श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ७ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘आत्या’ (माहेरच्या मायेचा एक हळवा कोपरा)

​नात्यांना काही नावे असतात आणि काही नात्यांना सुगंध असतो. नाव उच्चारलं की नातं समोर येतं; पण काही नाती आठवली की मनात एखादा गंध दरवळतो… जुन्या घराचा, अंगणातल्या तुळशीचा, उन्हाळ्याच्या सुट्टीचा, चुलीवरच्या स्वयंपाकाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायेचा!

​‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीची ‘संस्कारांची शिदोरी’, आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’, मामाचा ‘माहेरचा समृद्ध दुवा’ आणि मावशीची ‘आईची प्रतिछाया’ अनुभवली. या महावस्त्रात असाच एक अत्यंत हळवा, आपुलकीचा आणि माहेर-सासर या दोन घरांना जोडणारा रेशमी धागा म्हणजेच ‘आत्या’!

​तुम्ही म्हणाल, कशासाठी सांगत आहात ही नाती? तर नात्यांनीच कुटुंब आणि समाज जोडला जातो. आपलं जीवन समृद्ध होतं ते नात्यांमुळेच ना! आपल्याला एकट्याला काय महत्त्व आहे?

​जशी आईची बहीण म्हणजे मावशी, तशी वडिलांची बहीण म्हणजे आत्या. मावशी आणि आत्या… नावं वेगळी आहेत, नाती वेगळी आहेत; पण माया आणि प्रेम यात फरक नाही. कदाचित व्यक्तिपरत्वे थोडाफार फरक कोणाला जाणवू शकेल, पण त्याचा विचार इथे आपल्याला करायचा नाही.

​वडिलांच्या बहिणीला आपण ‘आत्या’ म्हणतो. नात्यांच्या व्याख्येत ही माहिती अगदी पुस्तकी आणि बरोबर आहे; पण भावनेच्या कोशात ‘आत्या’ या शब्दाचा अर्थ एवढाच नसतो. आत्या घरातील सगळ्या नात्यांना व्यापून उरते. आत्या म्हणजे बाबांच्या माहेरची जिवंत आठवण.

​‘बाबांचं माहेर?’ तुम्ही म्हणाल, “अहो, माहेर आईचं असतं, बहिणीचं असतं; बाबांचं कसं असेल?”

​पण मला वाटतं, बाबा लहान असताना ज्या गावी राहिले, ज्या घरात राहिले आणि आई-बाबा आदी ज्या व्यक्तींसोबत राहिले, ते ठिकाण म्हणजे त्यांचं माहेरच! एखाद्या स्त्रीला आपल्या माहेरची जेवढी ओढ असते, तेवढीच ओढ बाबांनाही त्यांनी बालपण जिथे घालवलं, ज्यांच्यासोबत घालवलं त्या नातेवाईकांची आणि मित्रांची असते. आणि आत्या म्हणजे बाबांच्या बालपणाची साक्षीदार! एकाच घरात वाढलेले, बरोबर जेवलेले, दंगामस्ती केलेले, छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडलेले, रुसलेले आणि पुन्हा हसलेले. आपल्या बाबांना ‘अरे’ म्हणून हक्काने हाक मारणाऱ्या मोजक्या व्यक्तींमधली ती एक! आणि म्हणूनच कदाचित ‘आत्या’ या नात्यात आपल्या बाबांच्या बालपणाचा एक सुंदर तुकडा दडलेला असतो.

​आईच्या माहेरची माणसं आपल्याला ‘मामा’, ‘मावशी’, ‘आजोबा’, ‘आजी’ म्हणून लहानपणापासूनच जवळची वाटतात. पण बाबांच्या माहेरची माणसंही तितकीच आपली असतात, हे जाणवायला कधी कधी थोडा वेळ लागतो. कारण वडील स्वतःच्या भावना फारशा बोलून दाखवत नाहीत; त्यांच्या माहेरच्या आठवणींचा कप्पा ते सहज उघडत नाहीत. पण जेव्हा आत्या घरी येते, तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावर अचानक एक वेगळंच निष्पाप बालपण उमलतं.

​”अरे, तू अजूनही तसाच आहेस!”

आत्याने बाबांना असं म्हटलं की आपण आश्चर्याने बाबांकडे पाहतो. कारण आपल्यासाठी ते शिस्तप्रिय बाबा असतात, पण आत्यासाठी तो अजूनही तिचा लहान भाऊ असतो! त्यांच्या बालपणीच्या खोड्या, भांडणं, रुसवे-फुगवे, शाळा, खेळ, आईचा धाक आणि वडिलांची शिस्त… सगळं काही तिच्या स्मरणात ताजंतवानं आणि जिवंत असतं. जसा अनेक वर्षांपूर्वीचा एखादा फोटोंचा अल्बम पाहताना आठवणी जाग्या होतात, तसाच बालपणीच्या आठवणींचा अल्बम आत्या आली की उघडला जातो. म्हणूनच आत्या म्हणजे केवळ एक नातं नाही; ती आपल्या वडिलांच्या हरवलेल्या बालपणाची खरीखुरी साक्षीदार असते.

​बालपणात आत्या म्हणजे एक वेगळीच लाडकी व्यक्ती असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावाला जाणं म्हणजे जणू एखादी आनंदी सहलच! तिच्या घरात गेल्यावर आईच्या घरापेक्षा थोडं अधिक स्वातंत्र्य मिळतं. खाण्यापिण्याच्या बाबतीतही तिचा हात थोडा सैलच असतो. “अरे, घे ना अजून एक!” आई समोर असताना ज्या गोष्टीसाठी दहा वेळा विचार करावा लागतो, ते आत्याकडे एकदाच मागितलं की मिळतं! आणि आईने जर आत्याकडे आपल्या मुलाच्या खोड्यांची तक्रार केली, तर आत्या बहुतेक वेळा मुलांचीच बाजू घेते.

​”असू दे गं… मुलंच आहेत. थोडं खेळणार, थोडा दंगा करणार!”

आत्याच्या या एका वाक्यात भाच्याला मिळालेला हक्काचा जामीन असतो! पण आत्या फक्त लाड करणारी नसते, वेळ आली तर ती प्रेमाने समजही देते. आई रागाने बोलते, बाबा शिस्तीने बोलतात आणि आत्या मायेने समजावते. तिच्या बोलण्यात अधिकार असतो, पण त्या अधिकाराला मायेची रेशमी किनार असते.

​माझ्या लहानपणाच्या अनेक आठवणी आत्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्या आठवणी लिहायच्या म्हटलं, तर आत्याच्या उल्लेखाशिवाय त्या पूर्ण होणारच नाहीत. तसं तर मला दीर्घकाळ आत्याची माया लाभली. मी लहान असताना, नोकरीला लागल्यानंतर तसेच पुढे लग्न झाल्यावरही तिने माझं भरभरून कौतुक केलं आहे. माझी आत्या कल्याणला राहायची. आत्या आणि तिचे यजमान यांनी माझ्या मनावर उत्तम संस्कारांचं शिंपण केलं, त्यातून मी खूप काही शिकलो.

​माझं लहानपण एका अगदी छोट्या खेड्यात गेलं. पण आत्या कल्याणला राहत असल्याने मी दर सुट्टीत तिच्याकडे जायचो. ग्रामीण भागात राहत असलेल्या माझ्यासारख्या अजाण मुलाला शहरी संस्कृतीचा स्पर्श आणि ओळख तिच्यामुळे झाली. आत्याच्या यजमानांनी स्वतः माझ्यासोबत फिरून त्यावेळची मुंबई मला दाखवली आणि अनेक गोष्टींची माहिती दिली. त्यांनीच मला तेव्हा ‘मनाचे श्लोक’ हे पुस्तक भेट दिलं होतं. ते मला म्हणाले होते, “विश्वास, हे श्लोक पाठ कर. ते पाठ झाले की मला सांग.” त्याप्रमाणे मी तेव्हा सगळे श्लोक पाठांतर केले होते. त्यांनी त्यावेळी मला एक वही आणि पेन बक्षीस म्हणून दिले होते.

​आज इतकी वर्षं उलटून गेली, तरी ती वही, ते पेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ‘मनाचे श्लोक’ अजूनही माझ्या हृदयात कोरलेले आहेत. पुढे याच ‘मनाचे श्लोकां’शी माझं नातं इतकं दृढ होईल आणि त्यावर माझ्याकडून एक विस्तृत लेखमाला लिहिली जाईल, याची त्या वेळी मला कल्पनाही नव्हती! माझे आतेभाऊही माझ्यापेक्षा मोठे होते, पण त्यांनीही मैत्रीच्या नात्याने माझ्याशी वागून मला खूप प्रेम दिलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या.

​काही नाती केवळ भेटीगाठींनी टिकत नाहीत; ती आठवणींच्या मुळांनी टिकतात. काळ जसजसा पुढे जातो, आपण मोठे होतो आणि मग शिक्षण, नोकरी, संसार, मुलं… प्रत्येक जण आपापल्या जगात रमतो. आत्याच्या घरच्या फेऱ्या कमी होतात, फोनवरच्या गप्पा कमी होतात. ‘नंतर बोलू’ म्हणता म्हणता असे अनेक ‘नंतर’ निघून जातात; पण नात्यातील ‘अंतर’ कधीच वाढत नाही.

​आजच्या काळात कुटुंबाची व्याख्याही बदलली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात आत्याचं येणं-जाणं सहज असायचं. घर मोठं होतं, माणसं जास्त होती, अंगण मोठं होतं, माणसांची मनंही मोठी होती आणि वेळही भरपूर होता. पण आता काळानुसार सगळ्याच गोष्टींचा संकोच झाला आहे. माणसं जवळ असूनही वेळ दूर निघून गेला आहे. पूर्वी आत्या अचानक दारात उभी राहायची, “काय गं, आलीस?” असा प्रश्न विचारण्याआधीच घरात तिच्या स्वागताची तयारी व्हायची! आज कोणीच अचानक येत नाही. आधी फोन येतो—”वेळ आहे का? तुम्ही घरी आहात का?” सगळ्याच गोष्टी बदलल्या.

​आत्याच्या नात्यात आणखी एक सुंदर गोष्ट असते. ती आपल्या आईची नणंद असली, तरी अनेकदा आईची जिवाभावाची मैत्रीणही असते. दोघी एकत्र आल्या की जुन्या आठवणींची पेटी उघडते. बाबांच्या बालपणातील गमतीशीर किस्से बाहेर येतात आणि मग आपल्याला कळतं—आपले बाबा ज्या व्यक्तीला ‘माझी बहीण’ म्हणतात, तिच्यासाठी ते अजूनही ‘दादा’ किंवा ‘भाऊ’च आहेत. लग्नातील किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांच्या आठवणी निघतात; घर काही क्षण का होईना, पुन्हा हसतं-खेळतं होतं.

​भावाबहिणीचं नातंही अतिशय विलक्षण असतं. लहानपणी एकमेकांशी क्षुल्लक गोष्टीवरून भांडणारे, मोठे झाल्यावर एकमेकांच्या संकटात धावून जाणारे! संसाराच्या वाटेवर दोघे वेगवेगळ्या घरात गेले, तरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात त्यांचं माहेरचं घर कायम राहतं; आणि त्या माहेरच्या घराची एक जिवंत खूण असते—‘आत्या’.

​म्हणूनच, दुर्दैवाने जेव्हा वडील जग सोडून जातात, तेव्हा आत्याला होणारं दुःख फक्त भावाच्या जाण्याचं नसतं; तिच्या आयुष्यातील एक संपूर्ण मोठा अध्याय बंद झाल्याचं असतं. ‘माझा भाऊ’ म्हणत ज्याच्याशी ती आयुष्यभर बोलली, भांडली, हसली, रुसली… त्याचा आवाज अचानक कायमचा शांत झालेला असतो. त्या वेळी आत्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहताना आपणही अंतर्मुख होतो. तेव्हा जाणवतं की नाती केवळ रक्तावर आधारित नसतात, आठवणींची मुळे त्याहून खूप खोल गेलेली असतात!

​आत्या आणि भाचा-भाची यांचं नातंही तितकंच सुंदर. आई-वडिलांच्या शिस्तीच्या चौकटीबाहेर मायेची एक मोकळी खिडकी उघडी ठेवणारी व्यक्ती म्हणजे आत्या! भाच्यांच्या यशात मनापासून आनंद मानणारी आणि त्यांच्या अपयशातही त्यांना प्रेमाने धीर देणारी. आज भाचा मोठा झाला, त्याला स्वतःची मुलं झाली, तो स्वतः बाबा झाला; तरी आत्याच्या नजरेत तो अजूनही तोच छोटासा मुलगा असतो. “किती मोठा झालास रे!” हे वाक्य आत्या जितक्या वेळा म्हणते, तितक्या वेळा आपल्याला जाणवतं की तिच्या मनात आपण कधीच मोठे झालेले नसतो. आणि आजच्या कृत्रिम जगात ही गोष्ट किती दिलासा देणारी असते!

​आत्याला हिंदीत ‘बुआ’ म्हणतात. अनेक हिंदी चित्रपटांतून, मालिकांतून आणि कथांमधून हे नातं आपल्याला डोकावताना दिसतं. पण भाषा बदलली की नातं बदलत नाही. ‘आत्या’ म्हटलं की जशी आपल्या मनात मायेची एक ओळखीची प्रतिमा उभी राहते, तशीच ‘बुआ’ म्हटलं की हिंदी भाषिकांच्या मनातही! शब्द वेगळे, उच्चार वेगळे; पण नात्याची ऊब मात्र तीच! ‘बुआ’ या शब्दातही एक वेगळीच गोडी आहे. हिंदी घरात कदाचित “बुआ के घर चलो!” असं म्हटलं की बालपणाला आनंदाची चाहूल लागते, आणि मराठी घरात “आत्याकडे चल!” म्हटलं की बालपणाला पंख फुटतात! पण दोन्हीकडे स्वागत करणारा मायेचा हात मात्र अगदी सारखाच असतो. कारण नाती भाषेच्या सीमा मानत नाहीत—‘आत्या’ असो की ‘बुआ’!

​आजच्या डिजिटल युगात नाती एका क्लिकवर जोडली जातात आणि एका क्लिकवर दूरही जातात. व्हिडिओ कॉलवर चेहरे दिसतात, संदेशांमध्ये शुभेच्छा येतात. पण आत्याने हातावर ठेवलेला उबदार हात, डोक्यावरून फिरवलेली मायेची थाप आणि “काळजी घे रे!” म्हणताना तिच्या आवाजात उतरलेली खरीखुरी काळजी… याला जगात कोणत्याही डिजिटल तंत्रज्ञानाचा पर्याय नाही.

​वय वाढतं तसं माणसाला महागड्या भेटवस्तूंपेक्षा माणसं अधिक हवीहवीशी वाटतात—विशेषतः आपल्या माहेरच्या आठवणींशी जोडलेली माणसं. कारण ज्या घरातून ती कधीतरी सासरी गेली, त्या घरातील माणसं, आवाज, हसणं-रडणं, रुसवे-फुगवे, सण-उत्सवांची लगबग… सगळं तिच्या मनात कुठतरी जिवंत असतं. तिच्या माहेरच्या आठवणींचा शेवटचा धागा कधी कधी तिच्या भावाच्या मुलांशी जोडलेला असतो.

​म्हणूनच आत्याला भेटणं म्हणजे केवळ एका नातेवाईकाला भेटणं नव्हे! ते आपल्या वडिलांच्या बालपणाला भेटणं असतं. आपल्या कुटुंबाच्या जिवंत इतिहासाला भेटणं असतं. आणि आपल्या स्वतःच्या बालपणातील एका सुंदर पानाला पुन्हा अलगद स्पर्श करणं असतं.

​‘आत्या’ हे नातं माहेरच्या अंगणातल्या त्या जुन्या, समृद्ध झाडासारखं असतं… ज्याच्या सावलीत आपण कधीतरी खेळलो होतो, ज्याच्या फांद्यांवर कधी झोका घेतला होता; आणि आयुष्याच्या उन्हात खूप पुढे आलो, तरी ज्याची शीतल सावली मनातून कधीच जात नाही… आत्या म्हणजे त्या सावलीचं मायेचं नाव!

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted