मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेमभावना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेमभावना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला ह्या फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डेवरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…

एकदा एक मूर्ख शायर

सूर्यास म्हणतो की….

 

भास्करा, कीव मजला

येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे

पाहिली आहे कधी ?

 

तेव्हा सूर्य उत्तर देतो…

 

आम्हासही या शायराची

कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास

रात्र यावी लागते.

 

प्रेम हे काय दिवस ठरवून

व्यक्त करायची चीज आहे ?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.

प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.

गदिमा म्हणून गेलेयत…

‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला…’

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की

‘जिथे सागरा धरणी मिळते

तेथे तुझी मी वाट पहाते’

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.

ही कोंडी शेवटी तो फोडतो,

(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)

 

‘लाजून हांसणे अन् हांसून ते पहाणे,

मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’

भेट झाल्यावर मात्र हृदयात

एक अनाहूत हुरहुर सुरू होते.

मग परत गदिमा मदतीला येतात,

 

‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’

 तोही आपल्या विश्वात नसतोच.

 

‘होशवालों को खबर

बेखुदी क्या चीज है,

इश्क किजे, फिर समझिये,

बंदगी क्या चीज है’

 

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय….

 ‘मी मनांत हसता प्रीत हसे,

हे गुपीत कुणाला सांगू कसे ?’

त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे.

तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू ) आहेत,

ती म्हणते,

 

‘नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी’

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे

नाहीत. मग तीच म्हणते,

 

‘ये मुलाकात इक बहाना है,

प्यार का सिलसिला पुराना है’

 

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर

 

‘घडी घडी मेरा दिल धडके,

हाय धडके, क्यू धडके’

ह्याची खात्री पटलीय पण

खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.

 

‘कहना है, कहना है,

आज तुमसे ये पहली बार,

तुम ही तो लायी हो,

 जीवन में मेरे

प्यार, प्यार, प्यार..’

 ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय.

तृप्त झालीय.

 

‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

शब्दरूप आले, मुक्या भावनांना’

आणि मग झाडांची पाने हलतांत. तो खूष.

 

‘जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरांत आली’

 

आणि तिनं चक्क होय म्हटलं.

हा गडाबडा लोळायचा बाकी.

 

‘तुम क्या जानो, मुहब्बत क्या है..:

 

‘कोकिळ कुहूकुहू बोले,

तू माझा तुझी मी झाले.’

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते:

‘तुज्ये पायान् रूपता काटां,

माज्ये काळजान् लागतां घांव’

आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.

 

दो लब्जों की है बस ये कहानी या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.

 

‘आज तू डोळ्यांत माझ्या,

 मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा,

 तू अशी जवळी रहा..’

 

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डेच्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

भारतीय संस्कृती आणि माय मराठी प्रेमी… नक्कीच सहमत असतील.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

‘ — हे अक्षर असलेली वणदार भाषा म्हणजे आपली मराठी!!

आणि ….

म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धीचा आम्हाला गर्व आहे!

अक्षर नसेल तर?

पळणार कसे…?

वळणार कसे…?

दुसर्‍यावर जळणार कसे?

भजी तळणार कशी?

सौंदर्यावर भाळणार कसे?

पोरं-टोरं तळ्यात-मळ्यात खेळणार कशी..?

तीळगूळ कसा खाणार?

टाळे कसे लावणार?

 

बाळाला वाळे कसे घालणार….?

खुळखुळा कसा देणार?

घड्याळ नाही, तर सकाळी डोळे कसे उघडणार?

घड्याळ बंद पडले, तर पळे कोण मोजणार?

वेळ पाळणार कशी?

मने जुळणार कशी?

खिळे कोण ठोकणार?

तळे भरणार कसे?

नदी सागराला मिळणार कशी……..?

मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा….

नाही उन्हाच्या झळा

नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा….!

कळी कशी खुलणार?

गालाला खळी कशी पडणार?

फळा, शाळा, मैत्रिणींच्या  गळ्यात गळा….

सगळे सारखे, कोण निराळा?

दिवाळी, होळी सणाचे काय……?

कडबोळी, पुरणपोळी  ओवाळणी पण नाही?

तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता?

भोळा सांब,

सावळा श्याम

जपमाळ नसेल तर कुठून रामनाम?

मातीची ढेकळे नांगरणार कोण?

ढवळे पवळे बैल जोततील कोण?

पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण?

निळे आकाश, पिवळा चाफा…

 

माळ्याच्या कष्टाने फळाफुलांनी बहरलेला मळा!

नारळ, केळ, जांभूळ, आवळा

काळा कावळा, पांढरा बगळा

ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा?

अळीमिळी गुपचिळी, बसेल कशी दातखिळी?

नाही भेळ,

नाही मिसळ,

नाही जळजळ

नाही मळमळ

नाही तारुण्याची सळसळ

 

कणीक मळली जाणार नाही, पोळ्या लाटल्या जाणार नाहीत…..

टाळ्या आता वाजणार नाहीत…..!

जुळी तिळी होणार नाहीत…….!

बाळंतविडे बनणार नाहीत……!

तळमळ कळकळ वाटणार नाही….!

काळजी कसलीच उरणार नाही…!

पाठबळ कुणाचे मिळणार नाही

सगळेच बळ निघून जाईल,

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.

काहीच कळेनासे होईल शिवाय!

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शिवदासी लता…” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शिवदासी लता” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

असे तीव्रतेने वाटत असे, की या दीदीला कुठेतरी एखादे दृढ आलंबन सापडले असले पाहिजे. एरवी प्रसिद्धीचे अन् लोकप्रियतेचे हे लोटच्या लोट अंगावरून जात असता एखादा माणूस केवळ खुळावून गेला असता.

एके दिवशी अचानकपणे पत्ता लागला. हे लोकप्रियतेचे चपेटे ज्या महापुरुषाच्या आश्रयाने दीदी सोसत्ये आहे, त्याचे नाव कळले.

बाळाकडून (हृदयनाथ मंगेशकर) समर्थभक्त देवांचे समर्थावतार घेऊन आलो – अभ्यासासाठी. पुस्तकाची पहिली पृष्ठे उलटायचे कारण पडले नाही. मधले संदर्भ हवे असत, तेवढ्यापुरता तो भाग उघडला, की माझे काम भागत असे. पण एकदा पुस्तकावर नाव कुणाचे आहे, हे पाहण्याचा फुकाचा चाळा करू गेलो. बाळाचे थोडे तिरके, अतिशय देखणे हस्ताक्षर नुसते पाहत बसणे, हेही एक सुखच आहे.

मुखपृष्ठ उलटले, तो आत अक्षरे दिसली :

“श्रीजगदंबेच्या कृपेने – ज्ञानेश्वरांच्या लेखणीने – समर्थांच्या वैराग्याने – शिवाजीमहाराजांच्या तरवारीने पवित्र झालेल्या या मंगल महाराष्ट्राचा तुला कधी ओढही विसर न पडो, हा आशीर्वाद. “

आणि खाली सही होती –

‘शिवदासी’

१९-१०-५५

चि. हृदय,

१९ व्या वाढदिवसानिमित्त’

 शिवदासी!

 शिवदास्याबद्दल मनी केवढा गौरव! छंदच जडायचा असेल, तर तो हा असा जडावा. तो श्रीमंत योगी अशा अलौकिक योग्यतेचा पुरुषोत्तम होता, की भल्याभल्यांनी त्याचे दास म्हणून मिरवण्यांत धन्यता मानावी! ते एक भावनिक समाधान असते. बऱ्या-वाइटाच्या लाटा भवताली आंदोळत असता मनाला आधार वाटत राहतो, की चिंतेचे कारण काय? ज्याचे दास म्हणून म्हणवितो, त्याने तर याहून अधिक विराटरूप अंगावर झेलून त्याचा भार सहज वाहिला होता!

दीदीचे हे शिवदास्य केवळ कौतुकापुरते नव्हे, याचा प्रत्यय येण्याजोगी एकदोन बरी निमित्ये घडली. शिवराय मंडळाने दादरच्या हेटकरी महाजन वाडीमध्ये शिवछत्रपतिविषयक प्रदर्शन भरवले होते. काही दुर्गांच्या प्रतिमा, छायाचित्रे, शिवजीवनातले चित्ररूप केलेले काही प्रसंग, शिवकालीन शस्त्रे, अशा नाना परी यत्नपूर्वक मिळवून मांडल्या होत्या. अनेक जवानांनी रात्रंदिवस कष्ट केले होते. मात्र त्यांच्या त्या श्रमांचा परिहार करता येईल, असे मंडळाजवळ काही नव्हते। पाचसातशे रुपये खर्चावेत, तेव्हा शिवछत्रपतींच्या नावाला साजेसे कवतिक करता आले असते.

एकदम विचार आला, की दीदीजवळ हात पसरावा. शब्द टाकताक्षणी दीदी मूठभर नोटा घेऊन बाहेर आली; आणि कार्यकर्त्यांच्या मुद्रा उजळून निघाल्या. पावती नेऊन देऊ जाता ती म्हणाली,

“करायची काय पावती? घरच्या कामासाठी कुणी पावत्या का फाडीत बसते? “

दुसरा प्रसंग –

सिंधुदुर्गावरून शिवछत्रपतींच्या पदमुद्रेचा ठसा घेऊन मुंबईस आलो. मनी गौरव दाटला होता, की या क्षणीं आपल्याजवळ एक अलौकिक वस्तु आहे. ज्याला तिचे मोल कळते, तो पाहतांक्षणी मोहरून उठेल. स्वतः शिवछत्रपतींच्या पावलाचा ठसा!

दीदीकडे जाऊन तो कसा मिळवला, इत्यादि सर्व फुशारक्या मारल्या. शेवटी म्हणालो,

“आणि या क्षणी तो ठसा माझ्याजवळ आहे! ”

अतिशय उतावीळ होऊन दीदी म्हणाली,

“खरे? कुठाय्? दाखवा ना! “

ठशावरची आवरणे सोडेतोवरही तिला धीर निघेना. ठसा अनावृत्त होताच तिने अत्यंत श्रद्धापूर्वक करस्पर्श करून हात भाळी टेकला, अन् एखाद्या लहान मुलीप्रमाणे धावत ठसा घेऊन आपल्या शयनगृहात गेली. तिथे तो उशाशी ठेवून दिला. किती वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग भराभरा ज्याला त्याला फोन करून सांगू लागली,

‘हाँ, जी, सुनिये, महाराज शिवछत्रपति का चरणचिन्ह – हाँ, उन्हींका – अभी मेरे पास है, वही तो बता रही हूँ -‘

मात्र आता सूक्ष्मपणे पाहता वाटू लागले आहे, ही स्वरदेवता अलिकडे अधिक गंभीरपणे जीवनाचा विचार करू लागली आहे.

ज्या वेडाने जनी-मीरा झपाटल्या होत्या, त्या दिशेने हे पाखरू भरारू लागले आहे! तिथवर झेप घ्यावी, जिथवर त्या दोघी पोचल्या होत्या. त्याही तर प्रापंचिक कर्दमातून वर उठल्या होत्या. तर मग आपल्यालाही ऐहिक व्यापांची खंत मानायचे कारण नाही. तुकारामाने भरवंसा देऊन ठेवला आहे –

मागे झाले नका पाहो । पुढे जमान आम्ही आहो ।।

जामिनकी त्या महावैष्णवाने स्वीकारली आहे, तेव्हा आता द्यावे स्वतःला झोकून त्या महासमुद्रामध्ये!

 

लेखक:गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आज एका रद्दीच्या दुकानावरून जाताना सहज एका गोष्टीवर नजर गेली. एक लक्झरी कार त्याच्या दारात थांबली होती. त्याने खटका दाबून डिकी (सॉरी.. त्याला आता ट्रंक म्हणायचं! ) उघडली आणि कारच्या डिकीतून अगदी किरकोळ रद्दी काढून ती दुकानदाराला देऊ केली.

माझ्या खट्याळ मनात उगीचच विचार आला की आज २८ तारीख, हा मनुष्य रद्दी विकायला आलाय म्हणजे याच्या घरी ‘ मैना खेर’ आली की काय?

मी मनाने एकदम ४०-५० वर्षे मागे गेलो. ‘मैना खेर…! ‘

बहुतेक पगारदार मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रत्येक महिन्याची साधारण २०-२५ तारीख आली की ही ‘मैना खेर’ नावाची नावडती पाहुणी हटकून येत असे.

आज हा २८ तारखेला रद्दी विकणारा मनुष्य दिसल्यावर तिची आठवण झाली.

त्यावेळी मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात दर महिन्याच्या ४ आठवड्यांना नावही मोठी भन्नाट दिलेली असायची.

दर महिन्याला १ तारखेला पगार झाल्यावर येणारा पहिला आठवडा म्हणजे ‘ गोल्डन विक’!

महिन्याची वाणी, दूधवाला, पेपरवाला, मुलांच्या फिया (त्यावेळचं ‘फी’ चं मराठी अनेकवचन) वगैरे देऊन थोडी मध्यमवर्गीय मौजमजा करून झाल्यावर, दुसरा आठवडा यायचा तो म्हणजे  ‘सिल्व्हर विक’!

पैशाचं पाकिट बऱ्यापैकी हलकं व्हायला लागलेलं असताना महिन्याचा तिसरा आठवडा यायचा तो म्हणजे ‘ ब्रॉंझ विक’!

हा संपतोय नाही तर यायचा महिन्याचा ४था आठवडा. हा म्हणजे ‘ रद्दी विक’!

पगाराचं पाकिट रिकामं झालेलं असायचं. रोजच्या खर्चासाठी महिनाभर साठलेला रद्दीचा गठ्ठा नाडीनं बांधून सायकलीच्या कॅरियरला लावला जायचा. जे काही पैसे येतील, त्यातून बारीकसारीक खर्च भागवले जायचे. रद्दी विकून आलेल्या थोड्याफार पैशातून आठवडा ढकलला जायचा म्हणून याचं नाव ‘ रद्दी विक’ इतकंच! आधीच्या गोल्डन, सिल्व्हर वगैरे आठवड्यांचा गोल्ड, सिल्व्हरशी तसा काही संबंध नाही.

या आठवड्यात नवीन खरेदीवर बॅन आलेला असायचा.

नवीन काही आणायचं असेल तर “आत्ता हट्ट नको करूस, आत्ता ‘मैना खेर’ आहे ! बाबांचा पगार झाल्यावर घ्यायला सांगते हं मी त्यांना! “अशी आश्वासनं मुलांना दिली जायची.

तर अशी ही ‘ महिना अखेर’ यायची. तिचं लाडाचं नाव ‘ मैना खेर’!

शाळकरी मुलांना मात्र या महिना अखेरीत देखील एक आनंदाचा दिवस असायचा, तो म्हणजे, महिन्याचा शेवटचा दिवस!

त्या दिवशी शाळा ‘अर्धा दिवस’ असायची. वर्गशिक्षकांना महिन्याच्या ‘फी’चा हिशोब  करायला वेळ मिळावा म्हणून शाळा अर्धा दिवस असायची. तसं पाहिलं तर या अर्ध्या दिवसाच्या शाळेलाही काही अर्थ नसायचा म्हणा. वर्गशिक्षक त्या वेळातही काम करायचे.

कुणी फी भरलेली नसेल तर त्याला सूचना दिली जायची. प्रगती पुस्तकात महिन्यातल्या हजेरी-गैरहजेरीचा हिशोब मांडला जायचा.

त्या अर्ध्या दिवसातही सगळा गडबड गोंधळच चालायचा.

मला आजही एक गोष्ट खटकते ती म्हणजे वर्गशिक्षक मंडळी हिशोबात गोंधळ नको म्हणून ‘नादारीवाल्या’ मुलांना एका बाजूला वेगळे बसवत असत. तेव्हा ते ‘नादारी’ प्रकरण काय आहे ते समजायचं नाही. खरंतर ज्या मुलांना ‘नादारीवाले’ म्हणून अस्पृश्यासारखं वेगळं बसवलं जायचं, त्यांनादेखील खरंतर ते माहिती नसावं. कारण तेवढी समज कुणाला होती म्हणा?

हे आत्ता या ‘ मैना खेरच्या’  आठवणीत आठवलं खरं!

आता  या ‘मैना खेर’चं नाव कुठे ऐकायला मिळत नाही.

मोबाईल ॲप वरून सहज मिळणारी फसवी कर्जं, क्रेडिट कार्ड्स, चौका चौकात उघडलेली गोल्ड लोनची दुकानं आणि महत्त्वाचं म्हणजे ‘इएमआय’वर उपलब्ध असणाऱ्या जीवनासाठी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींमुळे,

“आत्ता नको ! बाबांचा पगार झाल्यावर पुढच्या महिन्यात ह्यांना आणायला सांगते हं! “असं म्हणणारी आई तरी कुठे राहिली आहे आता!

या सगळ्या ‘इझी क्रेडिट’, ‘इन्स्टा लोन’ च्या या आभासी सुबत्तेच्या आणि चंगळवादाच्या युगात, ती दुष्ट चेटकिणीसारखी वाटणारी  ‘मैना खेर’  कुठेतरी हरवली आहे, हे मात्र निश्चित!

लेखक: श्री. बिपिन देशमुख

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘माहेरपण’ – कवयित्री : वैष्णवी सोमलवार कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

सौ. शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘माहेरपण’ – कवयित्री : वैष्णवी सोमलवार कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

 

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा

 

मनसोक्त काढलेली झोप

आणि तिच्या हातचा गरम चहा

सुख म्हणजे काय असतं ,

देवा एकदा अनुभवून पहा

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड लोणचे चटण्या

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून

 

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून

मायापती  देवा तुम्ही,

तुम्हीही जाल गहिवरून

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाट

पैज लावून सांगते विसराल

वैकुंठाची वाट

 

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ

 

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा स्वर्ग नाही

 

कवयित्री : सौ. वैष्णवी सोमलवार – कुलकर्णी

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ केळीचे डोहाळेजेवण – लेखिका: सौ. मंजिरी अभिजित वझे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ केळीचे डोहाळेजेवण लेखिका: सौ. मंजिरी अभिजित वझे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

चार दिवस घरात नुसती गडबड चालू होती. कारण काय, तर केळीचे डोहाळजेवण करायचे ठरले होते. गडबड म्हणजे काय, तर हिरवी साडी आणायची. तिला बांगड्या ब्लाऊज पीस, ओटीचे सामान, विड्याची पाने, हे आणायचे होते. घुगऱ्यांसाठी हरबरे, शेंगदाणे भिजत घालायचे होते. मनात खूप उत्सुकता होती, कारण मला पण हे नवीन होते.

दुसरा दिवस उजाडला. सगळी पूजेची तयारी केली. मग सगळ्याजणी म्हणजे कामाच्या 12 बायका आणि मी आम्ही निघालो. जवळ जवळ अडीच हजार झाडे लावलेली त्यातला जो पहिला घड पडला होता, तेच झाड आम्ही निवडले. तिथली जागा स्वच्छ केली. विड्याची पानं मांडली.

त्यावर सुपारी, हळकुंड मांडले. मग त्यावरच सगळा नैवेद्य घातला. म्हणजे दहीभात, वरणभात, मसालेभात, शेवयाची खीर, गव्हाची खीर (इथे त्याला हुग्गी म्हणतात), भाजी, मुख्य पदार्थ म्हणजे आंबील. ती नाचणीची असते. थंडावा देण्यासाठी असते म्हणे. नैवेद्य झाल्यावर ओटी भरली. ओटीत साडी, ब्लाउजपीस, पाच प्रकारची फळे, बांगड्या असे सगळे साहित्य ठेवले होते. मग ती साडी जशी आपण नेसतो तशी झाडाला निऱ्या वगैरे करून नेसवली. त्यानंतर आरती केली. फोटो सेशन तर सतत चालले होतेच. मग सगळ्या बायकांनी गारवा आणला होता. त्यात भाकऱ्या, मुगाची उसळ, दाण्याची चटणी, दहीभात, झुणका, गोड म्हणून मोतीचूराचे लाडू असे आणले होते. त्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्या सगळ्यांनी माझी ओटी भरली. अभिजितला टॉवेल टोपी दिली.

जो घरी केलेला राहिलेला नैवेद्य होता तो सगळा एकत्र केला आणि पूर्ण दोन एकराच्या रानात चारी बाजूंनी शिंपडला. मग दुसऱ्या झाडाचा तयार झालेला घड काढला.

हे सगळे का करतात, हा प्रश्न तर मनात होताच. तर केळीचे झाड असे आहे की जे फक्त आपल्या मुलासाठी जगते. जेव्हा झाड मोठे होते, तेव्हा त्याला कोका पडतो, तेव्हा त्याला पण त्रास होतो. झाडातून विव्हळण्याचा आवाज येतो, असे जुन्या बायका सांगतात. जसा घड मोठा होतो तसे त्याचे वजन सांभाळत स्वतःला झिजवत जायचे, आणि पूर्ण पोषण केळ्यांना द्यायचे. आणि जेव्हा घड काढला जातो, तेव्हा स्वतःला समर्पित करायचे. घड काढून झाला, की झाड आपोआप वाळत जाते. म्हणून ही पूजा त्या साठी असते की झाडाची माफी मागून घड कापायचा असतो. अशा प्रकारे आज नवीन माहिती कळली.

लेखिका:सौ. मंजिरी अभिजित वझे

 

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वयंपाकघर” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “स्वयंपाकघर” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

स्वयंपाकघर म्हणजे एक छोटीशी कंपनी

आपणच असतो फाऊंडर, एखाद-दोन व्यक्ती कामं करायला हाताखाली

रोजचं नवीन प्रोजेक्ट, रोजचीच डेडलाईन

सकाळी 6 ला उघडणार ऑफिस, ते थेट रात्री नाईन

 

काहीवेळा वीकएंडला शटडाऊन, तर ओव्हरटाईम सणावारी

वर्षातले 300 दिवस  प्रोजेक्ट ‘जेवायला काय?’ चं  भूत मानगुटीवरी

ऑफिसला जावं लागत नाही, कायम वर्क फ्रॉम होम असतं

या ऑफिसमध्ये काम करणं इतकंही सोपं नसतं

 

महिन्याच्या महिन्याला भरावं लागतं सामान, स्टॉक अपडेट करायला लागतो

आवडीनिवडी आणि आरोग्य ह्यांचा मेळ घालावा लागतो

 

इथे चालत नसतो आयपॅड आणि लॅपटॉप

इथे असतो फक्त पोळपाट आणि हॉटपॉट

 

दर आठवड्याला प्रोजेक्ट ‘भाजीपाला’ असतं

त्यानुसारच आठवड्याचं प्लॅनिंग करावं लागतं

आलंच एखादं इस्कलेशन, त्यांनुसार घ्यावे लागतात कॉल

शांत राहून करावे लागतात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह

 

आठवड्यातून एकवेळ तरी बंद ठेवावी भट्टी

आराम करावा, घ्यावी मस्त सुट्टी

आठवडाभर असतेच की ओट्याशी गट्टी

भांडीकुंडी आणि गॅसशी घ्यावी तात्पुरती कट्टी

 

जगात भारी’ हेच अप्रेजल आणि हाच परफॉर्मन्स बोनस, खुश होते स्वारी

कंपनीच्या यशाची हीच तर किमया न्यारी

इथे आपणच आपले असतो बॉस

गैरहजेरीत आपल्या, होतो खूप केऑस

 

या कंपनीतून रिटायरमेंट मात्र योग्यवेळी घ्यावी

कंपनीची किल्ली लगेच सुपूर्द करावी

गरज लागलीच तर मदत करावी

नाहीतर रिटायरमेंट मस्त एंजॉय करावी

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ माणुसकीची शिकवण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

सौ. शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माणुसकीची शिकवण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. अनिकेतला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईत एक रिक्षा थांबवली. रिक्षात एक ७०-७२ वर्षांचे आजोबा ड्रायव्हर होते. त्यांचे हातपाय वयामुळे थरथरत होते. डोळ्यावर जाड चष्मा होता.

अनिकेत चिडून म्हणाला, “काय ओ आजोबा? घरी बसत जा ना या वयात. चला, मला लवकर ‘हिंजवडी’ला सोडा. “

आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे रिक्षा स्टार्ट केली.

रस्त्यात खड्डे होते. आजोबांची रिक्षा खूप हळू चालत होती. प्रत्येक खड्डा चुकवताना त्यांना वेळ लागत होता.

अनिकेतचा संयम सुटला. तो मागून ओरडला, “अहो, काय चालवलंय? बैलगाडी आहे का ही? जरा फास्ट घ्या ना! माझी मीटिंग आहे. “

आजोबांनी आरशातून एकदा अनिकेतकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण पावसामुळे अनिकेतला ते दिसले नाहीत. ते म्हणाले, “साहेब, रस्ता खराब आहे. गाडी जुनी आहे, घसरली तर तुम्हाला लागेल. “

अनिकेतने तोंड वाकडं केलं, “बहाणे नका सांगू. म्हातारपण झालंय तुमचं. ” शेवटी ऑफिस आलं. मीटरवर १४० रुपये झाले होते.

अनिकेतने १५० रुपये दिले आणि म्हणाला, “ठेवा सुट्टे. उपकार समजा. “

आजोबांनी ते पैसे घेतले, पण ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एका ‘छोट्या टिफिन बॉक्स’ मध्ये ठेवले. आणि त्या डब्याला त्यांनी नमस्कार केला.

अनिकेतला कुतूहल वाटलं. तो रागाने निघणार होता, पण पाय अडखळला.

त्याने विचारलं, “त्या डब्यात काय देव आहे का? १० रुपयाला नमस्कार करताय? ” आजोबांनी तो डबा उघडला. त्या डब्यात अन्न नव्हतं.

त्यात ‘चिल्लर आणि नोटा’ होत्या आणि एक ‘फोटो’ होता.

तो फोटो एका १० वर्षांच्या गोड मुलीचा होता. तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले:

“साहेब, ही माझी नात आहे, ‘रिया’. माझा मुलगा आणि सून कोरोनात गेले. तेव्हापासून मीच सांभाळतो तिला. “

आज तिची ‘शाळेची फी’ भरण्याची शेवटची तारीख आहे. १५०० रुपये भरायचे आहेत. सकाळपासून १४०० रुपये जमले होते. १०-२० रुपयांसाठी मी लोकांच्या विनवण्या करत होतो.

आता तुम्ही दिलेले हे १५० रुपये मिळून माझे १५५० रुपये झाले.

“साहेब, मी म्हातारा आहे, हात थरथरतात… पण या हातांनी आज माझ्या नातीचं भविष्य सुरक्षित केलंय. तुम्ही ज्याला ‘उशीर’ म्हणत होतात ना… तो माझ्यासाठी ‘संघर्ष’ होता. कारण जर आज मी फास्ट गाडी चालवून अपघात केला असता, तर माझ्या नातीला अनाथ आश्रमात जावं लागलं असतं. “

हे ऐकून अनिकेत सुन्न झाला.

ज्या हातांना तो ‘कमकुवत’ आणि ‘म्हातारे’ समजत होता, ते हात जगातले सर्वात मजबूत हात होते, जे एका अनाथ मुलीचं भविष्य सावरत होते.

त्याला आपल्या मघाच्या वागण्याची, त्या १० रुपयांच्या उपकाराची आणि त्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटली.

अनिकेतने आपली बॅग उघडली. त्यात ५००० रुपये कॅश होती.

त्याने ते सगळे पैसे काढले आणि आजोबांच्या त्या टिफिन बॉक्समध्ये ठेवले.

आजोबांनी हात जोडले, “नको साहेब, हे खूप आहेत. “

अनिकेत हळवा होऊन म्हणाला, “आजोबा, हे पैसे फीसाठी नाहीत. हे त्या ‘रिया’साठी आहेत. तिला सांगा, आज तिच्या आजोबांनी एका तरुणाला ‘माणुसकी’ शिकवली. तुम्ही आज घरी जा. ती तुमची वाट बघत असेल. “आजोबांनी अश्रू पुसले आणि रिक्षा वळवली.

अनिकेत ऑफिसच्या पायऱ्यांवर उभा राहून त्या जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. आज त्याला समजलं होतं की, वेग हा गाडीचा नसतो, तर तो आयुष्याच्या परिस्थितीचा असतो.

कधीही कोणाच्या कामावरून किंवा वयावरून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो. रिक्षावाला, भाजीवाला हे सुद्धा कोणाचे तरी ‘पालक’ असतात. त्यांचा आदर करा. तुमची १० मिनिटांची घाई त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते.

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऋणानुबंध… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

ऋणानुबंध… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

नात्यापेक्षाही मैत्रीत खूप दम असतो.

जेव्हा मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी एकत्रित पुन्हा भेटतात ना, तेव्हा खूप आनंद होतो.

तारुण्यातील मैत्री व साठीतली मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो. कारण तेव्हा मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…

मैत्री टिकली तर टिकली, नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असतं. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो आपण. पण जेव्हां साठीला पोहोचतो, तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो, ते कळत सुध्दा नाही…

जेव्हा साठीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात, तेव्हा सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलंसं वाटत असतं की, ती मैत्री खूप खूप हवी हवीशी वाटत असते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल, तर सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो. आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतं. आपल्याला समजावून घेतो, सुखादु:खात सहभागी होतं व चुकलं तर बोलतं व माफही करतं. असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

आपण कोणाचे कोणीच नसतो, पण आपले मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात. म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची साठी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे, तेव्हा या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात, त्यांना भेटूया….

कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…

ते स्टेशन आलं की उतरावंच लागते…

म्हणून जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे, तोपर्यंत त्या प्रवासात मनातल्या तक्रारींना बाजूला काढून टाकू या.

माहीत नाही, परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू?

म्हणून मैत्रीची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!

पण अशी मैत्री समजून घेणारे फार कमी असतात.

ज्यांना खरे निःस्वार्थी मित्र लाभले ना, ते खरेखुरे भाग्यवानच!  

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घर म्हणजे काय?” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “घर म्हणजे काय?” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

जे घर हौसेने बांधलेले असते

त्याला.. HOUSE.. म्हणतात.

*

ज्या घरात होम हवन चालतात

त्याला.. HOME.. म्हणतात.

*

ज्या घरात हवा खेळती असते

त्याला.. HAVELI.. म्हणतात.

*

ज्या घरात भिंतीला कान असतात

त्याला.. MAKAN.. म्हणतात.

*

ज्या घरात माणसांचे हाल होतात

त्याला.. MAHAL.. म्हणतात.

*

ज्या घरात झोप चांगली येते

त्याला.. ZOPADI.. म्हणतात.

आणि

ज्या घराचे हप्ते

फेडून – फेडून

लोक आडवे होतात

त्याला.. FLAT.. म्हणतात.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares