीचे जीवन ऐन बहरात असते. पत्नीपुढे तिचे सबंध आयुष्य पडलेले असते. त्यामुळेच विवाहित सैनिकाची पत्नी हीच सैनिकाची Next of Kin अर्थात जवळची व्यक्ती समजली जाते.. तशी कायद्यात तरतूद आहे. वरवर यात काहीही गैर दिसत नाही!

अभिमन्यू साहेबांच्या मृत्यूने आई, वडील आणि त्यांची पत्नी यांचे झालेले भावनिक नुकसान कधीही भरून न येणारे असेच आहे. त्यांना नियमानुसार आर्थिक नुकसानभरपाई मिळाली असेलच. पण देशसेवेत असताना आपला मुलगा गेला.. त्याला कुणी हुतात्मा समजत नाही.. याचे शल्य विशेषकरून आई वडिलांना आहे! जनतेचे जीव वाचावेत म्हणून अभिमन्यू साहेब त्या जळत्या चक्रव्यूहात थांबून राहिले… त्यांनी ते विमान लोकवस्तीपासून दूर नेले हा पराक्रमच नव्हे का? असा आई वडिलांचा समाजाला सवाल आहे!

अभिमन्यूच्या आई वडिलांनी जिथे अभिमन्यू साहेबांचा मृत्यू झाला त्या जागेवर स्मारक उभारले आहे आणि स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यास स्वखर्चाने स्मृतिवन तयार करण्याचीही त्यांची इच्छा आहे! साहेबांचे वडील श्री. अमिताभ राय आजही तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात! राय पती-पत्नी व्हिएतनाम मध्ये जाऊन त्या वैमानिकाच्या घरी भेट देऊन आले आहेत… दोन्ही परिवार जीवनाने नव्हे पण मृत्यूने असे एकत्र आले! अभिमन्यू साहेबांच्या मातोश्रींनी त्यांच्या या बहादुर मुलाचे चित्र त्यांच्या हातावर गोंदवून घेतले आहे… permanent tatoo! हा tatoo काढणाऱ्या कलाकाराने यासाठी मानधन नाकारले होते!

हुतात्मा सैनिकाच्या पत्नीसह सैनिकाच्या आईवडिलांना सुद्धा तेवढाच सन्मान दिला जावा.. अशी त्यांची व्यवस्थेकडे मागणी आहे… जी रास्तच आहे! जनतेने सुद्धा सर्वच हुतात्मा सैनिकांचा सारखाच सन्मान राखला पाहिजे… त्यांच्या कुटुंबीयांकडे आत्मियतेने लक्ष दिले पाहिजे!

हुतात्मा अभिमन्यू राय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted