मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुहास… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ सुहास… ☆ श्री सुनील शिरवाडकर

“अगं माझा गॉगल सापडत नाहीये.. बघितला का कुठे”

सुहासची नेहमीची चिडचिड चालू झाली. त्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी हव्या असायच्या.. कपडे, शुज, गॉगल.. आणि ते तसं असायचं ही.. पण मग एखादे वेळी त्याच्याच हातुन कुठे काही ठेवलं जायचं.. मग ते सापडायचं नाही.. आणि मग ही चिडचिड.

दिपानं टिव्हीवर ठेवलेला ब्राऊन कलरचा बॉक्स त्याच्या हातात ठेवला.. सुहासनं तो उघडला.. आतुन हिरव्यागार काचेचा रे बॉनचा गॉगल डोळ्यांवर ठेवला.. आरशासमोर उभा राहिला.

मस्तच.. स्वतः वरच तो खुश झाला.. बाकी काही असो.. त्यांची पर्सनलीटी.. टापटीपपण मात्र वाखाणण्याजोगा होता.. लिवाईस जीन्स.. पीटर इंग्लंडचा शर्ट.. ब्रॅण्डेड शुज.. डोळ्यांवर रे बॉनचा गॉगल.. कपाटातून त्याने पार्क ॲव्हेन्युचा परफ्यूम काढला.. हात वर करुन.. इकडे तिकडे फुसफुस केला.. आणि बाहेर पडला.. अशा थाटात की, जणु काही ऑफिसलाच निघाला..

सुहास नेहमीच रिक्षाने फिरायचा.. आजही तो रोडवर आला.. रिक्षा दिसतीये का ते पहात होता.. एकमेव रिक्षा स्टँडवर उभी होती..

सुहासला रिक्षाच्या, ट्रकच्या मागे लिहिलेली वाक्ये वाचण्याचा छंद होता.. आज त्याने जी रिक्षा केली.. त्या रिक्षाच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं..

समय से पहेले भाग्य से अधिक 

किसीको कुछ मिलता नहीं

क्या बात है.. सुहास मनही मन खुश झाला.. खरंच.. आज अपना समय आनेवाला है.. आज आपलं भाग्य उजाडणार आहे हे नक्की.. तो थेट रिक्षात जाऊन बसला.. किती पैसे घेणार वगैरे काही विचारलं नाही..

पुढच्या चौकात रिक्षा एका मेडिकल स्टोअर समोर त्यानं सोडून दिली.. हे त्याच्या मित्राचं दुकान होतं.. काऊंटरवरची फळी उचलुन तो आत गेला..

“गजा.. फोनपे आहे ना तुझ्याकडे?लग्गेच पंचवीस हजार ट्रान्स्फर कर बरं”

गजाला हे सवयीचं झालं होतं.. प्रत्येक वेळी सुहास येणार.. काही पैसे मागणार.. तो थोडे आढेवेढे घेणार.. हजार मागितले की पाचशे देणार.. पण आज एकदम पंचवीस हजार?

“अरे यार.. मागचे किती बाकी आहे माहीतीय का?”

“अरे यार गजा.. तु भी क्या.. सारखं पैसा पैसा करत असतोस.. आत्ता संध्याकाळी तुला पन्नास हजार देऊन टाकतो.. “

“नेहमीच तु असं काही काही सांगतोस.. आणि गेला की तिकडेच जातो. “

हो.. ना करता करता गजानं पैसे दिले.. थॅंक्यु थॅंक्यु करत सुहास बाहेर पडला.. दुसरी रिक्षा केली.. आणि एका बकाल वस्तीच्या कोपऱ्यावर सोडून दिली.. तेथे त्याचा मित्र शाम्या त्याची वाटच पहात होता.

सुहास आज पहिल्यांदाच मटक्याच्या अड्ड्यावर जाणार होता.. नेहमी तो‌ लॉटरी खेळायचा.. अलीकडे ऑनलाईन गेम्स मध्ये पण पैसे घालवायचा..

हो.. त्याला कधी जिंकणं माहीत नव्हतंच.. चार वेळा पैसे घालवायचा.. आणि एखादं वेळी जिंकायचा.. सुहासला दुसरा कामधंदा नव्हताच.. बायको बॅंकेत नोकरी करायची.. घर चालवायची.. आणि हा तिच्या जीवावर लॉटरी खेळायचा.. सगळे सांगून थकले.. पण त्याच्यावर परीणाम ढिम्म.

गयावया करून बायको कडून पैसे घ्यायचे.. आणि जुगारात उडवायचे हेच त्याचं आयुष्य झालं होतं.. कधीतरी मग एखादे वेळी लॉटरी लागायची.. मग.. पोरावर ते पैसे खर्च करायचे.. त्याला भारीतले कपडे, शुज आणायचे.. ते लहान मुल त्याला भुलायचं.. त्यामुळे झालं होतं काय.. पोराचं आणि बापाचं चांगलं पटायचं..

अशातच एकदा त्याची ओळख शाम्याशी झाली.. तोही जुगारीच.. त्यानं सांगितलं.. हे लॉटरी बिटरी सोड रे.. माझ्याबरोबर एकदा अड्ड्यावर चल..

कुठला अड्डा?तर मटक्याचा अड्डा. सुहास तिथं कधी गेला नव्हता.. आज शाम्याबरोबर पहिल्यांदा जाणार होता.. त्याला खुप उत्सुकता होती.. आजवर फक्त ऐकून होता तो मटक्याबद्दल..

“कुठे जायचं आपल्याला नक्की?”

“ते काय.. त्या गल्लीत”

“अरे तिकडे तर कचरा कुंडी दिसतेय”

“तु चल फक्त माझ्या मागुन. “

नाक मुठीत धरुनच सुहास शाम्याच्या मागुन निघाला.. थोड्या अंतरावर एक पडकं घर दिसलं.. दरवाज्याला एक कळकटलेला पडदा लावला होता.. तो बाजूला करून दोघे आत शिरले.. आत गेल्यावर एक वेगळीच दुनिया त्याला तिथे दिसली.. एका भिंतीवर फळा टांगला होता.. त्यावर खडुने खुप आकडेमोड केली होती.. मुंबई.. कल्याण असंही काही लिहीलं होतं.. चार पाच जण उभ्या उभ्या हातात असलेल्या छोट्या बुकमध्ये काही लिहीत होते.

“हे बघ.. ओपनचं बुकिंग सुरु आहे.. किती लावायचे? आणि कुठली फिगर?”

“मला त्यातलं काही माहीत नाही.. पंचवीस हजार रुपये आहे माझ्याकडे.. कसे लावायचे.. कुठे लावायचे तुच सांग मला “

मग अर्धे अर्धे असे दोन ठिकाणी लावायचे ठरवले. तो जो बुकी होता, शाम्याने त्याच्या जवळ पैसे दिले.. पट्टा लाव.. जोड लाव.. असं त्या बुकीला शाम्या काहीतरी सांगत होता.

बसच्या तिकीटापेक्षाही लहान पातळ गुलाबी कागदावर त्या बुकीनं काहीतरी लिहीलं.. दोन चिठ्ठ्या बनवल्या.. त्या सुहास कडे देऊन त्यानं सांगितलं..

“दुपारी चार वाजता आकडा फुटेल.. आपण येऊ त्यावेळी.. या चिठ्ठ्या मात्र जपुन ठेव.. माझा अंदाज आहेच आज अठ्ठा येणार आहे.. वळण घ्यायला येऊ आपण चार वाजता. “

“वळण?ते काय असतं?”

“अरे वळण म्हणजे पेमेंट.. कुठला तरी एक आकडा नक्की लागणारच आहे.. लिहून ठेव. “

सुहासनं मोबाईलचं कव्हर काढलं.. आत ती चिठ्ठी ठेवली.. पुन्हा कव्हर घातलं.. पडदा बाजुला करुन त्या अड्ड्यावरुन बाहेर पडला.. रिक्षा केली ती थेट घरापर्यंत.. घरी येऊन जेवण करून त्याने मस्तपैकी ताणून दिली.

चार वाजता उठून.. मस्त आवरुन अड्ड्यावर हजर.. आज त्याला खुप हुरहुर लागली होती.. शाम्या म्हणतो तसा आकडा लागला तर लाखांमध्ये पैसे मिळणार होते.. पुन्हा एकदा नाक मुठीत धरून तो अड्ड्यावर आला.. शाम्या तिथं होताच.

“काय रे.. काय झालं.. आला का आकडा आपण लावलेला?”

“थांब जरा वेळ.. पंधरा वीस मिनिटात येईलच “

पंधरा मिनिटांनी जरा हलचल झाली.. एक जण स्टुलवर चढला.. हातातल्या खडुने त्यानं टांगलेल्या फळ्यावर काही आकडे लिहिले.. ते आकडे पाहुन अनेक जण तिथुन निराश होऊन निघून गेले..

“चल रे.. “

“का? काय झालं.. आपला आकडा आला?”

“नाही.. तु इथुन चल.. आपण उद्या परत येऊ.. उद्या नक्की येईल.. तु पैसे घेऊन ये”

सुहासच्या लक्षात आलं.. आपले पैसे गेले.. खुपच नर्व्हसनेस आला त्याला.. खरंतर त्याला हे असं हरण्याची सवय होतीच.. पण आज कसं? मोठी रक्कम गेली होती ना त्याची!

हताश होऊन तो बाहेर रस्त्यावर आला.. रिक्षा शोधु लागला.. एक रिक्षा त्याला मिळालीही.. आत जाऊन तो बसला.. घराचा पत्ता सांगितला..

आज मात्र त्या रिक्षाच्या मागे लिहीलेलं वाक्य वाचायचं तो विसरला होता.. त्या रिक्षावर लिहीलं होतं..

‘समय से पहेले भाग्य से अधिक..

मेहनत करनेसेही सबकुछ मिलता है

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक पिल्लू, बारा अंडी… लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ एक पिल्लू, बारा अंडी… लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका पिल्लासमोर त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टन मध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या सगळ्यांची नोंद घेतली गेली – अगदी क्लिनिकल डिटॅचमेंटने ! उरलेल्या अकरा अंड्याचं स्टॅटिस्टिकस होण्याच्या आत त्या प्रयोगात यशस्वी रित्या व्यत्यय आणण्यात आला आणि पिल्लू वाटी-चमच्यातून निर्माण होणाऱ्या संगीताचा अभ्यास करायला लागलं.

पिल्लाला माणसाच्या जमातीत जन्मल्यामुळे एक नांव ठेवण्यात आलं आणि त्याच्या गोंडस शरीरावर तऱ्हेतऱ्हेचे कपडे घालण्यात आले. स्वतःच्या नावातील ‘र’ म्हणता येण्याआधी पिल्लाला आपल्या अंगातले कपडे काढता यायला लागले. आणि खेळण्यांच्या पसाऱ्यात बसलेलं आणि स्वतःच्या कपड्यांनी जमीन पुसणारं बाळ बघून हसू, वैताग, लोभ अश्या मिश्र भावनांचे तरंग घरात उमटू लागले. घराच्या भिंतींमध्ये एक कोवळीक आली-वेलींची टेन्ड्रिल्स भिंतीचा आधार शोधत वरवर झेपावायला लागलीत की भिंती अश्याच कोवळ्या होत असतील का ?

घरात वाटी-चमच्याचं तर बागेत लॉरेलच्या खुळखुळणाऱ्या शेंगाचं संगीत ! राजानं हत्तीवर (!) बसून प्रजेची खबरबात घ्यावी तशी आजीच्या कडेवर बसून झाडांशी मूक संवाद करणं, हे एक आवडतं काम-आर्याचं आणि आजीचंही ! फुल ही एक स्वतंत्र, संपूर्ण चीज आहे हे कळायला वेळ लागला. पानं आणि पाकळ्या यात जास्त रस. कदाचित पाकळ्या, पानं, आकाशाकडे झेपावणारं बाकीचं झाड आणि त्यानंतर सुरु होणारं आकाश यातील भेद करणाऱ्या रेखा तिला दिसत नसाव्यात. त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रकलेत दिसायचं. रुक्ष नजरेच्या वडीलधाऱ्यांना ती गिचमिड दिसायची. हळूहळू ती रेषा आणि आकार काढायला लागली. ह्या रेषा बेदरकारपणे, प्रसिद्ध कलाकाराच्या आत्मविश्वासाने लेदर फर्निचरवर, भिंतींवर उमटायला लागल्या. आपल्या आईकडून भिंती रंगवण्याचं जीन तिनं मिळवलं असणार याची खात्री असल्यामुळे वॉशेबल क्रेयॉन्स आधीच आणून ठेवले होते. या आणि अश्या, फक्त आजी लोकात वावरणाऱ्या जमातीला प्राप्त होणाऱ्या शहाणपणामुळे एग कार्टनमधली अनेक अंडी वाचवली गेली.

ही प्रक्रिया आयुष्यात परत परत होत राहते का ? कुठल्याही नवीन जागी, नवीन देशात-प्रदेशात गेल्यावर प्रथम सगळी गिचमीडच असते आणि नंतर त्यातून आकार उमटायला लागतात. या गिचमिडीचा अर्थ लावायचा असेल तर त्याचा तटस्थपणे अभ्यास करावा लागतो; असा प्रोग्रॅम या पिल्लाच्या हार्ड ड्राइव्हवर आधीच टाकलेला आहे, अशी कौतुक-आश्चर्य मिश्रित जाणीव अनेकदा झाली.

(पण माझ्या हार्ड ड्राइव्हवर असलेल्या या प्रोग्रॅमचं काय झालं? काळाच्या वाळवीनं ग्रासला की काय?)

तटस्थपणा हा अभ्यासू नजरेचा भाग झाला; सतत काहीतरी नवीन शोधण्यासाठी धडपडणाऱ्या शरीराचा नव्हे, याची प्रचिती दिवसभरात अनेकदा यायला लागली. माणूस दोन पायांवर चालू लागेपर्यंत ज्या टप्प्यांमधून जातो त्या टप्प्यांमधून जाताना आर्याची आडनावं बदलत गेली – उदाहरणार्थ, झोपेश्वर, कडपालटे, पालथे, रांगणेकर, बैस, (उभं राहायला लागल्यावर) राजकारणे, आणि धावायला लागल्यावर -चोरे ! या सर्व स्थितीतून जाताना जमीन, पाय, डोळे, यांच्यात बेबनाव झाल्यामुळे डोक्याची आणि गुडघ्याची नारळं आपटून जे संगीत निर्माण झालं, ते ध्वनिमुद्रित करून संकलित केलं असतं तर वादनाचा एक नवीन प्रकार निर्माण झाला असता, यात शंका नाही. पडणे-दुखापती ह्यांचा मनावर व्रण उमटू नये अशी काही तरी पूर्वनिर्धारित योजना असावी; त्यांचे शिकवणारे, शहाणपण देणारे अनुभव झाले. त्यामुळे चालणं, धावणं थांबलं नाही.

ही वृत्ती जन्मभर माणसात टिकती तर कित्येक मनःस्वास्थ्याच्या समस्या उपजल्याच नसत्या.

मनात एक सतत वाहत असणारा, नवीन अनुभवासाठी पाटी सतत कोरी ठेवणारा चैतन्याचा धबधबा

असावा का? हा प्रवाह थांबला की अनुभवांचा ताजेपणा जातो, साचलेपण येऊन सर्व इन्द्रियातून जमा होणाऱ्या माहितीची पुटं जमत राहतात -शेवाळासारखी!

माणसाचं पिल्लू धडपड करत दोन पायावर चालायला लागलं की लगेच त्याच्या गतीत वाऱ्याची गती मिसळावी म्हणून घरातील लहान मुलाला त्याची पहिली सायकल घेऊन देण्यात येते; ही घटना सोन्याचा दागिना घेऊन देण्याइतकीच महत्त्वाची ! ही सायकल सगळं जग पादाक्रांत (चाकाक्रांत!) करू शकते. ही जादू सायकल चालवणाऱ्या मध्येच असते. अंगणाच्या एका टोकाला फीनिक्सच्या आजीचं ( खरं )घर असतं आणि दुसऱ्या टोकाला अहमदाबादच्या(हेमडाबॅडच्या) आजीचं ! मध्येच कुठेतरी डेकेयर (ढे खेय्य), सुपरमार्केट

(छुप्प मारक्के) ही ठिकाणं लागतात. रस्त्यावर दिसणाऱ्या (खरोखरीच्या) झाडांची फुलं तोडून (बुरुन) सायकलच्या बास्केटमध्ये टाकली जातात-आजी, फुयी (गुजरातीत आत्या) इत्यादी प्रेमाच्या लोकांना देण्यासाठी!

रस्त्यात पोलीस थांबवतो-वायुवेगानं सायकल चालवल्याबद्दल ! ( अमेरिकेत रेसिडेन्शिअल एरियातली स्पीड-लिमिट फॉल मध्ये (शरद ऋतूत) गळणाऱ्या पानांच्या गती इतकीच असावी असा अलिखित नियम आहे. ) डझनभर अंड्यांपैकी फक्त एक अंडं आतापर्यन्त फोडून बघितलेलं हे माणसाचं पिल्लू सहर्षपणे पोलिसाकडे पाहातं. बागेतील सर्व कळ्यांमध्ये असणारा निरागसपणा आणि वाऱ्याबरोबर डुलणाऱ्या फांद्यांमधला खेळकरपणा,

नियम तोडणाऱ्याच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत असतो. ते पाहून पोलीस क्षणभर आपलं काम विसरतो. सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून भानावर येत पोलीस म्हणतो, “मिस त्रिवेदी, तुम्ही खूप वेगानी सायकल चालवता आहात, म्हणून तुम्हाला पन्नास डॉलर्स पेनल्टी. ” गुन्हेगार गोड हसत (आपल्या आईसारखं)

“आय सी (छी)”असं म्हणतो आणि नसलेल्या खिशातले पैसे काढून पोलिसाला देतो. पोलीस पैसे मोजायला लागतो. गुन्हेगार म्हणतो, ” डू यू वॉण्ट मोअर ?” पोलीस अजून पैसेच मोजत असतो. तो नैतिकेतचा आदर्श असल्यामुळे मानेनं नकार दर्शवत “यू कॅन गो नाऊ” असं म्हणतो.

गुन्हेगार थोडा पुढे जातो आणि जाहीर करतो की आता तो टीचर आहे. क्षणात पोलिसाचं गुन्हेगारात रूपांतर होतं कारण त्यानी क्रेयॉन्स शेयर केलेले नसतात. त्याला “टाईम आउट” असं म्हणून कठोरपणे छोट्या छोट्या हातांनी एका कोपऱ्यात ढकललं जातं. पण टाईम आउट मध्ये असलेली व्यक्ती सकाळच्या चहाबरोबर घेतलेला नैतिकतेचा डोस विसरून थकलेल्या आणि चिडचिड करणाऱ्या टिचरला अॅपलची लाच देते आणि घरात नेते. थोडंसं अॅपल पोटात गेल्यावर टीचर हुंहू किंवा अहं किंवा हंहं असं म्हणताना मान कुठल्या दिशेने हलवली की त्याचा काय अर्थ होतो याचं गहन असं ज्ञान देते. तोपर्यंत तिच्या आईवडिलांची चाहूल तिला लागते, डोअर बेल वाजते, घरातला कुत्रा पोटतिडकीनं भुंकत दाराच्या दिशेनं पळायला लागतो. आर्या त्याच्यामागे वारा कानात गेल्यागत धावायला लागते आणि “आजही उरलेली अकरा अंडी कशी वाचवली” हा विचार मनात येऊन मी खुसूखुसू हसत त्यांच्यामागे दार उघडायला जाते. तेव्हा अंगणातली सायकल आणि वारा, झाडं आणि वेली, कळ्या आणि फुलं सगळेजण तिच्यावर मायेचे पाश टाकून “खेळायला परत ये, परत ये” असं गुणगुणत असतात.

…. ते सगळ्यांना ऐकू येतं.

लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे

मेसा, ॲरिझोना

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती रक्त चंदनाची पहाट… ☆ श्री संदीप काळे ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

?जीवनरंग ?

☆ ती रक्त चंदनाची पहाट… ☆ श्री संदीप काळे ☆

मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. उन्हाळा जोरात सुरू झाला होता. सकाळी आठ वाजता जोराने ऊन लागत होते. रस्त्याच्या कडेला पळसाच्या झाडावर लालभडक असलेली फुलं लक्ष वेधून घेत होती. एक व्यक्ती धोतर कमरेला खोवून पळसाच्या झाडावर चढून फुले तोडत होती. त्या व्यक्तीला पाहून मला राहवलं नाही. मी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि त्या वर चढलेल्या व्यक्तीला म्हणालो, “दादा जरा दोन-चार फुले मला द्या ना. “

माझा आवाज ऐकून त्या व्यक्तीने हातामध्ये असलेली फुले माझ्या दिशेने खाली फेकली. मी त्या फुलांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून अर्धी फुले हातात राहिली आणि आर्धी फुले खाली पडली. असे वाटत होते, त्या फुलांच्या स्पर्शाने धरणीमाता ही आनंदून गेली असेल. हातात पडलेली ती फुले मी तशीच छातीला घेऊन कवटाळली. त्या फुलांमुळे वसंत ऋतू एवढ्या उन्हामध्ये किती प्रसन्नतेने आपलं स्वागत करत आहे, असेच मनोमनी वाटत होते.

मी ती फुले घेऊन आता निघणार, तितक्यात माझे लक्ष त्या फुले तोडणाऱ्या व्यक्तीकडे गेले. तो इतक्या गडबडीने एवढी फुले का तोडत असेल, असा मला प्रश्न पडला होता. तो फुले तोडायचा आणि त्या रिकाम्या थैलीमध्ये टाकायचा. त्या व्यक्तीची थैली आता भरत आली होती. मी थोडे जवळ जाऊन त्या व्यक्तीला विचारले, “एवढी फुले कशाला हवी आहेत?”

तो म्हणाला, “रंग करायला. “

मला माझे बालपण आठवले, मी लहानपणी होळीला याच फुलांचा रंग करायचो. मी त्या व्यक्तीला म्हणालो, “तुम्ही फार हौशी दिसताय. या काळातही ह्या फुलांचा रंग करताय म्हणजे कमाल आहे तुमची. “

तो म्हणाला, “साहेब मुलींसाठी करतोय, त्यांना या मुलांचा रंग फार आवडायचा. त्यांच्या आठवणीत मी आणि माझी बायको दोघेजण दर वर्षी रंगपंचमीला त्यांच्या समाधीला या फुलांच्या रंगाची अंघोळ घालतोय. “

मला त्या वडिलांची असलेली भावना पाहून आश्चर्य वाटलं. मी काही न बोलता तिथेच थांबलो. तो माणूस खाली आला. कमरेला खोवलेले धोतर त्याने सोडले. त्याच धोतराने त्याने डोक्यावर आलेला घाम पुसला.

मी म्हणालो, “काय झाले होते मुलीला. “

तो म्हणाला, “काय सांगावे, साहेब, खूप मोठी कहाणी आहे. जाऊ द्या. काळाने माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून हिरावून घेतल्या. ” तो त्या पुढे काहीही न बोलता पुढे जात होता आणि मी त्याच्या मागे. आमचे बोलणे सुरू असताना तो व्यक्ती मधेच म्हणाला, “साहेब वाट छोटी आहे. त्यात आजूबाजूने इर्षेतून भावकीने काटे टाकले आहेत. “

 मी म्हणालो, “भावकीने अर्जुनालाही सोडले नाही, आपण कोण?”

 माझे बोलणे एकूण तो व्यक्तीही हसला. आता तो माझ्याशी बोलण्यात हळू हळू खुलत होता. आमचे बोलणे सुरू असताना, दुरून एका महिलेने आवाज दिला, “अहो काय करून राहिले, चला ना लवकर, किती वेळ आहे अजून, मला उन्हाच्या अगोदर घरी पोहचायचे आहे. ”

मला त्या व्यक्तीच्या मागे पाहून त्या बाईच्या आवाजाचा सूर थोडा कमी झाला. आम्ही आंब्याच्या झाडाखाली असलेल्या लाकडी पलंगावर बसलो. बाजूला पाण्याचा माठ भरला होता. त्या माठातले पाणी थंड राहावे यासाठी त्यावर ओले करून फडके टाकले होते. ती व्यक्ती त्यांच्या बायकोला माझी ओळख करून देत म्हणाली, “साहेब मुंबईचे आहेत. यवतमाळला जात आहेत. राजश्री आणि विजयश्री विषयी त्यांना मी सांगितले, त्यांना फार वाईट वाटले. बोलत बोलत आले माझ्यासोबत. “

त्या माऊलीने मान हलवत मला पाणी दिले. मी ती व्यक्ती आणि त्यांची पत्नी आम्ही बोलत बसलो. कुणाच्याही वाट्याला एवढे दुःख येऊ नये, एवढे दुःख या दोघांच्या वाट्याला आले होते. जगावे तर का? आणि मरावे तर का? असा प्रश्न त्या दोघांच्या समोर निर्माण झाला होता.

शेतकरी मोठा असो की छोटा, सततची नापिकी, पिकले तर चांगला भाव नाही, हे सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था कोणी विचारू नये आणि कुणी सांगूही नये अशीच होती आणि आहेही.

मी ज्यांच्याशी बोलत होतो ते त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यवतमाळ पासून जवळच एका खेडेगावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित २७ एकर जमीन होती. त्यातून विकून विकून त्यांच्याकडे आता तीन एकर जमीन आहे. त्यांच्या राजश्री आणि विजयश्री या दोन मुलींनी दोन वर्षांपूर्वी स्वतःचे आयुष्य संपवले.

राजश्री आणि विजयश्री या दोघींच्या लग्नाची घरात चर्चा सुरू होती. पाहुणे यायचे, पसंत करायचे आणि हुंड्यासाठी आग्रह धरायचे, मोठे लग्न करून द्या म्हणून आग्रह धरायचे. खूप मागणीमुळे लग्न काही जमेना. त्रंबक आणि त्यांची पत्नी देवकी यांची काळजी दिवसेंदिवस वाढत होती.

आई वडिलांना होणारा त्रास दोन्ही मुलींना पाहवत नव्हता. त्याच काळात हुंड्यासाठी, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या सतत कानावर पडत होत्या. त्रंबक म्हणाले, “माझ्या दोन्ही मुली मरणाच्या आठ दिवस अगोदर रात्री एक झोपायची एक जागी राहायची. आम्हा नवरा-बायकोला हे का होत होते हे कळाले नाही. आम्ही जेव्हा खोलीमध्ये जाऊन माहिती घेतली तर कळाले. मी काही टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या वगैरे तर करणार नाही, याची काळजी त्या त्या दोघींना वाटायची, म्हणून त्या रात्री जागी राहायच्या, माझ्या मागे मागे शेतात यायच्या. मरणाच्या आदल्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या, दोन्ही पोरी खूप मोठ्या झाल्यासारख्या आमच्याशी बोलत होत्या. आमच्या दोघांचे पाय दाबत होत्या. ‘बाबा तुम्हाला कशाचेही टेन्शन येणार नाही, तुम्ही नका काळजी करू. पुढच्या जन्मी आम्ही दोघीही मुले म्हणून तुमच्या पोटाला जन्माला येऊ. ‘

चंदनाचा लेप उगाळताना मुलींच्या गप्पा सुरू होत्या. राजश्री म्हणाली, ‘बाबा मी पळसाची फुले रंगासाठी भिजवली आहेत, या वर्षी तुम्हीही आमच्यासोबत रंग खेळाल ना? आम्ही दोघी कुठेही असो, बाबा आम्हाला दर रंगपंचमीसाठी याच फुलांचा रंग पाहिजे हा?’ त्रंबक म्हणाले, ‘हो बेटा, नक्की मिळेल, का नाही. ?”

असे आम्ही दोघे बोलताना मध्येच देवकी म्हणाल्या, “दोन्ही मुली अशा का बोलतात याचे मला खूप आश्चर्य वाटले, “

त्रंबक म्हणाले, “का कुणास ठाऊक, त्या रात्री सकाळी सकाळी काहीतरी वाईट घडणार आहे, असं मला मनोमनी वाटत होते. त्या दिवशी सकाळी सकाळी घरात दोन मांजरांच्या भांडणात डब्बे खाली पडले आणि आम्हाला जाग आली. आमची दोघांची नजर मुलींच्या अंथरुणाकडे गेली, तिथे मुली नव्हत्या. आमच्या पोटात एकदम धस्स झाले. अशा मुली न सांगता कुठेही गेल्या नाहीत, एकदम गेल्या कुठे असे आम्ही एकमेकांना विचारत होतो. तेव्हढ्यात माझ्या भावाचा मुलगा पळत घरी आला आणि म्हणाला, ‘मोठे बाबा शेताकडे चला, दोन्ही पोरींनी फाशी घेतली. ‘

आम्ही रडत पडत शेतात गेलो, तेव्हढ्या सकाळी अवघे गाव आमच्या शेतात जमले होते. आम्ही रात्री झोपलो होतो, पण मुलींनी झोपल्याचे सोंग घेतले होते. आम्ही झोपल्यावर मुली घरातला मोठा दोर घेऊन कधी शेतात गेल्या आम्हाला कळाले नाही. सकाळी आम्ही शेतात जाऊन पाहिले तर काय दोन्ही मुलींनी गळ्याला फास लावून आत्महत्या केली होती. त्या झाडाला लटकत्या मुली पाहून आम्ही दोघेही बेशुद्ध पडलो.

आम्हाला जाग आली तेव्हा दोन्ही मुली स्मशानात होत्या. आम्हीही तिथे पोहचलो. रडण्यासाठी शरीरात ताकत नव्हती. रात्री जे चंदन मुलींनी उगाळून काढले होते, ते चंदन पहाटे रक्त चंदन होऊन येईल असे कधी वाटले नव्हते. ” ते दोघेही मुलींची आत्महत्यांची कहाणी सांगून हामसू हामसून रडत होते.

त्या दोघांची समजूत काढण्याची माझी हिंमत होत नव्हती. शेवटी रडून रडून रडणार तरी किती? ते दोघेही उठले, स्वतःला सावरत त्यांनी त्या पळसाच्या फुलांचा रंग केला. ज्या ठिकाणी त्या दोन्ही मुलींची समाधी होती, तिथे तो रंग टाकला. एकीकडे त्या पळसाच्या फुलांचा अभिषेक त्या मुलींच्या समाधीवर होत होता, तर दुसरीकडे अभिषेक करणाऱ्या आई बाबांच्या डोळ्यातील अश्रूही त्या रंगात मिसळत होते. ते सारे दृश्य पाहून माझ्यासारख्या हळव्या मनाच्या माणसाचे अश्रू डोळ्यांतून बाहेर येत होते.

त्यांना थोडीबहुत मदत करून, मी त्या दोघांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. शेती करणाऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे, याचे देणे घेणे कुणालाही नाही. त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यांच्यासारखे हतबल शेतकरी कुटुंब आपल्या अवतीभवती तुम्हाला भेटतील, त्यांना नक्की मदत करा, त्यांना आधार द्या. बरोबर ना.

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘अफलातून अभिनंदन…’ ☆ श्रीमती समीक्षा तैलंग ☆

श्रीमती समीक्षा तैलंग

?जीवनरंग ?

☆ ‘अफलातून अभिनंदन…’ ☆ श्रीमती समीक्षा तैलंग  ☆

आज सकाळी-सकाळी गणेशाचे नांव घेऊन घराच्या बाहेर पडले. अहो! पडले म्हणजे पडले नाही बरं का! म्हणजे सकाळी वॉक करायला निघाले. पडून राहणे किंवा पडणे हे दोन्हीच टाळायला ह्या वयात वॉक करणे गरजेचे आहे की नाही!

रस्त्यावर चालताना मागून ओळखीचा आवाज कानाच्या पडद्यावर पडताच जोराने कंपन व्हायला लागले. एवढ्या जोराने हाक मारायला काय झालं? जणू ट्रेनची हॉर्नच मागून सोडली असावी. रेलगाडी पण उगाच हॉर्न वाजवत येते. लोकं घरून उशिरा निघतील पण प्लेटफॉर्म क्रॉस करायला गाडीच्या रुळाचाच वापर करतील. अहो त्यांचा सिद्ध अधिकार आहे! तसेच रुळाच्या कडेला ढुंगण उंच करून बसणारे सुद्धा तसेच राहणार. रेल्वेने कितीही स्वच्छता मोहिमी चालवल्या तरीही त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडणे शक्यच नाही. तिथे असलेल्या शेणाची सफाई कोण करणार!

“बाब्या काय रे कशाला ओरडून घसा कोरडा करतोयेस! हे पुण आहे. विसरला कां? सायकलीची हवा काढणारे बेशिस्त म्हणायला सोडणार नाही बरं का!”

“काकू तुला बधाई द्यायला आलो. ‘हॅपी हिंदी डे’. ”

“थैंक्यू रे! पण बाब्या तुला कसे माहीत की आज हिंदी दिवस आहेत? तुझा तर काहीच संबंध नाही हिंदीशी. खरं तर गोड तेल खाणाऱ्यांना कडू तेलाचा स्वाद कसा कळणार?”

“काकू सोशल मिडिया झिंदाबाद! जिकडे डोळे फिरवा तिकडे हिंदीच दिसतेय. आता हिंदी नस्ती भाषा राहिली कां? ब्रॅण्ड झालाये काकू! ब्रॅण्ड! माझ्या मित्राने आत्मनिर्भर भारतात नवा धंदा सुरू केला आहे. माहितीये काय नांव ठेवलंय त्याने! ‘जल’ हे त्याच्या कंपनीचे नांव आहे. त्याला कुठे हिंदी विंदी येते. सगळी कामे इंग्रजीत करतो पण ठसका पाहा त्याचा! एकदम बत्तीस कॅरेट सारखा चमकतोय त्याचा ब्रॅण्ड”.

“काय विकतो रे! पाणी?”

“अगं हे असले काम तो काय करणार! चाळीत टोळ्या राहतो न तोच आपल्या खडखड्या डंपर मधे पाणी आणतो. सद्याला हेच सगळं करायचं असतं तर एवढं शिकला कशाला असता? शिक्षणात केवढा पैसा इन्वेष्ट केलाय त्यानं! पाण्या सारखा वेष्ट करणार कां?”

“हो खरंय! मोफत मिळालेल्या वस्तुंना किंमत नसतेच. पाणी वायफळ घालवू शकतो. पैसा कसा घालवणार?”

“अगं काकू! सद्या वॉटर स्पोर्ट्स करवतो. त्या शिवाय शोकीनांना क्रूज, बोटी सगळं भाड्यावर देतो. मोठमोठे फिल्मस्टार पण येतात. हे सगळं ‘जल’ मुळे होतये. नावामुळे कष्टंबर मिळतात. मी पण असेच काही एडवेंचर करायला बघतोयं. पण करणार हिंदीतच. सध्याच्या काळाचा फॅशन आणि डिमांड आहे हिंदी!”

“मग शीक खरं!”

“शिकून काय करणार काकू! कष्टंबर हिंदीत कुठे बोलतात! आणि थोडी फार तर मला पण येतेच. आपल्या बिझनेसचे नांव मी हिंदीतच ठेवणार हे खरंय”.

“खरंय बाब्या! हिंदी गाजणार नाही पण तुम्हाला चमकावणार”.

“काकू तू परदेशात होती. तेथे फराटेदार इंग्रजी चालते न?”

“तेथे इंग्रजी खरच चालते. आपल्याकडे एक्स्प्रेसच्या स्पीडने धावते. किती माणसं तुटक बोलतात पण कोणी खाली पाहायला नाही दाखवत. तेथे अभिमानाची भाषा नाहीये ही. नुस्त ब्रिजचे काम करते. दोन माणसांना जोडते. आपल्या कडे उलट आहे. बाराखडी येत असे नसे पण अल्फाबेटस् सगळ्यांना येतात. नशीब पाहावे की बुलेट ट्रेन नसून आपल्या कडे त्या स्पीडने इंग्रजी धावते. आपलं सोडून पाळत्याच्या माघे धावणं हीच परंपरा आहे आपली. आपल्या कडे इंग्रेजी हाईक्लास आणि हिंदी विदाउट क्लास आहे”.

“काकू पुढं वाढायचं असेल तर इंग्रजी कम्पलसरी आहे”.

“माझा भाचा जपानला गेला तर तेथे त्याला जापानी शिकावी लागली. जेवढे वर्ष तेथे होता इंग्रजी घश्याबाहेर पडली नाही. तिची फास लागली नाही. तेंव्हाच मी समजले की भाषा मुळे आपले विचार आणि संस्कृती बदलते. इंग्रजी बोलता बोलता आपण त्यांचे संस्कार पण घेतलेच न”.

“तू एकदम बरोब्बर म्हणतेयेस काकू! चल आता मी निघतो. इंग्रजीच्या ट्यूशनाला जायची वेळ झाली आहे. बॉय!!”

© श्रीमती समीक्षा तैलंग 

(ग्वाल्हेर, सध्या पुणे)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- २ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- २ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.) – इथून पुढे —- 

आम्ही संध्याकाळी ऑफिसमधून परतलो की काकू चविष्ट नाश्ता बनवून आमची वाट पाहत असायच्या. आता सकाळ संध्याकाळ भाज्या चिरून, कोशिंबीर आणि विविध प्रकारच्या चटण्या तयार करून ठेवतात. त्या अनेकदा पीठही मळून ठेवायच्या. हे सर्व पाहून दिवसभरात त्या क्षणभरही बसत नसतील असे वाटले.

आता घरातील प्रत्येक वस्तू आपापल्या जागी नीटनेटकी ठेवली असते, ज्या आधी वेळेअभावी वापरानंतर इकडे तिकडे पडायच्या.

एका सुट्टीच्या दिवशी आम्ही काकूंना मॉलमध्ये फिरायला घेऊन जात होतो. वाटेत एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवायला सांगितल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले. तरीही राकेशने ताबडतोब गाडी थांबवली तेव्हा काकू लगेच खाली उतरल्या आणि जवळच्या एटीएमच्या दिशेने निघाल्या. अवघ्या दोन मिनिटांत त्या नोटा हातात घेऊन परत आल्या.

आमच्या चेहऱ्यावर आश्चर्य बघून त्या म्हणाल्या, “आश्चर्यचकित होऊ नका. ” माझी परिस्थिती लक्षात घेऊन मी हे कार्ड हॉस्पिटलच्या सामानासोबत ठेवले होते. दवाखान्यात पैशाची गरज तर होतीच ना? पण मला माहित नव्हते की माझी अवस्था इतकी वाईट होईल की मला माझ्या शेजाऱ्याला सांगून फोन करून तुला बोलवावे लागेल. “

“ते ठीक आहे काकू, पण आता आम्ही आहोत ना. पैसे काढण्याची काय गरज होती? खरं तर, माफ करा, तुम्ही येऊन इतके दिवस झाले आहेत, याचा आम्ही विचारही केला नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या गरजा विचारायला हव्या होत्या, ” राकेश लाजत म्हणाला.

“नाही नाही बेटा, मला पैशाचे काय काम? पण मी माझा मुलगा आणि सुनेसोबत पहिल्यांदाच बाजारात जात आहे, त्यामुळे पैसे माझ्याकडे असले पाहिजेत. चला, उशीर होत आहे, ” काकू उत्साहाने म्हणाल्या.

मॉलमध्ये पोहोचताच काकू तयार कपड्यांच्या दालनात गेल्या. आम्हाला वाटले की त्या आजारपणामुळे इतक्या घाईत दवाखान्यात आल्या आहेत की त्यांना त्यांच्यासोबत अनेक गोष्टी आणता आल्या नसतील. त्यांना कपड्यांविना त्रास होत असावा, म्हणूनच त्या तिथे गेल्या असाव्यात.

पण त्या रेडीमेड शर्ट आणि जीन्सच्या काउंटरवर गेल्या आणि राकेशला कपडे खरेदी करण्यास सांगू लागल्या. राकेशने खूप नकार दिला पण त्यांनी ऐकले नाही.

राकेश जीन्स घालून पहात असताना त्या मला म्हणाल्या, “आजकाल सगळ्या मुली जीन्स घालतात. ते सोयीचे असल्याचे कामावर जाणाऱ्यांचे म्हणणे आहे. सूनबाई, तू जीन्स वापरत नाहीस का?

त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले. जुन्या पिढीतल्या असूनही त्या असं का बोलल्या?

“नाही नाही काकू, मी पण… ” म्हणत मी थांबले. असं बोलत असताना त्या माझी परिक्षा तर घेत नाही ना असं मला वाटत होतं.

“तू घालतोस पण माझ्यामुळे तू रोज साडी आणि सूटच्या बंधनात अडकतेस. पण मी तर कधीच काही बोलले नाही, ” काकू अगदी निरागसपणे म्हणाल्या.

“सून, तू पण तुझ्यासाठी काही जीन्स आणि एक छान टॉप खरेदी कर. माझी सून या कपड्यांमध्ये कशी दिसते ते मलाही पाहू दे, ” असे म्हणत त्यांनी माझ्यासाठी कपडे निवडण्यास सुरुवात केली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत उभी राहिले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, पण हे सर्व खरे होते आणि स्वप्न नव्हते.

कपडे खरेदी होताच काकू म्हणाल्या, “बेटा, मला खूप भूक लागली आहे. ” असंही मी आजारातून बरी झाल्याबद्दल एखादी मेजवानी तर व्हायलाच हवी. ”

आम्ही नकार देऊनही काकूंनी रेस्टॉरंटमध्ये आईस्क्रीमसह अनेक गोष्टी मागवल्या. नंतर राकेश पैसे द्यायला लागले तेव्हा किकूंनी लगेचच ती नोट त्याच्या हातात दिली आणि म्हणाल्या, “हे घे, हे दिल्याने काय फरक पडतो? ” हे ऐकून आम्ही हसलो, बिल घेऊन आलेल्या वेटरलाही हसू आवरले नाही.

घरी आल्यावर राकेश काकूंना म्हणाले की “तूम्ही इतके पैसे खर्च करायला नको होते”. त्यावर त्या म्हणाल्या, “तुझ्या काकांच्या पश्चात आता मला पेन्शन मिळते. मी एकटी असताना या वयात मी स्वतःवर असा किती खर्च करू? “

त्या बऱ्या झाल्यापासून त्या अनेकदा संध्याकाळी फिरायला जातात. येतांना फळे, भाज्या, दूध, मिठाई आणि इतर अनेक गोष्टी घेऊन येतात. कधीही रिकाम्या हाताने येत नाहीत.

सकाळी आम्ही ऑफिससाठी तयार होत असताना त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, “राकेश बेटा, मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. आता मला परतीचे तिकीट काढून दे. “

हे ऐकून आम्ही दोघेही अवाक झालो. “काय झालं काकू, तुम्हाला इथे काही अडचण आहे का?”

“नाही नाही बेटा, काय अडचण असणार आहे तुझ्या घरात? तरीही मला परतले पाहिजे. दोन महिने झाले, मी तुमच्यावर… ”

हे ऐकताच मी अस्वस्थ झाले, “काकू, आम्ही तुम्हाला खूप नको म्हणतो, तरीही तुम्ही दिवसभर स्वतःच्या मर्जीने का होईना कामात मग्न राहता. “

“नाही नाही सीमा, मी कामाबद्दल बोलत नाहीये. हे काय काम आहे का. बटण दाबले आणि कपडे धुतले. बटण दाबलं, चटणी, मसाला तयार झाला. घराची साफसफाई आणि भांडीकुंडी ची कामे मोलकरीण करते. एका दिवसात असं किती काम असतं? पण बेटा, दोन महिने झाले, किती दिवस मी तुमच्यावर ओझे बनून राहणार? “

ओझे हा शब्द ऐकताच माझे डोळे भरून आले. मी त्यांना मिठी मारली. प्रेमाची अशी प्रतिमा ओझे कसं असू शकते? माझ्या सासूबाईंबद्दल किती चुकीचे विचार होते माझे. माझी काकूंच्या येथे रहाण्याबद्दल काहीच तक्रार नाही. आधी जेव्हा राकेश त्यांच्या इथे राहण्याबद्दल बोलला होता तेव्हा मला खूपच काळजी वाटली होती. पण आता मी त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. त्यांच्या प्रेम, आशीर्वाद आणि उपस्थितीशिवाय आपण आणि आपलं कुटुंब किती अपूर्ण असेल. रोज संध्याकाळी आमची घरी येण्याची कोण वाट पाहणार? आम्हाला भूक लागली नाही तरी कोण खायला घालणार? एवढ्या बिनशर्त प्रेमाचा वर्षाव कोण आपल्यावर कोणत्याही स्वार्थाशिवाय करेल?

आम्ही दोघांनीही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की त्या आता कुठेही जाणार नाहीत. आता या वयात त्यांनी एकटं राहायचं नाही. आता त्यांनी मथुरेतील घराला कुलूप लावायचे की भाड्याने द्यायचे ही त्यांची मर्जी आहे. त्या आमची जिद्द आणि आमच्या प्रेमाचा अव्हेर करू शकल्या नाहीत.

काकू थोडा विचार करून बोलल्या, ‘‘तुम्ही म्हणता तर तुमच्या जवळच राहीन, पण माझी एक अट आहे. ’’

काकूंना काय म्हणायचं आहे ते मी समजले. मी लगेच म्हणाले, ‘‘तुम्ही एकदा मथुरेला जा, तुमचे काही कपडे, काही आवश्यक सामान घेऊन या. यात अटीची काय गरज आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी आम्ही दोघं तुम्हाला मथुरेला घेऊन जाऊ. ’’

“ते तर जाईनच, पण तरीही माझी एक अट आहे. “

काकूंनी हे सांगताच मी जरा काळजीत पडले. विचार केला, माहीत नाही त्या काय अट ठेवतील.

मग राकेश म्हणाले, “काकू, अट कशाला, तुम्ही फक्त आदेश करा, तुम्हाला काय हवे आहे?”

आमचे काळजीत पडलेले चेहरे पाहून काकू हसल्या. त्या हसत म्हणाल्या, “हो, ही अट नाहीये, मी इथेच राहावं असं वाटत असेल तर मला लवकर एक नातू द्यावा लागेल, असा माझा आदेश आहे. तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली, किती दिवस असेच सडाफटींग रहाणार? “

हे ऐकून आम्हा दोघंही लाजलो. ज्या प्रेमाने आणि अधिकाराने काकूंनी हे सांगितले, त्याबद्दल विचार करावा असे काहीच नाही. काकूंनी आमच्या आयुष्याला नवा अर्थ दिला आहे. मला तर हे कळत नाही की ही ममतेची मूर्ती इतकी वर्षे निपुत्रिक कशी राहिली असेल? आजारपणाच्या निमित्ताने का होईना, ती आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आमच्याकडे आली आहे.

– समाप्त –

 मूळ हिंदी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- १ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- १ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

रात्रीचे साधारण ८ वाजले होते. ऑफिसमधून परत आल्यानंतर मी जेवण बनवत होते आणि राकेश अजूनही त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात फोन वाजला. हा कोणाचा फोन आहे याची उत्सुकता मला किचनमधून खेचत होती. फोनवर बोलताना राकेशला खूप अस्वस्थ होताना मी पाहिलं.

‘कृपया, त्यांना दवाखान्यात घेऊन जा. मी ताबडतोब निघतो आहे, तरी मला पोहोचायला २-३ तास लागतील, ‘ असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. मी काही विचारण्याआधीच त्यांनी घाईघाईने मला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांचे काही कपडे आणि महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत ठेवायला सुरुवात केली.

मथुरा येथे राहणारी राकेशची काकू अचानक खूप आजारी पडली होती. त्यांची अवस्था पाहून शेजाऱ्याने आम्हाला फोन केला. आमच्याशिवाय या जगात काकूंचं कोण आहे? त्यांना स्वतःचे मूलबाळ नाही आणि काही वर्षांपूर्वी काकांचे निधन झाले आहे.

आमच्या लग्नात काकूने माझ्या सासूबाईंचे सर्व विधी पार पाडले. राकेशच्या आई-वडिलांचा फार पूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी राकेशची बहीण गरिमा शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होती, मात्र राकेश शाळेत शिकत होता, जो त्याच्या बहिणीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. त्यानंतर काका-काकूंनी बहिणीचे लग्न लावून दिले आणि पुढील शिक्षणासाठी राकेशला शाळेनंतर वसतिगृहात पाठवले. राकेशने मला या दोन वर्षात अनेक वेळा सांगितले आहे की माझ्या काका आणि काकूंनी दीदी आणि माझ्यावर त्यांच्या मुलांसारखे प्रेम केले आहे.

पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र राहायचे पण राकेश चौथीत शिकत असताना त्याच्या काकांची मथुरेला बदली झाली. यानंतर त्यांची इतर अनेक शहरांमध्ये बदली झाली पण त्यांनी मथुरेत घर बनवले होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आत्या मथुरेत आल्या. नाही तर त्या कुठे गेल्या असत्या?

मला काकूंबद्दल फारशी माहिती नव्हती. आमच्या लग्नाच्या वेळी त्या आमच्याकडे फक्त ५-६ दिवस राहिल्या होत्या. खरे तर आम्हा दोघांना लग्नानंतर बँकॉक ला जायचे होते, म्हणून त्या मथुरेला परतल्या. मी काय काय विचार करू लागले होते. राकेशच्या आवाजाने मला पुन्हा वर्तमानात आणले. ते म्हणत होते, बघ मी घाईत काही ठेवायला विसरलो तर नाही ना?

बॅग भरून झाल्यावर राकेश काकूला एकटं कसं सांभाळतील असा विचार करत मी पण सोबत येण्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की आधी जाऊन परिस्थिती बघायला हवी, गरज पडली तर तुला फोन करेन. त्यानंतर ते मथुरेला रवाना झाले.

लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती की मी रात्री घरी एकटी होते. एक विचित्र भीती आणि अस्वस्थता मला झोपू देत नव्हती. रात्री दोनच्या सुमारास मी राकेशशी बोलले. काकू बेशुद्ध असल्याचे कळले. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या, आत्ताच काही सांगता येणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते. राकेश खूप काळजीत दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता राकेशने फोन केला की काकूंच्या उपचार आणि डॉक्टरांवर ते समाधानी नाहीत. काकूंसोबत ते दिल्लीला येत आहेत. दिल्लीतील रुग्णालयाशी चर्चा सुरू आहे.

संध्याकाळपर्यंत ते काकूंना सोबत घेऊन दिल्लीला पोहोचले. काकू बेशुद्ध अवस्थेत खूप अशक्त दिसत होत्या. रंगही पिवळा पडला होता. ते दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मी तिथे पोहोचले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

काकूंना ५ दिवसांनी दवाखान्यातून घरी सोडण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी औषधोपचारासह विश्रांती घेण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. आम्ही त्यांना घरी आणले. हा आजार काही विशेष नव्हता. वाढते वय, एकटेपणा, चिंता, कामाचा थकवा, वेळेवर नीट न खाणे ही या आजाराची कारणे होती.

आम्हा दोघांना आणखी सुटी घेणे शक्य नव्हते. आम्ही त्यांच्यासाठी नोकर किंवा नर्सची शोधले पण मिळाले नाही, म्हणून आम्ही घरी काम करणाऱ्या मोलकरणीला दिवसातून २-३ फेऱ्या मारून त्यांना दूध, चहा, नाश्ता वगैरे देण्यास सांगितले आणि ऑफिसला जाऊ लागलो. पण हो, आम्ही दिवसातून अनेक वेळा काकूंशी फोनवर बोलायचो. त्यांची चौकशी करीत असू. काही अडचण तर नाही ना? विचारत राहिलो.

राकेश बद्दल माहित नाही, पण माझा त्रास जरा वाढला होता. जे घर आत्तापर्यंत फक्त आमचं होतं ते अचानक माझ्या सासरच्या घरासारखं वाटू लागलं. आता उठणे, बसणे आणि कपडे घालणे यात काही बंधने जाणवू लागली. आंटी याविषयी कधीच काही बोलल्या नसल्या तरी घरात त्यांची उपस्थिती माझ्यासाठी पुरेशी होती.

पण मी हे सर्व पूर्ण उत्साहाने करत होते, कारण काकू अपेक्षेपेक्षा लवकर बऱ्या होत होत्या. अवघ्या एका आठवड्यानंतर त्यांना मोलकरणीची गरज उरली नाही. त्या स्वतः उठून त्यांची छोटी-मोठी कामे करू लागल्या. त्या लवकरच बऱ्या होऊन मथुरेला परततील याचा मला आनंद झाला. आणखी काही दिवसांची तर गोष्ट होती.

एक दिवस राकेश म्हणाला कि ‘आता आपण काकूंना परत जाऊ द्यायचं नाही. त्या आता आपल्या सोबतच राहणार आहेत. आता या वयात त्यांना एकटे राहणे कठीण होणार आहे. पुन्हा आजारी पडल्या तर? मग त्यांच्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. ‘ राकेश काही चुकीचं बोलले नव्हते पण माझं मन अस्वस्थ झालं.

मला आठवतं, जेव्हा राकेशचं स्थळ माझ्यासाठी आलं तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझं मत विचारलं. राकेश कसा दिसतो? किती शिक्षित आहेत? ते किती कमावतात? मला हे सर्व जाणून घेण्याची गरज वाटली नाही कारण मला वाटले की माझ्या आई-वडिलांनी आणि काकांनी हे स्थळ पाहिले आहे तर सर्व काही ठीकच असणार. ते माझ्यासाठी चांगलेच अ तील. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे होते. विचारले असता माझे सासरी मुलाला आई वडील नसल्याचे कळले. एकच मोठी बहीण आहे, तिचेही लग्न झाले आहे. एवढेच जाणून घेणे माझ्यासाठी पुरेसे होते कारण माझ्या मनात सासूची प्रतिमा अशी होती की सून नेहमीच दबावाखाली असते. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या माझी मैत्रिण जया हिच्याशी मी जेव्हा कधी बोलायचे तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा तिच्या सासूबद्दलच जास्त बोलायची. ती नेहमी काळजीतच असायची.

शिवाय, माझी बहीण जेव्हा कधी तिच्या माहेरी आई-वडिलांच्या घरी यायची तेव्हा ती बरेच दिवस परत जातच नाही. आई नेहमी तीला समजावून परत पाठवायची. तिच्या पती किंवा दिराविषयी नव्हे तर सासूंविषयी अनेक तक्रारी होत्या.

पण राकेशची काकू आता आमच्या घरीच राहणार होती. सासू-सासऱ्यांचे एकवेळ ठीक आहे, पण काकूचे बोलणे, टोमणे, टोमणे कुणी व का ऐकावे? असा विचार करणं खूप चुकीचं असलं तरी हा स्वार्थी विचार होता, आणि त्याचा मला खूप त्रास होऊ लागला होता.

एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिस वरून घरी पोहोचले तेव्हा मी पाहिले की काकूने वाशींगमशीन लावली होती आणि घरातील सर्व मळालेले कपडे जमा करून धुतले होते. मी फक्त रविवारी मशीन वापरते आणि आठवड्याभराचे कपडे धुते. नुकतेच काकूंच्या आजारपणामुळे हे काम राहिले होते. इतके कपडे एकदम धुतलेले पाहून मला आश्चर्य वाटले, “हे काय काकू, तुम्ही एवढं काम का केले? आता तुम्ही आराम करा. ”

“सीमा, मी दिवसभर आरामच तर करते, मग आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे हे काय काम आहे का? ” असे बोलून काकू हसल्या.

आता जेवणाच्या वेळी गप्पांचा ओघ सुरू झाला. काकू राकेशच्या लहानपणीच्या सवयी आणि खोडकरपणाविषयी सांगायच्या. माझ्या सासरच्या घराबाबतही त्यांनी मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या मला सांगायला कुणीच नव्हतं. मलाही राकेशचा चिडचिडा स्वभाव आणि आवडी-निवडी माहीत होतं होत्या. आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

मुंबईच्या टर्मिनल २ च्या डिपार्चर जवळ एक गाडी येऊन थांबली. लगबगीने व्हील चेअर आणली गेली. गाडीतून रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकरांना उचलून व्हील चेअर मध्ये बसवण्यात आलं. विमान कंपनीने त्यांना दिलेला त्यांचा अटेंडंट त्यांची व्हील चेअर डीपार्चर गेटच्या दिशेने ढकलू लागला आणि अशोक केतकरांच्या डोळ्या समोरुन त्यांचा भुतकाळ सरकू लागला!

ते सर्व्हिस मध्ये असताना एका विमान अपघातात त्यांचा जीव तर वाचला होता. पण त्यांनी दोन्ही पाय गमावले होते. दोन युद्धात भारत मातेची सेवा केलेला तो भारत मातेचा सुपुत्र आता कायमचा व्हील चेअर वर बसला होता. एकेकाळी आभाळाला गवसणी घालणारा तो शूर वीर आता जमिनीवर देखील उभा राहू शकत नव्हता! दर वर्षी एकदा ते दिल्लीला मात्र जात असत. प्रजासत्ताक दिनी ते आणि त्यांचे काही जुने कलिग्स इंडिया गेट जवळ जमत असत. मग दोन दिवस दिल्लीत त्या फ्रेंड्स बरोबर मुक्काम करून ते परत येत. आजही ते त्यासाठीच निघाले होते. गेल्या अनेक वर्षांचा ते शिरस्ता होता.

पण गेली चार पाच वर्ष मात्र त्यांना दिल्लीला जाण जीवावर येत असे. कारण त्यांच्या सगळ्या कलीग ची मुलं एकतर सैन्यात, एअर फोर्स मध्ये होती किंवा चांगल शिकून चांगल्या पोस्टवर नोकरीला होती. ह्यांची मुलगी भार्गवी मात्र सेकंड इयरला असतानाच एक मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून गेली होती. कारण काय तर त्याची आई दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि तिला तिचे डोळे मिटायच्या आत मुलाचं लग्न झालेलं पहायचं होतं. ह्यांनी आणि बायकोने बराच विरोध केला. एकुलत्या एका मुलीचं छान करिअर व्हावं हे त्याचं स्वप्न होतं. पण तिने ऐकलं नाही. मग ह्यांनीही संबंध तोडले. आज त्यालाही पाचेक वर्ष उलटली होती!

त्यांची व्हील चेअर चेक इन सोपस्कार पूर्ण करून बोर्डिंग गेट पर्यंत आणली. अटेंडंट त्यांच्या शेजारी उभा होता. बोर्डिंग ची घोषणा झाली. शिरस्त्या प्रमाणे ह्यांची व्हील चेअर सर्वात आधी आत नेण्यात आली. त्यांना पहिल्या रो मध्ये स्थानापन्न केल्यावर बाकी प्रवासी बोर्ड झाले. विमान टॅक्सी वे वरून रन वे वर येऊन थांबल. अशोक रावांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांना त्यांच्या फ्लाइंग दिवसांची आठवण आली. त्यांनी नकळत डोळे पुसले. ते अजस्त्र धुड रन वे वर जवळ जवळ ताशी अडीचशे किलोमीटर वेगाने धावू लागल. आणि एका क्षणी आकाशात झेपावलं. खिडकीतून खाली बघत असलेल्या अशोक रावांचे हात आपसून जॉय स्टिक धरल्या सारखे हालचाल करत होते! जुन्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं. त्या अपघातानंतर सर्व्हिस सोडल्यावर ते करत असलेल्या प्रत्येक विमान प्रवासात येत असे तसंच!

विमान आता आकाशात स्थिरावलं आणि सीट बेल्ट काढायचे संकेत मिळाले. अशोक रावांनी सीटबेल्ट काढला आणि एअर होस्टेस ला बोलवायला वरच बेल बटण दाबल. एअर होस्टेस आली. अशोक रावांनी पाणी मागितलं आणि ते बरोबर आणलेलं पुस्तक वाचू लागले. काही मिनिटात एक लहानसा मुलगा हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि त्याने त्यांना पाणी दिलं. त्याला पाहून अशोक रावांना आश्चर्य वाटलं आणि तितक्यात पायलट ने अनाउन्समेंट सुरू केली.

पायलट – प्रिय गेस्ट. फ्लाईट ६इ ६०२८ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक अत्यंत महत्वाचे आणि आदरणीय गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकर. ते पहिल्या रांगेत a सीटवर आहेत. विंग कमांडर अशोक केतकर ह्यांनी भारतासाठी दोन मोहिमांमध्ये भाग घेऊन आपले शौर्य दाखवून शत्रूचा पराभव करण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. एका अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असले तरी त्याचा लढवय्या स्वभाव मात्र अजूनही जिवंत आहे. एअरफोर्सची शिस्त, सिनियर च्या आदेशांचे पालन ह्या गोष्टी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातही पाळल्या. इतक्या की त्यांच्या मुलीने करिअर सोडून त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यावर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. पण मुलगी बापाला कशी विसरू शकत होती? ती दुसऱ्या शहरात असली तरी तिचं वडिलांवर लक्ष होतं. तिने लग्न केल्यावर एका महिन्यातच तिच्या नवऱ्याची, राहुलची आई गेली. ती नवऱ्या बरोबर दिल्लीत रहात होती. पण वडिलांची इच्छा तिच्या लक्षात होती. तिने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. उत्तम गुण मिळवून ग्रॅज्युएट झाली. पुढे चांगल्या कॉलेज मध्ये admission मिळवली… तिने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं असलं तरी त्यांनी तिच्यासाठी ठरवलेलं करिअर मात्र तिने पूर्ण केलं.

अशोकराव हे ऐकून स्तिमित झाले. सगळ्या प्रवाश्यांना उत्सुकता लागली होती. पायलटचा आवाज आला.

पायलट – बाबा… तुम्हाला मला पायलट झालेली पहायचं होतं ना? ते तुमचं स्वप्न होतं ना? मग आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. आज हे विमान तुमची लाडकी भार्गवी उडवते आहे. तीच भार्गवी जिच्यावर रागावला आहात… आणि हो तुम्हाला आता ज्या मुलाने पाणी दिलं ना तो माझा मुलगा आहे आदित्य… तुमचा नातू…

प्रचंड शॉक बसलेल्या अशोक रावांनी भरलेल्या डोळ्यांनी त्या गोड मुलाकडे पाहिलं. तो त्यांच्याकडे बघत निरागस हसत होता. त्यांनी आदित्यला उचलून घेतला आणि त्याचे मुके घेतले. एव्हाना भार्गवी बाहेर आली होती. हातात फोन माईक धरून डोळ्यातून धारा तश्याच वाहू देत अशोक रावांकडे बघत बोलू लागली..

भार्गवी – बाबा मला माफ करा… मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केल… पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. आणि बाबा राहुल खुप चांगला मुलगा आहे. एका mnc मध्ये तो मोठ्या पदावर आहे. आम्ही दिल्लीला असतो. आज तुम्ही ह्या फ्लाईट ने दिल्लीला जाणार हे मला आई कडून कळल्यावर मी ही फ्लाईट मागून घेतली आणि आदित्यला घेऊन आले. बाबा प्लीज मला माफ करा… मला तुमचा खूप खूप अभिमान आहे बाबा… म्हणूनच आज मी, एक कमर्शियल पायलट तुम्हाला, एका फायटर पायलट ला salute करते आहे.

हे बोलून भार्गवी ने एक कडक salute केला. विमानातील सगळे प्रवासी आणि क्रू देखील salute करत उभे होते…. भार्गवी हळूच अशोक रावांच्या शेजारी बसली आणि त्यांना मिठी मारून हमसून हमसून रडू लागली. बाप आणि मुलीची अनेक वर्षांनी अशी भेट होत होती. अशोक रावांचा शर्ट तिच्या श्रूंनी भिजला होता…. तितक्यात आदित्य बोबड्या आवाजात म्हणाला – 

आदित्य – आजोबा मी ना तुमच्या सारखा फायटर पायलट होऊन देशाची सेवा करणार आहे. मला मम्मी रोज तुमच्या स्टोरी सांगून फायटर पायलट बनायला सांगते.

हे ऐकून अशोकरावांना प्रचंड आनंद झाला. तेवढ्यात आतून को पायलट ने विमानाच्या डीसेंड ची घोषणा करून सिट बेल्ट बांधायची सुचना केली. भार्गवी त्यांचा निरोप घेऊन कॉकपीट मध्ये गेली. विमान आता उतरू लागलं. आत भार्गवी विमान उतरवत होती. इथे शेजारी बसलेल्या आदित्यला अशोकराव विमान उतरवताना काय काय करतात ते अभिनय करून सांगत होते. खिडकीबाहेर अस्ताला जाणारा सूर्य एका माजी, एका आजी आणि भविष्यातील एका पायलटला आपल्या सोनेरी किरणांनी न्हाऊ घालत होता. विमानाचा डिसेंड सुरू झाला असला तरी आता कुठे अशोकरावांच्या आयुष्याच्या विमानाने परत एकदा टेकऑफ करायला धावपट्टीवर वेग घेतला होता!

लेखक : श्री मंदार जोग 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ती तिथे नुकतीच राहायला आली होती. तीचं अजून घर आवरणं सुरू होतं. नंदा नावाची बाई कामाला मिळाली होती. बाई साधी भोळी प्रेमळ होती. त्यादिवशी नंदा काम करायला आली म्हणाली,

” वहिनी आज काही ज्यादा काम असेल तर ते करून घेऊ. आज मला एका कामावर सुट्टी आहे. “

” अगं बरं झालं पुस्तकांचं खोकं ऊघडायच आहे. पुस्तकं काचेच्या कपाटात लावून घेऊ. “

नंदाने सगळी पुस्तकं काढली. बरेच दिवस पॅक असल्याने जरा धूळ जमा झाली होती. ओल्या कपड्याने पुसायला घेतली. ,

” वहिनी फॅन सुरू करा. वाळली की मग आत ठेवू. “

एक, एक पुस्तक नंदा पुसत होती.

” केवढी पुस्तकं हो. एव्हडी कधी वाचता? “

“अग अभ्यासाची, कथा, कादंबऱ्या प्रवासवर्णन, काही इंग्रजी पुस्तकं आहेत. परत परत वाचायला आवडतात म्हणून घेतली आहेत. “

ती म्हणाली…

तिच्या मनात आलं ह्या अडाणी बाईला आपण सांगतोय… पण तिला ते काय कळणार..

नंदा म्हणाली, ” बैजवार सगळी पुस्तकं नीट लावून ठेवते. तुम्ही तुमचं दुसरं काम असलं तर करा. “

” अगं नको तुलाच मदत करते”

आवरता आवरता ती तिच्याशी गप्पा मारायला लागली.

“तुला वाचायला लिहायला येतं का? ” 

” वहिनी आम्ही गावाकडे राहत होतो. माझा बाप फार गरीब होता. दुसऱ्याच्या शेतात काम करायचा. आई पण रोजंदारीन जायची.. आम्ही चार बहिणी एक भाऊ. जेमतेम हाता तोंडाची गाठ पडायची. कुठली शाळा.. अन् काय हो.. “

” म्हणजे तू काही शिकली नाहीस?

” नाही हो लहानपणापासून कामचं करायला लागले शेतातलं तणं काढायला जायचं, गुरं रानात गेली की गोठा साफ करायचा, लोकांच अंगण झाडायला जायचं, दूध घालायला जायची… “

” अग म्हणजे घरात कोणी शिकलं नाही? “

” बापाने लहान भावाला.. तो मुलगा म्हणून शाळेत घातलं. आमची लग्न सोळा-सतरा वयातच लावून दिली. माझा नवरा इथे बांधकामावर कामाला लागला म्हणून मी इथे शहरात आले. “

तिला वाईट वाटलं.. काय या बाईचं आयुष्य… हीच कशाला अशा अनेक बायका अडाणीच राहिल्या.. आई-वडिलांनी नुसतं त्यांना जन्माला घातलं.. अर्थात यात या बिचाऱ्या बायकांचा तरी काय दोष म्हणा…..

” तुला काहीच लिहिता वाचता येत नाही? “

“अगदी थोडं येतं पण कुठंही गेलं तरी अंगठाच द्यावा लागतोय बघा… वाईट वाटतंय… पण बापाचा पण नाईलाजच होता. तो तरी काय करणार? एकापाठोपाठ चार पोरी घरी होतो… “

“हो.. तेही खर आहे म्हणा”

“शिक्षण नाही झालं पण नवऱ्याने इथं आणलं म्हणून माझं कल्याण झालं बघा”

ती काय म्हणते आहे तिच्या लक्षातच येईना..

” अग कसलं कल्याण?

” अहो वहिनी बघा इथल्या लोकात मिसळले, कामं मिळाली, काम करतीयं.. चार पैसे हातात येतायत”

“अग पण किती कष्ट.. “

” अहो कुठेही काम केलं तर कष्ट करावेच लागणार ना? आम्हाला त्याची सवय असते. त्याचं काही वाटत नाही. दहा ते चार कामं करते साडेचारला घरी जाते. “

” अग पण थोडं तरी लिहिता यायला पाहिजे. मी शिकवीन तुला. साहेब ऑफिसात गेले की मला तसा खूप वेळ असतो. “

“अहो आता शिकून काय करू? घरी गेले की घरचं काम असतं. “

” अग तशी तु हुशार वाटतेस म्हणून तु थोडं तरी शिकावं असं मला वाटतं”

” तसं नाही वहिनी…. मला पण आवडलं असतं पण संध्याकाळचं अजून एक काम असतं बघा”

” संध्याकाळी काय करतेस? “

” त्या पाच नंबरातल्या आगाशे आजींना बागेत नेते. त्या तिथल्या बाकावर मैत्रिणींशी गप्पा मारतात. मी बाजूच्या बाकावर बसते. नंतर त्यांना घरी आणून सोडते. तेवढे चार पैसे मिळतात.. संसाराला उपयोग होतो”

” हो का… बरं बरं… “

रोज नंदा येऊन काम करून जायची. आज कामं करता करता तिच्याशी गप्पा सुरू होत्या. ती पण आनंदात काही काही बोलत होती.

” वहिनी माझी मुलगी रोज वीस मुलांना डबे देते. ती साबुदाणा खिचडी, कटलेट, बटाटेवडे, पावभाजीची ऑर्डर घेते. कधी तुम्हाला काही लागलं तर सांगा “

” अरे हो का…. सांगेन हं”

बोलता बोलता पुस्तकं नीट शिस्तीत लावून झाली.

“वहिनी बघा बरं नीट लागलीत का? “

” हो ग… छान काम केलंस”

“वहिनी हे काय आहे? हे आत ठेवायचं का? “

“हो… त्यात अगदी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. त्यात आमची सगळी सर्टिफिकेट्स आहेत. “

तिने स्वतःच ते फोल्डर नीट कपाटात ठेवले.

तेवढ्यात नंदाला एक फोन आला.

बोलून झाल्यावर ती म्हणाली,

” वहिनी तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय बघा. मला जमेल तसं मी शिकेन.. मध्येच मला पण वाटतय तुमच्यासारखं शिकावं शहाणं व्हावं…. “

” मी शिकवते तुला आणि चांगलं शहाणं करते “ती म्हणाली.

” बरं आता निघते मी. माझी मुलगी इथेच ऑर्डर द्यायला आली आहे. तिच्याबरोबर गाडीवर जाते घरी. “

” ती गाडीवर येते? “

” अहो जोशी आजोबा आता गाडी चालवत नाहीत. त्यांची जुनी गाडी विकत घेतलेलीय लेकीनी. निघते वहिनी”

” अग थांब तुझा पगार काढून ठेवला आहे. तो देते”

” वहिनी रोख पैसे नको. तुम्हाला माझं पासबुक दाखवते. त्या नंबरावर खात्यावर टाका. सगळे तसेच करतात. “

असं म्हणून नंदाने पासबुक तिच्या हातात दिले.

तिने उघडून बघितलं तर सोळा हजार जमा झाले होते.

“माझं वन बीएचकेच जुनं घर आहे. आता एक नविन टू बीएचके घेतलं आहे.. पगारातनं हप्ता भरते. माझा नवरा, मुलगा पण बँकेत पैसे भरतो. चार महिन्यात आम्हाला घर ताब्यात मिळेल बघा. दोन लाख तेवढे द्यायचे राहिलेत.. ” नंदा सहजपणे हे सांगत होती.

” दुसरं घर घेतलस? “

” मुलाचं लग्न होईल. मग घरात सुनबाई येईल.. मोठं घर हवं… वाढता संसार.. म्हणून घेतलय.. “

” अरे वा… “

” बर वहिनी येते मी. खात्याच्या नंबराचा फोटो काढून तुम्हाला व्हाट्सअप ला पाठवते. त्यावर पैसे पाठवा”

असं म्हणून नंदा गेली. ती विचारातच पडली…

इतका वेळ आपण तिला मी तुला शिकवते….. मी तुला शिकवते…. असं म्हणत होतो याची तिला आता थोडी लाज वाटली…. आज मात्र तिने मनाशी तिने ते कबुल पण केले..

लिहिता वाचता येणं… हातातं डिग्री असेल तर तेच खरं शिक्षण… असचं ईतकी वर्षे आपण समजत होतो….. ही तर दिवसभर कामं करत होती आणि बँकेचा हप्ता भरत होती…. लाखाची गोष्ट करत होती…

रोजच्या जगात वावरताना लागणार व्यावहारिक शिक्षण आपल्यापेक्षा तिच्याकडे जास्त आहे हेही तिच्या लक्षात आलं…

खरंतरं तिच्याकडूनच आपण शिकायला हवे असे तिला मनोमन वाटले..

महिन्याला अठरा हजार रुपये मिळवणारी ही…. आणि हिला मी अडाणी अशिक्षित समजत होते…

ती पुस्तकांच्या बंद कपाटाकडे…. त्यातल्या सर्टिफिकेटच्या फोल्डरकडे बघत राहिली….

या शिक्षणातून मिळालेले ज्ञानही असचं आपण डोक्यात बंद करून ठेवले आहे. कधी त्याचा उपयोग केला नाही.

नुसता डिग्रीचा अभिमान बाळगला. आज प्रथमच तिला त्याचं थोडं का होईना पण मनातून वाईट वाटलं…..

खंत वाटली…

ती उठून गॅलरीत आली. मुलीच्या मागे बसून नंदा निघाली होती. तिच्याकडे पाहून…

ती प्रांजळपणे मनात म्हणाली…

नंदा खरी शहाणी तर तुच आहेस…

अक्षरं ओळख नसल्याने..

अंगठे उठवणारी….

खरी बहाद्दरीण…

आत्मनिर्भर असलेली…

माझा सलाम आहे तुला…..

आणि आम्हाला रोज मदत करणाऱ्या तुझ्यासारख्या असंख्य मैत्रिणींना… सख्यांना पण… मनापासून वंदन.

तुमच्यामुळे आमचं आयुष्य सुखकर झालेलं आहे…

वाचता वाचता…. डोळ्यात का ग पाणी… तुलाही तुझ्या कपाटातलं बंद करून ठेवलेलं सर्टिफिकेट आठवलं का…

तुझीच कथा वाटली का तुला…

असू दे… तुझ्यासारख्या असंख्यजणींची हीच कथा आहे..

पैसे मिळवण्यासाठी नको पण निदान तुझ्या मनाला समाधान मिळेल असं काहीतरी कर..

घराबाहेर पड… अजूनही वेळ गेलेली नाही.. तू मिळवलेल्या ज्ञानाचा.. डिग्रीचा कर काहीतरी ऊपयोग…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ यंदा कर्तव्य आहे… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ यंदा कर्तव्य आहे…  ☆ डॉ. शैलजा करोडे

“अग सीमा, एखादी चांगली मुलगी असली तर सुचवशील आपल्या रोहितसाठी, यंदा कर्तव्य आहे ग. पण पाहिजे तसं स्थळ काही नजरेसमोर नाही. तुला तर माहित आहेच रोहित किती गुणी व कर्तबगार मुलगा आहे. ” ” मला माहित आहे ग प्रतिमा सगळं. पण आजकाल लग्नाच्या मुलींची वानवा भासतेय सगळीकडे. लग्नाची मुले जास्त व मुली कमी. मग या मुलीवालेही जणू सातव्या आसमानावर असतात. अपेक्षा खूप असतात यांची मुलगी जरी सुमार असली तरी. शिक्षण कमी, दिसायला यथातथा असलेल्या मुलींनाही गोरा, गोमटा, राजबिंडा मुलगा हवा. शहरात राहणारा हवा. खेड्यातला नको, डाॅक्टर, इंजिनियर, सरकारी नोकर हवा. , सासू सासरे, दीर नणंदेचा फापट पसारा नको. हवा फक्त राजाराणीचा संसार, हम दो हमारे दो. बाकी मंडळी जाऊ दे हवेत उडत, यांना काही घेणं देणं नसतं. “

” बरोबर आहे ग तुझं म्हणणं. पण माझा रोहितही एकुलता एकच आहे. चांगला M. Sc. Agri. डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरी पण मिळणार होती. पण आमची वडिलोपार्जित भरपूर शेती. ती कसायची सोडून नोकरी कसा करणार तो. सोन्यासारखी जमीन आमची. नोकरीतील उत्पन्नापेक्षा कितीतरी पट उत्पन्न देणारी, मग हातचं सोडून पळत्याच्या मागे काय लागायचं. राबणारी गडी माणसं, आपली देखरेख. शिवाय रोहित कृषी क्षेत्रातील विद्यानिष्णात, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बियांणाच्या विविध प्रजाती, खतांची जोड, ठिबक सिंचन, शेतीचं आधुनिकीकरण, मार्केटिंग, शेतीसाठी असणार्‍या विविध योजना, विम्याचं संरक्षण, शेतमाल साठविण्यासाठी आधुनिक सोयींनी सुसज्ज गोदामं, त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे.

” होय ग प्रतिमा, सगळं पटतंय मला. पुढच्या महिन्यात पुण्यात भव्य वधु वर मेळावा आहे. online अर्ज भरायचा आहे. नोंदणी करून ठेव. ” ” होय, मी घरी गेल्यावर आधी ते काम करते “

” अहो, रोहितच्या लग्नाचा काही विचार करता कि नाही. आता रोहितचं शिक्षणही संपलं, त्याने आपला शेती व्यवसायही सांभाळलाय. आता कसली अडचण. ” अडचण कसली ? आता रोहितनं मनावर घ्यावं ” ” रोहित व्यस्त आहे आपल्या कामात. शिवाय तो मूळातच अबोल, आपला आदर करणारा. तो काय मनावर घेणार, आणि आपलंही काही कर्तव्य आहे कि नाही ? ” ” कर्तव्य आहे ग, आपण कोठे नाकारतोय. पण त्याचंही मत घ्यायला हवं. शिवाय त्याच्या मनात कोणी आहे काय ? हे ही जाणून घ्यायला हवं, तू चिंता नको करूस. मी बोलतो रोहितशी. “

मृगाच्या सरी चांगल्याच कोसळल्या होत्या. तप्त धरतीची तृष्णा शमून ती जणू नवकांतीने उभारली होती. चोहीकडे पसरणारा मृदगंध वातावरणात आल्हाद निर्माण करत होता. दुकानांमध्ये बि बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडाली होती. रोहितनेही नवीन संकरीत बियाणे घेतली. ज्वारी बरोबरच, उडीद, मूग, चवळी या भरड धान्याबरोबरच तो कांदा व काही प्रमाणात विविध भाज्यांचीही लागवड करणार होता.

रात्री जेवतांना शांतारामरावांनी रोहितला म्हणाले, ” काय रोहित मृगसरी कोसळल्या. सर्वत्र मृदगंध दरवळतोय. आनंदी, आल्हाददायी वातावरण आहे. काळ्या आईच्या सेवेसाठी आपणही सज्ज आहोत. आणि ही काळी आई एका दाण्याच्या बदल्यात हजार दाणे देईल. पण बेटा तुझ्या ह्या आईची पण काही इच्छा आहे. तुझेही दोनाचे चार, पुढे चाराचे सहा व्हावे. ” ” बाबा, मी काय सांगणार ? ” ” अरे काय सांगणार म्हणजे ? तुलाच तर सांगावं लागेल ? कोणी आहे

काय तुझ्या पसंतीची ? असेल तर आमचं काम सोपं होईल. फक्त अक्षता टाकण्याचं काम आमचं. ” ” नाही बाबा, माझी कोणी पसंती नाही. आईलाच करू देत हे काम “” अहो ऐकलंत का ? तुम्ही लागा आता कामाला “. ‘ मी सुरू केलंय माझं काम. पुढच्या महिन्यात वधु वर मेळावा आहे. रोहितचं नाव नोंदवलंय मी. आपण जाऊ तिथे ‘.

दुपारचे जेवण झाले व सगळी मंडळी हाॅलमध्ये परतली. सकाळपासून सुरु झालेल्या वधु वर मेळाव्यात मान्यवरांची भाषणे, सन्मान, प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय यातच सकाळचं सत्र संपलं होतं. आता दुसर्‍या सत्रात वधु वर परिचय होणार होता. वधुपेक्षा वरांचीच संख्या भरपूर होती. एक एक उमेदवार मंचावर येऊन आपला परिचय देत होता, अपेक्षा सांगत होता. सांगलीची अलका लोणकर व अमरावतीची विद्या बनकर या दोन मुली मला (प्रतिमाला) रोहितसाठी योग्य वाटल्या. त्यांच्या पालकांशी मी तिथेच संपर्क साधला. गोरा, उंच, राजबिंडा दिसणार्‍या रोहितला कोण नाकारणार ? मी मनोमन खुश होते.

” रोहित चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, सधन स्थितीतील आहे, आम्हांला पसंत आहे, पण मुलाने खेड्यात राहून शेती करण्यापेक्षा शहरात नोकरी करावी एवढी आमची माफक अपेक्षा ” सांगलीच्या अलका लोणकरचे पालक बोलत होते.

‘ आपली गडगंज संपत्ती व शेती सोडून त्याने नोकरी म्हणजे दुसर्‍यांची चाकरी करायची ? ” ” आमची मुलगी शहरात राहणारी, पुढेही मुलांचे शिक्षण, इंग्रजी शाळा, विविध शैक्षणिक सुविधा शहरातच मिळणार. शिवाय आमची मुलगीही उच्च शिक्षित आहे, ती नोकरी करणारच, तिच्या ज्ञानाचा उपयोग करणार, खेडे गावात हे शक्य तरी होईल काय ?” 

आता माझं लक्ष अमरावतीच्या विद्या बनकर वर केंद्रित झालं. ” प्रतिमाताई तुमचा मुलगा चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, होतकरू आहे. आम्हांलाही असाच मुलगा हवा होता. विद्या आमची एकुलती एक कन्या, माझा बिझनेस, उद्योग व्यवसाय सांभाळायला मला रोहितसारखा मुलगा हवा होता. ” रोहितने तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळायचा आणि त्याचा स्वतःचा कोणी सांभाळायचा ? ” ” ताई शेतीकडे पाहायला तुम्ही दोघं आहात, शिवाय गडी माणसं आहेत. उद्योग व्यवसायात स्वतः लक्ष घालावं लागतं ” ” आम्ही थकलोत आता, पुढील पिढीने ही जवाबदारी सांभाळावी ही आमची अपेक्षा, पण तुम्हांला तर घरजावई हवा “. ते शक्य नाही. विद्याचं स्थळावर मी क्रास मार्क केला.

पुन्हा परिस्थिती जैसे थे वर येऊन ठेपली.

‘ प्रतिमा, नको चिंता करूस. मिळेल आपल्या रोहितलाही साजेशी मुलगी “

” कशी मिळणार, पाहिलंत ना वधुवर मेळाव्यातही किती कमी मुली होत्या. “

” होय, स्त्री भ्रूण हत्येचा मार्ग अनेकांनी चोखाळला व समाजातील स्त्री पुरूष समतोल ढासळला. हे परिणाम तर होणारच होते. तरी बघूया, रोहित आपला हुशार, होतकरू आहे. त्याला मुलगी मिळेल. नव्हे घरबसल्या सांगून येईल. “

लग्नाचा हा सिजन तर निघून गेला. माझे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.

” अरे रोहित आलास. मी केव्हाची वाट पाहात होते. आणि सोबत ही कोण ? ” आई ह्यांना घरात तर येऊ दे. या आहेत मीनाक्षी मॅडम, कृषी अधिकारी, कृषी मार्केटिंगसाठी मला बरीच मदत होते यांची. शेतीचं पोत, आणि इतर घटक लक्षात घेऊन विविध बियाणांचे वाण, खतांचं मागदर्शन करण्यासाठी या स्थानिक सर्व्हे सुद्धा करतात. आज आपल्या जमिनीचा सर्व्हे करुन, मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला देतील व आपल्याला त्यानुसार मार्गदर्शन करतील. ” ” होय काय, ठीक आहे. काय घेणार मॅडम, चहा, काॅफी कि थंड बनवू काही ” ” मला मॅडम नाही मीनाक्षी म्हणा आई, तुम्ही मला आईसारख्या आहात. “

किती चांगली मुलगी, मला आई म्हणाली, आंटी नाही, संस्कारी वाटते. रोहितला शोभेशी आहे.

मीनाक्षी आपले काम आटोपून निघून गेली, पण माझ्या मनात घर करून गेली.

‘ रोहित, मीनाक्षी कशी वाटते रे ? काही विचार केलास काय ? ‘ ‘ आई, काय बोलतेस हे ? तू असा विचार कसा करू शकतेस ? माझ्या मनात तसलं काहीही नाही आणि मीनाक्षी मॅडमच्या मनातही नसावं. तू रात्रंदिवस माझ्या लग्नाचा ध्यास घेतला आहेस. कोणत्याही मुलीमध्ये तू आपली सून शोधतेस. ” ” तसं नाही रे. मला मुलगी चांगली वाटली. गळ्यात सौभाग्य अलंकार नव्हते म्हणून लग्नाची वाटली. यात माझं काय चुकलं. ” ” नाही आई, तसं नव्हतं म्हणायच मला. “

मीनाक्षी कामानिमित्त गावात आली कि मलाहि भेटून जायची. हळूहळू परिचय वाढला. मीनाक्षीला एक धाकटा भाऊ व घरी आई वडील होते. वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर तर आई गृहिणी. निम्नमध्यम वर्गीय कुटुंब.

“मीनाक्षी लग्नाचा काही विचार केलास”. तशी मीनाक्षी निरूत्तर. ” अग, असं मौन राहून कसं चालेल. बरं, मीच घालते विषयाला हात. माझा रोहित कसा वाटतो तुला ? ही माझी, मेलीची इच्छा. तुझ्या मनात नसेल तर विसरुन जा हा माझा प्रश्न. ” ” मी नंतर कळवलं तर चालेल आई ” ” होय, तुला पाहिजे तेवढा वेळ घे “

मीनाक्षीने घरी आई बाबांना रोहितविषयी सांगितलं. ” तुला पसंत आहे ना. मग पुढील फाॅर्म्यालिटीज आम्ही करू. रोहितच्या आई बाबांना सांग आम्ही येतो भेटीला म्हणून “

नक्षत्रासारख्या सुनेचं स्वागत करतांना आज मन आनंदानं उचंबळून आलं होतं. ” ये सूनबाई, उंबरठ्यावरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं ये ” ” खूप छान आहे हो मुलगी, अगदी लक्ष्मी नारायणाची जोडी शोभतेय. लग्न घरातील सगळ्यांची हिच प्रतिक्रिया होती. यंदा कर्तव्य आहे म्हणत असतांना चार वर्ष भुरsss कन उडून गेली होती

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शाम दहावीला बसतो” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

अल्प परिचय 

शालेय शिक्षण विदर्भामध्ये वाशिम येथे व इंजीनियरिंग भोपाळला झाले. एक वर्ष नाशिकला ओझर येथे विमान कंपनीत नोकरी. नंतर पुण्याला टाटा मोटर्स मध्ये. २००९ मध्ये निवृत्त . निवृत्तीनंतर अवांतर लिखाणाला नकळतच छान सुरुवात झाली आणि वाचकांकडून छान चालना मिळत गेली.

🔆 जीवनरंग 🔆

☆ “शाम दहावीला बसतो” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.

शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.

रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.

फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.

शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.

म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.

त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.

चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.

ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.

झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.

शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.

अमिताभ : किससे पूछना चाहोगे?

शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!

शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू 

अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?

शाम : हा, सर. पक्का 

अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.

टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर 

अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल

ओबामा : यस्, आय नो दॅट यु आर ऑन द लाईन. हाऊ कॅन आय हेल्प यू?

अमिताभ : सर, शाम वॉन्टस टू आस्क यु समथिंग. यु विल बी गिव्हन 30 सेकंड्स. नेक्स्ट व्हाईस इज फ्रॉम शाम, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ 

ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर 

शाम जाम खुश झाला.

शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?

ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.

सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.

फोन कट झाला.

ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.

सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.

पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला 

शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares