मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४७ – – – 

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे|

जनी जाणता भक्त होऊनि राहे|

गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |४७|

अर्थ : ज्या साधकाला आपल्या देहाच्या आत आणि बाहेर एकमात्र भगवंतच दिसतो, जो जाणता म्हणजे ज्ञानी भक्त म्हणून जगात वावरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनेचा क्रम कायम राखतो असा भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा (भगवंताचा)दास हा खरोखरीच जगात धन्य होय.

विवेचन : या ४७ व्या श्लोकापासून ते ५६ व्या श्लोकापर्यंत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे अंतिम चरण आहे. यात समर्थ ज्ञानी साधकाचे किंवा भक्ताचे गुण सांगतात.

या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात, ” मनी लोचनी श्रीहरी तो चि पाहे” यामध्ये जो परमेश्वराचा भक्त असतो तो मनात आणि लोचनात म्हणजे डोळ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मनामध्ये त्याचे निर्गुण रूप असते आणि नेत्रांना म्हणजेच बाह्य जगतात त्याचे दृश्य रूप किंवा सगुण रूपाचे दर्शन होते. तात्पर्य म्हणजे आत बाहेर सर्वत्र त्याला परमेश्वराचेच दर्शन होत असते. भक्त हा शब्द जर आपण पाहिला तर जो परमेश्वराशी जोडलेला आहे तो भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. जो परमेश्वराशी जोडलेला नसतो तो भक्त कसा असेल ?

खऱ्या भक्ताला देव सर्वत्र दिसतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. प्राणीमात्रात सर्वत्र तोच भरलेला आहे. त्याची दृष्टी सम होते. मग भेद राहत नाही. जो आपल्या अंतरात आहे तोच बाहेर देखील आहे हे त्याला लक्षात येते. मग द्वैत राहत नाही. तो अद्वैताचाच एक भाग होतो. तो परमेश्वराशी तदाकार होतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे त्याला सांगण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील जेव्हा कधी तो सगुण मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा देखील तो परमेश्वराच्या दर्शनाने भाव विभोर होतो. त्याचे नेत्र पाणावतात.

समर्थांनी “मनी लोचनी तो चि पाहे” असे जे म्हटले आहे, त्यातील “चि “म्हणजेच तोच परमेश्वर त्याला सर्वत्र दिसतो. जसा तो भक्त प्रल्हादाला दिसत होता. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीला निर्जीव दिसणाऱ्या खांबामध्येही प्रल्हादाला परमेश्वराचे अस्तित्व दिसत होते.

खऱ्या भक्ताच्या डोळ्यासमोर परमेश्वराची सगुण मूर्ती नसली तरी काही बिघडत नाही. त्याच्या अंतर्यामी ती मूर्ती ठसलेली असते. सगुण निर्गुणाने त्याला काही फरक पडत नाही. “सगुण निर्गुण एकू गोविंदु रे “. अशी त्याची अवस्था असते. त्याला परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. अशा भक्ताला समर्थ ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तीतून ज्ञान होते पण ज्ञान झाल्यानंतरही भक्ती संपत नाही. असा भक्त हा ज्ञानी भक्त असतो.

पण ज्ञानी भक्त म्हणजे भोळा भक्त नव्हे. हा फरक आपण समजून घ्यायला हवा. आपला असा सोयीस्कर समज असतो की भक्त हा भोळा असतो, त्याला व्यवहार कळत नाही. काही लोक अशा लोकांना मूर्ख किंवा बावळट देखील समजतात. परंतु ज्ञानी भक्ताचे असे वागणे समर्थांना अपेक्षित नाही. त्यांच्या दृष्टीने चातुर्य अखंड सावधानता हे मोठे गुण आहेत. त्यांना अपेक्षित असलेला ज्ञानी भक्त व्यवहारात देखील चातुर्याने वागतो. तो लबाडी करत नाही, तो स्वार्थी नसतो परंतु लोकांकडून फसवला जाईल एवढाही भोळा नसतो.

तिसऱ्या ओळीचा अर्थ पाहूया. तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमूं साधनाचा. ” ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. परमेश्वराचे जे गुण आहेत की तो सर्वव्यापी आहे, शरणागताला आश्रय देणारा आहे, यासारख्या त्याच्या अनेक गुणां प्रति भक्ताची प्रीती म्हणजे प्रेम असते. परमेश्वराच्या गुणांवरच ज्याची प्रीती नाही, तो परमेश्वरावर प्रेम कसे काय करू शकेल ? असा भक्त साधनेचा क्रम देखील पाळत असतो म्हणजे जिवापाड जपत असतो. साधनेचा क्रम याचा अर्थ भक्त हा पायरीपायरीने परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते. उदा. परमेश्वराच्या नामाचे स्मरण, मनन, सदैव त्याचे चिंतन आणि मग पुढे त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. या सगळ्या विविध पायऱ्या आहेत. या ओळीतील राखे हा शब्द गुणांबद्दल प्रीती राखणे आणि साधनेचा क्रम राखणे या दोन्हींसाठी लागू पडतो.

चौथ्या ओळीत समर्थ अशा भक्ताबद्दल म्हणतात, ” जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ” सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम !कोण बरं असेल मग ? तर एक परमेश्वरच सर्वोत्तम आहे आणि अशा या सर्वोत्तमाचा दास होण्यामध्ये जी धन्यता आहे ती अन्य कशातच नाही. म्हणून अशा सर्वोत्तम असलेल्या परमेश्वराचा भक्त खरोखरच धन्य असतो. तसाच भक्त होण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद (नवीन) :: 

१) माझ्या दृष्टीत “समदृष्टी” आहे का – माझ्या भोवतालच्या माणसांमध्ये, निसर्गात मला परमेश्वर दिसतो का ?

२) मी “ज्ञानी भक्त” आहे की “भोळा भक्त” – व्यवहारात चातुर्य राखून भक्ती करण्याचा माझा प्रयत्न आहे का ?

३) माझ्या साधनेचा “क्रम” आहे का – नामस्मरण, मनन, चिंतन या पायऱ्या मी नियमितपणे पाळतो का ? 

– – – – 

श्लोक क्र. ४८ – – 

सदा देवकाजी झीजे देह ज्याचा |

सदा रामनामे वदे नित्य वाचा |

स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८|

अर्थ :  जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

विवेचन : देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मारुतींची स्थापना केली आणि गावोगाव श्रीराम आणि मारुतीची मंदिरे निर्माण करवली. मठ उभारून महंत घडवले. हे सगळे भगवंताचेच कार्य त्यांच्या हातून झाले. त्या कार्यातच त्यांचा देह झिजला.

भगवंताचे कार्य करायचे म्हणजे केवळ नामस्मरणच केले पाहिजे असे काही नाही. रंजल्या गांजल्यांची, दीनदुबळ्यांची, प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच आहे. ते देखील भगवंताचे कार्य आहे असे म्हणता येईल.

भक्ताने नेहमी ईश्वरसन्मुख राहिले पाहिजे. तसे राहण्यासाठी भगवंताचे नाम अखंड त्याच्या मुखात आले पाहिजे. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड असते असा भक्त धन्य होय. व्यवहारांमध्ये बोलताना भलेही त्याला लोकरीतीनुसार व्यवहार करावा लागेल. परंतु अंतरातील भगवंताचे चिंतन अखंड सुरूच राहते.

तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, “स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा” म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम तोच आपला स्वधर्म समजून जो उत्तम प्रकारे करतो तो भक्त धन्य होय. बऱ्याच वेळा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सर्व त्यावरील कलाकार आहोत असे म्हटले जाते. आपल्या वाट्याला जी भूमिका आली असेल ती उत्तम प्रकारे करणे हे आपले काम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तोच आपला स्वधर्म आहे तो आपल्याला उत्तम रीतीने निभवता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।

पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।

त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा अतिशय प्रिय आहे. म्हणजेच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला आवडते. मग तुम्ही मंदिरात किंवा तीर्थयात्रेला गेला काय आणि नाही गेलात तरी चालू शकते. प्रत्येकाने आपले काम जर उत्तम प्रकारे केले तर हीच त्या परमेश्वराची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा आपण बांधली असे होईल. मग जगामध्ये आपोआपच सज्जनांची मांदियाळी तयार होईल आणि सगळे सुखी होतील. तेव्हाच ऋषींनी सांगितलेले अस्तित्वात येईल

 सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥

– – सर्व सुखी होतील सर्वांना आरोग्य लाभेल. अर्थात प्रत्येकाने आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तर…

– – आणि असे वागणारा भक्त जगामध्ये धन्य होईल. भगवंताच्या उत्कृष्ट भक्तांमध्ये त्याची गणना होईल.

स्वसंवाद :: 

१) माझ्या दैनंदिन कामात मी “देवकाज” पाहतो का – माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असा भाव माझ्या मनात असतो का ?

२) “स्वधर्म” म्हणजे माझ्या वाट्याला आलेली भूमिका – ती मी उत्तम प्रकारे निभावतो का की इतरांच्या भूमिकेकडे माझे लक्ष जास्त असते ?

३) माझ्या नामस्मरणाने किंवा वागण्याने इतर कोणाला परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे का ?

– क्रमशः श्लोक ४७ आणि ४८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग”  – माहिती संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग”  – माहिती संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

– रोझलीन फिशर

अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग :

… रोझलीन फिशर यांच्या ‘टोपोग्राफी ऑफ टीअर्स’चा थक्क करणारा प्रवास 

… डोळ्यांतून ओघळणारा अश्रू हा वरवर केवळ खाऱ्या पाण्याचा एक पारदर्शक थेंब दिसतो. पण याच थेंबाला सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास एखाद्या महाकाय शहराचा नकाशा किंवा पर्वतदऱ्यांचे विहंगम दृश्य समोर येते.

२०१३ साली छायाचित्रकार रोझलीन फिशर यांनी एका विलक्षण प्रयोगाला सुरुवात केली, ज्याने मानवी भावनांच्या विज्ञानाला एक नवी दृष्टी दिली. फिशर यांनी या प्रकल्पाला ‘टोपोग्राफी ऑफ टीअर्स’ (Topography of Tears) असे नाव दिले. एका वैयक्तिक शोकाच्या काळात त्यांच्या मनात विचार आला की, माझे अश्रू सूक्ष्मदर्शकाखाली कसे दिसत असतील? इथूनच एका जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रकल्पाचा पाया रचला गेला. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, फिशर यांनी उच्च क्षमतेच्या ‘रेझोल्युशन ऑप्टिकल मायक्रोस्कोप’चा वापर केला. त्यांनी जेव्हा स्वतःच्या अश्रूचा पहिला थेंब तपासला, तेव्हा त्यांना आलेला अनुभव थक्क करणारा होता. फिशर यांच्या मते, “हा अनुभव विमानातून जमिनीवरील दृश्य पाहण्यासारखा होता. “अश्रूंमध्ये केवळ पाणी नसते. त्यात तेल, प्रथिने, एन्झाईम्स आणि मिठाचे प्रमाण असते. जेव्हा हा थेंब सुकतो, तेव्हा त्यातील मिठाचे स्फटिक (Crystals) तयार होतात. हे स्फटिक वेगवेगळ्या आकृत्या धारण करतात, ज्या एखाद्या भूभागाच्या नकाशासारख्या दिसतात.

संशोधनादरम्यान फिशर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. दुःखाचे अश्रू, आनंदाश्रू आणि कांदा चिरताना डोळ्यांतून येणारे पाणी यांच्या रचनेत फरक असतो का? या एका विचाराने या प्रकल्पाला व्यापक स्वरूप दिले. त्यांनी स्वतःचे आणि इतरांचे मिळून जवळजवळ १०० अश्रूंचे नमुने तपासले. विज्ञानाने अश्रूंचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिले ‘बेसल’ (Basal) अश्रू, जे डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवतात. दुसरे ‘रिफ्लेक्स’ (Reflex) अश्रू, जे कांदा चिरताना किंवा धुरामुळे येतात. तिसरे ‘सायकिक’ (Psychic) अश्रू, जे केवळ मानवी भावनांमुळे बाहेर पडतात.

आकडेवारी आणि निरीक्षणांनुसार, या प्रत्येक प्रकारच्या अश्रूची सूक्ष्म रचना वेगळी असते. दुःखाचे अश्रू जेव्हा सुकतात, तेव्हा त्यांची रचना विखुरलेली आणि गडद दिसते. याउलट, आनंदाश्रूंची रचना एखाद्या फुलांच्या बागेसारखी किंवा गुंतागुंतीच्या नक्षीसारखी भासते. कांदा चिरताना येणाऱ्या अश्रूंची भूमिती पूर्णपणे वेगळी असते. यामागचं कारण शोधताना असे लक्षात येते की, भावनांनुसार अश्रूंमधील हार्मोन्स आणि रसायनांचे प्रमाण बदलते. न्यूरोट्रांसमीटरमधील हा बदल अश्रू सुकल्यानंतर तयार होणाऱ्या स्फटिकांच्या रचनेवर परिणाम करतो. म्हणूनच, प्रत्येक अश्रू हा त्या व्यक्तीच्या तत्कालीन मानसिक अवस्थेचा जणू ‘फिंगरप्रिंट’ असतो.

– – – फिशर म्हणतात की, “आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे दिसते, ते हिमनगाचे केवळ एक टोक आहे. ” आपल्या भावना केवळ मनात नसून त्या आपल्या शरीरातील द्रवाच्या रेणवीय रचनेतही उमटतात. हा प्रकल्प केवळ विज्ञानाचा भाग नसून तो मानवी संवेदनांचे एक दृश्य काव्य आहे. एका लहानशा थेंबात इतकी गुंतागुंतीची सृष्टी दडलेली असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण जाते. पण विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, आपण जेव्हा रडतो, तेव्हा आपण केवळ पाणी गाळत नसून आपल्या अस्तित्वाचा एक नकाशाच बाहेर टाकत असतो.

– – – आपल्या प्रत्येक भावनांची एक स्वतंत्र भूमिती असते, हे वास्तव आपण कधी मान्य करणार?

*******

माहिती संकलक / लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जाऊ देवाचिया गावा! शेगाव!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

जाऊ देवाचिया गावा! शेगाव!! ☆ श्री संभाजी बबन गायके 

रात्रीचे साडेदहा वाजलेत. आनंदविहार भक्तनिवास. परिसरातील झाडांची पानगळ सतत सुरूच असते. या पानगळीला रात्रीही आराम नसतो. इथं पानं गळून खाली पडण्याची जणू वाटच पाहिली जाते… आणि ती उचलून घेतली जातात!

कचरा साठू द्यायचा आणि मग तो उचलायचा अशी इथली रीत नाही! आज दुपारी मंदिरातल्या ओसरीवर बसलेल्या मुलीने थोडंसं पाणी सांडवलं… ज्यांची त्या ठिकाणी duty नव्हती असे एक माऊली त्या जागी त्यांच्या कामासाठी आले तेंव्हा त्यांनी ते पाणी पाहिलं आणि केवळ एकाच मिनिटात ते पाणी पुसून घेण्याची व्यवस्था केली गेली.

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर फोटो काढण्याची परवानगी नाही. पण ही सूचना तोंडी न देता तसा लाकडी फलक फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या समोर धरला जातो. आणि फोटो काढण्यासाठी नेमून दिलेली जागाही दाखवली जाते.

या नियमातून पोलिसांनाही सूट नाही!

विदर्भाची भाषाही त्यात तशी मृदु आणि मावळ. त्यात ‘ माऊली ‘ हे संबोधन तर अतिशय समर्पक. त्यामुळे कुणाला ओरडण्याचा, रागावण्याचा संबंध फारसा येत नाही. ज्या लोकांना बुद्धीच्या कानांनी कमी ऐकू येते, अशांच्या कानांवर सुरक्षा रक्षक गणवेशधारी लोकांचे शब्द मात्र जातील, अशी व्यवस्था आहे.

श्री गजानन महाराज संस्थान हे स्वयंपूर्ण, स्वयंशिस्त आणि स्वयंस्फूर्त संघटन असल्याने स्वयंसेवक हा मुख्य आधार आहे. आसपासच्या तीनशे पेक्षा जास्त गावांतील हजारो तरुण या सेवाकार्यात कालबध्द सेवा करण्यास रुजू होत असतात. आणखी शंभर गांवे प्रतीक्षेत आहेत, असे समजते!

ही सेवेकऱ्यांची नवी पिढी सुशिक्षित आणि संगणक साक्षर आहे.

इथला प्रत्येक घटक भक्तांच्या संभाव्य अडचणींचा विचार करून सातत्याने सुधारणा घडवत राहतो. मंदिरात जायचे म्हणजे चपलांची काळजी सोबत नेणे, असा प्रकार इथे नाही. बूट घालायचे म्हणजे खाली बसणे आले… यासाठी आरामदायी बाक, खुर्च्या आहेत. पूर्वी चप्पल स्टँड कप्प्याचे बिल्ले दिले जात. आता मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायला सांगतात! फोटो दाखवायचा आणि चपला ताब्यात! फक्त इथं समोर म्हणजे पुढे असा अर्थ घ्यावा लागतो. माऊली, चला समोर.. म्हणजे तिथून पुढे सरकावे… थांबून राहू नये. समाधी दर्शन एकाच वेळी किमान शंभर लोकांना घडेल अशी पायऱ्यांची व्यवस्था आहे. समाधी जवळ पोहोचेपर्यंत भाविक मूर्ती पाहू शकतात… त्यात समाधान लाभते. समाधीपासून डाव्या आणि उजव्याही बाजूने जाता येते.

जेवणापूर्वी लोक हात धुणार, नळ पूर्ण सोडणार आणि सत्तर टक्के पाणी वाया घालवणार…! इथे एक सारखी नियंत्रित धार सोडणारे अनेक नळ एका रांगेत, तेही भोजन गृहात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ लावले गेलेत. ते पाणी सुद्धा वाया जाऊ दिले जात नाही.

दर्शन रांगेत उभे असताना कुणाला स्वच्छतागृहात जायचे असेल तर रांग सोडून जाणे आणि पुन्हा रांगेत येणे या प्रक्रियेत लोकांचा राग, गैरसमज ठरलेला असतो. पण इथे रीतसर स्वच्छतागृह पास घेऊन जाता येते आणि अधिकृतरित्या रांगेत परतता येते. रांगेत ठेवून ताटकळत असलेल्या लोकांसाठी चहा आणि स्वच्छ पाण्याची सोय आहेच. शिवाय तान्ह्या बाळांची आणि त्यांच्या मातांची अत्यंत उत्तम व्यवस्था प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे.

मुख्य मंदिरात प्रसाद व्यवस्था दिवसभर ठरलेल्या वेळी विनामूल्य असते. भक्त निवासात सशुल्क आहे. पण रात्री उशिरा पोहोचणाऱ्या भाविकांना हाच भोजन प्रसाद विनामूल्य देण्याची व्यवस्था आहे!

भक्त निवास ते मंदिर ते रेल्वे स्टेशन अशी विनामूल्य आणि सुरक्षित बस सेवा आहे. भक्तनिवास प्रवेशद्वार ते भक्तनिवास इथपर्यंत साहित्य, माणसे नेण्यासाठी चाकांच्या खुर्च्या, ढकल गाड्या आहेत, लहान मुलांसाठी आच्छादित ढकल गाडी आहे! निवास व्यवस्था ऑनलाईन नाही. आगाऊ आरक्षण नाही. प्रथम येईल त्यास प्राधान्य अशा रीतीने खोल्या उपलब्ध करुन दिल्या जातात. निवास व्यवस्था देणगी स्वरूपात सशुल्क आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारात दर्शनास अंदाजे किती वेळ लागू शकेल याचा इलेक्ट्रॉनिक फलक आहे. त्यातही मुख दर्शनाची सोय आहे.

देणगी द्यायची असल्यास रोख आणि card swipe करून देता येते. UPI scanner उपलब्ध नाही. मात्र online पद्धतीने घरूनही देणगी पाठवता येते.

देणगी रकमेनुसार भक्तांना भेटवस्तू, प्रसाद दिला जातो. पाच हजार रुपयांच्या देणगीदारास उत्तम दर्जाचा शर्ट पॅन्ट पीस देण्याची पद्धत सुरू आहे! श्री गजानन महाराज प्रतिमा सुद्धा आहेच. पोथी आणि इतर साहित्य सुबक, सुलभ आणि अत्यल्प शुल्कात मिळते!

VIP दर्शन पद्धती नाही. अगदी नाईलाज म्हणून माननीय राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्या दरम्यान, सुरक्षिततेचा अत्यावश्यक उपाय म्हणून अगदी अल्प काळ इतर भाविकांसाठी दर्शन स्थगित ठेवले जाईल हे जाहीर करताना संस्थान दिलगिरी व्यक्त करण्यास विसरलेले नाही!

थोडक्यात, श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र हे तीर्थक्षेत्र सतत भेट द्यावे असेच आणि इतरांना आदर्शवत आहे!

जय गजानन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ आदित्य हृदय स्तोत्र ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ आदित्य हृदय स्तोत्र ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रभू रामचंद्र रणांगणात चिंतित अवस्थेत असतांना रावण शस्त्रसज्ज होऊन रणांगणात उतरला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी रामापाशी जाऊन त्याला ‘आदित्यहृदय स्तोत्र’ सांगितले.

आदित्य ह्रदय स्तोत्र 

ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्‌ । 

रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्‌ ॥१॥

 *

दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम्‌ । 

उपगम्याब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा ॥२॥

 *

राम राम महाबाहो श्रृणु गुह्मं सनातनम्‌ । 

येन सर्वानरीन्‌ वत्स समरे विजयिष्यसे ॥३॥

 *

आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम्‌ । 

जयावहं जपं नित्यमक्षयं परमं शिवम्‌ ॥४॥

 *

सर्वमंगलमागल्यं सर्वपापप्रणाशनम्‌ । 

चिन्ताशोकप्रशमनमायुर्वर्धनमुत्तमम्‌ ॥५॥

 *

रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम्‌ । 

पुजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम्‌ ॥६॥

 *

सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावन: । 

एष देवासुरगणांल्लोकान्‌ पाति गभस्तिभि: ॥७॥

 *

एष ब्रह्मा च विष्णुश्च शिव: स्कन्द: प्रजापति: । 

महेन्द्रो धनद: कालो यम: सोमो ह्यापां पतिः ॥८॥

 *

पितरो वसव: साध्या अश्विनौ मरुतो मनु: । 

वायुर्वहिन: प्रजा प्राण ऋतुकर्ता प्रभाकर: ॥९॥

 *

आदित्य: सविता सूर्य: खग: पूषा गभस्तिमान्‌ । 

सुवर्णसदृशो भानुर्हिरण्यरेता दिवाकर: ॥१०॥

 *

हरिदश्व: सहस्त्रार्चि: सप्तसप्तिर्मरीचिमान्‌ । 

तिमिरोन्मथन: शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोंऽशुमान्‌ ॥११॥

 *

हिरण्यगर्भ: शिशिरस्तपनोऽहस्करो रवि: । 

अग्निगर्भोऽदिते: पुत्रः शंखः शिशिरनाशन: ॥१२॥

 *

व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजु:सामपारग: । 

घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथीप्लवंगमः ॥१३॥

 *

आतपी मण्डली मृत्यु: पिगंल: सर्वतापन:। 

कविर्विश्वो महातेजा: रक्त:सर्वभवोद् भव: ॥१४॥

 *

नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावन: । 

तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्‌ नमोऽस्तु ते ॥१५॥

 *

नम: पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नम: । 

ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नम: ॥१६॥

 *

जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नम: । 

नमो नम: सहस्त्रांशो आदित्याय नमो नम: ॥१७॥

 *

नम उग्राय वीराय सारंगाय नमो नम: । 

नम: पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते ॥१८॥

 *

ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे । 

भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नम: ॥१९॥

 *

तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने । 

कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नम: ॥२०॥

 *

तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे । 

नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे ॥२१॥

 *

नाशयत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभु: । 

पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभि: ॥२२॥

 *

एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठित: । 

एष चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणाम्‌ ॥२३॥

 *

देवाश्च क्रतवश्चैव क्रतुनां फलमेव च । 

यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमं प्रभु: ॥२४॥

 *

एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च । 

कीर्तयन्‌ पुरुष: कश्चिन्नावसीदति राघव ॥२५॥

 *

पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगप्ततिम्‌ । 

एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ॥२६॥

 *

अस्मिन्‌ क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि । 

एवमुक्ता ततोऽगस्त्यो जगाम स यथागतम्‌ ॥२७॥

 *

एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत्‌ तदा ॥ 

धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान्‌ ॥२८॥

 *

आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्‌ । 

त्रिराचम्य शूचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्‌ ॥२९॥

 *

रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागतम्‌ । 

सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधेऽभवत्‌ ॥३०॥

 *

अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमना: परमं प्रहृष्यमाण: । 

निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति ॥३१॥

 — — 

आदित्यहृदय स्तोत्र : भावानुवाद

 ☆ 

चिंतेने ग्रस्त श्रीरामचंद्र युद्धश्रमाने थकून रणी

युद्ध करण्या प्रत्यक्ष ठाके रावण समरांगणी ॥१॥

 *

देखूनिया तया रणी मुनी अगस्ती सरसावले 

भगवंत श्रीरामासमीप जाउनिया वदले ॥२॥

 *

महावीरा हे श्रीरामा गुपित सनातन ऐकशील

युद्धात सर्वांवरती विजयश्री प्राप्त करशील ॥३॥

 *

पावन आदित्यहृदय स्तोत्र सर्वशत्रूविनाशक

परम शिव नित्य अक्षय जपावे विजयदायक ॥४॥

 *

समग्र मंगलांमधील मंगल सर्वपापविनाशक

चिन्ताशोक शमन करी आयुष्य वृद्धीदायक ॥५॥

 *

सुर-असूर नित्य पूजिती किरणोमयी उदय होता 

विवस्वान भास्कर भुवनेश्वराचे पूजन करी आता ॥६॥

 *

आभा सकल देवांची तेजस्वी किरणकारण

सुर-असुरसहित समस्त लोकांचे करती पालन ॥७॥

 *

हाचि ब्रह्मा विष्णु हा शिव कार्तिकेय तथा प्रजापति

महेंद्र कुबेर काल हा यम विधु हाचि तेजाचा पती ॥८॥

 *

पितर वसू साध्य मरूद्गण मनु तथा अश्विनीकुमार

पवन वन्ही प्रजा प्राण ऋतू नियामक तेजस्वी प्रभाकर ॥९॥

 *

आदित्य खग सूर्य सविता गभस्तिमान पूष 

भानु हिरण्यरेत प्रभाकर सुवर्णसदृश ॥१०॥

 *

हरिद्रश्व सहस्रार्चि सप्तसति मरीचिमान

तिमिरोन्मथन शंभू त्वष्टा अंशुमान मार्तंड ॥११॥

 *

हिरण्यगर्भ शिशिर तपन दिनकर विवस्वान 

अदितीपुत्र अग्निगर्भ शंख शिशिरनाशन ॥१२॥

 *

व्योमनाथ ऋग्वेद यजुर्वेद सामवेद पारगमनी

जलमित्र घनवृष्टी विन्ध्यवीथीप्लवंग तमोभेदनी ॥१३॥

 *

आतपी मण्डली मृत्यू पिंगल सर्वतापन

कवि विश्व महातेज रक्त समस्त चरजनन ॥१४॥

 *

नक्षत्रतारांगणस्वामी तथा असुन विश्वभावन

तेजस्वीत तेजोमयी द्वादशारिक्त नामे तुज नमन ॥१५॥

 *

उदयाचल अस्ताचल रुपे नमन तुजला

नमन तारांगण स्वामी तथा दिनाधिपतीला ॥१६॥

 *

जयासी जयभद्रासी हरिताश्वासी असो नमन

सहस्ररश्मी शोभित आदित्यदेवा वारंवार नमन ॥१७॥

 *

उग्रासी नमन वीरासी सारंगासी पुनर्नमन

पद्मप्रबोधासी नमन प्रचंडासी असो नमन ।१८॥

 *

ब्रह्मा विष्णु महेश तुम्ही किरणांची प्रभा तुम्हा 

तेजःपुंजा सर्वभक्षका हे रौद्रा नमन तुम्हा ॥१९॥ 

 *

तम विनाशक अनुपमरूपी शत्रुनाशका विनाशक हिम

कृतघ्न नाशक देवा ज्योतिषपते तव चरणी प्रणाम ॥२०॥

 *

हरे विश्वकर्मा प्रभा तप्त सुवर्णासमान

तमारि प्रकेशरूपा सर्वसाक्षी तुला नमन ॥२१॥

 *

सर्व जीव संहारक समस्त सृष्टीचे पालक ईश

देव तापाचा सूर्य पर्जन्याचा नमन गभस्ती ईश ॥२२॥

 *

सुप्तरूपे समस्त जीवांच्या अंतर्यामी जागृत 

अग्निहोत्र्यांसी अग्निहोत्राचे फल हाचि अर्पित ॥२३॥

 *

देव हाचि यज्ञ हाचि यज्ञाचे प्राप्त फल

समस्त कर्मांचे विश्वातील हाचि देई फल ॥२४॥

 *

कष्ट असो वा आपत्ती दुर्गम मार्ग भय वा

याचे करता कीर्तन होईल निवारण राघवा ॥२५॥

 *

एकाग्र होउनी जगदीश्वराची करावीसी अर्चना

युद्धे विजय प्राप्ती करिता स्तोत्रा त्रिवार पठणा ॥२६॥

 *

वीरश्रेष्ठा युद्ध करुनी या क्षणी पराजित करशील दशानना

निघून गेले ऋषी अगस्ती देउनिया रघुनायका आश्वासना ॥२७॥

 *

चिंतामुक्त जाहले रघुवीर ऐकुनिया वचना

प्रसन्न चित्ते धारियले रघुनाथे ऋषीवचना ॥२८॥

 *

 नेत्र लाविले आदित्यावर त्रिवार आचमन 

शुचिर्भूत राघव सज्ज हाती कोदंडा धरून ॥२९॥

 *

समोर बघता दशाननाला राघव सरसावले

अरीवधाचा निश्चय करूनी युद्धसिद्ध जाहले ॥३०॥

 *

देवगणांसमवेत ठाकल्या आदित्यरविदेवाने

समरसज्ज श्रीरामास पाहिले मोठ्या हर्षाने

निशाचरपति रावणवधास सज्ज पाहुनी राघव

हे रघुनंदन त्वरा करावी वदले भास्करमित्रदेव ॥३१॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथ टागोर व संगीत

रविंद्रनाथांना जन्मजात लाभलेल्या रूपसौंदर्यासारखंच सूर सौंदर्य देखील लाभलं होतं. ब्राह्मो समाजाचे आद्य गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती हे त्यांचे पहिले गायन गुरू. यदुभट्ट यांच्याकडेही त्यांचे संगीत शिक्षण झाले मात्र कोणत्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही. त्यांनी जवळ जवळ २२३० स्वरचित गाण्यांना चाली लावल्या.

रविंद्रनाथांच्या कविता; नाद, सूर, लय घेऊनच त्यांच्या लेखणीतून प्रकट होत. ते त्यांच्या कवितेला कधी कविता म्हणत नाहीत, गीत म्हणतात. इंग्रजी गीतांजलीतील कविता खरंतर prose poetry किंवा गद्य काव्य या प्रकारातील आहेत पण तरीही त्यांनी तिला ‘गीतांजली, song offering’ म्हटलंय. कदाचित मूळ बंगाली कविता, ह्या गेय असल्यामुळे असेल. कविता व गेयता यांचं नातं अनादि कालापासून भारतीयांनी अनुभवलेलं आहे. आपली वेद, उपनिषदे सुद्धा गेय काव्य रूपातच आहेत.

रविंद्रनाथांनी सुरांचे सामर्थ्य लहानपणीच ओळखलं होतं. त्यांच्या कवितेचा भाव; सुख-दु:ख, हर्ष- शोक, भक्ती- प्रीती कोणताही असो, त्यांचे शब्द, सुरांचा साज लेऊनच वहीच्या मंचावर नर्तन करीत प्रवेश करत. कवितेचं गाणं होताना सुरांतून इंद्रधनुष्य निर्माण होत असतं असं त्यांना वाटे.

“मला गायला कधी येत नव्हतं असं मला आठवतच नाही. ” असं ते म्हणायचे. गाणं रचताना ते गात गात रचावं व रचता रचता तद्रूप होऊन जावं अशी तन्मयता, उन्मादावस्था त्यांनी अनेकदा अनुभवली व एकदा एका खाजगी पत्रात वर्णिली पण आहे. ही अलौकिक अशी अध्यात्मिक परमावस्था नाही काय?

रविंद्रनाथांना भारतीय अभिजात संगीताची चांगली जाण होती. अनेक रागरागिण्यांचे संस्कार घेऊन त्यांची गीतं प्रकट होत. पण लोकसंगीताच्या देखील असंख्य चाली त्यांच्या गीतांमध्ये दिसतात. बंगाली लोकसंगीत मुळात अतिशय समृद्ध आहे. बाऊल, भटियाली, कीर्तन, काका, कविगान, श्यामा संगीत, फकिरांची गाणी, सूफी गाणी, वैष्णव भक्तांची गाणी, भादू सारखी कहाण्यांची गाणी, पाँचालि, जात्रापाला असे अनेक प्रकार त्यात आहेत. आपल्या संगीतासाठी ख्याल, ध्रुपद, ठुमरी, दादरा, टप्पा इथपासून लोकसंगीतापर्यंतच्या; इतकंच नव्हे तर पाश्चात्य संगीतावर आधारित चाली देखिल वापरण्याची रविंद्रनाथांची प्रतिभा पाहून अभ्यासक देखील चकित होतात.

रविंद्र संगीताचा बंगाली संगीतावरील प्रभाव आज देखील ठळकपणे जाणवतो किंबहुना खरंतर रविंद्र संगीतापासून बंगाली संगीत वेगळं करताच येणार नाही. त्यांच्या संगीताकडे चित्रपट क्षेत्रातील सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, नितीन बोस, तपन सिन्हा, कुमार साहनी यांच्यासारखे अतिरथी, महारथी आकर्षित झाले नसते तरच नवल! त्यांनी आपल्या चित्रपटात रविंद्रनाथांची गाणी वापरली. इतकेच नव्हे तर कांही ब्रिटिश, युरोपियन व ऑस्ट्रेलियन चित्रपटांत देखील त्यांची गाणी वापरली गेली आहेत. मात्र आपल्या गीतातील शब्दच काय पण सूर देखील बदलणं त्यांना मंजूर नव्हतं. आज सुध्दा त्यांची गाणी जशीच्या तशी गायली जातात.

 (संदर्भ: रविंद्रनाथ तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

——

गीत : ७३

DELIVERANCE is not for me in renunciation. I feel the embrace of freedom in a thousand bonds of delight.

Thou ever pourest for me the fresh draught of thy wine of various colours and fragrance, filling this earthen vessel to the brim.

My world will light its hundred different lamps with thy flame and place them before the altar of thy temple.

No, I will never shut the doors of my senses. The delights of sight and hearing and touch will bear thy delight.

Yes, all my illusions will burn into illumination of joy, and all my desires ripen into fruits of love.

——

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७३

☆ 

सर्वसंगपरित्याग करुनि

कशास मी मुक्त व्हावे ?

हजार बंधनात सुखाच्या,

मुक्तीला आलिंगन द्यावे॥

 *

काठोकाठ रस तू भरिशी 

मातीच्या या घटाघटातुनी

अनेक रंगी तिला रंगविशी,

अनेक तशा सुवासातुनी॥

 *

तव ज्योतीने दीप उजळतील

मम जगती, राऊळी लावण्या

पंचेंद्रिये मम सजग राहतील

तुझे शब्द, स्पर्श जाणण्या॥

 *

तव दर्शनास आसुसलो रे,

कसा करीन मी बंद लोचना

सारी सुखे ही तुझी देणगी

याच जाणीवा आणि भावना॥ 

 *

आनंद इतुका मला हवा की

आभास सारे त्यात मिटावे

तव प्रेमाच्या अंतर्यामी

मनोरथ माझे फलित व्हावे॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆  गीत : ७४ ☆ 

THE day is no more, the shadow is upon the earth. It is time that I go to the stream to fill my pitcher.

The evening air is eager with the sad music of the water. Ah, it calls me out into the dusk. In the lonely lane there is no passer by, the wind is up, the ripples are rampant in the river.

I know not if I shall come back home. I know not whom I shall chance to meet. There at the fording in the little boat the unknown man plays upon his lute.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७४ ☆ 

☆ 

लांब गेल्या सावल्या अन्

क्षितिजी टेकला दिनमणी

मावळतीची सुवर्णलाली

जलात नदीच्या आरसपानी॥

 *

सांजवेळी नदी किनारी,

घडा भराया जाईन म्हणते

उत्सुक सायंकाळ परंतु 

उदासवाणे गीत गाते॥

 *

तिन्हीसांजेच्या या प्रहरी

दूर कोण मज साद देते

वात लहर ती अवखळ भारी

पाण्यावर तरंग उठविते॥

 *

जाईन म्हणते, नसे माहिती 

परतुनि येईन की नाही

नदी किनारी, कुणा भेटण्या

जीव अनावर होतच राही॥

 *

गेले धावत निर्जन मार्गे

तोच उमटले मधु सूर बासुरी

एकल नावेमधे बैसला

अनोळखी जरी, खचित मुरारी॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆   गीत : ७५ ☆ 

THY gifts to us mortals fulfil all our needs and yet run back to thee un-diminished.

The river has its everyday work to do and hastens through fields and hamlets; yet its incessant stream winds towards the washing of thy feet.

The flower sweetens the air with its perfume; yet its last service is to offer itself to thee.

Thy worship does not impoverish the world.

From the words of the poet men take what meanings please them; yet their last meaning points to thee.

—–

☆   मराठी भावानुवाद : गीत : ७५ ☆ 

☆ 

 दान तुझे तुळस मंजिरी

उणे न कांही तुझ्या मंदिरी

भरभरुनि तू देतच जाशी

परतुनि ये ते तुझ्याच पाशी॥

 *

नदी वाहते शेतामधुनी

शमते तृष्णा गावामधुनी

अविरत वाहे, अखेर सरिता,

पादाभ्यंगा तुझ्याच करिता॥

 *

कुसुम गंधा पवन वाहतो

आसमंत हा पुलकित होतो

ध्येय अंतिम परंतु त्याचे

तुझ्याच पायी लीन व्हायचे॥

 *

तुझ्या पूजना सर्वस्व वाहतो

इथे परि कुणी नच गरीब होतो

भरभरून सुख जीवनी वेचतो

तुझीच किमया हे ही जाणतो॥

 *

 कवीच्या गीतांमधुनी अर्था

जो तो शोधी, पुरवित स्वार्था

परि अखेर जी गीते बोलती

कृष्ण भावना तुझीच की ती॥

☆ 

– क्रमशः भाग २५..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा

– – – आणि काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री!

वर्ष १९६५. आपल्या जन्मजात शत्रूने अर्थात पाकिस्तानने १९४७ नंतर १८ वर्षांनी पुन्हा फणा उभारला आणि भारतावर आक्रमण करण्याचा मनसुबा प्रत्यक्षात आणला ! –

– – आपल्या पंजाब सीमेवरील फिरोजपूर जिल्ह्यातलं, सतलज नदीच्या अगदी अंगाखांद्यावर खेळणारं आणि पाकिस्तानातील गंडासिंगवाला गावच्या अगदी समोर असलेले हुसैनीवाला गाव. अमृतसर पासून हे स्थळ सुमारे ११० किलोमीटर्स भरते. हुसैन नावाच्या मुस्लिम संताच्या नावावरून या गावाचे नाव पडले आहे.

या गावाला एक विशेष इतिहास लाभला आहे. क्रांतीपुरुष भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिशांनी फासावर चढवले. या तिघांवर सतलज काठावरील एका ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. भारतीय जनमत या बलिदानांनी विदग्ध झालेले होते… या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जमाव जमून काही विपरीत घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी ठरलेल्या दिवसापेक्षा एक दिवस आधीच गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची योजना आखत या तिघांची शवं तिथे पोहोचवली… पण याचीही खबर लोकांना लागली… मोठाच तणाव निर्माण झाला… यामुळे ब्रिटिशांनी हे तीन मृतदेह जागेवरच ठेवून तिथून पळ काढला. मग स्थानिक नागरिकांनीच या देहांवर अंत्यसंस्कार केले! इथे पुढे प्रेरणा स्थळ स्मारक उभारले गेले.

भगत सिंह यांच्या मातोश्री, विद्यावती देवी यांनी आपले अंतिम संस्कार मुलाशेजारीच केले जावेत, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार त्यांच्या देहावर भगत सिंग यांच्या स्मारकाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले… मूल आईच्या कुशीत शिरते… इथे आई मुलाच्या कुशीत शिरून चिरनिद्रा घेती झाली! क्रांतिवीर बी. के. दत्त यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली होती… त्यांनाही इथे अंतिम विश्रांती देण्यात आली.

१९४७ च्या फाळणीत हुसैनीवालासह येथील बारा गावे पाकिस्तानात गेली. नतद्रष्ट पाकिस्तान्यांनी इथून जाताना भारतात असलेला कैसर ए हिंद हा स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला सुंदर पूल नष्ट केला!

मुंबईतून हुसेनीवाला मार्गे पाकिस्तानमध्ये जाणारी पंजाब मेल दिल्लीवरून फिरोजपूरला वळवण्यात आली.. हुसेनीवाला रेल्वे स्टेशन तिथे जतन करून ठेवलेले आहे.

फाळणीमुळे पाकिस्तानात गेलेल्या शहीद प्रेरणास्थलाची अवस्था खराब झाली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रयत्न करून तो भाग भारतात घेतला आणि त्या बदल्यात नदीचा आणि जलव्यवस्थेचा काही भाग पाकिस्तानला दिला! 

१९५६. प्रचंड पावसाने महापूर आलेला होता, येथील ब्रिटिशकालीन पूल वाचवण्यासाठी अभियंते झटत होते. परिस्थितीचा गैरफायदा घेत पाकिस्तानने या पुलावर हल्ला चढवला. ४, जम्मू काश्मीर रायफल्सच्या सैनिकांनी पाकिस्तान्यांना हुसकावून लावले!

आणि यानंतर दहाच वर्षांनी पाकिस्तान पुन्हा उलटून आला.. !१९६५ मध्ये पाकिस्तान ही जागा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची खबर भारतीय सैन्यास लागली. या भागाच्या रक्षणासाठी २, मराठा लाईट इन्फंट्री या आपल्या चपळ सैन्यदलास इथे घाईघाईने तैनात करण्यात आले.

– – या काळ्या पाचवीच्या नेतृत्वाची जबाबदारी लेफ्टनंट कर्नल टी. टी. ए. नोलान साहेबांच्या भक्कम खांद्यांवर होती. खरं तर मराठा सैनिक इथे संरक्षणात्मक पवित्रा घेतील अशी इतरांची कल्पना होती!

काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री या नावाला एक अर्थ आहे. या सैनिकांच्या गणवेशात काळया रंगाचे प्राबल्य आहे. सह्याद्रीचा रंगही करडा, काळा कभिन्न! आणि इथं जन्मलेली शरीरं आणि मनं कणखर! वायुवेगाने हालचाली करीत शत्रूच्या गोटात शिरून त्याच्या राईराई एवढ्या चिंधड्या उडवाव्यात त्या मराठ्यांनीच! यशाचे धनी असलेले मराठा गडी लष्करात विशेष वकूब राखून आहे. पूर्वी आपल्याकडे गणपत हे नाव प्रचलित असे. त्यावरून अधिकारी लोकांनी प्रेमाने आपल्या सैनिकांना Ganpats हे नाव दिले होते! आता दुसरी असलेली ही इन्फंट्री पूर्वी पाचवी होती. लष्करात प्रत्येक दलाला विशिष्ट क्रमांक दिलेले असतात.

पाकिस्तान पूर्ण ताकदीने या हल्ल्यात उतरले असताना नोलान साहेबांनी आक्रमक पवित्रा घेतला! मराठे त्वेषाने लढले… एक विरुद्ध शंभर अशी स्थिती असताना एक मराठा शंभर पाकिस्तान्यांना भारी पडला! हल्ले परतवून लावले जातच होते… एके दिवशी नोलान साहेब युद्धाची व्यूहरचना करीत असताना त्यांच्या अगदी जवळच बाँब पडला आणि आपण एका शूर अधिकाऱ्यास मुकलो. त्यांच्यासह वीस सैनिक, अधिकारी हुतात्मा झाले. नेता धारातीर्थी पडलेला असताना मराठे आणखी जोरदार लढले आणि पाकिस्तान शेपूट घालून माघारी पळून गेला!

या लढाईतील कामगिरी मुळे २, मराठा लाईट इन्फंट्रीला Husseniwala Battle Honour प्राप्त झाला. स्थानिक नागरिकांनी विशेष मानपत्र प्रदान केले!

 १९७१ मध्ये सुद्धा पाकिस्तानने इथेच हल्ला चढवला होता. पंजाब बटालियनने यावेळी शौर्य गाजवून त्यांना खूप काळ रोखून धरले होते! पण यावेळी पाकिस्तानची ताकद आणि तयारी तिप्पट होती… त्यांनी हुसेनीवाला पूल उडवून लावला आणि परिसर ताब्यात घेतला… मात्र शिमला करारात भारताने हा भाग पुन्हा मिळवला!

या जागेचे महत्त्व व्यापारीदृष्ट्या सुद्धा अधिक होते आणि आहे. भारत – पाकिस्तान – अफगाणिस्तान यांच्यात जो काही व्यापार होतो… तो बराचसा इथून होतो. परस्पर संवाद वाढवा, सौहार्द वाढावे म्हणून सीमा सुरक्षा दलाचे तत्कालीन इन्स्पेक्टर जनरल अश्विनीकुमार शर्मा साहेबांनी १९७० मध्ये आटारी बॉर्डर सारखी The Beating The Retreat Ceremony सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि ही परेड सुरू झाली.. आणि १९७१ पासून ही नियमित झाली!

माहितीचा किंवा प्रसिद्धीचा अभाव या कारणांनी अनेक भारतीय नागरिकांना ही जागा माहीत नाही. खरं तर हुतात्मा भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांची बलिदाने, भगत सिंग यांच्या मातोश्री यांना वंदन करण्यास लोकांनी गेले पाहिजे… हे एक पवित्र स्थळ आहे. भारतीय सैनिकांनी इथे बलिदाने दिली आहेत… मराठी अधिकाऱ्यांनी इथे अनुभव पणाला लावला आहे. त्यांना वंदन म्हणून इथे भेट द्यायला पाहिजे!

सैनिक आणि नागरिक यांनी आता अधिकाधिक जवळ आले पाहिजे… कारण पाकिस्तान सुधारणार नाही… आपण सदैव दक्ष असले पाहिजे! सैन्य आहेच तैनात! जय हिंद.. जय हिंद की सेना!

(सेवानिवृत्त सैन्याधिकारी श्री. संजय सहस्रबुद्धे साहेबांनी या लेखासाठी प्रेरणा दिली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मरीन ड्राईव्ह बांधणारा आणि दादरची स्मशानभूमी दान देणारा ‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला विचारलं की मुंबईची शान असलेला मरीन ड्राईव्ह कोणी बांधला? तर अनेकांना उत्तर माहीत नसेल. पण स्वतःच्या खिशातले लाखो रुपये खर्चून मुंबईसाठी मरीन ड्राईव्ह बांधणारा, आणि दादरमध्ये स्मशानभूमीसाठी तब्बल ५ एकर जागा दान देणारा एक महान मराठी माणूस होता !

ते होते : श्रीमान भागोजी शेठ कीर ! 

रत्नागिरीतल्या एका अत्यंत गरीब भंडारी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्राने स्वतःच्या जिद्दीवर मुंबईत साम्राज्य उभं केलं. आज दादरमध्ये ज्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘चैत्यभूमी’ आणि ‘सावरकर स्मारक’ डौलाने उभं आहे, ती ५ ते ६ एकर जागा भागोजी शेठ कीर यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन स्मशानभूमीसाठी दान केली होती.  

इतकेच नाही, तर मरीन ड्राईव्हची समुद्राचे पाणी अडवणारी भिंत, मुंबई सेंट्रल स्टेशन आणि ब्रेबॉर्न स्टेडियम या मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंचे बांधकाम त्यांनी शापूरजी पालनजी यांच्यासोबत भागीदारीत केले.

नुसता पैसाच नाही तर समाजसुधारणेतही ते पुढे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःच्या खर्चाने रत्नागिरीत देशातले पहिले ‘पतित पावन मंदिर’ बांधले आणि सर्व जाती-धर्मांसाठी खुले करून अस्पृश्यता निवारणाचा मोठा लढा उभारला.

ज्या माणसाने मुंबईच्या जडणघडणीसाठी आपली संपत्ती पणाला लावली, त्यांचं साधं एक भव्य स्मारक आज मुंबईत नाही, हे आपलं दुर्दैव आहे ! 

पण हा इतिहास इथवरच थांबता कामा नये.

… भागोजी शेठ कीर यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने सांगा! 

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ७ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ७. ☆ प्रा.भारती जोगी ☆

तिनं एकवार बैठकीवर पाहिलं. ती चरकली. गोंधळली. बैठकीवर फक्त टाळ आणि चिपळ्या… बुवांशिवाय! तिला आठवले बुवांचे शब्द, ” आवले, ज्या दिवशी या टाळ-चिपळ्या माझ्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्या दिवशी समज तुझा तुकाराम या जगात नाही “!

 चरकली ती… टाहो फोडला… धनी… धनी… तिचा आकांत ऐकून विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप झाला, पायाखालची वीट थरारली… इंद्रायणी क्षणभर वहायची थांबली!!

हो… हीच ती… टाहो फोडून कोसळलेली, मनानं ढासळलेली… तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी… जिजाबाई, जिला तुकोबा प्रेमाने आवली म्हणत!

… हीच ती आवली जिला तुकोबांनी कधीतरी मनाच्या तरल मनस्थितीत, ज्यात त्यांना वाटे… ” विठो तुझे माझे राज्य, नाही दुस-याचे काज”!… मग अशा वेळी त्यांनी एका अभंगात म्हंटले…

स्त्री द्यावी गुणवंती, तरी तीते गुंते आशा,

म्हणून कर्कशा लावी पाठी”! 

– – झालं… त्यानंतर सगळेच मग आवली कडे कर्कशा पत्नी म्हणूनच बघू लागले. आजही बघतात. पण त्याच तुकोबांनी अजून एका अभंगात म्हंटलंयं…

 ” तुका म्हणे शोधून पाह्य,

 बायको नव-याची माय.

 तिजविण विसावे नाही,

 क्षणार्ध सुद्धा! 

 म्हणोनी संसार थोर! “

पण समाजधुरिणांनी, किर्तनकार, प्रवचनकार, सगळ्यांनीच आवलीवर ‘कर्कशा’… हे शिक्कामोर्तब केले ते केलेच! हाच शिक्का, हीच उमटवलेली मोहोर… पुसण्याचा हा प्रयत्न! तुकोबांच्या परमार्थ कार्य यज्ञात, आयुष्यभर… बोलंत-म्हणंत, त्याना जगरहाटी शिकवंत, लोकांपासून सावध रहाणं सांगंत, प्रापंचिक जबाबदा-यांची जाणीव देत… आणि स्वतः कोंड्याचा मांडा करून प्रपंच नेटका करण्याचा सतत प्रयत्न करंत… कधी पेटंत, कधी धुमसंत, तर कधी धगधगंत पण कुटुंब कबिल्यासाठी चेतती राहिलेली ही… समिधा!!! 

पुण्याच्या गुळवे सावकाराची, खात्या-पित्या घरातली ९-१० वर्षांची लेक… जिजाई! लग्न होऊन तुकारामांच्या घरात येते आणि साखरे सारखी विरघळून जाते त्यांच्या संसारात. द्वितीय पत्नी म्हणून आलेली असूनही, सवतीवर… रखुमाबाईंवर अगदी मनापासून प्रेम आणि तिच्या तब्येतीची काळजी घेणं, तिच्या मुलावर अपत्यवत प्रेम करणं… मोठ्या जावेवर बहिणीसारखी माया केली तिनं! जावेच्या पती विरहाच्या अव्यक्त दु:खानं दु:खी होणारी ही आवली!! प्रपंच मात्र नेटाने आणि नेटका, निगुतीचा करत होती. मोठ्या आत्मविश्वासाने संसार केला तिनं! 

पण तुकाराम मात्र एकापाठोपाठ एक पिता आणि माता यांचं छत्र हरवणं, मोठ्या भावजयीचं अकस्मात जाणं, मोठ्या भावाचं त्या दु:खात, विमनस्क अवस्थेत दूर कायमचं निघून जाणे, पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि पहिल्या मुलाचा ही मृत्यू, पडलेला भयंकर दुष्काळ, होणारी उपासमार, बुडलेली सावकारी आणि प्रतिष्ठेचे निघालेले दिवाळे… या सगळ्या आपत्ती, विपत्तींच्या झंझावातात कोलमडून पडले. आणि परमार्थाची वाट धरली त्यांनी, प्रपंच जणू वा-यावर सोडून दिला. आणि दोघांच्या जगण्याच्या पातळ्याच भिन्न झाल्या. आवली ढासळली मनाने. हिंमत खचल्या सारखी झाली. आणि मग मात्र तिचा संयम कधी तरी संपला तर तिची चिडचिड होणं साहजिकच नाही कां? आपल्या नव-यानं चारचौघांसारखा संसार करावा असं त्या काळातल्या कुणाही बाईला वाटणाऱच ना? मग आवलीचं संतापणं, चिडणं, पराकोटीला ही गेलं असेल समजा… तरी तो उद्रेक तर घरा-घरांत आजही बघायला मिळतोच की! मग तिलाच ‘कर्कशा’ ठरवून, आणि तुकोबांनीच… तिच्या पतीनेच म्हंटलय़ं… असा पवित्रा घेत… आवलीचं पत्नी, सून, जाऊ, माता, गृहिणी म्हणून असलेलं समर्पण दुर्लक्षित नाहीच ना करता येणार? 

तुकोबांनी एकच उरवून आणलेला ऊस… संतापात तिने, भावनेच्या उद्रेकात फेकला, भिरकावला असेल ही त्यांच्या दिशेने… पण त्याचा विपर्यास करून… पाठीत मारला… असं म्हणणं… ही किंवदंती, आख्यायिका ही असू शकते की कदाचित! हा ही एक विचार असूच शकतो ना? पण म्हणून तिच्या या धगी पेक्षा… तिची ऊब, तिची मायेची, पती प्रेमाची पाखर त्याचा तो अलवार स्पर्श ही कधीतरी जाणवून घ्यावा ना? 

हीच आवली… भंडा-याच्या डोंगरात काटे-कुटे तुडवत तुकोबांच्या भुकेची भाकर झाली. तुकोंबावर मनापासून निरतिशय प्रेम केलं तिनं… म्हणूनच तर चिंतनासाठी कधी… भांबनाथ तर कधी भंडारा अशा विविध डोंगरावर, न सांगता गेलेल्या तुकोबांचा पत्ता तिला बरोबर कळे, आणि मग जाई ती थेट त्यांच्या पर्यंत भाकर घेऊन. तुकोबांच्या पोटात घास गेल्याशिवाय आवलीने कधीच एक घास ही खाल्ला नाही.

तुकारामा सारख्या तेजस्वी सूर्याची किरणे आवली पर्यंत नाही पोहोचू शकली. ती सतत त्यांची सावली बनून राहिली तरीही!! पण तरीही आवलीने एका अभंगात आपल्या आध्यात्मिक ज्ञानाची चुणूक, झलक दाखवलीच आहे असं वाटतं… बघा ना…

तुकारामाची कांता सांगे लोकांपाशी

 जातो पंढरीशी स्वामी माझा,

 फुटकाची वीणा त्याला दोन तारा

 घालितो येरझारा पंढरीच्या!”

– – – आवलीने आध्यात्मिक सत्यच सांगितले आहे ना यात… नऊ ठिकाणी छिद्रे असलेली ही देहरूपी वीणा आणि श्वास-उच्छवास या दोन तारा छेडीत माझा स्वामी पंढरीसी कां जातो? कळेना!! 

आवलीने… “देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग! “… हेच तर सांगितलयं ना? 

तुकोबांचं सांगणं… ” आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने! “… हे नसेल उमगलं तिला… पण तरीही तिनं तुकोबांच्या भक्तीचं वादळ पेललंच ना? आभाळ झेललं तिनं!! पण तिचं हे… पेलणं, झेलणं, घराचा सरा होऊन आख्खं घर तोलणं आणि कुटुंबाचा कणा होऊन ताठ उभं करणं… हे जगाने ओळखलंच नाही.

तुका आकाशाएवढा असेलही, आहे ही… पण आवली तर पृथ्वी सिद्ध झाली, जिच्या सोशिकतेने दगडाला ही पाझर फुटावा!!! 

कविवर्य बोरकरांनी सुद्धा तिचा महिमा वर्णिला आहे… म्हणतात…

तुक्याच्या पायाची व्हाया जिने वीट

 केली पायपीट चौ-यांशीची.

 *

 पोचवाया त्याच्या भूकेला भाकर

 काट्यांचे डोंगर पालाणिले.

 *

न चुकावी त्याची पंढरीची वारी

म्हणून वोसरी नोलांडिली!! “

*
आणि पुढे कविवर्य लिहितात…

 *

सार्थक होऊन, तुक्याच्या जन्माचे

 विमान देवाचे आले दारी,

 *

असून गर्भार पाचा महिन्यांची

 गाभण म्हशीची आई व्हाया,

 *

आलीये मुक्ती ला लाविले माघारी

 तुक्याहून थोरवी जिजाई ची!! 

अशी ही आवली तुकयाची सावली, गोठ्यातील गाभण म्हशीची माऊली… स्वतः गर्भार असूनही पतीबरोबरच मुक्ती पांडुरंगाने सुचविली, पण तिने नाकारिली… असंही म्हंटलं जातं. ही आख्यायिका जरी असली तरी, एक गोष्ट तर खरीच ना… की… तुकोबांनंतर ही आवलीने संसाराचा गाडा पुढे नेला. पती विरहाचं दु:ख पचवलं आणि त्यानंतर ४ महिन्यांनी जन्माला आलेल्या नारायणा वर अतिशय सुंदर संस्कार केले. आवलीला पतीचे महात्म्य कळले होतेच. फक्त तिची इच्छा होती की तुकोबांनी प्रपंच सांभाळून परमार्थ करावा. पण तसे नाही होऊ शकले. पण तरीही आवलीने, नारायण बापा सारखा व्हावा म्हणून त्याला वारकरी पंथाची शिकवण दिली. नारायणाचा… नारायण महाराज झाला. वारकरी पंथाची पताका तुकोबारायांनंतर नारायण महाराजांनीच खांद्यावर घेतली. ” ग्यानबा-तुकाराम”… हा गजर, नारायण महाराजांनी लिहिला, सुरू केला आणि माऊली -तुकोबांची एकत्रित पालखी ही त्यांनीच सुरू केली. म्हणूनच ते… पालखी सोहळा जनक:- तपोनिधी नारायण महाराज म्हणून ओळखले जातात. दिंडी सोहळ्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात करण्याचं श्रेय त्यांच्याकडेच जाते.

– – – या सोहळ्याची पताका फडकविणा-या हातांच्या पाळण्याची दोरी मात्र त्या आवली माऊली च्याच हाती होती… हे विसरून नाही ना चालायचं! तिचेच संस्कार भिडले ना, गजर बनून थेट आभाळाला!! या… तिन्ही लोकीं च्या गुंडा पुत्राची माता… आवली… ‘कर्कशा’ कशी असेल ना मग?? 

तुका वारकरी संप्रदायाचा कळस झाला, पण त्या कळसाच्या तेजाचं स्फुल्लिंग… पाया मात्र आवलीच ठरावी, मानावी… असं वाटतं!! 

… ही बायको… तुकोबाची माय बनली, आपल्या लेकरांबरोबरंच, म्हणूनच तुकोबांच्या म्हणण्यानुसार च ते… प्रभु चरणी विसावू शकले.

हा विसावा देणारी त्यांची सावली… आवली… शेवटी त्या पांडुरंगाच्याच चरणी विसावली. खरं म्हणजे पांडुरंगाला तुकोबांपेक्षा तीच जास्त प्रिय होती… तिची विरोधी भक्ती, त्याच्या वरील रागामागचा भक्तीमय अनुराग… जाणला होता त्यानं… म्हणूनच तर ना… काटा निमित्त होते, घेई देव भक्ताचे पाय हाती!! 

– – अशी ही थोरवी त्या आवली ची ! स्वयं दीप होऊन जळत राहणाऱ्या समिधेची !!! 

– लेख क्र. ७.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

… आपण कुठे जास्त सुखी आहोत?

आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपल्याला अमेरिका, लंडन किंवा स्वित्झर्लंडचे फोटो पाहून वाटतं, “काय नशीब आहे या लोकाचं””! किती सुंदर बर्फ आणि किती स्वच्छ हवा!” पण मित्रांनो, एक डॉक्टर म्हणून आणि निसर्गाचा अभ्यासक म्हणून मी तुम्हाला सांगेन, ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.

आज आपण जगातील मोठ्या देशांची हवामान स्थिती आणि आपला भारत किती ‘नशिबवान’ आहे, याचा वास्तववादी आढावा घेऊया.

१. स्वित्झर्लंड: केवळ पर्यटनासाठी सुंदर, जगण्यासाठी कठीण!

स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो पांढराशुभ्र बर्फ. पण विचार करा:

गोठलेले आयुष्य: तिथे वर्षातील ७ ते ८ महिने कडाक्याची थंडी असते. जो बर्फ फोटोंमध्ये छान वाटतो, तोच बर्फ जेव्हा घराच्या दारासमोर ३-४ फूट साचतो, तेव्हा तो काढताना नाकी नऊ येतात.

शेतीचा अभाव: हवामानामुळे तिथे आपल्यासारखी विविध कडधान्ये, फळे किंवा भाजीपाला पिकवणे अशक्य आहे. त्यांना बहुतेक अन्नधान्य आयात करावे लागते.

२. लंडन (यूके): सूर्यप्रकाशासाठी आसुसलेले लोक लंडनच्या हवामानाचा भरवसा कोणीच देऊ शकत नाही.

नेहमीचा पाऊस: तिथे कधीही पाऊस पडतो, त्यामुळे लोक सतत छत्री घेऊन फिरतात. पण तो पाऊस आपल्यासारखा ‘चिंब भिजवणारा’ नसतो, तर तो हाडे गोठवणारा आणि ओलसर असतो.

विटामिन-डी ची कमतरता: तिथे कित्येक आठवडे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे तिथल्या लोकांमध्ये हाडांचे आजार आणि ‘डिप्रेशन’ (उदासीनता) मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच तिथे उन्हाळ्यात थोडा जरी सूर्य दिसला की लोक पार्क मध्ये धावतात.

३. अमेरिका: निसर्गाचा रुद्रावतार

अमेरिका हा देश जेवढा प्रगत आहे, तेवढाच तो नैसर्गिक आपत्तींनी घेरलेला आहे.

बर्फाची वादळे (Blizzards): अमेरिकेत जेव्हा बर्फाची वादळं येतात, तेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, हीटिंग सिस्टम बंद पडते आणि लोक घरातच गोठून मृत्यू पावल्याच्या घटना दरवर्षी घडतात.

टोर्नेडो : तिथल्या काही राज्यांमध्ये इतकी भयानक चक्रीवादळं येतात की अख्खी घरं हवेत उडून जातात. अशा भीतीखाली जगण्यापेक्षा आपला भारत कितीतरी पटीने सुरक्षित आहे.

४. रशिया आणि कॅनडा: उणे ५० अंशांचा छळ

या देशांतील काही भागांत तापमान उणे ४० ते ५० अंशांपर्यंत जातं. तिथे साध्या पाण्याचा बर्फ व्हायला काही सेकंद लागतात. अशा ठिकाणी राहणं म्हणजे निसर्गाशी रोजचं युद्ध असतं.

मग आपला भारत ‘नशिबवान’ का?

आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राहणारे लोक खरंच भाग्याचे आहोत,  

कारण: न मोजता मिळणारा सूर्यप्रकाश: आपल्याला वर्षभर मोफत ‘व्हिटॅमिन-डी’ देणारा सूर्य मिळतो, जो जगातील निम्म्या देशांना मिळत नाही.

मोजून चार-चार महिने: निसर्गाने आपल्याला बदलायची संधी दिली आहे. उन्हाळ्यात आपण आंबे खातो, पावसाळ्यात निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेतो आणि हिवाळ्यात आल्हाददायक वातावरणात काम करतो.

अतिरेक नाही: आपल्याकडे रशियासारखा हाडे गोठवणारा बर्फ नाही की दुबईसारखं अंगाची राख करणारं ऊन नाही. आपल्याकडे ‘मध्यम’ मार्ग आहे.

अन्नधान्याची श्रीमंती: आपल्या हवामानामुळे आपण वर्षातून ३-३ पिके घेऊ शकतो. ताज्या भाज्या, फळे जे आपल्याला सहज मिळतात, ते परदेशात ‘लक्झरी’ मानले जातात.  

डॉक्टरांचा सल्ला:

परदेशाचे फोटो पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. आपण अशा भूमीत जन्माला आलो आहोत जिथे निसर्ग आपली ‘माय’ बनून काळजी घेतो, ‘वैरी’ बनून नाही. या सुवर्ण हवामानाचा आनंद घ्या, व्यायाम करा आणि निरोगी रहा.

 

लेखक: डॉ. सुशांत पाटील

(मोरया क्लिनिक, अक्कोळ)

संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४५ – – – 

जयाचेनि संगे समाधान भंगे |

अहंता अकस्मात येऊनि लागे |

तये संगतीची जनी कोण गोडी |

जिये संगतीने मति राम सोडी |४५|

अर्थ : ज्यांच्या संगतीत मनाचे समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढीस लागतो अशा लोकांची संगत चांगली नाही. ज्यांच्या संगतीत आपण बुद्धीने परमेश्वरापासून दूर जातो अशांच्या संगतीत राहण्यात गोडी ती कोणती ?

विवेचन : या श्लोकात समर्थांनी अप्रत्यक्षपणे सत्संगतीची महती सांगितली आहे. व्यवहारात आणि परमार्थातही संगत अतिशय महत्त्वाची असते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचे गुण किंवा दोष आपल्याला लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात …..

ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला

कुसंगे नाडला साधू तैसा ||

हिरा अत्यंत कठीण असतो परंतु त्याला ढेकणाचे रक्त लागले की तो भंग पावतो असे म्हणतात. त्याप्रमाणेच दुर्जनांच्या संगतीत राहिले की साधू देखील बिघडतो एवढे संगतीचे महत्त्व आहे. ‘संगती संग दोषेंण’ असे म्हटले जाते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, ” सत्संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो” व्यसनी माणसाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे आपल्यालाही व्यसन लागण्याची शक्यता असते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहत असू तर आपल्याला तसे वागणे योग्यच वाटायला लागते. श्रीमंत व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यालाही तसेच श्रीमंत व्हावेसे वाटते. या सगळ्या अशा प्रकारच्या संगतीत आपण भगवंताला मात्र विसरतो आणि आपला अहंकार मात्र वाढत असतो. ‘मी ‘पणाला खतपाणी मिळते.

संत नामदेवराय म्हणतात ….

अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णुदासा | भाविकांसी ||

क्षमा हे वीराचे भूषण आहे. नम्रता हे विद्येचे भूषण आहे. गर्व नसणे हे श्रीमंतीचे भूषण आहे. परंतु ज्या माणसांना हे माहिती नसते त्यांचा अहंकार बळावतो. अशांच्या संगतीत राहिल्याने आपलाही अहंकार आपण जोपासत राहतो. संत कबीर यांचा एक दोहा फार सुंदर आहे…

बडें बडाई न करे, बडे न बोले बोल| हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||

मैं मैं बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग| कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’

समर्थ म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. ” अहंकारामुळे काम, क्रोध आदी दुर्गुण वाढीस लागतात. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीमुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. परंतु शांतता आणि समाधान मात्र हरवलेले दिसते. आपल्याला त्यांची प्रगती जरी आकर्षक वाटली तरी त्यातील फोलपणा समजून घेतला पाहिजे.

तात्पर्य, ज्या संगतीने भगवंताचे नाम मुखात येऊन ते संगत म्हणजे सत्संगत ! सत्संगती धरली तर सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.

स्वसंवाद :: 

१) ज्या लोकांच्या सहवासात गेल्यानंतर मला अशांत वाटते किंवा स्वतःबद्दल उगाचच बडेजाव (मीपणा) मिरवावासा वाटतो, असे लोक माझ्या लक्षात येतात का ?

२)माझ्या मित्रांच्या किंवा परिचितांच्या वर्तुळात गेल्यानंतर आमचा संवाद भगवंताकडे/सद्गुणांकडे वळतो की केवळ परनिंदा आणि ऐहिक सुखांच्या गोष्टींकडे ?

३) श्रीमंतांच्या संगतीत स्वतःबद्दलचा न्यूनगंड आणि सत्ताधीशांच्या संगतीत वाढलेला माझा अहंकार मला जाणवतो का ? (हे देखील समाधान भंग पावण्याचे लक्षण आहे).

४) ‘अहंकाराचा वारा’ लागून माझी बुद्धी रामापासून (सत्यापासून) दूर जात आहे, हे ओळखण्याची सतर्कता माझ्यात आहे का?

– – – –

श्लोक क्र. ४६ – – 

मना जे घडी राघवेवीण गेली |

जनी आपुली ते तुवा हानी केली |

रघुनायकावीण तो सीण आहे|

जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे|४६|

अर्थ : हे मना, जो क्षण राघवाच्या स्मरणाशिवाय गेला त्याने तू आपले नुकसान करून घेतले असे समज. ज्या गोष्टीत रामाचे अधिष्ठान नाही अशा गोष्टी करणे म्हणजे व्यर्थ शीणणे असे समजून या जगात तू अत्यंत सावधपणे वावर.

विवेचन : श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. एक क्षणही आपण श्रीरामाच्या स्मरणाशिवाय घालवावा असे त्यांना वाटत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील हेच आपल्याला सांगतात. आपण जर स्वतःला साधक मानत असू आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय एक क्षणही व्यर्थ घालवू नये. असा वाया घालवलेला वेळ म्हणजे साधकाने आपले स्वतःचेच करून घेतलेले नुकसान.

आपल्याला दृश्य गोष्टी जास्त आकर्षित करतात. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची ओढ आपल्याला वाटत नाही. त्यासाठीच संतांनी आपल्याला सगुण भक्ती करायला सांगितले आहे. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणि चित्तात त्याचेच ध्यान अशी साधकाची अवस्था असावी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अशी संत परमेश्वराला प्रार्थना करतात यासाठीच.

विज्ञानाच्या प्रगतीने आणि भौतिक समृद्धीने माणसाला ज्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातच माणूस सुख मानतो. त्या प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय समजतो आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्या परमेश्वराला आपण विसरतो. भगवंताशिवाय आपल्या हिताचे कोणी नाही आणि उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही हे साधकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये कोणते तरी ध्येय असते हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला त्या ध्येयाचा विसर पडून चालत नाही म्हणजेच त्या ध्येयाकडे सतत लक्ष असावे लागते. ते साध्य होण्यासाठी दक्ष असावे लागते. परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे हे विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागते. इतर गोष्टींमध्ये आपला फार वेळ जाणार नाही याबाबत दक्ष असावे लागते. एखाद्याला उत्तम गायक व्हायचे असेल, तर त्याला रोजचा रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गळ्याचे आरोग्य बिघडणार नाही याबाबतीत त्याला दक्ष असावे लागते. थंड, तेलकट पदार्थ खाल्लेले त्याला चालत नाहीत.

त्याप्रमाणेच साधकाने देखील सदैव दक्ष असावे असे समर्थ म्हणतात. सर्वत्र सावधानता बाळगावी असा समर्थांचा आग्रह आहे. मग साधना मार्गावर तर सावधानता अत्यंत आवश्यक आहे. कारण साधकाला आपल्या मोहात पाडून त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी विवेक हवा.

रोज मी भगवंताच्या नामस्मरणासाठी किती वेळ देतो याचा विचार प्रत्येक साधकाने करायला हवा. आजकाल सगळ्या गोष्टी आपण अतिशय घाईने उरकतो. भगवंताची पूजा, नामस्मरण यासारख्या गोष्टी रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात. ज्या गोष्टी मनापासून किंवा समर्पण भावनेने केल्या जात नाहीत, त्या गोष्टी उपचार ठरतात. इतरही अनेक गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवत असतो. परंतु समर्थ म्हणतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय वेळ घालवणे म्हणजे आपली हानी आपण करून घेणे. तो केवळ ‘ सीण आहे ‘ म्हणूनच आपण आपला एक क्षणही परमेश्वराच्या स्मरणाशिवाय जाणार नाही याबाबत दक्ष असले पाहिजे.

स्वसंवाद (नवीन)

१) मी स्वतःला साधक मानतो का?

२) माझी पूजा, नामस्मरण या गोष्टी मनापासून होतात की केवळ रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात ?

३) ध्येयापासून विचलित करणाऱ्या कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत असे मला वाटते ? त्याबाबत मी खरोखर दक्ष आहे का ?

– क्रमशः श्लोक ४५ आणि ४६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares