श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “मृत्यूला चारवेळा हुलकावणी दिलेला वायुसूत वैमानिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
शाळेतील इतर मुलांप्रमाणे हा मुलगाही कागदी विमाने तयार करून उडवत असावा, पण याचे कागदी विमान मात्र निश्चित योग्य पद्धतीने सुरक्षित जमिनीवर उतरत असावे, हे मात्र निश्चित. आभाळातून प्रचंड वेगाने जाणारी लढाऊ विमाने आणि अधिक उंचीवरून उडत जाणारी प्रवासी विमाने यांत त्याला लढाऊ विमानांचे आकर्षण जास्त वाटे. त्यामुळेच घरची परिस्थिती फारशी सकारात्मक नसताना, पालकांचा विरोध असतानाही हा तरुण प्रचंड अभ्यास,अदम्य आत्मविश्वास या जोरावर १९६१ मध्ये एन. डी. ए. खडकवासला येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला.
दिलीप कमलाकर पारूळकर १९६३ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले. १९६२ चे भारत-चीन युद्ध संपुष्टात आलेले होते. भारतीय सेनेचे मनोबल तसे काहीसे खालावलेले होते. अशात पाकिस्तानने १९६५ मध्ये आगळीक केली आणि यात भारतीय सेनेला आपल्या तलवारी पुन्हा एकदा परजायची संधी मिळाली!
आपले कथानायक अशा संधीची वाटच पहात होते… त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करायला निघालेल्या तुकडीत स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारली. हल्ला सुरु झाला… लक्ष्य वेधले जाऊ लागले. पाकिस्तानाला अमेरिकेने विकलेल्या पॅटन रणगाड्यांवर विमान विरोधी तोफा बसवलेल्या होत्या. या तोफेने पारुळेकर साहेबांच्या विमानाचा खालून अचूक वेध घेतला… एक गोळी कॉकपिटमध्ये शिरली आणि साहेबांच्या उजव्या खांद्यातून आरपार वर निघून गेली. साहेबांनी त्यांच्या खुर्चीवर डोके टेकवलेले नसल्याने त्यांचे डोके बचावले.. पण खांद्यातून प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. हातात ताकद राहिली नसल्याने त्यांना विमानावर नियंत्रण करणे अवघड झाले होते… त्यामुळे त्यांना युद्धक्षेत्रात टिकून राहणे अशक्य झाले. हल्ल्याचे नेतृत्व करणा-या अधिका-याने आपल्या या वैमानिकाला आदेश दिला… विमानातून बाहेर पडा! पण या बहादराने आदेशाकडे काणाडोळा केला… आणि एका हाताने विमानावर नियंत्रण राखीत भारतीय विमानतळावर हे विमान सुरक्षितरीत्या उतरवण्यात यश मिळवले… एक महागडे विमान आणि एक अमूल्य वैमानिक या कृतीमुळे बचावले गेले! या कामगिरीबद्दल भारतीय वायुसेनेने पारुळेकर साहेबांना वायू सेना मेडल देऊन सन्मानित केले!
विमानातून उडी न घेता विमान उडवत नेऊन भारतीय तळावर नेण्याचा त्यांचा हा निर्णय प्रमुखाची आज्ञा भंग करणारा होता खरा… परंतु तो आदेश त्यांनी पाळला असता तर वैमानिकाच्या आसनामध्ये बसवण्यात आलेली छत्री उघडलीच गेली नसती… चारशे किलोमीटर्स प्रती तास या वेगाने पारूळकर साहेब जमिनीकडे कोसळले असते… कारण पाकिस्तानी गोळीबारात त्यांच्या कॉकपिट मध्ये शिरलेली गोळी, त्यांच्या खांद्यातून विमानात वैमानिकाच्या खुर्चीच्या वरच्या भागात असलेल्या छत्रीचा खटका नादुरुस्त करून वर निघून गेली होती… खुर्ची हवेत उडाली असती पण या खुर्चीला जोडलेली हवाई छत्री उघडली गेलीच नसती!
पारूळकर साहेबांनी मृत्यूला दिलेली ही पहिली हुलकावणी ठरली… कुशल लढाऊ वैमानिकाच्या अंगी हा हुलकावणी देण्याचा गुण असावा लागतोच.
२ मे,१९७०. फ्लाईट लेफ्टनंट पारुळेकर साहेब सुखोई ७ विमान उडवत होते… त्यांना शिमला येथे जायचे होते… पण विमानाच्या इंजिनाने दगा दिला… साहेबांना विमानातून उडी घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
१० डिसेंबर,१९७१. भारत-पाकिस्तान बांगलादेश मुक्तीसंग्राम युद्ध. भारतीय विमाने पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खोलवर घुसली होती… जोरदार हल्ला सुरु असताना नेमके पारुळेकर साहेबांचे सुखोई ७ विमान पाकिस्तानी विमानविरोधी तोफांच्या तुफान हल्ल्यामध्ये सापडले… सुदैवाने विमान जास्त उंचीवर असल्याने साहेबांना विमानातून अचूक उडी घेता आली… पण ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले आणि युद्धकैदी झाले! भारताने युद्ध जिंकल्यावर एकमेकांच्या युद्धबंदी सैनिकांची पाठवणी करण्याचे सत्र सुरु झाले. परंतु पाकिस्तानी कैदेत असलेल्या भारतीय वैमानिकांची सुटका होण्यात विलंब लागू लागला. १९६९ मध्ये त्यांचे कमांडिंग ऑफिसर एम. एस. बावा यांना “मी शत्रूच्या तावडीत सापडलो तरी तिथून पळून येईन” असे सांगितलेल्या पारुळेकर साहेबांना असे कैदेत जास्त दिवस राहणे,शक्य झाले नाही. त्यांनी तेथील बंदिगृहात मिळतील त्या साधनांनी,अतिशय उत्तम योजना आखून आणखी दोन वैमानिकांसह बंदिगृहातून पलायन केले. परंतु हे पलायन अगदी ऐनवेळी अयशस्वी झाले. अफगाणिस्तान हद्दीच्या अगदी समीप असताना हे तिघे पाकिस्तानला सापडले आणि त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली! त्यांनी योजना आखताना पाकिस्तानचा त्या भागातील नकाशा तयार केला होता. त्यात एक रेल्वे स्टेशन आहे, अशी त्यांची माहिती होती. त्या रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे, आणि तेथून अफगाणिस्तानात शिरायचे,असे ठरले होते. परंतु हे रेल्वे स्टेशन खूप वर्षांपूर्वीच बंद करण्यात आलेले होते… आणि हे तिघे याच रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारत होते… त्यामुळे गडबड झाली.. सुटका केवळ चार मैलांवर असताना हे तीन गरुड पुन्हा कैदेत गेले! या तिघांना गोळ्या घालून ठार करावे, असा आदेश पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी दिला होता… हे तिघे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्यांना गोळ्या घातल्या… अशी बतावणी करता येईल, अशी त्यांची अटकळ होती. पण तत्कालीन पाकिस्तानी वायुसेना प्रमुखाने त्यांना पुढे होऊ शकणा-या परिणामांची जाणीव करून दिल्याने तो प्रकार टाळला गेला,असे समजते… पण पुढे काही दिवसांनी पारुळेकर साहेब आणि त्यांच्या अन्य सहका-यांची भारतात सुखरूप पाठवणी झाली… पण त्यांचे १ डिसेंबर,१९७२ रोजी वाघा सीमेवर फार जल्लोषात स्वागत करण्यात आले होते! या जगप्रसिद्ध पलायनाविषयी फेथ जॉनस्टन यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे… फोर माईल्स टू फ्रीडम! या धाडसी कामगिरीवर एक चित्रपटही निर्माण करण्यात आला… दि ग्रेट इंडियन एस्केप.. यातले नायक आहेत.. तिघेही त्यावेळचे फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारुळकर,एम. एस. ग्रेवाल उर्फ गॅरी, हरीश सिंग उर्फ हॅरी. ही कथा तरणजीतसिंग नामधारी यांनी दिग्दर्शित केली होती.
२४ जानेवारी,१९७५. स्क्वाड्रन लीडर दिलीप पारुळेकर साहेब यावेळीही सुखोई ७ उडवत होते… आज तिसरा अपघात होणार होता… तांत्रिक बिघाड झाला आणि सुखोई जमिनीकडे वेगाने जाऊ लागले.. साहेबांनी याहीवेळी अचूक उडी घेतली… सलग चौथ्या वेळी त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली होती!
पुढील कारकीर्दीत दिलीप पारूळेकर साहेबांनी भारतीय वायुसेनेत उल्लेखनीय कामगिरी केली. लढाऊ विमान प्रशिक्षक म्हणून त्यांचे काम अतिशय प्रभावी होते. सिंगापूरच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना दोन वर्षे प्रशिक्षण देण्यासाठी झालेली त्यांची निवड अत्यंत योग्य अशी ठरली. पुढे खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांनी दीर्घकाळ बटालियन कमांडर म्हणून भरीव कामगिरी बजावली. त्यांच्या एकूण देदीप्यमान कारकीर्दीचा गौरव म्हणून वायुसेनेने त्यांना विशिष्ट सेना मेडलने गौरवले.
ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर पारूळकर साहेबांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली नसती तर ते सहज एअर मार्शल पदावर पोहोचले असते. सेवानिवृत्तीनंतर साहेबांनी पर्यावरण संरक्षण आणि शेतीमध्ये लक्ष घातले. खेळ हा त्यांचा आवडीचा प्रांत होता,त्यासाठी ते नियमितपणे विम्बल्डनची वारी करीत. पुणे शहरात त्यांनी आपला अखेरचा कालावधी घालवला. तब्बल चार वेळा मृत्यूला चकवा दिलेल्या पारुळकर साहेबांना दहा ऑगस्ट,२०२५ रोजी त्यांच्या वयाच्या ८२ व्या गाठले! पण तोपर्यंत साहेब अतिशय अभिमानास्पद आयुष्य जगले! त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी भारतीय वायुसेनेने त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला! फेअर विंडस! असे नौदलात शुभेच्छा देण्याची पद्धत आहे… म्हणजे तुम्ही ज्या जहाज प्रवासाला निघाला आहात… त्या प्रवासात तुम्हांला वा-याची उत्तम साथ लाभो… पारुळकर साहेबांचे सारे आयुष्य वा-याशी स्पर्धा करण्यात गेले.. त्यांच्या स्वर्गापर्यंतच्या प्रवासात त्यांना ‘फेअर विंडस’ म्हणूयात!! …
भावपूर्ण आदरांजली! जय हिंद!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






