मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ये दोस्ती हम नही तोडेंगे….. ☆ राधिका माजगावकर पंडित ☆

राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ ये दोस्ती हम नही तोडेंगे… ☆ राधिका माजगावकर पंडित

एस. पी. चा आमचा आवडता कट्टा आज बरेच दिवसांनी टोळभैरवांनी भरगच्च भरला होता. प्रत्येकाच्या हातात मस्त रंगीत फुलांचे बुके नाचत होते.

 हो! आज अभ्याचा वाढदिवस आहे ना! शिक्षणाच्या कोर्सच्या वाटा बदलल्या म्हणून काय झालं! ‘येदोस्ती हम नही तोडेंगे’ चा नारा आम्ही आधीपासूनच पक्का केला होता. भेटल्यावर पहिली सलामी शिव्यांचीच असायची, “साल्या कुठे कलमडला होतास? भुतासारखा कुठल्या पिंपळावर बसला होतास आज उगवलास? ” अशीच सुरुवात व्हायची पण प्रेमाने दिलेली शिवीही एकमेकांना वडापाव सारखी वाटायची. खरं प्रेम होतं आमच्या मित्रांमध्ये.

कुणाला मदत करताना आम्ही ‘साथी हाथ बढाना’ होतो तर माजलेल्या गुंडांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रांगडे पैलवान व्हायचो. आपल्याच मस्तीच्या विचारात मी असताना पोरं खिंकाळली, “अरे अभ्या आला रे आला! उचला त्याला मिरवत आणूया आणि नाचणाऱ्या मित्रांच्या खांद्यावरून तोल सांवरत अभ्या अवतरला.

सगळ्यांची वर्णी लागली होती पण मन्याचा पत्ता नव्हता अभयनी विचारल्यावर कोणीतरी किंचाळल “अरे तो मजनू पार कामातून गेलाय त्याची लैला त्याला सोडून गेलीय नां म्हणून तो जन्तर मंतर झालाय. परवा तर आत्महत्येची भाषा करत होता. ” नऱ्याचं टाळकच् सटकलं, सोडून गेली? म्हणजेकांय? माझ्यासमोर प्रेमाचा, लग्नाचा पाढा वाचलाय त्यांनी. आणि आता ती पळून जाते म्हणजे काय? बघतोचं तिच्याकडे. ” 

त्याच्या डोक्यावर बर्फाचे लादी ठेवत मी म्हणालो, “समंधा शांत हो तिच्याकडे आपण नंतर बघू आधी त्या मजनुला ताळ्यावर आणू. “

अभ्या बोलला, “माझा बर्थडे उद्या होणार आज आपली धाड मनोजच्या घरावर पाडायची. आमचा मोर्चा मनोजच्या घराकडे वळला शिट्ट्या वाजल्या. मन्याला आम्ही घराबाहेर रस्त्यावर खेचला. गॅलरीतून त्याची आई कळवळली, “अरे सांभाळून न्यारे त्याला” तर बाबा ओरडले, “बरं झालं तुम्ही आलात ते, चार दिवस झाले सुतकी चेहरा करून, त्या पोरी पायी टाळकं फिरवून बसलय कार्ट, डोकं ठिकाणावर आणा त्याचं” 

काकांचं म्हणणं बरोबर होतं मन्याला धोपटून ब्रेन वॉश करणं आवश्यक होतं. दाढी काय, डोळे काय, देवदास झालेल्या मन्याला अगदी रामदास नाही पण वास्तवदास करायचा चंग आम्ही बांधला. “मी नाही येत रे” चा पाढा वाचणाऱ्या त्याला आम्ही उचलला आणि बाकावर आदळला. सम्या करवादला “अरे तिच्यापाई काय अवस्था करून घेतलीस स्वतःची. आणि रडतोस काय बायल्या हातभर बांगड्या भर लेका” आमच्याकडून मुक्ताफळांची उधळण चालली होती. आमच्यात अभ्या जरा शांत डोक्याचा आणि सीनियर आहे मन्याच्या भोवतांलचं आमचं कोंडाळ फोडून तो आत शिरला. त्या फडतुस मुलीसाठी वेड्या झालेल्या वेड्याला त्यांनी चुचकारत विचारलं, ” काय झालंय मन्या? कोण ही पोरगी? अरे! तिच्यासाठी तू जीव द्यायला निघाला होतास? चल त्या पोरीकडे सरळ करतो तिला. “

एकानी शंख केला, “अरे अभ्या सरळ करायला ती इथे आहे कुठे, पैसेवाल्याचा हात धरून केव्हाच पळालीय ती. ” 

मन्याला पुन्हा दुःखाचा उमाळा आला. त्याच्या नरड्यात आम्ही अख्खी बिसलरी ओतली तेव्हा त्याचे उसासे थांबले. तो म्हणाला, “अरे चांगली होती, सुंदर होती रे ती मला आवडली होती. ह्या बजरंगापुढे आम्ही आणाभाका घेतल्या, सात जन्म एकत्र राहण्याचा वचन दिलं होतं तिनं मला. दोन्हीकडचे आई-बाबा एकदम खुश होते सगळीकडून हिरवा सिग्नल मिळाला. लग्नाची तारीख पक्की झाली पत्रिका कशा छापायच्या, तुझी आवड सांग म्हणून मी तिच्या घरी विचारायला गेलो तर आई-वडिलांनी हात झटकले. तुमच्या घरात तिची हौस नसती पुरवली गेली म्हणून तिने पैसेवाल्याशी लग्न केलं” असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः हकललं रे!

मध्या दात ओठ खात मन्याला मारायला धावला, “मुर्खा त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस? हा सगळा त्यांचा आधीपासूनचा प्लॅन असेल. लबाड साले”एवढं महाभारत घडूनही आमचा हा हिरो रिंगणाबाहेर यायला तयारच नव्हता. “अरे पण ती चांगली होती रे माझं प्रेम होतं तिच्यावर” मन्याचं गाणं चालूच होतं. अजूनही हे पात्र तिच्या प्रेमातून बाहेर यायला तयारच नव्हतं. त्याच्यापुढे डोकं आपटायचंच बाकी राहयलं होत. त्याला धोधो धुवावासा वाटत होतं. आता मात्र मध्या भडकून म्हणाला “चुलीत घाल तिचं प्रेम, अरे मुर्खा फसवलय तिने तुला. तुझं घर, पैसा, इन्कम, बचत बघायला तुझ्या घरात आणि गोड बोलून तुझ्या आई बाबांच्या मनात शिरली ती बया. तुझा मासा गळाला लागला होता. पण पैसा हातात येत नव्हता मग काय सोडलं तुला आणि गाठला तिने मोठा लक्षाधीश मासा 

आणि हे येडं अजूनही अडकलय तिच्यात. अरे सोड! छपन्न मुली आणून उभ्या करतो तुझ्या पुढे” आम्ही हिरवा सिग्नल दाखवला. तरी पण आमचं हे बाळं तुणतुण वाजवतच राह्यलं, ” 56 राहू दे रें एक तरी मुलगी लग्न करायला तयार आहे का माझ्याशी? वय वाढतय माझं. आई बाबा थकलेत. मी नाही गुडघ्याला बाशिंग बांधलं पण आई माझ्या डोक्यावर अक्षता टाकायला उतावळी झालीय. आता कोण देईल मला मुलगी? आमचं हे बेनं दळण दळतच होतं. आम्ही वास्तवात आलो या रड्याच्या बोलण्यात तथ्य होतं त्याचं म्हणणं बरोबर होतं. आमची लग्नाची वय मागे पडताहेत. गुडघ्याला बाशिंग बांधलय खरं पण नवरीचा पत्ता नाहीये. केविलवाणी परिस्थिती झालीय आमची. तरी पण मन्याला स्वप्नातून कसंबसं आम्ही खाली आणलं.

आता पुढे काय? हा गुंता सुट्ता सुटत नव्हता. निराश झालेला आमचा दोस्त आणि उदास झालेल्या त्याच्या आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोरून हालत नव्हता आता काय करायच? हा राक्षसी प्रश्न ‘आ’वासून गिळायला बघत होता.

त्याच तिरीमिरीत चंद्याकडे गेलो दार त्याच्या बहिणीने उघडलं. आणि डोळ्यासमोर लख्ख वीज चमकली, मेंदू हलला, झटका बसला आणि झटक्यात विचारआला ‘अरे ही पोरगी तर लग्नाची आहे की. मन्यासाठी हिला विचारलं तर.. चंद्या नुकताच चतुर्भुज झाला होता आणि गेला होता त्याच्या चंद्राला घेऊन मधुचंद्राला. मग काय थेट त्याच्या आबांना गाठलं खडा टाकून बघितला, मनोजची वकिली करून त्याच्याबद्दल त्यांना पटवलं. बाबातर एकदम खुश झाले चंद्याची आई देवापुढे साखर ठेवायला धावली. पडद्याआडून डोकावणाऱ्या मनालीकडे मी बघितलं. मनोजला ती ओळखत होतीच. खुणेने मी तिला विचारलं तर पोरगी झक्कास लाजली. चला अर्धा गड तर सर झाला.

आता मन्याला घोड्यावर बसवायचं. एस. पी. चा कट्टा गाठला. मोबाईल खणखणले मित्रांचा अड्डा जमला. मन्याला मधे घेतला, चारी बाजूंनी हल्ला करून ‘अरे मारो गोली उस छोकरीको असं म्हणून त्या पळालेल्या पोरीचं त्याच्या मानगुटीवर बसलेलं भूत उतरवलं. अखेर त्याचा भेजा ठिकाणावर आला आणि या बैलाने मुंडी हलवली,

लगेच आमचं दोस्त मंडळ तयारीला लागलं. हो! हे खुळं परत बिथरलं तर काय करा! कारण मन्या त्या पोरीपायी पार कामातून गेला होता. येरवड्याला न्यायचंच बाकी होतं अनेक रात्री त्याने जागवल्या. दिवसा तो मनांत रडायचा. त्याचा उदास आणि केविलवाणा चेहरा बघून त्याच्या आई-बाबांचा जीव धास्तावला होता.

त्याला ह्या निराशेच्या डोहातून बाहेर काढणं आवश्यक होतं. अशावेळी फक्त त्याच्यावर फोकस करून आमच्या दोस्त मंडळींनी त्याला माणसात आणण्याचा विडा उचलला चंद्या ला निरोप गेला तो हनिमून सोडून धावत पळत आला.

चक्र वेगाने फिरत होती. मनाली तर खुश होतीच, पण आमचं हे ध्यान मन्याही आता लग्नाला उतावळा झाला होता. अंतरपाट वर धरला तरी टाचा उंच करून तो मनालीला न्याहाळत होता. ते बघून आमचं मित्रमंडळ पुढे सरसावलं, नवरदेवाला उंचावर नेण्यासाठी दहीहंडी केली आणि म्हणालो “कशी घालतोस माळ बघु लेका, आता माळ घालूनच दाखव ” 

पण ह्या l बहाद्दराने दहीहंडी फोडून उडी मारली आणि तो धपक्कन मनालीच्या पुढेच पडला. आम्ही तिथे पोहोचायच्या आतच चलाखीने नवरीच्या गळ्यात त्याने माळ घातली, मनालीने पण तितक्याच चपळाईने त्याच्या गळ्यात हार घातला. आणि काय म्हणाली माहित आहे कां “.. हमभी कुछ कम नही..

अक्षतांचा मारा झाला हास्याची लाट उसळली, फुलांची उधळण झाली आणि.. आणि.. शुभमंगल एकदाचं पार पडलं. आम्ही रोखलेले श्वास सोडले.

आज डोकं ठिकाणावर आलेलं आमचं हे यडखुळं हनिमूनला निघालय. त्याला पोहोचवायला वीस गाड्या बाहेर पडल्यात. विमानतळावर त्याला सोडताना आम्ही आरोळ्या ठोकल्या.

“बाय मनोज… बाय मनाली… हॅप्पी जर्नी”

© राधिका माजगावकर पंडित

सन सॅटॅलाइट पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अंधाराची सावली… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ अंधाराची सावली… ☆ डॉ. शैलजा करोडे

“निलिमा मॅडम, 28 फेब्रुवारी विज्ञानदिन. यानिमित्ताने आपल्या शाळेत विज्ञान कथास्पर्धेचे आयोजन करुया, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल व त्यांच्या मनात विज्ञानाविषयी गोडीही निर्माण होईल. कथेचा विषय व इतर नियमावली तुम्ही तयार करुन नोटीस बोर्डवर लावायला द्या. कथांचं परीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून काही बक्षीसंही देऊयात “. ” होय मॅडम, मी करते सगळं आयोजन. स्पर्धा यशस्वी होईल मॅडम ” “दॅट्स गुड. किप इट अप. शुभस्य शीघ्रम मॅडम. कारण वेळ फार कमी आहे. आज 21फेब्रुवारी, आपल्या हातात फक्त चार/पाच दिवस आहेत.

मी स्टाफ रूममध्ये आले. पुढचा पिरेड मला आँफ होता. चला विज्ञान कथेचा विषय ठरवायला वेळ मिळाला. काय बरं विषय ठरवावा. होय सुचला कि विषय ” कृष्णविवरातील अंधाराचा भेद “होय हाच विषय ठेवूया. मुलांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळेल. छान छान काल्पनिक विज्ञान कथा तयार होतील. येस, वाॅव, माझ्या चेहर्‍यावर स्मित झळकलं. काय निलिमा मॅडम खुश आहात “, माझी सहकारी अपर्णा पोतनीस स्टाफ रूममध्ये प्रवेश करीत बोलत होती. “काही नाही गं, असंच ‘. ‘असंच कसं, काहीतरी तर कारण असेल ना ‘ ” काही विशेष नाही ग अपर्णा ‘ ‘ नसेल सांगायचं तर नको सांगूस निलिमा. पण आनंद वाटून घेतल्याने द्विगुणित होतो म्हणतात ” मी माझी कल्पना अपर्णा बरोबर शेअर केली. ‘ अरे वाह, किती छान विषय आहे ग. मुलांनाही आवडेल आणि स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल बघ. खूप खूप शुभेच्छा. ‘ धन्यवाद अपर्णा ‘ तास संपल्याची घंटा वाजली आणि आमचा संवाद थांबला. मी खडू, डस्टर घेऊन वर्गात जाण्यासाठी निघाले.

स्पर्धेला खरंच भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ चाळीस मुलांनी कथा लिहिल्या होत्या.

कृष्णविवर, महा भयंकर अंधार, प्रकाशालाही गिळंकृत करणारा, अभेद्य, पण या अंधाराचाही शोध वैज्ञानिकांनी घेण्याचा प्रयत्न केलाय. मी कथांचं परीक्षण करीत होते.

इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (EHT): जगभरातील रेडिओ टेलिस्कोप एकत्र करून तयार केलेल्या या आभासी टेलिस्कोपमुळे मानवाला इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये ‘M87*’ आणि २०२२ मध्ये आपल्या आकाशगंगेतील ‘Sgr A*’ या कृष्णविवराची थेट छायाचित्रे घेणे शक्य झाले.

हॉकिंग रेडिएशन सिद्धांत: महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केले की कृष्णविवरे पूर्णपणे काळी नसतात;

त्यातून पुंज भौतिकशास्त्राच्या (Quantum Mechanics) नियमांनुसार सूक्ष्म किरणोत्सर्ग बाहेर पडतो, ज्यामुळे ती हळूहळू नाहीशी होऊ शकतात.

गुरुत्वीय लहरी (Gravitational Waves): २०१५ मध्ये ‘LIGO’ वेधशाळेने दोन कृष्णविवरांच्या टक्करीतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला, ज्यामुळे कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी विज्ञानाला ‘नवे डोळे’ मिळाले.

अॅक्रेशन डिस्कचा प्रकाश: कृष्णविवराच्या भोवती फिरणारा वायू आणि धूळ तीव्र वेगाने फिरताना प्रचंड घर्षणामुळे चमकू लागतात, या प्रकाशाच्या मदतीने कृष्णविवराच्या सीमांची (Event Horizon) अचूक रचना समजते.

कृष्णविवराचे मुख्य भाग

सिंग्युलॅरिटी (Singularity): कृष्णविवराचा केंद्रबिंदू जेथे संपूर्ण वस्तुमान एका अनंत सूक्ष्म बिंदूत एकवटलेले असते तेथे भौतिकशास्त्राचे नियम कोलमडतात.

इव्हेंट होरायझन (Event Horizon): कृष्णविवराची ती अंतिम सीमा ज्याच्या आत गेलेली कोणतीही वस्तू किंवा प्रकाश कधीही परत येऊ शकत नाही.

विज्ञानाने अत्यंत प्रगत टेलिस्कोप, गणिताची सूत्रे आणि भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांच्या जोरावर कृष्णविवराच्या अंधाराचा भेद करून त्याची छायाचित्रे आणि अस्तित्व जगासमोर आणले आहे.

बाप रे बाप, मुलांनी काय अभ्यास केलाय. किती सविस्तर आणि सखोलात जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केलाय. खरंच मानलं पाहिजे आजच्या पिढीला. माहिती तंत्रज्ञान, सगळी इलेक्ट्रानिक माध्यमं आणि AI ची होणारी मदत, जणू ज्ञानगंगा दारी आलीय आजच्या युगात.

आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात कृष्णविवराचा शोध घेऊन त्या अंधाराला भेदण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

असाच, असाच अंधार वारंवार जीवनातही येतो, माझ्याही जीवनात अनेकदा आला. म्हणतात ना जेव्हा अंधार येतो ना तेव्हा आपली सावलीही सोबत सोडते म्हणतात. पण, पण, सावली आपल्या सोबतच असते. कारण आपण तिथे असतो, फरक एवढाच कि आपल्याला ती दिसत नाही. जेव्हा संकटे येतात, वादळे येतात, परीक्षेचे क्षण येतात तेव्हा या अंधाराला भेदते आपली सावली, होय सावलीच, मग ती आपला आत्मविश्वास जागवते, मनाला खंबीरता देते, संकटांशी झुंजण्याची शक्ती देते तर चोहीकडे पसरलेल्या अंधारातही प्रकाशकिरण शोधण्याची हिंमत देते.

सात आठ वर्षाची असेन मी, घरात आई कॅन्सरशी झुंज देत होती, दोन लहान भावंडे, सगळी जवाबदारी माझ्यावर, जमेल तसा कच्चा पक्का स्वयंपाक मी करायची, आईची सेवा करुन शाळेत जात होती. आणि तो काळा दिवसही आला, आईने जगाचा निरोप घेतला.

आम्हां भावंडासाठी बाबांनी पुन्हा संसाराची घडी बसविली. सावत्र आई, तिला कसलं प्रेम माया, सातत्याने मला कामाला जुंपायची, जेमतेम 13 वर्षाची असेल मी. बाबांना माझे हात पिवळे करायला लावले. माझे शिक्षण सातव्या इयत्तेतच थांबले.

लहान लहान भावंडे सोडून मी सासरी आले. माझं लक्ष भावंडांकडे लागायचं.

“लग्न झालंय तुझं आता, विसर सगळं माहेर आणि लाग संसाराला ” सासूबाईंची टोचणी. नणंदेचा तोरा होताच. पतीराजही बायकोला नेहमी धाकात ठेवले पाहिजे या विचारसरणीचे. घरात कोणाला उलटून बोलण्याची हिंमत नाही. काही चुकल्यास, मनाविरूद्ध घडल्यास मारहाणही व्हायची मला. जीवनाची गाडी अशी चालू असतांनाच मातृत्वाचं ओझंही माझ्यावर लादलं गेलं केवळ सतराव्या वर्षीच. गोंडस, गोड गोजिरं बाळ कुशीत आलं आणि या प्रकाशाने माझ्या जीवनातील अंधाराचा भेद केला. बाळाला कुशीत घेतांना ब्रम्हांड सुखाचा अनुभव मी घेत होते.

आणि एक दिवस कोसळणार्‍या पाऊसधारा, दाटलेला अंधार, विजेच्या कडकडाटासह, घोंघावणारा वारा, जणू प्रलयाची नांदी देणारा, पतीराज अजून घरी आले नव्हते. माझी अस्वस्थता वाढलेली. दरवाज्यातून, खिडकीतून यांची वाट पाहात होते. हळूहळू पाऊस थांबला पण माझ्यासाठी धरणी दुभंगणारी बातमी घेऊन आला. वादळी पावसात घरी येतांना रस्त्याच्या कडेला असलेला वृक्ष उन्मळून पडला होता, तो नेमका माझे पती अशोकच्या अंगावरच, सोबत वीजेच्या तारा. तत्क्षणीच त्यांचा मृत्यू झालेला.

कुशीत सहा महिन्याचा माझा गौरव व मी पुन्हा अंधाराने वेढले गेलो. सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. पण बाळासाठी मला पुन्हा मला उभं राहाणं भाग होतं. शिवणकला मी शिकलेली होती. शहरातीलच सुधर्मा फाऊंडेशन विद्यार्थ्यांना गणवेष, पुस्तकं, जलमंदिर अर्थात पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच अपंगाना सायकल व निराधार भगिनींना शिवणयंत्राचे वाटप करायचे. माझा आर्थिक प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी तो पुरेसा नव्हता. मला पुढील शिक्षण घेणं भाग होतं. मी बहिःस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली, उत्तीर्ण झाले. डी. एड. साठी अर्ज केला, प्रवेशही मिळाला. प्रश्न होता गौरवला सांभाळण्याचा. यावेळी मात्र बाबांनी सगळा विरोध पत्करून गौरवला सांभाळण्याची जवाबदारी घेऊन माझा मार्ग सुकर केला.

यथावकाश माझे शिक्षण पूर्ण होऊन मला शाळेत नोकरीही मिळाली. आर्थिक स्वावलंबनाने माझ्या जीवनातील अंधार कमी झाला होता. आता मी पदवी परिक्षेचाही अभ्यास सुरू केला होता. यशाची दालनं हळूहळू उघडत गेली आणि मी आज ज्युनियर काॅलेजमध्ये प्राध्यापिका होते.

माझा गौरवही एमबीबीएस च्या शेवटच्या वर्षाला होता. अंधाराचा भेद झाला होता.

अंधारातील माझ्या आत्मविश्वासरूपी सावलीनेच मला प्रकाशाचा मार्ग दाखविला होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – मी नक्की येईन / आत्मविश्वास / खेळणे “ हिन्दी लेखक : श्री महेश राजा ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – मी नक्की येईन / आत्मविश्वास / खेळणे “ हिन्दी लेखक : श्री महेश राजा ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर

१) मी नक्की येईन माझ्या बाळांनो!

मुलांच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. मुले खूश होती. उद्यापासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. दु:खी होती ती शाळेतली आया. ती एका कोपर्‍यात बसून मुलांना खेळताना बघत होती. उद्यापासून शाळा उजाड वाटणार होती.

तिचे कोणी नातेवाईक, संबंधित नव्हते, असा काही नव्हतं. तिला दोन मुले होती. ती वेगवेगळ्या शहरात आपापल्या पत्नी-मुलांबरोबर रहात होती. जेव्हा, त्यांना पैशाची काही अडचण यायची, तेव्हा, त्यांना आईची आठवण यायची. नाही तर कधी सणावारीदेखील आईला कधी बोलावले नव्हते. पतीचा मृत्यूनंतर, तिने मेहनत-मजुरी करून मुलांना शिकवले. छोटी-मोठी नोकरी शोधून, त्यांची समान परिवारातील मुलींशी लग्ने करून दिली. सगळ्यांना ती खुश बघू इच्छित होती. तिची कुणाहीबद्दल कसलीच तक्रार नव्हती. तिला माहीत होतं, आज-कालचे दिवस असे आहेत. सुना सासूच्याजवळ राहू इच्छित नाहीत. घरोघरी हीच परिस्थिती आहे. आपल्या नशिबाचा दोष मानून, ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत आयाची नोकरी करत होती. शाळेतील मुलांवर ती खूप प्रेम करत असे. त्या मुलामध्ये, ती आपलं मन रमवत असे. कधी तिला आपल्या नातवंडांची आठवण येत असे. आपण त्यांना आपल्या मांडीवर बसवून कधी नीट भरवू शकलो नाही या विचाराने, ती दु:खी होत असे. या शाळेतल्या मुलांनाच ती आपली मुले मानून खूश रहात असे.

एवढ्यात, एका मुलाच्या रडण्याच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. तिने त्या मुलाला मांडीवर बसवले आणि त्याला गप्प करण्याचा ती प्रयत्न करू लागली. सगळ्या मुलांना ती खूप आवडत असे. ती सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून गेली होती. तिला आता रडू येऊ लागले होते. दिवसभर मुलांची देखभाल, त्यांचे खाणे -पिणे, साफ-सफाई यात तिचं मन रमायचं. आता उद्यापासून काय करणार? हा विचार तिला सतावत होता. मॅडमने हाक मारली. सुट्टीची वेळ झाली. मुलांकडे भरलेल्या नजरेने बघत ती बेल वाजवायला निघून गेली. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रूधारा वहात होत्या. मॅडमने तिच्या मनातील भाव समजून, तिच्या ख्ंद्यावर हात ठेवून तिला सांत्वना दिली. गेट उघडून ती लक्ष ठेवत होती. कुणाची रिक्षा अजून आली नाही. इतक्यात बघता बघता मुलांनी तिला घेरलं. त्यांच्या हातात एक पॅकेट होतं. सगळी मुले एका स्वरात ओरडली, ; बाई, यावेळी दिवाळीसाठी तू आमच्याच घरी ये. आम्ही आमच्या मम्मी –पापांना विचारलय! तिने सगळ्या मुलांना आपल्या ममतामयी बाहुंनी विळखा घातला. भरल्या आवाजात ती म्हणाली, येईन बाळांनो. जरूर येईन! तिचा गळा दाटून आला. मुले जिद्द करू लागली. नाही. आत्ताच चल आमच्या बरोबर! तिने मुलांना समजवलं, शाळेची साफ-सफाई, राखण करणं, याची जबाबदारी तिच्यावर आहे. वेळ काढून एकेकाकडे, अशी ती सगळ्यांकडे जाईल.

मुलांनी तिच्याकडून प्रॉमीस घेतले. सगळ्यात छोट्या असलेल्या सिद्धीने तिच्या हातात पॅकेट दिले. ती म्हणाली, हे काय आहे बाळांनो?

यावेळी सहावीच्या वर्गातला विकी म्हणाला, ही साडी आहे. आम्ही सगळ्यांनी आमच्या पॉकेट मनीतून पैसे वाचवून ही साडी तुझ्यासाठी घेतली.

नको. मी कशी ही घेऊ?

नाही म्हणू नको हं! आम्हाला वाईट वाटेल!

मॅडम म्हणाल्या, बाई, घे! मुलांनी इतक्या प्रेमाने आणलीय!

तिने सगळ्या मुलांच्या गालाचा एकेक पापा घेतला.

बाई, तू घरी आली नाहीस, तर मी फटाके नाही उडवणार! विशू म्हणाली.

बाई, मी फराळाच करणार नाही.. मदन म्हणाला.

नाही. नाही. बाळांनो, मी नक्की येईन. आत्यंतिक खुशीने ओघळणारे अश्रू, तिने तसेच ओघळू दिले.

सगळी मुले निघून गेली.

गेटपाशी उभी असलेल्या तिला, दूर उडणार्‍या धुळीकडे ती बघत राहिली.

…. जीवनात आज तिला प्रथमच वाटले, ती एकटी नाही आहे.

मूळ कथा – मैं जरूर आऊंगी मेरे बच्चोँ!, मूळ लेखक – महेश राजा

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454,

२) आत्मविश्वास – – 

जानकीदेवींनी एकदा आपल्या सार्‍या घराचे निरीक्षण केलं. सगळं काही ठाक-ठीक आहे न? तिची सहयोगी आशा पूर्ण निष्ठेने घर सजवण्याच्या कामात गुंतलेली होती. तिचा मुलगा राजेश आपल्या पत्नीला घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी गेला होता. मुलगी रीना आपल्या सासरी सुखात आहे. जानकीदेवींनी अन्य नोकरांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आता ती देवघरात आली. आपल्या इष्ट देवतांना नमस्कार करून, आपल्या पतीच्या फोटोपूढे उभी राहिली. तस्बिरीतून एक तेजस्वी किरण फुटतोय, असा तिला वाटलं.

पदर डोक्यावर ठेवत ती हळुवारपणे म्हणाली, ‘आहो, बघा ना, मी माझी सारी कर्तव्ये पार पाडलीत. मुलीचा विवाह एका कुलीन परिवारात केला. मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. तुम्ही दोघांना माझ्या झोळीत टाकून, लवकर निघून गेलात आणि सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलीत. तुमचा माझ्यावर विश्वास होता. तो मी कायम ठेवला. सगळं चांगल्या तर्‍हेने निभावलं. ’

थोडं थांबून डोळ्यात उतरलेलं पाणी पदराने पुसलं. मग म्हणाली, ‘आता मला परवानगी द्या. आता मी माझं पुढचं जीवन समाजसेवेत आणि गरीब मुलांना शिकवण्यात व्यतीत करू इच्छिते. मला आशा आहे, तुमचा विरोध असणार नाही. आजपासूनच मी आपलं हे निवासस्थान, हर्षध्वनी आश्रमाच्या रूपात बदलते आहे.

तुम्हाला प्रणाम करून, तुमचा आशीर्वाद घेऊनच, हे शुभ काम मी करू इच्छिते. मला परवानगी द्या! ’

– – ती हात जोडून मूक उभी राहिली. तिला वाटलं, पतीची तसबीर हसते आहे.

मूळ हिंदी कथा – स्वयं पर विश्वास, मूळ लेखक – महेश राजा

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

३) खेळणे – – 

दोन दिवसांनंतर आज वातावरण स्वच्छ होतं. मध्यंतरी खूप पाऊस पडत होता. आज ऊन पडण्याची लक्षणे दिसू लागले होती. अंश आज आपल्या आजोबांबरोबर किलकारी गार्डनमध्ये आला होता. शहराच्या मधोमध असलेला हा बगीचा मुलांच्या दृष्टीने फिरण्यासाठी अतिशय आकर्षक जागा होती. बागेत झोपाळे, घसरगुंड्या आणि व्यायाम करण्याची अनेक उपकरणे लावलेली होती. बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली होती. किलकारीच्या एका बाजूला फळे, ज्यूस इ. च्या हातगाड्या लागल्या होत्या. दुसर्‍या

बाजूला एक हलकी चटई हांतरून एक बाई, आपल्या लहान मुलाला घेऊन मुलांसाठी मातीची अनेक आकर्षक खेळणी घेऊन, गिर्‍हाईकांची वाट बघत बसली होती. तिचा छोटा मुलगा पुन्हा पुन्हा त्या खेळण्यासाठी हट्ट करत होता. तो सारखा एखादं खेळणं उचलून घेत होता. त्याची आई, त्याच्या हातातून ते काढून घेत होती.. खेळणं घेण्याची मनाई करत होती.

अंश वारंवार हे दृश्य बघत होता. तो आपल्या आजोबांना म्हणाला, ‘ आजोबा, त्या मुलाची मम्मी त्याला खेळणं का घेऊ देत नाही? ’

आजोबा त्याला समजावत म्हणाले, ‘ती गरीब आहे. त्यांच्या घरी खाण्यासाठी काही नाही. जेव्हा तिची खेळणी विकली जातील, तेव्हा त्यांच्या घराची चूल पेटेल. 

अंशने पुहा विचारले, ‘आजोबा, त्यांच्याकडे खायला का नाही? आपल्या घरी तर आहे. आपण घरून रोटी आणून या महिलेला आणून देऊ या. ’

आपल्या नातवाचे हे निरागस बोलणे, ऐकल्यावर आजोबा हसू लागले. लाडाने त्यांनी याला मिठीत घेतलं. ‘चल! त्या महिलेकडून खेळणं घेऊ या. ’

अंश खूश झाला. तो त्या जागी गेला व दोन चांगली खेळणी त्याने उचलली आणि आजोबांकडे पाहिलं. आजोबांनी होकार भरला.

अंशने एक खेळणं त्या छोट्या मुलाला दिलं. ती महिला ‘नको… नको.. ’ म्हणत होती.

आजोबांनी दोन्ही खेळण्यांचे पैसे तिला दिले. तेव्हा ती आश्वस्त झाली. तो मुलगा खेळणं मिळाल्याने खुश झाला. तो खेळण्याशी खेळू लागला.

अंशने आपल्या बॅगेतून काही फळे काढली आणि त्या मुलाला दिली. मुलाची आई त्यांच्यापुढे हात जोडत राहिली.

आता आजोबा-नातवाची जोडी हातात हात घालून आपल्या घराकडे खुशी-खुशीने परत चालले होते.

– – आकाश निरभ्र होतं. त्यातून सूर्यदेवता हसत होती.

मूळ हिन्दी कथा – खिलौना, मूळ लेखक – महेश राजा

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454,

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”वक्त वक्त की बात है! ..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “वक्त वक्त की बात है!” ☆ संध्या बेडेकर ☆

“व्यक्तिमत्त्व एवढे सरळ व तिखट ठेवा की चांगल्या माणसांना त्याची चव व वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे “.

आज दादा वहिनीला श्री. श्रीधर कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे आमंत्रण आहे. कुलकर्णी काका म्हणजे आमचे चुलत घराणे. खूप श्रीमंत. पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी?? असं वाटतं. त्यातच मुलांचीही बिझनेसमधे मदत झाली.   म्हणतात ना,   “पैसा पैशाला ओढतो. ”  

ते काकांकडे बघून पटत.   

म्हंटल तर मुलं खूप शिकलेली नाही. पण पिढी दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत. सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त त्यांच्यावर छान ठेवलेला आहे.   

श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या, घरात नोकर माणसे, म्हणजे घरच्या बायकांना साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर.    

पैशाचा माज चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना कुठे तरी खटकत. , मनाला लागत. असे आमच्या दादाचे नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही.   

मागे दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी अजूनही विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची वहीनीची काही तरी खास आठवण आहेच. नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे. तरीही काही महत्वाच्या कार्यक्रमात दादा वहिनी जातातच. आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी लावतात.   

तेंव्हा अनघा लहान होती, ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना, आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर, वाईट वाटणे, कधी कधी आईचे रडणे, तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच जास्त वाटत होता. वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही.   

दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही, पण सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती. दादाची मुल शिक्षणात हुशार होती, म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने कधी काही कमी पडू दिले नाही.  

अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या. ‘ UPSC ‘ पास केली. आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.   

आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे. अनघा म्हणाली मी पण येईन. ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.   

अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले.

“आपण नेहमी चांगले वागायचे”. असा बाबांचा नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई, बाबांबरोबर जात असे.  

अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे कटाक्ष व्हायचे. कसं होईल हिचे??? ही काळजी तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच जास्त होती. त्यांच्या घरी आई बाबांकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःख सारख आपलं डोकं वर काढतात. व तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात. व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.   

आई बाबा लग्नाला जायला निघाले. अनघा आॅफिस मधून सरळ हॉलवर येणार होती.  

तसं अनघाला सहज सुट्टी घेता आली असती, व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण तिला काळया सावळ्या अनघाचा ‘रूबाब ‘ दाखवायचा होता. खरं तर हे असे वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जून्या प्रसंगाची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही ती विसरली नव्हती. आज आई बाबांना खासकरून आईला तिची प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.   

पोलिस अधिकारी च्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म त्यावर ACP rank चे लागलेले स्टार्स, डोक्यावर लावलेली cap, हातात स्टीक, चकचकीत बूट, कमरेवर बेल्ट. डोळयांवर काळा चष्मा. तिला आॅफिसकडून मिळालेल्या गाडीतून अनघा आली. लगेच ड्रायव्हर ने कारचा दरवाजा उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.   

” व्वा!!! काय शान होती अनघाची. “

तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली. अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा तसाच कडक सॅलूट मारला.  

हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी निसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू पोलिस अधिकारी ‘अनघा ‘ होती.   

श्रीधर काकां काकू, व त्यांच्या घरचे इतरही सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले.   

अनघाने वेळ कमी असल्यामुळे मी सरळ आॅफिसमधूनच आले व लगेच मला जावे लागेल. असे सांगितले.   आज सर्वांशी भेट होईल, म्हणून मी आले.   पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे.  पण या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही.  तिने सर्वांची विचारपूस केली.   सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे ठरविले   

लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही आदराने जेवण दिल्या गेले.. आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते. आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.   

अनघाच्या आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती. अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला होता, तो ही बाबांचा नियम सांभाळून, “आपण नेहमी चांगले वागावे”.   

निघताना अनघा आई बाबांना म्हणाली,   आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा.   

श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘ राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली, ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा, माझा ताई बरोबर फोटो काढा ना. तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन.   

अनघा म्हणाली,   हो का??

मग छान अभ्यास कर. मी तुला वेळोवेळी guidance देईन.   

एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.  

“वक्त वक्त की बात हैं। 

वो भी एक वक्त था ।

आज भी एक वक्त हैं।”  

आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.   

म्हणतात ना,  

“Your greatest test is how you handle people who have mishandled you.”   

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोष्ट एका मुंगूसाची ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ गोष्ट एका मुंगूसाची ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

राजेश, त्याची बायको रजनी व त्यांची २ वर्षांची छकुली स्वीटी यांचं छोट्टं कुटुंब यमुना सोसायटीत खूप आनंदात होते. राजेशची एका बॅंकेत नोकरी होती आणि रजनीने स्वीटीच्या जन्मापासून नोकरी सोडली होती. सोसायटीचा वॉचमन नकुल सिंग याचा स्वीटीवर खूप जीव. “इसे देखता हूँ ना तो गांवमे मेरी बिटीया है ना, उसकी याद आती है! “, त्याचं नेहेमीचे पालुपद असायचे.

एकदा राजेश नेहमीप्रमाणे कामावर गेलेला. दुपारी ४ – ४:३० ची वेळ होती. सोसायटीच्या बागेत सावलीत स्वीटी व ७-८ वर्षाची सोहम, पिंकी, राजू खेळत बसली होती. सोहमची आई दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत कपडे वाळत टाकत होती. रजनीला पटकन कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन यायचे होते. रजनीने सोहमच्या आईला खूणेनेच आपण ५ मिनीटात येतोय असे सांगितले. मुलांनाही सांगितले – “स्वीटीवर लक्ष ठेवा रे, तिला एकटीला नका सोडू. मी आलेच पाच मिनीटात. ” गेटशी नकुल सिंग अर्धवट डोळे मिटून डुलक्या काढत होता.

रजनी परतली, पाहते तर बागेत मुलं नव्हतीच. एकटी स्वीटीच तिथे आणि नकुल सिंग तिच्या जवळ बसून, तिचा स्कर्ट वर करून… रजनीच्या जीवाने ठाव सोडला. जोरात ओरडतच ती नकुलच्या अंगावर धावून गेली आणि लाथा-बुक्क्याने त्याला मारू लागली.

इमारतीशी उभी राहिलेली मुलं काहीतरी ओरडून तिला सांगत होती, नकुल हात जोडून तिला काही सांगत होता, पण ती बेभान – बेफाम झालेली.

सोहमची आई धावतच येत होती. ” अग रजनी, हात आवर, हात आवर. ही मुलं खेळत होती तर तिकडून हा एवढा मोठा नाग आला. मुलं घाबरून पळाली, स्वीटी मात्र काही न कळल्याने तिथेच तशीच फतकल मारून बसलेली. मुलांच्या आरडाओरड्याने नकुलचे लक्ष गेले; नाग स्वीटीच्या पायात घुटमळत होता. नकुलने जीवाची पर्वा न करता खाली वाकून त्याला हाताने उचलले आणि दूर भिरकावून दिले. तो तिला कुठे डसला नाही ना नकुल पहात होता. “

रजनीच्या जीवाचे पाणी पाणी झाले, मारहाण करणारे हात जोडले गेले आणि ती नकुलकडे क्षमायाचना करू लागली, तिच्या छकुलीचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पाया पडू लागली.

— —

पंचतंत्रातील मुंगूसाची गोष्ट –

एक शेतकरी एका मुंगूसाला वाचवतो आणि घरी आणतो. एकदा तो शेतकरी आणि त्याची बायको दोघेही घराबाहेर गेले असतात, घरी त्यांचे बाळ व मुंगूस असे दोघेच असतात. बायको घरी येऊन बघते तर दारात मुंगूस उभं असतं – त्याचं तोंड आणि शरीर रक्तानं माखलं असतं. या मुंगूसाने नक्की आपल्या बाळाचा घात केला असे वाटून ती माऊली तिथल्या तिथे त्या मुंगूसाला मारून टाकते. घरात जाऊन पहाते तर बाळ मजेत खेळत असतं आणि त्याच्याजवळ एक विषारी नाग मरून पडलेला असतो – बाळाला इजा करण्याच्या आधीच मुंगूसाने त्याला मारलेले असते.

— —

संस्कृतमध्ये मुंगूसाला नकुल म्हणतात, माहित होतं का हो तुम्हाला?

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले, आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती.) 

इथून पुढे – – 

मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी पण फॅक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिनं मला सांगितलं. फॅक्टरीच्या प्राॅडक्ट्सची, त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगची तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती. एका ट्रस्टच्या माध्यमातून ती बरीच समाजसेवाही करत होती.

जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता. त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्या वागण्यातला नम्रपणा, साधेपणा, तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी हे सर्व पाहून मी खुप भारावून गेलो होतो.

“तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत का नाही गेलात? ” माझ्या नकळत माझ्या मनात खदखदणारा तो प्रश्न निघून गेला. ती मोकळेपणाने हसली. मग म्हणाली

“मला हा प्रश्न अनेकांनी विचारलाय. मला ऑफरही होत्या पण तिथं जाऊन मला प्रसिद्धीव्यतिरिक्त काय मिळालं असतं? आम्ही पिढीजात श्रीमंत. पैशाची आमच्याकडे कधीच कमतरता नव्हती. फिल्म इंडस्ट्रीत काय काय धंदे चालतात हे तुम्हांलाही वाचून माहित असेल. मला ते नको होतं. आणि प्रसिद्धी क्षणभंगुर असते. काही काळानंतर तुम्हांला कुणीही विचारत नाही. मला साधंसुधं जीवन जगायला आवडतं. सामान्य माणसांत मिसळायला, त्यांचे जगण्यामरण्याचे प्रश्न सोडवायला आवडतं. खरं सांगू मला मी सुंदर असल्याबद्दल वाईटच वाटतं. लोक माझी बुद्धीमत्ता, माझं कर्तुत्व, माझ्या भावना, माझ्यातली माणुसकी किंवा इतर काही गुण बघायलाच तयार होत नाहीत हो. ते माझ्या चेहऱ्याकडेच वेड्यासारखे बघत रहातात “

मीही तर तेच करत होतो. मला माझीच लाज वाटून मी चुप बसलो.

“थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते “

ती म्हणाली तसं मी भानावर येऊन होकारार्थी मान हलवली.

ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पॅसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा. एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो अतिशय गोड दिसत होता. मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला.

तेवढ्यात ती आली.

“रडत होता वाटतं! ” तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.

थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हांला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.

“मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो. तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय ” तिनं स्पष्टीकरण दिलं.

सकाळ झाली. आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो. कितीही सुंदर असली तरी आई ती आईच असते. रात्र रात्र मुलांसाठी जागणारी, त्यांच्या सुखासाठी जीवाचं रान करणारी.

एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.

“घरी कोणकोण असतं? “तिनं अचानक प्रश्न केला.

“मी, आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीये “

“अच्छा. म्हणजे तुम्हांला नोकरीची खरी गरज आहे “

“हो तर! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार? “

तिनं लगेच पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली. बोलणं झाल्यावर मला म्हणाली “तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना मेसेज करते “

मी नाव सांगितलं तिनं मेसेज केला.

“तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून “

“संजना कोण? ” मी विचारलं

“मीच. माझंच नांव संजना” ती हसून उत्तरली.

“थँक्यू व्हेरी मच मॅडम अँड व्हेरी व्हेरी साॅरी”

“साँरी? कशाबद्दल? ” तिनं आश्चर्याने विचारलं

“काल तुम्ही म्हंटलात तसं इतर पुरुषांसारखं मीही तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात, एका मुलाची आई आहात. माझी चुक झाली. आय ॲम एक्स्ट्रीमली साॅरी फाॅर दॅट”

तिनं हलकसं स्मित केलं. म्हणाली. ” फरगेट इट. अशा नजरांची मला सवय झाली आहे. स्वतःची बायको सुंदर असतांनाही दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमॅरीड आहात. आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. हे मी पहिल्या नजरेतच ओळखलं होतं. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते “

थोडं थांबून ती म्हणाली “आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहीजेत. खरं ना? “

“नाही नाही ” मी घाईघाईने म्हणालो “अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की त्याच्यासाठी मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढायला तयार आहे ” तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला.

नागपूर आलं. मी खाली उतरलो. तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली. निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले. तो लगेच माझ्याकडे झेपावला. मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले. मग त्याला तिच्याकडे दिलं. रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.

“बेस्ट ऑफ लक फाॅर युवर इंटरव्ह्यू. मी फोन केलाच आहे. तुम्हांला कोणतीही अडचण येणार नाही ” ती म्हणाली.

“थँक्यू व्हेरी मच “

जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला.

इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारुन एकशेसाठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली. त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की.

संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही. पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खुप चांगली शिकवणही देऊन गेली.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

गाडी हलली तसं मी बॅगेतून पुस्तक वाचायला काढलं. उद्या माझा नागपूरच्या एका कंपनीत इंटरव्ह्यू होता. गेल्या वर्षभरापासून मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. सहा महिन्यापुर्वी वडिलांनी तब्येतीच्या कारणांमुळे रेल्वेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून मला नोकरी मिळवण्याचं जास्तच टेंशन आलं होतं. वडिलांच्याच पासवर मी सेकंड ए. सी. चं रिझर्वेशन करुन नागपूरला निघालो होतो. पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती. माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते.

नाशिक आलं तसा एक देखणा तरुण बॅगा घेऊन आत चढला. माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बॅग ठेवली. तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली. तिला पाहीलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाॅड! काय सुंदर होती ती!

” कुठं जाताय? ” तो तरुण मला विचारत होता.

“नागपूरला “मी शुध्दीवर येत म्हंटलं.

” थोडं लक्ष ठेवाल का? मिसेस गोंदीयाला जातेय. एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे “

तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.

” हो ठेवेन की. त्यात काय विशेष! “

मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली. गाडी निघाली तसा तो उतरुन गेला.

” गोंदियाला पोहचली की फोन कर ” खिडकीबाहेरुन तो तिला म्हणाला.

” हो करते ” असं म्हणून तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं. समोरच्या बर्थवर तिनं किरकिर करणाऱ्या मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली. माझी नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती. खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती. मी माझ्या काॅलेजच्या मुली आठवून पाहील्या. त्यातली एकही तिच्या जवळपासही जाणारी नव्हती. तिचे डोळे, नाक, ओठ, त्वचा, केस फारच सुरेख होते. विशेष म्हणजे तिनं मेकअपही केलेला दिसत नव्हता तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती. माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती. बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे. पण तिची फिगर अतिशय सुरेख होती. मनात विचार आला, स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का? की हिच्यापेक्षा जास्त? नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.

मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो. ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती. मुलाला बाटलीने दुध पाजतांना, त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती. गाणी म्हणत होती. अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.

एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं. तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली. नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती. जांभळ्या साडीत ती अप्रतिम शब्दही कमी पडावा इतकी सुंदर दिसत होती. पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा, भडकपणा नव्हता. घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती. काॅलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं. आणि आजही तिला पाहिल्यावर प्रत्येक पुरुष वेडा होत असेल यात मला शंका वाटत नव्हती. ती जर विवाहित नसती तर कदाचित मीसुद्धा तिच्या प्रेमात पागल झालो असतो. तिचा नवराही तोडीसतोड देखणा होता म्हणून तरी बरं नाहितर इतक्या सुंदर बायकोला सांभाळणं ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही हे मला जाणवत होतं.

मी हातातलं पुस्तक वाचायचं सोडून तिच्याकडेच वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती.

आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो. भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बॅगेतून डबा काढून जेवण केलं. साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा. तिनं बॅगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.

“या जेवायला”

अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम गडबडून गेलो.

” मी आताच जेवलो बघा “

ती सौम्य हसली. मग म्हणाली

” हो पाहिलं मी. हे स्वीट तरी घ्या ” एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली. मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं. खरं म्हणजे मी दिसायला बरा असलो तरी इतक्या सुंदर बाईशी स्वतःहून बोलण्याची माझी हिंमतच झाली नसती.

” नागपूरला रहाता? “

तिनं जेवता जेवता विचारलं.

” नाही. इंटरव्ह्यूला चाललोय “

” कोणत्या कंपनीत? “

मी कंपनीचं नाव सांगितलं.

” इंजीनियर आहात? “

” हो मी बी. ई. केलंय केमिकल मध्ये ” मी जरा अभिमानानेच सागितलं.

” मी सुध्दा इंजीनियरच आहे ” ती म्हणाली. “एम. ई. केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये”

मी वरमलो. माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.

” मग जाॅब करताय कुठे? ” मी विचारलं

” नाही. करायची खुप इच्छा होती. पण एम. ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं. “

” मिस्टर काय करतात तुमचे? ” मी थोडं इर्ष्येने विचारलं.

” ते सुध्दा इंजीनियर आहेत. एम. एस. केलंय अमेरिकेतून आणि आता फॅक्टरीज सांभाळतात. “

” फॅक्टरीज? “

” हो. नाशिकमध्ये आमच्या तीन फॅक्टरीज आहेत आणि पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फॅक्टरीज आहेत. अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात “

बापरे! मी गार झालो. एवढं प्रचंड साम्राज्य असलेल्या धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो. तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी अक्षरशः दरिद्री होतो. माझ्यासारखे अनेक इंजीनियर्स तिच्या फॅक्टरीत पगारी नोकर असतील. तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती. कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.

” तुम्ही एकट्याच जाताय? नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं? “

एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं.

“का? कशासाठी? नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं. गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच. एका रात्रीचा तर प्रश्न होता. तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं. तसं कारनेही जाता आलं असतं पण रेल्वे प्रवास सगळ्यात सेफ. नाही का? “

” तरीपण कुणीतरी.. …. “

“अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले, आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कॅनडाचा पी आर…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ कॅनडाचा पी आर ☆ प्रा. भरत खैरकर 

कॅनडाचं अल्बर्टा राज्य आणि त्यामधील अँडमिंटन शहरापासून साधारण चार तासाच्या अंतरावर असलेलं हायपेरी हे तीन हजार लोक वस्तीचं गाव! त्या ठिकाणी असलेल्या बर्फाळ प्रदेशातील एका  कारखान्यामध्ये लॉजिस्टिकचे काम बघणारा सुधीर आपल्या रूमवर परतला. तेव्हा त्याला कॅनडा सरकारचं एक पत्र आलं होतं. त्याने ते उघडून बघितलं तर तो त्याचा पीआर होता… म्हणजे परमनंट रेसिडेन्शिअल परवाना होता…

सहा वर्षांपूर्वी कोरोनाआधी सुधीरच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते… त्याला कारणही तसेच होते… पुण्यातील एका नामांकित वाहन बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुधीरचे वडील अकाउंटंट होते… रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सर्व पैसा शेअर बाजारात गुंतवला होता… सुधीरच्या आईला किंवा सुधीरला न सांगता! त्यांनी घरातील सोन्यावरही कर्ज काढले होते… आणि कसे कोण जाणे? ह्या सगळ्यामध्ये ते फसले! आणि त्यांचे सगळे पैसे बुडीत झाले… ही गोष्ट बायकोला किंवा मुलाला कशी सांगावी? ह्या विचाराने त्यांना अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला…

त्यानंतर सुधीरच्या आईने तडकाफडकी निर्णय घेऊन सुधीरला कॅनडाला एम एस करण्यासाठी  पाठविले होते… त्या करता तिने उरलेसुरले सगळे पैसे उपयोगात आणले होते… आता  सुधीर मागील पाच वर्षापासून आईपासून दूर होता… कॅनडामध्ये एम एस केल्यानंतर कायमचा नागरिकत्व मिळावं, यासाठी तो प्रयत्न करीत होता… सुरुवातीला टोरांटो सारख्या मोठ्या शहरात असल्याने… त्याचे एक-दोन वर्ष तसे वाया गेले… कारण शहरी भागात पी आर लवकर मिळत नाही असे त्याला नंतर समजले… म्हणून त्याने टोरांटोपासून लांब अल्बर्टा स्टेटमध्ये असलेल्या हाय पेरी या खेडेगावात नोकरी स्वीकारली होती… इथे येऊन त्याला जवळपास तीन वर्ष तरी झाली होती… त्याचा मनमिळावू स्वभाव… सर्वांना मदत करण्याची वृत्ती… कामसूपणा… आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आईची स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द… ह्या गोष्टीमुळे तो रात्रंदिन कष्ट करायचा… त्याच्याच वयाची इतर मुले क्लब, पार्टी, सॅटर्डे नाईट, इत्यादींमध्ये गुंतून राहायची… पण सुधीर मात्र ह्या गोष्टीपासून लांब राहायचा…

हाय पेरीचा भाग संपूर्णतः बर्फाच्छादित असतो… या ठिकाणी फार थंडी असते… अशी ऊनही असते… उणे 20 डिग्री तापमान या ठिकाणी असतं… अशा वातावरणात इथल्या कंपनीमध्ये कारखान्यामध्ये इंटरशिप करणारी… काम करणारी मुले… पुन्हा पार्टटाइम म्हणून इथल्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये वेटर किंवा वेटरेस म्हणून कामे करतात… ह्या मुलांमध्ये बरीचशी चायनीज, फिलिपिन्स, इंडियन, त्यातही पंजाबी मुलामुलींचा भरणा अधिक आहे… आपापल्या देशांमध्ये आई-वडिलांच्या छत्राखाली राहणारी ही मुले इथे मात्र काबाडकष्ट करीत असतात… आणि हा सगळा आटापिटा केवळ पीआर मिळावा म्हणून असतो…

तीन वर्षांपूर्वी टोरांटोवरून जेव्हा अल्बर्टाला यायचे होते… तेव्हा गुगल मॅप नुसार रशिया नंतर कॅनडा हा जगातला दुसऱ्या नंबरचा विस्तारलेला देश आहे हे सुधीरला समजले. तेव्हा तर सुधीरने जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास त्याच्या कारने  केला होता… त्यासाठी त्याला चार दिवस लागले होते… एवढे दिवस तो एकटाच कार चालवत होता… पण टोरंटो आणि हायपेरीच्या वातावरणात खूप फरक असल्याने म्हणजेच हा प्रदेश बर्फाळ असल्याने या ठिकाणी कार चालविणे कठीण असते. तिथल्या हायवेवर नियमानुसार गाडी चालवतांना १२० च्या गतीने चालवावी लागते… पण सुधीरला बर्फावर त्या पद्धतीने चालविण्याची सवय नसल्याने त्याची स्पीड कमी झाली… त्यामुळे पोलिसांनी मागून येऊन त्याला त्याबद्दल विचारणा केली… तेव्हा त्याने खरे कारण सांगितले की, ” मी पहिल्यांदा बर्फावर किंवा बर्फाच्या रस्त्यावर गाडी चालवत आहे आणि मला ती सवय नाही मुळे मी स्पीड कमी केली”… हे ऐकून त्या पोलिसांनी स्वतः ती कार चालवत सुधीरला हायपेरीपर्यंत पोचवले होते.

ग्रामीण भागात काम केल्याने पीआर लवकर मिळतो. असे त्याने ऐकले होते… शिवाय त्या त्या भागातला पीआर  कोटा सुद्धा ठरलेला असल्याने शहरी भागाच्या तुलनेत ह्या ठिकाणी नंबर लागण्याची संधी जास्त असते हे त्याला आता लक्षात आले होते… त्यामुळेच अख्ख्या हायपेरीमध्ये दर महिन्याला एक दोन एक दोन नंबर पीआर साठी लागायचेच… आणि अलीकडेच त्याचा नंबर आलेला होता… ही आनंदाची बातमी आपल्या आईला देण्यासाठी सुधीर अधीर झाला होता… त्याने लगेच पुण्याला भारतात फोन लावला… आईला पीआरची गोड बातमी सांगितली… आणि आता तुझ्यासाठी सुनबाई बघ किंवा मग  इकडचीच  कॅनडाची एखादी बघतो… असं मनात आईसोबत आनंदाने बोलत राहिला…

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याग ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ त्याग… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

माझं नाव विवेक शर्मा आहे. मी ३२ वर्षांचा आहे. जेव्हा लोक मला विचारतात की मी काय करतो, तेव्हा मी सांगतो की मी किराणा दुकान चालवतो. ते हसतात, कारण त्यांना माहीत आहे की मी आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये सुवर्णपदक विजेता आहे, आणि माझ्या कपाटात अजूनही सॅन फ्रान्सिस्कोमधील एका कंपनीचं ऑफर लेटर आहे, ज्यात वर्षाला २, ४०, ००० डॉलर्स पगाराचा उल्लेख आहे. मी ते पत्र कधीच फाडलं नाही, पण त्याचा वापरही कधी केला नाही.

ही गोष्ट १९९८ साली, कानपूरच्या किडवाई नगरमध्ये सुरू होते. दोन खोल्यांचं घर, ज्याच्या वरच्या मजल्यावर पत्र्याचं छप्पर होतं. माझे वडील रेल्वेत कारकून होते आणि माझी आई शिकवणी घ्यायची. मी एकुलता एक मुलगा होतो. माझ्या वडिलांचा पगार ८, ००० रुपये होता. माझ्या आईची शिकवणीचं उत्पन्न २, ००० रुपये होती. आम्ही मध्यमवर्गीयही नव्हतो, तर निम्न मध्यमवर्गीय होतो.

पण माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं: की त्यांच्या मुलाने एक महान माणूस बनावं. त्यांनी मला कधीच डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायला सांगितलं नाही. ते सहजच म्हणाले, “बाळा, तुला हवं तितकं शिक; पैशांची चिंता करू नकोस. “

मी शिकत राहिलो. मला दहावीत ९५% आणि बारावीत ९७% मिळाले. कोचिंगची फी १ लाख होती. माझ्या वडिलांनी त्यांचा पीएफ काढला. माझ्या आईने तिच्या बांगड्या विकल्या. मी कोटाला गेलो. मी दोन वर्षे पंख्याखाली बसून, डासांकडून चावून घेत अभ्यास केला. २०१२ मध्ये निकाल लागला, अखिल भारतीय रँक (AIR) १४७. आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स.

ज्या दिवशी पत्र आले, त्या दिवशी माझ्या वडिलांनी मिठाईचा बॉक्स आणला आणि तो संपूर्ण परिसरात वाटला. माझी आई रडली. ती म्हणाली, “आता माझा मुलगा अमेरिकेला जाईल. “

मी आयआयटीमध्ये यशस्वी झालो. कोडिंग, हॅकेथॉन, इंटर्नशिप. तिसऱ्या वर्षी गुगलमध्ये समर इंटर्न, १ लाख स्टायपेंडसह. माझ्या पहिल्या पगारातून मी वडिलांना फोन आणि आईला वॉशिंग मशीन घेऊन दिली. माझे वडील फोनवर म्हणाले, “बाळा, आता मी निवृत्तीनंतर आराम करेन. “

माझ्या शेवटच्या वर्षात प्लेसमेंट. मी रात्रंदिवस तयारी केली. डिसेंबर २०१५ मध्ये, सॅन फ्रान्सिस्कोस्थित, स्ट्राइपसारख्या एका पेमेंट स्टार्टअप कंपनीने माझी मुलाखत घेतली. चार फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत, सीटीओ (CTO) म्हणाले, “आम्हाला तूच हवा आहेस. ” ऑफर आली: $२४०, ०००, H1B व्हिसा, स्थलांतराची सोय.

मी हॉस्टेलमधील माझ्या मित्रांना हे आनंदातिरेकाने ओरडून सांगितले. त्या रात्री मी माझ्या वडिलांना फोन केला. वडील शांत राहिले, मग म्हणाले, “बाळा, ही खूप मोठी गोष्ट आहे. ” आई म्हणाली, “तुझा पासपोर्ट बनवून घे. “

मी ऑगस्ट २०१६ मध्ये रुजू होण्यासाठी तिकिटांच्या उपलब्धतेचा शोध सुरू केला.

मार्च २०१६ मध्ये मी होळीसाठी घरी आलो. वडील अशक्त दिसत होते. त्यांना खोकला येत होता. मी म्हणालो, “डॉक्टरला दाखवा. ” ते म्हणाले, “काही नाही, फक्त सर्दी आहे.” आईसुद्धा थकलेली होती. मला वाटले हे फक्त म्हातारपणामुळे असेल.

एप्रिलमध्ये मला आईचा फोन आला. वडील चक्कर येऊन पडले होते आणि हॉस्पिटलमध्ये होते. मी तिथे धावत गेलो. डॉक्टर म्हणाले, “फुफ्फुसांचा संसर्ग आणि हृदयाचा त्रास आहे. अँजिओप्लास्टी करावी लागेल. ” खर्च ३ लाख रुपये होता.

माझ्या वडिलांचा वैद्यकीय विमा होता, पण त्यात फक्त अर्धाच खर्च समाविष्ट होत होता. मी माझ्या इंटर्नशिपचे २ लाख रुपये काढले. ऑपरेशन झाले. वडील वाचले.

मी माझ्या अंतिम प्रकल्पासाठी मुंबईला परत गेलो. मे महिन्यात, मी पुन्हा फोन केला. आईला अधूनमधून चक्कर येऊ लागली होती. तिला स्तनाच्या कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्याचे निदान झाले. डॉक्टर म्हणाले, केमो सुरू करावे लागेल, सहा वेळा, प्रत्येक वेळेचा खर्च ८०, ००० रुपये. एकूण ५, ००, ००० रुपये, आणि नंतर शस्त्रक्रिया करावी लागेल.

मला धक्काच बसला. माझे वडील सेवानिवृत्त होते, त्यांना १२, ००० रुपयांचे निवृत्तीवेतन मिळत होते. घरातली सगळी बचत संपली होती. मी मित्रांकडून उसने पैसे घेतले आणि १, ००, ००० रुपये मिळवले. बाकीचे पैसे?

जून महिन्यात, मी घरी बसलो होते, हातात ऑफर लेटर होते. व्हिसाची मुलाखत १५ जुलैला होती. विमानप्रवास १० ऑगस्टला होता. माझ्या आईची पहिली केमो २० जूनला होती.

मी माझ्या वडिलांना म्हणालो, मी कर्ज घेईन. माझे वडील म्हणाले, “कोण फेडणार? मला घर गहाण ठेवावं लागेल. ” मी म्हणालो, “मी ठेवीन. ” माझे वडील म्हणाले, “हे घर तुझ्या आईचं आवडतं आहे. “

त्या रात्री, मी छतावर बसलो होतो. आकाशात एक विमान उडत होतं. मला वाटलं, “हे विमान मला घेऊन जाईल. ” त्याचवेळी, माझी आई खाली वेदनेने विव्हळत होती.

मी माझ्या मार्गदर्शकाला ईमेल केला, “मी रुजू होणं सहा महिन्यांसाठी पुढे ढकलू शकतो का? ” उत्तर आलं, “सॉरी विवेक, आम्हाला आत्ता लोकांची गरज आहे. हवंतर तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज करू शकता. “

मी पुन्हा ईमेल केला, “आताच येण्याचा प्रयत्न करतो. “

१४ जुलैची रात्र. उद्या व्हिसाची मुलाखत. परवा आईची दुसरी केमो. वडील औषध आणायला गेले होते. जेव्हा ते परत आले, तेव्हा औषधाची चिठ्ठी खाली पडली आणि त्यांना ती उचलायला वाकता येत नव्हतं. मी ती उचलली. तेव्हा मला जाणवलं, जर मी निघून गेलो, तर हे दोघे कसे जगतील? बाबा सेवानिवृत्त आणि आजारी आहेत. आईची केमोथेरपी चालू आहे. भावंडं नाहीत. मदतीला कोणी नातेवाईक नाहीत. तिला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन जाईल, तिची औषधं कोण आणेल, रात्री तिला पाणी कोण देईल?

मी सकाळी व्हिसाची मुलाखत रद्द केली. कंपनीला ईमेल केला, “ऑफरबद्दल धन्यवाद. कौटुंबिक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे, मी रुजू होऊ शकत नाही. “

मित्रांनी फोन केला, “तू वेडा झाला आहेस का? तू १ कोटी ६० लाख रुपयांची नोकरी सोडत आहेस. ” 

मी म्हणालो, “हो. “

मी आईला हे सर्व सांगितलं नाही. मी बाबांना सांगितलं. ते गप्प राहिले, मग म्हणाले, “बाळा, तुझं करिअर. ” मी म्हणालो, “मी माझं करिअर पुन्हा उभं करेल, पण जर आत्ता गेलो तर तुम्ही पुन्हा मला दिसणार नाहीत. “

मला कानपूरमध्ये नोकरी मिळाली. एका स्थानिक सॉफ्टवेअर कंपनीत, पगार ३५, ०००. मी रुजू झालो. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ ऑफिस, संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये. केमोथेरपी दरम्यान आईचे केस गळाले आणि ती रडली. मी तिच्यासाठी एक विग विकत घेतला. मी बाबांना त्यांची औषधं वेळेवर दिली. २०१६ ते २०१८, अशी दोन वर्षे निघून गेली. आईची शस्त्रक्रिया झाली आणि ती बरी झाली. कॅन्सर नियंत्रणात आला. बाबांची तब्येत स्थिर झाली. पण पैसे संपले. माझ्यावर ७ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

२०१८ मध्ये कंपनी बंद झाली. मी बेरोजगार झालो. मी इतर ठिकाणी मुलाखती दिल्या आणि बंगळूरुहून १८ लाख रुपयांची नोकरीची ऑफर आली. पण मी नकार दिला. माझे वडील म्हणाले, “जा, बाळा. ” मी म्हणालो, “मी आता जाऊ शकत नाही. माझ्या आईला दर तीन महिन्यांनी तपासणीची गरज असते, तुम्हाला मधुमेह आहे. तुमची काळजी कोण घेणार? “

माझे मित्र म्हणाले, “तू तुझं करिअर खराब करत आहेस. ” मी म्हणालो, “हे करिअर माझं आहे आणि आई-वडीलही माझेच आहेत. “

मी माझ्या घराखाली, वडिलांच्या नावाने ‘शर्मा जनरल स्टोअर’ नावाचं एक छोटं दुकान उघडलं. मी माझा कॉम्प्युटर तिथेच ठेवला आणि डाळी व तांदूळ विकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मला लाज वाटली. मी एक आयआयटीयन होतो. मग एक काकू आल्या आणि म्हणाल्या, “बाळा, तुझ्या आईने मला शिकवलं आहे. तू दुकान उघड, आम्ही इथूनच खरेदी करू. “

हळूहळू दुकान भरभराटीला आलं. मी सकाळी ६ वाजता घाऊक बाजारात सामान आणायला जायचो, दिवसा खरेदी करायचो, रात्री फ्रीलान्स कोडिंग करायचो आणि ५०० डॉलर्समध्ये एक वेबसाइट बनवली.

२०१९ मध्ये, माझी आई पूर्णपणे बरी झाली होती. डॉक्टर म्हणाले, “सर्व काही ठीक आहे. ” त्या दिवशी, मी दुकान बंद करून मंदिरात गेलो. मी प्रसाद अर्पण केला. जेव्हा मी घरी आलो, तेव्हा माझे वडील म्हणाले, “बाळा, तू आमच्यासाठी सर्व काही सोडून दिलंस. ” मी म्हणालो, “मी सोडलेलं नाही, मी फक्त बदललं आहे. “

२०२० चा लॉकडाऊन. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली. लोकांना किराणा सामानाची गरज होती. मी घरपोच डिलिव्हरी सुरू केली. मी सायकलवरून जाऊ लागलो. बाबा हिशोब सांभाळायचे. आई पॅकिंग करायची. त्या लॉकडाऊनमध्ये आम्ही २ लाख रुपये कमावले. मी कर्जाची अर्धी परतफेड केली.

२०२१ मध्ये, मी माझ्या दुकानाच्या बाजूलाच मुलांना कोडिंग शिकवण्यासाठी एक छोटा कॉम्प्युटर क्लास सुरू केला. त्याची फी महिन्याला ५०० रुपये होती. २० विद्यार्थी आले. मला पुन्हा माझं आवडतं कोडिंग करायला मजा येऊ लागली.

२०२२ मध्ये, अंश नावाच्या ए विद्यार्थ्याने, जो माझ्याकडे शिकला होता, राष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकले. बातमी आली, “कानपूरच्या एका आयआयटीयन किराणा दुकानदाराकडून शिकून  विजय मिळवला. ” तो लेख व्हायरल झाला.

त्याच आठवड्यात, मला स्ट्राइपच्या त्याच सीटीओकडून एक ईमेल आला. त्यांनी लिहिले होते, “विवेक, मी तुझी स्टोरी पाहिली. आम्ही भारतात ऑफिस उघडत आहोत. तुला रिमोट पद्धतीने, पार्ट-टाइम, एका शैक्षणिक उपक्रमाचे नेतृत्व करायला आवडेल का? “

मी हो म्हटले. आता मी सकाळी दुकानात, दुपारी क्लासमध्ये आणि संध्याकाळी यूएस टीमसोबत काम करतो. पगार डॉलर्समध्ये नाही, पण तो प्रचंड आहे.

गेल्या महिन्यात, माझ्या वडिलांनी वयाची ६८ वर्षे पूर्ण केली. मी एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. तेच मित्र आले होते, जे म्हणायचे की वडिलांनी माझे करिअर खराब केले. माझे वडील माईक घेऊन म्हणाले, “माझा मुलगा अमेरिकेला गेला नाही, पण तो माझ्यासोबत राहिला. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्याने माझा हात धरला होता. जेव्हा त्याच्या आईचे केस परत आले, तेव्हा त्याने तिच्या केसांच्या वेण्या घातल्या. बाळा, बरेच लोक करिअर घडवतात, पण त्यातले काही मोजकेच यशस्वी होतात.”

माझी आई हळू आवाजात म्हणाली, “मला ते ऑफर लेटर अजूनही आठवतंय. तू ते कपाटात का ठेवलंस? “

मी म्हटलं, “जेणेकरून मी काय मागे सोडलंय याची मला आठवण राहील. ” 

ती म्हणाली, “तू सोडलं नाहीस, तू निवड केलीस. “

आज मी दुकानात बसलो आहे. माझ्यासमोर शाळेची मुलं कँडी विकत घेत आहेत. माझ्या लॅपटॉपवर कोडिंग चालू आहे. बाबा माझ्या शेजारी वर्तमानपत्र वाचत आहेत आणि आई काउंटरवर बसली आहे.

कधीकधी रात्री, मी ते ऑफर लेटर बाहेर काढतो. २४०, ००० डॉलर्स. मग मला आईचं हसणं ऐकू येतं आणि बाबांचा खोकला थांबलेला असतो. समजलं. आणि मी ते पत्र परत ठेवून देतो.

लोक विचारतात, मला त्याचा पश्चात्ताप होतो का? मी खरं सांगतो, पूर्वी व्हायचा. जेव्हा मित्र बंगळूरुमधून, अमेरिकेच्या सहलींचे फोटो पोस्ट करायचे. आता तसं होत नाही. कारण मी माझ्या करिअरचा बळी दिला नाही, उलट मी त्याला एक नवीन ओळख दिली. माझं करिअर आता फक्त कोडिंग नाही, तर ती एक काळजी आहे.

मी माझ्या आई-वडिलांसाठी अमेरिका सोडली, पण त्यांच्यासोबत आयुष्य जगलो. मला रोज सकाळी माझ्या वडिलांना चहा द्यायला आणि माझ्या आईचे पाय दाबायला मिळतात. हे काही २. ४ कोटी रुपयांनी मिळत नाही.

जर मला पुन्हा संधी मिळाली, तर मी तेच करेन. माझा व्हिसा रद्द करेन, नोकरी सोडेन आणि एक दुकान उघडेन. कारण काही त्याग हे नुकसान नसतात; ती प्रेमातील गुंतवणूक असते.

आणि आज, जेव्हा एखादं मूल विचारतं, “दादा, आयआयटी पूर्ण केल्यावर दुकान का उघडलं? ” तेव्हा मी हसून म्हणतो, “कारण माझ्या आई-वडिलांची माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि मी त्यांचा पूर्णवेळ सीईओ आहे. ” 

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “Just Good Friends” (अनुवादित) – इंग्रजी लेखक : जेफ्री आर्चर ☆ स्वैर अनुवाद – डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ “Just Good Friends” (अनुवादित) – इंग्रजी लेखक : जेफ्री आर्चर ☆ स्वैर अनुवाद – डॉ मकरंद पिंपुटकर 

इंग्लंडमधील माझी व रॉजरची कहाणी…

किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं तर बेडरूमच्या पडद्यामागे साधारण उजाडत होतं आणि शेजारी उघडाबंब रॉजर अजून घोरत होता. माझ्यासारखा व्यायाम केला तर त्याची ढेरी कमी होईल हे त्याला मी सांगून सांगून थकले होते पण व्यायामापेक्षा बीअरच त्याला जास्त पसंत होती, मग पोट वाढणार नाही तर काय होणार?

अर्थात या बीअरमुळेच माझी व त्याची भेट झाली होती हे मला विसरून चालणार नाही. मी ज्या बारमध्ये असे त्या “जिन and टॉनिक” बारमध्ये त्याचं नेहमी येणं असे. दिसायला चार चौघांसारखाच पण कमालीचा साधा व सरळ.

काऊंटरमागच्या माझ्या ठरलेल्या जागेवरून मी त्याच्याकडे एकटक बघत रहात असे. माझा जीव जडला होता त्याच्यावर – एकतर्फीच हं. त्याने कधी मान वर करून माझ्याकडे पाहिलेही नाही. पण मी आशा सोडली नाही कधी.

मग त्याच्या आयुष्यात नटमोगरी fake फर कोट घालणारी एलिझाबेथ आली. आमच्या बारमधलं एलिझाबेथबद्दलचं सगळ्यांचंच मत चारचौघांत सांगण्यासारखं; छापण्यासारखं नव्हतं. या प्रकरणाचा शेवट दु:खदच होणार याबद्दलही सगळ्यांचं एकमत होतं.

मला दहा वेळा वाटलं की तिच्याबद्दल सगळं सगळं रॉजरला सांगावं पण मला तिचा मत्सर वाटतो म्हणून मी चहाड्या करतीये असे तो म्हणणार याची मला खात्री होती आणि माझा धीर झाला नाही हेच खरं.

मोजून २० दिवसांत हे लफडं संपलं. मला exact माहितीये कारण प्रत्येक दिवस मी मोजत होते. आमच्याच बारमध्ये त्यांचं वाजलं. ती त्याला फडाफडा बोलली आणि ताडताड निघून गेली. या वेळी मात्र मी मागे हटली नाही. जनाची मनाची सगळी लाज कोळून प्यायले आणि सरळ जाऊन त्याच्या टेबलवर शेजारच्या खुर्चीतच जाऊन बसले.

तो काही बोलला नाही पण मला उठून जा असंही म्हणाला नाही. पण मग जेव्हा मी त्याच्याकडे बघून माझ्या पापण्या जेव्हा दिलखेचकपणे उघडमिट उघडमिट केल्या तेव्हा मात्र त्याच्या ओठावर एक हलके स्मित झळकले. माझ्या गालावर त्याने हलकेच हात फिरवला. माझ्यातर काळजाचा ठोकाच चुकला. आंखोही आंखोमें इशारा हो गया – आणि मी सरळ त्याच्याबरोबरच बारमधून निघाले आणि त्याच्या घरीच move in झाले.

सुरुवातीला काही दिवस तो एलिझाबेथच्याच आठवणीत होता – मला जाणवत होतं. ती सुंदर असेलही पण तिचा फर कोट duplicate होता. मी श्रीमंत नसेनही पण माझ्या आईने माझ्यासाठी दिलेला अस्सल golden fur coat होता. माझं त्याच्या घरी असणं त्याला आता अंगवळणी पडू लागलं and soon even the memories of Elizabeth were history.

दर सकाळी तो माझ्यासाठी दूध आणि त्याचा बेड टी घेऊन यायचा आणि आमची सकाळ सुरू व्हायची. मला फारसं धड जेवण बनवता यायचं नाही पण रॉजरनेही तसा कधी आग्रह धरला नाही. मला मासे आवडतात म्हणून तोही आता मासे खाऊ लागला होता. आठवड्यातून एक दोनदा तरी आम्ही “जिन and टॉनिक” मध्ये जायचो. मला रॉजरबरोबर पाहून तिथल्या barmaids च्या डोळ्यातील असूया मला स्पष्ट दिसायची. “एलिझाबेथ गेली आणि हिने तिची जागा पटकावली. काय पाहिलं यानं तिच्यात कोण जाणे! ” मुद्दामहून मला ऐकू येईल अशा comments मारल्या जायच्या. मीही तितकीच रॉजरला बिलगायचे आणि तोही सगळ्यांदेखत मला जवळ घ्यायचा – कुरवाळायचा. दुनिया जले तो जले!

रॉजरने कधी मला माझ्या भूतकाळाविषयी विचारलं नाही आणि मीही स्वत:हून काही सांगितलं नाही. तो त्याच्या रुटीननुसार ऑफिसला जायचा आणि मग माझंच घरात साम्राज्य असे. तो निघेपर्यंत मी जरी पलंगावर लोळत पडले तरी त्याची तक्रार नसे.

आरशासमोर बसून आपली छबी न्याहाळत बसणे हा माझा आवडता timepass होता त्यात तासन तास कसे जायचे हेही मला कळायचे नाही. त्याची यायची वेळ होइपर्यंत मी छान तयार होऊन दारातच त्याच्या स्वागताला तयार असायचे. त्याच्याभोवती रुंजी घालायचे, आळोखे पिळोखे देत लाडिकपणे त्याच्या मांडीवर बसायचे – त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर – ” मी ” असं अगदी बेधडक सांगावसं वाटायचं. सगळं कसं अगदी छान चाललं होतं.

नाही म्हणायला गेले काही दिवस शेजारच्या बंगल्याच्या छतावरून एक काळुंद्रा बोका माझ्याकडे सारखा रोखून बघतोय असं मला जाणवतंय. रॉजर आधीच्या माझ्या बॉयफ्रेंडबद्दल तर त्याला माहित नसेल ना? बिन लग्नाची माझी pregnancy आणि माझ्या जुळ्या मुली – यांच्याबद्दल तर त्याला कळलं नसेल नाही ना? मला रॉजरला गमवायचं नव्हतं.

आज तर रॉजर कामावरून येतानाच त्या काळुंद्र्याने रॉजरला गाठलं, त्याच्या पायात पायात करून माझ्या चहाड्या करायचा प्रयत्न केला पण रॉजरने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. मी जशी आहे तशी त्याला आवडत होते, त्याला माझ्या भूतकाळाविषयी interest नव्हता. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू.

तो दार उघडून आत येताच मी त्याला सामोरी गेले. नेहमीप्रमाणे त्याने माझ्यासाठी बशीत दूध ओतले. मी त्याच्याकडे रोखून पाहिले, त्याच्याबरोबर टेबलावर पहिल्यांदा बसले तेव्हासारखी डोळ्यांची उघडमिट उघडमिट केली, जीभेने लपालपा दूध पिऊ लागले, माझी सोनेरी शेपुट फेंदारून मी – त्याची लाडकी मनीमाऊ – त्याच्याकडे एकटक पाहत होते.

आम्ही मांजरी फक्त रागवलो कीच शेपुट फेंदारतो असा एक सर्वत्र मोठा गैरसमज आहे! We are friends – Just Good Friends!

मूल इंग्लिश लेखक : जेफ्री आर्चर 

स्वैर अनुवाद : डॉ. मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares