☆ “अधिपत्य” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉल मध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे, सासू सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे, पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी, मुलांची बस येणार नव्हती, सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती, तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येतांना मुलांना घेऊन येऊ”
नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं, लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे, त्यानंतर बहुदा पहिल्यांदा दोघे बाहेर जात होते, एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना, तिने छानपैकी तयारी केली, दोघेही निघाले, मुलांना शाळेत सोडलं, तिला खूप वेगळं वाटत होतं, स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागायची, पण मग सासू सासरे घरात नाही असं आठवलं की परत निर्धास्त होई, त्याने मॉलकडे गाडी वळवली, मॉल मधली मोठमोठे शॉप बघत दोघे चालत होते, ती तिथल्या बायकाही बघत होती, वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस..मेकप मध्ये असलेल्या तिच्यातून अधिक वयाच्या बायका, एकदम मॉडर्न..अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती,जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती, पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…
एका दुकानापाशी थांबली, होम डेकोर चं साहित्य होतं तिथे, ती हात लावून एकेक बघत असतांना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे, काहीं कामाचं नाही, चल इथून” ते प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”
“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं..तू चल इथून..”
ती निघाली,
पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,
चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली,
पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला..
तो म्हणाला, “जड आहे खूप”
“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून”
“असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल”
तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली,
नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले,
ती म्हणाली मी मुलं खातात तसा पिझ्झा खाणार,
तो म्हणाला, मी ऑर्डर देऊन येतो..
“मी जाऊ का? तुम्ही बसा”
तो हसला,
“तुला नाही जमणार..मॉल मध्ये आहोत आपण, कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही..”
तो म्हणाला, तीही हसली..तिनेही आपलं “न जमणं” मान्यच केलेलं..
तो काउंटर वर गेला, गर्दी होती तिथे,
ती आजूबाजूला बघू लागली,
एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता,
मॉलमध्ये त्या फ्लोर च्या मधोमध एक छोटासा स्टेज होता, आजूबाजूला बरीच गर्दी होती, माईकवरुन आवाज येत हो..
काय असेल? तिला कुतूहल वाटलं..
नवरा लाईनमध्ये उभा होता, त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली,
“Now next contestant? Please step forward”
तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते, सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरीरीने भाग घेत होत्या, ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली तिला कळलंच नाही, तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला..
अरे देवा, हे कुठलं संकट…!
ती मागे फिरू बघत होती पण तो मुलगा ओरडला,
“ओह मॅडम, तिकडे कुठे, इकडे या”
ते ऐकून ती अजूनच घाबरली,
स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली, तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं…
त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता,
इंग्रजीमधले अवघड स्पेल्लिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते, ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता..
तिला दरदरून घाम फुटला,
सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, ला कुठे काय येत होतं?
त्यांना पहिला शब्द दिला..
लेफ्टनंट…
सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं,
तिला आठवलं,
सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता, त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली, तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं..
तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं,
बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,
पुढचं स्पेल्लिंग, बुके..
तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिले..ते तिच्या लक्षात होतं,
एक बाई आऊट झाली,
आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली,
पुढचं स्पेलिंग, रेस्टरन्ट..
तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं, डोळ्यात पाणी जमू लागलं..
नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोकून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात..फक्त नजर तीक्ष्ण हवी”
तिला येईना, तिने आजूबाजूला पाहिलं,
लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,
“कॉंटिनेंटल restaurant”
तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं..
दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,
ती जिंकली,
सर्वांनी टाळ्या वाजवल्या,
तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,
माईकवर तिचं नाव ऐकलं तसा तो ट्रे टेबलवर ठेऊन तिकडे पळाला,
त्याला सगळं समजलं, तो हैराण झाला..
सर्वांनी तिचं अभिनंदन केलं,
सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती, मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…
ती आनंदाने त्याच्यापाशी आली,
“तू आणि इंग्रजी स्पेल्लिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेल्लिंग विचारलेली की काय? हा हा हा” तो या गोष्टीकडे गम्मत म्हणून बघून हसत होता,
“अशी स्पेल्लिंग होती जी तुम्हालाही जमली नसती”
“मग तुला कशी जमली?”
“कसं आहे ना,
आजवर तूला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही हेच ऐकत होते आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला..तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी..पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले…कदाचित, उशिराच…”
तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..
नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला, सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला, काही जमेना..
तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,
“सोडा, तुम्हाला नाही जमणार”
जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, *अधिपत्य गाजवणं * म्हणतात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “Less luggage, more comfort…” – लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
“Less luggage, more comfort…”
वयाच्या ८९ व्या वर्षी ती शेवटच्या ग्लानीत होती. काही शेवटचे क्षणच उरले असावेत बहुधा. तिने किंचित डोळे उघडले.
तो जवळच होता. नुकताच आला असावा कदाचित.“चला, निघूया का आपण? मलाही उशीर होतोय. काही उरलंसुरलं असेल तर….” तो किंचित हसला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “तसं फार काही नाही पण मी काहींना माफ करणार नाही मरेपर्यंत…ती वाशीची कुमुद, माई सावंत, दिगंबर मुसळे आणि विद्याताई….”
“का बुवा?” मरणासन्न अवस्थेतही तिचा तो निर्धार बघून त्याला हसू आवरेना..
“का म्हणजे काय? या सगळ्यांनी आयुष्यभर छळलंय मला. अपमान, पदोपदी अपमान केलेत. तोंडाला येईल ते बोललेत. माझ्या माहेरचे उध्दार केलेत. प्रॉपर्टीवरुन वीस पंचवीस वर्षे कोर्टकज्जे चालवलेत हरामखोरांनी. त्या विद्याने तर माझा नवरा…. कधीच माफ करणार नाही”
तो उठला होता तो क्षणभर बसला. त्याने तिचा हात नीट धरला, “बरं…पण आता तुझ्या माफ न करण्यानं काय होईल? त्यावेळी तु प्रतिकार करु शकली नाहीस. नंतर कधी केला नाही. आणि आता माफ न करण्याचं ओझं शिरावर कोण घेऊन बसलंय? कुमुद याक्षणी वृध्दाश्रमात खितपत आहे. विद्याताई लंडनला मुलीकडे आहे मजेत असं तुला वाटतंय पण तिथे ती हक्काची मोलकरीण झालीये, वैतागलीये पण बोलणार कुणाला? दिगंबर मुसळे निजधामाला जाऊन दहा वर्षे झाली. माई सावंत अशाच कुठल्यातरी अज्ञातवासात…. नियती बघते काय ते? आणि तु तरी कुठे गं धुतल्या तांदळासारखी आहेस? तुझ्या हातूनही असंख्य चुका, अपमान झालेच आहेत की…. तु त्यांना माफ न करुन आता काहीच फरक पडत नाही. पण तुझ्या माथ्यावर ओझं मात्र झालंय खूप… ऐक एक, ते ओझं इथेच टाक, माफ कर आणि चल माझ्यासोबत”
“तुला काय जातंय बोलायला? मी सोसलंय”
“हो मान्य आहे. पण आता काय? एका ठराविक क्षणी याला काहीच अर्थ उरत नसतो. तु माफ न करुन आता काय होणार आहे नेमकं? तुला तर साधं बोटंही हलवता येत नाही. इथून जाताना ही विषारी आणि विखारी ओझी का नेतेयस? त्यावर पुढे खूप व्याज वाढतं. शिक्षा देणारी ती नियती आहे. तू नव्हेस…. तुला एक सांगू? प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. Less luggage, more comfort…”
ती अस्फुट हसली…. “करते रे बाबा माफ सगळ्यांना… ओझी कधीतरी उतरवायला हवीतच. हो ना?”
“परफेक्ट…” तो म्हणाला… आणि अर्धवट ग्लानीतला तिचा देह आता चिरनिद्रेत जाऊ लागला… तो एव्हाना तिला घेऊन खोलीबाहेर पडला.. आता ओझं हलके झाले होते…
☆
लेखक: श्री सचिन मधुकर परांजपे
(पालघर)
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते: “बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली? ”
मैत्रीण म्हणाली, “काहीच नाही! “
तेव्हा ती विचारते, “हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्या लेखी तुझी काही किंमतच नाही का? “
हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते.
संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की बायकोचा चेहरा उतरलेला आहे. मग दोघांमध्ये वाद होतो. एकमेकांना दोष दिले जातात.
शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो.
तुम्हाला माहितीये सगळ्याची सुरुवात कुठून झाली?
त्या एका निष्कारण प्रश्नातून, जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता.
—
रवि आपल्या जिवलग मित्र पवनला विचारतो: “कुठे काम करतोस? “
पवन – “अमुक एका दुकानात. “
रवि – “किती पगार मिळतो? “
पवन – “१८ हजार. “
रवि – “फक्त १८ हजार? इतक्यात कशी चालते तुमची रोजची जिंदगी? “
पवन – (खाली मान घालून) “काय सांगू रे… बस तसंच. “
या छोट्याशा संवादानंतर, पवनच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होतं.
त्याने पगारवाढीची मागणी केली, मालकाने नकार दिला. पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो.
पूर्वी त्याच्याकडे काम होतं… आता काहीच नाही!
—
एका गृहस्थाने एका वृद्ध पित्याला विचारलं, “तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का? म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटतं? ”
वडील म्हणाले, “तो खूप व्यस्त असतो. त्याला त्याची कामं, बायको, मुलं… वेळ मिळत नाही. “
ते गृहस्थ म्हणतात, “हे काय उत्तर झालं? तुम्ही त्याला वाढवलंत, सगळं दिलंत, आता तो म्हणतो त्याला वेळ नाही? “
त्या संभाषणानंतर, बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली.
जेव्हा मुलगा भेटायला यायचा, तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात असंच चालायचं.. “माझ्यासाठी वेळच नाही… “
—
एक गोष्ट लक्षात ठेवा:
आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोल परिणाम करू शकतात. कधी कधी आपले प्रश्न निष्कपट वाटतात, पण ते दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात. उदाहरणार्थ:
“तुम्ही हे का नाही घेतलंत? “
“तुमच्याकडे हे का नाही? “
“तुम्ही याच्यासोबत कसं राहू शकता? “
“तो तुमच्या योग्य आहे का? “
हे असले बिनधास्त प्रश्न, जे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नाही, पण हे विसरतो की, याचा परिणाम समोरच्याच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो. आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं, तर अनेकदा असं आढळतं की कोणाच्या तरी चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं आहे. जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात, आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. म्हणून एकच विनंती….
लोकांच्या घरात अंधासारखं शिरा आणि मुक्यासारखं बाहेर या!
आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट न पडो, हीच खऱ्या माणसाची ओळख आहे.
☆
लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वर्ग नावाच्या मैफलीतील कलावंत! – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆
शिक्षक म्हणजे बोलणारा कारकून नव्हे. तर तो एक कलावंत आहे. कलावंत ज्याप्रमाणे जन्मावा लागतो असे म्हणतात ;त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा जन्मावा लागतो असे मला वाटते. याचाच अर्थ कलावंताची प्रतिभा जशी उपजत असते, पुढे ती मार्गदर्शनाने फुलवता येते. विविध प्रकारच्या कार्यशाळांतून आकाराला येते. व्यासंगाने कलेची जडणघडण करता येते. परंतु मुळात त्या व्यक्तिमत्त्वात कला निर्मितीचे काही रसतंतू असावेच लागतातत्. केवळ कुणाला तरी वाटते आहे म्हणून, कवी नर्तक, चित्रकार गायक, निर्माण करता येत नाहीत. अध्यापन व्यवसायाचा मी जेव्हा अगदी मुळातून विचार करतो, तेव्हा मला असे वाटते, कलावंताप्रमाणे अध्यापक हा सुद्धा अभिजात असावा लागतो. नव्या पिढीला काहीतरी मनातलं सांगावे, केवळ इथून तिथून गोळा केलेले, आजच्या भाषेत कॉपी-पेस्ट केलेले अध्यापन असून चालत नाही. जमिनीतून तरारून बी उगवावे तसे अध्यापन असावे लागते. केवळ देखावा म्हणून प्लॅस्टिकचे झाड प्लास्टिकची फुले कितीही हुबेहूब केली, तरीही आलेल्या पाहुण्यांना चकवता येईल; परंतु फुलपाखरांना चकवता येत नाही. कारण फुलपाखरांना फुलांच्या आत्म्यातील सुगंध कळतो. त्याचप्रमाणे, नव्या पिढीलाही समोर उभा असलेला आपला शिक्षक हा अंतर्यामातून बोलतो आहे की नाही हे नक्कीच जाणवते. विद्यार्थी उघड व्यक्त करू शकणार नाही, परंतु त्याला अध्यापनातील सच्चेपणा नक्कीच प्रतीत होत असतो. मनापासून केलेल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांची हृदये स्पंदित होतात. खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय म्हणजे ” ये हृदयीचे ते हृदयी “रुजवण्याचा आगळावेगळा स्वधर्म आहे.
अध्यापनाची कलासुद्धा आपल्या पिंडात असावी लागते. अर्थात् प्रशिक्षणाने एक उत्तम अध्यापक घडवता येतो. पण मुळात अध्यापनाचे काही मूलद्रव्य त्याच्यात असावे लागते.
सुमारे पस्तीस वर्षाच्या अध्यापन काळात आणि अनेक विद्यालयांच्या मधून कार्यक्रम केल्यामुळे तेथीलही अनेक प्रकारचे अध्यापक निरीक्षणांतून अनुभवले.
काहीना केवळ प्राचार्यांच्या केबिनमध्ये खलबते करण्यातच रस असे. आपले नियोजित तास बुडतील कसे, याची काळजीपूर्वक काळजी घेताना काही शिक्षक असायचे. काही शिक्षकांना केवळ वेतनश्रेणी, भत्त्यांची वाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक कमाईच्या वाटा यातच रस असायचा. ही मंडळी कधी एखाद्या नव्या पुस्तकाबद्दल बोलली आहेत, किंवा वर्गातील एखादा नवा शैक्षणिक प्रयोग त्यांनी चर्चिला आहे, किंवा स्नेहसंमेलनात एखादा उपक्रम त्यांनी मुलांकडून बसवला आहे, हे मला जाणवलेच नाही. बरीच मंडळी ती अक्षरशः काठावर बसून गंमत पहात. लाटेवर येऊन त्यांना अध्यापनाच्या अथांग तलावात भिजता आलेच नाही. काही जणांना वेगवेगळ्या निमित्ताने चमचमीत खाण्याचे आकर्षण असे. एखादी खाद्य पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हातखंडा. अर्थातच स्टाफरूम मध्ये असे चेहरे लोकप्रिय असतातच तसेच ते होते. त्यातील काहींचे स्वभाव चांगले होते. परंतु प्रत्यक्ष अध्यापनात जितकी उडवा उडवी करता येईल तितकी ते करत असत. आपल्या संपन्न ग्रंथालयाचा लाभ त्यांनी मनापासून कधी घेतला आहे हे मी अनुभवलेच नाही फक्त पाठ्यपुस्तके तेवढे बदलत असतात आणि संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांची मार्गदर्शक आहे या व्यतिरिक्त अनेक प्राध्यापकांचा ग्रंथालयाशी संबंध नसायचा नवीन चरित्रे कुठली आली आहे कथा कादंबरी लेखन कुठले आले आहे याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले आहे हे कधी मला जाणवलेच नाही आणि गंमतही की आपण एखाद्याला सुचवू शकतो पण आपल्या व्यवसाय मित्रांना आपण आग्रह करू शकत नाही, कारण आपला अपमान करण्याचे धारदार शस्त्र त्यांच्याकडे असते. त्यांना आपले हेतू ध्यानात येत नाही, त्यांना फक्त वाटते “हा कोण टिकोजीराव! आम्हाला काहीतरी वेगळे शिकवतो आहे. स्वतःचे ज्ञान घरी ठेवा म्हणाव ” हा त्यांचा सूर लगेच आपल्याला लक्षात येतो आणि अर्थातच आपण त्यांना काही सांगण्याच्या फंदातच पडत नाही
परंतु सुदैवाने अशा प्रकारची मंडळी अगदी तुरळक असत, पण एखादा खडा सुद्धा आपले जेवण काहीसे नीरस करतोच ना! उत्साही शिक्षकांचा उत्साह काही उदास मंडळी मुळे मावळतो, अशावेळी ज्येष्ठ शिक्षक, प्राचार्य, यांनी जे चैतन्याने काम करत आहेत, जे प्रयोगाशील आहेत, आपले तन-मन धन खर्च करत आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. कारण त्यातच वर्गात आशेने वाट पाहणाऱ्या नव्या पिढीचे भवितव्य दडलेले आहे. कुठल्याही क्षेत्रात लोकप्रियता ही योगायोगाने आपोआप मिळत नाही तर ती प्रत्यक्ष काम करून सातत्य ठेवून मिळवावी लागते. मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भक्तीचा पिसारा त्यांना लाभतो. मी असे काळजाचे शिक्षक अनेक पाहिले आणि मुशाफिरीतही आजही मी असे कार्यशील उत्साही शिक्षक पाहतो आहे अनुभवतो आहे. अध्यापनाची मनापासून आवड असणारे अनेक शिक्षक मी असे पाहिले की त्यांना अधिक वेतनाच्या व्यावसायिक संधी त्यांच्या उमेदीच्या वयात मिळत असूनही अध्यापकच व्हायचे याच स्वप्नाने ते झपातून या क्षेत्रात आले होते. जेव्हा कोणत्याही शाळेत कार्यक्रमासाठी जातो तेव्हा डोळ्यात उत्सुकता असलेला, संवादात प्रसन्नता आणि वागण्यात अगत्य असणारा तरुण अध्यापक मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला त्याचा मी न पाहिलेला, अतिशय रंगलेला असा तास कल्पनेने अनुभवतो.
एखादी मैफल रंगवायला गायक रंगमंचावर जावा त्या उत्साहाने जे वर्गात जातात आणि तास संपवून पुन्हा एकदा स्टाफरूम मध्ये परतल्यावर तो उत्तम अध्यापनाचा आनंदरंग त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसत असेल, तर तो अध्यापक या क्षेत्राशी एकरूप झाला आहे असे समजावे.
आपण अध्यापक अखेर माणसेच आहोत. केव्हा तरी कंटाळा येणारच. केव्हातरी मन उदास असणार ; आपल्या घरातील किंवा आयुष्यातील सुखदुःख आपल्या चेहऱ्यावर ते उमटणारच. पण हे ‘केव्हातरी ‘ केव्हातरीच असावे, जर तोच आपला स्वभाव झाला, तर आपणही उदास आणि समोरची पिढी उदास!
शक्यतो एका दालनातून दुसऱ्या दालनात जावे, तसे मनाचा मूड बदलून स्वतःला अंतर्यामातून बदलता येणे ही सुद्धा अध्यापन व्यवसायातील एक कला आहे. एकदा हा व्यवसाय आपण स्वीकारल्यानंतर त्या व्यवसायाविषयी, आणि विशेषतः जिवंत मनांना, नवी पंखभरारी देण्याचा हा व्यवसाय निवडल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. अंतर्मुख होऊन अगदी प्रत्येकाने आपल्याला या व्यवसायात आनंद मिळतोय का? मिळत असेल तर तो अधिक कसा मिळेल आणि मिळत नसेल तर तो का मिळत नाही याचा शोध अंतर्मुख होऊन घ्यायला हवा असे मला वाटते. आपल्या व्यवसायातील व्यावसायिक अस्थिरता, काही वेळा होणारा स्थानिक पातळीवरचा अन्याय, अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी शासकीय कामे ही कारणे आहेतच. नक्कीच अशा तऱ्हेच्या कारणांचे कुणीच समर्थन करणार नाही.
पण मला नेहमी वाटते, या सगळ्या बाह्य गोष्टीची शिक्षा त्या अजाण विद्यार्थ्यांना का बरे द्यायची,? उभे आयुष्य त्यांना साद घालत असत भविष्य खुणावत असते. मोठ्या अपेक्षांनी ती समोरील अध्यापकाकडे पाहत असतात. अशावेळी आपला अनुभव, आपले ज्ञान, व्यवहारज्ञान त्यांना भरभरून दिले तर शिक्षक पदाचा विस्तारही होतो आणि ते पद सखोले होते सखोलही होते.
कलावंत ज्याप्रमाणे कलेतील नवनिर्मितीमुळे चिरतरुण राहतो. अक्षरशः अध्यापकाच्या व्यवसायातही तेच घडत असते. मला काही जण विचारत असत, ” एकच कविता अनेक वर्ष शिकवून तुम्हाला कंटाळा येत नाही का? “
मी त्यांना म्हणत असे, “कविता तीच असेल, पण मी नवा आहे. मी नित्य नवा झालो की आपोआपच कवितेतील नवीन रूपरंग आकळतात. शिवाय दरवर्षी वर्ग बदलतो, चेहरे नवीन असतात. त्यामुळे अर्थात ती कविता मला “तीचतीच “वाटत नाही माझे तर स्पष्ट मत आहे, आपल्या मानसिक वयाबरोबर साहित्यातील संवेदनशील पदर अधिक उलगडत जातात. उदाहरणार्थ ‘औदुंबर’ सारखी कविता एका सारखी शिकवू शकत नाही. सतत त्यात नवे नवे काहीतरी सापडत जाते. खरे म्हणजे नवे जे सापडते, ते केवळ कवितेतील असत नाही, तर ते आपल्यातले नवे सापडते ;आणि त्यामुळे भाषा असो की विज्ञान, गणित असो का इतिहास भूगोल, विषय कुठलाही असो ;सतत नव्या वर्षी नव्या वर्गात नव्या मुलांपुढे आपण नवतेचा शोध घेत असतो आणि त्यामुळेच नवनिर्मितीचा आणि कलावंताचा ज्याप्रमाणे संबंध आहे, त्याप्रमाणे अर्थातच अध्यापकाचा आणि नवनिर्मितीचा संबंध आहे. म्हणूनच मला हाडाचा शिक्षकही कलावंत वाटतो. आचार्य अत्रे यांनी आपल्या आत्मकथनात” मी शिक्षक कसर झालो? “या प्रकरणांमध्ये स्पष्ट म्हणून ठेवले आहे, “पुढे आयुष्यात माझ्याकडून जे लेखन झाले, अनेक नाटके लिहिली गेली, साहित्यात मी अनेक प्रयोग केले, त्या सर्वांची मुळे माझ्या अध्यापन व्यवसायात आहेत. अतिशय बोलके वाक्य आहे त्यांचे. लेखनातील प्रतिभा अध्यापनात येते आणि अध्यापनातील प्रतिभेने आपले लेखने वेगळे होते.
शिक्षकाकडे अक्षरशः संपूर्ण समाज अध्यापनाच्या निमित्ताने वर्गात येतो. आणि त्यामुळेच अनेक सुखदुःखे आपण जवळून पाहतो. केवळ आपण पुस्तके वाचत नाही, विद्यार्थ्यांचे चेहरे वाचतो. चेहरे वाचतावाचता, सामाजिक पुस्तक कळत जाते. समाजात नेमके कुठले बरे वाईट बदल होत आहेत, मानसिक प्रवाह येत आहेत, कुठल्या प्रकृती विकृती जन्माला येत आहेत, हे आपल्याला एक कलावंत म्हणून कळते. अध्यापकाला ती संधी असते. मात्र ती घेतली पाहिजे. अध्यापनाच्या व्यवसायाकडे केवळ एक अनुक्रमाणिका पूर्ण करण्याचा, आणि उत्तर पत्रिका तपासण्याचा व्यवसाय तेवढ्यापुरताच जर आपण पाहिले, तर अनुक्रमणिका पूर्ण होईल आपण मात्र अपूर्ण राहू आणि अर्थातच एक अपूर्ण शिक्षक स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही, आणि आपल्या व्यवसायाला हिला न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच मनाच्या पूर्ण जागेपणाने, उत्फुल्ल मनाने आपण वर्गात जावे लागते. कलावंत ज्याप्रमाणे एखादी मैफल रंगवतो,.
कधी वक्तृत्वाने कधी अभिनयाने, त्याप्रमाणे अध्यापकाला सुद्धा वर्ग नावाची मैफल रंगवण्याची संधी असते. मात्र ते जिंदादिल मन आपल्यामध्ये हवे, ते आपल्यामध्ये तो निश्चित आहे, म्हणूनच हे हितगुज.
एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.
शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.
शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…
करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…
हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…
तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…
हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…
जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…
बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…
तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला,
हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…
अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.
गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्चर्य वाटे.
शाळा अशा मजेत चालायच्या!
आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.
अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.
सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.
(वरील कविता गेल्या शतकात मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. ही कविता वाचून आजच्या भक्तांच्या विचारात काही फरक पडावा ही अपेक्षा..)
प्रस्तुती : जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझे whatsap ज्ञान!!” – लेखिका : सुश्री नीलिमा जपे कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
गेल्या काही वर्षांत मी अभ्यास करून एवढे ज्ञान मिळवले आहे, जे मी कुठल्याही विद्यापिठाच्या पदवी साठी अभ्यास करतांना मिळवले नसेल. यासाठी मला एखाद्या विद्यापिठाने एखादी डॉक्टरेट प्रदान करावी, अशी शिफारस मी करू इच्छिते, पण ती कोणत्या विषयात द्यावी हे अजून ठरत नसल्याने घोडे अडले आहे.
खरंच मी या काही वर्षांत जगातील सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला असावा असे मला वाटते आहे. मी विज्ञान, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, भाषा, गणित, धार्मिक शास्त्रे, या आणि इतर अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला आहे. जेंव्हा पासून माझ्या भ्रमणध्वनी वर whats ap हे अतिशय उपयुक्त अॅप घेतले, तेंव्हा पासून ज्ञानाची अनेक कवाडेच माझ्यासाठी जणू खुली झाली.
त्या दिवसाासून मला आलेले एकूण एक लेख मी वाचून काढले आहेत, काहींची तर पुन्हा पुन्हा पारायणे केली आहेत. काही लेख तर पिंजून काढले आहेत. आणि त्यावर होणाऱ्या चर्चांचा अभ्यास बघता विचारमंथनातून नवनीत निघावे असे एकाहून एक सरस ज्ञानकण मी वेचित असते.
मी या अॅपची शतश: ऋणी आहे, इतकी की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी याच गुरुला साक्षात दंडवत घातला.
यावरच मला बाल संगोपनाचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून धडे मिळाले, पूर्वीच्या शिक्षा कशा अगदी मानस शास्त्राला धरून होत्या हे मी जाणले. त्यापायी मला अनेकदा माझ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करावे लागले, पण त्यात पुढे जाऊन त्यांचेच भले आहे हे उमजून मी त्याबद्दल जराही खंत बाळगली नाही. त्यातच अनेक पौष्टिक व समतोल पाककृतींचाही अभ्यास करता आला. आता त्या प्रत्यक्ष करून बघण्या इतका अवधी मिळाला नाही तो भाग अलहिदा. बऱ्याचदा बाहेरच्या पदार्थांवरच भागवावे लागले, पण ते सर्व मिळालेल्या ज्ञानामृतापुढे क्षुल्लकच, नाही का!
यावरच मला आईवडील कसे श्रेष्ठ असतात हेही कळाले, हे सर्व शिकत असताना त्यांच्याकडे जायला, अथवा संपर्क साधायला जमले नाही तो भाग वेगळा, पण आईवडील तेवढे तरी समजून घेतीलच!
संवाद कसा साधावा याचे धडे इथेच मिळाले, त्यामुळे शेजारी बसलेला दुरावला एव्हढेच नुकसान झाले दुसरे काही नाही.
कित्येक अनाथ मुले, हरवलेली कागदपत्रे माझ्यामुळे योग्य व्यक्तीला मिळाली असतील याची गणनाच नाही. Whats app मुळे माझी समाजसेवाही सुरु झाली. अनेक गरजू लोकांसम्बंधीचे लेख कधीकधी तर न वाचता देखील केवळ पुढे पाठवून मी आतापर्यन्त भरपूर पुण्य गोळा केले आहे. त्या नादात आजूबाजूच्या गरजूंकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही इतकेच.
यामुळेच मी नतमस्तक झाले आहे, कारण सतत मी मान खाली घालून काहीतरी वाचतच असते. ‘केल्याने देशाटन मनुजा येत ऐसे पांडित्य फार’अशी जुनी म्हण बाद करून ‘केल्याने व्हाट्सपायन…. …….. ‘अशी नवीन म्हण आता वापरावी असे मला वाटते.
यावरच मला कळले की माझी मराठी ही वैज्ञानिक भाषा आहे (? ) भाषा वैज्ञानिक कशी काय असू शकते असा प्रश्न ही मला कधी पडला नाही, कारण माझा w. a. वरील गाढ ( अंध) विश्वास. आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वश्रेष्ठ ठरले हेही समजले, तेव्हाही मला प्रश्न पडला नाही की सर्वच देशाचे राष्ट्रगीत त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. पूर्वी असे मानायची पद्धत होती की जे पेपर मध्ये छापून आले ते सर्व खरे. आता मी मानते की w. a. वर येते तेच फक्त खरे.
या नादात एकच कविता वेग वेगळ्या कवींच्या नावे आली, तरी मी संशय घेतला नाही. कारण great men think alike ही उक्ती मला माहीत होती. आपल्या प्रथा परंपरा कशा विज्ञानाला धरून होत्या याचाही मी अभ्यास केला. आणि त्या सर्व परपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. अर्थात ज्ञान कण वेचण्यातून वेळ मिळाला तर!
याशिवाय आयुर्वेद, आहारशास्त्र, वजन कमी करण्यासाठी असंख्य उपाय, घरगुती औषधे इत्यादी अनेक शास्त्रे मी अभ्यासली आहेत. त्या सर्व गडबडीत माझे वजन थोडे वाढले आहे, पण कदाचित ते वाढलेल्या ज्ञानाने असू शकेल असे मी मनाचे समाधान करून घेतले आहे. व्यायामाचे फायदे वाचता वाचता व्यायाम करायला वेळच न मिळाल्याने माझे आरोग्य गमावले आहे.
हे सर्व ज्ञान मिळवून त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करायला वेळच न मिळाल्याने मी माझे उरले सुरले शहाणपण गमावून बसले आहे हाच एक लहानसा तोटा!! ज्ञान मिळवून त्यातील काय घ्यावे व काय त्यागावे ही नीर क्षीर वृत्तीच मी हरवली आहे. बाकी काही फार नुकसान नाही. काही मिळवायचे असेल तर काही तरी गमवावेच लागते ना! शहाणपण गेले पण ज्ञान तर हाती आले ना!!
लेखिका : सुश्री नीलिमा जपे- कुलकर्णी
नाशिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.
एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!
☆
लेखिका : सुश्री दुर्गा भागवत
प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈