सौ. वंदना अशोक हुळबत्ते
जीवनरंग
☆ मोबदला… भाग – २ ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
(“बाळा आम्हाला तुझा अभिमान वाटतो. कमी वयात हे यश तू मिळवलंस. “असं म्हणत आईने त्याच्या तोंडावरून हात फिरवत मुका घेतला. त्याला आशीर्वाद दिला. तो दिवस खूप आनंदात गेला.)
– इथून पुढे – – –
आधी श्री एकटाच जर्मनीला गेला. थोड्या दिवसांनी आपल्या बायकोला, मुलाला घेऊन गेला. सुरुवातीला श्री चे रोज फोन येई. तो खुशाली घेई. हळूहळू त्याचे फोन येणे कमी झाले. रिकाम्या घरात आई आप्पांच मन रमे नासे झाले. शहरात राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलाच्या विकासात आम्ही आडवे येणार नाही पण आमचाअपघात झाला हे समजल्यावर तर त्यांन यायला पाहिजे होतं. विचारपूस करायला हवी होती. किमान सुनेला तरी इकडं पाठवायला पाहिजे होतं. परदेशात गेल्यावर खरंच माणसं एवढी गेंड्याच्या कातड्याची होतात काय? आपल्या माणसांची माया, ममता, प्रेम कसं विसरतात? या शहरात अस काय आहे इथं माणसांना माणसानंसाठी वेळ मिळत नाही. या मुलांची घाई कधीच संपत नाही. कामे संपतं नाहीत. याची हाव कधी संपत नाही. कि आपली विचार करण्याची पद्धत आपण बदलली पाहिजे? हे जर खरं असेल तर हा मधु ना नात्याचा ना गोत्याचा आपलं काम सोडून रोज इथं का येतो? मला वाटतं आपल्या संस्कारात काही उणीव राहिली असेल म्हणून श्री असा वागला. श्री च्या आठवणीने सुधाच्या डोळ्यात पाणी आले. आईच आतड त्याला कुठं व्यवहार समजतो. आपल्या मायेचा चांगला मोबदला दिला आपल्या लेकान.
“चला…. चला…. खिचडी खायला चला. आई तू घे. मी यंगमनला भरवतो. “
” मी भरवते. ते फार सावकाश खातात. “
“मी भरवतो. मला घाई नाही. ” म्हणत त्यांनी भरवायला सुरूवात केली. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. सुधांन हे बघितलं ती त्याच्याजवळ गेली त्याच्या पाठीवर मायेने हात ठेवला “बाळा काय झालं तुझ्या डोळ्यात का पाणी? ” काही वेळ तसाच गेला. कोणीच काही बोलले नाही. “आजवर तुला कधी विचारलं नाही. तुझी इच्छा असेल तर सांगशील मधू तुझ्या घरी कोण कोण असतं? “
आता मात्र त्याचा त्याला हुंदका आवरता आला नाही. सुधाने त्याला पाणी दिले. जवळ बसवले ” बोल काय साठले तुझ्या मनात. “पाण्याचा एक घोट पिऊन तो म्हणाला
“माझ्या घरी कोणीच नसतं. मी एकटाच राहतो. मी, माझी मोठी बहीण, आई-वडील सगळे एकत्र राहत होतो. बहिणीचे लग्न झाले. पहिल्या बाळंतपणात ती गेली. मी दहावीत असताना माझ्या डोळ्यात देखत एका अपघात आई वडील गेले. मी त्यांना वाचू शकलो नाही. नंतर माझा सांभाळ एका मानलेल्या काकांनी केला. त्यांनीच मला शिकवले, नोकरीला लावले. ज्या दिवशी तुमचा अपघात झाला त्या दिवशी मी तिथे होतो तुमच्या रूपात मला माझी आई वडील दिसले. मी जीवाचा आकांत करून तुम्हाला वाचवले आणि मला आई-वडिलांना जीवदान देण्याचे समाधान मिळाले. माझे वडील असते तर त्यांचेही मी एवढ्याच प्रेमाने केलं असतं आज ते नाहीत याचं मला वाईट वाटतंय. “
“आम्ही कोण आहोत. आम्ही तुझे आई वडीलच आहोत. अरे पोटच्या मुलापेक्षा तू आमचं जास्त करतोस. खरंतर गावात राहणारी आम्ही साधी माणसं. शहराचं वार आम्हाला माहित नाही. पण मुलाच्या प्रेमा खातर गाव सोडून इथं आलो. आम्हाला भेटायला, आमचं करायला, मुलाला सुनेला वेळ नाही. पण तू न चुकता रोज येतोस आमची काळजी घेतोस कोणत्या जन्मी आम्ही पुण्य केलं म्हणून तू आम्हाला भेटलास. तू आमचा मानसपुत्र. तुझे उपकार मानावे थोडे कमीच आहेत.”
“मानसपुत्र म्हणता आणि उपकाराची भाषा काढता. असं असेल तर मी येणारच नाही. तुम्ही सुद्धा मला आई-वडिलांसारखेच प्रेम दिले. “बराच वेळ गप्पागोष्टी करून मधु निघून गेला.
संध्याकाळी सुधा राघवला पुस्तक वाचून दाखवत होती. दारावरची बेल वाजली. सुधाने पुस्तक मिटवून ठेवले दार उघडले एक मुलगी दारात उभी होती.
” कोण तू? काय हवं आहे? “
” सुधा आई तुम्हीच ना. “
” हो. पण तू.. कोण? तुला इथला पत्ता कोणी दिला? “
” मला मधुने पाठवलं. “
“तो कुठाय? तू का आलीस? “
” हो…. सांगते. किती प्रश्न विचारता. मी मंदा मधुच्या शेजारी राहते. मधुची बदली बेंगळुरूला झाली आहे. त्याने तुमच्या घरची परिस्थिती मला समजून सांगितली आहे. मी दोन्ही वेळेला येऊन स्वयंपाक करून जाईल. “मधुची बदली झाली हे ऐकताच सुधाच्या पायाखालची जमीन सरकली. पुन्हा एकदा त्याच चक्रात अडकलो. आपल्या मुलावर आपली सत्ता नाही तर आपण मधु कडून एवढी अपेक्षा का ठेवायची? हाच विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. आपला आधार संपलाय असं तिला वाटलं. स्वतःला सावरत ती म्हणाली
“आम्ही हे खरं कसं मानायचं? “
“मी मधुशी फोन लावून देते तुम्हीच बोला. “
“हॅलो सुधाआई. सॉरी… मी मधु बोलतोय. मला अचानक बेंगलोरला जावं लागलं म्हणून फोन करता आला नाही. मंदा खूप चांगली मुलगी आहे. ती तुमची काळजी चांगली घेईल”
“हॅलो… मधु… बाळा तू कसा आहेस? तिथे तुला सगळ्या सोयी मिळाल्या का? स्वतःची काळजी घे. इथली काळजी करू नको. आम्ही सांभाळून घेऊ. “
मधुला प्रमोशन मिळाले तो नव्या मोठ्या शहरात गेला याचा आनंद सुधाला झाला. श्रीच्या आणि मधुच्या वागण्यात फरक काय होता? दोघांनाही आपला विकास करण्याचा हक्क आहे. नवक्षितिज तरुणाईला खुणावते त्यांना एका बंधनात बांधून ठेवणे कितपत योग्य आहे. ते शक्यही नाही. त्यांच मोकळं आकाश त्यांना दिलं पाहिजे पण त्यांनीही आपल्या कर्तव्यात चूक करून चालणार नाही. आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. पण वास्तवात यशाला जबाबदारी दिसत नसते हेच खरं. आता आपण आपली सोय करून जगायला शिकलं पाहिजे.
मंदा सांगत होती त्यांची एक संस्था आहे. तुमच्या गरजा आमची सेवा या नावाने. तुम्हाला दवाखान्यात जायचं असेल, बँकेत जायचं असेल तुम्हाला सोबत हवी असेर, घरी सोबतीला थांबायचं असेल किंवा स्वयंपाक करून द्यायचा असेल, तुमची जी गरज असेल त्याप्रमाणे या संस्थेमार्फत सेवा दिली जाईल त्या मोबदल्यात पैसे घेतले जातील. तुम्ही कोणत्याही कामाला बोलवा ते सेवेला हजर असतील पण त्याच्या मोबदल्यात ते पैसे घेतील. खरंतर ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. बऱ्याच वेळा घरच्या लोकांना वेळ नसतो. अशावेळी पैसे देऊन तरी मनुष्यबळ उभं राहणं महत्त्वाचं असतं. आई मुलांना मोठं करत असताना कोणता मोबदला घेते? आपल्या गरजेच्या वेळी मुलांनी आपल्याला विचारावं एवढीच अपेक्षा असते. असं तर असं. जशी वेळ येईल तसं. जगलं तर पाहिजे. तेही आत्मसन्मानानं. पैसे देऊन घेतलेल्या सेवेत मायेचा कोपरा कायम रिकामा राहील. जगण्याचा व्यवहार तरी पूर्ण होईल.
भूक लागली आहे. स्वयंपाक झाला पाहिजे. जुळवून घेतलंच पाहिजे. सुधाने मंदाला काम समजून दिले ती स्वयंपाक घरात गेली.
– समाप्त –
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈










