मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

डोक्यावर पदर,मोठं रुपयाएव्हढ कुंकू, झळझळीत दागिने असं एकूण ‘आमदार सौभाग्यवती’छाप व्यक्तिमत्व.ओळखपरेड पुढे चालुच होती.सरांचं अख्खं कुटुंब शाळेशी अगदीं एकरूप झालेलं.शाळा ही मुख्याध्यापकांच्या आयुष्यात कशी मुरवता येते याचे धडे सरांच्या बोलण्यातून मला मिळत होते खरे, पण मी तर पुरस्काराच्या ‘प्रयत्ना’साठी आले होते.मी घाईघाईने म्हणाले, “मला ती कागदपत्रं दाखवताय ना सर?”

“हो. या. हिथच आहेत कपाटं. तीन आहेत बघा.” गोदरेजच्या तीन कपाटांकडे बोट दाखवत सर म्हणाले.

“बापरे! इतकी कागदपत्रं?” मी आश्चर्यचकित.

“तर हो. हे जिल्हा, हे राज्य नि तिसरं राष्ट्रीय साठी. आता ते सुद्धा भरेल” सरांनी जिल्हा पुरस्काराचं लाल कपाट उघडलं. “हा मँडम, घ्या फायली बाहेर.”

“बापरे! इतक्या जाडजूड फायली?” मी त्या काढताना थक्क झाले म्हणजे थकले. “अहो, त्यात घटनांचे पुरावे आहेत. म्हणजे पंधरा नंबरची माहिती, त्याचा फोटो पंधरा नंबरला. पुरावा पायजेल की. फायली नीट लावलेल्या होत्या. त्यावर विषयांची नांव होती. एकूण  सोळा विषय होते.”

“सर, तुमच्या कार्याचा अफाट सागर पुढे पसरलेला, माझ्या कार्याचा झरा सुद्धा नाही. कशाला मी नसती आशा धरू! हे चाळायला सुद्धा आठ दिवस लागतील. मी फक्त खात्यांची नांव लिहून घेऊ शकेन.”

“काय असतं कार्याचा पसारा आपणच वाढवायचा. कार्य मूठभर, पसारा हातभर. एखादी फाईल उघडून बघा. एव्हढ्या आलायसा, तर चिकाटी पायजे.”

मी काव्यलेखनाची फाईल उघडली. अल्बम मध्ये साताठ लग्नांचे फोटो होते. सर कोटबिट घालून हसऱ्या चेहऱ्याने वधुवरांना आशिर्वाद देत होते.

“सर, ही लग्न शाळेतल्या अनाथ मुलींची वगैरे —”

“त्या नंबरची  फाईल बघा.”

मी पाहिलं तर तिथे काव्याक्षतांची छापील प्रत डेकोरेशन करून लावलेली.

कवी–शी.आर. ढेकळे. पुढे लांबलचक अनाकलनीय पदवी.”मंगलाष्टकं लिहितो.

गावात कुणाचं लग्नं ठरलं की नावांच्या याद्या घेऊन माणसं येतात. मग चालीवरच मंगलाष्टकं रचतो. काव्य तेच, नांवं बदलायची. सरस्वती प्रसन्न आहे. लग्न अटेंड करायचं मग फोटो नि काव्य. फायली तुडुंब भरतात. प्रयत्नांती परमेश्वर.”

मी पुढची पानं पलटत गेले. आसपासच्या नेतेमंडळींचे वाढदिवस, ‘जीवेत् शरदाः शतम्’ नि खाली त्यांच्या अफाट कार्याबद्दलची, शुभेच्छांची शब्दाला शब्द जोडून केलेली काव्य. कवी–शी.आर्. ढेकळे सर. त्या नंबर च्या अल्बममध्ये त्या I नेत्याबरोबरचा सरांचा नतमस्तक फोटो. एकूण सरांच्या काव्यलेखनाचा पसारा माझ्या लक्षात  आला.

मग पुढची ‘देशसेवा’ ही फाईल उघडली. त्यात ध्वजारोहण, एन.सी.सी. कँप्स. मुलांना समुहगीतांच्या स्पर्धाना पाठविण्याचे फोटो, त्याच्या बातम्या, आणि अनेक देशभक्तीपर सुभाषितं— ‘जिंकू किंवा मरू’, ‘सदैव सैनिका, ‘यशवंत व्हा, खचू नका, मुलं सैनिकांच्या वेशात, त्यांच्या बरोबर सर, भिंतीवर मोठा भारताचा नकाशा —- फोटो आणि बातमी. “ही सगळी आमच्या ड्राईंग टीचरची किमया बरका.” असं म्हणत सरानी आणखी एक फाईल उचलली. ती व्रुक्षारोपणाची होती. तो सोहळा आल्या आल्या पाहिलाच होता. शाळेसमोर बरीच झाडं,  त्यांचा वरचा संभार सरांच्या बंगल्यासमोर आलेला. मुलांची समाजसेवा, शिपायांची पगारी सेवा, शाळेचं कचरा खत, मुलांचं डबे धुतलेलं पाणी त्यामुळे झाडं भराला आली होती. तिथे गीतेतला संदेश मराठीत लिहिलेला मुलांसाठी. “कर्म करीत रहा, फळांची आशा धरू नका” ही फाईल हिरव्यागार चित्रानी सजवलेली .

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

“रिटायरमेंट तीन वर्षांवर आली. ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते’ अशी पदवी घेऊनच निव्रुत्त व्हायचं बघा. त्याचंबी लई फायदे असतात बरका. चाललीय खटपट.”

“खटपट?म्हणजे?”

“घ्या. तुम्हाला ठाऊक नाही?”

“म्हणजे  अर्ज करायचा, कागदपत्र सादर करायची हे माहितीय की.”

“तुम्ही नाही केला प्रयत्न?”

“नाही हो. हेडसरांची शिफारस लागते ना. ते देतील अशी खात्री नव्हती. कुठे नाकदुऱ्या काढायच्या! कधी वळलेच नाही तिकडे. विचारच नाही केला.”

“बाई, पुरस्कार मिळवायचा म्हणजे आधी सगळ्यांशी गोड रहावं लागतय्. पण आता जाऊदे मागचं. आता तर तुम्हीच हेड. कुणाची ‘ब्र’काढायची हिंमत न्हाई. मात्र तुम्हाला  संस्थेच्या सेक्रेटरींची नाही तर अध्यक्षांची शिफारस लागणार.”

“बापरे! म्हणजे आणखी अवघड.”

“तुमचा सही, शिक्का बगितला की लगेच सह्या ठोकतात. शिफारस क्लार्ककडून लिहून घ्या. त्यांना पाठ असते. आता सहा म्हयन्यांत ग्रँट सुटेल. चेक घेऊनच सेक्रेटरींकडे जावा. मग आनंदात गप सह्या ठोकत्यात.”

“कागदपत्रं म्हणजे आपण शाळेसाठी, मुलांसाठी काय काय केलं कोणते उपक्रम राबवले वगैरे ना?” मी विचारलं. मला तेव्हढच माहिती ना!

“ते मात्र इतकं सोपं न्हाई बरका मँडम. इतक्या थोड्या वेळात ते कसं सांगणार?

तुम्ही असं करताय का? आमच्या घरीच या एकदा. माझी कागदं तुम्हाला समक्षच दाखवतो. तुम्ही पहिल्याने जिल्हा पुरस्कारासाठी प्रयत्न करा. मग एकेक पायरी चढायची. रिटायर्ड व्हायला सहा सात वर्ष आहेत ना? तेव्हढ्यात सगळं उरकावंप लागेल. आत्ता पासून कामाला लागा.”

ढेकळे सर निरागसपणे म्हणाले. तेच मला गमतीशीर वाटत होत. पुरस्कारासाठी आपण प्रयत्न केले हे निःसंकोचपणे सांगत होते. उगीच आपलं मला माहीतच नव्हतं असा मानभावीपणा नव्हता.

आणि खोटं कशाला बोलू, माझ्याही मनात पुरस्कार चकचकायला लागला होता. अरे, आजपर्यंतच्या नोकरीत मी मुलांसाठी काय काय केलं होतं. रिझल्ट साठी कष्ट घेतले, गरीब, कच्च्या, अपंग मुलांसाठी झटले, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलांचे कार्यक्रम केले, बालसाहित्य लिहिलं, नाटकं बसवली, त्यातून शाळेसाठी निधी जमवला, एव्हढं काम केल्यावर कमीतकमी जिल्हा पुरस्कार मिळायला हरकत नव्हती ना? आता मुख्याध्यापक म्हणून आणखी काम, मग राज्यपुरस्कार. निव्रुत्तीपर्यंत एव्हढे सोपान चढता येतील. शिक्षकांच्या जीवनात पुरस्कार म्हणजे मानाचं पान. हवेत तरंगल्यासारखं झालं. ढेकळे सरांकडे जाऊन कागदपत्र बघण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. एक दिवस निवांतपणे गेलेच त्यांच्या घरी.

“या, या,”म्हणून सर्वांनी माझं स्वागत केलं. एक शहरातल्या बाई आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येतात ह्याचं सरांना अप्रूप वाटत होतं. ‘पुरस्कारासाठी प्रयत्न’ यातला विनोद, खोच, खंत  असं त्यांच्या निष्पाप स्वार्थी मनाला काही वाटत नव्हतं.

शाळेच्या डोक्यावरच त्यांचा बंगला म्हणजे बंगल्याच्या तळघरातच शाळा. गेल्यावर बाल्कनी कम् शाळेचं ऑफीस. सर म्हणाले, “हे माझे सासरे कम् संस्थेचे अध्यक्ष आणि ह्या संस्थेच्या कार्यवाह कम् माझ्या सुविद्य पत्नी.”

क्रमशः ……

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हुशारी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ हुशारी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा:   विषयाचे बंधन / वयाची अट नाही.

—-ही ठळक जाहिरात वाचली आणि मन एकदम शाळेत पोहोचलं. निबंधाचा  प्रश्न मराठीच्या पेपरात हमखास पहिला असायचा, आणि हमखासच तो शेवटी लिहिण्यासाठी ठेवला जायचा.   फार कष्ट घ्यावे लागायचे ना त्यासाठी  आणि तो पूर्ण होणारच  नाही,  या बेतानेच वेळ साधण्याची हुशारी केव्हाच जमलेली होती. कारण मजकूर सुचायचाच नाही.  मग लो. टिळकांवरचा निबंध, “त्यांचा मृत्यू १९२० साली झाला” या वाक्याने सुरु व्हायचा  कारण त्यांच्याबद्दल वाचलेलं ते  शेवटचं वाक्य असायचं.  अर्थात ‘निबंध पूर्ण का झाला नाही’ या  प्रश्नाला, ‘बाकीचे सगळे प्रश्न अगदी  व्यवस्थित लिहीत बसलो,  म्हणून पुरेसा वेळ उरला नाही’  हे उत्तर देतांना  हुशारी पुन्हा उफाळून आल्याचा आनंद व्हायचा.

“युरेका”…. स्पर्धेसाठी विषय सापडला … “हुशारीचे नाना प्रकार”. लगेच दीडशे रुपये भरून नाव नोंदवलही.

दहा दिवसांची मुदत होती.  पण पूर्वानुभवावरून शहाणं होत, लगेच लिहायला बसले.. {हेही  हुशारीचे लक्षण}.  सवयीने हातात मोबाईल होताच.  लगेच गुगलकाकांना पाचारण केलं,  कारण सगळी भिस्त त्यांच्यावरच तर होती.  टाईप केलं–“हुशारीचे प्रकार”–पण १०-१५ वेळा पापणी लवली तरी स्क्रीन कोराच. -मग “प्रकार हुशारीचे”, “हुशारीचे विविध प्रकार”, “वेगवेगळ्या प्रकारची हुशारी” — असं  काय काय टाईप केलं,  तरी तेच.  इतकं गुगलून बघताबघता  उत्साहही कमी होतोय अशी शंका वाटायला लागली.  पण प्रश्न दीडशे रुपयांचा होता हो. —

“गुगलून बघण्यात”?– अरेच्चा– हा शब्द गुगलकाकांचा नक्कीच नाही.  असे आगळे-वेगळे वाक्प्रचार रूढ करणं ही तर जन्मजात भाषाप्रभूंच्या हुशारीची कमाल —

“पुन्हा  हुशारी”? —  अचानक माझ्या अंगभूत {?} हुशारीला कोंब फुटायला लागले की काय … मी एकदम सरसावले —-“हुशारीचे नाना प्रकार” ——–

‘अभ्यासातली हुशारी ‘  हा जगन्मान्य पहिला प्रकार.   ज्ञानाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असावाच लागतो, असे मुळीच नाही. पण याबद्दल इथे न लिहिणेच उत्तम.  हुशारीचा याहून सरस प्रकार म्हणजे,  खूप मन लावून अभ्यास करत असल्याचा  बनाव  रचण्यातली हुशारी—म्हणजे रात्री जागणे— {थर्मासात भरून ठेवलेला चहा संपेपर्यंत,  किंवा बाकी सगळे गाढ झोपल्याची खात्री पटेपर्यंत-}—तरीही पहाटे लवकर उठून, कौतुक करून घेणे इ.इ.  यात “ मन नक्की कुठे लागलं होतं” हा प्रश्न निरागस पालकांना  पडतच नाही.  अपेक्षित मार्क मिळाले नाहीत, की “ सर  कशी पार्शालिटी करतात ”  हे पटवून देण्याची हुशारीही असतेच…पण हा वापरून गुळगुळीत  झालेला प्रकार.

याहून परिणामकारक प्रकार,  दुसऱ्यांच्या वस्तूंवर डल्ला मारतांना वापरण्याचा  —- भुरटी चोरी, पाकीटमारी, किंवा  थेट दरोडा–. या कानाचे त्या कानाला कळू न देता चोरी  करायला  शिकवणारी हुशारी– डोळे मिटून दूध पिणारी— पण हा प्रकार फशी पाडणारा.

भीक मागायला  हुशारी कशाला ?  असा समज तर साफ चुकीचा आहे.  स्वतःला लुळापांगळा  दाखवायचं, की आंधळा, हे ठरवणं अक्कल हुशारीचं काम.  सोंग बेमालूम जमावं लागतं.  हिंदी चित्रपटात याची बरीच प्रॅक्टिकल्स शिकवतात..

एक प्रकार, दुसऱ्याबद्दलच्या ऐकीव बातम्या तिसऱ्याला सांगतांना लागणाऱ्या हुशारीचा–  त्रयस्थ वृत्तीने,  केवळ दुसऱ्याच्या काळजीपोटी बोलत असल्याचे बेमालूम नाटक साधण्यासाठी   हुशारी तर लागतेच.  चहाड्या,  काड्या,  कागाळ्या,  यासाठी हा प्रकार उपयोगी.. याचा उपप्रकार म्हणजे,  स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतांनाची हुशारी  पण हाही तोंडघाशी पाडणाराच  प्रकार.

तुलनेने सोपी हुशारी लागते –उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी– यात स्वतःला फरक पडतच नाही— “ जनहो, खादी वापरा “  —  सामाजिक पातळीवर वापरण्यासाठी उत्तम प्रकार –.. . याहून धूर्त हुशारी लागते ती  दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतांना- असो.  याच   पातळीवरून  “ चोर तो चोर, वर शिरजोर “ असे वागतांनाही हुशारी लागते ? बहुतेक नाहीच. पण काहींना मात्र तसे ठामपणे वाटते.

हुशारीचे मॉडर्न प्रकारही खूप आहेत सांगण्यासारखे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

बाप रे;  हुशारीचे किती प्रकार सांगितले ना मी —— गुगलकाकांच्या  ज्ञानात भर घालू का?–  नकोच.– जगभरातून माहिती गोळा करून,  ती आपल्याच नावावर खपवण्याची  हुशारी,  हेच तर त्यांचं भांडवल आहे  आणि  त्यांना न कळवण्यातच माझं शहाणपण——

-बघा-असं होतं —  “ज्ञानयुक्त शहाणपणमिश्रित हुशारी” हा विशेष प्रकार सांगायचाच राहिला.  मला तो माहितीये.  पण हा प्रकार  सर्रासपणे वापरतांना  दिसत नाही ना कुणी, म्हणून नजरेआड झाला इतकंच ——

आज इतकंच —थांबायचं कुठे हे कळणं, हा तर फार महत्वाचा प्रकार … ते कळायलाही हुशारी हवीच की….

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – परदुःख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – परदुःख ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“एका विवाहित महिलेची,आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या….. नवऱ्याचे दुसऱ्या कोणा बाईशी अनैतिक संबंध हे या आत्महत्येचे कारण असल्याचे समजते “…….. सकाळी सकाळी वर्तमानपत्रात ही बातमी वाचल्यावाचल्या आभाची बडबड सुरु झाली……..

“वेडी होती ही बाई….. एक नंबरची मूर्ख होती…… जरासाही विचार केला नसावा तिने. एवढा एकच मार्ग उरला होता का तिच्याकडे…. सोडून द्यायचं होतं तिने असल्या नवऱ्याला. किंवा मग मुलांना घेऊन निघून जायचं कुठेतरी… नोकरी करायची…… सन्मानाने रहायचं….. मुलांना सांभाळायचं. एका दोषी माणसाला असा स्वतः मरुन शह दिला, आणि एक आई असूनही, स्वतःच्या मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या शक्यता तिने स्वतःच्या हाताने संपवून टाकल्या….. त्यांचं भविष्यच हिरावून घेतलं……..”

…….. “ तू तरी करू शकली होतीस का असं काही”?…….जेव्हा तुझा पंचेचाळीस वर्षांचा नवरा, त्याच्या ऑफिसमधल्या चोवीस वर्षांच्या दामिनीच्या प्रेमात पार गुरफटला होता तेव्हा ?’…..’येता जाता तुला ‘ म्हातारी – शिळी होत चालली आहेस तू’ असं म्हणत तो तुझा अपमान करत होता तेव्हा?’……’ती दामिनी नावाची आग स्वतःच्या आयुष्याला लागू नये म्हणून तू विझवू शकली होतीस का त्या आगीला?’…..’ तू तर शिकली – सवरलेली होतीस, सक्षम होतीस ना? मग तू का नाही केलास कुठे नोकरी करण्याचा विचार?’……’त्यावेळी हाआत्मसन्मानाचा धडा तुझ्या आयुष्याच्या अभ्यासक्रमासाठी का नाही निवडलास तू ?’ “…………

……. आभाच्या अंतर्मनात दुसऱ्याच क्षणी असे कितीतरी प्रश्न उभे ठाकले, आणि त्यांनी चारही बाजूंनी तिला जणू घेरून टाकलं …….  आणि  एखाद्याला उपदेश करणं अगदी सोप्पं असतं, पण दुसऱ्याचं दुःख मनापासून समजून घेणं फार फार अवघड असतं, हे आता तिला कळलं होतं…..आणि मनापासून पटलंही होतं.. ….

मूळ हिंदी कथा : डॉ. लता  अग्रवाल

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ आनंद ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये

सौ. राही पंढरीनाथ लिमये

 

 ☆ जीवन रंग ☆ आनंद ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆ 

कालच नाम्याने गणवेश स्वच्छ धुऊन ठेवला होता. चड्डी ला ठिगळं होती पण आज ती त्याला टोचत नव्हती. आज तो आणि त्याची आई आनंदात होते. त्याच्या चेह-यावर बाबा विषयी अभिमान आणि माया ओसंडून वहात होती.

आई सारखे डोळे पुसत होती. आज त्याला बाबा देशासाठी शहीद झाला म्हणजे किती मोठा आहे हे कळलं होतं. देशासाठी त्याने मोठं काम केलं होतं. आज शाळेत झेंडा वंदना ला कोणत्या नेत्याला बोलावलं नव्हतं तर त्याच्या आई ला बोलावलं होतं. आई ठेवणीतली साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन तयार झाली. नाम्याने बाबा चा फोटो छातीशी घट्ट पकडला.

दोघं ही आनंदाने मान ताठ करून शाळेकडे निघाले.

© सौ. राही पंढरीनाथ लिमये

मो  नं 9860499623

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-5 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-5 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

आज मी परत घरी एकटी पडले  डोळ्यासमोरुन सुखी, समाधानी, आनंदी प्रतिक्षा हलत नव्हती. त्यामुळे हा एकटेपणा आज तरी मला त्रासदायक वाटत नव्हता.

आता मी नोकरी सोडली होती. गाण्याचा क्लास जाॅईण्ट केला होता. न चुकता जवळच्याच अनाथाश्रमांत एका दिवसा आड जात होते. त्या मुलांना शिकवत होते. त्यांच्या गोकुळात माझे मन रमत होते.ती मुलं पण माझ्या वाटेकडे डोळे लावून बसायची.

मधे मधे प्रतिक्षा नितीन येऊन भेटायचे. कधी मी त्याच्याकडे जायचे. मी, प्रतिक्षा, नितीन त्याचे पप्पा चौघेजण नाटक, सिनेमा, कधी छोटीशी पिकनिकला जात होतो. मस्त मजेत दिवस चालले होते. आणि एक दिवस माझ्याकडे रात्री ही जोडीअचानक आली. इकडच्यातिकडच्या  गप्पा झाल्या. त्यांना  माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला काहीतरी सांगायचे होतं. पण ते सांगायला कचरत होते. शेवटी मीच म्हटलं “जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा माझी ऐकायची तयारी आहे”

प्रतिक्षा चाचरत सांगू लागली म्हणाली,”आई, नितीनला परदेशी जाण्याची संधी आली आहे. माझ्या कंपनीची पण तिकडे शाखा आहे. तू आणि नितीनचे पप्पां इकडे एकटे रहाणार म्हणून ती संधी स्विकारायची कि नाही अशा द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत. आई तू फार सोसलं ग. मला एकटीनेच वाढवलसं. आपलं सोन्यासारखं आयुष्य आमच्यासाठी घालवलसं. दोन्ही आजी आजोबांची दुखणी, खुपणी म्हातारपण म्हातारपणाची त्यांची चिडचिड, हे मुकाट्याने सहन केलंस. आता मला म्हणजे नितीनला, म्हणजे मलाआणि नितीनला”

“अग बोल ना प्रतिक्षा काय ते एकदाच सांगून टाक”

“म्हणजे तू आणि नितीनच्या पपानी लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? एक तर तुमचे विचार जुळतात.ते पण एकटे रहाणार आणि इकडे तू पण. आम्ही usला  तिकडे  गेल्यावर आम्हाला तुमची काळजी पण नाही.”

“नाही प्रतिक्षा तुम्ही तिकडे बिनधास्त जा. मी इकडे माझी काळजी व्यवस्थित घेईनच पण नितीनच्या पपांची पण घेईन. तुम्ही आमच्या दोघांची थोडी सुद्धा  चिंता करु नका.निश्चिंत मनाने जा. पण आता ह्या वयांत मला हे स्विकारण्यास सांगू नका. जे मी ऐन तारूण्यात सुध्दा स्वीकारले नाही.”

रात्रभर विचार केला. सकाळी लगेचच मी माझ्या जवळपास राहणारी माझी एक जिवलग मैत्रिण विनीता सध्या सुनेच्या जाचाला कंटाळून वृध्दाश्रमात जायचा विचार करत होती. तिला माझ्याकडे कायम रहायला येण्याबद्दल विचारले. ती एका पायावर तयार झाली.नितीनच्या पप्पांना पण एखाद्या मित्राला घरी रहायला बोलावण्यासंबंधी सांगितले. ते म्हणाले, “मित्र कशाला ? भाऊच माझा येईल की. भावजय हल्लीच वारली आहे. आणि पुतणी सासरी. आम्ही दोघं भाऊ मजेत राहू. खरं म्हणजे तोच मला पुण्याला बोलावत होता. पण नितीनला सोडून जायला मन तयार होत नव्हते. आता त्यालाच इकडे बोलावतो.

मग मी कामाला एक जोडपं शोधलं. ती बाई माझ्या घरी स्वयंपाक करेल. आणि नितीनच्या पपाना आणि काकांना डबा पोचवेल. दोन्ही घरचे घरकाम पण करेल. आणि तिचा नवरा दोन्ही घरची बाहेरची कामें, बाजारहाट आणि इतर सटरफटर  कामे करतील. दोघंही आमच्याच घरी रहातील. कारण माझं घर तसं भरपूर मोठं होतं. एक गच्ची होती.  त्याला जोडून एक खोली पण होती. तिकडे ती दोघं आरामात राहू शकत होती. मी माझा प्लॅन  प्रतिक्षा, नितीन आणि पप्पांनी सांगितला. माझ्या ह्या प्लॅनवर तिघेही  खुष.. त्याना पण ते पटलं. वेळा काळाला आपण आहोतच.  एकमेकांना.

नितीन आंणि प्रतिक्षा बिनधास्त  usला गेले. आता मला अजिबात एकटं वाटत नाही. माझी मैत्रीण सुनिता 24 तास बरोबर असते. मग काय मनसोक्त भटकणं खाणंपिणं. आम्ही अनाथाश्रमांत जातो. त्या मुलांना शिकवतो. गाणी गोष्टी सांगून त्याचं मनोरंजन करतो. नितीनच्या पप्पांना कधी बोलावतो. कधी आम्ही तिकडे जातो. कधी वॄध्दाश्रमांत जातो. आमच्यापेक्षा वृध्द आहेत त्यांची जमेल ती सेवा करतो. त्यांना पुस्तके वाचून दाखवतो. मनोरंजन करतो. आता मी अजिबात एकटी,एकुलती एक नाही.

माझा परिवाराचा परीघ खूप रुंदावला आहे. गोकुळाची कक्षा वाढली आहे. एकुलतं एकपण त्या गोकुळात कधीच विसरुन गेले.

! समाप्त !

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

प्रतिक्षा हळूहळू मोठी होत होती. तिच्या बाळलीला बघत आम्ही दिवस काढत होतो.रक्षाबंधन आलं भाऊबीज आली की माझ्या एकट्या पडणा-या  प्रतिक्षाला बघून मला आमचं दोघांचं गोव्याच्या ट्रीप मधले गोकुळं बनवण्याचे स्वप्न,ह्यांनी आईला ‘पुढच्या वर्षी बहिणीला रक्षाबंधनाला भाऊ येईलच ‘असं मस्करीत दिलेलं आश्वासन सगळं सगळं आठवयाचं.शेवटी माझ्या प्रतिक्षाला पण नियतीने अशा रितीने माझ्याच सारखं  एकटं पाडलं.सासू सासरे,आई बाबा कधी उघडपणे,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दुस-या विवाहाचे सुचवू लागले.सासूबाई तर चक्क मला सांगू लागल्या,”बघ पोरी,आम्ही पिकली पानं कधी गळून पडू सांगता येत नाही.प्रतिक्षा एक दिवस लग्न करुन भुर्र्कन उडून जाईल.मग तू एकटी कशी रहाशील ” प्रतिक्षा सांगायची,” मी मुळी लग्न करणारच नाही.आईला सोडून कुठे जाणारच नाही”.मी पण तो विषय काहीतरी बोलून वेळ मारुन नेत असे.

प्रतिक्षा आता शाळा संपवून काॅलेजात जाऊ लागली.तशी तिला वयाच्या मानानं खूपच समज होती.मला जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी साथ देऊ लागली.आम्ही एकमेकांकडे विचार शेअर करु लागलो.

काॅलेजमध्ये लहानसहान सगळ्या गोष्टी पण मला सांगू लागली.

काॅलेजात बारावीत  तिला नितीन भेटला.दोघांची चांगली गट्टी जमली. आमच्याकडे त्याचं जाणंयेणं वाढलं.

आईवेगळा पोर होता.वडील बिझनेसमध्ये व्यस्त म्हणून कि काय आईच्या प्रेमाला पारखा झालेला माझ्याकडे जास्त ओढला गेला.जवळपासच राहणारा होता. काॅलेजमध्ये  येता जाता प्रतिक्षाला पण सोबत असायची.

दरम्यान एकेक करुन चारही पिकली पानं गळून गेली.आता प्रतिक्षा मला आणि मी प्रतिक्षाला. आता मी तशी मनाने खंबीर झाले होते.ज्या मुलीवर तेव्हा ऐन तारूण्यात वैधव्याचा पहाड कोसळला. आता तर काय भरपूर पावसाळे, वादळ वारे अंगावर घेऊन तन,मन ठणठणीत झालं होतं.

हळूहळू लक्षात येऊ लागलं.प्रतिक्षा नितीनची मैत्री आता वाढली होती.तिचं प्रेमात रुपांतर झालं.दोघांची शिक्षणं पण पूर्ण झाली.आपापली क्षेत्र दोघांनी निवडली होती.त्यात प्रगती करुन दोघंही स्थिर झाली होती.एक दिवस मी प्रतिक्षाचा मूड बघून लग्नाचा विषय काढला.”बघ प्रतिक्षा आता तुम्ही दोघंही सेट्ल झालात आता पुढे विचार काय आहे?”

तर म्हणते कशी,”” कशाबद्दल ”

“अग तुझ्या आणि नितीनच्या लग्नाबद्दल”

“आई मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही.आमची मैत्री आहे ती तशीच कायम राहील”

“ते काहीही चालणार नाही मी आजच नितीनच्या वडिलांशी  बोलून घेते.आणि नक्की करून टाकते.आणि कुठे लांब का जाणार आहेस?हांकेच्या अंतरावर तर आहे नितीनचे घर.”

ठरल्याप्रमाणे नितीनच्या वडिलांशी बोलून सगळं नक्की केले.आणि प्रतिक्षा आणि नितीनचा विवाह सुमुहुर्तावर दणक्यात पार पडला.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

दोन्ही आजी आजोबांनी नातीचं बारसे दणक्यात केलं. ‘प्रतिक्षा’ नाव ठेवलं. आणि नातवाची प्रतिक्षा करत प्रतिक्षाचे लाड करत होते. तिचे दर महिन्याच्या महिन्याला वाढदिवस काय? प्रत्येक वाढदिवसाला नवनवीन केकचे प्रकार काय? नुसती चढाओढच. फ्राॅक काय, परकर पोलका काय? आपली हौस पुरवू लागल्या. तिचे बोरन्हाण, उष्टावन सगळंच थाटात. आता प्रतिक्षा वर्षाची झाली. तिचा वाढदिवस. हॉल बुक केला. केकची, वाडीची ऑर्डर दिली. आमंत्रण केली. आणिअचानक माझ्या पतीदेवांना दोन दिवसासाठी दिल्लीला अर्जंट कामासाठी जायचं म्हणून कंपनीने सांगितले. पुढे वाढदिवस करुन मग गेलं तर चालणार नाही का? म्हणून विचाराल  तर तो म्हणतो कसा, “सगळी तयारी तर झाली आहे. हॉल, केक, तिचा ड्रेस, वाडीची ऑर्डर, कॅटरिंग, फोटोग्राफर, आमंत्रण सगळे सगळे रेडी आहे. दोन दिवसाचा तर प्रश्न आहे. असा गेलो आणि असा आलो. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी हजर.”

हजर राहीन असं म्हणाला खरं पण त्याच्या ऐवजी त्याच्याबद्दलची बातमीच सकाळी घरी हजर झाली. त्याच्या गाडीला  दिल्ली मध्ये  अपघात झाला. ‘And he is no more’ असं कानावर शब्द आदळले. पायाखालची जमीनच सरकली. माझ्यावर  दुःखाचा पहाड कोसळला. सगळे नातेवाईक आले. भेटले गेले. ज्याला त्याला आपापले व्यवहार कामधंदा होताच की त्याना पण. शेवटी मलाच ताठ उभं रहावं लागलं. पदरी एक वर्षाची प्रतिक्षा, वयस्कर सासू सासरे  त्यांचा एकुलता एक जिवापलिकडे जपलेला मुलगा दोन दिवसात येतो म्हणून सांगून गेला तो कायमचाच. त्यांना सांभाळू की आपल्या एकुलत्या एका मुलीवर इतक्या लहान वयांत वैधव्य ओढवले म्हणून दुःख करणा-या माझ्या वयस्कर आईबापाची समजूत काढू. प्रतिक्षाचे भवितव्य आठवून तर डोके फुटायची वेळ आली. दुःख गोंजारणं तर सोडा पण विचार करून मन मोकळे करायला पण भक्कम आधारच नव्हता. जो एक होता तोच नेमका पूर्ण कळायच्याओळखायच्या आतच देवाने हिसकावून घेतला. परत  मी एकटी पडली. एकदम एकटी.

पण काळ आणि परिस्थिती हेच औषध असतं. सगळं दुःख बाजूला सारुन एका अर्भकाचा आणि चार वयस्करांचा विचार करुन उभी राहिले. नोकरीची गरज नव्हती म्हणून प्रतिक्षा झाल्यावर नोकरी सोडली होती. पण मन कशांत तरी  गुंतवायचे म्हणून घराजवळ एका कंपनीत अकाउंटस क्लार्कची पार्टटाईम नोकरी मिळाली. घर सांभाळून मी नोकरी करु शकत होते. प्रतिक्षाला बघायला दोन आज्या, दोन आजोबा होतेच. कारण माझे आईबाबा पण आता आमची बिल्डींग नंतर दोन बिल्डींग सोडून तिकडेच सहा महिन्यापूर्वी रहायला आले होते.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

लग्न झालं, पुजा झाली. आधी देवाच्या पाया पडायला गोव्याला, मग केरळ सारख्या  मस्त हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी फिरुन आलो. पण तिकडेच मी त्याच्याकडे कबूल करुन घेतले.”तू एकटा मी पण आईबाबांची एकटी मुलगी पण आपल्याला मात्र दोन किंवा तीन तरी बछडी पाहिजेत हा”तर साहेब म्हणतात, “हे इकडे सांगण्यापेक्षा गोव्याला सांगितले असतेस तर बरं झालं असतं मी देवाकडे तरी जुळं तीळं मागून घेतलं असतं. हाहाहा ” नेहमीच्या स्टाईलमध्ये हसून विषय संपवला.

आम्ही मुंबईला आलो. नेहमीचे रूटीन चालू झालं. नव्या नव्यानवलाईचे दिवस. ‘अहो ‘आईंना मला कुठे ठेवू  आणि कुठे नको असे झाले होते. माझ्यासाठी कपडा, साडी, दागिना, पर्स,  काय काय घेऊन येऊ लागल्या. त्यांचा चॉईस पण छान होता. आम्हाला रविवारी ह्या आत्याकडे पुढच्या रविवारी त्या काकांकडे असे कौतुकानी न्यायच्या. आज हा सण, उद्या दुसरा. नंतर श्रावण आला. मंगळागौर. आमच्याकडे सगळे जमले. रात्रभर जागवली मज्जाच मज्जा. दुस-या दिवशी रक्षाबंधन.ह्याला  सख्खी बहीण नसल्यामुळे मानलेल्या. बहिणी राखी बांधायच्या त्या आल्या. ह्यांच्या चुलत, मामे, मावस बहिणी पण मंगळागौरीला आलेल्या सगळ्या राहिल्या.आमच्याकडे मज्जाच मज्जा. आता त्यांच्या लाडक्या भावाची एकुलती एक लाडकी बायको आली होती ना तिच्याशी गप्पा मारायला धमाल करायला. आज मला कळलं ह्याला सख्खी बहीण नसली तरी अशा  त्याच्यावर प्रेम, माया करणाऱ्या खूप बहिणी आहेत.

मग श्रीकृष्ण जन्म, गणपती उत्सव सगळे आमच्याकडेच. त्यामुळे घर सतत भरलेले गोकुळ मला हवे असलेले.  एकदा ते सणवार झाले कि सगळे आपापल्या घरी गेले कि परत आम्ही एकटेच.

वर्षभराचे सगळे सणवार आईने आणि  ‘अहो ‘ आईने अगदी थाटामाटात केले. दोघीने आपापली हौस पुरवून घेतली. म्हणेपर्यंत चिमुकल्या पाहूण्याची चाहूल  लागली. दोन्ही घरात माझे नको इतके लाड करण्याची परत चढाओढ सुरु झाली. मनांत विचार आला हे पण अजीर्ण होतंय. किमान आणखी एकेक अपत्य दोन्ही घरांत असते तर माझी लाडाकोडात भागीदारी झाली असती आणि ह्या अजीर्णाचा त्रास कमी झाला असता. चोरओटी झाली, डोहाळे जेवण, झाले. झोपाळ्यावरचे, चांदण्यातले वगैरे वगैरे. आणि एकदाच आमचं पहिलवहिलं कन्यारत्न  जन्माला आलं. आजोबा  एकदम खूष. त्याना मुलगी नव्हती ती मिळाली. पहिली बेटी धनाची पेटी वगैरे म्हणून आनंदी झाले. आजीचं मात्र  तोंड एव्हढंस झाले तिला पहिला नातू हवा होता. हे म्हणतात  कसे त्यांना “आई अग आज नात झाली पुढच्या वर्षी  राखी बांधून घेण्यासाठी येईल कि छोटासा भाऊ. आमच्या हिला नाहीतरी घराचं गोकुळ करायचं आहे. आम्ही दोघेही एकुलते एक ना. ना तिला भाऊ बहीण, ना मला हे तिचं दुःख आहे.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

‘एकुलती एक’  हो खरंच मला ह्या दोन शब्दांचा अगदी वीट आला. लहानपणी कधी कधी आवडायचं कधी कधी राग यायचा.आईस्क्रीम, चाॅकलेटची कधी वाटणी करावी लागायची नाही. अख्खं मलाच मिळायचे.आणि शेजारच्या मंगलला एकच चाॅकलेट चार भावंडांना वाटून एक तुकडा  मिळायचा तेव्हा मला एकुलताएक पणाचा आनंद व्हायचा. पण खेळात भांडण झाल्यावर ती चौघं एकत्र आणि मी एकटी पडायची.तेव्हा मला कोणी भावंडं असतं तर असं वाटून रडू यायचं.अजून पण वाटतं एखादी बहीण हवी होती.वाटणी काय ?माझा हिस्सा पण दिला असता पण मनातल्या गोष्टी, सुखदुःखात सहभागी झाली असती.काका काकीचुलत बहिणी घरी रहायला आल्या की इतका आनंद व्हायचा. आणि जायला निघाल्या की माझी रडारड सुरु.”काकी दोघींपैकी एका मुलीला तरी ठेवा ना.”नाहीतर मीच त्यांच्याकडे जायचे.अर्धअधिक माझ्या बालपणातील सुट्टी त्यांच्याकडेच गेली.

जाऊ दे मी कॉलेज मध्ये जायला लागले मला एकापेक्षा एक, जिवाला जीव देणा-या मैत्रिणी भेटल्या. माझ्याचं बरोबरीची माझी चुलतबहीण  माझ्याचं कॉलेजमध्ये होती. दुधात साखर. माझंही एकुलते एकच दुःख काही प्रमाणात कमी झाले. मजेत दिवस जात होते. पदवीधर झाले. लगेचच  नोकरीं पण चांगली  बँकेत  मिळाली. त्या वेळच्या  रूढी प्रमाणे आई बाबाने वरसंशोधनाला सुरुवात केली. मला विचारण्यात आले, “तू कुठे जमवले आहेस का? तर सांग. नाही तर आम्ही बघतो. तुला नवरा कसा हवा? ते फक्त सांग म्हणजे तसा मुलगा तुझ्यासाठी शोधायला  बरे पडेल”.

मी सांगितलं,” तुम्ही शोधाल तो  चांगलाच शोधाल. फक्त माझी एकच अट आहे. एकुलता एक मुलगा मला नवरा म्हणून अजिबात नको. त्याचं घर माणसांनी भरलेले असू दे. त्याला भाऊ, बहीण पाहिजे”. आत्याबाई तिकडे होत्या त्यांनी कपाळाला हात लावला “अरे अण्णा, आजकाल मुलींना मोठा गोतावळा नको असतो. ‘मी आणि माझा नारा  नको कोणाचा वारा ‘ आणि हिची अट तरी ऐक.”

आई बाबांनी वरसंशोधनाला  सुरुवात केली. जर गोतावळावाला मुलगा मिळाला तर तिकडे पत्रिका जुळत नव्हती. पत्रिका जुळली तर मुलगा परदेशात जाणारा.

मला परदेशात अजिबात जायचं नव्हतं भारत देश, आणि माझ्या आईबाबाना सोडून. कारण मी एकच मुलगी होते ना त्यांची. शेवटी आपण एक ठरवतो पण वरचा दुसरंच. लग्नाच्या गाठी ह्या वरचाच मारतो. तसे म्हणा सगळ्याबद्दलच सगळे तोच ठरवत असतो. आपण मी हे केलं, मी ते केलं म्हणतो. पण प्रत्यक्षात तो वरचाच  प्रत्येकाच्या बाबतीत सगळं ठरवून त्याला पृथ्वीवर पाठवतो.आपण  फक्त  कठपुतळ्या, किंवा बुद्धिबळातली  प्यादी. माझ्याबाबतीत तेच झाले.

मुलगा चांगला उच्चशिक्षित, सुस्थापित, दिसायला चांगला, मुंबईतच राहणारा. नाही म्हणण्यासारखे काहीच नव्हते. पण माझ्या मुख्य अटीत तो बसत नव्हता. कारण तो  एकुलता एक होता. जे मला मुळीच मान्य नव्हतं. पण आईबाबांनी आणि जिने स्थळ आणले होते त्या माझ्या लाडक्या माई मावशीने माझं ब्रेन वॉश करायला सुरवात केली” इतकं चांगलं स्थळ हातचं सोडू नकोस. एकतर तुझी पत्रिका सहजासहजी जमत नाही. ह्या ठिकाणी छानच जमते. गुणमिलन पण होतयं. शिवाय सासू सासरे हौशी. स्वतःच्या मुलीसारखं तुझे कौतुक लाड करतील. तुला काही कमी पडू देणार नाहीत ” . कारण मुलाची आई ती माई मावशीची  जवळची मैत्रीण होती. प्रश्न लाडाकोडाचा नव्हता. ते तर माहेरी भरपूर होत होते. प्रश्न त्याच्या घरांत गोकुळ नव्हते. तोच एकटेपणा, तेच एकुलते एक प्रकरण. जे मला अजिबात नको होतं. पण शेवटी वडीलधा-याच्या व्यवहारी दृष्टिकोनापुढे माझा भावुक विचार दुर्बळ ठरला. ती वरच्याचीच इच्छा असणार. आले  देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना  आणि अशा रितीने एकुलत्या एक मुलीचा एकुलत्या एक मुलांशी  विवाह आनंदात धूमधडाक्यात पार पडला. “छान मस्त लग्न झालं.” “अनुरुप जोडी”.वगैरे वगैरे.

                                      क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares