मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘चिरंजीवी भव.. की एक्झिट ऑन टाईम?’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

सौ. शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘चिरंजीवी भव.. की एक्झिट ऑन टाईम?’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

नुकतेच KBC Junior 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच; पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा confidence, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस innocence. सरळसोट, कुठलाही आडपडदा नाही… खूप छान वाटतं.

अशाच एका भागात एक दहा- बारा वर्षांची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खूश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, “चिरंजीवी भव. ”

ती चिमुरडी आधी नम्रपणे “Thank you, sir” म्हणाली. पण मग… कथेमध्ये ट्विस्ट आला.

ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली,

“Thank you, sir! लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हात-पाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक bedridden होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर exit घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या exit घ्यायचंच आहे, तो मुझे time पे exit लेना हैं”. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले.

इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली,

“आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिये पैसा है. आप चिरंजीव हो गये, तो भी ठीक. ”

क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कुणाचंतरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल – आजारी व्यक्तीची अणि कुटुंबाचीसुद्धा.

पण तरीही… ही Gen Alpha काहीतरी वेगळीच आहे, हे नक्की.

तिच्या या बोलण्याने मला ‘इच्छा मरण’ या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकतानादेखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये euthanasia कायदेशीर आहे—ठरावीक नियम आणि अटींसह. नेदरलॅंड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, कॅनडा, कोलंबिया स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल तसेच ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधील काही states मध्ये terminal illness असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबागच्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली बेचाळीस वर्ष… बेचाळीस वर्ष ……

पण आज ह्या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू—

एका ठरावीक वयानंतर किंवा ठरावीक परिस्थितीत मला ventilator वर ठेवू नका किंवा कृत्रिमरीत्या जगवू नका.

असं एखादं will किंवा living directive असणं किती दिलासादायक ठरेल!

यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल…

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—

त्यांच्या मनावर कधीही guiltचं ओझं राहणार नाही.

आपण नेहमी “आई-वडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत, ” असं म्हणतो. पण कधी कधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो, हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येतंय, पण प्रश्न असा आहे की—फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजे जगणं का?

जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण “जीवन” म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल.

त्या चिमुरडीने ‘इच्छा मरण’ हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर exit घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल! मृत्यूची भीती नसून, वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती.

उद्या हीच पिढी policy बनवेल, कायदे ठरवेल, आणि “जगण्याचा अर्थ” नव्याने define करेल. तेव्हा कदाचित ‘इच्छा मरण’ ही संकल्पना भीतीदायक न वाटता, करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल.

आणि तेव्हा कदाचित ह्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू…

 “बाबू मोशाय! ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं! ”

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

सा रे ग म प ध नि सा

संगीतातले हे सप्तसूर

आणि

बायकोच्या शब्दकोशातले नवऱ्याच्या बाबतीतले हे ‘सप्तसूर’..

 

सा धं कळत नाही या माणसाला

रे देवा, कधी सुधारणार हा माणूस..

 

ग प्प बसा, मला शिकवू नका..

म लाच सर्व करावं लागतं..

प टपट आवरणं, ह्यांना कधी जमतच नाही..

ध ड एक काम करत नाही, हा माणूस..

 

नि दान एक काम मी करीन, म्हणेल, तर शपथ..

सा री कामं बायकोवर टाकून, गावभर उंडारायला हा मोकळा..

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याच्या संध्याकाळी मुलं आणि आपण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्याच्या संध्याकाळी मुलं आणि आपण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आयुष्याच्या संध्याकाळी

आपली मुले जेव्हा आपली काळजी घेतात, तेव्हा

खूप छान वाटतंय..

 

बालपणी ज्यांना चिऊकाऊचे घास भरवले,

आज ते मला, “आई, खाऊन बघ छान आहे, ” म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरून रस्ता ओलांडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलांडतात.

हातांची अदलाबदल कधी झाली, कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

“चालताना उड्या मारु नकोस रे. पडशील, ” असं म्हणणारी मी..

आणि आज, “आई, हळू पुढे खड्डा आहे, ” म्हणणारे ते.

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

“प्रयत्न करून बघ. शिकवलंय ना मी तुला, ” असे म्हणणारी मी आणि आज… “सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, ” असं सांगणारे ते….

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते “आई, हे गाणं ऐकलंस का! बीट्स आवडतील बघ तुला, ” असं म्हणतात, तेव्हा काय सांगू काय वाटतं….?

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनिकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या.

किती मस्त वाटतंय…

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी,

आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे, हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, “हे काय, बाबा अजून आले नाहीत? ” म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच. भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

 

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

खूप धन्य वाटतंय…

 

काहींच्या बाबतीत हे आता फोनवर आणि व्हॉट्सपवर होतंय. पण तेही छान वाटतंय…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वडिलांचा नकार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

श्री ब्रह्मानंद पै

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘वडिलांचा नकार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

“मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे… ” पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं.

​ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस.

​ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, “बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. “

सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.

“ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण… मी रिस्क घेऊ शकत नाही. “

​ईशा संतापली होती.

“तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. “

असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.

तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाच्या तोंडाकडे पाहिलंही नव्हतं.

गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.

​वर्तमान:

ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.

तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.

“ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. “

​ईशाने उपहासाने विचारले, “काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी?”

​काका गंभीर झाले. “वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. “

​ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.

काहीवेळाने आलं ते पान – तारीख १० वर्षांपूर्वीची.

“आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो. “

​ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. “आज ईशाला अमेरिकेच्या ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खूश आहे. तिला वाटतंय, तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून आलेले पैसे जमा केलेत. तिला वाटेल, बापाने मदत नाही केली. ती माझा तिरस्कार करेल… पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. “

​ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला ‘स्कॉलरशिप’ समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?

ज्या बापाला तिने ‘भित्रा’ आणि ‘कंजूस’ म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?

​ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख – २ दिवसांपूर्वीची.

​”ईशा, आज डॉक्टर म्हणाले- माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो… मी तुला पैसे दिले नाहीत, असं नाटक केलं, कारण तुला ‘बापाच्या पैशावर जगणारी मुलगी’ नाही, तर ‘स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री’ व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.

फक्त एक खंत आहे… मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.

​तुझा ‘कंजूस’ बाबा. “

​ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.

“बाबा… बाबा उठा ना… मला माफ करा… मी चुकले… “

तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. ​आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.

पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक ‘भेट’ आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. ​बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.

त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त ‘चटणी-भाकरी’ खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.

​ईशाला आता कळलं होतं…

बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.

आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.

लेखक: अज्ञात 

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तुमची मैत्री कुठे होती?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “तुमची मैत्री कुठे होती?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

उद्धवाने कृष्णाला विचारलेला कठोर प्रश्न: “तुमची मैत्री कुठे होती? ”

महाभारत युद्धानंतर उद्धवाने श्रीकृष्णासमोर तो प्रश्न ठेवला, जो आजही आपल्या सर्वांच्या मनात उमटतो. हा संवाद केवळ एक कथा नसून, जीवन जगण्याचा एक अत्यंत गहन ‘मॅनेजमेंट लेसन’ आहे.

“हे माधवा! तुम्ही म्हणता, की खरा मित्र तोच, जो न मागता मदत करतो. मग पांडवांबरोबर असे का घडले?

युधिष्ठिरांना जुगार खेळण्यापासून तुम्ही का थांबवले नाही?

त्या फाशांना धर्मराजाच्या बाजूने का वळवले नाही?

आणि द्रौपदीचा सभेत अपमान होत असताना, तिच्या चीरहरणाची पराकाष्ठा होईपर्यंत तुम्ही वाट का पाहिली?

हीच का तुमच्या मैत्रीची व्याख्या? ”

भगवान मंद स्मित करून म्हणाले,

“उद्धवा, संसारात विजय त्याचाच होतो ज्याच्याकडे विवेक असतो.

दुर्योधनाकडे विवेक होता—त्याने स्वतः न खेळता शकुनीला पुढे केलं. युधिष्ठिरही विवेकाने वागून, स्वतःऐवजी मला खेळायला सांगू शकले असते. सांग, जर माझ्यात आणि शकुनीत खेळ झाला असता, तर विजय कुणाचा झाला असता?

धर्मराजांनी मला विनंती केली होती, की बोलावल्याशिवाय सभेत यायचे नाही.

त्यांना स्वतःचा पराभव माझ्यापासून लपवायचा होता. मी त्यांच्या त्या विनंतीच्या मर्यादेत बांधला गेलो आणि बाहेरच उभा राहिलो. ते हरत गेले, पण मला आठवण्याऐवजी फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहिले.

द्रौपदीला जेव्हा सभेत ओढून आणले गेले,

तेव्हाही तिचा स्वतःच्या शक्तीवर आणि पांडवांवर विश्वास होता. पण ज्या क्षणी तिने स्वतःवरील आधार सोडून, पूर्ण शरणागतीने हाक मारली—

‘हे हरि! अभय दे, कृष्णा! ’—

त्या क्षणीच मी प्रकट झालो. सांग उद्धवा, उशीर माझ्याकडून झाला होता की तिच्या पुकारण्यात? ”

उद्धवाने टोचून विचारले,

“म्हणजे तुम्ही फक्त बोलावल्यावरच येता? शांतपणे सगळं पाहत राहता? ”

कृष्ण म्हणाले,

“उद्धवा, सृष्टी कर्मफलाच्या नियमावर चालते.

मी हस्तक्षेप करत नाही; मी केवळ साक्षी आहे. प्रत्येक क्षणी तुमच्याजवळ उभा राहून तुम्हाला पाहतो—हाच माझे धर्म आहे. ”

उद्धवाने पुन्हा प्रश्न केला,

“वा! म्हणजे आम्ही पाप करत राहायचे आणि तुम्ही फक्त पाहत बसायचे? ”

तेव्हा भगवानांनी मर्म सांगितले:

“उद्धवा, ज्या क्षणी तुला हे जाणवेल की ‘मी’ तुला पाहतो आहे,

त्या क्षणी तू कोणतेही चुकीचे कृत्य करू शकशील का?

मनुष्य पाप तेव्हाच करतो, जेव्हा त्याला वाटते की त्याला कोणीही पाहत नाही.

युधिष्ठिरांची चूकही हीच होती. “

उद्धव निरुत्तर झाले.

हा संवाद आपल्याला हे शिकवतो की—

ईश्वराची अनुपस्थिती पाप नाही,

तर ईश्वराच्या उपस्थितीचे विस्मरण हेच पापाचा खरं मूळ आहे.

जर आपण प्रत्येक क्षणी त्याला आपल्या सोबत अनुभवले,

तर जीवन आपोआप दिव्य होऊन जाईल.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शून्य मार्क…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शून्य मार्क” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

रशियाच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेचा कमाल गुण ५ असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे—एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका पूर्णपणे कोरी दिली तरी त्याला २ गुण दिले जातात.

मॉस्को विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा पहिल्याच दिवशी हे कळल्यावर मी अक्षरशः चकित झालो. मला ते अजिबात तर्कसंगत वाटले नाही.

कोणी काहीही लिहिले नाही, तर त्याला शून्यच मिळायला नको का?

कुतूहलापोटी मी माझे प्राध्यापक डॉ. थिओडोर मेद्रायेव यांना विचारले,

“सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?”

डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,

“शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर—फक्त वर्गात येण्यासाठीही विद्यार्थी किती प्रयत्न करतो. कदाचित पहाटे उठून, कडाक्याच्या थंडीत, लांबचा प्रवास करून, बस-ट्राम-ट्रेनमध्ये उभा राहून तो इथे आला असेल.

उत्तरपत्रिका कोरी असली तरी तो आला, याचा अर्थ त्याने प्रयत्न केला आहे. मग मी त्याला शून्य कसा देऊ?”

ते पुढे म्हणाले,

“कदाचित तो उत्तर लिहू शकला नसेल. पण म्हणून त्याचे सगळे प्रयत्न मिटवून टाकायचे का?

रात्रभर जागून केलेला अभ्यास, घेतलेली वही, उघडलेली पुस्तके, केलेली धडपड—हे सगळे आपण दुर्लक्षित करायचे का?

नाही रे, माझ्या मुला. माणूस कधीच शून्य नसतो.

आपण शून्य देतो, तेव्हा आपण त्याचा आत्मविश्वास चोरतो, त्याच्या आतली जिद्द विझवतो.

आणि शिक्षक म्हणून आपले काम विद्यार्थ्यांना पुन्हा-पुन्हा उभे राहायला मदत करणे आहे—त्यांना शरण जायला भाग पाडणे नाही.”

मी शांतपणे ऐकत राहिलो. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी हलले.

तेव्हाच मला उमगले—

शिक्षण म्हणजे केवळ गुण देणे किंवा उत्तर तपासणे नाही.

शिक्षण म्हणजे माणसाला जिवंत ठेवणे, प्रयत्नांची दखल घेणे, आशा जपणे.

शून्य गुण अनेक विद्यार्थ्यांसाठी जणू मृत्यूची घंटा ठरतात.

त्या कागदावरचं शून्य त्यांना घाबरवतं, त्याची शिकण्याची आवड संपवतं आणि हळूहळू शिक्षणाबद्दल चीड निर्माण करतं.

पण शिक्षकाची जबाबदारी वेगळी आहे.

ती म्हणजे प्रोत्साहन देणं, धीर देणं, आणि म्हणणं—”तू करू शकतोस. पुन्हा प्रयत्न कर.”

रिकाम्या उत्तरपत्रिकेसाठीही किमान गुण देण्याचा अर्थ असा असतो—

“तू शून्य नाहीस.

तू महत्त्वाचा आहेस.

तुझ्यात क्षमता आहे.

तू अपयशी झालेला नाहीस—फक्त यावेळी  यश मिळाले नाही.पुन्हा प्रयत्न कर.”

हेच खरे शिक्षण आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या हातात असते.

जर शिक्षक थोडे अधिक माणुसकीने पाहू लागले,जर त्यांनी आकड्यांपलीकडे प्रयत्न पाहायला शिकलं,तर अनेक निराश विद्यार्थी पुन्हा स्वप्न पाहण्याचे धाडस करतील.

मला वाटते ही गोष्ट फक्त रशियापुरती मर्यादित राहू नये.

ती जगभरातील शिक्षकांपर्यंत पोहोचायला हवी.

कारण—

शून्य गुण म्हणजे शिक्षणच नाही,

तर अनेकदा एखाद्याचा प्रवास संपवणे.

जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रयत्न करत आहे,

तोपर्यंत तिला किमान आश्वासन तरी मिळायलाच हवे,

किमान मान्यता तरी मिळायलाच हवी.

— रशियात शिक्षण घेणाऱ्या एका अज्ञात विद्यार्थ्याने लिहिलेली ही गोष्ट एखाद्या आदर्श शिक्षकासोबत जरूर शेअर करा.

कदाचित ती आपल्या शिक्षण व्यवस्थेत एखादा छोटासा, पण अर्थपूर्ण बदल घडवेल.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आत्मविश्वास व धाडस… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ आत्मविश्वास व धाडस… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काय गंमत असते पहा..

असाधारण बुद्धिमत्ता, उच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या बहुतांशी लोकांचे मन कायम शंका, भीती आणि संशयांनी भरलेले असते. त्यामुळे ते सुरक्षिततेचा मार्ग पसंत करतात आणि मोठी जोखीम घेणे टाळतात. परिणामी, त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्धोक चाकरी (नोकरी) करण्यात व्यतीत होताना दिसते. याउलट, अनेक वेळा दिसते की साधारण बुध्दिमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता असलेले अथवा ज्यांनी गमवायला जीवनात फारसं काही कमावलेलं नसलेले, जास्त विचार न करता प्रचंड आत्मविश्वासाने एखाद्या व्यवसायात उतरून त्यात यश मिळवतात व कालांतराने उच्च शिक्षित लोकांना आपल्याकडे कामाला ठेवून त्यांच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या जोरावर व्यवसायाला नव्या उंचीवर नेतात.

कारण कोणत्याही माणसाचा आत्मविश्वास पर्वतालाही हलवू शकतो. हे केवळ एक सुभाषित नसून, ते एक सत्यवचन आहे… असाधारण बुद्धिमत्ता असलेल्या व उच्चशिक्षित व्यक्तींकडे अनेकदा ‘ॲनालिसिस पॅरालिसिस’ (Analysis Paralysis) ही समस्या दिसून येते. ते प्रत्येक परिस्थितीचा इतका सखोल विचार करतात की, शेवटी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा मोठा असतो, त्यामुळे त्यांना प्रत्येक संभाव्य धोका स्पष्टपणे दिसतो. ‘चुकीचा निर्णय घेतला तर काय होईल?’, ‘अपयश आले तर समाजात मान कसा राहील?’अशा अनेक शंका त्यांच्या मनात घर करतात. ही गमावण्याची भीती (Fear of Loss) त्यांना सुरक्षित ठेवते, पण त्याच वेळी त्यांना मोठे काही साध्य करण्यापासून रोखते. सुरक्षित नोकरीचा मार्ग त्यांना निश्चित उत्पन्न आणि सामाजिक प्रतिष्ठा देतो, पण उद्योजकतेचे किंवा धाडसाचे मोठे फळ मिळवण्याची संधी ते गमावून बसतात. अन् दुसरीकडे, साधारण बुध्दीमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या व्यक्तींकडे गमावण्यासाठी फारसे काही नसते. त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन प्रयत्न ही एक संधी असते, धोका नव्हे. त्यांच्यातील आत्मविश्वास शंकांना मनात जागा देत नाही. ते परिस्थितीचा अतिविचार न करता थेट कृती (Action) करण्यावर भर देतात. अन् व्यवसायात यश मिळवतात.

व्यवसायात किंवा जीवनातील इतर क्षेत्रांत यश मिळवण्यासाठी केवळ ज्ञानाची नव्हे, तर लवचिकता (Flexibility), बाजाराचे निरीक्षण, संवाद कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोका पत्करण्याची तयारी (Risk Taking Ability) आवश्यक असते. हे गुण औपचारिक शिक्षणातून नव्हे, तर जीवनाच्या अनुभवातून आणि आत्मविश्वासातून माणसात रुजतात. यामुळेच जगभरात अनेक यशस्वी उद्योजक पाहायला मिळतात, ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले किंवा ज्यांच्याकडे उच्च पदव्या नव्हत्या, पण त्यांनी केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती उच्चशिक्षित असतात, कारण या उद्योजकांनी केवळ आत्मविश्वासाच्या बळावर योग्य लोकांना योग्य कामासाठी नेमण्याची कला आत्मसात केलेली असते.

थोडक्यात शिक्षण आणि ज्ञान महत्वाचे आहे, पण जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि धाडस यांचे महत्त्व अधिक आहे !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “८० वर्षांच्या सुदैवी जीवनाचे ४४ मंत्र…” – लेखक :डॉ. वाडा ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “८० वर्षांच्या सुदैवी जीवनाचे ४४ मंत्र…” – लेखक :डॉ. वाडा ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

[डॉ. वाडा (वय ६१ वर्षे) हे वृद्धांच्या मानसिक आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ आहेत.]

८० वर्षांच्या सुदैवी जीवनाचे ४४ मंत्र

  1. सतत हलत राहा.
  2. राग आला तर खोल श्वास घ्या.
  3. शरीर कडक होऊ नये म्हणून पुरेशी हालचाल करा.
  4. उन्हाळ्यात ए. सी. वापरत असाल तर अधिक पाणी प्या.
  5. डायपर (वृद्धांसाठी) वापरल्याने हालचाली अधिक सोप्या होतात.
  6. जास्त वेळा चावल्याने मेंदू आणि शरीर अधिक सक्रिय राहते.
  7. विस्मरण वयामुळे नसते, तर मेंदूचा वापर कमी केल्याने होते.
  8. खूप औषधे घेण्याची गरज नाही.
  9. रक्तदाब आणि साखर अनावश्यकरीत्या कमी करण्याची गरज नाही.
  10. एकटे राहणे म्हणजे एकाकीपणा नव्हे; ती शांततेत घालवलेली वेळ असते.
  11. आळस करणे लाजिरवाणे नाही.
  12. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. (जपानमध्ये वयोवृद्धांनी लायसन्स परत देण्याची मोहीम चालू आहे.)
  13. जे आवडते ते करा; जे नकोसे वाटते ते करू नका.
  14. वय वाढले तरी नैसर्गिक इच्छा कायम राहतात.
  15. कुठल्याही परिस्थितीत घरातच बसून राहू नका.
  16. जे आवडते ते खा; थोडं जाड असणं वाईट नाही.
  17. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.
  18. जे लोक आवडत नाहीत, त्यांच्याशी संबंध ठेवू नका.
  19. टी. व्ही. सतत पाहू नका.
  20. आजाराशी लढा देण्याऐवजी त्याच्यासह जगायला शिका.
  21. “जेव्हा गाडी डोंगरावर पोचते, तेव्हा रस्ता दिसतो” — हे वृद्धांसाठी आनंदाचे जादुई सूत्र आहे.
  22. ताजी फळे आणि सॅलड खा.
  23. अंघोळ १० मिनिटांपेक्षा जास्त करू नका.
  24. झोप येत नसेल तर स्वतःला जबरदस्तीने झोपायला लावू नका.
  25. जे आनंद देतात, अशा क्रियाकलापांमुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो.
  26. जे वाटते ते बोला. जास्त विचार करू नका.
  27. शक्य तितक्या लवकर “कौटुंबिक डॉक्टर” ठेवा.
  28. फार सहनशील किंवा हट्टी बनू नका; ‘धाडसी वृद्ध’ होणेही वाईट नाही.
  29. कधी कधी मत बदलले तरी चालते.
  30. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) हा देवाचा आशीर्वाद असतो.
  31. शिकणे थांबवले तर माणूस वृद्ध होतो.
  32. कीर्तीची लालसा बाळगू नका; जे आहे ते पुरेसे आहे.
  33. निरागसता ही वृद्धांची शोभा आहे.
  34. जसे काम कठीण, तसे ते अधिक रोचक असते.
  35. सूर्यप्रकाशात बसणे आनंद देते.
  36. इतरांना उपयोगी पडणारी कामे करा.
  37. आजचा दिवस सुखात घालवा.
  38. इच्छा म्हणजे दीर्घायुष्याचे गुपित.
  39. आनंदाने जगा.
  40. सहजपणे श्वास घ्या.
  41. जीवनाचे तत्त्व तुमच्या स्वतःच्या हातात आहे.
  42. प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.
  43. आनंदी लोक सर्वांना आवडतात.
  44. हसू हे भाग्य घेऊन येते.

वय वाढणे ही मर्यादा नाही — ती एक देणगी आहे.

योग्य दृष्टिकोन आणि साध्या सवयींमुळे साठीनंतरची वर्षे जीवनातील सर्वात समृद्ध वर्षे ठरू शकतात.

वय वाढणे हे भयाने नाही तर कृतज्ञतेने, सन्मानाने आणि शहाणपणाने स्वीकारा.

☆  

लेखक: डॉ. वाडा

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक मोलाचा धडा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “दोन मुलगे…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मी अमेरिकेतून आईच्या अंत्यसंस्काराला आलो होतो, अंगात $3, 000 किमतीचा खास शिवलेला सूट घातला होता. एअरपोर्टवरून भाड्याच्या आलिशान SUV मधून गावात घरापाशी पोहोचलो. डिझायनर सन-ग्लासेसच्या मागे अजून न सांडलेले अश्रू लपले होते..

 

गावातील इतर लोकांची परिस्थिती पाहता मला माझ्या स्वतःचा अभिमान वाटत होता.

मी ‘यशस्वी’ झालो होतो.

आयुष्यात पुढे गेलो होतो.

 

गेल्या 15 वर्षांपासून मी शिकागोमध्ये राहून लॉजिस्टिक्सचा व्यवसाय चालवत आहे. मी चांगली कमाई केली आहे.

मी गाव सोडल्यानंतर, माझ्या धाकट्या भावाला म्हणजे डेव्हिडला आईजवळ राहता यावं म्हणून मी डेव्हिडला दर महिन्याला $200 पाठवत होतो आणि आईच्या उपचारासाठी $100 वेगळे पाठवत होतो..

माझ्या मते, त्यामुळे मी ‘चांगला मुलगा’ ठरत होतो.

माझ्यामुळे घराची बिलं भरली जात होती.

माझ्यामुळे आई नीट खातपित होती.

माझ्यामुळे सगळं ‘व्यवस्थित’ होत होतं.

अंत्यसंस्कारानंतर, घरी परतल्यावर माझ्या तक्रारी सुरू झाल्या –

 

“अंगण एवढं कोरडं का पडलंय?” मी खिडकीतून पाहत डेव्हिडला विचारलं.

“मी एकदा बागायतीसाठी जास्त पैसे पाठवले होते, त्याचं काय केलंस. ”

 

भिंतीवरील उखडलेला रंग पाहत मी म्हणालो, “मी सांगितलं होतं, कुणाला सांगून रंगरंगोटी कर, मी पैसे पाठवतो. पण तू काहीच केलं नाहीस. “

 

आणि मग मी नकळत एक सीमा ओलांडली.

“आई इतकी बारीक का झाली होती?”

“मी पाठवलेल्या पैशातून तू तिला निट खायला प्यायला देत होतास ना?”

 

डेव्हिड काहीच बोलला नाही.

 

तो स्वयंपाकघरातील टेबलाजवळ बसला होता — अंगावर न बसणारा जुना सूट, डोळ्याखाली गडद वर्तुळे, हात सुजलेले आणि खरखरीत.

तो माझ्यापेक्षा लहान होता, पण दिसायला माझ्यापेक्षा मोठा दिसत होता..

 

मी पुन्हा व्यवसायाच्या सुरात आलो.

“घराविषयी बोलायला हवं,” मी म्हणालो.

“सध्या बाजार चांगला आहे. पटकन विकता येईल. 60-40 वाटू — तू जास्त घे, कारण तू इथे राहिलास. ”

 

मी कृतज्ञतेची अपेक्षा करत होतो.

 

पण त्याऐवजी, डेव्हिड हळूच उठला, एका जुन्या ड्रॉवरमधून वही काढली आणि टेबलावर ठेवली.

 

“वाच,” तो शांतपणे म्हणाला.

 

ती आईची ‘देखभाल नोंदवही’ होती.

 

12 ऑक्टोबर:

ती संपूर्ण रात्र किंचाळत होती. मला ओळखत नव्हती.

पाच वेळा चादरी बदलल्या.

तिला स्वच्छ करताना तिने माझा चावा घेतला. रक्त येत होतं, पण तिला मी एकटी सोडू शकत नव्हतो.

 

3 नोव्हेंबर:

मायकलने पाठवलेले पैसे घरखर्चासाठी पुरेसे होते, पण आईच्या हृदयाच्या औषधांसाठी नाही.

इन्शुरन्सने पैसे देण्यास नकार दिला.

म्हणून आज माझी बाईक विकली.

 

25 डिसेंबर:

‘ तिचा यशस्वी मुलगा’ फोन करत नाही, म्हणून ती दिवसभर रडत होती. काहीही खात पित नव्हती..

तिने थोडं खावं म्हणून मी मायकलचा जुना व्हॉइसमेल लावला आणि त्यावर तिला मी थोडं भरवलं.

आणि मी तिच्या खाटेजवळ जमिनीवर झोपलो.

 

15 जानेवारी:

अंघोळ घालताना तिला उचलताना माझी पाठ दुखावली.

डॉक्टर म्हणाले — डिस्क सरकली आहे…

शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेणं शक्य नाही.

 

माझ्या घशात शब्द अडकले.

 

डेव्हिड माझ्याकडे पाहून म्हणाला,

“तू पैसे पाठवलेस. आणि त्यासाठी मी आभारी आहे.

पण तू पैसे पाठवत असताना — तू छान झोप घेत होतास.

तू सुट्ट्या घेत होतास. सहलीला जात होता. स्वतःचं छान आयुष्य जगत होतास. ”

 

तो छातीवर हात ठेवून म्हणाला,

“मी चार वर्षांत एकदाही पूर्ण रात्र झोपलो नाही.

माझी नोकरी गेली..

माझा साखरपुडा तुटला..

पैसे रात्री 3 वाजता साफसफाई करत नाहीत.

पैसे घाबरलेल्या आईला शांत करत नाहीत.

पैसे मरण यातना होत असताना कुणाला मिठी मारत नाहीत. ”

 

त्याचा आवाज मंद झाला.

 

“भावा, तू घर विक. सगळे पैसे तूच ठेव.

मी माझा वाटा आधीच घेतलाय,

ह्या घरात राहून, उपभोग घेऊन.. “

 

तो आईच्या खोलीत गेला आणि दार बंद केलं –

पहिल्यांदाच, अनेक वर्षांनंतर, शांत झोपायला..

 

मी एकटाच स्वयंपाकघरात उभा राहिलो.

माझे घड्याळ, बूट, आरशातील प्रतिबिंब पाहत..

कशालाच आता अर्थ उरला नव्हता..

 

मी फक्त औषधांचे पैसे दिले.

त्याने रात्रभर जागून ती औषधं तिला दिली.

 

मी फक्त अंत्यसंस्कारांचे पैसे दिले..

त्याने तिच्या आजारपणात शेवटपर्यंत तिचा हात धरून ठेवला..

 

त्या दुपारी मी घर पूर्णपणे डेव्हिडच्या नावावर केलं.

त्याच्या भविष्यासाठी..

ती माझ्याकडून त्याला भेट नव्हती..

तो ‘थकीत मोबदला’ होता, त्याच्या त्यागाला, त्याच्या निस्वार्थी सेवेला, त्याच्या समर्पणाला. जे अमूल्य आहे म्हणून मी आयुष्यभर त्याचा ऋणी आहे..

एक आत्मचिंतन:

प्रत्येक कुटुंबात दोन भूमिका असतात:

उपग्रह मूल— यशस्वी, दूर राहणारं, पैसे पाठवणारं..

काठीसारखं मूल — जवळ राहणारं, संपूर्ण ओझं वाहणारं, वाकेपर्यंत.

 

तुम्ही पैसा दिला म्हणजे तुम्ही सर्व जबाबदारीतून मुक्त होत नाहीत..

बँक ट्रान्सफर आईबाबांचे डायपर बदलत नाही..

पैसा रात्री जागत नाही..

बॅन्क चेक एकटेपणी सोबत देत नाही..

 

तुम्ही जर शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडलं असेल,

तर जो भाऊ घरी राहिला आहे त्याचा त्यागही लक्षात घ्या..

 

आणि जेव्हा उरलेलं वाटायची वेळ येईल,

तेव्हा एक जाणीव ठेवा – आपल्या आईबाबांच्या सेवेसाठी

ज्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये..

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वृद्धत्व एकटेपणा आणि निर्णय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वृद्धत्व एकटेपणा आणि निर्णय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

वृद्धाश्रम चालवणारा माझा एक मित्र सांगत होता, त्यांच्या वृद्धाश्रमात ९७ वर्षांच्या एक बाई आहेत. त्या़ंचा एकुलता एक मुलगा आणि सून दोघेही निवर्तले आहेत. एकुलता एक नातू त्याच्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये रहातोय. जेव्हा या बाईंच्या शेवटच्या घटका येतील तेव्हा त्यांच्या उपचारांच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या वृद्धाश्रम चालवणाऱ्यांना देण्यात यावे आणि त्या निर्णयाला नंतर कोणी आव्हान देऊ नये, अशी कायदेशीर तरतूद करणारे कागदपत्र तयार करण्यासाठी, त्याला त्यांनी आत्ता बोलावून घेतले आहे. तो सांगत होता, त्या कागदपत्रात नक्की काय लिहायचे, हे कोणालाच धड सांगता येत नाही. याविषयी काही विचारच केला गेलेला नाही.

आमचे शेजारी आहेत त्यांची मामी गेला महिनाभर हाॅस्पिटलमध्ये आहे. शेजाऱ्यांचे मामा मनमोहन सिंग रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर असताना त्यांचे P. A. नंतर The Times of India मध्ये editor finance वगैरे पदे भुषवलेले. मामी M. A. (English) Gold Medalist. अत्यंत सधन आणि मुलंबाळं नाहीत. मामा काही वर्षांपूर्वी अचानक गेले. आता मामी वय ८७+ शेवटच्या घटका मोजत आहे. ते सांगत होते, मामीला पैशाची काय विल्हेवाट लावली आहेस, असं विचारण्याचा आम्हाला धीर होत नसे. तिला वाटेल, आम्हाला काही इंटरेस्ट आहे. कदाचित तसंच तिच्या माहेरच्या लोकांना पण वाटत असेल. आता मामी सहीसुद्धा करू शकत नाही. कुठे काय इन्व्हेस्टमेंटस आहेत, बॅंक अकाऊंटस… कोणाला माहीत नाही. हे दोघे सत्तरीतले भाचे सगळी धावपळ आणि उपचारांचे पैसे खर्च करत आहेत.

त्या बाईच्या सोसायटीत कळलं तेव्हा शेजारचे लोक आले. त्यांना वेगळाच प्राॅब्लेम आहे. सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. या बाईने तिच्या फ्लॅटचं नाॅमिनेशन गेली तीस वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेल्या भाचीच्या नावाने केलं आहे. भाची म्हणते, मला त्यात काही इंटरेस्ट नाही.

हे सगळं चित्र किती भयानक आहे!

आत्ता आपल्या पिढीत मुलं परदेशी असणाऱ्यांना अशा समस्या आहेत. पण पुढच्या पिढीत माझ्या माहितीत देशात, परदेशी एकेकटी रहाणारी, लग्नाचं वय उलटून गेलेली असंख्य मुलंमुली, अत्यंत उच्चशिक्षित आणि मुलं होऊ न दिलेली जोडपी दिसायला लागली.

हा केवढा भयानक प्रश्न पुढच्या काळात उपस्थित होणार आहे!

मध्यंतरी माझ्या नवऱ्याला काही शेअर्स डिमॅट करायचे राहून गेले होते. त्या कामासाठी फंड मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जावं लागलं असताना तिथल्या माणसाने सांगितलं होतं, की हजारो कोटींचे शेअर्स पडून आहेत. काही वर्षांनी ते मूळ कंपनीच्या मालकीचे होतात, पण खूप व्याप करावा लागतो. पण ही गोष्ट नुसती पैशाची झाली. जिथे माणूस मृत्यूशय्येवर आहे आणि त्याच्या वतीने त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी कोणीच नाही, त्या माणसाचं काय करायचं हा केवढा मोठा प्रश्न नजिकच्या भविष्यात निर्माण होणार आहे!

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares