मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या  देणारे आणि ९५% मिळवूनही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक..  उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं..  म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे,  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको..  आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला ..  असं होईल, ते नको प्यायला .. तसं होईल..  ह्या टेंशनमधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे,  आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘ काही नाही होत यार ‘ म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं ..  पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार —-  जगा की बिनधास्त…….. 

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाशी संवाद … ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाशी संवाद  ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

माणूस :  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?

देव :  विचार ना .

माणूस :  देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?

देव :  अरे काय झालं पण ?

माणूस :  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देव :  बरं मग ?

माणूस :  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देव :  मग ?

माणूस  :  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूस :  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देव :  बरं मग

माणूस  :  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून       झोपणार होतो . का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

 देव :  आता नीट ऐक —- आज तुझा मृत्यूयोग होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते  सँडविच वर निभावलं .तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूस :  देवा मला क्षमा कर .

देव :  क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 

— आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात ? – तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही . …

— आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि  नको ते मेसेज फॉरवर्ड करतो …..

—  देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार वागत असतो …! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो , पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो ..  तूप नाही .. अगदी तसच …आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  

—  ‘ माझं ‘ म्हणून नाही ” आपलं ” म्हणून जगता आलं पाहिजे …

—  जग खूप ‘ चांगलं ‘ आहे, फक्त चांगलं ” वागता ” आलं पाहिजे …

– सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।

— समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग असले, तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही 

… देह सर्वांचा सारखाच।

           …… फरक फक्त विचारांचा।

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

 

वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे….!!!! 

 

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे….!!!! 

 

तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे….!!!! 

 

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे….!!!! 

 

कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे….!!!! 

 

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे….!!!! 

 

जातीच्या नावाने सवलती घेईन 

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे….!!!! 

 

मतदान करताना जात पाहीन

जातीयता  मात्र बंद झाली पाहिजे….!!!! 

 

कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात झाला पाहिजे….!!!! 

 

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

 

 – कवी अज्ञात

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ”सा रं  का ही  स्व तः सा ठी…” – कवी :  मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 ”सा रं  का ही  स्व तः सा ठी…” – कवी :  मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

।। देवधर्म पूजाअर्चा

।। सारं असतं स्वतःसाठी

।। देवाला यातलं काही

।। नको असतं स्वतःसाठी

 

।। फुलं अर्पण करतो देवाला

।। ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?

।। सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा

।। त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?

 

।। नैवेद्य जो आपण दाखवतो

।। तो काय देव खातो ?

।। तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं

।। भरणपोषण करीत असतो !

 

।। निरांजनाच्या इवल्या ज्योतीने

।। ओवाळतो आपण प्रभूला

।। चंद्रसूर्य जातीने

।। हजर ज्याच्या दिमतीला

 

।। स्तोत्रं त्याची गातो ती काय

।। हपापलाय म्हणून स्तुतीला ?

।। निर्गुण निराकार जो

।। त्याला अवडंबर हवंय कशाला ?

 

।। सारं काही जे करायचं

।। ते स्वतःसाठीच असतं करायचं,

।। प्रार्थनेनं देव बदलत नसतो

।। स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !

 

|। आवडलेल्या आमटीचा

।। आवाज करीत मारता भुरका

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकरणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। जबरदस्त डुलकी येते

।। धर्मग्रंथ वाचता वाचता !

।। लहान बाळासारखे तुम्ही

।। खुर्चीतच पेंगू लागता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। देवळापुढील रांग टाळून

।। तुम्ही वेगळी वाट धरता !

।। गरम कांदाभजी खाऊन

।। पोटोबाची पूजा करता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। प्रेमाची हाक येते

।। तुम्ही धुंद साद देता !

।। कवितेच्या ओळी ऐकून

।। मनापासून दाद देता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

कवी :  मंगेश पाडगावकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

शाळेत असताना  टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँटला हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….

कारण मी हातावरील छडीची घाण पुसायचो..

तसा साफसफाईच्या बाबतीत मी खूपच जागरूक होतो!

माझ्या शालेय दिवसांमध्ये माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत. कदाचित ते मला काहीही  direct सांगायला मला घाबरत असावेत…

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असावं,  माझ हस्ताक्षरच त्याला कारणीभूत असणार.. म्हणूनच बऱ्याच वेळा ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…

कितीतरी वेळेला शिक्षक मला न विचारता त्यांचा chalk माझ्या दिशेने फेकत असत…

उद्देश एकच होता की मी नेहमीच अतिशय दक्ष असावं.. 

परीक्षेच्या वेळी नेहमीच 3-4 शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजुबाजूलाच पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत..

अगदी Z security च असायची!

कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून माझा सन्मान करण्यात येत असे.. 

म्हणजे मी इतर सर्व मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी, हाच प्रमुख उद्देश असावा…

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती..माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली  मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर उभा करत असत. आणि मैदानाला रोज ५-५ फेर्‍या पण मारायला सांगितल्या जात असत…. हु:! तेव्हा बाकीची मुलं मात्र वर्गात घामाघूम होऊन त्या कोंडलेल्या,  गुदमरलेल्या वातावरणात शिकत असत.. 

तसा मी इतर मुलांपेक्षा खूपच हुशार असल्यामुळे माझे बहुतेक शिक्षक मला नेहमीच म्हणत असत…. 

“ तू शाळेत का येतोस? …खरं तर तुला ह्याची काहीच गरज नाहीये…” 

वा !!! काय सोनेरी दिवस होते ते ….  अजूनही आठवतात मला !

— यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग वेगळं असूच शकत नाही —–

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

५२ पत्ते याबद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा. पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो- ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. 

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.     

—  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा, याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु. 

प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

३) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) २ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

३) चौकी म्हणजे चार वेद —  (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेद)

४) पंजी म्हणजे पंचप्राण —  (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षडरिपू —  (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये 

१०) गुलाम- मनातील वासना 

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

मित्रांनो, लहानपणापासून पत्ते बघितले. असतील काहींनी खेळले असतील.  परंतू त्या पत्त्यांच्या संचाबद्दल अशा प्रकारची माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.?

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला, तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते !!!

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अटॅच तर होतोच आपण… ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 अटॅच तर होतोच आपण… ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

अटॅच तर होतोच आपण

डिटॅच होता आलं पाहिजे — 

 

वार्धक्याच्या पाऊलखुणा चाल करताहेत अंगावर

कधी गुडघे पाय तर कधी दुखते आहे कंबर

ठाव सोडणाऱ्या दातांना हसून बाय म्हटलं पाहिजे

अटॅच तर होतो आपण 

डिटॅच होता आलं पाहिजे — 

 

लेक व्हावी जावयाची, मुलगा सुनेचा झाला पाहिजे 

आत्तापर्यंत आपलेच होते, आता एकमेकांचे झाले पाहिजे

 नातवंडे ही त्यांची संपत्ती, एवढी समज यायला पाहिजे 

अटॅच तर होतो आपण 

डिटॅच होता आलं पाहिजे —

 

ऑफिसच्या खुर्चीशीही किती अटॅच होतो आपण

पैसा पद प्रतिष्ठेचेही गुलाम होतो आपण

टायर्ड होण्याआधी रिटायर होता आलं पाहिजे

अटॅच  तर होतोच आपण

डिटॅच होता आलं पाहिजे —

 

ज्याने दिली चोच तो देईल चारा पाणी

भरवणारे कोण आपण– तो आहे दुसरा कोणी

शरीर नश्वर, आत्म्याशी तादात्म्य होता आलं पाहिजे

अटॅच तर होतोच आपण

 डिटॅच होता आलं पाहिजे —

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “Coordination Cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार. 

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला. “Duty Manager please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.” 

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.” 

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मै तुम को जमीन मे जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?” 

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले. “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मै आप की मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी मे ठीक तरह  से बातचीत करने नही आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उन की तरफ से माफी मांगता हूं . ” 

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली पण चढ्या आवाजांत म्हणाली “मेरे दांत मे बहोत दर्द है . मै सफर नही कर सकुंगी. बस इतना मैने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये है ? मै उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?” 

यावर बनर्जीने जे उत्तर दिले ते ऐकून मला हंसावे की रडावे ते कळेना. 

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मै वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैने लेडी को बोला टांग उपर करो. असं म्हणून बनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिटमे दोर्द गायब होता है.” 

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जीभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा. 

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बंद घराचे आत्मवृत्त… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बंद घराचे आत्मवृत्त… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…! 

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं ! 

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही! 

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात !! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घराच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ॥ लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ॥लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

शाळा नाही,

दप्तर नाही

अभ्यास नाही,

परीक्षा नाही

पाढे नाही,

गृहपाठ नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥१॥

ऑफीस नाही,

लँपटॉप नाही

रोजचा त्रासदायक 

प्रवास नाही

आई आजी सारखा 

स्वयंपाक नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥२॥

सारखा फोन 

नाही तर पेपर

फार तर बँकेत 

एखादी चक्कर

कुठेही जा म्हटलं

की काढतात स्कूटर

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥३॥

मित्र जमवतात,

सहली काढतात

देश परदेश 

फिरुन पाहतात

येतांना आम्हांला 

गंमत आणतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥४॥

नमस्कार केला की 

काहीतरी पुटपुटतात

आपल्याला नेहमीच 

शाबासकी देतात

चष्मा स्वत: हरवतात 

अन् दुसऱ्यांना 

शोधायला लावतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥५॥

सर्व आजोबांना समर्पित….

संग्राहिका : जुईली अमोल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares