झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले ” वास्तू प्रसन्न आहे हं तुमची ” – आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली. तुझी वास्तुशांती करून, काही वस्तु जमिनीत पुरून, जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही… मग उरतं ते फक्त घर… तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा केला जातो !!—- अगदी अपराधी वाटलं… मग काय तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं... म्हणून आज हे पत्र !
तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या… जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही…
घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते…
आजारपणात डॉक्टर म्हणतात–” आराम पडावा म्हणून ऍडमिट करा “– पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं… !
तुझ्या निवाऱ्यातच अपरिमित सुख आहे —
अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते,
दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं,
तर उंबरा म्हणतो ‘ थांब लिंबलोण उतरू दे…’
बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी !
स्वयंपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !
तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते,
—–खरंच वास्तुदेवते या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी —
खिडकी म्हणते ‘ दूरवर बघायला शिक,’
दार म्हणतं ‘ येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर,’
भिंती म्हणतात ‘ मलाही कान आहेत परनिंदा करू नकोस,’
छत म्हणतं ‘ माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर,’
जमीन म्हणते ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत ‘
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे, की बाहेरची शोभा आतून दिसेल आणि कुणालाही ऊन, वारा, पाऊस लागणार नाही ! ‘
इतकंच नाही तर तू घरातील मुंग्या, झुरळं, पाली, कोळी, यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तूच तर बघतोस आणि निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस…
— इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद आम्हाला दे…
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलांची घरं उभी रहातात याचं खरंच वाईट वाटतं…
एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालोय आम्ही……. पण तरीही शेवटी ‘ घर देता का कोणी घर ‘ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत ते घर नसतं… ते बांधकाम असतं रे… विटा-मातीचं.
वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची…’ नेहमी शुभ बोलावं म्हणजे आपल्या बोलण्याला वास्तूपुरूष नेहमी तथास्तु म्हणत असतो ‘ —– मग आज इतकंच म्हणतो की —
” तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन, तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तेष्टं एकत्र वास्तव्यास येऊ दे…”
—” आणि या माझ्या मागण्याला तू तथास्तु असं म्हणच… हा माझा आग्रह आहे.”
ll वास्तूदेवताभ्यो नम: ll
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तो कल्याण करी — तो मुरारी वनचरी — तो रामकृष्णहरी… सौ.प्रिया श्रीनिवास जोग ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आज गर्भरेशमी लाल रंगाचा शालू सीतामाईंच्या अंगावर अगदी खुलून दिसत होता. साक्षात लक्ष्मीचे तेज, तिचे ऐश्वर्य त्यांच्या मुखावर विलसत होते. पण कधी आपल्या रुपाचा त्यांना गर्व नाही झाला. अत्यंत सालस अन् सोज्ज्वळ अशी ती सीतामाई ! दाशरथी रामाची जनकनंदिनी सीता !
खरंतर देवळात आवळी पूजनाची चाललेली तयारी पाहून सीतामाई खुलल्या होत्या. वनवासातले भोग भोगून त्या मानवी जीवन खूप जवळून समजल्या होत्या. म्हणून तर माणसांच्यात घटकाभर त्यांनाही रमायला आवडत असावे. तितक्यात कुणीतरी एका कुंडीत लावलेले आवळीचे झाड तिथे आणून ठेवले. पाठोपाठ भगवान विष्णूंचा ध्यानस्थ फोटोही तिथे मांडण्यात आला. कुंडीभोवती फुलांची रांगोळी काय, फुलांचे तुळशीचे हार काय !! ती कुंडीतली छोटीशी आमलकी अर्थात आवळीच हो, लाजून चूर होतेय असा सीतामाईंना भास झाला. तिची इवली इवलाली नाजूक पाने तिने जणू लाजबावरी होऊन मिटून घेतली होती असंच वाटत होतं. खरंतर किती साधंसच तिचं रुप, पण श्रीविष्णूंच्या सान्निध्यात ते अधिकच खुललं होतं. ती अधिकच सौंदर्यवती भासत होती. नववधूचे भाव तिच्यावर विलसत होते. खरंतर नववधू तर सध्या वृंदादेवी आहेत. पण तरीही ही आमलकी किती आनंदात दिसत होती. औटघटकेचे तिचे हे सुख, हे सान्निध्य, पण ती अत्यंत समाधानी होती. सीतामाई एकटक तिच्याकडे पहात होत्या. ते रामरायांच्या चतुर नजरेने बरोबर टिपलं. थोडीशी थट्टा करायची लहर त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी एकवार लक्ष्मणाकडेही पाहिलं. पण तो काय बोलणार अशावेळी. तो बिचारा आपले धनुष्य सावरीत स्वस्थ उभा !!
श्रीराम— सीते, हे सीते , अशा एकटक कुठे पाहताय नक्की ? तुमच्याहून रुपाने कुणी सरस आहे की काय ?
सीतामाई – लटके हसत मान वेळावत, “अहो तसंच काही नाही. पण आज ती आमलकी पहा ना कशी अनुपम दिसतेय. आजचा दिवस तिच्या भाग्याचा. हेवा नाही हो आमच्या मनी. आपले एकपत्नी व्रत आम्ही जाणत नाही का ? पण तिचे उजळलेले रुप नेत्रात साठवावे वाटते हो. आज तिला विष्णूंचे सान्निध्य लाभलंय. त्यांचा परीस स्पर्श तिला मिळतोय. त्यांची कृपादृष्टी आज तिच्यावर आहे. समाधान मिळतंय हो ते पाहून.
श्रीराम— सीते हे वैभव तर तिच्या ओटीत तुम्हीच घातलंत ना. तिच्या झाडाखाली विष्णूरुपात पूजा करुन–तेही तुमच्या लक्ष्मीरुपात. आपण उभयतांनी तिथेच वास केला म्हणून तर तिचे माहात्म्य थोर झाले.
सीतामाई— ते सारं स्मरणात आहे हो. पण मी आता वेगळाच विचार करतेय. आपण राम अवतारात १४ वर्षे वनांतरी काढली. आणि त्या गोकुळातल्या कृष्णाने गाईगुरांबरोबर गोपगोपींबरोबर वनविहार केला. दोन्ही अवतारात वनात वास होताच. पण किती फरक पडला ना दोहोंत. कृष्ण अवतारात आपला एकमेकांचा सहवास किती ते जरा आठवावंच लागेल. तुमचा सहवास लाभला तो राधेला आणि वृंदेलाच.
श्रीराम— अवतारलीला होत्या त्या सर्व. पण हा राम मात्र सीतारामच किंवा सीताकांत म्हणून स्मरला जातो हेही सत्य आहे ना–
“ सीताकांत स्मरण जयजयराम “ — लक्ष्मणाने हळूच जयजयकार करत श्रीरामांना आपले अनुमोदन दर्शवले.
आता यावर सीतामाई निरुत्तर. पण रामांना कोपरखळी मारायचीच होती. त्यांचे लक्ष तितक्यात समोर गेलं. लाडू, पेढे, पोहे, चित्रान्ना, केळी, फुटाणे,- भगवंतासमोर किती ते भोग मांडले जात होते. पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जात होता. रामराया आशिर्वाद मुद्रेत होते. स्मित हास्य चेहेऱ्यावर उमटत होते. ते पाहून सीतामाई चटकन म्हणाल्या,
“ अहो ऐकलंत का, तो नैवेद्य कृष्णार्पण आहे बरं. रामराय काय वनवासी, कंदमुळं खाऊन राहिलेले. तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचा हा भक्तांना कायम प्रश्न पडत असावा. त्यामुळे सगळा नैवेद्य कृष्णार्पणच !! आणि हो, इथे श्रीविष्णूसहस्रनाम आवर्तन होणार आहे हे पण ध्यानात असू दे. “
श्रीराम — “ होय सीते जाणून आहोत ते आम्ही. ‘ सहस्र नाम तत्तुल्य रामनाम वरानने ‘ – ठाऊक आहे ना.
रामकृष्णहरी हा या युगासाठी अत्यंत सोपा मंत्र आहे. जो हा मंत्र जपेल त्याचे कल्याण होईल. आवर्तन श्रीविष्णूसहस्रनामाचे पण साक्षीला राम आहे हे महत्त्वाचे !!”
सीतामाई — एकवचनी रामाचे कुठलेही वचन कसे हो उणे पडावे. आम्ही निरुत्तर आहोत. तुमच्या बाणांप्रमाणे तुमचे वाक्बाणही अमोघ आहेत हे मान्य आहे आम्हाला.”
श्रीराम -राम अवतारात वनवासी राहिलो. पण कृष्ण अवतारात खरे निसर्ग सान्निध्य मोकळेपणाने अनुभवले. गोपांचा जीवनाधार तो गोवर्धन, त्यावरील वृक्ष राजी, यमुनेचा तो खळाळ अन् तिचे ते धीरगंभीर डोह, यमुना तटावरचा तो कदंब, आवळी, ते वृंदावन, गोधन, वेणूनादाने नादावलेले इतरही पशुपक्षी, हे सारे तर सृष्टीचे भाग. ही विपुल सृष्टी आहे. म्हणून मानवी जीवन समृद्ध आहे. म्हणूनच फक्त गोवर्धन नव्हे तर सर्व सृष्टीचे वर्धन व्हावे आणि अर्थातच पुढील पिढीसाठी संवर्धनही तितकेच महत्वाचे हे जाणून तशा लिला रचल्या. तशा कथा रचल्या आणि त्यातून कालातीत असे संदेश मानव जातीला दिले.”
सीतामाई— होय त्यासाठी गीतेची निर्मिती झाली. विभूतीयोगाद्वारे आपली विभूती निसर्गाच्या कोणकोणत्या रुपात आहे हे सांगितलंत. तेच मुख्य सूत्र धरुन आपल्या ऋषीमुनींनी सणवारांची रचना केली, असंच म्हणायचं आहे ना ?”
लक्ष्मण — “ मध्येच बोलतोय श्रीरामा. शेषरुपात या पृथ्वीचा भार आम्ही तोलतोय म्हणून जे वाटतंय ते बोलू का–”
सीतामाई— “ अहो भाऊजी, परवानगी काय हो मागताय? अहो बोलू शकता तुम्ही. तुमचे आमच्यात शाश्वत स्थान आहेच.”
लक्ष्मण — “ मानवाने त्याच्या कल्याणाकरता घालून दिलेल्या परंपरांचे पालन करावे यासाठी खरेतर मीच मनोभावे प्रार्थना करेन. कारण मानवाची चुकीची पावले धरणीला भारभूत होतात. आणि पर्यायाने मलाही.”
श्रीराम– “ अगदी योग्य बोललास लक्ष्मणा ! धर्माचे पालन व रक्षण करण्यासाठी परंपरांचे आणि पर्यावरणाचेही समजून उमजून जतन हेही महत्त्वाचे. काळाची बदलती पावले ओळखण्याइतका माणूस सूज्ञ आहेच. त्याने फक्त हितकारी मार्गावर पावले टाकत समस्त मानव जातीचे कल्याण साधावे.”
रामराया कल्याण करायला उत्सुक आहेतच. ते सर्वांच्या हृदयातच स्थित आहेत. ते फक्त ओळखावे आणि ज्याने त्याने आपले कल्याण साधावे.
लेखिका : सौ.प्रिया श्रीनिवास जोग, चिंचवड पुणे
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पाश्चिमात्य संशोधकांनी उलगडले की संस्कृत मंत्र लक्षात ठेवणारी मुले मोठी झाल्यावर अति हुशार का होतात ?
कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते हे न्यूरोसायन्स दाखवते. ‘संस्कृत इफेक्ट’ ही संज्ञा न्यूरोसायंटिस्ट जेम्स हार्टझेल यांनी तयार केली होती, ज्यांनी व्यावसायिक पात्रता असलेल्या २१ संस्कृत पंडितांचा अभ्यास केला होता. त्यांनी शोधून काढले की वैदिक मंत्रांचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक कार्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. हा शोध भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी देतो, ज्यामध्ये असे मानले जाते की मंत्रांचे स्मरण करणे आणि पाठ करणे स्मरणशक्ती आणि विचार वाढवते.
डॉ. हार्टझेलच्या अलिकडील अभ्यासात असा प्रश्न निर्माण झाला आहे की अशाप्रकारच्या प्राचीन ग्रंथांचे स्मरण अल्झायमर आणि इतर स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या रोगांचे विनाशकारी आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते का? वरवर पाहता, भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर असे सुचवतात, आणि संस्कृतमध्ये अधिक संशोधनासह भविष्यातील अभ्यास नक्कीच केले जातील.
आपल्या सर्वांना सजगता आणि ध्यान पद्धतींचे फायदे माहित असताना, डॉ हार्टझेलचे निष्कर्ष खरोखरच नाट्यमय आहेत. कमी होत चाललेल्या लक्षांच्या जगात, जिथे आपल्याला दररोज माहितीचा पूर येतो आणि मुले लक्ष वेधून घेणारे अनेक विकार दाखवतात, तिथे प्राचीन भारतीय शहाणपणामध्ये पश्चिमेला (आणि पूर्वेकडील त्यांच्या ‘आधुनिक’ बौद्धिक सेवकांना) शिकवण्यासारखे बरेच काही आहे.
गायत्री मंत्रासारख्या सामान्य संस्कृत मंत्रांचे थोडय़ा प्रमाणात जप आणि पठण करूनही आपल्या सर्व मेंदूवर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.
मला तुमचा चेहरा आठवायचा आहे सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
“ मला तुमचा चेहरा आठवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: ” सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का?”
रतनजी टाटा म्हणाले: ” मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.—
पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.
त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील ९५%डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.
चौथा टप्पा होता, जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे २०० मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हीलचेअर घेतल्या.—
—पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्या . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणू काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “ तुला आणखी काही हवे आहे का?”
—- तेव्हा त्या मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला—-
—मुलाने म्हटले: ” मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”—- “
वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?
कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.
☆ मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
तुम्ही वयानं जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला— असे डॉक्टर्स म्हणताहेत..
ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलले पाहिजे कारण स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही इतर मार्ग नाही. अधिक बोलणे हा त्यातल्यात्यात प्रभावी मार्ग आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत—-
१)बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक अबोल असतात, कमी बोलतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते.
२) बोलल्याने मनावरचा बराचसा ताण दूर होऊ शकतो, मानसिक आजार टळू शकतात. आपण बरेचदा काही बोलत नाही, पण आपल्या मनात मात्र असतं. अश्यानं आपला भावनिक कोंडमारा होऊ शकतो आणि आपण गुदमरतो. कुणी वयस्कर व्यक्ती बोलत असेल तर बोलू द्या..
३) बोलण्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम होतो, घशाचाही व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते. तसेच डोळे आणि कान खराब होण्याचा धोका, चक्कर वगैरे येण्यासारखे सुप्त धोकेही कमी होतात.
थोडक्यात, ज्येष्ठ नागरिक – सेवानिवृत्त व्यक्तींना अल्झायमरसारख्या विकारांपासून स्वतःचा बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बोलणे – शक्य तितके बोलणे, इतरांशी संवाद साधणे.
म्हणून, आपण सारे अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांनाही नातेवाईक अन मित्रमंडळीसोबत अधिक बोलण्यास प्रवृत्त करूया…
संग्राहक : सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो.आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!
घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात.मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.
ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.
चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.
पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.
प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहीणींना अचूक माहीती असते ईतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.
डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.
जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.
शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही तो संपतो पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.
असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ
हो आणि एक राहीलंच घरोघरी ताटं यायची घरोघरी ताटं जायची.
त्यात घरोघरच्या चकल्या कडबोळ्या काही कडक काही तिखट काही खुसखुशीत तर काही वातड पण सगळ्यांना मुक्ती मिळायची ताकाच्या झणझणीत कढीत समाधी मिळायची. एक वेगळीच सबगोलंकारी चव यायची जठराग्नीची तृप्ती व्हायची.
काही फुकट जाण्याचा विषयच नसायचा.
अन्नब्रह्माची किंमत असायची
🙏
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
महेशचं घर एका देवळासमोर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली होती.
चडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला. तर काचेवर एक चिठ्ठी अडकवलेली होती. त्या चिठ्ठीवर एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता, आणि फोन करण्यास सांगितले होते.
त्याने त्या नंबरवर फोन लावला.
पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘ मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच.
मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. पहाटे तुम्हाला त्रास द्यायला नको म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’
त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, आणि तो माफीही मागत होता.
महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘ तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबूल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.”
यावर तो माणूस म्हणाला…
“कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर— तर माझ्यासारख्या माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार? “
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
एक महिला आहे जयपूरमध्ये, ती PG ( पेइंग गेस्ट ) ठेवते. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये मोठ्या १०-१२ खोल्या आहेत. 3 बेड प्रत्येक खोलीत ठेवल्या आहेत. त्यांच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे.
त्या मनापासून स्वयंपाक करतात. खाणाऱ्यांनाही ते आवडते. इतके उत्तम की सर्वोत्तम शेफला बनवता येणार नाही. नोकरदार लोक आणि विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहात.
प्रत्येकजण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घेई, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवण पॅक करून मिळे.
पण त्यांचा एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाई, उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर बंद. ते दिवस हॉटेलात खा अथवा काहीही करा, पण बाहेर.
मी विचारले, “ हे का ? किती विचित्र नियम आहे हा. तुमचे स्वयंपाकघर फक्त २८ दिवसच का ?”
“ आमचा नियमच आहे. म्हणूनच आम्ही फक्त २८ दिवसांसाठीच जेवणाचे पैसे घेतो. “
मी म्हणालो, “ हा काय विचित्र नियम आहे ? आपणच बनवला आहे, मग नियम बदला.”
ती म्हणाली, “ नाही. नियम हा नियम असतो.”
एके दिवशी मी त्यांना पुन्हा चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावर.
त्यादिवशी ती बोलली आणि म्हणाली, “ तुला समजणार नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमी असमाधानी आणी नेहमी टीका…… त्यामुळे वैतागून हा नियम केला. २८ दिवस प्रेमाने खायला द्या आणि उरलेले 2-3 दिवस बाहेरचे खा. आता त्या ३ दिवसात नानी आठवते. मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि तरीही निकृष्ट अन्न मिळते हे कळते. चहाचे दोन घोट १५ ते 20 रुपयांना मिळतात.—- माझे मूल्य त्यांना या ३ दिवसांतच कळते, त्यामुळे उरलेले २८ दिवस अतिशय नरम राहतात.”
खरंय — जास्त आरामाची व आयत्याची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.
अशीच परिस्थिती देशात राहणार्या काही जनतेची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमीच काही उणिवा दिसतात. अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक घडले नाही, होत नाही आणि होणारही नाही.
अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावे, जेणेकरून त्यांची बुद्धी बरोबर ठिकाणावर येईल.
संग्राहक : विनय गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈