“तु मला ओवाळ अन मी तुला ओवाळते असं म्हणत ग्रुपवर कौतुक सोहळा चालू असतो. ते पाहून बऱ्याचदा हसू येतं आणि असह्य होतं असं वाटतं की.. ”
“ग्रुपमधल्या अनेकांना तसंच वाटतं. फालतूचे वाद आणि बावळटांच्या नादी लागण्या पेक्षा शांत बसणं चांगलं!!” मीना.
“जाऊ दे ना. आपल्याला काय करायचं. आपण गंमत बघायची.”
“ए ग्रुप बघितला का? सुलभाला परत ऍड केलं” मीना.
“विनीतानं केलं असणार”
“दुसरं कोण!!”
“सुलभाचा मेसेज बघितला का?”
“हो,काय तर म्हणे!! आपली मैत्री जुनी आहे. प्रत्येकाचे स्वभाव,विचार करायची पद्धत वेगवेगळी आहे तेव्हा एकमेकांना जज करण्यापेक्षा रिस्पेक्ट करू. कमेंट करण्याआधी विचार करा”
“त्यावर विनीतानं लगेच रिप्लायही दिला ‘खूप छान विचार!! सगळ्यांच्या फायदा होईल. धन्यवाद सुलभा.!”
“सुरवात स्वतःपासून कर,सुलभा” हा कालिंदीचा मेसेज म्हणजे सिक्सर.”
“हो पण या सिक्सरनं ग्रुपवर नवीन वाद सुरु झाला”
“होऊ दे. आपल्याला फुल टाइमपास…” मीना-प्रिया दोघीही मोठमोठ्यांनं हसायला लागल्या..
—–
वरील संभाषण काल्पनिक असलं तरी त्याला वास्तवाचा आधार आहे.
“व्हॉटसप ग्रुप” हे आता जगण्याचा भाग झालेत. ग्रुपवरच्या पोस्ट,चर्चा मेसेजेस,वाद आणि गॉसिप याचसुद्धा रुटीन झालंय मीना-प्रिया यांच्याप्रमाणेच “दुसऱ्यांचं ग्रुपवरचं वागणं” हाच विषय प्रामुख्यानं असतो.
“व्हॉटसप गॉसिप” चा संसर्ग सगळ्यांनाच झालाय. एवढं मात्र नक्की..
☆ “विचारात चिमूटभर बदल झाला तर??..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“Sometimes You meet someone in life, Who change your way of thinking. “
काल ताई कडे गेले होते. सहजच. जेंव्हा मनात येईल तेंव्हा जाण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे माझ्या ताईचे घर.
ताई म्हणजे ‘आभा कुलकर्णी ‘ चा सधन मध्यमवर्गीय परिवार आहे. भाऊजी सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते. आजही कन्सल्टंट म्हणून काम करतात.
एक मुलगा अजय आणि एक मुलगी अनघा.
अजय भारतातच शिकला आणि भारतातच एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. पण मधून मधून कामानिमित्त परदेशात जाव लागत. कधी कधी तर प्रोजेक्ट च्या कामाने महिनाभर तेथेच रहावं लागतं. तेंव्हा सूनेच्या शोधात असताना हा पोइंट सांगणे खूप महत्वाचे आहे. असं भाऊंजींचे म्हणणे आहे.
‘अनिता देशमुख ‘ बरोबर बरेचदा भेटीगाठी झाल्यानंतर, सर्व सम्मतीने पसंती झाल्यावर,अजय ने हा मुद्दा सर्वांसमोर मांडला.
अजय म्हणाला,
मला कामानिमित्त कधी कधी महिनाभर बाहेर रहाव लागत. तेंव्हा माझ्या होणाऱ्या बायकोला प्रथम ही गोष्ट माहीत असली पाहिजे,मान्य असली पाहिजे. आणि तीने किंवा आई बाबांनी एकट राहण्यापेक्षा एकत्र रहावं. दोघांनाही एकमेकांची मदत होईल. आधार असेल. मला काळजी राहणार नाही. सर्वांचे सर्व प्रश्न सहज सुटतील. असं माझं मत आहे.
अनिता ने नोकरी चालू ठेवावी किंवा तिला अजून काही आपले छंद जोपासायचे असतील तर ते ही चालेल. माझ्याकडून तिला प्रत्येक कामात माझे व आईबाबांचे सहकार्य नेहमी मिळेल. याची मी खात्री देतो.
अजयने स्पष्ट बोलून सौम्य शब्दात सर्व गोष्टी सांगितल्या. बंगल्यात राहणाऱ्या अनिताला सर्व गोष्टी मान्य होत्या. आणि अजय चे लग्न पार पडले. बंगल्यात तून अनिता फ्लॅट मध्ये रहायला आली.
अनिता मधून मधून माहेरी जात असली,तरी जास्तीत जास्त ती आई बाबांबरोबरच असते. या गोष्टी चे ताईला आणि अनिताच्या आईबाबांना दोघांनाही कौतुकच आहे.
ताई आणि भाऊजीं ना तशी थोडी काळजीच होती. कारण दोन्ही घरच्यांच्या सांपत्तिक स्थिती मध्ये बराच फरक आहे.
प्रत्यक्षात रहायला सुरुवात झाली की कदाचित अनिता ला adjust होण कठीण होईल की काय?? ही भीती ताईला वाटतं होती.
आता लग्नाला महीना झाला. अनिता घरात छान रुळली आहे. आज संध्याकाळी जेवणानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. सध्या लग्नाच्याच गोष्टी म्हणजे Pre and Post marriage गप्पा होत असतात.
आज ताई अनिताला म्हणाली,
अनिता!! आता जवळजवळ महिना झाला ग तुला या घरात येऊन. अगदी आरामात रहा. मोकळेपणाने काही वाटलं तर सांग. प्रत्येक घरच्या पद्धती वेगळ्या असतात. अग! भाजीत गुळाचे प्रमाण पण प्रत्येक घरचे वेगळे असते, किंवा अजिबात गुळ घालतही नाही. तेंव्हा तुला काही वेगळ खायचं असेल तर तसं सांग,मी करून देईन किंवा तू कर. आम्हाला पण खायला आवडेल.
तुला घरात काम करायची सवय नसेल तर संकोच करू नको. आपण एखाद्या मावशींना कामाला ठेवू शकतो.
अनिता म्हणाली,
आई!! तुम्ही माझा एवढा विचार करता हे बघून मला माझा निर्णय बरोबर आहे. हे लक्षात येतंय.
आई!! मी घरी खूप पैसा बघितालाय. बाबांचा बिझनेस हळूहळू वाढत गेला. पैसा घरात येत गेला. यामागे बाबांचे कष्ट आणि Vision दोन्ही आहे. मला बाबांचा अभिमान आणि कौतुक दोन्ही आहे. आता एवढा बिझनेस सांभाळायला दादा पण भारतात नाही. तो अमेरिकेत स्थायिक झालाय. म्हणजे बाबांनाच सर्व बघावं लागतं. आईने घर,मला आणि दादाला खूप छान सांभाळल. आम्हाला शिस्तीत ठेवल. बाबांनी शुन्यातून हे साम्राज्य उभे केले.
मी बाबांना नेहमी विचारते,
बाबा!! स्वतः साठी वेळ केंव्हा काढणार आहात?? कमविलेल्या पैशाचा आनंद केंव्हा घेणार आहात??
केंव्हा आणि कुठे थांबायचं तेही ठरवता आलं पाहिजे ना.
मी आणि दादा नेहमीच स्वतः चे निर्णय घेत आलो. आई बाबांचा नेहमीच सपोर्ट असतो. मला श्रीमंत परिवारापेक्षा एक छान समजूतदार परिवार मिळावा,ही आमच्या सर्वांचीच इच्छा होती.
“श्रीमंत परिवार, एकुलता एक मुलगा, मुलांची प्रोपर्टी, बंगला ” हे मुद्दे आमच्या घरी नव्हतेच.
आज या गप्पागोष्टींत ‘अनघा ‘ताईची उच्च शिक्षित मुलगीही हजर होतीच. अजय पेक्षा एकच वर्ष लहान,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, एका नामी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणारी अनघा, अनिताचे बोलणं लक्ष देऊन ऐकत होती.
अनघाला लग्न तर करायचे आहे. पण अटी भरपूर आहेत. उच्च शिक्षण,पगार या अटी तर आहेतच. बरोबर एकुलता एक,पॉश लोक्यालिटीत स्वतः चे घर असणारा हवा ही एक अटही आहे.
आता अनघा चे वय तीस वर्ष आहे.
सगळ्यांचे सर्व समजावून झाले. पण पालथ्या घड्यावर पाणी. वय वाढतय पण अटी काही कमी होत नाहीत.
बाकी सर्व अटी तरी ठीक म्हणता येतील. पण पॉश एरियातच घर हवं,
ये बात कुछ हजम नहीं हुई ।
या अटी वर भरपूर चर्चा नेहमीच होत असते.
मध्यंतरी ताईंच्याच कॉलोनीत राहणारे श्री देशपांडे यांनी त्यांच्या उच्च शिक्षित एकुलत्या एक मुलांसाठी विचारलेही होते.
भाऊजींचे म्हणणे,
आपण नेहमीच मिडिल क्लास सोसायटीत राहिलो. आपल काय वाईट झाल.?? खरंतर कोविड पिरियड मध्ये किती लोकांची मदत झाली.
मध्यवर्गीय सामान्य लोकांची सोसायटी चांगली नसते की लोक चांगली नसतात.??
घर / बंगला कुठं आहे यापेक्षा घरातील माणसे महत्वाची नाही का??
आजही अनघाच्या लग्नाचे प्रयत्न सुरूच आहेत पण सर्व अटीत फिट बसणारा मुलगाच मिळत नाहीये.
ताई भाऊजी ना तिची काळजी आहेच.
म्हणतात ना,
वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस दोघांची किंमत सारखीच आहे.
आज अनघा बाबांना म्हणाली,
बाबा!! देशपांडे काकांना भेटून पूढच्या गोष्टी केल्या तर माझी काही हरकत नाही.
ताई भाऊंजीं एकमेकांकडे समाधानाने आनंदाने बघतच राहिले.
ताई मनात म्हणाली, हा अनिताच्या विचारांचा प्रभाव आहे का?
भाऊजी पण मनात म्हणाले,
“Sometimes you meet someone in life who change your way of thinking.”
माझी शाळा. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अत्यंत हळवा कोपरा असतो. आयुष्याच्या भविष्याची, शाळा ही सुरुवात असते. काहीच कळत नसतं, कसलाच अनुभव नसतो. बाल मनातली एक अनोळखी भीती आणि डोळ्यातून नकळत सांडणारे पाणी घेऊन, आईचा हात घट्ट पकडून, शाळेच्या आवारात पाऊल टाकलेलं असतं, आणि त्यानंतर एक एक पायरी चढत, शाळेच्या त्या सुंदर विश्वात आपलं बाल्य, कौमार्य, तारुण्य कसं विकसित होत जातं हे कळतही नाही.
माझी शाळा… गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल ठाणे.
.. एक लांबलचक इमारत, खूप मोठे पटांगण. ,घंटा,पार बांधलेली झाडे,टीचर्स रुम,प्रयोगशाळा,आणि मित्रमैत्रीणींचा घोळका. वर्गात नोटीस घेऊन येणारा शिवा,आणि खूप काही.
पाचवीच्या वर्गात असताना वाटायचं दहावीचा वर्ग किती छान आहे! आपण कधी त्या वर्गात जाऊ? आणि ही दहावी ची मुलं जसा रुबाब करतात, तसा आपल्याला कधी करायला मिळेल?
शाळा म्हणजे बेंचेस, खडू, फळा, गणवेश, प्रार्थना, मधल्या सुट्टीतला सवंगड्यांबरोबर बरोबर खाल्लेला डबा. आणि उरलेल्या वेळात खेळलेले, सोनसाखळी, लंगडी,लगोरी असे मैदानी खेळ. हरलो-जिंकलो,आऊट,टाईम प्लीज, रुसवे भांडणे, कट्टी -बट्टी, कच्चा लिंबू अय्या! ईश्श!
आणि कधीतरी थोडं घाबरत थोडं धिटाईने, नियम मोडत, शाळेच्या आवाराबाहेर जाऊन, एक पैशाचा खाल्लेला गोड पेरू! जांभळं,चिंचा म्हातारीचा कापूस वगैरे. अवीट गोडी! अविस्मरणीय! त्या एका पैशाच्या पेरूची, आजच्या शंभर रुपयाच्या थाई पेरू ला गोडी कशी येणार?
गोखले बाई फार आवडायच्या. विंदांची स्वेदगंगा ही कविता त्यांनी इतक्या तळमळीने शिकवली होती,की आजही त्या ओळी अर्थासकट मनावर स्वार आहेत.
स्वेद बिंदूंनो विसरा भीती
खूप बाळगा एकचित्त
अहित जयातून तीच अनिती
वेद यात नि यात बायबल
पुराण अथवा कुराण यातच
मता मतांचा सोडा गोंधळ ।।
गोखलेबाई ही कविता एका चालीत आणि लयीत म्हणायच्या. आणि ती आमच्या उमलत्या मनावर हलकेच पांघरत जायची. शाळेत शिकलेली, म्हटलेली,
” फुलपाखरू छान किती दिसते! ” किंवा “देवा तुझे किती सुंदर आकाश! ” किंवा कुसुमाग्रजांची,
” आवडतो मज अफाट सागर।
निळ्या जांभळ्या जळात केशर ।।.. शाळेच्या अंगणात बहरलेल्या या काव्यानंदाने आजपर्यंत च्या जीवनात कधीही साथ सोडली नाही.
नाशिककर बाईंनी प्रेमचंद मुन्शी,मन्नु भंडारी,हरिवंशराय बच्चन यांच्या साहित्याची ओळख करून दिली. फडके बाईंनी माझ्यासारख्या बेसूर गळ्यातू नही, भूप रूप शांतरस असलेले आरोह-अवरोह काढले. चित्रकलेचे तांबे सर मला म्हणायचे,” अगं! तुला नक्की काय काढायचे आहे? चिमणी की बदक? “
विविध कलांचे असे एकेक थेंब शाळेच्या त्या अंगणात मनात साठत गेले. दोन डोंगरातला उगवता सूर्य,निळे आकाश,उडणारे पक्षी,नारळाचे झाड,घर,नदी रस्ता हे एकमेव जागतिक चित्र आजही शालेय जीवनाची साक्ष आहे!
सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरते, याचं प्रात्यक्षिक चौधरी बाई करून दाखवायच्या. वर्गातलाच कोणीतरी एक सूर्य, कोणीतरी एक पृथ्वी, आणि मग सारी ग्रहमाला बाईंच्या स्टेजवर फिरायला लागायची. या नाटकात मीही एकदा मंगळाची भूमिका केली होती!
पण सारं काही मजेत शिकलो.
पहिल्या नंबर पासून तिसाव्या नंबर पर्यंत प्रवास केला. पण स्पर्धा नव्हती. मित्र-मैत्रिणींच्या यशातही आनंद होता. तसे काही काही चेहरे होते कुसकट! पण वैर, द्वेष असे काही नव्हते. ” यावेळेस माझा नंबर तू पटकावलास.. “इतकाच राग.
शिक्षाही भोगल्या की! बेंचावर उभे राहिलो, वर्गाच्या बाहेर ओणव्याने ऊभं राहून काही मिनिटे सहन केली. शंभर वेळा, शिक्षा म्हणून एखादी ओळ लिहिली. पण पालकांनी कधी शिक्षकांची तक्रार केली नाही.
शाळा म्हणजे एक मंदिर होतं. “हे! जगत्राता विश्वविधाता “या प्रार्थनेने शाळा सुरु व्हायची…
वर्हांड्यातल्या फळ्यावर रोज एक सुविचार लिहिलेला असे. आम्ही विद्यार्थीच लिहीत असू.
एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।
खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
अंथरूण पाहून पाय पसरावेत।
अलसस्य कुत:विद्या । अविद्यस्य कुत: धनम्।।
अधनस्य कुत: मित्र ।अमित्रस्य कुत: सुखम।।
Friend in need is a friend indeed
– – असे कितीतरी सद्विचार…संस्कारांचं गाठोडं बांधून दिलं या शाळेने.
या शाळेने, जसं मन घडवलं, तसं उमलत्या वयाबरोबर फुलणार्या स्पंदनांची ही जाणीव करून दिली. कळीचं फुल होताना घडणारी अंतस्थ वादळं बघायला आणि अनुभवायलाही शिकवलं. त्यासाठी लागणारी संयमाची, प्रशिक्षणाची, स्थैर्याची किल्लीही हाती ठेवली..
अकरावी नंतर शाळा संपली. (आमच्या वेळी दहावी अधिक दोन असे नव्हते. अकरावी होती. आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात असे.)
शाळेच्या त्या इमारतीला, त्या पटांगणाला, तिथल्या झाडांना, त्या घंटेला निरोप देताना, खूप खूप काहीतरी वाटून गेले.
उरले उरात काही
आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे
उचलून रात्र गेली ।।
अशी काहीतरी भावना झाली असावी.
माझी शाळा या दोन शब्दांबरोबर, या भावनांचे धबधबे असे कोसळले खरे! पण आज, या शेवटच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना, दूर कुठेतरी, अंत: चक्षूने माझी शाळा पाहताना वाटते, या चार भिंतीच्या शाळेने मला संरक्षण दिले. माझ्या जगण्याच्या सीमा निश्चित केल्या ही असतील. पण माझी विद्यार्थीदशा कुठे संपली? या शाळेच्या बाहेर एक मोठी शाळा होती जिथे माझा प्रवेश झाला. आणि त्या शाळेत मी अजूनही आहेच की! आज हीच *माझी शाळा* आहे. फरक इतकाच, या शाळेला भिंती नाहीत, बसायला बाक नाहीत, लिहायला फळा नाही,शिक्षकांचा ठराविक समूह नाही. जिथे जाऊ तिथे शिक्षक आहेत. ते आपल्यालाच शोधायचे आहेत. सारे काही मुक्त आहे. ज्ञानाचा सागर आहे. त्यात एक तर बुडाल नाही तर तराल. इथे तुमचं तुम्हाला शिकायचंय्. तुमचं तुम्हाला टिपायचंय्. अंथरुण पाहून पाय पसरायचे की अंथरुणच वाढवायचे? नेहमी खरं बोलायचं की कधी खोट्याचाही आधार घ्यायचा? जगावर प्रेम करायचे की जगापासून सावध राहायचे? एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा की ठोशास प्रतिठोसा द्यायचा, हे तुमचं तुम्हाला ठरवायचे आहे. *ये ग ये ग सरी माझे मडके भरी* हेच का माझं गाणं इथे असायला हवं हेही तुम्हालाच ठरवायचे आहे. आज मात्र *माझी शाळा* म्हणजे हे जग आहे,हे जीवन आहे का?
मनात येतं..
।जग हे बंदी शाळा
कुणी न येथे भलाचांगला
जो तो पथ चुकलेला
कुणा न माहीत सजा किती ते
कोठून आलो नच स्मरते
सुटके लागी मन घाबरते
जो आला तो रमला।।
या माझ्या शाळेत मात्र आजही मी विद्यार्थीच आहे. प्रवाहपतित, ज्ञानपिपासू. गुरूच्या शोधात असलेली मी अजूनही गमभन गिरवत आहे…
येई वो… किती प्रेमाने, लडिवाळपणे,आपलेपणाने विठु माऊलीला साद घातलेली आहे. अरे ये रे…
लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर)आडवा हात धरतो.
डोळे बारीक करून कोणी दिसतंय का… हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय.. तू येरे…
आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यां बरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री आहे… त्याची वाट बघण्यातही आनंद आहे…
“पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला… “2
अंतरंगातला प्रकाश उजळला तरच हे डोळे दिपवून टाकणार आभाळभर पसरलेलं..
झळकलेलं दिसेल.
प्रत्यक्ष विठ्ठल येणार आहे त्याचं रूप असे भव्यदिव्यच असणार…
कल्पनेच्या राज्यात जाऊन बघा बरं ते रूप…
मग गरुडावर बसून येणारा तो कैवारी दिसेल… पण तो माझा कैवार म्हणजे पक्ष कधी आणि कसा घेईल… याचाही मला विचार करायला हवा. त्यासाठी माझी बाजू सत्याची,न्यायाची हवी. मगच तो माझ्या साथीला येईल.
“असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया”3
महाराजांना आपली स्थिती कशी आहे हे पूर्ण माहित आहे… ते ओळखून आहेत.. तुझ्या बाबतीत आमचा भाव इतका शुद्ध,सात्विक, निरामय नाही. आम्ही प्रपंचात अडकलो आहोत.. तुझ्याकडे काहीतरी मागायलाच येतो. संकटात असलो की तुझी आठवण काढतो..
स्वतःचे हे अवगुण माहीत असूनही अत्यंत लडिवाळपणे हक्काने ते सांगत आहेत…
कारण तो सर्वांत जवळचा आहे. इथे त्याला म्हणूनच
“माझ्या पंढरीराया” असे संबोधले आहे.
तू आम्हाला क्षमा कर आणि आमच्याकडे कृपाळु नजरेने पहा.
“विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी”4
विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला की मग काय रोजच दिवाळी… दिवाळी म्हणजे पूर्णानंद आणि तो रोजच मिळणार… मग सुखाला काय कमी?
म्हणूनच आपला सात्विक भाव एकत्र करून त्याची आरती करायची.. आरती म्हणजे काय तर… आर्त स्वराने हृदयातून साद घालून म्हटली जाते ती आरती…
आता अंतकरणात भक्तीची निरांजन पेटवायची.. सदविवेकाचा कापूर लावायचा.. मनोभावे… आरती करायची.. तरच ती विठ्ठलापर्यंत पोहोचेल. इतका मनोरम आणि निर्मळ भाव आमच्यात हवा.. आरती म्हणताना ती आस आमच्या शब्दातही हवी…
असं हे या आरतीतलं आपल्याला नीट समजलेलं आहे.
इथपर्यंत झालं…
आता आपल्याला कृती करायची आहे. शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. आरती नुसती तोंडाने म्हणायची नाही तर ती अंतःकरणपूर्वक म्हणायची. त्यातला मूळ अर्थ जाणून घ्यायचा. शाब्दिक अर्थापेक्षा खूप वेगळे काही सांगायचं आहे हे ध्यानात… लक्षात घ्यायचं आहे.
मग जबाबदारी वाढते. आपल्याला तसं वागायचं बंधन येतं. पण हे बंधन हवसं आहे. या बंधनात कोणाची जबरदस्ती नाही. तर विठ्ठल प्रेमाने आपणच… बांधून घ्यायच आहे.
आपल्याला प्रगत करणारं उन्नतीकडे नेणार अस हे आहे. ते पूर्णपणे अंगी बाणून घेऊया.
विठ्ठलाला अनन्य शरण जाऊ या
मग तो येईलचं त्याची वाट पाहूया…
प्रत्यक्ष विष्णुदास नामांनीच हे सांगितलेलं आहे ते सुद्धा कितीतरी वर्षापूर्वी… एक सांगू का…
आपणही मनापासून बोलावून तर बघू या … मग प्रेमाने त्याला हाक घाला बरं ……
☆ असावा असा एक छंद! – लेखिका : रेशमा डोळे (रमा) ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
☆
नवीन ठिकाणी राहायला आलो, पण मन काही त्या नव्या जागेत अजून रुळलं नव्हतं. नवऱ्याच्या नोकरीची अजून सहा वर्षे बाकी होती. तब्येतीच्या कारणामुळे आम्हाला जुनी राहती जागा सोडावी लागली आणि त्यांच्या नवीन ऑफिसजवळ घर घ्यावं लागलं.
सुरुवातीचे एक-दोन दिवस सामान लावण्यातच गेले.
एक दिवस दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर एक गोड आजी उभ्या होत्या. गोऱ्यापान, गुलाबी वर्ण, ठेंगण्या. अंगात सुंदर पंजाबी ड्रेस, त्याला मॅचिंग टिकली, कानातले, बांगड्या… आणि ते निळेशार डोळे! सगळंच देखणं… आणि त्याहूनही गोड त्यांचं बोलणं.
मी मात्र घरच्या अवतारात होते. मला अगदीच लाजल्यासारखं झालं.
“अगं, मी तुझी शेजारीण. सगळे मला ‘माई’ म्हणतात. कालच यायचं ठरवलं होतं ओळख करून घ्यायला, पण लगेच आले असते तर तू म्हणाली असतीस, ‘काय ही म्हातारी, लगेच आली! ‘”
हे बोलून त्या गालावर खळी पाडत इतक्या गोड हसल्या की मी त्या खळीतच हरवून गेले.
“हे घे, मस्त टोमॅटो सूप आणलंय. घरात किती जण आहेत माहीत नव्हतं, म्हणून अंदाजाने आणलं. आवडतं ना? म्हणजे आवडत नसलं तरी आता प्यावंच लागेल हं! “
पुन्हा तेच मधाळ हसू…
“अगं, मीच बोलत बसले ना! माझं असंच होतं. समोर माणूस दिसला की किती बोलू आणि किती नको, हेच कळत नाही.
चल येते… चालू दे काम तुझं.. काही लागलं तर सांग.. “
आमच्या दोघींच्या गच्च्या समोरासमोर होत्या. त्यामुळे सकाळी हळूहळू गप्पा सुरू झाल्या. बिल्डिंगमध्येही एक-दोन ओळखी झाल्या; पण तिथल्या बायकांना इतर रहिवाशांच्या घरात काय सुरू आहे याच्या गप्पा, मालिकांची चर्चा यांतच जास्त रस होता. त्यामुळे मी त्यांच्यात फारशी रमले नाही.
माईंच्या हातचे पदार्थ अप्रतिम असायचे. हळूहळू माझ्या घरूनही पदार्थांच्या वाट्या त्यांच्याकडे जाऊ लागल्या. त्या मनापासून कौतुक करायच्या आणि मला अजून काहीतरी करून त्यांना खाऊ घालावंसं वाटायचं.
मी आता इथे रुळले आहे, हे पाहून नवरा आणि परदेशात असलेली मुलगी दोघेही निर्धास्त झाले. “आता काय करू? कंटाळा आलाय… ” हा माझा पंचक्षरी मंत्रही बंद झाला.
एक दिवस सकाळी माई गच्चीत बसून क्रोशेचं काम करताना दिसल्या.
दुसऱ्या दिवशी सगळी कामं आटोपून मी अकराच्या सुमारास त्यांच्या घरी गेले.
माईंबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं. एवढंच ऐकलं होतं की त्यांचे पती आणि मुलगा आर्मीमध्ये होते.
घरात शिरताच समोर भिंतीवर मोठा फोटो होता. माई, त्यांचे पती आणि मुलगा. पती आणि मुलगा दोघेही आर्मीच्या गणवेशात.
घराचा प्रत्येक कोपरा त्यांनी इतका सुंदर सजवला होता! कुठेही दिखाऊपणा नव्हता; पण साधेपणातलं देखणेपण मात्र प्रत्येक वस्तूतून जाणवत होतं.
“येतेस का गं आत? मी जरा आमच्या नातेवाईकांना जेवू घालून येते. “
मी चकित झाले.
नातेवाईक? पण घरात कोणाचाच आवाज नव्हता. बाहेर चप्पलही नव्हत्या.
“माई, मी नंतर येऊ का? “
“अगं, कशाला? थांब. हे असे जेवतील आणि जातील. “
मला काहीच कळेना.
“ये ना, आतच. तुझी ओळख करून देते. “
मी किचनमध्ये गेले.
खिडकीजवळ खुर्ची टाकून माई बसल्या होत्या. त्यांच्या हातात कणकेच्या छोट्या गोळ्यांचा डबा होता.
एक गोळा त्यांनी खिडकीत ठेवला.
क्षणात एक कावळा आला, दोन मिनिटं एकदम शांत बसून राहिला. सावकाश एक गोळा चोचीत धरला आणि उडून गेला.
“ही माझी बहीण. एकदम गाय होती. आयुष्यभर कधी कसले नखरे नाहीत. समोर जे आलं ते आनंदाने स्वीकारलं. “
पुढचा गोळा ठेवताच दुसरा कावळा आला. बराच वेळ कर्कश आवाज करत राहिला. गोळा चोचीने इकडे-तिकडे करत राहिला आणि मग घेऊन गेला.
माई हसत म्हणाल्या,
“या माझ्या सासूबाई. आयुष्यात कधी म्हणून कौतुक नाही. “
मलाही आता गंमत वाटू लागली.
पुढचा गोळा ठेवला. एक कावळा आला; पण आमच्याकडे पाठ करून बसला.
“हा कोण? “
“आमच्या आईचे मोठे जावई. कायम मानपान हवा असायचा. अजूनही ताठा तोच. “
माई म्हणाल्या,
“जयंतराव, वाढलं आहे. येता का? “
माई हे म्हणताच क्षणात तो कावळा वळला, गोळा घेतला एकदा कर्कश्य ओरडला आणि उडून गेला.
योगायोग असेल कदाचित; पण मला मात्र हे सगळं विलक्षण वाटत होतं. मला आता जरा मजा वाटत होती.
आणखी एक कावळा गोळा घेऊन खिडकीच्या कपारीत ठेवून थोडा खाऊन उडून गेला.
“ही माझी जाऊ. कायम सगळं लपवून ठेवायची. “
तेवढ्यात एक खार आली.
“माई, हीसुद्धा नातेवाईक? “
“नाही गं. ही पाहुणी. “
एक गोळा घेऊन ती धूम ठोकून पळाली.
थोड्याच वेळात आणखी एक कावळा आला. आधी त्याने चोचीने जागा स्वच्छ केली, मग स्वतःची चोच साफ केली आणि शेवटी गोळा खाल्ला.
मी भुवया उंचावत विचारलं,
“हे कोण? “
माई कपाळावरचं कुंकू दाखवत हळूच म्हणाल्या,
“आमचे हे… सगळी कडे शिस्त म्हणजे शिस्त. “
त्यांच्या डोळ्यांत त्या क्षणी वेगळीच चमक होती.
थोड्या वेळाने कावळे येणं थांबलं.
माईंनी दहीभाताची वाटी खिडकीत ठेवली.
क्षणात एक कावळा आला आणि दहीभातावर तुटून पडला.
मी हसत विचारलं,
“याला वेगळा मेनू? फार स्पेशल दिसतोय हा नातेवाईक. “
क्षणात माईंचे डोळे भरून आले.
“माझा लेक… नील. त्याला माझ्या हातचा कालवलेला दहीभात फार आवडायचा. “
माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत.
क्षणभर शांतता पसरली.
पण पुढच्याच क्षणी माई नेहमीसारख्या गोड हसल्या.
“चल… झाले सगळे. उरलेले गोळे ठेवून देऊ. अजूनही येतात हळूहळू. जवळचे सगळे भेटून गेले. “
मी म्हणाले,
“माई… आज क्रोशा नको. आज फक्त गप्पा मारूया. हा सगळा प्रकार मला सांगाल? “
माई हळूच बोलू लागल्या.
“हे आणि माझा मुलगा नील… दोघेही एका पाठोपाठ गेले. हे आजाराने गेले आणि नील देशासाठी शहीद झाला. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. आम्ही दोघी बायका अक्षरशः कोलमडलो होतो.
एक दिवस मला स्पष्ट जाणवलं… नील मला दहीभात मागतोय.
सुनेनेच सांगितलं, ‘आई, तुम्हाला तो जाणवतोय ना? मग खिडकीत ठेवा. ‘
मी दहीभात ठेवला… आणि मिनिटभरात एक कावळा आला. सगळा भात खाऊन गेला. मग रोजच ठराविक वेळी येऊ लागला.
त्या दिवशी मला किती आनंद झाला होता, हे मी कुणालाच सांगू शकले नाही.
वर्षभराने मी सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं. ती तिच्या संसारात सुखी आहे. मला दोन गोड नातवंडं आहेत. आली की तुला भेटवेन.
मग नीलसाठी ठेवलेला दहीभात… त्यानंतर एक-एक कावळा यायला लागला मग रोज अशी पंगत बसायला लागली… आणि हळूहळू हा माझा छंद झाला.
लोक म्हणतात ना, माणूस एकटा पडला की काहीतरी आधार शोधतो…
मी माझे आधार या ‘नातेवाईकांमध्ये’ शोधले. “
थोडा विराम घेऊन त्या पुढे म्हणाल्या,
“बिल्डिंगमध्ये गेले की मुल सुनांचा तक्रारी, मेंदू बधिर करणाऱ्या मालिकांवर चर्चा या गप्पा. माझी सून दुसऱ्या घरी सुखात आहे म्हणून तिच्याबद्दल वाईट बोलायचं मला कधी जमलं नाही. मग माझ्या कडून काही मसालेदार खबर नाही म्हणून मी जरा त्यांच्यात नापासच होते.. मग मी खाली जाणंच बंद केलं.
आता, सकाळी या नातेवाईकांसोबत वेळ जातो. दुपारी थोडेसे विणकाम किंवा वचन, चार वाजता परदेशात राहायला जाणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन रेसिपी क्लास. संध्याकाळी मिलिटरीच्या एनजीओमध्ये काम. रात्री पुन्हा घर… असा माझा दिवस संपतो.
लोक मला वेड्यात काढतील म्हणून हे कावळ्यांचं प्रकरण मी कुणालाच सांगितलं नव्हतं… तुला सांगितलं… कारण तू चेष्टा करणार नाहीस, असा विश्वास वाटला. “
मी त्यांच्या हातावर हलकेच हात ठेवला. त्या दिवशी मला एक गोष्ट उमगली…
प्रत्येक जण दुःख विसरण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. कुणी देवात रमतो, कुणी कामात, कुणी आठवणींमध्ये… आणि माई? माई रोज आपल्या “नातेवाईकांना” एक गोळा कणिक वाढून जगण्याची उमेद गोळा करत होत्या.
त्या दिवशी मी क्रोशा शिकले नाही…
पण आयुष्याच्या विणकामात दुःखाचे धागेही किती प्रेमाने गुंफायचे असतात, हा सर्वात मोठा धडा मात्र माईंनी मला शिकवला.
☆
लेखिका : रेश्मा डोळे (रमा).
प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.
बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.
तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.
मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.
सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी काम देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला धपाटे देईन हं असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.
कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.
कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. श्वास चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.
खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.
बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.
“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते. मी तिला सांगितलं तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. क्लार्कला पैसे द्या म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. ”
बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.
आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.
देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.
निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार धपाटे देईन हं म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.
बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.
समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :
महंते महंत करावे,
युक्तीबुद्धीने भरावे,
जाणते करून विखरावे,
नाना देशी.
समर्थच असेही म्हणतात की
आपणासी जे ठावे,
ते ते दुसऱ्यासी सांगावे,
शहाणे करून सोडावे,
सकळ जन.
हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं.
बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.
जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!
आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!
तू आमचे काम सोडून गेलीस त्याला आता महिना होऊन गेला. तुझी वाट बघून, फोन करून मी थकले पण तू काही परत आली नाहीस की फोन उचलला नाहीस.
आजारी आहे म्हणून सुट्टी घेतलीस ती काम सोडण्यासाठीच. तुझे ते न सांगता काम सोडणे माझ्या मनाला खूप लागले. वाटले काय कमी होते तुला आमच्या घरी?
तू तुझ्या सवडीनुसार कामाला यायचीस, भराभर कामे उरकायचीस, हक्काने रोज चहा आणि जेवण पण मागायचीस, दर रविवारी सुट्टी, दिवाळी बोनस, गरजेला आगाऊ रक्कम देत होतोच. जुने कपडे/ भांडी/पुस्तके/ वस्तू / रद्दी हे सगळे तुझ्याच स्वाधीन करायचो आम्ही. असे काय कमी पडले म्हणून तू गायब झालीस?
तशी तू हुशार होतीस, हिंदी बरोबर तुला थोडे इंग्रजी पण यायचे म्हणून मला कौतुक वाटायचे. गप्पा मारायला तुला खूप आवडायचे. सगळ्या बातम्या मला तुझ्यामुळेच कळत, एवढेच नाही तर बाजारात काय नव्या गोष्टी आल्या आहेत हे पण तूच सांगायचीस, जसे की साड्या, ड्रेस, बांगड्या, दागिने, भांडी, मशिन वगैरे वगैरे…
तू अगदी हौशी होतीस, स्मार्टफोन पण माझ्या आधी तुझ्याकडे आला होता. तुला त्याचा उपयोग करता येत नव्हता ही गोष्ट निराळी! पण आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात असा तुझा एक अट्टाहास असायचा.
त्यात काही गैर नव्हते पण या वस्तू तुला माझ्याकडून (किंवा इतरांकडून) मिळाव्यात असे वाटायचे. मग घरात काही नवी वस्तू आणली की लगेच जुनी वस्तू मला द्या म्हणून मागे लागायचीस. नवा लॅपटॉप, टीव्ही आला की जुना तुला पाहिजे म्हणायचीस. नवा मिक्सर आणला, तुला जुना दिला. अशा कित्येक गोष्टी तुला दिल्या.
दर महिना पगार होताच पण तू सतत काहीतरी मागत असायचीस. तुझी नजर सारखी घरातल्या गोष्टींवर भिरभिरत असायची. माझ्या घरी काय काय वस्तू आहेत आणि त्या कोठे ठेवल्या आहेत हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायचे.
का कोणास ठाऊक पण मला तुझ्या या सगळ्या गुण दोषांची इतकी सवय झाली होती की मला त्यात काही वावगे वाटायचे नाही. कामवाल्या बायका अशाच असतात अशी माझी एक समजूत!
पण हे सगळे अती होत चालले होते. तुझा अहंकार आजकाल वाढत होता. ‘माझ्याशिवाय‘ काही कामे होत नाहीत हे तुला कळून चुकले होते. त्यामुळे तुला ‘नाखुष ‘कोणी करत नव्हते.
अलीकडे तर तू मला कॉफीची ऑर्डर सोडू लागलीस. पाव नको बिस्किट द्या, शिळे नको ताजे द्या. मी समजू शकते हे, पण तू एकदा मला शिरा करून द्या म्हणालीस, आणि लाडू पण बरेच दिवसात दिला नाही खायला असे म्हणालीस, हा धक्काच होता मला.
माझ्या हातचे सांबार तुला खूप आवडायचे. ते केले की मी आधी तुला द्यायचे मग आम्ही खायचो. गोष्टी इतक्या थराला गेल्या.
पण काय करणार, आमचे हात बांधले होते. तुला गमावून चालणार नव्हते म्हणून मुकाट्याने सगळे सहन केले. म्हटले ही सोडून गेली तर रोज भांडी कोण घासणार? झाडू कोण मारणार? फरशी कोण पुसणार? आपल्याला काही झेपणार नाही हे.
आणि कामवाली बाई बदलली तरी हीच तर्हा असणार हे मी अनुभवावरून जाणून होतेच. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असेच काहीसे झाले होते…
पण कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. तुझी वाट बघता बघता ७/८ दिवस मी सगळी कामे केली. नाहीतरी मी भांडी स्वछ धुवूनच तुला घासायला ठेवत असे, आता फक्त साबण लावून धुवून टाकायची, आणि लक्षात आले की जमतंय…
सुरुवातीला खूप त्रास झाला, वेळ पण बराच लागला कारण या कष्टाची सवय नव्हती. दुसरी कामवाली बाई पण विचारून गेली पण मी मात्र ठरवले होते आता या कामवाल्या बायकांचे कौतुक बस्स झाले.
माझा पण आता थोडा आत्मविश्वास वाढत होता, आपण ही कामे करू शकतो आणि जास्त चांगली करू शकतो हेही लक्षात आले. नवरा पण मदत करू लागला, मुलाला पण थोडे ट्रेनिंग दिले.
ही कामे करता करता आमच्यातला संवाद वाढला. एवढेच नाही तर आम्ही घरा-दाराशी, भिंतींशी, घरातल्या वस्तू, भांडी-कुंडी, फर्निचर या सार्या गोष्टींशी बोलू लागलो.
साफसफाई करताना अधिक काळजी घेऊ लागलो. घराचा कोपरान् कोपरा लख्ख झाला.
आम्हा बायकांना भांड्यांविषयी जरा जास्त प्रेम असतेच. आता भांडी घासताना ते उतू जाऊ लागले. भांडी जास्त चमकू लागली.
तुला दर पंधरा दिवसांना लिक्विड सोपची मोठी बाटली लागायची. आता तीच बाटली मी दीड महिना वापरते आहे. भांडी घासताना तू खूप पाणी वाया घालवत होतीस, बर्याचदा सांगून पण तू ऐकले नाहीस. एवढे पाणी वापरुन पण भांड्यांवरचा साबण तसाच राहायचा. मला परत परत ते भांडे धुवायला लागायचे.
तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्ही किती किलो साबण खाल्ला असेल कोणास ठाऊक?
अजुन बर्याच गोष्टी कळल्या. भांडी मीच घासत असलेने स्वयंपाक घरातील भांड्यांची संख्या कमी झाली. भांड्यांचा एक सेट पुरतो आता. शिवाय भांडी चेपली जात नाहीत, पोचे येत नाहीत अगर हँडल तुटत नाही की काचेची भांडी फुटत नाहीत.
चार मोठ्या खोल्यांचा केर तू ५ मिनिटांत काढायचीस आणि १० मिनिटात फरशी पुसून टाकायचीस.
वाटायचे काय फास्ट बाई आहे, पण आता कळते की तू सोफा, कॉट, खुर्ची, टेबलखाली धुळ ठेवत होतीस. आता मी या सगळ्या वस्तू वेळोवेळी हलवून त्या खालचा केर काढून मग पुसून घेते. आता प्रत्येक वस्तू कशी लखलखते आहे.
तीच गोष्ट बाथ-रूमची. तू प्रचंड प्रमाणात हर्पिक, फिनेल वगैरे केमिकल्स नुसती ओतत होतीस. पण तरीही ते स्वच्छ वाटत नव्हते. कारण तू जोर लावून कामे करत नव्हतीस. ,
आता या सगळ्या सफाईच्या खाचा-खोचा मला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरुन फरशी आणि बाथ-रूम एकदम चकचकीत झाले आहे. अगदी नव्यासारखे. येऊन बघ एकदा!
कोणी तरी म्हटले आहे की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडायला माणसाला साधारण २१ दिवस लागतात. त्याचा प्रत्यय आला.
ही कामे करायला मला आता जास्त कष्ट किंवा वेळ लागत नाही. अगदी हातासरशी ही कामे होतात.
भांडी घासता घासता मी मोबाइल वर माझी आवडती सिरियल पण बघते. झाडू-पोछा करताना छान गाणी लावते आणि त्या तालावर कामे कधी संपतात ते देखील कळत नाही मला.
अजून एक, हे सारे करताना माझे हात त्या उग्र रसायनांपासून जपतेय. रबरी हातमोजे वापरुन.
आता तुझी वाट बघणे नाही, तू येशील की नाही ही धाकधुक नाही. अचानक पडलेल्या कामांचा ढीग नाहीकी ते होणार कसे याचे टेन्शन पण नाही.
खरच आता मला जास्त रिलॅक्स वाटताय. स्वावलंबी असण्याचा अर्थ कळतोय. न जाणो अजून काही काळानंतर अमेरिकेसारखी कामवाल्या बायकांची कमतरता भासू शकते आपल्या भारतात सुद्धा… म्हणून आतापासूनच तयार आहे मी.
तू आमचे काम सोडून मला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिलीस. बऱ्याच गोष्टी तुझ्या कडून शिकले. आता मला तू गुरू स्थानी.. म्हणून तुला दंडवत!
एका रविवारी नक्की घरी ये हा बदल पहायला!
तुझी
दीदी
लेखिका : अनामिका.
प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हा मीच तो… आणि तो हाच तो…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
– – भीक मागणाऱ्या वृद्धांमध्ये बसून टगेगिरी करणारा आणि त्यांना त्रास देणारा तो हाच तो…
– – माझ्या कामात उगीचच अडथळे निर्माण करणारा तो हाच तो…
… आणि खूप समजावून सांगून, कधी सांभाळून घेणारा हा मीच तो…
– – अंगकाठी बारीक परंतु कोणतीही गुन्हेगारी करण्यास न घाबरणारा तो हाच तो…
– – आई वडील दोघेही नाहीत कोणतेही संस्कार न झालेला तो हाच तो…
– – एके दिवशी माझ्या देखत एका वृद्धाला थोबाडीत मारणारा, तो हाच तो…
… आणि माझा ताबा सुटला, शेजारी पडलेला दांडका, त्याच्या दिशेने जोराने फेकलेला…
हा मीच तो…
– – हेतू नव्हता, परंतु डोळ्याच्या शेजारी दांडक्याने झालेली मोठी जखम… तो हाच तो…
… आणि जीव आणि डोळा थोडक्यात वाचला… घाबरून गेलेला मी हाच तो…
– – रागाने त्याने पायातली चप्पल मला फेकून मारली, या चपलीचा नेम चुकवणारा तो मीच तो…
– – पुनः मांडीवर डोकं घेऊन जखमेचे ड्रेसिंग करणारा हा मीच तो…
– – ड्रेसिंग करता करताही मला शिव्यांची लाखोली वाहणारा हा तोच तो…
– – घाणेरड्या शिव्या ऐकून रडणारा तो मीच तो…
– – आपलीच चूक आहे, शिक्षा भोगायला हवी, हा विचार करणाराही तो मीच तो…
– – रस्त्यावर कुणीतरी मेलंय आणि कोणीतरी रडतंय असं वाटून त्याचाही तमाशा बघणारा घोळका जमला… तो घोळका हाच तो…
दुसऱ्याची वेदना हि आपली करमणूक आहे, असं समजून सेल्फी घेणारा षंढ घोळका… तोही हाच तो…
– – असो, बिना आई बापाचा… वाट चुकलेला मुलगा तो हाच तो…
… आणि आपणच आता आई होऊ, आणि याचा बाप होऊन त्याला जवळ घेऊ असं वाटणारा मीच तो…
– – हळूहळू माझी सावली आणि माझी कवच कुंडलं होऊन माझ्या मागे मागे फिरणारा तो हाच तो…
– – “तुमी काय बी सांगा सर, आपुन येकांद्याचा खून बी करंल तुमच्यासाटी, तुम्ही फकस्त बोलून बगा” म्हणणारा तो हाच तो…
– – मग त्याला एका खुनाची सुपारी द्यायला, आड बाजूला घेऊन गेलो… हो तोही मीच तो…
– – मी त्याला पाच हजार रुपये दिले, एक खून करायचा आहे म्हटलं, पैसे खिशात ठेवीत उत्साहीत होणारा… तो हाच तो…
– – “खून कुणाचा करायचा सर? ” भाबडेपणाने विचारणारा… तो तोच तो…
… आणि “तुझाच माझ्या बाळा” हे तितक्याच भाबडेपणाने सांगणारा… तो मीच तो…
– – सर…? तुमी…?? माझा??? खून…????
गोंधळलेल्या अवस्थेत, तोंडावर भीती स्पष्ट, पण अस्पष्ट वाक्य बोलणारा तो हाच तो…
… होय माज्या राजा, खून तुझाच करायचा आहे, पण तुझ्या आतल्या गुंडगिरीचा, गुंडाचा, टवाळखोर आणि टगेगिरीचा… तू खूप गोड आहेस रे सोन्या… लोकं लोखंडावर सोन्याचा मुलामा देतात आणि त्याला बाजारात खपवतात… तू तर अस्सल सोनं आहेस रे माझ्या बाळा… लोखंडाची सुरी घेऊन कोणाला धमकावण्यापेक्षा… पडलेल्या कोणालातरी उठवून बघ, मरणाऱ्या कुणाला तरी जगवून बघ, विझलेली एखादी ज्योत पेटवून बघ, एखाद्यासाठी प्रार्थना करून बघ… मग तुजा हातच सोन्याचा होऊन जाईल रे माज्या सोन्या…!
… करशील खून तुझ्यातल्या गुंडाचा…? या पाच हजारात एखादा धंदा चालू कर…
… मी तुजी आई होण्याचा प्रयत्न करंल आन बापबी…!
… भाऊकपणे प्रश्न विचारणारा… तो मी हाच तो…
– – रडत म्हणाला “आजपत्तूर मला कुनी सोन्या बाळा राजा म्हनालं नाही… ” तुमी म्हनला… यानंतर अंगावरले सर्व कपडे फाडत, रडत रडत म्हणाला केला खून मी… माझ्यातल्या गुंडाचा… फेकून दिलं मी समदं… समदा नागडा झालो मी. आता नाव द्या मला…! “
– – मी काय नाव देणार… आजपासून माणूस म्हणून जन्माला आलेला तो हाच तो… आता त्याच्यावर कसलाही कोणताही शिक्का नव्हता, नावाचा सुद्धा…
… तो… तो… हाच तो…!
– – मग गळ्यात पडून कधी आई म्हणत, कधी बाबा म्हणत, रड रड रडला… रडला… खुप रडला… तो हाच तो…
आम्ही एका नदीकाठी बसलो होतो… याच नदीकाठी एक डिलिव्हरी झाली… मात्र जन्माला तिघे आले…!
… एक कोणताही शिक्का नसलेलं बाळ… तो हाच तो
… एक आई आणि एक बाप… तो मीच तो…
… तो सर्वसामान्य माणूस म्हणून कामाला लागला, कमावू लागला… तो हाच तो…
… लगीन करायचं हाय, पोरगी मी शोदली हाय, म्हणत माझ्या मागे लागलेला… तो हाच तो…
… लग्न लागलं, वरपक्ष म्हणून एकटाच नाचणारा तो मीच तो…
– – लग्नाच्या आधी कानात काही गोष्टी विचारणारा तोच तो…
… लग्नाच्या आधी कानात काही गोष्टी सांगणारा मीच तो…
– – लग्न पार पडल्यानंतर हमसून रडू लागणारा तो हाच तो…
… वरपक्ष म्हणून छाती फुगवून उभा असणारा… तो मीच तो…
– – त्याला म्हणालो, ‘बेण्या, आज आपण रडायचं नसतंय… वधू पक्षाकडील मंडळी रडतील… रडू दे त्यांना’ हे म्हणणारा वरपक्ष म्हणून निर्ढावलेला मीच तो…
– – ‘सर तिच्या बापाची ती येकुलती येक मुलगी व्हती, आपुन आज तिच्या बापाचं काळीज घिवून चाललो, तिच्या बापाला कसं वाटलं आसंल, पोरी वाचून त्यो आता रोज कसा जगंल? म्हनुन मी रडतूय सर’…
हे म्हणणारा, सोन्याचे हात झालेला तो हाच तो…
– – एकेकाळी याच मुलाने मला चप्पल फेकून मारली होती,
आज बरोबर नेम धरून ती माझ्या थोबाडावर बसली होती…!
नेम वर्मी लागला होता, आता डोळ्यात पाणी आलेला हा मीच तो…
– – एकेकाळी सूरी घेऊन कुणाच्या तरी काळजावर बिनधास्त वार करणारा हाच तो…?
… आज मुलीच्या बापाच्या काळजाचाही विचार करणारा तो हाच तो…??
– – शरमून गेलो… शरमणारा फक्त मीच तो…!
… हा सर्व खेळ, नाटक समजून विंगेत बसून बघणारा मीच तो…!
एवढ्या सर्व गडबडीत तो भाबडेपणाने माझ्या कानात म्हणाला, ‘सर लग्नात माजी एक चप्पल हारावली… ‘
.. त्याला आता कोणत्या तोंडाने सांगू, एकदा तुझा नेम चुकला होता, आज तो नेम बरोबर माझ्या थोबाडावर लागला आहे, आणि ती चप्पल मी आता माझ्या हृदयात जपून ठेवली आहे… हे सांगणारा मीच तो…
मी विषय बदलला, ‘अरे येड्या चपलीचं काय विचारतो, तुम्हा दोघांचा “जोडा” बघ किती छान दिसतोय… बायकोकडे बघ की रं जरा… ‘
तो लाजला… आहा रे… तो… लाजला… बघा तो लाजला… लाजला… तो हाच तो…
… तिघांनी मिळून मग हा फोटो काढला… तो हाच तो…!
– – जाताना मुलीकडचे सर्व रडत होते, त्यात आणखी एक माणूस रडत होता… तो हाच तो…
… आणि… आणि त्याचा माणूस म्हणून झालेला जन्म, आणि तोंडावर मारलेली चप्पल हृदयात घेऊन, अत्यंत समाधानाने त्याच्या मागे मागे चालणारा हा मीच तो…!!!
… पिठापूरला जाताना सकाळी 10 च्या सुमारास विजयावाडा जंक्शन आले.
इथे इंजिन बदलते हे कळल्यावर म्हणलं चला बघू प्रोसेस. आमचा डबा ही इंजिना पासून 4- 5 वाच होता.
पूर्वी पुणे स्टेशनवर महालक्ष्मीचे डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लागायचे आणि मग गाडी मुंबई कडे जायची हे पाहिले होते.
हातात चहाचा कप घेऊन तिथे पोचेपर्यत पहिले इंजिन निघाले होते. समोर दिसणा-या अनेक इंजिना पैकी एखादे येईल म्हणून बघत बसलो. थोड्यावेळाने लक्षात आले जोडणी करणारे रेल्वे कर्मचारी ही नाहीत. कदाचित ते नवीन येणा-या इंजिनातून येतील असे वाटले. दहा – पंधरा मिनिटे झाली काहीच हालचाल नाही, तेवढ्यात घोषणा झाली की कोणार्क एक्सप्रेस सुटत आहे. शिट्टी मारून गार्डने झेंडा दाखवायला सुरवात केली आणि धावत पळत जाऊन गाडी सुटत असताना आमचा डबा पकडला.
इंजिन दुसऱ्या बाजूला लागले होते. पूर्वीच्या अनुभवावरून मनाने खात्री केलेली की इंजिन आम्ही जिथे आहोत तिथेच लागेल.
आयुष्याचं पण असंच नाही का? आपण एक विचार करत असतो पण एका योग्य स्टेशन वर थोडी प्रतीक्षा करायला लावून नियती एका वेगळ्याच मार्गाने, जो आपल्यासाठी कदाचित अधिक चांगला आहे तिकडे नेणार असते.