कधी नव्हे तो निवांतपणा मिळाला होता. उकाडा फार जाणवायला लागला होता. बाल्कनीत जरा हवा येत असेल म्हणून तिथे खुर्ची टाकून बसले होते. मग नजर सहजच इकडेतिकडे भिरभिरायला लागली, आणि दररोजच समोर असणाऱ्या कित्येक गोष्टी नव्यानेच पहातेय असं वाटायला लागलं……
… त्यातलेच एक हे घरासमोरील मोठ्ठे पिंपळाचे झाड …’ आजूबाजूचं सगळंच इतकं बदललंय.. पण हे झाड मात्र गेली कित्येक वर्षं आहे तसंच आहे.. ते कसं काय ?‘…
… इतक्यात वाऱ्याची एक सुखद झुळूक आली.. अंग मोहरून उठलं.. समोरचं ते झाडही सळसळलं …. आणि.. आणि बघता बघता त्याची कितीतरी पानं अल्लाद झाडावरून खाली पडली.. मला कसंतरीच झालं.. एकदम जाणवलं की ही तर पानगळ सुरु झालीये.. म्हणजे आता शिशिर संपून वसंत ऋतू येणार तर … आणि मग त्या भिरभिरणाऱ्या पानांबरोबर मनही भिरभिरायला लागलं – – –
खरंच.. काय गंमत आहे ना.. कोणी न सांगताच या झाडांना कळतंय की वर्षभर ज्याची वाट पाहात होतो तो आपला प्रिय सखा वसंतराजा आता येणार म्हणून.. आणि झाडं आता त्याच्या स्वागताची जणू तयारी करताहेत.. मनात आलं.. ही झटकून टाकलेली पानं म्हणजे जणू इतके दिवस नावडत्या सोबत्याबरोबर राहावे लागल्याने मनाला आलेली मरगळच अशी क्षणार्धात झटकून टाकली असेल का ? पण मग ज्यांच्यामुळे झाडांना शोभा अशी ती पानं एकदम अशी निरुपयोगी समजून दूर फेकून देतांना काहीच दु:ख नसेल का झालं झाडाला ?……
…. असं नसेल पण.. इतकं कठोर नि कृतघ्न व्हायला झाडं म्हणजे माणसं थोडीच आहेत ? मग हे कदाचित फक्त स्थित्यंतर असेल …. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.. किंवा झाडाचा पुनर्जन्म ??
आत्मा तोच आणि वरचा साज मात्र नवा.. कोवळ्या लुसलुशीत तजेलदार पानांचा !!.. असंच असावं….
.. म्हणूनच तर या खाली पडलेल्या पानांच्या चेहेऱ्यावर कुठे दु:ख दिसत नाहीये ! कशी आनंदाने भिरभिरताहेत ! त्यांची जागा घेऊन आता झाडावर अभिमानाने डोलणाऱ्या नव्या पानांकडेही किती कौतुकाने पहाताहेत ! केवढं मोठं मन हे.. आणि केवढा त्याग.. आपल्या जीवावर ज्याचा रुबाब, त्याला संजीवनी मिळावी म्हणून किती सहज स्वतःचाच त्याग करताहेत ही पानं ! ही पानगळ !…. का लोक खेदाने पहातात तिच्याकडे ? तिचा मोठेपणा का लक्षातच येत नाही कुणाच्या ?.. प्रत्येक गोष्टीत फक्त ‘उणं’ तेवढंच पाहणाऱ्या आम्हा माणसांना तिच्याकडून काहीच संदेश घ्यावासा वाटत नाही ते का ?….
…. निदान आयुष्याला मरगळ आणणाऱ्या नकारात्मक संवेदना झटकून टाकून सद्भावाची अन प्रेमाची नवी पालवी फुलवावी आणि भविष्य आनंददायी ‘वसंत’ व्हावं असा प्रयत्न करण्यासाठी या पिंपळवृक्षाप्रमाणे सज्ज व्हावं असं कधी वाटेल आम्हाला ?
नव्या रक्ताला.. नव्या विचारांना.. नव्या जाणिवांना संधी देण्यासाठी जुन्यांनी अट्टाहास सोडून समजूतदारपणा दाखवायलाच हवा हे या पानगळीकडून शिकेल का कधी आमचा समाज ? … या समाजवृक्षाला नवजीवन मिळावं म्हणून हातात हात घालून एकत्रपणे काही करू शकू का आम्ही.. या पानगळीसारखं ???
… सहजपणे ‘कचरा’ समजल्या जाणाऱ्या या दुर्लक्षित पानगळीतून कितीतरी शिकण्यासारखं आहे हाच एक विचार मग कितीतरी वेळ माझ्या मनात टपटपत राहिला … त्या पानगळीसारखाच … आणि नकळत तसेच भिरभिरत कागदावर शब्द उतरले…
☆ पानगळ… ☆
☆
दिवसामागून दिवस चालती.. ऋतूमागूनी ऋतू धावती
विसावा नसे मुळी कसा तो.. निसर्गचक्रा सततची गती – –
*
वसंत प्रिय तो येईल आता.. कल्पनेत या वृक्ष थरारे
स्वागतास अति आतुर झाला.. आनंदे अन मनही भरारे – –
*
येणार नक्की तो प्रियतम म्हणुनी.. सळसळ उठली पानोपानी
स्वतःस आता किती सजवावे.. रोमरोम हे जाई हरखुनि – –
*
मरगळ मनीची झटकत असता.. विखरून पाने किती ओघळली
सालभरी त्यांनीच सजवले.. जुनी जणू ती आता झाली – –
*
जुने जाऊ द्या मरणालागी.. म्हणतच येती नवी पाने ती
परी तयांना आज कळेना.. उद्याची त्यांची हीच स्थिती – –
जन्माने ख्रिश्चन पण मनाने हिंदू असलेली एक ब्रिटिश महिला म्हणजे ॲनी बेझंट.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एकनिष्ठ व्यक्ती त्या ठवल्या.ॲनी बेझंट यांचा जन्म एक ऑक्टोबर १८४७ रोजी लंडन येथे झाला. त्या पाच वर्षाच्या असताना वडील विल्यम पेजवुड यांचे निधन झाले. ते विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. आई एमिली ही धार्मिक, कष्टाळू होती. पण पेजवुड यांच्या निधनानंतर आई कौटुंबिक अडचणीत सापडली. त्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने ॲनीचे शिक्षण व पालन पोषण केले. त्या धार्मिक बनल्या. पुढे १८६७ मध्ये रेव्हरंट फ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशका बरोबर त्यांचा विवाह झाला. देवावरील श्रद्धेवरून दोघात मतभेद झाले आणि बेझंट यांनी घटस्फोट घेतला.
त्या स्त्री सुधारणावादी होत्या. कामगारांची युनियन स्थापन केली. महिला कामगारांचा संप घडवून आणला. लेखन भाषण मार्गाने समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. पुढे १८८९ मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची त्यांचा संबंध आला. ही संस्था अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा शोध घेणारी व विश्वबंधुत्वाला प्रोत्साहन देणारी होती. त्यात त्या सामील झाल्या. १८९३ च्या सर्व धर्म परिषदेत थिओसाॅफिकल सोसायटीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. १८९३ मध्ये या सोसायटीच्या प्रसारासाठी त्या भारतात आल्या.
भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सक्रिय पुरस्कार केला. लोकमान्य टिळकांबरोबर होमरूल चळवळ उभारली. तुरुंगवासही भोगला.१९१७ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (कलकत्ता) अध्यक्ष पद त्यांनी भूषविले. या पदावरच्या त्या पहिल्या महिला ठरल्या. स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांनाही त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नाने भारतात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. महिला शिक्षणावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. १८९८ मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. यातूनच पंडित मदन मोहन मालवीय यांचे बनारस हिंदू विश्वविद्यालय स्थापन झालं. मुलींसाठी सेंट्रल हिंदू स्कूल फॉर गर्ल्स ची स्थापना करून शैक्षणिक सुधारणांचा पाया घातला.
भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. लेखिका व व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाल्या. भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे यावर अनेक व्याख्याने दिली. १९०५ मध्ये गीतेचे इंग्रजी भाषांतर केले. २५० ग्रंथ लिहिले. भारतीयांनी प्राचीन परंपरा विसरू नये यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगावा हे पाहून लोक प्रभावित झाले. त्यांना मानू लागले. पण सनातनी हिंदू मात्र त्यांना आपल्या शत्रू समजत. सहभोजने, बालविवाह प्रतिबंध, स्त्रियांची सुधारणा इत्यादी क्षेत्रात त्यांनी काम केले. मद्रास येथे ‘कॉमन विल’ आणि न्यू इंडिया’ ही वृत्तपत्रे सुरू केली. असहकार व सत्याग्रह या बाबतीत मात्र गांधींची त्यांचे मतभेद झाले.
मद्रास येथे १९३३ मध्ये ॲनी बेझंट यांचे निधन झाले. पार्थिव देहाचे दहन करून रक्षेचा अंश गंगेत विसर्जित करण्यात आला. ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मियता, समाज सुधारण्याची तळमळ होती. त्या प्रकांड पांडित्य, वक्तृत्व, कार्यक्षमता, स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा अशा अष्टपैलू होत्या. ॲनी बेझंट एकदा भारतात आल्या त्या इथल्याच होऊन राहिल्या. पुढील पिढ्यांना प्रेरणादायी असे समर्पित जीवन त्या जगल्या.
☆ “अपरिचिताचा शेवटचा प्रवास…” (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – कन्नड अनुवादक : अज्ञात – मराठी अनुवादक : डॉ. सुभाष भोसले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
(‘अपरिचिताचा शेवटचा प्रवास’ ही एक सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली हृदयस्पर्शी कथा आहे. या कथेत एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध प्रवाशाचा अनुभव मांडला आहे. या कथेचे मूळ लेखक केंट नर्बर्न (Kent Nerburn) आहेत. ही कथा त्यांच्या “Make Me an Instrument: The Humble Journeys of a Everyman“ या पुस्तकातील एका भागावर आधारित आहे, ज्याला “The Taxi Ride“ या नावाने ओळखले जाते. या कथेचा कोणताही एक अधिकृत ‘एकुलता एक’ अनुवादक नाही. ही कथा प्रामुख्याने सोशल मीडिया (फेसबुक आणि व्हॉट्सॲप) आणि ब्लॉग्स द्वारे मराठीत लोकप्रिय झाली.- AI आधारीत जानकारी)
मी एक टॅक्सी चालक आहे. बहुतेक वेळा मी रात्रीची पाळी करतो. गेल्या आठवड्यात रात्री साधारण अकरा वाजता एक वयस्कर गृहस्थ माझ्या टॅक्सीत बसले. पांढ रा कुर्ता, धोतर, थकलेले डोळे—पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच ठामपणा होता.
टॅक्सीत बसताच ते म्हणाले,
“आज रात्री तू मला पाच ठिकाणी घेऊन जायचे आहे. मी तुला ५००० रुपये रोख देईन. पण प्रवास संपेपर्यंत ‘का?’ असा एकही प्रश्न विचारायचा नाही.”
त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यावर पाच पत्ते लिहिले होते.
पहिला थांबा
दक्षिण कोलकात्यातील एक जुने घर. मी गाडी थांबवली. ते खाली उतरले नाहीत. फक्त काच खाली करून त्या घराकडे शांतपणे पाहत राहिले. दहा मिनिटे गेली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता.
“चला… पुढच्या ठिकाणी जाऊया,” ते हळूच म्हणाले.
दुसरा थांबा
एक प्राथमिक शाळा. गेट बंद होते. आत अंधारात खेळाचे मैदान दिसत होते. ते गाडीतून उतरले आणि हळूहळू झोपाळ्याजवळ गेले. त्यावर बसून हलके हलके झोके घेऊ लागले. वीस मिनिटांनी ते परत आले.
ते म्हणाले, “इथे मी ४३ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ इथेच गेला.”
तिसरा थांबा
एक छोटंसं जुने कॉफी हाऊस. ते आत गेले आणि चहाचा एक कप मागवला. एका कोपऱ्यात बसले, पण चहाला हातही लावला नाही. फक्त आजूबाजूला पाहत बसले. पंधरा मिनिटांनी हलकंसं हसत बाहेर आले.
ते म्हणाले, “इथेच मी पहिल्यांदा उमादेवीला भेटलो होतो… १९६९ साली.”
चौथा थांबा
निम्ताला स्मशानभूमी. ते खाली उतरले. एका स्मृतीफलकासमोर उभे राहून काहीतरी पुटपुटत होते—जणू प्रार्थना करत होते. अर्ध्या तासाने परत आले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते.
ते म्हणाले, “ती गेल्याला आता तीन वर्षे झाली.”
पाचवा थांबा
एक मोठे सरकारी रुग्णालय. त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. मग माझ्याकडे पाहून म्हणाले,
“आता मी तुला कारण सांगतो. मला चौथ्या टप्प्यातील कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणतात—काही आठवडे… कदाचित काही दिवसच उरले आहेत. म्हणून आज रात्री माझे संपूर्ण आयुष्य शेवटच्या वेळेस पाहून घ्यायचे होते.”
.. .. हे ऐकून मी स्टेअरिंगवर डोके टेकवून रडू लागलो.
ते शांतपणे म्हणाले—
“ते घर… जिथे मी माझी मुलं वाढवली.
ती शाळा… जिथे मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला.
ते कॉफी हाऊस… जिथे मी प्रेमात पडलो.
ते स्मशान… जिथे मी माझ्या पत्नीला शेवटचा निरोप दिला.
आणि हे रुग्णालय… जिथे आज मी दाखल होणार आहे. मी पुन्हा घरी परतणार नाही.”
.. .. .. त्यांनी ५००० रुपये माझ्या हातात दिले.
“धन्यवाद. तू मला माझे आयुष्य पुन्हा एकदा पाहायला मदत केलीस. माझ्या आयुष्यातील शेवटचा अपरिचित माणूस—पण खूप माणुसकीने वागणारा.”
मी म्हणालो, “नको तात्या, हे पैसे मी घेऊ शकत नाही.”
ते म्हणाले, “घे. हे देण्यासाठी माझ्याकडे आता कोणी नाही. माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. मित्रही उरले नाहीत. पण तू मला तीन तास दिलेस—तीन तास माणुसकीचे. त्याची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.”
त्यांनी आपली छोटी बॅग घेतली आणि रुग्णालयात आत गेले.
दुसऱ्या दिवशी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला पाहून हलकंसं हसलं.
“तू आलास?”
मी म्हणालो, “तुम्हाला असंच सोडून येणं मनाला पटत नव्हतं.”
आम्ही दोन तास बोललो—त्यांच्या पत्नी उमादेवीबद्दल, त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल, आणि दूर गेलेल्या मुलांबद्दल.
मी रोज जाऊ लागलो. चहा घेऊन जायचो, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचो. कधी कधी फक्त त्यांच्या शेजारी शांत बसायचो.
एकदा ते म्हणाले,
“मी एकटाच मरणार असं वाटत होतं. पण तू आता इथे आहेस. शेवटी एक अपरिचितच कुटुंबासारखा झाला—हेच माझं भाग्य.”
मी त्यांचा हात हातात घेत म्हणालो,
“तुम्ही एकटे नाही.”
दुसऱ्या दिवशी पहाटे ३:१७ वाजता त्यांचं निधन झालं. मी त्यांचा हात धरून तिथेच बसलो होतो.
त्यांचे शेवटचे शब्द होते—
“सगळ्यांना सांग… अपरिचित लोकांकडे लक्ष दे. आपण सगळे कुठेतरी निघालो आहोत. काहीजण जलद, काहीजण हळूहळू. पण वाटेत माणुसकी दाखवत जा. तू तसं केलंस… आणि माझे शेवटचे दिवस सुंदर केलेस.”
मॉनिटरचा आवाज थांबला… आणि सरळ रेषा दिसू लागली.
त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त सहा लोक होते—
मी, तीन परिचारिका, एक वकील आणि त्यांचा एक जुना विद्यार्थी.
४३ वर्षांचे अध्यापन.
५२ वर्षांचा संसार.
८१ वर्षांचे आयुष्य… आणि शेवटी फक्त सहा माणसं.
त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला—
प्रत्येक अपरिचित माणूस कोणाच्या तरी आयुष्याचं संपूर्ण जग असतो.
प्रत्येक प्रवाशामागे एक कथा असते.
प्रत्येक माणूस जगत असतो… आणि कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, इतकीच त्याची अपेक्षा असते.
आजही ते ५००० रुपये मी खर्च केलेले नाहीत. ते माझ्या टॅक्सीतच ठेवले आहेत. कारण प्रत्येक प्रवासी कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासावर असू शकतो.
त्या एका शिक्षकाने मला शिकवले—
माणुसकी ही काही अतिरिक्त गोष्ट नाही; तीच खरं आयुष्य आहे.
चला… आपणही असा प्रयत्न करूया.
कदाचित आपल्याला भेटणारा एखादा अपरिचित माणूस त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात असेल.
आपण त्याच्या आयुष्यात थोडासा का होईना, प्रकाश आणि माणुसकी देऊया.
माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणुसकी विसरून कसं चालेल?
अनुवादक : डॉ. सुभाष भोसले
(हा एखाद्या टॅक्सी चालकाचा खरा अनुभव आहे की एखाद्या लेखकाची कल्पित कथा आहे, हे मला माहीत नाही. कोणीतरी हे इंग्रजीतून कन्नडमध्ये भाषांतर केले होते. मी ते कन्नडमधून मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचलेल्या मजकुरात थोडेफार बदल करून, चांगला संदेश देण्याच्या सद्भावनेने येथे शेअर करत आहे).
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “शुभेच्छांचा दिवा तेवता राहो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
शुभेच्छांचा दिवा तेवता राहो…
“गुढीपाडवा शुभेच्छा”
आज मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे, म्हणजे शालिवाहन शके १९४८ चा पहिला दिवस चैत्र शु १.
आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
गुढी पाडव्याला मराठी नवीन वर्षाच्या आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा त्या ३६५ दिवसांकरता असतात. वर्ष सुरु होतांना पहिल्या दिवशी सगळीकडेच शुभेच्छांची भरपूर देवाण घेवाण सुरु असते, त्यामुळे तो दिवस छान जातो.
.. .. .. पण ज्यांना आपण शुभेच्छा दिल्या त्यांचे पुढचे ३६४ दिवस आनंदाचे जाण्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांची काहीच हालचाल नसते. नुसते एक दिवस हॅपी न्यू ईयर म्हणून संपूर्ण वर्ष नक्कीच आनंदाचे जाणार नसते.
ह्या दिलेल्या आणि घेतलेल्या शुभेच्छा जर आपल्याला वर्षभराकरता फलद्रुप करायच्या असतील, म्हणजे हा शुभेच्छांचा दिवा जर आपल्याला वर्षभर तेवत ठेवायचा असेल, तर आपल्याला त्यात कायम तेल टाकत रहायला पाहिजे, म्हणजे त्याकरता वर्षभर काहीतरी करत रहायला पाहिजे.
आपण स्वतः जर वर्षभर आनंदी असलो तरच आपण इतरांना वर्षभर आनंद देऊ शकतो. आणि त्याकरता खालील सोपे सोपे बदल आपण स्वतःमधे करायचे आहेत –
मला जर कायम आनंदी राहायचे असेल तर हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईन्ड, हीच प्रूव्हन व्दिसूत्री आहे. ही व्दिसूत्री अस्तित्वात उतरवण्याकरता अतिशय सोपे / कुठलाही साईड इफेक्ट नसणारे / खर्च नसणारे, आध्यात्मिक गुरूंनी दिलेले प्रिस्क्रिप्शन हे असे आहे – —
१)रोज स्वत:करता एक तास द्या, त्यामधे –
२५ मिनिटे चालणे : मस्त बूट घाला, रंगीबेरंगी कपडे घाला. मोबाईल घरी ठेवा. फिरतांना ‘बिग नो’ टू घरगुती वाद / नकारात्मक चर्चा. रमतगमत चालणे – नो वे ! स्विफ्ट चालायचे आहे, ताठ चालायचे आहे.
१५ मिनिटे प्राणायाम -. ५ मिनिटे अनुलोम – विलोम, ५ मिनिटे दीर्घ श्वसन, ५ मिनिटे ओंकार जाप.
१० मिनिटे ध्यान : विचारशून्य अवस्थेमधे बसणे
१० मिनिटे व्यायाम : आपल्या शरीराच्या सर्व सांध्यांची हालचाल होईल असे अगदी सोपे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. आपण शाळेमध्ये पीटी च्या तासाला करायचो, साधारण तसेच.
आठवड्यातून ५ दिवस केले तर चालेल का ? वगैरे, असे कुठलेही ऑपशन्स याला नाहीत.
२) कळते पण वळत नाही —
‘कळते पण वळत नाही’ या म्हणीतून, या वर्षी आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. म्हणजे जे कळते, त्याला आता वळते करायचे आहे. तब्येत छान राहण्याकरता ‘जंक फुड खाऊ नका’, ‘अति तेलकट-तुपकट खाऊ नका’, ‘साखरेचा अतिरेक टाळा’, हे पण आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं. ज्या ज्या गोष्टींकरता, आपण ही म्हण वापरतो, त्या सगळ्यांना या वर्षी वळते करायचे आहे.
ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यांचा मनापासून स्वीकार करायचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी असणे, फार महत्वाचे असते. समाधानी माणूसच मनन करू शकतो आणि परिस्थिती बदलू शकतो.
अप्रिय घटनांवर मनन केलं, तर समजू शकतं, की, आपलंच ‘असं – असं’ चुकलं होतं, किंवा आपण कुणाची तरी मदत घ्यायला पाहिजे होती. आणि चूक सुधारून पुन्हा आपल्याला घोडदौड सुरु करता येते.
४) संवाद —
घरामध्ये आई-वडील, मुलं-मुली, सासु-सासरे, नवरा-बायको यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असेल, तर घर आनंदी राहतं आणि ओघानीच आपण पण आनंदी राहतो. आणि याकरता जरूर आहे संवादाची.
एकमेकांची विचारपूस करणे, काय हवे-नको ते विचारणे, इतरांच्या चांगल्या कामाचे नेहेमीच मनापासून कौतुक करणे – प्रशंसा करणे, या गोष्टींना या वर्षी महत्व द्यायचे आहे.
५) कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे —-
रोजच्या आपल्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. अशावेळेस, ह्यानी असं कां केलं ? त्यानी असं कां केलं ? हा असं कां वागतो ? वगैरे, काथ्याकूट करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो आणि हातात काहीच येत नाही. ज्ञानी मंडळी सांगतात – कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो. स्वभावाला औषध नक्कीच असते. पण ते फक्त स्वतःचा स्वभाव बदलण्याकरता – इतरांचा नाही. मी काय करावं एवढाच सोपा विचार मला करायचा आहे.
६) वर्तमानकाळात रहा —
आपण आपला ५० % वेळ भूतकाळातल्या कडू आठ्वणी उगाळण्यात घालवतो आणि ५० % वेळ भविष्याची काळजी करण्यात घालवतो. त्यामुळे ताणतणाव हेच आपले आयुष्य बनते. मन आणि शरीर यांना बरोबर ठेवणे, यालाच वर्तमानकाळात राहणे असे म्हणतात, यालाच योगसाधना म्हणतात, यालाच ध्यान म्हणतात. ताणतणाव मुक्ती करता हीच आनंदी राहण्याची महाऔषधी आहे.
७) कायम आनंदी चेहेरा —
कायम आनंदी चेहेरा – ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन हिंडणारे भंगारवाले नेहेमीच हसतमुख असतात. चहाची टपरी चालवणारे / रस्यावर झाडलोट करणारे, कायम हसतमुख असतात. मग आपलाच चेहेरा एरंडेल तेल प्यायल्यासारखा का असतो ?
आपण नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहिलो आणि सकारात्मक-हसतमुख व्यक्तींना जवळ केले, तर हमखास हसतमुख राहता येते. आपल्या आवडीचे छंद, जसे वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, चित्रकला, वगैरे यामध्ये जर आपण रमलो तर आपल्या चेहेऱ्यावर हमखास आनंद फुलतो.
– – – मी जेव्हा समोरच्याला वर्ष आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो, तेव्हा माझा वर्षभर असा रोल असायला पाहिजे, कि, वर्षभर माझ्या प्रत्येक कृतीमधून, मी त्या व्यक्तीला आनंदच दिला पाहिजे. चांगले बोलून आनंद दिला पाहिजे. जरुरीच्या वेळेस मदतीचा हात पुढे करून आनंद दिला पाहिजे. कामासंबंधी विचारपूस करून आनंद दिला पाहिजे. घरच्यांची खुशाली विचारून आनंद दिला पाहिजे. नेहेमी संपर्क ठेवून आनंद दिला पाहिजे. असे वर्षभर करत राहणे, यालाच खऱ्या अर्थानी भरीव / ठोस शुभेच्छा देणे असे म्हणता येईल. हा बदल आपल्याला ह्या वर्षी नक्कीच करायचा आहे.
चला तर मग – यावेळेस शुभेच्छांची देवाण घेवाण करतांना देणाऱ्यांनी “ठोस” बनायचे आहे, आणि शुभेच्छा घेणाऱ्यांनी पण “ठोस” बनायचे आहे.
नवीन वर्षाकरिता माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि “ठोस” हार्दिक शुभेच्छा ! ! !
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदानी आणि उत्साहानी भरलेले असो, आणि मंगलमय असो.
“तुजसे नाराज नही जिंदगी,हैरान हू मै,परेशान हू मै….”गेले काही दिवस अशी अवस्था झालेली.मन थाऱ्यावर नव्हतं.सगळं व्यवस्थित चाललेलं.फार काही टेंशन नव्हतं तरीसुद्धा खूप उदास वाटत होतं.निराशा दाटलेली. मनापासून आनंद घेता येत नव्हता.यांत्रिकपणे रोजची कामं चाललेली.डॉक्टर मित्राच्या सल्ल्यानुसार तपासण्या केल्या पण रिपोर्ट नॉर्मल आले.विचार करून डोकं फुटायची वेळ आली. म्हणून अंकलना भेटायला गेलो.
“आई शप्पथ!!मलाही माहीत नाही पण सुचतं आपोआप” डोळे मिचकावत अंकल म्हणाले.
“तुमच्याकडे आलं की छान वाटतं.एकदम मस्त फिलिंग”
“म्हणूनच बऱ्याच दिवसांनी नव्हे महिन्यांनी भेटतोयेस.”
“इच्छा होती पण कामाच्या गडबडीत जमलं नाही”
“कसा आहेस”अंकलनी विचारल्यावर ओशाळल्यासारखं झालं वास्तविक मी विचारपूस करायला पाहिजे होती पण लक्षातच आलं नाही.आताशा आपण साधेसुधे मॅनर्स देखील विसरत चाललो आहोत.
“मी ठीकयं.तुम्ही कसे आहात.”
“मस्त,मजेत नेहमीसारखा”
“फार पेशंट दिसत नाहीत.”
“आता गर्दी स्पेशालिस्टकडे.आमच्यासारखे जुने डॉक्टर आता आऊटडेटेड.”
“मला आनंदी रहायला आवडतं म्हणून तसं राहण्याचा प्रयत्न करतो.”
“पण तरीही,त्रास असणारच ना.ते कोणाला चुकलेत”
“त्यालाच तर आयुष्य म्हणतात.समोर येईल ते स्वीकारायचं म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होते.त्यासाठीच काही सवयी मुद्दाम लावून घेतल्यात आणि काही बदलल्या.”
“उदारणार्थ..”
“आपली कुवत,मर्यादा ओळखून वागतो आणि स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकलोय.शक्य तेवढंच काम करतो.महत्वाचं म्हणजे कमी अपेक्षा ठेवतो त्यामुळे फार प्रॉब्लेम निर्माण होत नाही.”
“ऐकायला चांगलं वाटलं तरी प्रत्यक्षात असं वागणं फार अवघडयं.”
“हो पण अशक्य नाही.”
“आजकाल पैसा आहे पण मन शांत नाही असं का?.
“दिखाऊपणाच्या नादात आपणच आयुष्य अवघड करतो.अनेक त्रास स्वतःहून ओढावलेले असतात.मोठ्ठ कर्ज काढून खरेदी करायची आणि ईएमआयची वाळवी मेंदूला लावून घ्यायची.त्याचा तब्येतीवर परिणाम होतो.भरिस भर ताण आणि मोबाईल कायम सोबतीला असल्यानं सतत अस्वस्थ.”क्षणभर अंकल माझ्याविषयीच बोलत आहेत असं वाटलं.
“पण तुम्हांलाही त्रास झाला असेलच ना.”
“खूप त्रास झाला.धाडस नाही.
अल्पसंतुष्ट,कचखाऊ,पळपुटा,डेरिंग नाही वगैरे वगैरे अशी भरपूर नावं मिळाली.“कुछ तो लोग कहेंगे” म्हणत सोडून दिलं.माझा निर्णय बदलला नाही अर्थात बायकोच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. आता आम्ही आनंदी आहोत. गरजेपुरता पैसा गाठीशी आहे.मुलाच्या संसारात डोकावायला नको म्हणून मुद्दाम वेगळं राहतो.एक रुपयाचं सुद्धा कर्ज नाहीये.रोजचा व्यायाम आणि जिभेवरचा ताबा यामुळं तब्येत उत्तम,जमेल तसं सहलीला जातो.एकूणच मस्त आयुष्य चाललंय.”अंकलचं ऐकून मला त्यांचा खूप हेवा वाटला.
“अजून एक महत्वाचं सांगतो.”
“काय ते..”
“आपले प्रॉब्लेम्स स्वतःलाच सोडवावे लागतात.प्रेमपत्र कितीह सुंदर लिहिलेलं असलं तरी जाहिरारित्या वाचायचं नसतं. तसंच आपले प्रॉब्लेम कितीही मोठे आणि महत्वाचे असले तरी इतर त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही.त्यात आजकाल तर मदत करण्याऐवजी सल्लाच दिला जातो.”
“थोडक्यात काय तर दाढदुखीचा ठणका ज्याचा त्यालाच सहन करावा लागतो.”
“करेक्ट.नेमकं बोललासं.उदाहरण आवडलं”
“तुमच्याकडूनच शिकलोय.हसू नका पण मी सुद्धा मदत मागायलाच आलोय.”
“ते लक्षात आलं.तू मागतोय म्हणून सल्ला देईन पण मान्य करायचा की नाही याचा निर्णय तुलाच घ्यायचाय.माझा आग्रह नाही.” अंकलशी बराच वेळ गप्पा मारल्या.मनातली खदखद मोकळी केल्यावर शांत वाटलं.अंकल काहीच बोलले नाहीत.
“काही सीरियस”भीती भीत विचारलं.
“काहीही झालं नाहीये.हे मानसिक दुखणं आहे.टेंशन घेऊ नकोस.”
“विनाकारण उदास,निराश का वाटतं.”
“होतं असं.सर्व काही ठीक असलं तरी अनामिक काळजी वाटतेच.खूप विचार करतोस का?”
“हो.”
“विचारांची धुनी कायम पेटलेली.अनावश्यक, संदर्भहीन विचार येतात. स्वतःचाच राग येतो.घुसमट वाढते.शांत झोप नाही.मेंदू कायम सावध.करेक्ट!!”
“एकसूरी आयुष्य!!आजच्या भाषेत बोलायचं तर मोनोटोनस लाईफ!!सगळंच वरवरचं,तकलादू,तेच ते अन तेच ते आयुष्य.त्यातही आनंद घेण्यापेक्षा दाखवला जातो.त्यामुळे मन अस्थिर. एकाग्रता फार काळ टिकत नाही.भान हरपून जावं असं घडत नाही.स्वतःची नेमकी आवड,छंद कोणते?हेच समजत नाही.मेंढरांसारखे एकमेकांच्या पाठीमागे फरफटत जाऊन नकली आनंदी घेत राहतो.”
“अगदी खरंय,मी पण तेच करतोय.आवड साफ विरसलोय .”
“आधी त्याचा शोध घे.जे केल्यानं छान वाटतं,मूड चांगला होतो,आनंद मिळतो ते ते सर्व कर.आतापर्यंत घर,संसार,मुलं यांच्यासाठी केलसं.थोडं स्वतःसाठी जग…..आणि आता आज एवढा डोस बास!!बाकी तू हुशार आहेस.चला”
“मी घरी सोडतो.”
“नको.माझी मर्सिडिज आहे ना” सायकलकडे बोट दाखवत अंकल हसले.मी वाकून नमस्कार केल्यावर “कल्याणमस्तु!!” असा आशीर्वाद देऊन सायकलवर टांग मारून निघून गेले.पाठमोऱ्या अंकलकडे पाहताना अचानक डोक्यात ट्यूब पेटली लहाणपणी मला सायकल खूप आवडायची. भरपूर चालवली आणि नंतर सायकल सुटली ती कायमचीच.गेल्या कित्येक वर्षात सायकलला हातच लावला नव्हता.ठरलं तर मग…… नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले “ थॅंक्यू अंकल.”
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक पंधरावा – –
मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी |
जिता बोलती सर्वही जीव मी मी`
चिरंजीव हे सर्वही मानिताती |
अकस्मात सांडूनिया सर्व जाती १५|
अर्थ:
आपल्या भोवताली दिसणारे सुंदर जग म्हणजे मृत्यूभूमी आहे ही सत्य गोष्ट आहे. असे असले तरी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अहंकारामुळे मी मी करीत असतो. आपण अमर आहोत अशीच सर्वांची भावना असते. परंतु एक दिवस अचानक हे सगळेच सोडून जावे लागते.
आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले असे सांगतात. या श्लोकात आपण ज्या पृथ्वीवर म्हणजेच इहलोकांत राहतो तो इहलोक किंवा ही पृथ्वी मृत्यूभूमी कशी आहे हे समजावून सांगतात. हे जग नित्य बदलते आहे किंबहुना बदल हाच या जगाचा स्थायिभाव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था पृथ्वीवर आपल्याला बघायला मिळतात. भासमान असणाऱ्या या दृश्य जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थातून जाताना दिसते. माणसाला देखील याच अवस्थांमधून जावे लागते. तरीसुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला चिरंजीव समजतो आणि आपण केलेल्याचा अहंकार मिरवत असतो. हा अहंकार भल्याभल्यांचा घात करतो. ज्यांना साधना मार्गावर चालायचे आहे, त्यांना तर अहंकार विषाप्रमाणे वर्ज्य आहे. संत, सद्गुरू किंवा सद्ग्रंथ यांच्यामध्ये अहंकार दूर करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून साधकाने त्यांचा आश्रय घ्यावा.
माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे लागून पैसा कमावतो. घरदार, मुलेबाळे सगळे नाती निर्माण होतात. परंतु या सगळ्या गोष्टी इथेच राहतात. माणूस गेला की पैसा, धन, संपत्ती जागच्या जागीच राहते आणि इतरांची मालमत्ता होते. पत्नी त्याला दारापर्यंत पोहोचविण्यास येते, समाजातील लोक त्याला स्मशानापर्यंत पोहोचवतात. मात्र अगदी अंगावरचा कपडा देखील सोबत येत नाही. सोबत जाते ते फक्त आपले कर्म. परंतु तरीही माणसाचा ताठा किंवा गुर्मी शेवटपर्यंत कायम असते. मी एवढा पैसा कमावला, मी एवढे वैभव मिळवले, मला एवढे यश मिळाले, हे सगळे माझ्या कर्तृत्वामुळे ! माझी मुले, माझी बायको असे सगळे तो मी मी करत असतो.
काही लोक गैरमार्गाने अमाप संपत्ती कमावतात परंतु अंत्यसमयी त्यातील काहीही कामी येत नाही. करोडोंची संपत्ती असते परंतु एखाद्या दुर्धर आजाराने दवाखान्यात दाखल व्हावे लागले की पैसा सुद्धा त्याला बरे करू शकत नाही. आयुष्य वाढवून मिळत नाही की गेलेले क्षण परत येत नाहीत. हे सगळे सोडून कधीही अचानक जावे लागते. ‘नाही घडीचा भरवसा, कोण काळ येईल कैसा‘ हेच खरे. समर्थ म्हणतात
घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा,
आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना”
प्रत्येक क्षण मृत्यूच्या दिशेने जात असताना, संसाराच्या मायेत न अडकता ईश्वराचे (रामाचे) नामस्मरण करावे, कारण तोच कायमचा आधार आहे. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपला प्रत्येक क्षण सार्थकी लावला पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
स्वसंवाद :
माझ्या आयुष्यात मी हे केले किंवा हे सगळे माझ्यामुळे आहे असा अहंकार बाळगतो का ?
पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमच्या नाहीत हे मला खरोखर पटते का?
माझ्या आयुष्यातील सत्कर्मेच माझ्यासोबत येतील यावर माझा विश्वास आहे का ? ( क्रमशः )
– – –
श्लोक सोळावा – –
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥
अर्थ : आपली प्रिय किंवा जिव्हाळ्याची व्यक्ती गेली, मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा व्यक्तीच्या निधनाचे दुःख करीत बसणारा देखील त्याच रांगेत उभा असतो आणि अकस्मात त्याला देखील हे जग सोडून जावे लागते. शोक हा लोभ किंवा मोहापोटी असतो. त्यातून क्षोभ म्हणजे नाशालाच जन्म मिळतो म्हणून माणूस पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो.
आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला काळ हा आपल्या पाठीशी लागलेला आहे हे अटळ सत्य सांगतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे. या श्लोकात ते मृत्यूबद्दलच अधिक सांगून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आपली प्रिय व्यक्ती मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखाचा शोक करत बसतो परंतु हा शोक लोभ किंवा मोहाच्या पोटी असतो असेच समर्थांना सांगायचे आहे. कारण त्यातून क्षोभ निर्माण होतो आणि हा क्षोभ सर्वनाशाला कारणीभूत ठरतो.
मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल दुःख करीत बसताना आपल्यालाही एक दिवस त्याच वाटेने जायचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मृत्यूची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे आज माझी प्रिय व्यक्ती मला सोडून गेली परंतु उद्या मला देखील त्याच मार्गाने जायचे आहे. हे लक्षात घेतले तर आपोआपच जगण्याची आसक्ती आणि इहलोकीचा लोभ कमी होतो. असे झाले म्हणजे व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून च्युत होत नाही.
उपकार या हिंदी चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक फार सुंदर गाणं आहे. त्यात कवी म्हणतो,” कस्मे वादे प्यार वफा सब बाते है, बातों का क्या ? कोई किसी का नही है, झूठे नाते है नातोंका का क्या ?”
गाडगे बाबा कीर्तन करीत असताना कोणीतरी त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेल्याची बातमी सांगितली. तेव्हा ते म्हणाले
किती मेले कोट्यानुकोटी
काय रडू एकासाठी ?
लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित असताना त्यांना देखील आपला मुलगा वारल्याची बातमी कळाली. परंतु त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून अग्रलेख पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच केसरीचा अंक निघाला. ही सगळी मंडळी महान असली तरी त्यांना दुःख झाले नसेल का ? निश्चितच झाले असणार. परंतु त्याचे रूपांतर त्यांनी शोकामध्ये होऊ दिले नाही आणि आपल्या कर्तव्य मार्गावर ते अग्रेसर राहिले. कारण त्यांना देखील पुढे आपणही त्याच मार्गाने कधीतरी जाणार आहोत याची जाणीव होती.
समर्थ असे सांगतात की अति शोक हा मोहातून निर्माण होतो. मोह म्हणजेच लोभ किंवा वासना. असे षडरिपूंचे मायाजाल आपल्याला जगण्यात किंवा ज्या अनंत अशा राघवाच्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे त्यापासून परावृत्त करते. माणसाने त्यातून बाहेर पडले पाहिजे.
इच्छेतून वासना निर्माण होतात. वासनेतून काम किंवा षडरिपू निर्माण होतात. त्यात आपण अडकलो की जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका नाही. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि मृत्यू पावत राहतो. माणसाचे अंतिम ध्येय मोक्ष हेच आहे. म्हणूनच मरणाचा अति शोक न करता आपल्यालाही एक दिवस त्याच मार्गाने जायचे आहे हे लक्षात ठेवून आपले कर्तव्य करीत राहणे महत्त्वाचे आहे.
आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम सांगितले आहेत, त्यातील वानप्रस्थाश्रमाची कल्पना फार सुंदर आहे. ती यासाठी फार उपयोगी पडते. वानप्रस्थाश्रमात संसारातील लक्ष हळूहळू काढून घ्यायचे असते. आजच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे वानप्रस्थाश्रम शक्य नाही. परंतु काही ठराविक वयानंतर मुलांच्या बरोबर संसारात राहताना आपली आसक्ती हळूहळू कमी करायला हवी. ही आसक्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मुलांच्या संसारात अप्रत्यक्षपणे आपली ढवळाढवळ सुरूच राहते आणि त्याचे प्रमाण अति वाढले म्हणजे मुलांना देखील आपण नकोसे होतो. ही आसक्ती सोडता आली तर अंतकाळी जो मोह किंवा लोभ शिल्लक राहतो, तो राहणार नाही आणि त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकेल.
स्वसंवाद :
माझ्या प्रिय व्यक्तींबद्दल असलेले माझे प्रेम हे आसक्तीत तर बदलत नाही ना?
मृत्यू अटळ आहे ही जाणीव मी खरंच मनापासून स्वीकारली आहे का?
दुःखाच्या प्रसंगी मी खचून जातो की कर्तव्य मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो?
संसारातील मोह आणि लोभ कमी करण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ संसारापुरते मर्यादित आहे की आत्मोन्नतीकडेही माझे लक्ष आहे?
कधी कधी एखाद्या शब्दावरून सुरू झालेली अल्पशी चर्चा आपल्याला भारतीय संस्कृतीच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाते. “आनृण्य की अनृण्य?” हा प्रश्नही तसाच आहे. हा केवळ शब्दरूपाचा वाद नसून भारतीय जीवनदृष्टीतील एका महत्त्वपूर्ण नैतिक संकल्पनेशी संबंधित आहे.
शब्दाची व्युत्पत्ती
“अनृण्य” हा शब्द संस्कृतमधील “ऋण” या शब्दापासून निर्माण झाला आहे. “ऋण” म्हणजे देणे, कर्ज किंवा दायित्व. “अन्” हा नकारार्थी उपसर्ग जोडल्यावर “अनृण” म्हणजे ऋण नसलेला असा अर्थ होतो. त्याचेच भाववाचक रूप “अनृण्य” असून त्याचा अर्थ ऋणमुक्तता असा आहे.
मराठी भाषेत “आनृण्य” असे रूपही अनेकदा दिसते; परंतु व्युत्पत्तिशास्त्रीय दृष्टिकोनातून “अनृण्य” हेच अधिक प्रमाणभूत रूप मानले जाते.
जन्मतः ऋणी असलेला मनुष्य
भारतीय चिंतनानुसार मनुष्य या जगात पूर्णपणे स्वतंत्र येत नाही. तो काही मूलभूत ऋणांनी बद्ध असतो. आपल्या अस्तित्वामागे निसर्ग, देवता, ऋषी आणि पूर्वज यांचे योगदान असते. म्हणूनच जीवन म्हणजे केवळ अधिकारांचा उपभोग नसून कृतज्ञतेने ऋणांची परतफेड करण्याचा प्रवास आहे.
धर्मशास्त्रात या विचाराला “त्रि-ऋण सिद्धांत” असे म्हटले जाते.
तीन मूलभूत ऋणे
देवऋण
विश्वव्यवस्था आणि निसर्गाच्या देणगीबद्दलची कृतज्ञता.
यज्ञ, उपासना, सदाचार आणि धर्मपालन यांद्वारे हे ऋण फेडले जाते.
ऋषिऋण
ज्ञानपरंपरा घडवणाऱ्या ऋषींचे ऋण.
अध्ययन, स्वाध्याय, अध्यापन आणि ज्ञानसंवर्धन यांद्वारे हे ऋण परतफेडले जाते.
*पितृऋण*
पालक आणि पूर्वजांचे ऋण.
कुटुंबसंरक्षण, संतती, परंपरेचे जतन आणि पूर्वजस्मरण यांद्वारे हे ऋण फेडले जाते.
धर्मग्रंथांचा आधार
भारतीय धर्मग्रंथांनी या विचाराला स्पष्टपणे मांडले आहे. मनुस्मृतीत असे म्हटले आहे —
“ऋषिभ्यो देवताभ्यश्च पितृभ्यश्चैव मानवः ।
ऋणी जायते तस्मात् त्रिभ्य एव प्रतिपूजयेत् ॥”
अर्थ : मनुष्य जन्मतः देव, ऋषी आणि पितर यांचा ऋणी असतो; म्हणून त्याने या तिघांप्रती कृतज्ञतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.
महाभारतातही धर्मविचाराच्या संदर्भात यज्ञ, स्वाध्याय आणि कुटुंबकर्तव्य यांद्वारे ही ऋणे फेडण्याचे महत्त्व सांगितले आहे.
कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात राजा दिलीपाच्या कथेत पितृऋण पूर्ण करण्याची भावना सूचित होते.
– – – यावरून या संकल्पनेचा प्रभाव धर्मशास्त्राबरोबरच काव्यपरंपरेवरही पडलेला दिसतो.
संतपरंपरेतील भावार्थ
मराठी संतांनी “अनृण्य” हा शब्द थेट वापरला नसला तरी त्यामागील भावार्थ अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. संत म्हणतात —
“देह देवाचे मंदिर
करावे त्याचे सेवाकार्य.”
या ओळीत जीवनाची दिशा सूचित होते. देह आणि जीवन ही देवाची देणगी मानून त्याचा उपयोग सेवा, साधना आणि सदाचारासाठी करणे हीच देवऋणाची खरी परतफेड आहे.
आधुनिक जीवनातील अनृण्य
आजच्या काळात “अनृण्य” ही संकल्पना केवळ धार्मिक कर्मकांडापुरती मर्यादित राहिलेली नाही. समाज, संस्कृती, निसर्ग आणि मानवजातीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याप्रती आपली दायित्वे पार पाडणे हेच तिचे आधुनिक रूप आहे… .. ..
— पालकांची सेवा करणे_
— गुरूंनी दिलेले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे_
— समाजासाठी कार्य करणे_
— निसर्गाचे संवर्धन करणे_
– – – ही सर्व कृत्ये म्हणजे आपल्या ऋणांची परतफेडच होय.
अंतिम विचार
भारतीय संस्कृतीचा मूलस्वर कृतज्ञतेचा आहे.
जीवनात आपण जे काही प्राप्त करतो ते पूर्णपणे स्वतःचे नसते; त्यामागे असंख्य अदृश्य हातांचा सहभाग असतो.
म्हणूनच —
उपकारांचे स्मरण ठेवून कर्तव्यपूर्तीने जगणे .. हेच “अनृण्य” या संकल्पनेचे खरे सार आहे.
ऋणमुक्त जीवन म्हणजे उपकार विसरणे नव्हे, .. .. तर कृतज्ञतेने जीवन अर्थपूर्ण करणे होय.