अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ नंतर नाही, आताच… – लेखिका: अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆
“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी… आणि आयुष्य सरण्यापूर्वी जगून घ्यायला हवं. ”
ही ओळ साधी वाटते, पण तिच्यात आयुष्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे.
आपल्या कपाटात अनेक साड्या असतात… काही खास प्रसंगासाठी, काही “नंतर कधीतरी” म्हणून ठेवलेल्या. पण तो “नंतर” अनेकदा कधीच येत नाही. साडी तशीच राहते… आणि हळूहळू तिचा रंग फिका होत जातो.
हेच आपल्या आयुष्याबाबतही होत नाही का?
आपण सतत काहीतरी पुढे ढकलत राहतो—
“आत्ता वेळ नाही… नंतर करू…”
“थोडं स्थिर झाल्यावर जगू…”
“जबाबदाऱ्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढू…”
पण खरं सांगायचं तर,
आयुष्य कुणासाठीही थांबत नाही.
क्षण निघून जातात… आणि आपल्याला कळतही नाही.
आपण इतरांसाठी जगताना स्वतःला विसरतो.
इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधताना,
आपली स्वप्नं, आपल्या इच्छा… हळूहळू मागे पडतात.
साडीप्रमाणेच आयुष्यही जपून ठेवायचं नसतं,
ते जगून घ्यायचं असतं.
मनात येईल तेव्हा हसायचं,
आवडेल तसं सजायचं,
ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्यायचा,
आणि स्वतःलाही थोडंसं जगू द्यायचं.
कारण शेवटी,
ना साड्या कायम राहतात…
ना क्षण परत येतात…
म्हणूनच—
“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी…
आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. ”
कारण आयुष्य खूप मोठं नसतं,
पण ते सुंदर नक्की असू शकतं…
जर आपण ते मनापासून जगलो तर…
शेवटी इतकंच—
“उद्या” कधीच खात्रीचा नसतो…
म्हणून आजचं आयुष्य, आजचं हसू, आजचं प्रेम…
आजच जगून घ्या…
लेखिका:अज्ञात
प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






