मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Supporting Role..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Supporting Role.. ☆ संध्या बेडेकर ☆

इतक्यातच गोवर्धन असरानी च्या निधनाची बातमी वाचली. आणि अनेक सिनेमे… त्यातील असरानी चा Supporting role आठवला.

 हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है.

शोले तील हा डायलाॅग तर सर्वांच्याच लक्षात असेल.

मुख्य भूमिकेत नसले तरी Supporting role खूप महत्वाचा असतो. सिनेमातील मिर्च मसाला, खोडकरपणा, light कॉमेडी supporting role मुळेच असते. त्या भूमिकेशिवाय सिनेमा पूर्ण वाटत नाही. खूपदा तर मूख्य पात्राच्या भूमिकेला supporting actor मुळे रंग चढतो. त्याची भूमिका रंगते. सहज होते. नाट्य प्रभावशाली होत.

 काल आम्ही नाट्य अभिवाचनाची प्रॅक्टिस करत होतो. मुख्य कलाकारांचा रोल अर्थातच मोठा होता, परंतु वेळेवर, योग्य ठिकाणी, supporting कलाकारांनी दिलेल्या responses मुळे आमचा कार्यक्रम छान रंगला. प्रेक्षकांवर गोष्टचा प्रभाव पडला. आवडला सगळ्यांना. बक्षीस ही मिळाल.

आपल्या आयुष्यातही आजूबाजूला बघीतल तर सहायक भूमिकेत काम करणारे किती तरी जण असतात. त्यांच्या support शिवाय आपलंही रोजचे जीवन आयुष्य व्यवस्थीत चालू शकत नाही.

असरानीची बातमी ऐकून सहजच मनात हे विचार आले.

मी आणि ताईने हा सिनेमा दोनदा बघितला होता.

याच विचारात असताना ताई चा फोन आला.

म्हणाली… अग! वाचली का बातमी?

असरानी गेला बाई…

अग! Supporting role किती महत्वपूर्ण असतो. ते फक्त सिनेमातच नाही तर आपल्या आयुष्यात ही त्यांच महत्व असतच. नाही का?

आपल आयुष्य म्हणजे सिनेमाच नाही का ग?

अग! आता माझच बघ… माझ्या Real life picture मध्ये प्रसन्न साक्षी शिल्पा supporting role ची भूमिकाच तर करतायेत.

खरच रक्ताच काही नात नसताना आपल्या आयुष्यात किती माणसांची entry होत असते नाही.

मला थोड हसूच आल. गम्मतच वाटली

 ताईची… आता supporting role चे कौतुक करणारी,… हीच ती वर्ष भरापूर्वीची ताई आठवली. सर्व काम मीच करेन, असा हट्ट असणारी. कोणाचही न ऐकणारी…

 आयुष्याच्या प्रत्येक फेज मध्ये आयुष्य व्यवस्थीत चालू ठेवायला अनेक गोष्टींबरोबर adjustment करायच असत/ कराव लागत/करायला पाहिजे. Support घ्यावा लागतोच.

 आज ताई -भाऊजीं Super senior zone मध्ये आहेत. दोघेही छान राहतात. एकमेकांना सपोर्ट करतात. न चूकता औषध घेतल ना हे काळजीने विचारतात.

सांपत्तिक स्थिती चांगली म्हणजे 

खाऊन पिऊन सुखी आहेत. गाठीशी थोडा पैसाही आहे. दरमहा येणारी पेंशन म्हणजे तर महिन्याचा energy dose आहे. Life Line आहे.

मुलगा अमेरिकेत नोकरी करतोय. तेथील citizenship मिळाली आहे. आता त्याची मुल मोठी झाली आहेत. त्यामुळे कधी मुलगा, कधी सून मधून मधून येऊन जातात. आता ताई भाऊजीं मात्र जात नाहीत. एकतर लांबचा प्रवास, तेथे आजारी पडण खूप महागात पडत. आणि मुख्य म्हणजे तिथे करमत नाही.

इतक्यातच अनघा भारतात येऊन गेली. मागच्या वर्षी अजय आला होता. यावर्षी अनघा.

अजयने यावर्षी मुद्दामच अनघाला पाठवलं. आई बाबांचे काम जरा व्यवस्थित करून ये, हे सांगूनच पाठवलय.

 दोन तीन दिवस तिने ताई ची घरातील काम, इतर गोष्टी बघून घरातील system थोडी reconstruct- Reorganize Redesign केली…

ताईचे सकाळपासून दुपारपर्यंतची काम बघून, यावेळेस अनघा रागवलीच.

अहो आई! काय हे? मी करते, मी करेन हे अस किती दिवस करणार आहात तुम्ही?

आणि किती पैसे वाचवणार आहात?

खर सांगू आई.. तुमच्याकडून आता पहिल्यासारखी काम होत नाहिये. तुम्ही रागवू नका… पण हे बघा अनेक ठिकाणी dusting ची गरज आहे. खर तर deep cleaning ची गरज आहे. तुम्ही नेहमी म्हणता… तेवढाच शरीराचा व्यायाम होतो. पण घर काम करणे म्हणजे exercise नाही तो व्यायाम होत नाही, ते फक्त कामच असत.

अहो! फ्रिज केंव्हा स्वच्छ केलाय सांगा बर तुम्ही?

आता यावेळेस मी काही ऐकणार नाहीच.

अनघाने यावेळेस सर्व आपल्या ताब्यात घेतल.

भाऊजी म्हणाले… अनघा I am with you. मी सांगून सांगून थकलो.

अनघाने…

आधी स्वयंपाक घरातील जूना तवा, हॅन्डल नसलेल चहाचे भांड, प्लास्टिक च्या गाळण्या सर्व बदलल. किती तरी जून्या गोष्टी फेकायलाच हव्या होत्या.

एजेंसी मधून माणस बोलवून घराचे deep cleaning करून घेतले. अनेक उपयोगात नसलेल्या वस्तू, कपडे बाहेर टाकल्या. नवीन आणल्या.

मुख्य म्हणजे घरकामाला आता दोन मावशी येतात. स्वयंपाक करायला, भांडी फर्शी, डस्टिंग करायला येतात.

अनघाच ताई बरोबर च बोलण ऐकून तिसर्या व्यक्तीला… अनघा म्हणजे ताई ची सून नाही मुलगी आहे असच कोणालाही वाटेल..

सोसायटीच्या सेक्युरीटी गार्डचा मुलगा चांगला आहे पण नोकरी करत नाही. त्याला अनघाने बोलवून भाऊजींची महिन्याच्या कामांची लिस्ट सांगितली त्याबरोबरच वरची काम करायला सांगीतल. महिनाचे पैसे द्यायचे ठरले.

भाऊजी जरी on line काम करत असले तरी आता हाताशी प्रसन्न असतो. अगदी लिफाफे, पेंसील काहीही वस्तू आणायची असली, वरून सामान काढायचे किंवा ठेवायचे असले तरी प्रसन्न हाजिर असतो.

खरतर हे सर्व ताई स्वतःच करू शकली असती. पण अस न करण्यामागे काय कारण असतात माहित नाही.

पैसे खर्च करण खूप जणांना जमत नाही. या उलट काही घर मदतनीसांच्या भरवशावरच चालतात. ही दोन extreme टोक आहेत.

याचा मध्य पण असूच शकतो ना.

ताई सारखे वागण बरेच घरात दिसत.

त्यांना स्वतःच कौतुकही वाटत. शरीराला हालचाल नक्की पाहिजेच. पण त्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीत झाडू फर्शी करण किती योग्य आहे?

 Active रहायला बाकी बर्‍याच गोष्टी आहेतच की.

आपल्या पिढीने खूप पैसा बघीतला नाही. हे खरय. पण छान आरामात रहायला खूप पैसा लागतही नाही. छान व्यवस्थित राहण ही आवड असायला हवी. आणि त्याप्रमाणे पैसा खर्च करावा. घरच्या स्त्रीने अगदी हक्काने त्यानुसार सर्व सोई करून घ्याव्या.

बरे असो…

 आज ताई डबल आनंदात आहे. एकतर सर्व छान व्यवस्थित झालेल बघून, तिला छान वाटतय. , दुसर सूनेनी केलय. तो आनंद वेगळाच असतो. त्या आनंदात वेगळ सूख, समाधान असत.

 आज अनघा आई बाबांना घेऊन बाजारात गेली. दोघांसाठी नवीन कपडे घेतले. आईंसाठी गाऊन घेतले. पायात अडकायला नको म्हणून लगेच टेलरकडून त्यांची उंची बरोबर करून घेतली.

घरातील repair work करून घेतले. बाबांबरोबर बॅंकेत जाऊन त्यांची सर्व काम केली.

पंधरा दिवसांच्या आपल्या भारत visit मध्ये अनघाने आई – बाबांच रोजच काम व्यवस्थित होईल याचा विचार करून सर्व काम केली.

आज ताईने विचारले… अग! अनघा तुझी खरदी केंव्हा करणार आहेस?

अनघा म्हणाली… यावेळेस मी माझ काहीच काम आणल नाहिये.

अनघाची सुट्टी संपत आली आहे.

तिला भेटायला म्हणून मी आज ताईकडे गेले. साक्षी अनघाला न्यायला म्हणून चकल्या तळत होती.

निघताना अनघाने आई- बबांना नमस्कार केला. दोघांचे हात हातात घेऊन म्हणाली…

आई- बाबा मजेत रहा. आता आपण परिस्थितीत बदल करू शकत नाही. आमचे येथे कायमचे येणे, किंवा तुमचे अमेरिकेत येणे दोन्ही शक्य नाही.

आम्हाला तुमची काळजी असते.

आई मजेत रहा. खूप फिरा, बाहेर जा. अस म्हणून अनघा आईंच्या गळ्यात पडून रडू लागली.

बरोबर आहे…

म्हणतात ना…

त्रास निवडायचा की आनंद?

निवड फक्त तुमची आहे.

स्वतःसाठी जगा.

स्वतःला निवडा 

आनंदाने पूढे चला…

स्वतः साठी वेळ द्या. ,

कारण आपण आहोत तर जग आहे.

हे जरी खर असल तरी 

आज दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट अनघाने शिकवली… ती म्हणजे… दुसर्यांसाठी पण वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही…

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ५ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ५ ☆ श्री संभाजी बबन गायके 

देवाची गाडी!

 पंढरीची वारी म्हणजे पायी प्रवास हे समीकरण साहजिकच आहे. ज्या काळात वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या त्या काळात वारकरी संपूर्ण प्रवास पायीच करीत असत. पण कालांतराने वारक-यांची संख्या वाढली, वाटेतील मुक्काम, भोजन व्यवस्था आपली आपण करण्याची गरज भासू लागली तसे सोबत वाहन ठेवणे आवश्यक झाले. त्यामुळे आरंभी पालखी सोहळ्यासोबत लोक बैलगाडी, टांगा अशी वाहने आणीत. या वाहनांमधून साहित्याची आणि गरज पडेल त्यानुसार माणसांची वाहतूक होऊ लागली.

पुढे मोठी स्वयंचलित वाहने उपलब्ध झाल्यावर उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या दिंडीचालकांनी टेम्पो, ट्रक अशी वाहने सोबत घेण्यास सुरुवात केली. यात आरंभी trolly असलेला tractor फार लोकप्रिय आणि सोयीचा होता. अजूनही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.

या वाहनांमध्ये दिंडीला आवश्यक असणा-या सर्व साहित्याची वाहतूक करणे किफायतशीर ठरते. तंबू, स्वयंपाक, किराणा इत्यादी साहित्य, दिंडीत पायी चालणा-या वारक-यांच्या पिशव्या हे सर्व या वाहनांत ठेवले जाते. ही वाहने म्हणजे एकाअर्थाने दिंडीची कार्यालयेच ठरतात. ज्यांना पायी प्रवास झेपत नाही, किंवा प्रकृती खालावते असे वारकरी काहीवेळा या वाहनांतून वारीचा प्रवास करत असतात. वारीहून घरी परतण्यासाठी तर हमखास हीच वाहने वापरली जातात.

दानशूर लोक दिंडीसाठी स्वत:ची वाहने देऊ करतात. किंवा ही वाहने भाड्यानेही घेतली जातात. काही मालक, चालक केवळ इंधनखर्च, चालकाचे वेतन एवढा खर्च दिला तरी चालेल, अशा भावनेने वाहनसेवा रुजू करतात.

आज समजा पालखीचा मुक्काम सासवड येथे असेल तर दिंडीची ही वाहने पुण्यातून पालख्या निघण्याआधी निघून हडपसर येथील दुपारच्या भोजनाची जागा गाठतात. दुपारची जेवणे उरकली की, सोहळा निघण्यापूर्वी ही वाहने सासवडकडे रवाना केली जातात. वाहनांची संख्या आणि लोकांची संख्या जास्त झाल्याने बरेचदा रस्त्याच्या एका बाजूने दिंडी चाललेली आहे, आणि शेजारून दिंडीची वाहने चाललेली आहेत, असे दृश्य दिसते.

दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी वाहनांतून आणलेल्या वस्तूंच्या साहाय्याने स्वयंपाक केला जातो. वाहने मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तंबू ठोकले जातात. तंबूची जागा आधीच राखून ठेवलेली असते. त्यासाठी दिंडीचालक वारी आधी संबंधित व्यक्तींच्या, संस्थांच्या भेटी घेऊन व्यवस्था ठरवून घेतात. पंढरपुरात ब-याच गावांच्या, दिंड्या यांच्या स्वत:च्या मालकीच्या धर्मशाळा आहेत. पण इतर लोकांना मात्र मोकळ्या जागांत तंबू ठोकावे लागतात.

या वाहनांसोबत स्वयंपाकासाठी आचारी, त्यांचे साहाय्यक प्रवास करीत असतात. बहुतेक वेळा ही मंडळी अल्प मानधनावर आणि देवाची सेवा म्हणून हे काम करीत असतात. काही श्रीमंत दिंड्या स्वत:चे मोठे कामगार पथक सोबत घेऊन चालतात. यात वीज व्यवस्था, तंबू व्यवस्था, भोजन व्यवस्था त्यामानाने काहीशी वरच्या दर्जाची असते. काही ठिकाणी तर प्रत्येक तंबूमध्ये ट्यूब लाईटस, गाड्या, खुर्च्या आणि इतर वीजव्यवस्थाही करण्यात येते. अर्थात बहुतांश ठिकाणी वीज महामंडळाच्या तारांवर धातूच्या तारांचे आकडे टाकून वीज घेतली जाते… कारण तंबू माळावर, उघड्या जागी टाकलेले असतात. अशावेळी अधिकृतपणे वीज जोड घेता येणे शक्य नसते. अर्थात वाढत्या शहरीकरणामुळे हे प्रकार कमी झालेले आहेत. पूर्वी कंदिलाच्या उजेडात काम केले जाई. त्यामुळेच आजही दिंडी वाहनांच्या बाजूला कंदील दिसतात, पाण्याच्या बादल्या, तंबूचे साहित्य दिसते.

वारी काळात त्या त्या शहरांत gas cyllinders, रॉकेल, जळणासाठी लाकडे अशी व्यवस्था शासकीय पातळीवर माफक दरांत केली जाते. स्वयंसेवी संस्था सुद्धा अनेक सुविधा पुरवतात. हल्ली मोबाईल चार्जिंग व्यवस्थाही महत्त्वाची ठरलेली आहे.

वाहनांचे चालक, साहाय्यक सुद्धा या काळात वारक-यांच्या भूमिकेत दिसतात. हे लोक स्वयंपाक, दिंडीप्रवास यांत साहाय्य करताना दिसतात.

पालखी मार्गावर त्या त्या दिवशी केवळ दिंडीच्या वाहनांना प्रवेश दिला जातो. या वाहनांवर दिंडीचे फलक, पताका लावलेल्या दिसतात. हल्ली या वाहनांना टोल माफीही दिली जाते.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून पंढरपूरला पोहोचण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या (एस. टी.) बसेसशिवाय पर्याय नव्हता. इंग्रज काळात १९५९ मध्ये पुणे ते बार्शी अशी रेल्वे व्यवस्था निर्माण झाली. पुढे पुणे ते सोलापूर अशी रेल्वे १८६० मध्ये सुरु झाली. पण सोलापूरहून पंढरपूर तसे बरेच दूर आहे. त्यामुळे तिथून एस. टी. ने जाण्याशिवाय पर्याय नसे. पण दूर मराठवाड्यातील लोकांना पंढरीस येण्यासाठी रेल्वे उपलब्ध नव्हती.

एवरार्ड कॅलथोर्प नावाच्या हुशार, मेह्नती इंग्रज अधिका-याच्या अथक परिश्रमांतून बार्शी ते पंढरपूर अशी narrow guage अर्थात दोन रूळांमध्ये कमी अंतर असलेली रेल्वे सेवा सुरु होऊ शकली. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी (बार्शी) मिरज ते लातूर असा मार्ग सुरु केला गेल्याने खूप भाविकांची सोय झाली. कुर्डूवाडीनंतर पुढे या गाडीसाठी पंढरपूर रेल्वे स्टेशनची उभारणी झाल्यावर या गाडीला देवाची गाडी हे नाव चिकटले. या गाडीत केवळ सामान्य बैठक व्यवस्था होती. तिकीटदर माफक होते. आणि वेग अतिशय कमी. म्हणजे गाडीतून उतरून जाऊन आपले एखादे छोटे काम उरकून थोडेफार पळत जाऊन ही गाडी पकडता येत असे. आणि लोकांना फार घाईसुद्धा नसे. वारकरी गाडीच्या डब्यातच भजनाचा फड उभारीत आणि संपूर्ण प्रवास नामस्मरणात पूर्ण होई. असो.

पंढरीला देहू-आळंदीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून पायी दिंड्या येत असतात. काही दिंड्या तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही येतात. अर्थात या दिंड्यांसोबत चालणा-या लोकांची संख्याही कमी असते. सर्वच दिंड्यांना पोलिस बंदोबस्त देणे शक्य होणारे नसते. या दिंड्या महामार्ग, राज्य मार्ग इत्यादी रस्त्यांवरून प्रवास करीत असतात. बहुदा प्रवास पहाटे लवकर सुरु केला जातो, आणि काही वेळा रात्री उशीरा, अंधार पडेपर्यंत सुरु असतो. दिंडीसोबत चोपदार आणि शिपाई लोक चालत असतात, आणि हे लोक वाहतुकीपासून दिंडीचे संरक्षण करतात. पण अशा कमी संख्येन चालणा-या, अंधारात चालणा-या दिंड्यांमध्ये रस्त्यावरून धावणारी वाहने घुसून अपघात घडल्याची उदाहरणे बरीच आहेत. यात काही बळीही गेलेले आहेत. देहू, आळंदी, शेगाव, त्र्यंबकेश्वर, पैठण येथून येणा-या मोठ्या दिंड्यांच्या बाबतीत असे अपघात झाल्याचे फारसे प्रकार ऐकिवात नाहीत. कारण गर्दी पाहून वाहन चालक काळजीपूर्वक वाहने चालवतात, पोलिस बंदोबस्त असत, शिवाय दिंडी सोबतचे कार्यकर्ते, चोपदार, शिपाई शिस्त सांभाळत असतात.

दिंड्यांसोबत छोटे टेम्पो, मध्यम आकाराच्या ट्रक्स आणि काहीवेळा गरजेनुसार मोठे ट्रक्स असू शकतात. त्याच प्रमाणे शासकीय पाणी पुरवठा व्यवस्थेची वाहने, आरोग्य विभागाची वाहने, पोलिसांची वाहने, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांची वाहने, हौशी प्रेक्षकांची वाहने असतात. शिवाय संबंधित मार्गांवर नेहमीची प्रवासी वाहतूक सुरूच असते. फक्त गरजेनुसार मार्गांचे नियोजन केले जाते.

पूर्वी ही वाहने रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण अधिक होते. वारीपूर्वी वाहनांची पूर्व तपासणी करून घेण्याची अट असल्याने आता हे प्रकार फारसे दिसत नाहीत. माल वाहतुकीच्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास कायद्याने मज्जाव असला तरी मोठी संख्या, जनमताचा दबाव या काही कारणांमुळे प्रशासनाला या नियमाकडे डोळेझाक करावी लागते, हेही खरे आहे!

१३ जुलै, २०२६ रोजी सासवड ते जेजुरी मार्गावर एका दिंडीमध्ये ट्रक घुसून काही वारकरी मृत्युमुखी पडल्याची, जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर ट्रक हा त्या दिंडीचाच, त्यांच्या लोकांची, मालाची वाहतूक करणारा होता असे समजते. वाहनचालक वयस्कर असून, त्यांना अचानक प्रकृती खालावल्यामुळे वाहन नियंत्रणात ठेवता आले नाही, व सदर वाहन दुर्दैवाने पायी चालणा-या बिचा-या महिला वारक-यांना चिरडत पुढे गेले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली! ही परिस्थिती त्यावेळी तरी मानवी नियंत्रणात नव्हती, असे निदर्शनास आले आहे. या पुढील काळात चालकांची आरोग्य तपासणी आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे! पूर्वी हत्ती दिंडीसोबत आणला जाई. पण त्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर प्रतिबंध आणले गेले आहेत. दिंडीरथाला जोडलेले बैल, घोडे यांच्यामुळे सुद्धा काहीवेळा अपघात घडतात. पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. दरवर्षी अनुभवातून सुधारणा केल्या जातात. अधिकृत दिंडीत चालणा-या वारकरी मंडळीची स्वयंशिस्त उत्तम असल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार सहसा होत नाहीत. पण संख्याच मोठी असल्याने वारीचे नियोजन खूप अवघड बनले आहे. सोहळा ज्या ज्या जिल्ह्यांतून जातो, त्या त्या जिल्ह्यांतील पोलिसांकडे सोहळ्याला संरक्षण देण्याची जबाबदारी दिलेली असते. पोलिसांत महिला पोलिसांची संख्याही नजरेत भरण्यासारखी मोठी असून त्यामुळे महिला वारकरी, भाविक यांचे उत्तम संरक्षण होते. वारीत चोरांची संख्याही बरीच असते. पोलिसांमुळे यावर खूप नियंत्रण आलेले आहे.

सासवड-जेज्रुरी मार्गावर झालेल्या या दुर्दैवी अपघातात जीव गमवावा लागलेल्या वारकरी भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली! यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, ही अपेक्षा! रामकृष्णहरी!

– लेख क्र. ५ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दारातल्या गप्पा –  लेखिका : प्रार्थना देशमुख ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

सुनीला वैशंपायन 

??

☆ दारातल्या गप्पा –  लेखिका : प्रार्थना देशमुख ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन 

साध्या क्षणांत दडलेला आनंद आणि स्त्रीजीवनाचा एक सुंदर भाग!

आपल्या महाराष्ट्रात आणि एकूणच भारतीय संस्कृतीत एक अतिशय साधं पण तितकंच खास असं दृश्य आपण नेहमी पाहतो — घराच्या दारात, जिन्यावर किंवा गॅलरीत उभ्या राहून होणाऱ्या गप्पा… म्हणजेच ‘दारातल्या गप्पा’.

या गप्पांसाठी ना कोणतं निमंत्रण लागतं, ना खास वेळ ठरवावा लागतो. दोन ओळखीच्या स्त्रिया एकमेकींना दिसल्या की बस्स… गप्पांचा प्रवास सुरू होतो. आणि मग वेळ, काम, स्वयंपाक, बाजार… सगळं काही हळूहळू विसरायला लागतं.

“चल निघते आता…” — पण निघणं कधीच होत नाही!

दारातल्या गप्पांमधलं सर्वात प्रसिद्ध वाक्य म्हणजे —

“चल निघते आता गं…”

हे वाक्य साधारणपणे प्रत्येक 10-15 मिनिटांनी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं. पण गंमत अशी की, हे म्हणणारी व्यक्ती प्रत्यक्षात मात्र अजूनही दारातच उभी असते.

“घरात काम आहे गं…”

“स्वयंपाक ठेवला आहे…”

“नवरा येईल आता…”

असं सगळं बोललं जातं, पण तरीही पाय काही हलत नाहीत. कारण गप्पांमध्ये एक वेगळीच ओढ असते — जी माणसाला थांबवून ठेवते.

 

दारातल्या गप्पांचं एक छोटं पण रंगीत विश्व!

या गप्पांमध्ये विषयांची काहीच मर्यादा नसते. अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या चर्चांपर्यंत सगळं काही इथे घडतं.

आजच्या स्वयंपाकाची चर्चा 

भाजी बाजारातले दर 

शेजारच्या घरातील घडामोडी

टीव्ही सिरियलमधले नवीन ट्विस्ट 

आणि कधी कधी जुन्या आठवणींच्या गोड गोष्टीही 

आणि सगळ्यात शेवटी एक ठरलेलं वाक्य —

“आपल्याला काय करायचंय लोकांचं! ” 

 

वेळ कसा जातो हेच कळत नाही…

या गप्पा सुरू झाल्या की वेळ थांबतो असं वाटतं. पाच मिनिटं म्हणून सुरू झालेली चर्चा कधी एक तास होते, हेच कळत नाही.

कुकरची शिट्टी विसरली जाते,

टीव्हीवरील आवडती मालिका चुकते,

कधी कधी फोनवर आलेले कॉलही दुर्लक्षित होतात…

आणि घरात वाट पाहणारे लोक मात्र म्हणत राहतात —

“आता नक्की येतील…” 

 

फक्त गप्पा नाहीत… हा एक मानसिक आधार आहे!

काही लोक याला फक्त वेळ घालवणं म्हणतील, पण खरं पाहिलं तर या गप्पा म्हणजे स्त्रियांसाठी एक छोटासा विराम असतो.

घरकाम, जबाबदाऱ्या, कुटुंब, नोकरी — या सगळ्यांच्या मधोमध स्वतःसाठी काढलेला हा थोडा वेळ म्हणजे मन हलकं करण्याचा एक सुंदर मार्ग असतो.

हसणं, बोलणं, मन मोकळं करणं — हे सगळं मानसिक ताण कमी करतं. आणि म्हणूनच या ‘दारातल्या गप्पा’ अनेकदा औषधासारख्या काम करतात.

– – नात्यांना जवळ आणणारा एक साधा सेतू

या गप्पांमुळे शेजारपाजारात प्रेम, ओळख आणि आपुलकी वाढते.

“ती शेजारीण” हळूहळू “माझी मैत्रीण” बनते.

आणि हेच छोटंसं नातं अनेकदा मोठ्या अडचणीच्या वेळी आधार देऊन जातं.

 

शेवटी इतकंच…

जीवनात मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या क्षणांतच खरा आनंद दडलेला असतो.

‘दारातल्या गप्पा’ हे त्याच छोट्या आनंदाचं एक सुंदर उदाहरण आहे.

म्हणूनच…

जर तुमच्या आजूबाजूलाही अशा गप्पांचा फड रंगत असेल, तर त्याकडे फक्त गंमत म्हणून नाही, तर जीवन जगण्याचा एक हलका, सुंदर आणि आनंदी क्षण म्हणून पाहा.

 

तुमच्याकडेही असा अनुभव आहे का? “चल निघते आता…” म्हणत किती वेळ गप्पा चालतात? नक्की कमेंट करा!

लेखिका : प्रार्थना देशमुख 

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ४ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ४ ☆ श्री संभाजी बबन गायके 

पालखी सोहळ्यातील ‘अभंग’ व्यक्तिमत्त्वे!

भक्तिगीते आणि अभंग यांच्यात नेमका फरक सांगायचाच झाल्यास तो अनुभूतीचा असतो. शब्दांवर हुकुमत प्राप्त केलेले कवी अतिशय उत्तम भक्तीरचना करू शकतात, यात काहीच वाद नाही. परंतू संतांनी लिहून ठेवलेले अभंग हा त्यांचा प्रत्यक्ष जीवनानुभव असतो आणि म्हणूनच तो कधी भंग पावत नाही!

भारतातील जवळपास सर्वच संतांनी त्यांचे विचार काव्यरुपात लिहून ठेवलेले आढळतात. महाराष्ट्रभू तर संतकवींची खाणच म्हणावी. आणि हे काव्य म्हणजे कुणा व्यावसायिक वा हौशी कवीने प्रसिद्धी, धन, मान यांसाठी योजलेली शब्दयोजना नव्हेत! म्हणूनच कित्येक शतके उलटून गेली तरीही ते शब्द जनमानसावर आपले गारुड कायम ठेवून आहे!

जगदगुरू संत श्री तुकोबारायांसोबत वाट चालत होतो. हे माझे त्यांच्यासमवेतचे पहिलेच वर्ष होतं. दिंडीत खूप ज्येष्ठ वारकरी होते. दिवसभराच्या वाटचालीत एका वयोवृद्ध वारकरी आजोबांनी ‘म्हणा माऊली! ” म्हणत माझ्याकडे वाटचालीत अभंग म्हणायची सूचना केली! मला बोलू ऐसे बोले…. हा अभंग तोंडपाठ होताच… मात्र चाल? चाल रेकॉर्डवरची म्हणजे ध्वनीमुद्रीकेवरची…. छोटा गंधर्व यांनी गायलेला हा अभंग. मी माझ्या आवाजात बोलू ऐसे बोले…. अशी सुरुवात करतात….. मृदुंगावर थाप टाकण्याच्या तयारीत असलेले पखवाजे आणि सोबतचे टाळकरी एकदम थांबले आणि त्यांनी सर्वांनी माझ्याकडे नाराजीनेच कटाक्ष टाकले… मी गोंधळून गेलो!

विणेक-याच्या सोबतीने चालणा-या त्या आजोबांच्या चेह-यावर तर नाराजी अगदी उठून दिसली. “वारकरी चालीत म्हणा, महाराज! ” त्यांनी कडक शब्दांत आदेश दिला. आणि मी थबकलेलो पाहताच त्यांनी स्वत:च सुरुवात केली… बोलू ऐसे बोले… हां… बोलू ऐसे बोले… जेणे बोले विठ्ठल डोले… जेणे बोले विठ्ठल डोले!

चालता चालता टाळाच्या तालावर सहज गाता येणारी चाल. उच्चार स्पष्ट आणि नेमके. त्यामुळे अर्थही मनापर्यंत पोहोचतो…. आजोबांनीच चरणापर्यंत अभंग म्हटला… आणि म्हणाले… आता लावा तुमची शास्त्रीय चाल…… मी मला येते ती साधी चाल लावली…. सर्व सत्ता आली हाता… नामयाचा खेचर दाता! आणि आजोबांच्या मुखावर आनंद परतून आला! तेंव्हा समजलं… वारीत वाट चाल करताना वारकरी, नियमित चालीत अभंग गायचे असतात… येथे शास्त्रीय किंवा प्रथितयश गायकांनी गायलेल्या रचना गाऊन उपयोग नाही! कारण हे चालता चालता गायचे शब्द असतात.

असाच एक नवखा वारकरी कुणाचे तरी भक्तीगीत गाऊ लागला तेंव्हाही आजोबांनी त्याला रोखले. म्हणाले…. संतांचे अभंग म्हणा…. महाराज. हजारो आहेत. आपल्या तुकोबारायांचे तर चार हजार आहेत… कोणताही म्हणा! तेंव्हा समजले की वारीत केवळ संतांचेच शब्द गायचे असतात.

संत त्यांच्या रचनांच्या अखेरीस त्यांची नाममुद्रा गुंफीत असत… जसे एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रावर आपण स्वाक्षरी करतो, शिक्का उठवतो, तसे. उदाहरणार्थ….. तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, जनी म्हणे… इत्यादी. संतांना त्यांच्या काव्य रचनेत स्वत:चे नाव हवे असायचे, प्रसिद्धी हवी असायची म्हणून ते असा नामोल्लेख करीत असत, हा काही सुशिक्षित लोकांचा (गैर)समज आहे! त्याकाळी copy right विषय नव्हता. तरीही काही नतद्र्ष्ट माणसं स्वत:च्या रचना प्रसिद्ध संतांच्या नावाने खपवीत…. त्या रचनांना क्षेपक अभंग अशी संज्ञा आहे. अभ्यासू वारकरी, भजनकरी संतांचा मूळचा आणि इतरांनी घुसवलेला क्षेपक अभंग अचूक ओळखतात! त्यामुळे वारीत तरी केवळ अधिकृत संत अभंगच गावेत, असा दंडक असतो.

आमच्या दिंडीत चालणा-या त्या आजोबांना संपूर्ण भजनी मालिका, हरिपाठ, गाथा, नाथ महाराजांचा गाथा यांतील जवळजवळ सर्वच अभंग तोंडपाठ होते. विशेषत: तुकोबारायांचा गाथा त्यांना मुखोद्गत होता. दिंडीत कुणी गाताना एखादा शब्द चुकला की ते लगेच दुरुस्ती सांगत. विशेषत: शेवटच्या चरणात, म्हणजे हा अभंग कुणी लिहिला आहे त्या नावाचा उल्लेख करताना अनेकवेळा गफलती होत असतात! पण हे आजोबा म्हणजे आमचे चालते बोलते encyclopaedia होते!

हे आजोबा अत्यंत काटेकोर दिनचर्या पाळीत. दिंडीत सर्वांच्या आधी म्हणजे चार-सव्वाचार वाजता उठून आन्हिके आटोपित आणि तंबूमध्येच एका कोप-यात त्यांची पूजेची पेटी उघडून बसत. पत्र्याच्या त्या छोट्याशा पेटीत त्यांचे सर्व पूजासाहित्य असे. गंध, गंधगुळी, उद्बत्ती, काडेपेटी, छोटा हरिपाठ, विठोबा रखुमाईची कागदी तसबीर इत्यादी. मुखाने हरी हरी म्हणत त्यांची पूजा चाले…. सर्वांगावर गंध लेपन करीत. अंगावर गणवेश तर नेमून दिलेलाच असे…. पांढरे धोतर, पैरण, पटका… कपाळी गंध! बाकीची दिंडी उठून तयारीला लागेपर्यंत आजोबा महाराजांच्या रथासमोर जाऊन उभेही रहात. आणि पालखी रथ विसाव्याला थांबल्याशिवाय खाली बसत नसत. दिवसभर अभंग गाताना कधी थकलेले त्यांना पाहिले नाही. रात्री दिंडी मुक्कामावर पोहोचल्यावर रात्रीचा भजन जागर सुरु होई… त्यात आजोबा उशीरपर्यंत भजने गात. इथं कळलं… त्यांना उत्तम पेटी वाजवता येते. आवाजात माधुर्य नसलं, रागदारीचं फारसं ज्ञान नसलं तरी मनातले भाव आणि पाठांतर अप्रतिम होतं…. कित्येक वर्षांचा परिपाठ असावा!

आजोबा जातिवंत शेतकरी. त्याच्या खुणा त्यांच्या अंगभर दिसून येत. रापलेला रंग, भेगा पडलेले तळपाय, कपाळावर पसरलेलं आठ्यांचं जाळं… आणि विझत चाललेलं डोळे. कुणीतरी केंव्हातरी नंबरचा चष्मा दिलेला असावा… तुटलेला चष्मा… त्याच्या काड्यांना दोरा बांधून काम चालवलेलं. भजनी मालिकेच्या पुस्तकात कधी वाचायचा प्रसंग येत नसे… कारण बहुतेक सर्वच पाठ होतं… पण आपला असावा म्हणून डोळ्यांवर चष्मा असे. पूर्वी कारभारीण आणि ते असे दोघे वारी करीत. काही वर्षांपूर्वी त्या निवर्तल्या. मग आजोबांनी महिन्याची वारी धरली. म्हणजे दर महिन्याला देहू-आळंदी ते पंढरपूर अशी वारी. जमली तशी पायी केली आणि थकले तेंव्हा मिळेल त्या वाहनाने. विशेषत: बार्शी लाईट रेल्वे आवडीची आणि सोयीची!

आजोबांनी आपल्या दिंडीत यावे, असा सर्वच दिंडीचालकांचा प्रयत्न असे. पण आजोबांनी आपली एकच दिंडी धरून ठेवली होती. त्यांच्याकडून कोणी भिशी अर्थात दिंडीचा खर्च म्हणून पैसे घेत नसत… कारण दिंडीमध्ये वाटचालीचे अभंग म्हणायची जबाबदारी, शिस्त पाळायची जबाबदारी त्यांच्यावरच असे. ते सुद्धा एखाद्या सैन्याधिका-याने आपले सैन्यदल दिमाखात, शिस्तीत चालवावे, तशी दिंडी चालवीत!

द्वादशीचा उपवास सोडून दिंडीकरी लगबगीने, घराच्या ओढीने परतत… आजोब मात्र पुढील चातुर्मास पंढरीतच मुक्कामी राहण्यासाठी मागे रहात….. नेमाचे, निष्ठावंत वारकरी. जोडोनिया धन.. उत्तम व्यवहारे वेच करून संसारिक जबाबदा-या पार पाडून आयुष्याच्या संध्याकाळी हरी हरी करीत काळ व्यतीत करणारे संतांचे लाडके सेवक!

एका वर्षी ते दिंडीत दिसले नाहीत….. त्यांच्या नातवाने एका मुक्कामावर त्यांच्या स्मरणार्थ दिंडीला पंगत दिली तेंव्हा समजले…. ते मागील महिन्यात वैकुंठवासी झाले! असे वारकरी हे वारीचे वैभव असतात… त्यांचे दर्शन घडले, सहवास लाभला हे भाग्यच म्हणायचं…. रामकृष्णहरी!

– लेख क्र. ४ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘दर्पणी पहाता रूप…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘दर्पणी पहाता रूप…’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

विजया मेहता 

बालपणापासून मी, अमक्यासारखी दिसते, तमक्यासारखी दिसते, असं अनेकांनी माझ्या दिसण्यावरून मला सांगितलं होतं. लांब केस असताना कुणी अभिनेत्री ‘नूतन’सारखी दिसते म्हणायचे, तर लांब चेहर्‍यामुळे अगदी ‘नर्गिस’ म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमात सुनील दत्त साहेबांची भेट व्हायची, तेव्हा माझं गाणं ऐकताना ते बराच वेळ टक लावून पहायचे आणि ‘छोट्या पद्मजाचे’ लाड, कौतुकही करायचे!

माझे गुरु पं. हृदयनाथजी मंगेशकर तर मला पारशी म्हणतात. साक्षात् ‘भारतरत्न’ लतादीदी तर हृदयनाथजींना, माझ्या नावापेक्षाही, “बाळ, तुझी पारशी पोरगी काय म्हणते रे? ” असं गंमतीनं विचारत. आमच्या घरची मंडळी माझ्या बालपणी, मुद्दाम मला चिडवण्यासाठी, “ए, ही पारशाच्या जव्हेरी हॉस्पिटलमध्ये बदलून आली बरं का! चुकून पारशाचं पोर आई घरी घेऊन आली! ” असं सारे जेव्हा म्हणत, तेव्हा मला खरंच वाटे आणि मी रडून थयथयाट करीत असे. (वास्तविक माझे वडील शंकरराव गोरेपान, तजेलदार चेहऱ्याचे आणि धारदार नाकाचे…. ते खरे पारसी दिसत!) 

नूतन आणि नर्गिसचा तर मला उगीचच राग येत असे. लेखक श्री. अशोक चिटणीस काका तर मला “तू एखादं ग्रीक स्कल्पचर असावं, अशी वाटतेस, ” असं म्हणत.

मात्र अलीकडेच, एका नाटकाच्या निमित्ताने माझी आणि एका महान कलावंत स्त्रीची माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटर या सभागृहात भेट झाली. मला त्यावेळी आठवण झाली, ती म्हणजे आमचे शेजारी थोर गायक आणि एचएमव्हीचे त्यावेळचे सर्वेसर्वा श्री. जी. एन. जोशी यांची! ते माझ्या बाबांचे परममित्र! ज्यांनी मला बालपणापासून खूप प्रोत्साहन दिलं, कोडकौतुक केलं. ते नेहमी म्हणत, “तू – अगदी या बाईंसारखी दिसतेस बरं का! ” खरंतर या बाईंविषयी मी, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत घडवणाऱ्या कडक दरारा असणार्‍या गुरू, असं त्यांचं वर्णन ऐकून होते. त्यांना टीव्हीवर आणि फोटोतही पाहिलं होतं. मात्र भेट प्रथमच त्यादिवशी ग्रीन रूममध्ये झाली. कुणीतरी आमची ओळख करून दिली. आरशात आम्ही एकमेकींना पाहिलं आणि त्यांना मी म्हंटलं, “अनेकजण म्हणतात…. आपल्यात खूप साम्य आहे म्हणून. ” त्यावर त्या गोड हसल्या आणि अगदी सहजपणे, जणू काही रोजच भेटत असल्यासारखे, माझा हात हाती घेऊन त्या म्हणाल्या, “बरोबर आहे पद्मजा…. Our soul is the same!!! ”

त्यांचे हे आशीर्वादरूपी बोल ऐकून, माझ्या अंगातून आनंदाने वीज चमकून गेली. आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्या होत्या, अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या गुरू, अभिनेत्री, बुद्धिमान, प्रतिभावंत व कलेची उपासक स्त्री, तसंच बर्‍याच नाटकांना चैतन्य देणार्‍या महान दिग्दर्शिका – आदरणीय ‘विजयाबाई मेहता’!

“त्यांच्या मते, कला म्हणजे चैतन्याची शोधप्रक्रिया… कोणताही कलाकार आपली कला सादर करताना, स्वतःच्या वास्तवापलीकडे जाऊन मूळ सत्याचा, चैतन्याचा, स्रोताचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या कला सादर करताना कलाकार व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत एकटा असतो, मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्त्व मिळवण्याची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेले एक व्यसनच असते.. ”

त्यांचे हे विचार, तो तेजस्वी चेहरा आणि हाताचा मृदु मुलायम स्पर्श, ‘तो आशीर्वाद’…… ‘दर्पणी पहाता रूप’ म्हणत माझ्या मनात आजही दरवळत आहे!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वर्ग, नरक, आणि आपण – -” – लेखक : मुक्तक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “स्वर्ग, नरक, आणि आपण – -” – लेखक : मुक्तक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळावी म्हणून माणूस आयुष्यभर किती धडपड करतो. कुणी उपवास करतो, कुणी दानधर्म करतो, कुणी तीर्थयात्रा करतो, कुणी देवाला नवस बोलतो. जणू काही स्वर्ग म्हणजे एखादी नवीन हौसिंग सोसायटी आहे आणि तिथे 1 BHK बुक करण्यासाठी पॉइंट्स जमा करायचे आहेत.

पण मला एक प्रश्न पडतो.

जर आपण आधीच स्वर्गात राहत असू तर?

जरा सकाळी उठल्यावर आजूबाजूला नीट बघा.

बटण दाबलं की दिवा लागतो. दुसरं बटण दाबलं की पंखा फिरतो. तिसरं दाबलं की एसी सुरू होतो. नळ उघडला की पाणी येतं. गॅस पेटवला की काही मिनिटांत जेवण तयार होतं. मोबाईल काढला की जगभरातील माहिती हातात येते. एखादा मित्र अमेरिकेत असला तरी सेकंदात त्याचा चेहरा दिसतो.

आणि हे सगळं आपण इतक्या सहज घेतो की जणू काही ही पृथ्वीवरची नाही तर जन्मसिद्ध सुविधा आहे.

आजपासून फक्त दोनशे वर्षांपूर्वीच्या एखाद्या राजाला जर आपल्या घरात आणलं तर तो कदाचित घराबाहेर पडायलाच तयार होणार नाही.

“हे काय? ” “गरम पाणी. “

“हे? ” “थंड हवा. “

“हे? ” “जगभरातील माहिती. “

“हे? ” “दहा मिनिटांत पिझ्झा घरी. “

राजा म्हणेल, “मी आयुष्यभर राज्य केलं, युद्धं जिंकली, खजिने गोळा केले, पण हे सुख तर मला कधीच मिळालं नाही! “

म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की आजचा सामान्य माणूस अनेक बाबतीत कालच्या राजापेक्षा सुखात जगतो.

पण गंमत बघा.

आपण या सगळ्या गोष्टींकडे बघत नाही.

कारण माणसाकडे जे असतं त्याची किंमत नसते.

एसी सुरू आहे म्हणून आनंद नाही.

एसी बंद पडला की दुःख.

मोबाईल आहे म्हणून आनंद नाही.

नेटवर्क गेलं की जग संपल्यासारखं.

घर आहे म्हणून आनंद नाही.

शेजाऱ्याचं घर मोठं आहे म्हणून दुःख.

गाडी आहे म्हणून आनंद नाही.

त्याच्याकडे मोठी गाडी आहे म्हणून दुःख.

माणूस स्वतःच्या स्वर्गात उभा राहून दुसऱ्याच्या स्वर्गाची तुलना करत असतो.

पण त्याच वेळी पृथ्वीवर दुसरं चित्रही आहे.

आजही लाखो लोक प्यायच्या पाण्यासाठी रांगेत उभे असतात.

काही जणांकडे राहायला पक्कं घर नाही.

काही जणांना दोन वेळच्या जेवणाची खात्री नाही.

काही मुलांना शिक्षण मिळत नाही.

काही लोकांकडे घालायला पुरेसे कपडेही नाहीत.

आपण ज्या गोष्टींना “सामान्य” म्हणतो, त्या अनेक लोकांच्या आयुष्याचं स्वप्न असतात.

आपल्याला नळातून येणारं पाणी दिसतं.

त्यांना पाण्यासाठी किलोमीटर चालावं लागतं.

आपल्याला एसीचा रिमोट सापडत नाही म्हणून राग येतो.

त्यांना उन्हापासून बचावासाठी झाडाची सावली शोधावी लागते.

आपण डाएट प्लॅन शोधतो.

ते पुढचं जेवण कुठून येईल याचा विचार करतात.

म्हणूनच मला वाटतं स्वर्ग आणि नरक हे मृत्यूनंतरचे पत्ते नसावेत.

ते इथेच आहेत.

एकाच शहरात.

एकाच गावात.

कधी कधी एकाच रस्त्यावर.

एका घरात मुलगा नवीन मोबाईल स्लो झाला म्हणून नाराज असतो.

समोरच्या घरात मुलगा ऑनलाइन वर्गासाठी मोबाईल नसल्यामुळे शिकू शकत नाही.

एका माणसाला गरम पाणी उशिरा आलं म्हणून त्रास होतो.

दुसऱ्याला पाणीच मिळालं तर तो आनंदाने आंघोळ करतो.

फरक फक्त परिस्थितीचा नाही.

फरक दृष्टीकोनाचाही आहे.

कारण काही लोक नरकात राहूनही हसतात.

आणि काही लोक स्वर्गात राहूनही कुरकुर करतात.

माणसाची एक सवय खूप विचित्र आहे.

तो जे नाही त्याची यादी रोज बनवतो.

पण जे आहे त्याची यादी कधीच बनवत नाही.

जर प्रत्येकाने रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच गोष्टी लिहिल्या…

आज मला श्वास घेता येतो.

आज माझ्याकडे पिण्याचं पाणी आहे.

आज माझ्याकडे खायला अन्न आहे.

आज माझ्याकडे झोपायला जागा आहे.

आज माझे प्रिय माणसं माझ्यासोबत आहेत.

… तर कदाचित आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.

आपण स्वर्ग शोधत आहोत.

पण कदाचित स्वर्ग ही एखादी जागा नसून एक जाणीव आहे.

आणि नरकही एखादी जागा नसून एक विस्मरण आहे.

जे आहे त्याची किंमत विसरणं म्हणजे नरक.

जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं म्हणजे स्वर्ग.

बाकी मृत्यूनंतर काय मिळेल हे कुणालाच माहीत नाही.

पण जिवंत असताना पृथ्वीसारखा ग्रह, श्वास घेण्यासाठी हवा, प्यायला पाणी, खायला अन्न, प्रेम करणारी माणसं आणि बटण दाबल्यावर मिळणाऱ्या हजारो सुविधा मिळालेल्या असताना सतत दुःखी राहणं… हा देखील थोडासा विनोदच आहे.

कदाचित देव वर बसून हसत असेल…

… “अरे, मी तुम्हाला स्वर्गात पाठवलं होतं. तुम्ही तिथेही तक्रार केंद्र सुरू केलंत! ” 

लेखक : मुक्तक जोशी

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राग मल्हार (महुडे) ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

 

??

☆ राग मल्हार (महुडे) ☆ श्री दिवाकर बुरसे

बघता बघता आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले. पिसाट वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.

रानात मोर आपले पिसारे फुलवून, माना उंचावून, म्याँव, म्याँव करीत आनंदाने केकारव करू लागले. क्षणातच पावसाच्या टपो-या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. बहुप्रतिक्षित वर्षाऋतुचे हवेहवेसे वाटणारे विभ्रम सुरू झाले! पाऊस आला, पाऊस आला!!

हा भावनाविष्कार

साकार करी मल्हार।।

टीप :- आई मुलाला लाडाने जसे “बबड्या, छबड्या” म्हणते तसे मल्हार या लोकप्रीय रागाला काहीजण “महुडे” या लाडक्या नावाने संबोधितात. (ही माहिती कवी कै. वसंत बापट यांच्याकडून मी ऐकली होती.) 

☆ राग मल्हार (महुडे) ☆

मत्त गजांसम धुंद गडद घन घुमती गगनात

मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।धृ।।

*

घुमती सागर, घुमति पयोधर, घुमती वादळवारे

मंदिरात जणु मृदंग घुमती, घुमती कडे-कपारे

काळ नागिणीपरी धावती सरिता फेसाळत

मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।१।।

*

रत्ने तोलित मोर नाचती धारांच्या तालात

लयकारी पाहून तयांची बिजली स्तिमित मनात

स्थिरावल्या त्या बलाकमाला थकुनी दूर वनात

मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।२।।

*

धडका देती डोंगरमाथी मेघ झिंगल्यापरी

प्रियकर स्मृतीने धडके काळिज सखिचे वरचेवरी

काय करिल परी खुळी! झाकळे महुडेनयनात

मूर्तिमान मल्हार दाटला असासकल विश्वात।।३।।

गीत रचना : श्री दिवाकर बुरसे

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ३ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

ज्ञानबा-तुकाराम गजराचे उद्गाते नारायणबाबा!

आषाढ वद्य अष्टमीला जगदगुरू संत श्री तुकोबाराय पंढरीस प्रस्थान ठेवतात आणि दुस-या दिवशी म्हणजे दशमीला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय पंढरीसाठी निघतात… हा केवळ योगायोग नव्हे!

तुकोबाराय हे ज्ञानोबारायांचे परमभक्त. माऊली ज्ञानोबारायांच्या जन्मानंतर (१२७५) नंतर ३३३ वर्षांनी (१६०८) मध्ये तुकोबाराय देहूत अवतरले. इंद्रायणी देहूतून पुढे अलंकापुरीस जाते!

तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर चार महिन्यांनी मातोश्री जिजाऊ यांच्या पोटी नारायण जन्माला आले… तेच नारायणबाबा अर्थात नारायण महाराज. तुकोबारायांची अध्यात्मिक मिराशी समर्थपणे चालवणारे साधक. घराण्यात पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीच्या पायी वारीची परंपरा त्यांनीही अंगिकारली. तुकोबाराय देहाने सोबत नसले तरी अभंगरूपाने जग व्यापून उरले आहेत, अशी नारायण महाराजांची खात्री होती. पांडूरंग परमात्म्याच्या या परमभक्तास देहाशिवाय पंढरीची वारी घडवता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी तुकोबारायांना वारीत सोबत घेण्याचे ठरवले… नव्हे त्यांच्या सोबत वारीला जायचे ठरवले. त्यांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि देहूतून बाहेर पाऊल ठेवले… आणि मग त्यांच्या मनात आले असेल… माऊली सोबत असल्या तर? नारायण महाराज तुकोबारायांना घेऊन थेट अलंकापुरीत दाखल झाले… माउलींना आग्रह केला! आपण दोघेही विठोबाचे लाडके… तुम्ही एकत्रित पंढरीची वाट चालू लागलात तर सबंध मराठी मुलुख तुमच्या आगे-मागे चालत निघेल देवाच्या भेटीला!

पादुकांच्या रुपात आता ज्ञानोबा आणि तुकोबा विराजमान झाले… सोबत चालणा-या भोळ्या भाविकांनी या दोघांच्या नावाचा गजर एकत्रित करायला आरंभ केला आणि महाराष्ट्राला नवा सूर गवसला… ज्ञानबा-तुकाराम… ज्ञानोबा-तुकाराम! ज्यांना ज्ञानोबा हा शब्द उच्चारता येत नव्हता त्यांनी ग्यानबा म्हटलं… तुकाराम सर्वांना म्हणता येत होतंच!

ज्ञानोबा-तुकाराम हा जणू स्वयंभू मंत्र बनला ज्याची जादू आजही कायम आहे.. आणि मराठीचा श्वास असेल तोवर याचे तेज कमी होणार नाही!

काळाच्या ओघात, व्यवहाराच्या प्रवाहात ही परंपरा काही काळ स्थगित झाली… पंढरीनाथाच्या कृपेने ती पुन्हा सुरु झाली. मात्र ही नवी सुरुवात स्वतंत्र मार्गाने सुरु झाली. माऊली ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त हैबतबा आरफळकर यांनी आळंदीहून माउलींना स्वतंत्र पालखीत बसवले… राजाश्रय मिळवला… वैभव स्थापित केले… श्रीमंत झाला सोहळा… देहू आणि आळंदी येथून तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या दोन स्वतंत्र पालख्या स्वतंत्र मार्गाने एकाच लक्ष्याकडे चालू लागल्या… कालांतराने तुकोबारायांच्या सोहळ्यालाही साजेसे रूप आले… वाटेत काही ठिकाणी या पालख्या एकमेकांना भेटू लागल्या, समांतर चालू लागल्या आणि वाखरी मुक्कामी मोठ्या ओढीने एकमेकांना आलिंगन देत्या झाल्या… भजन मात्र तेच राहिले… ज्ञानोबा-तुकाराम! ज्ञानोबारायांसोबत वाटचाल करणा-या जीवांच्या मुखी एक परवलीचा शब्द रुजला… आणि रुळला… माऊली! तुकोबारायांच्या सोहळ्यातही माऊली-माऊली गजर नित्याचा झाला! गंगा आणि यमुना… विठ्ठल नावाच्या महासिंधुत एकत्रित झाल्या… आणि चंद्रभागेच्या वाळवंटी कैवल्याचं चांदणं कायमचं वस्तीला आलं!

दिंडी म्हणजे केवळ वाटचाल नव्हे. दिंडी म्हणजे ब्रम्हमुहूर्त ते सूर्यास्तापर्यंतचा आखीव-रेखीव, शिस्तबद्ध प्रवास… संतांच्या सहवासात, त्यांच्या साक्षीने आणि मार्गदर्शनाखाली होत असलेला! इथे संत म्हणजे राजे. तेच वैभव, तोच दिमाख आणि तेच राजस उपचार. शाही स्नान, हत्ती, घोडे, सैन्य, अब्दागिरी, पताका आणि नामाचा गजर! वारीत नामस्मरण हे मुख्य कर्म. त्याचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ, अनुभवी साधक म्हणजे विणेकरी! सर्वांच्या पुढे चालणारे, भजनाचे नेतृत्व करणारे आणि स्वर-ताल यांचे सूत्रसंचालन करणारे. त्यांच्या मागे दोनच्या रांगांत पुरुष वारकरी, त्यांच्या मागे महिला, त्यांच्यामध्ये डोईवर तुळशीवृंदावन धारण केलेल्या भगिनी, शिस्त आणि संरक्षणकार्यासाठी दंडधारी चोपदार. माऊली-तुकोबाराय रथात आरूढ होण्याआधी रथांच्या मागे-पुढे शिस्तीत उभे राहते दिंडी. आणि मग नित्योपचार आरंभ होतो. इथं सगळा भार शब्द आणि तालावर. साथीला टाळांचा मधुर गजर. ज्यांच्या हाती टाळ नाहीत त्यांच्या हातात टाळी! आरंभ काकड आरतीच्या अभंगांनी… मग रूपाचे अभंग… मग विषयवार, वारानुसार निवडक अभंगांचे क्रमवार गायन. चाल साधी… चालता चालता सहजी गाता यावी अशी. चरणासाठी अर्थात तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे इथपासून स्वतंत्र चाल लावण्याची मुभा… रागदारीचा अविष्कार करण्याची संधी… गायकांना आणि श्रोत्यांना आनंद देणारी! अट एकच शब्द केवळ आणि केवळ संतांचेच असावेत. आयुष्यभर गायले तरी पुरतील अशी अभंगसंपदा आपल्याकडे आहे. तुकोबारायांचे तर हजारो. संतपंचक अर्थात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथमहाराज, निळोबाराय… यांचे अभंग अगणित. जोडीला मुक्ताई, जनाई, बहिणाई आहेतच… वाट कधी सरते समजतही नाही… उपदेश आणि वाटचाल एकमेकांच्या स्वरांत स्वर मिसळून चालत राहतात. दिंड्यांना स्वतंत्र क्रमांक दिलेले असतात. रथापासून पहिली दिंडी आणि तिच्या पुढे दोन, तीन असे वाढते क्रमांक… आणि रथामागची पहिली दिंडी… आणि त्या मागे दोन, तीन अशा क्रमाने मागे. यात कुणी हस्तक्षेप करायचा नसतो. एकामागून चालायचे. दुपारच्या भोजनाच्या विश्रांतीनंतर माऊली निघायच्या आधी सर्वांनी क्रमांकाने उभे राहायचे म्हणजे रहायचेच. चोपदार सकाळी निघताना शंखनाद करतात तसा प्रत्येक वेळी प्रवास सुरु करण्यापूर्वीही करतात. त्यांच्या हातातील दंड म्हणजे इशारा… त्यानुसार थांबावे किंवा पुढे चालावे.

मुक्कामाचे ठिकाण नजरेच्या टप्प्यात येईतोवर संपूर्ण भजनी मालिकांचे आवर्तन पूर्ण होते. यात आंधळा, पांगुळ, वासुदेव, भारुडे, गौळणी सर्व ओळीने हजेरी लावून जातात. मग अवतरतो हरिपाठ… माऊली ज्ञानोबारायांचे शब्दवैभव, विचारसंगती मिरवणारा… याची चाल ठरलेली. हरिपाठ सुरु करा असा निरोप एकमेकांना दिला जातो आणि संपूर्ण सोहळा या पाठ असलेला हरी उच्चारत वाट चालतात. समाधी संजीवन हरिपाठ… या शब्दांपाशी अवघा सोहळा काहीसा थबकतो… स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घेतली जाते. एवढ्यात पालखी तळ समीप येतो. मानाचा अश्व ‘समाज आरतीचा’ आदेश घेत दौडत येतो… त्याच्यासाठी दिंड्या मधून मार्ग देत राहतात… आरतीच्या तालावर वारकरी दिवसाच्या चालीचे कष्ट विसरून जातात… माऊली, तुकोबाराय, तसेच इतर सर्व संत… नेमून दिलेल्या मुकाम्माच्या ठिकाणी जातात… वारकरी तंबू-राहुट्या शोधतात… आणि स्थिरावतात. प्रवचन सेवा होते… स्वयंपाक होत आलेला असतो… नैवेद्य जातो… भोजनाच्या पंगती पडतात… अंधार गडद होत असतो… नेमाचे वारकरी एका तंबूत हरीजागरासाठी जमा होतात… आणि पापण्या जडावलेले इतर वारकरी पुन्हा अभंगवाणी अनुभवत निद्रेच्या अधीन होतात! … उद्या नवा गाव… पण शब्द हेच… ज्ञानोबा-तुकाराम!

(नारायणमहाराज आणि हैबतबाबा यांचे उपकार डोंगराएवढे… त्यांनी स्वर्गीही नसलेला हा सुखसोहळा मराठी मातीत रुजवला… दोघेही वंदनीय. माहितीमध्ये काही त्रुटी संभवतात. सांगायचे राहून गेले असेलच… क्रमही चुकलेला असेल… पण वारी अनुभवली असल्याने काही लिहिता येते आहे.)

– लेख क्र. ३ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वसुली अशीही” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वसुली अशीही…” ☆ श्री मंगेश मधुकर

गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासूनच वाढलेला. सलग पाऊस असूनही आश्चर्य म्हणजे अजून लाइट गेले नव्हते. सकाळी सातची वेळ, रविवार असल्यानं बाहेर जाण्याची गरज आणि इच्छा दोन्ही नव्हतं. म्हणून निवांत होतो इतक्यात दूध संपलंय, आणावं लागेल अशी शुभवार्ता सौंकडून आली. छत्री घेऊन निघालो. धुवाधार पावसामुळे जो तो आपापल्या घरात असल्यानं सोसायटीत सामसूम मात्र गेटजवळ भर पावसात रेनकोट घालून चक्क एकजण कार धुताना दिसला. ते पाहून हसायला आलं. दिवसेंदिवस लोकांच्या वागण्यातला विचित्रपणा वाढत चाललाय. कुठं, कोण, कसं वागेल याचा नेम राहिला नाही. दूध घेऊन घरी जाताना गाडी धुणं सुरूच होतं. तुफान पावसात इमानेइतबारे गाडी धुणाऱ्याजवळ गेलो. माझ्याकडे पाहत तो हसला.

“काय झालं. असं का पाहताय”

“रागावू नका. एक विचारू” मी.

“माहितीये, काय विचारणार?”

“पावसात गाडी धुणं विचित्र वाटत नाही.”

“गाडी धुण्याचे पैसे घेतो”

“इतरवेळी ठीक आहे पण जोरात पाऊस आहे तरीही?”

“नाईलाज!!”

“म्हणजे”

“पैशेवाल्यांपुढे अक्कल चालवायची नसते”

“कळलं नाही”

“रोज गाडी धुण्याचे साहेब पैसे देतात. पावसामुळे दोन दिवस गाडी धुतली नाही”

“बरोबर केलंत”

“त्यामुळे साहेब संतापले. आता दोन दिवसांचे पैसे कट करणार असं म्हणाले म्हणून भर पावसात गाडी धुतोय.”

“साहेब, फारच हुशार दिसतायेत”

“अति…” म्हणत पावसाच्या पाण्यानं भरलेली बादली भसकन गाडीवर ओतत त्यानं राग व्यक्त केला.

– – पैसे पुरेपूर वसूल करून घेण्याची वृत्ती वाढतीये.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “भिकारी…???” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिकारी…???” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…! एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?) 

इथून पुढे – – – 

मी या अगोदरही सांगितलं आहे, मी बारावीपर्यंत पूर्णतः वाया गेलेलं एक नालायक कार्ट होतो, माझ्या दहावीत मला बीजगणित आणि भूमिती मध्ये 120 पैकी 18 मार्क पडले होते, याच गणितामुळे मला दहावी रिपीट करावी लागली होती, घरच्यांचा मार आणि बाहेरच्यांचे टोमणे खावे लागले होते. गणितावर माझा भयंकर राग आहे…!

आणि म्हणूनच आमच्या दोघांमध्ये “36 चा आकडा” आहे…

आजही गणित माझ्या वाट्याला जात नाही आणि मी त्याच्या…!

आज त्याच गणिताच्या नाकावर बुक्की मारून, मी गणितावर घ्यायचा सूड माझ्या या मुलाने पूर्ण केला 

मला बीजगणित जमलं नाही… पण याचना करणाऱ्या माऊलींच्या मुळाशी जाऊन, आपल्या सर्वांच्या साथीनं, त्यांचं “बीज ” शोधून, तिथे खत पाणी घालून आलो, आयुष्यातील चुकलेल्या गणितातील, वाईट गोष्टी “वजा” करून, “बेरीज” मांडून आलो…!

भूमिती मधली प्रमेयं आणि सूत्र, मला पाठ झाली नाहीत, पण रस्त्यावरच्या लोकांची दुःखं मला पाठ झाली, त्यांना यातून बाहेर काढायचे “सूत्र” समजावून घेण्याचा प्रयत्न केला…!

अल्फा साईन कॉस थिटा मला कधीच समजलं नाही, मात्र या लोकांची दुःख, भाव भावना, मन:स्थिती समजून घेता घेता, नमःस्थिती म्हणजे काय हे मात्र समजले…!

प्रत्येक झाडानं फळ द्यावं असं काहीच नाही… जमेल त्यांनी सावली द्यावी…!

मी झाड झालो… फळ देण्याची माझी पात्रता नव्हतीच, मग मी सावली देण्याचा प्रयत्न केला, अर्थात तुम्हा सर्वांच्याच साथीनं…!

छान छान फुलं सुद्धा माझ्या झाडाला लागली नाहीत, मग बाभूळ होऊन कोणालातरी जपण्याचा प्रयत्न केला…!

आणि…

‘लावाल ना टॅलीचा क्लास…??? ‘ त्याच्या या प्रश्नाने मी तंद्रीतून जागा झालो.

योगायोगाने याच दिवशी फादर्स डे होता, तसा तो रोजच असतो हे वेगळं…!

माझ्यासाठी टॅलीचा क्लास लावा, म्हणून मागे लागणाऱ्या या मुलाच्या हट्टापेक्षा आणखी कोणतंही मोठं गिफ्ट माझ्यासाठी असूच शकत नाही…!

360 अंशाच्या कोनात या मुलाचा झालेला हा बदल असो किंवा दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर पडलेल्या एका मुलाने स्वतःला बदलून जॉब करायला सुरुवात केली आणि पगारातले पैसे संस्थेला देणगी म्हणून द्यायला आलेला असो. (“देणगी” याच नावाने या मुलाविषयी सविस्तर लिहिले होते)

फुटबॉल च्या खेळात अव्वल असूनही, केवळ फुटबॉलचे स्टड नाहीत म्हणून नाकारला गेलेला, अन्याय झालेला भिक मागणाऱ्या एका आईचा मुलगा.

फोडणे, तोडणे, मारणे, झोडणे हिच भाषा तोंडात…

आज तोच मुलगा तुम्हा सर्वांच्या मदतीमुळे येत्या काही दिवसात फुटबॉल कोच होत आहे. ‘गरीब मुलांना मी फ्री मध्ये शिकवणार सर, मला नोकरी लागली की काही गरीब मुलांना मी सुद्धा शैक्षणिक मदत करणार सर… ‘ 

आज हि भाषा घेऊन तो “माणूस” झाला आहे.

(“घातक” या नावाने याच्यावरही सविस्तर लेख लिहिला होता)

तर… गेल्या अकरा वर्षात खोटे वाटतील, इतके खरे आणि डोळ्यासमोर घडणारे हे बदल पाहायला खरंच खूप भाग्य लागतं, आणि तो भाग्यवान मी आहे…

हे भाग्य आपणा सर्वांमुळे आमच्या पदरी पडलं…!

मी आणि मनीषा आम्ही कृतज्ञ आहोत आपले

उद्या ही मुलं मोठी होतील, स्वतःबरोबर इतरांचंही आयुष्य बदलतील…

जगणं असं या मुलांसारखं असावं… फुलांसारखं… विखुरले तरी सुगंध मागे राहतोच…!

*वैद्यकीय. 

आतापर्यंतच्या कामात मला एक कळलंय, “जिवंत हाय तवंर जगून घ्या… मेल्यावर जाळायची / पुरायची गडबड करून लोकांना घरी लवकर जेवायला जायचं असतं… “

हेच अंतिम आणि अंतिम सत्य आहे… काहीही म्हणा…!!!

इथं सर्व काही महाग आहे परंतु वेदना मोफतच मिळतात आणि या वेदना देणारा आपलाच असतो…

अशा या वेदनायुक्त आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात एक हळुवार फुंकर घातली आहे, आपल्या सर्वांच्या मदतीने…!

  1. अंध अपंग आणि वृद्ध असे जे लोक आजारी आहेत, अशांना रस्त्यावरच तपासून वैद्यकीय सेवा दिली आहे, कमरेचे, मानेचे, गुडघ्याचे पट्टे, वॉकर, कुबड्या, काठ्या इत्यादी साधने देऊन शारीरिक दृष्ट्या उभे केले आहे.

 

  1. ज्या गोष्टी रस्त्यावर करणे शक्य नाही उदा. रक्त लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे वैगरे वैगरे… या गोष्टी हॉस्पिटलमध्ये करवून घेतल्या आहेत. ज्यांना गरज आहे अशांना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी एडमिट केलं आहे.

पूर्णपणे बरे झाल्यानंतर, तुमच्या मुळगावी जाऊन किंवा इथं पुण्यात काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करा… भीक मागणं सोडा, अशी प्रेमाची गळ, नेहमीप्रमाणे घातली आहे…!

सन्मानाचे स्वावलंबी जीवन… Rehabilitation

वैद्यकीय सेवा रस्त्यावर देत असलो, तरीही हे माझे प्रमुख उद्दिष्ट नाही. त्यांच्यात उठून – बसून, त्यांच्यासोबत जेवण करून, भीक मागण्याचे मूळ कारण त्यांच्या नकळत शोधणे आणि हळूच त्यांच्या हृदयात प्रवेश करून, या लोकांना सन्मानाने जगायला शिकवणे, भीक मागणे सोडायला लावून काहीतरी व्यवसाय करायला तयार करणे, त्यांना तो व्यवसाय टाकून देणे, भीक मागणाऱ्या पालकांशी चांगलं नातं करून, त्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी त्यांची परवानगी मिळवणं, आणि “भिक्षेकरी” म्हणून नाही तर “गावकरी” म्हणून जगायला लावणं… हे माझे प्रमुख ध्येय आहे…! 

  1. जगायलाच थकलेले एक आजोबा, काही काम करू शकतील अशी शारीरिक कुवत नाही. या आजोबांना एक वजन काटा घेऊन दिला आहे. लोक येतील, या वजन काट्यावर स्वतःचे वजन करतील आणि आजोबांना पैसे देतील.

हे कोणालाही करायला जमेल असं सोपं आणि बैठं काम आहे.

प्रचंड गर्दी असणाऱ्या रस्त्यावर, परंतु यांना काही त्रास होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, अशा ठिकाणी त्यांना बसवलं आहे.

आयुष्यातून कायमचे “उठण्याआधी” शांतपणे काहीतरी काम करत ते आता “बसले” आहेत…!

लोकांनी वजन काट्यावर केलेल्या “वजनामुळे” यांच्या आयुष्याचा “भार” थोडा हलका होईल, अशी आशा करतो.

या महिन्यात एक जण सुलभ शौचालयात (Public Toilet) व्यवस्थापक म्हणून काम करू लागला आहे. याच्या मुलालाही आपण शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.

याचं जगणं आणखी “सुलभ” करण्यासाठी प्रयत्नात आहे…!

इतर… 

  1. तीव्र उन्हाळा आणि पुढे येणारा पावसाळा दोन्ही लक्षात घेऊन सर्वांना आपण छत्र्या घेऊन दिल्या आहेत.
  2. जी पुरुष मंडळी काम करू लागली आहेत त्यांना पुढील महिन्यात आपण रेनकोट देणार आहोत.
  3. आंघोळ… किती साधी गोष्ट…! आपण या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही.

परंतु रस्त्यावर राहताना आंघोळ करणे हा एक मोठा टास्क असतो, आंघोळीसाठी पैसे लागतात, साबण लागतो, आंघोळ केल्यावर घालायला कपडे नसतात, असलेच तर कपडे धुवायला साबण नसतो, अंगावरचे कपडे धुवून वाळायला टाकले, तर अंगावर घालायचे काय…? अजूनही बरंच काही प्रश्न असतात…

आणि मग आंघोळ टाळण्याकडे कल वाढतो…

आपण म्हणतो हे लोक किती गलिच्छ राहतात…

अनेकांना गलिच्छ राहायची इच्छा नसते, परिस्थिती त्यांना तसे राहायला भाग पाडते…!

आंघोळीसारखी साधी सर्वसामान्य गोष्ट, पण रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी हा एक फार मोठा टास्क आहे, याची कुणालाच जाणीवही होत नाही…

बरोबर आहे, ठेच लागल्यावरच अंगठा असल्याची जाणीव होते, तोपर्यंत नाही, “हि वस्तुस्थिती आहे…! “

असो, आंघोळीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उदा. टॉवेल, अंगाचे – कपड्याचे साबण आणि इतर कपडे दिले आहेत.

बऱ्याच लोकांचे, आंघोळ करण्यासाठी सुलभ शौचालयामध्ये ऍडव्हान्स पैसे भरले आहेत.

या महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून, भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन कसे करता येईल, या चर्चेसाठी बोलावले होते.

मला आलेल्या अनुभवांच्या आधारावर, पुनर्वसनासाठी सहज करता येतील असे 14 मुद्दे मी सादर केले आहेत.

चर्चेत उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांनीही अत्यंत उपयुक्त सूचना दिल्या.

या सर्वांची अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्रात खरोखर एकही व्यक्ती भीक मागताना दिसणार नाही.

असो…

माझे आणि मनीषा चे दोन दोन हात आणि तुम्हा सर्वांचे हजारो हात घेऊन, माझ्या सदसद्विवेक बुद्धीला जे पटलं ते या महिन्यात केलं… आपल्यासमोर मांडलं…

खूप लोक म्हणतात, ‘तुम्ही हे काम करता, रात्री किती शांत आणि सुखाने झोप लागत असेल तुम्हाला…? ‘

खरं सांगू…???

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे लोटली, पण या दुर्लक्षित समाजाचा अजूनही विकास झाला नाही… झोप कशी येणार…?

आपल्या साथीने गेली अकरा वर्षे पूर्ण वेळ मी या लोकांसाठी काम करत आहे… अजूनही म्हणावं तसं यश हाताला लागलं नाही… अजूनही वरच्या पायरीवर सरकलो नाही… झोप कशी येणार…?

अकरा वर्षे काम करून आज सुद्धा, मला असं वाटतं की मी आजही – अजूनही या कामाच्या बालवाडीच्याच इयत्तेत आहे… वरच्या इयत्तेत मी कधी जाणार…? मग झोप कशी येणार…?

अकरा वर्ष एकाच इयत्तेत राहणं, याच्या वेदना काय असतात कशा सांगू…? झोप कशी येणार…??

तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या हातात पाटी पेन्सिल दिलीत,

पण आज 11 वर्ष, बाराखडी शिकताना अजूनही मी पाटीवर अ.. अ… आंघोळीचा, हेच गिरवत आहे, याची खंत आहे…

झोप कशी येणार…??

प… प… पसायदानाचा मी कधी गिरवणार…?

ज्ञ… ज्ञ… ज्ञानेश्वर माऊलींचा…

हा “ज्ञ” माझ्या पाटीवर उमटून, माझी बाराखडी पूर्ण होऊन वरच्या इयत्तेत माझे लोक कधी जाणार? याच विचारात मी असतो…! मग शांत सुखाने कशी झोप येणार…?

मध्यरात्री एखाद वेळी वाटतं, जाऊ दे थांबवू हे सर्व… बास झालं आता…! या विचाराने शांत सुखाने कशी झोप येणार…?

केव्हातरी पहाटे मग, कुशीवरून वळताना, तुमची आठवण येते…

तुमची प्रत्येक कृती, तुमचे मदतीचे हात आणि कौतुकाचे शब्द… माझ्यासाठी गाणं होऊन कानात रुंजी घालतात…

रुक जाना नहीं तू कहीं हार के 

काँटों पे चल के मिलेंगे साए बहार के… ओ राही, ओ राही…

तू तो चला था सपने ही ले के 

कोई नहीं तो हम तेरे अपने हैं, 

रुक जाना नहीं… रुक जाना नहीं… ओ राही, ओ राही…

तुम्ही गायलेलं हे गीत, माझ्यासाठी जीवन गाणं बनतं…!

हे गाणं ऐकता ऐकता मात्र मी निश्चिंत झोपी जातो, “उद्याची सकाळ” होण्याची वाट पहात…!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares